https://goodworld.in A website by Madhav Bhope

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-5

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-5

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-3   वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-4    वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

मागील भागावरून पुढे चालू 

याठिकाणी, अहंकार, हा शब्द, आपला consciousness, अशा अर्थाने लक्षात घ्यायला हवा. गीतेत अहंकार हा शब्द ५ ठिकाणी आला आहे. त्यातील पाहिला उल्लेख, ७ व्या अध्यायात, चौथ्या श्लोकात आलेला आहे.

भूमिरापोऽनलो वायु: खं मनो बुद्धिरेव च |
अहङ्कार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा||

 भूमि, आप, तेज, वायू, आकाश, ही पंचमहाभूतें, आणि मन बुद्धि आणि अहंकार, या आठ प्रकारांने विभाजित असलेली ही माझी ‘अपरा’ म्हणजे जड प्रकृती आहे.

तसेंच १३ व्या अध्यायात, ५ व्या श्लोकात,

महाभूतान्यङ्ककारो बुद्धिरव्यक्त मेव च |

इन्द्रियाणि दशैकं च पञ्च चेन्द्रियगोचरा: ||

 क्षेत्र क्षेत्रज्ञ योगा मध्ये, क्षेत्राच्या वर्णनात वरील श्लोक आला आहे, पाच महाभूतें, अहंकार, बुद्धि, आणि ‘अव्यक्तम्’ एव, म्हणजे मूल प्रकृति सुद्धा, दहा इंद्रियें, एकम् म्हणजे एक ‘मन’ आणि पञ्च इन्द्रिय गोचरा, म्हणजे पाच इंद्रियांचे विषय, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे क्षेत्र आहेत असे सांगितले आहे.

मनुष्याचे उद्दिष्ट जरी, सत्व रज, तम या तीन्ही गुणांच्या पलीकडे जाण्याचे असले, आणि मन, बुद्धि आणि अहंकार यांच्या अतीत असलेले तत्व जाणून घेण्याचे असले, तरी, जो पर्यंत ते उद्दिष्ट प्राप्त होत नाही, तोपर्यंत, ही सर्व ‘instruments’ सुस्थितीत रहावीत हीच प्रार्थना देवीकडे केली आहे.

आपण नेहमी वापरतो त्या अर्थाने अहंकार हा शब्द, किंवा त्याचे रूप, गीतेच्या  खालील श्लोकांमध्ये आले आहे, ते जिज्ञासूंनी पाहावे. (अध्याय- श्लोक)

१६-१८; १८-१७;, १८- ५८,५९.

आपण ४२ व्या श्लोकापर्यंत अर्थ पाहिला. देवी कवच एकूण ५६ श्लोकांचे आहे. उर्वरित १४ श्लोकांबद्दल थोडक्यात पाहू.

पदमेकं न गच्छेतु यदीच्छेच्छुभमात्मनः।
कवचेनावृतो नित्यं यत्र यत्रैव गच्छति॥43

 

मनुष्य आपले शुभ इच्छित असेल तर कवचाशिवाय एक पाऊल ही पुढे टाकू नये. (या स्तोत्राचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हा श्लोक आहे असे वाटते.)

तत्र तत्रार्थलाभश्च विजयः सार्वकामिकः।
यं यं चिन्तयते कामं तं तं प्राप्नोति निश्चितम्‌।

परमैश्वर्यमतुलं प्राप्स्यते भूतले पुमान्‌॥44

 

कवचाने सुरक्षित मनुष्य जिथे जिथे जाईल तिथे तिथे त्याला धन प्राप्ति होईल आणि पूर्ण कामनांची सिद्धि करवणाऱ्या विजयाची प्राप्ति होईल. तो ज्या ज्या अभीष्ट वस्तूचे चिन्तन करेल त्या त्या वस्तूची त्याला निश्चित प्राप्ति होईल. तो पुरुष या पृथ्वीवर तुलनारहित महान ऐश्वर्य प्राप्त करील.

निर्भयो जायते मर्त्यः संग्रामेष्वपराजितः।

त्रैलोक्ये तु भवेत्पूज्यः कवचेनावृतः पुमान्‌॥45

 

कवचाने सुरक्षित मनुष्य निर्भय होतो. युद्धात त्याचा पराजय होत नाही आणि तो तीन्ही लोकांत पूजनीय होतो.

इदं तु देव्याः कवचं देवानामपि दुर्लभम्‌।
यः पठेत्प्रयतो नित्यं त्रिसन्ध्यं श्रद्धयान्वितः॥46

 

देवीचे हे कवच, देवांनाही दुर्लभ आहे. जो रोज नियमपूर्वक तीन्ही संधीकाळी (सकाळ, दुपार, संध्याकाळ) श्रद्धेने या स्तोत्राचा पाठ करतो,

दैवी कला भवेत्तस्य त्रैलोक्येष्वपराजितः।
जीवेद् वर्षशतं साग्रमपमृत्युविवर्जितः॥47

 

त्याला दैवी कला प्राप्त होते, आणि तो तीन्ही लोकांमध्ये कधीही पराजित होत नाही. तो अपमृत्यू पासून रहित होतो, आणि शताधिक वर्षेंपर्यंत जीवित राहतो.

नश्यन्ति व्याधयः सर्वे लूताविस्फोटकादयः।
स्थावरं जंगमं चैव कृत्रिमं चापि यद्विषम्‌॥48

 

(लूत आणि विस्फोटक हे व्याधींचे प्रकार आहेत) या व्याधी नष्ट होतात त्याच्यावर, स्थावर, जंगम आणि कृत्रिम विषाचा काहीही परिणाम होत नाही. [कण्हेर, भांग, अफू, धत्तुरा, आदींचे ‘स्थावर’ विष म्हटले जाते. साप, विंचू इत्यादि विषारी प्राणी चावल्यामुळे चढलेले म्हणजे, ‘जंगम’ विष, आणि, अहिफेन (अफू) आणि तेल यांच्या संयोगाने किंवा, तत्सम विविध वस्तूंच्या संयोगाने बनलेले कृत्रिम विष]


अभिचाराणि सर्वाणि मन्त्रयन्त्राणि भूतले।
भूचराः खेचराश्चैव जलजाश्चोपदेशिकाः॥49

 

या पृथ्वीतलावर मारण, मोहन आदि जितके अभिचार प्रयोग आहेत, तसेंच अशा प्रकारचे जितकेही मंत्र यंत्र आहेत, ते सर्व, या कवचाला हृदयात धारण केल्याने त्या मनुष्याला पाहताच नष्ट होतात. पृथ्वीवर विचरणारे ग्रामदेवता, आकाशचारी देवविशेष, जलदेवता, उपदेश मात्राने सिद्ध होणारे निम्न कोटीचे देवता,

 

सहजा कुलजा माला डाकिनी शाकिनी तथा।
अन्तरिक्षचरा घोरा डाकिन्यश्च महाबलाः॥50

 

