https://goodworld.in A website by Madhav Bhope

Mind blowing experiences of a Banker-13 एका बँकरचे थरारक अनुभव-13

rbi guards

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 13)

लोकपाल मॅडमनी दिलेला तो प्रतिकूल निकाल ऐकल्यापासून माझ्या हातपायातील त्राणच जणू नाहीसं झालं होतं. निकालाचा लिफाफा यंत्रवत हातात धरून मी तसाच रिसेप्शन काउंटर जवळ निर्जीवपणे उभा होतो. स्नेहलता मॅडमनी आधी दुरून, हातानेच खुणावून “काय झालं ?” असं विचारलं. पण माझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्यांना निकालाचा अंदाज आला असावा. बहुदा म्हणूनच आपुलकीने, सहानुभूती व्यक्त करून माझं सांत्वन करण्यासाठीच त्या मला त्यांच्याजवळ बोलावीत होत्या.

मी तसाच खिन्न, सुन्न, बधिर होऊन उभा असतांनाच लोपामुद्रा सेनगुप्ता मॅडम त्यांच्या चेंबर मधून बाहेर आल्या. स्नेहलता मॅडम जवळ जाऊन त्या म्हणाल्या..

“स्नेहा, खूप खुश आहे मी आज..! एकतर, न्यायासाठी झगडणाऱ्या एका सामान्य, गरीब कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून देऊन त्यांच्या सदिच्छा व आशीर्वाद मिळवले.. आणि दुसरं म्हणजे माझी ही शेवटची केस खूपच लवकर, अगदी एकाच हिअरिंग मध्ये निकाली निघाली. त्यातही, मनासारखा निर्णय देता आल्यामुळे खूप आनंद आणि समाधान सुद्धा प्राप्त झालंय आज मला..”

सेनगुप्ता मॅडम अस्खलित मराठी भाषेत बोलत होत्या. मुंबईतच लहानाच्या मोठ्या झाल्यामुळे त्यांना छान मराठी बोलता येतं, हे स्नेहलता मॅडमनी मला आधीच सांगितलं होतं. उत्साहाच्या भरात लोकपाल मॅडम आपलं पद विसरून मैत्रिणीशी मनमोकळ्या गप्पा मारीत होत्या..

“अगं, मी त्या बँक मॅनेजरला असं काही खडसावलं की बिचारा काही न बोलता गप्पच बसला. आणि मग मी चट्कन निकाल देऊन टाकला. बरं ते जाऊ दे.. ! मी आता रिक्रिएशन रूम मध्ये जाऊन जरा आराम करणार आहे. मला जरा शांतता हवी आहे. थोडा वेळ मला कुणीही डिस्टर्ब करू नका.. मग.., दुपारी चार वाजता तुमचं ते फेअरवेल फंक्शनही आहे.. हो ना ? काय..! देणार आहात ना सेंड ऑफ मला ?”

एवढं बोलून लोपामुद्रा मॅडम रिक्रिएशन रूम कडे जाण्यासाठी वळल्या तोच त्यांची नजर माझ्यावर पडली. माझ्याबद्दल त्यांनी काढलेले हेटाळणीचे अनुदार बोल मी नक्कीच ऐकले असावेत याची जाणीव झाल्याने क्षणभर त्या ओशाळल्या. पण मग लगेच स्वतःला सावरून घेत, चेहऱ्यावर कठोर भाव आणीत रिसेप्शनिस्ट मॅडमला त्या म्हणाल्या..

“साधना sss ! ज्यांचं काम झालं असेल त्यांना इथून जायला सांग. कामाशिवाय कुणीही इथे बसता कामा नये..”

लोकपाल मॅडमची ही सूचना माझ्यासाठीच होती हे न समजण्या इतका मी खुळा नव्हतो. त्यामुळेच आता स्नेहलता मॅडम कडे जावं की न जावं या संभ्रमात असतानाच जागीच उभं राहून आग्रही स्वरात सुपरिन्टेंडेंट मॅडम म्हणाल्या..

“अहो, या नं तुम्ही..! मला बोलायचंय तुमच्याशी..”

निमूटपणे मी स्नेहलता मॅडमच्या टेबला समोरील खुर्चीत जाऊन बसलो.

“बघू, काय निकाल दिलाय लोकपाल मॅडमनी..?”

माझ्या हातातील लिफाफ्याकडे पहात त्या म्हणाल्या. मी चुपचाप तो लिफाफा त्यांच्या पुढ्यात ठेवला. लिफाफ्यातील निकालाचा कागद बाहेर काढून त्यांनी तो लक्षपूर्वक वाचला. मग माझ्याकडे रोखून पहात त्या म्हणाल्या..

“हं..! मग आता पुढे काय करायचं ठरवलंत..?”

“मी याबद्दल काहीच विचार केलेला नाही. खरं म्हणजे खूप तयारी करून आलो होतो मी. माझ्याजवळची कागदपत्रं आणि तर्कसंगत युक्तिवाद यांच्या जोरावर मी लोकयुक्तांना सत्य परिस्थिती समजावू शकेन, फिर्यादीचा खरा चेहरा त्यांच्यापुढे उघड करू शकेन असा पूर्ण आत्मविश्वास होता मला.. ! पण.. मॅडम काही ऐकून घ्यायच्या मूड मध्येच नव्हत्या. त्यामुळे नाईलाजानं मी गप्प बसलो..”

“ओके, ओके.., होतं असं कधी कधी.. !” स्नेहलता मॅडम मला धीर देत म्हणाल्या..

“मी तुम्हाला सकाळीच म्हटलं होतं ना की दुर्दैवाने तुमची केस चुकीच्या वेळी आलीय मॅडम पुढे म्हणून.. ! बरं, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंत तुम्ही..? आता पुढे काय करणार आहात ?”

या मॅडम मला वारंवार हा एकच प्रश्न का विचारत आहेत हेच मला कळत नव्हतं.

“मॅडम, हे सगळं एवढं तडकाफडकी झालंय की मला काहीच सुचत नाहीय. आता, ह्या निकालाबद्दल वरिष्ठांना कळवायचं आणि पुढे ते सांगतील तसं करायचं बहुदा एवढंच आहे माझ्या हातात..”

हताश स्वरात मी उत्तरलो..

“मॅडम, अपील करता येतं का हो या निकालाविरुद्ध ?”

खोल गेलेल्या स्वरात, उगीच काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं..

“अर्थातच ! रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरकडे 30 दिवसांच्या आत तुम्ही या निकालाविरुद्ध अपील करू शकता. पण त्यासाठी तुमच्या बँकेच्या CMD, ED किंवा CEO यांची आधी मंजुरी घ्यावी लागते. डेप्यु. गव्हर्नर एकतर निकाल तसाच कायम ठेवतात किंवा निकाल रद्द करतात अथवा पुन्हा बँकिंग लोकपालाकडे केस फेरविचारासाठी पाठवतात..”

एवढं सांगितल्यावर स्नेहलता मॅडम म्हणाल्या..

“पण.. मी विचारतेय की तुम्ही आज, आत्ता.. या क्षणी काही प्रयत्न करणार आहात की नाही हा निकाल रोखण्यासाठी किंवा रिव्हर्स करण्यासाठी ? अजूनही तुम्ही लोकपाल मॅडमला भेटून त्यांना आपली बाजू पटवून देऊ शकता. हवं तर मी तुम्हाला या कामी मदत करू शकते. तुम्ही प्रयत्न तर करा.. “

स्नेहलता मॅडमच्या शब्दांतून त्यांना माझ्याविषयी वाटणारी आपुलकी, कळकळ जाणवत होती..

“तुमच्या मॅडमनी तर क्विक जजमेंट देऊन केसच गुंडाळून टाकलीय.. तो सुखदेव तर निकाल घेऊन एव्हाना वैजापूरच्या रस्त्यालाही लागला असेल. आणि.. मला नाही वाटत, तुमची मैत्रीण आता माझी बाजू ऐकून घ्यायला तयार होईल.. छे छे.. अशक्यच आहे ते..! जाऊ द्या मॅडम, तुम्ही माझ्याबद्दल जी आपुलकी व सदभावना दाखवलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.. येतो मी.. !”

images 80

एवढं बोलून उदास मनाने, दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि खुर्चीवरून उठून परत जाण्यासाठी निघालो. अचानक स्नेहलता मॅडमनी ताडकन खुर्चीवरून उठून माझा हात धरला आणि म्हणाल्या..

“कम ऑन.. चिअर अप ! मी मॅडमची आणि तुमची भेट घालून देते. तुम्ही मला जशी तुमची केस नीट समजावून दिली होतीत अगदी तशीच ती मॅडमलाही समजावून सांगा. माझी खात्री आहे, काहीतरी चांगलं नक्कीच घडेल. तुम्ही प्लिज इथेच थांबा.. मी आलेच..!”

असं बोलून माझ्याकडे पहात पहातच स्नेहलता मॅडम रिक्रिएशन रूम मध्ये गेल्या. अवघ्या दोनच मिनिटांत आनंदी, प्रफुल्लित चेहऱ्याने त्या बाहेर आल्या.

snehalata

“जा..! लोपा.. आय मीन, माझी जवळची मैत्रीण आणि तुमची लोकपाल मॅडम.. ती तयार झालीय.. आय मिन, तयार झाल्यात त्या.. तुमची वस्तुस्थिती जाणून घ्यायला.. जा लवकर..! न घाबरता, शांतपणे बोला त्यांच्याशी.. रिमेम्बर, शी इज व्हेरी हेल्पफुल, कोऑपरेटिव्ह अँड काईंड हार्टेड वूमन.. ऑल द बेस्ट.. !!”

जीव मुठीत धरून भीतभीतच मी रिक्रिएशन रूम मध्ये प्रवेश केला. सेनगुप्ता मॅडम तेथील एका झुलत्या आराम खुर्चीवर बसल्या होत्या. मला पाहून त्यांनी हलकंसं स्मित केलं. त्यांना नमस्कार करून बोलायला सुरुवात करणार इतक्यात त्यांनी हातानेच मला थांबायची खूण केली आणि म्हणाल्या..

