https://goodworld.in A website by Madhav Bhope

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

एटीएम चे थरारक नाट्य- भाग-३  अजय कोटणीस atm drama

*एटीएम नाट्य..* 

(अंक दुसरा – प्रवेश दुसरा)

अतिशय निराश, खिन्न अंतःकरणाने त्या एटीएम प्रकरणावर विचार करीतच मी बँकेत आलो. या प्रकरणी आता जास्त खोलात जायचं नाही, अतिविचार करून डोकं शिणवून घ्यायचं नाही, असं कितीही ठरवलं तरी काही काही गोष्टी मात्र मला अजूनही खटकतच होत्या. नेमक्या त्याच वेळी, फक्त पाच सहा मिनिटां पुरतीच गावातली वीज कशी जाते ? अचानक मला आठवलं, वीज मंडळातील एक प्यारेलाल नावाचा कर्मचारी आमच्या बँकेतील प्युन शंकरचा मित्र होता. लगेच शंकर करवी प्यारेलालला बँकेत बोलावून घेतलं.

“या भागातील वीज पुरवठा बंद-चालू करण्याची ड्युटी कुणाकडे आहे ? त्याला बँकेत घेऊन येता येईल का ?”

असं विचारलं असता तो वीज मंडळातील कर्मचारी प्यारेलाल म्हणाला..

“माझा मित्र व शेजारी सोमनाथ हाच या भागातील वीज पुरवठा बंद-चालू करण्याचे काम करीत असतो. कुणीतरी नातेवाईक वारल्यामुळे आज सकाळीच तो नजिकच्या गावाला गेला आहे. उद्या मी त्याला नक्कीच बँकेत घेऊन येईन..”

आजचा दिवसच असा उगवला होता की कोणतंच काम चट्कन आणि मनासारखं होत नव्हतं. क्रूरकर्मा हवालदार जमदाडेंच्या दहशतीपायी उतावीळ होऊन पूर्वीचे एटीएम टेक्निशियन श्री. गाडेकर तसेच सध्याचे टेक्निशियन श्री. डोंगरे यांना पुन्हा फोन लावला आणि त्यांना प्रकरणाची अर्जन्सी समजावून सांगितली. कुणी अन्य टेक्निशियन आज इथे येण्यासाठी उपलब्ध आहे का ? याचीही चौकशी केली. पण दोघांकडूनही नकारार्थीच उत्तर मिळाले.

तशी तर अगदी सुरवातीपासूनच या प्रकरणातील हवालदार जमदाडेंची भूमिका मला जराशी संशयास्पदच वाटत होती. त्यामुळे त्यांची पत्नी व मुले याबद्दलची अधिक माहिती काढण्याची कामगिरी बँकेतील हेड प्युन प्रेमानंद यांच्यावर सोपविली होती. प्रेमानंदचं घर जमदाडेंच्या घरापासून अगदी जवळच होतं. त्याने आणलेल्या माहितीनुसार जमदाडेंची पत्नी ठार निरक्षर होती तसेच त्यांची दोन्ही मुले अहमदनगर येथे शिकत असून गेल्या अनेक दिवसांत ती वैजापूरला आलेली नव्हती. त्यामुळे याबाबतीत तरी हवालदार जमदाडे यांनी दिलेली माहिती ही खरीच होती.

मात्र खुद्द हवालदार जमदाडे दहा दिवसांपूर्वी वैजापूरला येऊन गेले किंवा नाही याबद्दल अजूनही पक्की माहिती मिळाली नव्हती. सुदैवाने प्रेमानंदच्या घरची कामवाली बाईच जमदाडेंच्या घरीही भांडी घासण्यासाठी जाते, असं प्रेमानंद कडून समजलं. तेव्हा आता या कामवाली कडूनच हवालदार जमदाडेंच्या बाबतीत पक्की खबर मिळण्याची किंचितशी शक्यता होती. मात्र ती कामवाली देखील सध्या आजारी असल्यामुळे गेले दोन दिवस प्रेमानंद कडे कामाला आलेली नव्हती.

