https://goodworld.in A website by Madhav Bhope

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-3

shriram

मागील लेखावरून-पुढे 

यापूर्वीच्या लेखात आपण 10 व्या श्लोकापर्यंत पाहिले होते. त्यात श्लोक क्र. 4 पासून 10 पर्यन्त, श्री राम कवच बघितले. आता पुढे:-

 

आता यापुढील श्लोकांत या कवचाचे माहात्म्य श्रीरामाच्या नामाचे महत्त्व, श्रीरामाच्या रूपाचे वर्णन इत्यादि आहे.

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।

न दृष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥11॥

 

— पाताल+ भूतल+व्योम+ चारिणः+ छद्मचारिणः+न+ द्रष्टुं+ अपि+शक्ताः+ते+ रक्षितं+ राम+नामभिः

विष्णू पुराणात ३ लोक आणि चौदा भुवने सांगितली आहेत. तीन लोक म्हणजे पाताळ लोक, भूलोक आणि स्वर्गलोक. पाताळ लोकात दैत्य, दानव, यक्ष, नाग इत्यादिंचा वास असतो असे मानले गेले आहे. भूलोकात मनुष्य आणि इतर जीवजंतूंचा वास असतो, आणि स्वर्गलोकात इंद्र, वरूण, पवन, बृहस्पति, चंद्र, निरनिराळे ग्रह इत्यादि देवतांचा वास असतो. या तीन्ही लोकांमधील कुठलीही शक्ति, राम नामाने रक्षित माणसाचे वाकडे करू शकत नाही. याशिवाय, छद्म रूपाने वावरणाऱ्या  शक्ति असतात, ज्या की सामान्य दृष्टीला दिसत नाहीत(छद्मचारिणः).

अशा शक्ति, रामनामाने रक्षित झालेल्या व्यक्तिचे वाकडे करण्याचे तर सोडाच (अपि) पण त्याच्या कडे वाकडया नजरेने पाहूही शकत नाहीत.( न+ द्रष्टुं). अर्थात, ज्या व्यक्तिने राम नाम रूपी कवच धारण केले आहे, त्याला तीन्ही लोकांतील वाईट शक्तींची बाधा होऊ शकत नाही.(ग्रह नक्षत्र, भूत पिशाच, किंवा, या लोकातील वाईट प्रवृत्तीचे लोक)

म्हणूनच आपल्या इथे, कुठल्याही वाईट शक्तींची बाधा झालेली आहे, दृष्ट इत्यादि लागली आहे, अशी शंका असल्यास, रामरक्षा स्तोत्राचा अचूक उपाय आहे असे मानले जाते.

rakshas-1

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌ ।

नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥12॥

image 2

 “राम”, “रामभद्र” किंवा “रामचंद्र” अशा कुठल्याही नावाने श्रीरामाचे जो स्मरण करतो, त्या पुरुषाला पापाचा स्पर्शही होत नाही. आणि “भुक्ति” आणि “मुक्ती” प्राप्त होते. (विन्दति = प्राप्त होणे )

भुक्ति म्हणजे ऐहिक भोग. मुक्ति अर्थात मोक्ष. श्रीरामाच्या नामस्मरणाने दोन्हीही प्राप्त होतात.

आपल्या आवडत्या व्यक्तिला, आपल्या लाडक्या मुलाला, जसे आपण बबड्या, छबड्या, सोन्या, राजा, छकुल्या, अशा अनेक नावाने हाक मारतो आणि कितीही नावांनी हाक मारली तरी आपले मन भरत नाही, तशीच अवस्था या ठिकाणी कवीची झाली आहे, असे मला वाटते, म्हणूनच, श्रीराम या आपल्या प्रेमास्पदाला, आपल्या देवतेला, “राम”, “रामभद्र”, “रामचंद्र” अशा वेगवेगळ्या नावांनी संबोधित केले आहे!

जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्‌ ।

यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥13॥

  जगज्जैत्र+ एक+ मंत्रेण+रामनाम्ना+ अभिरक्षितम्+यः +कण्ठे +धारयेत्+तस्य+ करस्थाः+ सर्व+ सिद्धयः

ज्याने जग जिंकता येते अशा एकमेव रामनाम रूपी मंत्राने जो अभिरक्षित आहे, संरक्षित आहे, रामरूपी मंत्र ज्याने कंठात धारण केलेला आहे, त्याला, सर्व सिद्धी हातातच असल्यासारख्या आहेत.

वज्रपंजरनामेदं यो रामकवचं स्मरेत्‌ ।

अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमंगलम्‌ ॥14॥

vajra

वज्र+ पंजर+नाम+इदं+यो+ राम कवचम्+ स्मरेत+अव्याहत+ आज्ञः + सर्वत्र+ लभते+जय+ मंगलम्

इंद्राचे वज्र हे आपणास माहित आहे. देव आणि दानवांच्या लढाईत, जेंव्हा दानव देवांवर प्रबळ होऊ लागले, त्यावेळी दधिची ऋषींच्या हाडांपासून वज्र बनविण्यात आले होते आणि त्याचा वापर करून इंद्राने वृत्रासुरावर आणि इतर दानवांवर विजय मिळविला होता. हे वज्र अजेय समजले जाते. पंजर म्हणजे पिंजरा. रामकवच हे वज्राच्या पिंजऱ्यासारखे अभेद्य आहे. असे हे रामकवच जो  स्मरण करतो, त्याची आज्ञा कधीच मोडली जात   नाही. आणि त्याला नेहमी सर्वत्र, जय आणि मंगलाचीच प्राप्ति होते.(अव्याहताज्ञः या शब्दाचा अर्थ आपण मराठीच्या अव्याहत म्हणजे सतत असा घेतो आणि अशा व्यक्तिला नेहमी सर्वत्र जय मंगल प्राप्त होते असा करतो. पण सदरील शब्दाचा समास विग्रह अव्याहत+ आज्ञः असा होत असून त्याचा अर्थ ‘ज्याची आज्ञा मोडली जात नाही’ असा होतो)

आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।

तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥

budhkaushik rushi

 बुधकौशिक ऋषींना ‘हर’ म्हणजे भगवान शंकरांनी स्वप्नात येऊन आदेश दिल्याप्रमाणे (‘आदिष्ट”) त्यांनी सकाळी उठून (प्रबुद्धो) हे रामरक्षा स्तोत्र लिहिले.

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्‌ ।

अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान्स नः प्रभुः ॥16॥

“आराम” म्हणजे बगीचा, “विराम” म्हणजे “पूर्णविराम”, “अभिराम” म्हणजे आनंदकर, हर्षपूर्ण. अभिरामस्त्रिलोकानां म्हणजे तीन्ही लोकांना आनंद देणारा.    राम:+ श्रीमान+स+ न: +प्रभु:

 कल्पवृक्षाचा बगीचा , समस्त आपदा म्हणजे संकटांचा विराम (the end) असणारा , तीन्ही लोकांना आनंद देणारा(अभिरामस्त्रिलोकानां) असा “राम” हा आमचा “प्रभु” आहे.

इथपर्यंत रामरक्षा स्तोत्र, आणि त्याची उत्पत्ति कशी झाली, इत्यादि सांगून झाले. इथून पुढील श्लोक हे भक्तिरसात ओथंबलेले आहेत.

तरुणौ रूप सम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।

पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥17॥

ram and laxman

वरील श्लोकात श्रीराम आणि लक्ष्मण दोघांचे वर्णन आहे. दोघेही तरुण, रूपसंपन्न, सुकुमार आणि त्याच बरोबर महान शक्तिमान आहेत. दिसायला जरी सुकुमार असले तरी ते महाबलौ आहेत हे लगेच स्पष्ट केले आहे. “पुण्डरीक” म्हणजे कमळ. कमळाप्रमाणे विशाल ज्यांचे नेत्र आहेत, आणि ज्यांनी “कृष्णाजिन” म्हणजे काळ्या मृगाचे “चीर” म्हणजे वल्कल नेसले आहे.

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।

पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥18॥

फल आणि कंदमूल खाणारे, दान्तौ म्हणजे ज्यांच्याकडे संयम आहे; तपस्वी, ब्रह्मचारी, असे दशरथाचे पुत्र, राम लक्ष्मण हे दोन भाऊ,

शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्‌ ।

रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥19॥

सर्व जीवांचे शरणस्थान , सर्व धनुर्धार्यांमध्ये श्रेष्ठ, ज्यांनी राक्षस कुलांचा संहार केला आहे, (रक्षःकुल म्हणजे राक्षसांचे कूळ,  निहन्तारौ म्हणजे नष्ट करणारे), असे ते रघुकुलातील दोन उत्तम पुरुष, हे आमचे ‘त्रायेतां नौ’ म्हणजे रक्षण करोत.