“माझ्या मैत्रिणीशी बोलतांना मघाशी उत्साहाच्या भरात तुमच्याबद्दल जे अपरिपक्व, अनुचित शब्द माझ्याकडून उच्चारले गेले त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागते. खरं म्हणजे मलाच ही केस लवकर संपवायची घाई झाली होती. चुकलंच माझं..!”

अत्यंत विनम्रतेने आणि मनापासून उच्चारलेले मॅडमचे ते शब्द ऐकून माझ्या छातीवरचं दडपण एकदम कमी झालं आणि त्यांच्याबद्दलचा मनातील आदरही दुणावला.

“मी समजू शकतो मॅडम..! एकतर आज तुमचा ऑफिसातील शेवटचा दिवस असल्याने लवकर सर्व कामं आटपायची घाई आणि त्यातून माझी केस सुद्धा तांत्रिक व कायदेशीर दृष्ट्या खूपच कमजोर होती..”

माझ्या या बोलण्यावर पुन्हा स्वच्छ, निर्मळ, मनमोकळं स्मितहास्य करीत त्या म्हणाल्या..

lopamudra

“बसा निवांतपणे.. आणि सांगा तुम्हाला काय सांगायचंय ते..!”

सुखदेवने त्याच्या बायकोचं बँकेत खातं उघडलं त्या दिवसापासूनचा घटनाक्रम सांगायला मी सुरुवात केली. बँकेचा अस्थायी कर्मचारी रुपेशच्या सहभागामुळे आमची केस कशी कमजोर बनली, पैसे नेणाऱ्या व्यक्तीचा फोटो व घटनेच्या दिवसभराचं CCTV फुटेज उपलब्ध असूनही पोलिसांची तपासकामातील हेतुपुरस्सर दिरंगाई, सुखदेवच्या धमक्या, पेपरबाजी, पैशाच्या मागण्या, त्याने बँकेच्या स्टाफविरुद्ध केलेली खोटी पोलीस केस, रुपेशची अटक व त्याचा अर्धवट कबुलीजबाब.. हे सर्व माझ्या तोंडून ऐकत असतांना क्षणोक्षणी मॅडमच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. माझं बोलणं संपलं तेंव्हा त्या उठून माझ्याजवळ आल्या. माझ्या पाठीवर कौतुकमिश्रित सहानुभूतीने हलकंसं थोपटून त्या म्हणाल्या..

“आय ॲम रिअली व्हेरी सॉरी..! खरंच घाईघाईत खूप मोठी चूक घडली माझ्या हातून.. ! पण.. तक्रारदाराने सादर केलेले पुरावे व मुद्दे पाहता माझ्या जागी दुसरं कुणीही असतं तरी त्याने देखील हाच किंवा असाच निकाल दिला असता. किंवा फार फार तर निकाल थोडा लांबवला असता..”

त्यावर मी म्हणालो..

“नाही मॅडम, तसाही हा निकाल लांबवून फारसा उपयोग झाला नसता.. कारण कन्झ्युमर कोर्टाने ग्राहकाला एका महिन्याच्या आत न्याय देण्याची म्हणजेच नुकसान भरपाई देण्याची बँकेला तंबी दिली आहे..”

माझ्या तोंडून कन्झ्युमर कोर्टाचा उल्लेख ऐकताच सेनगुप्ता मॅडमचे डोळे आनंदानं चकाकले..

“काय म्हणालात..? कन्झ्युमर कोर्ट ? म्हणजे हे प्रकरण तिथेही नेलंय का या गृहस्थाने..?”

“होय मॅडम ! पोलिस केस, फौजदारी न्यायालय, ग्राहक मंच, अँटी करप्शन ब्युरो, केंद्र व राज्य सरकारचे विविध ग्रीव्हन्स सेल, बँकेच्या हेड ऑफिस मधील फ्रॉड व तक्रार विभाग.. अशा अनेक मंचांकडे या सुखदेवने बँकेविरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत..”

हे ऐकतांच मॅडम आनंदाने जवळजवळ ओरडल्याच..

“बस..बस..! झालं तुमचं काम..! जर ही केस आधीच ग्राहक मंचात सुरू असेल तर आज झालेली येथील संपूर्ण सुनावणीच Null & Void म्हणजेच व्यर्थ आहे. ताबडतोब मला हा निकाल बदलायला हवा.. तुम्ही इथेच थांबा.. आणि Revised निकाल घेऊन जा..!”

स्नेहलता मॅडमला सांगून त्यांनी ताबडतोब पीए ला बोलावून घेतलं आणि त्याला Revised Verdict डिक्टेट करायला सुरुवात केली. पीए ने सुधारित निकाल त्वरित टाईप करून मॅडमपुढे ठेवला. त्यावर सही करून मॅडमनी स्वतः तो निकाल माझ्या हातात दिला.

याच दरम्यान स्नेहलता मॅडमनी कार्यालयाच्या साऱ्याच मजल्यावरील सिक्युरिटी गार्ड व शिपायांना बोलावून सुखदेवला शोधून आणण्यासाठी त्यांना खाली रस्त्यावर पिटाळलं होतं. सुदैवाने सुखदेव RBI बिल्डिंग जवळच्या हॉटेलमध्येच कुटुंब व वकील मित्रांसह शांतपणे जेवण करीत बसला होता. लोकपाल मॅडमनी बोलावलंय म्हटल्यावर तो कुटुंबमित्रांसह धावतपळतंच लोकपाल कक्षात आला. धापा टाकीतच तो म्हणाला..

“मॅडम, जेवण झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांसाठी पेढे घेऊन येणारच होतो मी.. पण तेवढ्यात तुम्ही अर्जंट बोलावल्याचा निरोप मिळाला म्हणून मुलाला पेढे आणण्यासाठी पाठवलं आणि मी लगबगीनं इकडे आलो.. असं काय अर्जंट काम होतं मॅडम ?”

सुखदेवकडे रोखून पहात लोकपाल मॅडम म्हणाल्या..

“असं आहे की, तुमच्या केसच्या निकालात किंचित दुरुस्ती करून आता पहिल्यापेक्षा अधिक योग्य असा निकाल देण्यात आला आहे..”

सुखदेवकडून पूर्वी दिलेला निकाल आधी परत घेऊन लोकपाल मॅडमनी त्याच्या हातात नवीन निकालाचा लिफाफा ठेवला.

पूर्वीसारखाच लिफाफा उघडून सुखदेवनं अधाशा सारखा तो निकाल भराभरा वाचला.

“हे प्रकरण कन्झ्युमर कोर्टात आधीच न्यायप्रविष्ट असल्याने नियमानुसार लोकपाल कार्यालयाला या तक्रारीची दखल घेता येत नाही.. याप्रकरणी आधी दिलेला निकाल रद्द करण्यात येत आहे..”

हे शब्द वाचतांच सुखदेवने अविश्वासयुक्त क्रोधाने मॅडम कडे पाहिलं..

“हा तर सरळ सरळ दगा आहे. तुम्ही असा कसा निकाल बदलू शकता ? मला हे अजिबात मान्य नाही. मला न्याय मिळेपर्यंत मी इथेच तुमच्यापुढे बसून उपोषण करीन. मला पक्की खात्री आहे की त्या मॅनेजर साहेबांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्याकडून लाच घेऊनच तुम्ही हा निकाल बदललेला आहे. पण मी असा गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. तुम्हाला मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही..”

सुखदेवचं आरडाओरडा करून आकांडतांडव करीत गोंधळ घालणं सुरूच होतं. मला पाहिल्यावर तो आणखीनच चेकाळला असता, म्हणून हेतुपुरस्सरच त्याच्या नजरेसमोर येण्याचं आतापर्यंत मी टाळलं होतं. लोकपाल मॅडमनी कडक शब्दात ताकीद देऊनही सुखदेवचं त्यांना शिव्या-शाप देऊन थयथयाट करीत कक्षात थैमान घालणं तसंच चालू होतं.

हा प्रकार पाहून RBI कार्यालयातील तीन चार सिक्युरिटी गार्ड धावतच लोकपाल कक्षात आले आणि त्यांनी सुखदेवची गचांडी धरून त्याला कक्षा बाहेर काढलं. तरीही सुखदेवची बेताल बडबड अव्याहतपणे सुरूच होती. त्यातच बाहेर एका कोपऱ्यात बसून वाट पहात बसलेलो मी त्याच्या दृष्टीस पडलो. मग काय विचारता..!

क्रोधाने धुमसणाऱ्या सुखदेवच्या संतापाचा जणू स्फोटच झाला. त्वेषाने दातओठ खात तो म्हणाला..

“तरीच..! मला वाटलंच होतं की ही नक्कीच मॅनेजर साहेबांचीच करतूत असावी. आणि आता तुम्हाला इथे पाहून तर माझी त्याबद्दल खात्रीच झाली आहे.. साहेब, तुम्ही मॅडमला लाच देऊन न्याय विकत घेतला आहे.. पण मी तुम्हाला असा सोडणार नाही.. तुम्ही आणि ती आत बसलेली भ्रष्ट, पक्षपाती लोकपाल मॅडम, या दोघांनाही मी जबरदस्त धडा शिकविन.. त्या मॅडमची तर थेट RBI गव्हर्नर कडेच तक्रार करीन. शिवाय त्यांना कोर्टात खेचेन ते वेगळंच..”

सुखदेवनं माजवलेला हा तमाशा पाहून त्याचं मानगूट धरलेला सिक्युरिटी गार्ड म्हणाला..bank katha-13

“हे पहा, लोकपाल कक्षात गोंधळ घालणं आणि मॅडम बद्दल अपशब्द उच्चारणं हा गंभीर गुन्हा आहे. तुम्हाला जर इथल्या मार्शलच्या ताब्यात दिलं तर तुमची रवानगी थेट तुरुंगात होईल. तेंव्हा मुकाट्याने इथून ताबडतोब निघून जा..”

