https://goodworld.in A website by Madhav Bhope

आठवणीतले झाकीरभाई- remembering Zakir bhai

zakir hussain

 

सहेली.. शब्द प्रांगण या ग्रुप मध्ये, श्री सौरभ जोशी यांचा आलेला लेख, खूप आवडल्याने, इथे, मूळ लेखकाच्या नांवासकट प्रकाशित करत आहोत.

 

आठवणीतले झाकीरभाई

 

सौरभ जोशी

 

 

 

झाकीरभाई अनंताच्या प्रवासाला गेले, आणि माझ्या मनात त्यांच्या आठवणींचं मोहोळ उठलं. अर्थात त्यांचा भरपूर सहवास लाभावा, इतका मी भाग्यवान नव्हतो. पण माझ्याकडच्या चिमुटभर पुण्याईच्या शिदोरीवर माझ्या आयुष्यात त्यांच्याबरोबर जे काही चार क्षण घालवायचं भाग्य मला लाभलं, ते क्षण म्हणजे साक्षात अमृतशिंपण करणारे होते. त्याविषयी हा छोटा लेखनप्रपंच.

तर, मी चार वर्षांचा असताना झाकीरभाईंना पहिल्यांदा पाहिलं. त्याचं झालं असं की, बोरिवलीला भाटिया हॉलमध्ये इतर काही कलाकारांबरोबरंच अब्बाजी आणि झाकीरभाईंच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होता. तेव्हा झाकीरभाईंनी जो काही तबला वाजवला, त्याने मी जो संमोहित झालो, तो कायमचा. मला त्यांचं वादन आणि त्यांचं व्यक्तिमत्व इतकं आवडलं, की चार वर्षांचा मी आई बाबांना म्हणालो, “माझी मुंज भाटिया हॉलमध्ये करायची, कारण तिथे झाकीरभाई येतात”. आपण किती मोठ्या कलाकाराबद्दल असं म्हटलं, याची तेव्हा माझ्या बालमनाला पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांचं मोठेपण नंतरच्या जीवनात त्यांच्या कार्यक्रमांतून, त्यांना भेटण्यातून, त्यांच्याशी थोडंफार जेव्हा केव्हा बोलायला मिळालं, त्यातून उलगडत गेलं.

 

कलाकार किती नम्र असावा, याचा मूर्तिमंत वस्तुपाठ झाकीरभाई पदोपदी घालून देत असंत. त्याविषयी काही आठवणी सांगतो.

 

१९९३ साली फेब्रुवारी महिन्यात उ.अमीर हुसेन खॉं साहेबांच्या बरसीनिमित्त दादरला छबिलदास विद्यालयात एकल तबलावादनाचे कार्यक्रम होते. त्यात शेवटी झाकीरभाईंचं एकल तबलावादन होतं. नगम्याला सारंगीवर उ.सुलतान खाँसाहेब. मी आणि माझा भाऊ दीपक जोशी इतके भाग्यवान होतो, की कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होऊन सगळे गिचमिडीत बसले असताना, फूटभरच उंची असलेल्या स्टेजच्या अगदी पुढ्यात, झाकीरभाईंपासून अगदी दोन हात अंतरावर स्टेजला खेटूनंच आम्ही बसलो होतो आणि अख्खा कार्यक्रम ऐकला. पं.पढरीनाथ नागेशकर, पं.अरविंद मुळगावकर, पं.सुरेश तळवलकर पं.भाई गायतोंडे, पं.सुधीर माईणकर, अशी अनेक बुजुर्ग खानदानी तबलाविद्यालयं बाजूला बसली होती. झाकीरभाई आणि खाँसाहेब मंचावर स्थानापन्न झाल्यावर निवेदक श्रीकृष्ण जोशी यांनी “ज्यांचं एकल तबलावादन ऐकण्यासाठी आपण सारे खूप वेळ उत्सुक आहोत, ते उस्ताद झाकीर हुसेन मंचावर विराजमान झाले आहेत” असं म्हणून त्यांचं स्वागत केलं. तेव्हा त्यांचं निवेदन पूर्ण होण्याच्या आधीच त्यांना थांबवून झाकीरभाईंनी माईक हातात घेतला, आणि म्हणाले, “मै एक correction करवाना चाहता हूं l जहा इतने ग्यानी बुजुर्ग कलावंत सामने बैठे हो, जहा उ.अमीर हुसैन खॉंसाहाब जैसे तबलियाकी बरसी हो रही है, जहा बाजू मै यही मंच पे सुलतान खाँसाहाब बैठे हो, ऐसी जगह सरस्वती के मंदिर जैसी बन जाती है l वहा (स्वतःच्या छातीवर हात ठेवून) हम जैसे बच्चोंको उस्ताद कहना ठीक नही है l अगर उस्ताद कहनाही हो, तो उस्ताद सुलतान खां (त्यांच्याकडे हात दाखवून) कहीये l हम तो अभीभी सिख रहे है l गुरजनोंकी कृपा से जो थोडा बहोत बजाता हूं, वो ही बजाकर मै और हम सब मिलके ये बरसी के अवसरपर माता सरस्वतीके चरण मे पूजा करेंगे l” यश आणि कीर्तीच्या परमोच्च शिखरावर पोचलेला हा कलाकार भर मैफिलीत स्वतःला बच्चा म्हणतो, अजूनही शिकतोय, असं म्हणतो, ही किती नम्रता? कलाकार बरेच असतात. पण आपल्यातील कलेच्या अचाट अविष्काराबद्द्ल जराही गर्व न बाळगता इतका साधेपणा, इतका विनयशीलपणा दाखवणारा झाकीरभाईंसारखा कलाकार विरळाच, नव्हे, ऐसा होणे नाही.

 

अशीच अजून एक आठवण. पार्ल्याला लोकमान्य सेवा संघात एकदा झाकीरभाईंचं एकल तबलावादन ऐकायला आणि पाहायला (हो, पाहायला देखील कारण, त्यांचं वादन हे श्रवणीय आणि प्रेक्षणीय असं दोन्ही होतं) गेलो होतो. तेव्हाही असाच त्यांच्या पुढ्यात स्टेजला चिकटून बसलो होतो. सारंगीवर उ. सुलतान खाँसाहेब. खॉंसाहेबांनी सारंगीवर सुंदर आलापी सादर करून वातावरण भारून टाकलं, आणि झाकीरभाईंनी आपल्या वादनास सुरूवात केली. पेशकार संपवून कायदा घेतला वाजवायला, त्याची दीडपट करून झाली, दुगुन केली आणि कायदाविस्तार करण्यासाठी पलट्यांमध्ये शिरले. इथपर्यंत वादन सुरू करून साधारण अर्धा तास-चाळीस मिनिटं झाली असतील, आणि प्रख्यात संवादिनीवादक पं.अप्पा जळगावकर सभागृहात प्रवेशते झाले, आणि स्टेजच्या समोरच भारतीय बैठकीवर येऊन बसले. ते पाहून झाकीरभाई वाजवायचे थांबले. प्रेक्षकांना कळेना काय झालं. झाकीरभाई मग स्टेजवरून उतरून अप्पांजवळ आले, भर मैफिलीत स्टेजच्या पुढ्यात गुडघे टेकून अप्पांच्या पायावर डोकं ठेवलं, आणि अप्पांना स्टेजवर घेऊन आले.

तबल्यावरचा माईक हातात घेतला आणि म्हणाले, “आज अप्पाजी का जनमदिन है l मेरा परमसौभाग्य है, की अप्पाजी के जनमदिनपर उनके सामने मै बजा रहा हूं l” असं म्हणून स्वतःला स्वागतपर मिळालेली शाल अप्पांवर घातली, आणि पुन्हा स्टेजवर त्यांना नमस्कार केला. हे सगळं झाल्यावर अप्पा स्टेजवरून खाली भारतीय बैठकीवर, जिथे आधी बसले होते, तिथे उतरून जायला लागले. तेव्हा झाकीरभाई त्यांना म्हणाले, “अप्पाजी, कहा जा रहे हो? रुकीये l” मग श्रोत्यांना उद्देशून म्हणाले,”अप्पाजी जैसे महान कलाकार जब सभागृह मे हो, तो उन्हे स्टेजके सामने बैठकपर बिठाके हम जैसे छोटे लोगोंने स्टेजपर बैठ के बजाना गलत है l” मग अप्पांना उद्देशून म्हणाले, “अप्पाजी, आप यही स्टेजपर मेरे बाजू मे बैठकर मुझे तबला बजाने के लिये आशीर्वाद देते रहीये”, असं म्हणून अप्पांना स्वतःच्या बाजूला बसवून अख्खा सोलो वाजवला. आणि हे सगळं भर कार्यक्रमात, शेकडो प्रेक्षकांसमोर, वादन सुरू करून अर्धा तास होऊन गेल्यावर. झाकीरभाई तबलावादकाबरोबरंच एक माणूस, एक कलाकार म्हणून हे असे होते. इतकी नम्रता मी आजवर कुठल्याही कलाकारात पाहिली नाही. म्हणूनच झाकीरभाई हे व्यक्तिमत्व नव्हतं, तर पुलंच्या भाषेत सांगायचं तर विभूतिमत्व होतं.

