Emotional Intelligence भावनिक बुद्धिमत्ता
goodworld.in- A website by Madhav Bhope
आपल्याला I.Q.( Intelligence Quotient) म्हणजेच ‘बुध्ढ्यांक’ या शब्दाचा परिचय चांगल्या प्रकारे आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिनेट याने ही संकल्पना मांडली आणि नंतर अमेरिकन शास्त्रज्ञांनी त्यात भर घालून, बुद्धिमत्तेचे मोजमाप करण्यासाठी काही पद्धती निश्चित केल्या. IQ = (mental age/chronological age) x 100. पण नंतरच्या काळात एखाद्या व्यक्तीची गुणवत्ता मोजण्यासाठी I.Q. च्या उपयोगितेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. आणि जीवनातल्या अनेक क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले, की केवळ ‘बुध्ढ्यांक’ हा यशस्वी जीवनाचे गमक होऊ शकत नाही, तर ज्या व्यक्ति आपल्या भावनांचे योग्य प्रकारे नियमन करू शकतात, त्या आयुष्यात जास्त यशस्वी होतात. यशस्वितेचा संबंध बुद्धिमत्तेपेक्षा, भावनांचे योग्य रित्या नियमन करण्याशी जास्त आहे असे दिसून आले. मानसशास्त्री Daniel Goleman याने 1990 च्या सुमारास ही संकल्पना, त्याच्या, “Emotional Intelligence: Why It Can Matter More Than IQ.” या पुस्तकाद्वारे मांडली.

वरील सर्व तांत्रिक आणि academic माहिती जरी बाजूला ठेवली, तरी आपल्या आजूबाजूला पाहिले तरी वरील गोष्ट खरी आहे असे जाणवेल.
What is Emotional Intelligence?
भावनिक बुद्धिमत्ता (EQ) म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या भावना ओळखण्याची, समजून घेण्याची, व्यवस्थापित करण्याची आणि प्रभावीपणे वापरण्याची क्षमता तसेच इतरांच्या भावना ओळखण्याची, समजून घेण्याची आणि प्रभावित करण्याची क्षमता ही रोजच्या जीवनात, तसेच जीवनात येणाऱ्या आव्हानांना यशस्वीरीत्या हाताळण्यास अत्यंत आवश्यक आहे असे दिसून येते.
ही संकल्पना जरी पाश्चात्य जगात आत्ता आत्ता मान्य पावत असली तरी, आपल्याकडे, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू या नावाने पारंपारिकरित्या ओळखले जाते. आणि त्यांना ताब्यात ठेवण्याविषयीही सांगितले जाते. पण एखाद्या विषयाची अति परिचयात अवज्ञा व्हावी तसे या विषयी झाले आहे असे वाटते.
वरील भावना जर ताब्यात नसतील, तर कमालीचा क्रोध, अस्वस्थता, कंटाळा, भीती, निराशा, चिडचिडेपणा, अपराधी भावना, न्यूनगंड, एकाकीपणा या नकारात्मक भावनांना माणसाचा ताबा घ्यायला वेळ लागत नाही, आणि व्यक्ति जगापासून एकटी पडत जाते, याउलट भावनांचे नियंत्रण ज्यांना जमते, त्यांच्यामध्ये प्रशंसा, कृतज्ञता, कुतूहल, उत्साह, उत्कटता, दृढनिश्चय, लवचिकता, आत्मविश्वास, आनंदीपणा, चैतन्य या भावना दिसून येतात.
असे म्हटले जाते, की बुध्ढ्यांक I.Q. हा एका विशिष्ट वयानंतर वाढत नाही. पण असे दिसून आले आहे की E.Q. हा लवचिक आहे, आणि प्रयत्नाने, अभ्यासाने, वाढवता येऊ शकतो.
How Emotional Intelligence can be measured?
पाश्चात्य मानसशास्त्रीनी E.Q. चे मूल्यमापन करण्यासाठी विविध पद्धती विकसित केल्या आहेत. त्यात self-awareness, self-management, social awareness, and relationship management अशा चार मापदंडावर मूल्यमापन केले जाते.
आजच्या धकाधकीच्या आणि चढाओढीच्या जीवनात अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यन्त सर्व जण कुठल्या ना कुठल्या छोट्या किंवा मोठ्या तणावाला नित्य सामोरे जातात असे दिसून येते. त्यातील सगळ्यात मोठा तणाव हा कुठल्या ना कुठल्या कारणामुळे येणारा राग महणजेच क्रोध. किंवा कुठल्या ना कुठल्या गोष्टीची, परिस्थितीची वाटणारी वास्तव किंवा अवास्तव भीति. या भावनांचा निचरा झाला नाही, तर लवकर किंवा उशीरा त्या कुठल्या ना कुठल्या शारिरिक किंवा मानसिक रोगात परिवर्तित होतात. काही लोक या भावनांना, बिनदिक्कतपणे, त्यांच्या परिणामांचा विचार न करता, मनाला येईल त्या प्रकारे व्यक्त करतात.
पण अशा अनियंत्रित प्रकटीकरणामुळे त्या व्यक्तीचे कधीही न भरून येणारे नुकसान होत असते. आणि ती दुसऱ्यांना आणि स्वतःलाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष इजा करून घेत असते. अशी व्यक्ति समाजापासून दूर जाते आणि एकटी पडते. याउलट काही व्यक्ति क्रोध, भीती, निराशा, दुःख या भावना मनातल्या अगदी आतल्या कप्प्यात दडवून ठेवतात. सभ्यपणाचा मुखवटा कोणासमोरही उतरून ठेवता येत नसल्यामुळे, आणि या भावना मनातल्या मनात दाबल्यामुळे, त्यांची प्रचंड घुसमट होते, आणि त्यामुळे निरनिराळ्या मनोकायिक (psychosomatic) रोगांना आमंत्रण मिळते.
Psychosomatic diseases.
मनोकायिक विकार
साध्या अपचन, अॅसिडिटी पासून ते पोटदुखी, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, अल्सर, पाळीच्या तक्रारी, बीपी, मधुमेह, हृदयाशी संबंधित रोग, अशा कुठल्याही रोगाचे मूळ हे मनोकायिक असू शकते.
मग काय करायचे? आपल्याला राग आल्यावर दुसऱ्याला ठोकून काढायचे, शिव्या द्यायच्या, की मनातल्या मनात चिडत राहायचे? हा प्रश्न आपणा सर्वांनाच पडतो. आपल्या मनातल्या सुप्त इच्छा मारधाडीच्या हिन्दी सिनेमातील हीरो पूर्ण करतो म्हणून आपण असे सिनेमे आवडीने पाहतो. पण हे प्रॅक्टिकल नाही, हे आपल्याला चांगलेच माहिती असते.
आपण सहसा हे गृहित धरलेले असते, की या भावना आपल्याला अशाच छळणार, हा आपला स्वभावच आहे, आणि त्याला काही औषध नाही, किंवा ही जगाची रीतच आहे. फार झाले तर आपल्यापेक्षा कमजोर व्यक्तींवर आपला राग काढला जातो आणि बलदंड किंवा कुठल्याही प्रकारे आपल्यापेक्षा वरचढ असलेल्यांपुढे नरमाईची भूमिका घेतली जाते.
पण emotional intelligence द्वारे, आपल्या भावनांना योग्य ती वाट करून दिली जाऊ शकते, स्वतःला किंवा दुसऱ्याला कोणतीही इजा न करता. इतकेच नव्हे, तर वरकरणी harmful घातक वाटणाऱ्या भावनांना योग्य रित्या channelize करून, योग्य रित्या वळवून त्यांना आपली शक्ति बनवली जाऊ शकते, किंवा हे शक्य झाले नाही तरी, कमीत कमी, भावनांचा उपद्रव कमी करता येऊ शकतो- हे एक life skill जीवनातील कौशल्य आहे, आणि ते उपजत नसले तरी, प्रयत्नाने, अभ्यासाने, आत्मसात करता येऊ शकते. जसे आपण मागील एका लेखात पाहिले होते, समर्थांनी दास बोधात सांगितल्याप्रमाणे,
रूप लावण्य अभ्यासिता न ये |
सहज गुणास न चले उपाये |
कांही तरी धरावी सोये |
आगंतुक गुणाची || (दासबोध- २-८-३१)
या बाबत आपल्या पूर्वजांनी किती कार्य करून ठेवले आहे, ते यथावकाश, पुढील काही भागांमध्ये पाहू.
Related
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.