सुखदेवच्या सोबत आलेल्या वकिलांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं आणि सुखदेवला शांत करून कशीबशी त्याची समजूत घालत त्याला लोकपाल कार्यालया बाहेर नेलं. आदळआपट करून शिव्याशाप देत, पाय आपटीत सुखदेव तिथून निघून गेला.

मला तर अजूनही आज दुपारनंतरचा सारा घटनाक्रम स्वप्नवतच वाटत होता. इतक्या लवकर असं निकालाचं पारडं माझ्याकडे झुकेल याची कल्पनाही मी केली नव्हती. स्नेहलता मॅडम आणि सेनगुप्ता मॅडमचे आभार मानून त्यांचा निरोप घेतांना माझे डोळे नकळत भरून आले. त्या दोघीही खूप भारावून गेलेल्या दिसत होत्या.

परतीची बस रात्री साडे दहाची होती. रात्रीचं जेवण झाल्यावर सरळ गेट वे ऑफ इंडिया वर गेलो. खूप वर्षांपूर्वी जेंव्हा जेंव्हा परीक्षा, इंटरव्ह्यू व अन्य निमित्ताने मुंबईला येणं व्हायचं तेंव्हा रात्रीच्या वेळी ताजमहाल हॉटेल समोरील समुद्राच्या तटरक्षक भिंतीवर बसून लाटांचं संगीत ऐकत बसायचो. आज ही तसाच समुद्राच्या सान्निध्यात बसलो होतो. वाटलं की, सागरातील भरती ओहोटीच्या लाटां प्रमाणेच जीवनातही आशा निराशेच्या लाटांचा खेळ असाच निरंतर सुरू असतो. आजच्या अकल्पित यशाबद्दल ईश्वराचे मनोमन आभार मानले.

एक छोटीशी लढाई संपली होती. भविष्यात अजून अशा अनेक लढाया आम्हाला जिंकायच्या होत्या.

(क्रमशः)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १० भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 

संत नामदेवांचे अभंग-5 Sant Namdev Abhang-5

namdev

Sant Namdev Abhang-5

संत नामदेवांचे अभंग-5

 

याधीच्या लेखात आपण संत नामदेवांनी ‘नामा’ची महती हर प्रकारे सांगितली आहे, त्यासंबंधात काही अभंग पाहिले. नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी ऐसी बोले वाणी वेदशास्त्रीं

 

नामाचे महत्त्व किती सांगू आणि किती नको असे नामदेवाला होऊन जाते, आणि पुढील काही अभंगात, नामदेव, आपल्या अभंगांतून नामाचे सामर्थ्य सांगतात.

वेदाध्ययन करिसी तरी वैदिक चि होसी | परी वैष्णव होसी अरे जना

गायन करिसी तरी गुणिजन होसी | परी वैष्णव होसी अरे जना

पुराण सांगसी तरी पुराणिक चि होसी | परी वैष्णव होसी अरे जना

कर्म आचरसी तरी कर्मठ चि होसी परी वैष्णव होसी अरे जना

यज्ञ करिसी तरी याज्ञिक चि होसी परी वैष्णव होसी अरे जना

नामा म्हणे नाम केशवाचें घेसी | तरी चि वैष्णव होसी अरे जना

 

वेद, पुराण, यज्ञ, गायन, निरनिराळ्या प्रकारचे कर्म केले, तर त्या त्या क्षेत्रात मनुष्य पारंगत होईल, पण तो ’वैष्णव’ होईल याची खात्री नाही. पण केशवाचे, विष्णूचे नांव घेतल्यास मनुष्य तद्रूपच होऊन जातो असे नामदेव महाराज सांगतात.

काही काही अभंग हे खूपच विशेष आहेत. म्हणून ते मुद्दाम वेगळ्या रंगात  दिले आहेत. त्यातलाच हा एक अभंग. एका विशिष्ट वयानंतर सर्वांनी लक्षात घेण्यासारखा हा उपदेश आहे.

सर्वांगसाजिरीं आहेत इंद्रियें तंव सावध होयें हरिकथे

कीर्तन नर्तन वाचे जनार्दन | पवसी पतन येरझारी

पूर्ण मनोरथ घडती एका नामें दाटेल सप्रेमें जीवहेतु

नामा म्हणे विलास करीं तूं आणिक | सर्वी सर्व एक नाम असे

 

या शरीराचा, त्याच्या इंद्रियांचा, काही भरवसा नाही. जोपर्यंत सगळी इंद्रियें शाबूत आहेत, सुस्थितीत आहेत, तोपर्यंतच हरिकथेसाठी सावध व्हायला पाहिजे. नसता मुखाने ‘राम राम’ च्या ऐवजी ‘लाम लाम’ असे येऊन, तो राम ‘लांब’ जाण्याची वेळ यायची!

नामाच्या पुण्याचे- वक्ता आणि श्रोता दोघेही वाटेकरी आहेत. दोघांनाही त्याचा फायदा होतो. अर्थात श्रोता ‘सावधान’ असला पाहिजे आणि वक्ता ‘प्रेमळ’ असला पाहिजे.

जें जें पुण्य जोडे हरिनामगजरीं | त्याचे वांटेकरी दोघे जण

सावधान श्रोता आणि प्रेमळ वक्ता जो भजे अनंता निर्विकल्प

तेणें सुखें सुख चढे नित्य नवें जाणती अनुभवें संतजन

नामा म्हणे धन्य ते झाले संसारीं | संडिती वारी पंढरीची

नाम कसेही घ्यावे, कीर्तनाचे रंगी ‘नाचता’ येत नसले, तरी वेडे वाकडे नाचावे, असा एक फारच बहारदार अभंग आहे-

एके हातीं टाळ एके हातीं दिंडी | म्हणें वाचा उदंडीं रामनाम

श्रीहरीसारिखा गोसावी पैं चांगु फेडिला पैं पांगु जन्मांतरींचा

ऐसें नृत्य करीं वेडिवे बागडें | वदन वांकुडें करूनियां

चुकलें पाडस कुरंगिणी गिंवसी | तैसा हृषीकेशी न्याहाळी तूंतें

धेनु पान्हाय हुंबरे वत्सातें तैसा वोरसे तूंतें केशिराज

नामा म्हणे इतुकें करवे नि्दैवा | तरी वाचेसीं केशवा उच्चारी पां

ऐसें नृत्य करीं वेडिवे बागडें | वदन वांकुडें करूनियां- वेड्या बागड्या सारखे, कसेही वेडे वाकडे तोंड करून गायले आणि नाचले, तर हृषीकेशी माऊली ही आपल्या लेकराकडे कौतुकानेच पाहते. जणू चुकलेले पाडस हरिणीला सापडले तर तिला जसा आनंद होईल, तसा आनंद देवाला, भक्ताला पाहून होतो- वासराला पाहून धेनू हंबरते- तिला पान्हा फुटतो- अगदी तशीच, देवाची आपल्या लेकरांप्रति प्रीती असते. नामदेव महाराज म्हणतात, अरे निर्दैवा! इतकेही करणे जमत नसेल, तर वाचेने नुसते केशव केशव म्हण.

नामदेव महाराज लहानपणा पासूनच विठ्ठलाचे लाडके होते, त्यांच्या लहानपणी त्यांनी विठ्ठलाला, हट्ट करून नैवेद्य खायला लावला होता. मोठेपणीही, जेंव्हा मुक्ताईने ‘हे मडके जरा कच्चे आहे’ असे म्हटले, तेंव्हा ते रुसून विठ्ठल माऊलीकडेच गाऱ्हाणे घेऊन गेले होते. अशा कितीतरी कथा, नामदेवांच्या निरागसपणाच्या आपल्याला ठाऊक आहेत. त्याच आधारावर ते सांगतात, की देवाला आपल्या भक्ताचे तसेच कौतुक असते, जसे एखाद्या मातेला, आपल्या बालकाचे.

नामात तल्लीन झाल्यानंतर स्वतःच्या स्त्री पुत्राचीही आठवण त्यांना राहिली नाही अशी त्यांची स्थिति त्यांनी वर्णन केली आहे-

हातीं वीणा मुखीं हरि| गाये राउळाभीतरीं

अन्नउदक सोडिलें | ध्यान देवाचें लागलें

स्त्री पुत्र बाप माय यांचा आठव होय

देहभाव विसरला | छंद हरीचा लागला

नामा म्हणे हें चि देई। तुझे पाय माझी डोई

नामाच्या तल्लीनतेमध्ये देहभानच राहत नाही- मग देह राहिला काय किंवा गेला काय- कोण फिकीर करते? म्हणून नामदेव महाराज म्हणतात- ‘काळ देहासि आला खाऊ- आम्ही आनंदे नाचू गाऊ’

काळ देहासी आला खाऊं | आम्ही आनंदें नाचूं गाऊं

कोणे वेळेस काय बा गाणें | हें तों भगवंता मी नेणें

टाळ मृदंग दक्षिणेकडे | माझें गाणें पश्‍चिमेकडे

नामा म्हणे बा केशवा | जन्मोजन्मी द्यावी सेवा

पूर्ण कृपा केली देवा | दिधली पादपदूम-सेवा

पापें पळालीं पळालीं | नामकीर्तन-कल्लोळीं

रंगमाळा जागरणीं | तेथे मुक्ति वाहती पाणी

जन्म वैष्णव-कुळीं द्यावा | घडो संतांची या सेवा

नामदेवाची आवडी | संतचरणीं देतों बुडी

नामदेव स्वतःला ‘संत’ म्हणवत नाहीत- “जन्म वैष्णव-कुळीं द्यावा | घडो संतांची या सेवा” असे म्हणतात आणि “नामदेवाची आवडी | संतचरणीं देतों बुडी” असे म्हणून स्वतःकडे कमीपणा घेतात- देवाच्या भक्तांची हीच तर ओळख असते!

संत नामदेवांच्या निवडक अभंगांचा हा पाचवा भाग, नामाची महति आणि सामर्थ्य सांगणारा होता. पुढील भागात, नामदेव महाराज संतांचा महिमा सांगतात त्याबद्दल जाणून घ्यायचे आहे.

