https://goodworld.in A website by Madhav Bhope

आठवणीतील पोळा Pola festival in Maharashtra

pola festival

आठवणीतील पोळा How pola was celebrated in Maharashtra

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पूर्वी साजरा केल्या जाणाऱ्या पोळ्याच्या आठवणी आणि इत्थंभूत वर्णन.

Pola in Maharashtra in old days. श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक, हे चार महिने सणावारांचे. श्रावणातील पहिल्या पंचमी पासून म्हणजे नागपंचमी पासून जे सण सुरू होतात, ते शीतला सप्तमी, नारळी पोर्णिमा किंवा रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला, इत्यादि झाल्यावर श्रावण अमावास्येला साजरा केला जाणारा सण म्हणजे पोळा आणि त्याच दिवशी साजरा केला जाणार मातृदिन. पोळ्याच्या नंतर लगेच गणेश चतुर्थी, महालक्षुम्या, नंतर पितृपक्षानंतर येणारे नवरात्र, दसरा, आणि नंतर दिवाळी, यामुळे, “पोळा, अन सण झाले गोळा”. अशी जुन्याकाळी म्हण होती.

आजकाल शहरात राहतांना हे सण कुठे येतात आणि कुठे जातात यांचा पत्ता लागत नाही. तेंव्हा बालपणी हे सण किती उत्साहाने साजरे केले जायचे हे आठवते. आज पुण्या मुंबई सारख्या शहरात, कॉस्मोपोलिटन भागात राहतांना, मातीचे बैल सुद्धा सहज मिळत नाहीत, आणि मग घरीच बैलांचे चित्र ठेवून त्याचीच पूजा करून कसे तरी मनाचे समाधान करून घ्यावे लागते, तेंव्हा बालपणी ठिकठिकाणी दणक्यात साजरा होणारा पोळा आठवतो.

आधी मातृदिना बद्दल. पोळ्याच्या दिवशी, सकाळी घरी मातीच्या पाच  बैलांचे, आणि गाय गोर्‍याचे रीतसर पूजन करून आई त्यांना खिरीचा आणि पुरीचा नैवेद्य दाखवीत असे. आणि मग आम्हाला ‘वाण’ घ्यायला बोलावीत असे. ‘वाण’ म्हणजे काय, तर आई आम्हाला तिच्या मागे उभे राहायला सांगत असे. तिने सुताच्या धाग्याला चार पदरी करून, हळदीने रंगवून ठेवलेले असे. त्याला ‘पोवते’ म्हणत. आम्ही मागे येऊन उभे राहिल्यावर आई मागे न पाहता आम्हाला विचारीत असे,- “सर्वातीत कोण?” मग आम्ही म्हणायचे, “सर्वातीत मी !” मग पुन्हा आई विचारी, “सर्वातीत कोण?” मग पुन्हा आम्ही म्हणायचे, “सर्वातीत मी !” असे तीनदा कारायचे. मग आई आम्हाला आपला उजवा हात पुढे करायला सांगायची, आणि मागे न पाहता, हातावर ते बंधन (‘पोवते’) बांधायची. आधी साधी गाठ बांधून मग ती मागे वळून आमच्या हाताला ते ‘पोवते’ नीट बांधून द्यायची. मग आम्हाला खीर पुरीचा नैवेद्य द्यायची.

मला यात खूप अर्थ भरलेला वाटतो. आई ही आपली पहिली गुरू असते. त्या आईची शिकवण आपल्याला आयुष्यभर साथ करणारी असते. ही शिकवण ही तशीच उच्च दर्जाची असली पाहिजे. ‘सर्वातीत’ म्हणजे सगळ्याच्या अतीत, म्हणजे पलीकडला. आणि असा सर्वाच्या पलीकडला म्हणजे कोण असतो, तर ‘आत्मा’. म्हणजे आपल्या अपत्याला “तू सगळ्याच्या अतीत असणारा आत्मा आहेस” याची आठवण करून देणारा हा उपदेश आहे. आणि हा प्रश्नोत्तराच्या स्वरूपात, मुलाकडून तीनदा हे वदवून घेतले जाते, की मी सर्वातीत आहे. असा हा मूल आणि माता यांच्यामधील अनन्य संबंध अधोरेखित करणारा हा दिवस आहे, म्हणून, “मातृदिन”.

आमच्याकडे जरी शेती नव्हती, तरी त्याकाळी आम्ही राहत असलेली गावे छोटी छोटीच होती, आणि तिथे बहुसंख्य समाज हा शेतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून असणारा होता. मला समजायला लागल्यावर आठवणारा पोळा म्हणजे हिंगोलीचा पोळा. मी त्यावेळी 9 ते 11 वर्षांचा असेल. हिंगोलीला सगळेच सण प्रचंड उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरे होत. त्यानंतरची आठवण म्हणजे सिल्लोड या गावची. तिथे अजून वेगळ्या प्रकारे पोळा साजरा होई. पण ठिकठिकाणी साजरा केला जाणारा पोळा हा बर्‍याच बाबतीत सारखा असे. माझ्या बहिणीच्या सासुरवाडीला, म्हणजे डोंगरावर असणार्‍या, सिल्लोड तालुक्यातील हळदा या गावी (त्यांच्याकडे शेती होती अणि ते पूर्णवेळ शेतकरी होते) साजरा होणारा पोळा मला बहीणीकडून ऐकायला मिळत असे.

खेड्यापाड्यात पोळ्याच्या कितीतरी दिवस आधी पासून शेतकर्‍यांची पोळ्याची तयारी सुरू व्ह्यायची. प्रत्येक शेतकर्‍याच्या घरी किती तरी बैल असत. त्यातल्या प्रत्येक बैलाचे आवडीने ठेवलेले नाव असे. तो कोणत्या कालवडी पासून झालेला आहे, कसा वाढला आहे, त्याच्या काय काय सवयी, किंवा ‘खोडी’ आहेत, त्याला काय आवडते आणि काय आवडत नाही, याची त्याच्या मालकाला इत्थंभूत माहिती असे. कोणता बैल गाडीला जुंपल्यावर अगदी शहाण्यासारखा चालतो, आणि कोणता नखरे करतो, पण तो नखरे करणारा बैलच औत ओढायला कसा भारी आहे, हे त्याचा मालक कौतुकाने सांगत असे.

पोळ्याच्या आधी येणारा आठवडी बाजाराचा दिवस बैलांच्या साजशृंगाराची सामग्री खरेदी करणार्‍या शेतकर्‍यांनी गजबजलेला असे. शिंगांना लावण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा ‘हिंगुळ’ (जो छोट्या छोट्या पत्र्याच्या डब्यांत मिळत असे), शिंगांना लावायसाठी रंगीबेरंगी बेगडी कागद, गळ्यात बांधायला घंटांच्या माळा, कवड्यांच्या माळा, तसेच नजर लागू नये म्हणून काळ्या रंगांच्या माळा,  रंगीबेरंगी गोंडे, पायात घालायला तोडे, बैलांच्या पाठीवर टाकायसाठी रंगीबेरंगी, वेगवेगळ्या रंगाच्या झुली, असे तऱ्हेतऱ्हेचे सामान बाजारात आलेले असे, आणि बैलांचे मालक आपल्या आवडत्या बैलांसाठी हे सर्व सामान मोठ्या आवडीने खरेदी करीत.pola bazar

पोळ्याच्या आदल्या दिवसापासून बैलांची स्पेशल ट्रीटमेंट सुरू होत असे. त्या दिवशी व दुसऱ्या दिवशी बैलांकडून कोणतेही काम घेत नसत. त्यांना नदीवर आंघोळीला घेऊन जात आणि चोळून चोळून आंघोळ घालीत. त्यानंतर बैलांची ‘खांदे मळणी’ होत असे. म्हणजे बैलांच्या खांद्यांना हळद आणि लोण्याने किंवा तुपाने मालिश करत. संध्याकाळी बैलांना चवळीच्या शेंगांची भाजी आणि पोळी किंवा पुरी खाऊ घालत.

पोळ्याच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी बैलांना आंघोळीसाठी नदीवर घेऊन जात. तिथून आल्यानंतर त्यांना सजवायला सुरूवात करीत. तांदुळाच्या पिठापासून आणि अन्य वस्तूंपासून तयार केलेल्या रंगाने बैलांना रंगवीत. त्यामध्ये बैलांच्या अंगावर बटाट्यापासून किंवा लाकडापासून बनवलेल्या छापयांनी छापे काढीत. तसेच हातांनीही छापे काढीत. बैलांची शिंगे खरबरीत झालेली असल्यास आधी त्यांना चाकूने नीट तासून घेत, जेणे करून शिंगांवरील डेड भाग निघून जाईल. नंतर शिंगांना हिंगुळ लावीत. हिंगुळ म्हणजे एक प्रकारचा रंगच असे. नंतर काही जण त्या हिंगुळावर, तो ओला असतांनाच बेगड चिकटवीत. बैलांच्या गळ्यात आदल्या दिवशी आणलेल्या घुंगरांच्या माळा(ज्यांना घागरमाळा सुद्धा म्हणतात) कवड्यांच्या माळा, आणि काळ्या रंगाच्या ‘केसरी’  माळा घालीत. पोळ्याच्या दिवशी बैलाच्या नाकात घालणारी ‘नथ’ किंवा ‘नथणी’ सुद्धा बदलतात आणि नवीन घालतात.  शिंगांना दोन्ही बाजूंनी अडकवून गोंडे समोरच्या बाजूला कपाळावर येतील असे बांधीत. तसेच छान तयार केलेले बाशिंग बांधीत.

अशा प्रकारे छान सजवलेले बैल घेऊन मग घराबाहेर पडत, घरी अनेक बैल असल्यानंतर (ते सहसा असतच.) घरातील माणसे एकेक बैल घेऊन बाहेर पडत. तसेच आणखी बैल असतील ते घेऊन सालदार बाहेर पडत.bail2

गावातील घरोघरचे सगळे बैल घेऊन मग सर्वजण एका मोठ्या मैदानात जमत. काही ठिकाणी हे ठिकाण नदीच्या पल्याड असे. काही जण तिकडे जाण्या आधी बैलांना मारूतीचे दर्शन करून आणीत.