 

आता झाकीरभाईंच्या मिश्किलपणाच्या एक दोन आठवणी सांगतो. १९९१ सालची गोष्ट. हरिजींनी त्यांच्या वृंदावन गुरुकुलातर्फे एक पूर्ण रात्र ५ जुगलबंदीचा कार्यक्रम शिवाजी पार्क ला ठेवला होता. त्यात अर्थातच झाकीरभाई देखील तबला वाजवणार होते. मला झाकीरभाईंचा कुठलाही कार्यक्रम मागे बसून पाहायला आवडायचं नाही. कारण मघाशी म्हटल्याप्रमाणे मला त्यांचं वादन नुसतं ऐकायचं नसायचं, तर ते पहायचं ही असायचं. त्याचबरोबर झाकीरभाईंच्या मुद्रा, डोळे, उडणारे कुरळे केस, मात्रांचा हिशोब डोक्यात चालू असताना हवेत एका जागी पाहत स्थिर राहणारे त्यांचे पाणीदार डोळे, हे सारं डोळे भरून पाहायचं असायचं. त्याप्रमाणे, मी पुढील रांगेतील महाग तिकिटे असतात वगैरे कसलाही विचार न करता सरळ पहिल्या रांगेतील सोफ्यावर जाऊन बसलो. पण दुर्दैवाने हरिजी आणि झाकीरभाईंची जुगलबंदी सुरु झाल्यावर आमंत्रितांपैकी कोणीतरी हस्ती सोफ्यावर बसण्यास आल्या, आणि मला उठावं लागलं. पण मी इतका बेशरम की, मुकाट्याने मागे आपल्या जागी यायचं सोडून मी सरळ स्टेज च्या झाकीरभाईंच्या बाजूला असणाऱ्या पायऱ्यांपैकी पहिल्या पायरीवर जाऊन बसलो, आणि झाकीरभाईंना वाजवताना पाहत राहिलो. ती पायरी स्टेज च्या बऱ्यापैकी जवळ होती, म्हणजे अजून २-३ पायऱ्या चढल्या कि थेट स्टेज वरंच…हरिजींबरोबर तबला वाजवताना मध्येच झाकीरभाईंनी मी पायरीवर येऊन बसलोय हे पहिलं. त्यांच्या जागी इतर दुसरा कुठला कलाकार असता, तर त्याने मला तडक उठवलं असतं, किंवा आयोजकांना मला तिथून उठवायला सांगितलं असतं. पण झाकीरभाई माझ्याकडे पाहून मिश्किल हसले, आणि “आता इतक्या जवळ येऊन बसलाच आहेस, तर आता माझ्या बाजूलाच येऊन बस” अशा अर्थी स्व:च्या मांडीच्या बाजूला स्टेज वर हाताने थाप देऊन खूण केली, आणि पुन्हा हसले. हे सगळं हरिजींना तबला साथ चालू असताना …! मी ती संपूर्ण जुगलबंदी तिथेच त्या स्टेज च्या पायरीवर बसून झाकीरभाईंना मनसोक्त डोळ्यात साठवत ऐकली. त्या वेळी रात्री नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत झाकीरभाईंनी सलग पाच जुगलबंदींमध्ये वादन केलं. झाकीरभाई आणि अब्बाजी, झाकीरभाई आणि पं.बिरजू महाराज, झाकीरभाई पं.जसराज आणि, झाकीरभाई आणि हरिजी, झाकीरभाई, पं.बिरजू महाराज आणि पं.केलूचरण महापात्रा. झाकीरभाईंच्या वादनातील clarity, वजन, आणि शक्ती जशी आदल्या रात्री नऊ ला होती, तशीच सकाळी पाच ला पाच जुगलबंद्या सलग वाजवून झाल्यावरंही होती. काय अचाट शक्ती आणि उत्साह. हे फक्त आणि फक्त झाकीरभाईच करू जाणोत.

 

त्यांच्या spontaneous sense of humor आणि मिश्कीलपणाची अजून एक आठवण. असंच एकदा नेहरू सेंटर ला गुणीदास संगीत संमेलनामध्ये उ.सुलतान खानसाहेबांचं सारंगीवादन आणि साथीला झाकीरभाई, असं सत्र होतं. खॉंसाहेब आणि झाकीरभाई मंचावर येऊन बसले. निवेदकाने झाकीरभाईंची भरभरून ओळख करून दिली, आणि त्यात एक वाक्य फेकलं, “उम्र के तीन सालसे आपने तबले की शिक्षा प्राप्त करने की शुरुवात की, सात साल की उम्र मे पेहेला प्रोग्राम बजाया, और तभी से अबतक कभी भी पीछे मुडकर नही देखा l” हे वाक्य झाकीरभाईंनी ऐकलं, आणि त्वरीत निवेदकाकडे मागे वळून पाहिलं, आणि म्हणाले “अभी तो देखा l” त्यावर सभागृहात जो हशा पिकला, की विचारायची सोय नाही.

 

आपल्यापेक्षा वयाने, यशाने, कीर्तीने ,ज्ञानाने कितीही छोट्या असलेल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे कमी लेखायचं नाही, हा कटाक्ष झाकीरभाईंनी आयुष्यभर पाळला. याचीच साक्ष देणारा माझ्या जीवनात झाकीरभाईंनीच दिलेला अजून एक अनुभव. माझे गुरु पं. मल्हारराव कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक वर्षी झाकीरभाई आणि फाझलभाई  अशी जुगलबंदी बोरिवली ला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आयोजित केली होती. त्यादिवशी कार्यक्रमस्थळी झाकीरभाईंना घेऊन यायची जवाबदारी राघुदादाने (श्री. राघवेंद्र कुलकर्णी, म्हणजे माझ्या गुरुजींचे ज्येष्ठ सुपुत्र) माझ्यावर सोपवली होती, नव्हे, राघुदादाकडे हट्ट करून मीच माझ्याकडे खेचली होती…! संध्याकाळी ५-३० च्या सुमारास सांताक्रूझ विमानतळाबाहेरील हॉटेल ऑर्किड मधून झाकीरभाईंना घेऊन बोरिवली ला प्रबोधनकार नाट्यगृहात गाडीने घेऊन यायचे होते. माझ्यासाठी तो उत्सवाचा दिवस होता. झाकीरभाई दिल्लीहून विमानाने मुंबईत येऊन, ऑर्किड ला येऊन, फ्रेश होऊन, कपडे करून पुढे आमच्या कार्यक्रमाला यायचे होते. मी अर्धा तास आधीच ऑर्किड ला पोचलो. ६ वाजून गेले तरी झाकीरभाई दिल्लीहून आले नाहीत. विमान अर्धा पाऊणतास लेट झालं होतं. मग सव्वा सहा च्या सुमारास झाकीरभाई आले. एक साधा डेनिमचा फुल शर्ट आणि जीन्स ची पॅन्ट असा त्यांचा पेहेराव होता. त्या पेहरावात मी झाकीरभाईंना त्यावेळी प्रथम पाहिलं. माझ्या झब्ब्यावरील volunteer च्या बॅचवरून त्यांनी मला लगेच ओळखलं, आणि मी काही बोलायच्या आतच, उशीर झाल्याबद्दल माफी मागितली. मलाच लाजल्यासारखं झालं. इतका महान, जगद्विख्यात, आणि कीर्तीच्या अत्युच्च शिखरावरील कलासूर्य, माझ्यासारख्या किस झाड की पत्ती असणार्या काजव्याची विमानाला उशीर झाल्याने आणि त्यांची काही चुकी नसताना उशीर झाला म्हणून माफी मागतो, याला काय म्हणावे? मी म्हटलं, “झाकीरभाई, it’s ok, आप क्या मुझ जैसे बच्चे को sorry बोल रहे हो l Flight delay हुआ, तो क्या करूं सक्ती है l” मग म्हणाले, “नही नही, आप को इंतजार करना पडा, मुझे अच्छा नही लगा l आप आप यही लॉबी मे बैठो, में १० मिनिट मे तय्यार होके आता हूं l” असं म्हणून त्यांच्या रूमवर गेले, आणि दहाव्या मिनिटाला सलवार कुडता घालून हजर झाले. म्हणाले चलिये. ऑर्किडवरून निघताना तिकडच्या security guard च्या विनंतीस मान देऊन, त्याच्याबरोबर फोटो काढून दिला. आपल्यासमोर जो माणूस येईल, मग तो लहान, थोर, कुणीही असो, त्याला सन्मानानेच वागवून, त्याच्यावर आपल्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचं जराही दडपण येऊ द्यायचं नाही, हे त्यांचं तत्व, मला तेव्हा उमगलं. झाकीरभाईंबरोबर सांताक्रूझ ते प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली असा आमच्या गाडीतून केलेला प्रवास म्हणजे माझ्या आयुष्यातील अनमोल स्मृतीकुंभ आहे. त्या पाऊण एक तासात त्यांच्याशी झालेल्या गप्पा मी आयुष्यभर माझ्या हृदयात जपून ठेवल्या आहेत.