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषंगसंगिनौ ।

रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम्‌ ॥20॥

हा रामरक्षेमधील सगळ्यात अवघड श्लोक. हा बऱ्याचदा चुकीचा म्हणला जातो. याचा संधिविग्रह जर समजून घेतला तर तो सोपा वाटेल.

आत्त   = ताणलेले

सज्ज     = सज्ज

धनुषौ   =  धनुष्य

‘आत्तसज्जधनुषौ’  = ताणलेल्या धनुष्याने सज्ज असलेले (ते दोघे)

इषुस्पृशौ  =(इषु: म्हणजे बाण, इषुस्पृशौ =बाणांना स्पर्श करणारे )

अक्षय =   कधीही न संपणारा

आशुग =  गतिमान;

निषंग    = बाण  ;

संगिनौ   =  बाणांचा भाता घेऊन जात असलेले

रक्षणाय   = रक्षणासाठी  ;

मम     = माझ्या ;

रामलक्ष्मणावग्रतः    राम लक्ष्मण माझ्या पुढे

 पथि    = रस्त्याने ;

 सदैव    =  नेहमी ;

 गच्छताम्  =   चालोत. ;

भावार्थ:

हातात धनुष्य घेतलेले, पाठीवर अक्षय बाणांचा भाता असलेले, आणि ज्यांचे हात त्या बाणांवर, कुठल्याही क्षणी वापर करण्याच्या तयारीत आहेत, असे राम आणि लक्ष्मण हे माझ्या रक्षणार्थ  माझ्या पुढे चालोत.

सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।

गच्छन्मनोरथोस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥21॥

सन्नद्ध म्हणजे शस्त्रास्त्रांनी पूर्ण सुसज्जित, तत्पर, उद्यत.

गच्छन्  म्हणजे चालत असलेले, अस्माकं म्हणजे आमचे, पातु म्हणजे रक्षण करणारा,

कवच,  खड्ग, धनुष्य, बाण यांनी सज्ज असलेले युवा  राम आणि लक्ष्मण, आमच्या  मनोरथानुसार आमचे रक्षण करण्यासाठी  आमच्या पुढे चालोत.

रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।

काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः ॥22॥

लक्ष्मण ज्याचा अनुचर आहे असा दाशरथी राम, शूर, बलवान, काकुत्स्थ वंशी, पूर्ण पुरुष, कौसल्येचा पुत्र आणि रघुकुलातील उत्तम पुरुष

वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।

जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥23॥

वेदान्तानी जाणण्यायोग्य (वेद्यो), यज्ञांचा स्वामी किंवा ईश , पुराण पुरुषोत्तम, जानकीचा पति, श्रीमान म्हणजे वैभवाने युक्त, अप्रमेय पराक्रम म्हणजे ज्याच्या पराक्रमाचे मोजमाप करता येऊ शकत नाही.

वरील श्लोकातील श्रीमानप्रमेयपराक्रम हा शब्द, श्रीमान आणि अप्रमेयपराक्रम हे दोन शब्द मिळून झाला आहे. त्यामुळे याचा उच्चार करतांना “श्रीमान प्रमेयपराक्रम” असा न करता

“न” वर जोर देऊन, श्रीमानप्रमेयपराक्रम असा करायला पाहिजे जेणे करून की श्रीमान आणि अप्रमेयपराक्रम हे दोन शब्द असल्याची जाणीव होईल.

इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।

अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥24॥

वरील संबोधन हे भगवान शिव करताहेत की वरीलप्रमाणे श्रीरामाची नांवे, जो माझा भक्त नित्य जपतो, त्याला अश्वमेध यज्ञ करून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही अधिक पुण्य मिळते यात काहीही संशय नाही.

माधव भोपे 

क्रमशः 

या पूर्वील लेख वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-2

For our U.S.A Readers:

Buy on Amazon

 

at $1.19 only

41CR5kGrwLL. SY445 SX342

For our U.K. readers:Acer Laptop

Buy on Amazon at Special prices

Laptops to fit your life style

UK Laptops 1200x90 1

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-2

shriram

 

मागील लेखावरून-पुढे 

श्रीराम आणि सीतेच्या ध्यानानंतर, रामरक्षा स्तोत्र सुरू होते.

त्यापुढील पहिल्या श्लोकात रामाच्या चरित्राची आणि नामाची महती सांगितलेली आहे:-

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्‌ ।

एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्‌ ॥1॥

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्‌ ।

जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम्‌ ॥2॥

श्रीरामाचे चरित्र हे ‘शत कोटी’ श्लोकांमाध्येही वर्णन करून संपणार नाही, इतके मोठे आहे.

इथे श्रीरामाला ‘रघुनाथ’ म्हटले आहे. अर्थात, रघुवंशातील सर्वोत्तम पुरूष, किंवा रघु वंशाचा ‘नाथ’.

भगवंताने, रघुकुलामध्ये अवतार घेतल्यामुळे, त्या कुळाचा उध्दार झाला. श्री शंकर हे श्री रामाचे नि:सीम भक्त. एक कथा अशी आहे, की एकदा, तीन्ही लोक, म्हणजे देव, दानव आणि मानव हे शंकराकडे गाऱ्हाणे घेऊन गेले. विषय होता, निरनिराळ्या मंत्रांचे योग्य वाटप. असे शंभर कोटी मंत्र होते. त्यावर, भगवान शंकरांनी तिघांनाही ३३ कोटी,३३ लाख ३३  हजार तीनशे तेहतीस मंत्र वाटून दिले. एक मंत्र राहिला, ज्यात ११ अक्षरे होती. शंकरांनी त्या मंत्रातील ३-३ अक्षरे तिघांना वाटून दिली. राहिली २ अक्षरे: “रा” आणि “म”. तेंव्हा शंकराने सांगितले, की ही दोन अक्षरे मात्र मी माझ्याच हृदयात ठेवणार.  

रघुनाथाच्या चरित्रामधील एक- एक अक्षर हे मनुष्याच्या महान पापांचे नाश करणारे आहे.

‘नीलोत्पल’- उत्पल अर्थात कमळ. ‘नीलोत्पल’ म्हणजे नील कमल. श्री रामाचा वर्ण नील कमलाप्रमाणे ‘नील’ ‘श्याम’ आहे. नील + श्याम. श्याम वर्ण म्हणजे काळा नव्हे. श्याम रंगाचे तेजच वेगळे आहे. श्री कृष्णाचे वर्णन ‘घनश्याम’ असे ही केले जाते. पुढे रामाचे ‘राजीव लोचन’ असे वर्णन केले आहे. राजीव लोचन म्हणजे कमला प्रमाणे नेत्र असलेला. वरील दोन्ही वैशिष्टये डोळ्यासमोर आणून श्रीरामाचे ध्यान करून पाहावे.

‘जानकीलक्ष्मणोपेतं’ म्हणजे ज्याच्या आजू बाजूला जानकी आणि लक्ष्मण आहेत असा. आणि जटा रुपी मुकुटाने मंडित झालेला, असा तो श्रीराम. जणू काही सुरुवातीच्या ध्यानाच्या श्लोकात श्री रामाच्या रूपाचे वर्णन करून कवीचे मन भरले नसावे! म्हणून या श्लोकात ‘नीलोत्पल श्याम’, ‘राजीवलोचन’, ‘जटा मुकुट मंडित’ अशा प्रकारे श्रीरामाचे ध्यान करून कवीने श्रीरामाच्या रूपाचे अजून बहारदार वर्णन केले आहे.

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरांतकम्‌ ।

स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्‌ ॥3॥

main qimg 280b9c16cbb6d0bf90cbd86d6d340541 lqसंस्कृत मधील श्लोकांचा अर्थ समजावून घेतांना, संधि विच्छेद करून, शब्द सुटे सुटे करून घेतल्यानंतर त्यातील अर्थ लवकर लक्षात येतो. वरील श्लोकाचा संधि विच्छेद खालील प्रमाणे आहे:

स= सहित , असि= तलवार, किंवा खड्ग,

 (आपण असिधारा व्रत हा शब्द ऐकला आहे. त्याचा अर्थ: असिधारा व्रत- तलवारीवर चालण्यासारखे कठीण व्रत)

तूण= बाण ठेवण्याचा भाता, धनु:= धनुष्य, बाण= बाण, पाणि=हात

नक्तम्+चर = नक्त म्हणजे रात्र. चर म्हणजे चालणे, हिंडणे(उदा. गोचर, वनचर, दिनचर, निशाचर) नक्तंचर- रात्री हिंडणारे अर्थात, राक्षस  ; अन्तकम्= अंत करणारा.

नक्तंचरांतकम्‌= निशाचर असलेले म्हणजे राक्षस, यांचा अंत करणारा.

स्वलीलया= स्वतःच्या लीलांनी

जगत्+त्रातुम्+आविर्भूतम्+अजम्(जो अज आहे, अर्थात ज्याचा जन्म झालेला नाही असा तो श्रीराम )+विभुम् (सर्व व्यापक, महान)- अर्थात, जगाला तारण्यासाठी जो आविर्भूत झाला आहे, जो अजन्मा आहे, जो विभू, म्हणजे सर्वव्यापक आहे.