पोळा ‘फुटायची’ वेळ सहसा आधीच गावकऱ्यांनी सर्व सहमतीने ठरवलेली असे. गावातील पोळ्याच्या मैदानावर सर्व मातब्बर मंडळी जमलेली असे. मैदानावर एका ठराविक ठिकाणी एक सजवलेली दोरी  तोरण म्हणून दोन्ही बाजूंनी ताणून धरलेली असे. जमलेले बैलही या वातावरणाने खूप उत्तेजित होऊन फुरफुरू लागत. आणि आपल्या मालकाच्या हातातील दाव्याला हिसडा देऊन पुढे जायचा प्रयत्न करीत. ठरलेल्या वेळेच्या खूप आधी वाजवणारी मंडळी जोरजोरात डफडे वाजवायला सुरूवात करीत. पोळा फुटल्यानंतर पहिल्यांदा पुढे जाणारा बैल कोणाचा हे आधीच ठरलेले असे. काही ठिकाणी गावातील प्रमुख व्यक्ति, पाटील इत्यादींना हा मान असे. काही ठिकाणी ज्यांनी नवीन जमीन घेतली आहे अशा मालकाला हा मान दिला जाई, तर काही ठिकाणी या मानाचा ‘लिलाव’ करून, जास्तीत जास्त बोली लावणाऱ्याला हा मान दिला जाई आणि त्याच्या कडून मिळणारे पैसे गावाच्या विकासासाठी वापरले जात.

आणि मग पोळा फुटायची वेळ येई, आणि एका क्षणी ते तोरण बाजूला घेतले जाई आणि सगळ्यात पहिल्यांदा मानाचा बैल ऐटीत पुढे निघे. आणि त्याच्या मागे लगेच इतर बैलांचे मालक आपापले बैल दामटीत. शेकडो बैल आणि त्यांचे मालक एकाच वेळी पळत सुटल्याने सगळीकडे त्यांच्या पायांनी उडणारी धूळ, बैलांच्या मालकांनी आपल्या बैलांना दिलेले आवाज, या सर्वांनी वातावरण भरून जात असे.pola festival

मग त्यातील बरेच जण आपल्या बैलांना मारुतीच्या मंदिरात घेऊन जात आणि  मारूतीचे दर्शन करून आणीत. मग त्यातील बरेच जण आपल्या घराकडे जाण्याआधी गावातील सर्व घरांच्या समोर घेऊन जात. त्या ठिकाणी घरातील मंडळी सजून धजून बैलांच्या स्वागतासाठी उभेच असत. मग घरातील स्त्रिया त्या बैलांना ओवाळीत, हळदी कुंकू वाहीत, त्यांच्या पायावर पाणी घालीत, तसेच ज्याने बैल धरला आहे त्याच्या सुद्धा पायावर पाणी घालीत, आणि बैलाला पुरणपोळीचा घास भरवीत. बैलही मोठ्या आनंदाने हा पुरणपोळीचा नैवेद्य स्वीकारीत.pola14 pola15 pola16

एखाद्या एखाद्या घरी मात्र बैल काही केल्या पुरणपोळी घेत नसत. तोंडाजवळ पोळी नेली तरी आडवी मान हलवीत. मग अशा वेळी बैल रूसला आहे असे म्हणत. मग त्याचा मालक त्याच्या विनवण्या करी, तेंव्हा कुठे तो बैल तो नैवेद्य स्वीकारी. गावात त्यादिवशी पूर्ण उत्सवाचे आणि उत्साहाचेच वातावरण असे. सगळीकडे जाऊन आल्यानंतर मग बैलाचा मालक जेंव्हा त्याला घेऊन घरी येई, तेंव्हा त्या दोघांचे खूप उत्साहाने स्वागत होत असे. काही काही जण आधी घरी जाऊन मग सगळीकडे बैल फिरवीत. घरी बैलाला घरातील स्त्रिया ओवाळीत, त्याच्या पायांवर पाणी घालीत, हळदी कुंकू वाहून नमस्कार करीत, आणि त्याला पुरणपोळी खाऊ घालीत.

आपल्या घरी आपले सगळे बैल परत आल्यानंतर मग सगळ्यांना पुरणपोळीचे जेवण असे. त्यात सालदार, घरगडी, बैल धरणारे, शेजारी पाजारी, नातेवाईक, असे सर्व संमिलित असत आणि मोठी पंगत असे.

नाग हा विषारी प्राणी असूनही, शेतातील धान्य फस्त करणार्‍या उंदरांना मर्यादित ठेवतो, अणि जीवन साखळीचा तो एक आवश्यक भाग आहे,म्हणून आपली संस्कृती त्याच्याप्रतिही, नागपंचमीच्या सणाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करते, त्याचे पूजन करते. त्यानिमित्ताने स्त्रिया बाहेर पडत, सामूहिकरित्या गावाबाहेरच्या मोकळ्या हवेत, वारुळावर जात, आणि नागाचे पूजन करत. यात निसर्गाच्या एका घटकाविषयी कृतज्ञतेचा भाव तर आहेच, पण अशा अनेक निमित्ताने  सगळ्यांचे एकत्र येणे, निसर्गाच्या जवळ जाणे, हे एक खूप मोठे मानसिक औषध ही आहे. तसेच बैल हा शेतीचा अविभाज्य घटक असून त्यावर शेतकर्‍यांचे अणि पर्यायाने इतर समाज घटकांचे जीवन अवलंबून असल्याने, नागपंचमी काय किंवा, बैलपोळा काय, हे आपले सण हे निसर्गाच्या अणि त्यातील घटकांच्या प्रति आपला कृतज्ञ भाव व्यक्त करणारी अप्रतिम व्यवस्था आहे.

 ज्याच्यावर आपले पोट, आपली शेती अवलंबून आहे, ज्याच्या श्रमामुळे आपण शेती करू शंकतो, त्या मुक्या जनावराच्या प्रति,  नुसते जनावर म्हणून नाही तर घरातील एक सदस्य म्हणून बघण्याची आणि त्याच्याप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची ही पर्वणी,  म्हणजे बैलपोळा.

अजून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बर्‍याच प्रमाणात पोळा हा वरील स्वरूपात साजरा केला जातो. पण शहरात राहणार्‍यांना मात्र बैल पोळा वरील स्वरूपात अनुभवायला मिळत नाही. आमच्या मुलांनी काही प्रमाणात हा अनुभव घेतला, पण नातवंडांना मात्र हा अनुभव देणे हे आता स्वप्नवतच झाले आहे.

असो. आज पोळ्याच्या अणि मातृदिनाच्या निमित्ताने जुन्या सगळ्या स्मृतींची उजळणी झाली. या पोळ्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा, आणि मातृदिनानिमित्त सर्व मातांना वंदन!

हा लेख आवडला असल्यास हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या मुलांनाही हा ब्लॉग वाचू द्या, जेणेकरून त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल. 

माधव भोपे

पुण्याजवळील पावसाळ्यातील पर्यटनस्थळे

madhe ghat

पावसाळ्यात फिरायला जाण्यासारखी पुण्याच्या जवळील नेहमीपेक्षा वेगळी पर्यटन स्थळे

यावर्षी पुणे आणि परिसरात पाऊस अगदी मनासारखा झाला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून पाऊस जवळ जवळ रोज हजरी लावत होता. मध्यंतरी तर अति पावसामुळे काही सखल भागात पाणी साचल्यामुळे तसेच खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे पुण्यात बरीच धावपळ ही झाली होती आणि नुकसान ही झाले होते. तसेच काही जणांना अति उत्साहामुळे जीवही गमवावा लागला होता. 

आता पावसाने थोडी उसंत घेतली आहे. पुण्याच्या आजूबाजूला सह्याद्रीच्या रांगा असल्यामुळे निसर्ग सौंदर्य बघण्यासारखे आहे.  आणि अशा वातावरणात बाहेर पडून निसर्गाच्या हिरवाईचा आस्वाद घेण्यात एक वेगळाच आनंद आहे. 

नेहमीच्या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळांवर प्रचंड गर्दी होत असल्यामुळे, अशा वेळी पर्यटकांचा हिरमोड होतो. अशा वेळी तितक्याच सुंदर, पण तुलनेने कमी गर्दी असणारी पर्यटन स्थळे असली तर किती छान असे वाटते. 

पुण्याच्या आसपास असणाऱ्या अशाच 11 पर्यटन स्थळांविषयी माहिती वाचा. 

यात अजून अधिकाधिक माहिती add करण्याचा प्रयत्न राहील. तेंव्हा या पोस्टला पुन्हा पुन्हा विजिट देत रहा.

  1. मढे घाट धबधबाmadhe ghat

पुणे व रायगड जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या राजगड तालुक्यातील केळद गावातील मढे घाट धबधबा म्हणजे जणू मिनी महाबळेश्वर म्हणता येईल असे ठिकाण आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये हिरव्यागार वनश्री ने नटलेला हा परिसर आहे.

पुण्यापासून अंतर- 68 ते 80 किमी

कसे जाणार- पुणे-खडकवासला -पाबे घाटमार्गे वेल्हे-केळद (68 किमी) किंवा पुणे-नरसापूर-मार्गासनी-वेल्हे–केळद  (80 किमी)

123movies

embedgooglemap.net

  1. बेंदेवाडी धबधबाbendewadi

आंदर मावळ भागातील हा धबधबा दुर्गम भागात असला तरी सध्या या भागाची ओळख बनला आहे.

पुण्यापासून अंतर- 70 किमी

कसे जाणार- पुणे-कान्हेफाटा-टाकवे बुद्रुक-वडेश्वर-डाहूली-बेंदेवाडी धबधबा

  1. 123movies

    embedgooglemap.net

    दाऱ्या घाट- आंबोली

    darya ghat
    Click this image to watch video

जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी सह्याद्रीच्या डोंगर रांगेत असणार्या. असणार्या. दाऱ्या  घाटाचे निसर्गसौंदर्य पावसाळ्यात पहाण्यासारखे असते पायथ्याशी असलेले निसर्गसौंदर्याने नटलेले आंबोली गाव  परिसरातील मुख्य सांडेदरा व वर्जंड धबधबा, मीना नदीचा उगमस्थान असलेले श्री क्षेत्र मीनेशवर, ढाकोबा व मारुती मंदिर, खळखळून वाहणारे ओढे, पावसाळ्यात डोंगरावरून फेसाळत वाहत येणारे पांढरेशुभ्र धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.