नेहमी सारखीच आजही बँकेत ग्राहकांची अफाट गर्दी होती. दैनंदिन कामकाजात एवढा बुडून गेलो की दिवस केंव्हा मावळला ते कळलंही नाही. संध्याकाळी साडेसात वाजता रोजच्या सारखी एटीएम मध्ये कॅश टाकण्यापूर्वी (Replenish) हेड कॅशियर व अकाउंटंट साहेब सहज माझ्या केबिन मध्ये आले, तेंव्हाच जमदाडेंच्या प्रकरणाची मला आठवण झाली. आज दिवसभरात जमदाडे बँकेत फिरकले नाहीत हे लक्षात येताच खूप हायसं वाटलं आणि मनोमन आनंदही झाला. वाटलं, चला..! तेवढंच आजचं मरण उद्यावर ढकललं गेलं.

पण माझा हा आनंद फार काळ टिकला नाही. रात्री साडेआठ वाजता हवालदार जमदाडे दोन तीन पत्रकारांना घेऊन बँकेत आले. जमदाडेंचा अवतार गेल्या खेपे सारखाच अतिशय उग्र, संतप्त होता. खुर्चीवर बसता बसता सोबत आलेल्या पत्रकारांकडे बोट दाखवून ते म्हणाले..

“तुमच्या कडून काहीच निरोप आला नाही म्हणून शेवटी या मित्रांना घेऊन इथे यावं लागलं. तुमचा तपास केंव्हा पूर्ण होणार आहे ? आणि तुम्ही माझे पैसे कधी परत करणार आहात ?, त्याची पक्की, फिक्स तारीख आत्ताच आमच्या ह्या पत्रकार मित्रांसमोर सांगा. म्हणजे त्यानुसार आम्हालाही पुढचं पाऊल उचलता येईल. तसं पाहिलं तर, मी नको नको म्हणत असतानाही एक छोटसं पाऊल माझ्या या मित्रांनी आज उचललंच आहे. बहुदा तुमचं त्याकडे लक्षच गेलेलं नसावं.”

असं बोलून दैनिक लोकमत, दै. सामना, दै. सकाळ अशा प्रमुख वर्तमानपत्रांत “वैजापूरच्या स्टेट बँकेत एटीएम घोटाळा” अशा मथळ्याखाली छापून आलेली दोन पॅराग्राफची छोटीशी बातमीच जमदाडेंनी मला दाखविली. सकाळी घाईघाईत पेपर चाळताना माझ्या नजरेतून ती बातमी सुटली असावी, मात्र बँकेच्या स्टाफने नक्कीच ती बातमी पाहिली असणार आणि केवळ मला आणखी मनस्ताप नको म्हणून माझ्याकडे त्या बातमीचा कुणीही उल्लेख केलेला नसावा.

“हे बघा, मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं आहे की तांत्रिक बिघाडामुळे एटीएम रूम मधील सीसीटीव्ही रेकॉर्डिंग सध्या उपलब्ध नसून एक दोन दिवसात औरंगाबाद येथून टेक्निशियन आल्यावर सीसीटीव्ही फुटेज तपासूनच पुढील निर्णय घेता येईल.”

माझ्या या उत्तरावर डोळे बारीक करीत मिशीवरून हात फिरवित निळू फुलें सारख्या धूर्त, बेरकी आविर्भावात जमदाडे म्हणाले..

“आणि समजा, तांत्रिक बिघाडामुळे अथवा अन्य काही कारणाने ते रेकॉर्डिंग झालेच नसेल किंवा ते झालेले रेकॉर्डिंग अस्पष्ट, अंधुक असेल, तर अशावेळी तुम्ही काय करणार ?”

जमदाडेंनी असा प्रश्न विचारताच चमकून जाऊन मी त्यांना प्रतिप्रश्न केला..

“पण तुम्हाला अशी शंका का येते आहे ?”

जमदाडे क्षणभर चपापले पण लगेच स्वतःला सावरून घेत म्हणाले..

“तुम्हीच म्हणालात ना की सीसीटीव्ही रेकॉर्डिंग मध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे म्हणून.. आणि तांत्रिक बिघाडात असं काहीही होणं शक्यच आहे.”

“ठीक आहे, तुम्ही म्हणता तशी परिस्थिती उद्भवलीच तर बँकेच्या नियमानुसार आणि वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.”

माझ्या या उत्तराने जमदाडेंचे जराही समाधान झाले नाही. त्यांचा बँकेत येण्याचा उद्देशच मुळी लोक जमवून, आरडा ओरडा करून, माझ्यावर दबाव टाकणे हा होता. ताडकन उठून उभे रहात माझ्याकडे बोट रोखून ते गरजले..

“बस झाला तुमचा वेळकाढूपणा ! उद्या सकाळी साडे दहा वाजता जर मला माझे पैसे परत मिळाले नाहीत तर दुपारी स्थानिक पुढारी, पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांचे (News channel) प्रतिनिधी यांच्यासह बँकेत येऊन तुम्हाला घेराव घालणार आहे. त्यानंतर टीव्ही आणि वृत्तपत्रांतून बँकेची जी प्रचंड, घोर बदनामी होईल त्यासाठी सर्वस्वी तुम्हीच जबाबदार असाल. त्यामुळे तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा आहे तो आजच घ्या.. येतो आम्ही.. !!”

दाणदाण पावले आपटीत, तावातावाने आपल्या दोन्ही मिशांना करकचून पीळ देत आपल्या पत्रकार मित्रांसह खुशालराव जमदाडे निघून गेले.

आणि डोकं गच्च धरून मी जागच्या जागी बसून राहिलो. या प्रकरणाची कोंडी फुटता फुटत नव्हती. एकीकडे हवालदार जमदाडे विनाकारण इरेस पेटून घाईला आले होते तर दुसरीकडे या संकटातून मार्ग काढण्याचे माझे सारे प्रयत्न एक तर संपुष्टात आले होते किंवा लांबणीवर पडले होते. शेवटचा निकराचा प्रयत्न म्हणून एटीएम टेक्निशियन श्री. डोंगरेंना अनेकदा, अगदी वारंवार कॉल केला परंतु त्यांनी एकदाही माझा कॉल उचलला नाही.

शेवटी, उद्या काय व्हायचं ते होवो, आता या प्रकरणात आणखी मनस्ताप करून घ्यायचा नाही असं मनाशी ठरवून उदास अंतःकरणाने रूमवर झोपायला निघून गेलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सवयीनुसार लवकरच जाग आली. पण आज नेहमीसारखं वैजापूर गावालगतच्या नारंगी सारंगी डॅमच्या काठी मॉर्निंग वॉकला जाण्याची इच्छाच झाली नाही. त्यामुळे कितीतरी वेळ तसाच आळसावल्यागत बिछान्यावर पडून राहिलो. शेवटी, जेंव्हा सकाळी साडेनऊ वाजता सिक्युरिटी गार्डचा फोन आला की “तुम्हाला भेटायला कुणी तरी आलं असून त्याचं तुमच्याकडे खूप महत्वाचं आणि अर्जंट काम आहे. त्यासाठी तुम्हाला ताबडतोब भेटायचं आहे असं ते म्हणत आहेत..” तेंव्हा “अरे देवा, आता हे कोणतं आणखीन एक नवीन संकट उद्भवणार आहे ?” या धास्तीनं कसंबसं घाईघाईत तोंडावर पाणी मारून तसाच बँकेत गेलो.

एक अनोळखी तरुण माझ्या केबिनमध्ये माझी वाट पहात बसला होता. मला पाहताच सुहास्य मुद्रेने हस्तांदोलनासाठी हात पुढे करीत तो म्हणाला..

“सर, मी आशिष डोंगरे.. एटीएम टेक्निशियन.. !”

मला आश्चर्याचा सुखद धक्काच बसला.

“सॉरी सर, काल मी माझा मोबाईल घरीच विसरून गेलो होतो. त्यामुळे तुमचा कॉल रिसिव्ह करू शकलो नाही. रात्री उशिरा घरी परतल्यावर तुमचे एवढे सारे मिस कॉल बघितले. तसं तर आज सकाळी मला सिन्नरला जायचं होतं, पण पहिल्यांदा इथलं तुमचं काम करून मगच पुढे सिन्नरला जावं अशी मला तीव्र आंतरिक प्रेरणा झाली. त्यामुळेच मी थेट तुमच्याकडे आलो आहे..”

मला तर जणू देवच पावल्यागत झालं. लगेच त्यांना घेऊन एटीएम रूम मध्ये गेलो. अकाउंटंट आणि हेड कॅशियर साहेब सुद्धा तोपर्यंत बँकेत आले होते. त्यांनाही सोबत घेतलं. विवादित एटीएम व्यवहाराची तारीख आणि वेळ सांगितल्यावर लगेच आशिष डोंगरेने अवघ्या पाच दहा मिनिटांतच बिल्ट-इन कॅमेऱ्यातील पंधरा तारखेच्या रात्री सव्वा नऊ वाजताचं रेकॉर्डिंग बँकेच्या pen drive मध्ये काढून दिलं. Pen drive माझ्या हातात ठेवत तो म्हणाला..

“हे घ्या..! सर्व रेकॉर्डिंग अगदी क्लिअर आणि स्पष्ट आहे. मी काल येऊ न शकल्याने तुम्हाला जो त्रास झाला असेल त्याबद्दल खरोखरीच दिलगीर आहे. मला आता सिन्नरला लवकर पोहोचायचं असल्याने कृपया मला जाण्याची परवानगी द्या..”

एवढं बोलून Pen drive माझ्या हातात ठेऊन मला साधी आभार मानण्याची संधीही न देता जवळ जवळ धावतच तो नम्र, अदबशीर व हसतमुख एटीएम टेक्निशियन बँकेबाहेर निघून गेला.

मी घड्याळात पाहिलं तर सकाळचे दहा वाजत होते. सकाळी साडेनऊ वाजता अचानक आशिष डोंगरेचं बँकेत प्रकट होणं आणि एटीएम रेकॉर्डिंग काढून देऊन दहा वाजेपर्यंत बँकेतून अंतर्धान पावणं.. हे सारं मला अगदी स्वप्नवत.. जणू एखादा चमत्कार घडून आल्या सारखंच वाटत होतं.

ताबडतोब वैजापूर पोलिस स्टेशनला फोन लावला. इन्स्पेक्टर खराटेंनीच फोन उचलला. त्यांना एटीएम रेकॉर्डिंग उपलब्ध झाले असल्याचें कळवता क्षणीच.. “अरे व्वा ! शाब्बास.. !! हवालदार जमदाडेंना सोबत घेऊन ‘ते’ रेकॉर्डिंग पहायला आत्ता लगेच बँकेत येतो आहे..” असं ते म्हणाले.

रेकॉर्डिंग मध्ये कुणाचा चेहरा आहे हे पाहण्याची इन्स्पेक्टर खराटें प्रमाणेच आम्हा सर्वांना सुद्धा अत्यंत उत्सुकता होती. ठाणेदार साहेब हवालदार जमदाडेंना घेऊन आल्यावर लॅपटॉपला Pen drive लावून रेकॉर्डिंग पहायला सुरुवात केली. ठीक नऊ वाजून पंधरा मिनिटे आणि सोळा सेकंदांनी एक धिप्पाड माणूस दहा हजार रुपये मोजताना दिसला. सुरवातीला त्याच्या चेहऱ्यावर खूप मोठे काळे डाग दिसत होते. नंतर नीट निरखून पाहिल्यावर लक्षात आलं की ते काळे डाग नसून त्या माणसाच्या जाडजूड, भरघोस मिशा आहेत. आता चेहरा नीट दिसू लागल्यावर तर तो माणूस म्हणजे हवालदार खुशालराव जमदाडे हाच होय, हे स्पष्ट झालं.

“अरेत्तिच्या मारी !” अविश्वासानं जमदाडेंकडे पाहत इन्स्पेक्टर खराटे उद्गारले..

“आता ह्याला काय म्हणावं ? ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ च्या ऐवजी ‘उलटा हवालदार मॅनेजर को डांटे’ असाच प्रकार झाला हा..! अशी आहे तर ही भानगड ! तरी मला शंका होतीच हा हवालदार एवढा मागे का लागलाय बँक वाल्यांच्या.. हे बाहेर समजलं तर “पोलिसांच्या उलट्या बोंबा” असंच म्हणतील ना सारे गावकरी ?”

हवालदार जमदाडे खाली मान घालून चुपचाप बसला होता. भीतीने व शरमेने त्याच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडत नव्हता.

आम्ही सारे स्तब्ध होऊन एकटक हवालदार खुशालराव जमदाडेंकडेच पहात होतो. काही वेळ असाच निःशब्द शांततेत गेल्यावर ठाणेदार खराटेंनी केबिनमधील संभाषणाची सारी सूत्रं आपल्या हातात घेतली. पुन्हा हवालदार जमदाडेंकडे वळून ते म्हणाले..

“अरेरे..! काय हे खुशालराव ? पोलिसांची होती नव्हती ती सारी इज्जतच पार मातीत घालवलीत तुम्ही..! खरं म्हणजे हे रेकॉर्डिंग अगदी क्रिस्टल क्लिअर म्हणता येईल इतकं अजिबातच स्पष्ट नाही. तुमच्या ऐवजी दुसरं कुणीही या रेकॉर्डिंग मध्ये असतं तर संशयाचा फायदा देऊन त्याला सहज सोडून देता आलं असतं. पण.. पण.. तुमच्या ह्या जगप्रसिद्ध मिशा आडव्या आल्या ना !!

अहो, तुमच्या ह्या गलेलठ्ठ भरभक्कम मिशा पाहून तर कुणी आंधळाही ओळखेल की ह्या रेकॉर्डिंग मध्ये दिसणारा माणूस हा जमदाडे हवालदारच आहे म्हणून..!”

जमदाडे अजूनही खाली मान घालूनच गप्प बसले होते. नंतर आमच्याकडे पहात मोठ्याने हसत इन्स्पेक्टर खराटे म्हणाले..

“अहो, काय सांगू तुम्हाला..!, आमच्या कमिशनर मिश्रा साहेबांना ह्या हलकट जमदाडेच्या मिशांचं एवढं कौतुक की प्रत्येक वेळी वैजापूरला आले की अमिताभ बच्चन स्टाईल ते म्हणायचे.. “मूंछें हो तो जमदाडे जैसी..! वरना ना हो.” पण बघा ना आज त्या मिशांनीच त्याचा घात केला.. मिशांच्या केसांनीच आज त्याचा गळा कापला..”

हास्यविनोद करून केबिन मधील वातावरण हलकं करण्याचा ठाणेदार खराटे आटोकाट प्रयत्न करीत असले तरी अकस्मात बसलेल्या आश्चर्याच्या त्या धक्क्यातून आमच्यापैकी कुणीच अजूनही बाहेर आलेलं नव्हतं. साऱ्यांच्या नजरा मुंडी खाली झुकवून बसलेल्या खुशालराव जमदाडेंवरच खिळलेल्या होत्या. आमची ती अवस्था बघून परिस्थिती सावरून घेत अत्यंत विनम्र आणि समजावणीच्या सुरात ठाणेदार खराटे म्हणाले..

“हे पहा, कधी कधी होतात चुका आम्हा पोलिसांकडूनही..! अशावेळी आपण देखील समजदारी दाखवून उदार बुद्धीने त्यांना माफ केलं पाहिजे. हवालदार जमदाडेंच्या वतीने मी तुम्हा सर्वांची माफी मागतो. आता हवालदार आपली तक्रार मागे घेत असल्याचं तुम्हाला लिहून देतील. तुम्ही देखील हे प्रकरण इथेच मिटवून टाका. चला..! सगळ्या स्टाफसाठी चहा मागवा माझ्या तर्फे, आणि शेवट गोड करा..!”

इन्स्पेक्टर खराटेंच्या ह्या प्रस्तावाला होकारार्थी मान डोलवत मी देखील आपली मूक संमती दर्शवली. प्रकरण विनाकारण वाढवून पोलिसांशी पंगा घेण्याची माझी आता अजिबातच इच्छा नव्हती.

“एटीएम मधून पंधरा तारखेला मीच दहा हजार रुपये काढले होते व त्याचे विस्मरण झाल्याने गैरसमजातून बँके विरुद्ध तक्रार केली होती..”  असे कबूल करून त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करीत बँके विरुद्धची तक्रार मागे घेत असल्याचे हवालदार जमदाडेंनी लिहून दिले.

हे प्रकरण एकदाचं संपलं असं वाटून मी ही सुटकेचा निःश्वास टाकला.

पण.. या एटीएम नाट्याचा तिसरा व शेवटचा अंक अद्याप बाकी होता. तसंच अनेक नवीन पात्रांचा या नाटकात प्रवेश होणंही अजून बाकी होतं..

                        (क्रमश:..4)

                      🙏🏻🌹🙏🏻

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 


Discover more from Blissful Life

Subscribe to get the latest posts sent to your email.

Say what you feel