माधव भोपे

 

संत नामदेवांचे अभंग-4 Sant Namdev Abhang-4

namdev-7

Sant Namdev Abhang-4

संत नामदेवांचे अभंग-4

 

मागील लेखात आपण ‘देह अभिमान’ म्हणजे ‘मी देह आहे’ या समजुतीमुळे काय काय दुःख सहन करावे लागते, याचे वर्णन संत नामदेवांनी केलेले पाहिले. नंतर आपल्या मनाला, विषय भोगांपासून दूर राहून, देवाच्या स्मरणात राहण्याविषयी परोपरीने समजावले त्याचे अभंग आहेत.

आता पुढील काही अभंग हे ‘नामाच्या गोडी विषयी आहेत.

नामाची गोडी सांगतांना संत नामदेवांनी काही खूप बहारदार उदाहरणे दिली आहेत. त्यावरून, एखादी गोष्ट समजावून सांगतांना, उपमांचा वापर केल्यावर ती गोष्ट कशी आपल्या मनावर पटकन ठसते, याचाही अनुभव येईल.

गोक्षीर लाविले आंधळियामुखीं | तेथील पारखी जिंव्हा जाणे

तैसें देवा तुझें नाम निरंतर | जिंव्हेसी पाझर अमृताचे

सोलूनियां केळें साखरें घोळिलें | आंधारी खादलें तरी गोड

जाणोनियां नामा करी विनवणी | अमृताची खाणी नाम तुझें

 

नाम कळत किंवा नकळत जरी घेतले, तरी त्याचा फायदा व्हायचा तो होतोच, त्याची गोडी येतेच, हे सांगतांना नामदेव महाराज सांगतात- गाईचे दूध आंधळ्या माणसाला जरी प्यायला दिले, तों ते पाहू शकत नसला, तरी त्याच्या जिभेला त्या दुधाची चव बरोबर कळते. दिसत नाही म्हणून त्याचे काही अडत नाही. तसे देवा, तुझ्या नामाची महति माहीत नसतांना जरी नांव घेतले, तरी तुझे नांव अमृतरूपी असल्याने, जिंव्हेला जणू अमृताचा पाझर फुटतो.

केळे सोलून, त्यात साखर घालून, अंधारात जरी खाल्ले, तरी ते गोडच लागते. तसे देवाचे नांव हे जाणता, अजाणता कसेही घेतले, तरी त्याची गोडी अनुभवास येतेच.

नाम तें चि रूप रूप तें चि नाम नामरूप भिन्न नाहीं नाहीं

आकारला देव नामरूपा आला म्हणोनि स्थापिले नाम वेदी

नामापरता मंत्र नाहीं हो आणिक | सांगती ते मूर्ख ज्ञानहीन

नामा म्हणे नाम केशव केवळ | जाणती प्रेमळ भक्‍त भले

 

नाम आणि रूप हे भिन्न नाहीतच मुळी. देव हा ‘नाम’ रूपाने आकारास आला आहे. नामापरता दुसरा कोणता मंत्र नाही.

मंत्राचा पैं मंत्र हरि हा उच्चार लगे तो विचार करणें कांहीं

सुफळ नाम गाढें वाचेसीं उच्चारू | केशव हा चि करूं सर्वांभूती

नाहीं त्यासी पतन नव्हेचि बंधन | नित्य हें चि स्नान रामनामें

नामा म्हणे भाव सर्वांभूती करा | आणिक पसारा घालूं नका

 

आपल्याला आवडणाऱ्या कोणत्याही नामाचा उच्चार सुरू करा, जास्त काही विचार करण्याची गरज नाही. आणखीन जास्त पसारा वाढवायची गरज नाही.

नामापरता मंत्र नाहीं त्रिभुवनी ऐसी बोले वाणी वेदशास्त्रीं

पहा विचारूनि अनुभव मनीं | नका आडरानीं झणीं भरू

नामावांचूनियां तरलों जे म्हणती | ते आधीं बुडती भवाब्धींत

नामा म्हणे नाम ओकाराचें मूळ | ब्रह्म तें केवळ रामनाम

विठ्ठल विठ्ठल म्हणा उघडा मंत्र जाणा | कळिकाळ आंकणा होईल तुम्हां

वेदांचें हें सार शास्त्रांचे गहृर | तें जाणा अक्षर विठ्ठलनाम

करावें खंडण अखंड उच्चारण | देश काळ वर्तमान नाहीं येथें

जीवींचें निजगूज मुक्‍तीचें तें बीज | नामा म्हणे मज सांपडलें

काळ वेळ नसे नामसंकीर्तनीं उंच नीच योनि हें हि नसे

धरा नाम कंठीं सदा सर्वकाळ | मग तो गोपाळ सांभाळील

कृपाळु कोंवळा सुखाचा सागर | करील उद्धार भाविकांसी

नामा म्हणे फार सोपें हें साधन | वाचे नाम घेणें इतुकें चि

 

पढावे वेद, नको शास्त्रबोध | नामाचे प्रबंध पाठ करा

नव्हे ब्रह्मज्ञान, होय वैराग्य | साधा भक्तिभाग्य संतसंगें

येर क्रियाकर्म करितां हो कळी– | माजीं कोण बळी तरले सांगा

नामा म्हणे गूज सांगितलें संतीं यापरती विश्रांति आणिक नाहीं

 

केशव म्हणतां क्ले जाती परते | त्याहूनि सरतें आणिक नाहीं

वेद कां पढसी शास्त्रें कां शिणसी | उदंड वाचेसीं हरि म्हण

पहा याहूनियां आन नाहीं दुसरें | भीष्में युधिष्ठिर उपदेशिला

नामा म्हणे धरीं केशवीं विश्‍वास | तरसी गर्भवास नामें एके

साराचें हि सार भक्‍तीचें भांडार | नाम निरंतर गातां वाचे

कासया करावें आणिक साधन नामाविण क्षण जाऊं नेदी

दया शांति क्षमा हें चि पैं भूषण नामसंकीर्तन अहर्निशी

नामा म्हणे जप अखंड नामाचा | काळ हा सुखाचा सदोदित

भवसिंधूचा पार तरावयालागीं साधन लियुगीं आणिक नाहीं

अहर्निशीं नाम जपा श्रीरामाचे जें सकळ धर्माचिं मुकुटमणि

चले वर्णाश्रम धर्मआचरण | घडे व्रत दान तप कोणा

नव्हे तीर्थाटन पुराणश्रवण | नव्हे ब्रह्मज्ञान शास्त्रबोध

नामा म्हणे नाम राघोबाचें गातां | ब्रह्मसायुज्यता घर रिघे

नामें सदा शुद्धि प्राणिया होतसे | नामापासीं असे भक्ति मुक्ति

नामाऐसें सोपें नाहीं त्रिभुवनी नाम संजीवनी साधकांसी

यज्ञदानतपें नामें आलीं हाता | नामें सर्व सत्ता प्राप्त होय

नामा म्हणे सदा नाम ज्याचे मुखीं | नाहीं त्याचे तुकीं दुजा कोणी

कलियुगात यज्ञ, तप, निरनिराळी व्रतें हे सर्व करण्याची मनुष्याची क्षमता राहणार नाही, म्हणून सर्व संतांनी ‘नामाचा’ आश्रय घ्यायला सांगितले आहे. ‘नानक नाम जहाज है’- संसार रूपी, निरनिराळ्या संकटांनी भरलेला भवसागर तरून जाण्यास नाम हे ‘जहाज आहे- या जहाजात बसून, सुरक्षितपणे, आरामात पैलतीराला पोंचता येते, असे गुरु नानक सांगून गेले आहेत. कोणत्याही संताची वाणी पाहिली, तरी त्यात हर प्रकारे नामाचे महत्त्व सांगितले आहे.

नामदेवांच्या तर नांवातच ‘नाम’ आहे. नामदेव हे केवळ ‘नाम’ घेण्यासाठीच जन्माला आले. त्यामुळे, नाम माहात्म्य सांगतांना नामदेवांच्या वाणीला अधिकच बहर येतो यात काही नवल नाही.

पुढील लेखात आपण नामाच्या सामर्थ्याबद्दल नामदेवांचे काही अभंग पाहणार आहोत.

माधव भोपे

संत नामदेवांचे अभंग-3 Sant Namdev Abhang-3

vithal mandir

Sant Namdev Abhang-3

संत नामदेवांचे अभंग-3

 

संत नामदेवांची भजने पाहतांना, मागील लेखात आपण, मनुष्य कसा विषयसुखाच्या मागे लागून केविलवाणा झाला आहे, अशा अर्थाचे काही अभंग पाहिले. तसेच भक्तीचे नुसते वरवरचे सोंग किंवा ढोंग करणाऱ्या लोकांचा कसा सुळसुळाट झाला आहे, त्याबद्दल ही नामदेवांचे अभंग पाहिले. तसेच, “सजीवासी हाणी लाथा, निर्जीवपायी ठेवी माथा”, असे क्रांतिकारी विचार ही पाहिले.

आता, देह अभिमान- “मी देह आहे” अशा भ्रमामुळे मनुष्याचे कसे हाल होतात, आणि त्यावर काय उपाय आहे, याबद्दल काही खूप छान अभंग आहेत.

देहाचा अभिमान धरावा चित्तीं | धरावी उपरति उपशम

सर्वांभूतीं देव ऐसी समबुद्धि सांडावी उपाधि प्रपंचाची

चिंता करी नाम्या येणें तरसी जाण| तुज सांगितली खूण निर्वाणींची

 

लौकिकाची कांहीं धरावी लाज | हें चि निज काज साधावें तें

निंदा करिती तो मानावा आदर | स्तुति तें उत्तर नायकावें

धरावी चाड मानसन्मानाची | आवडी भक्तीची रूढवावी

नामा म्हणे हें चि रूढवावें मानसीं | क्षण एक नामासी विसंबूं नये

 

निर्विकल्प ब्रह्म कैसेनि आतुडे | जंववरी मोडे मीतूंपण

शब्दचित्रकथा सांगती पाल्हाळ | मन नाहीं निश्‍चळ हरिपायीं

आणूतें प्रमाण होतां दुजेपण | मेरूतें समान देईल दुःख

नामा म्हणे ब्रह्म सर्वांभूती पाहीं तरी ठाईचा ठाई निवशील

 

 

परब्रह्मींची गोडी नेणती बापुडीं | संसारसांकडीं विषयभरित

तूंते चुकली रे जगजीवनरक्षा अनुभवाविण लक्षा नये चि रे कोणा

जवळीं असतां क्षीर नव्हे चि वरपडा | रुधिर सेवितां गोचिडा जन्म गेला

दर्दुरा कमळिणी एके ठाई बिढार | वास तो मधुकर घेऊनि गेला

नामा म्हणे ऐसीं चुकली बापुडीं | अमृत सेवितां पुडी चवी नेणे

एकदा परब्रह्माची गोडी लागली, तर संसारातील विषय आवडणार नाहीत. इथे गोचीड आणि गाईचे वासरू यांची तुलना केलेली आहे. गोचीड हे, गाईच्या स्तनापाशी असते. पण ते आयुष्यभर तिचे रक्तच सेवन करते. जेंव्हा की गाईचे वासरू मात्र दूधरूपी अमृत सेवन करते. तसेच दर्दुर म्हणजे बेडूक आणि मधुकर म्हणजे भुंगा हे दोन्ही कमळाच्या जवळ असतात, पण कमळाच्या सुगंधाचे सेवन भुंगा करतो, आणि बेडूक मात्र कमळाच्या अगदी जवळ असूनही त्याच्या सुगंधापासून वंचित राहतो. तसेच विषयी लोक, संसारात येऊन हरिनामरूपी अमृत सेवन करण्याच्या ऐवजी विषयरूपी चिखलाचेच सेवन करण्यात धन्यता मानतात.

संसार करितां देव जैं सांपडे | तरी कां झाले वेडे सनकादिक

संसारीं असतां जरी देव भेटता | शुकदेव कासया जाता तयालागीं

ज्ञातीच्या आचारें सांपडे जरी सार | तरी कां निरहंकार झाले साधु

नामा म्हणे आतां सकळ सांडून | आलोंसें शरण विठोबासी

 संसार करून जर देव सापडला असता, तर सनकादिक, शुकदेव हे कशाला संसारापासून दूर राहिले असते, असे म्हणून, सगळे सोडून विठोबाला शरण जा असे नामदेव महाराज कळकळीने सांगतात.  

संसारसागर भरला दुस्तर | विवेकी पोहणार विरळा संत

कामाचिया लाटा अंगीं आदळती नेणों गेले किती पोहूनियां

भ्रम हा भोंवरा फिरवी गरगरा | एक पडिले घरा चौर्‍यांशीच्या

नामा म्हणे नाम स्मरा श्रीरामाचे भय कळिकाळाचें नाहीं तुम्हां

वरील अभंग इतके सोप्या शब्दात आहेत, की त्यांच्यावर वेगळे काही भाष्य करण्याची गरज पडत नाही. पण त्यानिमित्ताने, आपलीही उजळणी होते, म्हणून भाष्य करावेसे वाटते.

त्यानंतर, येणारे भोग, शरीराची पीडा इत्यादि ही आपल्याच कर्माची फळें आहेत, त्यासाठी ईश्वराला किंवा कोणाला दोष देण्याची काय गरज आहे, अशा प्रकारचे काही अभंग आहेत-

पापाचें संचित देहासी दंडण | तुज नारायणा बोल नाहीं

सुख अथवा दु: भोगणें देहासी सोस वासनेसी वाऊगा चि

पेरी कडू जिरें इच्छी अमृतफळ | अर्कवृक्षा केळ केवीं होय

मुसळाचें धनु होय सर्वथा | पाषाण पिळितां रस कैंचा

नामा म्हणे देवा तुज कां रुसावें मनासी पुसावें आपुलिया

 नंतर समर्थांनी जसे आपल्या मनाला समजावले होते, तसेच नामदेव महाराजही पुढील काही अभंगांमधून समजावतात

अरे अलगटा माझिया तूं मना | किती रानोरानां हिंडविसी

विठोबाचे पायीं दृढ घाठीं मिठी| कां होसी हिंपुटी वायांविण

संकल्प विकल्प सांडी तूं समूळ | राहे रे निश्‍चळ क्षणभरी

आपुलें निजहित जाण तूं त्वरित | वासनारहित होई वेगीं

नामा म्हणे तुज ठाईंचें कळतें सोसणें कां लागते गर्भवा

क्षण एक मना बैसोनि एकांतीं | विचारीं विश्रांति कोठें आहे

लक्ष चौर्‍्यांशीच्या करितां येरझारा | शिणलासी गव्हारा वेळोवेळां

दुर्ल आयुष्य मनुष्यदेहींचें | जातसे मोलाचें वायांविण

नामा म्हणे तुज येतों काकुळती | सोडीं रे संगति वासनेची

वासनेची संगत सोडण्याविषयी नामदेव महाराज अगदी काकुळतीला येऊन सर्वांना विनंती करतात

वासनेची करणी आइकें तूं मना | या केली रचना ब्रह्मांडाची

निर्गुण चैतन्य सदा सुखराशि | त्या दिलीं चौऱ्यांशी लक्ष सोंगे

ऐसी हे लाघवी पाहतां क्षणभंगुर | ब्रह्मादि हरिहर ठकिले इणें

नामा म्हणे तरी चि इचा संग तुटे | दैवयोगें भेटे संतसंग

दैव योगाने संत भेटले, तरच या वासनेचा संग तुटू शकतो.

परियेसी वासने संकल्पस्वरूपे | विश्‍व त्वां आटोपें वश केलें

ब्रह्मादिक तुझे इच्छेचें खेळणें | विषयाकारणें ठोठिंगत

परी माझ्या मना सांडीं वो समर्थे | देई मज दीनातें कृपादान

नामा म्हणे पुढती गांजिसील मज | येईल केशिराज सोडवणे

ब्रह्मादिक ही या वासनेची खेळणीं आहेत. अशा वासनेला नामदेव महाराज दम देतात की तू मला सोड, माझ्या नादी लागू नकोस, कारण तू जर मला गांजलेस, तर साक्षात केशीराज मला सोडवायला समर्थ आहे, हे लक्षात ठेव

पुढील लेखात नाम स्मरणाचे महत्त्व सांगणारे काही अभंग बघणार आहोत.

माधव भोपे

संत नामदेवांचे अभंग-2 Sant Namdev Abhang-2

namdev-5

Sant Namdev Abhang-2

संत नामदेवांचे अभंग-2

 

संत नामदेवाची भजनें म्हणजे अगदी थोड्या शब्दात खूप मोठा आशय व्यक्त करणारी आहेत. मागील लेखात आपण नामदेवांची, आयुष्याच्या क्षणभंगुरपणाबद्दलची काही भजनें पाहिली. त्याचप्रमाणे  संसारात पडल्यावर माणूस, स्वतःचे आणि मुला बाळांचे पोट भरता भरता, कसा केविलवाणा होऊन जातो, पण त्याला त्याचे भान नसते, हे सांगणारे काही त्यांचे अभंग आहेत.

विषयाचा आंदणा दिसे केविलवाणा | करितसे कल्पना नानाविध

कुटुंबपाईक म्हणवी हरीचा दास मागे ग्रासोग्रास दारोदारी

पोटालागीं करी नाना विटंबना | संतोषवी मना दुर्जनांच्या

वैराग्याची वार्ता कैंची दैवहता | नुपजे सर्वथा प्रेमभावो

नामा म्हणे ऐसे तारी एक्या गुणें | अजा आरोहण गजस्कंधीं

goat on the shoulder of elephant

विषयांनी बांधलेला माणूस केविलवाणा दिसतो, सतत नानाविध कल्पना- असे झाले तर-तसे झाले तर- अशा कल्पना करून करून चिंता करत राहतो. ‘मागे ग्रासोग्रास दारोदारी’ हे या स्वरूपात नाही, तरी वेगळ्या स्वरूपात आपण आजही पाहतोच. आणि पोटाची खळगी भरण्यासाठी कशा कशा दुर्जनांची चाकरी करावी लागते, त्यांना खुश ठेवावे लागते. अशा माणसाला वैराग्य कुठून येणार- तो ‘दैव-हत’- दैवापुढे हतबल झालेला असा- जो माणूस आहे, त्याच्या हृदयात देवाविषयी प्रेम भाव कसा उपजेल?

पण असे जरी असले, तरी एक मार्ग आहे- “अजा आरोहण गजस्कंधीं” या ठिकाणी एक छान उपमा दिली आहे- बोकड जंगलातून जात असतांना- त्याला नाना प्रकारच्या हिंस्त्र श्वापदांपासून भय असते- पण कसेही करून जर त्याने हत्तीशी मैत्री करून घेतली- तर तो त्याच्या खांद्यावर बसून मजेत जंगल पार करू शकतो- समर्थाचा आश्रय घेतल्यास संकटांना घाबरण्याचे कारण उरत नाही- मग सर्व शक्तिमान परमेश्वराचा आश्रय घेतला- तर संसाररूपी जंगल विनासायास, सुरक्षितपणे पार करता येते.