पुण्यापासून अंतर- 112 किमी

कसे जाणार- पुणे-जुन्नर- दाऱ्या घाट

  1. 123movies

    embedgooglemap.net

    आंबे हातवीजambe hatvij

जुन्नर तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागातील आंबे हातवीज परिसरात कांचन धबधबा, दुर्गादेवी मंदिर, कोकण कडा, देवराई, खुटादरा व डोनीदरा आदि परिसरात विविध प्रकारची जैव विविधता आहे.

पुण्यापासून अंतर-135 किमी

कसे जाणार- पुणे-जुन्नर – आंबे हातवीज

  1. 123movies

    embedgooglemap.net

    डिंभे धरणDimbhe Dam Ambegaon Pune 3

आंबेगाव तालुक्यातील डिंभे येथील हुतात्मा बाबू गेनू जलाशय परिसर  हा हिरवाईने नटला असून श्री क्षेत्र भीमाशंकरकडे जातांना पोखरी घाटातून डिंभे धरणाचे मनमोहक स्वरूप पाहावयास मिळते.

पुण्यापासून अंतर-97 किमी

कसे जाणार- पुणे-मंचर-घोडेगाव-शिनोली- डिंभे

  1. 123movies

    embedgooglemap.net

    123movies

    embedgooglemap.net

    वरंधा घाटVarandha Ghat

भोर तालुक्यातील वरंधा घाट परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. येथे श्रावणात ऊन पावसाचा खेळ बघणण्यास एक वेगळीच मजा असते. घाटात, पाऊस सुरू होताच धबधबे दिसायला लागतात.

पुण्यापासून अंतर-110 किमी

कसे जाणार- पुणे-भोर- वरंधा घाट

  1. आहुपे-

    AhupeGhatTrekJuly32011
    Trek continues… Gorkhgad seen in the backdrop.

सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी नटलेले, भीमाशंकर अभयारण्यातले आहुपे हे पुणे जिल्ह्याचे शेवटचे टोकाचे गाव आहे. सगळीकडे हिरव्या रंगाची उधळण, डोंगर दऱ्यातून वाहणारे लहान मोठे धबधबे, धुके, इत्यादि येथील मुख्य आकर्षण आहे.

पुण्यापासून अंतर-137 किमी

कसे जाणार-  पुणे-मंचर-घोडेगाव- डिंभे-फुलवडे-अडीवरे-तिरपाड-आहुपे

  1. 123movies

    embedgooglemap.net

    नाणेघाट परिसर86351572Nane Ghat naneghat 4

नाणेघाट परिसरात पश्चिम घाट रांगेतील एक पर्वतीय खिंड, सातवाहन कालीन प्राचीन व्यापारी मार्ग, ब्राह्मी लिपी आणि मध्य इंडो-आर्यन बोलीतील संस्कृत शिलालेख असलेली प्रमुख गुहा, जकातीचा दगडी रांजण,  खळखळणारे ओढे, धबधबे व निसर्ग सौदर्य आकर्षक ठरते.

पुण्यापासून अंतर-125 किमी

कसे जाणार- पुणे-जुन्नर- नाणेघाट

  1. 123movies

    embedgooglemap.net

    मयूरेश्वर अभयारण्यBlackbuck

बारामती तालुक्यातील सुपे येथील मयूरेश्वर अभयारण्यात विविध आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्याने हे ठिकाण पर्यटकांच्या आवडीचे ठरत आहे. सुमारे 514 हेक्टर परिसरात हे अभयारण्य पसरलेले आहे. हे चिंकारा जातीच्या हरणांसाठी प्रसिद्ध असून, विविध पक्षी आणि प्राण्यांचेही इथे दर्शन घडते.

पुण्यापासून अंतर-75 किमी

कसे जाणार- पुणे-चौफुला(ता. दौंड)-सुपे- किंवा हडपसर-सासवड-जेजुरी -मोरगाव-सुपे

  1. 123movies

    embedgooglemap.net

    श्री क्षेत्र भुलेश्वरimages 26

श्रावण महिन्यात श्री शंकराचे दर्शन घ्यायचे असेल तर पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर येथे यादवकालीन शंकराचे जागृत देवस्थान आहे. या मंदिरावर शिल्पात कोरलेल्या मूर्ती आहेत. याची रचना वेरूळच्या मंदिरासारखी आहे. पुरातत्त्व विभागाने हे मंदिर राष्ट्रीय संरक्षित स्थळ म्हणून घोषित केले आहे.

पुण्यापासून अंतर= 55 ते 60 किमी

कसे जाणार-पुणे-यवत- भुलेश्वर, किंवा, पुणे-सासवड-भुलेश्वर

  1. 123movies

    embedgooglemap.net

    सोनगावचे ‘सोनेश्वर मंदिर’soneshwar temple

बारामती तालुक्यातील कऱ्हा व नीरा नदीच्या संगमावर वसलेले सोनगावचे ‘सोनेश्वर मंदिर’ हे धार्मिक स्थळाबरोबर पर्यटन स्थळ ही आहे. तीन बाजूंनी पाण्याने वेढलेल्या या मंदिराचे सौंदर्य पावसाळ्यात अधिकच खुलते.  या काळात इथे युरोपातून ‘भोरड्या’ पक्षी मोठ्या संख्येने येतात. पक्षी निरीक्षकांसाठी ही एक पर्वणीच असते.

पुण्यापासून अंतर- 116 किमी.

कसे जाणार-पुणे-बारामती-सोनगाव.

  

123movies

embedgooglemap.net

The art of Compartmentalization कम्पार्टमेंटची गम्मत

lfhealth240225 photos

Guest article by vaidya Sohan Pathak

कंपार्टमेंट ची गंमत..

 
मानसिक ताणतणावामुळे शुगर वाढलेला एक रुग्ण आमच्या मधुमेह तज्ञ मित्राने समुपदेशनासाठी पाठवला होता.
 
ऑफिसमधला कामाचा ताण,उत्पन्नामध्ये वाढ व्हावी म्हणून सुरु केलेला छोटा व्यवसाय ,त्याची वाढती जबाबदारी ,कौटुबिक ताण ,वाढणारी रक्त शर्करा एकंदर बऱ्यापैकी  वैतागलेला,पत्नीच्या भाषेत चिडचिडा स्वभाव अशी एकंदर रुग्णाची परिस्थिती होती.त्याचा मनात सतत आपण कुठे कमी पडणार तर नाही ,मला कुटुंबातले सदस्य समजावून घेत नाहीत असे विचार येत व त्या मुळे निद्रानाश , डोकेदुखी सारखे आणखी विकार मागे लागले होते.
 
 
सुरवातीला, तुम्ही डायनिंग टेबल वरचं खाण्याचं सामान नेहमी बेडरूम मध्ये ठेवता का ? किंवा रोज हॉलमधल्या चपला स्वयंपाक घरात आणता का ? असा प्रश्र्न मी विचारल्यावर
आता हा अजून काय नवीन प्रकार, अशा माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने माझ्याकडे पहिले.

ignoring

 
नंतर त्याच्यांशी संवाद साधताना मी कंपार्टमेंट विचार पद्धती ची मजा सांगितली .
 
आपण कोणत्याही घटनेचा विचार करताना त्याचा संबंध अनेक घटनांशी लावत असतो.  उदाहरणार्थ, ऑफिसमध्ये काही वादावादी झाली असेल आणि घरी आल्यावर मुलांचा गोंधळ चालू असेल किंवा पत्नीशी मतमतांतर झाले असेल तर आपण ऑफिसमधला ताणतणाव डोक्यात ठेवून मुलांवर किंवा पत्नीवर रागवतो .त्यांच्याशी नीट बोलत नाही.angry man1 
 
तसंच निर्णयाच्या बाबतीत कौटुंबिक मतभेद झाले तर आपण मतभेद झाले हाच विषय डोक्यात ठेवून इतर वेळी सामान्य पण वागत नाही .आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना मतभेद झालेला विषय डोक्यात ठेवून पूर्वग्रह दूषित संवाद करतो. त्यामुळे तो विसंवादच जास्त होतो .

silhouette, couple, people man-2480321.jpg

 
आपण आपली भूमिका नेमकी ठेवत नाही.आपल्या सगळ्या भूमिकांची सरमिसळ आपण करत असतो. जेव्हा वडील म्हणून काही संवाद साधायचा असेल तेव्हा आपली ऑफिसरची भूमिका आपण सोडून द्यायला पाहिजे पण मुलांची बोलताना बऱ्याच वेळा ऑफिसर च्या भूमिकेतूनच आपण बोलतो कुटुंबियांशी संवाद साधताना किंवा पत्नीशी संवाद साधताना अगोदर झालेल्या घटना, मतभेद डोक्यात ठेवून आपला संवाद होतो प्रत्येक वेळी मागे झालेल्या चुका संदर्भासाठी ठेवूनच आपण त्यांच्याशी बोलतो. 
 
 हा भूमिकांची सरमिसळ असलेला संवाद खूप त्रासदायक होतो. साधं “पाणी दे” हे वाक्य बोलताना सुद्धा मागच्या वेळेस पाणी थोडं सांडलं होतं हा रेफरन्स डोक्यात ठेवून पाणी न सांडता आण , असं बोलल्यास समोरची व्यक्ती सुद्धा आपल्या चुका आठवून बोलण्याची तयारी करते . त्यामुळे मूळ उद्देश बाजूला राहून वादविवादाची ठिणगी पडते.
 
एखाद्या सुनेला स्वयंपाक जमत नाही म्हणून ती वाईट किंवा सासूंचे कामात सहकार्य नाही म्हणून बेबनाव अशा विचारांच्या गोंधळामुळे त्या व्यक्तीचे चांगले गुण आपल्या लक्षात येत नाही.  जरी सुनेला स्वयंपाक येत नसेल, तरी ती नोकरी करते घर टापटीप ठेवते ,चांगलं लिहिते ,मुलांचा अभ्यास घेते सामाजिक संपर्क चांगला आहे ,कुटुंबियांची काळजी घेते घरातील महत्त्वाच्या गोष्टी मध्ये लक्ष घालते असे चांगले गुण तिच्यामध्ये असू शकतात पण आपण कंपार्टमेंटचा गोंधळ घातल्यामुळे आपल्या दृष्टीने ती वाईटच असं दृष्टिकोन होऊ शकतो. 
 
