https://goodworld.in A website by Madhav Bhope

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

 

cyber-fraud-3

सायबर फ्रॉड- (३)
 
 
*बँकस्य कथा रम्या:*
*सायबर फ्रॉड..(३)*

माझा गोंधळलेला चेहरा पाहून मला डोळ्यांनं खुणवून माझा हात धरून बावधनकर साहेब मला बाजूला घेऊन गेले आणि म्हणाले..
“साहेब, तुमची नक्की खात्री आहे की हा डिजीएम साहेबांचाच फोन आहे ?”

मी उसळून म्हणालो..
“अरे ! हा काय प्रश्न झाला ? मी बरेच दिवस डिजीएम साहेबांच्या सहवासात राहिलो आहे, त्यांचा आवाज मी चांगलाच ओळखतो. मी खात्रीनं सांगू शकतो की हा नक्की त्यांचाच आवाज आहे. पण.. तुम्ही असं का विचारताय ?”

“कारण मला शंका येतेय की पलीकडून बोलणारी व्यक्ती आपले डिजीएम साहेब नसावेत..”

कसलातरी विचार करीत गंभीर चेहऱ्याने बावधनकर साहेब म्हणाले.

“कशावरून..?” मी विचारलं.

“हा आवाज, ही बोलण्याची पद्धत जरी हुबेहूब आपल्या डिजीएम साहेबां सारखीच असली तरी एका गोष्टीमुळे शंका येतेय. ती म्हणजे.. कितीही चिडले तरी आपले डिजीएम साहेब कधीही आणि कुणालाही अजिबात अशा शिव्या देत नाहीत.. कुणाबद्दल साधे अपशब्दही ते कधी वापरत नाहीत..”

बावधनकर साहेबांनी व्यक्त केलेली शंका तशी अगदी यथार्थ अशीच होती. आमचे रकिब साहेब खूप मृदु हृदयाचे होते. कदाचित आमच्याकडून पैसे पाठविण्यास उशीर झाल्याने ते चिडले असतील आणि तशा उतावीळ, उत्तेजित अवस्थेत त्यांच्या तोंडून ते अपशब्द बाहेर पडले असावेत.

अचानक मला आठवलं..

डिजीएम साहेबांचे व्यवस्थापकीय सचिव (Adm. Sec. to DGM) श्री. अनिल सास्तुरे हे माझे बॅचमेट, माझे जवळचे मित्र होते. त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली तर..?

लगेच मी सास्तुरे साहेबांना फोन लावला. सुदैवाने त्यांनी तो पहिल्याच झटक्यात उचलला. दुपारपासून झालेला घटनाक्रम मी त्यांना थोडक्यात सांगितला. त्यावर ते म्हणाले..

“डिजीएम साहेब तर आज सकाळपासून ऑफिसमध्येच आहेत. तरी देखील त्यांनी तुला असा फोन केला होता का ? याबद्दल त्यांनाच विचारून लगेच तुला कळवतो..”

अवघ्या मिनिटाभरातच सास्तुरे साहेबांचा फोन आला. ते म्हणाले..

“अरे, डिजीएम साहेबांना मी तुझा किस्सा सांगितला तेव्हा ते खूप मोठ्यानं हसले आणि म्हणाले की कुणीतरी प्रॅक्टिकल जोक केला असावा. ते तर विनोदाने असंही म्हणाले की.. त्या कोटनिसला सांगा की पैसे मागायचेच असते तर मी कमीतकमी दोन तीन लाख रुपये तरी मागितले असते. माझ्या नावाने फक्त चाळीस हजार रुपये मागून त्या जोक करणाऱ्या व्यक्तीने एकप्रकारे अप्रत्यक्षपणे माझी लायकी कमी लेखून माझा अपमानच केला आहे..”

थरथरत्या स्वरातच सास्तुरेंना “थॅन्क्स..!” म्हणून मी कॅशियर कडे धाव घेतली. “सॉरी.. पण आता पैसे पाठवायची गरज नाही आहे..” असं त्याला सांगून ते व्हाउचर आणि चाळीस हजार रुपये परत घेतले आणि सुटकेचा निःश्वास टाकला.!

एव्हाना, सास्तुरे साहेबांनी मला काय सांगितलं असावं याचा बावधनकर साहेबांना अंदाज आलाच होता. ते म्हणाले..

“तुम्हाला त्या नकली डिजीएमचा फोन किती वाजता आला होता ?”
“अं.. ठीक दोन वाजता..!”
“अच्छा..! आणि किती वेळात वैजापूरला पोहोचतो असं त्यांनी सांगितलं..?”
“अर्ध्या तासात..!”
“पहा..! आत्ता साडेतीन होतायेत. म्हणजे तब्बल दीड तास झाला त्याचा फोन येऊन. एवढ्या वेळात तर औरंगाबादहून सुद्धा इथपर्यंत पोहोचता येतं..”
बावधनकर साहेब बोलत असतानाच माझा मोबाईल वाजला. नंबर पाहून मी म्हटलं..
“हा त्या नकली डिजीएम चाच फोन आहे..”
“द्या तो फोन इकडे..! आता मीच बोलतो त्याच्याशी..! मघाशी विनाकारण खूप शिव्या ऐकून घेतल्या त्याच्या.. !!”
असं म्हणून बावधनकर साहेबांनी माझ्याकडून फोन जवळ जवळ हिसकावूनच घेतला.

“नमस्ते साब..! बावधनकर बात कर रहा हूँ..!”
“अरे ! क्या sss बावधनकरजी ? आखिर क्या.. प्रॉब्लेम क्या है जी ? अभी तक उस खाते में पैसे क्यों नहीं जमा हुए ?”
“साब, अभी यहां कनेक्टिव्हिटी का थोड़ा प्रॉब्लेम चल रहा है.. बस कुछ ही देर में सॉल्व्ह हो जाएंगा.. लेकिन सर, आप तो आधे घंटे में यहां आने वाले थे.. क्यों नहीं पहुंचे सर अभी तक ?”
“अरे, रास्ते में हमारी लासूर ब्रँच पड़ती है ना, वहीं पर थोड़ी देर के लिए रुका हूँ..”

“तू वहीं रुक साले sss ! हम पुलिस को लेकर वहीं पर पहुंच रहे है ! खुद को ज्यादा शाणा समझता है क्या ? अभी तुझे तेरी नानी याद दिलाता हूँ.. !!”

बावधनकर साहेबांनी असा काही रुद्रावतार धारण केला की पलीकडच्या त्या नकली डिजीएमने घाबरून फोनच बंद केला. खरं तर त्यांना आणखी खूप शिव्या द्यायच्या होत्या त्या तोतया डिजीएमला.. पण त्याने फोनच कट केल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला.

त्यानंतर अष्टपुत्रे साहेबांच्या केबिनमध्ये बसून आम्ही त्या तोतया डिजीएमने पाठविलेल्या अकाउंट नंबर बद्दल डिटेल एन्कवायरी केली तेंव्हा समजलं की SBI च्या गाझियाबाद शाखेचं ते खातं कुणा दीपक कुमार चौरसिया नावाच्या व्यक्तीचं होतं. त्या खात्यातील काही अलीकडचे व्यवहार तपासले असता एक धक्कादायक बाब उघड झाली. 

ती अशी की गेल्या काही दिवसात देशाच्या विविध भागातून त्या खात्यात चाळीस चाळीस हजार रुपये जमा झाल्याच्या अनेक नोंदी होत्या. हे पैसे खात्यात जमा होताच लगेच काढून घेण्यात आले होते आणि सध्या त्या खात्यात फक्त मिनिमम बॅलन्स बाकी ठेवण्यात आला होता. म्हणजेच हे एक मोठं रॅकेट होतं आणि देशाच्या विविध राज्यांत ते पसरलेलं होतं. त्यावेळी एटीएम द्वारे एका खात्यातून एका दिवसात जास्तीतजास्त चाळीस हजार रुपयेच काढता येत असल्याने तेवढीच रक्कम सर्वांकडून मागविण्यात आली असावी.