या श्लोकात श्रीरामाची आणखी ठळक वैशिष्टये वर्णन केली आहेत.

रामाचे रूप लक्षात आणतांना, सर्वात ठळक बाब म्हणजे रामाचे आजानुबाहू; पण त्यानंतर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे रामाचा बाण. राम म्हटला की त्याच्या पाठीवर बाणाचा भाता, त्यात असलेले बाण, आणि एका हातात खड्ग हे आपल्या नजरे समोर येते. आपल्या दीर्घ बाहूंनी वरील शस्त्रें समर्थपणे चालवून राक्षसांचा नायनाट करणारा आणि भक्तांचे रक्षण करणारा असा राम.

परब्रह्माचा ‘जन्म’ होत नसतो, तर ते आविर्भूत होत असते. ते विभु म्हणजे सर्वव्यापक जरी असले , तरी भक्तांच्या संरक्षणासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी मनुष्य रूपात आविर्भूत होत असते.

आतापर्यंत आपण रामरक्षेतील सुरुवातीचे ३ श्लोक पाहिले. त्यात श्री रघुनाथाच्या चरित्राचा विस्तार, आणि जगाच्या उद्धारासाठी रामाचा झालेला ‘अविर्भाव’ यांचा उल्लेख आहे.

आता यापुढील श्लोक- या श्लोकापासून राम कवच सुरू होते.

रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌ ।

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥

‘प्राज्ञ’ म्हणजे विद्वान लोक ‘पापघ्नीं’ म्हणजे पापांचा नाश करणारी, आणि ‘सर्व कामदां’ म्हणजे सर्व कामना पूर्ण करणारी अशी  रामरक्षा पठण करतात.

इथून पुढच्या ओळीपासून रामरक्षा कवच सुरू होते. यात शरीरात सगळ्यात वर असणारे ‘शीर’ म्हणजे डोक्या पासून सुरुवात करून(‘शिरो मे राघवः पातु”) सर्वात खाली, म्हणजे आपल्या पायापर्यंत, (‘पादौ बिभीषण: श्रीद:”)  आपल्या  शरीराच्या सर्व अवयवांचे श्रीराम रक्षण करो अशी प्रार्थना केली आहे.

आपण काळजीपूर्वक पाहिले, तर या सर्व श्लोकांमध्ये, श्रीरामाचे पूर्ण चरित्र, कालक्रमानुसार आलेले आहे, असे दिसून येते.

श्रीराम हे रघुवंशी, म्हणून सुरुवातीला त्यांचा, राघवः असा उल्लेख आला आहे. आणि त्यानंतर दशरथाचा पुत्र, म्हणून दशरथात्मज. रघुवंशी ‘राघव’ माझ्या डोक्याचे रक्षण करो, तर दशरथाचा पुत्र असलेला श्रीराम माझ्या ‘भालाचे’ म्हणजेच कपाळाचे रक्षण करो.

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥

वडिलांनंतर आईचे अर्थात कौसल्येचे नाव येते. आणि आईच्या नंतर विश्वामित्रांचे  नांव येते. कौसल्यापुत्र श्रीराम माझ्या ‘दृशौ’ म्हणजे डोळ्यांचे रक्षण करो.

विश्वामित्रांना प्रिय असणारा श्रीराम माझ्या श्रुती म्हणजे कानाचे रक्षण करो.

इथे ‘नेत्र’ किंवा ‘कर्ण’ म्हटले नाही, हे लक्षात घ्यावे. ‘दृशौ’ म्हणजे दृष्टी म्हटले आहे. डोळे म्हणजे केवळ पाहण्याचा बाह्य अवयव आहे. दृष्टी मध्ये डोळे आणि आतील दृष्टीचे ज्ञानेंद्रिय दोहोंचा समावेश आहे. तसेच ‘श्रुती’ मध्ये कान आणि आतील कर्णेन्द्रिय दोन्हींचा समावेश आहे. तसेच ‘घ्राण’ म्हणजे नाक आणि आतील घ्राणेन्द्रिय दोन्हीचा समावेश आहे.

आपणास माहित  आहे, की जेंव्हा राम आणि लक्ष्मण थोडे मोठे झाले, वसिष्ठ ऋषींकडे विद्या प्राप्त करून आले, तेंव्हा ऋषि विश्वामित्र दशरथाकडे आले, आणि दशरथाला म्हणाले, “हे राजा, सांप्रत राक्षसांनी खूप धुमाकूळ माजवलेला असून, ते ऋषींना यज्ञ करू देत नाहीयेत. त्यामुळे राक्षसांचा निःपात करण्यासाठी आणि यज्ञ रक्षणासाठी तुझे हे दोन राजकुमार माझ्यासोबत दे” श्रीराम आणि लक्ष्मणाने विश्वामित्र ऋषींना या कामात सहकार्य केले, आणि ते त्यांना प्रिय झाले, म्हणून “विश्वामित्रप्रियः”

 ‘मखत्राता’- ‘मख’ म्हणजे यज्ञ. (लग्नात किंवा कुठल्याही शुभकार्यात ‘ग्रहमख’ करतात- ते म्हणजे नऊ ग्रहांना प्रसन्न करण्यासाठीचा यज्ञ.) मखत्राता म्हणजे ‘यज्ञाचे रक्षण करणारा’

त्यानंतरचे नांव ‘सौमित्रिवत्सल’ असे आहे. सौमित्री म्हणजे सुमित्रेचा पुत्र लक्ष्मण. सौमित्रिवत्सल म्हणजे लक्ष्मणावर वात्सल्य असलेला. श्रीरामाचे आपली कनिष्ठ भावावर, नुसते ‘प्रेम’ नव्हते तर ‘वात्सल्य’ होते हे लक्षात घेण्यासारखे आहे. वात्सल्य म्हणजे जे आईचे किंवा वडिलांचे मुलाप्रत असते, त्याला आपण वात्सल्य म्हणतो. तसेच वात्सल्य श्रीरामाचे आपल्या लहान भावाप्रति होते. रामायणात आदर्श नातेसंबंध कसे असावेत याचा वस्तुपाठ श्रीरामांनी घालून दिलेला आहे.

कौसल्यापुत्र श्रीराम माझ्या दृष्टीचे रक्षण करो; विश्वामित्रांना प्रिय असणारा राम माझ्या श्रुतीचे रक्षण करो; यज्ञाचे रक्षण करणारा श्रीराम माझ्या ‘घ्राणाचे’ रक्षण करो; आणि लक्ष्मणावर वात्सल्य असणारा श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो.

जिंव्हा विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥

त्यानंतर येणाऱ्या जिंव्हा या महत्वाच्या अवयवाचे रक्षण करण्यासाठी ‘विद्यानिधि’ श्रीरामाची प्रार्थना केली आहे.

त्यानंतर येणाऱ्या ‘कंठ’ या अवयवाचे रक्षण भरताने वंदन केलेल्या श्रीरामाने करावे अशी प्रार्थना केली आहे.

कंठ हा अवयव भावनांचे स्थान आहे. मनुष्य भावनावश झाल्यानंतर त्याचा कंठ अवरुद्ध होतो, घशात आवंढा दाटून येतो. भरताची श्रीरामाप्रत भक्ती ही अशा प्रकारची होती. श्रीराम लंकेहून अयोध्येला परत आल्यानंतर भरताशी झालेली गळाभेट आठवा. म्हणून या ठिकाणी कंठा साठी ‘भरत वंदित’ हे विशेषण अगदी योग्य वाटते.

स्कंध अर्थात खांद्यांसाठी ‘दिव्यायुध’ हे विशेषण तसेंच ‘भुजा’ अर्थात दण्ड किंवा बाहू यासाठी ‘भग्नेशकार्मुक’ हे विशेषण असेच चपखल बसते. रामाचे मुख्य शस्त्र हे धनुष्यबाण होते. आणि बाणाचा भाता खांद्यावर असतो.

विश्वामित्रांनी राम लक्ष्मणाकरवी आधी त्राटिकेचा वध करविला. तसेच इतर अनेक राक्षसांचा वध दोन्ही बंधूंनी केला. तदनंतर जनक राजाकडून आलेल्या आमंत्रणावरून विश्वामित्र ऋषी दोन्ही बंधूंना सीता स्वयंवराला घेऊन घेले. तिथे श्रीरामांनी शिवधनुष्याला प्रत्यंचा लावतांना ते तुटले, म्हणून भग्नेशकार्मुक असे नाव आले. ‘भग्नेशकार्मुक’ भग्न+ ईश+ कार्मुक; ईश अर्थात ‘शंकर’, ‘कार्मुक’ अर्थात धनुष्य. अर्थात, ज्याने श्री शंकराचे धनुष्य भग्न केले- तोडले- तो श्रीराम.

