https://goodworld.in A website by Madhav Bhope

उतनूरचे दिवस-5A-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

memories at utnoor featured image

Memories-at-Utnoor

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*उतनूरचे दिवस..*

*थरार… (५-अ)*

तरुण वयात प्रत्येकालाच साम्यवादाचं आकर्षण असतं. तसं ते एके काळी मला ही होतं. ज्या समाजात श्रीमंत गरीब असा वर्ग कलह नाही, निर्बल बलवान असा शक्ती संघर्ष नाही, उच्च नीच असा पंक्तीभेद नाही अशा समाजात राहणं कुणाला आवडणार नाही ? अशा कल्पनारम्य, आदर्श जगाची मोहिनी बहुतांश विद्वान, विचारवंत, प्रोफेसर, वैज्ञानिक, साहित्यिक, कवी व कलावंतांना तर कायमच पडत आलेली आहे.

विद्यार्थीदशेत असताना कार्ल मार्क्स, फ्रेडरिक एंगेल्स यांच्या विचारांच्या काही लहानशा पुस्तिका वाचल्या होत्या. पुढे कुतूहलवश “द कम्युनिस्ट मॅनिफेस्टो” आणि “दास कॅपिटल” हे ग्रंथही लायब्ररीतून मिळवून वाचून काढले. त्या कोवळ्या, अपरिपक्व वयात त्यातील विचार फारसे समजले नाहीत आणि त्यामुळे पुढे कम्युनिस्ट साहित्यापासून तसा दूरच राहिलो.

पुढे जॉर्ज ऑर्वेल ची “ऍनिमल फार्म”, “1984” ही पुस्तकं वाचली, स्टॅलिन व माओ यांनी केलेल्या आपल्याच देशवासीयांच्या प्रचंड नरसंहाराची वर्णनं वाचली आणि कम्युनिझम म्हणजे सुद्धा एकप्रकारची निर्दयी हुकूमशाहीच आहे असा माझा पक्का समज झाला. मात्र तरी देखील अमेरिका, ब्रिटन व अन्य पाश्चात्य, युरोपीय देश कम्युनिझमला एवढा विरोध का करतात याचं नेमकं आणि पटेल असं संयुक्तिक कारण मला ज्ञात नव्हतं.

नोकरीच्या निमित्ताने मी सध्या नक्षली मुलुखात होतो. मार्क्स, लेनिन आणि माओ यांच्या विचारांनी प्रेरित असलेला नक्षलवाद हाही एकप्रकारे टोकाचा (extreme) साम्यवादच. मात्र मिलिटरी सारखा नक्षली गणवेश घालून पोलिसांपासून जीव वाचवित जंगलात वणवण हिंडणाऱ्या ह्या भागातील गरीब, निरक्षर, आदिवासी नक्षली तरुणांना लेनिन, मार्क्स, एंगेल्स ची खरीखुरी साम्यवादी विचारसरणी माहित तरी असेल का ? असा प्रश्न मला नेहमीच पडत असे.

तसं पाहिलं तर आतापर्यंत एक दोन सशस्त्र नक्षलवाद्यांना ओझरतं पाहिलं असलं तरी कुणाही नक्षलवाद्याशी अद्याप माझा प्रत्यक्ष आमना सामना झाला नव्हता. मात्र, दुर्दैवाने लवकरच तशी वेळ येणार होती.

उतनूर पासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या वडगलपूर बुजुर्ग या गावात आमच्या शाखेचा जुना पीक कर्जाचा फायनान्स होता. पूर्वी हे गाव अत्यंत घनदाट जंगलात वसलेलं होतं. पुढे काही कारणास्तव वन विभागाने हा परिसर अधिग्रहित करून आपल्या ताब्यात घेतला आणि वडगलपुर गावाचं सहा किलोमीटर दूर असलेल्या गुंडाळा या गावाजवळ पुनर्वसन केलं. आज, याच गुंडाळा गावाला जाऊन तेथील पूर्वाश्रमीच्या वडगलपुर वासीयांना भेटून थकीत पीक कर्ज खाती नियमित करण्याचा माझा विचार होता.

दुपारी बारापर्यंत शाखेतील महत्वाची कामे आटोपून प्युन रमेश सोबत निघायचं ठरवलं होतं. परंतु बँकेतून निघे निघेपर्यंत दोन वाजून गेले होते. शाळेला दिवाळीच्या सुट्या लागल्यामुळे लहानग्या अनिशला घेऊन बायको पंधरा दिवसांसाठी अकोल्याला गेली होती. त्यामुळे घरी निरोप ठेवण्याचा प्रश्नच नव्हता. बस स्टँड जवळील चिन्नय्याच्या मेस मध्ये जेवून तीन वाजता मी व रमेश गुंडाळा गावाकडे निघालो.

जंगलातील कच्च्या पायवाटेने गुंडाळा गाव तसं फक्त सतरा अठरा किलोमीटर अंतरावरच होतं. बँकेतून निघायला उशीर झाल्याने आज गुंडाळा गावाला फक्त धावती भेट देऊन लगेच पाच वाजण्याच्या आत उतनूरला परतायचं असं आधीच ठरवलं होतं. आम्ही जेमतेम दोन तीन किलोमीटर अंतरावर आलो असतानाच अचानक रमेशचं पोट खूप दुखू लागलं. त्याला मोहाची दारू पिण्याचा खूप नाद होता. जास्त दारू पिल्यावर त्याचं पोट असं नेहमीच दुखायचं.

रमेशचं पोट दुखणं थांबायची वाट पहात आम्ही एका झाडाखाली उभे राहिलो. परंतु रमेशचं दुखणं थांबण्या ऐवजी आणखीनच वाढलं. शेवटी तो म्हणाला..

“ताबडतोब घरी जाऊन औषध घेऊन पडून राहिलो तरच मला आराम पडेल. मी आता परत उतनूरला जातो. गुंडाळा गावाकडे पायी जाणारा एखादा वाटसरू तुम्हाला पाहून देतो. तो तुम्हाला नीट वाट दाखवील. तसा, गुंडाळ्याचा रस्ता अगदी सरळ आहे. जातांनी रस्ता नीट पाहून ठेवा आणि येतांनी गेले तसेच परत या..”

रमेशचं म्हणणं मला पटलं. तसाही मी आजकाल बऱ्याच गावांत एकट्यानेच जात होतो. तेलगू भाषाही आता मला बरीचशी समजू लागली होती आणि मोडकी तोडकी बोलताही येत होती. याशिवाय बरेचसे आदिवासी बोली भाषेतील रोजच्या वापरातील शब्द ही माझ्या ओळखीचे झाले होते. त्यातून आज उतनूरला बँकेत काही विशेष काम नसल्याने रमेशच्या बोलण्यावर मी संमतीदर्शक मान डोलावली.

सुदैवाने त्याचवेळी समोरून पायी येणारा बिरसय्या हा गुंडाळा गावचा रहिवासी रमेशच्या चांगल्याच परिचयाचा निघाला. मला गुंडाळा गावात नेण्याबद्दल त्याला सांगून, एका फॉरेस्ट गार्डच्या दुचाकीवर बसून रमेश उतनूरला निघून गेला.

रमेशनं सांगितल्या प्रमाणेच गुंडाळा गावाकडे जाणारा रस्ता अगदी सरळ सरळ होता. रस्ता अगदी निर्मनुष्य होता. आजूबाजूला रमणीय वनश्री आणि छोटे छोटे सुंदर तलाव होते. झाडांवर व तलावाच्या आसपास बसलेल्या चित्रविचित्र रानपक्ष्यांचा सुरेल किलबिलाट कानी पडत होता. त्या अनोख्या पक्ष्यांना एकदा तरी निरखून पाहण्याचा अनावर मोह होत होता. पण समोरची पायवाट एवढी अरुंद होती की कसाबसा मोटारसायकलचा तोल सांभाळण्याकडेच सारं लक्ष द्यावं लागतं होतं.

वीस पंचवीस मिनिटांतच आम्ही गुंडाळा गावात पोहोचलो. संपूर्ण प्रवासात बिरसय्या माझ्याशी एक शब्दही बोलला नाही. ग्रामपंचायत ऑफिस समोरील वडाच्या झाडाजवळ उतरून काही न बोलता तो आपल्या घराकडे निघून गेला.

memories at utnoor 5a

ग्रामपंचायत ऑफिसला कुलूप होतं. तिथल्या लाकडी बाकावर काही रिकामटेकडी माणसं विडी फुंकत बसली होती. मी कोणीतरी सरकारी अधिकारी आहे असाच त्यांचा समज झाला असावा. त्यामुळे लगबगीने हातातील विड्या तशाच बाजूला फेकून देत ते जागीच नम्रपणे उभे राहिले.

त्यांच्या जवळ जाऊन, मी उतनूरच्या स्टेट बँकेतून आल्याचं सांगून वडगलपूर गावातील पुनर्वसित गावकऱ्यांबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली. त्यावर त्यांच्यापैकी एक जण म्हणाला..

“वडगलपूरच्या लोकांना गुंडाळा गावामागे अर्ध्या किलोमीटर दूर असलेल्या जंगलाच्या मध्यभागातील मोकळ्या जागेत वसवण्यात आले आहे. तिकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्याने सध्यातरी तुम्हाला मोटारसायकल घेऊन त्या रस्त्याने जाता येणार नाही. मात्र या उजव्या बाजूच्या पायवाटेने एक किलोमीटरचा वळसा घालून गेल्यास सहज गावापर्यंत मोटारसायकल नेता येईल.”

त्या गावकऱ्यांचे आभार मानून उजव्या बाजूच्या पायवाटेने नवीन वडगलपूर कडे निघालो.

अंदाजे दोन तीन किलोमीटर अंतर कापलं तरी कोणत्याही गावाचा मागमूस दिसेना आणि जंगल तर अधिकाधिक दाट होत चाललं होतं. आपण रस्ता चुकलो तर नाही ? ही शंका मनात येताच माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. मात्र, इथपर्यंत आलोच आहोत तर आणखी एक दोन किलोमीटर पुढे जाऊन पाहावे आणि तरी देखील वडगलपूर गाव दिसलं नाही तर सरळ माघारी फिरावं असा विचार करून नेटानं मोटारसायकल दामटीत राहिलो.

त्या एकाकी, सुनसान रस्त्यानं जाताना आपण खूप खोल जंगलात शिरत असल्याचा भास होत होता. सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. बहुदा सूर्य मावळू लागल्याने पक्षी आपापल्या घरट्यात परतून चिडीचूप बसले होते. मधूनच दूरवरून हिंस्त्र जंगली प्राण्याचा भीतीदायक चित्कार ऐकू येई. नकळत एक अनामिक भय दाटून आलं आणि अचानक मी मोटारसायकल माघारी फिरवली. आता गुंडाळा गावातही न थांबता सरळ उतनूर गाठायचं असं ठरवलं.

संध्याकाळ होत आली होती. मनगटा वरच्या घड्याळात पाहिलं तर सव्वा पाच वाजले होते. चला..! म्हणजे फारसा उशीर झालेला नाही. आणखी अर्ध्या पाऊण तासात आपण सहज घरी पोहोचू शकतो, या विचारानं मला धीर आला. मात्र यापुढे रमेशला सोबत घेतल्याशिवाय कोणत्याही अनोळखी रस्त्याने कधीही जायचं नाही म्हणजे नाही, असा मनोमन घोकून घोकून ठाम निश्चय केला.

विचारांच्या नादात किती वेळ झाला, आपण मोटारसायकल चालवीतच आहोत याकडे माझं लक्षच गेलं नाही. अर्धा पाऊण तास झाला तरी अजून गुंडाळा गाव देखील आलं नव्हतं. समोरील रस्ता सुद्धा एकदम अनोळखी वाटत होता. वाहत्या पाण्याचा खळखळाट अगदी जवळून ऐकू येत होता. नक्कीच आजूबाजूला एखादी नदी किंवा ओढा असावा. मी पुन्हा हातातील घड्याळाकडे पाहिलं. सहा वाजून गेले होते. आता मात्र आपण रस्ता चुकल्याची माझी पुरेपूर खात्री झाली.

थोडं पुढे गेल्यावर वाटेत मधोमध एक मोठं झाड आडवं पडलं होतं. त्यामुळे रस्ता बंद झाला होता. ते झाड एवढं मोठं होतं की आठ दहा माणसांच्या मदतीशिवाय ते जागेवरून हलवणं शक्यच नव्हतं. वादळ वाऱ्यामुळे ते झाड उन्मळून पडल्याची देखील अजिबात शक्यता दिसत नव्हती. करण आसपास तशा कोणत्याही खुणा नव्हत्या. नक्कीच कुणीतरी रस्ता अडवण्यासाठी हे झाड इथे आणून टाकलं असावं.

पुढे जाण्यास रस्ताच नसल्याने माझी गती आणि मती दोन्ही ही कुंठित झाली आणि दिग्मूढ़ होऊन मी त्या आडव्या पडलेल्या विशाल वृक्षाकडे एकटक पहातच राहिलो. मी भानावर आलो तेंव्हा हातात कुऱ्हाडी व कोयता असलेल्या चार बलदंड आदिवासी तरुणांनी माझ्याभोवती गराडा घातला होता. माझ्याशी एक शब्दही न बोलता त्यांनी माझे दोन्ही हात पाठीमागे नेऊन लवचिक जंगली वेलींनी करकचून बांधून टाकले. त्यानंतर बाजूच्या झाडीत घुसून जंगलातील झाडे झुडुपे व दगड गोटे यातून मार्ग काढीत ते मला कुठेतरी घेऊन चालले होते.

memories at utnoor5a

अकस्मात झालेल्या या घटनेने मी भांबावून गेलो होतो. भीतीने माझ्या तोंडून शब्दही बाहेर पडत नव्हता. त्या आदिवासींचे मख्ख, गंभीर चेहरे आणि त्यांच्या हातातील कुऱ्हाडी व कोयते पाहून मी पुरता गर्भगळीत झालो होतो. निःशब्द पणे चालत आम्ही आता डोंगराच्या उतारा वरून खाली दरीत उतरत होतो. लवकरच दुरून डफ, ढोलकीचे व माणसांच्या ओरडण्या किंचाळण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. लगेच त्या आदिवासीं पैकी एकाने आपल्या डोक्यावरील मुंडासं काढून ते माझ्या डोळ्यांभोवती बांधलं.

थोड्याच वेळात आम्ही नक्षल्यांच्या तळावर पोहोचलो, तेंव्हा आम्हाला पाहतांच तेथील वाद्यांचे व किंचाळून बोलण्याचे आवाज एकदम थांबले. आदिवासी गोंड भाषेत तिथल्या कमांडरने ओरडून कसली तरी आज्ञा दिल्यावर माझ्या डोळ्यांवरील फडकं काढण्यात आलं. समोर तीन चार खाटांवर हिरव्या गणवेशातील आठ दहा सशस्त्र नक्षली कमांडर बसले होते. त्यांच्यापैकी एका जाडजूड मिशीवाल्या गलेलठ्ठ माणसाने करड्या आवाजात तेलगू भाषेत मला विचारलं..

“तू कोण आहेस आणि इथे जंगलात कशाला आलास..?”

मी थोडक्यात माझी कर्मकहाणी त्यांना सांगितली. अर्थात त्यांचा माझ्या कहाणीवर काडीचाही विश्वास नव्हता. त्यांनी माझी कसून झडती घेतली. पेन, पाकीट, रुमाल आणि वडगलपुरच्या कर्जदारांची यादी एवढंच साहित्य त्यांना या झडतीतून मिळालं. माझी कर्मकथा त्यांना आता थोडी फार पटू लागल्याचं त्यांच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून वाटत होतं.

मला जिथे उभं करण्यात आलं होतं तिथून सुमारे शंभर फूट अंतरावर असलेल्या नदीच्या काठावर काही खुर्च्या आणि टेबलं मांडण्यात आली होती. काही पॅन्ट शर्ट घातलेल्या व्यक्ती तिथे बसलेल्या दिसत होत्या. अधून मधून माना वळवून त्या व्यक्ती माझ्याकडे पहात होत्या. माझी चौकशी पूर्ण झाल्यावर तो गलेलठ्ठ कमांडर त्या खुर्च्यांवर बसलेल्या व्यक्तींकडे गेला आणि त्याने त्यांना काहीतरी सांगितलं. त्यानंतर तो कमांडर माझ्याजवळ आला आणि त्याने माझे मागे बांधलेले हात सोडले. त्यानंतर त्याने मला त्या पॅन्ट शर्ट घालून खुर्च्यांवर बसलेल्या शहरी बाबूंच्या पुढ्यात नेऊन उभं केलं.