अजून एका अभंगात, वीतभर पोटासाठी काय काय करावे लागते, याचे अगदी वास्तव वर्णन केले आहे- मला यात अजून एक सुचवावेसे वाटते- आजकाल नुसते पोट भरणे एवढे अवघड राहिले नाही- पण या ठिकाणी आपण रसना- जिभेची चटक- किंवा वासना- विविध भोग भोगण्याची अदम्य इच्छा- या गोष्टी जर घातल्या, तर खालील अभंग अगदी तंतोतंत आजच्या काळाला लागू पडतो-

वीतभर पोट लागलेंसे पाठी | साधूसंगें गोष्टी सांगूं देई

पोट माझी माता पोट माझा पिता | पोटानें ही चिता लाविलीसे

पोट माझा बंधु पोट माझी बहीण | पोटानें हें दैन्य मांडियेले

विष्णुदास नामा पोटाकडे पाहे | अजूनि किती ठाय हिंडवीसी

त्यानंतरच्या एका अभंगात, पापा पासून वाचण्याचा अगदी सोपा मार्ग संत नामदेव सांगतात-

परदारा परधन परनिंदा परपीडन | सांडोनि भजन हरीचें करा

सर्वांभूती कृपा संतांची संगति | मग नाहीं पुनरावृत्ति जन्ममरण

नामा म्हणे नलगे साधन आणिक | दिधली मज भाक पांडुरंगे

खरंच- आपल्या आजूबाजूला पाहिले, तर सर्व प्रकारची दुष्कृत्यें या चार प्रकारात मोडतात- परदारा, परधन, परनिंदा आणि परपीडन. या चार गोष्टी सोडून, हरीचे भजन जर केले, आणि सगळ्यांबद्दल कृपाभाव ठेवला, आणि संत- सज्जनांची संगत धरली- तर यापेक्षा वेगळे साधन काय लागणार- अशा माणसाला जन्ममरण आणि  पुनरावृत्तिपासून सुटका मिळेल, यात काही संशय नाही- आज इतरांबद्दल द्वेष, असूया, या गोष्टींमुळे मनुष्य नाना प्रकारच्या मानसिक आणि मनो कायिक रोगांना बळी पडत असलेला आपण बघतो- तो सगळ्यांबद्दल कृपाभाव जर ठेवला, तर अशा रोगांपासून दूर राहू शकेल. या तीनच ओळींमध्ये संत नामदेवांनी आधुनिक जगात सुद्धा कसे राहावे याचा आदर्शच घालून दिला आहे असे दिसते.

आणि मग आजकालच्या जगात नुसतेच भक्त असण्याचे ढोंग करणारे- महात्मा असण्याचे ढोंग करणारे असे लोक कसे बोकाळले आहेत, त्याबद्दलचे काही अभंग आजच्या स्थितीलाही तंतोतंत लागू पडतात-

मुखीं नाम हातीं टाळी दया नुपजे कोणे काळीं

काय करावें तें गाणें | धिग धिग लाजिरवाणें

हरिदास म्हणोनि हालवी मान | कवडीसाठीं घेई प्राण

हरिदासाचे पायीं लोळे | केशीं धरोनि कापी गळे

नामा म्हणे अवघे चोर | एक हरिनाम थोर

पोटीं अहंतेसी ठावो | जिंव्हे सकळ शास्त्रांचा सरावो

भजन चालिले उफराटें। कोण जाणे खरें खोटें

सजीवासी हाणी लाथा | निर्जीवपायीं ठेवी माथा

सजीव तुळसी तोडा | पूजा निर्जीव दगडा

मृत्तिकेच्या पूजा नागा जित्या नागा घेती डांगा

नामा म्हणे अवघें खोटें | एक हरिनाम गोमटे

 वरील अभंगात तर सजीवासी हाणी लाथा | निर्जीवपायीं ठेवी माथा, असे सांगून अशा दांभिक लोकांचे वर्णन केले आहे- सजीव तुळसी तोडा | पूजा निर्जीव दगडा, मृत्तिकेच्या पूजा नागा जित्या नागा घेती डांगा या ओळींमधून नामदेव किती सुधारक विचाराचे होते, हे दिसून येते.

 ज्ञानदेवांच्या समाधीनंतर थोड्याच दिवसांनी अल्लाउद्दीन खिलजीचें महाराष्ट्रावर आक्रमण झालें. तत्पूर्वी महाराष्ट्र मुसलमानांच्या आक्रमणापासून मुक्‍त होता. पण नामदेव महाराज ऐंशी वर्षं जगले. म्हणजे ज्ञानदेवानंतर नामदेव जवळ जवळ पन्नास वर्षे राहिले.  त्यांनी  पाहिलें की सगळीकडे इस्लामचा प्रचार चालला आहे.  काही इस्लामचे राजे तर आले आणि गेले.  काही टॅक्स घेऊन परत गेले, परंतु सूफी तत्त्वज्ञानी भारतात फिरत होते ते महाराष्ट्रांतहि होते आणि परमात्मा एक आहे असें सांगत होते. नामदेवाने विचार केला की हा जो हल्ला आहे तो कसा परतवता येईल? त्यातला चांगला अंश ग्रहण केल्याशिवाय होणार नाही. इस्लाम म्हणतो, परमेश्वर एक आहे. पण हिंदूंमध्ये काय चालतें ? कुणी गणपतीची पूजा करतात, कुणी कुणाची, कुणी कुणाची. आणि जो तो आपली उपासना श्रेष्ठ मानून चालला आहे. फकीर सांगत होते, अल्लाह एक आहे, मानव एक आहे. त्यातले गुण घेतले पाहिजेत, म्हणजे तो हल्ला परतवता येईल. नामदेवाने विचार केला, आपणसुद्धा एकच ईश्‍वर मानतो. परमेश्‍वराचें एकत्व तर आपणहि मानतो. आपण दहा ईश्‍वर काही मानत नाही. हिंदूंचे मत वेदामध्ये एका वाक्यात आलें आहे, एकं सत्विप्रा बहुधा वदन्तिसत्य एक आहे, पण विद्वान लोक त्याला वेगवेगळ्या नामांनी बोलावतात. हिंदू धर्मातहि परमेश्‍वराचें एकत्व मानले आहे. पण तें लोपल्यासारखें होते. आम्ही नाना देवतांच्या मागे लागल्यामुळे या देवतेचा उपासक त्या देवतेच्या दर्शनालासुद्धा जाणार नाही, इतकी तयारी होती. म्हणून नामदेवाने विचार केला की एकत्वाचें प्रतिपादन केले पाहिजे. म्हणून जिथे जिथे इस्लामचा प्रचार होता तिथे तिथे यात्रा करीत नामदेव महाराज पोहोचले. इस्लामचा प्रचार सगळ्यात जास्त पंजाबात होता, म्हणून नामदेव महाराज तेथे गेले आणि  वीस वर्ष राहिले! तिथे त्यांनी पाहिलें की, प्रत्येक गांवात एक फकीर फिरत आहे आणि ईश्‍वर एक आहे असें समजावून सांगत आहे. नामदेवाने विचार केला ही एकता तर आपल्याहि धर्मात आहे, पण ती सांगितल्याशिवाय कशी कळणार? त्यांनी  एक भजन केलें आहे. त्यात एका बाजूने हिंदूला टोला हाणला

व दुसऱ्या बाजूने मुसलमानांना.

हिंदू पूजै देहुरा मुसलमाणु मसीति

नामे सोई सेविआ जह देहुरा मसीति

 हिंदू देवळातील देवाला पूजतात, तर मुसलमान मस्जीदीला पवित्र मानतात- पण दोघांनीही हे लक्षात घेणे आवश्यक आहे की सोई सेविआ जह देहुरा मसीति त्याचे सेवन करा-त्याची आस धरा-जो न देवळात राहतो, न मस्जीदीत. हिंदु देवळाची पूजा करतात आणि देवाला विसरले; मुसलमान मशिदीची पूजा करतात, मशिदीतच परमेश्‍वर आहे असें मानतात. म्हणजे तुम्हीसुद्धा मूर्तिपूजक आहात. म्हणून दोन्हीची पूजा सोडा आणि अंतर्यामी जो भगवान्‌ आहे त्याच्याकडे वळा, असें सांगत सांगत नामदेव महाराज  फिरले.  त्याचा परिणाम असा झाला की इस्लामची जी लाट आली होती ती थोपविली गेली. नानक महाराज आले, त्यांनी तेंच सांगितलें.

असो. हे थोडे विषयांतर झाले. पण आजकालच्या जगात, दंभ- ढोंग यांचीच कशी चलती झाली आहे, हे सांगणारे आणखी काही अभंग आहेत-

काय करूनि तीर्थाटणें | मन भरिलें अवगुणें

काय करावें तें तप | चित्तीं नाहीं अनुताप

मन:संकल्पाचीं पापें | जाती तीर्थाचेनि बापें

नामा म्हणे सर्व सोपें पाप जाय अनुतापें

 बापरे! मन:संकल्पाचीं पापें | जाती तीर्थाचेनि बापें किती स्पष्ट बोलतात नामदेव महाराज- मनात नुसता पापाचा संकल्प जरी केला तर तीर्थाच्या बापानेही ती पापें जायची नाहीत!

आणखी एक अभंग- मीच भक्त आहे- मीच मुक्त आहे अशी शेखी मिरविणाऱ्या पापी आणि दुराचारी लोकांची पोलखोल केली आहे-

देहाचें ममत्व नाहीं जों तुटले | विषयीं विटलें मन नाहीं

तंव नित्यसुख कैसेनि आंतुडे | नेणती बापुडे प्रेमसुख

मी चि एक भक्‍त मी चि एक मुक्‍त | म्हणवी पतित दुराचारी

नामा म्हणे तुझे कृपेविण देवा | केंवीं जोडे ठेवा विश्रांतीचा

तसेच एका अभंगात- हट्टाने कठिण योग साधना करणाऱ्या साधकांना सुद्धा सावध केले आहे- भुजंग हा नुसता पवन म्हणजे वाऱ्याचा आहार करून राहतो, अशी वदंता आहे- पण म्हणून तो काही योगेश्वर होत नाही. निरनिराळ्या योग साधनांनीt काया पालटेल- पण मन शुद्ध झाले नाही तर त्याचा काही उपयोग नाही असे सांगितले आहे.

 भुजंग विखार पवनाचा आहार | परी योगेश्‍वर म्हणूं नये

पवनाच्या अभ्यासें काया पालटी | परी तो वैकुंठीं सरता नव्हे

मन हें दर्पण करोनि निर्मळ | पाहें पां केवळ आत्मा स्वयें

तुझा तूं केवळ तुजमाजीं पाहीं | नामा म्हणे ध्याई केशिराजु

 आपल्या संत परंपरेमध्ये अशी अनेक रत्नें आहेत. अशा या अमूल्य ठेव्याची ओळख आपण येत्या काही लेखांत करून घेणार आहोत.

माधव भोपे 

संत नामदेवांची भजने-1 

 

Mind blowing experiences of a Banker-12 एका बँकरचे थरारक अनुभव-12

ombudsman

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

ombudsman

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 12)

फॅक्स मेसेज पाठोपाठ लगेच औरंगाबादच्या क्षेत्रीय कार्यालयातून फोन आला. स्वतः रिजनल मॅनेजर बोलत होते..

“उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्ही नरिमन पॉईंट, मुंबई येथील बँकेच्या झोनल ऑफिस मध्ये पोहोचा. तिथे बँकेचे एक वरिष्ठ अधिकारी तुम्हाला मदत व मार्गदर्शन करण्यासाठी हजर असतील. तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग लोकपाल कार्यालयातही तेच घेऊन जातील.”

मी लक्ष देऊन ऐकत होतो. RM साहेब पुढे म्हणाले..

“या प्रकरणाची इत्यंभूत माहिती केवळ तुम्हालाच असल्याने बँकेतर्फे ही केस तुम्हालाच प्लीड करायची आहे. लक्षात ठेवा, हे बँकिंग लोकपाल बँकांच्या कार्यपद्धती व नियमावली बद्दल सखोल ज्ञान असणाऱ्या उच्चपदस्थ व अनुभवी व्यक्ती असतात. त्यांच्याशी बोलतांना सावधगिरी बाळगा व अतिशय आदराने आणि मुद्देसूद तेवढंच बोला.”

“आणि.. लक्षात ठेवा, 20 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकरणांत ग्राहकाला त्वरित नुकसान भरपाई देण्याचे ते संबंधित बँकेला आदेश देऊ शकतात. तसेच विलंब व मानसिक त्रासापोटी एक लाख रुपयांचा अतिरिक्त दंडही ते बँकेला करू शकतात. तेंव्हा त्यांच्यापुढे अत्यंत नम्रपणे, अदबीने व सांभाळून सादर व्हा.. आणि केसचा निकाल बँकेविरुद्ध लागू नये यासाठी योग्य ते आटोकाट प्रयत्न करा.. ऑल द बेस्ट !!”

RM साहेबांचा फोन आल्यानंतर भराभर टेबलावरील कामे आवरेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले. मग डेप्यु. मॅनेजरला केबिनमध्ये बोलावून आज मुंबईला जात असल्याची त्यांना कल्पना दिली. केस संबंधी सर्व कागदपत्रे, वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे, सीसीटीव्ही फुटेज इत्यादी सामग्री घाईघाईत बॅगमध्ये भरली. शांत चित्ताने संपूर्ण घटनाक्रम व महत्वाचे मुद्दे थोडक्यात लिहून काढले. औरंगाबादला घरी जाण्यात उशीर झाला असता म्हणून रात्रीच्या बसने वैजापूरहूनच मुंबईला जाण्याचे ठरवले. रुमवरील एक बऱ्यापैकी ड्रेस बॅगेत टाकला आणि बस स्टँडवर निघालो.

छ. शिवाजी महाराज टर्मिनस जवळ उतरलो तेंव्हा पहाटेचे पाच वाजले होते. जवळच्याच एका हॉटेलात जाऊन सिंगल रूम बुक केली. माझ्या रूमच्या खिडकीतून व्हिक्टोरिया टर्मिनस रेल्वे स्टेशनची सुंदर देखणी इमारत दिसत होती. तिच्याकडे पहात चहाचे घोट घेता घेता.. “आजच्या केसचा निकाल काय लागणार.. ?” याबद्दलचेच विचार मनात घोळत होते.

नरिमन पॉईंट वरील बँकेच्या झोनल ऑफिस मध्ये पोहोचलो तेंव्हा किंचित स्थूल, ठेंगणे आणि जाड भिंगाचा चष्मा असलेले, दुभाषी नावाचे एक सिनियर चीफ मॅनेजर तिथे माझी वाटच पहात थांबले होते. माझं स्वागत केल्यावर “चला.. आपण आधी RBI च्या ऑफिसजवळ पोहोचू आणि मग तिथेच नाश्ता करू” असं ते म्हणाले. टॅक्सीतून आम्ही भायखळ्याच्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाजवळ पोहोचलो. तिथे एका रेस्टॉरंट मध्ये नाश्ता करता करता दुभाषी साहेब म्हणाले.. “मी तुमच्या केसचा नीट अभ्यास केला आहे. सर्व मुद्दे आपल्या विरुद्ध आहेत. ही केस आपण जिंकण्याची एक टक्काही शक्यता नाही. माझ्या अनुभवावरून सांगतो, जास्तीतजास्त पंधरा मिनिटांत लोकपाल Adverse Verdict देतील..”ro official

हे ऐकतांच माझा चेहरा एकदम पडला. बँकेने या गृहस्थांना मला मदत करण्यासाठी पाठविलं आहे की माझं धैर्य खच्ची करून मला नाउमेद करण्यासाठी ? अशी शंकाही माझ्या मनात तरळून गेली.

माझ्या चेहऱ्यावरील खिन्न भाव दुभाषी साहेबांच्या धूर्त डोळ्यांनी अचूक टिपले. काटे चमच्याचा सफाईदार उपयोग करून समोरच्या प्लेटमधील मसाला डोशाचा तुकडा तोंडात टाकीत अत्यंत निर्विकारपणे ते म्हणाले..

“मी खरं तेच सांगतोय.. पण तुम्ही असे निराश होऊ नका. या लोकायुक्त कार्यालयातील एकही केस आपण आजपर्यंत जिंकलेलो नाही. अहो, हे लोकपाल खूपच स्ट्रिक्ट असतात. राष्ट्रीयकृत बँकांचे चीफ जनरल मॅनेजर किंवा जनरल मॅनेजर अशा उच्च पदावरील या व्यक्ती असतात. ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ असा ह्यांचा सडेतोड खाक्या असतो. त्यामुळे ते तडकाफडकी निर्णय देतात आणि अर्थातच तो निर्णय बहुतांशी बँकेच्या विरुद्धच जातो. असो..! तुम्ही याबाबत जास्त विचार करू नका. ही केस हरलात तरी तुम्हाला कोणीही काहीही म्हणणार नाही.”

मी घड्याळात पाहिलं.. अकरा वाजायला आले होते. घाईघाईत खाणं संपवून नॅपकिनने तोंड पुशीत दुभाषी साहेब म्हणाले..

“चला चला.. ! It’s time now !आयुक्तांपुढे वेळेत हजर व्हायला हवं. तुम्ही या माझ्या मागे भराभर..”

तुरु तुरु चालत दुभाषी साहेब रिझर्व्ह बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या लिफ्ट जवळ पोहोचले. लोकायुक्त कार्यालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावर होते. तेथील रिसेप्शनिस्टने आम्ही हजर झाल्याबद्दल नोंद करून तेथील रजिस्टरवर आमच्या सह्या घेतल्या व थोड्याच वेळात तुम्हाला आत बोलावले जाईल असे सांगितले. दुभाषी साहेब तेथील सोफ्यावर बसून वर्तमानपत्रे चाळू लागले. जवळच एका टेबलवर तेथील ऑफिस सुपरिन्टेंडेंट मॅडम बसल्या होत्या. माझ्याकडे पाहून त्यांनी जुनी ओळख असल्यागत सुहास्य केले, त्यामुळे मी सरळ त्याच्या टेबलासमोरील खुर्चीवरच जाऊन बसलो.

त्या मॅडमचं नाव स्नेहलता होतं. त्यांनी सहज माझी चौकशी केली.. कुठून आलात ? कसली केस आहे ? वगैरे.. वगैरे. मीही त्यांना थोडक्यात केसची माहिती दिली. तसंच लिहून आणलेला घटनाक्रम व वर्तमानपत्रातील कात्रणेही त्यांना दाखविली. सुखदेवचा काळाकुट्ट पूर्वेतिहास, रुपेशने दिलेला घटनेतील सहभागाचा कबुलीजबाब, पोलीसांचा पक्षपातीपणा व तपासातील जाणूनबुजून केलेली दिरंगाई याबद्दलही त्यांना सांगितलं. माझी कहाणी ऐकून त्या हळहळल्या. त्यांच्या डोळ्यांत माझ्याबद्दल सहानुभूती दाटून आली.

“अरेरे..! खरं म्हणजे सध्या ज्या लोकपाल मॅडम आहेत ना, त्या माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रीण सुद्धा आहेत. एरव्ही त्यांना तुमची केस समजावून तुम्हाला मदत करणं मला नक्कीच आवडलं असतं. पण.. काय करू ? दुर्दैवाने तुमची केस चुकीच्या वेळी इथे आली आहे..!”

“म्हणजे ? मी समजलो नाही, चुकीची वेळ म्हणजे ? आणि.. लोकपाल ह्या महिला असून तुमची मैत्रीण आहेत ?”

जरासं असमंजस होऊनच मी विचारलं..

“होय.. सध्या असलेल्या Ombundsman मॅडम.. लोपामुद्रा सेनगुप्ता त्यांचं नाव.. ती माझी अगदी जवळची मैत्रीण आहे.. आम्ही इथे मुंबईतच एकत्रच शिकलो आहोत.. कार्यकाल संपल्यामुळे आज त्यांचा ऑफिसमधील शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच तुमची ही एकमेव केस आज त्यांनी हिअरिंग साठी ठेवली आहे. उद्या नंतर कदाचित एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची चेअर(वू)मन किंवा RBI च्या डेप्यु. गव्हर्नर म्हणूनही त्यांची नेमणूक होऊ शकते.”

आमचं असं बोलणं सुरू असतांनाच सुखदेव बोडखेने आपली पत्नी, मुलगा व एक दोन वकिलांना घेऊन ऑफिसात प्रवेश केला. मला पाहतांच त्याच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद प्रकटला. मोठ्याने ओरडून तो म्हणाला..

“अरे वा ! आले का साहेब रडत, बोंबलत, फरफटत.. वैजापूर टू मुंबई..! पाहिला नं, कसा आहे माझा इंगा..?”

मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. आमच्या नावाचा पुकारा झाला आणि आम्ही सगळे लोकपालांच्या न्यायकक्षात गेलो.

अंदाजे चाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान वय, मानेपर्यंतच केस असलेला आकर्षक प्लश बॉब कट, स्लीव्हलेस ब्लाऊझ, टपोरे सुंदर पाणीदार डोळे, धारदार नाक, गोरापान रंग, उंच कमनीय सडपातळ बांधा, चापून चोपून नेसलेली साधी पण सुंदरशी साडी अशा मोहक व्यक्तिमत्वाच्या लोपामुद्रा मॅडमनी सुहास्य वदनाने आमचं स्वागत केलं. आमच्या केसचा मॅडमनी सखोल अभ्यास केलेला असावा. रत्नमालाबाईंकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या..

banking ombudsman

“तुम्ही.. तक्रारदार मिसेस बोडखे ना ? तुमचं म्हणणं थोडक्यात सांगा..”

लोकपाल मॅडमनी एवढं म्हणायचाच अवकाश की दोन्ही हात जोडून आणि चेहऱ्यावर अत्यंत दीन, असहाय भाव आणीत सुखदेव उभा राहिला आणि म्हणाला..

“तिला काय विचारता मॅडम ? दुःखाने तिच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडणार नाही. आमची अशी काय चूक झाली की बँकेने एका रात्रीत आमच्या खात्यातून एवढी मोठी रक्कम गायब करून आम्हाला कफल्लक केलं.. बँक म्हणते की कोणीतरी आम्हाला दिलेल्या चेकबुक मधील चेकवर खोटी सही करून पैसे काढले आहेत. पण माझं चेकबुक तर माझ्याजवळच आहे. दुसरं जे चेकबुक आम्हाला दिलं होतं असं बँक म्हणते, त्या चेकबुक इश्यू रजिस्टरवर आम्हा कुणाचीही सही नाही. तसंच आमचा चेकबुक मागणी अर्ज देखील बँक दाखवू शकत नाही. मग बॅंकेच्या या निष्काळजीपणाची आम्हाला का सजा देता ?

मॅडम, मी एका स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असून सरकारी खात्यातील एक जबाबदार कर्मचारी आहे. हे पैसे शेती घेण्यासाठी बायकोचे दागिने मोडून मी बँकेत जमा केले होते. मला पेन्शन नाही, त्यामुळे रिटायरमेंट नंतर शेती करून उदरनिर्वाह करण्याचा माझा विचार आहे. या प्रकरणी आधीच खूप उशीर झालेला आहे. बँकेची चौकशी व तपास जेंव्हा पूर्ण व्हायचा तेंव्हा होवो. पण आम्हाला मात्र आमचे कष्टाचे पैसे ताबडतोब व्याजासहित आपण मिळवून द्यावेत हीच हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती..!”

हुंदके देत, दुःखी, केविलवाण्या, बापुड्या अभिनयाची पराकाष्ठा करीत अवघ्या शरीराची थरथरती हालचाल करीत डोळ्यातील अश्रू पुसत सुखदेव खाली बसला. त्याच्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या.. तद्दन नाटकी पण तरीही दमदार व भावपूर्ण वक्तृत्वाचा लोपामुद्रा मॅडमवर अपेक्षित परिणाम झालेला दिसला. माझ्याकडे रागाने पहात त्या कडाडल्या..

“तुम्हीच रिप्रेझेंट करताय ना बँकेला ? काही वेगळं सांगायचंय का तुम्हाला ? तक्रारदाराने आत्ता जे सांगितलं ते खोटं आहे असं तुम्ही सिद्ध करू शकता काय ? तसा काही नवीन, कागदोपत्री पुरावा आहे का तुमच्याकडे ? आणला असेल सोबत तर वेळ न घालवता ताबडतोब सादर करा..!”

“पण.. मॅडम, फोरेन्सिक डिपार्टमेंटचा अहवाल अजून प्राप्त व्हायचा आहे. त्यामुळे चेकवरील सही खरी (जेन्यूईन) आहे की बनावट (फोर्ज) आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही..”

मी कसंबसं चाचरतच म्हणालो..

“अहो, पण जर तो चेकच तक्रारदाराला दिलेल्या चेकबुक मधील नाही तर मग सहीच्या खरे खोटेपणाचा प्रश्नच कुठे येतो ? आणि.. आणखी किती वेळ घ्याल तुम्ही सहीचा खरेपणा तपासण्यासाठी ? तुम्हाला काही माणुसकी वगैरे आहे की नाही ? हे जे समोर बसले आहेत, ते तुमचेच कस्टमर आहेत ना ? त्यांची अवस्था बघा..! तुम्हाला त्यांची काहीच काळजी नाही कां ?”

मॅडमच्या त्या उग्रावतारापुढे गप्प बसणंच मी शहाणपणाचं आणि इष्ट समजलं. उद्वेगपूर्ण निराशेनं मान हलवीत माझ्याकडे पहात लोपामुद्रा मॅडम म्हणाल्या..

“ते काही नाही.. Enough is enough..! बँकेने तक्रारदाराला सात दिवसांच्या आत चेकची संपूर्ण रक्कम यथायोग्य व्याजासहित परत करावी असा मी आदेश देते. या आदेशाचं तंतोतंत पालन न झाल्यास संबंधित बँकेविरुद्ध या कार्यालयातर्फे उचित ती दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल..”

लोकपाल मॅडमचा “फैसला” ऐकताच माझ्या शेजारी बसलेले दुभाषी साहेब आपल्या जागेवरून उठले आणि बाहेर जाण्यापूर्वी हलक्या आवाजात मला म्हणाले..

“अगदी अपेक्षितच निकाल होता. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं.. पण एक बरं झालं, उगीच ताटकळत न ठेवता लवकर निकाल दिला मॅडमनी.. आता थोड्याच वेळात मॅडम निकालाची एक प्रत तक्रारदाराला व दुसरी बँकेला.. म्हणजे तुम्हाला देतील. तुम्ही ती निकालाची प्रत तुमच्या रिजनल ऑफिसला व झोनल ऑफिसला पाठवून द्या. मीही आमच्या कार्यालया मार्फत हेड ऑफिसला निकालाची माहिती देतो. येतो मी..”

असं म्हणून दुभाषी साहेब त्या लोकपाल कक्षाच्या दारापर्यंत गेले आणि मग काहीतरी आठवल्या सारखं करून मागे फिरून माझ्याजवळ येत म्हणाले..

“मी आता परत ऑफिसात न जाता माझ्या घरी जातोय. तेवढाच फॅमिली बरोबर वेळ घालवता येईल. आता थेट उद्याच ऑफिसला जाईन. संध्याकाळी उशिरापर्यंत लोकपाल कार्यालयातच होतो, असं सांगणार आहे DGM साहेबांना.. आमच्या ऑफिसातून कुणाचा फोन आला तर तुम्हीही तसंच सांगा.. आणि हो, निकाल विरुद्ध केला म्हणून मूड खराब करून घेऊ नका. एवीतेवी इथपर्यंत आलाच आहात तर थोडीशी मुंबई फिरून घ्या. बा ssss य..!”

माझ्या खांद्यावर हलकंसं थोपटून हात हलवीत निरोप घेत दुभाषी साहेब निघून गेले. मी घड्याळात पाहिलं.. आता कुठे फक्त साडेबारा वाजले होते. सेनगुप्ता मॅडम त्यांच्या पी. ए. ला निकालाच्या आदेश व अटींबाबत डिक्टेशन देत होत्या आणि त्यानुसार तो पीए भराभर टायपिंग करत होता. डिक्टेशन संपताच टाईप केलेले कागद सहीसाठी त्याने मॅडम समोर ठेवले व त्यांनी सही करतांच ते कागद दोन लिफाफ्यात टाकून माझ्या व सुखदेवच्या हातात दिले.

सुखदेवने लिफाफा उघडून आदेशाची प्रत वाचली. त्यातील “व्याजासहित चेकची संपूर्ण रक्कम सात दिवसांच्या आत द्यावी..” हे शब्द वाचून आनंद व अतीव समाधानाने त्याने डोळे मिटून घेतले. तिथूनच अदबपूर्ण कृतज्ञतेने मान झुकवून, कमरेत वाकून त्याने मॅडमना नमस्कार केला आणि म्हणाला..

“तुमचे खूप खूप आभार, मॅडम ! हा निकाल देऊन एका गरीब असहाय्य कुटुंबाला न्याय मिळवून दिलात तुम्ही.. तुमची सदैव प्रगती होवो, तुमचं कल्याण होवो अशाच मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो मॅडम तुम्हाला माझ्या कुटुंबातर्फे..”

लोकपाल मॅडम डायसच्या मागील दाराने त्यांच्या चेंबर मध्ये निघून गेल्यावर माझ्याजवळ येऊन माझ्याकडे कीव मिश्रित दयेच्या भावाने पहात सुखदेव म्हणाला..

“अरेरे.. साहेब..! अहो, हे काय झालं..? तुमची तर आत्ताच हवा गुल झाली. मग उद्या जेंव्हा मी वैजापुरात विजयी मिरवणूक काढून बँकेसमोर पब्लिक जमवून धांगडधिंगा करत तुमच्याविरुद्ध घोषणा देईन तेंव्हा तुमची काय हालत होईल ? आणि.. उद्याच्या पेपर मधील तुमच्या बदनामीच्या ठळक अक्षरातील बातम्या वाचून तर तुम्ही बहुदा आत्महत्याच करून घ्याल.. खूप मजा येणार आहे आता..! उद्या वैजापुरात भेटूच.. !!”sukhdev bodkhe

निकालाचा लिफाफा उंचावून जणू नाचतच आपल्या लवाजम्यासह सुखदेव निघून गेला. खिन्न मनानं जड पावलांनी मी रिसेप्शन रूम मध्ये आलो. ऑफिस सुपरिन्टेंडेंट स्नेहलता मॅडमनी ईशाऱ्यानेच मला जवळ बोलावलं.

(क्रमश:)

 

kotnisश्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १० भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे..