https://goodworld.in A website by Madhav Bhope

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-4

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-4

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-3   वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

मागील भागावरून पुढे चालू 

१७ व्या श्लोकाच्या दुसऱ्या ओळीपासून कवच सुरु होते.

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥17॥

पूर्व दिशेला ऐन्द्री (इंद्र शक्ति), तू माझे रक्षण कर. आग्नेय दिशेला अग्निशक्ति तू माझे रक्षण कर.

आठ दिशांची माहिती आपणा सर्वांना आहेच. तरीही, उजळणीसाठी आपण अष्टदिशांचे चित्र पाहू

Durgadevi kavach

देवी कवचामध्ये पूर्व दिशेपासून सुरुवात करून, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य, उत्तर, ईशान्य अशाप्रकारे क्रमाने सर्व दिशांनी ती देवी माझे रक्षण करो अशी प्रार्थना केलेली आहे. वरील आठ दिशांच्या शिवाय, ऊर्ध्व आणि अध अर्थात वर आणि  खाली या प्रकारे १० दिशा झाल्या. म्हणून एवं दश दिशो रक्षेच्चामुण्डा शववाहना।

याशिवाय, पुढे, मागे, डावीकडे आणि उजवीकडे:–अग्रतः म्हणजे पुढे, आणि  पृष्ठतः म्हणजे मागे, जया आणि विजया देवी माझे रक्षण करोत. डाव्या बाजूला अजिता आणि दक्षिण म्हणजे उजव्या बाजूला अपराजिता माझे रक्षण करो. १७ ते ४२ या श्लोकांत विविध अंगांचे आणि संकल्पनांचे रक्षण करण्याविषयी देवीची विविध नांवे घेऊन प्रार्थना केली आहे.

कवचामध्ये उल्लेख केलेले विविध अवयव आणि त्यांचे रक्षण करणाऱ्या विविध देवतांची माहिती बघूयात

1

शिखा (शेंडी)

उद्योतिनी

2

मूर्ध्नि (मस्तक भाग)

उमा

3

ललाट (कपाळ)

मालाधरी

4

भुवया

यशस्विनी

5

भ्रूमध्य

त्रिनेत्रा

6

नाकपुड्या (नासिका)

यमघण्टा

7

दोन्ही डोळ्यांचा मध्यभाग

शङ्खिनी

8

श्रोत्र (कान)

द्वारवासिनी

9

कपोल (गाल)

कालिका

10

कर्णमूल

शांकरी

11

नासिका (नाक): इथे नाकपुड्या आणि नाक हे दोन वेगवेगळे कल्पिले आहेत)

सुगन्धा

12

उत्तरोष्ठ(वरील ओठ)

चर्चिकादेवी

13

अधरोष्ठ(खालचा ओठ)

अमृतकला

14

जिंव्हा

सरस्वती

15

दात

कौमारी

16

कण्ठप्रदेश

चण्डिका

17

घण्टिका (गळ्याची घाटी)

चित्रघण्टा

18

तालुका (टाळू)

महामाया

19

चिबुक (हनुवटी)

कामाक्षी

20

वाचा

सर्वमङ्गला

21

ग्रीवा (गळा)

भद्रकाली

22

पृष्ठवन्श(मेरुदण्ड्)

धनुर्धरी

23

बहिः कण्ठ(कण्ठाचा बाहेरील भाग)

नीलग्रीवा

24

नलिका(कण्ठनळी)

नलकूबरी

25

स्कन्धयोः (दोन्ही खांदे)

खड्गिनी

26

दोन्ही बाहू म्हणजे दण्ड

वज्रधारिणी

27

दोन्ही हात

दण्डिनी

28

अङ्गुली(हाताची बोटें)

अम्बिका

29

नखें

शूलेश्वरि

30

कुक्षि (कोख, उदर) पहा: वामकुक्षी

कुलेश्वरी

31

स्तन

महालक्ष्मी

32

मन

शोकविनाशिनी

33

हृदय

ललितादेवी

34

उदर

शूलधारिणी

35

नाभि

कामिनी

36

गुह्य

गुह्येश्वरी

37

मेढ्र(लिंग)

पूतना आणि कामिका

38

गुदा

महिषवाहिनी

39

कटी (कंबर)

भगवती

40

जानु (गुडघे)

विन्ध्यवासिनी

41

जंघा(म्हणजे पोटऱ्या)

महाबला, सर्व कामना पूर्ण करणारी

42

गुल्फ(पायाचे घोटे)

नारसिंही

43

पादपृष्ठ(पायांचा वरचा भाग)

तैजसी

44

पायाची बोटें

श्री देवी

45

पायाचे तळवे

तलवासिनी

46

नखें(पायाची)

दंष्ट्राकराली

47

केश

ऊर्ध्वकेशिनी

48

रोमकूप अर्थात, शरीरावरील रोमछिद्र

कौबेरी

49

त्वचा

वागीश्वरी

50

रक्त, मज्जा, वसा,मांस, अस्थि, मेद

सप्त धातूंपैकी सहा धातू: रक्त-blood, मज्जा- bone marrow and nervous tissue,

वसा-म्हणजे रक्तामध्ये स्थित स्नेह (ज्याला आजकालच्या भाषेत fatty acid म्हणता येईल), मांस म्हणजे स्नायू म्हणता येईल, अस्थि म्हणजे हाडें, आणि मेद म्हणजे चरबी किंवा fat. वरील सर्व गोष्टी आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत हे ओघानेच आले.

पार्वति

51

अंत्र म्हणजे आतडे किंवा gut.

कालरात्री

52

पित्त (शरीरात अन्न पचविण्यासाठी पित्त आवश्यक आहे) म्हणजेच वेगवेगळे पाचक रस.

मुकुटेश्वरी

53

पद्मकोश म्हणजे मूलाधार आदि कमलकोश

पद्मावती

54

कफ (कफ म्हणजे आपण समजतो तसा चिकट पदार्थ नव्हे, आयुर्वेदात कफ संकल्पना वेगळी आहे)

चूडामणी

55

नखांचे तेज

ज्वालामुखी

56

शरीरातील समस्त संधि (सांधे)

अभेद्या (जिचे भेदन कोणतेही अस्त्र करू शकत नाही)

57

शुक्र

ब्रह्माणी

58

छाया

छात्रेश्वरी

59

अहंकार, मन, बुद्धि

धर्मधारिणी

60

प्राण, अपान, व्यान, उदान, समान हे पंचप्राण

वज्रहस्ता

61

प्राण

कल्याण शोभना

62

रस, रूप, गन्ध, शब्द, स्पर्श, हे पाच विषय ग्रहण करतांना

योगिनी

63

सत्व, रज आणि तम हे तिन्ही गुण

नारायणी

64

आयुष्य

वाराही

65

धर्म

वैष्णवी

66

यश, कीर्ति, लक्ष्मी, धन, विद्या

चक्रिणी

67

गोत्र

इंद्राणी

68

पशू

चंडिका

69

पुत्राचे रक्षण

महालक्ष्मी

70

भार्येचे रक्षण

भैरवी

71

पंथ (अर्थात, while travelling)

सुपथा

72

मार्ग

क्षेमकरी

73

राजाच्या दरबारी

महालक्ष्मी

74

सर्व ठिकाणी

विजया

आपल्याकडे सर्व देवांची कवचें प्रसिध्द आहेत. रामरक्षा हेही एक प्रकारचे कवच आहे, आणि   डोक्यापासून ते पायापर्यंत च्या अवयवांचा उल्लेख आहे. आपल्यापैकी काहींनी योगनिद्रेचा class कधी केला असेल. त्यामध्ये, शरीराच्या एकेक अवयवांवर आपला consciousness घेऊन जाऊन, शरीराचा तो तो भाग शिथिल होत आहे, अशी कल्पना करायची असते.

देवी कवचामध्ये आपल्या शरीराचे बाह्यभाग, आणि बरेच अंतर-अवयव यांच्या कडे आपले ध्यान  (consciousness) घेऊन जाऊन, त्या त्या भागांना, किंवा, अंतर्गत अवयवांना, देवीच्या एकेक नावाशी, रूपाशी, जोडले आहे, आणि त्या त्या भागाचे रक्षण करण्याची प्रार्थना केली आहे. या कवचात स्थूल अवयवांसोबत काही सूक्ष्म गोष्टी, आणि काही concepts ही जोडले आहेत. त्यातील, सत्व, रज आणि तम हे गुण, रस, रूप, गन्ध, शब्द, स्पर्श, हे पाच विषय ग्रहण करणारी इंद्रियें. (बाह्य इंद्रियें नव्हे, तर त्या त्या संवेदना जाणवणारी मेंदूतील centres), यांचा उल्लेख आहे.

वरील सर्व गोष्टी लक्षात येऊ शकतात. तसेच, मन आणि बुद्धि यांचे रक्षण कर, हेही लक्षात येऊ शकते. पण अहंकार? आपल्या मनात कदाचित अशी शंका येऊ शकते, की माझ्या अहंकाराचे रक्षण कर, असे कसे म्हटले जाऊ शकते? कारण अहंकार हा शब्द आपल्याकडे सहसा तो मनुष्य फार अहंकारी आहे, म्हणजे गर्विष्ठ आहे, अशा अर्थाने वापरला जातो. अहंकाराचा त्याग करा, असेच सर्व ठिकाणी सांगितल्याचे ऐकायला, वाचायला, येते. मग अहंकाराचे रक्षण कर असे कसे?

याबद्दल वाचूयात पुढील भागात 

क्रमशः

माधव भोपे 

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-3

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-3

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

भाग-2  वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

 

मागील भागावरून पुढे चालू 

आता आपण  १७ व्या श्लोकापासून ते ४२ व्या श्लोकापर्यंत जे देवी कवच आहे, त्याची विशेषता पाहू:

त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनी ।

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥१७॥

दक्षिणेऽवतु वाराही नैर्ऋत्यां खड्गधारिणी।

प्रतीच्यां वारुणी रक्षेद् वायव्यां मृगवाहिनी॥१८॥

उदीच्यां पातु कौमारी ऐशान्यां शूलधारिणी।

ऊर्ध्वं ब्रह्माणि मे रक्षेदधस्ताद् वैष्णवी तथा ॥१९॥

एवं दश दिशो रक्षेच्चामुण्डा शववाहना।

जया में चाग्रतः पातु विजया पातु पृष्ठतः॥२०॥

अजिता वामपार्श्वे तु दक्षिणे चापराजिता।

शिखामुद्योतिनी रक्षेदुमा मूर्ध्नि व्यवस्थिता॥२१॥

मालाधारी ललाटे च भ्रुवौ रक्षेद् यशस्विनी।

त्रिनेत्रा च भ्रुवोर्मध्ये यमघण्टा च नासिके॥२२॥

शंखिनी चक्षुषोर्मध्ये श्रोत्रयोर्द्वारवासिनी।

कपोलौ कालिका रक्षेत्कर्णमूले तु शांकरी॥२३॥

नासिकायां सुगन्धा च उत्तरोष्ठे च चर्चिका।

अधरे चामृतकला जिह्वायां च सरस्वती॥२४॥

दन्तान्‌ रक्षतु कौमारी कण्ठदेशे तु चण्डिका।

घण्टिकां चित्रघण्टा च महामाया च तालुके॥२५॥

कामाक्षी चिबुकं रक्षेद् वाचं मे सर्वमंगला।

ग्रीवायां भद्रकाली च पृष्ठवंशे धनुर्धरी॥२६॥

नीलग्रीवा बहिःकण्ठे नलिकां नलकूबरी।

स्कन्धयोः खड्गिनी रक्षेद् बाहू में व्रजधारिणी॥२७॥

हस्तयोर्दण्डिनी रक्षेदम्बिका चांगुलीषु च।

नखाञ्छूलेश्वरी रक्षेत्कुक्षौ रक्षेत्कुलेश्वरी॥२८॥

स्तनौ रक्षेन्महादेवी मनः शोकविनाशिनी।

हृदये ललिता देवी उदरे शूलधारिणी॥२९॥

नाभौ च कामिनी रक्षेद् गुह्यं गुह्येश्वरी तथा।

पूतना कामिका मेढ्रं गुदे महिषवाहिनी॥३०॥

कट्यां भगवती रक्षेज्जानुनी विन्ध्यवासिनी।

जंघे महाबला रक्षेत्सर्वकामप्रदायिनी॥३१॥

गुल्फयोर्नारसिंही च पादपृष्ठे तु तैजसी।

पादांगुलीषु श्री रक्षेत्पादाधस्तलवासिनी॥३२॥

नखान्‌ दंष्ट्राकराली च केशांश्चैवोर्ध्वकेशिनी।

रोमकूपेषु कौबेरी त्वचं वागीश्वरी तथा॥३३॥

रक्तमज्जावसामांसान्यस्थिमेदांसि पार्वती।

अन्त्राणि कालरात्रिश्च पित्तं च मुकुटेश्वरी॥३४॥

पद्मावती पद्मकोशे कफे चूडामणिस्तथा।

ज्वालामुखी नखज्वालामभेद्या सर्वसंधिषु॥३५॥

शुक्रं ब्रह्माणि मे रक्षेच्छायां छत्रेश्वरी तथा।

अहंकारं मनो बुद्धिं रक्षेन्मे धर्मधारिणी॥३६॥

प्राणापानौ तथा व्यानमुदानं च समानकम्‌।

वज्रहस्ता च मे रक्षेत्प्राणं कल्याणशोभना॥३७॥

रसे रूपे च गन्धे च शब्दे स्पर्शे च योगिनी।

सत्त्वं रजस्तमश्चैव रक्षेन्नारायणी सदा॥३८॥

आयू रक्षतु वाराही धर्मं रक्षतु वैष्णवी।

यशः कीर्तिं च लक्ष्मीं च धनं विद्यां च चक्रिणी॥३९॥

गोत्रमिन्द्राणि मे रक्षेत्पशून्मे रक्ष चण्डिके।

पुत्रान्‌ रक्षेन्महालक्ष्मीर्भार्यां रक्षतु भैरवी॥४०॥

पन्थानं सुपथा रक्षेन्मार्गं क्षेमकरी तथा।

राजद्वारे महालक्ष्मीर्विजया सर्वतः स्थिता॥४१॥

रक्षाहीनं तु यत्स्थानं वर्जितं कवचेन तु।

तत्सर्वं रक्ष मे देवि जयन्ती पापनाशिनी॥४२॥

यात प्रथम सर्व दिशांचा उल्लेख असून दाही दिशांना देवी माझे रक्षण करो, अशी प्रार्थना आहे. तसेच, मागून पुढून, डाव्या, उजव्या बाजूकडून रक्षण करो. तद्नंतर, शेंडी पासून सर्व अवयवांचे रक्षण करण्याविषयी तपशीलवार आले आहे. शेंडी, मस्तक, ललाट (कपाळ), भुवया, भ्रुवोर्मध्य, दोन्ही डोळ्यांचा मध्य, नाकपुड्या, कान, कपोल(म्हणजे गाल), कानाचे मूळ (कर्णमूळ), नाक, वरचा ओठ, खालचा ओठ, दात, कन्ठ, गळ्याची घाटी, तालु, चिबुक म्हणजे हनुवटी, बोलण्याची शक्ति म्हणजे वाणी, कण्ठाचा बाहेरील भाग, कण्ठनळी, दोन्ही खांदे, दोन्ही दंड, दोन्ही हात, त्यांची बोटें,  आणि नखें, पोट, दोन्ही स्तन, हृदय, उदार, नाभी, गुह्यभाग, (मेढ्र)लिङ्ग, गुदा, कटिभाग, गुडघे(जानुनी विन्ध्यवासिनी), दोन्ही जंघा (म्हणजे मराठीत पोटऱ्या), गुल्फ म्हणजे पायाचे घोटे ज्याला इंग्लिश मध्ये ankle म्हणतात. पायांचा पृष्ठ भाग, पायांची बोटें, पायांचे तळवे,  नखें, केश, रोमकूप म्हणजे शरीरावरील रोमावली. त्वचा,

रक्त, मज्जा, वसा, मांस, हाडे, मेद; आंत (आंतडे), 

एवढेच नव्हे, तर, शरीरातील पित्त, कफ, नखांचे तेज, शरीरातील समस्त संधि,

वीर्य, छाया (सावली), प्राण अपान इत्यादि पंचप्राण, अहंकार, मन बुद्धि

एवढेच नाही, तर रस, रूप, गंध, शब्द आणि स्पर्श या विषयांचा अनुभव, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण,

आयु,

धर्म, यश, कीर्ति, लक्ष्मी, धन, विद्या

वरील सर्व गोष्टी स्वतः च्या संदर्भातील झाल्या,

आता त्यानंतर, गोत्र, पशु, पुत्र, पत्नी यांचे रक्षण करण्याविषयी प्रार्थना आहे

राजाच्या दरबारात तसेच सर्व भयापासून रक्षण करण्याविषयी प्रार्थना आहे.

एवढे कमी आहे की काय, म्हणून शेवटी असे म्हटले आहे, की वरील वर्णनात जर एखादे स्थान राहून गेले असेल तर त्याचे ही रक्षण कर.

इतका comprehensive विचार केला आहे, हे बघून मन थक्क होते.

क्रमशः

माधव भोपे 

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-2

navdurga devi kavach

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच-भाग-2

मागील लेखावरून पुढे चालू 

भाग-1 वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ, जो की देवी माहात्म्य या नावानेही ओळखला जातो, याच्यात एकूण १३ अध्याय आणि ७०० श्लोक आहेत. ७०० श्लोक असल्यामुळेही याला सप्तशती असे म्हणतात. (श्रीमद्भग्वद्गीते मध्येही ७०० श्लोक आहेत.) हे ७०० श्लोक म्हणजे मार्कंडेय पुराणामधील अध्याय ८१ ते ९३ आहेत. आपल्याकडे १८ पुराणे आहेत. भागवत पुराण, विष्णू पुराण, नारदीय पुराण, वामन पुराण, मत्स्य पुराण, गरुड पुराण, ब्रह्म पुराण, भविष्य पुराण, अग्नि पुराण, ब्रम्ह्वैवर्त पुराण, ब्रम्हानंद पुराण, पद्म पुराण, शिव पुराण, लिंग पुराण, कूर्म पुराण, मार्कंडेय पुराण, वराह पुराण आणि स्कंद पुराण या १८ पुराणांपैकी १६ वे हे  मार्कंडेय पुराण आहे.

देवी कवच ही मार्कंडेय पुराणाचाच भाग आहे. आणि ग्रंथ वाचकाच्या अंग प्रत्यंगांचे रक्षण करण्याचे काम करते.

श्री दुर्गा सप्तशतीच्या १३ अध्यायांमध्ये खालील प्रमाणे वर्णन आहे.

अध्याय

श्लोक

वर्णन

१०४

मधुकैटभ वध

६९

महिषासुर सेना वध

४४

महिषासुर वध

४२

देवतांकडून देवीची स्तुती

१२९

देवतांकडून देवीची स्तुती आणि चण्ड मुण्ड देवीला शुम्भ निशुम्भा चा निरोप

२४

धूम्रलोचन वध

२७

चण्ड मुण्ड वध

8

६३

रक्तबीज वध

४१

निशुम्भ वध

१०

३२

शुम्भ वध

११

५५

देवी स्तुति- वरदान

१२

४१

पाठ माहात्म्य

१३

२९

सुरथ आणि वैश्याला इच्छित वर प्राप्ति

एकूण

७००

 

आता आपण देवी कवचा च्या पुढील काही श्लोकांचा अर्थ पाहू.

अग्निना दह्यमानस्तु शत्रुमध्ये गतो रणे।

विषमे दुर्गमे चैव भयार्ताः शरणं गताः॥6॥

न तेषां जायते किंचिदशुभं रणसंकटे।

नापदं तस्य पश्यामि शोकदुःखभयं न हि॥7॥

यैस्तु भक्त्या स्मृता नूनं तेषां वृद्धिः प्रजायते।

ये त्वां स्मरन्ति देवेशि रक्षसे तान्न संशयः॥8॥

प्रेतसंस्था तु चामुण्डा वाराही महिषासना।

ऐन्द्री गजसमारूढा वैष्णवी गरुडासना॥9॥

माहेश्वरी वृषारूढा कौमारी शिखिवाहना।

लक्ष्मीः पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया॥10॥

श्वेतरूपधरा देवी ईश्वरी वृषवाहना।

ब्राह्मी हंससमारूढा सर्वाभरणभूषिता॥11॥

श्लोक ६-७:  जो मनुष्य अग्नीत जळत असेल, रणभूमी मध्ये शत्रूंनी घेरला गेला असेल, विषम संकटामध्ये सापडला असेल, आणि अशा प्रकारे भयाने आतुर होऊन देवीला शरण आला असेल, त्याचे काहीही अशुभ (अमंगल) होत नाही; युद्धाच्या संकटामध्येही त्याच्यावर कोणतीही विपत्ति येत नाही, त्याला शोक, दुःख आणि भय प्राप्त होत नाही.

वरील विपत्तींना वाच्यार्थाने न घेता, लक्ष्यार्थाने घ्यावे. कारण वरील प्रकारच्या विपत्ति आजकालच्या कालात येणे दुर्मिळ असले, तरी, तत्सम प्रसंग मात्र मनुष्याच्या आयुष्यात नित्यच येत असतात.

श्लोक ८: ज्यांनी भक्तिपूर्वक देवीचे स्मरण केले आहे, त्यांचा नक्कीच अभ्युदय (वृद्धिः) होतो. हे देवेश्वरी, जे तुझे चिन्तन करतात, त्यांचे तू निःसंदेह रक्षण करतेस.

 आता खालील ९ ते ११ या श्लोकांमध्ये योगशक्तीने संपन्न देवीच्या विविध रूपांचे वर्णन आहे.

प्रेतसंस्था तु चामुण्डा:  सप्तशतीच्या ७व्या अध्यायात चण्ड आणि मुण्ड राक्षसांच्या वधाचे वर्णन आहे.

 सहाव्या अध्यायात शुम्भ निशुम्भाने पाठविलेल्या धूम्रलोचन राक्षसाचा देवीने वध केल्यानंतर, शुम्भ निशुम्भ यांनी, चण्ड आणि मुण्ड या दोन महादैत्यांना देवीचे केस धरून ओढत आणण्याची आज्ञा केली.

 सातव्या अध्यायात चण्ड आणि मुण्ड देवीला ओढत न्यायला आले असतांना, क्रोधाने देवीचे तोंड काळे ठिक्कर पडले, आणि तिच्या शरीरातून विक्राळ असे कालीरूप प्रकट झाले. त्या कालीने इतर राक्षसांसोबत, चण्ड आणि मुण्ड यांचा वध केला.

 त्यावर कल्याणमयी देवीने, चण्ड आणि मुण्ड यांना मारणारी, म्हणून तिचे नांव चामुण्डा असे ठेवले. प्रेत हे तिचे आसन समजले जाते.

वाराही, ही सप्त मातृकांमधील असून, विष्णूच्या वराह अवताराची शक्ति समजली जाते. तिचे वाहन महिष आहे. सप्त मातृका म्हणजे; चामुण्डा, वाराही, इंद्राणी, वैष्णवी, माहेश्वरी, कौमारी, ब्राम्ही.

सप्तशतीच्या ८ व्या अध्यायात, रक्तबीज वधाच्या समयी, निरनिराळ्या मातृकांनी, म्हणजेच देवांच्या शक्तिरुपांनी राक्षसांचा वध केला, त्यातही वाराहीचा उल्लेख आहे. वाराही ही देवता वाम मार्गाच्या (तंत्र मार्गाच्या) साधकांमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.

 कार्तिकेयाची  (ज्यांचे दुसरे नांव ‘कुमार’ आहे) शक्ति कौमारी , जी की शिखिवाहना, म्हणजे मोरावर आरूढ आहे. कार्तिकेयाच्या बऱ्याच कथा प्रसिद्ध आहेत. कार्तिकेय(शंकराचा पुत्र) हा दक्षिणेमध्ये मुरुगन, किंवा, सुब्रम्हण्यम या नावाने प्रसिध्द आहे.

इत्येता मातरः सर्वाः सर्वयोगसमन्विताः।

नानाभरणशोभाढ्या नानारत्नोपशोभिताः॥12॥

अशा प्रकारे या सर्व माता सर्व प्रकारच्या योग शक्तींनी संपन्न आहेत, आणि नाना प्रकारच्या आभूषणांनी युक्त आणि नाना प्रकारच्या रत्नांनी सुशोभित आहेत.

श्लोक १३ ते ४३:

दृश्यन्ते रथमारूढा देव्यः क्रोधसमाकुलाः।

शंख चक्रं गदां शक्तिं हलं च मुसलायुधम्‌॥13॥

खेटकं तोमरं चैव परशुं पाशमेव च।

कुन्तायुधं त्रिशूलं च शांर्गमायुधमुत्तमम्‌॥14॥

दैत्यानां देहनाशाय भक्तानामभयाय च।

धारयन्त्यायुधानीत्थं देवानां च हिताय वै॥15॥

या सर्व देवी क्रोधाने भरलेल्या आहेत आणि भक्तांच्या रक्षणासाठी रथावर बसलेल्या आहेत. त्यांनी आपल्या हातांमध्ये शंख, चक्र, गदा, शक्ति, हल, मुसळ, खेटक (म्हणजे ढाल), तोमर (म्हणजे सर्पाकृती मुख असलेला बाण), परशु, पाश, कुन्त या नावाचे आयुध (कुन्त म्हणजे English मध्ये ज्याला spear म्हणता येईल, म्हणजे भाला किंवा तत्सदृश शस्त्र), त्रिशूल, शारङ्ग नावाचे धनुष्य इत्यादि शस्त्रें धारण केली आहेत. ही शस्त्रें त्यांनी दैत्यांचे देह नाश करण्यासाठी, भक्तांना अभय देण्यासाठी आणि देवांच्या कल्याणासाठी धारण केली आहेत

आता कवचाचा प्रारंभ करण्याआधी प्रार्थना केली जाते:

नमस्तेऽस्तु महारौद्रे महाघोरपराक्रमे।

महाबले महोत्साहे महाभयविनाशिनि॥16॥

महान रौद्र रूप, अत्यंत घोर पराक्रम आणि महान उत्साहाने भरलेल्या देवी, तू भयाचा नाश करणारी आहेस, तुला नमस्कार असो.

त्राहि मां देवि दुष्प्रेक्ष्ये शत्रूणां भयवर्धिनि।

प्राच्यां रक्षतु मामैन्द्री आग्नेय्यामग्निदेवता॥17॥

तुझ्याकडे बघणेही कठीण आहे.(दुष्प्रेक्ष्य). हे शत्रूंचे भय वाढविणाऱ्या देवी, तू माझे रक्षण कर.

क्रमशः

 

माधव भोपे 

Navdurga Devi kavach सर्व ठिकाणी रक्षण करणारे चण्डी कवच-1

shailputri mata

Navdurga Devi Kavach- The armour of the power of Goddess Durga- सर्व ठिकाणी रक्षण करणारे देवी कवच

देवीचे नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना. या काळामध्ये व्रतस्थ राहून देवीच्या विविध रूपांमध्ये शक्तीची उपासना करण्याची परंपरा भारतात पुरातन कालापासून चालत आलेली आहे.

आपल्या १८ पुराणांपैकी मार्कंडेय पुराणात, ७०० श्लोकांमध्ये  देवीद्वारे राक्षसांचा म्हणजेच असुर प्रवृत्तींचा वध करण्याचे निरनिराळे प्रसंग अत्यंत शक्तिशाली शब्दांत वर्णन केलेले आहेत. या भागाला सप्तशती असे म्हटले जाते.

नवरात्री मध्ये, या सप्तशतीच्या पोथीचा पाठ करण्याची बऱ्याच घरी प्रथा असते. आपल्याकडे कुठल्याही देवतेचे चरित्र वर्णन करण्यापूर्वी, त्या देवतेचे आवाहन करून ‘कवच’ म्हणण्याची प्रथा आहे. जेणे करून ती देवता आपल्या अंग प्रत्यंगांचे रक्षण करो अशी प्रार्थना केली जाते. त्याच प्रकारे, सप्तशतीचा पाठ करण्या आधी, देवीकवच, अर्गला आणि कीलक म्हणणे आवश्यक समजले जाते. यातील कीलक म्हणजे एक प्रकारे त्या चारित्राला लावलेले कुलूप उघडण्यासाठीची किल्ली समजली जाते. हे आपल्यापैकी जे या विषयाशी परिचित आहेत त्यांना माहिती असेल.  आपल्यापैकी बरेच जण या कालात कवच, अर्गला आणि कीलक, यथाशक्ति म्हणत असतात.

 

ही स्तोत्रें संस्कृत मध्ये असून सुरुवातीला उच्चार करायला अवघड वाटतात खरी, पण एकदा ती वाचायला जमू लागले, की शरीरात एक प्रकारचे नवचैतन्य संचार करवण्याचे सामर्थ्य या शब्दांत आहे हे नक्की. आणि जर या स्तोत्रांचा अर्थ समजून घेतला, तर ती खूप परिणामकारक होतात यात शंका नाही. मला जरी संस्कृतचे विशेष ज्ञान नसले, तरी, जमेल तसे समजून घेऊन, यातील देवी कवच वाचतांना जे समजले आणि जे विचार मनात आले ते माझ्या अल्पबुद्धिप्रमाणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

खालील विवेचन हे मी आमच्या फॅमिली whatsapp ग्रुप मध्ये ६ वर्षांपूर्वी, काही भागांत लिहिले होते. यावर्षी, त्यात थोडी सुधारणा करून आणि थोडे बदल करून या ठिकाणी, goodlifehub.in च्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहे.

या स्तोत्रांचा अर्थ, आणि संदर्भ समजून घेतल्यास खूपच छान वाटेल यात संशय नाही.

हे स्तोत्र एकूण ५६ श्लोकांचे आहे. सुरुवातीला, या स्तोत्राचे पाहिले ५ श्लोक पाहूत.

