जिवतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ
jara jivantika pujan
आपल्याकडे आषाढ महिन्याच्या अमावस्येला दीपपूजन केले जाते, ही खरोखर किती उदात्त परंपरा आहे! दिवा हे ज्ञानाचं प्रतीक आहे. आपल्या आयुष्यातील अज्ञान रूपी अंधाराचा नाश करून ज्ञान रूपी प्रकाश आपल्या आयुष्यात यावा, यासाठी, ज्ञानाच्या प्रतीक असलेल्या दिव्याचे, प्रकाशाचे पूजन केले जाते. दिव्याला वंशवृद्धीचे प्रतीक ही मानतात. एका दिव्याने हजारो दिवे उजळले जातात, तसेच एक ज्ञानी व्यक्ति हजारो लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आणते. आणि जेंव्हा घरातील गृहिणी दीप पुजा करते, घरातील सगळे दिवे धुवून पुसून, लख्ख करून, त्यांची पूजा करते, त्यांना प्रज्ज्वलित करते, आणि घरातील लहान मुले ते पाहतात, घरातील मोठी माणसे, या सर्वामागील अर्थ त्यांना समजावून सांगतात, तेंव्हा नकळतच मुलांवर अतिशय योग्य असे संस्कार होत असतात.
अमावस्येनंतर दुसर्या दिवशीपासून सुरू होतो, पवित्र श्रावण मास!
श्रावण मासात घरोघरी जिवती पूजन केले जाते. jara jivantika pujan
जिवतीची प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेच पूजन मातृशक्ती कडून केलं जातं व आपल्या अपत्यांच्या मांगल्याची प्रार्थना केली जाते.
या एकाच प्रतिमेत चार वेगवेगळ्या देवतांच्या, वरवर पाहता परस्परांशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातील प्रतिमांचा काय अर्थ आहे हे आज समजून घेणार आहोत.
जिवती प्रतिमेत प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा कृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा- जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुध – बृहस्पती (गुरु) यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पूजले जाते त्याची कारण मीमांसा…
भगवान नरसिंह
भगवान विष्णूंचा चवथा अवतार असलेले नरसिंह, आपल्या बाल भक्तासाठी प्रगट झाले, ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपू पासून म्हणजेच दैत्यांपासून रक्षण करणे याच मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकांचा रक्षक आणि बाल भक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात.
नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात, जसे उंचावरून पडणे, अन्नातून कधी विषबाधा होणे, आगीपासून होणारी हानी इत्यादी असे समजले जाते.
कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-
त्यानंतर येतो कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण-
यातील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्हीही श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण जर कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल कि या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळात असतांना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि कृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या- बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरटपटणाऱ्या प्राण्यांमध्ये मुख्य. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असतांना बालकांवर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा कृष्ण येथे कालियामर्दन रूपात पुजला जातो.
म्हणजेच…
कालियादमनक कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून जसे खेळतांना येणाऱ्या आपत्ती, पाण्यापासूनचे संकट, सरपटणाऱ्या प्राण्यांचे भय इत्यादींपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळांवर येणाऱ्या संकटांपासून हे दोन्ही देव बालकांचे रक्षण करतात म्हणून जिवती प्रतिमेत त्यांचे प्रथम स्थान.
जरा व जिवंतिका
नंतर येतात त्या जरा व जिवंतिका
जरा व जिवंतिका या यक्ष गणातील देवता.
जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते.
मगधनरेश बृह्दरथ याला दोन राण्या होत्या. दोन्हीही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम होते. परंतु राजाला संतान नसल्यामुळे राजा दुःखी असतो.
याच सुमारास नगराजवळील उपवनात ऋषी चंडकौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्यांचे दर्शन घेऊन आपले दुःख त्यांना सांगतो.
ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे समान भाग करून राण्यांना देतो.
कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो परंतु केवळ अर्धा- अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना राजा सेवकांना सांगून जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिणी जात असते.
ती त्या दोन्ही तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधण्याच्या कलेने ती दोन्ही शकलं सांधते. जरा ते सांधलेले अर्भक संध्यासमयास बृह्दरथ राजाला आणून देते.
जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंघ ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रीत्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो. त्याच प्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरु करतो, अशी ही जरा देवी. तिची सखी जिवंतिका. जिवंतिका या शब्दाचा अपभ्रंश जिवती. जिवंतिकेचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकाच्या दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशा रूपात दाखवतात.
बुध व बृहस्पति –
प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात बुध व बृहस्पति –
बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो. तर बृहस्पति (गुरु) वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व, वाक्पटुत्व इत्यादी गुण प्राप्त होतात. तर बृहस्पतिच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती, विवेकबुद्धी जागृत होते.
बुधाचं वाहन हत्ती – हत्ती हे उन्मत्ततेचं प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उन्मत्तता आपल्या बुद्धिमत्तेने, व्यक्तित्वाचा अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरुन लक्षात येते.
बृहस्पतीचं वाहन वाघ – हे अहंकाराचा प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिकटतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. त्यावर आपण ज्ञानाच्या, गुरुकृपेच्या आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते.
म्हणूनच बुध – बृहस्पती यांना सुद्धा जिवती प्रतिमेत स्थान मिळालं.
प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता, आणि नंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारे ग्रह देवता असा हा जिवती प्रतिमेचा क्रम.
एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जिवती पूजन. जगातील सर्व प्राणिमात्रांच्या उज्वल भविष्याची, रक्षणाची प्रार्थना …
म्हणजेच, जिवती पूजन.
जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी।
रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते।।
साभार,संग्रहित
Discover more from Blissful Life
Subscribe to get the latest posts sent to your email.