 

आज माझे शब्द अबोल झालेत, बोटं बधिर झाली आहेत…

आज झाकीरभाई या जगात नाहीत हे सत्य जरी असलं, आणि जरी एक ना एक दिवस हे अटळ होतं, तरीही माझं मन हे अजून स्वीकारूच शकत नाहीये… नव्हे, ते सत्य असलं तरी कधीही स्वीकारणारंच नाही. कारण वर कथन केल्याप्रमाणे मी चार वर्षांचा असताना जेव्हा मी झाकीरभाईंना प्रथम पाहिलं आणि ऐकलं, तेव्हापासूनच माझ्या हृदयात झाकिरभाईंसाठी एक स्वतंत्र सिंहासन तयार झालं, जे माझं हृदय चालू असेपर्यंत राहील, आणि त्यावर झाकीरभाई कायम विराजमान असतील.

 

बहुत काय लिहिणे, इति लेखनसीमा.

 

– सौरभ जोशी

१८.१२.२०२४

————————-

ज्ञान ,मनोरंजन, माहिती, यासारख्या update मिळविण्यासाठी join करा..

सहेली.. शब्द प्रांगण

What’sapp group 10

 

https://chat.whatsapp.com/Bz3uFrE8LpSB3h7BBa5hK0

 

सहेली.. शब्द प्रांगण

 

प्रत्यय निरूपण

samarth ramdas

Guest Article by Shri Pandurang Deshpande

प्रत्यय निरूपण

 खालील लेख हा विशेषेकरून श्री समर्थ रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ ज्यांनी वाचला आहे, अभ्यास केला आहे, अशा साधकांसाठी आहे. नुसते वाचून, अभ्यास करून काही होत नाही, तर प्रत्यक्ष अनुभव हेच परमार्थाचे उद्दिष्ट आहे, हे या लेखात सांगितले आहे.
dasbodh2
 

दासबोधामध्ये समर्थांनी मानवी जीवनातील भौतिक व आध्यात्मिक पातळीवरील  विविध विषयांचा सर्वस्पर्शी विशालपट  सविस्तरपणे उलगडला आहे.

 पूर्वार्धात समर्थांनी प्रपंच अपूर्ण व दुःखाने भरलेला असून आत्मज्ञान  म्हणजेच खरे देवदर्शन असे सांगून मानवी बुद्धीला दृष्याकडून दृश्य निरसनाकडे ,  स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेण्याचा मार्ग दाखविला आहे. सत्संगतीत आत्म्याविषयी सतत श्रवण,मनन व निदिध्यास करायला सांगितले आहे. गुरु करायला व त्याचा उपदेश जीवनात  आचरणात आणून त्याच्या कृपेला पात्र होण्यास सांगितले  आहे.

प्रत्यय किंवा प्रचिती यांनी येणारे ज्ञान  हेच खरे असे दासबोधाच्या  पूर्वार्धात शेवटी शेवटी  म्हणजे नवव्या  दशका पासून सांगायला समर्थ सुरुवात करतात. त्याआधी ते मायाब्रह्म निरूपण,दृश्यनिरसन,अनुमान निरसन,संदेहवारण, विकल्पनिरसन आणि भ्रमनिरुपण आदि संकल्पनातून श्रोत्याला, अनुमानाचे किंवा केवल पुस्तकाचे ज्ञान खोटे आहे असे दाखवून तिथून  पुढे  प्रचितीच्या वा प्रत्ययाच्या भूमिकेवर आणतात.

त्यांची  प्रचिती व प्रत्यय याविषयी जगज्योति दशक (समास ८), विवेकवैराग्य दशक (समास २) नामरूप दशक(समास ७) ही तीन स्वतंत्र प्रकरणे  आपण वाचतोच.

भौतिक जीवनाचा संदर्भ घेऊन प्रकरणांचे शेवटी प्रत्यय हीच परमार्थातील अंतिम ज्ञानाची कसोटी आहे असे ते पटवून देतात.

पूर्वार्धातील आत्मवस्तुचा सिद्धांत  व्यावहारिक आणि पारमार्थिक जीवनात कसा आचरणात आणायचा  हे समर्थ उत्तरार्धात सांगतात. संबंध दासबोध हा केवळ प्रचिती व प्रत्ययज्ञानाचा म्हणजेच अपरोक्षज्ञानाचा आदर्श ग्रंथच आहे. परमार्थाला वैराग्यासह विवेकाची जोड अत्यंत आवश्यक आहे हे ते वारंवार सांगतात.तसेच ज्या विवेकाने आत्मानात्म विचार करायचा तो सुद्धा प्रत्ययाच्या म्हणजेच स्वानुभवाच्या पायावर आधारलेला असावा,नाहीतर विवेक केवळ कल्पनारूप उरतो.

त्यांनी प्रत्ययाच्या अनेक ओव्या दासबोधात ठिकठिकाणी लिहिल्या आहेतdasbodh1

 अनुमान निर्शन -पिंडब्रह्माण्डाविषयी –

येथे प्रचित हे प्रमाण ।ना लगे शास्त्राचा अनुमान |   अथवा शास्त्री तरी पाहोन ।प्रत्ययो आणावा ।।(९-५-१४)

जितुके अनुमानाचे बोलणे ।तितुके वमनत्यागें टाकणे ।निश्चयात्मक बोलणे ।प्रत्ययाचे ।।(९-५-३९)

 सगुणभजन निरूपण नाम —

म्हणौन सगुण भजन ।वरी विशेष ब्रह्मज्ञान ।प्रत्ययाचे समाधान ।दुर्लभ जगी ।।(१०-७-३१)

नाना व्रते नाना दाने ।नाना योग तीर्थाटणें ।सर्वांहूनि कोटिगुणें ।महिमा आत्मज्ञानाचा ।।(१०-१०-६४)

या प्रचितीच्या गोष्टी ।प्रचित पाहावी आत्मदृष्टी ।प्रचितीवेगळे कष्टी।होवोची नये ।।(१०-१०-६७)

प्रत्यय निरूपण –

बरे करीत बरे होते ।हें तों  प्रत्ययास येते ।आता पुढे सांगावे ते। कोणास काये ।।(१२-२-२८)

 विवेक वैराग्य –

प्रखर वैराग्य उदासीन ।प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान ।स्नानसंध्या भगवद्भजन| ।पुण्यमार्ग ।।(१२-४-१८)

 सृष्टिनिरूपण नाम-

पुस्तकज्ञाने निश्चय धरणे ।तरी गुरु कासया करणे ।या कारणे विवरणे ।आपुल्या प्रत्यये  ।।(१२-७-६)

 उभारणी निरूपणनाम –

नवे अनुमानाचे बोलणे ।याचा बरा प्रत्यये  घेणे ।वेदशास्त्र पुराणें ।प्रत्यये  घ्यावी ।।(१३-३-१७)

जे आपल्या प्रत्यया  येना ।ते अनुमानिक घ्यावे ना ।प्रत्ययाविण सकळ जना ।वेवसाय नाही ।।(१३-३-१८)

 कर्ता निरूपण  नाम –

बरे पाहता प्रत्यये आला| तरी का करावा गलबला ।प्रचित आलीयां आपणाला ।अंतर्यामी||(१३-८-३६)

