https://goodworld.in A website by Madhav Bhope

फेसबुक तुम्हाला तुमच्या जुन्या आठवणी कधी कधी समोर आणून ठेवते. आज अशीच एक 9 वर्षांपूर्वीची केलेली पोस्ट फेसबुकने समोर आणून ठेवली- अजून कितीतरी पल्ला गाठायचा आहे. दि. १७ मार्च २०१७ रोजी लिहिलेली. 

आता सध्या काय परिस्थिति आहे, माहिती नाही. पण त्यावेळी जे वाटले, ते तसेच्या तसेच व्यक्त केले होते.  ते आज या ब्लॉग वर जसेच्या तसे देत आहे. 

अजून कितीतरी पल्ला गाठायचा आहे!

 
अमेरिकेत प्रत्येक विमानतळावर प्रवाशांची व त्यांच्या सामानाची अत्यंत कसोशीने, व सविस्तर तपासणी, व तीही वेळेचा अजिबात अपव्यय न करता, होतांना पाहिली. तेथील सरकारी अधिकारी सतर्क व कर्तव्यदक्ष दिसले. याचा अनुभव आम्हाला ड़ॅलसहून नायगारा येथे जातांना व येतांना आला.
तसेच अमेरिकेहून परतीच्या प्रवासात ड़ॅलस येथील विमानतळावरही हा अनुभव पुरेपूर आला. तिथे security check अत्यंत सविस्तर, आणि तोही कमीत कमी वेळात केला गेला.
 
परतीच्या प्रवासात आम्ही मुंबई विमानतळावर उतरलो, तेंव्हा security check चा काही प्रश्न नव्हता , पण कस्टम क्लीअर करतांना आम्हाला जो अनुभव आला, त्यावरून, अजून आपल्या देशाला मूल्यांच्या बाबतीत किती पल्ला गाठायचा आहे याची जाणीव झाली.
 
आम्ही मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलो आणि आमचे सामान घ्यायला फिरत्या पट्ट्याजवळ थांबलो. तेंव्हा एक मनुष्य आमच्याजवळ आला आणि हलक्या आवाजात विचारू लागला, “ सर आपको कहाँ जाना है?” आम्हाला कस्टम क्लीअर करून जेट एअरवेज च्या औरंगाबाद च्या डोमेस्टिक फ्लाईट ने जायचे होते, हे त्याला कळाल्यावर म्हणू लागला, “सर मै आपको वहाँतक छोड देता हूँ” मी त्याला विचारले, जेट एअर वेज का काऊंटर कहाँ है? तर “बहोत दूर है सर, मै आपको वहाँतक आपके सामानके साथ छोड देता हूँ” म्हणून म्हणाला. मी त्याला विचारले, “किती पैसे घेशील?” तर कुछ नाही साब, एक हजार रुपये दे दिजीये, बस!” म्हणून म्हणाला!
 
मी त्याच्याकडे नंतर लक्ष दिले नाही; पण पुढे कस्टम क्लीअर केल्यानंतर, जेट चे काऊंटर समोरच असलेले दिसले! पण याहून ही पुढे, कस्टम काऊंटर वरील प्रकार पाहून धक्काच बसला. अमेरिकेतून परत येणाऱ्या भारतीय प्रवाशांना, त्यांच्याजवळ घोषित करण्यासारखे (रु. ५००००/ च्या आत) काही कर आकारणी योग्य सामान नसल्यास, ग्रीन चॅनेल मधून जाता येते, जेणेकरून त्याला लवकर बाहेर पडता येईल. आमच्याजवळ तसे काहीच सामान नसल्यामुळे immigration counter चा शिक्का लागल्यावर आम्ही कस्टम च्या ग्रीन चॅनेल च्या रांगेमध्ये उभे राहिलो.
goodworld_Gemini_Generated_Image_wo6knqwo6knqwo6k
 
त्या ठिकाणी, अर्थातच, भरपूर गर्दी होती, व येणाऱ्या प्रवाशांचे सामान X-Ray machine मधून scan होऊन पुढे जात होते. पण ही सर्व तपासणी अत्यंत जुजबी होत असल्याचे दिसले. आमच्याजवळ पाच मोठ्या बॅगा होत्या व हातातील पर्स, पाऊच व जेवणाचा डबा असे ३ छोटे डाग होते. बऱ्याच सूटकेस त्या यंत्रातून जात होत्या तर बऱ्याच प्रवाशांना बाजूने, तसेच न तपासता ही जाऊ दिले जात होते. आम्हालाही तेथील एका सब स्टाफ ने आमच्या दोघांच्या, फक्त छोट्या पर्स इत्यादि, मशीन मध्ये टाकायला सांगितल्या व सर्व मोठ्या बॅग्ज बाजूनेच, मशीनमधून न बघताच, पुढे न्यायला सांगितल्या. आमच्या छोट्या पर्स इत्यादि, मशीन मधून बाहेर आल्या. तिथे प्रवाशांचे सामान हाताळणाऱ्या एका स्टाफने, हिंदीमध्ये, “सर… कुछ बक्षिसी..” असे म्हणून आमच्याकडे क्षणभर अपेक्षेने पाहिले. आम्ही त्याचे म्हणणे न ऐकल्यासारखे करून आमच्या सामानाच्या trolleys घेऊन पुढे निघालो. पण हा प्रकार पाहून मला धक्काच बसला. आंतरराष्ट्रीय विमानतळावर हा प्रकार! माझ्या बॅग्जमध्ये, काही कस्टम ड्युटी लागणाऱ्या वस्तू नव्हत्या म्हणून बरे. पण माझ्या सामानात जर अशा अत्यंत महागड्या वस्तू असल्या असत्या, तर त्या कस्टम ड्युटी न भरताच मला सहज बाहेर आणता आल्या असत्या. आणि असे करू दिल्याबद्दल, तेथील स्टाफ ला १००-२०० रुपये दिल्यास, कोणीही, लाखो रुपयांची कस्टम ड्युटी सहज चुकवू शकला असता! आता ह्या प्रकारची तक्रार कुणाकडे व कशी करायची?
तिथून पुढे जवळच असलेल्या जेट एअरवेज च्या काऊंटर वर आम्ही आलो. तेथील व्यक्तीने आमच्या सामानाचे वजन केले, आणि आम्हाला excess luggage चा चार्ज लागेल म्हणून सांगितले. आमच्या luggage चे वजन international standards प्रमाणे बरोबर होते, पण domestic flight च्या मानाने जास्त होते, म्हणून मी काही न बोलता excess luggage चे पैसे भरले. पण नंतर मला सचिन ने सांगितले की international flight ने येणाऱ्या passengers ला तेवढे excess luggage allowed असते. जेट एअरवेज च्या कर्मचाऱ्यांनी आमच्या बॅगान्वरील international flight चे tags धडधडीत दिसत असूनही, आम्हाला वरील नियम सांगितला तर नाहीच, पण आमच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन आम्हाला निष्कारण भुर्दंड बसवला. ही आपल्या येथील सचोटी!
त्यामुळे असे वाटते की सचोटी, प्रामाणिकपणा, इत्यादि मूल्ये एखाद्या समाजात मूलतः रुजावी लागतात, आणि त्या दृष्टीने आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे!
——******——-
माधव भोपे
१६.३.२०१७

Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

Say what you feel