ग्रहभूतपिशाचाश्च यक्षगन्धर्वराक्षसाः।
ब्रह्मराक्षसवेतालाः कूष्माण्डा भैरवादयः॥51

 

नश्यन्ति दर्शनात्तस्य कवचे हृदि संस्थिते।
मानोन्नतिर्भवेद् राज्ञस्तेजोवृद्धिकरं परम्‌॥52

 

आपल्या जन्माच्या बरोबर प्रकट होणारे देवता (सहजा) कुलदेवता, माला (कंठमाला इत्यादि), डाकिनी, शाकिनी, अंतरिक्षामध्ये विचरणाऱ्या घोर डाकिनी, ग्रह, भूत, पिशाच, यक्ष, राक्षस, गंधर्व, ब्रम्हराक्षस, वेताळ, कूष्मांड आणि भैरव आदि अनिष्टकारक देवता सुद्धा हे कवच हृदयात धारण केलेल्या मनुष्याला पाहूनच पळून जातात. कवचधारी पुरुषाला राजासमान वृद्धि प्राप्त होते.

(वरील विवरणात दिलेल्या ‘कुलदेवता’ या शब्दाचा आपापल्या कुलदेवते सोबत गल्लत करू नये. वरील सर्व क्षुद्र देवता म्हणवल्या जातात, आणि निरनिराळ्या योनितल्या देवता आहेत, ज्या की त्या त्या पातळीवर exist होतात.)

यशसा वर्धते सोऽपि कीर्तिमण्डितभूतले।

जपेत्सप्तशतीं चण्डीं कृत्वा तु कवचं पुरा॥53

यावद्भूमण्डलं धत्ते सशैलवनकाननम्‌।
तावत्तिष्ठति मेदिन्यां संततिः पुत्रपौत्रिकी॥54

 

कवचाचा पाठ करणारा पुरुष आपल्या कीर्तीने विभूषित भूतलावर सुयशासाहित वृद्धीला प्राप्त होतो. जो प्रथम कवचाचा पाठ करून मग सप्तशतीचा चण्डी पाठ करतो तो, जोपर्यन्त वन, पर्वत, आणि काननासाहित ही पृथ्वी टिकून रहाते, तोपर्यंत त्याची पुत्र, पौत्र आदि संतान परंपरा कायम राहते.

देहान्ते परमं स्थानं यत्सुरैरपि दुर्लभम्‌।
प्राप्नोति पुरुषो नित्यं महामायाप्रसादतः॥55

 

नंतर, देहाचा अंत होतो, तेंव्हा, तो पुरुष भगवती महामायेच्या प्रसादाने त्या नित्य परम पदाला प्राप्त होतो, जे की देवांलाही दुर्लभ आहे.

लभते परमं रूपं शिवेन सह मोदते॥ॐ॥56

तो सुंदर दिव्य रूप धारण करतो आणि शिवासहित आनंदाचा भागीदार होतो.

आजकालच्या मनोविज्ञानात सकारात्मक विचारांचे महत्व अधोरेखित केलेले आहे. आपली संस्कृति पाहिली, तर पावलोपावली, मनाला नकारात्मक विचारांपासून परावृत्त करून  सकारात्मक विचारांकडे जाणीवपूर्वक घेऊन जाण्याचा प्रयत्न दिसतो, जो की खूप महत्त्वाचा आहे. आजकाल आपल्या अवतीभोवती सगळीकडे आसुरी विचार आणि आचार बोकाळलेले दिसतात, आणि तेच कसे नॉर्मल आहेत असे उदात्तीकरण केले जाते. अशा काळात, अशा मंगल आणि सकारात्मक विचारांनी भरलेल्या आपल्या पुरातन ठेव्याचे आपण जतन केले पाहिजे असे प्रकर्षाने वाटते.  

ॐ शांतिः शांतिः शांतिः!

माधव भोपे

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-3

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-3

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

मागील भागावरून पुढे चालू 

आता आपण  १७ व्या श्लोकापासून ते ४२ व्या श्लोकापर्यंत जे देवी कवच आहे, त्याची विशेषता पाहू:

