https://goodworld.in A website by Madhav Bhope

पुण्यातील मानाचे पाच गणपति 5 Most important Ganpati of Pune

punyache manache ganpati

5 Most important Ganpati of Pune

पुण्यातील मानाचे पाच गणपति

पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. मुळात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवातच आणि त्याचा पाया हा पुण्यामध्ये घातला गेलेला आहे, त्यामुळेच पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा निश्चितच इतरांपेक्षा वेगळा आहे. यामध्ये कालांतराने अनेक गणेश उत्सव मंडळे निर्माण होत गेली आणि आज सध्या हजारो मंडळे पुण्यामध्ये कार्यरत आहेत.

पण त्यापैकी काही निवडक, जुने, ऐतिहासिक आणि मानाचे असे पाच गणपती पुण्यात आजही आहेत. या मानाच्या गणपतींचे दर्शन सुद्धा एका विशिष्ट क्रमाने घ्यायचे असते

पुण्याच्या मानाच्या ५ गणपतींचे दर्शन कसे घेण्याचा क्रम खालीलप्रमाणे

१. दर्शनाची सुरुवात मानाचा पहिल्या गणपती कसबा गणपती पासून करावी.
२. त्यानंतर ४५० मीटर वर असलेल्या मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेशवरी चे दर्शन घ्यावे.
३. त्यानंतर २३० मीटर वर असलेल्या गुरुजी तालीम या मानाचा तिसरा गणपतीचे दर्शन घेता येईल.
४. इथून १५० मीटर वर असणाऱ्या तुळशीबाग गणपती या मानाचा चौथा गणपती चे दर्शन घ्यावे.
५. आणि सर्वात शेवटी ९०० मीटर वरील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपती चे दर्शन घ्यावे.
सर्व गणपतींचे दर्शन जास्तीत जास्त २.५ किलोमीटर मध्ये होईल.

पुण्याच्या 5 मानाच्या गणपतीची  माहिती

  1. कसबा गणपती – मानाचा पहिला गणपती  Kasaba Ganapati

shri-kasba-ganpati

मासाहेब जिजाबाई भोसले यांच्या घराजवळ राहणाऱ्या विनायक ठकार यांच्या घराजवळ गणेशाची मूर्ती सापडली. हे मंदिर शिवाजी महाराज आणि जिजाबाई भोसले यांनी १६३९ साली बांधले होते.

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचे नेतृत्व श्री कसबा गणपती करतात. या मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतरच इतर मंडळे त्यांचे विसर्जन करू शकतात. पुण्याच्या आयुक्तांसह महापौर यांच्या तर्फे आरती होते आणि नंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होते.

शहाजीराजेंनी १६३६ साली लाल महाल बांधला त्यावेळी जिजामातांनी या गणपतीची स्थापना केली. येथील मूर्ती स्वयंभू असून प्रारंभीच्या काळात ती तांदळा एवढी होती, आता सातत्याने शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फुट उंचीची झाली आहे असे सांगितले जाते.

2.तांबडी जोगेशवरी – मानाचा दूसरा गणपती- Tambadi Jogeshwari

tambdi jogeshwari ganpatiतांबडी जोगेश्वरी हे दुर्गा देवीचे मंदिर आहे जिला पुणे शहराची ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते. येथील वैशिष्ट्य म्हणजे, दरवर्षी गणेशोत्सवाच्या शेवटी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते आणि सलग वर्षभरात त्याची पुनर्स्थापना केली जाते.

हे मंदिर १५ व्या शतकात बांधले गेले असले तरी दुर्गादेवीची मूर्ती अजूनही शाबूत आहे. सन 2000 पर्यंत मंदिरातच गणेश मूर्तीची स्थापना केली जात होती. 2000 पासून मंदिरासमोर स्वतंत्र पेंडल लावून मूर्तीची स्थापना चांदीच्या घुमटात केली जाते.

इथल्या गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते आणि दरवर्षी मूर्तींची प्रतिष्ठापना करतात. या उत्सवाची सुरुवात १८९३ साली झाली झाली. बुधवार पेठेतील या गणेशोत्सवास श्री भाऊ बेंद्रे यांनी प्रारंभ केला. इथल्या पितळी देव्हाऱ्यात गणेश मूर्तीची स्थापना करतात, तसेच चार युगातील बाप्पांचे एकाच ठिकाणी इथे रूप पाहायला मिळतात

3.गुरुजी तालीम – मानाचा तिसरा गणपती  Guruji Talim Ganapati

guruji talim ganpatiगुरुजी तालीम हा पुण्यातील तिसरा मानाचा गणपती आहे. 1887 मध्ये भिकू शिंदे आणि उस्ताद नलबन या दोन हिंदू आणि मुस्लिम कुटुंबांनी प्रथम स्थापना केली. त्यामुळेच पुण्यातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून गुरुजी तालीम गणपतीचे उदाहरण दिले जाते.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी ६ वर्षे या मंडळाची स्थापना झाली होती; त्यांउळे प्लॅटिनम ज्युबिली साजरी करणारे ते पहिले मंडळ बनले.

4.तुळशीबाग गणपती – मानाचा चौथा गणपती  Tulshi baag Ganpati

tulshibag ganpati जगप्रसिद्ध तुळशीबागेतील गणपती हा पुण्यातील चौथा मानाचा गणपती आहे. याची स्थापना 1901 मध्ये झाली होती. 1975 पासून प्रथम ग्लास फायबर ची मूर्ती स्थापन करण्याचा मान या मंडळाला मिळाला आहे. हा शहराच्या मध्यभाग आणि सर्वात गजबजलेला भाग आहे. पुतळा 13 फूट उंच आहे आणि 80 किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने घालतात. कलाकार डी.एस.खटवकर अनेक वर्षांपासून मूर्तीची सजावट करत आहेत.