तसेच सासूबाईंना नातवांच्या जबाबदारी मधे , आज्ञार्थक बोलण्यामुळे, मतमतांतर असले तरी पण त्यांचे अनुभव ,त्यांचं घरातल्या अस्तित्व त्यांनी घराला घरपण देण्यासाठी आजवर केलेली मेहनत इतर कामात केलेली मदत या बाबींकडे पण लक्ष देणे आवश्यक असते दोघांनीही पूर्वग्रह दूषित ठेवला तर त्यांनी केलेल्या प्रत्येक गोष्टीतच आपल्याला चूक वाटू शकते .
 
अशाच प्रकारे एखाद्याशी वाद-विवाद झाले तर त्याचा राग इतर व्यक्तीशी बोलताना सुद्धा आपल्या मनात असतो आणि त्याच्याशी नीट बोलत नाही.त्यामुळे त्या व्यक्तीचा आपल्याबद्दल गैरसमज होऊ असाच गोंधळ ऑफिस मधील कामात सामाजिक कामामध्ये सुद्धा होतो. एखाद्या व्यक्तीने आपल्याशी पूर्वी वाद घातलेला असेल तर आपल्याला त्याने केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्याच्या कौतुकासाठी अडचणी येते आणि नंतर आपण सुख संवाद न ठेवल्यामुळे पुन्हा वाद वाढण्याची शक्यता असते. 
 
यासाठी आपल्याला कंपार्टमेंट विचार पद्धती आवश्यक असते म्हणजेच आपण जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा त्या विचारांना काल्पनिक कंपार्टमेंटमध्ये ठेवणे आवश्यक म्हणजेच समजा ऑफिसमधला ताण तणाव हा एका वेगळ्या कंपार्टमेंट मध्ये ठेवावा.  त्यामुळे आपल्या मुलांशी ,पत्नीशी वागताना त्याचा परिणाम होणार नाही. आपलं कौटुंबिक जीवन हे एक वेगळं कंपार्टमेंट आहे त्याचा परिणाम आपल्या ऑफिसवर, कामावर, व्यवसायावर झाला नाही पाहिजे .
Free-pik image
Free-pik image
 
एखादी व्यक्ती एखादं काम व्यवस्थित करू शकत नसेल तर आपले मतभेद त्या कामापुरतेच असावेत इतर वेळी आपण त्या व्यक्तीच्या चांगल्या गुणांचा कौतुक निश्चित केलं पाहिजे सतत त्याच्या चुकाबद्दल बोलणं हे त्या व्यक्ती सोबतच्या व्यवहारात अडचणी निर्माण करू शकते माझा आनंद, माझे छंद, माझी मित्र मंडळी, माझे कुटुंब, माझा व्यवसाय हे आपले वेगवेगळे काल्पनिक कंपार्टमेंट आहेत. 
 
 जसं आपण एका खोलीतील वस्तू दुसऱ्या खोलीत शक्यतो  ठेवत नाही तसंच या कंपार्टमेंट मधल्या विषयांची सरमिसळ आपण एकमेकांशी करू नये. या प्रत्येक कंपार्टमेंटच्या काल्पनिक चाव्या सुद्धा आपल्याच हातात पाहिजे ज्यामुळे कितीही ताण तणाव असला तरी आपण कुटुंबासाठी, आपल्या छंदासाठी वेळ देऊ शकू .
 
एखादी घटना दुर्दैवी असेल, त्रासदायक असेल तरीसुद्धा त्या घटने शिवाय आपली काही वेगळी जबाबदारी, जीवन, आनंद असू शकतो. त्या दुर्दैवी घटनेचाच विचार सतत आपण करत राहिलो म्हणजेच त्या कंपार्टमेंट मधले विचार इतर कंपार्टमेंट मध्ये जाऊ लागले तर आपल्या जीवनातले जबाबदारी, कर्तव्य, आनंद आपण व्यवस्थित उपभोगू शकणार नाही.पण जर आपली कंपार्टमेंटची भूमिका स्पष्ट असेल तर आपण या सगळ्यांमध्ये सरमिसळ होऊ देणार नाही आणि प्रत्येक भूमिका, जबाबदारी आपण व्यवस्थित पार पाडू शकू आणि समजा परिस्थिती आपल्या हाताबाहेर असेल समोरची व्यक्ती अगदीच असमजुतदार असेल तर त्या ताणतणावामुळे आपल्या जीवनातील उत्साह, आपल्या छंद, आपला आनंद ,आपली आवड याच्यावर अश्या कंपार्टमेंट विचार पद्धतीमुळे निश्चितच कमी परिणाम होईल आणि कठीण परिस्थिती सुद्धा आपण चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करू शकु.
मी सो…पा…
वैद्य सोहन पाठक
9822303175
sohanpathak@gmail.com

sohan pathakसदरील लेख हा छ. संभाजीनगर येथील प्रथितयश आयुर्वेदिक चिकित्सक  आणि समुपदेशक वैद्य  सोहन पाठक यांच्या फेसबुक पोस्ट वरून त्यांच्या परवानगीने साभार घेतला आहे. 

 

Buy Kudej Desi Hallikar Cow A2 Ghee, Healthy and traditional aroma, Best for kids

71Rd 72h5jL. SX679

30% off on 500 ml. bottle on Amazon. Offer for limited period only.

 

 

For readers in USA- visit our Amazon Link below to shop for Amazing kids toys and much more. You can shop for other requirements also through this link

Tri cycle for toddlers

Amazing joy Riding toys

रानभूल -4

spooky forest dark mystery horror nature generated by ai 24640 81335

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

  

*रानभूल…* (४ )

एका गोष्टीचं मात्र राहून राहून आश्चर्य वाटत होतं की आम्हाला अद्याप एकही माणूस अथवा सजीव प्राणी दिसला नव्हता. आजपर्यंत चकव्याच्या जितक्या कथा ऐकल्या होत्या त्या सर्व कथांत चकव्याने कुत्रा, मांजर, ससा किंवा बकरी यांचेच रूप घेऊन फसवणूक केली होती.

माझा एक मित्र कारने पंढरपूरला जात असताना तुळजापूरच्या पुढे एक वळण घेतल्यावर चुकीच्या रस्त्याला लागला. जेंव्हा खूप वेळ पासून एकही वाहन क्रॉस झाले नाही आणि रस्त्याच्या दुतर्फा असणारे अंतर दर्शविणारे माईल स्टोन्स ही दिसेनात तेंव्हा त्याला रस्ता चुकला असे वाटले व त्याने मागे झोपलेल्या मित्राला उठवून सांगितले की दिवसाची वेळ असूनही रस्त्यावर एकही वाहन दिसत नाही. मात्र सशांचे थवेच्या थवे कारच्या पुढून रस्ता ओलांडून जात आहेत, हे मला जरा विचित्र वाटते आहे.

त्या अनुभवी मित्राने हे ऐकताच ओळखले की त्यांना चकवा लागला आहे. संध्याकाळ होईपर्यंत थांबून गाडीतच बसून वाट पाहण्याचे त्यांनी ठरवले. संध्याकाळ होताच चकव्याचा प्रभाव संपला आणि त्यांना समोरच पंढरपूरचा वाहता रस्ता दिसू लागला.

असाच चकव्याचा आणखी एक अनुभव माझ्या मित्राच्या वडिलांनाही आला होता.

तालुक्याच्या आठवडी बाजारातून खेड्यातील घरी परतताना एक छोटेसे बकरीचे पिल्लू त्यांच्या मागे मागे चालत येऊ लागले. ते पिल्लू एवढे गोंडस होते की त्याला उचलून घेण्याचा त्यांना अनिवार मोह झाला. पिल्लाला उचलून घरी नेताना वाटेतील नदी ओलांडताना त्या पिल्लाचे पाय लांब लांब होऊ लागले. जेंव्हा ते पाय लांब होऊन नदीच्या पाण्याला लागले तेंव्हा त्यांनी ते पिल्लू दूर भिरकावून दिले आणि मागे न पाहता भराभर गावाकडे निघाले. तोच मागून आवाज आला..

“आज वाचलास… !”

रानातील, जंगलातील चकव्याप्रमाणेच उजाड माळरानावरही चकवा लागल्याचे अनेक किस्से आहेत.

अकोल्यात आमच्या घराशेजारी राहणाऱ्या काकांना उमरीच्या माळावर एका माणसाने कसलातरी पत्ता विचारला. त्यानंतर काय झाले माहीत नाही, पण हे काका त्या माणसाच्या मागे मागे चालू लागले. रस्त्याने एक दोन ओळखीच्या माणसांनी त्यांना नमस्कार केला पण त्यांच्याकडे अजिबात न पाहता जादूने भारल्यासारखे ते त्या माणसाच्या मागून चालत राहिले.

एका कोरड्या विहिरीपाशी आल्यावर तो माणूस एकाएकी अदृश्य झाला आणि मग काका किंचित भानावर आहे. पण आपण इथवर का व कसे आलो आणि आता आपल्याला कुठे जायचे आहे हेच त्यांना आठवेना. त्यांची अशी संभ्रमित अवस्था पाहून एक दोघा परिचितांनी त्यांना घरापर्यंत पोहोचविले.

चकव्याच्या अशा एका मागून एक थरारक कहाण्या आठवत असतानाच बाजूलाच बसून काहीतरी विचार करीत असलेला रमेश म्हणाला..

“साब, ये प्राणहिता नदी इस जंगलमे सांप जैसी मोड़ लेते हुए (नागमोड़ी वळणे घेत) बहती है.. और शायद हम नदी के ऐसे ही एक मोड़ के बीच घूम रहे है ! बाहर निकलनेका रास्ता पास ही है, लेकिन हमे कुछ न सूझने के कारण दिखाई नहीं दे रहा..”

