https://goodworld.in A website by Madhav Bhope

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग -4 ramraksha-stotra-4

shriram

ramraksha-stotra-4

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग- भाग ४ 

भाग ३ वरून -पुढे 

काल आपण 24 व्या श्लोकापर्यंत विवेचन केले होते. 24 व्या श्लोकात, श्रीरामाचे नांव जपणाऱ्यास अश्वमेध यज्ञा च्या पुण्यापेक्षा ही अधिक पुण्य मिळते असे सांगितले आहे.  आता त्यापुढील श्लोक:

रामं दूवार्दलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्‌ ।

स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः ॥25॥

दूर्वादला प्रमाणे श्याम वर्ण असलेला, कमलाप्रमाणे डोळे असलेला, पीत वस्त्र नेसलेला अशा श्रीरामाची विविध दिव्य नामांनी जे स्तुति करतात, ते नर ‘संसारिणो’ म्हणजे साधारण संसारी पुरुष राहत नाहीत.

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं

काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्‌ ।

राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं

वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्‌ ॥26॥

वरील श्लोक हा श्रीरामाच्या विविध विशेषणांनी युक्त आहे आणि त्यातील शब्द हे अतिशय सोपे आहेत. त्यातील सत्यसंध शब्दाचा अर्थ सत्याने बांधलेला.

श्रीरामाचे वर्णन करतांना “करुण”, “शान्त”, ही विशेषणे बऱ्याच ठिकाणी येतात. तसेच “लोकाभिराम” हे विशेषणही खूप ठिकाणी येते. “अभिराम” म्हणजे आनंदकर .श्रीराम हे “लोकाभिराम” आहेत, लोकांना आनंद देणारे आहेत. अभिरामस्त्रिलोकानाम् आहेत.

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।

रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥27॥

आपण यापूर्वी पाहिले होते की रामरक्षा कवचाच्या नंतरचे श्लोक हे भक्तिरसाने ओथंबले आहेत. वरील श्लोकात श्रीरामाला विविध नावांनी संबोधले आहे. राम, रामभद्र, रामचन्द्र, रघुनाथ(रघुकुलाचा नाथ), सीतेचा पती. वरील शब्दांमध्ये, वेधसे हा एक शब्द आला आहे, जो की आपल्या नेहमीच्या ओळखीचा नाही. वेधस् म्हणजे,  विधाता, ब्रह्मा, सृष्टिकर्ता. वेधसे म्हणजे त्या विधात्याला.. तसेच वरील सर्व नामांनी वर्णन केलेल्या त्या श्रीरामाला नम: अर्थात नमस्कार असो.

श्रीराम राम रघुनन्दन राम राम

श्रीराम राम भरताग्रज राम राम ।

श्रीराम राम रणकर्कश राम राम

श्रीराम राम शरणं भव राम राम ॥28॥

भरत अग्रज अर्थात भरताचा मोठा भाऊ. आणि हा राम करुणामय आणि सुकुमार जरी असला, तरी “रणकर्कश” आहे. रणामध्ये तो सुकुमार वगैरे नाही, तर अत्यंत कर्कश, शत्रूच्या मनात धडकी भरवणारा असा आहे.  अशा या श्रीरामाला मी शरण आहे.

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि

श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।

श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि

श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥29॥

श्रीरामाचे चरण मी मनाने स्मरण करतो, श्रीरामाच्या चरणांची महती मी वाचेने “गृणामि” म्हणजे वर्णन करतो. श्रीरामाच्या चरणांना मी माझ्या शिराने वन्दन करतो, आणि श्रीरामच्या चरणांना मी शरण जातो. “शरणं प्रपद्ये”.

माता रामो मत्पिता रामचन्द्रः

स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।

सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं

जाने नैव जाने न जाने ॥30॥

माझी, माता, माझा पिता रामचन्द्र आहे. माझा स्वामी रामचन्द्र आहे, माझा सखाही रामचन्द्र आहे. माझे सर्वस्व दयाळु रामचन्द्र आहे. न+ अन्यं+ जाने- मी इतर कुणालाही ओळखत नाही. न+ एव+ जाने- “नाहीच ओळखत मी इतर कुणाला”, हे ठासून सांगितले आहे. पुन्हा पुन्हा सांगितले आहे. “नैव जाने न जाने”

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।

पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनन्दनम्‌ ॥31॥

ज्या रामाच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला जनकात्मजा म्हणजे सीता आहे, “पुरतो” म्हणजे समोरच्या बाजूला मारुती  आहे अशा त्या श्रीरामाला मी वंदन करतो.

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम ।

कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥32॥

लोकाभिराम अर्थात लोकांना प्रसन्न करणारा, रणामध्ये धीरोदात्त असणारा, राजीव म्हणजे कमळासारखे नेत्र असणारा, रघु वंशाचा नाथ, करुणेचे साक्षात रूप असलेला, करुणा करणारा, असा जो श्रीराम, त्याला मी शरण जातो.

यापुढील श्लोकात श्रीरामाच्या परम सेवक असलेल्या श्री हनुमंताला वंदन आहे.

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्‌ ।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥33॥

hanuman

वरील श्लोक आपण नेहमी, मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर, मारुतीच्या स्तुतीसाठी, म्हणतो. श्रीरामाच्या स्तोत्रात, त्यामुळे, मारुतीचा उल्लेख होणे अपरिहार्य आहे.

मारुति हा पवनपुत्रही म्हणवला जातो.  हनुमान पुराणात आलेल्या कथेनुसार, वानरराज केसरी सोबत विवाहापश्चात, अंजनी (जी की एक अप्सरा होती आणि एका शापानुसार तिला पृथ्वीतलावर जन्म घ्यावा लागला होता) ला बरेच वर्ष पुत्रप्राप्ति न झाल्यामुळे, तिने, मतंग ऋषींच्या सांगण्यावरून वायुदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी तप केले. वायुने तिला आशिर्वाद दिला की तो स्वतःच तिच्या पोटी जन्म घेईल. तदनंतर एकदा अंजनी बागेत बसली असतांना अचानक तिच्या शरीराला तीव्र वायूचा स्पर्श झाला. अंजनीला वाटले कोणी राक्षस माझे शील हरण करत आहे म्हणून तिला क्रोध आला. परंतु इतक्यात वायुदेव तिथे प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले, की त्यांनी अव्यक्त रूपाने, मानसिक संकल्पाने तिला पुत्र प्रदान केले आहे. मग यथावकाश अंजनी गर्भवती होऊन तिला पुत्र प्राप्ति झाली

मनोजवं= मनोजवंचा समास विग्रह – मन:+इव+ जवः  (इव म्हणजे, “च्या सारखा” जव म्हणजे स्फूर्तिवान, त्वरित इकडून तिकडे जाणारा, किंवा  वेग)

अर्थात, ज्याचा वेग मनासारखा आहे किंवा जो मनासारखा स्फूर्तिवान/ त्वरित इकडून तिकडे जाणारा  आहे

मारुत हे वायूचे एक नांव आहे. मारुततुल्य वेगं अर्थात, ज्याचा वेग वाऱ्यासारखा आहे. जितेन्द्रिय अर्थात ज्याने इंद्रियांवर विजय प्राप्त केलेला आहे. आणि जो बुध्दिमंतांमध्ये वरिष्ठ आहे. जो वातात्मज म्हणजे वायूचा पुत्र आहे आणि वानर यूथ म्हणजे वानरांच्या समूहाचा मुख्य आहे, अशा त्या श्रीरामाच्या दूताला मी शरण आहे.

यापुढील वाल्मिकींच्या स्तुतीचा श्लोक तर खूपच बहारदार आणि काव्यमय आहे.

कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्‌ ।

आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्‌ ॥34॥valmiki

वरील श्लोकाचा अर्थ अतिशय सोपा आहे, पण त्यातील कल्पना खूपच बहारदार आहे.kokila

कवितारूपी शाखेवर आरूढ होऊन, राम राम याप्रमाणे मधुर अक्षरांचे कूजन करणाऱ्या वाल्मिकिरूपी कोकिळाला मी वंदन करतो.

महर्षि वाल्मिकींना आद्य कवि म्हटले जाते. एकदा वाल्मीकि एका क्रौंच (सारस) पक्ष्यांच्या जोडप्याला पहात होते. ते जोडपे प्रेमालापात मग्न होते, त्यावेळी एक पारधी (निषाद) तेथे आला आणि त्याने त्याच्या बाणाने त्यातील नराचा वध केला. तेंव्हा त्या क्रौंच पक्षाची मादी दु:खातिरेकाने विलाप करू लागली. त्या वेळी वाल्मिकींचे मन करुणेने द्रवले, आणि त्यांच्या मुखातून अनायास शब्द बाहेर पडले:

मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वतीः समाः।

यत्क्रौंचमिथुनादेकम् अवधीः काममोहितम्॥’

valmiki

हे दुष्टा, तू प्रेम मग्न क्रौंच पक्ष्याला मारले आहे. तुला कधीही प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. तुलाही असाच वियोग सहन करावा लागेल.

त्यानंतर त्यांनी प्रसिध्द महाकाव्य “रामायण” रचले, जे की वाल्मिकी रामायण म्हणून ओळखले जाते.

यापुढील श्लोक:

आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्‌ ।

लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्‌ ॥35॥

आपदाम्+ अपहर्तारम अर्थात, आपदांचे हरण करणारा, “दातारं सर्वसंपदाम्” अर्थात सर्व संपदांचा दाता, लोकाभिराम, अर्थात लोकांना प्रसन्नता देणारा, जो श्रीराम, त्याला मी “भूयो भूयो” अर्थात, वारंवार नमन करतो.

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम्‌ ।

तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्‌ ॥36॥

भर्जनं+ भव बीजानां+ अर्जनं सुखसंपदाम

राम राम रूपी गर्जना ही भव बीजाचे “भर्जन” करणारी, म्हणजे भाजणारी. [भव रूपी बीजाची भाजून लाही केली म्हणजे पुन्हा जन्माला येणे होत नाही. “ बीज भाजुनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही”- संत तुकाराम]. (कुठल्याही धान्याचे बीज मातीत टाकल्यावर त्याला अंकुर फुटतो, पण तेच बीज जर भाजून मातीत टाकले, तर त्याला अंकुर फुटत नाही, मग कितीही पाणी टाका किंवा काहीही करा. )सुख आणि संपदांचे अर्जन (प्राप्ती) करणारी, यमदूतांना तर्जन करणारी म्हणजे भयभीत करणारी , अशी आहे.

रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥37॥

राम जो की राजमणि अर्थात राजांचा मणि आहे, ज्याचा सदा विजय होतो, अशा रामाला, रमेशाला मी भजतो. रामेण + अभिहतां= रामेणाभिहता. अभिहत म्हणजे प्रहार करणे.

निशाचर म्हणजे राक्षसांच्या चमूंवर “अभिहता” म्हणजे प्रहार करणारा जो राम आहे त्याला मी नमस्कार करतो. “तस्मै नम:”

रामान्नास्ति= रामात्+न+ अस्ति

परायणं= आश्रयस्थान  

परतर=  इतर,

म्हणजे रामाशिवाय इतर आश्रयस्थान नाही.

रामस्य दासोऽस्म्यहं= रामस्य दासोस्मि अहं = मी रामाचा दास आहे.

माझे चित्त सदा रामातच लय पावो म्हणजे रत असो. हे राम, माझा उद्धार कर!

वरील श्लोकात “राम” या अकारान्त पुल्लिंगी एकवचनी शब्दाच्या सर्व विभक्ति आल्या आहेत. संस्कृत मध्ये एखादा शब्द “चालवणे” हा प्रकार संस्कृत व्याकरण शिकणाऱ्यांना ज्ञात असेल. तसा “राम” हा शब्द “चालवल्यास” खालीलप्रमाणे प्रथमा ते सप्तमी, आणि संबोधन या विभक्ति वरील श्लोकात येतात.  

रामो राजमणिः सदा विजयते (रामः – प्रथमा, रामो = रामः)
रामं रमेशं भजे (रामम् – द्वितीया)
रामेणाभिहता निशाचरचमूः (रामेण – तृतीया)
रामाय तस्मै नमः । (रामाय – चतुर्थी)
रामान्नास्ति परायणंपरतरं (रामात् – पञ्चमी,रामात्+न+अस्ति = रामान्नास्ति)
रामस्य दासोस्म्यहं (रामस्य – षष्टी)
रामे चित्तलय: सदा  भवतु मे (रामे – सप्तमी)
भो राम ! मामुद्धर ॥ (राम ! – सम्बोधन प्रथमा)

[[रामरक्षेतील शेवटचा श्लोक बघण्याआधी, भगवान श्री शंकराने पार्वतीला रामनामाचे महत्व कसे सांगितले याबद्दल एक छोटीशी गोष्ट इथे सांगता येईल

एकदा शंकर भगवान यांनी कैलास पर्वतावर, पार्वतीकडे भोजन मागितले. पार्वती विष्णू सहस्रनामाचा पाठ करीत होती. पार्वतीने शंकरांना पाठ होईपर्यंत थोडे थांबायला सांगितले. शंकर म्हणाले यात तर खूप वेळ जाईल. तू संत लोक ज्याप्रमाणे सहस्र नामाला छोटे करून घेतात आणि नित्य जप करतात तसे का करीत नाहीस? त्यावर पार्वतीने विचारले, असा कोणता उपाय आहे, मला सांगा.
त्यावर शंकराने पार्वतीला सांगितले, फक्त एक वेळ राम नाम घेतले तर विष्णूचे सहस्र नाम घेतल्याचे पुण्य तुला मिळेल.

एक राम नाम हज़ार दिव्य नामांच्या बरोबर आहे.

पार्वत्युवाच
केनोपायेन लघुना विष्णोर्नाम सहस्रकं|
पठ्यते पण्डितैर्नित्यम् श्रोतुमिच्छाम्यहं प्रभो।।

ईश्वर उवाच
श्री राम राम रामेति, रमे रामे मनोरमे।
सहस्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने।।]]

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥38॥

वरानने= वर+आनने; वर म्हणजे श्रेष्ठ, उत्तम, सुन्दरतम. आनन म्हणजे मुख. इथे शंकराने पार्वतीला उद्देशून वरानने म्हणजे सुंदर मुख असलेली असे संबोधन वापरले आहे.

मनोरमे हे संबोधन सुद्धा पार्वतीला उद्देशून म्हणले आहे.

भगवान श्रीशंकर रामनामाची महति पार्वतीला सांगत आहेत, हे मनोरमे, “राम, राम, राम” या नामामध्ये मी रमतो. रामाचे एक नाम हे सहस्र नामांच्या (विष्णू सहस्रनाम) तुल्यबळ आहे.

पूर्ण रामरक्षेचे सार या एका श्लोकात आले आहे असे म्हटले तरी चालेल.

राम       राम       राम.

॥ इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् ॥

॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

बुधकौशिक ऋषींनी रचलेले श्रीराम रक्षा स्तोत्र संपूर्ण झाले.

श्री सीता रामचंद्राला अर्पण असो.

अशा प्रकारे रामरक्षा स्तोत्राचे हे विवेचन, माझ्या अल्पबुद्धि ला जसे समजले तसे इथे मांडले आहे. हा प्रयास म्हणजे एखाद्या बालकाने आपल्या वडिलांना घास भरविण्याचा प्रयत्न करण्या सारखे आहे. पण त्यानिमित्ताने तेवढेच श्री रामनामाचे स्मरण घडले हे महत्त्वाचे. 

माधव भोपे 

या पूर्वील लेख वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-2

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-3

Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids

71Rd 72h5jL. SX679

30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1 ramraksha-stotra-1

107046678

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग- भाग १ 

ramraksha-stotra-1

भगवान श्रीराम हे आपल्या भारतीयांच्या रोमा रोमात वसलेले आहेत.  आपल्या बोलण्यात, ठायी ठायी ‘राम’ येतो. 

रामरक्षा स्तोत्र हे बहुसंख्य भारतीयांच्या घरात म्हटले जाणारे स्तोत्र आहे.  आणि या स्तोत्राच्या दिव्य शक्तीचा अनुभव लोकांना वेळोवेळी येत असतो. 

आमच्या इथे अनेक पिढ्यांपासून हे स्तोत्र दररोज संध्याकाळी म्हटले जाते, जसे की ते अनेक घरांमध्ये म्हटले जाते. 

या स्तोत्राचा अर्थ अनेक विद्वानांनी  लिहिलेला आहे. अलिकडच्या काळात पण बऱ्याच जणांनी या स्तोत्राचा अर्थ लिहिला आहे. 

पण या स्तोत्राचा अर्थ मला जसा, उमगला, भावला, आणि समजला, तो ४ भागांमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 

रामरक्षा हे स्तोत्र कालातीत आहे. यापूर्वी हे फॅमिली ग्रुप वर प्रकाशित केले होते, पण आता ब्लॉग सुरू केलेला असल्यामुळे ते ब्लॉग वर प्रकाशित केले आहेत , जेणेकरून जास्तीत जास्त श्रीराम भक्तां पर्यन्त ते पोचतील. 

रामरक्षा स्तोत्र हे मंत्र म्हणून तर प्रभावी आहेच,  पण भक्तिरसामध्ये ओतप्रोत असे एक काव्य आहे. त्यामुळे याचा आस्वाद घेतांना, घाई  करून चालणार नाही. तर जशी आपण आपली आवडती वस्तू , डोळे बंद करून, तिचा स्वाद घेत, चाखत चाखत खातो, त्याप्रमाणे, यातील एकेक काव्यपंक्तीचा, कल्पनांचा, उपमांचा आस्वाद घेत घेत या स्तोत्राचे पठण-स्मरण  केले तर अगदी ब्रह्मानंदी टाळी लागू शकते. म्हणून आपण या स्तोत्राचा आस्वाद अनेक भागांमध्ये  घेणार आहोत.  पण त्याचबरोबर, सरते शेवटी, हे सर्व लेख एकत्र, एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत म्हणून, शेवटच्या भागात, सगळ्या लेखांचे एकत्र असे एक pdf  देणार आहोत, जे की ज्यांना पाहिजे त्यांना डाउनलोड करून घेऊन, आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप वर सेव्ह करून ठेवता येईल.

आज त्या लेखमालेतील पहिला भाग प्रकाशित करीत आहे. 

सर्वप्रथम, संदर्भासाठी, श्रीराम रक्षा स्तोत्र शुद्ध स्वरूपात खाली देत आहे. 

 

श्रीरामरक्षास्तोत्रम्

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप्‌ छंदः। सीता शक्तिः। श्रीमान हनुमान्‌ कीलकम्‌ । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ।

अथ ध्यानम्‌

ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं

 पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्‌ ।

 वामाङ्कारूढ सीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं

 नानालङ्कार दीप्तं दधतमुरुजटामंडलं रामचन्द्रम् । ।

इति ध्यानम्‌

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्‌ ।

एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्‌ ॥1॥

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्‌ ।

जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम्‌ ॥2॥

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम्‌ ।

स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्‌ ॥3॥

रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌ ।

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥8॥

जानुनी सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥9॥

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्‌ ।

स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्‌ ॥10॥

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।

न दृष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥11॥

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌ ।

नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥12॥

जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्‌ ।

यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥13॥

वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत्‌ ।

अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम्‌ ॥14॥

आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।

तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्‌ ।

अभिरामस्त्रिलोकानां   रामः श्रीमान्स नः प्रभुः ॥16॥

तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।

पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥17॥

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।

पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥18॥

शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्‌ ।

रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥19॥

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।

रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम्‌ ॥20॥

सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।

गच्छन्मनोरथोस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥21॥

रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।

काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः ॥22॥

वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।

जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥23॥

इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।

अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥24॥

रामं दूवार्दलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्‌ ।

स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः ॥25॥

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं

काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्‌ ।

राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं

वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्‌ ॥26॥

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।

रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥27॥

 श्रीराम राम रघुनन्दनराम राम

श्रीराम राम भरताग्रज राम राम ।

श्रीराम राम रणकर्कश राम राम

श्रीराम राम शरणं भव राम राम ॥28॥

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि

श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।

श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि

श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥29॥

माता रामो मत्पिता रामचन्द्रः

स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।

सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु-

र्नान्यं जाने नैव जाने न जाने ॥30॥

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।

पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्‌ ॥31॥

लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम ।

कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥32॥

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्‌ ।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥33॥

कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्‌ ।

आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्‌ ॥34॥

आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्‌ ।

लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्‌ ॥35॥

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम्‌ ।

तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्‌ ॥36॥

रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥37॥

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥38॥

इति श्री बुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रम् सम्पूर्णम्

 

आता त्यावरील विवेचन:

श्री रामरक्षा स्तोत्र

श्री रामरक्षा स्तोत्र आपणा सर्वांनाच माहित आहे आणि त्याचे महत्त्वही आपणास माहित आहे.

रामरक्षा स्तोत्र हे ‘स्तोत्र मंत्र’ आहे. स्तोत्र हे सहसा एखाद्या देवतेचे गुणवर्णन करणारे काव्य असल्याचे दिसून येते. पण मंत्र म्हणजे शक्तिशाली अक्षर समूह. आपल्या संस्कृतीमध्ये असंख्य मन्त्र आहेत हे आपणास माहित आहे. आपण अशा स्तोत्र रूपी मंत्रांकडे कडे नीट लक्ष दिले तर आपणास असे दिसून येईल, की, प्रत्येक स्तोत्राचा एक ‘ऋषि’ असतो; म्हणजे, ते स्तोत्र रचणारा, किंवा, ज्याच्या द्वारे ते स्तोत्र प्रकट झाले, तो. तसेच प्रत्येक स्तोत्राची एक ‘देवता’ असते. तसेच, स्तोत्राच्या सुरुवातीला, ते स्तोत्र, कुठल्या ‘छंदात’ रचले गेले आहे, त्याचा उल्लेख असतो. तदनंतर, त्या स्तोत्राची ‘शक्ति’ कोण आहे याचा उल्लेख असतो. त्यानंतर, त्या स्तोत्राची  , किंवा मंत्राची , ‘कीलक’ असलेली देवता कोणती आहे, याचा उल्लेख असतो. कीलक म्हणजे किल्ली. स्तोत्र किंवा मंत्ररूप हा खजिना जर उघडायचा असेल तर त्याची किल्ली लावणे आवश्यक आहे. या रामरक्षा स्तोत्राची, हनुमान ही देवता कीलक आहे. आणि सरते शेवटी, त्या  स्तोत्राचा ‘विनियोग’ म्हणजेच ‘उपयोग’ कुणा किंवा कशा प्रीत्यर्थ करण्याचे योजले आहे, याचा उल्लेख असतो.

आपणा ‘श्री सूक्तामध्ये’ ‘जपे विनियोग:’ किंवा ‘अभिषेके विनियोग:’ असा, प्रसंगानुसार उच्चार करतो. श्री सूक्ता’ ने अभिषेक करणार असू, तर ‘अभिषेके विनियोग:’, किंवा, श्री सूक्ताचा जप करणार असू तर, ‘जपे विनियोग:’.

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप्‌ छंदः। सीता शक्तिः। श्रीमद् हनुमान्‌ कीलकम्‌ । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः 

रामरक्षा स्तोत्राचे रचयिता, ‘बुधकौशिक’ ऋषि आहेत. बुधकौशिक ऋषि नक्की कोण होते, याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते, महर्षि वाल्मिकी म्हणजेच बुधकौशिक ऋषि होत.  रामरक्षा स्तोत्राच्या १५ व्या श्लोकात, 

आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।

तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥ असे म्हटले आहे, अर्थात, हर म्हणजे महादेव यांनी स्वप्नात येऊन संगीतल्याप्रमाणे, सकाळी बुधकौशिक ऋषींनी ही रामरक्षा लिहिली, असा उल्लेख आहे. काहींच्या मते, बुधकौशिक ऋषि म्हणजे विश्वामित्र ऋषि होत.  असो. 

सध्या तो विषय बाजूला ठेवू.

या स्तोत्राचे ‘श्री सीता रामचंद्र’ हे देवता आहेत. आपल्याकडे सर्व मुख्य देवता या जोडीजोडीनेच येतात. आणि त्यातही, स्त्री देवतेचे स्थान प्रथम असते, हे लक्षणीय आहे. एखाद्या स्तोत्रात जी देवता मध्यवर्ती असते, किंवा ज्या देवतेचे गुणवर्ण त्या स्तोत्रात केले असते, ती त्या स्तोत्राची ‘देवता’.

त्याच्यानंतर, ते स्तोत्र हे मुख्यता: कुठल्या ‘छंदात’ रचले गेले आहे, याचा उल्लेख येतो.

अनुष्टुप्  छंद हा संस्कृत काव्यामध्ये सर्वाधिक वापरला जाणारा छंद आहे. वेदांमध्ये याचा वापर झालेला आहे. रामायण, महाभारत, भगवद्गीता  यांतील अधिकांश श्लोक हे अनुष्टुप् छंदामध्ये आहेत. या छंदात ८- ८ वर्णांचे चार पाद, असे एकूण ३२ वर्ण असतात.

प्रत्येक स्तोत्राची/ मंत्राची, एक ‘शक्ति’ असते. या स्तोत्राची, ‘सीता’ ही शक्ति आहे.

आता ‘कीलका’ विषयी: कीलक म्हणजे किल्ली. प्रत्येक मंत्राची, एक कीलक देवता असते. त्या देवतेचे स्मरण केल्याशिवाय ते स्तोत्र फलीभूत होत नाही. रामरक्षा स्तोत्राचे कीलक म्हणजे ‘हनुमान’ आहे. हनुमान हा रामाचा परम भक्त होता. हनुमानरूपी देवतेची ‘किल्ली’ लावल्याशिवाय, हे स्तोत्र ‘उघडणार’ नाही.

सरते शेवटी, ह्या स्तोत्राचा ‘विनियोग’ म्हणजेच ‘उपयोग, कशा प्रीत्यर्थ, किंवा कुठल्या देवतेच्या प्रीत्यर्थ केला जात आहे, त्याचा उल्लेख.

बहुतेक स्तोत्रांमध्ये, सुरूवातीची ही प्राथमिक आणि आवश्यक माहिती  देऊन झाल्यानंतर, पुढील श्लोकामध्ये, त्या देवतेच्या, रूपाचे ‘ध्यान’ असते. म्हणून यापुढील श्लोकात, या स्तोत्राच्या देवतेचे, म्हणजे श्री रामचंद्राचे, व सीतेचे ध्यान केले आहे.

अथ ध्यानम्‌:

ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं ।

 पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्‌ ॥

वामांकारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं ।

 नानालंकार दीप्तं दधतमुरुजटामंडनं रामचंद्रम् ॥

श्रीरामाच्या आकृतीचे स्मरण करतांना, आपल्याला त्यातील सर्वात प्रभावशाली  गोष्ट लगेच डोळ्यासमोर येणारी कुठली असेल, तर ती म्हणजे रामाचे दीर्घ आणि बलशाली बाहू!.‘जानु’ म्हणजे ‘गुडघा’ ‘आ’ म्हणजे पर्यंत. ज्याचे बाहू त्याच्या गुडघ्यां पर्यंत लांब आहेत, तो श्रीराम. असे ‘आजानु बाहू’ ajanubahuपुरूष हे लाखो करोडोंमध्ये एखादेच असतात. आपण जेंव्हा रामरक्षा ‘कवच’ म्हणतो, तेंव्हा, रामाचे विशाल बाहू आपले संरक्षण करताहेत, ही भावना आपोआपच आपल्या मनात येते . रामाचे आजानुबाहू हे त्याच्या धनुर्विद्येसाठी वरदान होते.

‘धृतशरधनुषं’ 1d5d8c2740a0dfb1546b074b6f531db5अर्थात, हातात धनुष्य आणि बाण घेतलेला. ‘बद्धपद्मासनस्थं’ अर्थात,  बद्धपद्मासन घातलेला. पीत वस्त्र नेसलेला,

ज्याचे नेत्र, नुकत्याच उमललेल्या कमला सोबत स्पर्धा करतात आणि ज्याच्या मुखावर  ‘प्रसन्न’ भाव आहे.

ज्याच्या ‘वाम’ म्हणजे डाव्या अंकावर म्हणजे मांडीवर सीता विराजमान आहे.117271780 178882337200818 2702431598286977701 n

(हातात धनुष्य बाण घेतलेला, आणि बद्ध पद्मासन घातलेला आणि डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे, या तीन्ही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहेत हे अजून मला समजले नाही. बद्ध पद्मासनामध्ये, पद्मासन घालून, आपले हात पाठीच्या मागून नेऊन नंतर दोन्ही पायांचे अंगठे हाताने पकडायचे असतात. अशा वेळी हात मोकळे नसतांना धनुष्य बाण कसे धरणार? तसेंच अशा अवस्थेमध्ये, सीतेला डाव्या मांडीवर कसे घेणार? या विषयी काही खुलासा कुठे मिळतो का याचा शोध घेत आहे. मध्य प्रदेशातील हरदा येथे श्रीरामाची मूर्ती, डाव्या मांडीवर सीता बसलेली, अशी आहे. इतर कुठे अशी मूर्ति दिसत नाही.)  

आणि डाव्या बाजूला बसलेल्या सीतेच्या मुख कमलाकडे कडे ‘मिलल्लोचनं’ म्हणजे ज्याचे डोळे खिळले आहेत. आणि डोळे कसे, तर ‘नीरदाभं’ म्हणजे पाण्याने भरलेल्या काळ्या मेघांसारखे.main qimg 1d5b1752eb85adc08b2b37b63a0bc565 pjlq नाना+ अलंकार +दीप्तं म्हणजे विविध अलंकारांनी दीप्त झालेला; दधतम् म्हणजे  धारण करीत असलेला, काय? तर ‘उरु जटा’ उरु म्हणजे मांड्या. ‘उरु जटामंडनं’ म्हणजे मांड्यांपर्यंत रुळणाऱ्या जटांनी मंडित झालेला असा तो रामचंद्र. या ठिकाणी ‘जटामंडलं’ असेही काही ठिकाणी पाहण्यात येते. ‘जटामंडलं’ असा शब्द घेतल्यास  ज्याच्या भोवती मांड्यांपर्यंत रुळणाऱ्या जटांचे ‘मंडल’ आहे असा घेता येतो. मला व्यक्तिशः ‘जटामंडनं’ अधिक योग्य वाटते.

रामरक्षेला सुरुवात करतांना डोळे मिटून, अशा प्रकारे श्रीरामाचे रूप डोळ्यासमोर आणल्या नंतर, भाव समाधि लागणार नाही तर काय!  या इथे ‘ध्यान’ समाप्ति होते. ‘इति ध्यानम्.’    …..

क्रमशः 

पुढील येणारे भाग अवश्य वाचा, आणि सर्वात शेवटी येणाऱ्या भागात दिले जाणारे पीडीएफ डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवा.

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग- bhag 2 

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-2 ramraksha-stotra-2

shriram

ramraksha-stotra-2

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग- भाग २  

भाग १ वरून-पुढे 

श्रीराम आणि सीतेच्या ध्यानानंतर, रामरक्षा स्तोत्र सुरू होते.

त्यापुढील पहिल्या श्लोकात रामाच्या चरित्राची आणि नामाची महती सांगितलेली आहे:-

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्‌ ।

एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्‌ ॥1॥

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्‌ ।

जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम्‌ ॥2॥

श्रीरामाचे चरित्र हे ‘शत कोटी’ श्लोकांमाध्येही वर्णन करून संपणार नाही, इतके मोठे आहे.

इथे श्रीरामाला ‘रघुनाथ’ म्हटले आहे. अर्थात, रघुवंशातील सर्वोत्तम पुरूष, किंवा रघु वंशाचा ‘नाथ’.

भगवंताने, रघुकुलामध्ये अवतार घेतल्यामुळे, त्या कुळाचा उध्दार झाला. श्री शंकर हे श्री रामाचे नि:सीम भक्त. एक कथा अशी आहे, की एकदा, तीन्ही लोक, म्हणजे देव, दानव आणि मानव हे शंकराकडे गाऱ्हाणे घेऊन गेले. विषय होता, निरनिराळ्या मंत्रांचे योग्य वाटप. असे शंभर कोटी मंत्र होते. त्यावर, भगवान शंकरांनी तिघांनाही ३३ कोटी,३३ लाख ३३  हजार तीनशे तेहतीस मंत्र वाटून दिले. एक मंत्र राहिला, ज्यात ११ अक्षरे होती. शंकरांनी त्या मंत्रातील ३-३ अक्षरे तिघांना वाटून दिली. राहिली २ अक्षरे: “रा” आणि “म”. तेंव्हा शंकराने सांगितले, की ही दोन अक्षरे मात्र मी माझ्याच हृदयात ठेवणार.  

रघुनाथाच्या चरित्रामधील एक- एक अक्षर हे मनुष्याच्या महान पापांचे नाश करणारे आहे.

‘नीलोत्पल’- उत्पल अर्थात कमळ. ‘नीलोत्पल’ म्हणजे नील कमल. श्री रामाचा वर्ण नील कमलाप्रमाणे ‘नील’ ‘श्याम’ आहे. नील + श्याम. श्याम वर्ण म्हणजे काळा नव्हे. श्याम रंगाचे तेजच वेगळे आहे. श्री कृष्णाचे वर्णन ‘घनश्याम’ असे ही केले जाते. पुढे रामाचे ‘राजीव लोचन’ असे वर्णन केले आहे. राजीव लोचन म्हणजे कमला प्रमाणे नेत्र असलेला. वरील दोन्ही वैशिष्टये डोळ्यासमोर आणून श्रीरामाचे ध्यान करून पाहावे.

‘जानकीलक्ष्मणोपेतं’ म्हणजे ज्याच्या आजू बाजूला जानकी आणि लक्ष्मण आहेत असा. आणि जटा रुपी मुकुटाने मंडित झालेला, असा तो श्रीराम. जणू काही सुरुवातीच्या ध्यानाच्या श्लोकात श्री रामाच्या रूपाचे वर्णन करून कवीचे मन भरले नसावे! म्हणून या श्लोकात ‘नीलोत्पल श्याम’, ‘राजीवलोचन’, ‘जटा मुकुट मंडित’ अशा प्रकारे श्रीरामाचे ध्यान करून कवीने श्रीरामाच्या रूपाचे अजून बहारदार वर्णन केले आहे.

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरांतकम्‌ ।

स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्‌ ॥3॥

main qimg 280b9c16cbb6d0bf90cbd86d6d340541 lqसंस्कृत मधील श्लोकांचा अर्थ समजावून घेतांना, संधि विच्छेद करून, शब्द सुटे सुटे करून घेतल्यानंतर त्यातील अर्थ लवकर लक्षात येतो. वरील श्लोकाचा संधि विच्छेद खालील प्रमाणे आहे:

स= सहित , असि= तलवार, किंवा खड्ग,

 (आपण असिधारा व्रत हा शब्द ऐकला आहे. त्याचा अर्थ: असिधारा व्रत- तलवारीवर चालण्यासारखे कठीण व्रत)

तूण= बाण ठेवण्याचा भाता, धनु:= धनुष्य, बाण= बाण, पाणि=हात

नक्तम्+चर = नक्त म्हणजे रात्र. चर म्हणजे चालणे, हिंडणे(उदा. गोचर, वनचर, दिनचर, निशाचर) नक्तंचर- रात्री हिंडणारे अर्थात, राक्षस  ; अन्तकम्= अंत करणारा.

नक्तंचरांतकम्‌= निशाचर असलेले म्हणजे राक्षस, यांचा अंत करणारा.

स्वलीलया= स्वतःच्या लीलांनी

जगत्+त्रातुम्+आविर्भूतम्+अजम्(जो अज आहे, अर्थात ज्याचा जन्म झालेला नाही असा तो श्रीराम )+विभुम् (सर्व व्यापक, महान)- अर्थात, जगाला तारण्यासाठी जो आविर्भूत झाला आहे, जो अजन्मा आहे, जो विभू, म्हणजे सर्वव्यापक आहे.

या श्लोकात श्रीरामाची आणखी ठळक वैशिष्टये वर्णन केली आहेत.

रामाचे रूप लक्षात आणतांना, सर्वात ठळक बाब म्हणजे रामाचे आजानुबाहू; पण त्यानंतर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे रामाचा बाण. राम म्हटला की त्याच्या पाठीवर बाणाचा भाता, त्यात असलेले बाण, आणि एका हातात खड्ग हे आपल्या नजरे समोर येते. आपल्या दीर्घ बाहूंनी वरील शस्त्रें समर्थपणे चालवून राक्षसांचा नायनाट करणारा आणि भक्तांचे रक्षण करणारा असा राम.

परब्रह्माचा ‘जन्म’ होत नसतो, तर ते आविर्भूत होत असते. ते विभु म्हणजे सर्वव्यापक जरी असले , तरी भक्तांच्या संरक्षणासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी मनुष्य रूपात आविर्भूत होत असते.

आतापर्यंत आपण रामरक्षेतील सुरुवातीचे ३ श्लोक पाहिले. त्यात श्री रघुनाथाच्या चरित्राचा विस्तार, आणि जगाच्या उद्धारासाठी रामाचा झालेला ‘अविर्भाव’ यांचा उल्लेख आहे.

आता यापुढील श्लोक- या श्लोकापासून राम कवच सुरू होते.

रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌ ।

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥

‘प्राज्ञ’ म्हणजे विद्वान लोक ‘पापघ्नीं’ म्हणजे पापांचा नाश करणारी, आणि ‘सर्व कामदां’ म्हणजे सर्व कामना पूर्ण करणारी अशी  रामरक्षा पठण करतात.

इथून पुढच्या ओळीपासून रामरक्षा कवच सुरू होते. यात शरीरात सगळ्यात वर असणारे ‘शीर’ म्हणजे डोक्या पासून सुरुवात करून(‘शिरो मे राघवः पातु”) सर्वात खाली, म्हणजे आपल्या पायापर्यंत, (‘पादौ बिभीषण: श्रीद:”)  आपल्या  शरीराच्या सर्व अवयवांचे श्रीराम रक्षण करो अशी प्रार्थना केली आहे.

आपण काळजीपूर्वक पाहिले, तर या सर्व श्लोकांमध्ये, श्रीरामाचे पूर्ण चरित्र, कालक्रमानुसार आलेले आहे, असे दिसून येते.

श्रीराम हे रघुवंशी, म्हणून सुरुवातीला त्यांचा, राघवः असा उल्लेख आला आहे. आणि त्यानंतर दशरथाचा पुत्र, म्हणून दशरथात्मज. रघुवंशी ‘राघव’ माझ्या डोक्याचे रक्षण करो, तर दशरथाचा पुत्र असलेला श्रीराम माझ्या ‘भालाचे’ म्हणजेच कपाळाचे रक्षण करो.

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥

वडिलांनंतर आईचे अर्थात कौसल्येचे नाव येते. आणि आईच्या नंतर विश्वामित्रांचे  नांव येते. कौसल्यापुत्र श्रीराम माझ्या ‘दृशौ’ म्हणजे डोळ्यांचे रक्षण करो.

विश्वामित्रांना प्रिय असणारा श्रीराम माझ्या श्रुती म्हणजे कानाचे रक्षण करो.

इथे ‘नेत्र’ किंवा ‘कर्ण’ म्हटले नाही, हे लक्षात घ्यावे. ‘दृशौ’ म्हणजे दृष्टी म्हटले आहे. डोळे म्हणजे केवळ पाहण्याचा बाह्य अवयव आहे. दृष्टी मध्ये डोळे आणि आतील दृष्टीचे ज्ञानेंद्रिय दोहोंचा समावेश आहे. तसेच ‘श्रुती’ मध्ये कान आणि आतील कर्णेन्द्रिय दोन्हींचा समावेश आहे. तसेच ‘घ्राण’ म्हणजे नाक आणि आतील घ्राणेन्द्रिय दोन्हीचा समावेश आहे.

आपणास माहित  आहे, की जेंव्हा राम आणि लक्ष्मण थोडे मोठे झाले, वसिष्ठ ऋषींकडे विद्या प्राप्त करून आले, तेंव्हा ऋषि विश्वामित्र दशरथाकडे आले, आणि दशरथाला म्हणाले, “हे राजा, सांप्रत राक्षसांनी खूप धुमाकूळ माजवलेला असून, ते ऋषींना यज्ञ करू देत नाहीयेत. त्यामुळे राक्षसांचा निःपात करण्यासाठी आणि यज्ञ रक्षणासाठी तुझे हे दोन राजकुमार माझ्यासोबत दे” श्रीराम आणि लक्ष्मणाने विश्वामित्र ऋषींना या कामात सहकार्य केले, आणि ते त्यांना प्रिय झाले, म्हणून “विश्वामित्रप्रियः”

 ‘मखत्राता’- ‘मख’ म्हणजे यज्ञ. (लग्नात किंवा कुठल्याही शुभकार्यात ‘ग्रहमख’ करतात- ते म्हणजे नऊ ग्रहांना प्रसन्न करण्यासाठीचा यज्ञ.) मखत्राता म्हणजे ‘यज्ञाचे रक्षण करणारा’

त्यानंतरचे नांव ‘सौमित्रिवत्सल’ असे आहे. सौमित्री म्हणजे सुमित्रेचा पुत्र लक्ष्मण. सौमित्रिवत्सल म्हणजे लक्ष्मणावर वात्सल्य असलेला. श्रीरामाचे आपली कनिष्ठ भावावर, नुसते ‘प्रेम’ नव्हते तर ‘वात्सल्य’ होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. वात्सल्य म्हणजे जे आईचे किंवा वडिलांचे मुलाप्रत असते, त्याला आपण वात्सल्य म्हणतो. तसेच वात्सल्य श्रीरामाचे आपल्या लहान भावाप्रति होते. रामायणात आदर्श नातेसंबंध कसे असावेत याचा वस्तुपाठ श्रीरामांनी घालून दिलेला आहे.

कौसल्यापुत्र श्रीराम माझ्या दृष्टीचे रक्षण करो; विश्वामित्रांना प्रिय असणारा राम माझ्या श्रुतीचे रक्षण करो; यज्ञाचे रक्षण करणारा श्रीराम माझ्या ‘घ्राणाचे’ रक्षण करो; आणि लक्ष्मणावर वात्सल्य असणारा श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो.

जिंव्हा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥

त्यानंतर येणाऱ्या जिंव्हा या महत्वाच्या अवयवाचे रक्षण करण्यासाठी ‘विद्यानिधि’ श्रीरामाची प्रार्थना केली आहे.

त्यानंतर येणाऱ्या ‘कंठ’ या अवयवाचे रक्षण भरताने वंदन केलेल्या श्रीरामाने करावे अशी प्रार्थना केली आहे.

कंठ हा अवयव भावनांचे स्थान आहे. मनुष्य भावनावश झाल्यानंतर त्याचा कंठ अवरुद्ध होतो, घशात आवंढा दाटून येतो. भरताची श्रीरामाप्रत भक्ती ही अशा प्रकारची होती. श्रीराम लंकेहून अयोध्येला परत आल्यानंतर भरताशी झालेली गळाभेट आठवा. म्हणून या ठिकाणी कंठा साठी ‘भरत वंदित’ हे विशेषण अगदी योग्य वाटते.

स्कंध अर्थात खांद्यांसाठी ‘दिव्यायुध’ हे विशेषण तसेंच ‘भुजा’ अर्थात दण्ड किंवा बाहू यासाठी ‘भग्नेशकार्मुक’ हे विशेषण असेच चपखल बसते. रामाचे मुख्य शस्त्र हे धनुष्यबाण होते. आणि बाणाचा भाता खांद्यावर असतो.

विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाकरवी आधी त्राटिकेचा वध करविला. तसेच इतर अनेक राक्षसांचा वध दोन्ही बंधूंनी केला. तदनंतर जनक राजाकडून आलेल्या आमंत्रणावरून विश्वामित्र ऋषी दोन्ही बंधूंना सीता स्वयंवराला घेऊन घेले. तिथे श्रीरामांनी शिवधनुष्याला प्रत्यंचा लावतांना ते तुटले, म्हणून भग्नेशकार्मुक असे नाव आले. ‘भग्नेशकार्मुक’ भग्न+ ईश+ कार्मुक; ईश अर्थात ‘शंकर’, ‘कार्मुक’ अर्थात धनुष्य. अर्थात, ज्याने श्री शंकराचे धनुष्य भग्न केले- तोडले- तो श्रीराम.

या श्लोकात श्रीरामाचे शिवधनुष्य भंगापर्यन्तचे चरित्र आले आहे.

आता त्यापुढील श्लोक:

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥seetapati shriram

जनकाच्या दरबारातील  स्वयंवरात श्रीरामाने सीतेचे वरण केले. तो सीतापति श्रीराम माझ्या हातांचे रक्षण करो.  लग्न करणे- म्हणजे “हात हातात देणे” वधूवर एकमेकांना हाताने माला  घालतात, म्हणजेच “वरतात”. या दृष्टीने इथे सीतापती श्रीराम माझ्या हातांचे रक्षण करो अशी प्रार्थना योग्य वाटते. 

श्रीराम जानकीशी स्वयंवर करून परत निघाले असतांना वाटेत जमदग्नीचा पुत्र परशुराम ‘जामदग्न्य’ याने श्रीरामाला शिवधनुष्य तोडल्यामुळे रागावून आव्हान दिले. त्यावेळी झालेल्या युद्धात परशुरामांना, श्रीराम हे श्रीविष्णूचे अवतार असल्याची खात्री झाल्यानंतर, त्यांच्या मुखातील अवतार ज्योती श्रीरामाच्या मुखात शिरली अशी कथा आहे.  जामदग्न्याला म्हणजेच परशुरामांना जिंकणारा म्हणून जामदग्न्यजित्‌.parshuram

श्रीराम सीतेशी विवाह करून अयोध्येला परत आले, नंतर कैकेयीच्या दुराग्रहामुळे वनवासात गेले. वनवासात सीता आणि लक्ष्मण त्यांच्या सोबत होते. श्रीराम पंचवटीला असतांना, रावणाची बहिण शूर्पणखा तेथे आली. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले. शूर्पणखेचा आक्रोश ऐकून त्रिशिर, खर आणि दूषण हे राक्षस (जे की रावणाचे दूरचे भाऊ होते) चौदा हजार सैन्यासह धावून आले. रामाने त्या सर्वांचा वध केला. म्हणून ‘खरध्वंसी’ हे विशेषण येथे आले आहे.khar dushan killing by shriram

नंतर, सीता हरणाचा प्रसंग झाल्यानंतर, सीतेच्या शोधात असतांना, हनुमान, नळ, नीळ, सुग्रीव आणि जांबुवंत यांच्याशी श्रीरामाची भेट झाली. जाम्बुवन्ताला आश्रय देणारा, म्हणून ‘जाम्बवदाश्रयः’ हे विशेषण आले आहे.

“ खर राक्षसाचा वध करणारा श्रीराम माझ्या मध्य भागाचे रक्षण करो. जाम्बुवन्ताला आश्रय देणारा श्रीराम माझ्या ‘नाभि’ चे रक्षण करो.”

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥8॥

यापुढील श्लोकात सुग्रीवाचा ईश श्रीराम माझ्या कमरेचे रक्षण करो अशी प्रार्थना केली आहे. सुग्रीवाची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे.

यापुढील शब्द आहे ‘सक्थिनी’. सक्थिनी हा शब्द आपल्या जास्त परिचयाचा नाही. मराठी मध्ये एकवचन आणि बहुवचन असते. पण संस्कृत मध्ये एकवचन, द्विवचन  आणि बहुवचन असे तीन प्रकार आहेत. ‘सक्थिन’ म्हणजे कंबर आणि जांघ यांच्या मधील भाग. जांघ हा शब्द मराठी आहे, तो संस्कृत मधील ‘जंघा’ पेक्षा वेगळा आहे.  ‘सक्थिनी’ हे सक्थिन या शब्दाचे द्विवचन आहे. “हनुमंताचा प्रभु असलेला श्रीराम माझ्या सक्थिनी चे रक्षण करो.”parts of body- sanskrit

संस्कृत मधील ‘उरू’ म्हणजे मराठीतील ‘जांघ’ किंवा ‘मांडी’. “राक्षसांच्या कुळाचा नाश करणारा श्रीराम माझ्या मांड्यांचे रक्षण करो.”

जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥9॥

मांडीच्या खालचा अवयव म्हणजे गुडघा. “जानु” म्हणजे गुडघा. जानुनी म्हणजे दोन्ही गुडघे. (जसे सक्थिन चे द्विवचन सक्थिनी होते, तसेच, जानु चे द्विवचन जानुनी झाले. ) त्यापुढील अवयव “जंघा”. संस्कृत मधील “जंघा” हे मराठीतील “जांघ” पेक्षा  वेगळे आहे. संस्कृत मध्ये “जंघा” म्हणजे “पोटरी”

ज्याने सेतू बांधला, असा श्रीराम माझ्या “जानुनी” म्हणजे गुडघ्यांचे रक्षण करो; आणि दशमुख रावणाचा वध केला तो श्रीराम माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करो.

ज्या रामाने बिभीषणाला “श्री” म्हणजे वैभव आणि राज्य दिले, तो श्रीराम, माझ्या पावलांचे रक्षण करो.

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्‌ ।

स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्‌ ॥10॥

 एतां म्हणजे अशाप्रकारे. श्रीरामाचे बल युक्त असणारी अशी ही (एतां) रक्षा जो पुण्यवान मनुष्य पठण करेल, तो चिरायु, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयी होईल.

याठिकाणी रामरक्षेतील मुख्य भाग म्हणजे ”कवच” संपले.

विशेष:आपल्याला एखादे वेळी बाका प्रसंग असेल, संकटात सापडलो असू, जिवाची भीती असेल, आणि पूर्ण रामरक्षा म्हणण्याइतका वेळ नसेल, तर नुसते हे “कवच” म्हटले, तरी कार्यभाग होतो, संकटातून रक्षण होते हा अनुभव आहे.  

माधव भोपे 

क्रमशः 

या पूर्वील लेख वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1

For our U.S.A Readers:

Buy on Amazon

 

at $1.19 only

41CR5kGrwLL. SY445 SX342

For our U.K. readers:Acer Laptop

Buy on Amazon at Special prices

Laptops to fit your life style

UK Laptops 1200x90 1

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-3 ramraksha-stotra-3

shriram

ramraksha-stotra-3

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग- भाग ३ 

भाग २ वरून-पुढे 

यापूर्वीच्या लेखात आपण 10 व्या श्लोकापर्यंत पाहिले होते. त्यात श्लोक क्र. 4 पासून 10 पर्यन्त, श्री राम कवच बघितले. आता पुढे:-

आता यापुढील श्लोकांत या कवचाचे माहात्म्य श्रीरामाच्या नामाचे महत्त्व, श्रीरामाच्या रूपाचे वर्णन इत्यादि आहे.

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।

न दृष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥11॥

— पाताल+ भूतल+व्योम+ चारिणः+ छद्मचारिणः+न+ द्रष्टुं+ अपि+शक्ताः+ते+ रक्षितं+ राम+नामभिः

विष्णू पुराणात ३ लोक आणि चौदा भुवने सांगितली आहेत. तीन लोक म्हणजे पाताळ लोक, भूलोक आणि स्वर्गलोक. पाताळ लोकात दैत्य, दानव, यक्ष, नाग इत्यादिंचा वास असतो असे मानले गेले आहे. भूलोकात मनुष्य आणि इतर जीवजंतूंचा वास असतो, आणि स्वर्गलोकात इंद्र, वरूण, पवन, बृहस्पति, चंद्र, निरनिराळे ग्रह इत्यादि देवतांचा वास असतो. या तीन्ही लोकांमधील कुठलीही शक्ति, राम नामाने रक्षित माणसाचे वाकडे करू शकत नाही. याशिवाय, छद्म रूपाने वावरणाऱ्या  शक्ति असतात, ज्या की सामान्य दृष्टीला दिसत नाहीत(छद्मचारिणः).

अशा शक्ति, रामनामाने रक्षित झालेल्या व्यक्तिचे वाकडे करण्याचे तर सोडाच (अपि) पण त्याच्या कडे वाकडया नजरेने पाहूही शकत नाहीत.( न+ द्रष्टुं). अर्थात, ज्या व्यक्तिने राम नाम रूपी कवच धारण केले आहे, त्याला तीन्ही लोकांतील वाईट शक्तींची बाधा होऊ शकत नाही.(ग्रह नक्षत्र, भूत पिशाच, किंवा, या लोकातील वाईट प्रवृत्तीचे लोक)

म्हणूनच आपल्या इथे, कुठल्याही वाईट शक्तींची बाधा झालेली आहे, दृष्ट इत्यादि लागली आहे, अशी शंका असल्यास, रामरक्षा स्तोत्राचा अचूक उपाय आहे असे मानले जाते.

rakshas-1

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌ ।

नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥12॥

image 2

 “राम”, “रामभद्र” किंवा “रामचंद्र” अशा कुठल्याही नावाने श्रीरामाचे जो स्मरण करतो, त्या पुरुषाला पापाचा स्पर्शही होत नाही. आणि “भुक्ति” आणि “मुक्ती” प्राप्त होते. (विन्दति = प्राप्त होणे )

भुक्ति म्हणजे ऐहिक भोग. मुक्ति अर्थात मोक्ष. श्रीरामाच्या नामस्मरणाने दोन्हीही प्राप्त होतात.

आपल्या आवडत्या व्यक्तिला, आपल्या लाडक्या मुलाला, जसे आपण बबड्या, छबड्या, सोन्या, राजा, छकुल्या, अशा अनेक नावाने हाक मारतो आणि कितीही नावांनी हाक मारली तरी आपले मन भरत नाही, तशीच अवस्था या ठिकाणी कवीची झाली आहे, असे मला वाटते, म्हणूनच, श्रीराम या आपल्या प्रेमास्पदाला, आपल्या देवतेला, “राम”, “रामभद्र”, “रामचंद्र” अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधित केले आहे!

जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्‌ ।

यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥13॥

  जगज्जैत्र+ एक+ मंत्रेण+रामनाम्ना+ अभिरक्षितम्+यः +कण्ठे +धारयेत्+तस्य+ करस्थाः+ सर्व+ सिद्धयः

ज्याने जग जिंकता येते अशा एकमेव रामनाम रूपी मंत्राने जो अभिरक्षित आहे, संरक्षित आहे, रामरूपी मंत्र ज्याने कंठात धारण केलेला आहे, त्याला, सर्व सिद्धी हातातच असल्यासारख्या आहेत.

वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत्‌ ।

अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्‌ ॥14॥

vajra

वज्र+ पंजर+नाम+इदं+यो+ राम कवचम्+ स्मरेत+अव्याहत+ आज्ञः + सर्वत्र+ लभते+जय+ मंगलम्

इंद्राचे वज्र हे आपणास माहित आहे. देव आणि दानवांच्या लढाईत, जेंव्हा दानव देवांवर प्रबळ होऊ लागले, त्यावेळी दधिची ऋषींच्या हाडांपासून वज्र बनविण्यात आले होते आणि त्याचा वापर करून इंद्राने वृत्रासुरावर आणि इतर दानवांवर विजय मिळविला होता. हे वज्र अजेय समजले जाते. पंजर म्हणजे पिंजरा. रामकवच हे वज्राच्या पिंजऱ्यासारखे अभेद्य आहे. असे हे रामकवच जो  स्मरण करतो, त्याची आज्ञा कधीच मोडली जात   नाही. आणि त्याला नेहमी सर्वत्र, जय आणि मंगलाचीच प्राप्ति होते.(अव्याहताज्ञः या शब्दाचा अर्थ आपण मराठीच्या अव्याहत म्हणजे सतत असा घेतो आणि अशा व्यक्तिला नेहमी सर्वत्र जय मंगल प्राप्त होते असा करतो. पण सदरील शब्दाचा समास विग्रह अव्याहत+ आज्ञः असा होत असून त्याचा अर्थ ‘ज्याची आज्ञा मोडली जात नाही’ असा होतो)

आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।

तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥

budhkaushik rushi

 बुधकौशिक ऋषींना ‘हर’ म्हणजे भगवान शंकरांनी स्वप्नात येऊन आदेश दिल्याप्रमाणे (‘आदिष्ट”) त्यांनी सकाळी उठून (प्रबुद्धो) हे रामरक्षा स्तोत्र लिहिले.

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्‌ ।

अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान्स नः प्रभुः ॥16॥

“आराम” म्हणजे बगीचा, “विराम” म्हणजे “पूर्णविराम”, “अभिराम” म्हणजे आनंदकर, हर्षपूर्ण. अभिरामस्त्रिलोकानां म्हणजे तीन्ही लोकांना आनंद देणारा.    राम:+ श्रीमान+स+ न: +प्रभु:

 कल्पवृक्षाचा बगीचा , समस्त आपदा म्हणजे संकटांचा विराम (the end) असणारा , तीन्ही लोकांना आनंद देणारा(अभिरामस्त्रिलोकानां) असा “राम” हा आमचा “प्रभु” आहे.

इथपर्यंत रामरक्षा स्तोत्र, आणि त्याची उत्पत्ति कशी झाली, इत्यादि सांगून झाले. इथून पुढील श्लोक हे भक्तिरसात ओथंबलेले आहेत.

तरुणौ रूप सम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।

पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥17॥

ram and laxman

वरील श्लोकात श्रीराम आणि लक्ष्मण दोघांचे वर्णन आहे. दोघेही तरुण, रूपसंपन्न, सुकुमार आणि त्याच बरोबर महान शक्तिमान आहेत. दिसायला जरी सुकुमार असले तरी ते महाबलौ आहेत हे लगेच स्पष्ट केले आहे. “पुण्डरीक” म्हणजे कमळ. कमळाप्रमाणे विशाल ज्यांचे नेत्र आहेत, आणि ज्यांनी “कृष्णाजिन” म्हणजे काळ्या मृगाचे “चीर” म्हणजे वल्कल नेसले आहे.

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।

पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥18॥

फल आणि कंदमूल खाणारे, दान्तौ म्हणजे ज्यांच्याकडे संयम आहे; तपस्वी, ब्रह्मचारी, असे दशरथाचे पुत्र, राम लक्ष्मण हे दोन भाऊ,

शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्‌ ।

रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥19॥

सर्व जीवांचे शरणस्थान , सर्व धनुर्धार्यांमध्ये श्रेष्ठ, ज्यांनी राक्षस कुलांचा संहार केला आहे, (रक्षःकुल म्हणजे राक्षसांचे कूळ,  निहन्तारौ म्हणजे नष्ट करणारे), असे ते रघुकुलातील दोन उत्तम पुरुष, हे आमचे ‘त्रायेतां नौ’ म्हणजे रक्षण करोत.

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषंगसंगिनौ ।

रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम्‌ ॥20॥

हा रामरक्षेमधील सगळ्यात अवघड श्लोक. हा बऱ्याचदा चुकीचा म्हणला जातो. याचा संधिविग्रह जर समजून घेतला तर तो सोपा वाटेल.

आत्त   = ताणलेले

सज्ज     = सज्ज

धनुषौ   =  धनुष्य

‘आत्तसज्जधनुषौ’  = ताणलेल्या धनुष्याने सज्ज असलेले (ते दोघे)

इषुस्पृशौ  =(इषु: म्हणजे बाण, इषुस्पृशौ =बाणांना स्पर्श करणारे )

अक्षय =   कधीही न संपणारा

आशुग =  गतिमान;

निषंग    = बाण  ;

संगिनौ   =  बाणांचा भाता घेऊन जात असलेले

रक्षणाय   = रक्षणासाठी  ;

मम     = माझ्या ;

रामलक्ष्मणावग्रतः    राम लक्ष्मण माझ्या पुढे

 पथि    = रस्त्याने ;

 सदैव    =  नेहमी ;

 गच्छताम्  =   चालोत. ;

भावार्थ:

हातात धनुष्य घेतलेले, पाठीवर अक्षय बाणांचा भाता असलेले, आणि ज्यांचे हात त्या बाणांवर, कुठल्याही क्षणी वापर करण्याच्या तयारीत आहेत, असे राम आणि लक्ष्मण हे माझ्या रक्षणार्थ  माझ्या पुढे चालोत.

सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।

गच्छन्मनोरथोस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥21॥

सन्नद्ध म्हणजे शस्त्रास्त्रांनी पूर्ण सुसज्जित, तत्पर, उद्यत.

गच्छन्  म्हणजे चालत असलेले, अस्माकं म्हणजे आमचे, पातु म्हणजे रक्षण करणारा,

कवच,  खड्ग, धनुष्य, बाण यांनी सज्ज असलेले युवा  राम आणि लक्ष्मण, आमच्या  मनोरथानुसार आमचे रक्षण करण्यासाठी  आमच्या पुढे चालोत.

रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।

काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥22॥

लक्ष्मण ज्याचा अनुचर आहे असा दाशरथी राम, शूर, बलवान, काकुत्स्थ वंशी, पूर्ण पुरुष, कौसल्येचा पुत्र आणि रघुकुलातील उत्तम पुरुष

वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।

जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥23॥

वेदान्तानी जाणण्यायोग्य (वेद्यो), यज्ञांचा स्वामी किंवा ईश , पुराण पुरुषोत्तम, जानकीचा पति, श्रीमान म्हणजे वैभवाने युक्त, अप्रमेय पराक्रम म्हणजे ज्याच्या पराक्रमाचे मोजमाप करता येऊ शकत नाही.

वरील श्लोकातील श्रीमानप्रमेयपराक्रम हा शब्द, श्रीमान आणि अप्रमेयपराक्रम हे दोन शब्द मिळून झाला आहे. त्यामुळे याचा उच्चार करतांना “श्रीमान प्रमेयपराक्रम” असा न करता

“न” वर जोर देऊन, श्रीमानप्रमेयपराक्रम असा करायला पाहिजे जेणे करून की श्रीमान आणि अप्रमेयपराक्रम हे दोन शब्द असल्याची जाणीव होईल.

इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।

अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥24॥

वरील संबोधन हे भगवान शिव करताहेत की वरीलप्रमाणे श्रीरामाची नांवे, जो माझा भक्त नित्य जपतो, त्याला अश्वमेध यज्ञ करून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही अधिक पुण्य मिळते यात काहीही संशय नाही.

माधव भोपे 

क्रमशः 

या पूर्वील लेख वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-2

google-pay-story- पेमेंटचा रहस्यमय किस्सा

upi featured image

google-pay-story

Google Pay पेमेंट झाले… पण पैसे गेले कुठे? – QR कोडमुळे घडलेला खरा अनुभव

गेल्या काही वर्षांत, विशेषतः करोना नंतर, डिजिटल पेमेंट हे आपल्यापैकी बहुतेक लोकांच्या जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहे. गूगल पे, फोन पे, पेटीएम यासारखी अनेक ऍप्स आपण अगदी सहजपणे वापरीत आहोत. मोठ्या दुकानांपासून, मॉल पासून ते छोट्या दुकानदारांपर्यंत आणि वडा पाव वाल्यापासून, छोट्याशा भाजीवाली पर्यंत, भारताच्या कानाकोपऱ्यात, प्रत्येकजणासाठी डिजीटल पेमेंट अत्यंत सोयीचे झाले आहे.

मात्र आपण मधून मधून या माध्यमातून होणारे तुरळक फसवणुकीचे प्रकारही ऐकतो आणि वाचतो. असे प्रकार वाचल्यामुळे, “ते गूगल पे फोन पे आपण वापरतच नाही बाबा!” असे म्हणणारेही बरेच आहेत, आणि माझ्या पाहण्यात यांत वयस्करच नाही तर काही तरूण मंडळीही आहेत. असो. आज तो विषय नाही.

पण हे वापरत असतांना, अभावितपणेच कधी कधी कशी चूक होऊ शकते, त्याबद्दल एक किस्सा आज सांगायचा आहे!

मी, जेंव्हा पासून हे डिजिटल पेमेंट सुरू झाले, तेंव्हापासून वापरतो आहे. त्यामुळे एटीएमच्या चकरा कमी झाल्या आहेत. वर्षातून जास्तीतजास्त 2-4 वेळेला एटीएम ला जायचे काम पडते. त्यामुळे पूर्वी, एटीएमला कॅश नसणे, एटीएम बंद असणे, विशेषतः आपल्या बँकेच्या एटीएम्स ची दुरवस्था, तसेंच पाहिजे त्या नोटा न मिळणे, इत्यादि असंख्य गैरसोयीं पासून सुटका मिळाली आहे. आता खिशात पाकीट, एटीएम कार्ड असण्याची आवश्यकता भासत नाही, फक्त मोबाईल असला की पुरे!

असो. तरीही आपल्या यू पी आय ऍप ( गूगल पे, इत्यादि) चा वापर करतांना कधी कधी अभावितपणे कशी चूक होऊ शकते याचा हा किस्सा!

साधारण दोन महिन्यांपूर्वी, मी आणि सौ, आम्ही दोघे बाहेर खरेदी करायला निघालो होतो. काही किरकोळ वस्तू आणायच्या होत्या आणि मुख्य म्हणजे रोज वापरायच्या काही साड्या खरेदी करायच्या होत्या.

आम्ही दोघे, गाडीने  बाहेर पडलो. त्रिमूर्ती चौकातल्या एका दुकानात, काही स्टेशनरी, दोऱ्या वगैरे असे काही सामान घ्यायचे होते. वेळ संध्याकाळची होती. आम्ही त्या दुकानातून 110 रुपयांचे सामान घेतले, आणि सवयीप्रमाणे, समोर दिसणारा क्यू आर कोड स्कॅन केला आणि त्यात रक्कम टाकणार, इतक्यात,  दुकानाचा राजस्थानी वाटणारा मालक, , जो वयस्कर होता, म्हणाला, की तो क्यू आर कोड खराब आहे, तुम्ही कॅशच पेमेंट करा. रक्कम थोडी होती, आणि आमच्याजवळ तेवढी कॅश होती, त्यामुळे मी 110 रुपये त्याला नगदी दिले.

तिथून आम्ही साड्यांची दुकाने शोधत शोधत, गजानन मंदिरापासून, रिलायन्स कडे निघालो. या रस्त्यावर काही साड्यांची दुकाने रोज रस्त्याने येता जातांना दिसतात. त्यांच्यापैकीच एका चांगल्या दिसणाऱ्या साड्यांच्या दुकानात आम्ही शिरलो.

तिथे बऱ्याच वेळ निरनिराळ्या प्रकारच्या साड्या पाहिल्यानंतर, शेवटी 4 साड्या पसंत झाल्या. मनासारख्या साड्या मिळाल्यामुळे आम्ही खुश होतो. साड्यांचे बिल ₹2850 इतके झाले. सेल्समन ने साड्या पॅक करून काउंटरवर दिल्या. पण त्या साड्या काही ठिकाणी चुरगळल्या सारख्या असल्यामुळे साधारण अशा दुकानांमधून, त्या आपल्याला फ्री रोल प्रेस करून देतात. त्याप्रमाणे बिल काउंटर वरचा कॅशियर म्हणाला की रोल प्रेस करून तुम्हाला साड्या परवा मिळतील. अर्थात पेमेंट आपल्याला आधी करावे लागते. त्या प्रमाणे तो कॅशियर बिल बनवू लागला. त्याने बिल बनवले, आणि आम्ही काउंटर वर असणाऱ्या क्यू आर कोडवर माझ्या गूगल पे अँप ने स्कॅन केले, त्याच्यात रक्कम टाकली- ₹.2850. मी पिन टाकला, पेमेंट केले, कॅशियर ला स्क्रीनशॉट दाखवला, त्यानेही ओके म्हणून बिल मला सोपवले आणि आम्ही रोल प्रेस साठी साड्या तिथेच ठेवून, निघालो.

आम्ही घराच्या वाटेवर असतांनाच,गाडी चालवत असतांना, मला अनोळखी नंबर वरून फोन आला. आता आजकाल कोणत्या नंबरवरून कंपन्यांचे कॉल येतात, कोणत्या नंबरवरून फ्रॉड कॉल येतात, ते साधारण माहिती झाले आहे. हा नंबर त्यापैकी वाटत नव्हता. म्हणून मी गाडी बाजूला घेऊन, थांबवून, फोन घेतला. तर तो दुकानदाराचा फोन होता. “ साब, मैं … साडी सेंटर से बोल रहा हूँ. आपका पेमेंट अभी जमा नही हुवा है!”

मला थोड़े आश्चर्य वाटले. मी म्हटले, “ ऐसा कैसे हो सकता है? पेमेंट तो मैंने आपको किया, और आपको बताया भी था. एक मिनिट रुको. में चेक करता हूँ।” असे म्हणून मी गूगल पे वर transaction history वर जाऊन पाहिले. पेमेंट सक्सेस दाखवीत होते. मी त्याला सांगितले, “आप फिरसे चेक करो, मेरे पास तो पेमेंट सक्सेस बता रहा है। चाहे तो मैं आपको स्क्रीन शॉट भेजता हूँ” असे म्हणून मी त्याला माझ्या पेमेंट चा स्क्रीन शॉट पाठविला. तो स्क्रीनशॉट पाठवताना मी त्यावरील नांव पुन्हा एकदा पाहिले. MADANLALPOPATLALCHUTTAR असे सलग नाव त्याच्यात दिसत होते.

बऱ्याच वेळा दुकानदार हे त्यांच्या वैयक्तिक नांवाचा पण क्यू आर कोड तिथे ठेवतात. ते फोनपे चे बिझनेस अकाउंट दिसत होतं. नांव मारवाडी होते, नक्कीच त्या दुकानदाराचे असणार, यामुळे मी आश्वस्त होतो.

मी त्याला नीट बघायला सांगितले. पण तो म्हणू लागला पेमेंट आमच्या खात्यात जमा झाले नाही.

शेवटी मी ठरवले आत्ताच जाऊन काय मामला आहे ते पहावे, म्हणून मी गाडी मागे फिरविली आणि थोड्याच वेळात त्या दुकानासमोर गाडी घेतली.

आत गेल्यावर मी त्याला पुन्हा माझा स्क्रीनशॉट दाखविला. तर तो म्हणतो, हे आमच्या दुकानाचे नांव नाहीच!.

 मग मी तिथे उपलब्ध असणाऱ्या क्यू आर कोड वर स्कॅन करून पाहिले, तर त्याच्यावर देविका सारीज असे लिहून येत होते!

त्याला म्हटले तुझ्याकडे अजून कोणता क्यू आर कोड आहे का?

तेंव्हा त्याने खाली ठेवलेला अजून एक क्यू आर कोड काढून दाखविला.

मी तोही स्कॅन करून पाहिला, त्याच्यावर ही, देविका सारीज असेच लिहून येत होते.

आता मला वेगळीच शंका यायला लागली होती. अलीकडे बरेच किस्से असे वाचण्यात आले होते, की काही लोकांनी काही दुकानांत,  हात गाड्यांच्या ठेल्यांवर, काही फ्रॉडंस्टर्स, तिथल्या क्यू आर कोडच्या वर आपला कोड चिकटवून देतात (दुकानदारांच्या नकळत). आणि बरेच पेमेंट सरळ त्यांच्या खात्यात जमा होतात.

मला नक्की हा असाच प्रकार आहे असे वाटू लागले. आम्ही पेमेंट करीत होतो तेंव्हा तिथे काही व्यक्ती बाहेरच्या होत्या. मी कॅशियर ला सांगितले, आजकाल असे प्रकार होत आहेत. त्यावेळी दुकानात कोण कोण होते ते पहा. तेंव्हा तोही म्हणाला, की ठीक आहे, आपण cctv footage काढून पाहू.

पण  cctv footage बघण्यासाठी त्याने लॅपटॉप ऑन केला, आणि त्याच्या लक्षात आले की cctv camera चालू नव्हता. त्याने तसे आम्हाला सांगितले.

आता आम्हा दोघांमध्ये वाद सुरू झाला.  मी त्याला सांगितले की पेमेंट तर मी केले आहे. आणि तुमच्या दुकानातील कोड वरून केले आहे. तुम्ही तसे व्हेरिफाय करून मला बिल ही दिले आहे. त्यामुळे मला माझी वस्तू मिळालीच पाहिजे. त्यावर तो म्हणू लागला, मला पेमेंट मिळाले नाही, मी कशी वस्तू देणार? मी म्हणत होतो, तो प्रॉब्लेम माझा नाही, तुमचा आहे. तुम्ही Upi ची कम्प्लेन्ट  लॉज करा, किंवा काहीही करा!goodworld_upi paymenet blog image

आम्ही दोघेही बराच वेळ वाद घालत राहिलो. मी त्याला हेही म्हटले, की मी साड्या इथे ठेवून गेलो नसतो, तर तुम्ही काय केले असते? या प्रश्नाचे त्याच्या कडेही उत्तर नव्हते. शेवटी मी ठरवले की आपण घरी जाऊन नीट शोध घेऊ आणि पुढे काय करायचे ते ठरवू. असे ठरवून मी घरी परतलो.

घरी परतल्यावर मी ती व्यक्ती (जिला पेमेन्ट केले गेले होते) कोण आहे याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. पण त्या नावावरून काहीच शोध लागेना.

मला याआधीच, गेल्याच महिन्यात jio fiber च्या बाबतीत failed payment चा अनुभव आला होता आणि याबाबतीतील सगळी प्रोसिजर माहिती झाली होती. त्यामुळे मी लगेच गूगल पे च्या प्लॅटफॉर्मवर dispute raise केला,  तसेच फोनपे ला ही मेल टाकला, माझ्या बँकेला म्हणजे sbi ला पण मेल टाकला, आणि NPCI च्या वेबसाईटवर पण complaint lodge केली. असे सर्व केल्यानंतर मग मी, शांतपणे झोपलो.आता उद्याचे उद्या पाहू, जे करायचे ते सर्व केले आहे म्हणून.

मग दुसऱ्या दिवशी, दुपारच्या नंतर आणि संध्याकाळच्या आत, म्हणजे गर्दी होण्याच्या आत पुन्हा त्या दुकानात गेलो. आणि पुन्हा आमच्या दोघांचे तेच मुद्दे एकमेकांना पटवण्याचे प्रयत्न सुरू झाले. मी त्या कॅशियर ला आजकाल असे किस्से कसे होत आहेत ते सांगितले, आणि जर तुमच्या दुकानातील cctv सुरू असता तर एखाद्या गिऱ्हाईकाच्या मिषाने आलेल्या कोणी तो कोड  ऐनवेळी बदलला असेल ते समजले असते. ही तुमची चूक आहे,  मी तुमच्या दुकानातील कोड वर पेमेंट केले आहे, त्यामुळे तुम्हाला माल द्यावाच लागेल असे पुन्हा पुन्हा सांगू लागलो.

त्यावर cashier चे म्हणणे असे होते की मला मालकाला रोज हिशेब द्यावा लागतो. मी बिना पेमेंट चा, तुम्हाला माल दिला तर माझ्या पगारातून कपात होईल. तुम्ही सुध्दा, devika sarees बघून पेमेंट करायला हवे होते. तुम्ही माझे पेमेंट द्या, मी माल देतो.

दुकानातील इतर कर्मचारीही अर्थात, त्याची बाजू घेत होते. तेथील एक कर्मचारी मला काही समजावून सांगत होता. आधी मी बराच वेळ त्याच्याकडे लक्ष दिले नाही. पण थोड्या वेळाने मला त्याच्या म्हणण्यात काही तथ्य वाटू लागले. तो म्हणत होता, साहेब, तुम्ही नीट आठवून पहा, याआधी तुम्ही कुठे कुठे गेला होतात, आणि गूगल पे ने कुठे कुठे पेमेंट केले. मी त्याला माझी transaction history काढून दाखवली. त्यादिवशी मी गूगल पे ने एकूण ४ पेमेन्ट केले होते. त्यातील २ पेमेन्ट भाजीवाल्याचे होते, रु. १० आणि २० चे, एक टाटा चे होते २०० रु. चे आणि एक चप्पलच्या दुकानाचे ४४० रुपयांचे.

तो म्हणू लागला, साहेब, तुम्ही अजून नीट आठवून पहा: अजून कोणाला पेमेन्ट केले होते का?

मला एकदम त्याच्या म्हणण्यातून एक धागा मिळाला. अरे हो!. मी या साडीच्या दुकानात यायच्या आधी त्रिमूर्ती चौकातील स्टेशनरी सामानाच्या दुकानात गेलो होतो!

पण तिथे तर मी गूगल पे ने पेमेन्ट केले नव्हते!

आणि एकदम माझ्या डोक्यात ट्यूब पेटली! मला आठवले- मी तिथे पेमेन्ट करण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन केला होता. नंतर तो दुकानदार मला कॅश द्या म्हणून म्हणाला होता. मी मोबाईल चा फक्त डिस्प्ले ऑफ केला होता, आणि मोबाईल खिशात टाकला होता. पण गूगल पे मधून बॅक करून, बाहेर पडलो नव्हतो!

आणि साडीच्या दुकानात आल्यावर, मी मोबाईल ऑन केला, स्कॅनर समोर धरला. पण त्यात आधीच्याच स्क्रीन वर असल्यामुळे, तिथे पेयी हा आधीचाच होता. मी त्यात रक्कम टाकली- २८५० रुपये, आणि पेमेन्ट केले! नक्की असेच झाले असणार!

मी त्या साडीच्या दुकानातील नोकराला म्हटले, चल माझ्यासोबत. बहुतेक हे पेमेन्ट दुसऱ्याला गेले असावे- तसे असेल तर, नशिबाने, ते दुकान जवळच आहे.

आम्ही गजानन मंदिराजवळील साडीच्या दुकानातून, त्रिमूर्ती चौकातील त्या स्टेशनरीच्या दुकानात गेलो.

मी दुकानात कोण आहे ते पाहिले. दुकानात कालचा तो वृद्ध मालक नव्हता, पण त्याचा मध्यम वयाचा, मुलगा तिथे होता. मी त्याच्याजवळ जाऊन त्याला थोडक्यात परिस्थिति समजावून सांगितली,  आणि माझ्या मोबाईल मधील गूगल पे च्या हिस्टरी मध्ये त्या नावाने झालेले पेमेन्ट दाखवले. ते तुमचेच नाव आहे ना, हे विचारले.

सुदैवाने, त्याच्या लक्षात लगेच सर्व परिस्थिति आली. त्याने लगेच त्याच्या वडिलांना फोन लावून कालच्या transaction बद्दल खातरजमा करून घेतली.

आणि काहीही आढेवेढे न घेता, शांतपणे, त्याने, त्याचा मोबाईल काढला, मला माझा मोबाईल नंबर विचारला, आणि गूगल पे ने माझ्या खात्यावर ताबडतोब २८५० रुपये ट्रान्सफर करून टाकले! मी त्याचे मनापासून आभार मानले! तिथून मी आणि तो कर्मचारी, आनंदाने बाहेर पडलो.

याठिकाणी एका छोट्याशा negligence मुळे, ही सर्व धावपळ मला करावी लागली होती! ते negligence म्हणजे, मी गूगल पे उघडल्यावर,  त्यातून बाहेर न पडता मोबाईल तसाच बंद केला होता. पुन्हा गूगल पे एप उघडल्यावर आधीचाच स्क्रीन माझ्यासमोर आला होता! अजून दुसरे negligence म्हणता येईल ते, पेमेन्ट करतांना, पेयी चे नांव त्या दुकानदाराला दाखवून खात्री करून घेतली नव्हती. यात दुकानदाराचीही चूक होती, की त्याने त्याला पेमेन्ट मिळाले की नाही, हे लगेच confirm केले नव्हते.  

नशिबाने, ही घटना अगदी जवळच घडली होती. ज्या दुकानदाराच्या बाबतीत घडली होती, तो एक प्रतिष्ठित आणि समजदार दुकानदार होता, त्यामुळे त्याने आढेवेढे न घेता मला लगेच पैसे वापस दिले. हेच जर दूरवर कुठे तरी घडले असते, किंवा एखाद्या छोट्याशा अनोळखी किंवा तितकासा समजदार नसलेला कोणी हातगाडीवाला किंवा अन्य कोणी असता, तर त्याला हे समजायलाही वेळ लागला असता, आणि त्याने याबाबतीत आढेवेढे ही घेतले असते.

असो, तर अशा या नाट्याच्या सुखकारक शेवट झाल्यामुळे माझा जीव भांड्यात पडला! आणि मी त्या साडीच्या दुकानातील कर्मचाऱ्याला सोबत घेऊन वापस त्या दुकानात आलो. तेथील cashier चा ही जीव भांड्यात पडला. कारण त्याला ही कुठले dispute नकोच होते. मी साड्यांचे फ्रेश पेमेन्ट केले. त्याने तोपर्यंत साड्यांना प्रेस साठी पाठवले नव्हते. त्याने २ दिवसांनी यायला सांगितले, आणि दोन दिवसांनी जाऊन मी माझ्या वस्तू आनंदाने घरी घेऊन आलो!

असा हा गूगल पेमेन्ट चा किस्सा, मुद्दाम वाचकांसाठी शेअर एवढ्यासाठी केला, की अशा प्रकारे चूक कोणाची होऊ नये!

अजून कितीतरी पल्ला गाठायचा आहे!

mumbai airport

फेसबुक तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणी कधी कधी समोर आणून ठेवते. आज अशीच एक 9 वर्षांपूर्वीची केलेली पोस्ट फेसबुकने समोर आणून ठेवली- अजून कितीतरी पल्ला गाठायचा आहे. दि. १७ मार्च २०१७ रोजी लिहिलेली. 

आता सध्या काय परिस्थिति आहे, माहिती नाही. पण त्यावेळी जे वाटले, ते तसेच्या तसेच व्यक्त केले होते.  ते आज या ब्लॉग वर जसेच्या तसे देत आहे. 

अजून कितीतरी पल्ला गाठायचा आहे!

 
अमेरिकेत प्रत्येक विमानतळावर प्रवाशांची व त्यांच्या सामानाची अत्यंत कसोशीने, व सविस्तर तपासणी, व तीही वेळेचा अजिबात अपव्यय न करता, होतांना पाहिली. तेथील सरकारी अधिकारी सतर्क व कर्तव्यदक्ष दिसले. याचा अनुभव आम्हाला ड़ॅलसहून नायगारा येथे जातांना व येतांना आला.
तसेच अमेरिकेहून परतीच्या प्रवासात ड़ॅलस येथील विमानतळावरही हा अनुभव पुरेपूर आला. तिथे security check अत्यंत सविस्तर, आणि तोही कमीत कमी वेळात केला गेला.
 
परतीच्या प्रवासात आम्ही मुंबई विमानतळावर उतरलो, तेंव्हा security check चा काही प्रश्न नव्हता , पण कस्टम क्लीअर करतांना आम्हाला जो अनुभव आला, त्यावरून, अजून आपल्या देशाला मूल्यांच्या बाबतीत किती पल्ला गाठायचा आहे याची जाणीव झाली.
 
आम्ही मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो आणि आमचे सामान घ्यायला फिरत्या पट्ट्याजवळ थांबलो. तेंव्हा एक मनुष्य आमच्याजवळ आला आणि हलक्या आवाजात विचारू लागला, “ सर आपको कहाँ जाना है?” आम्हाला कस्टम क्लीअर करून जेट एअरवेज च्या औरंगाबाद च्या डोमेस्टिक फ्लाईट ने जायचे होते, हे त्याला कळाल्यावर म्हणू लागला, “सर मै आपको वहाँतक छोड देता हूँ” मी त्याला विचारले, जेट एअर वेज का काऊंटर कहाँ है? तर “बहोत दूर है सर, मै आपको वहाँतक आपके सामानके साथ छोड देता हूँ” म्हणून म्हणाला. मी त्याला विचारले, “किती पैसे घेशील?” तर कुछ नाही साब, एक हजार रुपये दे दिजीये, बस!” म्हणून म्हणाला!
 
मी त्याच्याकडे नंतर लक्ष दिले नाही; पण पुढे कस्टम क्लीअर केल्यानंतर, जेट चे काऊंटर समोरच असलेले दिसले! पण याहून ही पुढे, कस्टम काऊंटर वरील प्रकार पाहून धक्काच बसला. अमेरिकेतून परत येणाऱ्या भारतीय प्रवाशांना, त्यांच्याजवळ घोषित करण्यासारखे (रु. ५००००/ च्या आत) काही कर आकारणी योग्य सामान नसल्यास, ग्रीन चॅनेल मधून जाता येते, जेणेकरून त्याला लवकर बाहेर पडता येईल. आमच्याजवळ तसे काहीच सामान नसल्यामुळे immigration counter चा शिक्का लागल्यावर आम्ही कस्टम च्या ग्रीन चॅनेल च्या रांगेमध्ये उभे राहिलो.
goodworld_Gemini_Generated_Image_wo6knqwo6knqwo6k
 
त्या ठिकाणी, अर्थातच, भरपूर गर्दी होती, व येणाऱ्या प्रवाशांचे सामान X-Ray machine मधून scan होऊन पुढे जात होते. पण ही सर्व तपासणी अत्यंत जुजबी होत असल्याचे दिसले. आमच्याजवळ पाच मोठ्या बॅगा होत्या व हातातील पर्स, पाऊच व जेवणाचा डबा असे ३ छोटे डाग होते. बऱ्याच सूटकेस त्या यंत्रातून जात होत्या तर बऱ्याच प्रवाशांना बाजूने, तसेच न तपासता ही जाऊ दिले जात होते. आम्हालाही तेथील एका सब स्टाफ ने आमच्या दोघांच्या, फक्त छोट्या पर्स इत्यादि, मशीन मध्ये टाकायला सांगितल्या व सर्व मोठ्या बॅग्ज बाजूनेच, मशीनमधून न बघताच, पुढे न्यायला सांगितल्या. आमच्या छोट्या पर्स इत्यादि, मशीन मधून बाहेर आल्या. तिथे प्रवाशांचे सामान हाताळणाऱ्या एका स्टाफने, हिंदीमध्ये, “सर… कुछ बक्षिसी..” असे म्हणून आमच्याकडे क्षणभर अपेक्षेने पाहिले. आम्ही त्याचे म्हणणे न ऐकल्यासारखे करून आमच्या सामानाच्या trolleys घेऊन पुढे निघालो. पण हा प्रकार पाहून मला धक्काच बसला. आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रकार! माझ्या बॅग्जमध्ये, काही कस्टम ड्युटी लागणाऱ्या वस्तू नव्हत्या म्हणून बरे. पण माझ्या सामानात जर अशा अत्यंत महागड्या वस्तू असल्या असत्या, तर त्या कस्टम ड्युटी न भरताच मला सहज बाहेर आणता आल्या असत्या. आणि असे करू दिल्याबद्दल, तेथील स्टाफ ला १००-२०० रुपये दिल्यास, कोणीही, लाखो रुपयांची कस्टम ड्युटी सहज चुकवू शकला असता! आता ह्या प्रकारची तक्रार कुणाकडे व कशी करायची?
तिथून पुढे जवळच असलेल्या जेट एअरवेज च्या काऊंटर वर आम्ही आलो. तेथील व्यक्तीने आमच्या सामानाचे वजन केले, आणि आम्हाला excess luggage चा चार्ज लागेल म्हणून सांगितले. आमच्या luggage चे वजन international standards प्रमाणे बरोबर होते, पण domestic flight च्या मानाने जास्त होते, म्हणून मी काही न बोलता excess luggage चे पैसे भरले. पण नंतर मला सचिन ने सांगितले की international flight ने येणाऱ्या passengers ला तेवढे excess luggage allowed असते. जेट एअरवेज च्या कर्मचाऱ्यांनी आमच्या बॅगान्वरील international flight चे tags धडधडीत दिसत असूनही, आम्हाला वरील नियम सांगितला तर नाहीच, पण आमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आम्हाला निष्कारण भुर्दंड बसवला. ही आपल्या येथील सचोटी!
त्यामुळे असे वाटते की सचोटी, प्रामाणिकपणा, इत्यादि मूल्ये एखाद्या समाजात मूलतः रुजावी लागतात, आणि त्या दृष्टीने आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे!
——******——-
माधव भोपे
१६.३.२०१७