 अखंड ध्यान नाम-

खोटे अवघेंच सांडावे| खरे प्रत्यये वोळखावें ।मायात्यागें समजावे|परब्रह्म ।।(१४-१०-९)

 आत्मदशक –शाश्वतब्रह्म निरूपण

लोकांचे बोली लागला|तो अनुमानेची बुडाला ।या कारणे प्रत्ययाला|पाहिलेच पाहावे||(१५-४-३१)

 सप्ततीन्वय –

पिंडावरून ब्रह्माण्ड पाहावे| प्रचितीने प्रचीतीस घ्यावे|उमजेना तरी उमजावे|विवर विवरो ।।(१६-७-४१)

आणि शेवटी —

 पूर्णदशक-सूक्ष्मनामाभिधान –

उदंड हुडकावे संत ।सांपडे प्रचितीचा महंत ।प्रचितीविण स्वहित । होणार नाही ।।(२०-३-२७)

प्रपंच अथवा परमार्थ ।प्रचितीविण अवघे वेर्थ ।प्रत्येयज्ञानी तो समर्थ ।सकळांमध्ये||(२०-३-२८)

शुद्ध सार श्रवण।शुद्ध प्रत्ययाचे मनन ।विज्ञान पावतां  उन्मन | सहजचि होते|| (२०-१०-२५)

ग्रंथाचे करावे स्तवन|स्तवनाचे  काय प्रयोजन| येथे प्रत्ययास कारण ।प्रत्ययो पाहावा ।।(२०-१०-३३)

याशिवायही अनेक ओव्या आहेत. या ओव्यांचे अर्थ स्पष्ट आहेत.dasbodh3

प्रपंचातील घटना ,वस्तू  अनुभव इंद्रियगोचर असतात  प्रपंचातील ज्ञान पडताळ्याने लगेच तपासात येतो. परंतु  परमार्थातील घटना, आत्मवस्तु व अनुभव हे सर्व अतींद्रिय असतात.  पडताळ्यासाठी इतर सिध्दसाधकांचा अनुभव तेथे कामास नाही. एवढेच काय  पण सद्गुरूंचा अनुभव सुद्धा आपल्या समाधानास पुरा पडत  नाही. तेथे फक्त स्वयंसाधनेने आलेला स्वानुभवच ज्ञानाच्या खरेपणाबद्दल निश्चयवृत्ती करतो … स.भ.प.पु. बेलसरे महाराज सांगतात की  प्रचितीचा दृष्टिकोन  हा प्रपंच आणि  परमार्थात मूलभूत आहे..पण परमार्थात प्रचिती येणे (आत्मसाक्षात्कार होणे )म्हणजे  काय साधते हे सांगणे अवश्य असते..मुंडक उपनिषदामध्ये दुसऱ्या अध्यायात असा मंत्र आहे–

भिंद्यन्ते हृदयग्रंथी: छिन्द्यन्ते सर्व संशया:।क्षीयंते चास्य कर्माणि तस्मिन्द्रष्टी परावरे ।।”

-सर्वत्र समानपणे व्यापून असलेल्या ब्रह्माचे दर्शन झाले की हृदयात वास करणारी अविद्या आणि तिच्यापासून उत्पन्न होणार वासनासमुदाय नष्ट पावतो. मनातील संदेह नष्ट पावतात..प्रत्ययामुळे निश्चळ आत्मनिवेदन होते..पापखंडन  होऊन कर्मक्षय होतो.माणसाचा जन्म मरणाचा फेरा होणे थांबते.

म्हणून समर्थ म्हणतात की ..

पापाची खंडना  जाली  ।जन्मयातना चुकली ऐसी स्वयें प्रचित आली म्हणिजे बरें  ।।(१०-८-२१ ते २३)

परमेश्वरास ओळखिलें ।आपण कोणसे कळले| आत्मनिवेदन जाले म्हणजे बरें ।।

ब्रह्माण्ड कोणे केले| कासयाचे उभारलें | मुख्य कर्त्यास ओळखिले म्हणिजे बरें| ।।

जय जय रघुवीर समर्थ ।

-पांडुरंग  देशपांडे

लेखक- श्री पांडुरंग देशपांडे.

pandurang deshpande
pandurang deshpande

लेखक हे Textile Process Advisor and consultant असून मुंबई येथील UDCT मधून Textile Engineer झालेले आहेत. व्यवसायानिमित्त भारतभर भ्रमण केले आहे. आणि अध्यात्माची आवड असल्याने संत वाङमयाचे अभ्यासक आहेत.

सांभाजीनगरातील बिबट्या पुराण Leopard in Sambhajinagar

IMG 20240718 WA0055

Guest article by vaidya Sohan Pathak

संभाजी नगरातील बिबट्याचे पुराण!

 
अहो काय वैताग! गेले तीन दिवस संभाजीनगरच्या सो कॉल्ड कोथरूडमध्ये म्हणजेच उल्कनगरीमध्ये बिबट्या सदृश्य प्राण्याने अक्षरशः थैमान घातले आहे. 
 
वनविभागाचे कर्मचारी सोडून बाकी तमाम जनतेला त्या अजब प्राण्याने सीसीटीव्हीतून दर्शन दिले आहे. कदाचित त्या बिबट्याचा मागचा जन्म कॅमेरा समोर वावरणाऱ्या एखाद्या सराईत कलाकाराचा असावा. या बिबट्याच्या भीतीपोटी मात्र आधीचेच सहनशील संभाजीनगर कर अजूनच त्रस्त झाले आहेत पण महानगरपालिकेचे कर्मचारी मात्र पाण्याची चर्चा दुसरीकडे वळाली म्हणून खूप आनंदी झाले आहेत असे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर एका मनपा कर्मचाऱ्याने सांगितले.Leopard
बऱ्याच  ऑर्थोपेडिक सर्जन कडे-अचानक वर कुठे बिबट्या झाडावर बसलेला आहे का या चिंतेपोटी वर बघून चालण्यामुळे,  धपकन रस्त्यात, खड्ड्यात ,पाण्यात पडल्यामुळे जखमी झालेले बिचारे संभाजीनगर कर चकरा मारत आहे असेही कळाले . 
 
अचानक मफलर च्या विक्रीत वाढ झाल्याचे सुद्धा कळाले, कारण बिबट्याने आपल्या गळ्याला धरल्यावर, त्याचे दात लागू नये म्हणून काहीतरी आवरण हवे म्हणून बरेच जण मफलर घालून फिरत आहेत!  दिवसभर बिबट्याच्या चर्चा ऐकून रात्री स्वप्नात सुद्धा बिबट्या आल्यामुळे झोपेत बेड वरून खाली पडणे, तसेच जोरात ओरडणे,  व नवरा बायकोने एकमेकाला बिबट्या समजून हाणामारी करणे अशा अनेक घटना सुद्धा होत आहेत!
 
बायकोच्या बडबडीला कंटाळून संध्याकाळी, रात्री “जरा बाहेर चक्कर मारून येतो” असे म्हणून बाहेर पडणारे बिचारे पुरुष सध्या बिबट्या पेक्षा बायको बरी! म्हणून घरीच श्रवणीय आनंद घेत आहेत. 
 
आता निवडणुका ,मॅचेस सगळं काही संपल्यामुळे तरुण वर्गाला सुद्धा बिबट्याची चर्चा करत अनेक जणांशी, जणींशी जवळीक साधता येत आहे. जनरल प्रॅक्टिशनर मात्र या बिबट्यामुळे जरा नाराज आहेत. कारण या बिबट्याच्या भीतीपोटी अनेक जणांचा कॉन्स्टिपेशन चा त्रास आपोआपच बरा झाला आहे त्यामुळे त्या औषधासाठी येणारे रुग्ण खूप कमी झाले आहेत. 
 
आजोबा मंडळी जंगलातले प्राणी आता शहरात यायला लागले म्हणजे आता कलियुगाचा अंत आला ,काहीतरी भयंकर होणार अशा चिंता करत संध्याकाळी कट्ट्यावर भेटण्याचे ऐवजी एकमेकाना ज्येष्ठ नागरिकांच्या व्हाट्सअप ग्रुप वरून कॉल करून संपर्क करत आहेत. 
 
या बिबट्याच्या निमित्ताने आमच्या काळात तर… असे म्हणत किती वाघ पाहिले किती जंगली प्राणी पाहिले अशी पण चर्चा करत मनाचे समाधान करताना दिसत आहेत. अचानक शाळेला सुट्टी मिळाल्यामुळे मुलं-मुली आनंदातच आहेत त्यांच्या घरातल्या दंग्यामुळे आयांना येणाऱ्या रागामुळे बहुदा बिबट्या शहरातून पळून गेल्याची पण शक्यता नाकारता येत नाही.
 