अष्टपुत्रे साहेबांनी मागविलेला चहा पिऊन आणि त्यांचे आभार मानून बँकेत परतलो. केवळ आमचे अकाउंटंट श्री सुनील बावधनकर यांच्या सतर्कतेमुळेच आज फार मोठ्या फसवणुकी पासून मी वाचलो होतो. त्यामुळे त्यांचे शतशः आभार मानले आणि ताबडतोब रिजनल ऑफिसमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर झालेला सर्व प्रकार घातला. तसंच फसवणुकीचा प्रयत्न झाल्याबद्दल अज्ञात व्यक्ती विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करावी का ? याबद्दल वरिष्ठांना सल्लाही विचारला.

मात्र “प्रत्यक्षात पैशाचं कोणतंही नुकसान झालं नसल्याने पोलिसांत तक्रार केल्यास प्रकरणास विनाकारण चुकीची प्रसिद्धी मिळून बँकेची बदनामीच होईल..” असे कारण देत वरिष्ठांनी पोलिसांत तक्रार देण्याची परवानगी दिली नाही. तसंच ही बाब गुप्तच ठेवा आणि झालेल्या प्रकरणाबद्दल गावात किंवा स्टाफमध्ये अजिबात चर्चा करू नका असा वैयक्तिक खाजगी सल्लाही दिला.

ज्या खात्याचा उपयोग करून बसल्या बसल्या केवळ मोबाईल वर बोलून अनेकांची फसवणूक केली जात आहे, “तो” (दीपक कुमार चौरसियाचा) खाते नंबर व “तो”(तोतया डिजीएमचा) मोबाईल नंबर पोलिसांना दिल्यास ते या प्रकरणी सखोल चौकशी करतील आणि गुन्हेगारांना अटक करतील.. परिणामत: भविष्यात होणाऱ्या अनेकांच्या संभाव्य फसवणुकीला आळा घालता येईल, असं मला वाटत होतं. परंतु वरिष्ठांच्या आदेशाचं तंतोतंत पालन करणं मला भाग होतं. त्यामुळे खूप इच्छा असूनही या प्रकरणी पोलिसांत कोणतीही तक्रार दिली नाही.

काही दिवसांनी कानांवर ज्या बातम्या उडत उडत आल्या त्यावरून असं समजलं की गेल्या काही दिवसांत त्या नकली डिजीएमने आमच्या बँकेच्या गंगापूर, कन्नड, अंबड, परतूर, सेलू, गंगाखेड, वसमत, हिंगोली, कळमनुरी अशा अनेक शाखांच्या मॅनेजर्सना असाच फोन करून पैसे पाठवायला सांगितले होते. नेमके किती मॅनेजर्स त्या तोतयाच्या जाळ्यात फसून पैसे घालवून बसले हे जरी खात्रीलायकरित्या समजलं नसलं तरी किमान तीन-चार मॅनेजर्सनी “आपण त्या खात्यावर पैसे पाठवून लुबाडलो गेलो असल्याची” खाजगीत प्रामाणिकपणे कबुली दिल्याची आम्हा अधिकारी वर्गात कुजबुज होती.


या घटनेच्या सुमारे वर्षभरानंतर काही प्रमुख वृत्तपत्रांत “बँकेतील उच्च पदस्थांच्या आवाजाची हुबेहुब नक्कल करून बँक कर्मचारी/अधिकाऱ्यांना गंडा घालणाऱ्या टोळीस अटक..” या मथळ्याखाली एक विस्तृत बातमी छापून आली. सदर टोळीचे सदस्य वेगवेगळ्या बहाण्यांनी देशभरातील विविध बँकांच्या रिजनल/झोनल कार्यालयात जाऊन कार्यालय प्रमुखांची भेट घ्यायचे व त्यांचा आवाज, बोलण्याची पद्धत इत्यादीचा बारकाईने अभ्यास करायचे. तसेच बँकेच्या कार्यक्षेत्रातील शाखा, अधिकारी/ शाखाधिकाऱ्यांची नावे, त्यांचे फोन नंबर इत्यादी माहिती मिळवून त्याचा उपयोग करून आणि उच्च पदस्थांच्या आवाजाची तंतोतंत नक्कल करून पैशांची मागणी करायचे. सिंडिकेट बँकेच्या सांगली शाखेतील मॅनेजरने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि उत्तर प्रदेशातील मेरठ येथून टोळीच्या सदस्यांना अटक केली होती.

या घटनेच्या निमित्ताने वाघमारे बाईंची आदर्श शाळा पाहण्यात आली. तेथील परोपकारी, सेवाभावी शिक्षकांपासून प्रेरणा घेऊन वैजापुरातील अनाथ विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाला सढळ हाताने नियमितपणे वैयक्तिक मदत करण्यास प्रवृत्त झालो. बँकेच्या “SBH विद्या” योजने अंतर्गत दरवर्षी शाळेतील काही गरजू विद्यार्थिनींना दत्तक घेऊन त्यांचा दहावी पर्यंतचा सर्व खर्च बँकेतर्फे करण्याची व्यवस्था करण्यात आली. बँकेच्या “कम्युनिटी वेल्फेअर” योजने अंतर्गत शाळेला वॉटर प्युरिफायर, वॉटर कूलर व सिलिंग फॅन्स उपलब्ध करून देण्यात आले. शिक्षण घेण्यासाठी जवळच्या खेड्यांतून पायी चालत येणाऱ्या शाळेतील गरीब विद्यार्थिनींना बँकेच्या स्टाफ कडून वर्गणी गोळा करून सायकलीही पुरवण्यात आल्या.


कधी कधी वाटतं की त्या दिवशी SBI स्टाफचं लंच टाईमला शिर-खुर्मा खाण्यासाठी बाहेर जाणं आणि उशिरानं येणं, बावधनकर साहेबांनी तोतया डिजीएमचा फोन उचलणं, डिजीएम साहेबांचे सेक्रेटरी श्री. सास्तुरे साहेबांना फोन करून विचारण्याची मला बुद्धी होणं.. हा सारा काय निव्वळ योगायोगच होता ? तसं पाहिलं तर सकाळी फोन द्वारे अशीच फसवणूक झालेल्या वाघमारे बाईंचं बँकेत येणं म्हणजे एक प्रकारे मला मिळालेला सावधगिरीचा इशाराच होता. पण तरी सुद्धा डिजीएम साहेबांचं नुसतं नाव ऐकताच अती-उत्तेजीत होऊन सारासार विचार करण्याची बुद्धीच मी हरवून बसलो होतो.
थोडक्यात काय, तर काळ आला होता पण वेळ आली नव्हती.
कदाचित.. त्या दिवशी शाळेतून परततांना कसलाही अभिमान न बाळगता, अगदी निर्मळ हृदयानं वाघमारे बाईंची मनापासून माफी मागितल्यावर त्यांच्या मनात माझ्याबद्दल ज्या सद्भावना आल्या असतील त्यांच्या प्रभावाने तर माझ्यावर आलेलं संकट टळलं नसेल ना ?

(समाप्त)


अजय कोटणीस 


ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३८  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना वैजापूर या गावी असतांना आलेला एक अनुभव हा बँकर्स ला किती निरनिराळ्या आणि विचित्र अनुभवांना सामोरे जावे लागते याचे चित्तथरारक वर्णन आहे. 

या आधीचे प्रकरण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

*बँकस्य कथा रम्या..* सायबर फ्रॉड-१

*बँकस्य कथा रम्या..* सायबर फ्रॉड-२

 


Discover more from

Subscribe to get the latest posts sent to your email.

Say what you feel