रमेश जो विचार करत होता त्यात तथ्य होतं. नदीच्या दोन गोलाकार वळणांमध्ये आम्ही अडकलो असण्याचीही शक्यता होती. रानभुलीमुळे आम्हाला बाहेर निघण्याची वाट जवळ असूनही दिसत नव्हती.

आम्ही सरळ सरळ पुढेच जात असल्याने एकाच पद्धतीने विचार करीत आहोत आणि पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावर येत आहोत. पुढे जाण्याऐवजी मागे फिरून पाहिलं तर..? कदाचित उलट दिशेने गेल्यास एखादी नवी वाट सापडूही शकेल..!

रमेशलाही ही कल्पना पटली आणि मग पुन्हा पुन्हा नदी ओलांडण्याऐवजी आलेल्या रस्त्याने मागे फिरून आसपास एखादी नवीन वाट दिसते का ते शोधण्याचं ठरवलं.

हा उपाय खूपच परिणामकारक ठरला. त्याच रस्त्याने मागे फिरलो असताना आता रस्ता अजिबात ओळखीचा वाटत नव्हता. सर्व परिसर नवीन, वेगळा व अनोळखी वाटत होता. एखादी नवीन वाट आता आम्हाला नक्कीच सापडेल असा मनोमन विश्वास वाटत असतानाच दूर टोकावर एक मानवी आकृती उभी असलेली दिसली.

कमरेला फक्त वीतभर लांबीचा पंचा गुंडाळलेला एक उघडाबंब आदिवासी टोकाला घुंगरू लावलेली लांब काठी हातात घेऊन पुतळ्यासारखा स्थिर नजरेने आमच्याकडेच पहात होता. झुबकेदार मिशा, डोक्यावर मळकट मुंडासं, गळ्यात काळा गोफ, कानात कसल्यातरी धातूची भिकबाळी, खांद्यावर आखुडसं घोंगडं असलेला तो वनवासी जणू आमचीच वाट पहात रस्त्याच्या मधोमध उभा होता.

त्या माणसाजवळ जाताच रमेश म्हणाला..

“अरे..! ये तो अपना भिमन्ना है !”ranbhool 4

भिमन्ना बिरसाईपेट जवळच्या एका आदिवासी तांड्यात राहणारा गुराखी होता. गुरांना चरण्यासाठी तो जवळपासच्या जंगलात घेऊन जात असे. रमेश त्याला चांगलाच ओळखत होता.

“भिमन्ना, हम रास्ता भटक गए है ! हमे बालमपुर जाना था.. लेकिन अब बहुत देर हो चुकी है, इसलिए अब उतनुर वापस जाने के लिए रास्ता बताओ..!”

रमेशचं हे बोलणं ऐकताच भिमन्ना किंचित हसला आणि जवळच्या झाडाची पाने बाजूला केली. तो काय..?

त्या झाडामागे एक पाऊलवाट होती. एकावर एक असे तीन कळस असलेलं एक मंदिर ही तिथून दिसत होतं. लाकडी ओंडके व दगडी शिळांनी आदिवासी शैलीत बांधलेल्या त्या अनोख्या आकाराच्या मंदिराच्या शिखरावर लालभडक रंगाची त्रिकोणी पताका होती. बालमपुर गावातील काही झोपड्याही तिथून दिसत होत्या.

आम्ही एकदाचे बालमपुर गावात येऊन पोहोचलो होतो. आता आधी तिथल्या कर्जदारांना भेटून मग एखाद्या गावकऱ्यालाच सोबत घेऊया. म्हणजे परत जाताना त्रास होणार नाही.

तहानेनं जीव कासावीस झाला होता. कधी एकदा गावात जाऊन पोटभर पाणी पितोय असं झालं होतं. मी बालमपुरच्या दिशेनं मोटर सायकल वळवली.

भिमन्नाशी बोलण्यासाठी रमेश मात्र मागेच थांबला होता.

“कहो भिमन्ना..! बहुत दिन हुए, दिखाई नही दिए गांवमे..! कहां गए थे..?”

खिशातून तंबाखू काढून तळहातावर चोळत रमेश शेजारी उभा असलेल्या भिमन्नाला म्हणाला.

मात्र भिमन्नाकडून काहीच उत्तर न मिळाल्यामुळे रमेशने त्याच्याकडे वळून पाहिले तर त्याला तिथे कुणीच दिसले नाही. भिमन्ना कुठेतरी अंतर्धान पावला होता.

“साब.. रुक जाओ ! आगे मत जाना !”

रमेश जीवाच्या आकांताने ओरडला..

मी तसाच मागे आलो.

“क्या हुआ रमेश ? तुम इतने क्यों घबराए हुए हो ? और.. भिमन्ना कहां गया ?”

“वो.. वो.. वो भिमन्ना नही था !!”

थरथर कापत रमेश म्हणाला..

क्षणार्धात सारा प्रकार माझ्या ध्यानात आला. त्या झाडाची पाने बाजूला सारत मी बालमपुरच्या रस्त्याकडे पुन्हा बघितलं.. मघाशी दिसलेली पायवाट, ते आगळं वेगळं मंदिर, त्या झोपड्या.. सारं काही अदृश्य झालं होतं. गर्द झाडीशिवाय तिथे काहीच नव्हतं.

“घबराओ मत रमेश ! वो छलावा हमारा कुछ नही बिगाड़ सकता !”

वरकरणी रमेशला धीर देत असलो तरी आतून मी सुद्धा चांगलाच टरकलो होतो. चकवा आमच्या चिकाटीला कंटाळून आता आमनेसामने लढायला आला होता.

खिन्न मनाने आम्ही पूर्वीच्याच उलट दिशेने प्रवास पुन्हा सुरू केला. थोडं पुढे जातो न जातो, एवढ्यात अचानक मोटर सायकल बंद पडली. कदाचित गाडीतील पेट्रोल संपलं असावं. पेट्रोल टँकला कान लावत गाडी हलवून पाहिलं. काहीच आवाज ऐकू आला नाही. म्हणजे नक्कीच पेट्रोल संपलं होतं.

निमुटपणे गाडी हातात घेऊन पायवाटेने चालत पुढे निघालो. या चकव्याचा प्रभाव नक्की कधी संपणार ? मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे शुक्राची चांदणी दिसेपर्यंत तर नाही ना ?

प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक, लेखक अरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली हे विदर्भातील तणमोराच्या संशोधनाच्या निमित्ताने रानोमाळ भटकत असताना तणमोराची शिकार करणारा पारधी भेटला. डॉक्टर सलीम अली यांच्या पक्ष्यांच्या पुस्तकातील घुबडाचे चित्र पाहून त्याने त्या पक्ष्याचे नाव सांगितले “चकवाचांदण”. घुबडासारख्या अशुभ समजल्या जाणार्‍या पक्ष्याचे नाव इतके सुंदर, काव्यमय असू शकते याचे शब्दवेड्या चितमपल्लींना आश्चर्य, तसेच आनंद वाटला. साहजिकच त्यांच्या मनात “चकवाचांदण” या नावाविषयी जिज्ञासा निर्माण झाली.

त्यांनी त्या पारध्याला विचारले, “चकवाचांदण” म्हणजे काय ? तो म्हणाला “साब, ते पखेरू कलमुहा हाय. रानात सांजेला तो बोंबलू लागला की वाटेत आम्हाला चकवा मारतो. आमची रानभूल होते. अशा वेळी आम्ही जिथल्या तिथं बसून राहतो. आभाळात शुक्राची चांदणी दिसू लागते तेव्हा चकवा निघून जातो. आम्हाला वाट सापडते. म्हणून त्याला चकवाचांदण म्हणतो.”

चितमपल्लींना नावाचा हा खुलासा आवडला. “चकवाचांदण” हे नाव त्यांना संधिप्रकाश आणि गूढता यांचे प्रतीक वाटले. चितमपल्लींनी वनविभागातील नोकरी ठरवून स्वीकारलेली नव्हती. चुकून ते या नोकरीच्या आडवाटेच्या वनात आले आणि चालताना त्यांना आयुष्याची सुंदर वाट सापडली. अरण्यातल्या चकव्यानंतर दिसलेल्या उगवत्या शुक्राच्या चांदणीचे सौंदर्य अगदी आगळेवेगळे दिसते, म्हणून मारुती चितमपल्लींनी आपल्या आत्मकथनाचे नाव “चकवाचांदण” असे ठेवले.

उतनुरच्या त्या जंगलात अस्वल, तरस, बिबट्या, चित्ता, अजगर अशा हिंस्त्र प्राण्यांचा मुक्त संचार होता. संध्याकाळनंतर तिथे थांबणं खूपच थोक्याचं होतं.

काहीही करून लवकरात लवकर जंगलाबाहेर पडणं अत्यंत जरुरीचं होतं.

गाडी बंद पडल्यामुळे आमचा प्रवासाचा वेग मंदावला होता. अशात एखाद्या जंगली प्राण्याने हल्ला केला तर वेगाने पळ काढणेही शक्य नव्हते.

रानभूल ठरावीक अंतरापर्यंत आणि ठरावीक वेळेपर्यंतच आपल्या मेंदूचा कब्जा घेते. या भुलीच्या सीमेबाहेर जाताच त्याचा परिणाम, गुंगी कमी होते. खंबीर व भक्कम मनाच्या व्यक्ती मात्र अशा रानभुलीतून बाहेर पडू शकतात. कमकुवत मनाच्या व्यक्तींवर मात्र त्याचा दीर्घ काळ परिणाम राहू शकतो.

जंगलातले प्राणी, चरायला गेलेली गुरं, शेळ्या-मेंढ्या, गुराखी, लाकूडफाटा गोळा करायला गेलेले बायका-पुरुष, खेडूत, आदिवासी यांनाही चकवा लागतो. ते भ्रमिष्ट होतात, फिरून फिरून त्याच जागी घुटमळतात. शेवटी थकून, कंटाळून भुताटकी समजून घाबरतात.अशा भ्रमिष्ट झालेल्या व्यक्तींवर प्रसंगी मांत्रिकाकडून अघोरी उपायही केले जातात. पण चकवा, रानभूल हा अंधश्रद्धेचा विषय नाही, ती एक नैसर्गिक अरण्यशक्ती आहे. या शक्तीच्या अस्तित्वाचे संकेत रानभुलीसारख्या अनुभवातून मिळतात.