त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनी ।

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥१७॥

दक्षिणेऽवतु वाराही नैर्ऋत्यां खड्गधारिणी।

प्रतीच्यां वारुणी रक्षेद् वायव्यां मृगवाहिनी॥१८॥

उदीच्यां पातु कौमारी ऐशान्यां शूलधारिणी।

ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेदधस्ताद् वैष्णवी तथा ॥१९॥

एवं दश दिशो रक्षेच्चामुण्डा शववाहना।

जया में चाग्रतः पातु विजया पातु पृष्ठतः॥२०॥

अजिता वामपार्श्वे तु दक्षिणे चापराजिता।

शिखामुद्योतिनी रक्षेदुमा मूर्ध्नि व्यवस्थिता॥२१॥

मालाधारी ललाटे च भ्रुवौ रक्षेद् यशस्विनी।

त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके॥२२॥

शंखिनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोर्द्वारवासिनी।

कपोलौ कालिका रक्षेत्कर्णमूले तु शांकरी॥२३॥

नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका।

अधरे चामृतकला जिह्वायां च सरस्वती॥२४॥

दन्तान्‌ रक्षतु कौमारी कण्ठदेशे तु चण्डिका।

घण्टिकां चित्रघण्टा च महामाया च तालुके॥२५॥

कामाक्षी चिबुकं रक्षेद् वाचं मे सर्वमंगला।

ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी॥२६॥

नीलग्रीवा बहिःकण्ठे नलिकां नलकूबरी।

स्कन्धयोः खड्गिनी रक्षेद् बाहू में व्रजधारिणी॥२७॥

हस्तयोर्दण्डिनी रक्षेदम्बिका चांगुलीषु च।

नखाञ्छूलेश्वरी रक्षेत्कुक्षौ रक्षेत्कुलेश्वरी॥२८॥

स्तनौ रक्षेन्महादेवी मनः शोकविनाशिनी।

हृदये ललिता देवी उदरे शूलधारिणी॥२९॥

नाभौ च कामिनी रक्षेद् गुह्यं गुह्येश्वरी तथा।

पूतना कामिका मेढ्रं गुदे महिषवाहिनी॥३०॥

कट्यां भगवती रक्षेज्जानुनी विन्ध्यवासिनी।

जंघे महाबला रक्षेत्सर्वकामप्रदायिनी॥३१॥

गुल्फयोर्नारसिंही च पादपृष्ठे तु तैजसी।

पादांगुलीषु श्री रक्षेत्पादाधस्तलवासिनी॥३२॥

नखान्‌ दंष्ट्राकराली च केशांश्चैवोर्ध्वकेशिनी।

रोमकूपेषु कौबेरी त्वचं वागीश्वरी तथा॥३३॥

रक्तमज्जावसामांसान्यस्थिमेदांसि पार्वती।

अन्त्राणि कालरात्रिश्च पित्तं च मुकुटेश्वरी॥३४॥

पद्मावती पद्मकोशे कफे चूडामणिस्तथा।

ज्वालामुखी नखज्वालामभेद्या सर्वसंधिषु॥३५॥

शुक्रं ब्रह्माणि मे रक्षेच्छायां छत्रेश्वरी तथा।

अहंकारं मनो बुद्धिं रक्षेन्मे धर्मधारिणी॥३६॥

प्राणापानौ तथा व्यानमुदानं च समानकम्‌।

वज्रहस्ता च मे रक्षेत्प्राणं कल्याणशोभना॥३७॥

रसे रूपे च गन्धे च शब्दे स्पर्शे च योगिनी।

सत्त्वं रजस्तमश्चैव रक्षेन्नारायणी सदा॥३८॥

आयू रक्षतु वाराही धर्मं रक्षतु वैष्णवी।

यशः कीर्तिं च लक्ष्मीं च धनं विद्यां च चक्रिणी॥३९॥

गोत्रमिन्द्राणि मे रक्षेत्पशून्मे रक्ष चण्डिके।

पुत्रान्‌ रक्षेन्महालक्ष्मीर्भार्यां रक्षतु भैरवी॥४०॥

पन्थानं सुपथा रक्षेन्मार्गं क्षेमकरी तथा।

राजद्वारे महालक्ष्मीर्विजया सर्वतः स्थिता॥४१॥

रक्षाहीनं तु यत्स्थानं वर्जितं कवचेन तु।

तत्सर्वं रक्ष मे देवि जयन्ती पापनाशिनी॥४२॥

यात प्रथम सर्व दिशांचा उल्लेख असून दाही दिशांना देवी माझे रक्षण करो, अशी प्रार्थना आहे. तसेच, मागून पुढून, डाव्या, उजव्या बाजूकडून रक्षण करो. तद्नंतर, शेंडी पासून सर्व अवयवांचे रक्षण करण्याविषयी तपशीलवार आले आहे. शेंडी, मस्तक, ललाट (कपाळ), भुवया, भ्रुवोर्मध्य, दोन्ही डोळ्यांचा मध्य, नाकपुड्या, कान, कपोल(म्हणजे गाल), कानाचे मूळ (कर्णमूळ), नाक, वरचा ओठ, खालचा ओठ, दात, कन्ठ, गळ्याची घाटी, तालु, चिबुक म्हणजे हनुवटी, बोलण्याची शक्ति म्हणजे वाणी, कण्ठाचा बाहेरील भाग, कण्ठनळी, दोन्ही खांदे, दोन्ही दंड, दोन्ही हात, त्यांची बोटें,  आणि नखें, पोट, दोन्ही स्तन, हृदय, उदार, नाभी, गुह्यभाग, (मेढ्र)लिङ्ग, गुदा, कटिभाग, गुडघे(जानुनी विन्ध्यवासिनी), दोन्ही जंघा (म्हणजे मराठीत पोटऱ्या), गुल्फ म्हणजे पायाचे घोटे ज्याला इंग्लिश मध्ये ankle म्हणतात. पायांचा पृष्ठ भाग, पायांची बोटें, पायांचे तळवे,  नखें, केश, रोमकूप म्हणजे शरीरावरील रोमावली. त्वचा,

रक्त, मज्जा, वसा, मांस, हाडे, मेद; आंत (आंतडे), 

एवढेच नव्हे, तर, शरीरातील पित्त, कफ, नखांचे तेज, शरीरातील समस्त संधि,

वीर्य, छाया (सावली), प्राण अपान इत्यादि पंचप्राण, अहंकार, मन बुद्धि

एवढेच नाही, तर रस, रूप, गंध, शब्द आणि स्पर्श या विषयांचा अनुभव, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण,

आयु,

धर्म, यश, कीर्ति, लक्ष्मी, धन, विद्या

वरील सर्व गोष्टी स्वतः च्या संदर्भातील झाल्या,

आता त्यानंतर, गोत्र, पशु, पुत्र, पत्नी यांचे रक्षण करण्याविषयी प्रार्थना आहे

राजाच्या दरबारात तसेच सर्व भयापासून रक्षण करण्याविषयी प्रार्थना आहे.

एवढे कमी आहे की काय, म्हणून शेवटी असे म्हटले आहे, की वरील वर्णनात जर एखादे स्थान राहून गेले असेल तर त्याचे ही रक्षण कर.

इतका comprehensive विचार केला आहे, हे बघून मन थक्क होते.

क्रमशः

माधव भोपे 

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-4

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-4

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-3   वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

मागील भागावरून पुढे चालू 

१७ व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीपासून कवच सुरु होते.

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥17॥

पूर्व दिशेला ऐन्द्री (इंद्र शक्ति), तू माझे रक्षण कर. आग्नेय दिशेला अग्निशक्ति तू माझे रक्षण कर.

आठ दिशांची माहिती आपणा सर्वांना आहेच. तरीही, उजळणीसाठी आपण अष्टदिशांचे चित्र पाहू

Durgadevi kavach

देवी कवचामध्ये पूर्व दिशेपासून सुरुवात करून, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य अशाप्रकारे क्रमाने सर्व दिशांनी ती देवी माझे रक्षण करो अशी प्रार्थना केलेली आहे. वरील आठ दिशांच्या शिवाय, ऊर्ध्व आणि अध अर्थात वर आणि  खाली या प्रकारे १० दिशा झाल्या. म्हणून एवं दश दिशो रक्षेच्चामुण्डा शववाहना।

याशिवाय, पुढे, मागे, डावीकडे आणि उजवीकडे:–अग्रतः म्हणजे पुढे, आणि  पृष्ठतः म्हणजे मागे, जया आणि विजया देवी माझे रक्षण करोत. डाव्या बाजूला अजिता आणि दक्षिण म्हणजे उजव्या बाजूला अपराजिता माझे रक्षण करो. १७ ते ४२ या श्लोकांत विविध अंगांचे आणि संकल्पनांचे रक्षण करण्याविषयी देवीची विविध नांवे घेऊन प्रार्थना केली आहे.

