महाराष्ट्रातील अलिकडच्या काळातील ब्रह्मलीन सत्पुरुष आणि सुप्रसिद्ध संत ब्रह्मीभूत श्री गोंदवलेकर महाराज हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्व नाम भक्तांना सुपरिचित आहेत. त्यांच्या रोजच्या छोट्या आणि सुटसुटीत प्रवचनांचे पुस्तकही सगळ्यांच्या परिचयाचे आहे. या पुस्तकात वर्षातील ३६५ दिवसांची प्रवचने- रोजचे एक प्रवचन या स्वरूपात दिले आहे. ही प्रवचनें बऱ्याच भक्तांनी आपल्या आवाजात प्रस्तुत केलेली, उपलब्ध आहेत. अशाच एका “भक्ति सुधा” या चॅनल वरील प्रवचनें रोज या ब्लॉग च्या वाचकांसाठी उपलब्ध करून देत आहोत. आशा आहे की परमार्थाची आवड असणाऱ्या भाविकांना ही प्रवचने. उपयुक्त ठरतील
एका माणसाला विडी ओढण्याचे फार व्यसन होते. तो आजारी पडल्यावर त्याने डॉक्टरांना सांगितले, ‘मला तुम्ही औषध दिले तरी मी विडी सोडणार नाही.’ त्याचा डॉक्टर फार हुशार होता. त्याने त्याला एक गोळी देऊन, विडी ओढण्यापूर्वी ती तोंडात धरीत जा म्हणून सांगितले. त्या गोळीमुळे विडीच्या तंबाखूचे विष त्याला बाधत नसे. तसे आपण प्रपंच करताना वागले पाहिजे. प्रपंच आम्हांला सुख देईल ही आमची कल्पनाच नाहीशी झाली पाहिजे. म्हणजे प्रपंचाची हावही कमी होईल, आणि नंतर कर्तव्यापुरतेच आम्ही प्रपंचात राहू. जोपर्यंत प्रपंचाकडे आमची दृष्टी आहे तोपर्यंत आम्हाला समाधान कालत्रयीही मिळणे शक्य नाही. प्रारब्धाने प्रपंच आला आहे, तो कर्तव्यकर्म म्हणून करीत जा, पण त्यात सुख मिळणार आहे या कल्पनेने तो करू नका. प्रपंची लोकांचा स्वभाव फार विचित्र आहे; त्यांना खरे सांगितले तर ते आवडत नाही. वास्तविक आपण प्रपंचातले संबंधी लोक कामापुरते एकत्र जमतो. पाचजण मिळून प्रपंच बनतो. त्यांमध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो. मग सुख एकट्यालाच मिळणे कसे शक्य आहे ? नुसता प्रपंच तापदायक नाही, आकुंचित प्रपंच तापदायक आहे.
आपले खरे समाधान भगवंताजवळ आहे ही खूणगाठ पक्की बांधून प्रपंचात वागा. ज्याप्रमाणे व्यापारात नफा व्हावा म्हणून व्यापार करतात, तो होत नसेल तर व्यापारात काहीच तथ्य नाही, तसेच प्रपंचात समाधान हा नफा आहे; तो जर मिळत नसेल तर प्रपंचाचा लोभ धरण्यात काय फायदा आहे ? ‘तुझ्या असमाधानाचे कारण नक्की सांग’, असे जर आपण एखाद्याला विचारले, तर त्याला खात्रीलायक कारण सांगता येणार नाही. याचा अर्थ असा की, तत्त्वदृष्ट्या समाधान व्हायला खरोखरीच कशाची जरुरी नाही; पण ही गोष्ट कुणाला पटत नाही. आहे त्या अवस्थेमध्ये आपले समाधान टिकत नाही, आणि पाहिजे ती वस्तू मिळाली तरी आपण पूर्ण सुखी होत नाही. कैदेतल्या माणसाला ‘मी सुखी आहे’ असे वाटणे कधी शक्य आहे का ? तशी प्रपंची माणसाची अवस्था आहे. खरोखर, प्रपंचात समाधान, आनंद मिळत नाही हे अगदी सर्वांना कळते; परंतु शहरातले लोक केवळ अभिमानामुळे आणि खेड्यातले लोक अज्ञानामुळे, जसे वागायला पाहिजे तसे वागत नाहीत. या प्रपंचात राहूनसुद्धा भगवंताचे प्रेम आणि समाधान आम्हांला कसे मिळविता येईल, याचा आपण आधी विचार करायला पाहिजे. नामाच्या सहवासात राहिल्याने देहावरचे प्रेम आपोआप नष्ट होईल, आणि मग देहाने मांडलेल्या प्रपंचावरचेही प्रेम कमी होईल, आणि पुढे त्याला सर्वत्र परमेश्वरच दिसेल.
आज दि. 14 डिसेंबर- आज मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा- या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते.
महायोगीश्वर दत्तात्रेय भगवान हे भगवान विष्णूंचे अवतार आहेत. त्यांचे अवतरण मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला प्रदोष काळी झाले.
दत्तात्रेय हे भगवान विष्णूंच्या 24 अवतारांपैकी एक मानले जातात. मार्कंडेय पुराणाच्या 9 व्या आणि 10 व्या अध्यायांमध्ये भगवान दत्तात्रेयांच्या जन्माची कथा सांगितली आहे.
दत्तात्रेय नांवाची कथा
तसेंच श्रीमद्भागवतात आले आहे की पुत्र प्राप्तिच्या इच्छेने महर्षि अत्रींनी व्रत केले तेंव्हा ‘दत्तो मयाहमिति यद् भगवान् स दत्तः’ मी माझ्या स्वतःलाच तुम्हाला देऊन दिले आहे, असे म्हणून भगवान विष्णूच अत्रीच्या पुत्राच्या रूपात उत्पन्न झाले, आणि ‘दत्तो’ म्हणून दत्त आणि अत्रिपुत्र झाल्यामुळे आत्रेय, अशा प्रकारे दत्त आणि आत्रेय यांच्या संयोगामुळे यांचे दत्तात्रेय हे नांव प्रसिद्ध झाले.