मी त्यांना नीट निरखून पाहिलं. ते एकूण सहा जण होते. चार पुरुष आणि दोन स्त्रिया. स्त्रियांनी लांब बाह्यांची पोलकी आणि पांढऱ्या रंगाच्या साध्या सुती साड्या घातल्या होत्या तर चारही पुरुषांचा पोशाख, टेरिकॉटची काळ्या रंगाची पॅन्ट व पांढऱ्या रंगाचा जाड्याभरड्या खादीचा हाफ बाह्यांचा शर्ट, असा होता. ते सहाही जण बुद्धिजीवी, अभ्यासू आणि उच्चभ्रू शहरी वाटत होते. एक किरकोळ देहयष्टीचा आणि तरतरीत चेहऱ्याचा चष्मेवाला त्या सहा जणांचा नेता असावा. माझ्याकडे आपादमस्तक पहात तो हिंदीत म्हणाला..

“अच्छा, म्हणजे तुम्ही बँक अधिकारी आहात आणि केवळ वाट चुकल्यामुळेच इतक्या खोल जंगलात आला आहात तर..!”

केविलवाण्या चेहऱ्यानं मी होकारार्थी मान हलवली.

आपला चष्मा काढून त्याची काच शर्टाच्या कोपऱ्याने पुसत तो शहरी नेता म्हणाला..

“योगायोगाने म्हणा किंवा अपघाताने.. पण सध्या तुम्ही कुठे येऊन पोहोचला आहात याची तुम्हाला कल्पना असेलच..?”

“माफ करा, पण मी स्वतः हुन इथे आलेलो नाही तर मला हात बांधून व डोळे झाकून जंगल तुडवीत येथे आणण्यात आलं आहे. मी तर माझ्या रस्त्याने सरळ पुढे चाललो होतो. झाड पडल्यामुळे रस्ता बंद झाल्यानेच नाईलाजाने मला त्या जागी थांबावं लागलं.. “

प्रथमच निर्भय होऊन ताठ मानेने मी प्रत्युत्तर दिलं.

माझ्याकडून अशा बाणेदार प्रत्युत्तराची त्या नेत्याने अपेक्षाच केली नसावी. क्रोधाने त्याच्या भुवया उंचावल्या. करड्या आवाजात तो म्हणाला..

“तुम्ही ज्या रस्त्याने पुढे चालला होतात तोही रस्ता शेवटी इथेच येतो. सामान्य जनतेसाठी हा भाग निषिद्ध आहे. पोलिसही इथे एकट्यानं येण्याचं साहस करीत नाहीत.”

“पण.. मी या भागात नवीन आहे. गुंडाळा गावातून वडगलपुरला जाताना माझा रस्ता चुकला असावा.. तुमच्या कमांडरला मी हे पूर्वीच सांगितलं आहे.”

मी नम्रपणे स्पष्टीकरण दिलं.

“हो.. पण आम्हाला तुमच्या बोलण्यावर असा एकदम विश्वास ठेवता येणार नाही.”

असं बोलून आपल्या सहकाऱ्यांकडे हात करून तो म्हणाला..

“आमच्या पार्टीचा हा जो गट (faction) आहे त्याचे काही वरिष्ठ पॉलिट ब्युरो सदस्य आज इथे हजर आहेत. ते तुम्हाला काही प्रश्न विचारतील. कोणतीही लपवाछपवी न करता त्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं तुम्हाला द्यायची आहेत. तुमचं काय करायचं ? याचा निर्णय त्यानंतरच सर्व जण मिळून घेतील.”

माझ्यापुढे अन्य कोणताही पर्याय नसल्याने एखाद्या गुन्हेगारा सारखा खाली मान घालून समोरून येणाऱ्या प्रश्नांना तोंड देण्यास मी सिद्ध झालो. माझी उलट तपासणी सुरू झाली.

सुरवातीला माझं नाव, माझं मूळ गाव, शिक्षण, बँकेतील सहकाऱ्यांची नावे, पत्नी व मुलांबद्दल माहिती अशी प्राथमिक जुजबी चौकशी त्यांनी केली. मी सांगितलेली सर्व माहिती त्यांच्यापैकी एकाने आपल्या वहीत लिहून घेतली. त्यानंतर चीफ कमांडरला बोलावून त्याच्या हातात ती वही देऊन सांकेतिक भाषेत त्याने काहीतरी सांगितलं. कमांडर ती वही घेऊन निघून गेल्यानंतर हिटलर सारखी तोकडी मिशी असलेल्या एका अन्य पॉलिट ब्युरो सदस्याने चौकशीची सूत्रं आपल्या हातात घेतली.

थेट मुद्द्यालाच हात घालत त्यानं विचारलं..

“कम्युनिस्ट विचारसरणी बद्दल तुमचं काय मत आहे ?”

अत्यंत अक्कल हुशारीने विचारलेला तो प्रश्न खूप अवघड आणि tricky होता. मी साम्यवादी आणि पर्यायानं नक्षलवादी विचारसरणीचं समर्थन करावं अशीच प्रश्नकर्त्याची अपेक्षा असावी. जर मी नक्षली हिंसाचाराचा निषेध केला असता, व्यक्तिगत स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या साम्यवादी विचारांच्या विरोधात माझं खरंखुरं मत प्रदर्शित केलं असतं तर कदाचित मला विचारलेला पहिला प्रश्न हाच माझा अखेरचा प्रश्न ठरला असता.

अर्थात साम्यवादी आणि नक्षलवादी विचारांचं समर्थन करण्यासाठी त्यांची तत्वप्रणाली व त्या चळवळीचा समग्र इतिहास माहीत असणं आवश्यक होतं. आणि त्यादृष्टीने माझं वाचन, माझा अभ्यास तर खूपच तोकडा होता.

शेवटी, पुरेसा अभ्यास न झालेल्या विषयाच्या परीक्षेत ज्याप्रमाणे आपण गोल गोल व तीच तीच उत्तरं देऊन कशीबशी वेळ मारून नेतो, तीच पद्धत इथेही अवलंबवावी असं मी ठरवलं.

(क्रमशः ५-ब)

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

Birthday card from a daughter to her father

birthday card

 

See how beautifully my grand daughter, Saumya has expressed her emotions, her love and regards for her father on the occasion of his birthday- 

Every year, both my grand daughters come up with hand made greeting cards with new ideas, on the occasion of birth day of their parents, grand parents. 

This year, my elder grand daughter, Saumya made the following lines for her father-

सागराहून हृदय तुमचे मोठे,

असे बाबा नाही अजून कोठे,

जरी तुम्हाला नसतो जास्त वेळ,

तरी तुम्ही खेळता आमच्याशी खेळ,

काही केले तर म्हणता ‘वा, वा’

हॅपी बर्थडे डियर बाबा !

Which means,

You have a heart greater than the Sea,

There is no father like you in the world,

Though you are short of time,

Still you find time to play with us,

You appreciate anything that we do,

Happy birthday my dear father!

And the picture that she has drawn is simply heart touching. With the daughter cuddling her father fondly.birthday card

Her younger sister also made a cute drawing for her father and presented to him on his birthday.

You can see the birthday greeting card here, on her channel, Saumya’s Corner- Her video has already got 789 views and is liked by many.

उतनूरचे दिवस-4D-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

tractor

Memories-at-Utnoor

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

Memories at Utnoor

*उतनूरचे दिवस…*

*थरार… (४-ड)*

जनार्दन भाऊंच्या घरून मी बँकेत परतलो तेंव्हा दुपारचा एक वाजून गेला होता. खिन्नपणे यंत्रवत टेबलावरील कागद वर खाली करत बसलो. मात्र मनात उठलेलं के. जनार्दन बद्दलच्या विचारांचं काहूर काही केल्या थांबत नव्हतं. या प्रकरणातील माझी आतापर्यंतची सारी मेहनत वाया गेली होती. हा पराभव माझ्या जिव्हारी लागला होता.

मी असा उदास बसलेलो असतानाच आमचे मॅनेजर डी. कृष्णा बाबू अत्यंत प्रफुल्लित चेहऱ्याने तिथे आले. आल्या आल्या माझ्याशी हस्तांदोलन करीत ते म्हणाले..

“हार्दिक अभिनंदन..! तुमचं ते के. जनार्दन प्रकरण एकदाचं कायमचं मिटलं. आता तुम्हाला त्याच्या बद्दल कसलाही विचार करण्याची गरज नाही. यापुढे ते कर्ज खातं आपल्या बुक्स मध्ये दिसणार नाही..”

मॅनेजर साहेबांच्या बोलण्यातून काहीच अर्थबोध न झाल्यामुळे मी प्रश्नार्थक चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहिलं. मला असा बुचकळ्यात पडलेला पाहून मॅनेजर साहेब म्हणाले..

“आज सकाळी माझ्या केबिन मधल्या कपाटातील कागदपत्रे व फाईल्स नीट लावीत असताना मला रिजनल ऑफिस मधून आलेलं एक बंद पाकीट सापडलं. कदाचित आधीच्या मॅनेजर साहेबांची बदली झाल्यानंतर ते आलेलं असावं आणि अनवधानाने न फोडता ते तसंच राहून गेलं असावं.

त्या पाकिटात के. जनार्दनचे खाते राईट ऑफ (write off) करण्या बद्दल वरिष्ठ कार्यालयाची परवानगी होती. त्यासाठी मुख्य कार्यालयाने शत प्रतिशत तरतूद (provision) केल्याचाही त्यात उल्लेख होता. मी ताबडतोब क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधला आणि ही तरतूद अद्यापही कायम असल्याची खातरजमा करून घेतली. त्यानंतर त्वरित ही तरतूद वापरून के. जनार्दनचं प्रतिवादीत (Protested Bills) खातं बट्टा खात्यात टाकून मी राईट ऑफ (Write off) केलं.

शाखेच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये हे खाते “राईट ऑफ” साठी पाठवावे अशी ऑडिटरने शिफारस केली होती. त्यानुसार आधीच्या मॅनेजर साहेबांनी तसा प्रस्ताव रिजनल ऑफिस कडे पाठविला असावा. काहीही असो, त्या के. जनार्दनचा विषय आता मुळापासून संपला आहे. तुम्ही त्याच्या बद्दलचे सर्व विचार आता मनातून पूर्णपणे काढून टाका.. “

मॅनेजर साहेबांच्या दृष्टीनं जरी ही आनंदाची बातमी होती तरी माझ्या जखमेवर मात्र त्यामुळे जणू मीठच चोळलं गेलं.

के. जनार्दन च्या कर्ज खात्याची कागदपत्रे प्रतिवादीत (Protested Bills) खात्यांच्या फाईल मधून काढून लिखित-बंद (Written off) खात्यांच्या फाईल मध्ये टाकताना मी सहजच ती कागदपत्रे पुन्हा चाळली.

त्यातील ट्रॅक्टर समोर उभे राहून काढलेल्या के. जनार्दनच्या फोटोनं माझं लक्ष वेधून घेतलं. फोटोत ट्रॅक्टरचा रजिस्ट्रेशन नंबर AP- 01- A-19 असा स्पष्ट दिसत होता. मी नुकत्याच पाहिलेल्या के. जनार्दनच्या वाड्या मागील ट्रॅक्टरचा नंबर AP-01-B-313 असल्याचं मला पक्कं आठवत होतं. तसंच मी पाहिलेल्या ट्रॅक्टर वर “फोर्ड” असं लिहिलं होतं, पण या फोटोतील ट्रॅक्टर वर तर ठळक अक्षरात “मॅसी फर्ग्युसन” असं लिहिलेलं दिसत होतं.ford tractor

म्हणजेच के. जनार्दन काहीतरी लबाडी करत होता. बँकेला दाखवण्यासाठी त्याने भंगार मधून ट्रॅक्टर व ट्रॉली खरेदी केलेली दिसत होती. याचाच अर्थ बँकेने फायनान्स केलेला ट्रॅक्टर व ट्रॉली अद्यापही चालू स्थितीत होती आणि जनार्दन भाऊंनी त्यांना अन्य कुठेतरी लपवून ठेवलं असावं.

अर्थात आता या पश्चात बुद्धिनं काढ़लेल्या तार्किक निष्कर्षाचा काहीही उपयोग नव्हता.

त्याच सुमारास उतनूर च्या ससे उत्पादन (Rabbit Breeding) केंद्रा मधून पांढऱ्या शुभ्र सशांची दोन पिल्ले चि. अनिशला खेळण्यासाठी मी विकत आणली होती. त्या सशांसाठी लोखंडी जाळीचा छोटासा पिंजरा तयार करवून घेण्यासाठी उतनूरच्या एका वेल्डिंग शॉप मध्ये मी गेलो होतो. ह्या वेल्डिंग शॉप वाल्याचे पूर्वी शामपुरच्या दामोदर बाजार मध्ये फॅब्रिकेशनचे युनिट असल्याचे त्याच्या बोलण्यावरून समजले. साहजिकच “नक्षल्यांच्या धमकीमुळे ते दुकान बंद केले का ?” असा मी त्याला प्रश्न केला. त्यावर तो म्हणाला..

“नाही साहेब..! नक्षल्यांचा आम्हाला काहीही त्रास नव्हता. त्यांनी आम्हाला कधी धमकीही दिली नाही. खरं म्हणजे त्या कॉम्प्लेक्सचा मालक पी. जनार्दन हा खूप चलाख आणि दगाबाज माणूस आहे. गगन रेड्डी नावाच्या कुर्नुल येथील श्रीमंत व्यापाऱ्या कडून कर्ज घेऊन त्याने आपल्या जमिनीवर हा कॉम्प्लेक्स उभारला. मात्र ठरल्याप्रमाणे मुद्दल रकमेचा हप्ता आणि त्यावरील व्याजापोटी कॉम्प्लेक्सचे अर्धे भाडे या पी. जनार्दन ने गगन रेड्डीला कधीच दिले नाही. गगन रेड्डी हा रायलसीमा भागातील कुख्यात बाहुबली राजकारणी गुंड सुध्दा आहे. त्याने कुर्नुल हुन आपले गुंड आणून तो कॉम्प्लेक्स खाली करवून आपल्या ताब्यात घेतला. तसंच दर महिन्याला शामपुरला येऊन तो आपल्या कर्जाचा हप्ता पी. जनार्दन कडून वसूल करतो.”

बाप रे ! हा के. जनार्दन उर्फ पी. जनार्दन भलताच खोटारडा दिसत होता. त्याला अजिबात असंच सोडून देऊन चालणार नव्हतं. कसं ही करून त्याला चांगलीच अद्दल घडवायचं मी मनाशी पक्कं ठरवलं.

के. जनार्दनच्या कर्ज कागदपत्रात भागवत मुंढे नावाच्या इंद्रवेल्ली येथील एका शेतकऱ्याचा जामीनदार (गॅरंटर) म्हणून उल्लेख होता. पूर्वी, मी त्याच्याबद्दल गावात चौकशी केली होती तेंव्हा तो फार पूर्वीच मरण पावल्याचे समजले होते. आता मी नव्याने त्या जामीनदारा बद्दल कसून अधिक चौकशी केली. त्यातून, त्या दिवंगत गॅरंटरची पत्नी व मुले इंद्रवेल्ली गावातच राहून शेती व अन्य व्यवसाय करीत असल्याचे समजले. त्यांचा पत्ता मिळवून त्यांना गाठले आणि के. जनार्दनचे कर्ज फेडण्याची जबाबदारी मृत जामीनदाराचे वारस या नात्याने आता तुमची आहे, याची त्यांना जाणीव करून दिली.

के. जनार्दनला रजिस्टर्ड व कायदेशीर नोटीसा पाठवणे सुरूच होते. या नोटीसा आता थेट शामपुरच्या पत्त्यावरच पाठवीत होतो आणि जनार्दन भाऊही त्या नोटीसा निमूटपणे स्विकारीत होते. जामीनदार भागवत मुंढेची पत्नी व मुलांनाही रजिस्टर्ड नोटीसा पाठवणे मी आता सुरू केले.

उतनूर, शामपुर व नागापूर येथील शेतजमिनीवर जनार्दन भाऊंनी ग्रामीण बँक, मध्यवर्ती बँक तसेच विविध सोसायट्यां कडून पीक कर्ज घेतले होते. त्या सर्व बँकांच्या व सोसायट्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना या जमिनीवर आधीच आमच्या बँकेचा बोजा (charge) असल्याची कल्पना दिली. तसेच तुम्ही आमचे “बे-बाकी (No Dues) प्रमाणपत्र” न घेताच या जमिनीवर कर्ज दिले, त्याची जिल्हा अग्रणी बँकेकडे (District Lead Bank) तक्रार करणार असल्याचेही त्यांना सांगितले.

या सर्व बँका व सोसायट्यांनी जनार्दन भाऊंच्या मागे आपल्या कर्ज वसुलीसाठी तगादा लावला. तर इकडे जामीनदार भागवत मुंढेची पत्नी व मुले यांनी देखील जनार्दन भाऊंच्या घरी ठिय्या मांडून ट्रॅक्टरचे कर्ज ताबडतोब भरून टाकण्याचा आग्रह धरला.

