https://goodworld.in A website by Madhav Bhope

उतनूरचे दिवस-4D-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

tractor

Memories-at-Utnoor

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

Memories at Utnoor

*उतनूरचे दिवस…*

*थरार… (४-ड)*

जनार्दन भाऊंच्या घरून मी बँकेत परतलो तेंव्हा दुपारचा एक वाजून गेला होता. खिन्नपणे यंत्रवत टेबलावरील कागद वर खाली करत बसलो. मात्र मनात उठलेलं के. जनार्दन बद्दलच्या विचारांचं काहूर काही केल्या थांबत नव्हतं. या प्रकरणातील माझी आतापर्यंतची सारी मेहनत वाया गेली होती. हा पराभव माझ्या जिव्हारी लागला होता.

मी असा उदास बसलेलो असतानाच आमचे मॅनेजर डी. कृष्णा बाबू अत्यंत प्रफुल्लित चेहऱ्याने तिथे आले. आल्या आल्या माझ्याशी हस्तांदोलन करीत ते म्हणाले..

“हार्दिक अभिनंदन..! तुमचं ते के. जनार्दन प्रकरण एकदाचं कायमचं मिटलं. आता तुम्हाला त्याच्या बद्दल कसलाही विचार करण्याची गरज नाही. यापुढे ते कर्ज खातं आपल्या बुक्स मध्ये दिसणार नाही..”

मॅनेजर साहेबांच्या बोलण्यातून काहीच अर्थबोध न झाल्यामुळे मी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहिलं. मला असा बुचकळ्यात पडलेला पाहून मॅनेजर साहेब म्हणाले..

“आज सकाळी माझ्या केबिन मधल्या कपाटातील कागदपत्रे व फाईल्स नीट लावीत असताना मला रिजनल ऑफिस मधून आलेलं एक बंद पाकीट सापडलं. कदाचित आधीच्या मॅनेजर साहेबांची बदली झाल्यानंतर ते आलेलं असावं आणि अनवधानाने न फोडता ते तसंच राहून गेलं असावं.

त्या पाकिटात के. जनार्दनचे खाते राईट ऑफ (write off) करण्या बद्दल वरिष्ठ कार्यालयाची परवानगी होती. त्यासाठी मुख्य कार्यालयाने शत प्रतिशत तरतूद (provision) केल्याचाही त्यात उल्लेख होता. मी ताबडतोब क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधला आणि ही तरतूद अद्यापही कायम असल्याची खातरजमा करून घेतली. त्यानंतर त्वरित ही तरतूद वापरून के. जनार्दनचं प्रतिवादीत (Protested Bills) खातं बट्टा खात्यात टाकून मी राईट ऑफ (Write off) केलं.

शाखेच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये हे खाते “राईट ऑफ” साठी पाठवावे अशी ऑडिटरने शिफारस केली होती. त्यानुसार आधीच्या मॅनेजर साहेबांनी तसा प्रस्ताव रिजनल ऑफिस कडे पाठविला असावा. काहीही असो, त्या के. जनार्दनचा विषय आता मुळापासून संपला आहे. तुम्ही त्याच्या बद्दलचे सर्व विचार आता मनातून पूर्णपणे काढून टाका.. “

मॅनेजर साहेबांच्या दृष्टीनं जरी ही आनंदाची बातमी होती तरी माझ्या जखमेवर मात्र त्यामुळे जणू मीठच चोळलं गेलं.

के. जनार्दन च्या कर्ज खात्याची कागदपत्रे प्रतिवादीत (Protested Bills) खात्यांच्या फाईल मधून काढून लिखित-बंद (Written off) खात्यांच्या फाईल मध्ये टाकताना मी सहजच ती कागदपत्रे पुन्हा चाळली.

त्यातील ट्रॅक्टर समोर उभे राहून काढलेल्या के. जनार्दनच्या फोटोनं माझं लक्ष वेधून घेतलं. फोटोत ट्रॅक्टरचा रजिस्ट्रेशन नंबर AP- 01- A-19 असा स्पष्ट दिसत होता. मी नुकत्याच पाहिलेल्या के. जनार्दनच्या वाड्या मागील ट्रॅक्टरचा नंबर AP-01-B-313 असल्याचं मला पक्कं आठवत होतं. तसंच मी पाहिलेल्या ट्रॅक्टर वर “फोर्ड” असं लिहिलं होतं, पण या फोटोतील ट्रॅक्टर वर तर ठळक अक्षरात “मॅसी फर्ग्युसन” असं लिहिलेलं दिसत होतं.ford tractor

म्हणजेच के. जनार्दन काहीतरी लबाडी करत होता. बँकेला दाखवण्यासाठी त्याने भंगार मधून ट्रॅक्टर व ट्रॉली खरेदी केलेली दिसत होती. याचाच अर्थ बँकेने फायनान्स केलेला ट्रॅक्टर व ट्रॉली अद्यापही चालू स्थितीत होती आणि जनार्दन भाऊंनी त्यांना अन्य कुठेतरी लपवून ठेवलं असावं.

अर्थात आता या पश्चात बुद्धिनं काढ़लेल्या तार्किक निष्कर्षाचा काहीही उपयोग नव्हता.

त्याच सुमारास उतनूर च्या ससे उत्पादन (Rabbit Breeding) केंद्रा मधून पांढऱ्या शुभ्र सशांची दोन पिल्ले चि. अनिशला खेळण्यासाठी मी विकत आणली होती. त्या सशांसाठी लोखंडी जाळीचा छोटासा पिंजरा तयार करवून घेण्यासाठी उतनूरच्या एका वेल्डिंग शॉप मध्ये मी गेलो होतो. ह्या वेल्डिंग शॉप वाल्याचे पूर्वी शामपुरच्या दामोदर बाजार मध्ये फॅब्रिकेशनचे युनिट असल्याचे त्याच्या बोलण्यावरून समजले. साहजिकच “नक्षल्यांच्या धमकीमुळे ते दुकान बंद केले का ?” असा मी त्याला प्रश्न केला. त्यावर तो म्हणाला..

“नाही साहेब..! नक्षल्यांचा आम्हाला काहीही त्रास नव्हता. त्यांनी आम्हाला कधी धमकीही दिली नाही. खरं म्हणजे त्या कॉम्प्लेक्सचा मालक पी. जनार्दन हा खूप चलाख आणि दगाबाज माणूस आहे. गगन रेड्डी नावाच्या कुर्नुल येथील श्रीमंत व्यापाऱ्या कडून कर्ज घेऊन त्याने आपल्या जमिनीवर हा कॉम्प्लेक्स उभारला. मात्र ठरल्याप्रमाणे मुद्दल रकमेचा हप्ता आणि त्यावरील व्याजापोटी कॉम्प्लेक्सचे अर्धे भाडे या पी. जनार्दन ने गगन रेड्डीला कधीच दिले नाही. गगन रेड्डी हा रायलसीमा भागातील कुख्यात बाहुबली राजकारणी गुंड सुध्दा आहे. त्याने कुर्नुल हुन आपले गुंड आणून तो कॉम्प्लेक्स खाली करवून आपल्या ताब्यात घेतला. तसंच दर महिन्याला शामपुरला येऊन तो आपल्या कर्जाचा हप्ता पी. जनार्दन कडून वसूल करतो.”

बाप रे ! हा के. जनार्दन उर्फ पी. जनार्दन भलताच खोटारडा दिसत होता. त्याला अजिबात असंच सोडून देऊन चालणार नव्हतं. कसं ही करून त्याला चांगलीच अद्दल घडवायचं मी मनाशी पक्कं ठरवलं.

के. जनार्दनच्या कर्ज कागदपत्रात भागवत मुंढे नावाच्या इंद्रवेल्ली येथील एका शेतकऱ्याचा जामीनदार (गॅरंटर) म्हणून उल्लेख होता. पूर्वी, मी त्याच्याबद्दल गावात चौकशी केली होती तेंव्हा तो फार पूर्वीच मरण पावल्याचे समजले होते. आता मी नव्याने त्या जामीनदारा बद्दल कसून अधिक चौकशी केली. त्यातून, त्या दिवंगत गॅरंटरची पत्नी व मुले इंद्रवेल्ली गावातच राहून शेती व अन्य व्यवसाय करीत असल्याचे समजले. त्यांचा पत्ता मिळवून त्यांना गाठले आणि के. जनार्दनचे कर्ज फेडण्याची जबाबदारी मृत जामीनदाराचे वारस या नात्याने आता तुमची आहे, याची त्यांना जाणीव करून दिली.

के. जनार्दनला रजिस्टर्ड व कायदेशीर नोटीसा पाठवणे सुरूच होते. या नोटीसा आता थेट शामपुरच्या पत्त्यावरच पाठवीत होतो आणि जनार्दन भाऊही त्या नोटीसा निमूटपणे स्विकारीत होते. जामीनदार भागवत मुंढेची पत्नी व मुलांनाही रजिस्टर्ड नोटीसा पाठवणे मी आता सुरू केले.

उतनूर, शामपुर व नागापूर येथील शेतजमिनीवर जनार्दन भाऊंनी ग्रामीण बँक, मध्यवर्ती बँक तसेच विविध सोसायट्यां कडून पीक कर्ज घेतले होते. त्या सर्व बँकांच्या व सोसायट्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना या जमिनीवर आधीच आमच्या बँकेचा बोजा (charge) असल्याची कल्पना दिली. तसेच तुम्ही आमचे “बे-बाकी (No Dues) प्रमाणपत्र” न घेताच या जमिनीवर कर्ज दिले, त्याची जिल्हा अग्रणी बँकेकडे (District Lead Bank) तक्रार करणार असल्याचेही त्यांना सांगितले.

या सर्व बँका व सोसायट्यांनी जनार्दन भाऊंच्या मागे आपल्या कर्ज वसुलीसाठी तगादा लावला. तर इकडे जामीनदार भागवत मुंढेची पत्नी व मुले यांनी देखील जनार्दन भाऊंच्या घरी ठिय्या मांडून ट्रॅक्टरचे कर्ज ताबडतोब भरून टाकण्याचा आग्रह धरला.

अशातच आमच्या बँकेच्या वरंगल येथील रिजनल ऑफिसने आदीलाबाद जिल्ह्यातील सर्व शाखाधिकारी व फिल्ड ऑफिसर्स ची मिटिंग एका रविवारी आदीलाबाद येथे ठेवली होती. मिटिंग CCI (सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या हॉलमध्ये होती. या मिटिंग मध्ये आमच्या मॅनेजर साहेबांचा व माझा रिकव्हरी कॅम्पेन मध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. मिटिंग संपल्यानंतर थोड्याच वेळाने हॉलमध्येच जेवणाचा कार्यक्रम होता. त्या मधल्या वेळेत जवळपास फेरफटका मारण्यासाठी काही मित्रांसोबत फिरत फिरत मी बाहेरील रस्त्याकडे आलो.

conference hall meeting

सीसीआय सिमेंटची फॅक्टरी तिथून अगदी जवळच असावी. अनेक ट्रक व ट्रॅक्टर त्या फॅक्टरीत ये-जा करीत होते. अचानक एक ट्रॅक्टर आम्हाला अगदी चाटून गेला. त्यामुळे आम्ही रागाने त्या ट्रॅक्टरकडे बघितलं. त्या ट्रॅक्टरचा नंबर AP-01-A-19 असल्याचं पाहताच मी चमकलो.

tractor

हा तोच के. जनार्दनला आम्ही फायनान्स केलेला ट्रॅक्टर होता. त्या ट्रॅक्टर कडे लक्ष जाताच मागचा पुढचा विचार न करता मी एकट्याने पायीच त्या ट्रॅक्टरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

वेगाने जाणार तो ट्रॅक्टर लवकरच मला दिसेनासा झाला. मात्र तरीही मी नेटाने चालतच राहिलो. सुमारे एक दीड किलोमीटर अंतर चालून गेल्यावर मला सिमेंट फॅक्टरीचे गेट दिसले.

मी गेट वर जाऊन ट्रॅक्टरचा नंबर सांगून त्याची चौकशी केली तेंव्हा नुकताच तो ट्रॅक्टर आत गेला असून सुमारे अर्ध्या तासात तो बाहेर येईल असे गेटकीपर म्हणाला.

cci gate

त्यामुळे मी गेट जवळच तो ट्रॅक्टर बाहेर येण्याची वाट पहात थांबलो. खरोखरीच अर्ध्या तासाने तो ट्रॅक्टर बाहेर आला तेंव्हा हातानेच इशारा करून त्याला एका बाजूला नेत थांबवलं. त्या ट्रॅक्टर चालकाकडे ट्रॅक्टरच्या मालकाबद्दल चौकशी केली तेंव्हा आदीलाबादच्या धान्य मार्केट मधील जनार्दन शेठ ने पंधरा हजार रुपये महिना इतक्या भाड्याने तो ट्रॅक्टर त्याला भाड्याने दिल्याचे समजले.

मी ट्रॅक्टरचं निरीक्षण केलं. तो अगदी उत्तम स्थितीत होता. त्याचे चारी टायर नवीन दिसत होते. ट्रॉलीला ही नुकताच रंग दिल्यासारखं वाटत होतं. ट्रॅक्टर आणि ट्रॉली सुस्थितीत असल्याचं पाहून मला हायसं वाटलं. ट्रॅक्टर चालकाचे आभार मानून मी CCI हॉल कडे परतलो तेंव्हा सर्वांची जेवणे आटोपली होती. आमच्या मॅनेजर साहेबांनी “कुठे गेला होतात ?” असं विचारलं तेंव्हा “बँकेतील बॅच मेट भेटला होता व त्याच्या सोबत बाहेरच जेवलो” असं खोटंच सांगून त्यांचं समाधान केलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक साडेदहा वाजता आमचे रिजनल मॅनेजर साहेब क्वार्टरली व्हिजिट साठी शाखेत हजर झाले. व्हिजिट आटोपून त्यांना ताबडतोब अन्य दुसऱ्या शाखेत जायचे असल्याने त्यांच्या सहाय्यक अधिकाऱ्याला सरप्राईज इंस्पेक्षनची औपचारिक कार्यवाही लवकर आटोपण्यास सांगून ते आमच्याशी गप्पा मारीत बसले होते. इतक्यात मॅनेजर साहेबांना एक संशयास्पद फोन आला. पलीकडून

“मै रयतु क्रांति, प्रभाकर दलम का कमांडर बात कर रहा हूँ..”

असे शब्द ऐकू येताच मॅनेजर साहेबांनी आम्हा सर्वांना खुणेनेच गप्प राहण्यास सांगितले. पलीकडची व्यक्ती म्हणाली..

“आप का नया फिल्ड ऑफिसर आज कल कुछ जादा ही फुर्ती बता रहा है और फिजुलकी ईमानदारी भी झाड़ रहा है.. हमारे कुछ दोस्तोंको उसने परेशान करके रक्खा है.. उसे कह दो के शामपुर, नागापुर, इन्द्रवेल्ली एरिया में आना जाना बंद कर दे.. वरना हम उसे अपने टार्गेट पे ले सकते है..”

एवढं बोलून पलीकडच्या व्यक्तीने फोन ठेवून दिला. आमच्या मॅनेजर साहेबांना यापूर्वी ही “पोलीस कारवाईच्या निषेधार्थ बँक बंद ठेवण्यासाठी” नक्षली अन्नांचे अनेकदा फोन येऊन गेले असल्याने त्यांनी नक्षली अन्ना चा आवाज अचूक ओळखला. जेंव्हा त्यांनी समोर बसलेल्या रिजनल मॅनेजर साहेबांना नुकत्याच आलेल्या फोन बद्दल सांगितलं तेंव्हा ते हादरून गेले. मला कळवळून समजावून सांगत ते म्हणाले..

“डोन्ट टेक युअर जॉब सो सिरियसली. अरे बाबा, ऐसे खतरनाक एरिया में अपनी जान को सम्हालकर ही काम करना. आपको कोई गोल्ड मैडल नही मिलनेवाला ऐसी रिस्क लेने के बदले.. उलटा, आपको कुछ हुआ तो हम में से कोई भी नही आएगा आपको बचाने के लिए.. जरा अपने बीबी बच्चोंके बारे में सोचो.. यहां तो पुलिसवाले भी आने को डरते है.. इसलिए, आज के बाद, जब बहुत ही जरूरी काम हो तब ही बँक से बाहर जाना.. और बाहर जाते वक्त हमेशा सिक्युरिटी गार्ड को साथ ले जाना..”

रिजनल मॅनेजर साहेब निघून गेल्यावर बराच वेळ मी नक्षली कमांडरने केलेल्या फोन बद्दलच विचार करीत होतो. जनार्दन भाऊंनीच त्यांच्या नक्षली मित्रांना सांगून हा फोन करायला लावला असावा असा मला दाट संशय येत होता.

दोन दिवस वाट पाहून मग मॅनेजर साहेबांना के. जनार्दनच्या भाड्याने दिलेल्या ट्रॅक्टर बद्दल सांगून टाकलं आणि तो ट्रॅक्टर जप्त करून उतनूरला आणण्याबद्दल त्यांची परवानगी मागितली. मॅनेजर साहेबांना माझं कौतुक वाटलं. त्यांनी एका कस्टमरची जीप भाड्याने घेतली आणि ट्रॅक्टरचा एक ड्रायव्हर, बँकेकडे असलेली ट्रॅक्टरची डुप्लिकेट किल्ली व दोन सिक्युरिटी गार्ड सोबत देऊन बँकेचा ट्रॅक्टर खेचून आणण्यासाठी मला आदीलाबादला पाठवलं. तसंच आमच्या आदीलाबाद शाखेच्या चीफ मॅनेजरलाही फोन करून मला या प्रकरणी शक्य ती सर्व मदत करण्याची त्यांनी विनंती केली.

त्यानंतर मॅनेजर साहेबांनी उतनूरच्या पोलीस ठाण्याला फोन केला आणि ट्रॅक्टर खेचून आणण्यासाठी बँकेचा स्टाफ आदीलाबादला जात असल्याची त्यांना कल्पना दिली. दोन दिवसांपूर्वी नक्षली कमांडरने केलेल्या धमकीच्या फोन बद्दल त्यांना यापूर्वीच कळवलेलं असल्याने पोलिसांची एक जीप सुरक्षित अंतर ठेवून आमच्या मागोमाग येत होती.

आम्ही आदीलाबादला पोहोचल्यावर थेट सीसीआय सिमेंट फॅक्टरीवर गेलो. परंतु आज तेथे जनार्दन शेठचा ट्रॅक्टर आलेलाच नव्हता. तेथील काम संपल्याने कदाचित तो ट्रॅक्टर पुन्हा धान्य मोंढ्यात गेला असावा असे फॅक्टरीचा गेटकीपर म्हणाला. त्यामुळे आम्ही धान्य मार्केट कडे आमचा मोर्चा वळवला. सुदैवाने मार्केटच्या गेट जवळच आमचा ट्रॅक्टर उभा होता. सोबत नेलेल्या ड्रायव्हरने डुप्लिकेट किल्लीने ट्रॅक्टर चालू केला. आणि हळूहळू चालवीत तो उतनूरला आणला. वाटेत कोणताही त्रास झाला नाही. उतनूरच्या पोलिसांची जीपही सकाळ सारखीच आमच्या मागोमाग येत होती. बँकेसमोर पुरेशी जागा नसल्याने पोलीस स्टेशन समोरील मोकळ्या जागेतच ट्रॅक्टर उभा केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताच के. जनार्दन उर्फ जनार्दन भाऊ उर्फ जनार्दन शेठ बँकेत हजर झाले. ट्रॅक्टर सोबत उतनूर पोलिसांची जीप असल्याचे मोंढ्यातील अन्य व्यापाऱ्यांकडून जनार्दन शेठला समजले होते. त्यामुळेच तो थेट उतनूरला आमच्या बँकेत आला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता ट्रॅक्टर जप्त केल्याबद्दल सुरुवातीला त्याने माझ्याशी बाचाबाची करून तारस्वरात आरडाओरड करत बँकेत खूप तमाशा केला. ट्रॅक्टरचा तपास लावून बँक एवढ्या तडकाफडकी जप्तीची कारवाई करेल यावर अजूनही त्याचा विश्वासच बसत नव्हता.

जनार्दन शेठच्या त्या आक्रस्ताळी त्राग्याकडे मी अजिबात लक्ष दिलं नाही. उलट, आता वेळ न घालवता आम्ही त्याच्या ट्रॅक्टरचा जाहीर लिलाव करणार आहोत तसेच गॅरंटर वरही ताबडतोब कायदेशीर कारवाई करणार आहोत हे त्याला सांगितलं. बँकेने आपल्या भोवती सर्व बाजूंनी फास आवळला असून चारी बाजूनी आपल्याला घेरलं आहे याची कल्पना आल्यावर तो थोडा शांत झाला. त्याचा स्वरही किंचित नरम झाला.

कदाचित ग्रामीण बँकेच्या, सोसायट्यांच्या व गॅरंटरच्या कुटुंबियांच्या सततच्या तगाद्याला तो ही कंटाळला असावा. कारण थोडा वेळ खाली मान घालून शांत बसल्यावर अचानक अस्पष्ट, खोल गेलेल्या, हताश आणि असहाय्य आवाजात त्याने मला विचारलं..

“एक रकमी किती पैसे जमा केले तर बँक कर्ज-तडजोड (Compromise) करून मला या ट्रॅक्टर लोन मधून कर्ज-मुक्त करेल ?”

एवढा बिलंदर, जुना थकीत कर्जदार अखेरीस कर्ज भरण्यास तयार झाला आहे हे समजताच मॅनेजर साहेबांनी सर्व सूत्रं आपल्या हाती घेतली. कर्ज घेतलेल्या तारखेपासून आजपर्यंतचं व्याज कॅलक्युलेट करून एकूण सहा लाखांची थकबाकी काढून त्यांनी तो आकडा जनार्दन शेठला सांगितला.