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो.
दत्तांच्या जन्माची कथा
अत्रिमुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सान्निध्यांत राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करित असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचें मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळीअवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमांतून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्यापुढे शीतल होई. पवन तिच्यापुढे नम्र होई. एवढा तिच्या पातिव्रत्याचा प्रभाव होता.
पतीबद्दल तिच्या ठायी असलेल्या अनन्य भक्तिमुळे तिचे नाव ‘साध्वी व पतिव्रता स्त्री ‘ म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता नारदमुनींच्या सुद्धा कानावर पडली. त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रम्हा, विष्णू, महेश यांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी, पार्वती यांना सांगितली. तेव्हा त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. तेव्हा तिचे सत्व हरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखविला.
त्रैमूर्ति म्हणजेच ब्रह्मा-विष्णु-महेश यांनी आप आपल्या पत्नीला समजविण्याचा प्रयत्न केला पण त्या ऐकेनात. त्यामुळे आपआपल्या पत्नींच्या हट्टामुळे ही तिन्ही देव तिची परिक्षा पाहण्यासाठी आणि तिचे सत्त्वहरण करण्यासाठी तयार झाले. त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. आणि ते तिघे भर दुपारी अत्रिमुनींच्या आश्रमात आले.
अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांचे आदरातिथ्य केले, आणि दुपारची वेळ असल्यामुळे त्यांना भोजन करण्याची विनंती केली. तेंव्हा ब्राह्मण रूपात आलेल्या त्रिदेवांनी तिच्यासमोर अट ठेवली, की तिने विवस्त्र होऊन त्यांना वाढावे
अनुसूयेने तिच्या तपसामर्थ्याने ते कोण असावेत हे ओळखले. अत्रि मुनि नदीवर स्नान संध्येला गेले होते. अनुसूयेने आपल्या पतीचे स्मरण करून, त्यांचे पांदतीर्थ या ब्राह्मणांवर शिंपडले, त्यामुळे ती तिघे सहा महिन्यांची बालकें होऊन रांगू लागली.
अनुसूयेने त्यांच्या इच्छेप्रमाणे करून, त्यांना स्तनपान करविले. आणि त्यांना थोपटून पाळण्यात झोपविले. अत्रिमुनी परत आल्यानंतर तिने सर्व वृत्तान्त त्यांना सांगितला. अत्रीमुनींकडून ही गोष्ट नारदाला कळाली. स्वर्गलोकात तीन्ही देवस्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या. तेव्हा नारदमुनी अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली. त्या चिंताग्रस्त झाल्या. त्या तिघी अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली. तेव्हा अत्रिमुनींनीं पुन्हा गंगोदक देऊन तें त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा अनुसूयेने त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत् देवस्वरूप झाली. इतक्यांत मुनि बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. ब्रह्मा- विष्णु- महेश, प्रसन्न झाले व म्हणाले, “हे अनुसूये आम्ही तुजवर प्रसन्न झालो आहोत. इच्छित वर माग!” तेव्हां अनुसूयेने ‘तिघे बालक ( ब्रह्मा – विष्णु- महेश ) माझ्या घरी तीन मूर्ति एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत’ असा वर मागितला. तेव्हा ‘तथास्तु’ असें म्हणून देव अंतर्धान पावले. कालांतराने हे तीन्ही देव अनुसूयेच्या गर्भातून प्रकट झाले.
मासांमाजीं मार्गेश्वर । उत्तम महिना प्रियकर ।तिर्थीमाजीं तिथी थोर । चतुर्दशी शुद्ध पैं ॥वार बुधवार कृत्तिका नक्षत्र । ते दिनीं ब्रह्मा विष्णु त्रिनेत्र ।तिघे मिळोनि एकत्र । शुद्ध सत्त्व निवडिलें ॥त्रैमुर्तींचें सत्त्व मिळोन । मूर्ति केली असे निर्माण।ठेविते झाले नामभिघान । दत्तात्रेय अवधूत ॥
अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रेयाचा जन्म झाला. तीन शिरें, सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचें ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो.
दत्तात्रेयांचे रूप आणि त्याचा अर्थ
दत्तात्रेय जरी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कायम फिरत असले, तरी त्यांचे आवडीचे ठिकाण म्हणजे उंबराचा वृक्ष होय. त्यांचे रूप म्हणजे केसांवर जटाभार, सर्व अंगावर विभूति, व्याघ्रांबर वस्त्र म्हणून नेसलेले, तसेंच त्यांच्यासोबत त्यांची गाय आणि 4 कुत्रे, काखेला झोळी, असे ‘अवधूत’ दत्त विश्वाच्या कल्याणासाठी फिरत असतात. त्यांच्या सोबत असलेली गाय म्हणजे पृथ्वीचे स्वरूप समजले जाते. किंवा लोकांच्या कामना पूर्ण करणारी कामधेनू. तसेंच त्यांच्या सोबत असलेले 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत. तसेंच त्यांच्या हातात असणारे त्रिशूल म्हणजे तीन गुणांवर विजय मिळवण्याचे प्रतीक आहे. आणि एका हातात असलेले सुदर्शन चक्र म्हणजे काळाचे प्रतीक आहे, म्हणजे ते कालातीत आहेत. तसेंच एका हातात असलेला शंख म्हणजे ॐ ध्वनिचे प्रतीक आहे. तसेंच त्यांनी अंगावर फासलेले भस्म म्हणजे वैराग्याचे प्रतीक आहे. त्यांच्या हातात असलेले भिक्षापात्र म्हणजे ‘दान’ करण्याचे प्रतीक आहे. मनुष्यमात्राला, आपल्याजवळील वस्तू इतरां सोबत वाटून खाण्याचा संदेश आहे. एका हातात असलेली जपमाळ ही नामस्मरणाचे महत्त्व सांगते.
सर्व संप्रदायांमध्ये दत्तात्रेय
दत्तात्रेय हे वारकऱ्यांनाही पूज्य आहेत. श्री ज्ञानदेव आणि श्री एकनाथ हे दत्तोपासक होते. आनंद संप्रदायाची गुरुपरंपरा ही दत्तात्रेयादी आहे. चैतन्य संप्रदायाची गुरुपरंपरा राघव-चैतन्य-केशव-बाबाजी- तुकाराम अशी आहे. या परंपरेतील राघव चैतन्यांनी दत्ताची उपासना केली होती. मुस्लिमांत या देवतेचा निर्देश शहा फकीर म्हणून होतो. भक्तांसाठी दत्तप्रभू मलंग वेश धारण करतात, अशी धारणा आहे. यामुळे दत्ताचे अनेक भक्त मुसलमान असतात.
हिंदू धर्मातील बहुतेक सर्व सण आणि व्रतें ही निसर्ग चक्राशी जोडली गेलेली आहेत असे दिसते. पावसाळ्याचे चार महिने (जून ते ऑक्टोबर) वातावरणातील ओल, दमटपणा, सूर्यदर्शनाचा अभाव, त्यामुळे होणारी रोगजंतूंची वाढ, इत्यादींपासून बचाव करण्याच्या दृष्टीने, चातुर्मासाच्या निमित्ताने वेगवेगळ्या व्रतांची आणि उपवासांची योजना केलेली असल्यामुळे या काळात आपोआपच आरोग्याची काळजी घेतली जाते. चातुर्मासातील शेवटचा एक महिना, म्हणजे आश्विन महिना (साधारण ऑक्टोबर महिना सुरू झाल्यामुळे ऑक्टोबर हीट जेंव्हा सुरू झालेली असते), हा शरद ऋतू आणि हेमंत ऋतू यातील संधिकाल असतो. शरद ऋतू हा आरोग्याच्या दृष्टीने तसाही प्रतिकूल मानला गेला आहे. आणि त्यात भाद्रपद महिना संपल्यावर, आश्विन महिना लागतो तेंव्हा शरद ऋतू संपून हेमंत ऋतू सुरू होण्याचा काल, म्हणजे ऋतुसंधी, त्यामुळे या काळात आरोग्याची जास्त काळजी घेणे, आणि पुढे येणाऱ्या अनुकूल काळासाठी म्हणजेच हिवाळ्यासाठी शरीराला तयार करणे, या दृष्टीने दुर्गादेवीच्या नवरात्री व्रताची योजना असावी असे वाटते. या काळात, उपवास करून, ब्रह्मचर्य पालन करून, व्रतस्थ आणि संयमाने राहून, शरीर आणि मन दोन्हींना शुद्ध करून पुढे येणाऱ्या काळात शक्तिसंचय करण्यास तयार केले जाते असे दिसते. म्हणजेच शक्तीची उपासना करायला सुरूवात या काळापासून होते.
हिंदू धर्मातील सर्व देव, देवी आणि देवता हे, क्वचित काही अपवाद वगळता, शस्त्रधारी आहेत. निसर्गातील प्रत्येक शक्तीचे, शक्तीच्या प्रत्येक रूपाचे, व्यक्तिकरण (personification) केले गेले आहे. तसेच देवीच्या विविध रूपांत शक्तीच्या विविध रूपांचे व्यक्तीकरण केले आहे.
आजपासून सुरू होणारे देवीचे नवरात्र हे म्हणूनच, शक्तीची उपासना आहे.
नवरात्रामध्ये देवीच्या, म्हणजेच शक्तीच्या नऊ रूपांची नवदुर्गांच्या रूपात उपासना केली जाते. जाणून घेऊयात कोणत्या आहेत नवदुर्गा
दुर्गा सप्तशती ग्रंथांतर्गत देवी कवच स्तोत्रातील पुढील श्लोकांमध्ये अनुक्रमे नवदुर्गां ची नावे दिली आहेत –
दुर्गादेवी तिच्या पहिल्या रूपात ‘शैलपुत्री’ म्हणून ओळखली जाते. ती नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. तिला ‘शैलपुत्री’ हे नाव पडले कारण तिचा जन्म पर्वतराज हिमालयाच्या घरात झाला होता. (शैल म्हणजे पर्वत). नवरात्रीच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते. तिचे वाहन वृषभ आहे, म्हणून तिला वृषारूढा असेही म्हणतात. या देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि डाव्या हातात कमळ आहे. काही ठिकाणी तिच्या डाव्या हातात डमरू आहे असेही सांगितले जाते. तिला सती असेही म्हणतात.
शैलपुत्रीची कहाणी
एकदा सतीचे वडील प्रजापती दक्ष यांनी यज्ञ केला तेव्हा त्यांनी सर्व देवांना आमंत्रित केले, परंतु त्यांचे जावई भगवान शंकर यांना बोलावले नाही. सती आपल्या वडिलांच्या यज्ञाला जायला उत्सुक होती. शंकरांनी सतीला समजावले की बोलावणे नसतांना जाणे योग्य नाही. पण सतीचे समाधान झाले नाही. सतीचा हट्ट पाहून शंकरांनी तिला यज्ञाला जाण्याची परवानगी दिली.
सती दक्ष प्रजापतींकडे पोहोचल्यावर तिची उपेक्षा झाली. दक्षाने शंकरांबद्दल अपमानास्पद शब्दही बोलले. यामुळे सतीला खूप राग आला, पतीचा हा अपमान तिला सहन झाला नाही आणि तिने यज्ञकुंडात योगाग्नीद्वारे स्वतःला जाळून घेतले.
शंकरांना हे कळल्यावर ते भयंकर रागावले, आणि आपल्या जटांपासून त्यांनी वीरभद्राची निर्मिती केली आणि दक्ष प्रजापतीच्या यज्ञाचा नाश करण्यासाठी त्याला हजारो गणांसह पाठवले. त्यांनी त्या यज्ञाचा नाश केला. हीच सती पुढील जन्मी शैलराज हिमालयाची कन्या म्हणून जन्मली आणि तिला शैलपुत्री म्हटले गेले. शैलपुत्री पार्वतीजींच्या कठोर तपश्चर्येनंतर, लोककल्याणाच्या भावनेने तिचा भगवान शंकराशी पुन्हा विवाह झाला.
नवदुर्गांपैकी पहिली आणि सर्वात प्रमुख, शैलपुत्रीला खूप महत्त्व आहे आणि तिचे वैभव अनंत आहे. नवरात्राच्या पहिल्या दिवशी तिची पूजा केली जाते. या दिवशी, साधकाने मूलाधारावर आपले मन एकाग्र ठेवावे. हा त्यांच्या आध्यात्मिक अनुशासनाचा प्रारंभ बिंदू आहे. या दिवशी जप करावयाचा मंत्र: ओम शैलपुत्रये नमः.
या दिवशी श्री दुर्गा सप्तशतीच्या पहिल्या अध्यायाचे पठण करावे.
नवदुर्गा मधील इतर नावांविषयी जाणून घेऊयात यापुढील लेखांत त्यासाठी दररोज पुढील लेख नक्की वाचा
श्री गणेश पुराणात मागील भागात आपण पाहिले की प्राचीन काळी सोमकांत नांवाचा राजा कुष्ठरोगाने त्रस्त होऊन, आपली राणी आणि प्रधानासह अरण्यात गेला. तिथे त्याला आधी ऋषिकुमार च्यवन आणि नंतर त्यांचे वडील भृगू ऋषींची भेट झाली. भृगू ऋषीं नी आपल्या ज्ञानाने राजाच्या पूर्वजन्मीचा वृत्तान्त जाणून राजाला त्याच्या पूर्व जन्मी केलेल्या पापांची जाणीव करून दिली.
भृगू ऋषींच्या तोंडून आपले पूर्वजन्मीचे चरित्र ऐकून राजाच्या मनात संशय निर्माण झाला, आणि त्यावर त्याचा सहजी विश्वास बसेना. तो बराच वेळ काही न बोलता बसून राहिला.
तेवढ्यात त्याच्या सर्वांगातून अनेक पक्षी अकस्मात प्रकट झाले. ते राजावर आपल्या चोंचींनी प्रहार करू लागले, त्यामुळे आधीच क्षतिग्रस्त असलेल्या राजाला असह्य वेदना होऊ लागल्या. तो ओरडू आणि तडफडू लागला. त्याने भृगू ऋषींना तळमळून विचारले, “ हा काय प्रकार आहे? हे पक्षी माझ्यावर असे का तुटून पडले आहेत?”
त्यावर भृगू ऋषी म्हणाले, “हे राजन, तुझ्या मनात माझ्या बोलण्याबद्दल विकल्प निर्माण झाला, म्हणून तुला हे फळ भोगावे लागत आहे. तू माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या अंतःकरणात विश्वास निर्माण झाला, तर माझ्या एका हुंकाराने हे सर्व पक्षी नाहीसे होतील.”
त्यावर सोमकांताने मनातील विकल्प टाकून दिले आणि तो भृगू ऋषींना शरण गेला. तेंव्हा ऋषींनी मोठ्याने हुंकार भरला, आणि काय आश्चर्य! ते सर्व पक्षी क्षणार्धात अदृश्य झाले. ते पाहून राजाला मोठे आश्चर्य वाटले.
भृगू ऋषी पुढे म्हणाले, “राजा, तुझी पूर्वीची दुष्कर्मे एवढी भयानक आहेत की त्यांचे निरसन करायला काय करावे हा मला मोठा प्रश्न पडला आहे.
तथापि गणपतीचे माहात्म्य फार थोर आहे. तो सुखकर्ता आणि भक्तांच्या दोषांचा नाश करून त्यांना पवित्र करणारा आहे. म्हणून तू आता ‘गणेश पुराण’ श्रवण कर. त्यामुळे तू निष्पाप होशील.”
सोमकांत राजाचे अंतःकरण भरून आले, आणि तो ऋषींना म्हणाला, महाराज, तुम्ही माझे कल्याणच करणार याबद्दल माझी खात्री आहे. कृपया मला या रोगातून सोडवा.
तेंव्हा भृगू ऋषींनी श्री गणेशाच्या 108 नामांनी अभिमंत्रित केलेले जल राजाच्या रोगजर्जर देहावर शिंपडले. त्या जलाच्या प्रभावाने राजाच्या नाकातून सूक्ष्मरूपाने एक काळाकभिन्न पुरुष बाहेर पडला. पाहता पाहता त्याने महाकाय रूप धारण केले. त्याचे डोळे लालबुंद होते. जीभ बाहेर लोंबत होती, त्याच्या विक्राळ मुखातून अग्निज्वाला आणि रक्त, पू, इत्यादि घाण पदार्थ बाहेर पडत होते. तो आपल्या विक्राळ दाढा चावीत भृगू ऋषींकडे पाहू लागला. मात्र भृगू ऋषीं शांत होते. त्यांनी त्याला विचारले, “तू कोण आहेस?’ तो विकट हास्य करून म्हणाला, “मी पापपुरुष आहे. सर्व प्राण्यांच्या देहात सूक्ष्मरूपाने राहतो. तुझ्या अभिमंत्रित जलामुळे मला राजाच्या देहातून बाहेर यावे लागले. मी भुकेने व्याकुळ झालो आहे. मला काहीतरी खायला दे. नाहीतर मी या राजासह सर्वांचा फडशा पाडीन. तू मला बेघर केले आहेस म्हणून माझ्या राहण्याचीही व्यवस्था तूच कर.
भृगुंनी त्याच्या म्हणण्याने विचलित न होता, त्याला म्हटले, ” तू मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नकोस. त्याचा काहीही उपयोग होणाऱ् नाही. आता यापुढे तो समोरच्या आम्रवृक्षाच्या ढोलीत रहा आणि वाळलेली पाने खाऊन गुजराण कर.” ऋषींपुढे आपले काही चालणार नाही हे ओळखून तो पापपुरुष मुकाट्याने त्या आंब्याच्या झाडाच्या ढोलीत जाऊन बसला. त्याच क्षणी त्याच्या स्पर्शाने तो महाकाय वृक्ष जळून भस्मसात झाला. जमिनीवर राखेचा ढीग पडला. भृगुंच्या भीतीने तो पुरुष त्या राखेतच लपून राहिला. तेंव्हा भृगु सोमकांताला म्हणाले, “राजा, तुझ्या पापांचा प्रभाव समोरच दिसत आहे. आता तू गणेश पुराण श्रवण कर. त्यायोगे तू निष्पाप होशील, आणि हा आम्रवृक्षही पूर्वीप्रमाणे सजीव होईल.
Image credit raja biswas pinterest
त्यानंतर भृगु ऋषींनी राजाला गणेश पुराण सांगितले. गणेश पुराण हे एक उप पुराण असून त्याचे 155 अध्याय आहेत. मूळ पुराण संस्कृतात असून, आजवर बऱ्याच जणांनी त्याचे मराठीत सुलभ भाषांतर केले आहे.
त्यातील काही खालीलप्रमाणे आहेत. कोणाला जर ते amazon वरून खरेदी करायचे असल्यास खालील लिंक वरून घेऊ शकतात.
सध्या गणेश उत्सवाचा उत्साह ऐन भरात आहे. श्री गणेश हे महाराष्ट्राचे प्रमुख आराध्य दैवत आहे. त्यामुळे हे दहा दिवस साहजिकच गणेश भक्तांसाठी एक पर्वणीच असते. अशा वेळी आपण श्री गणेश पुराणातील गणेशाच्या काही गोष्टींची माहिती करून घेणे अगत्याचे राहील असे वाटते.
प्राचीन काळी नैमिषारण्यात एकदा 12 वर्षे प्रदीर्घ यज्ञसत्र चालले होते. (आजच्या संदर्भात पाहिले तर नैमिषारण्य हे लखनौ पासून 80 किमी दूर, सीतापूर जिल्ह्यात गोमती नदीच्या डाव्या किनाऱ्यावर असलेले प्रसिद्ध तीर्थ आहे. हे पूर्वीपासून ऋषींचे अत्यंत आवडते तपस्थळ आहे, मार्कंडेय पुराणात याचा अनेक वेळेला उल्लेख, 88 हजार ऋषींच्या तपस्थळी च्या रूपात आलेला आहे. या ठिकाणी आज ही भागवत पारायण इत्यादि सारखे धार्मिक कार्यक्रम वर्षभर चालू असतात.) तर प्राचीन काळी चालू असलेल्या या यज्ञसत्रात शौनकादि ऋषि हे ऋत्विज होते. त्या यज्ञात मध्यंतरात सूत मुनि सर्वांना पुराणातील गोष्टी सांगत होते. त्यावेळी जमलेल्या श्रोत्यांनी त्यांना सर्वांना पावन करणारी अशी कथा सांगायची विनंती केली. त्यावरून सूत मुनींनी सुरूवात केली.
ते म्हणाले की आज मी तुम्हाला श्री गणेशाची कथा सांगतो. अठरा पुराणांचे श्रवण तुम्ही केले आहे. आता उप पुराणांमध्ये मुख्य असलेले गणेश पुराण तुम्हाला सांगतो.
सूत सांगू लागले, श्रोतेहो, गणपती हा शिव पार्वतीचा पुत्र. त्याची सत्ता अगाध आहे. तो चराचराला अंतर्बाह्य व्यापून आहे. तोच सर्वांचा नियंता आहे. तोच सर्वांचे अधिष्ठान आहे. पंचमहाभूतें त्याच्या अधीन आहेत. विधी, हरी आणि हर हे ज्याची आज्ञेने सृष्टीचे नियंत्रण करतात, त्या गणपतीचे माहात्म्य मी काय वर्णन करणार? तथापि त्याची अल्पशी सेवा म्हणून मी त्याचे चरित्र तुम्हाला सांगणार आहे.
गणेशाचे हे परम पावन चरित्र सर्वप्रथम ब्रह्मदेवाने महर्षि व्यासांना सांगितले. त्यांनी ते भृगुला सांगितले, भृगुंनी ते सोमकांत राजाला आणि सोमकांत राजाकडून ते जनकल्याणार्थ सर्वांसाठी प्रकट झाले.
सोमकांताच्या कथेने मी गणेश पुराणाचा प्रारंभ करीत आहे.
सोमकांताची कथा
सोमकांत राजाला कुष्ठरोगाची व्याधी
सोमकांत हा एक धर्मशील राजा होता आणि त्याच्या राजवटीत प्रजा आनंदात राहत होती. त्याची तेवढीच धर्मशील पत्नी सुधर्मा नावाची होती, आणि त्यांचा एक कर्तृत्ववान पुत्र हेमकंठ हा होता.
या सोमकांत राजाला अचानक कुष्ठ रोग झाला. या दुर्धर व्याधीमुळे राजाची फार वाईट अवस्था झाली, तो जीवनाविषयी अत्यंत निराश झाला, आणि त्याने सर्वांपासून दूर, निर्जन अरण्यात जाऊन, उर्वरित काळ ईश्वरचिंतनात घालवायचा निर्णय घेतला. त्याच्या पत्नी, मुलाने आणि प्रधान इत्यादि सर्वांनी त्याला या विचारापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, पण राजाने पक्के ठरवले होते.
राजाने आपला पुत्र हेमकंठ याला राज्याभिषेक केला, आणि पत्नी आणि दोन प्रधानांसह अरण्याकडे निघाला.
