https://goodworld.in A website by Madhav Bhope

A glimpse of Vedic knowledge-2

A Glimpse of vedas-2

A glimpse of Vedic knowledge-2

The story of Satyakam-Jabala

सत्यकाम जाबालाची गोष्ट

मागील लेखात आपण श्रुति, स्मृति याबद्दल थोडी माहिती घेतली. आणि प्रस्थानत्रयी म्हणजे काय हे पाहिले. आपल्याला चार वेदांबद्दल थोडी प्राथमिक माहिती घ्यायची आहे. पण त्याआधी आपण छान्दोग्योपनिषदा मधील एक रोचक कथा पाहणार आहोत. पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धति होती. मुलगा ७-८ वर्षाचा झाला की, उपनयन संस्कार करून त्याला गुरूंच्या घरी विद्या शिकायला पाठवले जात असे. विद्या शिकवणारे आचार्य, किंवा गुरू, अरण्यात आश्रम करून रहात. असे आचार्य हे विद्वान, निःस्पृह आणि ब्रहमविद्या पारंगत असत. विद्यार्थ्यांचे हित, कल्याण हाच त्यांचा एकमेव उद्देश असे. विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचे किंवा नाकारण्याचे सर्व अधिकार त्यांचे असत. योग्य वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याची पूर्ण जबाबदारी गुरूंची असे. म्हणूनच येणाऱ्या विद्यार्थ्याची निवड करण्याचा अधिकारही गुरूंचा असे. गुरुकुलात नित्य यज्ञ याग चालत असे. यज्ञाला समिधा लागतात. येणाऱे  विद्यार्थी  येतांना, हातामध्ये प्रतिकात्मक म्हणून थोड्या समिधा (वाळलेली लाकडे) घेऊन येत आणि गुरूंना अर्पण करीत.

सत्यकाम हा जाबाला नांवाच्या स्त्रीचा मुलगा होता. ती अनेक घरांत काम करीत असे. सत्यकाम जेंव्हा ७ वर्षांचा झाला, तेंव्हा त्याने, त्यावेळच्या प्रथेनुसार, इतर मुलांप्रमाणे, गुरूच्या घरी जाऊन विद्या शिकण्याची इच्छा आपल्या आईजवळ व्यक्त केली. गुरूंना आपल्या वडिलांचे नांव आणि गोत्र सांगणे आवश्यक असे, तसे सत्यकामने आपल्या आईला विचारले. त्याची आई विवाहित नव्हती, आणि अनेक घरांमध्ये काम करीत असतांना तिला सत्यकाम झाला होता. तिने तिच्या मुलाला सांगितले, “ बाळा, तुझ्या जन्माच्या आधी मी अनेक घरांमध्ये काम करत होते, अनेक स्वामींची सेवा करत होते. त्यामुळे, तुझे वडील कोण आहेत, हे मी नक्की सांगू शकत नाही. तू फक्त सत्यकाम आहेस- सत्यकाम- जाबाला. तुझ्या गुरुजींनी तुझे गोत्र किंवा वडिलांचे नांव विचारले तर जे खरे आहे ते सांग.

आईचा निरोप घेऊन सत्यकाम निघाला आणि गुरू गौतम यांच्या आश्रमात आला. आपल्याला त्यांच्या आश्रमात प्रवेश मिळावा अशी त्याने विनंती केली. गुरूंनी त्याला त्याचे कुळ आणि गोत्र विचारले. सत्यकाम म्हणाला, “मी माझ्या आईला हा प्रश्न विचारला, तेंव्हा तिने सांगितले की माझे वडील कोण हे तिला नक्की माहिती नाही. माझे नांव सत्यकाम- जाबाला.” त्याचे हे उत्तर ऐकून आश्रमात बसलेले विद्यार्थी हसू लागले आणि त्याची टिंगल करू लागले. पण गुरू गौतम त्याला म्हणाले, “ बाळा, तू खरा ब्राह्मण आहेस- कारण की जो खरे बोलतो तो ब्राह्मण. मी तुला माझा शिष्य म्हणून स्वीकार करतो. आजपासून तू आश्रमात रहा.” सत्यकाम ने सोबत आणलेल्या समिधा गुरूंना अर्पण केल्या आणि आश्रमात राहू लागला.

सत्यकामचे शिक्षण सुरू झाले. त्याला गुरूंनी आश्रमातील दैनंदिन कामें करायला सांगितले. नंतर एके दिवशी गौतमांनी त्याला बोलावले. आणि सांगितले, “आज मी तुझ्याजवळ ४०० गायी देत आहे. तू यांना जंगलात चरायला घेऊन जा, तिकडेच राहा, आणि जेंव्हा या ४०० गायींच्या १००० गायी होतील, तेंव्हा परत ये.” असे म्हणून त्यांनी आश्रमातील अगदी दुबळ्या झालेल्या ४०० गायी त्याच्या हवाली केल्या.

गुरूंच्या आज्ञेनुसार, सत्यकामने त्या ४०० गायी घेतल्या आणि तो जंगलाच्या दिशेने निघाला. रोज तो त्या गायींना चरायला सोडत असे, त्यांच्यावर लक्ष ठेवत असे, आणि त्याचबरोबर जंगलाचे, निसर्गाचे, पशुपक्ष्यांचे निरीक्षण करीत असे. त्याचबरोबर, तो नदीच्या काठी बसून, चिरंतन सत्य काय आहे याचा विचार करीत असे, चिंतन करीत असे. अशी वर्षांमागून वर्षें लोटली.

एके दिवशी एक पुष्ट दिसणारा बैल त्याच्याजवळ आला, आणि मनुष्यवाणीत म्हणाला, “मुला, आता आमची संख्या १००० झाली आहे. तू आता आम्हाला तुझ्या गुरूंकडे, आश्रमाकडे घेऊन चल.” तो बैल दुसरे तिसरे कोणी नसून वायूदेव होता. तो पुढे सत्यकामला म्हणाला, “ तू जी आमची सेवा केली आहेस, त्याने मी अत्यंत प्रसन्न झालो आहे. तू परब्रह्माचे- चिरंतन सत्याचे चिंतन करीत आहेस. मी तुला त्या ज्ञानाचा चौथा हिस्सा सांगतो- पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण- या सगळ्या दिशा या त्या ब्रह्माचा भाग आहेत. आता यापुढील ज्ञान तुला अग्नि देईल.”

सत्यकामने गुरूंच्या आश्रमाकडील आपला परतीचा प्रवास चालू ठेवला. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी, जेंव्हा सगळ्या गायी चरून परत आल्या, तेंव्हा, सत्यकाम शेकोटी पेटवत होता आणि तीत इंधन टाकीत होता, त्यावेळी अग्निदेव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, “वायूने तुला चिरंतन सत्याचे काही ज्ञान दिले. मी आता त्याच्या पुढील चौथा हिस्सा तुला सांगतो. पृथ्वी, आकाश, वायू आणि समुद्र, हे सुद्धा त्या परब्रह्माचाच हिस्सा आहेत. आता यापुढील ज्ञान तुला हंस देईल.”

पुढील दिवशी संध्याकाळी, जेंव्हा सगळ्या गायी चरून परत आल्या, आणि जेंव्हा सत्यकाम शेकोटी पेटवत होता, तेंव्हा एक दिव्य हंस उडत त्याच्यापाशी आला. तो हंस म्हणजे प्रत्यक्ष सूर्यदेव होता. तो सत्यकामला म्हणाला, “सत्यकाम, मी तुला आता परब्रह्माच्या ज्ञानाचा पुढील चतुर्थ भाग सांगतो- अग्नि, सूर्य, चंद्र, आणि विद्द्युल्लता या सर्वांना ‘ज्योतिष्मान’ असे नांव आहे. हे ही सगळे, त्या परब्रह्माचे भाग आहेत. यापुढील भाग तुला पाणपक्षी म्हणजेच बदक सांगेल.”

त्यापुढील दिवशी, पुन्हा संध्याकाळी गायी चरवून आल्यावर जेंव्हा सत्यकाम शेकोटी पेटवत होता, तेंव्हा पाणपक्षी त्याच्या जवळ आला आणि म्हणू लागला, “ सत्यकाम, मी आता तुला परब्रह्माच्या ज्ञानाचा चौथा आणि शेवटचा भाग सांगतो, ऐक. प्राण, डोळे (दृष्टी), कान (श्रवणेंद्रिय) आणि मानस (मन) ही त्याच पूर्ण परब्रह्माचा हिस्सा आहेत. हे चराचर त्याच परब्रह्माचे प्रकटीकरण आहे.”

जेंव्हा सत्यकाम आपल्या गुरूच्या आश्रमात १००० गायींसह  पोंचला, तेंव्हा त्याचा चेहरा ब्रह्मज्ञानाच्या तेजाने उजळला होता. त्याला पाहून त्याचे गुरू, गौतम अत्यंत प्रसन्न झाले आणि त्याला म्हणाले, “माझ्या प्रिय शिष्या, तुझा चेहरा ब्रह्मज्ञानाच्या तेजाने उजळलेला दिसतो आहे.! तुला हे ज्ञान कोणी दिले?”

तेंव्हा सत्यकामने त्याच्या चार गुरूंबद्दल सांगितले आणि नम्रतेने म्हणाला, “गुरुजी, पण हे ज्ञान मला आपल्या मुखातून ऐकायचे आहे. त्याशिवाय त्याला पूर्णता येणार नाही.”

तेंव्हा गुरू गौतमांनी प्रसन्न होऊन त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. ते म्हणाले, “ ब्रह्म सर्वत्र आणि सर्वव्यापी आहे. ब्रह्मच सर्व आहे. ते अनादि आहे आणि अनंत आहे. स्वतःला जाणल्यानेच ब्रह्म जाणले जाते. यालाच ब्रह्मविद्या म्हणतात.”sun

गुरूंकडून ज्ञान मिळून सत्यकाम धन्य झाला. पुढे चालून सत्यकामही एक उत्तम शिक्षक झाला.

आपण या लेखमालेची सुरुवात करतांना, पाश्चात्य लोक आपल्या संस्कृतिकडे आकर्षित होतात, आणि नुसते तात्पुरते आकर्षित होत नाहीत, तर आपल्या संस्कृतिचा, वेदांचा, सखोल अभ्यास करतात, पण एक भारतीय म्हणून आपल्याला आपल्या गोष्टींबद्दल तितकी किंवा अगदी प्राथमिक माहितीही नसते अशी खंत व्यक्त करून झाली होती. वेदांचे ज्ञान हे फक्त काही उच्च वर्णीय लोकांपुरतेच मर्यादित ठेवले गेले होते, असे आपल्याला सांगितले गेले. पण छान्दोग्योपनिषदात आलेल्या या गोष्टीवरून असे दिसून येते, की जात किंवा कुळ याचा विचार न करता विद्यार्थ्याची योग्यता पाहून ज्ञान दिले जात असे. आणि योग्यता ठरविण्याचा अधिकार हा तितक्याच ज्ञानी, अधिकारी आणि निःस्वार्थ गुरूंकडे असे.

दुसरे असे, की शिक्षण देण्याची कोणती पद्धत अवलंबायची हे सुद्धा, कोणती पद्धत कोणाला सूट होईल हे ठरवून त्याप्रमाणे आचार्य highly individualized पद्धत वापरत.

आश्रमात वेदांचा अभ्यास करतांना घोकंपट्टी तर असेच, आणि ती आवश्यकही असे. पण त्याचबरोबर ‘प्रात्यक्षिक’ शिक्षणावर अधिक भर असे.

वरील गोष्टीमध्ये, अनेक वर्षे निसर्गाच्या सान्निध्यात राहून सत्यकामला जे ज्ञान मिळाले, ते कदाचित आश्रमात राहून मिळाले नसते. वरील गोष्टीतील- वायूदेव, अग्निदेव, सूर्यदेव यांनी येऊन सत्यकामला ज्ञान देण्याचे प्रसंग आपण जरी बाजूला ठेवले, तरी इतक्या दिवसांच्या निसर्गाच्या सान्निध्यानंतर आणि चिंतनानंतर सत्यकामला आतून ज्ञान ‘स्फुरले’ असे तर आपण मानूच शकतो. कारण ‘ज्ञान’ हे बाहेरून मिळवायचे नसते, तर ते आपल्या आतच असते हीच तर वेदांची शिकवण आहे. आजकाल आपण बाहेरून, पुस्तकांतून आणि गूगल मधून जे ‘ज्ञान’ मिळवितो, ते ‘ज्ञान’ नव्हे, तर ‘माहिती’ म्हणजेच information असते.

यापुढील लेखात आपण वेदातील काही संज्ञांची प्राथमिक ओळख करून घेणार आहोत.

आपल्याला हा विषय आवडला असेल, त्यात रस येत असेल, तर अवश्य कळवा, म्हणजे अजून पुढे लिहायला उत्साह येईल.

माधव भोपे 

यापूर्वीचे लेख इथे वाचा 

A glimpse of Vedic knowledge-1

A glimpse of Vedic Knowledge-1

four vedas

A glimpse of Vedic Knowledge-1 

वेदांची झलक

काही वर्षांपूर्वी यू ट्यूब वर एक व्हीडिओ पाहण्यात आला- व्लादिमीर यातसेन्को (Vladimir Yatsenko) असे नांव असलेल्या, रशियन माणसाचा तो व्हीडिओ होता.

व्हीडिओ 9 वर्षांपूर्वीचा आहे. ( एप्रिल 2015 चा). त्याचे शीर्षक होते- Introduction to Vedas- Part-1. काही भागांमध्ये हा व्हीडिओ होता. सांगणारा माणूस इंग्लिश मध्ये बोलत होता. त्याचा वेष जरी पाश्चात्य असला, तरी तो एखादा  ऋषितुल्य भारतीय वाटत होता.

 या व्हीडिओमध्ये, एखाद्या भारतीयालाही नसेल, इतकी सखोल माहिती तो आपल्या वेदांबद्दल सांगत होता. व्हीडिओ ऐकल्यानंतर मला खूप नवीन गोष्टी कळल्या. मी भारतीय असून, आणि तथाकथित उच्च कुळात जन्म घेतलेला असूनही, मला त्यातील बहुतेक गोष्टींचे शून्य ज्ञान होते. त्यामुळे माझीच मला लाज वाटली. आपण स्वतःला भारतीय म्हणवतो, आणि वेद हे आपले धर्मग्रंथ आहेत, पण आपल्याला त्यांच्याबद्दल काहीही माहिती नसते.  आणि हा रशियन माणूसच नाही, तर अक्षरशः शेकडो, हजारो इतर देशांतील, इतर धर्मीय जिज्ञासू, तिथे राहून किंवा भारतात येऊन, आपल्या ज्ञानाचा अभ्यास करतात, आपले पूर्ण आयुष्य सनातन संस्कृतीला वाहून घेतात, असे मला त्यानंतर समजू लागले. आणि असे अनेक लोक- स्त्री, पुरुष, धांडोळा घेतांना दिसू लागले.

या सर्व गोष्टी आपण इतरांसोबत शेअर केल्या पाहिजेत असे प्रकर्षाने वाटू लागले. आता हा ब्लॉगिंगचा प्लॅटफॉर्म मिळाल्यामुळे यातील काही गोष्टी, वाचकांसोबत शेअर करायचा विचार आहे.

हा विषय trending म्हणजे पटकन कोणाला आकर्षित करणारा नाही. त्यामुळे किती लोकांच्या वाचण्यात येईल हे माहित नाही. पण आपल्या आनंदासाठी, अशा  काही विषयांची मांडणी करतांना, आपलीच त्या विषयाची उजळणी होते आणि वेळ सत्कारणी लागल्याचे समाधान मिळते, म्हणून हा लेखन प्रपंच करणार आहे.

या लेखांमध्ये आपल्याला काही गोष्टींची आणि काही शब्दांची तोंडओळख होणार आहे-

  1. वेद किती आहेत, त्यांच्यात किती मंत्र आहेत- श्रुति म्हणजे काय, स्मृति म्हणजे काय, वेदांचे भाग- संहिता, ब्राह्मण, आरण्यक, आणि उपनिषद म्हणजे काय, त्रैविद्या म्हणजे काय, प्रस्थानत्रयी म्हणजे काय.
  1. पुरातन काळापासून आजपर्यंत वेद अत्यंत शुद्ध स्वरूपात कोणत्या पद्धतीने जतन केले गेले, भारताच्या कुठल्याही भागात गेले तरी वेदांचे शब्द आणि स्वर अगदी अचूक एकसारखे कसे येतात, याबद्दल माहिती
  2. द्याौ,  पृथ्वी, अंतरिक्ष या संकल्पना,
  3. अग्निहोत्र, किंवा यज्ञ करतांना निरनिराळे कर्म कर्ते – होतार, अध्वर्यू आणि उद्गातृ किंवा उद्गात्र आणि ब्राह्मण आणि त्यांना दिलेल्या जबाबदाऱ्या.

प्रस्थानत्रयी –

वरील विषयाची चर्चा सुरू करण्याआधी प्रस्थानत्रयी म्हणजे काय याबद्दल थोडे समजून घेणे आवश्यक आहे.

या शब्दाचा अर्थ कुठल्या डिक्शनरीत मिळाला नाही. पण आपल्याला केंव्हा ना केंव्हा इथून ‘प्रस्थान’ करायचे आहे- म्हणजे जायचे आहे- तर ते- आपल्या ‘मूळ गावाला’   जाणे सुलभ व्हावे म्हणून जे ग्रंथ सहायक आहेत असे तीन ग्रंथ म्हणून प्रस्थानत्रयी म्हणत असावेत असे माझ्या अल्पबुद्धीला वाटत होते.  पण मला एका ठिकाणी खालील अर्थ बघायला मिळाला-

प्रस्थानत्रयी

सनातन धर्मात असे मत आहे की कोणाला कुठला सिद्धांत सिद्ध करायचा असेल तर त्याला तीन प्रस्थानांमधून जावे लागेल. ते तीन प्रस्थान म्हणजे- श्रुति प्रस्थान, स्मृति प्रस्थान आणि न्याय प्रस्थान. तर आपल्याकडे उपनिषद, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र या तीन रचना श्रुति प्रस्थान, स्मृति प्रस्थान आणि न्याय प्रस्थान म्हणून ओळखल्या जातात.

श्रुति म्हणजे आपल्या ऋषिंना त्यांच्या ध्यान अवस्थेत ज्या ज्ञानाची ‘जाणीव’ झाली, जो ‘शब्द’ त्यांना ध्यानाच्या अवस्थेत ऐकू आला- तो शब्द किंवा ते शब्द म्हणजे श्रुति. म्हणजेच ‘वेद’. वेद हे अपौरुषेय आहेत असे जे म्हणतात ते त्याचमुळे. वेद हे कोणी ‘रचले’ नाहीत किंवा बनवले नाहीत, तर ते ‘स्फुरले’. म्हणून ते अपौरुषेय. आणि त्या प्रत्येक वेदांतील शेवटचा आणि अत्यंत सारगर्भ असलेला भाग म्हणजे उपनिषद. उपनिषदें अनेक आहेत, पण आद्य शंकराचार्यांनी ईश, केन, कठ, प्रश्न, मुण्डक, मांडूक्य, ऐतरेय, तैत्तिरीय, बृहदारण्यक आणि  छान्दोग्योपनिषद् या १०   मुख्य उपनिषदांवर भाष्य लिहिले आहे.

तर उपनिषद हे प्रस्थानत्रयीमधील प्रथम म्हणजे ‘श्रुति प्रस्थान’ म्हणून ओळखले जातात.

स्मृति म्हणजे आठवणीतून लिहिलेले इतर साहित्य. मग त्यात भगवद्गीता आली, सगळे शास्त्र आले, दर्शन, योगसूत्र, सांख्य, रामायण, महाभारत इत्यादि रचना आल्या.

प्रमाणांच्या, पुराव्यांच्या आधारावर कुठल्या तरी निष्कर्षाला पोंचणे, याला ‘न्याय’ म्हणतात. ब्रह्मसूत्र हे स्वतः वेदव्यास (बादरायण) यांनी रचलेले आहे. आणि ते ‘न्याय’ या संज्ञेत येते.    त्यात उपनिषदांतील इतस्ततः विखुरलेले ज्ञान एका ठिकाणी आणून, ५५५ ‘सूत्रां’ मध्ये क्रमवार आणि पद्धतशीर एकत्र केले आहे. ‘अथातो ब्रह्मजिज्ञासा’ या सूत्राने त्याची सुरुवात होते, आणि प्रमाणांच्या, पुराव्यांच्या आधारावर ‘ब्रह्म’ म्हणजे काय याचे विवेचन केलेले आढळते.

भारतवर्षात जेंव्हा कुठल्याही आचार्यांना आपले मत मांडायचे असेल, तेंव्हा त्यांनी प्रथम या प्रस्थानत्रयींवर भाष्य करून आपले मत मांडणे अपेक्षित असे. आद्य शंकराचार्य यांनी या तिन्हींवर आपले भाष्य लिहिले आहे. निम्बार्काचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य इत्यादि आचार्यांनीही या प्रस्थानत्रयींवर भाष्य केले आहे.

यापुढील लेखात आपण वेद किती आहेत, त्यांच्यात किती मंत्र आहेत याविषयी माहिती घेणार आहोत. त्यानंतरच्या एका लेखात आपण छांदोग्योपनिषदात आलेली सत्यकाम जाबाल याची अत्यंत रोचक कथा पाहणार आहोत.

वरील सर्व विषयांवर मला मिळालेली माहिती आपल्यासोबत शेअर करणार आहे. या विषयात रस असणाऱ्या वाचकांनी येणारे लेख नक्की वाचावे.

माधव भोपे

Gita Quiz-2 -Simple quiz on Gita 12th Chapter

12 chapter

 

।। अथ द्वादशोऽध्यायः ।।
अर्जुन उवाच
एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ।।1।।

 

भगवंताने गीतेच्या चौथ्या अध्यायाच्या 33 आणि 34 व्या श्लोकांमध्ये ज्ञानयोगाचे महत्त्व सांगितले, नंतर पाचव्या अध्यायाच्या 16, 17 व्या आणि 24 ते 26 या श्लोकांमध्ये, सहाव्या अध्यायाच्या 24 ते 28 या श्लोकांमध्ये आणि आठव्या अध्यायाच्या 11 ते 13 व्या श्लोकांमध्ये निर्गुण निराकाराच्या उपासनेचे महत्त्व विषद केले.

 

सहाव्या अध्यायाच्या 47 व्या श्लोकात साधक भक्ताचा महिमा सांगितला, आणि सातव्या अध्यायापासून ते 11 व्या अध्यायापर्यंत जागोजागी ‘अहम्, माम्’ आदि पदांद्वारे विशेष रूपाने सगुण साकार आणि सगुण निराकाराच्या उपासनेचे महत्त्व सांगितले. शेवटी 11 व्या अध्यायाच्या 54 आणि 55 व्या श्लोकात अनन्य भक्तीचा महिमा आणि फळाचे वर्णन केले.

 

भक्त्या त्वनन्यया शक्य अहमेवंविधोऽर्जुन । ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप ॥ ११-५४ ॥ मत्कर्मकृन्मत्परमो मद्भक्तः सङ्गवर्जितः । निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव ॥ ११-५५ ॥

 

वरील सर्व वर्णन ऐकून अर्जुनाच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली की सगुण परमेश्वराची उपासना करणारे आणि निर्गुण ब्रह्माची उपासना करणारे या दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे? या जिज्ञासेतूनच अर्जुनानाने भगवंताला प्रश्न विचारला-

 

एवं सततयुक्ता ये भक्तास्त्वां पर्युपासते ।
ये चाप्यक्षरमव्यक्तं तेषां के योगवित्तमाः ।।1।।

 

अर्जुन म्हणाला, जे अनन्यप्रेमी भक्तजन पूर्वी सांगितलेल्या आपल्या भजन, ध्यानात निरंतर मग्न राहून आपणा सगुणरूप परमेश्वराची आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदघन निराकार ब्रह्माचीच अतिश्रेष्ठ भावाने उपासना करतात, त्या दोन्ही प्रकारच्या भक्तांमध्ये अतिशय उत्तम योगवेत्ते कोण होत? ॥ १२-१ ॥

 

इथे  एवं या शब्दाने 11 व्या अध्यायातील 55 व्या श्लोकामध्ये ज्यांचा उल्लेख केलेला आहे अशा भक्तांबद्दल अर्जुन विचारत आहेत.

 

श्रीभगवानुवाच
मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धया परयोपेतास्ते मे युक्ततमा मताः ।।2।।

 

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन, ध्यानात रत झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुणरूप परमेश्वराला भजतात, ते मला योग्यांमधील अतिउत्तम योगी वाटतात. ॥ १२-२ ॥

 

ये त्वक्षरमनिर्देश्यमव्यक्तं पर्युपासते ।
सर्वत्रगमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम् ।।3।।

संनियम्येन्द्रिग्रामं सर्वत्र समबुद्धयः ।
ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः ।।4।।

 

परंतु जे पुरुष इंद्रियसमूहाला चांगल्या प्रकारे ताब्यात ठेवून मन, बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या, सर्वव्यापी, अवर्णनीय स्वरूप आणि नेहमी एकरूप असणाऱ्या नित्य, अचल, निराकार, अविनाशी, सच्चिदानंदघन ब्रह्माची निरंतर ऐक्यभावनेने ध्यान करीत उपासना करतात, ते सर्व भूतमात्रांच्या कल्याणात तत्पर आणि सर्वांच्या ठिकाणी समान भाव ठेवणारे योगी मलाच येऊन मिळतात. ॥ १२-३, १२-४ ॥

क्लेशोऽधिकतरस्तेषामव्यक्तासक्तचेतसाम् ।
अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहविद्भिरवाप्यते ।।5।।

सच्चिदानंदघन निराकार ब्रह्मांत चित्त गुंतलेल्या त्या पुरुषांच्या साधनांत कष्ट जास्त आहेत. कारण देहाचा अभिमान असणाऱ्यांकडून अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती कष्टानेच होत असते. ॥ १२-५

ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः ।
अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते ।।6।।

परंतु जे मत्परायण भक्तजन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुणरूप परमेश्वराचीच अनन्य भक्तियोगाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात ॥ १२-६ ॥

तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात् ।
भवामि नचिरात्पार्थ मय्यावेशितचेतसाम् ।।7।।

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), त्या माझ्यात चित्त गुंतवलेल्या प्रेमी भक्तांचा मी तत्काळ मृत्युरूप संसारसागरातून उद्धार करणारा होतो. ॥ १२-७ ॥

मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय ।
निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः ।।8।।

माझ्यातच मन ठेव. माझ्या ठिकाणीच बुद्धी स्थापन कर. म्हणजे मग तू माझ्यातच राहशील, यात मुळीच संशय नाही. ॥ १२-८ ॥

अथ चित्तं समाधातुं शक्नोषि मयि स्थिरम् ।
अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनंजय ।।9।।

जर तू माझ्यात मन निश्चल ठेवायला समर्थ नसशील, तर हे धनंजया (अर्थात अर्जुना), अभ्यासरूप योगाने मला प्राप्त होण्याची इच्छा कर. ॥ १२-९ ॥

अभ्यासेऽप्यसमर्थोऽसि मत्कर्मपरमो भव ।
मदर्थमपि कर्माणि कुर्वन्सिद्धिमवाप्स्यसि ।।10।।

जर तू वर सांगितलेल्या अभ्यासालाही असमर्थ असशील, तर केवळ माझ्याकरता कर्म करायला परायण हो. अशा रीतीने माझ्यासाठी कर्मे केल्यानेही माझ्या प्राप्तीची सिद्धी तू मिळवशील. ॥ १२-१० ॥

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः।
सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान् ।।11।।

जर माझ्या प्राप्तिरूप योगाचा आश्रय करून वर सांगितलेले साधन करायलाही तू असमर्थ असशील, तर मन बुद्धी इत्यादींवर विजय मिळविणारा होऊन सर्व कर्मांच्या फळांचा त्याग कर. ॥ १२-११ ॥

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते ।
ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम् ।।12।।

मर्म न जाणता केलेल्या अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे. ज्ञानापेक्षा मज परमेश्वराच्या स्वरूपाचे ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षाही सर्व कर्मांच्या फळांचा त्याग श्रेष्ठ आहे. कारण त्यागाने ताबडतोब परम शांती मिळते. ॥ १२-१२ ॥

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च ।
निर्ममो निरहंकारः समदुःखसुखः क्षमी ।।13।।

जो कोणत्याही भूताचा द्वेष न करणारा, स्वार्थरहित, सर्वांवर प्रेम करणारा व अकारण दया करणारा, माझेपणा व मीपणा नसलेला, दुःखात व सुखात समभाव असलेला आणि क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्यालाही (त्याच्या पश्चातापानंतर) अभय देणारा असतो; ॥ १२-१३ ॥

संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः ।
मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद् भक्तः स मे प्रियः ।।14।।

तसेच जो योगी नेहमी संतुष्ट असतो, ज्याने शरीर, मन व इंद्रिये ताब्यात ठेवलेली असतात, ज्याची माझ्यावर दृढ श्रद्धा असते, तो मन व बुद्धी मलाच अर्पण केलेला माझा भक्त मला प्रिय आहे., ॥१२-१४ ॥

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः ।
हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ।।15।।

ज्याच्यापासून कोणत्याही जीवाला उद्वेग होत नाही तसेच ज्याला कोणत्याही जीवाचा उद्वेग होत नाही, जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादींपासून मुक्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे. ॥ १२-१५ ॥

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः ।
सर्वारम्भपरित्यागी यो मद् भक्तः स मे प्रियः ।।16।।

ज्याला कशाची अपेक्षा नाही, जो अंतर्बाह्य शुद्ध, चतुर, तटस्थ आणि दुःखमुक्त आहे, असा कर्तृत्वाचा अभिमान न बाळगणारा माझा भक्त मला प्रिय आहे. ॥ १२-१६ ॥

यो न ह्यष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति ।
शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ।।17।।

जो कधी हर्षयुक्त होत नाही, द्वेष करीत नाही, शोक करीत नाही, इच्छा करीत नाही, तसेच जो शुभ व अशुभ सर्व कर्मांचा त्याग करणारा आहे, तो भक्तियुक्त पुरुष मला प्रिय आहे. ॥ १२-१७ ॥

समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।
शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ।।18।।

जो शत्रू-मित्र आणि मान-अपमान यांविषयी समभाव बाळगतो, तसेच थंडी-ऊन, सुख-दुःख इत्यादी द्वंद्वांत ज्याची वृत्ती सारखीच राहते, ज्याला आसक्ती नसते ॥ १२-१८ ॥

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् ।
अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ।।19।।

ज्याला निंदा-स्तुती सारखीच वाटते, जो ईशस्वरूपाचे मनन करणारा असतो, जो जे काही मिळेल त्यानेच शरीरनिर्वाह होण्याने नेहमी समाधानी असतो, निवासस्थानाविषयी ज्याला ममता किंवा आसक्ती नसते, तो स्थिर बुद्धी असणारा भक्तिमान पुरुष मला प्रिय असतो. ॥ १२-१९ ॥

ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तिं पर्युपासते ।
श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ।।20।।

परंतु जे श्रद्धाळू पुरुष मत्परायण होऊन या वर सांगितलेल्या धर्ममय अमृताचे निष्काम प्रेमभावनेने सेवन करतात, ते भक्त मला अतिशय प्रिय आहेत. ॥ १२-२० ॥

ॐ तत्सदिति श्रीमद् भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः

Gita Quiz- गीतेवर आधारित प्रश्नोत्तरें

bhagavad-gita-quiz

भगवद्‌गीता हा प्राचीन भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. वेदांच्या अखेरच्या रचनेतील असलेला हा ग्रंथ ‘गीतोपनिषद’ म्हणूनही प्रसिद्ध आहे.  त्यात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.


सुमारे ५००० वर्षांपूर्वी मार्गशीर्ष शुक्ल एकादशी ह्या दिवशी श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली. यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.


महाभारतातल्या ‘भीष्म पर्वा’मध्ये गीतेचा अंतर्भाव आहे. महाभारतातल्या २५ व्या अध्याया पासून ते ४२ व्या अध्यायापर्यन्त संपूर्ण गीता येते. संस्कृत भाषेतल्या विविध अलंकारांचा वापर करून लिहिली गेलेली गीता छंदोबद्ध आहे. त्यामुळे भारतामधे ती ‘गायली’ जाते.


गीतेतील असलेले ७०० श्लोक खालीलप्रमाणे १८ अध्यायांत सांगितले आहेत:


अध्याय शीर्षक श्लोक
अर्जुनविषादयोग ४७
सांख्ययोग(गीतेचे सार) ७२
कर्मयोग ४३
ज्ञानकर्मसंन्यासयोग(दिव्य ज्ञान) ४२
कर्मसंन्यासयोग २९
आत्मसंयमयोग ४७
ज्ञानविज्ञानयोग ३०
अक्षरब्रह्मयोग २८
राजविद्याराजगुह्ययोग (परम गोपनीय ज्ञान) ३४
१० विभूतियोग(भगवंताचे ऐश्वर्य) ४२
११ विश्वरूपदर्शनयोग ५५
१२ भक्तियोग(श्रीकृष्णाची प्रेममयी सेवा) २०
१३ क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग ३४
१४ गुणत्रयविभागयोग २७
१५ पुरुषोत्तमयोग २०
१६ दैवासुरसंपद्विभागयोग २४
१७ श्रद्धात्रयविभागयोग २८
१८ मोक्षसंन्यासयोग(गीतेचा निष्कर्ष) ७८
  एकूण श्लोक ७००

गीतेची सुरुवात

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः। मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय॥“ या श्लोकापासून होते, आणि शेवट

‘यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः। तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम

या श्लोकाने होते. अशा पासून सुरू होऊन र्म ने संपणाऱ्या ७०० श्लोकांमध्ये पूर्ण धर्माचे सार आले आहे असे म्हटले तरी हरकत नाही.

जीवनविषयक तत्वज्ञान गीतेमध्ये जे सांगितले आहे, त्याचे काही काहीजण खालीलप्रमाणेही वर्गीकरण करतात-

कर्मयोग (अध्याय १-६)

भक्ती योग (अध्याय ७-१२)

ज्ञान योग (अध्याय १३-१८)


गीतेची अठरा नावे

गीता गंगा च गायत्री सीता सत्या सरस्वती।
ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तगेहिनी।।
अर्धमात्रा चिदानन्दा भवघ्नी भयनाशिनी।
वेदत्रयी पराऽनन्ता तत्त्वार्थज्ञानमंजरी।।
इत्येतानि जपेन्नित्यं नरो निश्चलमानसः।
ज्ञानसिद्धिं लभेच्छीघ्रं तथान्ते परमं पदम्।।

 


गीता, गंगा, गायत्री, सीता, सत्या, सरस्वती, ब्रह्मविद्या, ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या, मुक्तगेहिनी, अर्धमात्रा, चिदानन्दा, भवघ्नी, भयनाशिनी, वेदत्रयी, परा, अनन्ता और तत्त्वार्थज्ञानमंजरी (तत्त्वरूपी अर्थाच्या ज्ञानाचे  भंडार) या प्रकारे  (गीतेच्या) अठरा नावांना जो मनुष्य स्थिर मनाने नित्य जप करताो, तो शीघ्र ज्ञानसिद्धि आणि अंती परम पदाला प्राप्त होतो.


आज गीताजयंतीच्या शुभमुहूर्तापासून आपण श्रीमद् भगवद् गीतेवर आधारित क्विझ सुरू करीत आहोत.

आपला वेळ सत्कारणी लागण्यासाठी, आणि त्याचबरोबर त्यानिमित्ताने श्रीमद्भगवद्गीतेचे वाचन व्हावे या हेतूने हे क्विझ सुरू करीत आहोत.

आपण सर्वांनी वरील लेख पूर्ण वाचला असेल तर मग चला, आपण वरील लेखावर आधारित असलेल्या खालील प्रश्नांची उत्तरें देऊ यात.

भूपाळ्या-1 Morning holy prayers in Indian tradition

ganesha ganesh ganapati theresa tahara

Morning holy prayers in Indian tradition

प्रातःकाळी उठल्यानंतर सर्वात आधी सर्व देवांचे, संतांचे, स्मरण करण्याची आपली परंपरा आहे. आजकाल ती लोप पावत चालली आहे. बऱ्याच लोकांना प्रातःस्मरण करण्याची इच्छा असते, पण संबंधित साहित्य सहज उपलब्ध  नसते. या ठिकाणी आपले परंपरागत साहित्य, वेगवेगळ्या भूपाळ्या, इत्यादि एका ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्या उपक्रमातील पहिले पुष्प आज प्रकाशित करीत आहोत. यानंतर अजून भूपाळ्या, स्तोत्रे, इत्यादि या ठिकाणी प्रकाशित करण्याचा प्रयत्न राहील. 

आपण ब्लॉग ला subscribe केल्यास नवीन पोस्ट प्रकाशित होताच सर्वप्रथम आपणास नोटिफिकेशन मिळू शकेल. 

माधव भोपे 

ganapati

भूपाळी श्री गणपतीची

उठा उठा हो सकळिक । वाचे स्मरावा गजमुख ।
ऋध्दि-सिद्धींचा नायक । सुखदायक भक्तांसी ॥ ध्रु. ॥
अगीं शेंदुराची उटी । माथा  शोभतसे कीरिटी ।
केशरकस्तुरी लल्लाटीं । कंठी हार  साजिरा ॥ १ ॥
कानी कुंडलांची प्रभा । चंद्र-सूर्य जैसे नभा ।
माजीं नागबंदी  शोभा । स्मरता उभा जवळी तो ॥ २ ॥
कांसे पितांबराची धटी । हाती मोदकांची वाटी ।
रामानंद स्मरता कंठी । तो संकटी पावतो ॥ ३ ॥

shriram

भूपाळी रामाची

उठोनियां प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वयें ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥
राम योग्यांचें मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचें रक्षण । संरक्षण दासांचे ॥ १ ॥
रामे त्राटिका मारिली । रामें शिळा उध्दरिली ।
रामे जानकी पर्णिली । गणिका केली ते मुक्त ॥ २ ॥
रामें पाषाण तारिले । रामें दैत्य संहारिले ।
रामें बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥
रामें रक्षिले भक्तांसी । रामें सोडविलें देवांसी
रामदासाचे मानसीं । रामदासीं आनंद ॥ ४ ॥

vitthal-rukhumai

भूपाळी पंढरीची

उठा उठा हो वेगेंसी । चला जाऊं पंढरीसी ।
भेटों विठ्ठ्ल-रखुमाईसी । त्रिविध ताप हरतील ॥ ध्रु. ॥
चंद्रभागे करु स्नान । घेऊ पुंडलिकाचे दर्शन ।
तेथे भेटती संतजन । तेणे मन निवेल ॥ १ ॥
गंगा यमुना सरस्वती । कृष्णा वेण्या भागिरथी ।
तुंगभद्रा भोगावती । येती श्रीपति दर्शना ॥ २ ॥
तापी नर्मदा कावेरी । पंचगंगा गोदावरी ।
स्नाने केलिया बाहेरी । महादोष  हरतील ॥ ३ ॥
रामानंदाचे माहेर । क्षेत्र नाम पंढरपूर ।
माता पिता विश्वंभर  । पैलपार तरतील ॥ ४ ॥

shri vishnu-1

भूपाळी श्रीविष्णूची-1

राम कृष्ण विष्णु गोविंद ॥ नरहरि नारायण मुकुंद ॥ मना लागो हाचि छंद परमानंद पावसी ॥१॥


माधव मधुसूदन पुरुषोत्तम ॥ अच्युतांत त्रिविक्रम ॥ श्रीधर वामन मेघ:शाम पूर्णकाम वद वाचें ॥२॥


केशव जनार्दन संकर्षण ॥ दामोदर तो रमारमण ॥ वाचे वासुदेव स्मरण ॥ जन्ममरण त्या नाहीं ॥३॥


प्रद्युम्न श्रीरंग गोपाळ ॥ विश्वीं विश्वंभर घननीळ ॥ नंदनंदन देवकीबाळा ॥ दीनदयाळ स्मरावा ॥४॥


पद्मनाभ अधोक्षज ॥ ह्रषीकेश गरुडध्वज ॥ श्रीहरिनामें सहजीं सहज ॥ निजानंदें रंगसी ॥५॥

shri vishnu-2

भूपाळी श्रीविष्णूची-2  

[काशीराजकृत.]
उठि उठि वा पुरुषोत्तमा ॥ भक्तकाजकल्पद्रुमा ॥ आत्मारामा निजसुखधामा ॥ मेघ:शामा श्रीकृष्णा ॥१॥


भक्तमंडळी महाद्वारीं ॥ उभी तिष्ठती श्रीहरी ॥ जोडोनियां उभय करीं ॥ तुज श्रीहरी पहावया ॥२॥


सुरवर सनकादिक नारद ॥ विदुर उद्धव ध्रुव प्रल्हाद ॥ शुक भीष्म रुक्मांगद ॥ हनुमंत बळिराय ॥३॥


रिक्त पाणि न पश्यंती ॥ घेउनि आलें स्वसंत्ती ॥ आज्ञां सांप्रत सांगिजेती ॥ नाचत गर्जत हरिनामें ॥४॥


झाला प्रात:काळ परिपूर्ण ॥ करी पंचागश्रवण ॥ महामुद्गल  ब्राह्मण ॥ आशिर्वाद घे त्याचा ॥५॥


तुझा नामदेव शिंपी ॥ घेउनि आला आंगडें टोपी ॥ आतां नको जाऊं झोंपीं ॥ दर्शन देईं निज भक्तां ॥६॥


घेउनि नाना अलंकार ॥ आला नरहरी सोनार ॥ आला रोहिदास चांभार ॥ जोडा घेउनी तुजलागीं ॥७॥


मीराबाई तुजसाठीं ॥ दुग्धें तुपें भरोनि  वाटी ॥ तुझ्या लावावया ओठीं ॥ लक्ष लावुनी बैसली ॥८॥


कान्होपात्रा नृत्य करी ॥ टाळ मृदंग साक्षात्कारी ॥ सेना न्हावी दर्पण करीं ॥ घेउनि उभा राहिला ॥९॥


गूळ खोबरें भरोनि गोणी ॥ घेऊन आला तुका वाणी ॥ त्याच्या वह्या कोरडया पाणी ॥ लागो दिलें नाहीं त्वां ॥१०॥


गरुडपारीं हरिरंगणी ॥ टाळमृदंगाचा ध्वनी ॥ रागोद्धार हरिकीर्तनीं ॥ करी कान्हया हरिदास ॥११॥


हरिभजनाविण वायां गेलें ॥ ते नरदेहीं बैल झाले ॥ गोर्‍या कुंभारें आणिले ॥ खेळावया तुजलागीं ॥१२॥


निजानंदें रंग पूर्ण ॥ सर्वहि कर्में कृष्णार्पण ॥ श्रीरंगानुजतनुज शरण ॥ चरण संवाहन करीतसे ॥१३॥

अनंत चतुर्दशी- भगवान विष्णूंचे व्रत

anant chaturdashi

Anant Chaturdashi अनंत चतुर्दशी हे मुख्य करून भगवान विष्णूचे व्रत आहे.

आज अनंत चतुर्दशी. सर्वसाधारणपणे आपल्याला अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस हेच जास्त माहिती आहे. पण सार्वजनिक रित्या गणपती बसवण्याची पद्धत ही लोकमान्य टिळक यांच्या काळात म्हणजे अलीकडेच सुरू झालेली. गणपती चतुर्थीला बसवतात, आणि १० दिवसांच्या वास्तव्यानंतर चतुर्दशीला विसर्जन करतात अशी प्रथा सुरू झाली. पण काही जणांचे गणपती दीड दिवसांचेही असतात, तर काहींचे ५ दिवसांचे, काहींचे ७ दिवसांचे इत्यादि. पण अनंत चतुर्दशी चे महत्त्व पुरातन काळापासून वेगळ्याच गोष्टीसाठी आहे. ते म्हणजे अनंताचे व्रत.

हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला अतिशय महत्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा केली जाते. पूजेनंतर अनंत धागा बांधण्याची परंपरा आहे. या धाग्यात 14 गाठी मारल्या जातात. हा धागा रेशीम किंवा कापसाचा बनवला जातो. स्त्रिया डाव्या हातात आणि पुरुष उजव्या हातात हा अनंत धागा बांधतात. अनंत धागा बांधल्याने सर्व दु:ख आणि संकटे दूर होतात अशी धार्मिक मान्यता आहे. anant chaturdashi

अनंत चतुर्दशीचे महत्त्व 

अनंत चतुर्दशी साजरी करण्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. पुराणानुसार पांडवांनी जुगारात आपले संपूर्ण राज्य गमावले होते. त्यानंतर त्यांना 12 वर्षांचा वनवास आणि एक वर्ष अज्ञातवासात घालवावे लागले. या काळात पांडवांनी आपले वचन पूर्ण करण्यासाठी जंगलात वास्तव्य केले होते. त्यावेळी युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांला आपले राज्य परत मिळवण्याचा आणि दुःख दूर करण्याचा मार्ग विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने त्यांना सांगितले की जुगारामुळे माता लक्ष्मी तुझ्यावर नाराज आहे. तुम्हाला तुमचे राज्य परत मिळवायचे असेल तर तुम्ही अनंत चतुर्दशीचे व्रत ठेवा आणि भगवान विष्णूची पूजा करा. हे व्रत केल्याने तुम्हाला सर्व काही परत मिळेल. यानंतर श्रीकृष्णाने युधिष्ठिराला व्रताचे महत्त्व सांगणारी कथाही सांगितली. यानंतर युधिष्ठिराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि पांडवांना त्यांचे राज्य परत मिळाले.

अनंत चतुर्दशीची कथा

 प्राचीन काळी एक तपस्वी ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव सुमंत आणि पत्नीचे नाव दिक्षा होते. त्या दोघांना सुशीला नावाची पुण्यवान मुलगी होती. सुशीला लहान असतानाच तिची आई दीक्षा मरण पावली. काही काळानंतर सुशीलाचे वडील सुमंत यांनी कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केले. काही दिवसांनंतर सुशीलाचा विवाह ब्राह्मण कौंडिण्य ऋषीशीही झाला. सुशीलाच्या निरोपाच्या वेळी तिची सावत्र आई कर्कशा हिने काही विटा आणि दगड बांधून जावई कौंडिण्याला दिले. कौंडिण्याला कर्कशाचे हे वागणे खूप वाईट वाटले. दुःखाने तो आपल्या पत्नीसह निघून गेला. वाटेत रात्र झाली म्हणून तो एका नदीकाठी थांबला आणि संध्याकाळी भगवंताचे नामस्मरण करू लागला.  त्याचवेळी सुशीलाला अनेक स्त्रिया कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा करताना दिसल्या. सुशीलाने त्या स्त्रियांना पूजेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी तिला भगवान अनंतांची पूजा आणि त्याचे महत्त्व सांगितले. सुशीलानेही त्याच वेळी व्रत केले आणि 14 गाठींचा धागा बांधून कौंडिण्याकडे आली. कौंडिण्याने सुशीलाला त्या धाग्याबद्दल विचारले तेव्हा सुशीलाने त्याला सर्व प्रकार सांगितला. कौंडिण्याने हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला आणि तिच्या हातावर बांधलेला अनंत धागा काढून आगीत टाकला. यानंतर त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि तो दुःखी राहू लागला. खूप दिवस उलटल्यानंतर कौंडिण्याने सुशीलाला या गरिबीचे कारण विचारले तेव्हा तिने भगवान अनंतांचा धागा जाळल्याची आठवण करून दिली. हे ऐकून कौंडिण्य अनंत सूत्र घेण्यासाठी वनाकडे निघाला. अनेक दिवस जंगलात शोधाशोध करूनही जेव्हा त्याला अनंत सूत्र सापडले नाही तेव्हा तो निराशेने जमिनीवर कोसळला. त्यानंतर तेथे भगवान विष्णू प्रकट झाले आणि कौंडिण्याला उद्देशून म्हणाले. हे कौंडिण्या तू माझा तिरस्कार केला होता म्हणूनच तुला खूप त्रास सहन करावा लागला. आता तुला पश्चात्ताप झाला आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता घरी जाऊन अनंत चतुर्दशीचे व्रत कर. 14 वर्षे उपवास केल्यावर तुझे दुःख दूर होईल आणि तू धनवान होशील. त्यानंतर कौंडिण्याने  अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि त्याची सर्व संकटातून सुटका झाली.

या दिवशी अनंत आणि अनंती म्हणजेच चौदा गाठींचा धागा बांधला जातो, जो भगवान विष्णूच्या १४ जगांचे प्रतीक मानला जातो. अनंत चतुर्दशीच्या पूजेच्या दिवशी भगवान विष्णूच्या सहस्त्रनामाचा पाठ करणे अत्यंत शुभ मानले जाते. अनंतच्या १४ गाठी १४ जगांचे प्रतीक मानले जातात. चौदा भुवने – सप्त स्वर्ग आणि सप्त पाताळ मिळून चौदा भुवने होतात.

 सात स्वर्ग लोक

भूलोक, भुवर लोक, स्वर्लोक, महालोक, जनलोक, तपलोक, सत्यलोक

सात पाताळ लोक

अतल, वितल, सुतल, महातल, रसातल, तलातल, पाताळ

आपल्या सणावारांचा प्रारंभ प्रतिवर्षी नागपंचमीपासून होतो आणि त्यातील एक पर्व अनंत चतुर्दशीला संपते. अनंत हे विष्णू चे नाव आहे. अनंत हे एका महानागाचेही  नाव आहे.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णूची ‘अनंत’ ह्या नावाने पूजा केली जाते. दर्भपासून अनंतरूपी नाग बनवला जातो. आणि त्याची पूजा केली जाते.

१४ प्रकारची फुले, १४ प्रकारची फळे, १४ प्रकारची धान्ये आणि १४ प्रकारचे नैवेद्य

ह्या व्रतामध्ये पूजा झाल्यानंतर विसर्जन मागाहून दुस-या दिवशी किंवा गणपती पूजेप्रमाणे दोन, पाच दिवसांनी अशाप्रकारे न करता त्याच दिवशी पूजेनंतर काही वेळाने करतात.

हे अनंताचे व्रत १४ वर्षे आचरावे असे सांगितलेले असले तरी अनेक लोक ते नेहमीसाठी पाळतात.

अनंत चतुर्दशीचे महत्त्व अधिक वाढविणारा योग म्हणजे गणेशोत्सवातील मूर्तीचे विसर्जन सगळीकडे थाटामाटात केले जाईल. जलाशयात मूर्ती विसर्जित करावयाच्या असा धर्मनियम असल्यामुळे समुद्र, नद्या, विहिरी अशा ठिकाणी गणेशभक्त वाजतगाजत जाऊन मूर्तीचे विसर्जन करतात. सगळीकडे आनंदाचा जल्लोष चालू असतो आणि अशा जल्लोषामुळे अनंत चतुर्दशी हा अनंताच्या व्रताचा दिवस आहे, ही गोष्ट फारशी कोणाच्या ध्यानातच येत नाही. असो. त्यानिमित्ताने या अनंताच्या व्रताची माहिती सर्वांना व्हावी म्हणून हा प्रपंच. गणेश विसर्जनाच्या सर्वांना शुभेच्छा! (खरं तर गणेश विसर्जनाच्या शुभेच्छा हा शब्दप्रयोग किंवा वाक्यप्रयोग कितपत योग्य आहे हे माहिती नाही.) गणपतीबाप्पा मोरया पुढच्या वर्षा लवकर या….!

संकलक- माधव भोपे