5.केसरीवाडा गणपती – मानाचा पाचवा गणपती  Kesariwada Ganpati

kesari vada ganpatiटिळकांच्या केसरी संस्थेचा केसरीवाडा गणपती हा पुण्यातील ५वा मानाचा गणपती आहे. १८९४ मध्ये स्थापन झाल्यापासून केसरीवाड्याचा गणेशोत्सव कुमठेकर रोडपासून दूर असलेल्या विंचूरकर वाड्यात आयोजित केला जायचा, जे त्यावेळचे टिळकांचे वडिलोपार्जित घर होते. त्यानंतर ते गायकवाड वाड्यात स्थलांतरित करण्यात आले, जो सध्या केसरीवाडा म्हणून ओळखला जातो.

इथे गणेशोत्सव काळात टिळकांची नियमित व्याख्याने होत असत. आजही  या गणपतीची मिरवणूक पालखीतून निघते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

तर ते सगळं झालं ‘मानाचे ५ गणपती’ बद्दल, म्हणजेच सर्वात आदरणीय आणि आदरणीय गणेश मूर्तींबद्दल. या ५ व्यतिरिक्त, आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा उल्लेख करायला विसरू शकत नाही जो महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ आहे. बुधवार पेठेत असलेल्या या मंदिराला वर्षभर असंख्य भाविक भेट देतात परंतु गणेशोत्सवादरम्यान मंदिर आणि त्याची सजावट हे शहरातील मुख्य आकर्षणांपैकी एक आहे . भक्तांमध्ये महाराष्ट्रातील सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध राजकारणी यांचा समावेश आहे.

dagdusheth halwai ganpati

Map of 5 most important Ganpatis of Pune

Manache-Ganpati-Pune-Map updated on 27.8.2025

Hartalika vrat- Connection with nature हरतालिका व्रत- निसर्गाशी नाते

hariyali-teej-1

Hartalika vrat- Connection with nature

हरितालिकेचे व्रत- निसर्गाशी नाते

आपल्या देशातील सण, वार, व्रतें ही किती खुबीने निसर्गाशी आणि निसर्गचक्राशी जोडली गेलेली आहेत हे पाहून राहून राहून आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. मागे आपण चातुर्मासातील  एकूणच दिनचर्या कशी या ऋतूतील बदलांशी आपल्या शरीराला जुळवून घेण्याच्या दृष्टीने बनविण्यात आली आहे, याबद्दल लिहिले होते. तसेच चातुर्मासातील विविध व्रतांच्या निमित्ताने घरातील स्त्रियांना, लहान थोरांना सगळ्यांनाच या काळात निसर्गात मुबलकपणे उपलब्ध होणाऱ्या विविध वनस्पती, पानें, फुले, फळे इत्यादि यांची ओळख अनायासे होत असते. बाहेर जाऊन या वनस्पती गोळा करून आणणे, त्या निवडून व्यवस्थित करणे, इत्यादि कामांत एक तर त्या निमित्ताने ज्यांना कधी, शेतात इत्यादि जाण्याचे काम पडत नाही अशांना सुद्धा, बाहेरच्या मोकळ्या वातावरणात जाण्याचे काम पडते, आणि त्या वनस्पतींना हाताळण्याने, त्यांची पक्की ओळख होते, अनायासेच त्यांच्या गुणधर्मांची माहिती होऊ शकते. अर्थात आजकाल शहरांत या सर्व गोष्टी बाजारात आयत्या विकत मिळतात, त्यामुळे घरच्या सदस्यांचा बाहेर मोकळ्या हवेत जाण्याचा भाग जरी कमी झाला असला, तयारी त्या निमित्ताने त्या वनस्पतींची ओळख होते हेही काही कमी नाही.

आज स्त्रिया साजरे करीत असणारे हरतालिका व्रत हे एक असेच व्रत आहे. मला अजून एक गोष्ट आपल्या सगळ्या चाली रीतीं मध्ये अगदी ठळकपणे दिसते, जिचा आजकाल अत्यंत अभाव झाला आहे- ती म्हणजे या सण व्रतांच्या निमित्ताने एकत्र येण्याने लोकांना, घरातील स्त्रियांना आपल्या भावनांना वाट करून देण्याची मिळणारी संधी. हरतालिका व्रताची, पार्वती आणि शंकराची कहाणी सर्वांना माहिती आहे- ती आपण पुढे थोडक्यात बघूच.   

पण या व्रताची, पारंपरिक पद्धत ही खूप रंजक आहे. हरतालिकेला महादेवाच्या वाळूच्या पिंडीचे पूजन करतात. तर पूर्वी ही जी वाळू आणायची, त्यासाठी अशी पद्धत होती की गावातील स्त्रिया दोघी दोघी, चौघी चौघी, किंवा त्याहूनही जास्त अशा घोळक्याने, गावातील नदीच्या काठी जात. पावसाळा आता अर्ध्यापेक्षा जास्त होऊन गेलेला असे, त्यामुळे नदीचे पाणीही नितळ झालेले असे. मग दोघी दोघी स्त्रिया, नदीच्या पात्रात जाऊन, एकमेकींच्या हातात हात गुंफून, नदीच्या पात्रातून वाळू काढीत. त्यावेळी त्या एक गाणे म्हणत-

“खडक फोडू-मोती काढू- चला चला गौळणी, गौळणी!”

हे सर्व करतांना हास्य विनोद करीत करीत, निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचे टेंशन कुणाला राहणे शक्यच नसे.

असे पाच वेळा करून मग आपल्या हातांच्या ओंजळीत नदीतील वाळू काढीत. पाच वेळा केल्याने वाळूतील सर्व मोठे मोठे गोटे, काडी, कचरा वगैरे निघून जात असे आणि हातात राहिलेली स्वच्छ वाळू मग त्या सोबत आणलेल्या ताटलीत घेऊन घरी येत. नंतर त्या आणलेल्या वाळूची, छान सुबक पिंड तयार करीत. त्या पिंडीवर मग शंकर, पार्वती व पार्वतीच्या मांडीवर गणपती, एका बाजूला  पार्वतीच्या ५ सख्या आणि पिंडीच्या समोर नंदी दर्शविणारे छोटे छोटे वाळूचे गोळे ठेवायचे.