कवचामध्ये उल्लेख केलेले विविध अवयव आणि त्यांचे रक्षण करणाऱ्या विविध देवतांची माहिती बघूयात

1

शिखा (शेंडी)

उद्योतिनी

2

मूर्ध्नि (मस्तक भाग)

उमा

3

ललाट (कपाळ)

मालाधरी

4

भुवया

यशस्विनी

5

भ्रूमध्य

त्रिनेत्रा

6

नाकपुड्या (नासिका)

यमघण्टा

7

दोन्ही डोळ्यांचा मध्यभाग

शङ्खिनी

8

श्रोत्र (कान)

द्वारवासिनी

9

कपोल (गाल)

कालिका

10

कर्णमूल

शांकरी

11

नासिका (नाक): इथे नाकपुड्या आणि नाक हे दोन वेगवेगळे कल्पिले आहेत)

सुगन्धा

12

उत्तरोष्ठ(वरील ओठ)

चर्चिकादेवी

13

अधरोष्ठ(खालचा ओठ)

अमृतकला

14

जिंव्हा

सरस्वती

15

दात

कौमारी

16

कण्ठप्रदेश

चण्डिका

17

घण्टिका (गळ्याची घाटी)

चित्रघण्टा

18

तालुका (टाळू)

महामाया

19

चिबुक (हनुवटी)

कामाक्षी

20

वाचा

सर्वमङ्गला

21

ग्रीवा (गळा)

भद्रकाली

22

पृष्ठवन्श(मेरुदण्ड्)

धनुर्धरी

23

बहिः कण्ठ(कण्ठाचा बाहेरील भाग)

नीलग्रीवा

24

नलिका(कण्ठनळी)

नलकूबरी

25

स्कन्धयोः (दोन्ही खांदे)

खड्गिनी

26

दोन्ही बाहू म्हणजे दण्ड

वज्रधारिणी

27

दोन्ही हात

दण्डिनी

28

अङ्गुली(हाताची बोटें)

अम्बिका

29

नखें

शूलेश्वरि

30

कुक्षि (कोख, उदर) पहा: वामकुक्षी

कुलेश्वरी

31

स्तन

महालक्ष्मी

32

मन

शोकविनाशिनी

33

हृदय

ललितादेवी

34

उदर

शूलधारिणी

35

नाभि

कामिनी

36

गुह्य

गुह्येश्वरी

37

मेढ्र(लिंग)

पूतना आणि कामिका

38

गुदा

महिषवाहिनी

39

कटी (कंबर)

भगवती

40

जानु (गुडघे)

विन्ध्यवासिनी

41

जंघा(म्हणजे पोटऱ्या)

महाबला, सर्व कामना पूर्ण करणारी

42

गुल्फ(पायाचे घोटे)

नारसिंही

43

पादपृष्ठ(पायांचा वरचा भाग)

तैजसी

44

पायाची बोटें

श्री देवी

45

पायाचे तळवे

तलवासिनी

46

नखें(पायाची)

दंष्ट्राकराली

47

केश

ऊर्ध्वकेशिनी

48

रोमकूप अर्थात, शरीरावरील रोमछिद्र

कौबेरी

49

त्वचा

वागीश्वरी

50

रक्त, मज्जा, वसा,मांस, अस्थि, मेद

सप्त धातूंपैकी सहा धातू: रक्त-blood, मज्जा- bone marrow and nervous tissue,

वसा-म्हणजे रक्तामध्ये स्थित स्नेह (ज्याला आजकालच्या भाषेत fatty acid म्हणता येईल), मांस म्हणजे स्नायू म्हणता येईल, अस्थि म्हणजे हाडें, आणि मेद म्हणजे चरबी किंवा fat. वरील सर्व गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत हे ओघानेच आले.

पार्वति

51

अंत्र म्हणजे आतडे किंवा gut.

कालरात्री

52

पित्त (शरीरात अन्न पचविण्यासाठी पित्त आवश्यक आहे) म्हणजेच वेगवेगळे पाचक रस.

मुकुटेश्वरी

53

पद्मकोश म्हणजे मूलाधार आदि कमलकोश

पद्मावती

54

कफ (कफ म्हणजे आपण समजतो तसा चिकट पदार्थ नव्हे, आयुर्वेदात कफ संकल्पना वेगळी आहे)

चूडामणी

55

नखांचे तेज

ज्वालामुखी

56

शरीरातील समस्त संधि (सांधे)

अभेद्या (जिचे भेदन कोणतेही अस्त्र करू शकत नाही)

57

शुक्र

ब्रह्माणी

58

छाया

छात्रेश्वरी

59

अहंकार, मन, बुद्धि

धर्मधारिणी

60

प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंचप्राण

वज्रहस्ता

61

प्राण

कल्याण शोभना

62

रस, रूप, गन्ध, शब्द, स्पर्श, हे पाच विषय ग्रहण करतांना

योगिनी

63

सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण

नारायणी

64

आयुष्य

वाराही

65

धर्म

वैष्णवी

66

यश, कीर्ति, लक्ष्मी, धन, विद्या

चक्रिणी

67

गोत्र

इंद्राणी

68

पशू

चंडिका

69

पुत्राचे रक्षण

महालक्ष्मी

70

भार्येचे रक्षण

भैरवी

71

पंथ (अर्थात, while travelling)

सुपथा

72

मार्ग

क्षेमकरी

73

राजाच्या दरबारी

महालक्ष्मी

74

सर्व ठिकाणी

विजया

आपल्याकडे सर्व देवांची कवचें प्रसिध्द आहेत. रामरक्षा हेही एक प्रकारचे कवच आहे, आणि   डोक्यापासून ते पायापर्यंत च्या अवयवांचा उल्लेख आहे. आपल्यापैकी काहींनी योगनिद्रेचा class कधी केला असेल. त्यामध्ये, शरीराच्या एकेक अवयवांवर आपला consciousness घेऊन जाऊन, शरीराचा तो तो भाग शिथिल होत आहे, अशी कल्पना करायची असते.

देवी कवचामध्ये आपल्या शरीराचे बाह्यभाग, आणि बरेच अंतर-अवयव यांच्या कडे आपले ध्यान  (consciousness) घेऊन जाऊन, त्या त्या भागांना, किंवा, अंतर्गत अवयवांना, देवीच्या एकेक नावाशी, रूपाशी, जोडले आहे, आणि त्या त्या भागाचे रक्षण करण्याची प्रार्थना केली आहे. या कवचात स्थूल अवयवांसोबत काही सूक्ष्म गोष्टी, आणि काही concepts ही जोडले आहेत. त्यातील, सत्व, रज आणि तम हे गुण, रस, रूप, गन्ध, शब्द, स्पर्श, हे पाच विषय ग्रहण करणारी इंद्रियें. (बाह्य इंद्रियें नव्हे, तर त्या त्या संवेदना जाणवणारी मेंदूतील centres), यांचा उल्लेख आहे.

वरील सर्व गोष्टी लक्षात येऊ शकतात. तसेच, मन आणि बुद्धि यांचे रक्षण कर, हेही लक्षात येऊ शकते. पण अहंकार? आपल्या मनात कदाचित अशी शंका येऊ शकते, की माझ्या अहंकाराचे रक्षण कर, असे कसे म्हटले जाऊ शकते? कारण अहंकार हा शब्द आपल्याकडे सहसा तो मनुष्य फार अहंकारी आहे, म्हणजे गर्विष्ठ आहे, अशा अर्थाने वापरला जातो. अहंकाराचा त्याग करा, असेच सर्व ठिकाणी सांगितल्याचे ऐकायला, वाचायला, येते. मग अहंकाराचे रक्षण कर असे कसे?