 

ॐ नमश्चण्डिकायै ||

मार्कण्डेय उवाच

ॐ यद्गुह्यम परमं लोके सर्वरक्षाकरं नृणाम्|

यन्न कस्य चिदाख्यातं तन्मे ब्रूहि पितामह ||१||

ब्रम्होवाच

अस्ति गुह्यतमं विप्र सर्वभूतोपकारकम्

देव्यास्तु कवचं पुण्यं तत् श्रुणुष्व महामुने ||२||

प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रम्हचारिणी

तृतीयं चन्द्रघण्टेति कूष्माण्डेति चतुर्थकम् ||३||

पञ्चमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च

सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमम् ||४||

नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिताः

उक्तान्येतानि नामानि ब्रह्मणैव महात्मनाः||५||

 

मार्कण्डेय मुनींनी ब्रम्हाजी, जे कि सर्व सृष्टीचे प्रजापिता आहेत, त्यांना विचारले,

हे पितामह, जे या सृष्टीत परम गोपनीय आहे (यद्गुह्यम), मनुष्य प्राण्याचे सर्व प्रकारे रक्षण करणारे आहे  आणि जे आज पर्यन्त आपण कुणापुढेच प्रकट केले नाही असे साधन कृपया मला सांगावे

त्यावर ब्रम्हदेवाने सांगितले:

अशा प्रकारचे एकमेव साधन म्हणजे देवीचे कवचच  आहे, जे परम गोपनीय, पवित्र, आणि सर्व प्राण्यांवर उपकार करणारे आहे. हे महामुनी, ते श्रवण कर:

देवीची, नऊ रूपे आहेत, ज्यांना नवदुर्गा असे म्हणतात.

 त्यांची निरनिराळी नावे पुढील प्रमाणे आहेत:

१.    तिचे प्रथम नांव ‘शैलपुत्री’ आहे आहे. (गिरिराज हिमालयाची पुत्री , पार्वतीदेवी. ही जरी सर्वांची अधीश्वरी आहे, तरी, हिमालयाची तपश्चर्या आणि प्रार्थनेने प्रसन्न होऊन, कृपापूर्वक त्याच्या पुत्रीच्या रूपात प्रकट झाली).

२.    सच्चिदानंदमय ब्रम्हस्वरूपाची प्राप्ती करून देणे हा जिचा स्वभाव आहे, ती ‘ब्रम्हचारिणी’

३.    आल्हादकारी चन्द्रमा जिच्या घण्टेत स्थित आहे, ती, चन्द्रघण्टा

४.    कुत्सितः ऊष्मा- कूष्मा,+ त्रिविध तापयुक्त संसार रुपी अण्ड: = कूष्माण्ड, अर्थात, त्रिविध ताप युक्त संसार जिच्या उदरामध्ये स्थित आहे, ती म्हणजे कूष्माण्डा

५.    छान्दोग्यश्रुतीनुसार भगवतीच्या शक्तिने उत्पन्न झालेल्या सनत्कुमारांचे नांव ‘स्कन्द’ आहे. त्यांची माता असल्यामुळे तिचे नांव ‘स्कन्दमाता ‘ आहे.

६.    देवतांचे कार्य सिद्ध करण्यासाठी देवी, महर्षि कात्यायन यांच्या आश्रमात प्रकट झाली, आणि त्यांनी तिला आपली कन्या मानले, म्हणून तिचे ‘कात्यायनी’ हे नांव प्रसिध्द झाले.

७.    सर्वांना मारणाऱ्या ‘कालाची’ ही ‘रात्री’ (विनाशिका) असल्यामुळे, तिचे नांव ‘कालरात्रि’ आहे.

८.    देवीने तपस्येने महान गौर वर्ण प्राप्त करून घेतला होता, म्हणून तिचे नांव ‘महागौरी’ आहे.

९.    ‘सिद्धि’ अर्थात मोक्ष देणारी, म्हणून तिचे नांव ‘सिद्धिदात्री’ आहे.

यानंतरच्या भागात मार्कंडेय पुराणामधील या अत्यंत प्रभावशाली कथाभागाबद्दल जाणून घेऊयात..

क्रमशः

Mind blowing experiences of a Banker-5 एका बँकर चे थरारक अनुभव-5

images 46 1

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

गाडीत मागच्या बाजूला बसलेले रविशंकर, सुनील सैनी, शेख रहीम आणि बेबी सुमित्रा हे चौघे अजूनही गोंधळलेल्या मन:स्थितीतच होते. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी निघालेलो आपण औरंगाबादला कशासाठी चाललो आहोत हाच प्रश्न चौघांनाही पडला होता परंतु माझ्या चेहऱ्यावरील गंभीर चिंतेचे भाव व RM साहेबांशी माझे होत असलेले बोलणे, यावरून कसलं तरी सिरीयस मॅटर असावं याचा त्यांनी मनाशी अंदाज बांधला होता.

आमची गाडी वैजापूर पासून जेमतेम चार पाच किलोमीटर अंतरावर पोहोचली असेल नसेल तोच माझा मोबाईल वाजला. पलीकडून इंस्पे. माळी बोलत होते..

“अहो साहेब, तुम्ही निघालात की नाही अजून ? फक्त पाचच मिनिटांचं काम आहे. फिर्यादीने बँके विरुद्धची तक्रार मागे घेतली आहे. त्यासंबंधीच्या तडजोडीच्या कागदपत्रांवर तुम्हा सर्व स्टाफच्या सह्या हव्या आहेत. त्या करून तुम्ही लगेच बँकेत परत जाऊ शकता.. तेंव्हा लवकर निघा..”

“हो साहेब, निघालोच..!”

असं तुटक उत्तर देऊन मी कॉल कट केला.

पाच सात मिनिटांनी पुन्हा मोबाईलची रिंग वाजली. या वेळी मात्र ठाण्यातून सब इंस्पे. हिवाळे बोलत होते..

“काय राव, आम्ही केंव्हाची वाट पाहतोय.. हातातलं काम टाकून जसे असाल तसे लगेच निघा बरं.. !

कमाल आहे हं तुमची ! तुमच्या विरुद्ध ठाण्यात फिर्याद नोंदली गेली आहे, फिर्यादी सकाळ पासून ठाण्यात हजर आहे, आम्ही तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करतोय.. फिर्यादीचं मन वळवतोय.. आणि तुम्हाला तर काही गांभीर्यच दिसत नाही या प्रकरणाचं.. !

ध्यानात घ्या, जर फौजदार साहेब चिडले नं, तर सारा मामलाच बिघडून जाईल.. त्यामुळे, निघा लवकर !!”

शेवटचे “निघा लवकर !” हे शब्द दरडावल्यासारखे उच्चारून माझ्या उत्तराची वाट ही न पाहता हिवाळेंनी फोन कट केला.police

एव्हाना आम्ही वैजापूर पासून पंचवीस तीस किलोमीटर दूर आलो होतो. पोलीस आम्हाला पाठलाग करून गाठण्याची आता फारशी शक्यता नव्हती, त्यामुळे थोडा निर्धास्त झालो आणि मागे वळून स्टाफकडे पहात म्हणालो..

“हमे पुलीस स्टेशन बुलाकर धोखेसे अरेस्ट करनेका पुलिसवालों का प्लान था, इसलिए हमें इस तरह जल्दबाजी में वैजापूर छोड़ना पड़ा.. अब अरेस्ट से बचने के लिए हमें तुरंत एंटीसिपेटरी बेल के लिए कोर्ट में अर्जी करनी होगी और जब तक बेल की दरख़्वास्त मंजूर नही होती तब तक पुलिस की नजरों से दूर कहीं चोरी छिपे रहना होगा.. फिलहाल तो RM साब ने अपने ट्रेनिंग सेंटर में हमारे रहने का इंतज़ाम कर दिया है और हम सीधे वहीं पर जा रहे है..”

माझ्या बोलण्या नंतर काही क्षण गाडीत गहन गंभीर शांतता पसरली.. मग हळूहळू एकेकाच्या प्रतिक्रिया यायला लागल्या.

“ओ माय गॉड !” इति रविशंकर..

“अरे बापरे.. !” इति सैनी..

“या खुदा..! तेरी रहमत !” इति रहीम चाचा..

अल्लड, अवखळ बेबी सुमित्राच्या चेहऱ्यावर मात्र कसलाच तणाव दिसत नव्हता. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी सुदूर छत्तीसगडच्या आदिवासी भागातून वैजापुरात आलेली हसरी, खेळकर बेबी जणू हे टेन्शन, ही भीती सुद्धा एन्जॉय करत होती. अचानक तिच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव उमटले..

“मतलब.. सर, आज से हम सब लोग दुनिया की नजरों मे *फरार* है.. ! है ना ?”

आणि मग खळाळून हसत दोन्ही हातांनी टाळी वाजवत ती म्हणाली..

“हाऊ एक्सायटिंग ! हाऊ थ्रिलिंग !”

बेबीचं हे बोलणं थोडंसं बालिश वाटलं तरी तिच्या उत्साही मुद्रेवरील खेळकर आणि निरागस उस्फुर्त आनंद पाहून गाडीतील सर्वांचाच ताण एकदम हलका होऊन गेला. नकळत आम्हालाही खुदकन हसू आलं.. बेबी सारखंच आपणही स्वतःवर हसून हे संकट एन्जॉय कां करू शकत नाही ? असाच विचार आमच्या मनात येऊन गेला.

इकडे सब इंस्पे. हिवाळे मघापासून मला सारखा फोन लावीत होते. बराच वेळ घाबरून मी फोन उचललाच नाही. नंतर ती फोनची सतत वाजणारी रिंग असह्य झाली म्हणून एकदाचा तो फोनच स्विच ऑफ करून टाकला.

आता गाडीतील अन्य चौघांचेही मोबाईल वाजणं सुरू झालं. सारेच नंबर्स अनोळखी होते. हे सारे फोन पोलीस स्टेशन मधूनच येत आहेत हे न समजण्या इतके कुणीही खुळे नव्हते. त्यामुळे कुणीच फोन उचलण्याच्या भानगडीत पडलं नाही.