नवेगाव अरण्यातल्या अशाच एका अनुभवाची गोष्ट. नवेगाव अरण्यातला निसर्ग आणि वन्यजीवांचं निरीक्षण करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या सहली सतत जातात. एकदा एका शाळेतर्फे पाच दिवसांचं शिबीर तेथे भरवलं गेलं होतं. प्रत्यक्ष जंगलात वास्तव्य करून अरण्यवाचन शिकवलं जात होतं. वन्यजीव आणि त्यांची पर्यावरणातला समतोल राखण्यात होणारी मदत याबद्दलची माहिती दिली जात होती.

काही वेळानंतर सर्वानी दुपारच्या जेवणासाठी परतीची वाट धरली. वाटेवरच्या पाणवठ्यावर मुलं तहान भागवण्यासाठी थांबली. तेव्हा त्यांची गणती केली गेली. सर्व मिळून २४ जण होते. तिथून त्यांचा कॅम्प ३ किलोमीटर अंतरावर होता. थकव्यामुळे सर्वाची चाल मंदावली. पुढे १ किलोमीटरनंतर मागे-पुढे चालणाऱ्यांची गणती केली असता २ मुली आणि १ शिक्षिका दिसेनात.

त्या थकव्यामुळे सावकाश मागे चालत असतील असं समजून मागे जाऊन त्यांना शोधलं, सर्वानी खूप हाकाही मारल्या. पण काहीच प्रतिसाद येईना. मागच्या पाणवठ्यावरही शोधलं, पण त्या तिघी कुठेच दिसेनात. सूर्य डोक्यावर तळपू लागला. बाकी मुलामुलींना कॅम्पवर पोहोचवण्यात आलं, आणि त्या तिघींचा पुन्हा बारकाईनं शोध घ्यायला सुरुवात झाली. तेव्हा मात्र धास्ती वाटू लागली.

तेवढ्यात अचानक एका नाल्यापुढे ओलसर मातीत मुलींच्या पायांचे ठसे दिसले. त्यांना साद घालत घालत, शोधपथक निघालं. नाल्यातून तसंच २ किलोमीटर चालत गेल्यावर मोहाच्या एका झाडाला टेकून ती शिक्षिका सुन्नपणे बसलेली दिसली. तिच्या कुशीत त्या २ छोट्या मुली थकूनभागून पहुडल्या होत्या. शोधपथक आनंदानं त्यांच्याजवळ गेलं. पण त्यांनी त्यांना ओळखलं नाही. तिघींना हलवलं तरी त्यांनी कसली हालचाल केली नाही. त्या भान हरवल्यासारख्या बसल्या होत्या.

एकूण परिस्थितीवरून त्या रानभुलीच्या चक्रव्यूहात सापडल्याचं लक्षात आलं. त्यांना आधार देऊन उठवलं, आणि १ किलोमीटर चालत आणलं. दरम्यान, शोधार्थ निघालेली वन विभागाची जीप तेथे आली. काही वेळानं त्या शुद्धीवर आल्या.

पुढे “आकाशवाणी” वरच्या कार्यक्रमासाठी त्यांचे अनुभव ध्वनिमुद्रित केले गेले. तेव्हा ती शिक्षिका म्हणाली, ‘‘आम्ही सर्वाच्या मागे चालत होतो. तेवढय़ात एका मुलीला रस्त्याच्या डाव्या बाजूला सुंदर फुलं दिसली. ती तोडायचा मोह अनावर झाला, म्हणून तिघीही फुलांजवळ गेलो. तोच कसलातरी उग्र गंध आला आणि त्या वासानं आम्ही भांबावलो. काय चाललंय तेच कळेना. रस्ता दिसेनासा झाला. मुलींनी माझे हात घट्ट पकडले. आम्ही चालतच राहिलो. कुठे जातोय ते कळत नव्हतं. चालत चालत या नाल्यात आलो. थकव्यानं पायातलं त्राणच गेलं होतं, भान हरपलं होतं. फुलांचा मोह महागात पडला.’’

याचा अर्थ स्वसंरक्षणासाठी त्या झाडानं उग्र गंध सोडून त्या तिघींना बेभान केलं होतं.

मी व रमेश, आम्ही दोघेही अशाच कुठल्या झाडाच्या, वेलीच्या गंधजालात अडकलो होतो का ? तो रमेशच्या तोंडावर बसणारा वेलीचा फटका स्वसंरक्षणासाठीच होता काय ?

काही जाणकारांच्या मते अशा भूल पडणाऱ्या तीन प्रकारच्या वनस्पती आहेत. आदिवासी जिला “भुलनीदेवी” म्हणतात ती एक प्रकारची वनस्पती किनवट तालुक्यात आढळते. ज्या वनस्पतीवर पाय पडला किंवा फुलाचा सुगंध घेतल्यास भूल पडते ती “भूलनजडी” नावाची वनस्पती कोरपना ते राजुरा महामार्गावरील नदी शेजारील पायवाटेवर आढळते. ज्या वनस्पतीवर पाय पडल्यास ती त्या व्यक्तीला खाली पाडते अशी “भूतनी” नावाची वनस्पती पेटलावदच्या जंगलात तसेच निमाड भागात आढळते.

जंगलात भटकण्याची, गड किल्ले चढण्याची, ट्रेकिंग व अन्य साहसी प्रकारांची मनापासून आवड असल्याने माझं मनोधैर्य अद्याप तसं फारसं खचलं नव्हतं. उलट मला त्यात एक वेगळंच ॲडव्हेंचर दिसून येत होतं.

आम्ही खाली मान घालून चालतच होतो. इतक्यात..जंगलातील वातावरण हलके हलके बदलतं आहे असं जाणवू लागलं. पक्ष्यांचे कूजन पुन्हा कानावर पडू लागले. फळा फुलांचे सुगंधी वास पुन्हा दरवळू लागले. मघापासून प्रेतासारखे निर्जीव व भेसूर भासणारे जंगल आता पूर्वीसारखंच उल्हसित व चैतन्यपूर्ण वाटू लागले.

पुन्हा दूरवर एक मानवी आकृती दिसली. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. या आधीचा अनुभव आठवून आता पूर्ण सावधगिरी बाळगायचं मनोमन ठरवलं.

हुबेहूब यापूर्वी भेटलेल्या माणसा सारखाच दिसणारा तो आदिवासी आमच्याकडे हसत हसत पहात उभा होता. फक्त त्याच्या खांद्यावर घोंगडी व हातात काठी नव्हती. त्याऐवजी खांद्यावर एक कुऱ्हाड लटकत होती. किंचित वयस्कर वाटणाऱ्या त्या आदिवासीला रमेशने तेलगू मिश्रित गोंड भाषेत अभिवादन करून रस्ता चुकल्याचे सांगितले व उतनुरचा रस्ता विचारला.

त्या माणसाने सांगितले की पुढे जाऊन तुम्हाला दोन रस्ते दिसतील. त्यातील डाव्या रस्त्याने न जाता उजव्या रस्त्याने जा. डावा रस्ता “जुन्या बालमपुर” गावाकडे जातो तर उजवा रस्ता दंतनपल्ली गावाजवळ निघेल.

रमेशने त्या आदिवासीचा हात धरून ठेवला. आणि मला खरोखरीच पुढे दोन रस्ते आहेत का.. हे पाहण्यासाठी पुढे पाठविले.

पुढे खरोखरीच दोन पायवाटा होत्या. त्या आदिवासीचे आभार मानून त्याचे नाव विचारले तेंव्हा तो नमस्कार करत हसून म्हणाला.. “देवू.. देवन्ना !”

आम्ही पायीच पुढे चालू लागलो तेंव्हा तो म्हणाला.. “गाडी पर बैठो, साब..!”

गाडीतील पेट्रोल संपल्याचं सांगितल्यावर त्याने गाडी धरून जोरात हलवली तेंव्हा टाकीतील पेट्रोलचा आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू आला.

आश्चर्य वाटून गाडीला किक मारली आणि पहिल्याच किक मध्ये गाडी सुरू झाली. आमचे चेहरे आनंदाने फुलले. त्याचे पुन्हा पुन्हा आभार मानीत आम्ही उजव्या रस्त्याने निघालो. थोडं दूर आल्यावर मागे वळून पाहिलं तर “देवू” अजूनही आम्हाला हात हलवून निरोप देत उभा होता.

जाताना सहज डाव्या बाजूच्या पायवाटेकडे नजर गेली. ती पायवाट एक प्रचंड मोठ्या तलावाला जाऊन मिळाली होती. त्या विस्तीर्ण जलाशयात एक मंदिर पूर्णपणे बुडालेले दिसत होते. फक्त त्या मंदिराचे एकावर एक तीन कळस असलेले शिखर तेवढे पाण्याच्या वर होते. मंदिराच्या शिखरावर लालभडक त्रिकोणी पताका फडकत होती.

सुमारे चार किलोमीटर अंतर कापल्यावर आम्ही दंतनपल्ली गावाजवळ पोहोचलो तेंव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. तिथून मग अर्ध्या तासात ऊतनुरला पोहोचलो.

दुसऱ्या दिवशी बिरसाईपेटचे गावकरी बँकेत आले असता त्यांना आदल्या दिवशीचा अनुभव कथन केला तेंव्हा त्यांनी जो खुलासा केला तो ऐकून तर आम्ही आश्चर्याने फुटभर उंच उडालोच.

सुमारे दोन वर्षांपूर्वी बालमपुर गावाजवळ छोटेसे धरण बांधण्यात आले. त्यामुळे बालमपुर गावाचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. मात्र काही आदिवासी गावकऱ्यांनी गाव सोडण्यास नकार दिला. संपूर्ण गाव धरणाच्या पाण्याखाली जाणार असल्याने धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर पाणी सोडण्यापूर्वी वन खात्याने व पाटबंधारे खात्याने संयुक्त मोहीम राबवून या हट्टी गावकऱ्यांना बळजबरीने पकडून दहा किलोमीटर दूर अंतरावर उभारलेल्या निर्वासितांच्या छावणीत स्थलांतरित केले.