याबद्दल वाचूयात पुढील भागात 

क्रमशः

माधव भोपे 

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-2

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-2

मागील लेखावरून पुढे चालू 

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ, जो की देवी माहात्म्य या नावानेही ओळखला जातो, याच्यात एकूण १३ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. ७०० श्लोक असल्यामुळेही याला सप्तशती असे म्हणतात. (श्रीमद्भग्वद्गीते मध्येही ७०० श्लोक आहेत.) हे ७०० श्लोक म्हणजे मार्कंडेय पुराणामधील अध्याय ८१ ते ९३ आहेत. आपल्याकडे १८ पुराणे आहेत. भागवत पुराण, विष्णू पुराण, नारदीय पुराण, वामन पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्म पुराण, भविष्य पुराण, अग्नि पुराण, ब्रम्ह्वैवर्त पुराण, ब्रम्हानंद पुराण, पद्म पुराण, शिव पुराण, लिंग पुराण, कूर्म पुराण, मार्कंडेय पुराण, वराह पुराण आणि स्कंद पुराण या १८ पुराणांपैकी १६ वे हे  मार्कंडेय पुराण आहे.

देवी कवच ही मार्कंडेय पुराणाचाच भाग आहे. आणि ग्रंथ वाचकाच्या अंग प्रत्यंगांचे रक्षण करण्याचे काम करते.

श्री दुर्गा सप्तशतीच्या १३ अध्यायांमध्ये खालील प्रमाणे वर्णन आहे.

अध्याय

श्लोक

वर्णन

१०४

मधुकैटभ वध

६९

महिषासुर सेना वध

४४

महिषासुर वध

४२

देवतांकडून देवीची स्तुती

१२९

देवतांकडून देवीची स्तुती आणि चण्ड मुण्ड देवीला शुम्भ निशुम्भा चा निरोप

२४

धूम्रलोचन वध

२७

चण्ड मुण्ड वध

8

६३

रक्तबीज वध

४१

निशुम्भ वध

१०

३२

शुम्भ वध

११

५५

देवी स्तुति- वरदान

१२

४१

पाठ माहात्म्य

१३

२९

सुरथ आणि वैश्याला इच्छित वर प्राप्ति

एकूण

७००

 

आता आपण देवी कवचा च्या पुढील काही श्लोकांचा अर्थ पाहू.

अग्निना दह्यमानस्तु शत्रुमध्ये गतो रणे।

विषमे दुर्गमे चैव भयार्ताः शरणं गताः॥6॥

न तेषां जायते किंचिदशुभं रणसंकटे।

नापदं तस्य पश्यामि शोकदुःखभयं न हि॥7॥

यैस्तु भक्त्या स्मृता नूनं तेषां वृद्धिः प्रजायते।

ये त्वां स्मरन्ति देवेशि रक्षसे तान्न संशयः॥8॥

प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना।

ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना॥9॥

माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना।

लक्ष्मीः पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया॥10॥

श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना।

ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता॥11॥

श्लोक ६-७:  जो मनुष्य अग्नीत जळत असेल, रणभूमी मध्ये शत्रूंनी घेरला गेला असेल, विषम संकटामध्ये सापडला असेल, आणि अशा प्रकारे भयाने आतुर होऊन देवीला शरण आला असेल, त्याचे काहीही अशुभ (अमंगल) होत नाही; युद्धाच्या संकटामध्येही त्याच्यावर कोणतीही विपत्ति येत नाही, त्याला शोक, दुःख आणि भय प्राप्त होत नाही.

वरील विपत्तींना वाच्यार्थाने न घेता, लक्ष्यार्थाने घ्यावे. कारण वरील प्रकारच्या विपत्ति आजकालच्या कालात येणे दुर्मिळ असले, तरी, तत्सम प्रसंग मात्र मनुष्याच्या आयुष्यात नित्यच येत असतात.

श्लोक ८: ज्यांनी भक्तिपूर्वक देवीचे स्मरण केले आहे, त्यांचा नक्कीच अभ्युदय (वृद्धिः) होतो. हे देवेश्वरी, जे तुझे चिन्तन करतात, त्यांचे तू निःसंदेह रक्षण करतेस.

 आता खालील ९ ते ११ या श्लोकांमध्ये योगशक्तीने संपन्न देवीच्या विविध रूपांचे वर्णन आहे.

प्रेतसंस्था तु चामुण्डा:  सप्तशतीच्या ७व्या अध्यायात चण्ड आणि मुण्ड राक्षसांच्या वधाचे वर्णन आहे.

 सहाव्या अध्यायात शुम्भ निशुम्भाने पाठविलेल्या धूम्रलोचन राक्षसाचा देवीने वध केल्यानंतर, शुम्भ निशुम्भ यांनी, चण्ड आणि मुण्ड या दोन महादैत्यांना देवीचे केस धरून ओढत आणण्याची आज्ञा केली.

 सातव्या अध्यायात चण्ड आणि मुण्ड देवीला ओढत न्यायला आले असतांना, क्रोधाने देवीचे तोंड काळे ठिक्कर पडले, आणि तिच्या शरीरातून विक्राळ असे कालीरूप प्रकट झाले. त्या कालीने इतर राक्षसांसोबत, चण्ड आणि मुण्ड यांचा वध केला.

 त्यावर कल्याणमयी देवीने, चण्ड आणि मुण्ड यांना मारणारी, म्हणून तिचे नांव चामुण्डा असे ठेवले. प्रेत हे तिचे आसन समजले जाते.

वाराही, ही सप्त मातृकांमधील असून, विष्णूच्या वराह अवताराची शक्ति समजली जाते. तिचे वाहन महिष आहे. सप्त मातृका म्हणजे; चामुण्डा, वाराही, इंद्राणी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, ब्राम्ही.

सप्तशतीच्या ८ व्या अध्यायात, रक्तबीज वधाच्या समयी, निरनिराळ्या मातृकांनी, म्हणजेच देवांच्या शक्तिरुपांनी राक्षसांचा वध केला, त्यातही वाराहीचा उल्लेख आहे. वाराही ही देवता वाम मार्गाच्या (तंत्र मार्गाच्या) साधकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.

 कार्तिकेयाची  (ज्यांचे दुसरे नांव ‘कुमार’ आहे) शक्ति कौमारी , जी की शिखिवाहना, म्हणजे मोरावर आरूढ आहे. कार्तिकेयाच्या बऱ्याच कथा प्रसिद्ध आहेत. कार्तिकेय(शंकराचा पुत्र) हा दक्षिणेमध्ये मुरुगन, किंवा, सुब्रम्हण्यम या नावाने प्रसिध्द आहे.

इत्येता मातरः सर्वाः सर्वयोगसमन्विताः।

नानाभरणशोभाढ्या नानारत्नोपशोभिताः॥12॥

अशा प्रकारे या सर्व माता सर्व प्रकारच्या योग शक्तींनी संपन्न आहेत, आणि नाना प्रकारच्या आभूषणांनी युक्त आणि नाना प्रकारच्या रत्नांनी सुशोभित आहेत.

