https://goodworld.in A website by Madhav Bhope

चातुर्मासाचे महत्त्व importance-of-chaturmas

chaturmas-2025

importance of chaturmas

चातुर्मासाचे महत्त्व: पावसाळ्यातील आरोग्य, आध्यात्मिकता आणि संस्कृतीचा संगम

अतिशय पुरातन आणि समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेल्या भारतामध्ये आपला जन्म झालेला आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे आपल्या येथील सर्व चाली  रीती, सण, उत्सव, हे निसर्गचक्राशी घट्टपणे जोडले गेलेले आहेत. भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे चार महिने नियमितपणे (जरी गेल्या काही वर्षात अनियमित झाला असला तरी) पाऊस- ज्याला आपण मान्सून म्हणतो, तो  पडणारा आपला देश आहे.

महाराष्ट्राला तर गेल्या ७०० वर्षांपासून आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वारीची समृद्ध परंपरा लाभली आहे.

vari

आणि आषाढी एकादशीपासूनच सुरू होतो-‘चातुर्मास’.

summer

४ महिने उन्हाने तापलेल्या जमिनीला थंड करण्यासाठी नैऋत्य मोसमी वारे घेऊन येतात, ‘पावसाळा’. पावसाळा हा जमिनीला उपजाऊ बनवून, आपले भरण पोषण करणारे धान्य, फळे, भाजीपाला उगवून तसेच वर्षभराची पाण्याची, भू-जलाची बेगमी आणि पुनर्भरण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारा काळ. धरित्रीचे ओसाड, शुष्क रूप बदलून, तिला सुखद शीतल हिरवे रूप प्रदान करणारा काळ.

first rain

पण असे असले, तरी, या काळाचे काही तोटे ही असतात. मनुष्याचे आरोग्य, त्याच्या शरीरातील पाचक अग्नी हा खूप मोठ्या प्रमाणावर सूर्याशी जोडलेला असतो. पावसाळ्यात सूर्यदर्शन अभावानेच होते. अर्थात ज्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असते, किंवा मराठवाडा, विदर्भातील काही भाग, इत्यादि त्यांचा अपवाद सोडून द्या. तर सूर्याच्या अभावामुळे मनुष्यप्राण्याच्या पोटातील अग्नि सुद्धा मंद होतो आणि पाचनक्रिया मंदावते.

नद्यांना पूर आल्याने, रस्ते चिखलमय झाल्यामुळे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे दुस्तर होते.

flooded river

जलाशय अशुद्ध होतात. पालेभाज्या, ज्या अगदी जमिनीलगत उगवतात, त्यां चिखलामुळे आणि मातीतील जंतूंमुळे खाण्या योग्य राहत नाहीत आणि त्या खाल्ल्या तर रोगांचा प्रादुर्भाव होणे अटळ असते. शरीरात वाताचा प्रभाव बळावतो.

या सर्व बाहेरील बदलांचा दुष्परिणाम होऊ नये, आणि या चार महिन्यांचा सदुपयोग व्हावा, या दृष्टीने चातुर्मासात संयमित आणि व्रतस्थ राहणे, ही संकल्पना आपल्या पूर्वजांनी रूढ केली. आणि कुठल्याही गोष्टीला धर्माशी जोडल्यानंतर सर्व सामान्यांकडून तिचे पालन होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून या गोष्टी धर्माशी, विविध व्रतांशी जोडल्या गेल्या.

या दृष्टीने मग खालील नियम अस्तित्वात आले-

  1. चातुर्मासात वर्ज्य गोष्टी- prohibited vegetables चातुर्मासात कांदे, लसूण, वांगे, इत्यादि पदार्थ जे की वातुळ, म्हणजे शरीरात वात वाढविणारे आहेत, ते खाणे निषिद्ध मानले गेले. बऱ्याच लोकांचे म्हणणे असते, की कांदे, लसूण आरोग्याला खूप चांगले असतात, आणि म्हणून त्यांचे सेवन नेहमी केले पाहिजे. वांगेही शरीराला चांगले असतात, म्हणून तेही खाल्ले पाहिजेत. पण आयुर्वेदाचा दृष्टिकोण असा आहे, की प्रत्येक पदार्थ हा ऋतू, काळ बघूनच सेवन केला पाहिजे. आणि कांदे, लसूण इत्यादि केवळ औषधी स्वरूपात आणि तितक्याच प्रमाणात सेवन केले पाहिजेत. त्या पदार्थांचे जसे गुण आहेत तसेच दोष ही आहेत. कांदा आणि लसूण खाल्ल्यावर माणसाचे मन स्थिर राहू शकत नाही, विचलित होते, त्यात कामवासना वाढीस लागते, हा आपला प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि काम वासना वाढू देण्यास हा काळ अनुकूल मानलेला नाही. तसेच याच्या सेवनाने शरीरातील वात वाढीस लागतो आणि विकृत होतो. तीच गोष्ट वांगे इत्यादि गोष्टींची आहे. त्यामुळे या काळात वरील पदार्थ वर्ज्य सांगितले आहेत. तसेच फुलकोबी, पत्ताकोबी, इत्यादि सुद्धा टाळायला सांगितले आहेत. कारण या भाज्यांमध्येही आळ्या, सूक्ष्म किडे इत्यादि या दिवसांत होण्याची खूप जास्त शक्यता असते.  तसेच या काळात हिरव्या पालेभाज्या, मुळा, गाजर इत्यादींचे  सेवन ही वर्जित सांगितले आहे. कारण हिरव्या पालेभाज्या किंवा मुळा, गाजर इत्यादि जमिनीच्या अगदी जवळ असतात( मुळा गाजर तर जमिनीतच असतात). शेतात पावसाळ्यामुळे चिखल झालेला असतो, आणि त्यामुळे पालेभाज्यांवर चिखल, माती, आणि सूक्ष्म किडे असण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात या भाज्यांचे सेवन वर्ज्य सांगितले आहे.
  2. वर्ज्य समारंभ -या काळात शुभ कार्यांचे मुहूर्तही नसतात. भारतातील जनता मुख्यतः कृषिप्रधान असल्याने या काळात शेतकरी एकतर शेतीच्या कामात व्यस्त असतो. आणि लग्न, मुंज, यज्ञ याग इत्यादि कार्यात समाजातील लोकांचे एकत्र येणे अपेक्षित असते, जे की पावसाळ्यामुळे अवघड असते. या कारणामुळे या काळात वरील कार्यांचे मुहूर्त नसावेत. अर्थात बदलत्या काळानुसार परिस्थिती बदललेली आहे, आणि आजकाल काही पंचांगकर्त्यांनी सुद्धा बदलत्या काळानुसार वरील काळांसाठी आपत्कालीन मुहूर्त द्यायला सुरूवात केली आहे.  
  3. उपवास- या काळात पाचक अग्नि कमी झाल्यामुळे, आहार हलका आणि बेताचाच घेणे योग्य असते आणि त्यातही मधून मधून पोटाला विश्रांती देणेही आवश्यक असते. याच दृष्टीने या चार महिन्यांत अनेक उपवास आणि व्रतें आपल्या संस्कृतीत योजली आहेत. त्यांचा योग्य तो अर्थ घेऊन खऱ्या अर्थाने उपवास केले, तर त्याचा फायदा नक्कीच शरीराला होतो आणि पावसाळ्याच्या मंद आणि कुंद् वातावरणात जठराग्निचे रक्षण होते. अन्यथा उपवासाच्या दिवशी विविध जड पदार्थ, जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खाल्ले गेले, तर उपवासाचे फायदे तर दूर राहिले, पण तोटे मात्र निश्चित संभवतात. मग त्यापेक्षा उपवास न केलेला बरा, असे म्हणायची वेळ येते.

असो.

प्रतीकरूप समजावून घेणे आवश्यक

आता या चातुर्मासाविषयी आपल्या परंपरेत, विविध पुराणांत इत्यादि, काय सांगितले आहे, ते थोडक्यात बघू. या सर्व गोष्टींचे प्रतीकरूप समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा, काय, पुराणातल्या गप्पा, असे म्हणून त्यांना झिडकारणे सोपे आहे, पण समजदारीचे नाही.    

चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ होय.  जैन धर्मकल्पनेनुसार चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. या काळात एरवी एका गावाहून दुसऱ्या गावाला विहार (प्रवास) करणारे जैन साधू एकाच गावात मुक्काम करतात. हिंदू धर्मात ही या काळात संन्याशी एकाच गावात थांबतात. अन्यथा संन्याशांनी ३ दिवसांच्या वर एका जागी थांबू नये असा नियम असतो.

चातुर्मास कालावधी

bhagvan vishnu

चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मास सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तूळ राशीत आल्यावर त्याच्या आसपास, कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस ‘प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे.. जैनधर्मीय आषाढ शुक्ल चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा काळ हा चातुर्मासाचा कालावधी मानतात. चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला शेषशायी विष्णू जलाशयात -क्षीरसागरात निद्रा घेतात आणि प्रबोधिनीला उठतात, अशी धारणा आहे. या काळात जगाचा कारभार हा भगवान शिव बघतात अशी धारणा आहे. हरि हा शब्द सूर्य, चंद्र, वायु, विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्य चंद्रांचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो.

पौराणिक कथा

 या संदर्भात ब्रह्मांडपुराणात सूर्यवंशातील  मांधाता नावाच्या चक्रवर्ती सम्राटाची कथा सांगितली जाते. त्या राजाच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच व्याधी नव्हत्या.

king

त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते. तो अशाप्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजाजन त्रासले. व भुकेने आर्त झाले. तेंव्हा राजा आपल्या सैन्यासह वनात गेला, आणि अनेक ऋषींच्या आश्रमांना भेटी दिल्या. तिथे त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेले  अंगिर ऋषी दिसले.

rishi

राजाने त्यांना प्रणाम करून आपले आणि आपल्या प्रजेचे दुःख सांगितले. त्यावर मुनीने त्यांना पद्मा एकादशीचे (म्हणजेच देवशयनी एकादशी) व्रत सांगितले, आणि आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह  या एकादशीचे व्रत करायला सांगितले. राजाने आणि प्रजेने त्याप्रमाणे  त्या सर्वांनी असे व्रत सुरू करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली. व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. अशी कथा ब्रह्मांडपुराणात सांगितली आहे.

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चतुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत, असा समज आहे. एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णूप्रबोधोत्सव साजरा केला जातो.’

देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. ‘असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे’, असे धर्मशास्त्र सांगते –

वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः

व्रतेन चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ।।

अर्थ: प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते.

या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते.

पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला.

मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत.[६]

परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय.

चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्धे करतात.

चातुर्मासात (चार मास) व्रतस्थ राहायचे असते.

चातुर्मासातील व्रते 

सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात.  पर्णभोजन (पानावर जेवण करणे), एकभोजन (एक वेळेस जेवणे), अयाचित (मागता मिळेल तेवढे जेवणे), एकवाढी (एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे), मिश्रभोजन (सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे) इत्यादी भोजननियम करता येतात.’ ‘कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणे-पारणे’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास, असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर रहातात. काही एकभुक्त रहातात. देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात.

वर्ज्य

१. ‘प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, ईडनिंबू, महाळुंग, वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ़[१०]

२. मंचकावर शयन

३. ऋतुकालावाचून स्त्रीगमन

४. परान्न

५. विवाह किंवा अन्य तत्सम कार्य

६. चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने चार मास, निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी राहावे, असे धर्मसिंधूत आणि इतरही काही धर्मग्रंथांत सांगितले आहे. अजूनही बरेच लोक चातुर्मासात किंवा कमीतकमी श्रावण महिन्यात, दाढी करीत नाहीत.

अवर्ज्य

चातुर्मास्यात हविष्यान्न (यज्ञाच्या वेळी चालते ते अन्न) सेवन करावे, असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, सैंधव मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ यांना हविष्यान्न म्हणतात.  (वर्ज्य पदार्थ रज-तमगुणयुक्त असतात, तर हविष्यान्ने सत्त्वगुणप्रधान असतात.)

आठवणी

मला आठवते, आमच्या लहानपणी- साधारण ५५ वर्षांपूर्वी, छोट्या गावांमध्ये, चातुर्मासामध्ये निरनिराळ्या पोथ्यांचे वाचन होत असे. संध्याकाळी, गावातील लहान थोर लोक, बाया बापड्या, सर्व श्रद्धेने पोथी ऐकायला जमत. या चार महिन्यांत विशेष करून निरनिराळ्या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असे, गावांत कुणाचे न कुणाचे कीर्तन इत्यादि असे आणि लोक अत्यंत श्रद्धेने कीर्तन ऐकायला जमत. दर गुरुवारी आणि एकादशीला, बहुतेक कुठल्या मंदिरात किंवा कुणाच्या घरी, स्थानिक भजनी मंडळाचे भजन असे. संध्याकाळी ९ च्या नंतर,, सगळ्यांची कामे वगैरे आटोपल्यावर लोक एकत्र जमून भजन, संकीर्तन करीत. मी बऱ्याच वेळेला, माझ्या वडिलांसोबत अशा भजनाला जात असे. एखादे दिवशी भजनाला गेलो नाही, तरी घरी अंथरुणावर पडल्या पडल्या, टाळ मृदुंगांचा आवाज आणि कुणीतरी आळवून आळवून म्हटलेले भजन आणि इतरांनी त्याला दिलेली सामूहिक साथ, ऐकू येत असे आणि मी अगदी वेगळ्याच दुनियेत पोंचून जात असे.

bhajan

समारोप 

असो. रविवारी दि. ६ जुलै पासून यावर्षीचा चातुर्मास सुरू झाला आहे. आपल्या सर्व चांगल्या रूढी, परंपरा नेहमीसाठी सुरू राहोत आणि आपल्याला माणूस म्हणून जगण्याचे बळ देत राहोत, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

माधव भोपे 

Gondavalekar Maharaj Pravachan आजचे प्रवचन

gondavalekar maharaj image

महाराष्ट्रातील अलिकडच्या काळातील ब्रह्मलीन सत्पुरुष आणि सुप्रसिद्ध संत ब्रह्मीभूत श्री गोंदवलेकर महाराज हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्व नाम भक्तांना सुपरिचित आहेत. त्यांच्या रोजच्या छोट्या आणि सुटसुटीत  प्रवचनांचे पुस्तकही सगळ्यांच्या परिचयाचे आहे. या पुस्तकात वर्षातील ३६५ दिवसांची प्रवचने- रोजचे एक प्रवचन या स्वरूपात दिले आहे. ही प्रवचनें बऱ्याच भक्तांनी आपल्या आवाजात प्रस्तुत केलेली, उपलब्ध आहेत. अशाच एका “भक्ति सुधा” या चॅनल वरील प्रवचनें रोज या ब्लॉग च्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. आशा आहे की परमार्थाची आवड असणाऱ्या भाविकांना ही प्रवचने. उपयुक्त ठरतील

Gondavalekar Maharaj Pravachan आजचे प्रवचन

gondavalekar maharaj image

महाराष्ट्रातील अलिकडच्या काळातील ब्रह्मलीन सत्पुरुष आणि सुप्रसिद्ध संत ब्रह्मीभूत श्री गोंदवलेकर महाराज हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्व नाम भक्तांना सुपरिचित आहेत. त्यांच्या रोजच्या छोट्या आणि सुटसुटीत  प्रवचनांचे पुस्तकही सगळ्यांच्या परिचयाचे आहे. या पुस्तकात वर्षातील ३६५ दिवसांची प्रवचने- रोजचे एक प्रवचन या स्वरूपात दिले आहे. ही प्रवचनें बऱ्याच भक्तांनी आपल्या आवाजात प्रस्तुत केलेली, उपलब्ध आहेत. अशाच एका “भक्ति सुधा” या चॅनल वरील प्रवचनें रोज या ब्लॉग च्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. आशा आहे की परमार्थाची आवड असणाऱ्या भाविकांना ही प्रवचने. उपयुक्त ठरतील

२५ मार्च

प्रपंच केवळ कर्तव्यकर्म म्हणून करा.

एका माणसाला विडी ओढण्याचे फार व्यसन होते. तो आजारी पडल्यावर त्याने डॉक्टरांना सांगितले, ‘मला तुम्ही औषध दिले तरी मी विडी सोडणार नाही.’ त्याचा डॉक्टर फार हुशार होता. त्याने त्याला एक गोळी देऊन, विडी ओढण्यापूर्वी ती तोंडात धरीत जा म्हणून सांगितले. त्या गोळीमुळे विडीच्या तंबाखूचे विष त्याला बाधत नसे. तसे आपण प्रपंच करताना वागले पाहिजे. प्रपंच आम्हांला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल, आणि नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयीही मिळणे शक्य नाही. प्रारब्धाने प्रपंच आला आहे, तो कर्तव्यकर्म म्हणून करीत जा, पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नका. प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे; त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही. वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमतो. पाचजण मिळून प्रपंच बनतो. त्यांमध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे ? नुसता प्रपंच तापदायक नाही, आकुंचित प्रपंच तापदायक आहे.

आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे ही खूणगाठ पक्की बांधून प्रपंचात वागा. ज्याप्रमाणे व्यापारात नफा व्हावा म्हणून व्यापार करतात, तो होत नसेल तर व्यापारात काहीच तथ्य नाही, तसेच प्रपंचात समाधान हा नफा आहे; तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा आहे ? ‘तुझ्या असमाधानाचे कारण नक्की सांग’, असे जर आपण एखाद्याला विचारले, तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की, तत्त्वदृष्ट्या समाधान व्हायला खरोखरीच कशाची जरुरी नाही; पण ही गोष्ट कुणाला पटत नाही. आहे त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही, आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही. कैदेतल्या माणसाला ‘मी सुखी आहे’ असे वाटणे कधी शक्य आहे का ? तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे. खरोखर, प्रपंचात समाधान, आनंद मिळत नाही हे अगदी सर्वांना कळते; परंतु शहरातले लोक केवळ अभिमानामुळे आणि खेड्यातले लोक अज्ञानामुळे, जसे वागायला पाहिजे तसे वागत नाहीत. या प्रपंचात राहूनसुद्धा भगवंताचे प्रेम आणि समाधान आम्हांला कसे मिळविता येईल, याचा आपण आधी विचार करायला पाहिजे. नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल, आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल, आणि पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल.

८५. प्रपंच सुखाचा करणे याचेच नाव परमार्थ होय.

दत्त जन्माची कथा Shri Guru Dattatreya

datta-2

Shri Guru Dattatreya दत्त जन्माची कथा

आज दि. 14 डिसेंबर- आज मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा- या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते.

महायोगीश्वर दत्तात्रेय भगवान हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत. त्यांचे अवतरण मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळी झाले.

दत्तात्रेय हे भगवान विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक मानले जातात. मार्कंडेय पुराणाच्या 9 व्या आणि 10 व्या अध्यायांमध्ये भगवान दत्तात्रेयांच्या जन्माची कथा सांगितली आहे.

दत्तात्रेय नांवाची कथा  

तसेंच श्रीमद्भागवतात आले आहे की पुत्र प्राप्तिच्या इच्छेने महर्षि अत्रींनी व्रत केले तेंव्हा ‘दत्तो मयाहमिति यद् भगवान् स दत्तः’ मी माझ्या स्वतःलाच तुम्हाला देऊन दिले आहे, असे म्हणून भगवान विष्णूच अत्रीच्या पुत्राच्या रूपात उत्पन्न झाले, आणि ‘दत्तो’ म्हणून दत्त आणि अत्रिपुत्र झाल्यामुळे आत्रेय, अशा प्रकारे दत्त आणि आत्रेय यांच्या संयोगामुळे यांचे दत्तात्रेय हे नांव प्रसिद्ध झाले.

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.

दत्तांच्या जन्माची कथा

अत्रिमुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सान्निध्यांत राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करित असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचें मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळीअवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमांतून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्यापुढे शीतल होई. पवन तिच्यापुढे नम्र होई. एवढा तिच्या पातिव्रत्याचा प्रभाव होता.

पतीबद्दल तिच्या ठायी असलेल्या अनन्य भक्तिमुळे तिचे नाव ‘साध्वी व पतिव्रता स्त्री ‘ म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता नारदमुनींच्या सुद्धा कानावर पडली. त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना सांगितली. तेव्हा त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. तेव्हा तिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखविला.

त्रैमूर्ति म्हणजेच ब्रह्मा-विष्णु-महेश यांनी आप आपल्या पत्नीला समजविण्याचा प्रयत्न केला पण त्या ऐकेनात. त्यामुळे आपआपल्या पत्नींच्या हट्टामुळे ही तिन्ही देव तिची परिक्षा पाहण्यासाठी आणि तिचे सत्त्वहरण करण्यासाठी तयार झाले. त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. आणि ते तिघे भर दुपारी अत्रिमुनींच्या आश्रमात आले.

अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांचे आदरातिथ्य केले, आणि दुपारची वेळ असल्यामुळे त्यांना भोजन करण्याची विनंती केली. तेंव्हा ब्राह्मण रूपात आलेल्या त्रिदेवांनी तिच्यासमोर अट ठेवली, की तिने विवस्त्र होऊन त्यांना वाढावे

अनुसूयेने तिच्या तपसामर्थ्याने ते कोण असावेत हे ओळखले. अत्रि मुनि नदीवर स्नान संध्येला गेले होते. अनुसूयेने आपल्या पतीचे स्मरण करून, त्यांचे पांदतीर्थ या ब्राह्मणांवर शिंपडले, त्यामुळे ती तिघे सहा महिन्यांची बालकें होऊन रांगू लागली.

datta-1

अनुसूयेने  त्यांच्या इच्छेप्रमाणे करून, त्यांना स्तनपान करविले. आणि त्यांना थोपटून पाळण्यात झोपविले. अत्रिमुनी परत आल्यानंतर तिने सर्व वृत्तान्त त्यांना सांगितला. अत्रीमुनींकडून ही गोष्ट नारदाला कळाली.  स्वर्गलोकात तीन्ही देवस्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या. तेव्हा नारदमुनी अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली. त्या चिंताग्रस्त झाल्या. त्या तिघी अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली.  तेव्हा अत्रिमुनींनीं पुन्हा गंगोदक देऊन तें त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा अनुसूयेने त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत् देवस्वरूप झाली. इतक्यांत मुनि बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. ब्रह्मा- विष्णु- महेश, प्रसन्न झाले व म्हणाले, “हे अनुसूये आम्ही तुजवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग!” तेव्हां अनुसूयेने ‘तिघे बालक ( ब्रह्मा – विष्णु- महेश ) माझ्या घरी तीन मूर्ति एकरूप होऊन पुत्राप्रमाणे  राहू देत’ असा वर मागितला. तेव्हा ‘तथास्तु’ असें म्हणून देव अंतर्धान पावले. कालांतराने हे तीन्ही देव अनुसूयेच्या गर्भातून प्रकट झाले.

मासांमाजीं मार्गेश्वर । उत्तम महिना प्रियकर ।तिर्थीमाजीं तिथी थोर । चतुर्दशी शुद्ध पैं ॥वार बुधवार कृत्तिका नक्षत्र । ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र ।तिघे मिळोनि एकत्र । शुद्ध सत्त्व निवडिलें ॥त्रैमुर्तींचें सत्त्व मिळोन । मूर्ति केली असे निर्माण।ठेविते झाले नामभिघान । दत्तात्रेय अवधूत ॥

अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. तीन शिरें, सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचें ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो.

दत्तात्रेयांचे रूप आणि त्याचा अर्थ

datta-3

दत्तात्रेय जरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायम फिरत असले, तरी त्यांचे आवडीचे ठिकाण म्हणजे उंबराचा वृक्ष होय. त्यांचे रूप म्हणजे केसांवर जटाभार, सर्व अंगावर विभूति, व्याघ्रांबर वस्त्र म्हणून नेसलेले, तसेंच त्यांच्यासोबत त्यांची गाय आणि 4 कुत्रे, काखेला झोळी, असे ‘अवधूत’ दत्त विश्वाच्या कल्याणासाठी फिरत असतात. त्यांच्या सोबत असलेली गाय म्हणजे पृथ्वीचे स्वरूप समजले जाते. किंवा लोकांच्या कामना पूर्ण करणारी कामधेनू. तसेंच त्यांच्या सोबत असलेले 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत. तसेंच त्यांच्या हातात असणारे त्रिशूल म्हणजे तीन गुणांवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. आणि एका हातात असलेले सुदर्शन चक्र म्हणजे काळाचे प्रतीक आहे, म्हणजे ते कालातीत आहेत. तसेंच एका हातात असलेला शंख म्हणजे ॐ ध्वनिचे प्रतीक आहे. तसेंच त्यांनी अंगावर फासलेले भस्म म्हणजे वैराग्याचे प्रतीक आहे. त्यांच्या हातात असलेले भिक्षापात्र म्हणजे ‘दान’ करण्याचे प्रतीक आहे. मनुष्यमात्राला, आपल्याजवळील वस्तू इतरां सोबत वाटून खाण्याचा संदेश आहे. एका हातात असलेली जपमाळ ही नामस्मरणाचे महत्त्व सांगते.

सर्व संप्रदायांमध्ये दत्तात्रेय

दत्तात्रेय हे वारकऱ्यांनाही पूज्य आहेत. श्री ज्ञानदेव आणि श्री एकनाथ हे दत्तोपासक होते. आनंद संप्रदायाची गुरुपरंपरा ही दत्तात्रेयादी आहे. चैतन्य संप्रदायाची गुरुपरंपरा राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- तुकाराम अशी आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक भक्त मुसलमान असतात.

 

संकलन- goodworld.in

 

नागपूजन- नागदिवे Nagdive

nagdiwali

मार्गशीर्ष पंचमी या दिवसाला महाराष्ट्रात खास महत्व आहे. या दिवशी नागदिवे लावून नागदिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. काही भागात मार्गशीर्ष पंचमी विवाह पंचमी म्हणून साजरी करतात.

नागदिवाळी हा मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला साजरा केला जाणारा हिंदू सण आहे. या दिवशी नागप्रतिमेची पूजा करण्याची व घरात जेवढे पुरुष असतील त्या प्रत्येकाच्या नावाने पक्वान्न करून त्यावर एकेक दिवा लावण्याची प्रथा महाराष्ट्रात काही ठिकाणी आहे.

आपल्याकडे दिवाळी, देव दिवाळी आणि यानंतर नाग दिवाळी साजरी करण्याची परंपरा असून, यात महत्वाचे म्हणजे दिवे आहे. आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा हीच यामागील श्रद्धा आहे.

नागदिवाळीला लावण्यात येणारा दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक व नाग हे कुलाच्या मूळपुरुषाचे प्रतीक मानतात. या मूळपुरुषाच्या कृपेने घरातल्या हयात पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे असा हेतू असतो.

स्कंदपुराणात म्हटल्याप्रमाणे

“शुक्ला मार्गशिरे पुण्या श्रावणे याच पंचमी ।

स्नानदानैर्बहुफला नागलोकप्रदायिनी ॥”

या वचनानुसार श्रावण शुद्ध पंचमीप्रमाणेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीलाही नागांची पूजा केल्याने आणि व्रत केल्याने फलप्राप्ती होते, सुख-समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते.

नागदिवाळी पूजा पद्धत

नागदिवाळीला नागदिवे बनविले जातात. पुरणाचे, किंवा कणकेचे तर काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे हे दिवे तयार केले जातात. आपआपल्या परंपरेनुसार कोणी १ तर कोणी ५ दिवे लावतात, तर काही ठिकाणी घरात जितके पुरूषमंडळी आहेत तितके दिवे लावण्याची पद्धत आहे. या दिव्यासह हरभऱ्याची, मेथीची भाजी, वांग्याचे भरीत, भात असा नैवेद्य अर्पण करतात.

nagdive

nagdive-2

नागदिवाळीचे विदर्भासह महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ, कोकण यातील ग्रामीण भागात हा सण साजरा केला जातो. शेतकरी वर्गात याचे विशेष महत्त्व आहे. खरीपाचे धान्य शेतकऱ्याच्या घरी आल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्याशीही याचा संबंध जोडतात.

Navdurga Upasana नवदुर्गा उपासना

navdurga upasana

नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना

Navdurga Upasana

हिंदू धर्मातील बहुतेक सर्व सण आणि व्रतें ही निसर्ग चक्राशी जोडली गेलेली आहेत असे दिसते. पावसाळ्याचे चार महिने (जून ते ऑक्टोबर) वातावरणातील ओल, दमटपणा, सूर्यदर्शनाचा अभाव, त्यामुळे होणारी रोगजंतूंची वाढ,  इत्यादींपासून बचाव करण्याच्या दृष्टीने,  चातुर्मासाच्या निमित्ताने वेगवेगळ्या व्रतांची आणि उपवासांची योजना केलेली असल्यामुळे या काळात आपोआपच आरोग्याची काळजी घेतली जाते. चातुर्मासातील शेवटचा एक महिना, म्हणजे आश्विन महिना (साधारण ऑक्टोबर महिना सुरू झाल्यामुळे ऑक्टोबर हीट जेंव्हा सुरू झालेली असते), हा शरद ऋतू आणि हेमंत ऋतू यातील संधिकाल असतो. शरद ऋतू हा आरोग्याच्या दृष्टीने तसाही प्रतिकूल मानला गेला आहे. आणि त्यात भाद्रपद महिना संपल्यावर, आश्विन महिना लागतो तेंव्हा शरद ऋतू संपून हेमंत ऋतू सुरू होण्याचा काल, म्हणजे ऋतुसंधी, त्यामुळे या काळात आरोग्याची जास्त काळजी घेणे, आणि पुढे येणाऱ्या अनुकूल काळासाठी म्हणजेच हिवाळ्यासाठी शरीराला तयार करणे, या दृष्टीने दुर्गादेवीच्या नवरात्री व्रताची योजना असावी असे वाटते. या काळात, उपवास करून, ब्रह्मचर्य पालन करून, व्रतस्थ आणि संयमाने राहून, शरीर आणि मन दोन्हींना शुद्ध करून पुढे येणाऱ्या काळात शक्तिसंचय करण्यास तयार केले जाते असे दिसते. म्हणजेच शक्तीची उपासना करायला सुरूवात या काळापासून होते.  

हिंदू धर्मातील सर्व देव, देवी आणि देवता हे, क्वचित काही अपवाद वगळता, शस्त्रधारी आहेत. निसर्गातील प्रत्येक शक्तीचे, शक्तीच्या प्रत्येक रूपाचे, व्यक्तिकरण (personification) केले गेले आहे. तसेच देवीच्या विविध रूपांत शक्तीच्या विविध रूपांचे व्यक्तीकरण केले आहे.

आजपासून सुरू होणारे देवीचे नवरात्र हे म्हणूनच, शक्तीची उपासना आहे.

नवरात्रामध्ये देवीच्या, म्हणजेच शक्तीच्या नऊ रूपांची नवदुर्गांच्या रूपात उपासना केली जाते. जाणून घेऊयात कोणत्या आहेत नवदुर्गा  

दुर्गा सप्तशती ग्रंथांतर्गत देवी कवच स्तोत्रातील पुढील श्लोकांमध्ये अनुक्रमे नवदुर्गां ची नावे दिली आहेत –

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं
ब्रह्मचारिणी।
तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ।।
पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च।
सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ।।
नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा: प्रकीर्तिता:।
उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मना ।।

 शैलपुत्री

shailputri1

दुर्गादेवी  तिच्या पहिल्या रूपात ‘शैलपुत्री’ म्हणून ओळखली जाते.  ती नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. तिला ‘शैलपुत्री’ हे नाव पडले कारण तिचा जन्म पर्वतराज हिमालयाच्या घरात झाला होता. (शैल म्हणजे पर्वत).  नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते. तिचे वाहन वृषभ आहे, म्हणून तिला वृषारूढा असेही म्हणतात. या देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि डाव्या हातात कमळ आहे. काही ठिकाणी तिच्या डाव्या हातात डमरू आहे असेही सांगितले जाते.  तिला सती असेही म्हणतात.

शैलपुत्रीची कहाणी

एकदा सतीचे वडील प्रजापती दक्ष यांनी यज्ञ केला तेव्हा त्यांनी सर्व देवांना आमंत्रित केले, परंतु त्यांचे जावई भगवान शंकर यांना बोलावले नाही. सती आपल्या वडिलांच्या यज्ञाला जायला उत्सुक  होती. शंकरांनी सतीला समजावले की बोलावणे नसतांना जाणे योग्य नाही. पण सतीचे समाधान झाले नाही. सतीचा हट्ट पाहून शंकरांनी तिला यज्ञाला जाण्याची परवानगी दिली.

 सती दक्ष प्रजापतींकडे पोहोचल्यावर तिची उपेक्षा झाली.  दक्षाने शंकरांबद्दल अपमानास्पद शब्दही बोलले. यामुळे सतीला खूप राग आला, पतीचा हा अपमान तिला सहन झाला नाही आणि तिने यज्ञकुंडात  योगाग्नीद्वारे  स्वतःला जाळून घेतले.

शंकरांना हे कळल्यावर ते भयंकर रागावले, आणि आपल्या  जटांपासून त्यांनी  वीरभद्राची निर्मिती केली आणि दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा नाश करण्यासाठी त्याला हजारो गणांसह  पाठवले. त्यांनी त्या यज्ञाचा नाश केला. हीच  सती पुढील जन्मी शैलराज हिमालयाची कन्या म्हणून जन्मली आणि तिला शैलपुत्री म्हटले गेले. शैलपुत्री पार्वतीजींच्या कठोर तपश्चर्येनंतर, लोककल्याणाच्या भावनेने तिचा भगवान शंकराशी पुन्हा विवाह झाला.

 नवदुर्गांपैकी पहिली आणि सर्वात प्रमुख, शैलपुत्रीला खूप महत्त्व आहे आणि तिचे वैभव अनंत आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते. या दिवशी, साधकाने मूलाधारावर आपले मन एकाग्र ठेवावे. हा त्यांच्या आध्यात्मिक अनुशासनाचा प्रारंभ बिंदू आहे. या दिवशी जप करावयाचा मंत्र: ओम शैलपुत्रये नमः.

या दिवशी श्री दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायाचे पठण करावे.

नवदुर्गा मधील इतर नावांविषयी जाणून घेऊयात यापुढील लेखांत त्यासाठी दररोज पुढील लेख नक्की वाचा 

********* माधव भोपे*********