अशातच आमच्या बँकेच्या वरंगल येथील रिजनल ऑफिसने आदीलाबाद जिल्ह्यातील सर्व शाखाधिकारी व फिल्ड ऑफिसर्स ची मिटिंग एका रविवारी आदीलाबाद येथे ठेवली होती. मिटिंग CCI (सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) च्या हॉलमध्ये होती. या मिटिंग मध्ये आमच्या मॅनेजर साहेबांचा व माझा रिकव्हरी कॅम्पेन मध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. मिटिंग संपल्यानंतर थोड्याच वेळाने हॉलमध्येच जेवणाचा कार्यक्रम होता. त्या मधल्या वेळेत जवळपास फेरफटका मारण्यासाठी काही मित्रांसोबत फिरत फिरत मी बाहेरील रस्त्याकडे आलो.

conference hall meeting

सीसीआय सिमेंटची फॅक्टरी तिथून अगदी जवळच असावी. अनेक ट्रक व ट्रॅक्टर त्या फॅक्टरीत ये-जा करीत होते. अचानक एक ट्रॅक्टर आम्हाला अगदी चाटून गेला. त्यामुळे आम्ही रागाने त्या ट्रॅक्टरकडे बघितलं. त्या ट्रॅक्टरचा नंबर AP-01-A-19 असल्याचं पाहताच मी चमकलो.

tractor

हा तोच के. जनार्दनला आम्ही फायनान्स केलेला ट्रॅक्टर होता. त्या ट्रॅक्टर कडे लक्ष जाताच मागचा पुढचा विचार न करता मी एकट्याने पायीच त्या ट्रॅक्टरचा पाठलाग करण्यास सुरुवात केली.

वेगाने जाणार तो ट्रॅक्टर लवकरच मला दिसेनासा झाला. मात्र तरीही मी नेटाने चालतच राहिलो. सुमारे एक दीड किलोमीटर अंतर चालून गेल्यावर मला सिमेंट फॅक्टरीचे गेट दिसले.

मी गेट वर जाऊन ट्रॅक्टरचा नंबर सांगून त्याची चौकशी केली तेंव्हा नुकताच तो ट्रॅक्टर आत गेला असून सुमारे अर्ध्या तासात तो बाहेर येईल असे गेटकीपर म्हणाला.

cci gate

त्यामुळे मी गेट जवळच तो ट्रॅक्टर बाहेर येण्याची वाट पहात थांबलो. खरोखरीच अर्ध्या तासाने तो ट्रॅक्टर बाहेर आला तेंव्हा हातानेच इशारा करून त्याला एका बाजूला नेत थांबवलं. त्या ट्रॅक्टर चालकाकडे ट्रॅक्टरच्या मालकाबद्दल चौकशी केली तेंव्हा आदीलाबादच्या धान्य मार्केट मधील जनार्दन शेठ ने पंधरा हजार रुपये महिना इतक्या भाड्याने तो ट्रॅक्टर त्याला भाड्याने दिल्याचे समजले.

मी ट्रॅक्टरचं निरीक्षण केलं. तो अगदी उत्तम स्थितीत होता. त्याचे चारी टायर नवीन दिसत होते. ट्रॉलीला ही नुकताच रंग दिल्यासारखं वाटत होतं. ट्रॅक्टर आणि ट्रॉली सुस्थितीत असल्याचं पाहून मला हायसं वाटलं. ट्रॅक्टर चालकाचे आभार मानून मी CCI हॉल कडे परतलो तेंव्हा सर्वांची जेवणे आटोपली होती. आमच्या मॅनेजर साहेबांनी “कुठे गेला होतात ?” असं विचारलं तेंव्हा “बँकेतील बॅच मेट भेटला होता व त्याच्या सोबत बाहेरच जेवलो” असं खोटंच सांगून त्यांचं समाधान केलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक साडेदहा वाजता आमचे रिजनल मॅनेजर साहेब क्वार्टरली व्हिजिट साठी शाखेत हजर झाले. व्हिजिट आटोपून त्यांना ताबडतोब अन्य दुसऱ्या शाखेत जायचे असल्याने त्यांच्या सहाय्यक अधिकाऱ्याला सरप्राईज इंस्पेक्षनची औपचारिक कार्यवाही लवकर आटोपण्यास सांगून ते आमच्याशी गप्पा मारीत बसले होते. इतक्यात मॅनेजर साहेबांना एक संशयास्पद फोन आला. पलीकडून

“मै रयतु क्रांति, प्रभाकर दलम का कमांडर बात कर रहा हूँ..”

असे शब्द ऐकू येताच मॅनेजर साहेबांनी आम्हा सर्वांना खुणेनेच गप्प राहण्यास सांगितले. पलीकडची व्यक्ती म्हणाली..

“आप का नया फिल्ड ऑफिसर आज कल कुछ जादा ही फुर्ती बता रहा है और फिजुलकी ईमानदारी भी झाड़ रहा है.. हमारे कुछ दोस्तोंको उसने परेशान करके रक्खा है.. उसे कह दो के शामपुर, नागापुर, इन्द्रवेल्ली एरिया में आना जाना बंद कर दे.. वरना हम उसे अपने टार्गेट पे ले सकते है..”

एवढं बोलून पलीकडच्या व्यक्तीने फोन ठेवून दिला. आमच्या मॅनेजर साहेबांना यापूर्वी ही “पोलीस कारवाईच्या निषेधार्थ बँक बंद ठेवण्यासाठी” नक्षली अन्नांचे अनेकदा फोन येऊन गेले असल्याने त्यांनी नक्षली अन्ना चा आवाज अचूक ओळखला. जेंव्हा त्यांनी समोर बसलेल्या रिजनल मॅनेजर साहेबांना नुकत्याच आलेल्या फोन बद्दल सांगितलं तेंव्हा ते हादरून गेले. मला कळवळून समजावून सांगत ते म्हणाले..

“डोन्ट टेक युअर जॉब सो सिरियसली. अरे बाबा, ऐसे खतरनाक एरिया में अपनी जान को सम्हालकर ही काम करना. आपको कोई गोल्ड मैडल नही मिलनेवाला ऐसी रिस्क लेने के बदले.. उलटा, आपको कुछ हुआ तो हम में से कोई भी नही आएगा आपको बचाने के लिए.. जरा अपने बीबी बच्चोंके बारे में सोचो.. यहां तो पुलिसवाले भी आने को डरते है.. इसलिए, आज के बाद, जब बहुत ही जरूरी काम हो तब ही बँक से बाहर जाना.. और बाहर जाते वक्त हमेशा सिक्युरिटी गार्ड को साथ ले जाना..”

रिजनल मॅनेजर साहेब निघून गेल्यावर बराच वेळ मी नक्षली कमांडरने केलेल्या फोन बद्दलच विचार करीत होतो. जनार्दन भाऊंनीच त्यांच्या नक्षली मित्रांना सांगून हा फोन करायला लावला असावा असा मला दाट संशय येत होता.

दोन दिवस वाट पाहून मग मॅनेजर साहेबांना के. जनार्दनच्या भाड्याने दिलेल्या ट्रॅक्टर बद्दल सांगून टाकलं आणि तो ट्रॅक्टर जप्त करून उतनूरला आणण्याबद्दल त्यांची परवानगी मागितली. मॅनेजर साहेबांना माझं कौतुक वाटलं. त्यांनी एका कस्टमरची जीप भाड्याने घेतली आणि ट्रॅक्टरचा एक ड्रायव्हर, बँकेकडे असलेली ट्रॅक्टरची डुप्लिकेट किल्ली व दोन सिक्युरिटी गार्ड सोबत देऊन बँकेचा ट्रॅक्टर खेचून आणण्यासाठी मला आदीलाबादला पाठवलं. तसंच आमच्या आदीलाबाद शाखेच्या चीफ मॅनेजरलाही फोन करून मला या प्रकरणी शक्य ती सर्व मदत करण्याची त्यांनी विनंती केली.

त्यानंतर मॅनेजर साहेबांनी उतनूरच्या पोलीस ठाण्याला फोन केला आणि ट्रॅक्टर खेचून आणण्यासाठी बँकेचा स्टाफ आदीलाबादला जात असल्याची त्यांना कल्पना दिली. दोन दिवसांपूर्वी नक्षली कमांडरने केलेल्या धमकीच्या फोन बद्दल त्यांना यापूर्वीच कळवलेलं असल्याने पोलिसांची एक जीप सुरक्षित अंतर ठेवून आमच्या मागोमाग येत होती.

आम्ही आदीलाबादला पोहोचल्यावर थेट सीसीआय सिमेंट फॅक्टरीवर गेलो. परंतु आज तेथे जनार्दन शेठचा ट्रॅक्टर आलेलाच नव्हता. तेथील काम संपल्याने कदाचित तो ट्रॅक्टर पुन्हा धान्य मोंढ्यात गेला असावा असे फॅक्टरीचा गेटकीपर म्हणाला. त्यामुळे आम्ही धान्य मार्केट कडे आमचा मोर्चा वळवला. सुदैवाने मार्केटच्या गेट जवळच आमचा ट्रॅक्टर उभा होता. सोबत नेलेल्या ड्रायव्हरने डुप्लिकेट किल्लीने ट्रॅक्टर चालू केला. आणि हळूहळू चालवीत तो उतनूरला आणला. वाटेत कोणताही त्रास झाला नाही. उतनूरच्या पोलिसांची जीपही सकाळ सारखीच आमच्या मागोमाग येत होती. बँकेसमोर पुरेशी जागा नसल्याने पोलीस स्टेशन समोरील मोकळ्या जागेतच ट्रॅक्टर उभा केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताच के. जनार्दन उर्फ जनार्दन भाऊ उर्फ जनार्दन शेठ बँकेत हजर झाले. ट्रॅक्टर सोबत उतनूर पोलिसांची जीप असल्याचे मोंढ्यातील अन्य व्यापाऱ्यांकडून जनार्दन शेठला समजले होते. त्यामुळेच तो थेट उतनूरला आमच्या बँकेत आला होता. कोणतीही पूर्वसूचना न देता ट्रॅक्टर जप्त केल्याबद्दल सुरुवातीला त्याने माझ्याशी बाचाबाची करून तारस्वरात आरडाओरड करत बँकेत खूप तमाशा केला. ट्रॅक्टरचा तपास लावून बँक एवढ्या तडकाफडकी जप्तीची कारवाई करेल यावर अजूनही त्याचा विश्वासच बसत नव्हता.

जनार्दन शेठच्या त्या आक्रस्ताळी त्राग्याकडे मी अजिबात लक्ष दिलं नाही. उलट, आता वेळ न घालवता आम्ही त्याच्या ट्रॅक्टरचा जाहीर लिलाव करणार आहोत तसेच गॅरंटर वरही ताबडतोब कायदेशीर कारवाई करणार आहोत हे त्याला सांगितलं. बँकेने आपल्या भोवती सर्व बाजूंनी फास आवळला असून चारी बाजूनी आपल्याला घेरलं आहे याची कल्पना आल्यावर तो थोडा शांत झाला. त्याचा स्वरही किंचित नरम झाला.

कदाचित ग्रामीण बँकेच्या, सोसायट्यांच्या व गॅरंटरच्या कुटुंबियांच्या सततच्या तगाद्याला तो ही कंटाळला असावा. कारण थोडा वेळ खाली मान घालून शांत बसल्यावर अचानक अस्पष्ट, खोल गेलेल्या, हताश आणि असहाय्य आवाजात त्याने मला विचारलं..

“एक रकमी किती पैसे जमा केले तर बँक कर्ज-तडजोड (Compromise) करून मला या ट्रॅक्टर लोन मधून कर्ज-मुक्त करेल ?”

एवढा बिलंदर, जुना थकीत कर्जदार अखेरीस कर्ज भरण्यास तयार झाला आहे हे समजताच मॅनेजर साहेबांनी सर्व सूत्रं आपल्या हाती घेतली. कर्ज घेतलेल्या तारखेपासून आजपर्यंतचं व्याज कॅलक्युलेट करून एकूण सहा लाखांची थकबाकी काढून त्यांनी तो आकडा जनार्दन शेठला सांगितला.

बारा गावचं पाणी प्यालेल्या व्यापारी वृत्तीच्या जनार्दन शेठ वर एवढा मोठा आकडा ऐकून काहीही परिणाम झाला नाही. एनपीए (NPA) कमी करण्यासाठी बँका आजकाल “कॉम्प्रमाईज प्रपोजल” च्या नावाखाली कितीही कमी रक्कम घेऊन कर्ज खातं बंद करतात याची त्याला चांगलीच कल्पना असावी.

“व्याजाचं तर सोडाच, मुद्दल रकमेत किती कमी करता ते सांगा..!”

असं मग्रूर, उर्मट प्रत्युत्तर त्याने मॅनेजर साहेबांना दिलं.

“कर्जाची मुद्दल रक्कम तर तुम्हाला द्यावीच लागेल आणि व्याजाचं म्हणाल तर त्यात थोडीफार सवलत तुम्हाला देता येईल, पण त्यासाठी ही अगोदर आमच्या वरंगल रिजनल ऑफिसची मला परवानगी घ्यावी लागेल..”

मॅनेजर साहेबांनी दिलेलं हे परखड व अंतिम उत्तर ऐकताच ताडकन खुर्चीवरून उठून बाहेर निघून जात जनार्दन भाऊ म्हणाले..

“असं आहे तर मग मी स्वतःच तुमच्या त्या वरंगल रिजनल ऑफिसला जातो आणि माझं Compromise proposal मंजूर करून घेतो..”

जनार्दन भाऊ असे तावातावाने बँके बाहेर निघून जात असताना मी उपहासाने त्यांना म्हणालो..

“तुम्ही तुमच्या नक्षली मित्रांना तर बेधडक लाखो रुपयांची खंडणी ताबडतोब पोहोचती करता.. मग बँकेचं कायदेशीर देणं देताना एवढी घासाघीस का करता ?”

मी मुद्दामच “तुमचे नक्षली मित्र” असे शब्द वापरले होते. कारण बँकेत आलेला तो धमकीचा फोन जनार्दन भाऊंनीच त्यांच्या लालची खंडणीखोर नक्षली मित्रांना सांगून करविला होता, याची मला खात्री होती.

माझे शब्द जनार्दन भाऊंना झोंबले, मात्र माझ्याकडे केवळ रागाचा एक तीक्ष्ण कटाक्ष टाकून मोटारसायकलला जोरदार किक मारून जनार्दन भाऊ निघून गेले.

दोनच दिवसांत आमच्या रिजनल ऑफिसातून आपलं Compromise proposal मंजूर करून जनार्दन भाऊ विजयी मुद्रेने उतनूरला परत आले. एकूण दोन लाख रुपयांत त्यांचं मॅटर सेटल झालं होतं.

अर्थात या दोन दिवसात रिजनल ऑफिस सतत आमच्या संपर्कात होतं आणि कर्ज वसुलीचे चान्सेस, ट्रॅक्टर विकल्यास येणारी संभाव्य रक्कम, त्यात होणारा कालापव्यय अशा सर्व गोष्टी विचारात घेऊन आणि आमच्या शाखेकडून तसं compromise proposal फॅक्स द्वारे मागवून मगच त्यांच्याद्वारे हे प्रपोजल मंजूर करण्यात आलं होतं.

बँकेत रोख दोन लाख रुपये भरून बे-बाकी प्रमाणपत्र (No Dues Certificate) घेतल्यावर आपला ट्रॅक्टर सोडवून घेऊन शामपुरला परत जाताना जनार्दन भाऊंनी मला कोपरापासून नमस्कार केला..

सर्वोत्तम कर्ज-वसुली प्रित्यर्थ हैदराबाद येथे होणारा आमच्या शाखेचा सत्कार समारंभ अवघ्या दोन दिवसांवर आला होता. या कार्यक्रमाचं निमंत्रण फक्त वरिष्ठ नियंत्रक व शाखाधिकारी (Controllers & Branch Managers) यांनाच होतं. परंतु आमच्या मॅनेजर साहेबांनी रिजनल मॅनेजरना विनंती करून मला ही समारंभास सोबत घेऊन जाण्याची विशेष परवानगी मागितली आणि रिजनल मॅनेजर साहेबांनीही अत्यंत सहर्ष ती दिली.

प्रत्यक्ष समारंभात आमच्या शाखेला ट्रॉफी प्रदान केल्यावर आमच्या मॅनेजर साहेबांनी मलाही स्टेज वर बोलावण्याची इच्छा आमच्या मॅनेजिंग डायरेक्टर साहेबांकडे प्रकट केली. या प्रसंगी आमच्या रिजनल मॅनेजर साहेबांनी आमच्या शाखेने नुकत्याच केलेल्या अशक्यप्राय अशा Written Off खात्यातील कर्ज वसुलीचा किस्सा थोडक्यात सांगितला.

त्यानंतर एमडी साहेबांनी माझ्याशी हस्तांदोलन करून माझ्या पाठीवर शाबासकीची जोरदार थाप मारल्यावर झालेला टाळ्यांचा कडकडाट आजही माझ्या आठवणीत ताजा आहे.

felicitation ceremony

(समाप्त)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

उतनूरचे दिवस-4C-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

old tractor

Memories-at-Utnoor

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

 

*उतनुरचे दिवस..*

*थरार.. (४-क)*

के. जनार्दनचं भूत काही केल्या माझा पिच्छा सोडायला तयार नव्हतं. मी जेंव्हा जेंव्हा शामपुरच्या जनार्दन भाऊंना भेटायचो तेंव्हा तेंव्हा इथे काही तरी पाणी मुरतंय असा मला सतत संशय यायचा. ते कितीही “के. जनार्दनला ओळखत नसल्याचा” आव आणत असले तरी त्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी नक्कीच काहीतरी जवळचा संबंध असावा, अशी माझं अंतर्मन मनोमन ग्वाही देत होतं.