आणि मग त्या सर्वांची विधिवत पूजा करायची. ही पूजा बऱ्याच वेळा घरातील स्त्रिया आणि आजूबाजूच्या त्यांच्या शेजारणी, मैत्रिणी, या सर्वजणी सामूहिक रीतीने अत्यंत उत्साहाने करीत.  स्त्रियांसाठी हे  एकप्रकारे emotional tonic असे आणि वर्षभराची ऊर्जा या एकत्र येण्यातल्या आनंदातून त्या साठवून घेत.  

निसर्गाच्या सान्निध्याचा- हरतालिकेच्या महादेवासाठी वाळू आणणे हा एक भाग झाला, तर या पूजेसाठी लागणाऱ्या सोळा प्रकारच्या पत्र्या (पानें) आणणे आणि फुलें आणणे हा दुसरा भाग झाला. पूजेसाठी लागणाऱ्या सर्व पत्र्या घरातील व्यक्ति स्वतः जाऊन आणीत असल्याने वर लिहिल्याप्रमाणे अनायासेच ह्या सर्व वनस्पती हाताळल्या जात असत. महादेव पार्वतीच्या पूजेसाठी १६ प्रकारच्या पत्र्या वाहतात. या सोळा वनस्पती कोणत्या याबद्दल आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते. साधारणपणे खालील वनस्पतींच्या पानांचा उपयोग केला जातो- एक लक्षात घेण्यासारखे आहे, की या सर्व वनस्पतींचे कुठले ना कुठले औषधी गुणधर्म आहेत. साध्या साध्या दुखण्यांवर कुठल्या वनस्पतीच्या पानाचा रस, तर कुठल्याच्या मुळांचा उपयोग, कुठल्या फुलांचा उपयोग, हा अनायासेच माहिती होत असे- अशा प्रकारे समाज, आरोग्याच्या बाबतीत स्वावलंबी होत असे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज अजिबात नसे. तर हरतालिकेसाठी लागणाऱ्या १६ पत्र्या खालीलप्रमाणे-

हरतालिका पूजेसाठी लागणाऱ्या १६ पत्रींची नावे: 

  1. बेलपत्र (Bilva Patra)
  2. आघाडा (Aghada)
  3. मालती (Malati)
  4. दुर्वा (Durva/Durva Grass)
  5. चंपक (Champak)
  6. करवीर (Karvir/Oleander) म्हणजेच कण्हेर
  7. बद्री (Badri) म्हणजे बोर
  8. रुई (Rui/Calotropis) (रुईची फळे ही वाहतात)
  9. तुळस (Tulsi)
  10. मुनीपत्र (Munipatra) (म्हणजे ब्राह्मी- किंवा मंडूकपर्णी
  11. डाळिंब (Dalimb/Pomegranate)
  12. धोतरा (Dhatura)
  13. जाई (Jai/Jasmine)
  14. माका म्हणजेच भृंगराज (जे केसांसाठी वापरतात). (Maka)
  15. बकुळ (Bakul)
  16. अशोक (Ashok)

काही काही ठिकाणी यातील काही वनस्पतींच्या ऐवजी दुसऱ्या वनस्पतींची नांवे आढळतात. त्यामुळे असे सांगितले जाते की यातील मिळतील तितक्या वनस्पती घ्यायच्या, आणि महादेव पार्वतीची पूजा करतांना पार्वतीचे एक एक नांव घेऊन त्या वाहायच्या. तसेच फुलें ही वेगवेगळ्या प्रकारची, वाहायची, महादेव पार्वतीला दुधाचा नैवेद्य दाखवायचा. आरती करायची. हरतालिकेला स्त्रिया पूर्ण दिवस उपवास ठेवतात- हाही या ऋतूला अनुकूल असा एक detoxification चाच प्रकार आहे असे दिसून येते. आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे गणेश चतुर्थीला, सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवून, हरतालिकेचे विसर्जन केल्यावर तो खाऊन हा उपवास सोडायचा. त्यासोबत गुळाचा कानोला, खीर, भिजवलेली हरभऱ्याची डाळ, काकडीच्या फोडी, किसलेले खोबरे आणि साखर यांची खिरापत यांचाही नैवेद्य दाखवतात. हे सर्व पदार्थ किती आरोग्यदायी, शक्तिदायी आणि पावसाळ्याच्या ऋतूला योग्य असणारे आहेत!

त्यानंतर येणारा गणपती उत्सव पण असाच निसर्गाशी नाळ असलेला होता. रोज गणपतीला लागणाऱ्या दूर्वा तोडून आणणे, त्या निवडणे या सर्व गोष्टी किती आनंददायी होत्या! आणि हो, आजकालसारखे प्लास्टर ऑफ पॅरिस चे गणपती नव्हते आणि वीस वीस पन्नास पन्नास फुटांचे अजस्त्र गणपती तर नव्हतेच नव्हते. गणपतीची मृण्मयी मूर्ती करण्याची पद्धत घरोघरी प्रचलित होती, आणि आपल्या गावातच मिळणारी माती आणून घरोघरी आपल्या कला कुसरीने गणपती बनवले जात. ती मूर्ती बनवत असतांनाच बनवणारा त्यात आपला जीव ओतत असे! ती खरोखर चैतन्यमयी मूर्ती होत असे.

हरतालिकेची प्रचलित असलेली कहाणी याप्रमाणे-

एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.

हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी ‍त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांने ही गोष्ट कबूल केली.

नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिये चा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो.

पुढे दुसर्‍या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडील तिथं आले, त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेले . मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे.

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दळिद्रं येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

हरतालिकेच्या व्रताच्या समस्त महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा!

माधव भोपे 

Raksha Bandhan and Narali Pornima # रक्षाबंधन: इतिहास, महत्त्व आणि परंपरा

narali pornima

रक्षाबंधन: इतिहास, महत्त्व आणि परंपरा

रक्षाबंधन: इतिहास, महत्त्व आणि परंपरा

रक्षाबंधन हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. हा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि भाऊ तिला आयुष्यभर संरक्षण देण्याचे वचन देतो. हा सण केवळ रक्ताच्या नात्यापुरता मर्यादित नसून, प्रेम, विश्वास आणि संरक्षणाच्या बंधाचे प्रतीक आहे.

## रक्षाबंधनाचा इतिहास

रक्षाबंधनाचा इतिहास खूप प्राचीन आहे आणि तो अनेक पौराणिक कथा आणि ऐतिहासिक घटनांशी जोडलेला आहे. या सणाची मुळे वैदिक काळात सापडतात. काही प्रमुख कथा खालीलप्रमाणे आहेत:

**१. इंद्रदेव आणि इंद्राणी:** सर्वात प्रसिद्ध कथांपैकी एक म्हणजे इंद्रदेव आणि त्यांची पत्नी इंद्राणी यांची. एकदा दानवांनी इंद्रावर हल्ला केला आणि इंद्रदेवांना पराभव दिसू लागला. तेव्हा इंद्राणीने विष्णू देवाच्या कृपेने एक पवित्र धागा तयार केला आणि तो इंद्राच्या मनगटावर बांधला. या धाग्याच्या प्रभावाने इंद्राने दानवांवर विजय मिळवला. तेव्हापासून हा धागा ‘रक्षासूत्र’ म्हणून ओळखला जाऊ लागला, जो संरक्षणाचे प्रतीक आहे.

**२. महाभारत आणि द्रौपदी-कृष्ण:** महाभारतातील एक कथा अशी आहे की, शिशुपालाचा वध करताना भगवान श्रीकृष्णाच्या बोटाला दुखापत झाली आणि रक्त वाहू लागले. तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून कृष्णाच्या बोटाला बांधला. कृष्णाने या उपकाराची परतफेड म्हणून द्रौपदीला कोणत्याही संकटात संरक्षण देण्याचे वचन दिले. या घटनेला रक्षाबंधनाच्या परंपरेशी जोडले जाते, जिथे बहीण भावाला राखी बांधून त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते आणि भाऊ तिच्या संरक्षणाची जबाबदारी घेतो.

rakshabandhan

**३. राणी कर्णावती आणि सम्राट हुमायू:** मध्ययुगीन इतिहासातही रक्षाबंधनाचे महत्त्व दिसून येते. चित्तोडची राणी कर्णावतीने गुजरातचा सुलतान बहादूर शाह याच्या आक्रमणापासून आपल्या राज्याचे संरक्षण करण्यासाठी सम्राट हुमायूला राखी पाठवली होती. हुमायूने राखीचा मान राखत राणीला मदत केली आणि तिच्या राज्याचे रक्षण केले. ही कथा धर्म आणि राज्याच्या सीमा ओलांडून भावनिक बंधाचे महत्त्व दर्शवते.

**४. रवींद्रनाथ टागोर आणि बंगालची फाळणी:** आधुनिक काळात, १९०५ मध्ये बंगालच्या फाळणीच्या वेळी, रवींद्रनाथ टागोर यांनी हिंदू आणि मुस्लिमांमधील ऐक्य आणि बंधुत्व वाढवण्यासाठी रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याचे आवाहन केले. त्यांनी लोकांना एकमेकांना राखी बांधून जातीय सलोखा आणि एकतेचा संदेश दिला. या घटनेने रक्षाबंधनाला सामाजिक एकतेचे आणि बंधुत्वाचे प्रतीक बनवले.

## रक्षाबंधनाचे महत्त्व आणि परंपरा

रक्षाबंधन हा केवळ एक धार्मिक सण नाही, तर तो सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचा आहे. या सणाचे अनेक पैलू आहेत, जे त्याचे महत्त्व अधोरेखित करतात:

**१. प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक:** रक्षाबंधन हे भाऊ-बहिणीच्या निस्वार्थ प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे. या दिवशी बहीण आपल्या भावासाठी दीर्घायुष्य आणि समृद्धीची कामना करते, तर भाऊ तिला प्रत्येक संकटातून वाचवण्याचे वचन देतो. हे नाते केवळ रक्ताचे नसून, ते विश्वासाचे आणि आदराचे आहे.

raksha-3

**२. संरक्षणाचे वचन:** राखी हा केवळ एक धागा नसून, तो संरक्षणाचे आणि जबाबदारीचे प्रतीक आहे. बहीण भावाला राखी बांधून त्याच्याकडून संरक्षणाचे वचन घेते. हे संरक्षण केवळ शारीरिक नसून, मानसिक आणि भावनिकही असते. भाऊ आपल्या बहिणीला कोणत्याही परिस्थितीत आधार देतो आणि तिची काळजी घेतो.

**३. कौटुंबिक एकोपा:** रक्षाबंधन हा सण कुटुंबातील सदस्यांना एकत्र आणतो. दूरवर राहणारे भाऊ-बहीण या दिवशी एकमेकांना भेटतात, जुन्या आठवणींना उजाळा देतात आणि आपले नाते अधिक दृढ करतात. हा सण कौटुंबिक एकोपा आणि सलोखा वाढवण्यास मदत करतो.

**४. सामाजिक सलोखा:** रवींद्रनाथ टागोर यांनी दाखवून दिल्याप्रमाणे, रक्षाबंधन हा सण सामाजिक सलोखा आणि एकतेचे प्रतीक बनू शकतो. हा सण केवळ भाऊ-बहिणीपुरता मर्यादित नसून, कोणत्याही दोन व्यक्तींमध्ये प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचा बंध निर्माण करू शकतो. समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्यासाठी आणि बंधुत्वाची भावना वाढवण्यासाठी हा सण महत्त्वाचा ठरतो.

**५. सांस्कृतिक वारसा:** रक्षाबंधन हा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा एक भाग आहे. या सणातून भारतीय संस्कृतीतील नातेसंबंधांचे महत्त्व आणि परंपरांचे जतन केले जाते. हा सण पिढ्यानपिढ्या साजरा केला जातो आणि तो आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला आहे.

raksha-4

**६. धार्मिक विधी आणि परंपरा:** रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक धार्मिक विधी आणि परंपरा पाळल्या जातात. सकाळी लवकर उठून स्नान करणे, नवीन वस्त्रे परिधान करणे, देवाची पूजा करणे आणि नंतर भावाला राखी बांधणे हे या सणाचे मुख्य भाग आहेत. राखी बांधण्यापूर्वी बहीण भावाच्या कपाळाला टिळा लावते, आरती करते आणि त्याला मिठाई भरवते. भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो आणि तिला आशीर्वाद देतो. काही ठिकाणी नारळी पौर्णिमा म्हणूनही हा सण साजरा केला जातो, जिथे समुद्राला नारळ अर्पण करून त्याची पूजा केली जाते.

## निष्कर्ष

रक्षाबंधन हा केवळ एक सण नसून, तो भारतीय संस्कृतीतील नातेसंबंधांचे महत्त्व आणि मूल्यांचे प्रतीक आहे. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याला अधिक दृढ करणारा हा सण प्रेम, विश्वास, संरक्षण आणि एकतेचा संदेश देतो. पौराणिक काळापासून ते आजपर्यंत, रक्षाबंधनाने आपले महत्त्व कायम राखले आहे आणि तो आजही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा सण आपल्याला आठवण करून देतो की, नाती ही केवळ रक्ताची नसतात, तर ती प्रेमाची, आदराची आणि एकमेकांच्या संरक्षणाची असतात. त्यामुळे, रक्षाबंधन हा केवळ एक दिवस नसून, तो आयुष्यभर जपला जाणारा एक सुंदर बंध आहे.

raksha-8

## नारळी पौर्णिमा: एक समांतर उत्सव

रक्षाबंधनाच्या दिवशीच भारताच्या काही भागांमध्ये, विशेषतः महाराष्ट्र आणि किनारपट्टीच्या प्रदेशांमध्ये, नारळी पौर्णिमा हा सण साजरा केला जातो. हा सण समुद्राचे देवता वरुण देव यांना समर्पित आहे आणि तो कोळी बांधवांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण श्रावण पौर्णिमेला येतात, त्यामुळे अनेक ठिकाणी हे दोन्ही उत्सव एकत्र साजरे केले जातात.

**नारळी पौर्णिमेचे महत्त्व:**

१. **वरुण देवाची पूजा:** नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करून वरुण देवाची पूजा केली जाते. कोळी बांधव समुद्राला आपला पालनकर्ता मानतात आणि चांगल्या मासेमारीसाठी तसेच समुद्रातील प्रवासादरम्यान संरक्षणासाठी वरुण देवाचा आशीर्वाद घेतात.

raksha-5

२. **मासेमारीच्या हंगामाची सुरुवात:** पावसाळा संपल्यानंतर आणि समुद्रातील वादळे शांत झाल्यानंतर, नारळी पौर्णिमा मासेमारीच्या नवीन हंगामाची सुरुवात दर्शवते. या दिवशी कोळी बांधव आपल्या बोटींची पूजा करतात आणि समुद्रात जाण्यापूर्वी वरुण देवाकडून सुरक्षिततेची प्रार्थना करतात.

raksha-6

३. **पर्यावरणाशी नाते:** हा सण मानवाचे निसर्गाशी असलेले नाते आणि पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करतो. समुद्राला नारळ अर्पण करणे हे निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक आहे.

४. **सांस्कृतिक विविधता:** रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा हे दोन्ही सण एकाच दिवशी साजरे होत असले तरी, त्यांचे महत्त्व आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत. ही भारताच्या सांस्कृतिक विविधतेचे एक सुंदर उदाहरण आहे, जिथे एकाच दिवशी विविध प्रादेशिक आणि धार्मिक उत्सव साजरे केले जातात. काही कुटुंबांमध्ये, भाऊ-बहिणी रक्षाबंधन साजरे करतात, तर त्याच वेळी कुटुंबातील पुरुष सदस्य नारळी पौर्णिमेचे विधी पूर्ण करतात.

raksha-7

श्रावण महिन्यातील जरा व जिवंतिका पूजन jara jivantika pujan

jara jivantika

जिवतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ

 jara jivantika pujan

आपल्याकडे आषाढ महिन्याच्या अमावस्येला दीपपूजन केले जाते, ही खरोखर किती उदात्त परंपरा आहे! दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे. आपल्या आयुष्यातील अज्ञान रूपी अंधाराचा नाश करून ज्ञान रूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा, यासाठी, ज्ञानाच्या प्रतीक असलेल्या दिव्याचे, प्रकाशाचे पूजन केले जाते. दिव्याला वंशवृद्धीचे प्रतीक ही मानतात. एका दिव्याने हजारो दिवे उजळले जातात, तसेच एक ज्ञानी व्यक्ति हजारो लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणते. आणि जेंव्हा घरातील गृहिणी दीप पुजा  करते, घरातील सगळे दिवे धुवून पुसून, लख्ख करून, त्यांची पूजा करते, त्यांना प्रज्ज्वलित करते, आणि  घरातील लहान मुले ते पाहतात, घरातील मोठी माणसे, या सर्वामागील अर्थ त्यांना समजावून सांगतात, तेंव्हा नकळतच मुलांवर अतिशय योग्य असे संस्कार होत असतात.

अमावस्येनंतर  दुसर्‍या दिवशीपासून सुरू होतो, पवित्र श्रावण मास!

श्रावण मासात घरोघरी जिवती पूजन केले जाते. jara jivantika pujan

जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मांगल्याची प्रार्थना केली जाते.

या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील प्रतिमांचा काय अर्थ आहे हे आज समजून घेणार आहोत.

जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध – बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पूजले जाते त्याची कारण मीमांसा…

भगवान नरसिंह

भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाल भक्तासाठी प्रगट  झाले, ही  कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात.

नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात, जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी  असे समजले जाते.

कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-

त्यानंतर येतो कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-

यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीही श्रावणातील  आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन  करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो.

म्हणजेच…

कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान.

जराजिवंतिका

नंतर येतात त्या जराजिवंतिका

जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता.

जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते.

मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या होत्या. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम होते. परंतु राजाला संतान  नसल्यामुळे राजा दुःखी असतो.

याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपले दुःख त्यांना सांगतो.

ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो.

कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा सेवकांना सांगून जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते.

ती त्या दोन्ही तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने ती दोन्ही  शकलं सांधते. जरा ते सांधलेले अर्भक  संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते.

जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो. त्याच प्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी ही  जरा देवी. तिची सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात.

बुध व बृहस्पति –

प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पति –

बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पति (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतिच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते.

बुधाचं वाहन हत्ती – हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते.

बृहस्पतीचं वाहन वाघ – हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते.

म्हणूनच बुध – बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं.

प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता, आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.

एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना …

म्हणजेच, जिवती पूजन.

जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी।

रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते।।

साभार,संग्रहित

चातुर्मासाचे महत्त्व importance-of-chaturmas

chaturmas-2025

importance of chaturmas

चातुर्मासाचे महत्त्व: पावसाळ्यातील आरोग्य, आध्यात्मिकता आणि संस्कृतीचा संगम

अतिशय पुरातन आणि समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेल्या भारतामध्ये आपला जन्म झालेला आहे. येथील वैशिष्ट्य म्हणजे आपल्या येथील सर्व चाली  रीती, सण, उत्सव, हे निसर्गचक्राशी घट्टपणे जोडले गेलेले आहेत. भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य म्हणजे चार महिने नियमितपणे (जरी गेल्या काही वर्षात अनियमित झाला असला तरी) पाऊस- ज्याला आपण मान्सून म्हणतो, तो  पडणारा आपला देश आहे.

महाराष्ट्राला तर गेल्या ७०० वर्षांपासून आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या वारीची समृद्ध परंपरा लाभली आहे.

vari

आणि आषाढी एकादशीपासूनच सुरू होतो-‘चातुर्मास’.

summer

४ महिने उन्हाने तापलेल्या जमिनीला थंड करण्यासाठी नैऋत्य मोसमी वारे घेऊन येतात, ‘पावसाळा’. पावसाळा हा जमिनीला उपजाऊ बनवून, आपले भरण पोषण करणारे धान्य, फळे, भाजीपाला उगवून तसेच वर्षभराची पाण्याची, भू-जलाची बेगमी आणि पुनर्भरण करण्यासाठी अत्यंत आवश्यक असणारा काळ. धरित्रीचे ओसाड, शुष्क रूप बदलून, तिला सुखद शीतल हिरवे रूप प्रदान करणारा काळ.

first rain

पण असे असले, तरी, या काळाचे काही तोटे ही असतात. मनुष्याचे आरोग्य, त्याच्या शरीरातील पाचक अग्नी हा खूप मोठ्या प्रमाणावर सूर्याशी जोडलेला असतो. पावसाळ्यात सूर्यदर्शन अभावानेच होते. अर्थात ज्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी असते, किंवा मराठवाडा, विदर्भातील काही भाग, इत्यादि त्यांचा अपवाद सोडून द्या. तर सूर्याच्या अभावामुळे मनुष्यप्राण्याच्या पोटातील अग्नि सुद्धा मंद होतो आणि पाचनक्रिया मंदावते.

नद्यांना पूर आल्याने, रस्ते चिखलमय झाल्यामुळे, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे दुस्तर होते.

flooded river

जलाशय अशुद्ध होतात. पालेभाज्या, ज्या अगदी जमिनीलगत उगवतात, त्यां चिखलामुळे आणि मातीतील जंतूंमुळे खाण्या योग्य राहत नाहीत आणि त्या खाल्ल्या तर रोगांचा प्रादुर्भाव होणे अटळ असते. शरीरात वाताचा प्रभाव बळावतो.

या सर्व बाहेरील बदलांचा दुष्परिणाम होऊ नये, आणि या चार महिन्यांचा सदुपयोग व्हावा, या दृष्टीने चातुर्मासात संयमित आणि व्रतस्थ राहणे, ही संकल्पना आपल्या पूर्वजांनी रूढ केली. आणि कुठल्याही गोष्टीला धर्माशी जोडल्यानंतर सर्व सामान्यांकडून तिचे पालन होण्याची शक्यता जास्त असते, म्हणून या गोष्टी धर्माशी, विविध व्रतांशी जोडल्या गेल्या.

या दृष्टीने मग खालील नियम अस्तित्वात आले-

  1. चातुर्मासात वर्ज्य गोष्टी- prohibited vegetables चातुर्मासात कांदे, लसूण, वांगे, इत्यादि पदार्थ जे की वातुळ, म्हणजे शरीरात वात वाढविणारे आहेत, ते खाणे निषिद्ध मानले गेले. बऱ्याच लोकांचे म्हणणे असते, की कांदे, लसूण आरोग्याला खूप चांगले असतात, आणि म्हणून त्यांचे सेवन नेहमी केले पाहिजे. वांगेही शरीराला चांगले असतात, म्हणून तेही खाल्ले पाहिजेत. पण आयुर्वेदाचा दृष्टिकोण असा आहे, की प्रत्येक पदार्थ हा ऋतू, काळ बघूनच सेवन केला पाहिजे. आणि कांदे, लसूण इत्यादि केवळ औषधी स्वरूपात आणि तितक्याच प्रमाणात सेवन केले पाहिजेत. त्या पदार्थांचे जसे गुण आहेत तसेच दोष ही आहेत. कांदा आणि लसूण खाल्ल्यावर माणसाचे मन स्थिर राहू शकत नाही, विचलित होते, त्यात कामवासना वाढीस लागते, हा आपला प्रत्यक्ष अनुभव आहे. आणि काम वासना वाढू देण्यास हा काळ अनुकूल मानलेला नाही. तसेच याच्या सेवनाने शरीरातील वात वाढीस लागतो आणि विकृत होतो. तीच गोष्ट वांगे इत्यादि गोष्टींची आहे. त्यामुळे या काळात वरील पदार्थ वर्ज्य सांगितले आहेत. तसेच फुलकोबी, पत्ताकोबी, इत्यादि सुद्धा टाळायला सांगितले आहेत. कारण या भाज्यांमध्येही आळ्या, सूक्ष्म किडे इत्यादि या दिवसांत होण्याची खूप जास्त शक्यता असते.  तसेच या काळात हिरव्या पालेभाज्या, मुळा, गाजर इत्यादींचे  सेवन ही वर्जित सांगितले आहे. कारण हिरव्या पालेभाज्या किंवा मुळा, गाजर इत्यादि जमिनीच्या अगदी जवळ असतात( मुळा गाजर तर जमिनीतच असतात). शेतात पावसाळ्यामुळे चिखल झालेला असतो, आणि त्यामुळे पालेभाज्यांवर चिखल, माती, आणि सूक्ष्म किडे असण्याची शक्यता असते. त्यामुळे या काळात या भाज्यांचे सेवन वर्ज्य सांगितले आहे.
  2. वर्ज्य समारंभ -या काळात शुभ कार्यांचे मुहूर्तही नसतात. भारतातील जनता मुख्यतः कृषिप्रधान असल्याने या काळात शेतकरी एकतर शेतीच्या कामात व्यस्त असतो. आणि लग्न, मुंज, यज्ञ याग इत्यादि कार्यात समाजातील लोकांचे एकत्र येणे अपेक्षित असते, जे की पावसाळ्यामुळे अवघड असते. या कारणामुळे या काळात वरील कार्यांचे मुहूर्त नसावेत. अर्थात बदलत्या काळानुसार परिस्थिती बदललेली आहे, आणि आजकाल काही पंचांगकर्त्यांनी सुद्धा बदलत्या काळानुसार वरील काळांसाठी आपत्कालीन मुहूर्त द्यायला सुरूवात केली आहे.  
  3. उपवास- या काळात पाचक अग्नि कमी झाल्यामुळे, आहार हलका आणि बेताचाच घेणे योग्य असते आणि त्यातही मधून मधून पोटाला विश्रांती देणेही आवश्यक असते. याच दृष्टीने या चार महिन्यांत अनेक उपवास आणि व्रतें आपल्या संस्कृतीत योजली आहेत. त्यांचा योग्य तो अर्थ घेऊन खऱ्या अर्थाने उपवास केले, तर त्याचा फायदा नक्कीच शरीराला होतो आणि पावसाळ्याच्या मंद आणि कुंद् वातावरणात जठराग्निचे रक्षण होते. अन्यथा उपवासाच्या दिवशी विविध जड पदार्थ, जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खाल्ले गेले, तर उपवासाचे फायदे तर दूर राहिले, पण तोटे मात्र निश्चित संभवतात. मग त्यापेक्षा उपवास न केलेला बरा, असे म्हणायची वेळ येते.

असो.

प्रतीकरूप समजावून घेणे आवश्यक

आता या चातुर्मासाविषयी आपल्या परंपरेत, विविध पुराणांत इत्यादि, काय सांगितले आहे, ते थोडक्यात बघू. या सर्व गोष्टींचे प्रतीकरूप समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा, काय, पुराणातल्या गप्पा, असे म्हणून त्यांना झिडकारणे सोपे आहे, पण समजदारीचे नाही.    

चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा चार महिन्यांचा काळ होय.  जैन धर्मकल्पनेनुसार चातुर्मास आषाढ शुक्ल चतुर्दशीला सुरू होतो आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत चालतो. या काळात एरवी एका गावाहून दुसऱ्या गावाला विहार (प्रवास) करणारे जैन साधू एकाच गावात मुक्काम करतात. हिंदू धर्मात ही या काळात संन्याशी एकाच गावात थांबतात. अन्यथा संन्याशांनी ३ दिवसांच्या वर एका जागी थांबू नये असा नियम असतो.

चातुर्मास कालावधी

bhagvan vishnu

चातुर्मास म्हणजे चार महिने. आषाढाचे २० दिवस, श्रावण-भाद्रपद-आश्विन हे तीन पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले ११ दिवस. भारतीय उपखंडात हा काळ मोसमी पावसाळ्याचा असतो. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मास सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशीला पद्मा एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तूळ राशीत आल्यावर त्याच्या आसपास, कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस ‘प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे.. जैनधर्मीय आषाढ शुक्ल चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमेपर्यंतचा काळ हा चातुर्मासाचा कालावधी मानतात. चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला शेषशायी विष्णू जलाशयात -क्षीरसागरात निद्रा घेतात आणि प्रबोधिनीला उठतात, अशी धारणा आहे. या काळात जगाचा कारभार हा भगवान शिव बघतात अशी धारणा आहे. हरि हा शब्द सूर्य, चंद्र, वायु, विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्य चंद्रांचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो.

पौराणिक कथा

 या संदर्भात ब्रह्मांडपुराणात सूर्यवंशातील  मांधाता नावाच्या चक्रवर्ती सम्राटाची कथा सांगितली जाते. त्या राजाच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नसे व कोणालाही कसल्याच व्याधी नव्हत्या.

king

त्या राजाच्या कोषागारात अन्यायाने मिळवलेले धन थोडेसुद्धा नव्हते. तो अशाप्रकारे राज्य करीत असताना पुष्कळ वर्षे लोटली. एकदा राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे त्याच्या राज्यात तीन वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे दुष्काळ पडून सर्व प्रजाजन त्रासले. व भुकेने आर्त झाले. तेंव्हा राजा आपल्या सैन्यासह वनात गेला, आणि अनेक ऋषींच्या आश्रमांना भेटी दिल्या. तिथे त्याला ब्रह्मदेवाचा मानसपुत्र असलेले  अंगिर ऋषी दिसले.

rishi

राजाने त्यांना प्रणाम करून आपले आणि आपल्या प्रजेचे दुःख सांगितले. त्यावर मुनीने त्यांना पद्मा एकादशीचे (म्हणजेच देवशयनी एकादशी) व्रत सांगितले, आणि आपल्या परिवारासह व प्रजाजनांसह  या एकादशीचे व्रत करायला सांगितले. राजाने आणि प्रजेने त्याप्रमाणे  त्या सर्वांनी असे व्रत सुरू करताच मेघांनी वर्षा सुरू केली. सर्व पृथ्वी जलाने भरून गेली. व थोड्या दिवसातच शेते पिकांनी शोभू लागली. अशी कथा ब्रह्मांडपुराणात सांगितली आहे.

ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रते केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संतदर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चतुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत, असा समज आहे. एकादशीनंतर म्हणजे द्वादशीला विष्णूप्रबोधोत्सव साजरा केला जातो.’

देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. ‘असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत अवश्य करावे’, असे धर्मशास्त्र सांगते –

वार्षिकांश्चतुरो मासान् वाहयेत् केनचिन्नरः

व्रतेन चेदाप्नोति किल्मिषं वत्सरोद्भवम् ।।

अर्थ: प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते.

या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते.

पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास्य व्रत एका स्थानी राहूनच करावे, असा प्रघात पडला.

मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी संस्थांचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत.[६]

परमार्थाला पोषक गोष्टींचा विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय.

चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्धे करतात.

चातुर्मासात (चार मास) व्रतस्थ राहायचे असते.

चातुर्मासातील व्रते 

सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात.  पर्णभोजन (पानावर जेवण करणे), एकभोजन (एक वेळेस जेवणे), अयाचित (मागता मिळेल तेवढे जेवणे), एकवाढी (एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे), मिश्रभोजन (सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे) इत्यादी भोजननियम करता येतात.’ ‘कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणे-पारणे’ नावाचे व्रत करतात. यात एक दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास, असे सतत चार मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात एक किंवा दोन धान्यांवर रहातात. काही एकभुक्त रहातात. देशपरत्वे चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात.

वर्ज्य

१. ‘प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, ईडनिंबू, महाळुंग, वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ़[१०]

२. मंचकावर शयन

३. ऋतुकालावाचून स्त्रीगमन

४. परान्न

५. विवाह किंवा अन्य तत्सम कार्य

६. चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने चार मास, निदान दोन मास तरी एकाच ठिकाणी राहावे, असे धर्मसिंधूत आणि इतरही काही धर्मग्रंथांत सांगितले आहे. अजूनही बरेच लोक चातुर्मासात किंवा कमीतकमी श्रावण महिन्यात, दाढी करीत नाहीत.

अवर्ज्य

चातुर्मास्यात हविष्यान्न (यज्ञाच्या वेळी चालते ते अन्न) सेवन करावे, असे सांगितले आहे. तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, सैंधव मीठ, गायीचे दूध, दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ यांना हविष्यान्न म्हणतात.  (वर्ज्य पदार्थ रज-तमगुणयुक्त असतात, तर हविष्यान्ने सत्त्वगुणप्रधान असतात.)

आठवणी

मला आठवते, आमच्या लहानपणी- साधारण ५५ वर्षांपूर्वी, छोट्या गावांमध्ये, चातुर्मासामध्ये निरनिराळ्या पोथ्यांचे वाचन होत असे. संध्याकाळी, गावातील लहान थोर लोक, बाया बापड्या, सर्व श्रद्धेने पोथी ऐकायला जमत. या चार महिन्यांत विशेष करून निरनिराळ्या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असे, गावांत कुणाचे न कुणाचे कीर्तन इत्यादि असे आणि लोक अत्यंत श्रद्धेने कीर्तन ऐकायला जमत. दर गुरुवारी आणि एकादशीला, बहुतेक कुठल्या मंदिरात किंवा कुणाच्या घरी, स्थानिक भजनी मंडळाचे भजन असे. संध्याकाळी ९ च्या नंतर,, सगळ्यांची कामे वगैरे आटोपल्यावर लोक एकत्र जमून भजन, संकीर्तन करीत. मी बऱ्याच वेळेला, माझ्या वडिलांसोबत अशा भजनाला जात असे. एखादे दिवशी भजनाला गेलो नाही, तरी घरी अंथरुणावर पडल्या पडल्या, टाळ मृदुंगांचा आवाज आणि कुणीतरी आळवून आळवून म्हटलेले भजन आणि इतरांनी त्याला दिलेली सामूहिक साथ, ऐकू येत असे आणि मी अगदी वेगळ्याच दुनियेत पोंचून जात असे.

bhajan

समारोप 

असो. रविवारी दि. ६ जुलै पासून यावर्षीचा चातुर्मास सुरू झाला आहे. आपल्या सर्व चांगल्या रूढी, परंपरा नेहमीसाठी सुरू राहोत आणि आपल्याला माणूस म्हणून जगण्याचे बळ देत राहोत, ही ईश्वरचरणी प्रार्थना.

माधव भोपे 

Gondavalekar Maharaj Pravachan आजचे प्रवचन

gondavalekar maharaj image

महाराष्ट्रातील अलिकडच्या काळातील ब्रह्मलीन सत्पुरुष आणि सुप्रसिद्ध संत ब्रह्मीभूत श्री गोंदवलेकर महाराज हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्व नाम भक्तांना सुपरिचित आहेत. त्यांच्या रोजच्या छोट्या आणि सुटसुटीत  प्रवचनांचे पुस्तकही सगळ्यांच्या परिचयाचे आहे. या पुस्तकात वर्षातील ३६५ दिवसांची प्रवचने- रोजचे एक प्रवचन या स्वरूपात दिले आहे. ही प्रवचनें बऱ्याच भक्तांनी आपल्या आवाजात प्रस्तुत केलेली, उपलब्ध आहेत. अशाच एका “भक्ति सुधा” या चॅनल वरील प्रवचनें रोज या ब्लॉग च्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. आशा आहे की परमार्थाची आवड असणाऱ्या भाविकांना ही प्रवचने. उपयुक्त ठरतील