बारा गावचं पाणी प्यालेल्या व्यापारी वृत्तीच्या जनार्दन शेठ वर एवढा मोठा आकडा ऐकून काहीही परिणाम झाला नाही. एनपीए (NPA) कमी करण्यासाठी बँका आजकाल “कॉम्प्रमाईज प्रपोजल” च्या नावाखाली कितीही कमी रक्कम घेऊन कर्ज खातं बंद करतात याची त्याला चांगलीच कल्पना असावी.

“व्याजाचं तर सोडाच, मुद्दल रकमेत किती कमी करता ते सांगा..!”

असं मग्रूर, उर्मट प्रत्युत्तर त्याने मॅनेजर साहेबांना दिलं.

“कर्जाची मुद्दल रक्कम तर तुम्हाला द्यावीच लागेल आणि व्याजाचं म्हणाल तर त्यात थोडीफार सवलत तुम्हाला देता येईल, पण त्यासाठी ही अगोदर आमच्या वरंगल रिजनल ऑफिसची मला परवानगी घ्यावी लागेल..”

मॅनेजर साहेबांनी दिलेलं हे परखड व अंतिम उत्तर ऐकताच ताडकन खुर्चीवरून उठून बाहेर निघून जात जनार्दन भाऊ म्हणाले..

“असं आहे तर मग मी स्वतःच तुमच्या त्या वरंगल रिजनल ऑफिसला जातो आणि माझं Compromise proposal मंजूर करून घेतो..”

जनार्दन भाऊ असे तावातावाने बँके बाहेर निघून जात असताना मी उपहासाने त्यांना म्हणालो..

“तुम्ही तुमच्या नक्षली मित्रांना तर बेधडक लाखो रुपयांची खंडणी ताबडतोब पोहोचती करता.. मग बँकेचं कायदेशीर देणं देताना एवढी घासाघीस का करता ?”

मी मुद्दामच “तुमचे नक्षली मित्र” असे शब्द वापरले होते. कारण बँकेत आलेला तो धमकीचा फोन जनार्दन भाऊंनीच त्यांच्या लालची खंडणीखोर नक्षली मित्रांना सांगून करविला होता, याची मला खात्री होती.

माझे शब्द जनार्दन भाऊंना झोंबले, मात्र माझ्याकडे केवळ रागाचा एक तीक्ष्ण कटाक्ष टाकून मोटारसायकलला जोरदार किक मारून जनार्दन भाऊ निघून गेले.

दोनच दिवसांत आमच्या रिजनल ऑफिसातून आपलं Compromise proposal मंजूर करून जनार्दन भाऊ विजयी मुद्रेने उतनूरला परत आले. एकूण दोन लाख रुपयांत त्यांचं मॅटर सेटल झालं होतं.

अर्थात या दोन दिवसात रिजनल ऑफिस सतत आमच्या संपर्कात होतं आणि कर्ज वसुलीचे चान्सेस, ट्रॅक्टर विकल्यास येणारी संभाव्य रक्कम, त्यात होणारा कालापव्यय अशा सर्व गोष्टी विचारात घेऊन आणि आमच्या शाखेकडून तसं compromise proposal फॅक्स द्वारे मागवून मगच त्यांच्याद्वारे हे प्रपोजल मंजूर करण्यात आलं होतं.

बँकेत रोख दोन लाख रुपये भरून बे-बाकी प्रमाणपत्र (No Dues Certificate) घेतल्यावर आपला ट्रॅक्टर सोडवून घेऊन शामपुरला परत जाताना जनार्दन भाऊंनी मला कोपरापासून नमस्कार केला..

सर्वोत्तम कर्ज-वसुली प्रित्यर्थ हैदराबाद येथे होणारा आमच्या शाखेचा सत्कार समारंभ अवघ्या दोन दिवसांवर आला होता. या कार्यक्रमाचं निमंत्रण फक्त वरिष्ठ नियंत्रक व शाखाधिकारी (Controllers & Branch Managers) यांनाच होतं. परंतु आमच्या मॅनेजर साहेबांनी रिजनल मॅनेजरना विनंती करून मला ही समारंभास सोबत घेऊन जाण्याची विशेष परवानगी मागितली आणि रिजनल मॅनेजर साहेबांनीही अत्यंत सहर्ष ती दिली.

प्रत्यक्ष समारंभात आमच्या शाखेला ट्रॉफी प्रदान केल्यावर आमच्या मॅनेजर साहेबांनी मलाही स्टेज वर बोलावण्याची इच्छा आमच्या मॅनेजिंग डायरेक्टर साहेबांकडे प्रकट केली. या प्रसंगी आमच्या रिजनल मॅनेजर साहेबांनी आमच्या शाखेने नुकत्याच केलेल्या अशक्यप्राय अशा Written Off खात्यातील कर्ज वसुलीचा किस्सा थोडक्यात सांगितला.

त्यानंतर एमडी साहेबांनी माझ्याशी हस्तांदोलन करून माझ्या पाठीवर शाबासकीची जोरदार थाप मारल्यावर झालेला टाळ्यांचा कडकडाट आजही माझ्या आठवणीत ताजा आहे.

felicitation ceremony

(समाप्त)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

उतनूरचे दिवस-4B-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

roadside tea stall

Memories-at-Utnoor

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*उतनूरचे दिवस…*

*थरार… (४-ब)*

त्यानंतर आठवडाभर मी खिन्न, बेचैन होतो. जनार्दन भाऊंनी मला सुनावलेले कठोर बोल आठवले की आत्मग्लानीने मन विषादाने भरून जाई. माझी ही तगमग, तळमळ आमच्या मॅनेजर साहेबांनी ओळखली. सध्या मी के. जनार्दनचा छडा लावण्यात गुंग आहे याची त्यांना कल्पना होती. एक दिवस माझ्याजवळ येऊन ते म्हणाले..

“तुम्ही त्या के. जनार्दनचा माग काढण्यात एवढे डीपली ईनव्हॉल्व्ह होऊ नका. पंधरा वर्षे एवढ्या प्रदीर्घ काळापासून ती व्यक्ती बेपत्ता आहे. बँकेचं कर्ज फेडण्याची त्या व्यक्तीची मानसिकता नाही हे तर उघडच आहे. त्यातून हे आदिवासी क्षेत्र असून इथे एजन्सी ऍक्ट लागू आहे. त्यानुसार येथे फक्त आदिवासी, अनुसूचित जमातीची व्यक्तीच जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करू शकते. त्यामुळे कर्जदाराने बँकेकडे तारण ठेवलेली जमीन जप्त करून विकणे ही खूपच किचकट प्रक्रिया आहे. आता इतक्या वर्षांनंतर यदाकदाचित त्या के. जनार्दनचा शोध जरी लागला तरी त्याच्याकडून बँकेचे कर्ज वसूल होण्याची काडीमात्र शक्यता नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्या के.जनार्दनचा नाद आता सोडून द्यावा.”

मॅनेजर साहेबांच्या बोलण्यात तथ्य होतं. त्यामुळे के. जनार्दनचा शोध घेणं थांबवून मी अन्य कामांत बिझी झालो.

त्याच सुमारास बँकेच्या “वसुली अभियान (Recovery Campaign)” स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. मेट्रो, अर्बन व रूरल/सेमीअर्बन असे शाखांचे तीन गट केले होते. आमची शाखा रूरल/सेमीअर्बन गटात येत होती. त्या गटातून आमच्या शाखेला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यामुळे सर्वत्र आमचे अभिनंदन होत होते. या सर्व कौतुकात के. जनार्दनला मी जवळजवळ विसरूनच गेलो होतो.

त्याच सुमारास उतनूर आदीलाबाद रोड वरील इंद्रवेल्ली पासून सुमारे तीस किलोमीटर दूर असलेल्या “इच्चोडा” गावातील शाखेत आठ दिवसांसाठी मला डेप्युटेशन वर जावे लागले. या काळात माझ्या मोटारसायकलनेच मी इच्चोडा इथं जाणं येणं करीत असे. इंद्रवेल्ली गावा बाहेरील मुख्य रस्त्यापासून फक्त शे-दीडशे फूट दूर असलेला लाल भडक रंगाचा एक स्मृती-स्तंभ जाता येताना माझ्या दृष्टीस पडत असे. स्तंभाच्या वरच्या टोकाला लोखंडी गोलाकार फ्रेम मधील मार्क्स-लेनिन वादी कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह “कोयता-हातोडा” दुरुनही दिसत असे.

indravelli memorial

एकदा कुतूहलवश रस्त्यावर मोटारसायकल उभी करून स्तंभा जवळ गेलो. पायथ्याच्या सात आठ पायऱ्या चढून स्तंभाचे जवळून निरीक्षण करू लागलो. स्तंभाच्या आसपास बरीच ओसाड, मोकळी जागा होती. स्तंभाच्या खालच्या बाजूस एका संगमरवरी फलकावर ठळक इंग्रजीत “PEOPLE’S HEROES ARE IMMORTAL” असं लिहून त्याखाली तेलगू आणि हिंदी भाषेत *”प्रजावीर मृत्युंजय”* असं कोरलं होतं. त्याच्या खाली इंग्रजीत चार ओळी लिहिल्या होत्या.

indravelli massacre board

मी खाली वाकून त्या ओळी वाचत असतानाच अचानक कुठूनतरी चार पाच आदिवासी तरुण तिथे आले आणि त्यांनी मला हटकले. मी बँक कर्मचारी असल्याचे सांगताच त्यांनी मला ताबडतोब तिथून निघून जाण्यास सांगितले आणि ते स्वतः सुद्धा वेगवेगळ्या दिशांना पांगून लगेच दिसेनासे झाले.

naxalites

त्या आदिवासी तरुणांच्या सांगण्यानुसार स्तंभाच्या पायऱ्या उतरून रस्त्यावरील मोटारसायकल कडे जात असतानाच पोलिसांची एक जीप माझ्याजवळ येऊन थांबली. “तुम्ही कोण आहात आणि इथे कशाला थांबला आहात ?” असं दरडावून विचारत त्यांनी माझी कसून चौकशी केली आणि माझं ओळ्खपत्रही मागितलं. मी महाराष्ट्रातून इथे नोकरीसाठी आलेला स्टेट बँकेचा अधिकारी असल्याची खात्री होतांच त्यांच्यापैकी एकजण मला मराठीतून म्हणाला..

andhra police jeep

“साहेब, असा उगीच आपला जीव धोक्यात कशाला घालता ? या जागेच्या आसपास येणाऱ्या प्रत्येकाकडे नक्षली हेरांचे आणि आम्हा पोलिसांचे बारकाईने लक्ष असते. ही अतिशय संवेदनशील जागा आहे. भीतीमुळे लोक या स्तंभाकडे नुसतं पाहणंही टाळतात. तुम्ही देखील या पुढे अशी इथं थांबण्याची चूक करू नका..”

माझ्या अज्ञानाबद्दल पोलिसांकडे दिलगिरी व्यक्त करून कशीबशी तेथून सुटका करून घेतली.

त्यानंतर उतनूरच्या गावकऱ्यांकडे इंद्रवेल्लीच्या स्तंभा बाबत चौकशी केली असता खालील रोमांचक, रक्तरंजित कहाणी समजली..

ज्या घटनेच्या स्मृत्यर्थ हा स्तंभ उभारण्यात आला होता त्या घटनेची “इंद्रवेल्ली हत्याकांड” (Indravelli massacre) म्हणून इतिहासात नोंद असून 20 एप्रिल 1981 रोजी ही अमानुष, दुर्दैवी घटना घडली.

या दिवशी इंद्रवेल्ली इथे “गिरीजन रयतु कुली संघम” नावाच्या भारतीय कम्युनिस्ट (मा.ले.) पक्षाच्या एका संघटनेतर्फे आदिवासी गोंड समाजाचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. आदिवासींना त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्काचे “पट्टाधारी पासबुक” देण्यात यावे तसेच बिगर आदिवासींच्या वाढत्या अतिक्रमणास पायबंद घालावा या मागण्यांसाठीच हा मेळावा होता. सुरवातीला पोलिसांनी या मेळाव्यास रीतसर परवानगी दिली होती. मात्र नंतर नक्षली उद्रेकाच्या भीतीने ऐनवेळी त्यांनी ही परवानगी रद्द केली. अर्थात मेळाव्यासाठी जमलेल्या आदिवासींना याची कल्पनाच नव्हती. त्याच दिवशी इंद्रवेल्लीचा आठवडी बाजारही होता.

telanagana rally

या मेळाव्यास जमलेल्या आदिवासींवर तसेच बाजारासाठी आलेल्या लोकांना घेरून पोलिसांनी त्यांच्यावर तुफान गोळीबार केला. सरकारी अहवालानुसार जमावाने पोलिसांवर हल्ला केल्यामुळे 5 पोलीस अधिकारी व 30 शिपाई यांनी स्वसंरक्षणात्मक प्रतिकारार्थ गोळीबार केला, ज्यात 9 जण जखमी झाले तर 13 जण मृत्युमुखी पडले. मात्र नागरी स्वातंत्र्य आयोगाने केलेल्या निःपक्षपाती चौकशीतून असे आढळून आले की घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांची संख्या प्रत्यक्षात खूपच जास्त होती. तसेच फार मोठ्या संख्येने आदीलाबाद जिल्ह्यातील पोलिसांना आदल्या दिवशीच इंद्रवेल्ली इथे पाठविण्यात आले होते.

पोलिसांच्या पाच तुकड्या (Platoons) आदल्या रात्रीसच इंद्रवेल्लीच्या हायस्कुलात येऊन थांबल्या होत्या. त्यांनी रात्रीच गावातील घरोघरी जाऊन संपूर्ण परिसरात जमावबंदीचे कलम 144 लागू केल्याचे लोकांना कळविले. दुसऱ्या दिवशी मेळाव्यासाठी गावात येणाऱ्या आदिवासींना त्यांनी बाहेरच रोखले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. पळून जाणाऱ्या आदिवासींच्या अंगावर पोलिसांनी जीप गाड्या घालून त्यांना चिरडलं तर जीपमधील शिपायांनी अतिशय जवळून (point blank range) त्यांना गोळ्या घातल्या.

बरेचसे आदिवासी घाबरून जंगलात पळून गेले. मात्र तिथेही झाडांआड आधीच पोलीस (Snipers) बंदुकीचा नेम धरून लपून बसले होते. त्यांनी या बेसावध आदिवासींना अचूक टिपले. त्या दिवशी गावातील सर्व शाळा, दुकानं आणि कार्यालयं बंद करवून पोलिसांनी संपूर्ण गावाला वेढा घातला होता. प्रत्यक्षदर्शींनुसार गोळीबारानंतर आदिवासींची किमान साठ प्रेतं गावात इतस्ततः पडली होती. तसेच शंभरहून जास्त जखमींना आसपासच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यापैकी बरेच जण नंतर मरण पावले.

त्यावेळी राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार होते. अनेक प्रत्यक्षदर्शी काँग्रेस कार्यकर्त्यांनी असे नमूद केले आहे की इंद्रवेल्ली गावातील गोंड आदिवासींचे साठ पेक्षा जास्त मृतदेह पोलिसांनी आदीलाबादला नेऊन गुप्तपणे जाळून टाकले. तसेच गंभीर जखमी आदिवासींचे देह एकावर एक रचून दोन मोठ्या व्हॅन मधून त्यांना आदीलाबादच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यापैकी अनेकजण वाटेतच मरण पावले तर काही जणांनी नंतर प्राण सोडला.

पळून जाणाऱ्या वेगवेगळ्या गावांतील ज्या आदिवासींना पोलिसांनी पाठलाग करून गोळ्यांनी उडवले त्यांचे मृतदेह त्या त्या गावातील रस्त्याच्या कडेला कित्येक दिवस बेवारसपणे पडून होते. उतनूर (30 ते 40), ईच्चोडा (25), मुथनूर (30) अशी प्रत्यक्षदर्शींनुसार अशा बेवारस मृतांची संख्या होती. या व्यतिरिक्त खोल जंगलात मरण पावलेल्या आदिवासींचे मृतदेह त्यानंतरही अनेक दिवस सापडतच होते. आंध्र प्रदेश सिव्हिल लिबर्टीज कमिटी च्या अंदाजानुसार या हत्याकांडातील मृतांची संख्या किमान 250 इतकी होती. तर अन्य विविध गैर सरकारी नागरी संघटनांच्या मते या नरसंहारातील मृतांचा आकडा 350 ते 1000 इतका असू शकतो.

1983 साली या पोलिसी हत्याकांडातील बळीच्या स्मरणार्थ गिरीजन रयतु कुली संघम (GRCS) तर्फे इंद्रवेल्ली इथे एक स्तंभ (Pillar) उभारण्यात आला. चीन मध्ये पाहिलेल्या अशाच एका मेमोरियल पिलर वरून GRCS च्या अध्यक्षांना हा स्तंभ उभारण्याची प्रेरणा मिळाली. पुढे 1986 साली “कडेम” या गावी नक्षल्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पोलिसांनी हा स्तंभ पाडून टाकला होता. मात्र पुढच्याच वर्षी पुन्हा नव्याने तो स्तंभ उभारण्यात आला.

इंद्रवेल्लीच्या घटने नंतर “पीपल्स वॉर ग्रुप” (PWG) ह्या सशस्त्र क्रांतिकारी बंडखोर नक्षली संघटनेत सामील होणाऱ्या आदिवासींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. पुढील काळात जेंव्हा जेंव्हा हे नक्षली बंडखोर पोलिसांवर व त्यांच्या खबऱ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारीत असत तेंव्हा तेंव्हा त्यांचे मृतदेह या लाल शहीद स्तंभाजवळ आणून टाकीत असत. अशारितीने एकप्रकारे इंद्रवेल्लीच्या निष्पाप हुतात्म्यांसच जणू ते श्रद्धांजली अर्पण करीत असत. त्याला प्रत्युत्तर म्हणून कधी कधी पोलीस देखील चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांचे गोळ्यांनी चाळण झालेले मृतदेह या लाल स्मृती स्तंभाच्या पायऱ्यांवर फेकून देत नक्षल्यांच्या जखमेवर आणखीनच मीठ चोळीत असत.

इंद्रवेल्लीच्या लाल स्मारकाचा हा क्रूर, रक्तरंजित इतिहास ऐकून मी प्रचंड हादरून गेलो. त्यामुळेच, उरलेल्या दिवसांत ईच्चोड्यास जाता येताना इंद्रवेल्लीतील त्या स्तंभाकडे नुसती मान वळवून पाहण्याचे देखील मला कधी धैर्य झाले नाही.

एकदाचं माझं ईच्चोडा येथील डेप्युटेशन संपलं आणि मी उतनूर कडे जाण्यास निघालो. नेमकं इंद्रवेल्ली गावात आल्यानंतरच जोरदार पाऊस सुरू झाला आणि इच्छा नसतांना ही मला तिथे थांबावं लागलं. गावाच्या एका टोकाला असलेल्या हॉटेल समोर मोटारसायकल उभी करून मी चहाची ऑर्डर दिली. हॉटेलचा वयस्क दिसणारा मालक.. चिन्नय्या, खूपच उत्साही, बडबडा आणि चौकस होता. त्याने मी कोण, कुठून व कशासाठी आलो आहे, याबद्दल विचारपूस केली. तो स्वतः इंद्रवेल्लीच्या रेव्हेन्यू ऑफिसचा रिटायर्ड चपराशी होता.

roadside tea stall

त्याच्या तोंडून इंद्रवेल्लीच्या रेव्हेन्यू (MRO) ऑफिसचे नाव ऐकताच के. जनार्दन बद्दल चौकशी करण्याचा मोह मला आवरला नाही. चिन्नय्याला के. जनार्दन बद्दल बरीच माहिती होती. त्याने सांगितलेली माहिती थोडक्यात अशी होती…

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातून आलेला सधन वंजारा कुटुंबातील हा के. जनार्दन त्याच्या ऐन तरुण वयात, 1970 च्या सुमारास इंद्रवेल्ली इथं आला. अत्यंत स्वस्त भावात त्याने या भागात भलीमोठी शेतजमीन खरेदी केली. शेती सोबतच त्याने सावकारीही सुरू केली आणि प्रचंड पैसा कमावला.

कॉलेजच्या एकदोन वर्षांपर्यंत शिकलेल्या के. जनार्दनला सूट-बूट, कोट-टाय, हॅट अशा साहेबी पेहेरावात राहण्याची सवय होती. महाराष्ट्रातील “वंजारी” व “लमाणी” जातीला आंध्र प्रदेशात “बंजारा” व “लंबाडा” या नावाने ओळखले जाते व त्यांचा समावेश “अनुसूचित जमाती” (Scheduled Tribe-ST) मध्ये केला जातो. त्यामुळेच के.जनार्दनला या भागात जमीन खरेदी करता आली.

इंद्रवेल्लीला आल्यानंतर के.जनार्दनने थोड्या बहुत शिकलेल्या महाराष्ट्रातील आपल्या सगळ्याच नातेवाईकांना इकडेच बोलावून घेतले आणि या राज्यातील ST आरक्षणाचा फायदा घेत त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. इन्द्रवेल्लीच्या MRO ऑफिसमध्येही त्याचे अनेक जवळचे नातेवाईक नोकरी करीत होते.

हळूहळू राठोड, जाधव, पवार, मुंडे, गीते अशा नावांच्या महाराष्ट्रातून आलेल्या वंजारी लोकांनी येथील आदिवासींच्या हक्काच्या जवळ जवळ सर्वच सरकारी नोकऱ्या बळकावून टाकल्या. त्याबरोबरच आंध्र प्रदेशातील श्रीमंत व शक्तिशाली रेड्डी आणि राव लोकांशी संगनमत करून आदिवासींच्या शेत जमिनींवर अतिक्रमण करण्यासही त्यांनी सुरुवात केली. साहजिकच स्थानिक आदिवासीं मध्ये या बाहेरून आलेल्या बंजारा व लंबाडा जमातीबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला. आदिवासींकडून तेंदू पत्ता, धान्य, मध, डिंक अत्यल्प दरात खरेदी करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या नफेखोरी, भांडवलदार व्यापाऱ्यांविरुद्धही त्यांच्या मनात अशीच द्वेषभावना धुमसत होती. पुढे, हा वाढत चाललेला द्वेष व असंतोषच हळूहळू नक्षलवादी चळवळीत रूपांतरित झाला.

नक्षलवादी चळवळ ही भारतातील डाव्या विचारसरणीची सशस्त्र चळवळ असून गरीब शेतमजूर, आदिवासी आणि इतर वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लढत असतात. आर्थिक असमानता दूर करणे, शेतजमिनीचे पुनर्वितरण करणे, राज्य व्यवस्थेतील अन्याय व भ्रष्टाचार नष्ट करणे आणि दुर्बल व वंचित घटकांना न्याय मिळवून देणे या त्यांच्या मागण्यांसाठी ते सशस्त्र संघर्ष करीत असतात.

के.जनार्दनने मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली शेतजमीन, सावकारीतून व धान्यखरेदीतून मिळवलेला अफाट नफा यामुळे लवकरच तो स्थानिक नक्षली नेत्यांच्या टार्गेट वर आला. याच सुमारास त्याने स्वतः साठी नवीन मोटारसायकल विकत घेतली तसेच स्टेट बँकेतून कर्ज घेऊन ट्रॅक्टर व ट्रॉली देखील खरेदी केली. नक्षल्यांनी के.जनार्दन कडे पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली तसेच सावकारी व्यवसाय ताबडतोब बंद करावा व फक्त पाच एकर जमीन स्वतःकडे ठेवून बाकी जमिनी वरील हक्क सोडून द्यावा असा त्यास आदेश फर्मावला.

नुकतंच इंद्रवेल्लीचं नृशंस हत्याकांड घडलं होतं. सर्वत्र पोलिसांची क्रूर दहशत पसरली होती. पोलिसांच्या विरोधाला न जुमानता काही नक्षली आदिवासींनी मोठया धाडसानं त्या हत्याकांडाच्या जागी चार पाच पायऱ्या व छोटासा तात्पुरता स्तंभ उभारून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. नक्षल्यांच्या या कृतीमुळे पोलिस क्रोधाने खवळून गेले होते. नि:शस्त्र, निरपराध आदिवासींना दिसेल तिथे अमानुष मारहाण करण्याचा, प्रसंगी गोळ्याही घालण्याचा त्यांनी सपाटाच लावला होता. पोलिसांच्या या नक्षल-सत्रामुळे घाबरून जाऊन सारे नक्षली भूमिगत झाले होते.

के. जनार्दनची पोलिसांशी घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या मागण्या त्याने साफ धुडकावून लावल्या. नक्षली नेत्यांच्या सांगण्या वरून आदिवासी मजुरांनी त्याच्या शेतात काम करण्यास नकार दिला तेंव्हा त्याने शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातून दुप्पट मजुरी देऊन शेतमजूर बोलावले. के. जनार्दनच्या या उद्धामपणा बद्दल त्याला चांगलीच अद्दल घडवण्याचा नक्षली हायकमांडने निर्णय घेतला.

1981 सालचा तो सप्टेंबर महिना होता. त्या दिवशी दुपारी बारा वाजता राज्याच्या गृहमंत्र्यांच्या हस्ते आदीलाबाद येथे पोलिसांना सन्मान पदके प्रदान करण्यात येणार होती. उतनूर व इंद्रवेल्लीचे झाडून सारे पोलीस अधिकारी व शिपाई या कार्यक्रमासाठी सकाळीच आदीलाबादला गेले होते. हीच वेळ साधून दुपारी अकराच्या सुमारास तीस ते चाळीस सशस्त्र आदिवासी तरुणांनी के. जनार्दनच्या इंद्रवेल्ली येथील राहत्या वाड्याला वेढा घातला.

सर्व गावकऱ्यांना जमवून के. जनार्दनला हात मागे बांधून वाड्यातून खेचतच बाहेर आणण्यात आलं. त्या आदिवासी तरुणांपैकी एकदोन गणवेषधारी नक्षल्यां जवळ बंदुका होत्या तर बाकीच्यांकडे विळा, कोयता, भाले व तिरकमठे अशी परंपरागत शस्त्रे होती. भीतीने के. जनार्दन थरथरा कापत होता. त्याच्या घराकडे जाणाऱ्या टेलिफोनच्या तारा नक्षल्यांनी आधीच तोडून टाकल्या होत्या.

“ताबडतोब पाच लाख रुपये आणून दे अन्यथा मरायला तयार हो..” असा नक्षल्यांनी निर्वाणीचा इशारा दिल्यावर त्यांच्यापुढे गयावया करणाऱ्या के. जनार्दनच्या पत्नीने घरातून काही रोकड रक्कम व आपले सोन्याचे दागिने त्यांना आणून दिले. त्या सर्वांची किंमत पाच लाखांपेक्षा खूप जास्त होती. त्यानंतर के. जनार्दन कडे असलेली सावकारीची सर्व कागदपत्रे बाहेर आणवून त्यांची होळी करण्यात आली तसेच त्याने गहाण ठेवून घेतलेल्या सर्व चीजवस्तू संबंधित गावकऱ्यांना परत करण्यात आल्या. अगदी चित्रपटातील डाकुंच्या दरोड्यात दाखवतात तसाच हा सर्व घटनाक्रम चाललेला होता.

एवढ्यात, गावातील कुणीतरी पोलिसांना फोन करून बातमी कळविल्यामुळे आदीलाबाद येथून जादा कुमक घेऊन पोलीस इंद्रवेल्ली कडे निघाल्याचे समजताच पैसे व दागिने गोळा करुन घाईघाईने जंगलात पळून जाण्यापूर्वी त्या नक्षल्यांच्या कमांडरने के.जनार्दनला पुढील आदेश सुनावले..

१.. स्थानिक मजुरांच्या मदतीने फक्त पाच एकर जमीनच कसावी. तसेच महाराष्ट्रातून आणलेले सर्व शेतमजूर ताबडतोब त्यांच्या गावी परत धाडण्यात यावेत.

२.. आदिवासींचा शेतमाल योग्य भावात खरेदी करावा. आंध्र प्रदेशातील लुटारू वृत्तीच्या भांडवलदार व्यापाऱ्यांना हाताशी धरून आदिवासींची आर्थिक पिळवणूक करू नये.

३.. सावकारी व्यवसाय ताबडतोब बंद करावा. खेडोपाडीच्या आदिवासींना त्यांची गहाण मालमत्ता व चीजवस्तू परत करण्यात यावी.

४.. यापुढे जेंव्हा जेंव्हा नक्षली नेत्यांतर्फे खंडणीची मागणी करण्यात येईल तेंव्हा तेंव्हा ताबडतोब व निमूटपणे ती मागणी पूर्ण करण्यात यावी.

५.. या क्षणापासून मोटरसायकलचा वापर कायमचा बंद करावा. मोटारसायकल हे पोलिसांच्या दडपशाहीचे प्रतीक आहे. या संपूर्ण परिसरात फक्त पोलिसांकडेच मोटारसायकली आहेत. त्यामुळे जो मोटारसायकल वापरत असेल तो पोलीस आहे असे समजून त्याला ताबडतोब ठार मारण्याचे आम्हाला आदेश आहेत.

५.. आजच्या घटनेबद्दल पोलिसांकडे तक्रार करू नये. तसेच पोलिसांचे संरक्षण ही घेऊ नये. तसे केल्यास बॉम्ब टाकून तुमचा हा वाडा उडवून देण्यात येईल.

वरीलप्रमाणे आदेश सुनावून परत जाताना अचानक काहीतरी आठवल्याने तो नक्षल्यांचा चीफ कमांडर पुन्हा के. जनार्दन जवळ आला. शेजारीच उभ्या असलेल्या आदिवासी तरुणाच्या हातातील कोयता हिसकावून घेत के. जनार्दनच्या दोन्ही बाजूंच्या गालांवर तसेच डोक्यावर आणि खाली हनुवटीवर असे चेहऱ्याच्या चार ही बाजूंना त्याने निर्दयपणे सपासप वार केले आणि के. जनार्दनच्या रक्तबंबाळ चेहऱ्याकडे पहात तो म्हणाला..

“यापुढे जेंव्हा जेंव्हा तू आरशात पाहशील तेंव्हा तेंव्हा नक्षली क्रांतिकारकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे काय परिणाम होतात याची तुला सतत आठवण, जाणीव होत राहील.. तसंच अन्य गावकरीही तुझ्या चेहऱ्यावरील जखमांच्या खुणा बघून आमच्याशी दगाबाजी करण्याचा कधी विचारही मनात आणणार नाहीत..”

नक्षली जंगलात निघून गेल्यानंतर ताबडतोब आदीलाबादच्या सरकारी दवाखान्यात नेऊन जखमी के. जनार्दन वर उपचार करण्यात आले.

सुदैवाने के. जनार्दनचा पंधरा सोळा वर्षांचा एकुलता एक मुलगा त्यावेळी आपल्या आजोळी परभणीला गेला असल्याने त्याच्यावर या भीषण प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ आली नाही. चार पाच दिवसांनी एका संध्याकाळी जरा उशिरानंच तो इंद्रवेल्लीला परत आला. झालेल्या प्रकाराबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती. जखमा पूर्णपणे बऱ्या न झाल्याने के. जनार्दन अद्यापही आदीलाबादच्या दवाखान्यातच होते.

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून नेहमीच्या सवयीप्रमाणे के. जनार्दनचा तो मुलगा गावाच्या आसपास फेरफटका मारण्यासाठी वडिलांची मोटारसायकल घेऊन गेला.

अवघ्या तासाभरानंतरच के. जनार्दनच्या मुलाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह इंद्रवेल्लीच्या त्या तात्पुरत्या शहीद स्मृती-स्तंभाच्या पायऱ्यांवर फेकून दिलेला आढळून आला. शेजारीच त्याने नेलेली के. जनार्दनची मोटारसायकल आडवी पाडली होती. त्यावर “याद रहे..! हर कोई, जो नक्सली आदेश का उल्लंघन करेंगा, उसका भी यही हाल होगा..!” असा लाल अक्षरात इशारा लिहिलेला कापडाचा तुकडा अडकवलेला होता.

के. जनार्दन व त्याच्या कुटुंबियांवर या नक्षली कृत्याचा जबरदस्त आघात झाला. एकुल्या एक मुलाच्या मृत्यूमुळे त्यांची अवस्था अक्षरशः वेड्यागत झाली. त्यांनी या घटनेचा एवढा धसका घेतला की आपला इंद्रवेल्लीचा वाडा आणि गावातील जमीन आपल्या नातेवाईकांच्या नावावर करून त्यांनी तडकाफडकी गाव सोडलं. तेंव्हापासून आजतागायत त्यांना या गावात आलेलं कुणीही पाहिलेलं नाही.

हॉटेलवाल्या चिन्नय्याने सांगितलेली के.जनार्दनची करुण कहाणी ऐकल्यावर माझ्या मनात त्याच्याबद्दल अपार सहानुभूती दाटून आली. त्याचबरोबर माझ्या मनात के. जनार्दन बद्दल शंका कुशंकांचा जो गुंता साचला होता तो देखील हळूहळू सुटतोय असं मला वाटू लागलं.

चहा पिऊन झाल्यावर उतनूरला परत जाताना मोटरसायकलला किक मारण्यापूर्वी न राहवून चिन्नय्याला विचारलं..

“के. जनार्दनच्या मुलाचं नाव काय होतं..?”

(क्रमशः ४-क)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

उतनूरचे दिवस-4A-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

tractor-1

Memories-at-Utnoor

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

 

*उतनूरचे दिवस…*

*थरार… (४-अ)*

उतनूर पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असलेलं शामपूर हे गाव मुख्य रस्त्याला अगदी लागून वसलेलं होतं. गावातील बराचसा भूभाग हा सपाट, जंगल विरहित व छान मोकळा मोकळा होता. त्यामुळे त्या गावात अनेक पक्की घरं होती तसंच रस्ते, नाल्या, पथ दिवे, पोस्ट ऑफिस अशा त्या परिसरातील अन्य गावात सहसा न आढळणाऱ्या सोयीही त्या गावात होत्या. आसपासच्या खेड्यांतील प्रवाशांनी तेथील बस स्टँड सदैव गजबजलेलं दिसायचं. बस स्टँड जवळच आठवडी बाजारही भरत असे.

उतनूर आदीलाबाद रस्त्यावरील उतनूर पासून दहा किलोमीटर दूर असलेल्या इंद्रवेल्ली गावापर्यंतचा भाग आमच्या शाखेच्या कार्यक्षेत्रात येत होता. इंद्रवेल्ली हे मंडल क्षेत्र (तालुका) असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर बँकेचा बोजा नोंदविण्यासाठी तेथील रेव्हेन्यू कार्यालयात वेळोवेळी जावे लागत असे. इंद्रवेल्लीस जातेवेळी शामपूर गावा वरूनच जावं लागायचं.

तसं पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि ग्रामीण बँकेची शाखा उघडल्यापासून शामपूर गावात आमच्या स्टेट बँकेचा कुठलाही चालू फायनान्स नव्हता. त्यामुळे शामपूर गावात आवर्जून जाण्याचं कधी काम पडलं नाही. तरी देखील तेथील बस स्टँड जवळील ओळीने सलग पंधरा सोळा दुकानं असलेलं एक व्यापारी संकुल जाता येताना नेहमीच लक्ष वेधून घेत असे. “दामोदर बाजार” असं नाव असलेला तो शॉपिंग कॉम्प्लेक्स गावातील कुणा धनाढ्य व्यक्तीचा असावा असाच माझा समज होता. damodar bazaar

गेले काही दिवस आमच्या बँकेत जुनी थकीत कर्जे वसूल करण्याची जोरदार मोहीम सुरू झाली होती. सुदैवाने आमच्या शाखेत अशी जुनी थकीत कर्जे फारशी नव्हती. मात्र बुडीत कर्जाच्या यादीत तब्बल एक लाख चाळीस हजार रुपयांचं एकच मोठं जुनं खातं दिसत होतं. ते ट्रॅक्टर लोन होतं. मी त्या खात्याबद्दल माहिती काढण्यास सुरवात केली. आधी, सुमारे पंधरा वर्षांपूर्वीच्या त्या कर्जखात्याची कागदपत्रे शोधून काढली. इंद्रवेल्ली इथं राहणाऱ्या कुणा “के. जनार्दन” नावाच्या संपन्न शेतकऱ्याने ट्रॅक्टर व ट्रॉली साठी दीड लाख रुपयांचं कर्ज आमच्या बँकेकडून घेतलेलं दिसत होतं.tractor-1

लोन डॉक्युमेंट्स वर कर्जदाराचा जो फोटो होता त्यावरून हा के. जनार्दन म्हणजे कोट, टाय, हॅट परिधान करणारी आणि बिन दाढीमिशांचा गुळगुळीत चेहरा असलेली पक्की सुटाबुटातली शहरी व्यक्ती वाटत होती.

k janardan

त्या व्यक्तीने बँकेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेऊन “मॅसी फर्ग्युसन” कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली यांची खरेदी केली असल्याचेही कोटेशन व बिलांवरून दिसत होते. प्रामुख्याने शेती तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची आदीलाबादच्या मोंढ्यात वाहतूक करणे हाच कर्जदाराचा मुख्य व्यवसाय होता. इंद्रवेल्ली व आसपासच्या गावात असलेली आपली पंचावन्न एकर जमीन या कर्जासाठी त्याने बँकेला तारण दिली होती. कर्ज कागदपत्रांच्या फाईल वर मोठ्या लाल अक्षरात “Borrower absconding” असं लिहिलेलं होतं.

इंस्पेक्शन रजिस्टर वरील नोंदी नुसार असं दिसतं होतं की कर्ज घेतल्या नंतर अवघ्या दोनच महिन्यांनी कर्जदार इंद्रवेल्ली गाव सोडून अन्य कुठेतरी निघून गेला होता. बँकेत उपलब्ध कागदपत्रांवरून कर्जदाराची फारशी माहिती न मिळाल्याने आता शाखेतील कर्मचाऱ्यांकडूनच काही माहिती मिळते का ते पहावे असा विचार केला. दुर्दैवाने उतनूर शाखेतील एक जुना हेड गार्ड वगळता अन्य शाखेतील सर्वच कर्मचारी फार तर चार पाच वर्षं इतकेच जुने होते. त्यांना कुणालाच या “के.जनार्दन” बद्दल कसलीही माहिती नव्हती.

हेड गार्ड सूर्यपाल स्वामी येत्या सहा महिन्यांतच सेवानिवृत्त होणार होता. त्याला ट्रॅक्टर लोन वाल्या के. जनार्दन बद्दल काहीतरी अंधुकसं आठवत होतं. ट्रॅक्टर घेतल्या घेतल्या या के. जनार्दन वर कुठलं तरी जबरदस्त संकट ओढवलं, त्यात त्याच्या आयुष्याची ट्रॅजेडी झाली आणि त्यानंतर हा कर्जदार ट्रॅक्टर सहित बेपत्ता झाला होता. चार पाच वर्षे वाट पाहून बँकेने ते कर्ज खाते प्रतिवादीत कर्जे खात्यास (Protested Bills A/c) वर्ग केलं होतं.

खूप प्रयत्न करूनही या के. जनार्दन चा सध्याचा ठावठिकाणा कोणता आहे ? या बद्दल पत्ता लागू शकला नाही. बँकेकडे तारण असलेल्या जमिनीच्या कागदपत्रांवरून वेगवेगळ्या गावांमध्ये या के.जनार्दन च्या नावाने सुमारे पंचावन्न एकर एवढी जमीन असल्याचे दिसत होते. त्यापैकी पंधरा एकर जमीन इंद्रवेल्ली गावात असल्याने तसेच कर्जदाराचा पत्ताही इंद्रवेल्ली गावातीलच दिला असल्याने मी प्रथम इंद्रवेल्ली गावात जाऊन दिलेल्या पत्त्याच्या ठिकाणी चौकशी केली. तेंव्हा, खूप वर्षांपूर्वीच आपले इंद्रवेल्लीचे राहते घर व शेती विकून के. जनार्दन आदीलाबाद येथे शिफ्ट झाल्याचे तेथील रहिवाशांकडून समजले.

बँकेकडे तारण असलेली जमीन कर्जदाराने परस्पर कशी काय विकली ? याबद्दल आश्चर्य वाटलं आणि मनस्वी चीडही आली. के. जनार्दनचं जमिनीचं “पट्टा पासबुक” घेऊन मी इंद्रवेल्ली मंडल रेव्हेन्यू ऑफिसर (MRO) कडे जाऊन धडकलो. मात्र तिथल्या लॅंड रेकॉर्ड मध्ये या के. जनार्दनच्या जमिनीवर आमच्या बँकेच्या कुठल्याही बोजाची नोंदच नव्हती. “निदान आता तरी उर्वरित जमिनीवर बँकेचा बोजा नोंदवा..” असा कार्यालयात अर्ज दिला. त्यावर “तुम्ही दहा दिवसांनी भेटा..” असं संबंधित अधिकारी म्हणाला. तिथल्या अनागोंदी कारभारावर चरफडतच निराश मनानं उतनूरला परतलो.

एरवी सदैव माझ्या सोबत राहणारा माझा वाटाड्या, माझा दुभाषी.. प्युन रमेश हा आजारी पडल्यामुळे गेले काही दिवस बँकेत गैरहजर होता. बेपत्ता के. जनार्दन चा शोध लावण्यात त्याची नक्कीच मदत होईल असा माझा विश्वास होता. त्यामुळे तो कामावर पुन्हा रुजू होण्याची मी आतुरतेनं वाट पहात होतो. अखेरीस तब्बल वीस दिवसांची विश्रांती घेऊन ताजातवाना होऊन रमेश ड्युटीवर हजर होताच अधिरपणे त्याला ट्रॅक्टर लोन वाल्या के. जनार्दन बद्दल विचारलं.

“के. जनार्दन..? ट्रॅक्टर लोन..?”

स्मरणशक्तीला ताण देत नकारार्थी मान हलवीत रमेश म्हणाला.. “नही साब.. पिछले आठ सालोंमें आज तक किसी भी मैनेजर ने या फिल्ड ऑफिसरने इस नाम के किसी भी आदमी का कभी जिक्र नही किया..”

रमेशचं हे उत्तर ऐकून माझा अपेक्षाभंग झाला. माझ्या खिन्न चेहऱ्याकडे पहात रमेश म्हणाला..

“लेकिन.. एक दूसरे “जनार्दन” को मै अच्छी तरह जानता हूं.. यहां पास ही में.. शामपुर में रहता है.. बहुत खतरनाक आदमी है.. गांव में किसी से मेलजोल नही रखता.. बात भी कम करता है.. सब लोग डरते है उस से.. हो सकता है, अन्ना (नक्षली) लोगोंका आदमी हो.. या वो खुद ही कोई शरण आकर सुधरा हुआ रिटायर्ड नक्सली अन्ना हो.. पता नही..”

रमेशचं या जनार्दन बद्दल चांगलं मत दिसत नव्हतं. तरी देखील आणखी एक प्रयत्न करून पहावा म्हणून रमेशला विचारलं..

“क्या हम मिल सकते है इस शामपुर वाले जनार्दन से ? शायद उसे के. जनार्दन के बारेमे कुछ मालूमात हो..”

काहीशा अनिच्छेनंच खोल उसासा सोडत रमेश म्हणाला..

“ठीक है..! आप कहते है तो आज ही शाम को मिलेंगे उन से..! वैसे भी अपने जनरेटर का पेट्रोल खतम होने को आया है.. नागापुर पेट्रोल बंक पर भी स्टॉक नही है.. अब तो शामपुर से ही पेट्रोल लाना पड़ेगा..”

संध्याकाळी पेट्रोलच्या रिकाम्या कॅन घेऊन आम्ही शामपुर कडे निघालो. “दामोदर बाजार” कॉम्प्लेक्स जवळ येताच रमेशने त्या ओळीनं बांधलेल्या पंधरा सोळा दुकानांच्या मधोमध असलेल्या एका अरुंद बोळीत गाडी घातली. कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस एक जुनाट, दगडी, प्रशस्त वाडा होता. रमेशने त्या वाड्याच्या भक्कम लाकडी दरवाजाची कडी वाजवली.

“कोण..?”

आतून तेलगू भाषेत करड्या आवाजात विचारणा झाली..

“मी.. रमेश.. स्टेट बँक..”

रमेशनं थोडक्यात आपला परिचय दिला. थोड्या वेळानं एका गंभीर, करारी मुद्रेच्या उंच माणसानं दार उघडलं. धारदार नाक, कपाळाला लाल-काळा गंध बुक्का, डोक्यावर कडक इस्त्रीची टोकदार पांढरी गांधी टोपी, किंचित मग्रूर, तुसडी, क्रूर नजर, पांढरं शुभ्र धोतर आणि टेरिलीनचा चमचमता व्हाईट ओपन शर्ट अशा वर्णनाची ती व्यक्ती एखाद्या राजकीय पुढाऱ्या सारखी दिसत होती. लांब, गालापर्यंत वाढलेले केसांचे दाट कल्ले, तलवार कट टोकदार मिशा आणि फक्त हनुवटी पुरतीच ठेवलेली छोटीशी फ्रेंच कट दाढी त्या व्यक्तीच्या एकंदर ग्रामीण पेहरावाला किंचित विसंगत वाटत असली तरी त्या लांब कल्ले व दाढी मिशांमुळेच ते व्यक्तिमत्व अधिकच गूढ, करारी भासत होते. image of janardan

त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील “काय काम आहे..?” अर्थाचे त्रासिक, प्रश्नार्थक भाव पाहून रमेश माझ्याकडे बोट दाखवत तेलगू भाषेत लगबगीनं म्हणाला..

“हे आमच्या बँकेचे नवीन फिल्ड ऑफिसर साहेब.. महाराष्ट्रातून आले आहेत.. त्यांना तुमच्याकडून काही माहिती हवी आहे..”

मला आपादमस्तक न्याहाळून झाल्यावर मागे वळत तो धोतर टोपीधारी गृहस्थ तेलगू भाषेतच म्हणाला..

“आत या..!”

आम्हाला दिवाणखान्यात बसवून तो गृहस्थ आत निघून गेला. जुनाट लाकडी माळवदाचं छत असलेल्या त्या दिवाणखान्यात लावलेल्या यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या काचेच्या फ्रेम मधील मोठ्या आकाराच्या फोटोंनी माझं लक्ष वेधून घेतलं. शेजारीच पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांची ही छायाचित्रे टांगली होती. एका कोनाड्यात विठ्ठल रखुमाईंच्या मूर्ती ठेवलेल्या होत्या. त्या मूर्तींसमोर एक निरंजन तेवत होतं. कोनाड्याच्या वरती भरजरी पोशाखातील अंदाजे चौदा पंधरा वर्षाच्या मुलाचा ऐटीत खुर्चीत बसलेला फोटो होता. त्या फोटोला नुकताच ताज्या फुलांचा हार घातलेला दिसत होता. फोटो शेजारी लावलेल्या उदबत्तीचा मंद सुगंध दिवाणखान्यात दरवळत होता.

“हे नक्कीच कुणा मराठी माणसाचं घर असलं पाहिजे..!” मी मनातल्या मनात अंदाज बांधला.

इतक्यात डोक्यावर पदर घेतलेली अस्सल मराठमोळ्या पद्धतीचं लुगडं नेसलेली एक घरंदाज सोज्वळ स्त्री हातात तांब्या भांडं घेऊन दिवाणखान्यात आली. तिचा चेहरा उदास वाटत होता. आम्हाला पाणी देऊन काही न बोलता ती आत निघून गेली. ती गेल्यावर जनार्दन भाऊ तेलगू भाषेत म्हणाले..

“हं.. बोला..! कसली माहिती हवी आहे तुम्हाला..?”

त्यावर नीट सरसावून बसत रमेश म्हणाला..

“के. जनार्दन या नावाच्या इंद्रवेल्ली इथं राहणाऱ्या कुणा माणसाला तुम्ही ओळखता का ? खूप वर्षांपूर्वी आमच्या बँकेकडून त्या माणसानं ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज घेतलं होतं. अजूनही ते कर्ज तसंच बाकी आहे आणि तो माणूस इंद्रवेल्ली गाव सोडून कुठेतरी दुसरीकडे निघून गेला आहे..”

रमेशने एका दमात सर्व सांगून टाकलं. जनार्दन भाऊंनी काही तरी आठवायचा प्रयत्न केला. डोकं खाजवीत ते म्हणाले..

“के. जनार्दन..? इंद्रवेल्ली..? अं..हं..! मी तर पहिल्यांदाच हे नाव ऐकतोय..”

नंतर थोडा वेळ खाली मान घालून हनुवटी वरील मुठभर दाढीचा पुंजका कुरवाळीत ते विचार करत बसले. मग नकारार्थी मान हलवत ठामपणे ते म्हणाले..

“नाही..! या नावाच्या कोणत्याही व्यक्तीबद्दल मला कसलीही माहिती नाही..! मी इथे शामपुरला आठ वर्षांपूर्वी आलो. त्यापूर्वी बरीच वर्षं मी आदिलाबाद इथं होतो. इंद्रवेल्ली गावात जायचं कधीच काही काम पडत नसल्यामुळे तेथील रहिवाशांबद्दल मला फारशी माहिती नाही..”

तोपर्यंत आतून आमच्यासाठी चहा आला होता. चहा पिऊन जनार्दन भाऊंचे आभार मानून आम्ही निघालो. परत जाताना वाटेत रमेश म्हणाला..

“हा जनार्दन खूप खडूस माणूस आहे. गेली पाच वर्षे मी ह्याच्याच दुकानातून बँकेच्या मोटारसायकल साठी व जनरेटर साठी भरपूर पेट्रोल खरेदी करतोय. मात्र पूर्वी एकदा आदीलाबादहून उतनूरला येतेवेळी रात्रीच्या वेळी माझी गाडी शामपुर जवळ बंद पडली होती. त्यावेळी मी या जनार्दनला त्याची मोटार सायकल फक्त रात्रीपुरती मागितली होती. एवढी ओळख असून आणि वारंवार विनंती करूनही जनार्दनने मला गाडी देण्यास त्यावेळी स्पष्ट नकार दिला होता. तेंव्हा पासून हा जनार्दन माझ्या मनातून साफ उतरलाय. तुम्हाला कसा वाटला हा माणूस..?”

“मला, हा माणूस आपल्यापासून काही तरी लपवतोय असंच जाणवत होतं..” मी म्हणालो.

“कशावरून..?” रमेशने आश्चर्यानं विचारलं.

“एक तर हा माणूस त्याच्या व त्याच्या पत्नीच्या पेहरावा वरून तसंच त्याच्या घराच्या ठेवणी वरून पक्का मराठी माणूस वाटत होता. मी महाराष्ट्रातील आहे हे कळूनही त्याने माझ्याशी मराठी बोलणं कटाक्षानं टाळलं. आपलं सर्व संभाषण तेलगू भाषेतच झालं. तेंव्हाच मला संशय आला..”

माझं हे बोलणं रमेशला अजिबात पटलं नाही. “धोतर, लुगडं हा इथलाच पेहराव आहे आणि विठ्ठल रखुमाई हे आंध्र व कर्नाटकाच्या सीमेवरील बहुसंख्य लोकांचे दैवत असल्यामुळे त्यांच्या मूर्ती, फोटो येथील घरोघरी आढळतात.. ” असे तो म्हणाला. आदीलाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील बरीच गावे पूर्वी महाराष्ट्रात होती. त्यामुळे येथील अनेक जुन्या घरांत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची छायाचित्रे दिसून येतात, अशीही माहिती त्याने पुरवली.

दहा दिवसांनंतर वेळात वेळ काढून सकाळी एकटाच इंद्रवेल्लीच्या मंडल रेव्हेन्यू ऑफिस मध्ये गेलो आणि के. जनार्दनच्या जमिनीवर बँकेचा बोजा (चार्ज) नोंदविला की नाही याची चौकशी केली. त्यावर तेथील संबंधित कर्मचारी म्हणाला..

“गेल्या आठवड्यातच के. जनार्दन स्वतःच इथे आले होते. आपण कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले नसून स्टेट बँकेचा काहीतरी गैरसमज झाला आहे असे ते म्हणाले. जमिनीवर बोजा नोंदविण्यास त्यांनी विरोध दर्शवला आणि तसे लेखी पत्रही त्यांनी आमच्या ऑफिसला दिले आहे.”

हा के. जनार्दन भलताच चलाख दिसत होता. MRO ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना देखील त्याने पटवलं असावं. MRO ऑफिसला दिलेल्या पत्रावर कुठेही त्याने आपला पत्ता किंवा फोन नंबर दिलेला नव्हता. मात्र हा के. जनार्दन जवळपासच कुठेतरी रहात असावा आणि इंद्रवेल्ली गावातील लोक त्याच्या नियमित संपर्कात असावेत हा माझा संशय आता पक्का झाला. निराश होऊन इंद्रवेल्लीहून परततांना शामपुर जवळ आल्यावर अचानक काहीतरी मनात आलं आणि “दामोदर बाजार” जवळ मी मोटरसायकल उभी केली. तेथून पायीच जात जनार्दन भाऊंच्या वाड्यासमोर उभा राहून दाराची कडी वाजवली.

“यवरू..?” (कोण ?) अशी आतून बायकी आवाजात तेलगू भाषेत विचारणा झाली.

“मी.. गंगाराम ! नागापूर पेट्रोल बंक वाला.. जनार्दन भाऊ आहेत का ?”

मी विचारपूर्वक आणि आवर्जून “मराठी” भाषेत धडधडीत खोटं बोललो. जवळच्या नागापूर पेट्रोल बंक वर गंगाराम नावाचा एक मराठी बोलणारा कर्मचारी असल्याचे मला माहिती होते. या गंगाराम कडूनच जनार्दन भाऊ किरकोळ विक्रीसाठी पेट्रोलचे बॅरल मागवीत असत.

काही क्षण आतून काहीच प्रत्युत्तर मिळालं नाही. बहुदा आतील स्त्रीला काहीतरी संशय आला असावा. थोड्यावेळाने ती स्त्री “मराठीत” म्हणाली..

“ते परगावी गेलेत. दुपारी चार पर्यंत परत येतील..”

माझं काम झालं होतं. मी फेकलेला खडा अचूक लागला होता. हे घर मराठी माणसाचं असल्याचा माझा अंदाज खरा ठरला होता.

“ठीक आहे.. मी पाच वाजता येतो..”

असं बोलून मागं फिरून झपाझप पावलं टाकीत मी बाहेर ठेवलेल्या मोटारसायकल जवळ आलो. मी मागं फिरल्यावर आतील स्त्री ने दरवाजा उघडल्याच्या आवाज माझ्या कानावर पडला. कदाचित मी गंगारामच आहे किंवा नाही याची तिला खात्री करून घ्यायची असावी.

दुपारी पाच वाजता पुन्हा जनार्दन भाऊंच्या घरी गेलो. स्वतः जनार्दन भाऊंनीच दार उघडलं आणि मला पाहतांच मराठीत “या..!” असं म्हणाले. आम्ही दिवाणखान्यात जाऊन बसल्यावर मी म्हणालो..

“काही पत्ता लागला का त्या के. जनार्दन नावाच्या माणसाचा..?”

“नाही..! मात्र काही वर्षांपूर्वी इंद्रवेल्लीची जमीन व घर विकून ते कुटुंबासह आदीलाबादला गेले एवढं समजलं. तुम्ही आदीलाबादला जाऊन चौकशी केली तर कदाचित त्यांचा काहीतरी ठावठिकाणा कळू शकेल..”

एवढं बोलून माझ्याकडे रोखून पहात ते म्हणाले..

“सकाळी ‘नागापूरचा गंगाराम’ असं नाव सांगून तुम्हीच घरी आला होतात ना ? हा गंगाराम तोतरा असून किंचित अडखळत बोलतो. त्यामुळे तुम्ही गंगाराम नाहीत, हे माझ्या बायकोने लगेच ओळखलं होतं. तुम्ही असं खोटं का बोललात ?”

जनार्दन भाऊंनी विचारलेल्या या थेट प्रश्नाने मी गडबडून गेलो. खोटं बोलल्याबद्दल ते मला असा आमने सामने रोखठोकपणे जाब विचारतील याची मी कल्पनाच केलेली नव्हती. आता काय उत्तर द्यावे हे क्षणभर मला सुचेचना.. कसंबसं स्वतःला सावरून घेत कसंनुसं हसत म्हणालो..

“गेल्या वेळी प्युन रमेश सोबत तुमच्याकडे आलो होतो तेंव्हा, मी महाराष्ट्रातून आल्याचं कळूनही तुम्ही आमच्याशी कटाक्षानं तेलगू भाषेतच बोललात. तुम्ही घरी मराठीच बोलत असावात असा माझा अंदाज होता. केवळ त्याची खातरजमा करण्यासाठीच तुमच्या पत्नीशी आज सकाळी मी खोटं बोललो. त्यात माझा अन्य कोणताही वाईट, विपरीत हेतू नव्हता..”

माझ्या ह्या उत्तराने जनार्दन भाऊंचं अजिबात समाधान झालं नाही. रागानं तीक्ष्ण स्वरात ते म्हणाले..

“कुणाशी कोणत्या भाषेत बोलावं हा सर्वस्वी माझ्या मर्जीचा प्रश्न आहे. आणि, मी मराठी आहे किंवा नाही, हे तुम्ही खुद्द मला सरळ सरळ विचारू शकला असतात. त्यासाठी माझ्या घरच्यांशी असं खोटं बोलायची गरज नव्हती. मला हे मुळीच आवडलेलं नाही. माझी पत्नी हळव्या स्वभावाची असून हार्ट पेशंट आहे. त्यातून आधीच ती खूप दुःखी आहे. तुमच्या असं खोटं बोलण्यामुळे तिच्या मनात नाना शंका कुशंका येऊन ती घाबरून गेली आहे. तुमच्यासारख्या नवख्या, अनोळखी माणसाकडून यापुढे असलं कुठलं ही पोरकट, बेजबाबदार गैरकृत्य मी खपवून घेणार नाही..”

त्वेषानं बोलता बोलता जनार्दन भाऊंच्या नाकपुड्या संतापानं थरथरू लागल्या. अपराध्यासारखा खाली मान घालून मी निमूटपणे त्यांचे निर्भत्सनेचे कठोर बोल ऐकून घेत होतो. एवढ्यात बाहेरून कुणीतरी जनार्दन भाऊंना हाक मारली आणि त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी भाऊ वाड्याबाहेर गेले. थोडावेळ अस्वस्थपणे चुळबुळत मी जागीच बसून राहिलो आणि नंतर वेळ घालवण्यासाठी दिवाणखान्यात लावलेले भाऊंचे जुने फॅमिली फोटो पाहू लागलो.

थोड्यावेळाने जनार्दन भाऊ वाड्यात परत आल्यावर त्यांच्या नजरेला नजर न देता त्यांचा निरोप घेऊन एखाद्या चोरासारखा, खाल मानेनं वाड्यातून बाहेर पडलो.

(क्रमशः 4-ब)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

उतनूरचे दिवस-3-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

image (17)

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*उतनूरचे दिवस…*

*थरार… (३ )*

उतनूर मध्ये आमच्या स्टेट बँके व्यतिरिक्त आदीलाबाद जिल्हा केंद्रीय मध्यवर्ती बँक (ADCC) व सरस्वती ग्रामीण बँक अशा दोनच अन्य बँका होत्या. त्यापैकी ADCC बँक ही अनागोंदी कारभार व पर्याप्त निधीच्या अभावी कायमची बंद पडण्याच्या मार्गावर होती तर सरस्वती ग्रामीण बँक ही स्टेट बँकेद्वाराच पुरस्कृत (sponsored) असल्याने तशी बरीचशी आमच्या अंकीतच होती.

सरस्वती ग्रामीण बँकेची शाखा आमच्या स्टेट बँकेच्या इमारतीच्या अगदी समोरच होती. पुरेसा व कार्यक्षम स्टाफ नसल्याने या ग्रामीण बँकेचा उतनूर परिसरात केवळ नाममात्रच बिझिनेस होता. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी त्या बँकेत राजकुमार रेड्डी नावाचे नवीन शाखाधिकारी आल्यापासून परिस्थिती बदलली होती.

सहा फूट उंच, धिप्पाड शरीरयष्टी, सावळा रंग आणि सदैव हसमुख चेहरा असलेले राजकुमार रेड्डी एक हुशार व तडफदार अधिकारी होते. सर्वांशी आदराने व हसून खेळून बोलण्याच्या त्यांच्या मैत्रीपूर्ण वागणुकीने त्यांनी अल्पावधीतच सर्वांची मने जिंकून घेतली होती. ते अतिशय कष्टाळू होते व आपल्या बँकेचा बिझिनेस वाढावा यासाठी ते अहोरात्र मेहनत घेत असायचे.reddy-2

दोन वर्षांपूर्वी त्यांच्या शाखेतील फिल्ड ऑफिसर सूर्यकुमार बाबू यांचा पुलीमडगु गावात कर्ज वसुलीसाठी गेले असताना वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता. तेंव्हापासून शाखेतील सर्वच कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचून गेले होते. पर्यायाने बँकेच्या कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम झाला होता. शाखेत नवीन स्टाफ येण्यास तयार नव्हता. कर्जवसुली ठप्प झाल्याने अनुत्पादित कर्जाचे (NPA- Non Performing assets) प्रमाणही खूप वाढले होते.

राजकुमार रेड्डी साहेबांना शाखेच्या वाढत्या NPA ची चिंता सतावत होती. फिल्ड ऑफिसर नसल्याने त्यांनी स्वतःच कर्जवसुली साठी खेडोपाडी जाण्यास सुरवात केली. कर्जदारांना नियमित कर्जफेडीचे फायदे गोड शब्दांत समजावून सांगत त्यांनी त्यांचा विश्वास संपादन केला. पाहता पाहता कर्ज वसुलीचे प्रमाण वाढले आणि शाखेचा NPA झपाट्याने कमी झाला.

रोज सकाळी सहा वाजता रेड्डी साहेब रिकव्हरी साठी बाहेर पडून साडेनऊ पर्यंत घरी परत येत असत. मग जेवण करून साडेदहा वाजता ते शाखेत येऊन बसायचे. दुपारी एक वाजता ते पुन्हा कर्जवसुली साठी बाहेर पडायचे आणि चार साडेचार वाजेपर्यंत शाखेत परत यायचे. स्टाफ शॉर्टेज असल्याने खेडोपाडी जाताना ते नेहमी एकटेच जात. कुणालाही सोबत नेत नसत.

राजकुमार रेड्डी साहेब स्वतः जरी काळे सावळे असले तरी त्यांची बायको मात्र भरपूर गोरी तसेच सौंदर्यवती सुद्धा होती. रेड्डी साहेबांना मुलबाळ नव्हते. आमच्या स्टेट बँकेच्या इमारतीच्या वरच्या भागातच ते नवरा बायको रहायचे. रोज संध्याकाळी रेड्डी साहेब बायकोला घेऊन गावात मोटर सायकलवर फिरायचे तेंव्हा त्या देखण्या जोडीकडे सारे गावकरी कौतुकानं बघायचे.image (17)

कर्जवसुली समाधानकारक होऊन NPA आटोक्यात आल्यावर शाखेचे डिपॉझिट वाढविण्यावर जोर देण्यास रेड्डी साहेबांनी सुरवात केली. आमची बँक सरकारी बँक असल्याने उतनूर परिसरातील बहुतांश खातेदारांची डिपॉझिट्स आमच्या स्टेट बँकेतच होती. स्पर्धेत टिकण्यासाठी सरकारी बँकांपेक्षा अर्धा टक्का जास्त व्याज देण्याची रिझर्व्ह बँकेने ग्रामीण बँकांना परवानगी दिली होती. या गोष्टीचा आक्रमक प्रचार करीत रेड्डी साहेबांनी स्टेट बँकेतील डिपॉझिट्स आपल्याकडे वळविण्यास सुरवात केली. लोकांनी आमच्या बँकेतून आपली जमा राशी काढून ती ग्रामीण बँकेत ठेवण्यास सुरवात केली. बघता बघता आमचे बरेच खातेदार त्यांच्या डिपॉझिट्स सह ग्रामीण बँकेत शिफ्ट झाले.

रेड्डी साहेबांच्या ह्या ऍग्रेसिव्ह बँकिंग मुळे स्टेट बँकेशी असलेल्या त्यांच्या मधुर संबंधात कडवटपणा निर्माण झाला होता. असं असलं तरी त्यांच्याशी असलेली माझी मैत्री मात्र कायम होती. रोज सकाळी एकाच वेळी आम्ही दोघेही इंस्पेक्शन व कर्ज वसुली साठी गावाबाहेर निघायचो. योगायोगाने आमची दत्तक गावेही एकाच रस्त्यावर होती. रस्त्याच्या डाव्या बाजूच्या जंगलातील गावे स्टेट बँकेकडे तर उजव्या बाजूच्या जंगलातील गावे ग्रामीण बँकेकडे, अशी दत्तक गावांची विभागणी होती.

नेहमीप्रमाणेच आजही दुपारी एक वाजता आम्ही दोघे रिकव्हरी साठी एकत्रच निघालो होतो. मला आज बिरसाई पेटच्या डावीकडील जंगलात पाच किलोमीटर अंतरावरील “भूपेट” या गावात जायचे होते. तर रेड्डी साहेबांना बिरसाई पेट च्या उजवीकडील जंगलात आठ किलोमीटर अंतरावरील “अल्लमपल्ली” या गावात जायचे होते. आम्ही दोघेही आपल्या ह्या गावांमध्ये पहिल्यांदाच जात होतो. तसंच ही दोन्ही गावं नक्षल्यांचा मुक्त वावर असलेली धोकादायक गावं असल्यामुळे दुपारी चार वाजण्यापूर्वीच व्हिजिट आटोपून बिरसाईपेट बस स्टॉप पाशी परत यायचे असे ठरवले.image (10)

बिरसाईपेट उतनूर पासून अकरा किलोमीटर दूर असलेलं रस्त्याला अगदी लागून असलेलं गाव होतं. तिथपर्यंत आम्ही तिघेही (मी, रेड्डी साहेब व प्युन रमेश) आपापल्या मोटार सायकलींवर आलो. तिथल्या बस स्टॉप नजीकच्या हॉटेलमध्ये चहा घेण्यासाठी थांबलो असतांनाच आम्हाला बिक्षुपती भेटला. “पाथा उतनूर” (old utnoor) नावाच्या छोट्याशा गावात राहणारा बिक्षुपती गावोगाव सायकलींवर फिरून चादरी, सतरंज्या, ब्लॅंकेट्स हप्त्याने विकायचा. त्याचा व्यवहार पाहून नुकतंच त्याला दहा हजार रुपयांचं कर्ज मी मंजूर केलं होतं. रेड्डी साहेबांशी बिक्षुपतीची ओळख करून दिली. चहा घेतल्यावर बिक्षुपती बिरसाईपेट गावात गेला तर आम्ही आपाल्याला गावांकडे निघालो.

भूपेट गावात आमचे फक्त दहा बाराच कर्जदार होते. त्यांची भेट घेऊन थोडीफार वसुली करून तीन वाजण्यापूर्वीच आम्ही बिरसाईपेटला परतलो आणि रेड्डी साहेबांची वाट पहात बसलो. मी झाडाखाली बसून इंस्पेक्शन रजिस्टर लिहून काढत होतो तर रमेश गावकऱ्यांशी गप्पागोष्टी करीत होता. दरम्यान बिक्षुपती ही बिरसाईपेट मधील विक्री आटोपून आमच्या समोरूनच सायकल दामटीत पुढील गावाकडे निघून गेला. साडे चार वाजले तरी अद्याप रेड्डी साहेबांचा पत्ता नव्हता.

अखेर पाच वाजले. उंच वृक्षांच्या सावल्या लांबून अंधार पडायला सुरुवात झाली. रोजची कॅश स्टीच करणे, नोटांचे बंडल बांधणे, कॅश स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवणे ही कामे देखील रमेशलाच करायची असल्याने तो उतनूरला परतण्याची घाई करू लागला. मला मात्र रेड्डी साहेबांना न घेताच उतनूरला परत जाणे मनाला पटत नव्हते. शेवटी साडेपाच वाजता रमेशला एकट्यालाच बँकेची मोटारसायकल घेऊन उतनूरला परतण्यास सांगून मी तिथेच रेड्डी साहेबांची वाट पहात थांबलो.

त्याकाळी मोबाईल फोन नव्हते. त्यामुळे रेड्डी साहेब नेमके कुठे आहेत हे समजण्यास मार्ग नव्हता. अल्लमपल्ली गावातून उतनूरकडे जाण्यासाठी हाच एकमेव मार्ग होता. बिरसाईपेट गावाचे सरपंच हनमांडलू गारु मला सोबत करीत बस स्टॉप वर थांबले होते. त्यांच्याजवळ मोटारसायकल असल्याने यदाकदाचित रेड्डी साहेबांची भेट न झाल्यास मला उतनूर पर्यंत सोडून देण्याचे त्यांनी कबूल केले होते.

संध्याकाळचे सात वाजून गेले होते. रस्त्यावरची वाहतूक मंदावली. गावकरी आपापल्या घरी परत गेले. गिऱ्हाईक नसल्याने बस स्टॉप वरील हॉटेलवालाही हॉटेल बंद करून आपल्या घरी गेला. आता तिथे फक्त मी आणि सरपंच हनमांडलू गारु असे दोघेच उरलो होतो. चादर विक्रेता बिक्षुपतीही अद्याप परतताना दिसला नसल्याने त्याबद्दल सरपंचांना विचारले असता.. “बिक्षुपतीचे भरपूर नातलग या परिसरातील विभिन्न गावांत रहात असल्याने विक्री करताना जिथे संध्याकाळ होईल त्याच गावात आपल्या नातेवाईकाकडे तो रात्रीचा मुक्काम करतो..” असे त्यांनी सांगितले.

साडेसात वाजता उतनूर मधील माझा सहकारी प्रसन्ना, मला परत नेण्यासाठी बँकेची मोटारसायकल घेऊन आला. रेड्डी साहेबांचा अद्यापही काहीच ठावठिकाणा नव्हता. आठ वाजता त्या मार्गावर रात्री गस्त घालणारी उतनूर पोलिसांची जीप (Patrolling vehicle) तिथे आली. रात्रीच्या वेळी रस्त्यावर असं एकट्या दुकट्यानं उभं राहणं धोक्याचं असल्याचं सांगून त्यांनी आम्हाला हटकलं, तेंव्हा आम्ही त्यांना रेड्डी साहेबांबद्दल सांगितलं. एवढ्या रात्री जंगलात शिरून त्यांचा शोध घेणं खूप रिस्की असल्याचं सांगून त्यांनी आम्हालाही ताबडतोब उतनूरला परतण्यास सांगितलं. नाईलाजानं रात्री नऊच्या सुमारास आम्ही उतनूरला परतलो.

एव्हाना रेड्डी साहेबां बद्दलची बातमी साऱ्या गावभर पसरली होती. आमच्या बँकेसमोर गावकऱ्यांचा घोळका जमला होता. शेजार पाजारच्या बायका रेड्डी साहेबांच्या बायकोला धीर देत होत्या. गाडी पंक्चर झाल्यामुळे किंवा बंद पडल्यामुळे कदाचित साहेबांना अल्लमपल्ली गावातच मुक्काम करावा लागला असेल असे सांगून लोक रेड्डी साहेबांच्या पत्नीची समजूत घालत होते. रात्री दहा वाजेपर्यंत वाट पाहून मग आम्ही पोलीस स्टेशनमध्ये रेड्डी साहेबांची “मिसिंग कम्प्लेन्ट” नोंदवली.

त्या दिवशी आम्ही स्टेट बँकेचे सर्व कर्मचारी बँकेत जमून रात्रभर जागत राहून रेड्डी साहेबांची वाट पहात बसलो होतो. ग्रामीण बँकेचा स्टाफ ही आमच्या सोबतच होता. काही प्रतिष्ठित गावकरी, ADCC बँकेचे कर्मचारी व दोन पोलीस कॉन्स्टेबल देखील थोड्या वेळासाठी तिथे येऊन गेले. रेड्डी साहेबांची पत्नी सुद्धा अधून मधून बँकेत येऊन जात होती. पहाटे सहा वाजता सशस्त्र पोलिसांच्या दोन जीप रेड्डी साहेबांच्या शोधार्थ अल्लमपल्ली फॉरेस्ट कडे निघाल्या.

अल्लमपल्ली गावापर्यंत जाऊन पोलिसांच्या या दोन्ही जीप सकाळी दहापर्यंत उतनूरला परत आल्या. रेड्डी साहेब अल्लमपल्ली गावात आलेच नसल्याचे तेथील गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितले होते. त्या नंतर दुपारी बारा वाजता, त्या भागातील हिरापूर गावाजवळ एक मोटारसायकल अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याचे तेथील गावकऱ्यांनी उतनूर पोलिस स्टेशनला कळविले. ताबडतोब रिकामी जीप पाठवून पोलिसांनी ती मोटारसायकल ग्रामीण बँकेकडे आणवून घेतली. ती रेड्डी साहेबांचीच मोटारसायकल होती.

रेड्डी साहेबांसोबत निश्चितच काहीतरी घातपात झालेला दिसत होता. हिरापूर जंगलात त्या मोटारसायकल पासून काहीच अंतरावर पोलिसांना एक पॅन्ट शर्ट व बुटांचा जोड ही फेकून दिलेला दिसला. तोही पोलिसांनी सोबत आणला होता. ते कपडे व बूट रेड्डी साहेबांचेच असल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितले.

राजकुमार रेड्डी साहेबांची ती जळालेली मोटारसायकल व बूट, कपडे पाहताच त्यांच्या पत्नीचा आतापर्यंत कसाबसा राखलेला धीर संपला. अशुभाच्या आशंकेने त्यांनी हंबरडा फोडून विलाप करण्यास सुरुवात केली. त्यांचा आक्रोश ऐकून जमलेल्या साऱ्यांचेच काळीज पिळवटून निघत होते. ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आज बँक बंदच ठेवली होती. थोड्याच वेळात ग्रामीण बँकेचे आदीलाबाद येथील रिजनल मॅनेजर आपल्या सोबत लीड बँक मॅनेजर साहेबांना घेऊन उतनूरला हजर झाले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी बँकेभोवती जमलेल्या जमावास पांगवून तिथे पोलीस बंदोबस्त वाढविला. रेड्डी साहेबांना शेवटचे पाहणारे आम्हीच असल्याने माझी व रमेशची पोलिसांनी कसून चौकशी केली. आदीलाबादचे जिल्हा पोलिस अधीक्षकही उतनूर पोलिसांशी संपर्क साधून त्यांना वारंवार सूचना देत तपास कार्याचा अपडेट घेत होते. अल्लमपल्ली व हिरापूरचे संपूर्ण जंगल पोलिसांनी पिंजून काढले होते. परंतु अद्यापही रेड्डी साहेबांचा कसलाही थांगपत्ता लागत नव्हता.

कदाचित नक्षलवाद्यांनी रेड्डी साहेबांचे अपहरण करून त्यांना महाराष्ट्राच्या गडचिरोली भागात नेले असावे असा पोलिसांचा कयास होता. तसे असेल तर खंडणीसाठी तरी त्यांचा फोन येईल याचीच पोलीस वाट पहात होते. परंतु दुपारचे चार वाजले तरी अद्याप तसा कुठलाही फोन आला नव्हता.

दिवस मावळू लागला तशीतशी रेड्डी साहेबांच्या परतण्याची आशा देखील मावळू लागली. त्यांच्या पत्नीची दयनीय अवस्था तर बघता बघवत नव्हती. पतीची आठवण काढून रडता रडता दु:खातिरेकाने ती विलापिता वारंवार बेशुद्ध पडत होती.

पाच वाजण्याच्या सुमारास कमरेला मळकंसं धोतर गुंडाळलेला एक जाडजूड उघडाबंब माणूस गर्दीतून वाट काढीत बँकेत आला. त्याचा चेहरा धुळीने माखलेला होता. माझ्याकडे पहात तो म्हणाला..

“नमस्ते साब..!”image (15)

आवाज ओळखीचा वाटला म्हणून मी त्या माणसाकडे निरखून बघितलं.. तो काय..

“अरे..! रेड्डी साब.. आप ? और इस हालत में..?”

माझ्या तोंडून आनंदाने व आश्चर्याने वरील उद्गार बाहेर पडले.

माझे ते शब्द ऐकून सर्वांच्याच नजरा त्या माणसाकडे वळल्या. ते रेड्डी साहेबच आहेत याची खात्री झाल्यावर बँकेत सर्वत्र आनंदाची एक लहर पसरली. जो तो त्यांना भेटण्यासाठी, पाहण्यासाठी धडपडू लागला. रेड्डी साहेबांच्या पत्नीला ही बातमी समजताच ती धावतच बँकेत आली आणि सर्वांदेखत तिने आपल्या पतीला घट्ट मिठी मारली. आनंदातिरेकाने तिच्या तोंडून शब्दच फुटेनासा झाला होता. रेड्डी साहेब व त्यांची पत्नी.. या दोघांचेही डोळे अश्रूंनी डबडबले होते. त्यांचं ते प्रेमभरीत उत्कट मिलन पाहून आम्हालाही गहिवरून आलं.

थोड्या वेळाने भानावर आल्यावर रेड्डी साहेबांच्या पत्नीने त्यांना घरी नेऊन आधी स्वच्छ आंघोळ घातली. त्यानंतर त्यांना पोटभर खाऊ पिऊ घालून हसतमुखाने त्यांना ती बँकेत घेऊन आली. तोपर्यंत उतनूरचे पोलीस ठाणेदारही त्यांचा जबाब घेण्यासाठी बँकेत येऊन ठेपले होते. आम्ही सारे ही त्यांची हकीकत ऐकण्यास अत्यंत उत्सुक होतो. रेड्डी साहेबांनी माझ्याकडे पहात बोलायला सुरुवात केली.

“काल दुपारी दीडच्या सुमारास माझ्या स्टेट बँकेच्या या मित्राला ‘चार वाजेपर्यंत इथेच परत येतो..’ असं सांगून बिरसाईपेट हून मी अल्लमपल्लीच्या दिशेने निघालो. सुमारे पाच किलोमीटर आत गेल्यावर एका ठिकाणी जंगलातील तो रस्ता दोन वेगळ्या दिशांना विभागला गेला होता. त्या रस्त्याने पहिल्यांदाच जात असल्याने नक्की कुठल्या दिशेने जावे याचा अंदाज न आल्याने नेमक्या चुकीच्याच दिशेने जंगलात जाण्यास मी सुरवात केली.

बराच वेळ झाला तरी कुठलेही गाव किंवा वस्ती दिसेना, तेंव्हा आपण रस्ता चुकल्याची मला खात्री झाली. गाडी वळवून माघारी परत फिरण्याचा विचार करीत असतानाच खाकी रंगाचा पॅन्ट शर्ट घातलेले दोन बंदूकधारी तरुण रस्त्याच्या कडेला उभे असलेले मला दिसले. ते फॉरेस्ट गार्ड असावेत असं वाटून मी त्यांच्याकडे अल्लमपल्लीच्या रस्त्याबद्दल चौकशी केली. हा हिरापूर कडे जाणारा रस्ता आहे असं सांगून अल्लमपल्लीचा रस्ता तर मागेच राहिला असं त्यांनी सांगितलं.

त्या दोघांचे आभार मानून मी मागे फिरलो. मात्र तेवढ्यात कुठूनतरी खुणेची एक कर्कश्श शीळ जंगलात घुमली. मला अनामिक धोक्याची जाणीव झाली. पाहता पाहता आजूबाजूच्या जंगलातून हिरव्या रंगाच्या गणवेशातील आठ दहा बंदूकधारी बाहेर पडून त्यांनी मला घेरून टाकलं. मला मोटारसायकल वरून खाली उतरवून पायवाटेने त्यांनी मला खोल जंगलात नेलं.

तिथे एका ठिकाणी नक्षलवाद्यांचा तळ होता. त्यांच्या कमांडरने माझी उलट तपासणी करण्यास सुरुवात केली. माझे आयडेंटिटी कार्ड दाखवूनही मी बँक मॅनेजर आहे यावर काही केल्या त्याचा विश्वास बसत नव्हता. गाडीचे लॉग बुक, इंस्पेक्षन रजिस्टर वगैरे त्याने दूर भिरकावून दिले. माझ्या दणकट शरीरयष्टीकडे पाहून मी पोलीस अधिकारीच असल्याचा त्याचा पक्का गैरसमज झाला होता. माझ्याबद्दल त्या कमांडरने खूप बारकाईने चौकशी केली. माझे जन्मगाव, शिक्षण, नोकरी इत्यादीचा तपशील जाणून घेऊन त्याची खातरजमा करण्यासाठी ट्रान्समिटर मार्फत ती माहिती त्याने त्याच्या वरिष्ठांना कळवली.

माझे अंगावरचे कपडे काढून घेऊन तिथल्याच एका झाडाला त्या नक्षल्यांनी मला रात्रभर बांधून ठेवलं. माझे कपडे जंगलात फेकून देऊन माझी मोटारसायकल जाळून टाकण्याचाही कमांडरने आपल्या सहकाऱ्यांना आदेश दिला. माझा “फैसला” उद्या सकाळी होईल.. असं सांगून ते सारे झोपायला निघून गेले.

सकाळी तिथला तळ हलवून व दोरीने माझे हात पाठीमागे बांधून अनवाणी पायी चालवत त्यांनी मला तेजपूरच्या दिशेने नेण्यास सुरवात केली. पोलिसांनी जंगलात माझा शोध घेण्यास सुरुवात केल्याबद्दल त्यांना खबर मिळाली होती. अधून मधून वॉकी टॉकी आणि ट्रान्समिटर वर बोलून ते माझ्या बद्दल वरिष्ठांकडून सूचना घेत होते. अद्याप माझ्या बद्दल हाय कमांड कडे पाठविलेली माहिती त्यांच्याकडून व्हेरिफाय झाली नव्हती.

सकाळचे दहा वाजून गेले होते. जसा जसा वरिष्ठांकडून माझी माहिती व्हेरिफाय करण्यास उशीर होत होता तसा तसा आमच्या सोबत जंगलात पायपीट करणाऱ्या त्या नक्षली दलम् च्या कमांडरचा राग व अधिरपणा वाढत होता. अखेरीस, बहुदा कमांडरच्या सततच्या विचारणेला वैतागून त्यांच्या हाय कमांडने माझ्या भवितव्याचा निर्णय त्या नक्षली कमांडरवरच सोपवला.

त्या कमांडरला तर माझ्या लोढण्या पासून कधीचीच सुटका हवी होती. त्याने मला पुन्हा झाडाला बांधून माझे हात पाय तोडून शीर धडावेगळे करण्याचा निष्ठूरपणे आदेश दिला. त्यानुसार चालता चालता मधेच थांबून तिथल्याच एका झाडाला मला बांधून टाकण्यात आले. मी ओरडू नये म्हणून माझ्या तोंडाला चिकटपट्टी लावण्यात आली. जगण्याची आशा तर मी केंव्हाच सोडून दिली होती.

हातात कुऱ्हाड आणि कत्ती घेऊन निर्विकार चेहऱ्याचे दोन क्रूरकर्मा नक्षली जणू हे नित्यकर्मच असल्याच्या अविर्भावात माझ्या समोर उभे राहिले. त्यापैकी एका नक्षल्याने माझ्यावर घाव घालण्यासाठी कुऱ्हाड उंचावली. माझ्या सर्व संवेदना बधिर झाल्या होत्या. मी डोळे गच्च मिटून घेतले.

त्या नक्षल्याचा वर गेलेला हात बराच वेळ झाला तरी खाली न आल्याने नवल वाटून मी हळूच डोळे किलकिले करून पाहिले. तो नक्षली कान देऊन कसला तरी कानोसा घेत होता. काल ऐकली होती तशी खुणेची शीळ पुन्हा जंगलात घुमली. त्या पाठोपाठ जंगलातून एका माणसाला धरून त्याच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्याला कमांडर पुढे आणण्यात आले. मला त्या माणसाची फक्त पाठच दिसत होती.

कमांडरने आदेश दिल्यावर त्या माणसाच्या डोळ्यांवरील पट्टी काढण्यात आली. पट्टी काढताच त्या माणसाने कमांडरला सॅल्युट ठोकला. कमांडरची त्या माणसाशी चांगलीच जान पहचान असावी. कारण कमांडरने त्याला आदराने आपल्या शेजारी बसवून घेतले. त्यानंतर त्या माणसाने माझ्याकडे पाहिले. तो कालच ओळख झालेला चादर सतरंजी विकणारा बिक्षुपती होता. बहुदा तो नक्षल्यांचा खबऱ्या असावा. सुरवातीला त्याने मला ओळखलेच नाही. मात्र नंतर कमांडरने माझ्याबद्दल माहिती सांगताच त्याला माझी ओळख पटली. तो कमांडरला म्हणाला..

“मी ओळखतो ह्यांना. मी खात्रीनं सांगतो, हे नवीन आलेले ग्रामीण बँकेचे मॅनेजरच आहेत.”image (19)

बिक्षुपतीच्या त्या उद्गारांनी जणू चमत्कारच झाला. त्या कमांडरने माझी माझी ताबडतोब सुटका करण्याचा आदेश दिला. माझी क्षमा मागून तो म्हणाला.. “बँकवाल्यांशी आमचं कसलंही वैर नाही. केवळ तुम्ही पोलीस असल्याचा संशय असल्यानेच सावधगिरी बाळगण्यासाठी तुम्हाला देहदंड देण्याचे मी ठरवले होते. तुम्ही आता या बाजूने सरळ चालत जा. सुमारे दोन तास चालल्यावर तुम्हाला उतनूर कडे जाणारा रस्ता सापडेल..”

पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी निमूटपणे त्यांनी दाखविलेल्या दिशेने निघालो. बिक्षुपतीचे साधे आभार मानण्याचेही धैर्य आणि त्राण माझ्यात उरले नव्हते. माझ्या अंगावर फक्त अंडरवेअर होती. त्या निर्मनुष्य जंगलात एखाद्या वनमाणसा सारखा वाट काढीत मी चाललो होतो. वाटेत एका उध्वस्त झोपडी समोर वाळत टाकलेलं फाटक मळकं धोतर काढून घेऊन मी ते कमरेला गुंडाळून घेतलं.

काल पासून पोटात अन्नाचा कण ही नसल्याने मला अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे चालताना अनेकदा सावली पाहून तिथे थांबून मी विश्रांती घेत होतो. अशा प्रकारे कशीबशी मजल दर मजल करीत अगदी विरुद्ध दिशेने एकदाचा मी उतनूर गावात प्रवेश केला.”

रेड्डी साहेबांचे बोलणे संपले. केवळ नशीब बलवत्तर म्हणूनच ते या जिवावरच्या संकटातून बचावले होते.

बिक्षुपती हा नक्षल्यांप्रमाणेच पोलिसांचा ही खबऱ्या होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या विरुद्ध काहीच कारवाई केली नाही.

या घटने नंतर ग्रामीण बँकेच्या मॅनेजमेंटने रेड्डी साहेबांची ताबडतोब अन्यत्र बदली केली. परंतु रेड्डी साहेबांनी नम्रपणे ही बदली नाकारली आणि आपल्याला उतनूरलाच राहू द्यावे अशी वरिष्ठांना विनंती केली. कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी व शाखेची प्रगती करण्यासाठी आपले उतनूरला राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी वरिष्ठांना पटवून दिले. विशेष म्हणजे रेड्डी साहेबांच्या पत्नीनेही आपल्या पतीच्या या निर्णयाला पाठिंबा दिला.

असे हे कर्तव्यनिष्ठ राजकुमार रेड्डी साहेब पुढे ग्रामीण बँकेचे जनरल मॅनेजर म्हणून निवृत्त झाले.

(क्रमश:)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

उतनूरचे दिवस-2-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

dense forest

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*उतनूरचे दिवस…*

*थरार… (२)*

*पुलीमडगुचा हल्लेखोर वाघ..*

दुसरा दिवस उजाडला. आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे सकाळी सहा वाजताच रमेश स्नान, देवपूजा आटोपून कपाळाला उभं गंध लावून बँकेची मोटारसायकल घेऊन माझ्या दारात हजर झाला. गाडीच्या अर्धवट तुटलेल्या पत्र्याच्या डिक्कीतून पुलीमडगु व आसपासच्या गावांतील कर्जदारांची माहिती असलेले जाडजूड इन्स्पेक्शन रजिस्टर डोकावत होते. मी सुद्धा स्नान, चहा ई. आटोपून तयारच होतो. दहा वाजेपर्यंत परत येतो, असं घरी सांगून आम्ही निघालो. ramesh

तसं पाहिलं तर उतनूर पासून पुलीमडगु गावाचं अंतर फक्त दहा किलोमीटर एवढंच होतं. परंतु काटेकुटे, खाच खळग्यांनी भरलेल्या कच्च्या, ओबडधोबड आणि निर्मनुष्य रस्त्याने जाताना ते छोटंसं अंतरही खूप मोठं वाटत होतं. नागपूर ते निर्मल या महामार्गावरील गुढीहतनूर या गावापासून उतनूर कडे जाण्यासाठी जो फाटा फुटतो त्या मार्गावर इंद्रवेल्ली आणि शामपूर या दोन गावांच्या मध्ये थोडं आडबाजूला हे पुलीमडगु गांव होतं. हा संपूर्ण भाग तुरळक वस्तीचा व आदिवासी बहुल असून गर्द वनराईनं वेढलेल्या भीषण दऱ्यादुऱ्यांचा तसंच क्रूर नक्षलवाद्यांचं प्राबल्य असलेला म्हणून कुख्यात होता.dense forest

पुलीमडगु गावात बेधडक दिवसा ढवळ्या वाघ येतो आणि दिसेल त्याच्यावर हल्ला करून त्याला ओढत जंगलात घेऊन जातो.. अशी त्या पंचक्रोशीत वंदता होती. त्यामुळे सहसा त्या गावांत एकटं दुकटं जायला कुणीही धजावत नसे. त्यातून हे गांव दाट जंगलात वसलेलं आणि थोडं आडबाजूला असल्याने त्या गावचे रहिवासी वगळता अन्य कुणीही त्या गावाकडे चुकूनही फिरकत नसत. पूर्वी हे गाव सरस्वती ग्रामीण बँकेच्या कार्यक्षेत्रात होतं. मात्र एका दुर्दैवी घटनेनंतर त्या बँकेने लीड बँकेकडे हे कार्यक्षेत्र बदलून मागितलं. त्यांची विनंति मान्य करून लीड बँकेने पुलीमडगु हे गांव स्टेट बँकेला पुनःआवंटीत (re-allot) केलं होतं.

आम्ही पुलीमडगु गावात प्रवेश केला तेंव्हा तिथल्या रस्त्यांवर काही बेवारस कुत्री सोडली तर अन्य कुणीही दिसत नव्हतं. सर्व घरांच्या व झोपड्यांच्या खिडक्या आणि दारं आतून बंद होती. गावात जेमतेम तीस चाळीस घरं असावीत. रमेशला गावातील वेड्यावाकड्या रस्त्यांची चांगलीच माहिती असल्याचं दिसत होतं. अतिशय शिताफीने वाटेतील खड्डे, खाच खळगे, चिखल, नाल्या चुकवत उभ्या आडव्या बोळांतून तो मोटार सायकल दामटीत होता.village

आम्ही एखाद्या घरासमोरून पुढे गेल्यावर त्या घरातील लोक खिडक्या दारं किंचित किलकिली करून आमच्याकडे चोरून पहात असावेत असा उगीचंच भास होत होता. डाकूंची टोळी गावात शिरते तेंव्हा गावातील लोक जसे घाबरून दारं खिडक्या घट्ट बंद करून घरात दडून बसतात तसंच काहीसं तिथलं वातावरण वाटत होतं.

आख्खं गाव ओलांडून रमेशने गावापासून दूर, अगदी टोकाला असलेल्या एका एकलकोंड्या घरासमोर गाडी उभी केली. दगडी बांधकाम असलेल्या त्या छोट्याश्या बैठ्या घरावरील नवी कोरी इंग्रजी कौलं सकाळच्या कोवळ्या उन्हात चमकत होती.roof tiles

घराभोवती बांबू व वाळलेल्या काट्याकुट्यांचं मजबूत, उंच कुंपण होतं. घरासमोर अंगणात एक मध्यम आकाराची गोल, पक्की विहीर होती. ती विहीर नुकतीच खणलेली असावी. कारण विहिरीच्या खोदकामातून निघालेल्या दगडांचा ढिगारा अंगणात अजूनही तसाच पडलेला होता. गाडीवरून खाली उतरून रमेशने हाक मारली..village house

” वेंकन्ना…! ओ ssss वेंकन्ना..!”

घरामागील उंचवट्यावरून पांढऱ्या रंगाचं आदिवासी पध्दतीचं मुंडासं घातलेलं एक डोकं हळूच दगडी भिंतीबाहेर डोकावलं. लांबवरून बराच वेळ रमेशला निरखून पाहिल्यानंतर मग कुठे त्या मुंडासंवाल्याच्या प्रश्नार्थक चेहऱ्यावर ओळख पटल्याचं हास्य उमटलं. लगबगीनं धावतच येऊन त्यानं कुंपणाचं लाकडी फळ्यांचं फाटक उघडलं.venkanna

“आत या साहेब..” तो तेलगू भाषेत म्हणाला.

सफेद धोतर आणि खादीची बिन बाह्यांची बंडी घातलेला वेंकन्ना एक मध्यम उंचीचा किरकोळ शरीरयष्टी असलेला सामान्य शेतकरी वाटत होता. आम्ही त्याच्या घरात गेलो. बैठकीच्या खोलीत असलेल्या लाकडी सोफ्यावर बसायला सांगून त्यानं आम्हाला पिण्यासाठी आंतून तांब्याभर पाणी आणून दिलं.

“हे बँकेचे नवीन फिल्ड ऑफिसर.. महाराष्ट्रातून आले आहेत. यांना तेलगू भाषा येत नाही..”

रमेशने वेंकन्नाला तेलगूतून माझा थोडक्यात परिचय करून दिला.

“पर्वा लेदू.. ! (हरकत नाही..No problem.)” वेंकन्ना म्हणाला.. “हमको थोडा थोडा हिंदी भी आता है..”

त्यानंतर हिंदीतूनच आमच्या गप्पा सुरु झाल्या.

रमेशनं सांगितलं की वेंकन्ना हा पुलीमडगु गावातील सर्वात श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती असून गेली अनेक वर्षे तो गावचा सरपंच देखील आहे. पोलीस, फॉरेस्ट खातं, ITDA, मंडल परिषद अशा सर्व सरकारी खात्यांमध्येही त्याचं चांगलंच वजन आहे. सध्या त्याचं स्वतःचंच कर्ज खातं थोडं थकीत असलं तरी एरव्ही मात्र तो बँकेला कर्जवसुलीत खूप सहकार्य करतो.

रमेशचं असं बोलणं चालू असतानाच तिथल्या लाकडी अलमारीतून पाच हजार रुपये काढून ते मला देत वेंकन्ना म्हणाला..

“कालच आदीलाबादचे व्यापारी इथल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनीच दिलेले हे पैसे माझ्या कर्ज खात्यात जमा करून घ्या. आणि, तुम्ही अगदी योग्य वेळी आला आहात. गावातील सर्वच शेतकऱ्यांकडे मक्याचे पैसे आलेले आहेत. तुम्ही मला इथल्या थकबाकीदारांची नावं सांगा. म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाता येईल..”

त्यानंतर वेंकन्नाला घेऊन आम्ही गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांकडे गेलो. वेंकन्नाचा गावात खूप मान आणि दरारा होता. ईरन्ना, भीमन्ना, सोमू, राजय्या, नरसय्या, लच्छन्ना अशा गावातील बऱ्याच थकीत कर्जदारांकडून त्या दिवशी भरपूर कर्ज वसुली झाली. त्यानंतर चहा पिण्यासाठी वेंकन्ना आम्हाला पुन्हा त्याच्या घरी घेऊन गेला. मुलांच्या शिक्षणासाठी वेंकन्नाची पत्नी तिच्या माहेरी करीमनगर इथं रहात असल्याने वेंकन्ना त्या घरात एकटाच रहात होता. त्याने बनवलेला चहा पिऊन झाल्यावर आम्ही त्याच्या घरामागील आमराई व फळबाग पहात हिंडत होतो.

वेंकन्नाचे घर गावापासून थोडे दूर एका टोकाला होते. त्याच्या घरामागील चिंच, आवळा, आंबा आणि मोहाची काही झाडे सोडली तर तिथूनच गर्द सागवृक्षांचे जंगल सुरू होत होते. घराला तिन्ही बाजूंनी बांबू व काट्यांचे उंच, भक्कम कुंपण असले तरी या मागील भागाला मात्र कुंपण नव्हते.

जंगलकडील या बाजूस एक पाच फूट उंचीचा आकर्षक नैसर्गिक उंचवटा होता आणि तिथूनच खोल जंगलात जाण्यासाठी एक पायवाट सुद्धा होती. मी त्या उंचवट्याला पाठ टेकून उभा राहिलो. माझं फक्त डोकंच त्या खांद्याएवढ्या उंच उंचवट्याच्या वरती होतं. सहज मान मागे वळवून पाहिलं तर तिथून ती जंगलात जाणारी रहस्यमय पायवाट अगदी जवळच दिसत होती. मला तसं उभं राहिलेला पाहून वेंकन्ना घाबरून मोठ्याने ओरडला..

“साब, उधर वैसा खड़े मत रहो.. इधर आ जाओ.. वहां खतरा है..!”

मी बुचकळ्यातच पडलो. खतऱ्या सारखं तर तिथं काहीच दिसत नव्हतं. मी अवतीभवती काळजीपूर्वक आणि शोधक नजरेने नीट निरखून पाहिलं. माझ्या पाठीमागे खांद्यापर्यंत तर तो नैसर्गिक उंचवटाच होता. आजूबाजूला आंब्याची, चिंचेची झाडं होती. जवळपास कुठेही विहीर, तलाव, दलदल, मधमाशांचं पोळं किंवा खोल दरी सुद्धा नव्हती. हां, मागे जंगल होतं खरं.. पण ते तिथून तीस चाळीस फुटांवरून सुरू होत होतं.

“आप पहले इधर आ जाओ..! फिर समझाता हूँ आपको..!”

वेंकन्नाने पुन्हा ओरडून मला खाली बोलावल्यावर अनिच्छेनेच त्या उंचवट्या पासून दूर होत मी त्याच्याकडे गेलो.

“दो साल पहले सूर्यकुमार बाबू उस टीले के पास ठीक उसी तरह खड़े थे, जैसे अभी अभी आप खड़े थे..”

वेंकन्ना गंभीर स्वरात म्हणाला.

“सूर्यकुमार..? कौन सूर्यकुमार ?”

मी विचारलं. तेंव्हा रमेशनं सांगितलं की सूर्यकुमार हा उतनूरच्या सरस्वती ग्रामीण बँकेचा एक तडफदार, धाडसी फिल्ड ऑफिसर होता. पूर्वी पुलीमडगु गाव ग्रामीण बँकेकडे दत्तक असल्याने कर्जमंजुरी पूर्वक निरीक्षण (Pre-sanction inspection) तसेच कर्जवसुली साठी सूर्यकुमार नेहमीच या गावात येत असे. तसंच तो निसर्गप्रेमी असल्याने जंगलात भटकणं त्याला खूप आवडत असे. पुलीमडगु लगतच्या जंगलातही तो बरेचदा फिरायला जात असे.

एकदा असाच नियमित कर्जवसुलीसाठी पुलीमडगु गावात आला असता याच उंचवट्याला पाठ टेकून तो उभा असतांनाच एका प्रचंड मोठ्या वाघाने अचानक पाठीमागून येऊन त्याचं डोकंच धरलं आणि तसाच फरफटत त्याला जंगलात घेऊन गेला. दोन दिवसांनी जागोजागी लचके तोडलेलं त्याचं शिरविरहीत धड खोल जंगलातील एका तलावाजवळ आढळून आलं.

रमेशनं असंही सांगितलं की त्या घटनेनंतर ग्रामीण बँकेच्या कर्मचाऱ्यांनी पुलीमडगु गावात जाण्यास नकार दिला आणि जिल्हा अग्रणी बँकेकडे हे गाव अन्य बँकेकडे दत्तक देण्याची विनंती केली. अशा तऱ्हेने हे गाव आमच्या स्टेट बँकेकडे दत्तक आले होते.

हकनाक बळी पडलेल्या सूर्यकुमार बाबूची हकीकत ऎकल्यावरही रमेश आणि वेंकन्नाच्या सावधगिरीच्या इशाऱ्याकडे लक्ष न देता बाजूच्या उतारावरून मी त्या उंचवट्यावर चढलो. मागील पन्नास साठ फुटांच्या त्या जागेला कसलेही कुंपण नव्हते. त्यातील जंगलात जाणारा आठ दहा फुटांचा रस्ता सोडला तर बाकी सगळीकडे जाडजूड बुंध्याचे एकमेकांच्या अगदी जवळ जवळ असलेले उंच, दाट साग वृक्ष होते. तिथून कोणत्याही प्राण्याला आत येणे खूप अवघड होते. हे निरीक्षण करून मी खाली उतरलो.

तेलगू भाषेत वाघाला जसं “व्याघ्रम” म्हणतात तसंच “पुली” असंही म्हणतात. आपल्याकडे वाघलगाव, वाघोली, वाघदरा, वाघजाई (जाळी) या नावाची जशी गावं असतात तसंच हे “पुलीमडगु”. यातील “पुली” म्हणजे वाघ आणि “मडगु” म्हणजे गाव, असंच मी समजत होतो.

मात्र काही दिवसांनी तेलगू भाषेत “मडगु” शब्दाचा अर्थ “तलाव” (lake) असा होतो, अशी ज्ञानात भर पडली. त्यावरून “वाघ जिथे पाणी प्यायला येतो तो तलाव” म्हणजे “पुलीमडगु” (मराठीत वाघतळं) असा योग्य अर्थ मी लावला. त्यानुसार त्या गावाच्या जवळपास कुठेतरी पाण्याचा तलाव आहे का याबद्दल चौकशी केली असता वेंकन्नाच्या घरामागील जंगलात एक किलोमीटर अंतरावर तसं एक मोठं तळं असल्याचीही माहिती मिळाली.

गुढी हतनूर ते उतनूर या मार्गावरील धानोरा, केसलापूर, इंद्रवेली, आंधळी, दसनापूर, खंडाळा, उमरी, शामपुर, नागापूर अशी जवळ जवळ सर्वच गावांची नावं जरी ओळखीची आणि मराठी वळणाची वाटत असली तरी प्रत्यक्षात त्या गावांत कुणालाही मराठी भाषा येत नाही. इंग्रजांपूर्वी आदिवासी गोंड राजांच्या अधिपत्याखाली असलेल्या या भूभागात प्रामुख्याने गोंड, कोलम, चेंचू, गडाबा, बैगा आणि मुंडा ह्या आदिम आदिवासी प्रजातीच्याच लोकांची वस्ती आहे. खोल जंगलात, डोंगरकपारीच्या आणि दऱ्या खोऱ्यांच्या आश्रयाने राहणारे हे आदिवासी क्वचितच रस्त्याकडे फिरकतात. पराकोटीचे दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा आणि कुपोषण यांनी ग्रासलेला हा भूमिपुत्रांचा समाज अतिशय भोळा आणि अल्पसंतुष्ट आहे.

पोटापुरतंच धान्य पिकवावं, लाज झाकण्या पुरतंच वस्त्र ल्यावं, तेल, मीठ, मिरचीच्या खर्चापुरता जंगलातून मध, डिंक गोळा करावा आणि कवडीमोल भावानं तो स्थानिक व्यापाऱ्यांना विकावा, मोहाची फुलं गोळा करून त्याची चविष्ट दारू तयार करावी, टोकदार बांबूचे भाले, गावठी धनुष्यबाण आणि पाळलेल्या अजस्त्र रानटी कुत्र्यांच्या मदतीने हरीण, ससे, रानडुक्कर यांची शिकार करावी, रात्री आगीवर ही शिकार भाजावी आणि मोहाची दारू प्राशन करून चांदण्या रात्री डफाच्या साथीवर शेकोटी भोवती फेर धरून नृत्य करीत मस्तीत जगावं असा त्या भाबड्या आदिवासींचा नित्य जीवनक्रम होता.

काही आदिवासी विडी उद्योगासाठी लागणारा तेंदू पत्ता गोळा करून तो नागपूर, नांदेड, निझामाबाद, जालना येथून येणाऱ्या बड्या व्यापाऱ्यांना विकत असत. वन विभागाच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्याच साथीने उच्च प्रतीचे अस्सल सागवानी तसेच शिसवी व चंदनाचे लाकूड यांचीही चोरटी वाहतूक काही आदिवासी अत्यल्प मोबदल्यात करीत असत. या आदिवासींचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांनी शिक्षित व्हावे, त्यांचे जीवनमान उंचावून त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे यासाठी केंद्र व राज्य सरकार द्वारे जे कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च केले जात त्याचा बहुतांश हिस्सा राजकीय नेते, सरकारी नोकरशहा आणि स्थानिक व्यापारी परस्परांच्या संगनमताने गिळंकृत करून टाकीत असत.

आदिवासींचा कष्टाचा आणि हक्काचा पैसा लुबाडून व्यापारी, पुढारी आणि सरकारी बगल बच्चे गब्बर होत चालले होते. आदिवासींना या अन्यायाची जाणीव करून देऊन त्यांना प्रस्थापितां विरुद्ध बंड करण्यास प्रवृत्त करणारी नक्षलवाद्यांची माओवादी हिंसक विचारसरणी या संपूर्ण परिसरात चांगलीच फोफावली होती.

रस्ते, रेल्वे, पोस्ट, टेलिफोन अशा दळण वळण आणि संदेश वहन सुलभ करणाऱ्या सरकारी खात्यांना या नक्षली लोकांचा तीव्र विरोध होता. या सोयींमुळेच आदिवासींची पिळवणूक करणारे भांडवलदार व्यापारी त्यांच्या पर्यंत सहज पोहोचतात आणि त्यांना लुबाडतात अशी नक्षली विचारसरणी होती. तसेच पोलिस या भांडवलदारांना, प्रस्थापितांना तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना संरक्षण पुरवितात म्हणून पोलिसांशीही त्यांचे वैर होते.

नक्षलवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळावी म्हणून ज्याप्रमाणे पोलिसांनी सामान्य आदिवासी जनतेत आपले खबरे पेरून ठेवले होते, अगदी तसेच नक्षलवाद्यांनी देखील प्रत्येक गावात आपले गुप्तहेर नेमलेले होते. या खबऱ्यांना व गुप्तहेरांना पोलिसांकडून तसंच नक्षलवाद्यांकडून भरपूर पैसा पुरविला जात असे.

काही चलाख, अतिधूर्त, संधीसाधू आदिवासी हे आपला जीव धोक्यात घालून, एकाच वेळी पोलिस व नक्षली, ह्या दोघांचेही विश्वासू खबरे म्हणून काम करीत आणि अशारितीने दोन्हीकडून भरपूर पैसा मिळवीत असत.

पुलीमडगु गावाचा प्रधान उर्फ सरपंच वेंकन्ना हाही असाच एक डबल एजंट होता.

ग्रामीण बँकेचा फिल्ड ऑफिसर सूर्य कुमार बाबू याला वाघानं ओढून नेण्यापूर्वी आणि नंतरही गावातील काही दुर्दैवी गावकऱ्यांना ओढून नेऊन वाघानं त्यांचा बळी घेतला होता. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासठी गावात आलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना देखील वाघाच्या प्राणघातक हल्ल्याची शिकार व्हावं लागलं होतं. वाघाच्या दहशतीमुळे पुलीमडगु गावातील शाळेत शिक्षक येईनासे झाल्यामुळे ती शाळाही कायमचीच बंद पडली होती.

पुलीमडगुला मी जेंव्हा पहिल्यांदा गेलो होतो तेंव्हा वेंकन्नाच्या घरामागील पन्नास साठ फुटांच्या जंगला कडील भागाला जर काटेरी तारांचे उंच कुंपण घातले तर वाघाचे गावात येणे कायमचे बंद होईल असे मला वाटले. त्यामुळे मी वेंकन्नाला तसे सुचवतांच “त्यासाठी खूप मोठा खर्च येईल..” असे तो म्हणाला.

योगायोगाने त्याचवेळी आमच्या उतनूर स्टेट बॅंके भोवतीचे तारेचे जुने कुंपण काढून टाकून त्याजागी नवीन पक्क्या विटांचे कंपाउंड बांधण्याचे काम सुरू होते. काढून टाकलेल्या जुन्या गंजलेल्या लोखंडी काटेरी तारांचा भला मोठा ढिगारा बँकेमागे पडला होता. मॅनेजर साहेबांची परवानगी घेऊन मी त्या जुन्या तारा वेंकन्नाला देण्याची व्यवस्था केली. वेंकन्नाही मोठ्या आनंदाने त्या तारा आपल्या बैलगाडीत टाकून घरी घेऊन गेला.

त्या नंतर काही दिवसांनी पुन्हा पुलीमडगु गावात गेलो असता वेंकन्नाच्या घरामागील भागाला काटेरी तारांचे उंच कुंपण घातलेले पाहून समाधान वाटले. त्या जंगलात जाणाऱ्या पायवाटेला तर काटेरी तारे सोबतच जाडजूड लाकडी फळ्याही लावून मजबूत तटबंदी केली असल्याने तो वाघाच्या येण्याजाण्याचा मार्ग तर आता दृष्टीसही पडत नव्ह्ता.

त्यानंतर बरेच दिवस पुलीमडगु गावात वाघाच्या हल्ल्याची एकही घटना घडली नाही. वाघाची भीती नाहीशी झाल्यामुळे कामानिमित्त गावात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची वर्दळ वाढली होती. बंद पडलेली गावातील शाळा ही आता पूर्ववत सुरू झाली होती. मात्र आजकाल गावात सशस्त्र नक्षलवादी कमांडर उर्फ “अन्ना”, सर्रास उघडपणे वावरत असल्याची कुजबुजही आसपासच्या गावातील लोकांच्या तोंडून ऐकायला मिळत असे.

एकदा सकाळी सहा वाजता बँकेच्या कामानिमित्त प्युन रमेशला सोबत घेऊन उतनूर पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या शामपुर गावात कर्जवसुली संदर्भात एक बड्या कस्टमरला भेटण्यासाठी गेलो होतो. सुदैवाने आदीलाबादला निघालेला तो शामपुरचा कस्टमर त्याच्या घरा समोरच भेटला आणि आम्हाला पाहतांच ताबडतोब घरात जाऊन त्याने आपला कर्ज परतफेडीचा हप्ता सुद्धा आम्हाला आणून दिला.

मी घड्याळात पाहिलं तर त्यावेळी सकाळचे फक्त पावणे सातच वाजले होते. शामपुर गावात आता अन्य कोणतंही काम उरल नव्हतं. इथून पुलीमडगु गाव फक्त पाच किलोमीटर दूर होतं. त्यामुळे त्या गावात जाऊन वेंकन्नाला सहजच भेटून यावं असं ठरवलं.

तेलंगाणा, आंध्र प्रदेश मध्ये मुख्य रस्त्याला जिथे एक किंवा अनेक फाटे फुटतात, त्या ठिकाणाला (मग ती चौफुली असो वा टी पॉईंट), एक्स- रोड (X-Road) असे म्हणतात. पुलीमडगु गावाकडे जाणाऱ्या एक्स-रोड वरील एका छोट्याशा हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आम्ही थांबलो. हॉटेलातील डुगडुगणाऱ्या बाकड्यावर बसून आम्ही चहा घेत असतानाच रमेशने सहज मागे बघितलं आणि तो एकदम दचकला. माझा हात गच्च दाबून धरत तो हलकेच कुजबुजला..

“साब, पिछे अन्ना लोग बैठे है..! झटसे पलटकर पिछे मत देखो.. उनको डाउट आएगा.. आयडियासे, धीरे धीरे देखो..”utnoor

रमेशने एवढं जतावून सांगितलं तरी “अन्ना” मंडळींना पाहण्याची माझी उत्सुकता एव्हढी जबरदस्त होती की उतावीळपणे झटकन मान मागे वळवून मी त्यांच्याकडे बघितलंच. मागील टेबलावर आर्मी सारख्या हिरव्या रंगाचा, जाड कापडाचा पॅन्ट शर्ट घातलेले अत्यंत बेफिकीर चेहऱ्याचे, रापलेल्या काळ्या रंगाचे दोन तरुण चहा पित पित आपसात काहीतरी चर्चा करीत होते. त्यांच्या डोक्यावर खाणीतील कामगार वापरतात तशी काळपट हिरव्या रंगाची मेटलची गोल कॅप होती. कमरेला कापडी बेल्ट व पायात मिलीटरीचे जाडजूड भक्कम बूट घातलेल्या त्या दोघांनीही भरीव, झुपकेदार मिशा ठेवल्या होत्या.

ते दोघेही गप्पांत एवढे गुंगले होते की त्यांना आसपासचं भानच नव्हतं. अर्थात त्यामुळे त्यांचं अगदी जवळून आणि बारकाईनं निरीक्षण करण्याची आयती संधीच मला मिळाली. दोघांच्याही पाठीवर सॅक सारखी थैली बांधलेली असावी, कारण बाहेरून त्या सॅकचे खांद्यावरील पट्टे दिसत होते. त्यांच्या शर्ट पॅन्टला वरपासून खालपर्यंत भरपूर खिसे होते. एका “अन्ना” ने आपली लांब नळीची रायफल बाकड्याला टेकवून उभी केलेली होती तर दुसऱ्याच्या खांद्याला आखूड नळीची ऑटो लोडेड कार्बाईन गन लटकत होती. नंतर रमेशने सांगितले की, त्यांच्या पाठीवरील थैलीत तसेच शर्ट पॅन्टच्या मोठमोठया फुगीर खिशात वॉकी टॉकी, ट्रान्समिटर सेट, काडतुसे, हँड ग्रेनेड्स व डायनामाईटच्या कांड्या ठेवलेल्या असतात.

चहा पिऊन ते दोघे “अन्ना” काउंटरच्या दिशेने गेले. खांद्याला कार्बाईन गन लटकवलेला अन्ना हॉटेल मालकाला चहाचे पैसे देत असतानाच दुसरा अन्ना आपली जड रायफल घेऊन तिथे आला. त्याच्या दुसऱ्या हातात पांढऱ्या कापडाचं एक छोटंसं गाठोडं होतं. गोल आकाराच्या त्या गाठोड्यातून लाल रक्त बाहेर टपकत होतं. हॉटेल मालकानं त्या गाठोड्याकडे पहात विचारलं..

“काय आहे त्याच्यात..?”

डोळे बारीक करून, गंभीर, खुनशी स्वरात तो अन्ना म्हणाला..

“मुंडकं..!”

त्याचं हे उत्तर ऐकून हॉटेलमधील आम्हा सर्वांच्याच अंगावर भीतीने सरकन काटाच आला. तो हॉटेल मालकही घाबरून थोडासा चरकला. कुठून आपण ही नसती चौकधी केली, असं त्याला वाटलं. थरथर कापतंच त्यानं गळ्यात दाटून आलेला आवंढा कसाबसा गिळला. त्याची ती घाबरलेली अवस्था पाहून एकदम गडगडाटी विकट हास्य करीत तो अन्ना म्हणाला..

“अरे ! ऐसे डरो नहीं..!”

आणि मग ते रक्त टपकणारं गाठोडं उंच करून हॉटेल मालकाच्या डोळ्यांपुढे नाचवीत तो म्हणाला..

“माणसाचं नाही, बकऱ्याचं मुंडकं आहे ह्याच्यात..! काल आमच्या “क्रांती दलम्” चे एरिया कमांडर आले होते पुलीमडगु कॅम्प मध्ये.. त्यांच्यासाठी कापलं होतं हे बकरं..!”

असं म्हणून पुन्हा दणदणीत राक्षसी हास्य करीत हॉटेलच्या बाहेर पडून ते आपल्या मोटर सायकलवर स्वार झाले आणि नागापूर जंगलाच्या दिशेने निघून गेले.

अशारितीने अन्ना लोकांचं पहिलं वहिलं दर्शन मला झालं होतं. रमेशने सांगितलं की, पोलिसां कडून त्वरित ओळखलं जाण्याची भीती असल्याने हे अन्ना लोक असा युनिफॉर्म घालून व शस्त्रं घेऊन कधीही एकट्या दुकट्याने जंगला बाहेर पडत नाहीत. ते नेहमी सामान्य वेशांतच जनतेत वावरतात. कधी कधी नक्षलवाद्यांनी धमकी दिल्याची बनावट तक्रार घेऊन ते चक्क पोलीस ठाण्यातही जातात आणि पोलिसांच्या तयारीचा व पुढील हालचालींचा अंदाज घेतात.

काही काळ थांबलेला पुलीमडगु गावातील वाघाचा जीवघेणा धुमाकूळ पुन्हा सुरू झाला होता. दोन गावकरी व तीन पोलिसांचे शीर धडावेगळं केलेले क्षतविक्षत देह तेथील जंगलात आढळून आले होते. जनतेच्या वाढत्या आक्रोशामुळे पत्रकारांनी व राजकीय पुढाऱ्यांनी या प्रकरणी कसून पाठपुरावा केल्याने पोलिसांनी नक्षल्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. वेंकन्ना जरी पोलिसांचा खबऱ्या असला तरी नक्षल्यांनाही तोच आश्रय देतो व पोलिसांबद्दल बित्तंबातमी पुरवून त्यांना मदतही करतो, असा पोलिसांना संशय होता. त्यामुळे वेंकन्नाला अटक करून पोलिसांनी त्याची रवानगी लॉकअप मध्ये केली होती.

लवकरच जादा कुमक मागवून पोलिसांनी पुलीमडगु जंगल परिसरात व्यापक सर्च कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं. नक्षलवाद्यांचे अनेक तळ उध्वस्त करण्यात आले. त्या दरम्यान झालेल्या चकमकींत काही नक्षली ठार झाले तर बरेचसे पकडलेही गेले. उरलेले नक्षलवादी छत्तीसगड, झारखंड व महाराष्ट्राच्या गडचिरोली भागातील दाट जंगलात पळून गेले.

पोलिसांनी वेंकन्नाच्या घराची कसून झडती घेतली तेंव्हा त्याच्या घरात जमिनीखाली पुरलेला दारुगोळा, शस्त्रे, माओवादी क्रांतिकारी साहित्य व छुपा ट्रान्समिटर आढळून आला. अनेक कुख्यात नक्षली कमांडर्स सोबत असलेले त्याचे फोटोही पोलिसांना सापडले. त्यावरून वेंकन्ना हा जुना, प्रशिक्षित व हार्ड कोअर नक्षली असावा असा पोलिसांनी निष्कर्ष काढला. मात्र त्यानंतर अल्पावधीतच नक्षलींसाठीच्या सरकारी “आत्मसमर्पण योजने”त सहभागी होऊन धूर्त वेंकन्नाने नाममात्र शिक्षा भोगून आपली सुटका करून घेतली.

पुलीमडगु गावातील काही कस्टमर एकदा उतनूरला बँकेत आले असता त्यांनी सांगितलं की ज्या ज्या पोलिसांना व गावकऱ्यांना वेंकन्ना बद्दल संशय येत असे त्यांना नक्षल्यांच्या मदतीने वेंकन्ना यमसदनाला पाठवीत असे आणि वाघाने ओढून नेले असा कांगावा करीत असे. प्रत्यक्षात वेंकन्ना व्यतिरिक्त अन्य कुणीही त्या वाघाला आपल्या डोळ्यांनी कधी पाहिलं नव्हतं.

ग्रामीण बँकेचा फिल्ड ऑफिसर सूर्यकुमारला जंगलात फिरण्याचा छंद होता. असंच फिरत असताना एकदा त्याने पुलीमडगुच्या जंगलातील नक्षल्यांचा तळ पहिला आणि त्या तळावर वेंकन्नाला नक्षल्यांशी हास्यविनोद करतानाही पाहिलं. ही गोष्ट त्याने काही गावकऱ्यांच्याही कानावर घातली. वेंकन्नाला हे समजताच आपले बिंग फुटू नये म्हणून नक्षल्यांकरवी बिचाऱ्या सुर्यकुमारचा त्याने हकनाक बळी घेतला.

पुलीमडगुच्या गावकऱ्यांच्या तोंडून हे वास्तव ऐकताच स्वार्थी, दुष्ट वेंकन्ना बद्दल आम्हा सर्वांच्या मनात तीव्र चीड, तिरस्कार व घृणा निर्माण झाली.

त्या गावकऱ्यांनी अशीही माहिती पुरवली की, वेंकन्नाने घरामागील जंगलाकडे जाणाऱ्या वाटेला फळ्या व काटेरी तारांचे जे कुंपण लावले होते तेही प्रत्यक्षात फसवेच होते. सहजपणे हातांनी उचलून तो कुंपणाचा भाग बाजूला ठेवता येत असे. वेंकन्ना रोज रात्री ते कुंपण बाजूला करून नक्षल्यांसाठी जंगलचा रस्ता खुला करून ठेवत असे.

पुलीमडगु भागातील नक्षल्यांचा तात्पुरता बिमोड झाला असला तरी जीवावर उदार झालेले, झुंजार व अतिशय चिवट नक्षली असे सहजासहजी हार मानणारे नव्हते. आत्मसमर्पण केलेल्या वेंकन्नावर तर त्यांचा विशेष राग होता. वेंकन्नाने पोलिसांना पुरवलेल्या अचूक माहितीमुळेच त्या भागातील नक्षल्यांचे मजबूत जाळे पोलीस एवढ्या सहजपणे उध्वस्त करू शकले, असा त्यांचा संशय होता.

“विश्वासघातकी वेंकन्नाला लवकरच गद्दारीची सजा दिली जाईल..” अशा आशयाच्या ठळक लाल अक्षरातील घोषणा लवकरच पुलीमडगुच्या घराघरांवर लिहिलेल्या दिसू लागल्या. नक्षलवादी त्या भागात पुन्हा सक्रिय होऊ लागल्याचीच ती चिन्हे होती.

घाबरलेल्या वेंकन्नाने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली. वेंकन्नाच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी पुलीमडगु गावात एक पर्मनंट चौकीच स्थापित केली.

एके दिवशी नक्षल्यांनी हँड ग्रेनेड्सचा तुफान मारा करून वेंकन्नाचे घर उध्वस्त करून टाकले. सुदैवाने वेंकन्ना त्यावेळी गावातील पोलीस चौकीतच बसला असल्याने त्या हल्ल्यातून बालंबाल बचावला. मात्र आता तो सावध झाला. पुलीमडगु गाव कायमचे सोडण्याचा त्याने निर्णय घेतला. गावातील आपली जमीन व राहते घर येईल त्या किमतीला त्याने विकून टाकले. तसंच आमच्या बँकेत येऊन आपल्या बचत खात्यातील सर्व पैसे काढून घेऊन त्याने खाते बंद केले.

“आजच दुपारी पोलीस बंदोबस्तात करीम नगरला कायम वास्तव्यासाठी जाणार आहे..”

असेही आमचा निरोप घेताना तो म्हणाला.

उतनूर-करीमनगर रोड वरील निर्मल- मंचेरियाल बॉर्डर जवळील इंधनपल्ली फाट्यापर्यंत पोलीसांनी वेंकन्नाला आपल्या जीपने सोडले. वेंकन्नाची पत्नी, मुले व भाऊ त्याला घेण्यासाठी इंधनपल्ली पर्यंत आले होते. पोलिसांचा निरोप घेऊन आपल्या कुटुंबियांसह वेंकन्ना करीमनगरला जाणाऱ्या बसमध्ये बसला.

त्याच दिवशी संध्याकाळी वेंकन्नाची पत्नी, मुले व भाऊ आक्रोश करीत उतनूर पोलीस स्टेशन मध्ये आली. इंधनपल्लीहून थोडं पुढे जाताच सशस्त्र नक्षलवाद्यांनी बस अडवून वेंकन्नाला जबरदस्तीने खाली उतरवून घेतल्याचे ते सांगत होते. पोलिसांनी ताबडतोब इंधनपल्लीच्या ग्रे-हाउंड (Greyhound) नावाच्या नक्षल विरोधी स्पेशल टास्क फोर्सशी संपर्क साधून त्यांना झालेल्या घटनेची माहिती दिली आणि वेंकन्नाचा तांतडीने शोध घेण्यास सांगितले.

त्यानंतर दोन दिवस वेंकन्नाचा काहीच थांगपत्ता लागला नाही.

1873124 death

तिसऱ्या दिवशी वेंकन्नाचा छिन्नविच्छिन्न, रक्तबंबाळ, शीर विरहित देह पुलीमडगु गावातील त्याच्या उध्वस्त घरावर फेकून दिलेला आढळून आला..

(क्रमश:)

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

उतनूरचे दिवस-1-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

tiger at night

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

Memories-at-Utnoor-1

*उतनूरचे दिवस..*

*थरार… (१)*

उतनूरचा अवघा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला होता. उंच सखोल डोंगर दऱ्यांच्या मधून जाणाऱ्या अरुंद, निर्मनुष्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या हिरव्यागार पानांचे विशाल उत्तुंग सागवृक्ष होते.

teak forest

 भर दुपारी या सागवृक्षांच्या गर्द सावल्या रस्त्यावर पडल्या की सूर्य प्रकाश अंधुक होऊन संध्याकाळ झाल्याचा भास होत असे. हिंस्त्र, रानटी पशुंचा या जंगलात मुक्त वावर असल्याने त्यांच्या भयामुळे दुपारनंतर रस्त्यावरील रहदारी मंदावत असे. संध्याकाळ नंतर तर कुणीही या रस्त्याने जाण्याचे धाडस करीत नसे.utnoor-8

उतनूरला येऊन मला आता दोन महिने होत आले होते. इथल्या शांत, सुंदर, निसर्गरम्य वातावरणात मी आता चांगलाच रमलो होतो. फक्त दीड ते दोन किलोमीटर लांब रुंद पसरलेल्या त्या छोट्याशा गावाची लोकसंख्या जेमतेम दहा हजार इतकी असावी. तालुक्याचे ठिकाण असल्याने राज्य सरकारच्या सर्व विभागांची कार्यालये तिथे होती. वनक्षेत्र असल्याने फॉरेस्ट खाते तसेच आदिवासी क्षेत्र असल्याने “एकात्मिक आदिवासी विकास संस्था” (Integrated Tribal Development Agency – ITDA) यांची कार्यालयेही त्या गावात होती.

उतनूरच्या ITDA कडे गावातील बराच मोठा भूभाग होता, ज्यावर बोटॅनिकल गार्डन, मधुमक्षिका पालन, रेशीम उत्पादन व ससे प्रजनन (rabbit breeding) असे विविध प्रकल्प राबविले जात. माझा अडीच वर्षांचा मुलगा चि. अनिशला खेळण्यासाठी पांढऱ्याशुभ्र सशांची दोन गोजिरवाणी पिल्ले येथीलच ससे पालन केंद्रातून मी विकत आणली होती.two white rabbits

मी रहात असलेल्या घराला कंपाऊंड वॉल असली तरी कंपाउंडच्या चारी बाजूला भरपूर मोकळी जागा होती. या जागेत वावरणारे नाग, साप, विंचू असे अनेक विषारी, घातक प्राणी नेहमीच कंपाऊंडच्या गेट मधून आत घुसून अंगणात तसेच दरवाज्या समोरील पायऱ्यांवर निर्धास्तपणे पहुडलेले दिसायचे. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहणे जितके आनंददायी तितकेच धोकादायक सुद्धा आहे याची जाणीव होत होती.

सशाची पिल्ले आणण्यापूर्वी चि. अनिश साठी एक मांजराचं पिल्लूही मी घरी आणलं होतं. शेजारीच राहणाऱ्या माझ्या घरमालकाकडे पूर्वीपासूनच एक धिप्पाड कोंबडी पाळलेली होती. त्याच सुमारास घरमालकाचा मुलगा एकदा जंगलातून मोराचं अंडं घेऊन आला. त्या पाळलेल्या कोंबडीने ते अंडं उबवलं आणि एक देखणं मोराचं पिल्लू त्यातून बाहेर आलं.hen

घराच्या गच्चीवर भलं मोठं पाण्याचं टाकं होतं. वेगवेगळ्या जातीचे मासे, खेकडे, विचित्र दिसणारे बेडूक त्या टाक्यात होते. रस्त्याच्या कडेने जात असलेली कासवाची तीन पिल्लेही एकदा घरमालकाच्या त्या मुलाने उचलून आणून त्या टाकीतील पाण्यात सोडली होती. घराभोवतीच्या अंगणात गोडलिंब, शेवगा, गुलमोहर अशी झाडे तसेच गुलाब, चाफा, केवडा, मोगरा, कर्दळी आणि विविधरंगी आकर्षक रानटी फुलांची झाडे होती. निसर्गातील अवघा फ्लोरा आणि फौना (flora & fauna) जणू आमच्या त्या छोट्याशा जागेत एकवटला होता.

जवळपासच्या शेतांतील गलेलठ्ठ उंदीर रोजच रात्री घराच्या व्हेंटिलेटरच्या खिडकीतून आत घुसून खुडबुड करायचे. त्यांच्या मागोमाग त्यांची शिकार करण्यासाठी साप, नाग व रानमांजरं सुद्धा कंपाऊंड मध्ये शिरायची. एकदा एक दहा फूट लांबीचा जाडजूड काळा कभिन्न नाग घरामागील बाथरूम जवळ दिसून आला. आसपास राहणाऱ्या सर्व लोकांनी आरडाओरडा करीत जमून त्याला मारण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते जनावर खूपच चपळ होते. आम्हा सर्वांचे लाठ्या काठ्यांचे प्रहार चुकवीत क्षणार्धात तो नाग एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे विजेच्या वेगाने सळसळत जायचा. कधी चिडून फणा काढून “हिस्स” असा फुत्कार सोडायचा तर कधी एखाद्या फुलांच्या कुंडीमागे बेमालूमपणे असा निपचित पडून राहायचा की जणू तो हवेतच विरून अदृश्यच झाला असावा असा भास व्हायचा. अखेरीस सगळ्यांना गुंगारा देऊन तो भुजंग अंगणातच कुठेतरी काट्याकुट्यात जो दडून बसला तो शेवटपर्यंत कुणालाच सापडला नाही.

माझा एलटीसी (Leave Travel Concession) चा ब्लॉक 15 डिसेंम्बरला expire होत असल्याने दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यात फिरून येण्याचे ठरवले. योगायोगाने त्याच सुमारास माझे आई, वडील, भाऊ व वहिनी आपल्या मुलांसह मला भेटण्यासाठी उतनूरला आले होते. तेंव्हा त्यांनाही सोबत घेऊनच ही दक्षिण भारताची सहल करावी असे ठरवले. त्यानुसार प्रवासासाठी गावातीलच एक टेम्पो ट्रॅक्स गाडी ठरवली आणि येत्या रविवारी दुपारी बारा वाजता उतनूर हून निघून संध्याकाळ पर्यंत हैदराबादला पोहोचायचे असा प्लॅन केला.

ठरल्याप्रमाणे रविवारी दुपारचे बारा वाजण्यापूर्वीच जेवणं खाणं आटोपून आम्ही सारे गाडीची वाट पहात बसलो. मात्र, सकाळी सर्व्हिसिंग साठी आदीलाबादला गेलेली गाडी संध्याकाळ झाली तरी उतनूरला परत आली नव्हती. शेवटी वाट पाहून कंटाळून आम्ही रात्रीची जेवणंही उरकून घेतली. रात्री आठ वाजता गाडी गावात परतली. गाडीच्या मागच्या दरवाजाचे काम अजूनही अर्धवटच राहीले असल्याने तो उघडाच ठेवावा लागत होता. त्यामुळे सोमवारी पुन्हा आदीलाबादला जाऊन दरवाजाचे हे काम पूर्ण करावे आणि मंगळवारी प्रवासाला निघावे किंवा आजच लगेच हैदराबादला निघावे आणि दरवाजाचे राहिलेले काम उद्या म्हणजे सोमवारी हैदराबाद इथेच करून घ्यावे असे दोन पर्याय ड्रायव्हर कृष्णाने आमच्यापुढे ठेवले.

आधीच मोठ्या मुश्किलीने मला आठ दिवसांची सुट्टी मंजूर झाली होती. त्यामुळे इथे थांबून दिवस वाया घालवण्यापेक्षा आत्ता लगेच निघून उद्या सकाळपर्यंत हैद्राबादला पोहोचावे असा निर्णय घेतला. रात्री नऊ वाजता आम्ही गावातून निघालो. मी समोरच्या सीटवर ड्रायव्हर शेजारी बसलो होतो. गावापासून जेमतेम दोन किलोमीटर दूर गेल्यावर लगेच तुरळक जंगलाला सुरवात झाली. छान टिपूर चांदणं पडलं होतं. त्याच्या चंदेरी प्रकाशात रस्ता उजळून निघाला होता. नुकतीच दिवाळी होऊन गेलेली होती. नोव्हेंबर महिना असला तरी थंडीला अजून सुरवात झालेली नव्हती. बाहेरील वातावरण उबदार आणि अत्यंत सुखद होतं. लहान मुलांची बडबड आणि आमच्या आपसातील गप्पा ह्याच्या नादात आम्ही दाट किर्र, निबिड भयाण जंगलात कधी प्रवेश केला ते ध्यानातही आलं नाही.

जंगलातील त्या सुनसान रस्त्यावरून आमची गाडी सुसाट वेगाने पळत होती. गाडीचा मागील दरवाजा उघडाच असल्याने त्यातून अधून मधून वारा आत घुसत असे. बाहेर एवढा मिट्ट काळोख होता की गाडीच्या लांबवर जाणाऱ्या प्रकाश झोतात दिसणारा निर्मनुष्य रस्ता सोडला तर आजूबाजूचं काहीही दिसत नव्हतं. आपण एखाद्या अतिखोल, अंधाऱ्या विवरातून किंवा कधीही न संपणाऱ्या एकाकी,भीषण काळोख्या बोगद्यातूनच प्रवास करीत आहोत असा भास होत होता. बाहेर सर्वत्रच अस्वस्थ, भयावह आणि गूढ शांतता पसरली होती. मुलांची बडबड आणि आमच्या गप्पा आता आपोआपच थांबल्या होत्या. फक्त चालत्या गाडीच्या इंजिनाचा आवाजच त्या भयाण शांततेचा भंग करीत होता.forest

आमच्या गाडीचा ड्रायव्हर कृष्णा हा अंदाजे पंचवीस वर्षे वयाचा हसमुख, उमदा तरुण होता. आतापर्यंत तो ही आमच्या गप्पांत अधून मधून भाग घेत होता, प्रवासातील मनोरंजक अनुभव, किस्से आम्हाला सांगत होता. मात्र हे घोर घनदाट जंगल सुरू होताच तोही निःशब्द होऊन अतिशय सावध नजरेने अवतीभवती पहात काळजीपूर्वक गाडी पुढे नेत होता. एखादा धांदरट, घाबरट ससा मधेच टुणकन उडी मारून रस्ता ओलांडून जायचा तर कधी एखादा बुटकासा कोल्हा तिरप्या मानेने गाडीकडे पहात पहात चपळाईने रस्ता क्रॉस करून पलीकडच्या झाडीत अदृश्य व्हायचा. कितीतरी छोटे मोठे साप नागमोडी वळणं घेत लगबगीने वळवळत गाडीच्या चाकांना चुकवत बाजूच्या काळोखात गडप व्हायचे तर माकडे, हरीण, मोर यासारखे प्राणी रस्त्याच्या कडेला थांबून आमची गाडी निघून जायची वाट पहात असलेले दिसायचे.

रस्ता जसा जसा जास्त दाट अरण्यातून जात होता तशी तशी रातकिड्यांची किरकिर वाढलेली जाणवत होती. दूर जंगलातून रानटी कुत्रे, लांडगे, तरस यांच्या टोळ्यांचे भेसूर आवाजातील हेल काढून एकसुरात सामूहिक रडणे, ओरडणे ऐकू येत होते. उंच झाडाच्या फांदीवर बसलेला एखादा टिटवी सारखा पक्षी साऱ्या आसमंतात घुमणारी कर्णकटु सांकेतिक शीळ घालायचा तेंव्हा तो कुणाला तरी इशारा करतोय किंवा आम्हाला सावध तरी करतोय असं वाटायचं. अचानक मधूनच अनोळख्या जंगली श्वापदाचा जीवघेणा आर्त चित्कार कानावर पडायचा आणि काळजाचं पाणी पाणी व्हायचं. आपण विनाकारणच जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी अशा सुनसान भीतीदायक जंगलातून प्रवास करण्याचा मूर्खपणाचा निर्णय का घेतला याचा आम्हा सर्वांनाच आता मनोमन पश्चाताप होत होता.

आमच्या डोळ्यांतील झोप तर पार उडाली होती. मुलंही कावऱ्या बावऱ्या चेहऱ्यानं समोरच्या डांबरी रस्त्यावर नजर खिळवून भयमिश्रित कुतूहलाने श्वास रोखून बसली होती. काहीतरी आगळं वेगळं, अप्रत्याशित, अकल्पित घडणार आहे किंवा पहायला तरी मिळणार आहे अशी अंतर्मन सतत सूचना देत होतं. आम्ही जिथून जात होतो तो अवघा परिसरच मंतरलेला, जादूने भारलेला, फसवा, मायावी वाटत होता..

अचानक अनुभवी कृष्णाच्या सावध नजरेनं दूर अंतरावरील सागवृक्षांच्या विशाल पानांमागची कसली तरी हालचाल टिपली. गाडीचा वेग कमी करत त्यानं रस्त्याच्या मधोमध गाडी उभी केली. रस्त्यावर कुणीच नव्हतं. मी कृष्णाला काही विचारणार इतक्यात त्यानं तोंडावर बोट ठेवीत मला शांत राहण्याची खूण केली. त्यानंतर तब्बल तीन चार मिनिटं आम्ही सारे तोंडातून एक शब्दही बाहेर न काढता, कसलीही हालचाल न करता रिकाम्या रस्त्याकडे पहात तसेच आपल्या जागी बसून होतो. डोळे फाडफाडून बघितलं तरी आम्हाला कुठेही काहीच दिसत नव्हतं. कृष्णाची नजर मात्र उजव्या बाजूच्या खोलगट जंगलाकडेच रोखलेली होती. अशीच आणखी दोन तीन मिनिटं स्तब्धतेत गेली. माझा संयम आता सुटू लागला होता..

“आपण कशासाठी थांबलो आहोत इथं..?”

अखेर न राहवून मधल्या सीटवर बसलेल्या माझ्या मोठ्या वहिनींनी अस्पष्ट, कुजबुजत्या हलक्या सुरात विचारलंच..

कृष्णानं मागे वळून दोन्ही हात जोडून त्यांना “अजिबात बोलू नका.. शांत राहून पुढे पहात रहा..” अशी बोटानंच खूण केली. तोच..

बाजूच्या खोलगट भागातून दमदार मंदगती पावले टाकीत एक रुबाबदार, अंगावर काळे पिवळे पट्टे असलेला, धष्टपुष्ट वाघ हळूहळू प्रगट झाला. आमच्या गाडीकडे नजर रोखून डौलदार चालीत आपलं एक एक ठाम पाऊल अगदी सावकाशपणे उचलीत अंदाजे आठ ते नऊ फूट लांबीचं ते राजबिंडं जनावर रस्त्याच्या मध्यभागी येऊन आमच्याकडे एकटक पहात स्तब्ध उभं राहिलं. त्याचा पिंगट, तांबूस, तपकिरी पिवळा रंग गाडीच्या हेड लाईट्स च्या प्रकाशात सोन्यासारखा चमचमत होता. त्यावरील दाट काळ्या रंगाचे तिरपे उभे पट्टे तर अतिशयच खुलून दिसत होते. शौर्य आणि सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेला तो जंगलचा अनभिषिक्त राजा एखाद्या अप्रतिम अलौकिक शिल्पासारखा आमच्या पुढे उभा होता. अनिमिष नेत्रांनी, अवाक् होऊन आम्ही सारे ते दृश्य पहात होतो. ब्युटी क्वीन काँटेस्ट मधील सौंदर्यवती तरुणी रॅम्प वॉक करताना थोडंसं चालून क्षणभर थांबते आणि मग वळून परत फिरण्याआधी कमरेवर हात ठेवून एक पोझ देते ना, अगदी तस्साच तो वाघ आम्हाला पोझ देतो आहे असंही क्षणभर वाटून गेलं.tiger at night

तो धिप्पाड देखणा वाघ गाडीच्या हेड लाईट्स च्या प्रखर प्रकाश झोतासमोर सिनेमातील एखाद्या हिरो सारखा स्टायलिशपणे आम्हाला आव्हान देत उभा होता. अंधाराला सरावलेल्या त्याच्या डोळ्यांवर एवढा सर्च लाईट सारखा पॉवरफुल प्रकाश पडूनही त्याचे डोळे दिपून गेल्याचे अजिबात जाणवत नव्हते.tiger staring

त्यावरून त्याला अशा प्रकाशाची सवय असावी असे वाटत होते. अद्यापही तो डोळे मोठे करून आमच्या गाडीकडेच निरखून पहात होता. मनात विचार आला.. त्या वाघाला गाडीत बसलेले आम्ही सारे दिसत असू का ?

त्या वाघाच्या अशा अचानक रस्त्यावर येण्यामुळे आजूबाजूच्या वातावरणातही एक अनोखा बदल घडून आल्याचा भास होत होता. पक्ष्यांचा कलकलाट, किलबिलाट, प्राण्यांचे हुंकार, चित्कार अचानक थांबले होते. रातकिड्यांची किरकिरही आता ऐकू येत नव्हती. एवढंच काय, सळसळत वाहणारा रानवारा देखील अगदी स्तब्ध, थंड झाला होता. जणू जंगलातील सारे प्राणी, पक्षी, कीटक, जंतू, वृक्ष, वनस्पती आणि वारा देखील श्वास रोखून आता पुढे काय होतंय याची उत्सुकतेने प्रतीक्षा करीत आहेत असं वाटत होतं.

आम्हा सर्वांचे डोळे त्या व्याघ्रराजा वर घट्ट खिळले असले तरी ड्रायव्हर कृष्णाची सावध नजर मात्र अवती भवतीचा कानोसा घेत होती. कुणाला नकळत माझ्या हाताला हलकासा चिमटा घेऊन त्यानं मला त्याच्या जवळ सरकण्याची खूण केली. त्यानुसार मी त्याच्या जवळ सरकल्यावर तो माझ्या कानात कुजबुजत म्हणाला..

“किसीं को समझे बगैर, आपकी बाजूवाले साईड मिरर में झांक के, रस्तेके पीछे की ओर देखो.. और प्ली sss ज, मुंह बिल्कुल बंद रख्खो.. किसी को कुछ भी पता न चले..”

डाव्या बाजूला सरकून मी साईड मिरर मध्ये डोकावलं. तिथे मला काहीतरी हालचाल दिसली. दोन तीन लहान मोठ्या आकृत्या रस्त्यावर बसल्या सारखं दिसत होतं. ते नेमकं काय आहे याची नीट, स्पष्ट कल्पना न आल्यामुळे अभावितपणे मी चक्क मान मागे वळवून गाडीच्या मागील बाजूच्या रस्त्याकडे बघितलं. गाडीचा मागचा नादुरुस्त दरवाजा तसाच सताड उघडा होता. त्यावेळी तिथे मला जे दृश्य दिसलं ते पाहून भीतीने माझी बोबडीच वळली.

आमच्या गाडीच्या मागे जेमतेम पंचवीस तीस फुटांवर एक अजस्त्र आकाराची वाघीण आपल्या दोन लहान बछड्यांसहित आरामात रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसली होती. एवढंच नाही तर त्या वाघिणीच्या मागील बाजूने आणखी दोन मध्यम आकाराचे तरुण वाघ खालच्या खोलगट जंगलातून रस्त्याच्या दिशेने येत होते. जणू त्या वाघाच्या संपूर्ण फॅमिलीनेच आम्हाला पूर्णपणे घेरून टाकलं होतं.

बापरे ! गाडीच्या मागच्या भागात बायका आणि लहान मुलं बसलेली आहेत आणि दुर्दैवाने गाडीचा मागील दरवाजा बिघडला असल्याने बंद करता येत नाहीए.. चुकून आमच्यापैकी कुणी मागे पाहिलं आणि हे दृश्य पाहून त्यांनी आरडा ओरडा केला तर ? ही क्रूर, चपळ श्वापदं आमच्या गोंगाटानं जर बिथरली तर केवळ एका झेपेतच ती आमच्या पर्यंत पोहोचू शकतील या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आला.

सुदैवाने मी व ड्रायव्हर कृष्णा वगळता गाडीतील अन्य सर्वजण समोर दिसणाऱ्या त्या दिव्य व्याघ्रमूर्ती कडे एकटक पाहण्यात एवढे गुंग होऊन गेले होते की आणखी कुठेही पाहण्याचे त्यांना भानच नव्हते. माझी घाबरलेली अवस्था कृष्णाने ओळखली. अर्थात आंतून तोही माझ्या इतकाच घाबरलेला असावा. तरीही मला धीर देत हलकेच कुजबुजत तो म्हणाला..

“सब्र रखो साब..! सिर्फ शांति बनाए रखो.. सब ठीक हो जाएगा..!”

एकमेकांच्या आमने सामने उभे ठाकलेले गाडीतील आम्ही आणि तो वाघ.. जणू परस्परांना जोखत होतो, दुसऱ्याच्या शक्तीचा, संयमाचा, पुढील हालचालीचा अंदाज घेत होतो. पलीकडून, वाट अडवून उभा असलेल्या त्या वाघाच्या मागून, विरुद्ध दिशेने एखादी गाडी यावी आणि आमची या डेड लॉक मधून सुटका व्हावी असाच मनोमन देवाचा धावा करीत होतो. जसाजसा वेळ निघत चालला होता तसातसा माझा धीरही सुटत चालला होता. गाडीच्या मागे जमा झालेलं वाघाचं ते आख्खं कुटुंब आत्ता नेमकं काय करतं आहे हे पाहण्याचं तर किंचितही धैर्य माझ्यात उरलं नव्हतं. भीतीनं व्याकुळ होऊन गाडी तशीच पुढे दामटण्याची ड्रायव्हर कृष्णाला मी कासावीस नजरेनंच विनंती केली. मात्र कृष्णा कडे जबरदस्त संयम होता. कदाचित यापूर्वीही अशा प्रसंगांतून तो गेलेला असावा. “धीर धरा.. शांत रहा.. मी आहे ना..” अशी त्याने डोळे व हातांनी मला खूण केली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून गाडीतील स्त्रिया आणि मुलं यांनी देखील आतापर्यंत जे सावध, घट्ट मौन धारण केलं होतं ते सुद्धा खरोखरीच कौतुकास्पदच होतं.

आमच्या सुदैवाने वाघालाच आता या स्टेलमेटचा कंटाळा आला असावा. पुढील पाय लांबवून कंबर झुकवून शरीराला आळोखे पिळोखे देत त्याने एक दीर्घ आळस दिला. अचानक त्याच्या चेहऱ्यावरील निर्विकार भाव बदलून त्याजागी दुष्ट, क्रूर, हिंस्त्र, शिकारी भाव दिसू लागले. थोडं पुढे सरकून तो रस्त्याच्या कडेला गेला आणि अचानक त्यानं आपला रोख गाडीच्या दिशेनं केला. तो आता आमच्यावर हल्ला करण्याच्याच तयारीत आहे अशी माझी जवळ जवळ खात्रीच झाली. त्याचवेळी जवळच्या झाडावरील माकडांनी अचानक भयसूचक गोंगाट करायला सुरुवात केली. कुण्या अनोळखी पक्ष्याची भयावह, थरकांप उडवणारी किंकाळी सदृश कर्णभेदक तान लकेर एकाएकी आसमंतात घुमली. अचानक माजलेल्या या कोलाहलामुळे त्या वाघाचे लक्ष जरासे विचलित झाले. हाच इशारा, हीच योग्य वेळ समजून अगदी त्याचवेळी कृष्णाने एक्सलरेटर दाबून भरधाव वेगानं गाडी पुढे काढली.

त्यानंतर सतत तासभर, एखादं भूत पाठीमागे लागल्यागत, जराही मागे वळून न पाहता, वारं प्यालेल्या वासरा सारखा कृष्णा गाडी पुढे पुढे दामटीत होता. नंतर जाणवलं की नोव्हेंबरच्या त्या थंडीतही गाडीतील आम्ही सारे जण भीतीने घामाघूम झालो होतो. अतिनिकट, खुल्या व्याघ्रदर्शनाच्या त्या विलक्षण रोमांचक, जिवंत अनुभवामुळे एखादं दुष्ट स्वप्न पाहिल्यागत आम्ही सारे इतके भयचकित, मुग्ध, अबोल बनलो होतो की त्या घटनेबद्दल साधी चर्चा करण्याइतकी हिम्मत देखील आम्हा कुणामध्येच उरली नव्हती.

दुसऱ्या दिवशी सकाळी हैद्राबादला पोहोचल्यावर सर्वप्रथम गाडीचा मागील दरवाजा तातडीने रिपेअर करून घेतला.

श्रीशैल्यम्, तिरुपती, मदुराई, रामेश्वरम्, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम्, उटी, म्हैसूर, बेंगलोर, हैद्राबाद अशी आठ दहा दिवसांची दक्षिण भारत सहल आटोपून उतनूरला परतलो. नंतर सहज एकदा आमचा बँकेतील अष्टपैलू व हरहुन्नरी प्युन रमेशला उतनूरच्या जंगलातील व्याघ्र दर्शनाबद्दल सांगितलं तेंव्हा तो म्हणाला..

“यहाँ जंगलमें रात के समय शेर का दिख जाना तो आम बात है। लेकिन यहां एक गांव ऐसा भी है जहाँ शेर दिनदहाड़े गांव में घुस जाता है। हमारे कुछ पुराने कर्जदार उस गांव में रहते है। चलो, कल हम आप को उस गांव में ले चलते है..! और.. सच कहूं तो साब, आपने अब तक “असली शेर” तो देखा ही नही है.. !!”

“असली शेर ? मैं कुछ समझा नही..?”

बुचकळ्यात पडून मी विचारलं..

त्यावर गूढ हसत रमेश म्हणाला..

“असली शेर याने “अन्ना..” ! वो खूंखार नक्सलाईट लोग, जिनका सिर्फ नाम सुनते ही इस पूरे एरिया के लोगोंको सांप सूंघ जाता है.. उन से भी मुलाकात होगी आपकी कभी ना कभी.. लेकिन फिलहाल.. याने की कल.. हम चलेंगे शेरों के गांव.. पुलीमडगु.. !!”

(क्रमशः 2)

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.