अशातच बेबीचा फोन वाजला आणि आमच्या “नकोss ! उचलू नकोss !” च्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष करीत तिने तो चक्क उचलला..

“हॅलोss !”

“कौन ? बेबी सुमित्रा..?”

“हां, मै बेबी सुमित्राही बात कर रही हूँ..”

“आप अभी तक थाने क्यों नही पहुँची ? अगर पाँच मिनट में आप सब लोग थाने नही पहुंचे तो हमे मजबूरन बैंक में आना पड़ेगा.. आपके मैनेजर साब तो फोन भी नही उठा रहे.. उन से कह दो, हम से कोई चालबाजी मत करो, वरना बहुत महँगा पड़ेगा..!”

पलीकडून उर्मट आवाजात दरडावण्यात आलं..

लाडिक, मधाळ, खोडकर स्वरात बेबी उत्तरली..

“अरे क्याsss साब ! आप तो खामख्वाह नाराज हो गए.. हम तो रास्ते में ही थे.. ये लीजिये..! पहुंच गए हम सब आपके थाने ! जरा उठकर बाहर आकर तो देखिए.. क्या हमे लेने गेट तक भी नही आओगे ? !!”

.. एवढं बोलून बेबीनं फोन कट केला आणि “अब ढूंढते रहो हमें पागलों की तरह, थाने के बाहर, इधर उधर.. !” असं म्हणत पोट धरधरून मोठ्यानं हसत सुटली.giggling woman

मी डोळे मोठे करून तिच्याकडे रागानं बघितलं तेंव्हा स्वतःला सावरून घेत ती म्हणाली..

“सर, वो लोग इतना बडा झूठ बोलकर हम से दगाबाजी कर सकते है तो हम इतना सा झूठ बोलकर उन को उल्लू भी नही बना सकते क्या ?”

बेबीच्या हिंमतीला आणि विनोदबुद्धीला मनोमन दाद देत मी गप्प बसलो.

औरंगाबाद आलं.. ट्रेनिंग सेंटरच्या हॉस्टेल मध्ये आमच्यासाठी चार खोल्या राखून ठेवण्यात आल्या होत्या. माझं घर तिथून अगदी जवळच होतं. घरी जाऊन बायकोला ओढवलेल्या प्रसंगाची थोडक्यात कल्पना दिली आणि घरातील दोन चार लुंगी पायजामे व बेबी साठी बायकोचा नाईट ड्रेस घेऊन हॉस्टेल वर परतलो. रात्री जेवणं झाल्यावर एका खोलीत एकत्र जमून आम्ही गप्पा मारत बसलो.room1

“तुम्हाला काय वाटतं..? तो दुसऱ्या चेकबुक मागणीचा अर्ज फायलिंग मधून कुणी गायब केला असावा ? ती व्यक्ती बँकेतीलच आहे हे तर नक्की..! पण कोण करू शकेल असं ?”

माझ्या या प्रश्नावर रहीम चाचा म्हणाले..

“जी व्यक्ती बँक संपल्यावर म्हणजेच सर्व जण घरी गेल्यावर देखील बँकेत थांबते अशीच व्यक्ती हे काम सहज करू शकते. मला वाटतं की आपले पाच सेक्युरिटी गार्ड्स हे रात्री बँकेतच असतात, त्यांच्या पैकीच कुणाचं तरी हे काम असावं..”

“नाही, मला ते पटत नाही. गेली सात वर्षं मी त्यांना पाहतो आहे. ते सारेच अतिशय कर्तव्यदक्ष आणि इमानदार आहेत. ते असं काही करतील याची तिळमात्र ही शक्यता नाही..”

रविशंकर ठामपणे म्हणाला..

“मग दुसरं कोण ? नंदू तर नाही ? कारण तो सकाळी सहा वाजल्यापासून बँकेतच असतो, आणि तेंव्हा बँकेत कुणीच नसतं..”

रहीम चाचांनी शंका व्यक्त केली.

नंदू हा माळी काम व बँकेची साफसफाई करणारा टेम्पररी (आऊट सोर्सिंग) कर्मचारी होता. सकाळी सहा वाजता बँकेत येऊन तो बागेतील झाडांना पाणी टाकणे, बाहेरील कंपाउंड झाडून काढणे, हॉल व आतील टाईल्स झाडून पुसून स्वच्छ करणे अशी कामे करीत असे. याशिवाय दिवसभर बँकेत थांबून तो प्युनची अन्य कामे सुद्धा करीत असे.hqdefault 1 1

प्रचंड कष्टाळू, नम्र व अबोल असलेला नंदू हा अत्यंत पापभिरू होता. पहाटे पाच ते सहा या वेळेत तो स्वेच्छेने व विना मोबदला गावातील दत्त मंदिराची साफसफाई करीत असे. म्हाताऱ्या आई वडिलांची मनापासून सेवा करणारा व नातेवाईकांनी वडिलोपार्जित संपत्ती लुबाडली तरी त्यांच्या बद्दल कोणतीही कटुता न बाळगणारा कुटुंबवत्सल नंदू हा माझा आवडता कर्मचारी होता. त्याचे आई वडीलही त्यांच्या तरुणपणी दीर्घकाळ पर्यंत आमच्या बँकेतच साफसफाईचे काम करीत होते. नंदू असं काही कृत्य करेल हे माझ्या दृष्टीने next to impossible होतं. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल मी निश्चितच पक्की खात्री देऊ शकत होतो.

मग आता कोण उरलं ?

बँकेच्या तीन पर्मनंट प्युन्स पैकी दोघा जणांना आत्यंतिक मद्य प्राशन करण्याची घाणेरडी सवय होती. दारूमुळे त्यांचं शरीर पोखरलं गेलं होतं. ते दोघेही वारंवार आजारी पडत आणि त्यामुळेच कामावर नेहमी गैरहजर रहायचे. गेले काही दिवस तर ते दोघे ही खूप आजारी असल्याने अंथरुणावरच होते. तिसरा प्युन रोज वेरूळ येथून वैजापूरला जाणे येणे करीत असे. सकाळी खूप उशिरा कामावर येणे आणि संध्याकाळी.. नव्हे दुपारीच खूप लवकर बँकेतून निघून जाणे हा त्याचा नित्यक्रम होता. पनिशमेण्ट वरच त्याची वेरूळहुन वैजापूरला बदली झाली होती. वारंवार ताकीद देऊन ही कुणालाही न जुमानता तो बँकेतून रोज लवकर निघून जात असे. मात्र त्यामुळेच तो या कट कारस्थानात सामील असण्याची शक्यता खूपच कमी होती.

“रुपेश के बारे में क्या खयाल है, सर ? पिछले चार साल से मैं उसे देख रहा हूँ, लेकिन अभी भी उसे ठीक तरह पहचान नही पाया हूँ..”confident businessman 1 e1727538156305

डोक्यावरील केसांतून हात फिरवीत रविशंकर म्हणाला.

खूप ठेंगणा, रापलेल्या चेहऱ्याचा आणि बलदंड शरीराचा रुपेश जगधने हा पंचवीस सव्वीस वर्षांचा तरुण होता. वैजापूर पासून दोन किलोमीटर अंतरावरील घायगाव इथे त्याची दहा एकर बागायती जमीन होती. फावल्या वेळेत तो होम गार्ड ची ड्युटी ही करीत असे. बँकेचे सिक्युरिटी गार्ड्स जेंव्हा रजेवर जात तेंव्हा त्यांच्या रजेच्या कालावधी पुरते त्यांच्या जागी लष्कराचे रिटायर्ड जवान किंवा होमगार्ड यांना रोजंदारीने पगारी ड्युटी देण्याचा बँकेचा नियम आहे. होम गार्ड असलेला रुपेश असा तात्पुरता सिक्युरिटी गार्ड म्हणून बँकेत अधून मधून ड्युटी करायचा.

तल्लख बुद्धीच्या रुपेशने कॉम्पुटरचा कोर्सही केलेला होता. पूर्वीच्या मॅनेजर साहेबांनी त्याला “सिग्नेचर स्कॅनिंग” चे काम शिकून घेण्यास सांगितले. लवकरच रुपेश त्या कामात तरबेज झाला आणि दररोज बँकेत येऊन सिग्नेचर स्कॅनिंग चे काम करू लागला. ग्राहकांकडून अकाउंट ओपनिंग चा फॉर्म भरून घेणे व अन्य छोटी मोठी कामे ही तो करीत असे. त्याला बसण्यासाठी बँकेत एक स्वतंत्र काउंटरही देण्यात आले होते.

रुपेश जसं आणि जिथून बोलावणं येईल त्याप्रमाणे कधी बँके बाहेर सिक्युरिटी गार्ड म्हणून उभा राहायचा तर कधी नवरात्र, उरूस, गणेशोत्सव काळात होमगार्ड म्हणून पोलीस बंदोबस्ताला जायचा.. कधी सिग्नेचर स्कॅनिंग साठी बँकेच्या आत काउंटर वर बसायचा तर कधी आपल्या स्वतःच्या शेतात राबायचा. काही महिन्यांपूर्वी त्याला पाईप लाईन साठी कृषी कर्ज हवे असल्याने त्याच्या शेतीचे इन्स्पेक्शन करण्यासाठी गेलो असता त्याच्या घायगाव येथील घरीही गेलो होतो.

आई बापाचा एकुलता एक मुलगा असलेल्या रुपेशने मोठ्या कष्टाने शेती खूप छान फुलवली होती. वृद्ध आईवडिलांची सेवा करीत सुस्वरूप पत्नी व दोन वर्षांच्या गोंडस मुलासह घायगावात बांधलेल्या पक्क्या घरात तो आनंदाने रहात होता. बँकेतील सर्वच प्रकारच्या कामांत तो तरबेज असल्याने गर्दीच्या वेळी प्रत्येकच कर्मचारी त्याला आवर्जून मदतीला बोलावून घेत असे. रुपेशही अगदी मनापासून सर्वांना त्यांच्या कामात मदत करीत असे.

रुपेशचे हस्ताक्षर खूप सुन्दर आणि वळणदार होते. मी वैजापूर शाखेत जॉईन झालो तेंव्हा तेथील रजिस्टर्सवर सुबक अक्षरात लिहिलेली नावे पाहून हे सुरेख अक्षर कुणाचे आहे याची चौकशी केली होती. त्यावेळी हे रुपेशचे हस्ताक्षर असून सध्या तो होमगार्डची ड्युटी करण्यासाठी औरंगाबादला गेला असल्याचे नंदू कडून समजले.

पुढच्याच आठवड्यात नंदू रुपेशला घेऊन माझ्या केबिन मध्ये आला.

“साहेब, हा रुपेश.. रुपेश जगधने. घायगावला राहून शेती करतो. बारावी पास आहे. कॉम्पुटर मधील सगळं काम येतं ह्याला. होमगार्ड म्हणून इथल्या पोलीस स्टेशनमध्ये काम करतो. कधी कधी आपल्या कडे टेम्पररी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो तसंच गेल्या दोन वर्षांपासून आपलं सिग्नेचर स्कॅनिंगचं ही काम करतो. साहेब, तुम्ही त्या दिवशी रजिस्टर वरील ज्याच्या सुंदर अक्षराबद्दल चौकशी केली होती तोच हा रुपेश..”

“अरे वा ! खूप छान.. !!”

रुपेश कडे कौतुकाने पहात मी म्हणालो.

“साहेब, ह्या रुपेशच्या अंगात विविध प्रकारच्या कला आहेत.”

नंदू म्हणाला..

“अच्छा..?”

कचरा कुंडीतील एक पाठकोरा कागदाचा तुकडा घेऊन नंदू म्हणाला..

“साहेब, ह्याच्यावर तुमची सही करा..!”

मी प्रश्नार्थक नजरेने नंदू कडे पाहिलं..

“असं संशयाने पाहू नका साहेब, फक्त एक गंमत दाखवायची आहे तुम्हाला.. आधी तुम्ही तुमची सही करा इथे..!”

हा काय पोरकटपणा आहे ? अशा मुद्रेने अनिच्छेनेच मी त्या कागदावर सही केली.

“आता बघा गंमत..” असं म्हणत नंदूने तो कागद रुपेशकडे दिला.

रुपेशने आपल्या खिशातील पेन काढला.. क्षणभर कागदावरील माझ्या सहीकडे बघीतलं, आणि चट्कन माझ्या सहीखाली अगदी हुबेहूब माझ्या सही सारखीच सही केली. दोन्ही सह्या इतक्या एकसारख्या दिसत होत्या की मी देखील ते पाहून चकित झालो.

“मानलं पाहिजे..! खरंच विलक्षण कला आहे.. ! पण जपून, ह्या कलेचा चुकूनही दुरुपयोग करू नकोस.. नाहीतर एके दिवशी तुरुंगात जावं लागेल.. !”

मी रुपेशला म्हणालो.

जीभ बाहेर काढून दोन्ही कानांना हात लावीत रुपेश म्हणाला..

“साहेब, मी स्वप्नातही असं कधी करण्याचा विचारही मनात आणणार नाही. ही तुमची सही सुद्धा नंदूने फारच आग्रह केला म्हणून खूप नाईलाजाने फक्त यावेळ पुरतीच केली आहे..”

कालांतराने ही गोष्ट मी पार विसरून गेलो होतो. आज रुपेशचं नाव निघाल्यावर अचानक हे सारं आठवलं. खरं म्हणजे रुपेशच्या या “हस्तकलेच्या जादू” बद्दल स्टाफ मधील सर्वांनाच माहिती होती. तरी देखील एवढी महत्वाची गोष्ट आतापर्यंत आपल्यापैकी कुणालाच कशी काय “क्लिक” झाली नाही याचंच सर्वांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं.

जसे जसे संशयित गुन्हेगार म्हणून रुपेश बद्दल आम्ही विचार करत गेलो तसा तसा त्याच्या वरील आमचा संशय अधिकच पक्का होत गेला. CCTV च्या रेंज बाहेर राहून ते चेक बुक डिलिव्हर करणं केवळ रुपेश सारख्या चाणाक्ष व्यक्तीलाच शक्य होतं. तसंच चेक बुक मागणी अर्ज फाईल मधून गायब करणं ही त्यालाच सहज साध्य होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे सिग्नेचर स्कॅनिंग करीत असल्यामुळे त्याला कुणाचीही सही पाहणं सहज शक्य होतं आणि हुबेहूब सही गिरवण्यात तर त्याचा हातखंडाच होता.

अशा तऱ्हेने इतके दिवस न सुटणारं कोडं अचानक सुटलं होतं. मधूनच अस्पष्ट दिसून दाट धुक्यात लुप्त होणारा, हुलकावणी देत हाती न येणारा तो धूर्त, कपटी, कारस्थानी चेहरा आता जाहीर झाला होता.

आता कधी एकदा लवकरात लवकर कोर्टातून जामीन मिळवून वैजापूरला परत जातो आणि रुपेशला बोलतं करून गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करतो असं आम्हाला झालं होतं..

गप्पांच्या नादात रात्रीचे बारा वाजून गेले होते. रात्री नऊ पूर्वीच झोपायची सवय असलेले वयोवृद्ध रहीम चाचा मघापासून जांभया देत होते. एकमेकांना “गुड नाईट” करून समाधानानं आम्ही आपापल्या खोलीत जाण्यासाठी निघालो तोच दारावर कुणीतरी हलक्या आवाजात “टकटक” केलं.

इतक्या रात्री कोण आलं असावं बरं ? कदाचित हॉस्टेलचा केअर टेकर “तुमच्या बोलण्यामुळे हॉस्टेल मधील ट्रेनिंग साठी आलेल्या अन्य स्टाफला डिस्टर्ब होतोय.. कृपया जास्त जागू नका.. आता झोपा..” असं सांगण्यासाठी आला असावा, असं वाटून मी रुमचं दार उघडलं.. तो काय..

डोक्यावर कॅप, अंगात कडक इस्त्रीचा युनिफॉर्म, कमरेला सर्व्हिस रिव्हॉल्व्हर, हातात पोलिसी दंडुका आणि चर्येवर क्रुद्ध भाव असलेले सब इंस्पे. हिवाळे दारात उभे होते..

Untitled design 1

 

(क्रमशः 6)

 

 

ajay-kotnis-photo1श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे

Mind blowing experiences of a Banker-4 एका बँकर चे थरारक अनुभव-4

cash van

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

बॅंकस्य कथा रम्या..

स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव..

( भाग : 4 )
जयदेव खडके… ! होय, हेच नाव होतं त्या पाच लाख ऐंशी हजार रुपयांच्या तथाकथित बनावट सहीच्या चेकवर..
उभट चेहरा, गहू वर्ण, मध्यम उंची, किंचित बसकं नाक, डोक्यावर विरळ केस, काळ्या रंगाच्या पँटीत खोचलेला दंडापर्यंत बाह्या फोल्ड केलेला पांढरा शर्ट आणि सतत भिरभिरणारे कावरे बावरे डोळे.. अतिशय साधारण आणि निरुपद्रवी वाटणाऱ्या त्या व्यक्तिमत्वात तसं पाहिलं तर चट्कन लक्षात रहावं असं काहीही नव्हतं.. पण सध्या तरी तोच अतिसामान्य चेहरा रहस्यमय बनून “टॉक ऑफ द टाऊन” झाला होता.
 
जयदेव खडके असे नाव सांगणाऱ्या त्या माणसाचे हॉलमधील CCTV कॅमेऱ्यांच्या वेगवेगळ्या अँगल मधून घेतलेले सुमारे दोनशे मोठ्या आकाराचे फोटो काढून आम्ही ते पोलीस स्टेशन, बस स्टँड, रेल्वे स्टेशन परिसर व मोंढ्यातील दुकानदार, आसपासच्या गावातील बँकेचे ग्राहक यांच्यापर्यंत पोहोचविले होते. त्यांच्या मार्फत फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीची व्यापक चौकशी सुरू होती. बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळच एका मॉनिटर स्क्रीनवर घटनेच्या दिवसाचे CCTV रेकॉर्डिंग दाखवून बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडे जयदेव खडकेची चौकशी केली जात होती.
 
पोलिसांतर्फे तो फोटो नजीकच्या जिल्ह्यांतील सगळ्या पोलीस स्टेशन्सना सर्क्युलेट करणे अपेक्षित होते. परंतु तसा कोणताही प्रयत्न त्यांच्यातर्फे होत असल्याचे दिसत नव्हते. हुबेहूब अशीच दिसणारी व्यक्ती नाशिक व अहमदनगर येथे पाहिली असल्याचे आठवते असे काही कस्टमर म्हणाले. त्यामुळे ती ही गोष्ट आम्ही सब इंस्पे. हिवाळेंच्या कानावर घातली. संशयित गुन्हेगाराचा एवढा स्पष्ट फोटो हातात असूनही अद्याप पोलीस त्याला का हुडकून काढू शकत नाहीत ? याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत होते.
 
एवढ्या मोठ्या रकमेचा चेक पोस्ट करण्यापूर्वी काउंटर क्लर्क शेख रहीम याने खातेदाराला फोन लावून त्याचे कन्फर्मेशन का घेतले नाही ? असा प्रश्न बँकेतर्फे अंतर्गत चौकशी करण्यासाठी आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारला होता. त्यावर रहीम चाचा म्हणाले..
“सभी बडी रकम के चेक जारी (issue) करनेवाले कस्टमरोंको फोन करके अनिवार्य रूप से मै उनका कन्फर्मेशन लेता हूँ.. ठीक उसी तरह वो चेक पोस्ट करने से पहले भी मैंने रत्नमाला बाई को फोन किया था, लेकिन उनका फोन उस समय स्विच ऑफ था. चेक लानेवाले जयदेव खड़के से मैंने उसका आधार कार्ड मांगा, लेकिन उसने ‘कार्ड घर पर है’ ऐसा जवाब दिया. फिर मैंने उसे उसका मोबाईल नंबर मांगा ताकि वह चेक के पीछे लिख के रख सकूँ.. लेकिन उसने कहाँ की ‘मेरे पास मोबाईल नही है..’ “
 
“चेक लानेवाला शख्स खुद को मोंढें के सबसे बडे व्यापारी मंगल सेठ का मुनीम बता रहा था.. उस के हाथ में मोंढे के मुनीमों के पास रहती है वैसी लंबी थैली भी थी और बैंक में मौजूद दूसरे मुनीमों के साथ वह जिस तरह हँस के बातें कर रहा था उसे देख मुझे उसपर कोई शक नही हुआ !”
“काउंटर पे भीड़ बढ़ती जा रही थी, और वैसे भी चेक बेअरर था, इसलिए मैंने चेक पोस्ट किया और पासिंग को भेज दिया..”
 