हा बिबट्या पण खूप हुशार दिसतोय सगळ्या सीसीटीव्ही कॅमेर्यात व्यवस्थित पोज देत आहे यामुळे अफवा पसरवणाऱ्यांना दहा-दहा वर्षाचे जुने बिबट्यांचे व्हिडिओ सुद्धा प्रसारमाध्यमात पसरवायला भरपूर वाव मिळत आहे. मला तर वाटते की या सगळ्या प्रकाराला कंटाळून वनविभागाच्या पिंजऱ्यांमध्ये बिबट्या स्वतःहूनच येऊन बसेल आणि संभाजीनगर कर सुटकेचा श्वास घेऊन कुठे जलवाहिनी फुटली याची चर्चा करत बसतील.
मी सो…पा…
May be an image of cheetah, big cat and snow leopard
 
 

 बिबट्या कुठे आढळून आल्यास टोल फ्री नंबर 1926 

24*7 नंबर- 95792 71552

c6d568ad b7d1 44a2 9f31 734d0cfc0fa1

dr sohan pathakसदरील लेख हा छ. संभाजीनगर येथील प्रथितयश आयुर्वेदिक चिकित्सक  आणि समुपदेशक वैद्य  सोहन पाठक यांच्या फेसबुक पोस्ट वरून त्यांच्या परवानगीने साभार घेतला आहे. 

 

Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids

71Rd 72h5jL. SX679

30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.

 

 

For readers in USA- visit our Amazon Link below to shop for Amazing kids toys and much more. You can shop for other requirements also through this link

Tri cycle for toddlers

Amazing joy Riding toys

न लगे मुक्ति धन संपदा

sant tukaram news 92203693

Guest Article by Shri Pandurang Deshpande

आपण वेगवेगळ्या संतांच्या साहित्याचा अभ्यास केल्यास असे जाणवते, की जेवढे म्हणून संत झाले आहेत, त्या सर्वांची अनुभूति एकच असते. फक्त त्यांच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार आणि त्या त्या काळानुसार, त्यांची व्यक्त होण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी असते, किंवा त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार त्यांच्या कडून त्या त्या वेळेला आवश्यक असलेल्या गोष्टीला थोडे जास्त महत्व दिले जाते. वरवर पाहिले तर कदाचित त्यांच्या विचारांमध्ये फरक वाटू शकतो, पण त्यांच्या पातळीवर जाऊन पाहिल्यावर दोन्हीमधील एकवाक्यता लक्षात येते.

असेच महाराष्ट्रातील दोन संत म्हणजे संत तुकाराम महाराज आणि आणि समर्थ रामदास.images 10629 18 pic 0

हे दोघेही संत साधारण एकाच कालखंडात झाले. (तुकाराम महाराज- इ.स. 1608 ते 1650, आणि समर्थ रामदास इ.स. 1608 ते 1682). दोघांचाही  परमार्थात मोठा अधिकार होता, आणि जगाच्या कल्याणा संताच्या विभूति असेच दोघांचे वर्तन होते. तुकाराम महाराज जिवंतपणीच ब्राह्मी स्थितीला पोहोचलेले तर समर्थ हे त्यांच्या प्रदीर्घ आणि  प्रखर साधनेने ‘रामदास’  बनलेले. या दोघांना सहस्रदल अशा  भारतीय तत्त्वज्ञानाच्या कमलपुष्पाच्या  दोन पाकळ्यांची उपमा शोभून दिसेल.

सनातन भारतीय तत्त्वज्ञान हे आत्मोद्धार हेच आयुष्याचे ध्येय मानणारे आहे.

पण वित्तेषणा (धनाची इच्छा) दारेषणा (स्त्रीची इच्छा) आणि  लोकेषणा (प्रसिद्धीची इच्छा) यांच्याबरोबर मोक्षेच्छा  ही सुद्धा एक ईषणा म्हणजे इच्छा आहे असे मानून त्याही पलीकडे जाणा-या तुकोबांना मोक्षाचे महत्त्व वाटत नाही, तर मोक्ष प्राप्ती नंतरही त्यांना भगवद्भजनच करावे वाटते.   

प्रेममय भक्तीचे ते पथिक होते आणि मुक्ती  त्यांना दासीप्रमाणे होती. मुक्तीनंतर सर्व इच्छा नष्ट झाल्या तरी एक उरतेच ती म्हणजे भगवंताचे सुख उपभोगावे हीच. तुकोबा असेही म्हणतात की ख-या भक्तीचा आरंभच मुळी ब्रह्मानुभवापासून (मुक्ती लाभल्यावर) होतो.

सामान्यतः माणूस पुनर्जन्माला घाबरून असतो.पण तुकोबांना याची भीती वाटत नाही.देवाची साथ म्हणजेच स्मरण असेल तर कितीही जन्म घ्यावे लागले तरी ते दु:ख खोटे आहे यावर त्यांचा विश्वास आहे.म्हणून तर ते म्हणतात..

हेचि दान देगा देवा ।तुझा विसर व्हावा।

पुढे ते म्हणतात..गुण गाईन आवडी …

(सक्तीने नाही हो! मनापासून..!!)

 (अत्यद्भूतं तच्चरितं सुमंगलं गायन्तआनंदसमुद्रमग्न: ।।भागवत अष्टमस्कंध)

हेचि माझे सर्व जोडी।।

लगे मुक्ती धन संपदा .

(आणि दुर्मिळ असा )

संतसंग देई सदा.।।

…जो देवसुद्धा इच्छितो…!

तुका म्हणे गर्भवासी।सुखे घालावे आम्हांसी

तुकोबा चतुर आहेत…

ते म्हणतात..गर्भवासी सुखे घालावे

कारण..गर्भात दु:ख आहे हे त्यांना माहीत आहेच..पण हरी सखा जवळ असेल,स्मरणात असेल तर ते दु:खच राहणार नाही हे ते जाणत होते.साक्षात हरीच आपणाला पालखीतून जन्मांतराच्या वाटेवरून घेऊन जाणार  असेल तर  पायी चालणा-यांना होणारे वाटेवरचे त्रास  जाणवणार नाहीत.

दु:ख त्याला भोगावे लागते ज्याची चित्तवृत्ती देहाला चिकटली आहे.पण ज्याची चित्तवृत्ती नामस्मरणात रंगते त्याचे देहात्म्यच सुटते.त्याला दु:ख कोठून असणार ? त्याची पालखी उचलायला देव तयारच आहे.

आता या पार्श्वभूमीवर, समर्थ रामदासांचे विचार पहिले, तर समर्थांना  सामान्यजन गर्भवासाच्या दु:खातून याच जन्मात मुक्त व्हावेत याची तळमळ होती.कारण जन्मजन्मांतरीचे नित्यकल्याण करण्याचे साधन असणारा नरदेह हा दुर्लभ आहे

लाधलो हा देह काकतालीन्याये।

घडो उपाये घडो आले ।।’

पापपुण्य समान झाले तरच नरदेह मिळतो.

नाथ महाराज म्हणतात..

सुकृतदुष्कृत समानसमी तैं पाविजे कर्मभूमि ।।

तेचि जैं पडे विषमी।तैं स्वर्गगामी कां नरक ।।(एक.भा.अ. २-२१७ )

इतर पशु आदी जन्मात पापपुण्य नाही पण येरझाऱ्या आहेत.

आणि आम्हा सामान्यांना प्रपंचासक्ती व वित्तदारेषणा (वासना),इतक्या घट्टपणे चिकटलेल्या आहेत की सर्वांची पूर्ति करतांना आम्हाला प्रचंड दु:ख होते.. जन्म वाया जाऊनही मरणानंतरही हे सुटत नाही मग जन्ममरणाच्या येरझाऱ्या,गर्भवासाचे दु:ख सहन करणेही अटळ..त्याची अत्यंत भीतीही वाटते..

मातेचिया उदरकुहरी ।पचुनी विष्ठेचिया रात्री ।।

उकडूनि नवमास वरी जन्मजन्मोनी मरती ।।(ज्ञा.९-३३१)

दासबोधात समर्थ लिहीतात..