मात्र काही जिद्दी आदिवासी गावकरी संध्याकाळ होताच तेथून निसटले आणि पायी चालत बालमपुरला येऊन आपापल्या झोपड्यांमध्ये जाऊन झोपले. रात्री बारा नंतर धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. या पाण्यात बालमपुर गाव पूर्णपणे बुडाले. आदल्या रात्री झोपड्यांमध्ये येऊन झोपलेले तेवीस आदिवासी झोपेतच बुडून मरण पावले.

दुसऱ्या दिवशी ही बातमी समजताच प्रशासनात एकच हडकंप माजला. पत्रकारांवर व अन्य प्रसिद्धी माध्यमांवर वरून दबाव आणून बातमी दडपण्यात आली. मृतांच्या कुटुंबियांना भरपूर नुकसान भरपाई देऊन त्यांची तोंडे बंद करण्यात आली.

मात्र त्या दिवसापासून बालमपुर गावाच्या आसपासच्या परिसरात, जंगलात लोकांना विचित्र अनुभव येऊ लागले. तलावात मृत झालेल्या व्यक्ती लोकांना दिसायच्या. काही दुष्ट मृतात्मे त्या जंगलात शिरणाऱ्या लोकांना तलावाजवळ नेऊन त्यांना बुडवून त्यांचा जीव घेऊ लागले. तर काही सत्प्रवृत्त मृतात्मे या दुष्ट मृतात्म्यांपासून लोकांचे रक्षण करून त्यांना मदतही करीत असत.

आम्हाला देवासारखा भेटलेला “देवन्ना” हा असाच एक सत्प्रवृत्त मृतात्मा असावा. भिमन्ना हा बिरसाईपेट जवळ राहणारा गुराखी सहा महिन्यांपूर्वी बालमपुरच्या तलावात बुडून मरण पावला होता. कदाचित तोच दुष्ट मृतात्मा बनून आम्हाला भेटला असावा.

माझ्या काही मित्रांच्या मते मला त्या दिवशी जे जे अनुभव आले त्या सर्वांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येते. उदा. आम्हाला जंगलात जे कुजबुजण्याचे, हसण्याचे, विकट हास्याचे आवाज ऐकू आले ते दाट जंगलात जोरदार वाहणारा वारा कोंडला गेला की येऊ शकतात. याशिवाय मनाचे खेळ, भास, आजूबाजूला असलेल्या एखाद्या विषारी वनस्पतीने उत्सर्जित केलेल्या वायूचा परिणाम (हॅल्युसिनॅशन) असं सुद्धा असू शकतं.

हवेच्या दाबामुळे, वातावरणातील, हवेतील अतिउष्णता वा अतिशीतलता यामुळे, प्रकाशाच्या परावर्तन व अपवर्तन (reflection & refraction) हयामुळे सुद्धा अनेक प्रकारचे भास होतात. आकाशातील ताऱ्यांचे लुकलुकणे, पाण्याने भरलेल्या ग्लासात ठेवलेला चमचा तुटलेला दिसणे, पाण्याची खोली आहे त्यापेक्षा खूप कमी भासणे, आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य हे सारे एकप्रकारचे दृष्टीभ्रम किंवा आभासच असून प्रकाशाच्या अपवर्तनाचे (refraction) परिणाम आहेत. वाळवंटातील मृगजळ (Mirage), हे ही याचेच उदाहरण.

वाळवंटात भरकटलेल्या व्यक्तींना बरेचदा दूर अंतरावर हिरवळीचा प्रदेश (oasis) असल्याचा भ्रम होतो. कारण त्यांचा मेंदू तशी कल्पना करून तसा आभास निर्माण करतो. हिमालय, अंटार्क्टिका या सारख्या अतिथंड बर्फाळ प्रदेशात सैनिकांना, संशोधकांना अत्याधिक थंडीमुळे विविध प्रकारचे आभास होतात.

आणि दिशाभूल ही तर कुठेही होऊ शकते. वाळवंटात, महासागरात, पर्वतराजीत, उजाड माळरानात किंवा दाट जंगलात दिशा भरकटल्याची असंख्य उदाहरणे आहेत. पण गजबजलेल्या शहरातही आपण अनोळखी गल्लीबोळातून जाताना अनेकदा रस्ता, दिशा चुकतो. भलत्याच दिशेने बाहेर निघतो. ही देखील एक प्रकारची दिशाभूलच असते. अनेकदा दुपारच्या झोपेतून उठल्यावर आपल्याला सकाळ झाल्याचा भास होतो हा ही एक प्रकारचा कालभ्रम असतो.

ज्याला आपण “चकवा” म्हणतो तो कदाचित एखादा स्थलकालाचा अपघात असू शकेल. वेळ आणि काल यांच्यातला परस्पर संबंध अजूनही आजच्या विज्ञानाला नीटसा उमजलेला नाही. उदाहरणार्थ, एखाद्या कागदावर काही अंतरावर दोन ठिपके काढले तर त्यांना जोडणारी सरळ रेषा हाच सर्वात जवळचा मार्ग असू शकतो. पण त्याच कागदाची घडी घातली तर त्या दोन बिंदूमध्ये अजूनही जवळचा मार्ग निर्माण होऊ शकतो.

किंवा एखाद्या रबरी फुग्यावर दोन्ही बाजूंना दोन बिंदू रेखाटले तर फुग्याच्या बाहेरून वळसा घालत जाणारी रेषा हा जवळचा ज्ञात मार्ग असू शकतो, पण फुग्याच्या आतमधून दोन बिंदू जोडणारा मार्ग सर्वात जवळचा असेल. फक्त त्याची कल्पना यायला हवी. मानव त्रिमिती मध्ये जगतो म्हणून त्याला कदाचित याचं आकलन होऊ शकेल, पण मुंगीसारखा प्राणी जो द्विमिती मध्ये जगतो त्याला याची कल्पनाच येऊ शकणार नाही.

*विश्वात अजूनही असे काही मार्ग असतील ज्यांची आपल्याला जाणीव होत नाही किंवा आपल्याकडे त्याची जाणीव करून देणारी सक्षम ज्ञानेंद्रिये नाहीत.* किंवा हे अनुभव इतके प्रखर असतील कि ज्याची जाणीव मेंदू आपल्याला होऊ देत नाही. मग हे अनुभव एखाद्या फिल्टर झालेल्या गोष्टींसारखे निरुपद्रवी रूपात आपल्याला सामोरे येत असतील.

कारण समोरच्या गोष्टीचं नीट आकलन होत नसेल तर मेंदू त्याला सर्वात जवळचं रूप देतो आणि त्याच स्वरूपात ती आपल्याला दिसते किंवा दाखवली जाते. पण दरवेळी ती तशीच असेल असं नाही. एखाद्या स्थलकालाच्या क्वचित घडणाऱ्या आणि क्षणिक टिकणाऱ्या अपघाताचा कोणीतरी साक्षीदार होत असेल आणि तो त्याला “चकवा” या निरुपद्रवी रूपात जाणवत असेल किंवा जाणवून दिला जात असेल.

बालमपुरच्या जंगलातील त्या दिवशीच्या दुपारी आम्हाला आलेला अनुभव एवढेच सांगतो की काही गोष्टी अशा असतात की ज्यांचे कोणतेही शास्त्रीय, वैज्ञानिक वा मानसशास्त्रीय स्पष्टीकरण दिलेच जाऊ शकत नाही.

अजूनही दैनंदिन जीवनात जेंव्हा जेंव्हा सुष्ट व दुष्ट प्रवृत्तीची माणसे एकाच वेळी भेटतात तेंव्हा तेंव्हा बालमपुरच्या जंगलात भेटलेल्या देवन्ना व भिमन्ना यांची आठवण आल्याखेरीज रहात नाही.

(समाप्त)

रानभूल-१ 

रानभूल-२ 

रानभूल-३ 

लेखक परिचय-ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

अशीच एक सत्यकथा त्यांना तेंव्हाच्या आंध्र प्रदेश मधील आदिलाबाद जिल्ह्यातील उतनूर या ठिकाणी पोस्टिंग असतांना आलेला अनुभव वर्णन करणारी आहे. ही कथा 3 भागांमध्ये क्रमशः आहे. ही यापूर्वी त्यांच्या फेसबुकवर प्रसिद्ध झालेली आहे, आणि आता त्यांच्या परवानगीने या ब्लॉगच्या वाचकांसाठी इथे देत आहोत. 

Online Shopping on Amazon

smartphone summer sale
smartphone summer sale
wall clocks
Wall Clocks
Nilkamal cupboard
Nilkamal cupboard
wooden sofa set
wooden sofa set

Order any items above by clicking on respective images

Or click on the link shown here  to see all items in furniture

The above items are available on Amazon India.

Please refer to our affiliate disclosure page

रानभूल -3

spooky forest dark mystery horror nature generated by ai 24640 81335

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

रानभूल…* (३ )

अनेक वृक्षवल्लींत पंचेंद्रियांची गूढ शक्ती असते. जंगलात येणाऱ्या प्रत्येक परक्याचं अस्तित्व ही घुसखोरी वाटल्यामुळे त्यांना ती सहन होत नाही. आपल्याला उपद्रव व इजा करण्यासाठीच कुणीतरी आलेलं आहे अशी त्यांची समजूत होते. मग त्यांची स्वसंरक्षणासाठी प्रतिक्षिप्त क्रिया (Reflex action), हालचाल होते.

… हा वेलीचा रमेशवरील हल्ला म्हणजे अशीच प्रतिक्षिप्त क्रिया तर नाही ना ?

काही वृक्षवेली आपण त्यांच्या जवळपास जाताच पानाफुलांतून उग्र गंध सोडून त्रस्त करून सोडतात. त्या उग्र गंधाचा परिणाम सौम्य किंवा तीव्र भूल दिल्यासारखा होतो. परिणामी प्राणिमात्रांना गुंगी येते. प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी-जास्त प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती, दिशा यांचं भान राहात नाही. आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत, कुठे जायचं आहे, हे कळेनासं होतं. मेंदू बधिर होतो, आणि मागे, पुढे, डावीकडे, उजवीकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही. फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते. हीच रानभूल! हाच चकवा, आणि हेच झोटिंग!