या श्लोकात श्रीरामाचे शिवधनुष्य भंगापर्यन्तचे चरित्र आले आहे.

आता त्यापुढील श्लोक:

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥seetapati shriram

जनकाच्या दरबारातील  स्वयंवरात श्रीरामाने सीतेचे वरण केले. तो सीतापति श्रीराम माझ्या हातांचे रक्षण करो.  लग्न करणे- म्हणजे “हात हातात देणे” वधूवर एकमेकांना हाताने माला  घालतात, म्हणजेच “वरतात”. या दृष्टीने इथे सीतापती श्रीराम माझ्या हातांचे रक्षण करो अशी प्रार्थना योग्य वाटते. 

श्रीराम जानकीशी स्वयंवर करून परत निघाले असतांना वाटेत जमदग्नीचा पुत्र परशुराम ‘जामदग्न्य’ याने श्रीरामाला शिवधनुष्य तोडल्यामुळे रागावून आव्हान दिले. त्यावेळी झालेल्या युद्धात परशुरामांना, श्रीराम हे श्रीविष्णूचे अवतार असल्याची खात्री झाल्यानंतर, त्यांच्या मुखातील अवतार ज्योती श्रीरामाच्या मुखात शिरली अशी कथा आहे.  जामदग्न्याला म्हणजेच परशुरामांना जिंकणारा म्हणून जामदग्न्यजित्‌.parshuram

श्रीराम सीतेशी विवाह करून अयोध्येला परत आले, नंतर कैकेयीच्या दुराग्रहामुळे वनवासात गेले. वनवासात सीता आणि लक्ष्मण त्यांच्या सोबत होते. श्रीराम पंचवटीला असतांना, रावणाची बहिण शूर्पणखा तेथे आली. लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले. शूर्पणखेचा आक्रोश ऐकून त्रिशिर, खर आणि दूषण हे राक्षस (जे की रावणाचे दूरचे भाऊ होते) चौदा हजार सैन्यासह धावून आले. रामाने त्या सर्वांचा वध केला. म्हणून ‘खरध्वंसी’ हे विशेषण येथे आले आहे.khar dushan killing by shriram

नंतर, सीता हरणाचा प्रसंग झाल्यानंतर, सीतेच्या शोधात असतांना, हनुमान, नळ, नीळ, सुग्रीव आणि जांबुवंत यांच्याशी श्रीरामाची भेट झाली. जाम्बुवन्ताला आश्रय देणारा, म्हणून ‘जाम्बवदाश्रयः’ हे विशेषण आले आहे.

“ खर राक्षसाचा वध करणारा श्रीराम माझ्या मध्य भागाचे रक्षण करो. जाम्बुवन्ताला आश्रय देणारा श्रीराम माझ्या ‘नाभि’ चे रक्षण करो.”

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

उरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥8॥

यापुढील श्लोकात सुग्रीवाचा ईश श्रीराम माझ्या कमरेचे रक्षण करो अशी प्रार्थना केली आहे. सुग्रीवाची कथा आपल्या सर्वांना माहिती आहे.

यापुढील शब्द आहे ‘सक्थिनी’. सक्थिनी हा शब्द आपल्या जास्त परिचयाचा नाही. मराठी मध्ये एकवचन आणि बहुवचन असते. पण संस्कृत मध्ये एकवचन, द्विवचन  आणि बहुवचन असे तीन प्रकार आहेत. ‘सक्थिन’ म्हणजे कंबर आणि जांघ यांच्या मधील भाग. जांघ हा शब्द मराठी आहे, तो संस्कृत मधील ‘जंघा’ पेक्षा वेगळा आहे.  ‘सक्थिनी’ हे सक्थिन या शब्दाचे द्विवचन आहे. “हनुमंताचा प्रभु असलेला श्रीराम माझ्या सक्थिनी चे रक्षण करो.”parts of body- sanskrit

संस्कृत मधील ‘उरू’ म्हणजे मराठीतील ‘जांघ’ किंवा ‘मांडी’. “राक्षसांच्या कुळाचा नाश करणारा श्रीराम माझ्या मांड्यांचे रक्षण करो.”

जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥9॥

मांडीच्या खालचा अवयव म्हणजे गुडघा. “जानु” म्हणजे गुडघा. जानुनी म्हणजे दोन्ही गुडघे. (जसे सक्थिन चे द्विवचन सक्थिनी होते, तसेच, जानु चे द्विवचन जानुनी झाले. ) त्यापुढील अवयव “जंघा”. संस्कृत मधील “जंघा” हे मराठीतील “जांघ” पेक्षा  वेगळे आहे. संस्कृत मध्ये “जंघा” म्हणजे “पोटरी”

ज्याने सेतू बांधला, असा श्रीराम माझ्या “जानुनी” म्हणजे गुडघ्यांचे रक्षण करो; आणि दशमुख रावणाचा वध केला तो श्रीराम माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करो.

ज्या रामाने बिभीषणाला “श्री” म्हणजे वैभव आणि राज्य दिले, तो श्रीराम, माझ्या पावलांचे रक्षण करो.

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्‌ ।

स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्‌ ॥10॥

 एतां म्हणजे अशाप्रकारे. श्रीरामाचे बल युक्त असणारी अशी ही (एतां) रक्षा जो पुण्यवान मनुष्य पठण करेल, तो चिरायु, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयी होईल.

याठिकाणी रामरक्षेतील मुख्य भाग म्हणजे ”कवच” संपले.

विशेष:आपल्याला एखादे वेळी बाका प्रसंग असेल, संकटात सापडलो असू, जिवाची भीती असेल, आणि पूर्ण रामरक्षा म्हणण्याइतका वेळ नसेल, तर नुसते हे “कवच” म्हटले, तरी कार्यभाग होतो, संकटातून रक्षण होते हा अनुभव आहे.  

 

माधव भोपे 

क्रमशः 

या पूर्वील लेख वाचण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1

For our U.S.A Readers:

Buy on Amazon

 

at $1.19 only

41CR5kGrwLL. SY445 SX342

For our U.K. readers:Acer Laptop

Buy on Amazon at Special prices

Laptops to fit your life style

UK Laptops 1200x90 1

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग-1

107046678

भगवान श्रीराम हे आपल्या भारतीयांच्या रोमा रोमात वसलेले आहेत.  आपल्या बोलण्यात, ठायी ठायी ‘राम’ येतो. 

रामरक्षा स्तोत्र हे बहुसंख्य भारतीयांच्या घरात म्हटले जाणारे स्तोत्र आहे.  आणि या स्तोत्राच्या दिव्य शक्तीचा अनुभव लोकांना वेळोवेळी येत असतो. 

आमच्या इथे अनेक पिढ्यांपासून हे स्तोत्र दररोज संध्याकाळी म्हटले जाते, जसे की ते अनेक घरांमध्ये म्हटले जाते. 

साधारण ४-५ वर्षांपूर्वी, यावर विचार करत असतांना, याबद्दल लिहावे, अशी प्रेरणा, झाली, आणि या स्तोत्राबद्दल, आमच्या फॅमिली whatsapp  group वर, काही भागांमध्ये,  लिहिण्यात आले. त्या लिखाणामध्ये निरनिराळ्या ठिकाणाहून घेतलेली माहिती आहेच, पण माझ्या मनाला भावलेले, सुचलेले, असे काही विचारही मांडले आहेत. त्यावेळी आणि त्यानंतरही, बऱ्याच जणांनी, हे लेख खूप उपयुक्त झाले असल्याचे कळविले. काही जणांनी ते सगळे एकत्र करून सेव्ह करून ठेवले.  रामरक्षा हे स्तोत्र कालातीत आहे. त्यामुळे, आज तेंव्हा ग्रुपवर टाकलेले भाग, काही सुधारणांसहित तसेच काही बदलांसहित   या ठिकाणी, ब्लॉगवर प्रकाशित करत आहे, जेणेकरून जास्तीत जास्त श्रीराम भक्तां पर्यन्त ते पोचतील. 

रामरक्षा स्तोत्र हे मंत्र म्हणून तर प्रभावी आहेच,  पण भक्तिरसामध्ये ओतप्रोत असे एक काव्य आहे. त्यामुळे याचा आस्वाद घेतांना, घाई  करून चालणार नाही. तर जशी आपण आपली आवडती वस्तू , डोळे बंद करून, तिचा स्वाद घेत, चाखत चाखत खातो, त्याप्रमाणे, यातील एकेक काव्यपंक्तीचा, कल्पनांचा, उपमांचा आस्वाद घेत घेत या स्तोत्राचे पठण-स्मरण  केले तर अगदी ब्रह्मानंदी टाळी लागू शकते. म्हणून आपण या स्तोत्राचा आस्वाद अनेक भागांमध्ये  घेणार आहोत.  पण त्याचबरोबर, सरते शेवटी, हे सर्व लेख एकत्र, एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावेत म्हणून, शेवटच्या भागात, सगळ्या लेखांचे एकत्र असे एक pdf  देणार आहोत, जे की ज्यांना पाहिजे त्यांना डाउनलोड करून घेऊन, आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉप वर सेव्ह करून ठेवता येईल.