भृगू ऋषींची भेट.
राजा, राणी आणि प्रधान एका निबिड अरण्यातून जात असतांना त्यांना एक स्वच्छ पाणी असलेले सरोवर लागले. त्यांनी तिथे स्नान केले आणि तेथील शीतल पाणी पिऊन, तिथेच एका झाडाखाली विश्रांती घेऊ लागले. त्यावेळी तिथे एक सुंदर तेजस्वी ऋषिकुमार त्याठिकाणी आला. राजाची पत्नी सुधर्मा हिला त्याला पाहून आनंद झाला आणि तिने आदराने त्याला बोलावले व त्याची विचारपूस केली. त्यावर ऋषि कुमाराने आपले नांव च्यवन असल्याचे सांगितले आणि आपण भृगू ऋषी आणि पुलोमा यांचा पुत्र असल्याचे सांगितले. नंतर त्या च्यवन ऋषींनी राजा आणि सर्वांची माहिती विचारली व राजाला काय झाले आहे ते विचारले. त्यावर राणीने आपले नशिबाचे भोग त्याला सांगितले. ऋषि कुमार च्यवन याने फार व्यथित झाले. च्यवन जेंव्हा परत त्यांच्या आश्रमात गेले, तेंव्हा त्याने दुःखी अंतःकरणाने आपले वडील भृगू यांना हा सर्व वृत्तान्त सांगितला. तेंव्हा भृगूंनीही करुणा युक्त अंतःकरणाने त्या सर्वांना आश्रमात घेऊन यायला सांगितले.
च्यवन ऋषि मग त्या सर्वांना आश्रमात घेऊन आले. आश्रमात गेल्यावर राजा सोमकांताने भृगू ऋषींना आपली व्यथा सांगितली. “हे ऋषि, या व्याधीचे निरसन व्हावे म्हणून मी आजपर्यंत अनेक प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही. माझ्या पूर्वपुण्याईने तुमचे दर्शन झाले आहे. मी तुमच्या शरण आहे. आता तुम्हीच मला या व्याधीतून मुक्त होण्याचा उपाय सांगा”
सोमकांताची प्रार्थना ऐकून भृगू ऋषि त्याला म्हणाले, “ राजा, पूर्व जन्मीच्या पापामुळेच तुला या व्याधीने ग्रासले आहे. आता काळजी करून नकोस. तू इथे आला आहेस तेंव्हा आता या व्याधीतून तुझी सुटका होणार याविषयी खात्री बाळग. मग ऋषींनी त्या सर्वांना उत्तम वस्त्रे देऊन, प्रेमाने पोटभर जेवू घातले आणि विश्रांती करावयास सांगितले.
सोमकांताचे पूर्वजन्मचरित्र
दुसरा दिवस उजाडल्यावर भृगू ऋषींनी, नित्याची कर्मे आटोपल्यावर सोमकांत व सुधर्मा यांना बोलावून घेतले. भृगू त्रिकालज्ञानी होते. त्यांनी राजाचे पूर्व जन्मचरित्र सांगायला सुरूवात केली. ते म्हणाले,
“ विंध्य पर्वता जवळ कोल्हार नावाचे एक रमणीय नगर होते. तेथे एक श्रीमंत वैश्य राहत असे. त्याचे नाव चिद्रूप. त्याची पत्नी सुभगा. त्यांना उशिराने एक मुलगा झाला. त्याचे नाव कामदा. तो अत्यंत देखणा होता. दोघा पती पत्नींनी त्याचे खूप लाडात संगोपन केले. तो मोठा झाल्यावर त्याचे लग्न लावून दिले. त्यांना सात मुले आणि पाच मुली अशी अपत्ये झाली. कालांतराने चिद्रूप आणि त्याची पत्नी मरण पावले.
त्यांच्यानंतर कामदा हाच त्यांच्या संपत्तीचा वारस होता. तो अत्यंत अविचारी होता. त्याने त्या संपत्तीची उधळण करायला सुरूवात केली. अनेक व्यसने करू लागला. आपल्या पत्नीचेही ऐकले नाही. त्याने आपल्या पत्नीला आणि मुलांना तिच्या माहेरी पाठवून दिले. शेवटी व्यसनापाई त्याने राहते घरही विकले. नंतरच्या काळात तो पैसे मिळविण्यासाठी चोऱ्या करू लागला. लोकांना त्रास देऊ लागला. राजाने त्याला हद्दपार केले. मग तो अरण्यात राहून वाटमाऱ्या करू लागला. यात्रेकरूंना ठार मारू लागला. त्याने आपली टोळी बनवली. अरण्यातच वाडा बांधून तो राहू लागला.
एके दिवशी एक दुर्बल ब्राह्मण त्या जंगलातून जात असतांना त्याला त्याने अडविले आणि त्याच्याकडे पैसे नसल्याने चिडून त्याला मारू लागला. त्यावर त्या ब्राह्मणाने त्याला समजावायचा प्रयत्न केला पण त्याचे काही न ऐकता कामदाने त्याचा शिरच्छेद केला.
अनेक प्रकारची पापकर्मे करून तो निर्दयी झाला होता. पुढे त्याला वृद्धत्व आले. अनेक व्याधी जडल्या. दिसेनासे झाले. कुटुंब त्याचा तिरस्कार करू लागले.
