https://goodworld.in A website by Madhav Bhope

Learning journey-4

dattatreya

Life is a learning journey. जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे. आपल्याला आपल्या जीवनात अनेक माणसे भेटतात. अनेकांशी कामानिमित्ताने अगदी जवळचा संबंध येतो. खरे तर आपल्या घरच्या लोकांपेक्षाही आपण जिथे काम करतो तिथल्या आपल्या सहकाऱ्यांसोबत आपण जास्त वेळ असतो.

दत्तात्रेयाने जसे 24 गुरू केले होते, आणि प्रत्येकाकडून काही ना काही गुण घेतले होते तसे प्रत्येकामध्ये काही काही गुण प्रकर्षाने दिसून येतात. ते आत्मसात करता आले तर खूप चांगले. नाही आले तरी आपल्याला एक बेंचमार्क बघायला मिळतो आणि काही प्रमाणात का होईना, ते गुण कळत नकळत आपल्यात येतात.

यापूर्वी अशा काही व्यक्तींविषयी लिहिले. आज अजून काही सहकाऱ्यांबद्दल लिहायचा विचार आहे.

  1. श्री सुभाष व्यवहारे

subhash vyavhare

एखाद्या माणसाची कामाप्रति निष्ठा कशी असावी, याचे चालते बोलते उदाहरण म्हणजे सुभाष व्यवहारे. मी पाथरी कृषि विकास शाखेला असतांना सुभाष व्यवहारे तिथे दफ्तरी म्हणून होते. अगदी टाप टीप राहणी, कपडे नेहमी नीट नेटके, आणि बँकेचा पांढरा गणवेश नेहमी न चुकता घालून येत, आणि वेळेच्या आधी नेहमी बँकेत हजर. बोलणे नेहमी अदबशीर. कधीही न सांगता सुट्टी घेत नसत. खूप आधी पूर्वकल्पना देऊन, आवश्यक असेल तेंव्हाच सुट्टी घेत. सुभाष व्यवहारेचा सगळ्यात मोठा गुण म्हणजे रेकॉर्ड ठेवण्याची त्यांची पद्धत. बँकेचे अनेक वर्षांचे रेकॉर्ड, ज्याच्यात रोजच्या व्हाऊचरपासून, ते मागील पूर्ण पत्रव्यवहार, बँकेचे असंख्य सर्क्युलर्स, वेगवेगळ्या विषयांच्या फाइली, या सर्व गोष्टींचा समावेश असे. या बाबतीत सुभाष व्यवहारेने तिथे आल्यावर, मागील सर्व सर्क्युलर्स, विषयाप्रमाणे आणि वर्षाप्रमाणे नीट लावून घेतले, आणि त्यांना बुक बाईंडर ला बोलावून त्याच्याकडून पक्के बाईंडिंग करून घेतले, आणि प्रत्येक फाइलवर त्या त्या सेरीजचे नाव आणि वर्ष सुवाच्च अक्षरात टाकून, त्या सर्व फाइल्स क्रमाने लावून ठेवल्या होत्या. त्यामुळे आम्हाला जुन्या कुठल्याही सर्क्युलर चा संदर्भ पाहिजे असेल तेंव्हा सुभाष व्यवहारे ते सर्क्युलर लगेच काढून देत. त्यामुळे इतर कुठल्या ब्रांचलाही, इतकेच नव्हे, तर कधी कधी रिजन ऑफिस ला ही एखादा जुना संदर्भ पाहिजे असेल, तर ते आमच्या ब्रांच ला फोन करत, कारण सुभाष व्यवहारे ते पटकन काढून देतील याविषयी त्यांना खात्री असे. तसेच रोज लागणारे वेगवेगळे फॉर्म्सही सुभाष यांनी अगदी व्यवस्थित लावून ठेवलेले असत. त्यामुळे फॉर्म शोधण्यात वेळ जात नसे.

अव्यवस्थितपणा त्यांना अजिबात खपत नसे. आपल्या कामाबद्दल त्यांना रास्त अभिमान होता, आणि हे सर्व काम व्यवस्थित करण्यास कितीही उशिरापर्यन्त थांबावे लागले, तरी त्यांची तयारी असे. या त्यांच्या गुणामुळे, मला, पाथरीला असतांना याबाबतीत खूप मदत झाली.

नंतर 2010 ते 2015 मी जेंव्हा ट्रेनिंग सेंटरला होतो, तेंव्हा, आम्ही मधून मधून subordinate staff साठी ट्रेनिंग प्रोग्राम घ्यायचो. तेंव्हा काही प्रोग्राम्स मध्ये मी मुद्दाम सुभाष व्यवहारे यांना बोलावून, एक पूर्ण सेशन, रेकॉर्ड कसे नीट ठेवावे, या विषयी त्यांच्याकडून प्रात्यक्षिक दाखवून घेत असे, त्यावेळी ते योगा योगाने, औरंगाबादच्याच एका ब्रांचला होते. ते त्यांच्या सोबत, काही फाइली घेऊन येत आणि  त्यांनी तेथील ब्रांचचे व्हाऊचर्स कसे stitch केले आहेत  फाइली कशा प्रकारे ठेवल्या आहेत, या विषयी सविस्तर सांगत. अशा प्रकारे मी ज्यांच्या सोबत काम केले, त्यापैकी सुभाष व्यवहारे हे व्यक्तिमत्व एक सभ्य, सुसंस्कृत, कामाप्रति अढळ निष्ठा असणारे व्यक्तिमत्व हे माझ्या कायम लक्षात राहिले आहे.

  1. श्री पी. एम. बुरांडे

श्री पी. एम. बुरांडे(प्रभाकर बुरांडे)  हे व्यक्तिमत्व सुद्धा, बऱ्याच अंशी श्री सुभाष व्यवहारे यांच्या सारखेच होते. वरील सर्व गुण हे त्यांच्यातही अगदी जसेच्या तसे होते म्हटले तरी चालेल. 1998 ते 2001 मधील अडीच वर्षांच्या काळात मी औरंगाबाद येथील स्टेशन रोड ब्रांचला होतो. त्यावेळी तिथे श्री बुरांडे हे दफ्तरी होते. बुरांडे हे नेहमी हसतमुख असत. आणि आपण एखादेवेळी त्यांच्यावर रागावलो तरी ते शांतपणे, समजावून सांगून, समोरच्याचा राग शांत करत. ही गोष्ट भल्या भल्यांना जमत नाही. पण स्थितप्रज्ञता हा  बुरांडे यांचा अंगभूत गुण होता.  मी कधीही त्यांना रागावलेले किंवा कोणाशी तावातावाने  भांडतांना पाहिले नाही. श्री बुरांडे यांनीही तेथील रेकॉर्ड अत्यंत व्यवस्थित ठेवले होते. आणि कोणताही फॉर्म किंवा रेकॉर्ड पाहिजे असल्यास ते पटकन काढून देण्याची त्यांची हातोटी होती. बुरांडे एक चांगले कलाकार सुद्धा होते, आणि रांगोळी काढण्याची कला ही त्यांना अवगत होती.

श्री बुरांडे हे अभ्यासू व मेहनती असल्यामुळे थोडेच दिवसांत त्यांचे प्रमोशन होऊन ते क्लरिकल केडऱ मध्ये आले, आणि नंतर प्रमोशन होऊन हेड कॅशियर पर्यन्त त्यांची पदोन्नती झाली.

आता तर निवृत्तीनंतर त्यांनी त्यांचा बागकामाचा छंद इतका उत्कृष्टपणे जपला आहे, की आता पूर्ण संभाजीनगर (औरंगाबाद) मधून खूप लोक त्यांच्या बागेला आणि कचऱ्यातून कला निर्माण करण्याच्या कार्याला पाहायला येतात.  बँकेतील लोक तर त्यांचे कौतुक करतातच, पण आता त्यांच्या कार्याची प्रसिद्धी आसपासच्या सर्व परिसरात झाली आहे, आणि त्याबद्दल काही वृत्तपत्रांमध्येही लिहून आले आहे.  त्यांना त्यांच्या बागकामासाठी, आणि टाकाऊतून टिकाऊ निर्माण करण्याच्या कार्यासाठी बरीच परितोषकेही मिळाली आहेत. नुकतेच त्यांना इको ग्रीन फाउंडेशन औरंगाबाद यांच्या तर्फे विशेष उल्लेखनीय बागेसाठीचे पारितोषिक देऊन गौरवीत करण्यात आले.  हल्लीच त्यांनी काही प्रदर्शनेही भरवली होती. निवृत्तीनंतरचे आयुष्य कसे जगावे याचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे श्री बुरांडे होत.image 9 P.M. Burande

माझ्या वरील दोन सहकाऱ्यांचे काम, त्यांचा स्वभाव, कामाप्रति त्यांची निष्ठा, या गोष्टींचा माझ्यावर खूप प्रभाव पडला आहे.

नाचू कीर्तनाचे रंगी

स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून मुख्य व्यवस्थापक म्हणून निवृत्त झालेले श्री भुजंग संगारेड्डीकर हे एक बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तिमत्त्व आहे. बँकेत असतांनाची त्यांची लोकप्रियता आजही तितकीच टिकून आहे. बँकेत असतांना त्यांच्या creative स्वभावामुळे, त्यांनी अनेक प्रयोग यशस्वीपणे राबवले. आणि computerization च्या वेळी आणि नंतर त्यांचा एक मार्गदर्शक आणि trouble shooter म्हणून खूप लौकिक झाला.

आजही त्यांचे निरनिराळे उपक्रम चालू असतात.

त्यांच्या पत्नी सौ. जयश्री संगारेड्डीकर यांचीही  त्यांना त्यांच्या सर्व उपक्रमात अगदी पूर्णपणे साथ असते.

निवृत्तीनंतर, अध्यात्माकडे ओढा असल्याने, त्या बाबतीतील उपक्रमात त्यांचा दोघांचाही सक्रिय सहभाग असतो.

स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधील निवृत्त कर्मचारी दर वर्षी आषाढी एकादशीच्या वारीत सहभागी होतात. आणि विठूरायाच्या भक्तीत रंगून जातात.

या वर्षीच्या वारीत संगारेड्डीकर उभयता पती पत्नींनी मिळून वारीत बहारदार कीर्तन सादर केले.

त्या कीर्तनाचा  काही अंश आपल्या “असीम आनंद” या यू ट्यूब चॅनेल वर टाकला आहे.

तो या ठिकाणी सादर आहे.

आपणास व्हिडिओ आवडला असल्यास like करा आणि youtube चॅनेल “असीम आनंद” नक्की subscibe करा.

तसेंच goodworld.in या आपल्या ब्लॉग ला subcribe करा.

तसेंच ब्लॉग इतरांसोबत share करा.

Test your Emotional Intelligence for FREE-आपली भावनिक बुद्धिमत्ता तपासा

 

  • Emotional intelligence is the ability to recognize your emotions, understand what they’re telling you, and realize how your emotions affect other people.
  • There are five elements that define Emotional Intelligence: Self-Awareness, Self-Regulation, Motivation, Empathy, and Social Skills.
    5 components of emotional intelligence
    5 components of emotional intelligence
  • Emotionally intelligent people are masters at managing their emotions. The ability to stay calm and in control in difficult situations is highly valued
  • Developing and using your emotional intelligence can be a good way to show others the leader inside of you.
  • Emotional intelligence can be learned and developed

We probably all know people, either at work or in our personal lives, who are really good listeners. No matter what kind of situation we’re in, they always seem to know just what to say – and how to say it – so that we’re not offended or upset. They’re caring and considerate, and even if we don’t find a solution to our problem, we usually leave feeling more hopeful and optimistic.

We probably also know people who are masters at managing their emotions. They don’t get angry in stressful situations. Instead, they have the ability to look at a problem and calmly find a solution. They’re excellent decision makers, and they know when to trust their intuition. Regardless of their strengths, however, they’re usually willing to look at themselves honestly. They take criticism well, and they know when to use it to improve their performance.

shining man

People like this have a high degree of emotional intelligence. They know themselves very well, and they’re also able to sense the emotional needs of others.

As more and more people accept that emotional intelligence is just as important to professional success as technical ability, organizations are increasingly using it when they hire and promote.

For example, one large cosmetics company recently revised their hiring process for salespeople to choose candidates based on their emotional intelligence. The result? People hired with the new system have sold, substantially more than salespeople selected under the old system. There has also been significantly lower staff turnover among the group chosen for their emotional intelligence.

How to measure your Emotional Intelligence?

Free Emotonal Intelligence Test

Emotional Intelligence-1

Emotional Intelligence-2

Learning journey-3

1715837720406

Life is a learning journey.images 18

या आधीच्या दोन लेखांत एकूण चार व्यक्तिमत्वांबद्दल लिहिले होते. आज आणखी काही सहकाऱ्यांबद्दल सांगावेसे वाटते.

माझे बी ग्रुप मध्ये प्रमोशन झाल्यावर एक वर्ष ट्रेनिंग आणि एक वर्ष प्रोबेशन असे दोन वर्ष झाल्यावर मला पहिली पोस्टिंग बीड A.D.B. येथे फील्ड ऑफिसर म्हणून मिळाली. बीड एडीबी ला आम्ही ४ ते ५ फील्ड ऑफिसर्स होतो. ब्रँचकडे भरपूर गावे दत्तक होती आणि प्रत्येक फील्ड ऑफिसरला १५ ते २० गावे दिलेली असत. बीड A.D.B च्या कार्यकाळात तसे तर सगळ्यांकडून काही ना काही शिकायला मिळाले, पण २ सहकाऱ्यांकडून मी काही खूप उपयुक्त गोष्टी शिकलो. आणि अजून एका स्वच्छंदी व्यक्तीचे व्यक्तिमत्व खूप लक्षात राहिले.

  1. श्री एन जी. बांटे

माझी तिथे पोस्टिंग झाल्यानंतर, काही कालावधीनंतर तिथे श्री एन जी. बांटे यांची टेक्निकल ऑफिसर म्हणून पोस्टिंग झाली. टेक्निकल ऑफिसरचे काम म्हणजे सगळ्या फील्ड ऑफिसर्सला काही तांत्रिक बाबीत सल्ला देणे. त्यात विहीर, मोटर, पाइप लाईन, ड्रिप इरिगेशन, हॉर्टिकल्चर, इत्यादि साठीची जी कर्ज प्रकरणे असत, ज्यात बर्‍याच तांत्रिक गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते, त्यात शक्यतो फील्ड ऑफिसर च्या सोबत जाऊन, संयुक्त पाहणी करून, तो प्रोजेक्ट व्हाएबल आहे की नाही, किंवा तसा नसेल तर त्यात काय बदल करावे लागतील, इत्यादि गोष्टींचा रिपोर्ट  देणे.

श्री बांटे यांची आणि माझी वेव्हलेंग्थ जुळत होती. भरपूर उंची, भव्य चेहरा, थोडे टक्कल पडत आलेले, नेहमी इन करण्याची सवय, आणि चेहर्‍यावर सौम्य भाव आणि वागणे आणि बोलणेही तसेच सौम्य. कोणाचे मन दुखवणार नाही, पण स्पष्टवक्तेपणाने समोरच्यासाठी योग्य तो सल्ला देण्याची वृत्ती. आणि त्यांना शेतीबद्दल अगदी खोल तांत्रिक ज्ञान होते आणि या आधीचा इतर शाखांमधला समृद्ध अनुभवही होता. मला याचा खूप उपयोग झाला.

त्यांचे एक वैशिष्ट्य होते. कुठल्याही शेतात गेल्यानंतर (जिथे नवीन विहीर घ्यायची आहे, किंवा जुन्या विहीरीची दुरूस्ती करायची आहे), त्यांना थोड्याच वेळात तिथल्या टोपोग्राफीचे योग्य आकलन होत असे. शेताच्या चारी बाजूला फिरून ते विहीर घेण्याची योग्य जागा अचूक सांगू शकत. साधारण किती फुटावर पाणी लागेल याचाही त्यांना अंदाज येत असे. किती इंची पाइपलाइन लागेल, किती हॉर्सपॉवर ची मोटर लागेल, इत्यादि तपशील ते अचूक सांगत. जमिनीचा पोत कसा आहे, ती कुठल्या पिकासाठी योग्य आहे हेही ते लगेच सांगू शकत.  वेगवेगळ्या पिकांसाठीचा (विशेषतः द्राक्ष वगैरे महाग पिकांसाठी) येणार्‍या खर्चाचा, लागणार्‍या खतांचा, फवारणीचा, तपशील त्यांना पूर्ण माहिती असे, आणि शेतकर्‍याशी ते अधिकारवाणीने बोलू शकत आणि त्याला योग्य तो सल्ला ही देऊ शकत. या सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. त्यामुळे मी त्यांना अनेक शंका विचारीत असे आणि त्याचे त्यांच्याकडून योग्य ते उत्तर मला मिळत असे.

जसा पाणाड्याला जमिनीत पाणी कुठे लागेल याचा अंदाज असतो, त्याप्रमाणे त्यांचा अंदाज बरोबर ठरत असे. पण ते त्यामागचे शास्त्र समजावून सांगत. आणि या त्यांच्या वैशिष्ट्याबद्दल त्यांना जराही अभिमान किंवा गर्व नव्हता. या आधी त्यांनी लोकांना केलेल्या मार्गदर्शनामुळे कसे व्यवस्थित पाणी लागले, इत्यादीचे किस्से ते कधी कधी सांगत. पण त्यात कुठेही बढाईचा लवलेश नसे. त्यांनी बनविलेला टेक्निकल रिपोर्टही सविस्तर आणि परिपूर्ण असे. त्यांच्यासोबत दोन वर्षे राहून मला खूप नवीन आणि उपयुक्त माहिती मिळाली.

त्यांच्यासोबत जाऊन जाऊन, जी माहिती झाली होती, तिच्या जोरावर नंतर नंतर मी पण शेतावर गेल्यावर एखाद्या एक्स्पर्टचा आव आणून शेतकर्‍याशी चर्चा करीत असे! त्याचे थोडे फार इंप्रेशन कधी कधी पडत असे. पण माझे ज्ञान हे अनुभवावर आधारित नसल्याने आणि तोकडे असल्याने, कधी कधी पोल उघडी पडण्याची वेळ येत असे! कन्नड येथे मिळालेला 3 वर्षांचा अनुभव, आणि बीड A.D.B. येथील अनुभव, एवढ्या भांडवलावर पुढील कालावधीत जेंव्हा जेंव्हा शेती कर्जाशी संबंध आला तो कालावधी निर्वेधपणे पार पडला!

माझी नंतर दुसर्‍या शाखेत (अजिंठा शाखा) बदली झाल्यानंतरही मला कुठलीही अडचण आली तर मी बांटेसाहेब  यांना फोन करून त्यांचा सल्ला विचारीत असे आणि तेही कुठलेही आढेवेढे न घेता मला योग्य तो सल्ला देत. बँकेतील माझ्या जडण घडणीत ज्या लोकांचा सहभाग आहे, त्यात श्री बांटे यांचे खूप मोलाचे स्थान आहे.

  1. श्री पी. के. कुलकर्णी

बीड A.D.B येथे असतांनाच, श्री पी. के. कुलकर्णी हे माझ्याबरोबर फील्ड ऑफिसर होते. पण माझी ही पहिलीच पोस्टिंग होती तर श्री पी. के. कुलकर्णी हे मला खूप सीनियर होते आणि अनुभवी होते. त्यात आणखी विशेष म्हणजे ते बीड येथे परवानानगर या बँकर्सच्या कॉलनीमध्ये माझे शेजारी होते. एक घर सोडून त्यांचे घर होते. त्यामुळे आमच्या  दोन्ही कुटुंबांचे पण एकमेकांसोबत खूप प्रेमाचे संबंध होते. ते मला सीनियर असल्यामुळे मी नेहमी मला कुठलीही शंका असली तरी त्यांना विचारत असे. आणि त्यांच्याकडून त्याचे अगदी प्रॅक्टिकल उत्तर मिळत असे. त्यांचाही स्वभाव हा अत्यंत सौम्य, हसतमुख आणि मनमिळाऊ असा होता. आणि कर्जदारांशी बोलतांनाही ते अगदी मित्रत्वाच्या टोनमध्ये बोलत. आम्ही बऱ्याच वेळा सोबत inspection ला जात असू. विशेषतः जेंव्हा माझी आणि त्यांची गांवे एकाच रूट वर असत तेंव्हा आम्ही एकाच जीप मधून सोबत जात असूत. त्यावेळी मी त्यांची खातेदारांशी बोलण्याची पद्धत जवळून बघत असे. त्यांची संवाद साधण्याची एक खास पद्धत होती. ते आधी खातेदाराशी सुरुवातीला आपुलकीच्या गोष्टी बोलून त्याचे मन मोकळे करीत आणि त्याच्या मनात विश्वास निर्माण करीत. थकबाकीदार असला तरी सरळ त्याच्या थकबाकीच्या मुद्द्यावर न येता, आधी त्याची आपुलकीने चौकशी करीत. त्याचे सध्या कसे काय चालले आहे, यावर्षी, त्याच्या आधीच्या वर्षी, पीकपाणी कसे झाले, घरी काही अडचण आहे का, इत्यादि सर्व चौकशी अगदी आपुलकीने करीत. आणि मग अगदी सौम्यपणे आपल्या मुद्द्यावर येत. कधी कधी नुसत्या revival letter किंवा rephasement letter वर सही घेण्याचे काम असे. पण अशा प्रकारे बोलल्यानंतर कुठलाही खातेदार पाहिजे ती सही करून द्यायला कधीच नकार देत नसे. मला त्यांची ही communication ची पद्धत खूप भावली. या गोष्टींचा मला पाथरी A.D.B. ला काम करतांना खूप उपयोग झाला. नंतर, खूप वर्षांनी औरंगाबाद येथील ट्रेनिंग सेंटरला जॉइन झाल्यावर, मला SBI मध्ये आमच्या Trainers training मध्ये जेंव्हा communication, soft skills, inter personal relations इत्यादि विषयांची ओळख झाली, त्यावेळी असे जाणवले, की या विषयांवरील वस्तुपाठ आपल्याला या व्यक्तिंकडून आधीच मिळाला आहे.

  1. श्री बी. एन. कुलकर्णी

बीड A.D.B येथे असतांना जे एक मनमौजी व्यक्तिमत्व माझ्या लक्षात राहिले ते म्हणजे, तिथे नंतरच्या काळात आलेले शाखाधिकारी श्री बी. एन. कुलकर्णी हे होत. त्यांची पूर्ण सर्विस मुंबई दिल्ली सारख्या मेट्रो शहरांत गेली होती आणि त्यांनी याआधी कधीच शेतीशी संबंधित शाखेत काम केले नव्हते. पण तसे असतांनाही त्यांना कुठलेच टेंशन नव्हते. ते तेंव्हा अर्थातच बरेच सीनियर होते (जवळजवळ पन्नाशीच्या आसपास). आणि त्यांना अगदी अप-टू-डेट राहायला आवडे. साधारण डार्क रंगाची पॅन्ट, त्यावर पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट, इन केलेली, पायात नेहमी चकचकीत पॉलिश केलेले शूज,  कमरेच्या बेल्टला त्यांच्या किल्ल्यांचा जुडगा लटकत असलेला. त्यांना त्यावेळी टक्कल पडत आले होते, पण आहे त्या केसांना ते आवर्जून डाय लावत आणि खिशामध्ये पॉकेट कंगवा असे, त्याने भांग पाडत. सदैव हसतमुख आणि जॉली मूड मध्ये असत. त्या माणसाला मी कधीच दुर्मुखलेले किंवा तणावामध्ये असलेले पाहिले नाही. किंवा कधीही आपल्या हाताखालच्या लोकांवर आपला रुबाब दाखवतांना पाहिले नाही. एवढ्या मोठ्या शाखेचे मुख्य असून आणि एवढा स्टाफ हाताखाली असूनही त्यांना कधी त्या गोष्टीचा गर्व नव्हता. सगळ्या स्टाफशी आणि खातेदारांशी ते अगदी फ्रेंडली वागत. सगळ्या गोष्टी अगदी सहज घेण्याच्या त्यांचा स्वभाव होता.  मुंबई दिल्ली येथे पूर्ण सर्विस केल्यामुळे बऱ्याचदा बोलण्यात हिन्दी किंवा इंग्लिश शब्द येत. अशी happy go lucky pesonality मला नंतर कुठे बघायला मिळाली नाही.  त्यांचे कुठलेही वैशिष्ट्य आत्मसात करणे तर मला शक्य नव्हते, कारण ते रसायनच वेगळे होते, पण अशीही माणसे असतात हे त्यामुळे समजले, आणि त्यांचे व्यक्तिमत्व माझ्या चांगलेच लक्षात राहिले.

माधव भोपे

मित्रांनो, ज्या व्यक्तिमत्वांनी मला वेगवेगळ्या कारणांमुळे प्रभावित केले, त्यांच्याबद्दल लिहिण्याच्या प्रपंचातील हा तिसरा  लेख.  आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्ति या आपल्यावर आणि आपण त्यांच्यावर परस्पर प्रभाव कमीजास्त प्रमाणात टाकत असतो, आणि त्यातून आपले व्यक्तिमत्व घडत जात असते. 

आपले याबाबतीतील विचार जरूर कळवा.

आवडल्यास ब्लॉगला subscribe करा.

 

Shrimat Bhagwat Katha Saar श्रीमद् भागवत कथासार

bhagwat katha mahtava 1

भज गोविन्दं भज गोविन्दं

image 6image 11image 12

 

गणेश वि. रामदासी

छत्रपति संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथील समर्थ भक्त श्री गणेश वि. रामदासी यांच्या यू ट्यूब चॅनेल वर (ज्याचे नांव Avirat Dasnavmi Mahotsav-  Ganesh V.Ramdasi असे आहे) नित्यनियमाने अनेक धार्मिक प्रवचने चालू असतात. मला असेच यू ट्यूब वर browse करता करता हे चॅनेल दिसले आणि खूप आवडले. 

सध्या या चॅनेल वर श्रीमद्भागवत कथासार चालू आहे.  आतापर्यंत २०० हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. यात त्यांच्या अत्यंत रसाळ वाणीने ते रोज ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या जपासहित भागवत कथेचे निरूपण करीत असतात.  त्यांच्या प्रवचनांची लिंक आपण आपल्या ब्लॉग वर देत आहोत. ही लिंक रोज अपडेट होत राहील. 

अध्यात्माची आवड असणाऱ्या वाचकांना आणि श्रोत्यांना हा उपक्रम आवडेल अशी आशा.

RSS Avirat Dasnavmi Mahotsav – Ganesh V. Ramdasi

Learning journey-2

learning journey

Life is a learning journey.

जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे, ही या वेबसाईटची टॅग लाईन आहे..

आपला कामाच्या निमित्ताने अनेक लोकांशी संबंध येतो. विशेषतः आपण जिथे नोकरी किंवा व्यवसाय करीत असू, तिथे आपल्या सोबत असणाऱ्या लोकांचा आपल्यावर कळत नकळत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. मी गेल्या लेखात, औरंगाबाद (आताचे संभाजीनगर) येथे काम करत असतांना त्यावेळचे तेथील DGM श्री नकीब यांच्या बद्दल लिहिले होते. आता अजून काही व्यक्तिमत्वांबद्दल लिहायचे आहे.

  1. श्री बी. डी. भोपे

मी बँकेत लागण्याच्या आधीपासून, माझे वडील बंधू, श्री बी. डी. भोपे, हे बँकेत होते. ते बँकेतील एक अत्यंत प्रसिद्ध, लोकप्रिय, अभ्यासू  आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते.

मी बँकेत लागल्यावर मला पहिली पोस्टिंग औरंगाबादपासून 35 किलोमीटर  अंतरावर असणाऱ्या खुलताबाद या उंचावरील निसर्गरम्य ठिकाणी मिळाली. माझी पोस्टिंग कॅशियर कम क्लर्क अशी होती.

हे जेंव्हा वडील बंधू (ज्यांना आम्ही ‘दादा’ म्हणत असू) यांना कळाले, तेंव्हा त्यांनी मला एक खूप उपयुक्त असा सल्ला दिला. ते म्हणाले, हे बघ, तुझी अपॉईंटमेंट कॅशियर कम क्लर्क म्हणून झाली आहे. तेंव्हा तुला केंव्हाही कॅश वर पण बसावे लागेल. (म्हणजे कॅशियर म्हणून काम करावे लागेल). त्यावेळी, माझ्या गुरुने मला सांगितलेली एक गोष्ट मी तुला सांगतो, जेणे करून तुला कॅश मध्ये कधीही shortage येणार नाही. ती गोष्ट अशी, “लेकर लिख, लिखकर दे – घाटा आया तो मुझसे ले!” म्हणजे असे, की तू काऊंटर वर बसल्यावर जेंव्हा कोणी कॅश जमा करायला येईल, तेंव्हा, त्यांनी दिलेली स्लिप, आणि त्यासोबतची कॅश- घेतल्यावर आधी मोजून घ्यायची- आणि त्याचे डिटेल्स आपण आपल्या हाताने त्या व्हाऊचर वर लिहायचे, टोटल करायची, आणि त्याने व्हाऊचर वर लिहिलेल्या रकमेसोबत ती जुळल्यावर, मग आपल्या Receipts च्या रजिस्टर मध्ये enter करायची. याच्या उलट कृती पेमेंट देतेवेळी करायची- पेमेंट च्या व्हाऊचर वर आधी आपण देणार असलेली कॅश पूर्ण लिहायची, tally करायची, आणि मग समोरच्या व्यक्तिला द्यायची. पेमेन्टचे व्हाऊचर दिवसाच्या शेवटी रजिस्टर मध्ये एंटर करायचे.

मी हा सल्ला चांगला लक्षात ठेवला. मला नेहमी जरी कॅश वर बसायचे काम पडत नसायचे, तरी जेंव्हा केंव्हा कॅश मध्ये काम करायची वेळ येई, त्यावेळी मी या पद्धतीने कॅश घेणे किंवा देणे करीत असे. त्यामुळे, माझी ऑफिसर म्हणून प्रमोशन होईपर्यंतच्या साडेसात वर्षांच्या काळात अनेक वेळा कॅश वर काम करावे लागले, पण कधी शॉर्ट आले नाही की एक्सेस आले नाही. आणि कॅश मध्ये काम करतांना कितीही गर्दी आली तरी त्याचे कधी दडपण आले नाही.

बी. डी. भोपें बद्दल अजूनही कधी विषय निघाला की त्यांच्यासोबत काम केलेले लोक भरभरून बोलतात. त्यांच्या उंचीच्या जवळपासही मला जाता आले नाही. पण प्रत्येक गोष्टीत बारीक सारिक डिटेल्सचा अभ्यास करून विषयाची पूर्ण माहिती करून घेण्याचा त्यांचा गुण थोड्या प्रमाणात मी आत्मसात करू शकलो.

  1. श्री एम. एस. भाले

खुलताबाद ला काम करतांना श्री एम. एस. भाले उर्फ मधू भाले, हे हेड कॅशियर होते. त्यांचा कॅशच्या कामातील आणि इतरही कामातील नीटनेटकेपणा अतिशय वाखाणण्याजोगा होता. एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व, तितकेच स्वाभिमानी, फटकळ पण त्याच वेळी आपले काम आटोपून इतरांना मदत करण्यात अत्यंत तत्पर असे हे व्यक्तिमत्व होते. त्यांचा आत्मविश्वास अत्यंत दांडगा होता. आणि राहणीमान, कपड्यांची आवड निवड ही अत्यंत चोखंदळ होती. कॅश च्या रजिस्टर मध्ये प्रत्येक कॉलम मध्ये सर्व फिगर्स अत्यंत नीटनेटक्या, एकाखाली एक लिहिलेल्या, आणि शेवटी टोटल मारतांना, एका रुळाने टोटलच्या खाली आणि वर सरळ रेष आखणार. जेणे करून टोटल हायलाईट होईल. आमच्या बँकेत करन्सी चेस्ट होती, म्हणजे आर. बी. आय. ची प्रतिनिधि म्हणून आमच्याकडे दर काही महिन्यांनी कोट्यावधीची नवीन करन्सी यायची. तसेच करन्सी चेस्ट चे व्यवहार, त्याचे दिवसाच्या सुरुवातीचे बॅलन्स, दिवसभरातील व्यवहार, आणि दिवसाच्या शेवटचे बॅलन्स, सर्व नोटांच्या तपशीलासह, असा पूर्ण तपशील रोजच्या रोज करन्सी ऑफिसर रिझर्व्ह बँक यांना पाठवावा लागायचा. त्याला चेस्ट स्लिप म्हणायचे. श्री भाले हा तपशील अत्यंत अचूकपणे भरून वर तो लिफाफा स्वतःच्या हाताने तयार करून त्यात ती स्लिप टाकून तयार ठेवत. कामातील अचूकता आणि परिपूर्णता हे गुण मला त्याकाळी त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

  1. श्री बी. ए. रझवी (बाकर आली रझवी)

माझी खुलताबादहून कन्नड येथे बदली झाली. कन्नड येथे बँकेचे एग्रिकल्चरल बँकिंग डिविजन (A.B.D.)होते. तिथे माझी पोस्टिंग झाली. A.B.D. म्हणजे मुख्य शाखे अंतर्गत, कृषि कर्जां साठीचा खास विभाग होता, आणि त्याचे इन चार्ज श्री बी. ए. रझवी हे होते. त्या विभागात सुरुवातीस आम्ही दोघेच होतो. मी त्यांचा सहाय्यक म्हणून तिथे 3 वर्षे काम केले. (साधारण एक-दोन वर्षांनंतर श्री एस. पी. माथुर हे तांत्रिक अधिकारी त्या विभागात आले.)

त्यांच्या सोबत काम करतांना, मला शेती कर्जाची अगदी बारीक सारिक माहिती झाली. ते मला त्यांच्या सोबत फील्ड वर मोटर सायकल वर इन्सपेक्शन ला घेऊन जात. तिथे शेतीची, पिकांची, विहीर, मोटार, पाइप लाईन, सर्व गोष्टींची माहिती मिळत असे. तोपर्यन्त माझा शेतीशी कधीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आला नव्हता. पण इथे मला सगळ्या शेतीसंबंधात बारीक सारिक गोष्टींची पण पूर्ण माहिती झाली.

मला त्यांच्यातला एक गुण फारच नोंद करण्यासारखा वाटला, आणि मी काही प्रमाणात तो पुढे चालून आत्मसात करण्याचा, मला जमेल तितका प्रयत्न केला. तो म्हणजे, compartmentalization.  त्यांच्यासमोर जेंव्हा एखादा खातेदार (शेती कर्जाचा) बसला असे, आणि तो जर थकबाकीदार असेल, किंवा त्याने काही नियमबाह्य काम केले असेल, तर ते त्याला खूप झापत. (ते मुस्लिम असले तरी अगदी अस्खलित मराठी बोलत, आणि दिसायला एखाद्या कोकणस्थासारखे गोरे पान दिसत.)त्यावेळी  त्यांची पूर्ण देहबोली, हातवारे, इत्यादि त्यांच्या मुद्द्याला साजेसे, आक्रमक होत आणि बोलता बोलता त्यांचा गोरापान असलेला चेहरा, लालबुंद होऊन जात असे. पण तो विषय संपला, की त्याच कर्जदाराशी इतर कुठला विषय असेल, किंवा त्यानंतर लगेच त्याच्यासोबत आलेल्या दुसऱ्या कुणाशी बोलण्याचे असेल, किंवा माझ्यासोबत काही बोलायचे असेल, तेंव्हा एक क्षणाचाही वेळ न लागता, एखाद्या कसलेल्या नटासारखे ते दुसऱ्या, हलक्या फुलक्या मूड मध्ये येऊ शकत. आधीच्या रागावलेल्या मूडचा मागमूसही त्यांच्यात दिसत नसे.

या ब्लॉग वर काही दिवसांपूर्वी, वैद्य सोहन पाठक यांचा Compartmentalization ⇒

(विभागीकरण, किंवा कप्पे करण्याचे कसब)या विषयावरचा लेख आपण वाचला असेल. मला वाटते हे compartmentalization रोजच्या आयुष्यात खूप आवश्यक आहे. त्यामुळे एका गोष्टीचा किंवा प्रसंगाचा तणाव दुसऱ्या गोष्टीवर पडणार नाही. आणि हे कसब कोणामध्ये उपजत नसेल तरी प्रयत्नाने साध्य करता येऊ शकेल. या बद्दल यापूर्वीच्या एका लेखात Acquire New skills  (काही तरी धरावी सोय, आगंतुक गुणांची) मी माझी मते व्यक्त केली होती.

मित्रांनो, ज्या व्यक्तिमत्वांनी मला वेगवेगळ्या कारणांमुळे प्रभावित केले, त्यांच्याबद्दल लिहिण्याच्या प्रपंचातील हा दुसरा लेख.  आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्ति या आपल्यावर आणि आपण त्यांच्यावर परस्पर प्रभाव कमीजास्त प्रमाणात टाकत असतो, आणि त्यातून आपले व्यक्तिमत्व घडत जात असते, ही प्रक्रिया शेवटपर्यंत चालू असते, असे मला वाटते.

येणाऱ्या भागात आणखी काही व्यक्तिमत्वांबद्दल लिहिण्याचा विचार आहे. आपले याबाबतीतील विचार जरूर कळवा.

आवडल्यास ब्लॉगला subscribe करा.