…आम्हालाही असाच स्मृतिभ्रंश तर झालेला नाही ना ? कारण योग्य दिशा न सापडल्यामुळे आम्हीही फिरून फिरून त्याच जागी येत होतो.

पण नाही..! ज्याअर्थी मला सारं काही व्यवस्थित आठवत होतं त्याअर्थी माझी स्मरणशक्ती जागृत होती. माझी तर्कशक्ती, चिकित्सक वृत्ती व विनोदबुद्धी ही अद्याप शाबूत होती. वास्तवाचं पुरेपूर भानही मला होतं. पण.. पण या व्यतिरिक्त इथे असं काहीतरी होतं की जे माझ्या बुद्धीच्या आकलन कक्षेबाहेरचं होतं.

हा निसर्गाचा भोवरा, हे मायावी अरण्याचं दुष्टचक्र कधी संपणार..? असा सचिंत मनाने विचार करीत असतानाच जंगलातील वातावरण ढवळल्यासारखं होऊन जोरदार वारे वाहू लागले. जवळच्या झाडीतून कुणाच्या तरी दबक्या आवाजातील हसण्याचा व कुजबुज करण्याचा आवाजही कानी पडला. बोलणाऱ्या व्यक्तींची भाषा जरी समजत नसली तरी ऐकू येणाऱ्या विविध प्रकारच्या आवाजांवरून तो किमान सहा सात माणसांचा घोळका असावा.img

आतापर्यंत अतिशय शांत, स्तब्ध, नीरव असलेल्या त्या जंगलात कोणतीही चाहूल न लागू देता अचानक एवढी सारी माणसे कुठून आली..? असा प्रश्न पडून भीती वाटण्याऐवजी उलट या जंगलात आम्हाला कुणीतरी सोबतीला आलं आहे याचा आनंदच झाला. या व्यक्तींना जंगलातील सर्व रस्त्यांची खडानखडा माहिती असेल आणि त्यांच्या मदतीने या जंतरमंतर मधून आता नक्कीच बाहेर पडू या विचाराने आम्ही सुखावलो.

बराच वेळ झाला तरी त्या हसत गप्पा करणाऱ्या व्यक्ती जंगलातून बाहेर येण्याचे नावच घेत नव्हत्या. शेवटी कंटाळून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही मोठ्याने ओरडून आवाज देत टाळ्याही वाजवल्या. थोडा वेळ तो आवाज एकदम शांत झाला. त्यापाठोपाठ वाहता वाराही लगेच थांबला. पण मग आमच्या आवाजाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत पुन्हा त्यांचं हसणं खिदळणं पूर्ववत सुरू झालं. वाराही पूर्वीसारखा अनिर्बंध वाहू लागला.mihaly koles kKWrn At4Gg unsplash

ती माणसं जंगलातून परस्पर निघून गेली तर या चकव्यातून बाहेर पडण्याची आलेली संधी आपण गमावून बसू या धास्तीने उतावीळ होऊन मी त्यांना गाठण्यासाठी झाडीत शिरण्यासाठी पुढे सरसावलो.. तोच.. रमेशने माझा हात धरून “थांबा..!” अशी खूण केली. मी भिवया उंचावत चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव आणून त्याच्याकडे पाहिलं, तेंव्हा तो हलकेच पुटपुटला..

“साब.. यहीं *छलावा* है !”

रमेशचे हे शब्द ऐकताच मी विंचू चावल्यागत झटकन झाडीत घातलेला पाय मागे घेतला.

रमेशने इतक्या हळू आवाजात बोललेलं त्या दूर झाडीतील चकव्याला कसं काय ऐकू गेलं कोण जाणे..! पण त्या नंतर तो आवाज एकाएकी एकदम लुप्त झाला. वाहता वाराही अचानक थंड झाल्यामुळे जंगलात स्मशान शांतता पसरली. आम्ही बराच वेळ त्या आवाजाच्या दिशेने कानोसा घेत उभे होतो. पण पुन्हा काही तो आवाज ऐकू आला नाही.

कदाचित तो चकवाही.. आता आम्ही काय करतो..? याची गंमत पहात आमच्या अगदी जवळच उभा असावा. कारण थोडा वेळ कानोसा घेऊन जेंव्हा आम्ही तिथून आपल्या वाटेने पुढे जायला निघालो तेंव्हा त्या झाडीतून विकट हास्याचा एक कल्लोळ उठला. जणू काय..”कसं फसवलं..!” असंच चिडवित तो आम्हाला हसत असावा. पुन्हा सुरू झालेल्या बेभान वाऱ्यासंगे तो गडगडाटी अट्टाहास ध्वनी जंगलभर घुमत असतानाच मी गाडीचा वेग वाढवला.

थोडं पुढे आल्यावर रमेश म्हणाला..

“जब तक हम इस रास्ते पर है, तब तक सेफ है ! उस छलावेका इरादा हमे किसी तरह जंगल के अंदर बुलाकर, दूर खींच के ले जाने का है ! अगर हम गलती से भी रास्ता छोड़कर जंगल के अंदर गए तो बहुत बुरे फंस जाएंगे !”

रमेशचे हे बोलणे ऐकतांच कॉलेजातील मित्राने एकदा सांगितलेला चकव्या संबंधीचा असाच एक किस्सा आठवला.

या मित्राच्या गावाकडील शेतात काम करणारा एक तरणाबांड मजूर दुपारी रानाजवळील वाटेने शेतात जात असताना बाजूच्या झुडुपात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला. म्हणून त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्याला काहीच दिसले नाही. तो थोडा पुढे आल्यावर पुन्हा त्याला तसाच आवाज ऐकू आला. यावेळीही त्याला त्या झुडुपात काहीच दिसलं नाही. तिसऱ्या वेळी पुन्हा जेंव्हा तसा आवाज आला तेंव्हा त्याने चिडून त्या दिशेने एक मोठा दगड भिरकावला, तेंव्हा एक गलेलठ्ठ रानकोंबडी पंख फडफडवित रानाच्या दिशेने पळाली.

रान कोंबडी पाहून मजुराला तिला पकडण्याचा मोह झाला आणि तिच्या मागे धावत तो खूप खोल रानात गेला. रानकोंबडी तर त्याला गुंगारा देऊन कुठेतरी गडप झाली पण तो मजूर मात्र त्या रानात अडकला. फिर फिर फिरला, पण रानातून बाहेर पडण्याचा मार्गच त्याला सापडेना. असा चार पाच तास भटकल्यानंतर संध्याकाळी तो गावापासून दहा किलोमीटर दूर तालुक्याच्या दिशेने जाताना दिसला. त्याची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली होती. आपल्याला कुठे जायचे आहे याची त्याला शुद्धच नव्हती. गावकऱ्यांनी त्याला कसेबसे घरी आणल्यानंतर बरेच दिवस तो संभ्रमित, अस्थिर मानसिक अवस्थेत होता.

…आम्हीही मघाशी उताविळपणे त्या हसण्याच्या आवाजाच्या दिशेने खोल जंगलात शिरलो असतो तर आमची अवस्था काय झाली असती या नुसत्या कल्पनेनेच मला कापरं भरलं.

जंगलातील ओबड धोबड पायवाटेवरून खडखड असा आवाज करीत हळूहळू पुढे जाणाऱ्या मोटर सायकल वरून आमचा अर्थहीन व अंतहीन प्रवास सुरूच होता.

एवढ्यात.. तोच चिरपरिचित नदीच्या पाण्याचा खळखळाट पुन्हा ऐकू आला. समोर पाहिलं तर तोच नदीकाठचा मोठा दगड, तीच मोडून नदीत आडवी पडलेली झाडे, फुटभर खोल स्वच्छ पाण्यात चमकणारे तेच दगड वाळू गोटे आणि एखाद्या भयनाट्यातील मायावी चेटकिणी प्रमाणे भासणारी तीच तीस चाळीस फुटाच्या उथळ पात्राची खळखळ वाहणारी गूढ रहस्यमय नदी..Nature Tree River Bach Water Forest Landscape 3630487 2

“रमेश, क्या नाम है इस नदी का..?”

या नदीचं नक्कीच निर्दया, भीषणा, भेसूरा, कर्कशा, कठोरा, निष्ठूरा, आक्रोशा, रुद्रा, डाकिणी, पिशाचीणी असं काहीतरी भीतीदायक नाव असलं पाहिजे, असा मनाशी विचार करीत रमेशला विचारलं..

“ये नदी आगे जा कर “प्राणहिता नदी” को मिल जाती है इस लिये इस नदी को भी सब लोग *प्राणहिता* ही कहते है..!”

रमेशचं हे उत्तर ऐकून हसू आलं. एखाद्या निर्दयी कसायाचं नाव दीनदयाळ असावं.. तसंच होतं हे ! खरं तर “प्राणहिता” ऐवजी या नदीचं नाव “प्राणहरा” किंवा “प्राणहंता” असंच असायला हवं होतं..!

हतबुद्ध होऊन नाईलाजाने नदीकाठच्या त्या मोठ्या दगडावर बसून क्षणभराची विश्रांती घेताना आणखी किती वेळा ही नदी आपल्याला पुन्हा पुन्हा आडवी येणार आहे असाच विचार राहून राहून मनात येत होता.

(क्रमशः)

या आधीचे २ लेख इथे वाचा 

रानभूल-१ 

 

रानभूल-२ 

 

लेखक परिचय-ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

अशीच एक सत्यकथा त्यांना तेंव्हाच्या आंध्र प्रदेश मधील आदिलाबाद जिल्ह्यातील उतनूर या ठिकाणी पोस्टिंग असतांना आलेला अनुभव वर्णन करणारी आहे. ही कथा 3 भागांमध्ये क्रमशः आहे. ही यापूर्वी त्यांच्या फेसबुकवर प्रसिद्ध झालेली आहे, आणि आता त्यांच्या परवानगीने या ब्लॉगच्या वाचकांसाठी इथे देत आहोत. 

Online Shopping on Amazon

smartphone summer sale
smartphone summer sale
wall clocks
Wall Clocks
Nilkamal cupboard
Nilkamal cupboard
wooden sofa set
wooden sofa set

Order any items above by clicking on respective images

Or click on the link shown here  to see all items in furniture

The above items are available on Amazon India.

Please refer to our affiliate disclosure page