मग तो अहोरात्र पश्चात्ताप करू लागला. मग त्याने दानधर्म करायचे ठरवले. पण त्याचे दान घ्यायला कोणीच त्याच्याकडे फिरकेना. शेवटी त्याने जंगलातील एका पडीक गणेश मंदिराचा जीर्णोद्धार करायचे ठरविले. त्याने एक परिचित ब्राह्मणास बोलावून घेतले आणि त्याच्या मार्गदर्शना नुसार बरेच धन खर्च केले. लोकांच्या सोयीसाठी तेथे चार विहिरी बांधल्या. यातून उरलेले धन त्याने आपल्या मुलाबाळांना वाटून टाकले. काही कालावधीनंतर कामदा मरण पावला. यमदूतांनी भयंकर नरकात घालून त्याचे खूप हाल केले. कालांतराने त्याला यम आणि चित्रगुप्तासमोर उभे करण्यात आले. यमाने त्याला विचारले, तू आधी पुण्य भोगणार की पाप? कामदाचा जीवात्मा म्हणाला, “धर्मराज, मी आधी पूर्वजन्मातील पुण्य भोगू इच्छितो.” त्यानुसार यमाने त्याला पुण्य भोगण्यासाठी सौराष्ट्रातील देवनगरच्या राजाच्या पोटी जन्माला घातले. हे राजन, तो कामदा तूच आहेस. गणेश मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे तुला राज ऐश्वर्य प्राप्त झाले. पण पुण्यक्षय होताच दुष्कर्मांची फळें भोगण्यासाठी तुला कुष्ठरोगा सारखी महाव्याधी झाली आहे.”
पुढील भागात वाचा:
पुढील भागात, सोमकांत राजाचा आधी ऋषींवर अविश्वास, नंतर दृढ विश्वास, ऋषींचे श्री गणेशाच्या 108 नामांनी अभिमंत्रित केलेले जल राजाच्या अंगावर शिंपडणे, सोमकांता चे पापमुक्त होणे, मग भृगू ऋषींचे सोमकांत राजाला श्री गणेशाचे माहात्म्य वर्णन करणे,
त्यापुढील भागात ब्रह्मदेवाकडून व्यासांना एकाक्षरी मंत्राचा उपदेश.
आज गोकुळअष्टमी, आणि उद्या दहीहंडी. दहीहंडीच्या दिवशी मुंबईसारख्या महानगरांत आणि इतर शहरात जो ‘राजकीय’ उत्सव होतो, तो आपल्या सर्वांना चांगलाच माहिती आहे.
पण या निमित्ताने मन सहज भूतकाळात गेले, आणि साधारण 50-55 वर्षांपूर्वी गोकुळाष्टमी Gokulashtami कशी साजरी व्हायची याचा मन धांडोळा घेऊ लागले.
श्रावण लागल्यापासून एक प्रकारचे धार्मिक वातावरण आपोआपच तयार होत असे. श्रावणतील पाहिला सण- राखी पोर्णिमा होऊन गेल्यानंतर, वेध लागत ते गोकुळाष्टमीचे. Gokulashtami che. श्रावण महिन्यातील भर पावसात, रात्रीच्या अंधारात, कारागृहाच्या बंदिस्त दरवाज्यांच्या आड झालेला कृष्णजन्म- कंसाच्या भीतीने पिता वसुदेवाने त्याला रात्रीच्या अंधारात, उफाण आलेल्या यमुनेला पार करून गोकुळात घेऊन जाणे, गोकुळात यशोदेच्या पोटी जन्मलेली साक्षात आदिमाया हिला घेऊन परत मथुरेला येणे, आणि कंसाचे, प्राण भयाने त्या नवजात कोमल बालिकेला पायाला धरून दगडावर आपटणे. त्या आदिमायेचे आकाशात जाऊन कंस वधाची भविष्यवाणी वर्तवणे. या सगळ्या गोष्टी कितीही वेळेस ऐकल्या तरी प्रत्येक वेळी अंगावर काटा उभ्या केल्याशिवाय राहत नाहीत.
पण इतक्या अडचणींवर मात करून झालेला कृष्ण जन्म म्हणजे आनंदाची पर्वणीच. अशा या कृष्ण जन्मोत्सवाची आठवण म्हणून गोकुळाष्टमीच्या दिवशी (On the day of gokulashtami) कृष्ण जन्मे पर्यंत घरोघरी लहान थोर, उपवास करून त्या कृष्णाच्या आगमनाची वाट पाहत.
Image credit-Indrasut2 on Maayboli.com
त्या दिवसाची आठवण म्हणून घरोघरी, लाकडाच्या पाटावर, शेतात जाऊन आणलेल्या काळ्याशार आणि मऊसूत अशा चिकण मातीने गोकुळाची प्रतिकृति साकारली जात असे.
लहान मुले उत्साहाने आजूबाजूच्या शेतात जाऊन काळी माती गोळा करून आणत. त्या निमित्ताने काळ्या आईशी यथेच्छ खेळायला मिळत असे. अंग, कपडे, हात पाय सर्व काळ्या मातीने माखले जात. घरी आणल्यावर घरातील आई, आज्जी, इत्यादि मंडळी त्या मातीतील काडी कचरा खडे गोटे काढून ती स्वच्छ करून पाणी टाकून छान मळून देत.
घरात लाकडाचे अनेक पाट असत. त्यातील मोठयाशा पाटावर मग गोकुळ साकारायला सुरुवात होत असे. त्याला सगळ्यांचेच हात लागत. आधी चहू बाजूंनी गावाची तटबंदी आखली जात असे. मग गोकुळातील विविध गोष्टी साकारल्या जात. आणि विविध पात्रे- त्यात गोप, गोपी, पेंदया, गाई, आणि एक गाढवही असायचे आणि कुत्राही असायचा! निसर्गातील झाडे, प्राणी या सर्वाविषयी आपुलकीची भावना यात दिसून येते. त्या गोकुळात काही ठिकाणी पूतना मावशीही असायची! पिंपळाचा पार,(त्याच्यावर पिंपळाच्या झाडाची एक फांदी), तुळशी वृंदावन, जाते, उखळ, चूल, तवा. नंद बाबाचे घर, त्या घरातील एक पाळणा, आणि त्या पाळण्यात, एक पिंपळाचे पान आणि/ किंवा एक छान मऊसूत रंगीत कपडा अंथरूण त्यावर बाळ कृष्णाची स्वारी!
Image credit- Anuradha Tambolkar-You Tube channel
या सगळ्या गोष्टी बनवतांना घरातील सगळ्यांच्या कलात्मकतेला, सृजनात्मकतेला आणि कल्पनाशक्तीला किती वाव मिळत असेल कल्पना करा. आणि घरातील लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांची त्यात involvement असे. सगळ्या घरात उत्साहाचे वातावरण असे. बाळकृष्णाला नैवेद्य म्हणून सुंठ साखरेचे मिश्रण तयार केले जाई. काही ठिकाणी डिंकाचा लाडूही नैवेद्याला केला जाई. या पावसाळ्याच्या दिवसात थंडीमुळे होणारे उपद्रव टाळण्यासाठी सुंठ आणि साखरेची योजना किती योग्य वाटते! वरील गोकुळातील पात्रांना सजविण्यासाठी ज्वारीचे दाणे वापरले जात. तसेच तुळशी वृंदावनावर छोटीशी तुळस ठेवली जाई. नंद बाबाच्या घरी भाकऱ्यांची चळत, लोण्याचे भांडेही साकारले जाई. ठिकठिकाणी गोकर्णाची निळी फुले आणि इतर त्या ऋतुतील फुले ठेवून गोकुळ सजवले जाई. आणि मग संध्याकाळी, सर्वजण जमून कृष्णजन्म साजरा करीत, कृष्णाचा पाळणा म्हटला जाई
गोकुळाष्टमी-(Gokulashtami)- कीर्तन
गावातील मंदिरात कीर्तनकार कृष्णजन्माची कथा रंगवून रंगवून सांगत. मंदिरातही कृष्णाला पाळण्यात ठेवून, कृष्ण जन्म साजरा केला जाई. आणि त्यावेळी मिळणारा प्रसाद- सुंठ, खोबरे, खसखस, खडीसाखर इत्यादिचे मिश्रण (याला उत्तरेकडे पंजिरी म्हणतात) अगदी अप्रतिम लागत असे.
मग दुसऱ्या दिवशी दुपारपासून दहीहंडीची धूम सुरू होत असे. पण दहीहंडीला आजच्या सारखे अक्राळ विक्राळ स्वरूप प्राप्त झाले नव्हते. तो एक मर्यादित कार्यक्रम असे. मंदिरातही दहीहंडी होत असे. तिथे घराघरातून लोक गोपाळकाल्यासाठी पदार्थ घेऊन येत. त्यात भिजवलेले पोहे, ज्वारीच्या लाहया,कैरीचे आणि लिंबाचे लोणचे, काकडी, डाळिंब, पेरूच्या फोडी, भिजवलेली चण्याची डाळ, दही, इत्यादि साहित्य सगळ्यांच्या घरातून आलेले, निरनिराळ्या चवीचे साहित्य एका मोठ्या भांड्यात एकत्र केल्यानंतर जी अप्रतिम चव तयार होते, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. (आजच्या न्यूट्रिशन च्या दृष्टीने पाहिले तर यात पौष्टिक आणि पाचक पदार्थ एकत्र केल्याचे दिसून येते.)मंदिरातील दहीहंडी छोट्या प्रमाणावर असे, आणि हा एकत्र केलेला गोपालकाला त्या हंडीत ठेवला जाई, आणि हंडी फोडल्यावर त्यातील काही कण आपल्याला मिळावे म्हणून सगळ्यांची झुंबड उडत असे. अर्थात नंतर सगळ्यांना तो मोठ्या पातेल्यातील एकत्र केलेला काला द्रोणात भरून दिला जाई. आणि तो लोक घरी घेऊन जात आणि घरातील इतर सदस्यांना देत.
चौकाचौकात जो दहीहंडी चा कार्यक्रम होई, त्याची मजा लोक आजूबाजूच्या घरांच्या गॅलऱ्यांमधून घेत. त्या परिसरातील सधन लोक काही बक्षिस ठेवत. पण हा सर्व कार्यक्रम एका मर्यादेत होता. त्याला बाजारू स्वरूप आले नव्हते.
विदर्भातील गोकुळाष्टमी
विदर्भात गोकुळाष्टमीला कानोबा म्हणतात. गणपतीला करतात तशी आरास करून कृष्णाची मूर्ती बनवतात. फुलोरा ही करतात. सकाळी मूर्तीची स्थापना करतात. त्या दिवशी कुटुंबातील मोठ्या माणसांना उपवास यसतो. दुपारपर्यंत मूर्तीची स्थापना होते. त्या दिवशी रात्री बारापर्यंत जागरण करतात. पूर्वी कृष्णलीलेवर छोटेखानी नाटक सुद्धा बसवत. भरगच्च कार्यक्रम असत. रात्री बरोबर बारा वाजता फुलोरा हलतांना कोणाला तरी दिसायचा. त्यानंतर जन्मोत्सव, आरत्या वगैरे रात्री 2 पर्यन्त चालायचे. दुसऱ्या दिवशी सर्वांना घरी जेवायला बोलावत. संध्याकाळी मूर्तीचे वाजत गाजत विसर्जन करीत. (विदर्भातील माहिती ग्रुप मधील बान्ते कुटुंबीयांनी पुरविली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद)
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने शाळेतल्या कार्यक्रमात ‘राधा’ म्हणून जायला सजलेली माझी नात- श्रीशा
आजकाल कित्येक दिवस आधी वर्गणी करून केले जाणारे कार्यक्रम, अशा कार्यक्रमांत समाजातील तथाकथित ‘दादा’ आणि ‘भाईंचा’ सहभाग, विविध राजकीय पक्षांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग, डीजेचा कर्कश दणडणाट या सर्व पार्श्वभूमीवर, आठवणीतील साधेसुधे पण निसर्गाशी जवळीक सांगणारे, माणसामाणसांतील नाती जपणारे त्या काळातील सण उत्सव आठवले की असे वाटते, की ते दिवस आता पुन्हा कधी येणार नाही!