रहीम चाचा यांनी कितीही योग्य रीतीने व प्रामाणिकपणे आपल्या कृतीचे समर्थन केले असले तरी बँकेने मात्र सखोल चौकशीअंती, कर्तव्यपालनातील हलगर्जी पणाबद्दल (negligence of duty) त्यांना दोषीच मानले. असो..
 
आज घटनेचा सहावा दिवस होता. सकाळी साडेदहा वाजतांच सब इन्स्पेक्टर हिवाळे दोन कॉन्स्टेबल सह बँकेत आले. रत्नमाला बोडखे यांनी बँकेविरुद्ध केलेल्या तक्रारीचा तपास करण्यासाठी आलो असल्याचं सांगून त्यांनी तो बनावट सहीचा चेक, चेकबुक इश्यु रजिस्टर व चेकबुक मागणीचा अर्ज मागितला. अर्ज सापडत नसल्याचे सांगून चेक व चेकबुक इश्यु रजिस्टर त्यांना दाखविले. घटनेशी संबंधित बँकेतील कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट घेऊन व चेकबुक इश्यु रजिस्टर आणि तो चेक जप्त करून सब इंस्पे. हिवाळे निघून गेले.police
 
पोलिस गेल्यानंतर लगेच RM साहेबांना फोन केला आणि पोलिसांनी केलेल्या चौकशीबद्दल त्यांना सविस्तर माहिती दिली. “सध्या मी श्रीरामपूर शाखेत ब्रँच व्हिजिट साठी आलो असून संध्याकाळी वैजापूर मार्गे परत जाताना तुमच्या शाखेत थोडा वेळ थांबेन तेंव्हा बोलू..” असं म्हणून त्यांनी फोन ठेवला.
सकाळी जेंव्हा सब इंस्पे. हिवाळे साहेब केबिन मध्ये बसून माझ्याकडून प्रकरणाची माहिती घेत होते तेंव्हा त्यांचा सूर अगदी नम्र आणि मित्रत्वाचा होता. त्यांच्या सोबत आलेले दोन कॉन्स्टेबल सुद्धा चौकशी करताना व स्टेटमेंट घेताना बँकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांशी अतिशय आदराने व स्नेहभावाने वागत होते. पोलिसांची ही सौहार्दपूर्ण वर्तणूक आम्ही जी कल्पना केली होती त्याच्या अगदी विपरीत होती. “घटनेच्या संपूर्ण दिवसाचे CCTV फुटेज पाहण्यासाठी रात्री आठ वाजता बँकेत येईन..” असंही जाता जाता हिवाळे सांगून गेले होते.
 
तो दिवस तसा शांततेतच गेला. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता AGM राणे साहेब बँकेत आले. बँकिंग हॉल मध्ये गोलाकार खुर्च्या टाकून त्यांनी स्टाफची छोटीशी मिटिंग घेतली. एक अकाऊंटंट, दोन फिल्ड ऑफिसर, दोन ट्रेनी ऑफिसर, एक हेड कॅशियर, दहा काउंटर क्लर्क, तीन पर्मनंट प्युन्स, दोन टेम्पररी (आऊटसोर्सिंग) प्युन, पाच सिक्युरिटी गार्ड्स असा माझ्या सहित एकूण सत्तावीस जणांचा स्टाफ मिटिंगला हजर होता.bank meeting
 
स्टाफला संबोधित करतांना RM साहेब म्हणाले.. “चौकशीला आलेल्या पोलिसांची आजची स्टाफशी वागणूक ही माणुसकीपूर्ण होती असं समजलं. ही आनंदाची गोष्ट असली तरी एव्हढ्यावरून तुम्ही हुरळून जाऊ नका. अद्याप पोलिसांनी FIR दाखल केलेला नाही एवढाच त्याचा अर्थ. जर कुठल्याही दबावाखाली पोलिसांनी बँकेविरुद्ध FIR फाईल केला तर या प्रकरणाशी संबंधित सर्वच कर्मचाऱ्यांना अटक करण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील. त्यामुळे सावध रहा. पोलिसांच्या गोड बोलण्यावर कदापिही विश्वास ठेवू नका. पोलीस स्टेशन मध्ये जाण्याचेही शक्यतो टाळा. माझ्या अंदाजाप्रमाणे आधी, तो तक्रारदार सुखदेव बोडखे, तडजोड करण्यासाठी एकदा तरी पुन्हा बँकेत येऊन जाईल. त्यामुळे निदान तोपर्यंत तरी तुम्ही अगदी निश्चिन्त रहा.”
 
पोलिसांनी आपला जबाब (स्टेटमेंट) नोंदवून घेतला, आवश्यक तो मुद्देमालही जप्त केला, त्यामुळे आपल्या मागे लागलेल्या या नसत्या झेंगटातून आता आपली मुक्तता झाली असं समजणाऱ्या सगळ्याच संबंधित स्टाफला RM साहेबांच्या या बोलण्याने धक्काच बसला. तो सुखदेव बोडखे लवकरात लवकर पुन्हा बँकेत यावा आणि काहीतरी तडजोड करून बँकेविरुद्धची तक्रार त्याने मागे घ्यावी अशीच सर्वजण मनातल्या मनात प्रार्थना करू लागले.
 
“रिजनल ऑफिस या प्रकरणात तुमच्यामागे भक्कमपणे उभं आहे. त्यामुळे न घाबरता आणि कसलीही काळजी न करता, मन लावून आपलं काम करीत रहा..” एवढं बोलून मिटिंग संपवून RM साहेब परत निघाले. ते हॉलच्या दरवाजाकडे जात असतानाच अचानक त्या पापग्रहाने.. सुखदेव बोडखेने, रागीट चेहऱ्याने घाईघाईत बँकेत प्रवेश केला.
“हे काय RM साहेब ? मला न बोलावता, न भेटता तसेच गुपचूप निघून चालला होतात की काय ?”
RM साहेबांना पाहताच सुखदेव तुच्छ उपरोधाने म्हणाला.
“तुम्ही आलात ? बरंच झालं..! चला आपण तिथे केबिन मध्ये बसून बोलू..”
राग आवरून संयम राखीत RM साहेब सुखदेवला माझ्या केबिन मध्ये घेऊन गेले.
“साहेब, तुमची चौकशी पूर्ण झाली का ? मला माझे पैसे कधी परत करणार ?”
सुखदेवने थेट मुद्द्यालाच हात घातला.
 
“हे पहा, बँकेची चौकशी इतक्या लवकर पूर्ण होत नसते. आधी चेकवरील सहीचा खरेखोटेपणा तपासून पहावा लागेल. आणखीही काही फॉर्म्यालिटीज आहेत..”
RM साहेबांचे बोलणे मधेच अर्धवट तोडीत उतावीळपणे सुखदेव म्हणाला..
“मी आता एक क्षण ही जास्त थांबू शकत नाही. तुम्ही मॅनेजर साहेबांना माझ्या खात्यात आजच्या आज तीन लाख रुपये जमा करायला सांगा. बाकीची रक्कम तुमची चौकशी पूर्ण झाल्यानंतर व्याजासहित परत करा. तुम्ही एवढं केल्यास मी बँकेविरुद्धची तक्रार मागे घेईन..”
“नाही, ते शक्य नाही !”
RM साहेब ठामपणे म्हणाले.
“ठीक आहे.. मग पुढील परिणाम भोगायला तयार रहा..”
खुर्ची वरून उठत खुनशी हास्य करीत सुखदेव शांतपणे म्हणाला.
 
“उद्या सकाळी पोलीस FIR दाखल करून घेतील. सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना अटक होईल. बँकेची प्रचंड बदनामी होईल. पोलीस कर्मचाऱ्यांवर खटला भरतील. हा खटला किमान पंधरा वीस वर्षे चालेल. या संपूर्ण कालावधीत शेकडो वेळा कर्मचाऱ्यांना कोर्टात तारखेला हजर रहावे लागेल. हजर न झाल्यास वॉरंट निघेल. वर पोलीस वेळोवेळी त्रास देतील, पैसे लुबाडतील ते वेगळंच..! सबळ पुराव्या अभावी अनेक वर्षांनी कदाचित तुमचा स्टाफ निर्दोष सुटेलही परंतु तोपर्यंत कोर्टात नेहमी त्यांचा आरोपी म्हणूनच उल्लेख होईल. शेजाती पाजारी व नातेवाईकांत त्यांची बदनामी होईल. पोलीस नवीन नवीन कलमे लावतील. जामीन मिळविण्यासाठी त्यांना धावाधाव करावी लागेल. कोर्ट कचेरी आणि वकीलासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होईल.. ! आज मला फक्त दोन लाख रुपये देऊन तुम्ही हे सारं टाळू शकता..”
 
केबिन बाहेर उभे राहून उत्कंठेने आतील संभाषण ऐकीत असलेल्या स्टाफच्या डोळ्यासमोर बोडखेने आगामी वास्तवाचे भीषण चित्रच उभे केले होते.
RM साहेबांनी मात्र बोडखेच्या बोलण्यावर कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. दोन क्षण वाट पाहून सुखदेव म्हणाला..
“तयार रहा मग उद्या तोफेच्या तोंडी जायला..!”
तरातरा पावले टाकीत बोडखे निघून गेला.
 