एकदा सकाळी लवकर बँकेत जाऊन के. जनार्दन च्या लोन डॉक्युमेंट्स वरील फोटोला काळ्या पेन्सिलने लांब, भरगच्च कल्ले व फ्रेंच (बुल्गानिन) कट दाढी काढून, तो दाढी व कल्ल्यात कसा दिसला असता याबद्दल तर्क करीत होतो. त्या पोलिसी डिटेक्टिव्ह पद्ध्तीच्या क्रियाकलापात मी एवढा गुंग होऊन गेलो होतो की केंव्हा आमचे मॅनेजर साहेब माझ्या मागे येऊन उभे राहिले, हे मला कळलंही नाही.

memories at Utnoor 4c

मी अजूनही के. जनार्दनचाच छडा लावण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आहे हे पाहून आंतून त्यांना जरी माझ्या कर्तव्यनिष्ठ चिकाटीचं कौतुक वाटलं तरी वरकरणी नाराजी दाखवत ते म्हणाले..

“मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय की त्या के.जनार्दनचा व्यर्थ नाद सोडा. त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यापेक्षा, आपला हैद्राबाद इथं होणारा सत्कार समारंभ अवघ्या महिन्या भरावर आलाय, त्याची तयारी करा..”

त्यांच्या समाधानासाठी के. जनार्दनची फाईल बंद करून कपाटात ठेवून दिली. मात्र शेंडी तुटो वा पारंबी, पण आता के. जनार्दनचा रहस्यभेद करण्याची वेळ आली असून लवकरच त्यावर अंतिम घाव घालायचा असा मी मनातून निर्धार केला.

गेल्या काही दिवसांपासूनच्या, के. जनार्दनच्या उरलेल्या सर्वच म्हणजे एकूण 35 एकर जमिनीवर बँकेचा बोजा नोंदवून घेण्याच्या माझ्या सततच्या प्रयत्नांना आता यश आलं होतं. मात्र त्या उर्वरित जमिनीपैकी बहुतांश जमीन ही उतनूर, नागापूर व शामपुर या गावांत असून बऱ्याच काळापासून ती पडीत अवस्थेतच असल्याचं आढळून आलं होतं.

के. जनार्दनच्या इंद्रवेल्लीच्या पत्त्यावर लागोपाठ कर्ज वसुलीच्या नोटीसा पाठविण्याचा मी धडाकाच लावला होता. साध्या नोटीसा तसंच वकिलाच्या कायदेशीर नोटीसा, साध्या पोस्टाने (ordinary post) आणि रजिस्टर्ड पोस्टाने पाठविण्यास मी सुरवात केली होती. ही पोस्टाची सर्व पाकिटे “ऍड्रेस नॉट ट्रेसेबल” अशा शेऱ्याने बँकेकडे परत यायची. त्या परत आलेल्या पाकिटांवर जनार्दन भाऊंचा शामपुरचा पत्ता म्हणजेच”न्यू ऍड्रेस C/o दामोदर बाजार” असं लिहून मी ती पाकिटं पुन्हा पोस्टात नेऊन देत असे. आश्चर्य म्हणजे शा re-directed पाकिटांपैकी बरीचशी पाकिटं जनार्दन भाऊंकडून (चुकून ?) accept ही केली गेली होती.

एक दोन वेळा स्वतः आदीलाबादच्या मोंढ्यात जाऊन चौकशी केली तेंव्हा तेथील जुन्या हमालांकडून व मुनिमांकडून के. जनार्दन बद्दल बरीचशी नवीन व आश्चर्यजनक माहिती मिळाली.

अशा प्रकारे भरपूर पुरावे गोळा केल्यानंतर एका दिवशी सकाळी नऊ वाजता शामपुरला जनार्दन भाऊंच्या वाड्यावर जाऊन धडकलो. स्वतः जनार्दन भाऊंनीच दार उघडल्यावर दोन्ही हात जोडून खणखणीत, आत्मविश्वासपूर्वक आवाजात म्हणालो..

“नमस्कार जनार्दन भाऊ उर्फ आमचे ट्रॅक्टर कर्जदार माननीय श्री. के. जनार्दन..!”

माझ्या त्या नाट्यपूर्ण गौप्यस्फोटानंतर जनार्दन भाऊंचा चेहरा एकदम पडून जाईल व त्यावर भीतीची छाया पसरेल अशीच माझी अपेक्षा होती. मात्र जनार्दन भाऊंच्या चेहऱ्यावरची रेष ही माझ्या त्या डायलॉग मुळे हलली नाही. उलट, बहुदा ते मी येण्याचीच वाट पहात असावेत. गंभीर, रुक्ष स्वरात ते म्हणाले..

“या..! आत या.. !!”

आम्ही सोफ्यावर बसल्यावर नेहमी प्रमाणे त्यांच्या पत्नीने पाणी आणून दिलं आणि चहा आणण्यासाठी ती आत निघून गेल्यावर जनार्दन भाऊ म्हणाले..

memories at Utnoor-4c

“हं.. ! बोला आता.. !! कुठून कुठून आणि काय काय पुरावे गोळा केलेत, मीच तुमचा तो ‘के. जनार्दन’ आहे हे सिद्ध करण्यासाठी..?”

जनार्दन भाऊंच्या चेहऱ्याकडे, ते कुरवाळत असलेल्या त्यांच्या हनुवटीवरील दाढीकडे क्षणभर मी रोखून बघितलं. आणि मग एक दीर्घ श्वास घेतला आणि एकेक शब्द सावकाशपणे उच्चारीत मी म्हणालो..

“मी महाराष्ट्रातून आलेला मराठी माणूस आहे हे कळूनही तुम्ही जेंव्हा माझ्याशी थोडं जास्त आपुलकीनं वागायच्या ऐवजी त्रयस्था सारखं अलिप्तपणे वागलात, तेंव्हाच मला तुमचा थोडासा संशय आला होता. तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करीत आहात असं मला वाटलं. तुम्ही अट्टाहासानं माझ्याशी तेलगू भाषेत बोललात तेंव्हा तुम्ही मराठी भाषिकच आहात हे तुमच्या पत्नीशी खोटं बोलून मी शोधून काढलं. पण तोपर्यंत तुम्हीच के. जनार्दन आहात याची मला पुसटशीही कल्पना किंवा शंका नव्हती.”

हलकीशी जांभई देत कंटाळा आल्याचं दाखवीत जनार्दन भाऊ म्हणाले..

“त्याच त्याच, माहीत असलेल्या गोष्टी सांगू नका. मुद्द्याचं बोला..!”

त्यांच्या त्रासिक अविर्भावाकडे लक्ष न देता मी पुढे म्हणालो..

“त्या दिवशी तुम्ही थोड्या वेळासाठी वाड्याबाहेर गेला असताना दिवाणखान्यात लावलेले तुमचे फॅमिली फोटो पहात असताना तुमच्या वडिलांच्या फोटोखाली बारीक अक्षरात ‘कै. वामन गणपत केंद्रे’ असे नाव लिहिलेले मी वाचले. त्यावरून तुमचे आडनाव केंद्रे आहे हे समजले. तसं तुम्ही इथे ‘पी. जनार्दन’ हे नाव धारण केलं असून यातील ‘पी’ म्हणजे ‘पाटील’ असं तुम्ही इथल्या लोकांना सांगत असत, हे ही मला चौकशीतून समजलं होतं.

पुढे.. इंद्रवेल्लीच्या हॉटेलवाल्या चिन्नय्या कडून के. जनार्दनच्या नक्षलवाद्यांनी बळी घेतलेल्या मुलाचं नाव “दामोदर” असल्याचं समजलं आणि तुम्हीच जनार्दन केंद्रे उर्फ के. जनार्दन असल्याचा पहिल्यांदाच मला संशय आला.”

मी दामोदरचा उल्लेख केला तेंव्हा जनार्दन भाऊंच्या चेहऱ्यावर उमटून गेलेले शोकपूर्ण दुःखी भाव माझ्या नजरेतून सुटले नाहीत. त्यांच्या नजरेला नजर न देता भिंतीवरील कोवळ्या वयाच्या मुलाच्या फोटोकडे पहात मी पुढे म्हणालो..

“अर्थात, या हॉलमध्ये लावलेला हा हार घातलेला फोटो तुमच्या मुलाचा म्हणजेच दामोदरचा असून त्याच्या स्मरणार्थच तुम्ही या कॉम्प्लेक्स चे नाव ‘दामोदर बाजार’ असे ठेवले आहे याचाही मग आपोआपच उलगडा झाला.

नक्षलवाद्यांनी तुमच्या चेहऱ्यावर कोयत्याने जे वार केले होते, त्याचे व्रण लपवण्यासाठीच तुम्ही गालांवर केसांचे कल्ले वाढविले आणि हनुवटीवर ही छोटीशी दाढी सुद्धा ठेवलीत. तसंच डोक्यावरील व्रण लपवण्यासाठीच तुम्ही सदैव गांधी टोपी घालता.”

एवढं बोलून, यावर जनार्दन भाऊंची काय प्रतिक्रिया आहे हे जाणून घेण्यासाठी मी हळूच त्यांच्याकडे पाहिलं. मात्र डोळे मिटून शांतपणे ते माझं बोलणं एकाग्र चित्ताने ऐकून घेत होते. त्यामुळे माझं बोलणं तसंच सुरू ठेवत मी म्हणालो..

“आदीलाबादच्या धान्य मोंढ्यात जाऊन मी तुमच्याबद्दल चौकशी केली तेंव्हा तुम्ही अजूनही ट्रॅक्टर मध्ये धान्य भरून मोंढ्यात विक्रीसाठी आणता असं समजलं. तसंच चेहऱ्यावरचे व्रण नष्ट करण्यासाठी तुम्ही मद्रास (आताचं चेन्नई) येथे जाऊन प्लास्टिक सर्जरीही केलीत, पण तरीही ते व्रण पूर्णपणे मिटले नाहीत, त्यामुळे नाईलाजाने तुम्ही गालावर लांब कल्ले व हनुवटीवर बुल्गानिन कट फ्रेंच दाढी ठेवलीत, ही माहिती देखील तेथील जुन्या मुनींमांकडून समजली.”

मी आणखी पुढे बोलणार तोच जनार्दन भाऊंनी डोळे उघडले आणि हातानेच मला “थांबा..!” अशी खूण करीत म्हणाले..

“बस.. बस..! पुरे झालं..! मीच तो, तुमचा कर्जदार के. जनार्दन..! आता तुमचं काय म्हणणं आहे ते थोडक्यात सांगा..!!”

“बँकेचा कर्मचारी या नात्याने, ‘बँकेची थकबाकी ताबडतोब भरा’ यापेक्षा वेगळं ते काय म्हणणं असणार माझं..?” मी त्यांना प्रतिप्रश्न केला.

त्यावर एक दीर्घ उसासा सोडत खिन्न स्वरात जनार्दन भाऊ म्हणाले..

“दुर्दैवाने बँकेचं कर्ज परतफेड करू शकण्या एवढी आता माझी ऐपत राहिलेली नाही. मी पुरता कर्जबाजारी झालो आहे. अन्यथा फार पूर्वीच तुमचं सारं कर्ज मी फेडून टाकलं असतं..”

जनार्दन भाऊंचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. मी म्हणालो..

“एखाद्या सामान्य माणसानं हे म्हटलं असतं तर एक वेळ मी त्याच्यावर विश्वास ठेवला असता. पण.. तुमच्या नावावर अद्यापही 35 एकर जमीन आहे, पंधरा सोळा दुकानांचा एवढा मोठा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे, पेट्रोल व खत विक्रीचा तुमचा व्यवसाय आहे, याशिवाय ठोक धान्य खरेदी विक्रीही तुम्ही करता.. असं असूनही तुम्ही कर्जबाजारी कसे..?”

“तुम्हाला वस्तुस्थिती माहीत नाही म्हणून तुम्ही असं म्हणताय..” असं म्हणून जनार्दन भाऊंनी आपली दुखभरी दास्तान सांगायला सुरुवात केली..

“दामोदरच्या मृत्यूनंतर माझी पत्नी पुत्रशोकाच्या दु:खातिरेकानं भ्रमिष्ट झाली. तिला काही दिवसांकरता नागपूरच्या एका मानसोपचार केंद्रात उपचारांसाठी ठेवावं लागलं. माझ्या जिवालाही नक्षल्यांकडून धोका असल्याचा खात्रीलायकपणे सुगावा लागल्यामुळे तांतडीने घर व जमीन नातेवाईकांना विकून मी इंद्रवेल्ली कायमचं सोडून आदीलाबादला राहायला गेलो.

इंद्रावेल्ली गावातील नक्षल्यांच्या काही खबऱ्यांशी माझी खाजगी, व्यक्तिगत दुश्मनी होती. ते माझ्या मागावरच होते. सतत आदीलाबादला येऊन नक्षल्यांच्या नावाने ते माझ्याकडून खंडणी वसूल करायचे.

जखमांमुळे माझा चेहरा खूपच भेसूर दिसत होता. माझा विद्रुप चेहरा पाहताच माझ्या पत्नीला तो भयानक प्रसंग आठवायचा आणि तिचं बरं होत आलेलं वेड उफाळून यायचं. त्यामुळे मी सतत चेहऱ्यावर मोठा रुमाल बांधूनच वावरायचो. पुढे मद्रासला जाऊन मी चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरीही करवून घेतली. अर्थात त्यामुळे जखमांचे व्रण बरेच कमी झाले असले तरी ते पूर्णपणे नाहीसे न झाल्यामुळे ह्या दाढी, कल्ले आणि गांधी टोपीच्या आड मी ते व्रण लपवले.

बराच काळ माझा सावकारीचा व्यवसाय व धान्य खरेदी बंद असल्याने उत्पन्नाचे कोणतेही साधन उरले नव्हते. शेती करण्याची तर हिम्मतच नव्हती. एकीकडे पत्नीच्या उपचारात बराच पैसा खर्च होत होता तर दुसरीकडे नक्षल्यांना अजूनही खूप मोठी रक्कम अधून मधून खंडणी म्हणून द्यावी लागत असे. माझ्या प्लास्टिक सर्जरीलाही खूप जास्त खर्च आला. लवकरच माझी सर्व जमापुंजी संपुष्टात आली.

सुदैवाने मला ओळखणारे व माझ्याकडून सतत खंडणी उकळणारे इंद्रवेल्लीचे नक्षली व त्यांचे खबरी अचानक एका अपघातात मरण पावले. आता मला ओळखणारं त्या परिसरात कुणीच नसल्याने माझी उरलेली शेतजमीन कसण्यासाठी मी शामपुरला येण्याचं ठरवलं. तत्पूर्वी मोठ्या हौसेनं बांधलेला माझा परभणीचा बंगला आणि घरातील सर्व सोनं नाणं विकून आलेल्या पैशातून मी हा शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधून काढला.

सावधगिरीचा उपाय म्हणून माझं नाव पी. जनार्दन आहे असं मी शामपुरच्या लोकांना सांगितलं. कॉम्प्लेक्स मागेच हा वाडा बांधून घेतला आणि पत्नीसह इथे रहायला आलो. वाड्यामागेच माझी वीस एकर जमीन आहे. स्थानिक मजुरांच्या मदतीनं मी ती शेती कसायला सुरवात केली. लवकरच शॉपिंग कॉम्प्लेक्सची सर्व दुकानं भाड्यानं गेली आणि घरबसल्या मला भरपूर उत्पन्न मिळू लागलं.”

अविश्रांत बोलून थकल्यामुळे जनार्दन भाऊ दम घेण्यासाठी क्षणभर थांबले. त्यांची पत्नीही माजघरातील दारात उभी राहून आमचं बोलणं ऐकत होती. तिला पुन्हा एकदा चहा करायला सांगून जनार्दन भाऊंनी आपली कर्मकहाणी कन्टीन्यू केली..

“माझ्या आवडत्या सूट, बूट, कोट, टाय, गुळगुळीत दाढी व डोक्यावर हॅट अशा साहेबी पेहरावाचा त्याग करून धोतर, सदरा, गांधी टोपी, लांब कल्ले, दाढी व पायात चप्पल असा नवीन देशी पेहराव मी धारण केला. वीज खातं, शेती खातं, तहसील, रेव्हेन्यू खातं अशा सर्वच सरकारी खात्यात माझे नातेवाईक असल्याने त्यांच्या मदतीने सगळ्या सरकारी रेकॉर्ड्स मध्ये मी माझे नाव सहजरित्या पी. जनार्दन असे बदलून घेतले.

सुरवातीचे काही दिवस सारं काही सुरळीत चाललं होतं. स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांकडून ठोक भावाने धान्य खरेदी करून ट्रॅक्टरच्या साहाय्याने ते आदीलाबाद च्या मोंढ्यात विकण्याचा माझा जुना व्यवसायही आता मी पुन्हा सुरू केला होता. मात्र माझ्याकडून अनवधानाने एक बदल करायचा राहून गेला होता. मी माझी मोटारसायकल व ट्रॅक्टर ट्रॉली, तीच जुनीच ठेवली होती. आणि त्या एका चुकीनेच माझ्या मागे पुन्हा दुर्दैव हात धुवून लागलं.

इंद्रवेल्लीच्या अपघातातून वाचलेला एक नक्षली खबऱ्या योगायोगानं एकदा त्याच्या शामपुरच्या नातेवाईकाकडे आला होता. ट्रॅक्टर व मोटरसायकल वरुन तसंच माझ्या आवाजावरून त्याने मला ओळखलं आणि शामपुर एरियाच्या नक्षली कमांडरला त्याची खबर दिली.

एके दिवशी नक्षल्यांचं एक इशारेवजा धमकीपत्र मला प्राप्त झालं. तीन एकरपेक्षा जास्त जमीन कसू नये, शॉपिंग कॉम्प्लेक्स भाड्याने देऊ नये, मोटारसायकल वापरू नये, ठोक धान्य खरेदी बंद करावी किंवा आदिवासींना धान्याचा योग्य, वाढीव भाव द्यावा अशा आज्ञा त्यात दिल्या गेल्या होत्या. तसंच नक्षलींच्या पूर्वीच्या आज्ञापत्राचे उल्लंघन केल्याबद्दल दोन लाख रुपयांचा खंडणीवजा दंड ही मला ठोठावण्यात आला होता.

इंद्रवेल्लीत नक्षल्यांनी माझ्या कुटुंबावर जो भयंकर अत्याचार केला होता त्याला आता दहा वर्ष उलटून गेली होती. या मधल्या काळात नक्षल्यांचा जोर खूप कमी झाला होता. जवळच उतनूरला पोलिसांचं खूप मोठं ठाणं झालं होतं. रस्ते, टेलिफोन, वीज या सोयींतही या काळात भरपूर सुधारणा झाली होती. आणि मुख्य म्हणजे माझ्याकडे गमावण्या सारखं आता काहीच उरलं नव्हतं. त्यामुळे नक्षल्यांच्या मागण्या मी साफ धुडकावून लावल्या व त्यांच्या धमकीकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं.

माझ्या या कृतीमुळे चिडलेल्या नक्षल्यांनी सर्वप्रथम स्थानिक आदिवासी मजुरांना माझ्या शेतावर काम करण्यास मनाई केली. त्यामुळे माझी शेतीची कामे ठप्प झाली. मात्र त्यामुळे खचून न जाता आदीलाबाद-महाराष्ट्र सीमेवरील पिंपळखुटी गावातून जादा मजुरी देऊन मी मराठी मजूर आणले, त्यांची राहण्याची सोय केली आणि शेतीची कामे पूर्ववत सुरळीतपणे सुरू केली. त्यानंतर मला धान्य विकण्यास नक्षल्यांनी स्थानिक शेतकऱ्यांना मनाई केली. त्यामुळे माझा तो व्यवसायही कायमचाच बंद झाला. नक्षल्यांची दहशत व त्यांचे फर्मान यामुळे दामोदर बाजारातील सर्वच गाळे ओस पडले. त्या दुकानांच्या भाड्यातून मला जे नियमित उत्पन्न मिळत होतं, ते ही आता मिळेनासं झालं.

एकदा उतनूर येथील विशेष पोलीस मुख्यालयाच्या उदघाटनासाठी राज्याचे गृहमंत्री तिथे आले होते. ह्या परिसरातील सर्वच पोलीस ठाण्यांचे शिपाई या कार्यक्रमाला हजर होते. नेहमीप्रमाणेच हा मोका साधून वीस पंचवीस सशस्त्र आदिवासी तरुणांनी माझ्या वाड्याला वेढा घातला. शामपुर गावातील जनतेला दवंडी पिटवून माझ्या वाड्याजवळ जमण्यास सांगण्यात आले. माझ्या शेतात काम करीत असलेल्या महाराष्ट्रातील मजुरांपैकी दोघांना पकडून वाड्यासमोरील चिंचेच्या झाडाला बांधण्यात आले. त्यानंतर नक्षली गटाच्या कमांडरने गावकऱ्यांना माझ्यावरील आरोप पत्र वाचून दाखविले..”

इतक्यात चहा आल्यामुळे जनार्दन भाऊंनी बोलणं थांबवलं. त्यांची कहाणी आता रोमांचक वळणावर आल्याने भराभरा चहा पिऊन पुढील प्रसंग ऐकण्यास मी सज्ज झालो. दारात उभ्या असलेल्या आपल्या पत्नीला आत जाऊन आराम करण्यास सांगून जनार्दन भाऊंनी उर्वरित कहाणी सांगण्यास सुरवात केली..

“माझ्यावरील आरोपपत्रात असा उल्लेख होता की ‘पीपल्स वॉर ग्रुप’ च्या नियमानुसार समाजात आर्थिक समानता यावी या साठी या परिसरात कुणालाही तीन एकरापेक्षा जास्त जमीन कसण्यास मनाई आहे. तसेच घर, दुकान भाड्याने देणे, स्वस्त दराने स्थानिकांकडून धान्य, मध, डिंक इत्यादी खरेदी करून त्यांची पिळवणूक करणे यास ही सक्त मनाई आहे. कार, स्कुटर व मोटारसायकल अशी जलदगतीची वाहने वापरण्यास ही सामान्य नागरिकांना मनाई आहे. या सर्व नियमांचा पी. जनार्दन यांनी भंग केल्यामुळे त्यांना खालीलप्रमाणे दंड ठोठावण्यात येत आहे.

  1. आम्ही आखून दिलेल्या सीमा रेषेच्या आतील जमिनीवरच त्यांना शेती करता येईल.
  2. धान्य व अन्य मालाची छुप्या मार्गाने खरेदी केल्यास त्यांचे व माल विकणाऱ्याचे घर जाळून टाकण्यात येईल.
  3. त्यांची मोटारसायकल जप्त करण्यात येत आहे.
  4. त्यांना दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येत आहे. सांगितलेल्या ठिकाणी एक दोन दिवसात त्यांनी हा दंड पोचता करावा.

अशाप्रकारे आरोप पत्राचे जाहीर वाचन करून झाल्यावर वाड्याच्या मागील शेतजमिनीवर अंदाजे दोन अडीच एकर क्षेत्रफळाच्या अंतरावर एका रांगेत त्यांनी चार फूट उंचीच्या लाकडी खुंट्या ठोकल्या आणि या रांगे पलीकडील जमिनीत जो कोणी पाय ठेवील त्याचे दोन्ही पाय तोडून टाकले जातील असा जाहीर इशारा दिला.

bamboo boundary

त्यानंतर अत्यंत निर्दयपणे त्यांनी झाडाला बांधलेल्या दोन्ही मजुरांचा एकेक हात कुऱ्हाडीचे घाव घालून तोडून टाकला. मी महाराष्ट्रातून आणलेल्या सर्व मजुरांनी ताबडतोब येथून परत निघून जावे अन्यथा त्यांची ही गत अशीच होईल तंबी देऊन माझी मोटारसायकल घेऊन ते जंगलात निघून गेले.

या घटनेनंतर बरेच दिवस शामपुर गावात भीती व दहशतीचे वातावरण होते. पोलिसांनी तर माझ्या वाड्यासमोरच आपली तात्पुरती छावणी उभी केली होती. मी नक्षल्यांना खंडणी देऊ नये यासाठी त्यांनी माझ्यावर भरपूर दबावही आणला. मात्र नक्षल्यांच्या अत्यंत भीषण व कटू पूर्वानुभवामुळे मी गुपचूप त्यांच्याकडे खंडणीची रक्कम पोचती केली.”

जनार्दन भाऊ उर्फ के. जनार्दन यांची दुःखद कर्म कहाणी संपली होती. त्यानंतर मला घेऊन ते वाड्याच्या पाठीमागे गेले. तिथे पंधरा वीस एकर ओसाड जमीन पसरलेली होती. जवळच एका रांगेत अनेक लाकडी खुंट्या ठोकलेल्या होत्या. त्या काठ्यांकडे बोट दाखवीत जनार्दन भाऊ म्हणाले..

“जरी तिथपर्यंतच्या जमिनीवर शेती करण्याचा नक्षल्यांनी मला अधिकार दिला असला तरी प्राणभयामुळे या भागातील कुणीही माझ्या शेतीवर काम करण्यास तयार नाही. शेती, धंदा, दुकान भाडे या मार्गांनी पूर्वी मिळणारे सर्वच उत्पन्न बंद झाल्यामुळे मी पूर्णपणे कर्जबाजारी झालो आहे. पेट्रोल व खत विक्रीच्या व्यवसायातून कसंबसं पोट भरण्यापुरतं उत्पन्न मिळतं. पण तो व्यवसायही तसा बेकायदेशीरच आहे. माझ्याकडे पेट्रोल वा खत विक्रीचं कोणतंही लायसन्स नाही. पोलीस, MRO व अन्य सरकारी विभागांना नियमित लाच देऊनच मी तो व्यवसाय कसातरी टिकवून ठेवला आहे.”

जनार्दन भाऊंची कहाणी जरी खरी वाटत असली तरी कुठेतरी मला त्यात मतलबी धुर्तपणा लपलेला दिसत होता. वाड्यामागेच एका पत्र्याच्या शेडखाली त्यांची मोटारसायकल उभी केलेली दिसत होती. मी त्या मोटारसायकल कडे निरखून पहात असताना माझ्या मनात आलेली शंका जनार्दन भाऊंनी लगेच ओळखली आणि ते म्हणाले..

“नक्षल्यांनी पळवून नेलेली माझी मोटारसायकल पुढे एका छाप्यात पोलिसांनी जप्त केली. अद्यापही ती उतनूरच्या पोलीस ठाण्यात गंजत पडली आहे. तशीही ती गाडी बरीच जुनी झाल्याने मला नवीन मोटरसायकल घ्यायचीच होती. इथे दळणवळणाच्या सोयी जवळपास नाहीतच. बरेचदा माझ्या पत्नीला वैद्यकीय उपचारासाठी नागपूर व आदीलाबादला घेऊन जावे लागते. तसंच आदीलाबादच्या मोंढ्यात धान्य अडतीचा व्यवसायही मी करतो. त्यासाठीही मला स्वतःचे वाहन असणे आवश्यकच होते. इथल्या नक्षली नेत्यांना मी माझी अडचण सांगितली. ते खूप लालची आहेत. थोड्याशा खंडणीच्या मोबदल्यात त्यांनी मला मोटारसायकल वापरण्याची परवानगी दिली. मात्र माझ्या खेरीज अन्य कुणीही ती वापरल्यास त्याला कठोर दंड केला जाईल असे त्यांनी बजावले.”

एवढं सांगून जनार्दन भाऊ म्हणाले..

“केवळ ह्याच कारणामुळे त्या दिवशी रात्री तुमच्या बँकेतील प्युन रमेशला मोटारसायकल देण्यास मी नकार दिला होता.”

एकंदरीत जनार्दन भाऊ उर्फ के. जनार्दन यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असून त्यांच्या कर्ज खात्याच्या वसुलीची अजिबात शक्यता नाही याची जाणीव झाल्याने मी निराश झालो. तरी देखील एक शेवटची आशा म्हणून त्यांना म्हणालो..

“ठीक आहे, कर्ज परतफेड करण्याची तुमची ऐपत नाही हे जरी मान्य केलं तरी तुम्ही कर्जातून घेतलेल्या ट्रॅक्टर व ट्रॉलीचं काय ? ती तर बँकेचीच मालमत्ता आहे. त्यांच्या विक्रीतून आमची थोडी तरी कर्जवसुली होऊ शकेल. कुठे आहे सध्या तो ट्रॅक्टर व ती ट्रॉली..?”

माझ्या या प्रश्नावर मला हात धरून जवळच्या गुरांच्या गोठ्याकडे नेऊन त्यांनी तेथील कडब्याच्या पेंड्या किंचित बाजूला केल्या. त्या पेंड्यांच्या मागे पार गंजून गेलेल्या अवस्थेतील ट्रॅक्टर व ट्रॉली उभी होती. तिचा पत्रा एवढा गंजून सडून गेला होता की जरा हात लावला की त्याचे तुकडे गळून पडत होते. कुणी भंगार (स्क्रॅप) च्या भावाने देखील त्यांना विकत घेतले नसते.

old tractor

माझ्या शोध मोहिमेचा अंत असा अत्यंत निराशाजनक झाला होता. एवढा डोंगर पोखरूनही साधा मेलेला उंदिरही निघाला नव्हता. निराश, हतोत्साह मनानं मी उतनूर कडे निघालो.

(क्रमशः ४-ड)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

उतनूरचे दिवस-4B-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

roadside tea stall

Memories-at-Utnoor

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*उतनूरचे दिवस…*

*थरार… (४-ब)*

त्यानंतर आठवडाभर मी खिन्न, बेचैन होतो. जनार्दन भाऊंनी मला सुनावलेले कठोर बोल आठवले की आत्मग्लानीने मन विषादाने भरून जाई. माझी ही तगमग, तळमळ आमच्या मॅनेजर साहेबांनी ओळखली. सध्या मी के. जनार्दनचा छडा लावण्यात गुंग आहे याची त्यांना कल्पना होती. एक दिवस माझ्याजवळ येऊन ते म्हणाले..

“तुम्ही त्या के. जनार्दनचा माग काढण्यात एवढे डीपली ईनव्हॉल्व्ह होऊ नका. पंधरा वर्षे एवढ्या प्रदीर्घ काळापासून ती व्यक्ती बेपत्ता आहे. बँकेचं कर्ज फेडण्याची त्या व्यक्तीची मानसिकता नाही हे तर उघडच आहे. त्यातून हे आदिवासी क्षेत्र असून इथे एजन्सी ऍक्ट लागू आहे. त्यानुसार येथे फक्त आदिवासी, अनुसूचित जमातीची व्यक्तीच जमिनीचा खरेदी विक्री व्यवहार करू शकते. त्यामुळे कर्जदाराने बँकेकडे तारण ठेवलेली जमीन जप्त करून विकणे ही खूपच किचकट प्रक्रिया आहे. आता इतक्या वर्षांनंतर यदाकदाचित त्या के. जनार्दनचा शोध जरी लागला तरी त्याच्याकडून बँकेचे कर्ज वसूल होण्याची काडीमात्र शक्यता नाही. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही त्या के.जनार्दनचा नाद आता सोडून द्यावा.”

मॅनेजर साहेबांच्या बोलण्यात तथ्य होतं. त्यामुळे के. जनार्दनचा शोध घेणं थांबवून मी अन्य कामांत बिझी झालो.

त्याच सुमारास बँकेच्या “वसुली अभियान (Recovery Campaign)” स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. मेट्रो, अर्बन व रूरल/सेमीअर्बन असे शाखांचे तीन गट केले होते. आमची शाखा रूरल/सेमीअर्बन गटात येत होती. त्या गटातून आमच्या शाखेला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यामुळे सर्वत्र आमचे अभिनंदन होत होते. या सर्व कौतुकात के. जनार्दनला मी जवळजवळ विसरूनच गेलो होतो.

त्याच सुमारास उतनूर आदीलाबाद रोड वरील इंद्रवेल्ली पासून सुमारे तीस किलोमीटर दूर असलेल्या “इच्चोडा” गावातील शाखेत आठ दिवसांसाठी मला डेप्युटेशन वर जावे लागले. या काळात माझ्या मोटारसायकलनेच मी इच्चोडा इथं जाणं येणं करीत असे. इंद्रवेल्ली गावा बाहेरील मुख्य रस्त्यापासून फक्त शे-दीडशे फूट दूर असलेला लाल भडक रंगाचा एक स्मृती-स्तंभ जाता येताना माझ्या दृष्टीस पडत असे. स्तंभाच्या वरच्या टोकाला लोखंडी गोलाकार फ्रेम मधील मार्क्स-लेनिन वादी कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह “कोयता-हातोडा” दुरुनही दिसत असे.

indravelli memorial

एकदा कुतूहलवश रस्त्यावर मोटारसायकल उभी करून स्तंभा जवळ गेलो. पायथ्याच्या सात आठ पायऱ्या चढून स्तंभाचे जवळून निरीक्षण करू लागलो. स्तंभाच्या आसपास बरीच ओसाड, मोकळी जागा होती. स्तंभाच्या खालच्या बाजूस एका संगमरवरी फलकावर ठळक इंग्रजीत “PEOPLE’S HEROES ARE IMMORTAL” असं लिहून त्याखाली तेलगू आणि हिंदी भाषेत *”प्रजावीर मृत्युंजय”* असं कोरलं होतं. त्याच्या खाली इंग्रजीत चार ओळी लिहिल्या होत्या.

indravelli massacre board

मी खाली वाकून त्या ओळी वाचत असतानाच अचानक कुठूनतरी चार पाच आदिवासी तरुण तिथे आले आणि त्यांनी मला हटकले. मी बँक कर्मचारी असल्याचे सांगताच त्यांनी मला ताबडतोब तिथून निघून जाण्यास सांगितले आणि ते स्वतः सुद्धा वेगवेगळ्या दिशांना पांगून लगेच दिसेनासे झाले.

naxalites

त्या आदिवासी तरुणांच्या सांगण्यानुसार स्तंभाच्या पायऱ्या उतरून रस्त्यावरील मोटारसायकल कडे जात असतानाच पोलिसांची एक जीप माझ्याजवळ येऊन थांबली. “तुम्ही कोण आहात आणि इथे कशाला थांबला आहात ?” असं दरडावून विचारत त्यांनी माझी कसून चौकशी केली आणि माझं ओळ्खपत्रही मागितलं. मी महाराष्ट्रातून इथे नोकरीसाठी आलेला स्टेट बँकेचा अधिकारी असल्याची खात्री होतांच त्यांच्यापैकी एकजण मला मराठीतून म्हणाला..

andhra police jeep

“साहेब, असा उगीच आपला जीव धोक्यात कशाला घालता ? या जागेच्या आसपास येणाऱ्या प्रत्येकाकडे नक्षली हेरांचे आणि आम्हा पोलिसांचे बारकाईने लक्ष असते. ही अतिशय संवेदनशील जागा आहे. भीतीमुळे लोक या स्तंभाकडे नुसतं पाहणंही टाळतात. तुम्ही देखील या पुढे अशी इथं थांबण्याची चूक करू नका..”

माझ्या अज्ञानाबद्दल पोलिसांकडे दिलगिरी व्यक्त करून कशीबशी तेथून सुटका करून घेतली.

त्यानंतर उतनूरच्या गावकऱ्यांकडे इंद्रवेल्लीच्या स्तंभा बाबत चौकशी केली असता खालील रोमांचक, रक्तरंजित कहाणी समजली..

ज्या घटनेच्या स्मृत्यर्थ हा स्तंभ उभारण्यात आला होता त्या घटनेची “इंद्रवेल्ली हत्याकांड” (Indravelli massacre) म्हणून इतिहासात नोंद असून 20 एप्रिल 1981 रोजी ही अमानुष, दुर्दैवी घटना घडली.

या दिवशी इंद्रवेल्ली इथे “गिरीजन रयतु कुली संघम” नावाच्या भारतीय कम्युनिस्ट (मा.ले.) पक्षाच्या एका संघटनेतर्फे आदिवासी गोंड समाजाचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. आदिवासींना त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्काचे “पट्टाधारी पासबुक” देण्यात यावे तसेच बिगर आदिवासींच्या वाढत्या अतिक्रमणास पायबंद घालावा या मागण्यांसाठीच हा मेळावा होता. सुरवातीला पोलिसांनी या मेळाव्यास रीतसर परवानगी दिली होती. मात्र नंतर नक्षली उद्रेकाच्या भीतीने ऐनवेळी त्यांनी ही परवानगी रद्द केली. अर्थात मेळाव्यासाठी जमलेल्या आदिवासींना याची कल्पनाच नव्हती. त्याच दिवशी इंद्रवेल्लीचा आठवडी बाजारही होता.

telanagana rally

या मेळाव्यास जमलेल्या आदिवासींवर तसेच बाजारासाठी आलेल्या लोकांना घेरून पोलिसांनी त्यांच्यावर तुफान गोळीबार केला. सरकारी अहवालानुसार जमावाने पोलिसांवर हल्ला केल्यामुळे 5 पोलीस अधिकारी व 30 शिपाई यांनी स्वसंरक्षणात्मक प्रतिकारार्थ गोळीबार केला, ज्यात 9 जण जखमी झाले तर 13 जण मृत्युमुखी पडले. मात्र नागरी स्वातंत्र्य आयोगाने केलेल्या निःपक्षपाती चौकशीतून असे आढळून आले की घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांची संख्या प्रत्यक्षात खूपच जास्त होती. तसेच फार मोठ्या संख्येने आदीलाबाद जिल्ह्यातील पोलिसांना आदल्या दिवशीच इंद्रवेल्ली इथे पाठविण्यात आले होते.

पोलिसांच्या पाच तुकड्या (Platoons) आदल्या रात्रीसच इंद्रवेल्लीच्या हायस्कुलात येऊन थांबल्या होत्या. त्यांनी रात्रीच गावातील घरोघरी जाऊन संपूर्ण परिसरात जमावबंदीचे कलम 144 लागू केल्याचे लोकांना कळविले. दुसऱ्या दिवशी मेळाव्यासाठी गावात येणाऱ्या आदिवासींना त्यांनी बाहेरच रोखले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. पळून जाणाऱ्या आदिवासींच्या अंगावर पोलिसांनी जीप गाड्या घालून त्यांना चिरडलं तर जीपमधील शिपायांनी अतिशय जवळून (point blank range) त्यांना गोळ्या घातल्या.

बरेचसे आदिवासी घाबरून जंगलात पळून गेले. मात्र तिथेही झाडांआड आधीच पोलीस (Snipers) बंदुकीचा नेम धरून लपून बसले होते. त्यांनी या बेसावध आदिवासींना अचूक टिपले. त्या दिवशी गावातील सर्व शाळा, दुकानं आणि कार्यालयं बंद करवून पोलिसांनी संपूर्ण गावाला वेढा घातला होता. प्रत्यक्षदर्शींनुसार गोळीबारानंतर आदिवासींची किमान साठ प्रेतं गावात इतस्ततः पडली होती. तसेच शंभरहून जास्त जखमींना आसपासच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले होते. त्यापैकी बरेच जण नंतर मरण पावले.

त्यावेळी राज्यात काँग्रेस पक्षाचे सरकार होते. अनेक प्रत्यक्षदर्शी काँग्रेस कार्यकर्त्यांनी असे नमूद केले आहे की इंद्रवेल्ली गावातील गोंड आदिवासींचे साठ पेक्षा जास्त मृतदेह पोलिसांनी आदीलाबादला नेऊन गुप्तपणे जाळून टाकले. तसेच गंभीर जखमी आदिवासींचे देह एकावर एक रचून दोन मोठ्या व्हॅन मधून त्यांना आदीलाबादच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्यापैकी अनेकजण वाटेतच मरण पावले तर काही जणांनी नंतर प्राण सोडला.

पळून जाणाऱ्या वेगवेगळ्या गावांतील ज्या आदिवासींना पोलिसांनी पाठलाग करून गोळ्यांनी उडवले त्यांचे मृतदेह त्या त्या गावातील रस्त्याच्या कडेला कित्येक दिवस बेवारसपणे पडून होते. उतनूर (30 ते 40), ईच्चोडा (25), मुथनूर (30) अशी प्रत्यक्षदर्शींनुसार अशा बेवारस मृतांची संख्या होती. या व्यतिरिक्त खोल जंगलात मरण पावलेल्या आदिवासींचे मृतदेह त्यानंतरही अनेक दिवस सापडतच होते. आंध्र प्रदेश सिव्हिल लिबर्टीज कमिटी च्या अंदाजानुसार या हत्याकांडातील मृतांची संख्या किमान 250 इतकी होती. तर अन्य विविध गैर सरकारी नागरी संघटनांच्या मते या नरसंहारातील मृतांचा आकडा 350 ते 1000 इतका असू शकतो.

1983 साली या पोलिसी हत्याकांडातील बळीच्या स्मरणार्थ गिरीजन रयतु कुली संघम (GRCS) तर्फे इंद्रवेल्ली इथे एक स्तंभ (Pillar) उभारण्यात आला. चीन मध्ये पाहिलेल्या अशाच एका मेमोरियल पिलर वरून GRCS च्या अध्यक्षांना हा स्तंभ उभारण्याची प्रेरणा मिळाली. पुढे 1986 साली “कडेम” या गावी नक्षल्यांनी पोलिसांवर केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पोलिसांनी हा स्तंभ पाडून टाकला होता. मात्र पुढच्याच वर्षी पुन्हा नव्याने तो स्तंभ उभारण्यात आला.

इंद्रवेल्लीच्या घटने नंतर “पीपल्स वॉर ग्रुप” (PWG) ह्या सशस्त्र क्रांतिकारी बंडखोर नक्षली संघटनेत सामील होणाऱ्या आदिवासींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली. पुढील काळात जेंव्हा जेंव्हा हे नक्षली बंडखोर पोलिसांवर व त्यांच्या खबऱ्यांवर हल्ला करून त्यांना ठार मारीत असत तेंव्हा तेंव्हा त्यांचे मृतदेह या लाल शहीद स्तंभाजवळ आणून टाकीत असत. अशारितीने एकप्रकारे इंद्रवेल्लीच्या निष्पाप हुतात्म्यांसच जणू ते श्रद्धांजली अर्पण करीत असत. त्याला प्रत्युत्तर म्हणून कधी कधी पोलीस देखील चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांचे गोळ्यांनी चाळण झालेले मृतदेह या लाल स्मृती स्तंभाच्या पायऱ्यांवर फेकून देत नक्षल्यांच्या जखमेवर आणखीनच मीठ चोळीत असत.

इंद्रवेल्लीच्या लाल स्मारकाचा हा क्रूर, रक्तरंजित इतिहास ऐकून मी प्रचंड हादरून गेलो. त्यामुळेच, उरलेल्या दिवसांत ईच्चोड्यास जाता येताना इंद्रवेल्लीतील त्या स्तंभाकडे नुसती मान वळवून पाहण्याचे देखील मला कधी धैर्य झाले नाही.

एकदाचं माझं ईच्चोडा येथील डेप्युटेशन संपलं आणि मी उतनूर कडे जाण्यास निघालो. नेमकं इंद्रवेल्ली गावात आल्यानंतरच जोरदार पाऊस सुरू झाला आणि इच्छा नसतांना ही मला तिथे थांबावं लागलं. गावाच्या एका टोकाला असलेल्या हॉटेल समोर मोटारसायकल उभी करून मी चहाची ऑर्डर दिली. हॉटेलचा वयस्क दिसणारा मालक.. चिन्नय्या, खूपच उत्साही, बडबडा आणि चौकस होता. त्याने मी कोण, कुठून व कशासाठी आलो आहे, याबद्दल विचारपूस केली. तो स्वतः इंद्रवेल्लीच्या रेव्हेन्यू ऑफिसचा रिटायर्ड चपराशी होता.

roadside tea stall

त्याच्या तोंडून इंद्रवेल्लीच्या रेव्हेन्यू (MRO) ऑफिसचे नाव ऐकताच के. जनार्दन बद्दल चौकशी करण्याचा मोह मला आवरला नाही. चिन्नय्याला के. जनार्दन बद्दल बरीच माहिती होती. त्याने सांगितलेली माहिती थोडक्यात अशी होती…

महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातून आलेला सधन वंजारा कुटुंबातील हा के. जनार्दन त्याच्या ऐन तरुण वयात, 1970 च्या सुमारास इंद्रवेल्ली इथं आला. अत्यंत स्वस्त भावात त्याने या भागात भलीमोठी शेतजमीन खरेदी केली. शेती सोबतच त्याने सावकारीही सुरू केली आणि प्रचंड पैसा कमावला.

कॉलेजच्या एकदोन वर्षांपर्यंत शिकलेल्या के. जनार्दनला सूट-बूट, कोट-टाय, हॅट अशा साहेबी पेहेरावात राहण्याची सवय होती. महाराष्ट्रातील “वंजारी” व “लमाणी” जातीला आंध्र प्रदेशात “बंजारा” व “लंबाडा” या नावाने ओळखले जाते व त्यांचा समावेश “अनुसूचित जमाती” (Scheduled Tribe-ST) मध्ये केला जातो. त्यामुळेच के.जनार्दनला या भागात जमीन खरेदी करता आली.

इंद्रवेल्लीला आल्यानंतर के.जनार्दनने थोड्या बहुत शिकलेल्या महाराष्ट्रातील आपल्या सगळ्याच नातेवाईकांना इकडेच बोलावून घेतले आणि या राज्यातील ST आरक्षणाचा फायदा घेत त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवून दिल्या. इन्द्रवेल्लीच्या MRO ऑफिसमध्येही त्याचे अनेक जवळचे नातेवाईक नोकरी करीत होते.

हळूहळू राठोड, जाधव, पवार, मुंडे, गीते अशा नावांच्या महाराष्ट्रातून आलेल्या वंजारी लोकांनी येथील आदिवासींच्या हक्काच्या जवळ जवळ सर्वच सरकारी नोकऱ्या बळकावून टाकल्या. त्याबरोबरच आंध्र प्रदेशातील श्रीमंत व शक्तिशाली रेड्डी आणि राव लोकांशी संगनमत करून आदिवासींच्या शेत जमिनींवर अतिक्रमण करण्यासही त्यांनी सुरुवात केली. साहजिकच स्थानिक आदिवासीं मध्ये या बाहेरून आलेल्या बंजारा व लंबाडा जमातीबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला. आदिवासींकडून तेंदू पत्ता, धान्य, मध, डिंक अत्यल्प दरात खरेदी करून त्यांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या नफेखोरी, भांडवलदार व्यापाऱ्यांविरुद्धही त्यांच्या मनात अशीच द्वेषभावना धुमसत होती. पुढे, हा वाढत चाललेला द्वेष व असंतोषच हळूहळू नक्षलवादी चळवळीत रूपांतरित झाला.

नक्षलवादी चळवळ ही भारतातील डाव्या विचारसरणीची सशस्त्र चळवळ असून गरीब शेतमजूर, आदिवासी आणि इतर वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी ते लढत असतात. आर्थिक असमानता दूर करणे, शेतजमिनीचे पुनर्वितरण करणे, राज्य व्यवस्थेतील अन्याय व भ्रष्टाचार नष्ट करणे आणि दुर्बल व वंचित घटकांना न्याय मिळवून देणे या त्यांच्या मागण्यांसाठी ते सशस्त्र संघर्ष करीत असतात.

के.जनार्दनने मोठ्या प्रमाणात खरेदी केलेली शेतजमीन, सावकारीतून व धान्यखरेदीतून मिळवलेला अफाट नफा यामुळे लवकरच तो स्थानिक नक्षली नेत्यांच्या टार्गेट वर आला. याच सुमारास त्याने स्वतः साठी नवीन मोटारसायकल विकत घेतली तसेच स्टेट बँकेतून कर्ज घेऊन ट्रॅक्टर व ट्रॉली देखील खरेदी केली. नक्षल्यांनी के.जनार्दन कडे पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली तसेच सावकारी व्यवसाय ताबडतोब बंद करावा व फक्त पाच एकर जमीन स्वतःकडे ठेवून बाकी जमिनी वरील हक्क सोडून द्यावा असा त्यास आदेश फर्मावला.

नुकतंच इंद्रवेल्लीचं नृशंस हत्याकांड घडलं होतं. सर्वत्र पोलिसांची क्रूर दहशत पसरली होती. पोलिसांच्या विरोधाला न जुमानता काही नक्षली आदिवासींनी मोठया धाडसानं त्या हत्याकांडाच्या जागी चार पाच पायऱ्या व छोटासा तात्पुरता स्तंभ उभारून हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती. नक्षल्यांच्या या कृतीमुळे पोलिस क्रोधाने खवळून गेले होते. नि:शस्त्र, निरपराध आदिवासींना दिसेल तिथे अमानुष मारहाण करण्याचा, प्रसंगी गोळ्याही घालण्याचा त्यांनी सपाटाच लावला होता. पोलिसांच्या या नक्षल-सत्रामुळे घाबरून जाऊन सारे नक्षली भूमिगत झाले होते.

के. जनार्दनची पोलिसांशी घनिष्ठ मैत्री होती. त्यामुळे नक्षलवाद्यांच्या मागण्या त्याने साफ धुडकावून लावल्या. नक्षली नेत्यांच्या सांगण्या वरून आदिवासी मजुरांनी त्याच्या शेतात काम करण्यास नकार दिला तेंव्हा त्याने शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यातून दुप्पट मजुरी देऊन शेतमजूर बोलावले. के. जनार्दनच्या या उद्धामपणा बद्दल त्याला चांगलीच अद्दल घडवण्याचा नक्षली हायकमांडने निर्णय घेतला.

1981 सालचा तो सप्टेंबर महिना होता. त्या दिवशी दुपारी बारा वाजता राज्याच्या गृहमंत्र्यांच्या हस्ते आदीलाबाद येथे पोलिसांना सन्मान पदके प्रदान करण्यात येणार होती. उतनूर व इंद्रवेल्लीचे झाडून सारे पोलीस अधिकारी व शिपाई या कार्यक्रमासाठी सकाळीच आदीलाबादला गेले होते. हीच वेळ साधून दुपारी अकराच्या सुमारास तीस ते चाळीस सशस्त्र आदिवासी तरुणांनी के. जनार्दनच्या इंद्रवेल्ली येथील राहत्या वाड्याला वेढा घातला.

सर्व गावकऱ्यांना जमवून के. जनार्दनला हात मागे बांधून वाड्यातून खेचतच बाहेर आणण्यात आलं. त्या आदिवासी तरुणांपैकी एकदोन गणवेषधारी नक्षल्यां जवळ बंदुका होत्या तर बाकीच्यांकडे विळा, कोयता, भाले व तिरकमठे अशी परंपरागत शस्त्रे होती. भीतीने के. जनार्दन थरथरा कापत होता. त्याच्या घराकडे जाणाऱ्या टेलिफोनच्या तारा नक्षल्यांनी आधीच तोडून टाकल्या होत्या.

“ताबडतोब पाच लाख रुपये आणून दे अन्यथा मरायला तयार हो..” असा नक्षल्यांनी निर्वाणीचा इशारा दिल्यावर त्यांच्यापुढे गयावया करणाऱ्या के. जनार्दनच्या पत्नीने घरातून काही रोकड रक्कम व आपले सोन्याचे दागिने त्यांना आणून दिले. त्या सर्वांची किंमत पाच लाखांपेक्षा खूप जास्त होती. त्यानंतर के. जनार्दन कडे असलेली सावकारीची सर्व कागदपत्रे बाहेर आणवून त्यांची होळी करण्यात आली तसेच त्याने गहाण ठेवून घेतलेल्या सर्व चीजवस्तू संबंधित गावकऱ्यांना परत करण्यात आल्या. अगदी चित्रपटातील डाकुंच्या दरोड्यात दाखवतात तसाच हा सर्व घटनाक्रम चाललेला होता.

एवढ्यात, गावातील कुणीतरी पोलिसांना फोन करून बातमी कळविल्यामुळे आदीलाबाद येथून जादा कुमक घेऊन पोलीस इंद्रवेल्ली कडे निघाल्याचे समजताच पैसे व दागिने गोळा करुन घाईघाईने जंगलात पळून जाण्यापूर्वी त्या नक्षल्यांच्या कमांडरने के.जनार्दनला पुढील आदेश सुनावले..

१.. स्थानिक मजुरांच्या मदतीने फक्त पाच एकर जमीनच कसावी. तसेच महाराष्ट्रातून आणलेले सर्व शेतमजूर ताबडतोब त्यांच्या गावी परत धाडण्यात यावेत.

२.. आदिवासींचा शेतमाल योग्य भावात खरेदी करावा. आंध्र प्रदेशातील लुटारू वृत्तीच्या भांडवलदार व्यापाऱ्यांना हाताशी धरून आदिवासींची आर्थिक पिळवणूक करू नये.

३.. सावकारी व्यवसाय ताबडतोब बंद करावा. खेडोपाडीच्या आदिवासींना त्यांची गहाण मालमत्ता व चीजवस्तू परत करण्यात यावी.

४.. यापुढे जेंव्हा जेंव्हा नक्षली नेत्यांतर्फे खंडणीची मागणी करण्यात येईल तेंव्हा तेंव्हा ताबडतोब व निमूटपणे ती मागणी पूर्ण करण्यात यावी.

५.. या क्षणापासून मोटरसायकलचा वापर कायमचा बंद करावा. मोटारसायकल हे पोलिसांच्या दडपशाहीचे प्रतीक आहे. या संपूर्ण परिसरात फक्त पोलिसांकडेच मोटारसायकली आहेत. त्यामुळे जो मोटारसायकल वापरत असेल तो पोलीस आहे असे समजून त्याला ताबडतोब ठार मारण्याचे आम्हाला आदेश आहेत.

५.. आजच्या घटनेबद्दल पोलिसांकडे तक्रार करू नये. तसेच पोलिसांचे संरक्षण ही घेऊ नये. तसे केल्यास बॉम्ब टाकून तुमचा हा वाडा उडवून देण्यात येईल.

वरीलप्रमाणे आदेश सुनावून परत जाताना अचानक काहीतरी आठवल्याने तो नक्षल्यांचा चीफ कमांडर पुन्हा के. जनार्दन जवळ आला. शेजारीच उभ्या असलेल्या आदिवासी तरुणाच्या हातातील कोयता हिसकावून घेत के. जनार्दनच्या दोन्ही बाजूंच्या गालांवर तसेच डोक्यावर आणि खाली हनुवटीवर असे चेहऱ्याच्या चार ही बाजूंना त्याने निर्दयपणे सपासप वार केले आणि के. जनार्दनच्या रक्तबंबाळ चेहऱ्याकडे पहात तो म्हणाला..

“यापुढे जेंव्हा जेंव्हा तू आरशात पाहशील तेंव्हा तेंव्हा नक्षली क्रांतिकारकांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे काय परिणाम होतात याची तुला सतत आठवण, जाणीव होत राहील.. तसंच अन्य गावकरीही तुझ्या चेहऱ्यावरील जखमांच्या खुणा बघून आमच्याशी दगाबाजी करण्याचा कधी विचारही मनात आणणार नाहीत..”

नक्षली जंगलात निघून गेल्यानंतर ताबडतोब आदीलाबादच्या सरकारी दवाखान्यात नेऊन जखमी के. जनार्दन वर उपचार करण्यात आले.

सुदैवाने के. जनार्दनचा पंधरा सोळा वर्षांचा एकुलता एक मुलगा त्यावेळी आपल्या आजोळी परभणीला गेला असल्याने त्याच्यावर या भीषण प्रसंगाला सामोरं जाण्याची वेळ आली नाही. चार पाच दिवसांनी एका संध्याकाळी जरा उशिरानंच तो इंद्रवेल्लीला परत आला. झालेल्या प्रकाराबद्दल त्याला काहीच माहिती नव्हती. जखमा पूर्णपणे बऱ्या न झाल्याने के. जनार्दन अद्यापही आदीलाबादच्या दवाखान्यातच होते.

दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून नेहमीच्या सवयीप्रमाणे के. जनार्दनचा तो मुलगा गावाच्या आसपास फेरफटका मारण्यासाठी वडिलांची मोटारसायकल घेऊन गेला.

अवघ्या तासाभरानंतरच के. जनार्दनच्या मुलाचा छिन्नविच्छिन्न मृतदेह इंद्रवेल्लीच्या त्या तात्पुरत्या शहीद स्मृती-स्तंभाच्या पायऱ्यांवर फेकून दिलेला आढळून आला. शेजारीच त्याने नेलेली के. जनार्दनची मोटारसायकल आडवी पाडली होती. त्यावर “याद रहे..! हर कोई, जो नक्सली आदेश का उल्लंघन करेंगा, उसका भी यही हाल होगा..!” असा लाल अक्षरात इशारा लिहिलेला कापडाचा तुकडा अडकवलेला होता.

के. जनार्दन व त्याच्या कुटुंबियांवर या नक्षली कृत्याचा जबरदस्त आघात झाला. एकुल्या एक मुलाच्या मृत्यूमुळे त्यांची अवस्था अक्षरशः वेड्यागत झाली. त्यांनी या घटनेचा एवढा धसका घेतला की आपला इंद्रवेल्लीचा वाडा आणि गावातील जमीन आपल्या नातेवाईकांच्या नावावर करून त्यांनी तडकाफडकी गाव सोडलं. तेंव्हापासून आजतागायत त्यांना या गावात आलेलं कुणीही पाहिलेलं नाही.

हॉटेलवाल्या चिन्नय्याने सांगितलेली के.जनार्दनची करुण कहाणी ऐकल्यावर माझ्या मनात त्याच्याबद्दल अपार सहानुभूती दाटून आली. त्याचबरोबर माझ्या मनात के. जनार्दन बद्दल शंका कुशंकांचा जो गुंता साचला होता तो देखील हळूहळू सुटतोय असं मला वाटू लागलं.

चहा पिऊन झाल्यावर उतनूरला परत जाताना मोटरसायकलला किक मारण्यापूर्वी न राहवून चिन्नय्याला विचारलं..

“के. जनार्दनच्या मुलाचं नाव काय होतं..?”

(क्रमशः ४-क)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

उतनूरचे दिवस-4A-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

tractor-1

Memories-at-Utnoor

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

 

*उतनूरचे दिवस…*

*थरार… (४-अ)*

उतनूर पासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर असलेलं शामपूर हे गाव मुख्य रस्त्याला अगदी लागून वसलेलं होतं. गावातील बराचसा भूभाग हा सपाट, जंगल विरहित व छान मोकळा मोकळा होता. त्यामुळे त्या गावात अनेक पक्की घरं होती तसंच रस्ते, नाल्या, पथ दिवे, पोस्ट ऑफिस अशा त्या परिसरातील अन्य गावात सहसा न आढळणाऱ्या सोयीही त्या गावात होत्या. आसपासच्या खेड्यांतील प्रवाशांनी तेथील बस स्टँड सदैव गजबजलेलं दिसायचं. बस स्टँड जवळच आठवडी बाजारही भरत असे.

उतनूर आदीलाबाद रस्त्यावरील उतनूर पासून दहा किलोमीटर दूर असलेल्या इंद्रवेल्ली गावापर्यंतचा भाग आमच्या शाखेच्या कार्यक्षेत्रात येत होता. इंद्रवेल्ली हे मंडल क्षेत्र (तालुका) असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर बँकेचा बोजा नोंदविण्यासाठी तेथील रेव्हेन्यू कार्यालयात वेळोवेळी जावे लागत असे. इंद्रवेल्लीस जातेवेळी शामपूर गावा वरूनच जावं लागायचं.

तसं पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि ग्रामीण बँकेची शाखा उघडल्यापासून शामपूर गावात आमच्या स्टेट बँकेचा कुठलाही चालू फायनान्स नव्हता. त्यामुळे शामपूर गावात आवर्जून जाण्याचं कधी काम पडलं नाही. तरी देखील तेथील बस स्टँड जवळील ओळीने सलग पंधरा सोळा दुकानं असलेलं एक व्यापारी संकुल जाता येताना नेहमीच लक्ष वेधून घेत असे. “दामोदर बाजार” असं नाव असलेला तो शॉपिंग कॉम्प्लेक्स गावातील कुणा धनाढ्य व्यक्तीचा असावा असाच माझा समज होता. damodar bazaar

गेले काही दिवस आमच्या बँकेत जुनी थकीत कर्जे वसूल करण्याची जोरदार मोहीम सुरू झाली होती. सुदैवाने आमच्या शाखेत अशी जुनी थकीत कर्जे फारशी नव्हती. मात्र बुडीत कर्जाच्या यादीत तब्बल एक लाख चाळीस हजार रुपयांचं एकच मोठं जुनं खातं दिसत होतं. ते ट्रॅक्टर लोन होतं. मी त्या खात्याबद्दल माहिती काढण्यास सुरवात केली. आधी, सुमारे पंधरा वर्षांपूर्वीच्या त्या कर्जखात्याची कागदपत्रे शोधून काढली. इंद्रवेल्ली इथं राहणाऱ्या कुणा “के. जनार्दन” नावाच्या संपन्न शेतकऱ्याने ट्रॅक्टर व ट्रॉली साठी दीड लाख रुपयांचं कर्ज आमच्या बँकेकडून घेतलेलं दिसत होतं.tractor-1

लोन डॉक्युमेंट्स वर कर्जदाराचा जो फोटो होता त्यावरून हा के. जनार्दन म्हणजे कोट, टाय, हॅट परिधान करणारी आणि बिन दाढीमिशांचा गुळगुळीत चेहरा असलेली पक्की सुटाबुटातली शहरी व्यक्ती वाटत होती.

k janardan

त्या व्यक्तीने बँकेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेऊन “मॅसी फर्ग्युसन” कंपनीचा ट्रॅक्टर व ट्रॉली यांची खरेदी केली असल्याचेही कोटेशन व बिलांवरून दिसत होते. प्रामुख्याने शेती तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची आदीलाबादच्या मोंढ्यात वाहतूक करणे हाच कर्जदाराचा मुख्य व्यवसाय होता. इंद्रवेल्ली व आसपासच्या गावात असलेली आपली पंचावन्न एकर जमीन या कर्जासाठी त्याने बँकेला तारण दिली होती. कर्ज कागदपत्रांच्या फाईल वर मोठ्या लाल अक्षरात “Borrower absconding” असं लिहिलेलं होतं.

इंस्पेक्शन रजिस्टर वरील नोंदी नुसार असं दिसतं होतं की कर्ज घेतल्या नंतर अवघ्या दोनच महिन्यांनी कर्जदार इंद्रवेल्ली गाव सोडून अन्य कुठेतरी निघून गेला होता. बँकेत उपलब्ध कागदपत्रांवरून कर्जदाराची फारशी माहिती न मिळाल्याने आता शाखेतील कर्मचाऱ्यांकडूनच काही माहिती मिळते का ते पहावे असा विचार केला. दुर्दैवाने उतनूर शाखेतील एक जुना हेड गार्ड वगळता अन्य शाखेतील सर्वच कर्मचारी फार तर चार पाच वर्षं इतकेच जुने होते. त्यांना कुणालाच या “के.जनार्दन” बद्दल कसलीही माहिती नव्हती.

हेड गार्ड सूर्यपाल स्वामी येत्या सहा महिन्यांतच सेवानिवृत्त होणार होता. त्याला ट्रॅक्टर लोन वाल्या के. जनार्दन बद्दल काहीतरी अंधुकसं आठवत होतं. ट्रॅक्टर घेतल्या घेतल्या या के. जनार्दन वर कुठलं तरी जबरदस्त संकट ओढवलं, त्यात त्याच्या आयुष्याची ट्रॅजेडी झाली आणि त्यानंतर हा कर्जदार ट्रॅक्टर सहित बेपत्ता झाला होता. चार पाच वर्षे वाट पाहून बँकेने ते कर्ज खाते प्रतिवादीत कर्जे खात्यास (Protested Bills A/c) वर्ग केलं होतं.

खूप प्रयत्न करूनही या के. जनार्दन चा सध्याचा ठावठिकाणा कोणता आहे ? या बद्दल पत्ता लागू शकला नाही. बँकेकडे तारण असलेल्या जमिनीच्या कागदपत्रांवरून वेगवेगळ्या गावांमध्ये या के.जनार्दन च्या नावाने सुमारे पंचावन्न एकर एवढी जमीन असल्याचे दिसत होते. त्यापैकी पंधरा एकर जमीन इंद्रवेल्ली गावात असल्याने तसेच कर्जदाराचा पत्ताही इंद्रवेल्ली गावातीलच दिला असल्याने मी प्रथम इंद्रवेल्ली गावात जाऊन दिलेल्या पत्त्याच्या ठिकाणी चौकशी केली. तेंव्हा, खूप वर्षांपूर्वीच आपले इंद्रवेल्लीचे राहते घर व शेती विकून के. जनार्दन आदीलाबाद येथे शिफ्ट झाल्याचे तेथील रहिवाशांकडून समजले.

बँकेकडे तारण असलेली जमीन कर्जदाराने परस्पर कशी काय विकली ? याबद्दल आश्चर्य वाटलं आणि मनस्वी चीडही आली. के. जनार्दनचं जमिनीचं “पट्टा पासबुक” घेऊन मी इंद्रवेल्ली मंडल रेव्हेन्यू ऑफिसर (MRO) कडे जाऊन धडकलो. मात्र तिथल्या लॅंड रेकॉर्ड मध्ये या के. जनार्दनच्या जमिनीवर आमच्या बँकेच्या कुठल्याही बोजाची नोंदच नव्हती. “निदान आता तरी उर्वरित जमिनीवर बँकेचा बोजा नोंदवा..” असा कार्यालयात अर्ज दिला. त्यावर “तुम्ही दहा दिवसांनी भेटा..” असं संबंधित अधिकारी म्हणाला. तिथल्या अनागोंदी कारभारावर चरफडतच निराश मनानं उतनूरला परतलो.

एरवी सदैव माझ्या सोबत राहणारा माझा वाटाड्या, माझा दुभाषी.. प्युन रमेश हा आजारी पडल्यामुळे गेले काही दिवस बँकेत गैरहजर होता. बेपत्ता के. जनार्दन चा शोध लावण्यात त्याची नक्कीच मदत होईल असा माझा विश्वास होता. त्यामुळे तो कामावर पुन्हा रुजू होण्याची मी आतुरतेनं वाट पहात होतो. अखेरीस तब्बल वीस दिवसांची विश्रांती घेऊन ताजातवाना होऊन रमेश ड्युटीवर हजर होताच अधिरपणे त्याला ट्रॅक्टर लोन वाल्या के. जनार्दन बद्दल विचारलं.

“के. जनार्दन..? ट्रॅक्टर लोन..?”

स्मरणशक्तीला ताण देत नकारार्थी मान हलवीत रमेश म्हणाला.. “नही साब.. पिछले आठ सालोंमें आज तक किसी भी मैनेजर ने या फिल्ड ऑफिसरने इस नाम के किसी भी आदमी का कभी जिक्र नही किया..”

रमेशचं हे उत्तर ऐकून माझा अपेक्षाभंग झाला. माझ्या खिन्न चेहऱ्याकडे पहात रमेश म्हणाला..

“लेकिन.. एक दूसरे “जनार्दन” को मै अच्छी तरह जानता हूं.. यहां पास ही में.. शामपुर में रहता है.. बहुत खतरनाक आदमी है.. गांव में किसी से मेलजोल नही रखता.. बात भी कम करता है.. सब लोग डरते है उस से.. हो सकता है, अन्ना (नक्षली) लोगोंका आदमी हो.. या वो खुद ही कोई शरण आकर सुधरा हुआ रिटायर्ड नक्सली अन्ना हो.. पता नही..”

रमेशचं या जनार्दन बद्दल चांगलं मत दिसत नव्हतं. तरी देखील आणखी एक प्रयत्न करून पहावा म्हणून रमेशला विचारलं..

“क्या हम मिल सकते है इस शामपुर वाले जनार्दन से ? शायद उसे के. जनार्दन के बारेमे कुछ मालूमात हो..”

काहीशा अनिच्छेनंच खोल उसासा सोडत रमेश म्हणाला..

“ठीक है..! आप कहते है तो आज ही शाम को मिलेंगे उन से..! वैसे भी अपने जनरेटर का पेट्रोल खतम होने को आया है.. नागापुर पेट्रोल बंक पर भी स्टॉक नही है.. अब तो शामपुर से ही पेट्रोल लाना पड़ेगा..”

संध्याकाळी पेट्रोलच्या रिकाम्या कॅन घेऊन आम्ही शामपुर कडे निघालो. “दामोदर बाजार” कॉम्प्लेक्स जवळ येताच रमेशने त्या ओळीनं बांधलेल्या पंधरा सोळा दुकानांच्या मधोमध असलेल्या एका अरुंद बोळीत गाडी घातली. कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस एक जुनाट, दगडी, प्रशस्त वाडा होता. रमेशने त्या वाड्याच्या भक्कम लाकडी दरवाजाची कडी वाजवली.

“कोण..?”

आतून तेलगू भाषेत करड्या आवाजात विचारणा झाली..

“मी.. रमेश.. स्टेट बँक..”

रमेशनं थोडक्यात आपला परिचय दिला. थोड्या वेळानं एका गंभीर, करारी मुद्रेच्या उंच माणसानं दार उघडलं. धारदार नाक, कपाळाला लाल-काळा गंध बुक्का, डोक्यावर कडक इस्त्रीची टोकदार पांढरी गांधी टोपी, किंचित मग्रूर, तुसडी, क्रूर नजर, पांढरं शुभ्र धोतर आणि टेरिलीनचा चमचमता व्हाईट ओपन शर्ट अशा वर्णनाची ती व्यक्ती एखाद्या राजकीय पुढाऱ्या सारखी दिसत होती. लांब, गालापर्यंत वाढलेले केसांचे दाट कल्ले, तलवार कट टोकदार मिशा आणि फक्त हनुवटी पुरतीच ठेवलेली छोटीशी फ्रेंच कट दाढी त्या व्यक्तीच्या एकंदर ग्रामीण पेहरावाला किंचित विसंगत वाटत असली तरी त्या लांब कल्ले व दाढी मिशांमुळेच ते व्यक्तिमत्व अधिकच गूढ, करारी भासत होते. image of janardan

त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील “काय काम आहे..?” अर्थाचे त्रासिक, प्रश्नार्थक भाव पाहून रमेश माझ्याकडे बोट दाखवत तेलगू भाषेत लगबगीनं म्हणाला..

“हे आमच्या बँकेचे नवीन फिल्ड ऑफिसर साहेब.. महाराष्ट्रातून आले आहेत.. त्यांना तुमच्याकडून काही माहिती हवी आहे..”

मला आपादमस्तक न्याहाळून झाल्यावर मागे वळत तो धोतर टोपीधारी गृहस्थ तेलगू भाषेतच म्हणाला..

“आत या..!”

आम्हाला दिवाणखान्यात बसवून तो गृहस्थ आत निघून गेला. जुनाट लाकडी माळवदाचं छत असलेल्या त्या दिवाणखान्यात लावलेल्या यशवंतराव चव्हाण आणि वसंतराव नाईक यांच्या काचेच्या फ्रेम मधील मोठ्या आकाराच्या फोटोंनी माझं लक्ष वेधून घेतलं. शेजारीच पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री यांची ही छायाचित्रे टांगली होती. एका कोनाड्यात विठ्ठल रखुमाईंच्या मूर्ती ठेवलेल्या होत्या. त्या मूर्तींसमोर एक निरंजन तेवत होतं. कोनाड्याच्या वरती भरजरी पोशाखातील अंदाजे चौदा पंधरा वर्षाच्या मुलाचा ऐटीत खुर्चीत बसलेला फोटो होता. त्या फोटोला नुकताच ताज्या फुलांचा हार घातलेला दिसत होता. फोटो शेजारी लावलेल्या उदबत्तीचा मंद सुगंध दिवाणखान्यात दरवळत होता.

“हे नक्कीच कुणा मराठी माणसाचं घर असलं पाहिजे..!” मी मनातल्या मनात अंदाज बांधला.

इतक्यात डोक्यावर पदर घेतलेली अस्सल मराठमोळ्या पद्धतीचं लुगडं नेसलेली एक घरंदाज सोज्वळ स्त्री हातात तांब्या भांडं घेऊन दिवाणखान्यात आली. तिचा चेहरा उदास वाटत होता. आम्हाला पाणी देऊन काही न बोलता ती आत निघून गेली. ती गेल्यावर जनार्दन भाऊ तेलगू भाषेत म्हणाले..

“हं.. बोला..! कसली माहिती हवी आहे तुम्हाला..?”

त्यावर नीट सरसावून बसत रमेश म्हणाला..

“के. जनार्दन या नावाच्या इंद्रवेल्ली इथं राहणाऱ्या कुणा माणसाला तुम्ही ओळखता का ? खूप वर्षांपूर्वी आमच्या बँकेकडून त्या माणसानं ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्ज घेतलं होतं. अजूनही ते कर्ज तसंच बाकी आहे आणि तो माणूस इंद्रवेल्ली गाव सोडून कुठेतरी दुसरीकडे निघून गेला आहे..”

रमेशने एका दमात सर्व सांगून टाकलं. जनार्दन भाऊंनी काही तरी आठवायचा प्रयत्न केला. डोकं खाजवीत ते म्हणाले..

“के. जनार्दन..? इंद्रवेल्ली..? अं..हं..! मी तर पहिल्यांदाच हे नाव ऐकतोय..”

नंतर थोडा वेळ खाली मान घालून हनुवटी वरील मुठभर दाढीचा पुंजका कुरवाळीत ते विचार करत बसले. मग नकारार्थी मान हलवत ठामपणे ते म्हणाले..

“नाही..! या नावाच्या कोणत्याही व्यक्तीबद्दल मला कसलीही माहिती नाही..! मी इथे शामपुरला आठ वर्षांपूर्वी आलो. त्यापूर्वी बरीच वर्षं मी आदिलाबाद इथं होतो. इंद्रवेल्ली गावात जायचं कधीच काही काम पडत नसल्यामुळे तेथील रहिवाशांबद्दल मला फारशी माहिती नाही..”

तोपर्यंत आतून आमच्यासाठी चहा आला होता. चहा पिऊन जनार्दन भाऊंचे आभार मानून आम्ही निघालो. परत जाताना वाटेत रमेश म्हणाला..

“हा जनार्दन खूप खडूस माणूस आहे. गेली पाच वर्षे मी ह्याच्याच दुकानातून बँकेच्या मोटारसायकल साठी व जनरेटर साठी भरपूर पेट्रोल खरेदी करतोय. मात्र पूर्वी एकदा आदीलाबादहून उतनूरला येतेवेळी रात्रीच्या वेळी माझी गाडी शामपुर जवळ बंद पडली होती. त्यावेळी मी या जनार्दनला त्याची मोटार सायकल फक्त रात्रीपुरती मागितली होती. एवढी ओळख असून आणि वारंवार विनंती करूनही जनार्दनने मला गाडी देण्यास त्यावेळी स्पष्ट नकार दिला होता. तेंव्हा पासून हा जनार्दन माझ्या मनातून साफ उतरलाय. तुम्हाला कसा वाटला हा माणूस..?”

“मला, हा माणूस आपल्यापासून काही तरी लपवतोय असंच जाणवत होतं..” मी म्हणालो.

“कशावरून..?” रमेशने आश्चर्यानं विचारलं.

“एक तर हा माणूस त्याच्या व त्याच्या पत्नीच्या पेहरावा वरून तसंच त्याच्या घराच्या ठेवणी वरून पक्का मराठी माणूस वाटत होता. मी महाराष्ट्रातील आहे हे कळूनही त्याने माझ्याशी मराठी बोलणं कटाक्षानं टाळलं. आपलं सर्व संभाषण तेलगू भाषेतच झालं. तेंव्हाच मला संशय आला..”

माझं हे बोलणं रमेशला अजिबात पटलं नाही. “धोतर, लुगडं हा इथलाच पेहराव आहे आणि विठ्ठल रखुमाई हे आंध्र व कर्नाटकाच्या सीमेवरील बहुसंख्य लोकांचे दैवत असल्यामुळे त्यांच्या मूर्ती, फोटो येथील घरोघरी आढळतात.. ” असे तो म्हणाला. आदीलाबाद जिल्ह्याच्या सीमेवरील बरीच गावे पूर्वी महाराष्ट्रात होती. त्यामुळे येथील अनेक जुन्या घरांत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांची छायाचित्रे दिसून येतात, अशीही माहिती त्याने पुरवली.

दहा दिवसांनंतर वेळात वेळ काढून सकाळी एकटाच इंद्रवेल्लीच्या मंडल रेव्हेन्यू ऑफिस मध्ये गेलो आणि के. जनार्दनच्या जमिनीवर बँकेचा बोजा (चार्ज) नोंदविला की नाही याची चौकशी केली. त्यावर तेथील संबंधित कर्मचारी म्हणाला..

“गेल्या आठवड्यातच के. जनार्दन स्वतःच इथे आले होते. आपण कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतले नसून स्टेट बँकेचा काहीतरी गैरसमज झाला आहे असे ते म्हणाले. जमिनीवर बोजा नोंदविण्यास त्यांनी विरोध दर्शवला आणि तसे लेखी पत्रही त्यांनी आमच्या ऑफिसला दिले आहे.”

हा के. जनार्दन भलताच चलाख दिसत होता. MRO ऑफिसच्या कर्मचाऱ्यांना देखील त्याने पटवलं असावं. MRO ऑफिसला दिलेल्या पत्रावर कुठेही त्याने आपला पत्ता किंवा फोन नंबर दिलेला नव्हता. मात्र हा के. जनार्दन जवळपासच कुठेतरी रहात असावा आणि इंद्रवेल्ली गावातील लोक त्याच्या नियमित संपर्कात असावेत हा माझा संशय आता पक्का झाला. निराश होऊन इंद्रवेल्लीहून परततांना शामपुर जवळ आल्यावर अचानक काहीतरी मनात आलं आणि “दामोदर बाजार” जवळ मी मोटरसायकल उभी केली. तेथून पायीच जात जनार्दन भाऊंच्या वाड्यासमोर उभा राहून दाराची कडी वाजवली.

“यवरू..?” (कोण ?) अशी आतून बायकी आवाजात तेलगू भाषेत विचारणा झाली.

“मी.. गंगाराम ! नागापूर पेट्रोल बंक वाला.. जनार्दन भाऊ आहेत का ?”

मी विचारपूर्वक आणि आवर्जून “मराठी” भाषेत धडधडीत खोटं बोललो. जवळच्या नागापूर पेट्रोल बंक वर गंगाराम नावाचा एक मराठी बोलणारा कर्मचारी असल्याचे मला माहिती होते. या गंगाराम कडूनच जनार्दन भाऊ किरकोळ विक्रीसाठी पेट्रोलचे बॅरल मागवीत असत.

काही क्षण आतून काहीच प्रत्युत्तर मिळालं नाही. बहुदा आतील स्त्रीला काहीतरी संशय आला असावा. थोड्यावेळाने ती स्त्री “मराठीत” म्हणाली..

“ते परगावी गेलेत. दुपारी चार पर्यंत परत येतील..”

माझं काम झालं होतं. मी फेकलेला खडा अचूक लागला होता. हे घर मराठी माणसाचं असल्याचा माझा अंदाज खरा ठरला होता.

“ठीक आहे.. मी पाच वाजता येतो..”

असं बोलून मागं फिरून झपाझप पावलं टाकीत मी बाहेर ठेवलेल्या मोटारसायकल जवळ आलो. मी मागं फिरल्यावर आतील स्त्री ने दरवाजा उघडल्याच्या आवाज माझ्या कानावर पडला. कदाचित मी गंगारामच आहे किंवा नाही याची तिला खात्री करून घ्यायची असावी.

दुपारी पाच वाजता पुन्हा जनार्दन भाऊंच्या घरी गेलो. स्वतः जनार्दन भाऊंनीच दार उघडलं आणि मला पाहतांच मराठीत “या..!” असं म्हणाले. आम्ही दिवाणखान्यात जाऊन बसल्यावर मी म्हणालो..

“काही पत्ता लागला का त्या के. जनार्दन नावाच्या माणसाचा..?”

“नाही..! मात्र काही वर्षांपूर्वी इंद्रवेल्लीची जमीन व घर विकून ते कुटुंबासह आदीलाबादला गेले एवढं समजलं. तुम्ही आदीलाबादला जाऊन चौकशी केली तर कदाचित त्यांचा काहीतरी ठावठिकाणा कळू शकेल..”

एवढं बोलून माझ्याकडे रोखून पहात ते म्हणाले..

“सकाळी ‘नागापूरचा गंगाराम’ असं नाव सांगून तुम्हीच घरी आला होतात ना ? हा गंगाराम तोतरा असून किंचित अडखळत बोलतो. त्यामुळे तुम्ही गंगाराम नाहीत, हे माझ्या बायकोने लगेच ओळखलं होतं. तुम्ही असं खोटं का बोललात ?”

जनार्दन भाऊंनी विचारलेल्या या थेट प्रश्नाने मी गडबडून गेलो. खोटं बोलल्याबद्दल ते मला असा आमने सामने रोखठोकपणे जाब विचारतील याची मी कल्पनाच केलेली नव्हती. आता काय उत्तर द्यावे हे क्षणभर मला सुचेचना.. कसंबसं स्वतःला सावरून घेत कसंनुसं हसत म्हणालो..

“गेल्या वेळी प्युन रमेश सोबत तुमच्याकडे आलो होतो तेंव्हा, मी महाराष्ट्रातून आल्याचं कळूनही तुम्ही आमच्याशी कटाक्षानं तेलगू भाषेतच बोललात. तुम्ही घरी मराठीच बोलत असावात असा माझा अंदाज होता. केवळ त्याची खातरजमा करण्यासाठीच तुमच्या पत्नीशी आज सकाळी मी खोटं बोललो. त्यात माझा अन्य कोणताही वाईट, विपरीत हेतू नव्हता..”

माझ्या ह्या उत्तराने जनार्दन भाऊंचं अजिबात समाधान झालं नाही. रागानं तीक्ष्ण स्वरात ते म्हणाले..

“कुणाशी कोणत्या भाषेत बोलावं हा सर्वस्वी माझ्या मर्जीचा प्रश्न आहे. आणि, मी मराठी आहे किंवा नाही, हे तुम्ही खुद्द मला सरळ सरळ विचारू शकला असतात. त्यासाठी माझ्या घरच्यांशी असं खोटं बोलायची गरज नव्हती. मला हे मुळीच आवडलेलं नाही. माझी पत्नी हळव्या स्वभावाची असून हार्ट पेशंट आहे. त्यातून आधीच ती खूप दुःखी आहे. तुमच्या असं खोटं बोलण्यामुळे तिच्या मनात नाना शंका कुशंका येऊन ती घाबरून गेली आहे. तुमच्यासारख्या नवख्या, अनोळखी माणसाकडून यापुढे असलं कुठलं ही पोरकट, बेजबाबदार गैरकृत्य मी खपवून घेणार नाही..”

त्वेषानं बोलता बोलता जनार्दन भाऊंच्या नाकपुड्या संतापानं थरथरू लागल्या. अपराध्यासारखा खाली मान घालून मी निमूटपणे त्यांचे निर्भत्सनेचे कठोर बोल ऐकून घेत होतो. एवढ्यात बाहेरून कुणीतरी जनार्दन भाऊंना हाक मारली आणि त्या व्यक्तीशी बोलण्यासाठी भाऊ वाड्याबाहेर गेले. थोडावेळ अस्वस्थपणे चुळबुळत मी जागीच बसून राहिलो आणि नंतर वेळ घालवण्यासाठी दिवाणखान्यात लावलेले भाऊंचे जुने फॅमिली फोटो पाहू लागलो.

थोड्यावेळाने जनार्दन भाऊ वाड्यात परत आल्यावर त्यांच्या नजरेला नजर न देता त्यांचा निरोप घेऊन एखाद्या चोरासारखा, खाल मानेनं वाड्यातून बाहेर पडलो.

(क्रमशः 4-ब)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.