श्लोक १३ ते ४३:

दृश्यन्ते रथमारूढा देव्यः क्रोधसमाकुलाः।

शंख चक्रं गदां शक्तिं हलं च मुसलायुधम्‌॥13॥

खेटकं तोमरं चैव परशुं पाशमेव च।

कुन्तायुधं त्रिशूलं च शांर्गमायुधमुत्तमम्‌॥14॥

दैत्यानां देहनाशाय भक्तानामभयाय च।

धारयन्त्यायुधानीत्थं देवानां च हिताय वै॥15॥

या सर्व देवी क्रोधाने भरलेल्या आहेत आणि भक्तांच्या रक्षणासाठी रथावर बसलेल्या आहेत. त्यांनी आपल्या हातांमध्ये शंख, चक्र, गदा, शक्ति, हल, मुसळ, खेटक (म्हणजे ढाल), तोमर (म्हणजे सर्पाकृती मुख असलेला बाण), परशु, पाश, कुन्त या नावाचे आयुध (कुन्त म्हणजे English मध्ये ज्याला spear म्हणता येईल, म्हणजे भाला किंवा तत्सदृश शस्त्र), त्रिशूल, शारङ्ग नावाचे धनुष्य इत्यादि शस्त्रें धारण केली आहेत. ही शस्त्रें त्यांनी दैत्यांचे देह नाश करण्यासाठी, भक्तांना अभय देण्यासाठी आणि देवांच्या कल्याणासाठी धारण केली आहेत

आता कवचाचा प्रारंभ करण्याआधी प्रार्थना केली जाते:

नमस्तेऽस्तु महारौद्रे महाघोरपराक्रमे।

महाबले महोत्साहे महाभयविनाशिनि॥16॥

महान रौद्र रूप, अत्यंत घोर पराक्रम आणि महान उत्साहाने भरलेल्या देवी, तू भयाचा नाश करणारी आहेस, तुला नमस्कार असो.

त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनि।

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥17॥

तुझ्याकडे बघणेही कठीण आहे.(दुष्प्रेक्ष्य). हे शत्रूंचे भय वाढविणाऱ्या देवी, तू माझे रक्षण कर.

क्रमशः

माधव भोपे 

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-1

shailputri mata

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच

देवीचे नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. या काळामध्ये व्रतस्थ राहून देवीच्या विविध रूपांमध्ये शक्तीची उपासना करण्याची परंपरा भारतात पुरातन कालापासून चालत आलेली आहे.

आपल्या १८ पुराणांपैकी मार्कंडेय पुराणात, ७०० श्लोकांमध्ये  देवीद्वारे राक्षसांचा म्हणजेच असुर प्रवृत्तींचा वध करण्याचे निरनिराळे प्रसंग अत्यंत शक्तिशाली शब्दांत वर्णन केलेले आहेत. या भागाला सप्तशती असे म्हटले जाते.

नवरात्री मध्ये, या सप्तशतीच्या पोथीचा पाठ करण्याची बऱ्याच घरी प्रथा असते. आपल्याकडे कुठल्याही देवतेचे चरित्र वर्णन करण्यापूर्वी, त्या देवतेचे आवाहन करून ‘कवच’ म्हणण्याची प्रथा आहे. जेणे करून ती देवता आपल्या अंग प्रत्यंगांचे रक्षण करो अशी प्रार्थना केली जाते. त्याच प्रकारे, सप्तशतीचा पाठ करण्या आधी, देवीकवच, अर्गला आणि कीलक म्हणणे आवश्यक समजले जाते. यातील कीलक म्हणजे एक प्रकारे त्या चारित्राला लावलेले कुलूप उघडण्यासाठीची किल्ली समजली जाते. हे आपल्यापैकी जे या विषयाशी परिचित आहेत त्यांना माहिती असेल.  आपल्यापैकी बरेच जण या कालात कवच, अर्गला आणि कीलक, यथाशक्ति म्हणत असतात.

ही स्तोत्रें संस्कृत मध्ये असून सुरुवातीला उच्चार करायला अवघड वाटतात खरी, पण एकदा ती वाचायला जमू लागले, की शरीरात एक प्रकारचे नवचैतन्य संचार करवण्याचे सामर्थ्य या शब्दांत आहे हे नक्की. आणि जर या स्तोत्रांचा अर्थ समजून घेतला, तर ती खूप परिणामकारक होतात यात शंका नाही. मला जरी संस्कृतचे विशेष ज्ञान नसले, तरी, जमेल तसे समजून घेऊन, यातील देवी कवच वाचतांना जे समजले आणि जे विचार मनात आले ते माझ्या अल्पबुद्धिप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

खालील विवेचन हे मी आमच्या फॅमिली whatsapp ग्रुप मध्ये ६ वर्षांपूर्वी, काही भागांत लिहिले होते. यावर्षी, त्यात थोडी सुधारणा करून आणि थोडे बदल करून या ठिकाणी, goodworld.in च्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहे.

या स्तोत्रांचा अर्थ, आणि संदर्भ समजून घेतल्यास खूपच छान वाटेल यात संशय नाही.

हे स्तोत्र एकूण ५६ श्लोकांचे आहे. सुरुवातीला, या स्तोत्राचे पाहिले ५ श्लोक पाहूत.

ॐ नमश्चण्डिकायै ||

मार्कण्डेय उवाच

ॐ यद्गुह्यम परमं लोके सर्वरक्षाकरं नृणाम्|

यन्न कस्य चिदाख्यातं तन्मे ब्रूहि पितामह ||१||

ब्रम्होवाच

अस्ति गुह्यतमं विप्र सर्वभूतोपकारकम्

देव्यास्तु कवचं पुण्यं तत् श्रुणुष्व महामुने ||२||

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रम्हचारिणी

तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ||३||

पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च

सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ||४||

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः

उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मनाः||५||

 

मार्कण्डेय मुनींनी ब्रम्हाजी, जे कि सर्व सृष्टीचे प्रजापिता आहेत, त्यांना विचारले,

हे पितामह, जे या सृष्टीत परम गोपनीय आहे (यद्गुह्यम), मनुष्य प्राण्याचे सर्व प्रकारे रक्षण करणारे आहे  आणि जे आज पर्यन्त आपण कुणापुढेच प्रकट केले नाही असे साधन कृपया मला सांगावे

त्यावर ब्रम्हदेवाने सांगितले:

अशा प्रकारचे एकमेव साधन म्हणजे देवीचे कवचच  आहे, जे परम गोपनीय, पवित्र, आणि सर्व प्राण्यांवर उपकार करणारे आहे. हे महामुनी, ते श्रवण कर:

देवीची, नऊ रूपे आहेत, ज्यांना नवदुर्गा असे म्हणतात.

 त्यांची निरनिराळी नावे पुढील प्रमाणे आहेत:

१.    तिचे प्रथम नांव ‘शैलपुत्री’ आहे आहे. (गिरिराज हिमालयाची पुत्री , पार्वतीदेवी. ही जरी सर्वांची अधीश्वरी आहे, तरी, हिमालयाची तपश्चर्या आणि प्रार्थनेने प्रसन्न होऊन, कृपापूर्वक त्याच्या पुत्रीच्या रूपात प्रकट झाली).

२.    सच्चिदानंदमय ब्रम्हस्वरूपाची प्राप्ती करून देणे हा जिचा स्वभाव आहे, ती ‘ब्रम्हचारिणी’

३.    आल्हादकारी चन्द्रमा जिच्या घण्टेत स्थित आहे, ती, चन्द्रघण्टा

४.    कुत्सितः ऊष्मा- कूष्मा,+ त्रिविध तापयुक्त संसार रुपी अण्ड: = कूष्माण्ड, अर्थात, त्रिविध ताप युक्त संसार जिच्या उदरामध्ये स्थित आहे, ती म्हणजे कूष्माण्डा

५.    छान्दोग्यश्रुतीनुसार भगवतीच्या शक्तिने उत्पन्न झालेल्या सनत्कुमारांचे नांव ‘स्कन्द’ आहे. त्यांची माता असल्यामुळे तिचे नांव ‘स्कन्दमाता ‘ आहे.

६.    देवतांचे कार्य सिद्ध करण्यासाठी देवी, महर्षि कात्यायन यांच्या आश्रमात प्रकट झाली, आणि त्यांनी तिला आपली कन्या मानले, म्हणून तिचे ‘कात्यायनी’ हे नांव प्रसिध्द झाले.

७.    सर्वांना मारणाऱ्या ‘कालाची’ ही ‘रात्री’ (विनाशिका) असल्यामुळे, तिचे नांव ‘कालरात्रि’ आहे.

८.    देवीने तपस्येने महान गौर वर्ण प्राप्त करून घेतला होता, म्हणून तिचे नांव ‘महागौरी’ आहे.

९.    ‘सिद्धि’ अर्थात मोक्ष देणारी, म्हणून तिचे नांव ‘सिद्धिदात्री’ आहे.

यानंतरच्या भागात मार्कंडेय पुराणामधील या अत्यंत प्रभावशाली कथाभागाबद्दल जाणून घेऊयात..

क्रमशः

A glimpse of Vedic knowledge-3

yagya

A glimpse of Vedic knowledge-3

A glimpse of Vedas या लेखमालेत आपण वेदांबद्दल काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्या या अत्यंत समृद्ध आणि कालातीत ठेव्याविषयी पाश्चात्य लोक किती आस्थापूर्वक अभ्यास करतात हे पाहिल्यावर आपल्याला या गोष्टींची अगदी प्राथमिक माहिती तरी असली पाहिजे असा विचार आला.

पहिल्या लेखात आपण प्रस्थान त्रयी कशाला म्हणतात, श्रुति प्रस्थान, स्मृति प्रस्थान आणि न्याय प्रस्थान म्हणजे काय याची थोडक्यात माहिती घेतली.

सनातन संस्कृतीचे आधारभूत असलेले वाङमय म्हणजे वेद होत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे ते चार वेद होत. संस्कृत मधील विद् या संज्ञेपासून वेद हा शब्द बनला आहे. विद् म्हणजे ‘जो जाणतो’ आणि वेद म्हणजे ‘जाणणे’.

चार वेदांत सगळ्यात मुख्य आणि सगळ्यात मोठा ऋग्वेद आहे. मोठा म्हणजे किती मोठा? तर ऋग्वेदात साधारण १०४६२ मंत्र, किंवा ऋचा आहेत. ज्या रचना पद्यस्वरूपात किंवा छंदोबद्ध आहेत त्यांना ऋचा म्हटले जाते. ऋक् + वेद म्हणजे ऋग्वेद. यातील ऋक् म्हणजे प्रार्थनापर किंवा स्तुतिपर मंत्र.  यजुस् म्हणजे यज्ञात वापरले जाणारे गद्य मंत्र. यजुर्वेद मुख्यतः यज्ञात वापरल्या जाणाऱ्या गद्य मंत्रांचा संग्रह आहे असे म्हटले तरी चालेल. यजुर्वेदात १९७५ मंत्र आहेत. सामवेदातही  जवळपास तितकेच मंत्र आहेत. पण सामवेदात बहुतेक मंत्र ऋग्वेदातीलच जसेच्या तसे घेतले आहेत. सामवेदात ते मुख्यतः गेय (गायल्या जाणाऱ्या) स्वरूपात आले आहेत. आणि अथर्ववेदात जवळ जवळ ६००० मंत्र आहेत. अथर्ववेदात अनेक तांत्रिक बाबतीतले, तसेच तथाकथित ‘वाम’ मार्गातील मंत्र आहेत. याबद्दल आपण पुढे माहिती घेऊ. याला आपल्या सोयीसाठी पुढील टेबलमध्ये मांडता येईल.

क्र.

वेद

मंत्र संख्या

शैली

विवरण

1

ऋग्वेद

10462

मन्त्रपरक

सगळ्यात  प्राचीन वेद

2

यजुर्वेद

1975

गद्यात्मक

कर्मकांडपरक, शुक्ल आणि  कृष्ण भागात विभाजित

3

सामवेद

1875

गेयात्मक

संगीतमय, यातील बहुतेक  मंत्र ऋग्वेदातीलच आहेत.

4

अथर्ववेद

5987

प्रौद्योगिकी, आरोग्य आणि तंत्रपरक

सगळ्यात नवीन वेद

ऋग्वेदात काय आहे?

ऋग्वेदात निसर्गाची, निसर्गातील विविध घटकांची आणि त्यांच्या देवतांची स्तुति आणि अत्यंत काव्यमय वर्णनें आहेत. अग्नि, वायू, इन्द्र, वरुण, विश्वदेव, मरुत, प्रजापति, सूर्य, उषा, पूषा, रुद्र, सविता या देवतांची सूक्तें आहेत. सूक्त म्हणजे स्तुति करणारी, ‘सु’ उक्ति. ऋग्वेदातील पहिलाच मंत्र किंवा ऋचा खालीलप्रमाणे आहे:

ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्। होतारं रत्नधातमम् ॥ १.१.१

पदच्छेद- ओ३म्  अ॒ग्निम् । ई॒ळे॒ । पु॒रःऽहि॑तम् । य॒ज्ञस्य॑ । दे॒वम् । ऋ॒त्विज॑म् । होता॑रम् । र॒त्न॒ऽधात॑मम् ॥ १.१.१

agni

ई॒ळे॒ म्हणजे स्तुति करणे. अग्नीचे मनुष्याच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ऋग्वेदाच्या पहिल्याच ऋचेमध्ये अशा अग्नीची स्तुति आणि प्रार्थना केली आहे. यात पुरोहित म्हणजे यज्ञाचे नेतृत्व करणारा पुजारी, ऋत्विज यांचे चार प्रकार असतात- होतार , अध्वर्यु, उद्गाता, आणि  ब्रह्मा.  ऋत्विज म्हणजे योग्य वेळी आहुति देणारा.  ‘होतार’ म्हणजे देवतांचे आवाहन  करणारा, या सर्व शब्दांचे अर्थ आपण पुढील काही भागांत पाहणार आहोत. जी खूप रंजक माहिती आहे. मी सुरुवातीच्या लेखात उल्लेख केलेल्या रशियन विद्वानाच्या व्हिडिओमध्ये त्यांनीं याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे.!

yagya

सर्व वेद हे साधारण चार भागांमध्ये विभागलेले असतात- १. संहिता, २. ब्राह्मण, ३. आरण्यक आणि ४. उपनिषद.