वोकानरकाचे रस झिरपती ।ते जठराग्नीस्तव तापती

तेणे सर्वही उकडती।अस्तीमांस।(३-१-३०)

असा हा शोककारी,दु:खकारी गर्भवास…

म्हणून मनाच्या श्लोकामध्ये रामदास स्वामी म्हणतात..

मना वासना चुकवी येरझारा I मना कामना सांडी रे द्रव्य दारा I

मना यातना थोर हे गर्भवासी ।मना सज्जना भेटवी राघवासी

 

(येथे वासना ही षष्ठी विभक्ती) .वासनेच्या येरझाऱ्या असा अर्थ.

दोन्ही महापुरुषांना एकच गोष्ट सांगायची आहे..

हेचि दान देगा देवा..तुझा विसर व्हावा

आणि

मना सज्जना भेटवी राघवासी

असे झाल्यास गर्भवास झाले तरी दु:ख होणार  नाही किंबहुना ते होणारच नाहीत कारण राघवाची भेट त्याचा विसर न झाल्याने होणार आहे .वासना ,कामना,द्रव्य दारा लोकादी ईषणा नष्ट झाल्यामुळे,मन सज्जन झाल्यामुळे हे होणार आहे..तो भेटल्यावर पुन्हा जन्म कसचा..? नामस्मरणातच मुक्ती आहे..विस्मरणात मरण आणि पुन्हा जन्म आहे.

थोडेसे विषयांतर..

प्रत्येकाला कितीदा जन्म घ्यावा लागेल हे माहीत नाही.

विवेकानंदांनी एक गोष्ट सांगितली आहे..

एका साधूला त्याचे मुक्ती साठी दोन जन्म बाकी सांगितल्यावर तो निराश झाला पण एका सहज  फिरणा-या माणसाला मुक्तीसाठी झाडावरच्या पानांइतके जन्म घ्यावे लागतील म्हणाल्यावर तो आनंदाने नाचू लागला..तर त्याला तात्काळ मुक्ती मिळाली.. कारण तो मुक्तच होता..

तेव्हा बंधन आणि मुक्ती या पण संकल्पनाच आहेत,त्या देहबुद्धीमुळे निर्माण होतात स्वस्वरुप ज्ञान करवून घेऊन त्यांचे निरसन करुन घ्यावे असे समर्थ दासबोधात म्हणतात.(७-६-५०)

आता, राघवाची भेट कशासाठी हवीय किंवा तुकोबांना देवाच्या स्मरणाचेच दान का हवे.. ? तर..

तद्प्राप्य तदेवावलोकयती तदेव श्रुणोती तदेव भाषयती तदेव चिंतयती ।।(नारदभक्तीसूत्र ४-५५)

भगवन्ताच्या प्रेमाला प्राप्त झाल्यावर भक्त फक्त त्याच्याचकडे पाहतो,त्याच्याबद्दलच ऐकतो,बोलतो,सदैव त्याचेच चिंतन करतो.

ही प्रेमभक्तीची उच्चतम अवस्था त्यांना निरंतर हवी आहे..(काही तत्त्वज्ञ मुक्तीचे १६ ते २० प्रकार मानतात..तरीही हीच सर्वोच्च अवस्था असे मी मानतो)

शेवटी..आणखी एक श्लोक घेऊन विवेचन संपवतो.

 देह्यादिक प्रपंच हा चिंतियेला I

परी अंतरी लोभ निश्चित ठेला I

हरीचिंतने मुक्तीकांता वरावी I

सदा संगती सज्जनांची धरावी..II

सदैव  प्रपंचाचेच चिंतन व त्याचा लोभ सोडून  मनाने मुक्ती साधावी,का? तर हरिचिंतन करता यावे म्हणून.यासाठी सज्जनांची संगती धरावी.तुकोबा संतसंगत मागतात तर समर्थ सज्जनांची.दोन्ही एकच. समर्थ तर मनालाच सज्जन म्हणून हाक मारतात.समर्थांचे याविषयी मनाचे श्लोक किती म्हणून सांगावेत..?

एकूण काय, तर कोणतेही संत त्यांच्या अनुभवाच्या आधारावर, एकाच गोष्ट, वेगवेगळ्या शब्दांत, वेगवेगळे दृष्टान्त देऊन सांगतात. फक्त समजून घेणारा पाहिजे.

संत साहित्य वाचतांना सहज सुचलेले हे विचार, समविचारी लोकांबरोबर शेअर करावे असे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच!

पांडुरंग देशपांडे

लेखक- श्री पांडुरंग देशपांडे.

pandurang deshpande
pandurang deshpande

लेखक हे Textile Process Advisor and consultant असून मुंबई येथील UDCT मधून Textile Engineer झालेले आहेत. व्यवसायानिमित्त भारतभर भ्रमण केले आहे. आणि अध्यात्माची आवड असल्याने संत वाङमयाचे अभ्यासक आहेत.

हम नही बदलेंगे !

stubborn man

Guest article by vaidya Sohan Pathak

जमत नाही… न जमण्याबद्दल सुद्धा अभिमान..

बऱ्याच लोकांना आपल्याला एखादी गोष्ट बिलकुल जमत नाही याबद्दल खंत वाटण्याऐवजी अभिमान वाटतो, आणि त्यामुळे आपण आपलेच किती नुकसान करून घेत आहोत, याबद्दल त्यांना माहिती नसते.

१)एका पेशंटला तिखट जरा कमी खा, हिरवी मिरची डायरेक्ट खाऊ नका असं सांगितल्यावर तो चक्क म्हणाला डॉक्टर तेवढं सोडून बोला, दोन गोळ्या वाढवून द्या… पण मला तिखट बंद करणे अजिबात जमणार नाही..

२)पती-पत्नीच्या वादाची केस होती. प्रकरण घटस्फोटात पर्यंत गेलं होतं.. त्या स्त्रीला म्हटलं तुम्ही त्यांना थोडं समजून घ्या ‌. सारखं टोचून बोलू नका. त्यांनी चूक कबूल केली आहे, तुम्हाला संसार पुढे न्यायचं असेल तर तुम्हाला बोलण्याची पद्धत थोडी बदलावी लागेल…

लगेच ती स्त्री म्हणाली .. ते मला शक्य होणार नाही कारण माझ्या माहेरी अशाच पद्धतीने बोलतात.त्यात काय एवढं! त्याने समजून घ्यावं..

deal with stubborn man
stubborn woman

३)व्यसनाधीन युवक कावीळ, अपचन आजाराने त्रस्त होता.. औषधाने बरं वाटल्यावर समुपदेशन करताना व्यसन बंद करण्याबद्दल सांगितलं तेव्हा तो चक्क म्हणाला सर,मी खूपदा प्रयत्न केला ते शक्य नाही. त्याच्याशिवाय जगू शकत नाही… माझे मित्र तर माझ्यापेक्षा जास्त घेतात त्यांना काही झालं नाही..

आपल्याला अशा  व्यक्ती बऱ्याचदा भेटतात किंवा आपण सुद्धा आपल्या साठी हितकर नसणाऱ्या पण आवडणाऱ्या गोष्टी किंवा आपल्या सवयी, आपल्यातील दुर्गुण, आपल्या स्वभावातील कमतरता  याबाबत अशाच पद्धतीने दृष्टिकोन ठेवत असतो. आपण चूक करत आहोत किंवा आपल्या स्वभावात हा बदल करणे आवश्यक आहे हे आपल्याला जाणवते फक्त त्याच्याशी स्थिर भावना,(rigid thoughts ) अवस्तुनिष्ठ वैचारिकता,( irrational thought process) निगडित असल्यामुळे जेव्हा असा प्रसंग येतो तेव्हा आपण अनेक कारणे देऊन त्यापासून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करतो. समुपदेशनासाठी आलेली असंच नुकतीच शाळेत नोकरी लागलेली स्त्री मला स्टेज करेज  येऊ च शकत नाही मी ते काम करणारच नाही. असं म्हणून नोकरी सोडायला निघाली होती.

खरंच”जमत नाही”

असं काही असतं का?आणि अत्यावश्यक आहे अशा वेळेस आपण भीती, अतार्किक आकलन (wrong perception),व्यसन, सवय याच्यावर विजय मिळू शकत नाही का? नक्कीच मिळवू शकतो . इतिहासात आणि आसपास आपल्याला असे अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. रवींद्र गुर्जर यांच्या ‘ *70 दिवस*’ भाषांतरित कादंबरीत नरमांस खाऊन जगलेला युवक भयंकर अपघात घडे पर्यंत अत्यंत लाजाळू, घाबरट होता पण त्याने विमान आल्पसच्या बर्फाळ पर्वतावर पडल्यावर जिवंत राहण्यासाठी स्वतःच्या स्वभावात बदल केला. आणि 70 दिवसाचा इतिहास घडवला .

गाडी शिकताना आपल्याला भीती वाटते आपल्याला बॅलन्स करता येणे अशक्य आहे असं सुरुवातीला नक्कीच वाटतं. एक्सीलेटर,क्लच आणि ब्रेक चा गोंधळ चार चाकी शिकताना स्वप्नात सुद्धा होतो. पण हळूहळू आपण तो बदल आपल्यात घडवून घेतो आणि नंतर सराईत ड्रायव्हिंग करू लागतो. जमत नाही यामागे बऱ्याच वेळा भीती हे कारण असते भय निर्माण होण्यासाठी काही जणांच्या बाबतीत सुरुवातीला काही अयोग्य,भीतीदायक घटना घडलेली असते किंवा भूतकाळात त्यांच्या हातून एखादी चूक झाली असते किंवा आपली योग्य नोंद घेतली जात नाही,कोणीतरी आपली झालेली चूक सर्वांसमोर निर्देशानास आणली असेल इत्यादी कारणं घडलेली असतात.पण अयोग्य विचार बैठकीमुळे त्याबद्दल इतका विचार केला जातो की पुन्हा याच्यापुढे मी असं करणारच नाही अशा सूचना आपण आपल्या मनाला देतो. आणि मग त्या मागच्या भितीचे समर्थन करण्यासाठी वेगवेगळी कारण देण्याची आपल्याला सवय लागते आणि हळूहळू त्याबाबत लोकांनी सहानुभूती दाखवल्यावर त्याचे रूपांतर वृथा अभिमानात होते आणि त्याबद्दल आपल्याला वाईट पण वाटत नाही.फोबिया किंवा भयगंड ,एन्झायटी नावाचा आजार यातूनच निर्माण होतो. आयुर्वेदामध्ये तर भयाची व्याख्या खूपच सुंदर केली आहे *अपकार अनुसंधानजं दैन्यम्* “| अर्थात पुढे काहीतरी वाईट होईल अशा विचारांमुळे येणारी मनाची दैन्यता.

म्हणजे सतत न जमणाऱ्या गोष्टीबद्दल नकारात्मक स्वसंवाद केल्यामुळे आपल्याला त्याबद्दल भय निर्माण होते. पण अशा पद्धतीने आपण आपले व्यक्तिमत्व निर्माण केले तर न जमणाऱ्या गोष्टींची संख्या वाढत जाते. त्याच्या मुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्रासदायक परिणाम होतो.आपल्या क्षमता आपण पूर्ण वापरू शकत नाही. त्याची खंत नंतर सतत राहते .

*आत्मनेव मन्येत कर्तारं सुखदुःखयो:* |

स्वतःच्या सुखदुःखाला आपणच कारण आहोत ज्या अयोग्य गोष्टी आपल्या वर्तनात आहेत, ज्याबद्दल आपल्या मनात भीती निर्माण होते,किंवा आपण बऱ्याच वेळा उपभोगतेच्या बाबतीत मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. यामुळे आपल्यावर त्रासदायक परिणामच होतात. यात सुधारणा होण्यासाठी नक्कीच ठरवून प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी प्रसंगी समुपदेशक किंवा तज्ञ व्यक्ती किंवा योग्य सहकार्याची मदत घेतली पाहिजे.

भीतीला जिंकण्यासाठी आयुर्वेदामध्ये ‘धैर्य’ थेरपी सांगितली आहे एखादी वर्तवणूक आपल्यासाठी त्रासदायक आहे त्यावर निश्चित आपण योजना बद्ध पद्धतीने विजय मिळवू शकतो. कोणताही बदल अचानक होत नाही त्यासाठी रोज थोडा थोडा प्रयत्न केला तर नक्की यश मिळते .

आपण शारीरिक, वाचिक आणि मानसिक कर्म करत असतो शारीरिक न जमणाऱ्या कर्मामध्ये व्यायाम, शिस्त, योजनाबद्ध पद्धतीने अवलंबूनत्व कमी करणे, असे सकारात्मक प्रयत्न उपयोगी ठरतात.उदाहरणार्थ सारखे नख खाण्याची सवय असेल तर बोटांना विशिष्ट चवीचे लेप लावले तर ही सवय बंद होण्यासाठी मदत होते. भार कमी करण्यासाठी व्यायाम आहार नियंत्रण हे जमवावे च लागते.

वाचिक कर्मामध्ये चुकीचे बोलणे,टोचून बोलणे,खोटे बोलणे,इत्यादी सवयी असू शकतात. याचा अत्यंत घातक परिणाम संसारिक,सामाजिक जीवनावर होतो. कदाचित बोलणाऱ्याच्या मनामध्ये असा उद्देश नसू शकेल पण चूक शब्दांची निवड,समोरच्याला लागेल असे बोलणे, सतत तुलना करणारे वाक्य , असमाधान व्यक्त करत रहाणे,अति क्रोध याचे उपद्रवमूल्य प्रचंड असू शकते. त्यामुळे जवळची माणसं दुरावतात.अशा व्यक्तींचा असा बोलण्याचा स्वभाव आहे हे माहीत असून सुद्धा बोललेले रुक्ष शब्द, मन दुखावणारा संवाद आयुष्यभर लक्षात ठेवला जातो.त्यामुळे समोरच्या व्यक्तीला व तत्परिणामी स्वतःला मानसिक त्रास होऊ शकतो.त्यासाठी प्रयत्नपूर्वक आपली बोलण्याची पद्धत, शब्दांची निवड,भावना व्यक्तिकरण पद्धती सुधारावी लागते.मानसिक कर्मामध्ये भीती,रागिष्ट स्वभाव, लोभ, द्वेष,इर्षा,सतत नकारात्मक विचार अशी वर्तवणूक असू शकते.यात जर बदल करायचा असेल तर ध्यान,धारणा, धैर्य,समुपदेशन इत्यादी उपाय फायदेशीर ठरतात. केवळ भीतीमुळे,सवयी मुळे, त्रासदायक आवड जपण्यासाठी बदल न स्वीकारणे हे आपल्यासाठी अत्यंत नुकसान कारक असते. आपल्या चुकांचा अथवा चुकीच्या सवयींचा अभिमान बाळगण्यात काय अर्थ आहे?

अर्थात अशा मनोवृत्तीमध्ये निश्चित बदल होऊ शकतो फक्त आपला कम्फर्ट झोन सोडण्यासाठी प्रयत्न प्रामाणिक हवेत.

मी सो…पा..

वैद्य सोहन पाठक

तद्विद समुपदेशन केंद्र

9822303175

sohan pathakसदरील लेख हा छ. संभाजीनगर येथील प्रथितयश आयुर्वेदिक चिकित्सक  आणि समुपदेशक वैद्य  सोहन पाठक यांच्या फेसबुक पोस्ट वरून त्यांच्या परवानगीने साभार घेतला आहे. 

 

The art of Compartmentalization कम्पार्टमेंटची गम्मत

lfhealth240225 photos

Guest article by vaidya Sohan Pathak

कंपार्टमेंट ची गंमत..

 
मानसिक ताणतणावामुळे शुगर वाढलेला एक रुग्ण आमच्या मधुमेह तज्ञ मित्राने समुपदेशनासाठी पाठवला होता.
 
ऑफिसमधला कामाचा ताण,उत्पन्नामध्ये वाढ व्हावी म्हणून सुरु केलेला छोटा व्यवसाय ,त्याची वाढती जबाबदारी ,कौटुबिक ताण ,वाढणारी रक्त शर्करा एकंदर बऱ्यापैकी  वैतागलेला,पत्नीच्या भाषेत चिडचिडा स्वभाव अशी एकंदर रुग्णाची परिस्थिती होती.त्याचा मनात सतत आपण कुठे कमी पडणार तर नाही ,मला कुटुंबातले सदस्य समजावून घेत नाहीत असे विचार येत व त्या मुळे निद्रानाश , डोकेदुखी सारखे आणखी विकार मागे लागले होते.
 
 
सुरवातीला, तुम्ही डायनिंग टेबल वरचं खाण्याचं सामान नेहमी बेडरूम मध्ये ठेवता का ? किंवा रोज हॉलमधल्या चपला स्वयंपाक घरात आणता का ? असा प्रश्र्न मी विचारल्यावर
आता हा अजून काय नवीन प्रकार, अशा माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पहिले.

ignoring

 
नंतर त्याच्यांशी संवाद साधताना मी कंपार्टमेंट विचार पद्धती ची मजा सांगितली .
 
आपण कोणत्याही घटनेचा विचार करताना त्याचा संबंध अनेक घटनांशी लावत असतो.  उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये काही वादावादी झाली असेल आणि घरी आल्यावर मुलांचा गोंधळ चालू असेल किंवा पत्नीशी मतमतांतर झाले असेल तर आपण ऑफिसमधला ताणतणाव डोक्यात ठेवून मुलांवर किंवा पत्नीवर रागवतो .त्यांच्याशी नीट बोलत नाही.angry man1 
 
तसंच निर्णयाच्या बाबतीत कौटुंबिक मतभेद झाले तर आपण मतभेद झाले हाच विषय डोक्यात ठेवून इतर वेळी सामान्य पण वागत नाही .आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना मतभेद झालेला विषय डोक्यात ठेवून पूर्वग्रह दूषित संवाद करतो. त्यामुळे तो विसंवादच जास्त होतो .

silhouette, couple, people man-2480321.jpg

 
आपण आपली भूमिका नेमकी ठेवत नाही.आपल्या सगळ्या भूमिकांची सरमिसळ आपण करत असतो. जेव्हा वडील म्हणून काही संवाद साधायचा असेल तेव्हा आपली ऑफिसरची भूमिका आपण सोडून द्यायला पाहिजे पण मुलांची बोलताना बऱ्याच वेळा ऑफिसर च्या भूमिकेतूनच आपण बोलतो कुटुंबियांशी संवाद साधताना किंवा पत्नीशी संवाद साधताना अगोदर झालेल्या घटना, मतभेद डोक्यात ठेवून आपला संवाद होतो प्रत्येक वेळी मागे झालेल्या चुका संदर्भासाठी ठेवूनच आपण त्यांच्याशी बोलतो. 
 
 हा भूमिकांची सरमिसळ असलेला संवाद खूप त्रासदायक होतो. साधं “पाणी दे” हे वाक्य बोलताना सुद्धा मागच्या वेळेस पाणी थोडं सांडलं होतं हा रेफरन्स डोक्यात ठेवून पाणी न सांडता आण , असं बोलल्यास समोरची व्यक्ती सुद्धा आपल्या चुका आठवून बोलण्याची तयारी करते . त्यामुळे मूळ उद्देश बाजूला राहून वादविवादाची ठिणगी पडते.
 
एखाद्या सुनेला स्वयंपाक जमत नाही म्हणून ती वाईट किंवा सासूंचे कामात सहकार्य नाही म्हणून बेबनाव अशा विचारांच्या गोंधळामुळे त्या व्यक्तीचे चांगले गुण आपल्या लक्षात येत नाही.  जरी सुनेला स्वयंपाक येत नसेल, तरी ती नोकरी करते घर टापटीप ठेवते ,चांगलं लिहिते ,मुलांचा अभ्यास घेते सामाजिक संपर्क चांगला आहे ,कुटुंबियांची काळजी घेते घरातील महत्त्वाच्या गोष्टी मध्ये लक्ष घालते असे चांगले गुण तिच्यामध्ये असू शकतात पण आपण कंपार्टमेंटचा गोंधळ घातल्यामुळे आपल्या दृष्टीने ती वाईटच असं दृष्टिकोन होऊ शकतो. 
 
तसेच सासूबाईंना नातवांच्या जबाबदारी मधे , आज्ञार्थक बोलण्यामुळे, मतमतांतर असले तरी पण त्यांचे अनुभव ,त्यांचं घरातल्या अस्तित्व त्यांनी घराला घरपण देण्यासाठी आजवर केलेली मेहनत इतर कामात केलेली मदत या बाबींकडे पण लक्ष देणे आवश्यक असते दोघांनीही पूर्वग्रह दूषित ठेवला तर त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीतच आपल्याला चूक वाटू शकते .
 
अशाच प्रकारे एखाद्याशी वाद-विवाद झाले तर त्याचा राग इतर व्यक्तीशी बोलताना सुद्धा आपल्या मनात असतो आणि त्याच्याशी नीट बोलत नाही.त्यामुळे त्या व्यक्तीचा आपल्याबद्दल गैरसमज होऊ असाच गोंधळ ऑफिस मधील कामात सामाजिक कामामध्ये सुद्धा होतो. एखाद्या व्यक्तीने आपल्याशी पूर्वी वाद घातलेला असेल तर आपल्याला त्याने केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्याच्या कौतुकासाठी अडचणी येते आणि नंतर आपण सुख संवाद न ठेवल्यामुळे पुन्हा वाद वाढण्याची शक्यता असते. 
 
यासाठी आपल्याला कंपार्टमेंट विचार पद्धती आवश्यक असते म्हणजेच आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा त्या विचारांना काल्पनिक कंपार्टमेंटमध्ये ठेवणे आवश्यक म्हणजेच समजा ऑफिसमधला ताण तणाव हा एका वेगळ्या कंपार्टमेंट मध्ये ठेवावा.  त्यामुळे आपल्या मुलांशी ,पत्नीशी वागताना त्याचा परिणाम होणार नाही. आपलं कौटुंबिक जीवन हे एक वेगळं कंपार्टमेंट आहे त्याचा परिणाम आपल्या ऑफिसवर, कामावर, व्यवसायावर झाला नाही पाहिजे .
Free-pik image
Free-pik image
 
एखादी व्यक्ती एखादं काम व्यवस्थित करू शकत नसेल तर आपले मतभेद त्या कामापुरतेच असावेत इतर वेळी आपण त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचा कौतुक निश्चित केलं पाहिजे सतत त्याच्या चुकाबद्दल बोलणं हे त्या व्यक्ती सोबतच्या व्यवहारात अडचणी निर्माण करू शकते माझा आनंद, माझे छंद, माझी मित्र मंडळी, माझे कुटुंब, माझा व्यवसाय हे आपले वेगवेगळे काल्पनिक कंपार्टमेंट आहेत. 
 
 जसं आपण एका खोलीतील वस्तू दुसऱ्या खोलीत शक्यतो  ठेवत नाही तसंच या कंपार्टमेंट मधल्या विषयांची सरमिसळ आपण एकमेकांशी करू नये. या प्रत्येक कंपार्टमेंटच्या काल्पनिक चाव्या सुद्धा आपल्याच हातात पाहिजे ज्यामुळे कितीही ताण तणाव असला तरी आपण कुटुंबासाठी, आपल्या छंदासाठी वेळ देऊ शकू .
 
एखादी घटना दुर्दैवी असेल, त्रासदायक असेल तरीसुद्धा त्या घटने शिवाय आपली काही वेगळी जबाबदारी, जीवन, आनंद असू शकतो. त्या दुर्दैवी घटनेचाच विचार सतत आपण करत राहिलो म्हणजेच त्या कंपार्टमेंट मधले विचार इतर कंपार्टमेंट मध्ये जाऊ लागले तर आपल्या जीवनातले जबाबदारी, कर्तव्य, आनंद आपण व्यवस्थित उपभोगू शकणार नाही.पण जर आपली कंपार्टमेंटची भूमिका स्पष्ट असेल तर आपण या सगळ्यांमध्ये सरमिसळ होऊ देणार नाही आणि प्रत्येक भूमिका, जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडू शकू आणि समजा परिस्थिती आपल्या हाताबाहेर असेल समोरची व्यक्ती अगदीच असमजुतदार असेल तर त्या ताणतणावामुळे आपल्या जीवनातील उत्साह, आपल्या छंद, आपला आनंद ,आपली आवड याच्यावर अश्या कंपार्टमेंट विचार पद्धतीमुळे निश्चितच कमी परिणाम होईल आणि कठीण परिस्थिती सुद्धा आपण चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकु.
मी सो…पा…
वैद्य सोहन पाठक
9822303175
sohanpathak@gmail.com

sohan pathakसदरील लेख हा छ. संभाजीनगर येथील प्रथितयश आयुर्वेदिक चिकित्सक  आणि समुपदेशक वैद्य  सोहन पाठक यांच्या फेसबुक पोस्ट वरून त्यांच्या परवानगीने साभार घेतला आहे. 

 

Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids

71Rd 72h5jL. SX679

30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.

 

 

For readers in USA- visit our Amazon Link below to shop for Amazing kids toys and much more. You can shop for other requirements also through this link

Tri cycle for toddlers

Amazing joy Riding toys