 

आज त्या लेखमालेतील पहिला भाग प्रकाशित करीत आहे. 

सर्वप्रथम, संदर्भासाठी, श्रीराम रक्षा स्तोत्र शुद्ध स्वरूपात खाली देत आहे. 

श्रीरामरक्षास्तोत्रम्

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप्‌ छंदः। सीता शक्तिः। श्रीमान हनुमान्‌ कीलकम्‌ । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ।

अथ ध्यानम्‌

ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं

 पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्‌ ।

 वामाङ्कारूढ सीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं

 नानालङ्कार दीप्तं दधतमुरुजटामंडलं रामचन्द्रम् । ।

इति ध्यानम्‌

चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्‌ ।

एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्‌ ॥1॥

ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम्‌ ।

जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमंडितम्‌ ॥2॥

सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम्‌ ।

स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम्‌ ॥3॥

रामरक्षां पठेत्प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम्‌ ।

शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥4॥

कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती ।

घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥5॥

जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवंदितः ।

स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥6॥

करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्‌ ।

मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥7॥

सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।

ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत्‌ ॥8॥

जानुनी सेतुकृत्पातु जङ्घे दशमुखान्तकः ।

पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥9॥

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्‌ ।

स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्‌ ॥10॥

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः ।

न दृष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥11॥

रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्‌ ।

नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥12॥

जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाऽभिरक्षितम्‌ ।

यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥13॥

वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत्‌ ।

अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम्‌ ॥14॥

आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।

तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥

आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्‌ ।

अभिरामस्त्रिलोकानां   रामः श्रीमान्स नः प्रभुः ॥16॥

तरुणौ रूपसम्पन्नौ सुकुमारौ महाबलौ ।

पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥17॥

फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ ।

पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥18॥

शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्‌ ।

रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥19॥

आत्तसज्जधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ ।

रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम्‌ ॥20॥

सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा ।

गच्छन्मनोरथोस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥21॥

रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली ।

काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः ॥22॥

वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः ।

जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥23॥

इत्येतानि जपन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयाऽन्वितः ।

अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥24॥

रामं दूवार्दलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्‌ ।

स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर्न ते संसारिणो नराः ॥25॥

रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरं

काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्‌ ।

राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं

वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम्‌ ॥26॥

रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे ।

रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥27॥

 श्रीराम राम रघुनन्दनराम राम

श्रीराम राम भरताग्रज राम राम ।

श्रीराम राम रणकर्कश राम राम

श्रीराम राम शरणं भव राम राम ॥28॥

श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि

श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि ।

श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि

श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥29॥

माता रामो मत्पिता रामचन्द्रः

स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः ।

सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालु-

र्नान्यं जाने नैव जाने न जाने ॥30॥

दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा ।

पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्‌ ॥31॥

लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम ।

कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ॥32॥

मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्‌ ।

वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥33॥

कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्‌ ।

आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्‌ ॥34॥

आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदाम्‌ ।

लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्‌ ॥35॥

भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसम्पदाम्‌ ।

तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम्‌ ॥36॥

रामो राजमणिः सदा विजयते रामं रामेशं भजे

रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः ।

रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं

रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥37॥

राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे ।

सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ॥38॥

इति श्री बुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रम् सम्पूर्णम्

 

आता त्यावरील विवेचन:

श्री रामरक्षा स्तोत्र

श्री रामरक्षा स्तोत्र आपणा सर्वांनाच माहित आहे आणि त्याचे महत्त्वही आपणास माहित आहे.

रामरक्षा स्तोत्र हे ‘स्तोत्र मंत्र’ आहे. स्तोत्र हे सहसा एखाद्या देवतेचे गुणवर्णन करणारे काव्य असल्याचे दिसून येते. पण मंत्र म्हणजे शक्तिशाली अक्षर समूह. आपल्या संस्कृतीमध्ये असंख्य मन्त्र आहेत हे आपणास माहित आहे. आपण अशा स्तोत्र रूपी मंत्रांकडे कडे नीट लक्ष दिले तर आपणास असे दिसून येईल, की, प्रत्येक स्तोत्राचा एक ‘ऋषि’ असतो; म्हणजे, ते स्तोत्र रचणारा, किंवा, ज्याच्या द्वारे ते स्तोत्र प्रकट झाले, तो. तसेच प्रत्येक स्तोत्राची एक ‘देवता’ असते. तसेच, स्तोत्राच्या सुरुवातीला, ते स्तोत्र, कुठल्या ‘छंदात’ रचले गेले आहे, त्याचा उल्लेख असतो. तदनंतर, त्या स्तोत्राची ‘शक्ति’ कोण आहे याचा उल्लेख असतो. त्यानंतर, त्या स्तोत्राची  , किंवा मंत्राची , ‘कीलक’ असलेली देवता कोणती आहे, याचा उल्लेख असतो. कीलक म्हणजे किल्ली. स्तोत्र किंवा मंत्ररूप हा खजिना जर उघडायचा असेल तर त्याची किल्ली लावणे आवश्यक आहे. या रामरक्षा स्तोत्राची, हनुमान ही देवता कीलक आहे. आणि सरते शेवटी, त्या  स्तोत्राचा ‘विनियोग’ म्हणजेच ‘उपयोग’ कुणा किंवा कशा प्रीत्यर्थ करण्याचे योजले आहे, याचा उल्लेख असतो.

आपणा ‘श्री सूक्तामध्ये’ ‘जपे विनियोग:’ किंवा ‘अभिषेके विनियोग:’ असा, प्रसंगानुसार उच्चार करतो. श्री सूक्ता’ ने अभिषेक करणार असू, तर ‘अभिषेके विनियोग:’, किंवा, श्री सूक्ताचा जप करणार असू तर, ‘जपे विनियोग:’.

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य बुधकौशिक ऋषिः। श्री सीतारामचंद्रो देवता । अनुष्टुप्‌ छंदः। सीता शक्तिः। श्रीमद् हनुमान्‌ कीलकम्‌ । श्री सीतारामचंद्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः 

रामरक्षा स्तोत्राचे रचयिता, ‘बुधकौशिक’ ऋषि आहेत. बुधकौशिक ऋषि नक्की कोण होते, याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत. काहींच्या मते, महर्षि वाल्मिकी म्हणजेच बुधकौशिक ऋषि होत.  रामरक्षा स्तोत्राच्या १५ व्या श्लोकात, 

आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः ।

तथा लिखितवान्प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥15॥ असे म्हटले आहे, अर्थात, हर म्हणजे महादेव यांनी स्वप्नात येऊन संगीतल्याप्रमाणे, सकाळी बुधकौशिक ऋषींनी ही रामरक्षा लिहिली, असा उल्लेख आहे. काहींच्या मते, बुधकौशिक ऋषि म्हणजे विश्वामित्र ऋषि होत.  असो. 

सध्या तो विषय बाजूला ठेवू.

या स्तोत्राचे ‘श्री सीता रामचंद्र’ हे देवता आहेत. आपल्याकडे सर्व मुख्य देवता या जोडीजोडीनेच येतात. आणि त्यातही, स्त्री देवतेचे स्थान प्रथम असते, हे लक्षणीय आहे. एखाद्या स्तोत्रात जी देवता मध्यवर्ती असते, किंवा ज्या देवतेचे गुणवर्ण त्या स्तोत्रात केले असते, ती त्या स्तोत्राची ‘देवता’.

त्याच्यानंतर, ते स्तोत्र हे मुख्यता: कुठल्या ‘छंदात’ रचले गेले आहे, याचा उल्लेख येतो.

अनुष्टुप्  छंद हा संस्कृत काव्यामध्ये सर्वाधिक वापरला जाणारा छंद आहे. वेदांमध्ये याचा वापर झालेला आहे. रामायण, महाभारत, भगवद्गीता  यांतील अधिकांश श्लोक हे अनुष्टुप् छंदामध्ये आहेत. या छंदात ८- ८ वर्णांचे चार पाद, असे एकूण ३२ वर्ण असतात.

प्रत्येक स्तोत्राची/ मंत्राची, एक ‘शक्ति’ असते. या स्तोत्राची, ‘सीता’ ही शक्ति आहे.

आता ‘कीलका’ विषयी: कीलक म्हणजे किल्ली. प्रत्येक मंत्राची, एक कीलक देवता असते. त्या देवतेचे स्मरण केल्याशिवाय ते स्तोत्र फलीभूत होत नाही. रामरक्षा स्तोत्राचे कीलक म्हणजे ‘हनुमान’ आहे. हनुमान हा रामाचा परम भक्त होता. हनुमानरूपी देवतेची ‘किल्ली’ लावल्याशिवाय, हे स्तोत्र ‘उघडणार’ नाही.

सरते शेवटी, ह्या स्तोत्राचा ‘विनियोग’ म्हणजेच ‘उपयोग, कशा प्रीत्यर्थ, किंवा कुठल्या देवतेच्या प्रीत्यर्थ केला जात आहे, त्याचा उल्लेख.

बहुतेक स्तोत्रांमध्ये, सुरूवातीची ही प्राथमिक आणि आवश्यक माहिती  देऊन झाल्यानंतर, पुढील श्लोकामध्ये, त्या देवतेच्या, रूपाचे ‘ध्यान’ असते. म्हणून यापुढील श्लोकात, या स्तोत्राच्या देवतेचे, म्हणजे श्री रामचंद्राचे, व सीतेचे ध्यान केले आहे.

अथ ध्यानम्‌:

ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं ।

 पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम्‌ ॥

वामांकारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं ।

 नानालंकार दीप्तं दधतमुरुजटामंडनं रामचंद्रम् ॥

श्रीरामाच्या आकृतीचे स्मरण करतांना, आपल्याला त्यातील सर्वात प्रभावशाली  गोष्ट लगेच डोळ्यासमोर येणारी कुठली असेल, तर ती म्हणजे रामाचे दीर्घ आणि बलशाली बाहू!.‘जानु’ म्हणजे ‘गुडघा’ ‘आ’ म्हणजे पर्यंत. ज्याचे बाहू त्याच्या गुडघ्यां पर्यंत लांब आहेत, तो श्रीराम. असे ‘आजानु बाहू’ ajanubahuपुरूष हे लाखो करोडोंमध्ये एखादेच असतात. आपण जेंव्हा रामरक्षा ‘कवच’ म्हणतो, तेंव्हा, रामाचे विशाल बाहू आपले संरक्षण करताहेत, ही भावना आपोआपच आपल्या मनात येते . रामाचे आजानुबाहू हे त्याच्या धनुर्विद्येसाठी वरदान होते.

‘धृतशरधनुषं’ 1d5d8c2740a0dfb1546b074b6f531db5अर्थात, हातात धनुष्य आणि बाण घेतलेला. ‘बद्धपद्मासनस्थं’ अर्थात,  बद्धपद्मासन घातलेला. पीत वस्त्र नेसलेला,

ज्याचे नेत्र, नुकत्याच उमललेल्या कमला सोबत स्पर्धा करतात आणि ज्याच्या मुखावर  ‘प्रसन्न’ भाव आहे.

ज्याच्या ‘वाम’ म्हणजे डाव्या अंकावर म्हणजे मांडीवर सीता विराजमान आहे.117271780 178882337200818 2702431598286977701 n

(हातात धनुष्य बाण घेतलेला, आणि बद्ध पद्मासन घातलेला आणि डाव्या मांडीवर सीता बसलेली आहे, या तीन्ही गोष्टी एकाच वेळी कशा शक्य आहेत हे अजून मला समजले नाही. बद्ध पद्मासनामध्ये, पद्मासन घालून, आपले हात पाठीच्या मागून नेऊन नंतर दोन्ही पायांचे अंगठे हाताने पकडायचे असतात. अशा वेळी हात मोकळे नसतांना धनुष्य बाण कसे धरणार? तसेंच अशा अवस्थेमध्ये, सीतेला डाव्या मांडीवर कसे घेणार? या विषयी काही खुलासा कुठे मिळतो का याचा शोध घेत आहे. मध्य प्रदेशातील हरदा येथे श्रीरामाची मूर्ती, डाव्या मांडीवर सीता बसलेली, अशी आहे. इतर कुठे अशी मूर्ति दिसत नाही.)  

आणि डाव्या बाजूला बसलेल्या सीतेच्या मुख कमलाकडे कडे ‘मिलल्लोचनं’ म्हणजे ज्याचे डोळे खिळले आहेत. आणि डोळे कसे, तर ‘नीरदाभं’ म्हणजे पाण्याने भरलेल्या काळ्या मेघांसारखे.main qimg 1d5b1752eb85adc08b2b37b63a0bc565 pjlq नाना+ अलंकार +दीप्तं म्हणजे विविध अलंकारांनी दीप्त झालेला; दधतम् म्हणजे  धारण करीत असलेला, काय? तर ‘उरु जटा’ उरु म्हणजे मांड्या. ‘उरु जटामंडनं’ म्हणजे मांड्यांपर्यंत रुळणाऱ्या जटांनी मंडित झालेला असा तो रामचंद्र. या ठिकाणी ‘जटामंडलं’ असेही काही ठिकाणी पाहण्यात येते. ‘जटामंडलं’ असा शब्द घेतल्यास  ज्याच्या भोवती मांड्यांपर्यंत रुळणाऱ्या जटांचे ‘मंडल’ आहे असा घेता येतो. मला व्यक्तिशः ‘जटामंडनं’ अधिक योग्य वाटते.

रामरक्षेला सुरुवात करतांना डोळे मिटून, अशा प्रकारे श्रीरामाचे रूप डोळ्यासमोर आणल्या नंतर, भाव समाधि लागणार नाही तर काय!  या इथे ‘ध्यान’ समाप्ति होते. ‘इति ध्यानम्.’    …..

क्रमशः 

पुढील येणारे भाग अवश्य वाचा, आणि सर्वात शेवटी येणाऱ्या भागात दिले जाणारे पीडीएफ डॉक्युमेंट सेव्ह करून ठेवा.

श्री रामरक्षा स्तोत्राचे अंतरंग- bhag 2 

 

 

For our U.S.A Readers:

Buy on Amazon

 

at $1.19 only

41CR5kGrwLL. SY445 SX342

For our U.K. readers:Acer Laptop

Buy on Amazon at Special prices

Laptops to fit your life style

UK Laptops 1200x90 1

पावसाळ्यातील रानमेवा-जांभूळ

Syzygium cumini fruits dark

An article in Health and Wellness category.

उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला, की आंबे हळू हळू कमी व्हायला लागतात, आणि जांभळांचा मोसम सुरू होतो. बाजारात हळू हळू टपोरी, चमकदार जांभळे दिसायला लागतात. आंब्यांच्या मोसमात पोटभर आंबे खाऊन जर अजीर्ण झाले असेल, तर त्यावर जांभळे खाणे हा एक उतारा समजला जातो.

जांभूळ हे एक विशुद्ध भारतीय फळ आहे. जांभळाला संस्कृत मध्ये जंबू हे नांव आहे. तसेच भारताचे एक नांव जंबूद्वीप असेही आहे. त्यावरून असे दिसते की, पूर्वीच्या काळी  भारतात जांभळाच्या झाडांची इतकी रेलचेल होती की या फळांवरून देशाचे नांव जम्बू द्वीप असे पडले!  आजही भारतात जांभळाची झाडे विपुल प्रमाणात आहेत, आणि देशातील जवळ जवळ सर्वच भागांत, अगदी प्रत्येकाला या फळाचा स्वाद परिचित आहे.IMG 20200621 180107

भगवान श्रीकृष्णाचा रंग ही जांभळासारखा होता असे पुराणात वर्णन आहे.images 30 भगवान श्रीरामांनी चौदा वर्षांच्या वनवासात फळें  आणि कंदमुळें  खाऊन जीवन व्यतीत केले हे आपण जाणतो. त्यात जांभळांच्या फळांचाही मोठा सहभाग आहे असा रामायणात उल्लेख सापडतो असे म्हणतात.ramayana and ram sita 1649493860

जांभूळ हे विशिष्ट ऋतूत येणारे मोसमी फळ आहे. खाण्याला रुचकर असण्यासोबत, याचे अनेक औषधी गुणधर्मही प्रसिद्ध आहेत. जांभूळ हे मुख्यतः आम्लधर्मीय गुणाचे फळ असून, याची चव मात्र गोड आणि तुरट अशी आहे. जांभळामध्ये ग्लुकोज आणि फ्रुकटोज विपुल प्रमाणात असते. सोबतच शरीराला आवश्यक असणारे जवळ जवळ सगळे लवण(क्षार) यात असतात.

जांभूळ खाण्याचे फायदे:

  1. पाचन क्रियेसाठी जांभूळ अत्यंत उपयोगी मानले जाते. जांभूळ खाल्ल्याने पोटाशी, पचनाशी संबंधित अनेक तक्रारी दूर होतात.
  2. मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ हे एक रामबाण उपाय समजले जाते. जांभळाच्या बिया वाळवून, त्याची पावडर करून तिचे सेवन केल्यास मधुमेहाच्या रोग्यांना रक्तशर्करा आटोक्यात ठेवण्यासाठी मदत होते. जांभळाचे फळ हे इतर फळांप्रमाणेच रक्त शर्करा वाढवणारे आहे हे कृपया लक्षात ठेवावे. त्यामुळे मधुमेहा च्या रोग्यांनी जांभळे खातेवेळी ही गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे. रक्त शर्करा कमी करण्यासाठी जांभळाचे फळ नाही तर त्याच्या बिया उपयोगी आहेत. तसेच सगळ्याच मधुमेहा च्या तक्रारींवर सरसकट जांभळाच्या बियांचा उपयोग आपल्या मनाने करणे योग्य नाही. त्यासाठी वैद्यांचा सल्ला घेणे हे आवश्यक आहे.
  3. त्याशिवाय याच्यात कॅन्सरप्रतिरोधक तत्व सुद्धा असतात.याशिवाय kidney stone (मुतखडा) रोकण्यासाठीही याचा उपयोग होतो. त्यासाठी याच्या बिया वाळवून, बारीक दळून, पाणी किंवा दहयासोबत घेण्याचे सांगितले जाते.
  4. अतिसारावर जांभूळ सेंधव मिठासोबत खाल्ल्याने फायदा होतो. रक्तयुक्त अतिसारामध्येही याच्या बियांचा उपयोग करतात.
  5. दात आणि हिरड्यांशी संबंधित अनेक समस्यांवर जांभळाचा उपयोग होतो. जांभळाच्या बियांच्या पावडर ने दात घासून, हिरड्यांची मालिश केल्यास दोन्हीही निरोगी राहतात.

अर्थात, वरील सर्व माहिती ही सर्वसाधारण असून, वैद्यकीय सल्ला नाही हे नक्की लक्षात ठेवावे.

जांभळाच्या लाकडाचा खूप उपयोग होतो. इमारतीसाठी वापरायला याचे लाकूड उत्कृष्ट समजले जाते. याच्यात पाण्यात टिकून राहण्याची शक्ति असते. जांभळाच्या लाकडाचा मोठा जाडसर तुकडा पाण्याच्या टाकीत ठेवल्यास त्या टाकीत (पाण्यात) शेवाळ किंवा हिरवे साचत नाही आणि टाकीला दीर्घकाळ साफ करण्याची गरज पडत नाही. पूर्वीच्या काळी जलस्रोत जसे की नदी, नाले, विहिरी, यांच्या काठावर जांभळाचे झाड नेहमी लावले जायचे. कारण याच्या पानांमध्येही जंतु प्रतिरोधक (anti bacterial) शक्ति आहे.

जांभळाच्या लाकडाची अजून एक विशेषता म्हणजे याचे लाकूड दीर्घकाळपर्यन्त पाण्यात सडत नाही. या वैशिष्ट्यामुळे याच्या लाकडांचा उपयोग नाव बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातो.

जांभूळ हे औषधी गुणांचे भांडार असून, शेतकर्‍यासाठीही अधिक उत्पन्न देणारे फळ आहे.

नद्या आणि इतर जलप्रवाहांच्या किनार्‍यावर मातीची होणारी धूप (क्षरण) टाळण्यासाठी जांभळाची झाडे अत्यंत उपयुक्त आहेत.

अजूनपर्यंत जांभळाची योजनाबद्ध अशी शेती फार कमी बघायला मिळते. देशातील बहुतेक भागात अनियोजित प्रकारेच जांभळाचे उत्पन्न घेतले जाते. खरे तर जांभळांच्या मोसमात फळांना खूप मागणी असते आणि शहरात तर भाव ही चांगला मिळतो. सध्या पुण्यात, जांभळे 80 रुपयांपासून 120 रुपयांपर्यंत पावकिलोचा भाव आहे. म्हणजे जवळ जवळ 320 ते 480 रुपये किलोचा भाव. हा भाव सफरचंद किंवा इतर अनेक फळांपेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे जांभळाच्या नियोजनबद्ध उत्पादनाला भारतात खूप वाव आहे असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्याचबरोबर जांभळांपासूनजेली, मुरब्बाही बनवता हेऊ शकतो.

खरं तर जांभूळ हे भारतीयांचे मुख्य फळ आहे आणि त्याचे संरक्षण आणि संवर्धन सगळ्यांनी करायला पाहिजे.

amazon logo
GO TO OUR AMAZON SHOP
wall clocks
CLICK FOR ONLINE SHOPPING AT AMAZON.

This site contains product affiliate links for Amazon and other sellers. We may receive a small commission if you make a purchase after clicking on one of these links, without any additional cost to the purchaser.

अंगलट येऊ शकणारे साहस

adult man with grumpy expression 1308 133857

आजकाल समाजाभिमुख असणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे, आणि ‘कॉम्प्युटराभिमुख’ असणाऱ्या नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. आणि करोनाच्या नंतर तर, वर्क फ्रॉम होम हा परवलीचा शब्द झाला आहे. पूर्वी ‘कॉम्प्युटराभिमुख’ असणाऱ्या नोकऱ्याही, जेंव्हा ‘वर्क फ्रॉम ऑफिस’ होत्या, तेंव्हा, काही प्रमाणात का होईना, पण ह्यूमन इंटरअॅक्शन एकमेकांसोबत होत असेल. पण आता, ते प्रमाण ही कमी झाले आहे. असो. हा काळाचा महिमा आहे.  

बँकेतील माझ्या कार्यकाळापैकी, जवळ जवळ नव्वद टक्के काळ, ‘समाजाभिमुख’ असण्यात गेला. त्यामुळे अनेक धडे शिकायला मिळाले. अहंकाराचे कंगोरे, घासून घासून गुळगळीत करावे लागले. लवचिकपणा अंगी बाणवावा लागला. काय करावे, आणि काय करू नये, याचे धडे, प्रत्यक्ष अनुभवातून मिळत गेले. असाच एक किस्सा, येथे सांगावासा वाटतो. त्यावेळी मी अजिंठा या गावी फील्ड ऑफिसर (क्षेत्र अधिकारी) म्हणून होतो. मी आणि माझा मॅनेजर, असे दोघेच अधिकारी, आणि ३-४ जणांचा स्टाफ तिथे होतो. अजिंठा इथे सरपंच ‘चाउस’ होते, आणि त्यांचा भयंकर दरारा होता. भले भले सरकारी अधिकारी त्यांना टरकून असत. मी एक वर्षांनंतर अजिंठ्यालाच मॅनेजर म्हणून राहिलो, त्यावेळी त्यांच्याशी यशस्वीपणे चांगले संबंध ठेवता आले, आणि तेही कुठलेही कॉम्प्रोमाइज न करता, पण तो किस्सा पुढे कधीतरी.

मला का कुणास ठाऊक, पण शक्य असूनही पैसे न भरणारे, विशेषतः पैसेवाले असून कर्ज न फेडणाऱ्या थकबाकीदारांबद्दल फार राग असे. आणि एखादा हट्टी कर्जदार, असा असला, की त्याचे खाते वसूल करणे हे मला वैयक्तिक आव्हान वाटत असे. तरुण रक्त होते, आणि कुठल्याही परिणामांची  परवा वाटत नव्हती. त्यामुळे कोणतेही साहस करायला काहीच वाटत नसे.

आमच्या शाखेची मुख्य कर्जे शेतीविषयक होती. पण काही कर्जे ही व्यापाऱ्यांना खेळते भांडवल इत्यादिसाठी ही होती. त्यातील बँकेपासून अगदी जवळ, कोपऱ्यावर असणारे एक कापड दुकानासाठी एक लाखाचे कर्ज होते. त्या माणसाचे नांव असेच काही पठाण वगैरे होते. तो त्याच्या खात्यात मूळ  रक्कम तर जाऊदे, व्याजही अजिबात भरत नव्हता. दुकान त्याचे चांगले चालत होते.images 29 मी अनेकदा त्याच्या दुकानात चकरा मारून त्याला सारखे विनवीत होतो, की कमीत कमी व्याज भरून, खाते नविनीकरण करून घ्या, स्टॉक स्टेटमेंट द्या, इत्यादि. पण तो प्रत्येक वेळी गोड बोलून नुसतेच हो हो म्हणत असे. त्याला अनेक नोटिसा पाठवून झाल्या. शेवटी एक नोटिस वकिलातर्फेही पाठवली. पण त्याच्यावर ढिम्म परिणाम नव्हता. शेवटी मी त्याला, तुमच्या दुकानाचा लिलाव करू, अशीही नोटिस पाठवली. पण त्याच्यावर काही परिणाम नव्हता. ही गोष्ट साधारण १९९१-९२ सालची आहे. तो काहीच प्रतिसाद देत नसल्याने मला फारच राग येत होता. अशातच एके दिवशी, मी आणि माझे मॅनेजर, एका शेतावर, पाहणी करायला गेलो होतो. तो शेतकरी बहुतेक त्या दुकानदाराचा ओळखीचा असावा असा माझा कयास होता. त्याचा बिझनेस ही होता. आमची तिथली पाहणी झाल्यावर मी त्याला म्हणालो, 38499 original“ आपसे एक बात करनेकी थी.  ये ऐसा कापड दुकान है. वो हम नीलाम करने  जा रहे है. अगर आपके जानकारी मे, कोई उसे लेनेवाला हो, तो बताइये.”.  हा माझा पूर्ण आगाऊपणा होता. वास्तविक माझे मॅनेजर सोबत होते. ते काही बोलले असते तर गोष्ट वेगळी. पण माझा स्वभाव अशा गोष्टी वैय्यक्तीक आव्हान म्हणून घेण्याचा असल्यामुळे, काहीही करून हे खाते वसूल करायचेच, अशी जिद्द होती. मी त्या माणसाजवळ मुद्दामहून बोललो, जेणे करून की त्याने त्याच्या त्या ओळखीच्या मित्राला सांगावे, आणि त्याच्या लक्षात आम्ही किती सिरीयस आहोत, हे यावे. तो माणूस काही बोलला नाही. आम्ही बँकेत परत आलो.

त्या घटनेनंतर एक दोन दिवस झाले. मी त्यावेळी अजिंठा गावाच्या बाहेर, अगदी एका बाजूला एक चार खोल्यांचा वाडा होता, त्यातील दोन खोल्यांत फॅमिली मुलांसकट राहत होतो. इतर दोन खोल्यांमध्ये आमचे Head Cashier राहत होते. त्या दिवशी बँकेतून घरी येऊन, नंतर बाहेर फिरायला जाऊन आल्यानंतर, तिन्ही सांजेच्या अंधारात, मी वाड्यातील अंगणात बाजेवर एकटाच बसलो होतो. त्यावेळी वाड्याच्या  दरवाजातून तो दुकानदार ‘पठाण’ “ अंदर आऊ क्या साब?” असे म्हणून आत आला. अशा वेळी अनपेक्षितपणे त्याला असा घरी आलेला पाहून मला क्षणभर काहीच समजले नाही. पण दुसऱ्याच क्षणी मी स्वतःला सावरून, अरे, आइये, आईए पठाण साब! आओ, बैठो! असे म्हणून त्याचे अगदी तोंड भरून स्वागत केले. बाजूलाच बसायला त्याला खुर्ची दिली. आतमध्ये जाऊन, त्याच्यासाठी पाणी घेऊन आलो, आणि घरात चहा टाकायला सांगितला. आधी तो बिचकत बिचकत बोलत होता. त्याचे डोळे भिरभरत होते. आधीच मोठे असलेल्या  त्याच्या डोळ्यांत एक लाल झाक दिसत होती. पण मी त्याच्याशी अगदी जिवलग मित्र असल्यासारखा बोलत होतो. आणि हळू हळू त्याचे डोळे स्थिर झाले. रिलॅक्स झाले. आणि तोही तितक्याच आत्मीयतेने बोलू लागला. बोलण्यात मी चुकूनही त्याच्या दुकानाच्या थकबाकीचा विषय येऊ दिला नाही. धंदा कसा चाललाय, शेती काय म्हणते आहे, इत्यादि विषयांवर बोलत राहिलो. तोही त्याच्या अडचणी सांगत राहीला. चहा आला. आम्ही दोघांनी चहा घेतला. आणि मग एका क्षणी तो एकदम उठून उभा राहिला, आणि म्हणाला, “अच्छा, खुदा हाफिज, साब! चलता हूं!” मग थोडे थांबून, त्याने डोळे बारीक करून विचारले, “क्या साब, आप हमारा शॉप नीलाम करने वाले है बोलके सुने. क्या बात है?” माझ्या लक्षात सगळा प्रकार आला. मी त्याला म्हणालो, “देखो भाई, नोकरी है. बँक के टार्गेट रहते है. मेरी तुम्हारी कोई पर्सनल दुशमनी तो है नही. लेकिन बोलना पडता है. आप बुरा मत मानिये. मै आपको दोस्त की हैसियत से दरखवास्त करूंगा कि आपने अगर पैसे भर दिये तो अच्छा रहेगा. इसके उपर आपकी मर्जी!”

“साब, आज हम दोनोकी किस्मत अच्छी है. बहुत अच्छी बात हुई. आपसे बात करके अच्छा लगा. लेकिन कुछ ऐसी  वैसी  बात होती, तो न जाने आज क्या हो जाता.” इतका वेळ त्याने त्याचा एक हात पाठीमागे ठेवलेला होता. तिकडे इशारा करून तो म्हणाला, “आज मैं खमिस के अंदर  ये डण्डा साथ में लेके आया था. मैं बहुत गुस्से में था. न जाने क्या हो जाता.!”  अच्छा साब, चलता हूँ, खुदा हाफिज!” असे म्हणून तो बाहेरच्या अंधारात दिसेनासा झाला.

तो गेल्यावर मी बराच वेळ सुन्न होऊन तो गेला त्या दिशेकडे पहात होतो. त्यादिवशी असे तसे काही न बोलता, अगदी योग्य तेच, योग्य त्या टोनमध्ये, न कळतच माझ्या तोंडून निघाले होते, आणि अशा वेळी परमेश्वरच आपल्याला बुद्धि देतो, हा माझा विश्वास अधिक दृढ झाला.  माझ्या ‘त्या शेतावरील’  बोलण्याचा त्याच्यावर अपेक्षित परिणाम न होता, उलटाच परिणाम झालेला दिसत होता. आणि तो तावातावात थेट माझ्या घरी येऊन ठेपला होता.  त्यादिवशी मी एक धडा शिकलो. अगदी टोकाचे कोणाला बोलायचे नाही, कायद्याने जे होईल ते करायचे, पण कोणाला दुखवेल असे बोलायचे नाही, हा धडा या प्रसंगाने मला शिकायला मिळाला.

पोस्ट स्क्रिप्ट: त्या कर्जाचे पुढे काय झाले, ही उत्सुकता असेल. तर आम्ही नंतर रीतसर नोटिसा वगैरे पाठवून, कोर्टात केस दाखल केली. कोर्टात केस चालत राहिली. आणि मी तिथे असेपर्यंत तरी ते कर्ज काही वसूल होऊ शकले नाही.

 

अशाच अजून काही ‘साहसांच्या’ कथा यथावकाश पुढील भागांत .

 

आला पाऊस !

rain 5115710 1280

आला पाऊस !

पहिला पाऊस आला की मन अगदी आनंदून जाते. अशा वेळी, आपल्या भावना व्यक्त करायला कवि, कवियत्री यांच्या शब्दांचा सहारा घेतल्या वाचून आपल्या भावना व्यक्त करणे अवघड होते. 

खानदेशच्या महान कवियत्री, बहिणाबाई चौधरी यांनी केलेले  खेड्यातल्या पहिल्या पावसाचे वर्णन हे त्यांच्या कवीमनाची साक्ष देते. (यातील आज आपल्याला कठीण वाटणाऱ्या शब्दांचा अर्थ शेवटी दिलेला आहे)

आला पह्यला पाऊस

शिपडली भुई सारी

धरत्रीचा परमय

माझं मन गेलं भरी0aeaa44d540b5bffa4807e13a15be10f

आला पाऊस पाऊस

आता सरीवर सरी

शेतं शिवार भिजले

नदी नाले गेले भरीsmall waterfall rain forest rock river ecology beautiful nature 49442 674

आला पाऊस पाऊस’

आता धूमधडाक्यानं

घर लागले गयाले

खारी गेली वाहीसन

आला पाऊस पाऊस

ललकारी ते ठोकत

पोरं निघाले भिजत

दारी चिल्लाया  मारतimages 26

आला पाऊस पाऊस

गडगडाट करत

धडधड करे छाती

पोरं दडले घरात

आता उगू दे रे शेतं

आला पाऊस पाऊस

वऱ्हे येऊ दे रे रोपं

आता फिटली हाऊसgrass 7089807 1280

येता पाऊस पाऊस

पावसाची लागे झडी  

आता खा रे वडे भजे

घरांमधी बसा दडी

देवा पाऊस पाऊस

तुझ्या डोयातले आंस

दैवा तुझा रे हारास

जीवा तुझी रे मिरास !

बहिणाबाई चौधरी 

!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

 

 

 

 

कठिण शब्दांचा अर्थ:

पह्यला= पहिला

धरत्रीचा परमय= धरित्रीचा परिमळ, म्हणजेच सुगंध

गयाले= गळायला 

खारी= पिवळी चिक्कन माती

वाहीसन= वाहून

चिल्लाया= आरोळ्या

वऱ्हे= वर

हाऊस= हौस

घरांमधी बसा दडी= घरात दडी मारून बसा

तुझ्या डोयातले आंस= तुझ्या डोळ्यातले अश्रू

हारास= लिलाव