पूर्वी मनुष्याच्या जीवनाचे चार आश्रम किंवा अवस्था मानल्या जात- ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम.

विद्यार्थी जेंव्हा गुरुकुलात वेद शिकायला जाई, तेंव्हा वेदातील चारही भाग तो शिके, पण त्यातील संहिता भाग जास्त करून त्याला ब्रह्मचर्याश्रमात उपयोगी येई, ब्राह्मण भाग गृहस्थाश्रमात, आरण्यक भाग वानप्रस्थाश्रमात आणि उपनिषद संन्यासाश्रमात.    

1) संहिता –

संहिता म्हणजे संग्रह. वेळोवेळी ऋषींनी रचलेले गद्य व पद्य मंत्र विषयवारीने एकत्र केले, त्याच संहिता होत. ऋग्वेद हा पद्यमंत्रांचा संग्रह आहे. हे पद्यमंत्र म्हणजे निरनिराळ्या देवतांच्या मुख्यत: प्रार्थना किंवा स्तोत्रे होत. हा भाग मुख्यतः ब्रह्मचर्याश्रमात उपयोगी येई

२.)‘ब्राह्मण’ या भागात विविध यज्ञ कसे करावयाचे, ह्याचे तपशीलवार विवरण दिलेले आहे. गृहस्थाश्रमात करणे अपेक्षित असलेल्या यज्ञातील प्रधान कर्म, अंगभूत कर्मे, कर्माची साधने, विविध नामे, यज्ञांचे अधिकारी व यज्ञांची विविध फले ह्यांत सांगितलेली असतात. यज्ञकर्मे रीतसर पार पाडण्याचा महिमा सूचित करणाऱ्या देव, ऋषी, असुर इत्यादिकांच्या कथा, योग्य पद्धतीने पार पाडलेल्या कर्माची व साधनांची वर्णने, तसेच अयोग्य रीतीने अनुष्ठिलेल्या कर्मांच्या व निषिद्ध पदार्थांच्या दुष्परिणामांची वर्णने, ह्यांत आलेली असतात.

3) आरण्यके –

अरण्यातच ज्या भागाचे व्रतस्थ राहून पठन करावयाचे तो भाग म्हणजे ‘आरण्यक’ होय. सर्व आरण्यके म्हणजे ब्राह्मणग्रंथांची अखेरची प्रकरणे होत. यांत यज्ञधर्माच्या विधानात्मक विवेचनापेक्षा यज्ञाचे तात्त्विक विवेचन आढळते. मनुष्याने गृहस्थाश्रम संपवून, वानप्रस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर या भागांचा अर्थ त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकत असावा.

4) उपनिषदे –

सामान्यतः जीव, ब्रह्म आणि जगत्‌ यांचे संबंधात विवेचन करणारे तत्त्वज्ञानात्मक भाग  उपनिषदे म्हणून ओळखली जातात. संन्यासाश्रमात हा भाग समजण्याएवढी प्रगल्भता मनुष्याला आलेली असे. पण म्हणून अर्थात उपनिषद इतर कुठल्या आश्रमात वाचू नये असे मुळीच नाही.

उपनिषदें ही साधारणतः वेदाच्या अंतिम भागात येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ म्हटले जाते. किंवा वेदांचा ‘निचोड’ म्हणता येईल, असा हा भाग असतो. गंमत म्हणजे, ज्या यज्ञ, याग यांविषयी आधीच्या भागात सविस्तर माहिती दिलेली असते, त्यांच्याही पलिकडे ‘परब्रह्म’ कसे आहे, याचे या भागांत वर्णन केलेले असते.

अनेक प्राचीन उपनिषदे ही वर्तमान आरण्यकांचे भाग असावेत. तसेच आज प्रसिद्ध असलेली प्राचीन उपनिषदे ज्या आरण्यकांचे भाग आहेत, त्यांतील उपनिषदांव्यतिरिक्त भागांनाही, ‘उपनिषद’ ही संज्ञा आरण्यकांमध्ये दिलेली असते. उदा., ‘बृहदारण्यक’ (मोठे आरण्यक) हा शतपथ ब्राह्मण नामक ब्राह्मणग्रंथाचा भाग असून हेच बृहदारण्यकोपनिषद म्हणून निर्दिष्ट केले जाते.

ऋग्वेदात साधारणपणे खालील वर्णन आहे.

  1. देवी-देवता : ऋग्वेदात इंद्र, अग्नि , सूर्य, विष्णू, सोम आदी प्रमुख देवतांसह ३३ देवी-देवतांची स्तुती व वर्णन आहे. या देवता विविध नैसर्गिक शक्ती आणि घटनांशी संबंधित आहेत.
  2. निसर्ग : सूर्य, चंद्र, नद्या, पर्वत, वृक्ष, वनस्पति  अशा निसर्गाच्या विविध पैलूंचे वर्णन यात केले आहे. या नैसर्गिक घटकांची देवता म्हणून पूजा केली जात असे.
  3. समाजजीवन : विविध वर्ग, व्यवसाय, चालीरीती व परंपरा यांचे वर्णन करून समकालीन समाजाची झलक यात दिसते.
  4. तत्त्वज्ञान आणि नीति : जीवन, मृत्यू, आत्मा, देवत्व, सत्य, न्याय आणि कर्म या विषयांवर सखोल विचार.
  5. स्तुति आणि प्रार्थना : ऋग्वेदात समृद्धि,  आरोग्य, विजय आणि मोक्षाच्या इच्छांसह देवी-देवतांची विविध स्तुति आणि प्रार्थना आहेत.
  6. पौराणिक कथा : यात अनेक पौराणिक कथा आणि दैवी पात्रे देखील आहेत, जी देवी-देवता आणि नैसर्गिक शक्तींचे सामर्थ्य वर्णन करतात.

प्रसिद्ध ‘गायत्री मंत्र’, तसेंच ‘पुरुष सूक्त’ हे ऋग्वेदाचा भाग आहेत. हे आपणाला माहिती असावे.

पुढील भागात आपण काही अत्यंत रंजक माहिती पाहणार आहोत. नक्की वाचा.

माधव भोपे 

यापूर्वीचे लेख इथे वाचा 

A glimpse of Vedic knowledge-1

A glimpse of Vedic knowledge-2