“उद्याचा दिवस तुमच्यासाठी कठीण दिसतो..! हा माणूस पूर्ण तयारी करून आलेला दिसतोय. उद्याची माझी या भागातील ब्रँच व्हिजिट सकाळी लवकर आटोपून दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला शाखेत येऊन जातो..”
अशाप्रकारे कर्मचाऱ्यांना आश्वस्त करीत RM साहेब निघून गेले. जाताना त्यांच्या अनुभवी, गंभीर चेहऱ्यावरील चिंतेचे भाव पाहून हे प्रकरण आपण समजतो तितकं साधं सरळ नाही याची सर्वांनाच जाणीव झाली.
 
ठरल्याप्रमाणे रात्री आठ वाजता सब इंस्पे. हिवाळे CCTV रेकॉर्डिंग पाहण्यासाठी आले. रेकॉर्डिंग मध्ये नवीन काही पाहण्यासारखं नव्हतंच. नाही म्हणायला तो पैसे काढणारा इसम थोडा वेळ एका अन्य कस्टमरशी बोलताना दिसत होता. तो कस्टमर कोण आहे हे पाहून त्याला उद्या बँकेत बोलावून घेऊन त्याची चौकशी करायला त्यांनी सांगितलं. मात्र रेकॉर्डिंग पाहताना हिवाळेंशी खूप गप्पा झाल्या, त्यांच्याशी एकप्रकारे दोस्तीच झाली. कुणीतरी खूप हुशारीने ही घटना घडवून आणली आहे, बँक कर्मचाऱ्यांची यात कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणा नाही, तसेच तो पैसे काढणारा इसम अन्य गावचा असावा याबद्दल हिवाळेंना खात्री पटली.
 
सुखदेव बोडखेचा मुलगा बबन हा मवाली टाईप असून गेल्या वर्षी त्याने चक्क इथल्या पूर्वीच्या इन्स्पेक्टर साहेबांच्या कॉलेजात शिकणाऱ्या मुलीचीच छेड काढली होती. त्या प्रकरणी त्याला अटक करून भरपूर चोप दिल्याची माहितीही हिवाळेंनी दिली. ते असंही म्हणाले की..
“ते इन्स्पेक्टर साहेब नुकतेच इथून बदलून गेले आहेत म्हणून बरंय, नाहीतर त्यांनी त्या बोडखेची तक्रारच नोंदवून घेतली नसती..”
रात्री बाराच्या सुमारास हिवाळे बँकेतून परत जाण्यास निघाले तोपर्यंत सर्व स्टाफ बँकेतच थांबला होता. उद्या काय होणार याची चिंता प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.
 
घटनेचा सातवा दिवस उजाडला. कसला तरी सण असल्याने आज बँकेत विशेष गर्दी नव्हती. सकाळीच एक साध्या वेशातील व्यक्ती पोलीस स्टेशन मधून आलो असल्याचे सांगून काही व्यक्तींची संपूर्ण नावे लिहून घेत होती. विवादित चेक बुक इश्यू करणारी क्लर्क बेबी सुमित्रा, काउंटर वर चेक घेऊन टोकन देणारे सिनिअर क्लर्क रहीम चाचा, चेक पास करणारा अकाउंटंट रविशंकर, चेकचे पैसे देणारा कॅशियर सुनील सैनी अशा चौघांची नावे त्या माणसाने लिहून घेतली.
काल सांगितल्यानुसार दुपारी दोन वाजता ब्रँच व्हिजिट आटोपून औरंगाबादला परत जाताना RM साहेब दोन मिनिटांपुरते बँकेत आले.
आल्या आल्या त्यांनी विचारलं..
 
“आज काही विशेष ? Any further development in the matter ? पोलीस स्टेशन मधून काही फोन वगैरे ?”
“अद्याप तरी काही नाही..”
मी थोडक्यात उत्तर दिलं.
“ठीक आहे ! मी निघतो मग.. काही काळजी करण्या सारखं वाटलं तर लगेच फोन करा मला..”
RM साहेबांनी आपली कार बाहेर रस्त्यावरच उभी केली होती. त्यांना सोडण्यासाठी बाहेर रस्त्या पर्यंत गेलो. ते कार मध्ये बसताच अचानक कुठून तरी सुखदेव तिथे प्रकट झाला. RM साहेबांना नमस्कार करून तो म्हणाला..
 
“साहेब, पाच जणांच्या नावे उद्या अटक वॉरंट निघणार आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी चाळीस हजार घेऊन मला आजच्या आज दोन लाख रुपये द्या. मी तक्रार मागे घेतो. ही शेवटचीच संधी समजा. तुमच्या स्टाफ बद्दल सहानुभूती वाटते, त्यांच्या लेकरा बाळांची चिंता वाटते म्हणून मी हा चान्स देतोय तुम्हाला..”
एकाएकी RM साहेबांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. त्यांना या साऱ्या प्रकाराचा उबग आला असावा. आवाज वाढवून कडक स्वरात ते म्हणाले..
“खबरदार, यापुढे असले पोरकट चाळे कराल तर.. ! तुमच्या असल्या धमक्यांना मी भीक घालीत नाही. तुम्हाला काय करायचं असेल ते करा. आमच्या स्टाफची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. या प्रकरणात जे काही होईल ते बँकेच्या नियमानुसारच होईल. यापुढे जर बँकेत पाय ठेवलात तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुमच्याविरुद्धच पोलिसांत तक्रार करण्यात येईल.”
 
नंतर माझ्याकडे पहात ते म्हणाले..
“यापुढे जर हा माणूस बँकेत येऊन बडबड करू लागला तर सिक्युरिटी गार्ड करवी धक्के मारून याला हाकलून लावा..”
RM साहेबांनी गाडीची काच वर केली आणि त्यांची कार औरंगाबादच्या दिशेने निघाली.
सुखदेव बोडखे RM साहेबांच्या आकस्मिक उग्रावताराने स्तंभित होऊन अजून जागच्या जागीच उभा होता. नंतर भानावर येऊन डिवचल्यागत, चिडून पाय आपटीत तो सरळ पोलीस स्टेशनच्या दिशेने निघून गेला.
 
बँकेत परत आल्यावर मी घड्याळात बघितलं तर दुपारचे पावणेतीन वाजले होते. स्टाफ पैकी काहीजण लंच आटोपून आपापल्या काउंटर वर जाऊन बसले होते. मी ही घाईघाईत माझा लंच बॉक्स उघडला तेवढ्यातच टेबलावरील फोन खणाणला. पलीकडून वैजापूर ठाण्याचे ईंचार्ज इन्स्पेक्टर माळी बोलत होते.
“नमस्कार ! वैजापूर पोलीस स्टेशन मधून ठाणेदार इंस्पे. माळी बोलतोय. तुमच्या स्टाफ विरुद्ध आमच्या ठाण्यात सुखदेव बोडखे यांनी फिर्याद नोंदविल्याचे तुम्हाला माहीतच असेल. त्याच संदर्भात आम्ही त्यांना समजावले असून मोठ्या मुश्किलीने ते आपली तक्रार मागे घेण्यास तयार झाले आहेत. तरी तुम्ही ताबडतोब बेबी सुमित्रा, शेख रहीम, रविशंकर व सुनील सैनी या चार जणांना घेऊन पोलीस ठाण्यात या, म्हणजे त्यांचे एक छोटेसे स्टेटमेंट व सही घेऊन प्रकरण मिटवून टाकता येईल. कृपया जरा लवकर या, आम्ही तुमची वाट पहात आहोत.”
 
इंस्पेक्टर साहेबांचे बोलणे ऐकत असताना माझ्या मस्तकात भीतीची एक थंडगार लहर उमटून गेली. जणू माझा मेंदू मला अनामिक संकटाचा इशाराच देत होता.
“येस सर, सध्या आम्ही लंच घेत आहोत. लंच झाल्यावर सर्वांना घेऊन लगेच तिकडे येतो. थँक यू व्हेरी मच, सर !”
थरथरत्या हातांनीच मी फोन खाली ठेवला. वाघाच्या गुहेत जाण्याची वेळ आली होती. बेबी, रविशंकर, रहीम व सैनी या चौघांना केबिन मध्ये बोलावून घेऊन त्यांना इंस्पे. माळींच्या फोन बद्दल सांगितलं.
“पोलीस स्टेशन मध्ये किती वेळ लागेल ते सांगता येत नाही, म्हणून आपल्या काऊंटरचे काम दुसऱ्यांना देऊन जा..”
असं सांगून पोलीस स्टेशन मध्ये जाण्यासाठी मी जागेवरून उठलो. कॅश टॅली करून काउंटरचा चार्ज दुसऱ्याला देण्यास सुनील सैनीला थोडा वेळ लागला. त्या मधल्या वेळेत RM साहेबांना ही रिसेन्ट डेव्हलपमेंट कळवावी म्हणून मोबाईल वरून त्यांच्याशी संपर्क साधला. एव्हाना ते औरंगाबादच्या अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचले होते. त्यांना इंस्पे. माळींच्या फोन बद्दल सांगताच त्यांनी ताबडतोब आपली कार जागीच थांबवली..
“हा पोलिसांचा ट्रॅप आहे. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाताच ते तुम्हाला लागलीच अटक करतील. त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवा आणि मिळेल त्या वाहनाने ताबडतोब औरंगाबादकडे निघा. तोपर्यंत मी तुमची इथे राहण्याची व्यवस्था करून ठेवतो. तिथून निघाल्यावर पोलीस स्टेशनच्या कुठल्याही कॉल ला उत्तर देऊ नका..”
 
… युद्ध सुरू होण्यापूर्वीचा शंखनाद झाला होता. लवकरच आमने सामने प्रत्यक्ष युद्धाला सुरवात होणार होती. सुदैवाने आसपासच्या शाखेतून कॅश नेण्या-आणण्यासाठी वैजापूर शाखेत कॅश व्हॅन ची व्यवस्था होती. त्या व्हॅन मध्ये सर्वांना बसवलं.cash van आपण व्हॅन मधून पोलीस स्टेशनला चाललो आहोत असंच ड्रायव्हर सहित सर्वांना वाटलं. व्हॅन गेटच्या बाहेर निघाल्यावर मी ड्रायव्हरला म्हणालो..
“चलो औरंगाबाद.. !!”
( क्रमश: 5 )
 

ajay-kotnis-photo1श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे