https://goodworld.in A website by Madhav Bhope

दुधाचे कर्ज Feeding the hungry child

sleeping baby 1

यापूर्वी आपण श्री अजय कोटणीस यांचे अनेक लेख वाचले आहेत. पण खालील आठवण ही त्यांची  अर्धांगिनी सौ. निरुपमा कोटणीस यांची एक अत्यंत हृद्य आठवण असून, यापूर्वी ती जेंव्हा फेसबुकवर प्रकाशित केली होती, त्यावेळी आणि त्यानंतर खूप लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता,  त्यात नुसतीच एक आठवण नाही, तर समाजातील एक मोठी गरज असलेल्या गोष्टीबद्दल त्यांनी सर्व समाजाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. 

*दुधाचं कर्ज*

लेखिका- सौ. निरुपमा कोटणीस 

त्यावेळी आमची बदली बुलढाण्या जवळील पारध या गावी झाली होती, म्हणून आम्ही बुलढाण्यालाच घर केले होते. माझा मोठा मुलगा अनिश पहील्या वर्गात होता अन् छोटा अथर्व दोन महिन्यांचा होता.

माझे माहेर ही बुलढाणाच असून तेंव्हा माझी आई व माझा मोठा भाऊ तिथे सहकुटुंब राहायचे.

1998…जानेवारी महिन्यातला पहिला आठवडा होता. माझ्या आईची तब्येत बरी नसल्याने दादाने ..माझ्या भावाने बुलढाण्यातील प्रसिद्ध डॉक्टर दीपक लध्दड यांची अपॉईंटमेंट घेतली होती. सकाळी दहा वाजता आईला घेऊन दवाखान्यात जायचे होते.

ठरल्याप्रमाणे दादा आईला घेऊन सकाळी माझ्या घरी आला आणि “मी तुझ्या बाळा जवळ थांबतो. तू आईला घेऊन डॉक्टर कडे जा” म्हणाला.

मी सर्व आवरून लगेच आईला घेऊन दवाखान्यात गेले. सिस्टरने “डॉक्टर अर्ध्या तासात येतील, तोपर्यंत बसा !” म्हणून सांगितलं. आम्ही दोघी तिथल्या बाकड्यावर बोलत बसलो होतो. कुठूनतरी बाळाच्या रडण्याचा आर्त आवाज येत होता…कोण आणि कां रडतंय हा प्रश्न पडताच उत्तर मिळालं.1024px CCBRT Disability Hospital waiting room 1 10679012155

…समोरून एक माणूस एका बाळाला घेऊन येताना दिसला. धोतराच्या दुहेरी कापडात उघडेबंब बाळ जिवाच्या आकांताने जोरजोरात रडत होते.crying baby आमच्या दोघींचे हृदय त्याच्या रडण्याने पिळवटून निघत होते. त्यावेळी सकाळचे दहा वाजले होते तरी थंडीचे दिवस असल्याने हवेत गारठा होता.आणि त्यातून हे बाळ असं उघडं…

तो माणूस बाळाला घेऊन आमच्या जवळून जायला लागला. बाळाचे रडणे न ऐकवून मी त्या माणसाला थांबवून म्हणाले…

“अहो भाऊ (विदर्भात अनोळखी व्यक्तीला भाऊ,ताई, बाई, दादा असे बोलतात) त्या बाळाला नीट कपड्यात गुंडाळून घ्या ना….थंडी वाजतेय त्याला.”MNI india man

तो माणूस कुठल्या तरी खेड्यातला होता. तो बोलला..

“बाई, हे कपडाच ठेवत नाहीये अंगावर.”

मी म्हणाले…

“द्या इकडे… मी व्यवस्थित गुंडाळून देते…”

असे म्हणून मी हात पुढे केला…आणि त्या चिमुकल्या बाळाला जवळ घेऊन कपड्यात गुंडाळायला लागले…..तर ते बाळ रडता रडता माझ्या छातीशी तोंड करून दुधाची वाट बघू लागले. मी त्या माणसाला म्हणाले..

“भाऊ, याला खूप भूक लागलीय… त्याच्या आईकडे न्या आधी. बाळ भुकेने कळवळतंय…”images 20

त्यावर हताशपणे तो माणूस म्हणाला

“बाई, त्याची आई टीबी हॉस्पिटलमध्ये मध्ये ऍडमिट आहे. तिला टीबी असल्याने बाळाला वरचे दूध सुरू आहे आणि आम्ही रस्त्यावरच चूल पेटवून दूध गरम करून पाजतो त्याला. त्यामुळे त्यालाही ते इन्फेक्शन का काय म्हणतात, ..ते झाले आहे…म्हणून त्याच्या टेस्ट करायला बोलावले होते..”

बाळाचे रडून रडून बारीक झालेले लुकलुकणारे डोळे मला काहीतरी मागत होते…थरथरणारे सुकलेले गुलाबी ओठ काहीतरी शोधत होते. त्याची व्याकुळता मला हतबल करत होती. माझ्यातलं मातृत्व जागं होतंच. लहानपणापासूनची परोपकाराची शिकवण मला स्वस्थ बसू देईना.

शेवटी न राहवून आईला हळूच विचारलं..

“आई, ह्याला दूध पाजू का गं ? मला या बाळाची भूक बघवत नाही…”

आई म्हणाली… “एक मिनिट थांब !

आणि आईने थोडे बाजूला जाऊन त्या माणसाला विचारलं..

“ही माझी मुलगी आहे. तिचे दोन महिन्यांचे बाळ घरी आहे. …तुमच्या बाळाची भूक तिला बघवत नाही. तुम्ही हो म्हणत असाल तर ती आपलं दूध पाजेल बाळाला….”

त्या गृहस्थाने अक्षरशः माझ्या आईचे पाय धरले.

“बाई, कोण म्हणतं हो देव नाही. मला काय करावं काहीच समजत नव्हतं. तुम्ही देवासारखे भेटले.”

असं म्हणत त्यांनं आनंदानं होकार दिला. डॉक्टर दिपक लद्धड शालेय जीवनात आमचे शेजारी असल्याने मी व आई हक्काने सिस्टरला सांगून बाळाला घेऊन डॉक्टरच्या केबिनमध्ये गेलो.a2ae359379334d589a7175eeb1ec34c4 इतका वेळ बाळाच्या रडण्याने हॉस्पिटलमध्ये होत असलेला आक्रोश, गडबड गोंधळ आता थांबला होता. अत्यंत शांतपणे बाळाला स्तनपानाचा कार्यक्रम झाला. बाळाचे पोट यथेच्छ भरले होते. आणि ते शांतपणे माझ्या कुशीत झोपले होते.sleeping baby तशा अवस्थेतच मी त्याला व्यवस्थित गुंडाळून त्या व्यक्तीच्या हवाली केले.

आमचे खूप खूप आभार मानून तो माणूस निघून गेला. नंतर पाच दहा मिनिटातच डॉक्टर आले. आईचे चेक अप झाले. डॉक्टरांनी औषधी लिहून दिली आणि आम्ही घरी परत आलो.

घरी यायला आम्हाला जरा उशीरच झाला होता. दादाने कारण विचारल्यावर आईने त्याला झालेला प्रकार सांगितला. त्यावर त्याने माझ्याकडे पाहून हात जोडले.

“खरंच निरु, यापुढे तू देवाला हात जोडले नाहीस तरी चालेल गं…! देव तुझ्यावर जाम खुश झाला असणार. त्याची कृपा कायम तुझ्यावर राहील.”

असं म्हणून मला तोंड भरून आशिर्वाद देऊन, चहा घेऊन दादा ऑफिसला निघून गेला.

त्या बाळाचे इन्फेक्शन माझ्या बाळाला लागू नये म्हणून मी डेटॉलने वॉश घेऊन माझ्या बाळा जवळ गेले. माझे बाळ शांतपणे झोपले होते. मी मनाशी विचार केला… “बरं झालं ! बाळ झोपलंय तोवर आपण पटकन स्वयंपाक करून घेऊ.”

स्वयंपाक झाला. अनिश शाळेतून आला होता, त्याचे आवरणे झाले. आमची जेवणेही झाली. .. तरी बाळ उठेना. शेवटी चार वाजता, न राहवून मी त्याला हलवून उठवण्याचा प्रयत्न केला. पण त्याची झोप उघडत नव्हती. तो परत तासभर झोपला. आणि नंतर खेळू लागला. आज माझ्या बाळाला भूक पण लागली नव्हती.

आई म्हणाली…

“बघ निरू, आज दवाखान्यात तू त्या बाळाचे पोट भरलेस, तर इकडे देवाने तुझ्या बाळाचेही पोट भरले. पाहिलंस, आज अथर्व प्यायला देखील उठला नाही.”

आमचं दुपार नंतरचं चहापाणी झाल्यावर आणि घरातली कामं आवरल्यावर माझ्या डोळ्यापुढे दवाखान्यातलं ते बाळ दिसायला लागलं. आता संध्याकाळी त्याच कसं होईल ही चिंता वाटत होती. सकाळचा प्रसंग असा झटकन घडून गेला की त्या माणसाचे नाव, गाव, पत्ता काहीच विचारलं गेलं नाही. मनाला त्या बाळाच्या भुकेची काळजी वाटून सारखी चुटपुट लागून राहिली.

दुसऱ्या दिवशी मी दादाला त्या बाळाबद्दल चौकशी करण्यासाठी दवाखान्यात पाठवलं. पण त्याचा काहीच पत्ता लागला नाही. टीबी हॉस्पिटल मध्येही ते कुटुंब नव्हतं.

एक खंत उगीच लागून राहिली होती की त्याच वेळी त्यांची नीट चौकशी करून त्या बाळाची आई बरी होई पर्यंत काही दिवस तरी मी त्याला सांभाळायला हवं होतं.

आजही मला त्या अश्राप, दुर्दैवी बाळाचे नाव, गाव, जात, पत्ता काहीच माहित नाही. एक रुख रूख मात्र मनात सदैव घर करून राहिली आहे. त्याचवेळी त्याची व्यवस्थित चौकशी करायला हवी होती म्हणून.

….बहुदा त्या बाळाचं गेल्याजन्मीचं दुधाचं कर्ज फिटलं असेल एवढंच म्हणेन…!!

माझ्या कौतुकासाठी मी ही पोस्ट लिहिली नाही. पण समाजात ज्या महिलांना शक्य असेल त्यांनी अशा प्रकारे अमृतदान दिल्यास भुकेल्या गरजू बाळाची गरज भागवली जाते. आणि स्वतःला खूप समाधान मिळते. याचा प्रत्यय घ्यावा. यात काहीही वावगे नाही. हे दान आपण इच्छा असूनही *नेहमी* करू शकत नाही. त्यामुळे जेंव्हा शक्य असेल तेंव्हा हे अमृतपान नक्की करा…त्यातच आपलं खरं सौंदर्य (ब्युटी) आहे. स्त्री असल्याचा मला *अभिमान* आहे आणि सर्व स्त्रियांनी तो बाळगावा !!

लेखिका  परिचय- सौ. निरुपमा अजय कोटणीस या श्री अजय कोटणीस( निवृत्त मॅनेजर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद ) यांच्या सुविद्य पत्नी होत. तसेच त्यांनी बुलडाणा अर्बन मध्ये व्यवस्थापक या पदावर नोकरी केलेली आहे. 28619093 1638096782933090 4565405443919362790 o

चष्मे बुलबुल Chashme Bulbul

chasme bulbul

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

आठव्या वर्गात खूप नवीन मुलं वर्गात आली. विशेषतः ज्या लहान गावात सातवी पर्यंतच शाळा असते तिथल्या मुलांना पुढील शिक्षणाकरता नाईलाजानं शहरात यावंच लागायचं. विलास लोहोटे हा असाच अकोल्याजवळच्या म्हैसांग गावातून आलेला एक विद्यार्थी. डोळ्यांना जाड भिंगाचा जुनाट पद्धतीचा चष्मा, अंगात खेड्यातील शिंप्याकडून शिवून घेतलेला चुरगळलेला ढगळ शर्ट,  प्रथमच शहरात आल्यानं चेहऱ्यावर नवखेपणाचे, बावरल्याचे भाव आणि वर्गात इकडे तिकडे नवलाईने पाहणारे भिरभिरते डोळे. वर्गातील जुन्या, खोडकर  मुलांच्या सराईत, कावेबाज नजरा साहजिकच या खेडवळ मुलाचं बारकाईने धूर्त निरीक्षण करू लागल्या. लवकरच हा भोळा भाबडा जीव वर्गातील मुलांच्या चेष्टेचा विषय झाला. आपल्या अगदी लहान सहान… प्रसंगी पोरकट वाटणाऱ्या सर्व शंका कुशंका तो निःसंकोचपणे, मुलांच्या कुत्सित हसण्याकडे लक्ष न देता आपल्या खणखणीत आवाजात शिक्षकांना विचारायचा. त्याचा निरागस बावळटपणा पाहून शिक्षकांनाही हसू आवरत नसे. आणि त्याची चेष्टा करण्याचा मोह कधी कधी त्यांनाही होत असे.

 

पीजी जोशी सर त्यावेळी आम्हाला विज्ञान विषय शिकवीत. आपल्या विनोदी वृत्तीला अनुसरून वर्गातील प्रत्येकच विद्यार्थ्याला ते विविध मजेशीर टोपण नावाने हाक मारायचे. लोहोटेला चष्मा असल्याने त्याला कधी “ढापण”, कधी “कंदील”, तर कधी “बुलबुल” या नावाने बोलवायचे.DIikHPKV4AAbjF0 696x522 1

 

एके दिवशी पीजी सरांचा पिरियड असताना सरांचं शिकवून संपल्यावर थोडा मोकळा वेळ होता. डोळ्यांवर ताण आल्याने चष्मा काढून बाकावर ठेवून लोहोटे डोळ्यांची उघडझाप करीत शांत बसला होता. त्याला पाहून पीजी सरांना त्याची फिरकी घेण्याची लहर आली. त्यांनी त्याच्याकडे पहात मोठ्या आवाजात हाक मारली..”अहो, चष्मे बुलबुल “…. सरांनी आपल्यालाच हाक मारली आहे हे लक्षात येताच लोहोटे गडबडीनेच  जागेवर उभा राहिला. उभं राहता राहता घाईघाईने टेबलावरचा चष्मा हातात घेतला आणि घालण्यापूर्वी  तो नीट पुसून घ्यावा म्हणून शर्टाच्या टोकाने चष्मा स्वच्छ करू लागला. त्याचवेळी पीजी सरांनी पुन्हा हाक मारली “कंदील राव…काय करताय ? ” …… हातातला चष्मा उंच करून सरांना दाखवित लोहोटे म्हणाला “कंदिलाची काच साफ करतोय, सर ! “….main qimg 1571a1f160a57d06b526843c007831c2 lq हे ऐकताच वर्गातील सर्व मुलांनी मनमुराद हसत लोहोटेच्या निर्भय विनोदबुद्धीला प्रचंड प्रतिसाद दिला.  पीजी सर ही क्षणभर चपापले. मनातल्या मनात त्यांनीही लोहोटेच्या हजरजबाबीपणाला निश्चितच दाद दिली असेल.

 

…..त्या प्रसंगानंतर पीजी सरांनी लोहोटेची चष्म्यावरून कधीच चेष्टा केली नाही….

 

😃😃😃😃😃

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.

ते फेसबुकवर  नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.

असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने  प्रकाशित करीत आहोत.

चुन्याची डब्बी

chuna dabbi 500x500 1

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*चुन्याची डबी*

 

1985 साली मी स्टेट बँकेच्या जुना जालना शाखेत काम करत असतानाची गोष्ट. मी कर्ज विभागात काम करीत होतो आणि त्याच बरोबर कर्मचारी संघटनेचा स्थानिक पदाधिकारी सुद्धा होतो. त्यावेळी शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना शेतीला पूरक जोडधंदा करता यावा म्हणून शेळ्या खरेदी करण्यासाठी बँकेतर्फे सरकारी योजनेअंतर्गत कर्ज उपलब्ध करून दिलं जायचं. सर्व सरकारी योजनांप्रमाणेच याही योजनेत स्थानिक नेत्यांचा अवाजवी हस्तक्षेप असायचा. राज्य सरकारच्या संबंधित खात्यातील अधिकारी भरपूर लाच घेऊनच कर्जाचे अर्ज बँकेकडे पाठवीत असत. विविध संघटना, सेना, मोर्चा यांचे स्वघोषित पदाधिकारी उर्फ दलाल बँकेत येऊन अयोग्य मंजुरीसाठी कर्मचाऱ्यांना दमदाटी करीत. परिणामी योजनेचा प्रचंड गैरफायदा अपात्र, कर्जबुडव्या, धूर्त ग्रामीण जनतेकडून घेतला जात होता.

 

एकदा जालन्यापासून 25-30 किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या बेरडगाव नावाच्या एका अतिशय दुर्गम खेड्यातील काही शेतमजुरांना शेळ्या खरेदीसाठीचे कर्ज आमच्या शाखेतर्फे मंजूर करण्यात आले होते. दर मंगळवारी जालन्यास गुरांचा बाजार भरत असे. तेथून लाभार्थीच्या पसंतीने शेळ्या खरेदी करून त्यांची व्हेटरनरी डॉक्टरकडून तपासणी केल्यानंतर विमा कंपनीचे बिल्ले (इअर टॅग) त्या शेळ्यांच्या कानाला टोचून घ्यावे लागत. त्यानंतर नगरपालिकेची जनावर खरेदीची पावती बनवून झाल्यावर शेळ्या व विक्रेता यांना घेऊन लाभार्थी बँकेत येत असे. बँकेच्या फिल्ड ऑफिसरने शेळ्यांचे इन्सपेक्शन व योग्य शहानिशा केल्यावरच विक्रेत्याला शेळ्यांची किंमत अदा केली जात असे.goats

 

त्या दिवशी बेरडगावच्या दहा लाभार्थींना कर्जवाटप करायचे होते. त्यापैकी नऊ जणांना प्रत्येकी वीस हजार रुपये तर राहीलेल्या एकाला दहा हजार रुपये इतकी कर्ज रक्कम प्रदान करायची होती. संध्याकाळी उशिरापर्यंत वाट पाहिल्यानंतर एकदाचे सर्व लाभार्थी शेळी विक्रेत्यांना घेऊन बँकेत आले. फिल्ड ऑफिसरने ताबडतोब शेळ्यांचे इंस्पेक्शन केले. उशीर झाल्याने कॅशियरने घाईघाईतच सर्वांना फिल्ड ऑफिसरने सांगितल्याप्रमाणे रक्कम अदा केली व कॅश क्लोज करण्याच्या मागे लागला. पण कॅशियर व अकाऊंटंटच्या स्क्रोलमध्ये दहा हजारांचा फरक येत होता. लवकरच उलगडा झाला की ज्या एकमेव शेळी विक्रेत्याला दहा हजार रुपये द्यायचे होते त्यालाही घाईगडबडीत वीस हजार रुपये दिले गेले होते.

 

त्याकाळी दहा हजार रुपये फार मोठी रक्कम होती. रक्कम जमा केल्याशिवाय कॅशियरला तिजोरी बंद करता येणार नव्हती. फिल्ड ऑफिसर, संबंधित क्लर्क, कॅशियर, …सारे या चुकीसाठी एकदुसऱ्याकडे बोट दाखवीत होते. शेवटी मॅनेजर श्री. टी. के. सोमैय्याजी यांना झालेला सर्व प्रकार सांगण्यात आला. ते अतिशय शांत, संयमी, सहृदय आणि दिलदार स्वभावाचे होते. त्यांनी शाखाप्रमुख या नात्याने कर्मचाऱ्यांकडून झालेल्या ह्या चुकीची सर्व जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. आणि ताबडतोब स्वतःच्या खात्यातून दहा हजार रुपये देऊन कॅश बंद करण्यास सांगितले.

 

हा सर्व गोंधळ निस्तरेपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. जादा गेलेली दहा हजाराची रक्कम वसूल करण्याची नैतिक जबाबदारी कर्मचारी संघटनेचा पदाधिकारी या नात्याने माझी देखील होती. मी लगेच ज्या लीडरने ही  कर्जप्रकरणे मंजूर करण्यासाठी शाखेवर दबाव आणला होता त्याच्याकडे म्हणजे साहेबराव दांडगे ह्याच्याकडे गेलो. साहेबरावने सर्व प्रकरण नीट समजावून घेतले. ज्याला दहा हजार रुपये जास्त गेले होते तो शेळीविक्रेता, लालसिंग त्याचं नाव, तोही योगायोगाने बेरडगावचाच निघाला.

 

साहेबराव म्हणाला ” सर, मी ह्या लालसिंगला चांगलाच ओळखतो. अतिशय प्रामाणिक माणूस आहे. जादा आलेले बँकेचे पैसे तो नक्कीच परत करील. मात्र पैसे आणण्यासाठी बेरडगावला जावे लागेल आणि तिकडे आत्ता रात्रीचे जाणे फारच अवघड आणि धोकादायक आहे. एकतर रात्रीचा अंधार आणि त्यातून संपूर्ण रस्ता कच्चा, चिखल-दलदलीचा, खाचखळग्याचा आणि काटाकुट्याचा आहे. गाडी पंक्चर होण्याची दाट शक्यता आहे. शिवाय रात्रीची साप, रानडुकरं, लांडगे यांची तसेच वाटमारीचीही भीती आहे. त्यामुळे तुम्ही उद्या सकाळीच बेरडगावला जा. हवं तर मीही तुमच्या सोबत येतो. काळजी करू नका. पैसे नक्की परत मिळतील.” साहेबरावच्या ह्या आश्वासक बोलण्यानं बराच धीर आला आणि खूप हायसंही वाटलं.

 

चर्चेअंती दुसरे दिवशी पहाटे सहा वाजता साहेबरावला सोबत घेऊन निघायचे ठरले. मी पाच वाजताच उठून तयार होऊन स्कुटर घेऊन साहेबरावच्या घरी गेलो. तो गाढ झोपला होता. मला आलेला पाहून डोळे चोळत उठून तो लगेच तयार झाला आणि स्वतःची मोटारसायकल घेऊन माझ्याबरोबर निघाला. सुमारे तासभराच्या खडतर प्रवासानंतर आम्ही बेरडगावला पोहोचलो. लालसिंग गावाबाहेर बेरडवस्तीत रहात होता. तिथपर्यंत जाण्यासाठी रस्ता नव्हता. त्यामुळे आमच्या गाड्या गावालगत रस्त्यावरच उभ्या करून आम्ही दोघे दोन तीन फर्लांगाचं अंतर चिखल तुडवीत जवळच्या बेरडवस्तीत गेलो.OIG2.b yTUR

 

लालसिंगने आमचे आदराने स्वागत केले. मी त्याला आम्ही इथपर्यंत येण्याचे कारण सांगितले. त्यावर लालसिंग म्हणाला “साहेब, मी बँकेने दिलेले पैसे न मोजता तिथेच रुमालात बांधले आणि लगेच घराकडे आलो. अजूनही ते पैसे तसेच रुमालात ठेवले आहेत. तुम्ही ती रुमालाची पुरचुंडी घ्या आणि त्यातून जास्तीचे आलेले पैसे काढून घ्या.”currency notes

 

मला लालसिंगच्या प्रामाणिकपणाचं कौतुक वाटलं. मी त्यानं आणून दिलेल्या रुमालाची गाठ उघडली आणि  जास्तीचे गेलेले दहा हजार काढून घेण्यासाठी पैसे मोजू लागलो. पण हे काय…? दहा हजार मोजताच सारे पैसे संपले. रुमालात एकूण फक्त दहा हजार रुपयेच होते. म्हणजे..? लालसिंगला दहाच हजार दिले गेले ? मग पैसे गेले कुठे ? कॅशियर खोटं तर बोलत नाही ना ?….असे नानाविध विचार माझ्या मनात येऊन गेले.

 

मी लालसिंगकडे पाहिलं. “काय झालं साहेब ?” माझा गोंधळलेला चेहरा पाहून त्यानं भाबडेपणानं विचारलं. “काही नाही. बहुदा आमच्याकडूनच काहीतरी चूक झाली असावी.” असं म्हणून लालसिंगची माफी मागून आम्ही निघालो.

 

जाता जाता लालसिंगच्या आग्रहास्तव वस्तीच्या कोपऱ्यावरील चहाच्या खोपटात चहा पिण्यासाठी गेलो. चहा पिताना साहेबराव म्हणाला “पहा साहेब !… मी म्हणत नव्हतो, लालसिंग खूप इमानदार आहे म्हणून ! बिचाऱ्याने अजूनपर्यंत पैसे मोजलेही नव्हते. जर खरोखरच त्याच्याकडे जास्तीचे पैसे आले असते तर ते तुम्हाला नक्की परत मिळाले असते.” मी देखील मान डोलावून त्याच्या बोलण्याला संमती दर्शवली.

 

माझी वसुली मोहीम पार फसली होती. मोठया आशेनं माझी वाट पाहत बसलेल्या कॅशियर, क्लर्क व फिल्ड ऑफीसरचे चेहरे माझ्या डोळ्यापुढे तरळू लागले. उदास मनानं लालसिंगचा निरोप घेऊन परत जाण्यासाठी आम्ही उठतो न उठतो, तोच….

 

“अहो काकाsssss थांबाsssss” असा आवाज देत लालसिंगचं आठ दहा वर्षांचं पोरगं धापा टाकत आमच्यापर्यंत आलं.images 17

 

“अहो काका, काल रात्री बँकेचे जास्तीचे आलेले पैसे घेण्यासाठी तुम्ही चिखलकाट्यात बरबटून आमच्या घरी आला होता ना, त्यावेळी जादा आलेले पैसे तर तुम्ही नेले पण तुमची एक गोष्ट मात्र आमच्या घरीच विसरला होता…ती ही घ्या तुमची विसरलेली चुन्याची डबी.”chuna dabbi

 

असं म्हणत त्या मुलानं चुन्याची डबी साहेबरावच्या हातावर ठेवली.

 

काल घडलेला सारा घटनाक्रम माझ्या डोळ्यापुढे विजेसारखा झर्रकन चमकून गेला. साहेबरावच्या चेहऱ्याचा तर रंगच उडाला. घाबरून त्यानं मोठ्ठा आवंढा गिळला. शरमेनं अवघडून त्याचा चेहरा कसनुसा होऊन अक्षरशः शतशः विदीर्ण झाला. खजील होऊन खाली गेलेली मान वर न करता, कुणाला काही कळायच्या आत, पायात चप्पलही न घालता, काट्याकुट्याची पर्वा न करता, चिखल तुडवीत त्यानं तडक रस्त्याकडे धाव घेतली.

 

……बघता बघता रस्त्यावरील कडेला लावलेल्या मोटारसायकलवर तो स्वार झाला आणि धुरळा उडवीत दिसेनासा झाला.

 

                     🤣😜🤣

 

🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹

kotnis

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.

ते फेसबुकवर  नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.

असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने  प्रकाशित करीत आहोत.

फिरते साहित्य Moving Literature

firte sahitya

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*फिरते  “साहित्य”* …

प्राथमिक शाळेत अक्षर ओळख होऊन सलग वाक्य वाचता येऊ लागलं तेव्हा जणू ज्ञानाचा खजिना असलेली अलिबाबाची गुहाच उघडल्यासारखं वाटलं. वाचनाचा आनंद, नाविन्याचं औसुक्य आणि वैविध्याची भूक एवढी जास्त होती की शाळेत येता जाताना जे जे काही लिहिलेलं दिसायचं, मग त्या भिंतींवरील जाहिराती असोत वा घरांवरील नावाच्या पाट्या असोत, ते ते सर्व अधाशासारखं भराभरा वाचून काढायचा नादच लागला.

त्यावेळी वाहनांच्या विशेष करून ट्रकच्या पाठीमागे काही ठराविक शब्द लिहिले असत. “हॉर्न प्लिज”, “हॉर्न दिजीए”, “हॉर्न ओके प्लिज”, “ओके टाटा”, “फिर मिलेंगे” असे थोडक्यात लिहिले असायचे. त्यानंतर सुप्रसिद्ध “बुरी नजरवाले तेरा मुँह काला” चा जमाना आला. माझ्या लहानपणापासून ते आजतागायत गेली साठ सत्तर वर्षे भारतातील समस्त ट्रक चालकांचे हे अत्यंत आवडते वाक्य राहिले आहे. या जगात “नजर” टाकण्याजोग्या इतर अनेक “आकर्षक सजीव” गोष्टी असताना त्या सोडून सर्वजण आपली नजर ट्रक सारख्या निर्जिव अनाकर्षक वाहनाकडेच आणि तीही वाकडी म्हणजे “बुरी”च का टाकत असावेत हे मला अजून न सुटलेलं एक कोडंच आहे.

नंतरच्या काळात काही रसिक ट्रक चालक मनोरंजक शेर शायरी ट्रकमागे लिहू लागले. हळूहळू ट्रॅक्टर, बस, जीप आणि सर्वच खाजगी वाहनांमागे अशा चित्तवेधक ओळी दिसू लागल्या. मला तर सुरवातीपासूनच ट्रक, बस मागे लिहिलेलं हे फिरतं साहित्य वाचण्याचा छंद होता. पुढे कॉलेजात गेल्यावर तर हा छंद वाढत जाऊन त्याचं तात्पुरत्या वेडात रूपांतर झालं. ट्रक, बस मागे लिहिलेलं प्रांतोप्रांतीचं, विविधतेनं नटलेलं आणि अतिशय सवंग पण मनोरंजक असं भरपूर साहित्य मला मुखोद्गत होतं. दररोज वाहनांच्या मागे सायकलवर फिरून असं नवनवीन साहित्य मिळवून आम्ही सारी मित्रमंडळी त्यावर चर्चा करत मस्तपैकी टाईमपास करायचो.main qimg beb03676b796c4586df600b0c149e2c4

एकदा मी कॉलेजातून घरी जात असताना लहान मुलांना शाळेत घेऊन जाणारी एक खाजगी स्कुलबस माझ्या सायकल जवळून पुढे गेली. नेहमीच्या सवयीने मी बसच्या मागे लिहिलेलं काही नवीन साहित्य मिळतंय का हे पाहण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बसमागे काही अपरिचित ओळी लिहिलेल्या मला अस्पष्ट दिसल्या. पण बस वेगात असल्याने मी त्या ओळी नीट वाचण्यापूर्वीच बस माझ्या दृष्टीआड झाली. त्या अपरिचित ओळींनी माझी उत्सुकता चाळवली गेली. काहीतरी नवीन साहित्याचा लाभ आज आपल्याला होणार या आशेने मी बसच्या मागे वेगात सायकल दामटली.4

दोन तीन किलोमीटर पर्यंत वेगात पाठलाग केल्यावर मला दूरवर ती बस दिसू लागली. मोठया कष्टाने सायकलला टांगा मारत कसाबसा बसपर्यंत पोहोचतो न पोहोचतो, तेवढ्यात बस पुन्हा सुरू झाली. मात्र त्या गडबडीतही मी बसच्या मागे लिहिलेली पहिली ओळ वाचून काढली. ती ओळ अशी होती….

“रंग गया, रूप गया, गई जीवन की लाली”

मी एवढी ओळ वाचतो न वाचतो तोच सायलेंसरमधून धूर सोडत आणि धुळीचे लोट उडवीत बस पुन्हा नजरेआड झाली. मी पाहिलं की पायाखालचा रस्ता आता खूप खडबडीत, कच्चा आणि धुळीने भरलेला होता. डोळ्यात व नाकातोंडात सारखी धूळ जात होती. त्यातून सायकल पंक्चर होण्याचीही भीती होती. रस्ता नीट दिसत नसल्याने मी काळजीपूर्वक, धिम्या गतीने पण नेटाने बसचा पाठलाग सुरूच ठेवला. त्याचवेळी मनातल्या मनात नुकतीच वाचलेली बस मागील पहिली ओळ आठवीत, पुढील ओळ काय असू शकेल याबद्दल कल्पनेला ताण देत विचार करीत होतो.

आतापर्यंत मी गावाच्या बाहेर पडून शहरापासून बराच दूर आलो होतो. घराकडे जाण्याचा रस्ता तर केव्हाच मागे पडला होता. मात्र मला त्याची फिकीर नव्हती. आज कसंही करून ती दुसरी ओळ वाचूनच मग मागे फिरायचं अशी मनात जिद्द पेटली होती. थोड्यावेळाने तो खराब रस्ता एकदाचा संपला. डोळ्यासमोरील धूळ ही कमी झाली. रस्ता स्वच्छ दिसू लागला तसा मी सायकलचा वेग पुन्हा वाढवला.  वाटेवरील गावांत थांबत थांबत, तेथील लहान मुलांना त्यांच्या  घरी पोहोचवणारी ती स्कुलबस मला पुन्हा दिसू लागली. एव्हाना मी सहा सात किलोमीटरचं अंतर पार केलं होतं. माझा स्टॅमिना आता संपत चालला होता. शेवटचा नेटाचा प्रयत्न म्हणून मी जोरात पायडल मारत धपापत्या उराने त्या थांबलेल्या बसपर्यंत पोहोचलो.cyclist

सायकल बसच्या अगदी जवळ नेत मी घाईघाईने ती दुसरी ओळ वाचली.

“रंग गया, रूप गया, गई जीवन की लाली”  नंतरची ती दुसरी ओळ होती….

“अब तो पिछा छोडो, मैं हूं बाल बच्चों वाली”

या ओळी वाचता वाचताच मला जोराचं हसू फुटलं. माझ्या आजच्या अवस्थेला अगदी समर्पक अशा त्या ओळी होत्या. स्वतःची कींव करत हसतानांच अशा निरर्थक गोष्टींच्या मागे एवढी धावाधाव करण्याच्या माझ्या पोरकट स्वभावाचा मला रागही आला.

……त्या दिवसापासून अशी फिरत्या साहित्यामागे फिरण्याची माझी सवय कायमची सुटली आणि मी नियमितपणे लायब्ररीत जाऊन सकस, अभिजात आणि उत्कृष्ट साहित्य वाचू लागलो.

main qimg d5986d7323955bdbc5d35e8381f76650

😃😃😃😃😃😃😃😃😃😃😃

kotnis

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.

ते फेसबुकवर  नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.

असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने  प्रकाशित करीत आहोत.

गल्लीतील यमदूत Demon in a dark lane

demon in dark lane

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*गल्लीतील यमदूत*

मी बँकेत नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. जालना येथील स्टेट बँकेत कॅशियर-कम्-क्लर्क म्हणून 1981 साली मी जॉईन झालो. लवकरच माझ्यावर बँकेचा रोजचा ताळेबंद म्हणजेच कॅश बुक (क्लीन कॅश) लिहिण्याचं अतिशय क्लिष्ट परंतु त्याचबरोबर प्रतिष्ठेचं काम सोपविण्यात आलं.

हे कॅश बुक टॅली करणं फारच जिकिरीचं काम होतं. बँकेत भरपूर काम असल्याने स्टाफही भरपूर होता. रोज एक हजारापेक्षाही जास्त व्हाऊचर्स असायची. ही व्हाऊचर्स योग्यरित्या सॉर्ट करून संबंधित दैनिक पुस्तकात (डे बुक) ठेवण्याचे काम प्यून मंडळी दुपारपासूनच सुरू करत. संध्याकाळी सर्वांची डे बुकं लिहून झाल्यावर मगच कॅश बुक लिहिण्याचे माझे काम सुरू होत असे. त्यामुळे संध्याकाळी चार तास व सकाळी दोन तास अशा दोन भागात माझे कामाचे तास विभागले होते.

शक्यतो त्याच दिवशी हे कॅश बुक टॅली करण्याचा माझा प्रयत्न असे. मात्र कधी व्हाऊचर्स गहाळ झाल्याने तर कधी डे बुक लिहिण्यातील विविध चुकांमुळे क्लीन कॅश टॅली होण्यास नेहमीच खूप उशीर व्हायचा. साहजिकच सर्व काम आटोपून घरी जाण्यास मला रात्रीचे दहा अकरा वाजत. बँकेपासून जराशा दूर अंतरावर असलेल्या एका विडी कामगारांच्या वस्तीत तेंव्हा मी रहात असे. स्टाफला मिळणारं सायकल लोन उचलून मी नुकतीच नवीन सायकल घेतली होती. त्यावरूनच मी बँकेत जाणे येणे करीत असे.

एक दिवस असाच रात्री साडे दहा वाजता काम आटोपून घरी जात असताना वाटेतील एका गल्लीच्या तोंडाशीच एक भला मोठा, हिंस्त्र चेहऱ्याचा कुत्रा, आपले अणकुचीदार दात विचकवीत, माझी वाट अडवून उभा राहिला. कुत्र्याला पाहून मी थोडा घाबरलो आणि त्याला टाळून बाजूने सायकल काढून वेगाने पुढे जाऊ लागलो. त्या धिप्पाड कुत्र्यानेही सायकलमागे वेगाने पळत माझा गल्लीच्या दुसऱ्या टोकापर्यंत पाठलाग केला.  त्यानंतर बहुदा त्याची हद्द संपल्यामुळे तो तिथेच थांबला. मी मात्र तोपर्यंत भीतीने अर्धमेला झालो होतो. जोरजोरात पायडल मारल्याने मला मोठी धाप लागली होती आणि भीतीने सर्वांगाला चांगलाच घाम फुटला होता.

त्या दिवशी रात्रभर मला झोप लागली नाही. सारखा तो भयंकर चेहऱ्याचा खुनशी, खूंखार कुत्रा नजरेसमोर येत होता.ferocious dog

दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही गोष्ट पार विसरून गेलो. त्या दिवशीही काम आटोपण्यास नेहमीसारखाच उशोर झाला. सायकलवर टांग मारत मी घराकडे निघालो. त्या गल्लीच्या तोंडाशी येताच अचानक कालच्या प्रसंगाची आठवण झाली आणि छातीचे ठोके वाढले. घशाला कोरड पडली. मी घाबरून आसपास पाहिलं. रस्ता सुनसान होता हे पाहून मी सुटकेचा निःश्वास सोडला आणि निर्धास्तपणे हलकेच शीळ घालीत आरामात हळू हळू पायडल मारण्यास सुरवात केली. इतक्यात अचानक कुणीतरी बाजूच्या झुडुपमागून निघून माझ्या सायकलवर झेप घेतली. मी ब्रेक मारून नीट बघितलं तर तो कालचाच भयंकर कुत्रा होता. बहुदा माझीच वाट पहात झुडुपामागे दबा धरून बसला असावा. मी कालच्यासारखीच वेगात सायकल दामटली. गल्लीच्या टोकापर्यंत माझा पाठलाग करून कालसारखाच तो दुष्ट कुत्रा आपली सीमा येताच थांबला.bike and dog

त्यानंतर हे रोजचंच झालं. मला रात्री घराकडे जायचं म्हंटलं की त्या कुत्र्याच्या दहशतीमुळे अंगावर काटा येत असे. घराकडे जाण्यासाठी पर्यायी मार्गही नव्हता. मी मॅनेजरसाहेबांकडे कॅश बुक सोडून दुसरं कोणतंही काम देण्याची विनंती केली. मॅनेजर साहेबांनी कारण विचारलं तेंव्हा मी त्यांना त्या कुत्र्याच्या मागे लागण्याबद्दल सांगितलं. ते ऐकून मॅनेजर साहेब खो खो करून हसत म्हणाले की “तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाच म्हणून  समज !”

जालना नगर परिषदेची सर्व बँक खाती आमच्याकडेच होती. त्यामुळे तेथील कर्मचारी वर्ग  विविध प्रकारच्या कामांसाठी बँकेत नियमित येत असे. मॅनेजर साहेबांनी भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करणाऱ्या खात्याच्या  कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांची माझ्याशी गाठ घालून दिली. मी त्यांना कुत्र्याचे वर्णन करून तो कुठल्या गल्लीत असतो हे सांगितले. त्यावर “आपण अजिबात काळजी करू नका. उद्याच त्या कुत्र्याचा निश्चितपणे बंदोबस्त केला जाईल,” असे त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले.

त्याही दिवशी रात्री कुत्र्याने माझा नेहमीसारखाच पाठलाग केला. एकदोनदा आपल्या दातांनी माझी पॅन्टही पकडली. पण ह्या क्रूर, पापी कुत्र्याला नगर पालिकेचे कर्मचारी उद्या पकडून नेणार आहेत, हे माहीत असल्याने मी तो त्रास फारसा मनावर घेतला नाही.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मॅनेजर साहेबांनी मला आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. नगर पालिकेचे ते कर्मचारी त्यांच्यासमोरच बसले होते. “सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्या गल्लीत व आसपास भरपूर शोधाशोध करूनही असा कोणताही भटका कुत्रा आढळला नाही” असं ते म्हणत होते. “बहुदा मला त्या कुत्र्याचा भास होत असावा” असं ते ठासून सांगत होते. माझ्याकडे विचित्र नजरेने पहात ते निघून गेले. मॅनेजर साहेबांनी मात्र त्यांच्याकडे लक्ष न देता “आजपासून रात्री तुम्हाला घरी सोडण्यासाठी बँकेचा वॉचमन तुमच्यासोबत घरापर्यंत येईल” असे सांगून मला धीर दिला.

पुढचे सलग दोन दिवस बँकेचा वॉचमन मला सोडण्यासाठी घरापर्यंत आला. आश्चर्य म्हणजे तो भयंकर कुत्रा त्या दोन दिवसात गल्लीत फिरकलाच नाही. साहजिकच “नगर पालिकेचे लोक खरंच बोलत होते…असा कुणी कुत्रा त्या भागात नाहीच आहे…सारे या साहेबांच्या मनाचे खेळ आहेत….मी आजपासून त्यांना सोडायला जाणार नाही.” असं वॉचमनने मॅनेजर साहेबांना माझ्यासमोरच ठणकावून सांगितले. शिवाय वरतून ” साहेब, दर शनिवारी मारुतीला नारळ फोडत जा…सारं काही ठीक होईल.” असा मला आगाऊपणाचा सल्लाही दिला

त्या दिवशी रात्री काम आटोपल्यावर मी हताशपणे घराकडे निघालो. मी “त्या” गल्लीत प्रवेश करताच तो  भयंकर कुत्रा माझ्यावर त्वेषाने चाल करून आला. मी अजिबात न डगमगता… “घाबरू नकोस, हा केवळ भास आहे”..असं मनाला बजावीत होतो. मात्र जेंव्हा त्याने माझी पॅन्ट दातात धरून टरकावली तेंव्हा मात्र माझे अवसान गळाले आणि मी जीव मुठीत धरून, कुत्र्यापासून पाय वाचवीत, कशीबशी ती गल्ली पार केली.

आता हा आतंक, हा उपद्रव म्हणजे माझं जागेपणीचं रोजचं दु:स्वप्नच होऊन बसलं. तो भयंकर कुत्रा मी त्या गल्लीत शिरताच माझ्या मागे लागायचा. कधी पॅन्ट धरायचा तर कधी सायकलच्या हँडलवर झेप घ्यायचा. मी या रोजच्या त्रासाने अगदी कंटाळून गेलो होतो. आता तर बँकेतही याबद्दल कुणाला काही सांगायची सोय राहीली नव्हती.

एकदा माझ्या मित्राला त्याच्या घरातील उंदीर मारण्यासाठी औषध घ्यायचे होते, म्हणून त्याच्यासोबत औषधाच्या दुकानात गेलो होतो. “या उंदरांच्या औषधाने कुत्री मरतात का हो ?” असं जेंव्हा मी दुकानदाराला विचारलं, तेंव्हा त्याने “कुत्री मारण्याचे वेगळे विष असते व ते आमच्याकडे उपलब्ध आहे” अशी माहिती पुरवली. त्याचवेळी त्या भयंकर कुत्र्यापासून सुटका करून घेण्यासाठी हा जालीम उपाय करण्याचा मी मनाशी निश्चय केला.

त्या दिवशी रात्री घरी जाताना न विसरता दुकानातून कुत्र्याचे विष विकत घेतले. गल्लीतून जाताना रोजच्याप्रमाणेच त्या कुत्र्याने अंगावर धावून येत घाबरवून टाकले, तेंव्हा “ह्या कुत्र्याचा त्रास सहन करण्याचा हा शेवटचाच दिवस !” असं मनात येऊन गेलं. घरी पोहोचताच एका वाटीत पाणी घेऊन त्यात ते कुत्र्याचे विष मिसळून ठेवले. उद्या दुपारी बिस्किटे आणून ती या विषाच्या पाण्यात भिजवून सोबत न्यायची आणि रात्री घरी येताना त्या भयंकर कुत्र्यास खाऊ घालायची असं ठरवून झोपी गेलो.

दुसऱ्या दिवशी दुपारी बँकेत जाण्यापूर्वी, पहिल्यांदा जवळच्या रस्त्यावरील दुकानातून बिस्किटे आणावीत म्हणून बाहेर पडलो. वाटेतच कानावर मृदुंग, वीणा, चिपळ्यांचा आवाज पडला म्हणून तिकडे पाहिलं तर पंढरपूरला जाणारी शेगावच्या गजानन महाराजांची पालखी चालली होती. आज पालखीचा मुक्काम जालन्यातच होता. मी मनोभावे पालखीला नमस्कार केला. परमप्रिय दैवताच्या पालखीचं दर्शन झाल्याने माझं मन भक्तिभावानं भरून गेलं. निदान आजच्या दिवशी तरी कुत्र्याला विष घालण्याचं दुष्ट कृत्य करू नये असा विचार करून विकत घेतलेला बिस्किटाच्या पुडा घरी न नेता तसाच बँकेत नेला.

रात्री काम आटोपल्यावर बिस्किटाच्या पुड्याची थैली सायकलच्या हॅंडलला लावली आणि घराकडे निघालो. आज गल्लीत तो खतरनाक कुत्रा दिसला नाही. तरी सावधगिरी म्हणून शोधक नजरेने आजूबाजूला पहात मी हळूहळू  सायकल चालवीत होतो. गल्ली संपत आली तरी कुत्रा दिसला नाही पाहून मी सुटकेचा निःश्वास टाकतो न टाकतो.. तोंच अचानक त्या गल्लीतील यमदूताने समोरून येत माझ्या सायकलवर झेप घेतली. या अनपेक्षित हल्ल्याने मी पुरता गांगरलो. माझा तोल गेला आणि मी सायकलवरून धाडकन खाली आदळलो. कसाबसा उठून कपड्यांवरील धूळही न झटकता, तशीच सायकल हातात धरली आणि धूम पळत सुटलो. गल्ली पार झाल्यानंतर, तो भयंकर यमदूत मागे फिरल्यावर मगच पुन्हा सायकलवर बसून घरी पोहोचलो.

आता मात्र मी सूडानं पुरता पेटलो होतो. सायकलवरून पडल्यामुळे थोडं खरचटून मुका मारही लागला होता. आत्ताच बिस्किटं विषात भिजवून ठेवावीत म्हणून मी हँडलची थैली काढली तर आत बिस्किटाचा पुडाच नव्हता. कदाचित मघाशी सायकल पडली तेंव्हा थैलीतून पुडा कुठेतरी खाली पडला असावा.

आता उद्या दुपारी बँकेत जाताना हे कुत्र्याचे विष बाटलीत भरून बँकेत न्यावे व रात्री येताना बिस्किटाचा पुडा सोबत आणून, त्या गल्लीत थांबून बिस्किटावर विष शिंपडून कुत्र्याला खाऊ घालावे असा पक्का निर्धार केला.

ठरल्याप्रमाणे त्या दिवशी रात्री घरी परतताना बिस्किटाचा पुडा विकत घेतला. विषाची बाटली तर दुपारी येतानाच खिशात ठेवली होती. एखाद्या योध्याप्रमाणे सर्व तयारीनिशी मी कामगिरीवर निघालो होतो. आज तो माझा जानी दुश्मन भयंकर कुत्रा गल्लीच्या सुरवातीलाच स्वागतासाठी हजर होता. जणू काही तो माझीच आतुरतेनं वाट पहात होता. मी देखील एकदाची ही ब्याद टळावी म्हणून आसुसलो होतो.

शांतपणे सायकल उभी करून मी खाली उतरलो. कुत्राही आता माझ्या अगदी जवळ आला होता. माझा हात खिशातील विषाच्या बाटलीकडे गेला. अचानक माझी नजर कुत्र्याच्या डोळ्यांकडे गेली. त्या डोळ्यात केवळ प्रेम आणि आपुलकीच भरलेली दिसत होती. तो आनंदाने जोरजोरात शेपटी हलवीत होता. मला पाहून त्याला खूप आनंद झालेला दिसत होता. तो जवळ येऊन प्रेमाने चक्क माझे पाय चाटु लागला. इतक्या दिवसांचा माझा वैरी आज माझा दोस्त झाला होता. ही किमया कशी घडली याचा मला तर काहीच उलगडा होत नव्हता. त्याचं ते प्रेम बघून माझ्या मनातही त्याच्याबद्दल दया उत्पन्न झाली. त्याच्यासाठी काहीतरी करावं असं वाटलं. थैलीतून बिस्किटाचा पुडा काढून मी त्याला सर्व बिस्किटं प्रेमाने खाऊ घातली. थोडावेळ त्याच्याशी खेळून, त्याला जवळ घेत कुरवाळून, त्याच्या पाठीवर तोंडावर हात फिरवून मी घरी निघालो. शेपूट हलवीत तो कुत्राही माझ्या मागोमाग गल्लीच्या टोकापर्यंत आला.pexels photo 7269591

a dog eating a treat

……घरी जाण्यापूर्वी खिशातून विषाची बाटली काढून मी दूर भिरकावून दिली. क्रोधाने आंधळा होऊन मी एक मुक्या प्राण्याच्या जीवावर उठलो होतो हे आठवून मला माझीच लाज वाटत होती.

त्या दिवसापासून तो कुत्रा माझा जिवलग मित्र झाला. माझी वाट पहात गल्लीच्या तोंडाशी बसून राहायचा. मी दुरून दिसताच शेपटी हलवत माझ्या जवळ यायचा, मला चाटायचा, माझ्या कडून लाड करून घ्यायचा. मीही त्याच्यासाठी आठवणीने काहीतरी खाऊ घेऊन जायचो. आता संध्याकाळ झाली की मलाही त्याच्या भेटीची ओढ आणि उत्सुकता लागून रहायची.

हा भयंकर कुत्रा अचानक माझा मित्र कसा बनला यावर विचार केल्यावर मला आठवलं की… त्या दिवशी सायकल खाली पडली तेंव्हा हँडलला लावलेल्या थैलीतील बिस्किटाचा पुडा तिथे पडला असावा आणि त्या कुत्र्याला असं वाटलं की मी तो त्याच्यासाठी आणला होता. साहजिकच त्याचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. मी त्याला दयाळू, सहृदय वाटू लागलो. त्याने प्रेमाच्या आशेने माझ्याशी मैत्रीपूर्ण सलगी केली आणि माझ्या सकारात्मक प्रतिसादाने आमची दोस्ती पक्की झाली.

खरंच… किती सोप्पं होतं त्याच्याशी दोस्ती करणं ! मी विनाकारण त्याला घाबरून इतके दिवस व्यर्थ तणावात घालवले. सुरवातीलाच त्याला चुचकारून, काहीतरी खायला देऊन, त्याच्यावर प्रेम करून, त्याला आपलंसं करून घेतलं असतं तर त्याचा जीव घेण्याइतका टोकाचा विचार करण्याची काहीच गरज नव्हती.

आपल्या आयुष्यात ही आपण खोट्या मान सन्मान, प्रतिष्ठा व अहंकारापायी कधी कधी अतिशय क्षुल्लक कारणावरून एकमेकांविषयी वैरभाव मनात बाळगून आपसातील संबंध बिघडवितो. गैरसमज न बाळगता, मोकळ्या मनाने जर आपण आपल्या तथाकथित शत्रु पुढे मैत्रीचा हात पुढे केला तर कोणताही वाद, मतभेद कधीच विकोपास जाणार नाहीत व एक सुदृढ समाज निर्माण होईल.

….”काय साहेब, औषध जालीम होतं ना ? कुत्र्याचा बंदोबस्त झाला की नाही ?”

जिथून कुत्र्याचे विष आणले होते तो औषध विक्रेता मला पाहून विचारत होता..

*”अगदी सहज ! आणि अतिशय उत्तमरीत्या….”*

……हात उंचावून अंगठा दाखवून मी हसत म्हणालो…

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

kotnis

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली.

ते फेसबुकवर  नित्य लिखाण करीत असतात आणि त्यांचे विविध प्रकारचे लेख वाचकांना अतिशय आवडतात.

असेच काही लेख या ब्लॉगवर त्यांच्या परवानगीने  प्रकाशित करीत आहोत.

लोकां सांगे ब्रह्मज्ञान -5

loka sange brahmadnyan

लेखक

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*लोकां सांगे ब्रह्मज्ञान..*

क्रमशः (५)

मार्च एंड झाल्यानंतर महिन्याभरातच माझी बदली पुन्हा महाराष्ट्रात झाली. रीतसर निरोप समारंभ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मिनी ट्रक मध्ये सामान भरून निघायचे ठरले. मात्र दुसऱ्या दिवशी मिनी ट्रक सकाळ ऐवजी संध्याकाळी आला आणि सामान भरून निघायला रात्र झाली.

अंधाऱ्या रात्री निबीड अरण्यातून सुनसान, निर्मनुष्य रस्त्याने आमचा ट्रक महाराष्ट्राच्या दिशेने निघाला होता. ट्रकच्या केबिन मध्ये ड्रायव्हर शेजारील दुहेरी सीटवर मी पत्नी व मुलांसह बसलो होतो. भोवतालच्या गडद काळोखातून मार्ग काढीत ट्रक धीम्या गतीने पुढे चालला होता. त्याच्या हेड लाईटच्या प्रकाशात रस्ता ओलांडणारे साप, ससे, मोर, हरीण, कोल्हे असे वनचर प्राणी पाहून आपण थिएटर मध्ये बसून “जंगल बुक”, “लॉयन किंग” किंवा “नार्निया” सारखा चित्रपट “थ्री-डी” मध्ये पाहतो आहोत, असा भास होत होता.

एका जीवघेण्या वळणावर अचानक ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबल्यामुळे कर्कश आवाज करीत ट्रक थांबला. झाडाच्या फांद्या आडव्या टाकून कुणीतरी जाणून बुजून रस्ता बंद केलेला होता. हा वाटमारीचा तर प्रकार नाही ना, अशी शंका येऊन सावधपणे कानोसा घेत आम्ही गाडीतच स्तब्ध बसून राहिलो.

थोडा वेळ असाच भयाण, रहस्यमय शांततेत गेला. मग रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या उतारावरील गर्द झाडीत जराशी कुजबुज व हालचाल जाणवली. मध्येच एखादा टॉर्च क्षणभर चमकून लगेच विझायचा. एखाद्या दबा धरून बसलेल्या हिंस्त्र वाघाच्या चमकणाऱ्या डोळ्यां सारखाच तो लुकलुकणारा प्रकाश भासायचा.

झाडीतून कुणीतरी खुणेची कर्णकटू शिटी वाजविली आणि गलका करीत हातात लाठी आणि टॉर्च घेतलेल्या पंधरावीस जणांनी खालचा उतार चढून रस्त्यावर येत आमच्या ट्रकला वेढा घातला. त्यातील एक जणाने टॉर्चच्या प्रकाशात ट्रकची नंबर प्लेट पाहिली आणि “हाच तो ट्रक आहे !” असे तेलगू भाषेत कुणालातरी ओरडून सांगितले. लगेच रस्त्यावरील झाडाचा अडथळा बाजूला करून दोन मोठ्या व्हॅन आमच्या ट्रक समोर येऊन थांबल्या. एखाद्या कुख्यात डाकूच्या टोळीला पोलिसांनी चारी बाजूंनी घेरावं तसं चित्रपटातल्या सारखं ते दृश्य होतं.

ते टॉर्चधारी, फॉरेस्ट खात्याच्या फ्लाईंग स्क्वाडचे लोक होते. सागवानाने भरलेला एक ट्रक उतनुरहून महाराष्ट्राकडे निघाला आहे अशी गुप्त खबर त्यांना मिळाली होती. मागच्या बाजूने आत चढून त्यांनी ट्रकची तपासणी सुरू केली. आतील घरगुती फर्निचर पाहून त्यांचा प्रचंड विरस झाला. “त्या” दहा सागफळ्या पाहून त्यांचे डोळे आनंदाने चकाकले. पण त्यावरील फॉरेस्ट विभागाचा शिक्का पाहताच पुन्हा एकदा ते निराश झाले. एव्हाना माझी ट्रान्स्फर ऑर्डर व रीलिव्हिंग लेटर मी त्यांच्या ऑफिसरला दाखविले होते.

मग अखेरचा प्रयत्न म्हणून,

“कशावरून हे फर्निचर व या साग फळ्या चोरीच्या नाहीत ? तुमच्या जवळ हे लाकूड खरेदी केल्याची सरकारी पावती आहे काय ?” असा बिनतोड कायदेशीर प्रश्न विचारून मला कोंडीत पकडण्याचा त्यांच्या ऑफिसरने प्रयत्न केला.

सर्व फर्निचर तसेच साग फळ्यांचा उल्लेख असलेली सूर्यकुमार साहेबांनी दिलेली फॉरेस्ट विभागाची दंडाची पावती आठवणीने खिशात ठेवली होतीच. ती त्या ऑफिसरला दाखवताच..

“कशावरून ही पावती खरी आहे ? आजकाल अशा बनावट पावत्यांचा सुळसुळाट झाला आहे ? या पावती वरील सही कुणाची आहे ?”

असा निष्फळ युक्तिवाद करीत मला चाचपण्याचा त्याने शेवटचा प्रयत्न केला.

“फॉरेस्ट रेंजर श्री.सूर्यकुमार साहेबांची ही सही आहे. तुमच्या जवळ असलेल्या वायरलेस सेट वरून त्यांच्याशी संपर्क साधून पावतीच्या खरेपणाबद्दल खात्री करून घेऊ शकता..!”

माझ्या ह्या उत्तराने देखील त्या ऑफिसरचे पुरेपूर समाधान झालेले दिसत नव्हते.

“सूर्यकुमार साहेब आज इथेच आहेत. बाजूच्या जंगलातील टेन्ट मध्ये बसले आहेत. त्यांना ही पावती दाखवून येतो..”

असे म्हणून ती पावती घेऊन तो ऑफिसर बाजूच्या जंगलात उतरत काळोखात दिसेनासा झाला.

आज आपलं काही खरं नाही, हे फॉरेस्ट वाले आपल्याला लवकर सोडणार नाहीत असा विचार करून आमच्या ड्रायव्हरने आपला सामानाचा ट्रक रस्त्याच्या कडेला घेतला आणि खाली उतरून एका फॉरेस्ट गार्डशी तेलगू भाषेत गप्पा मारत निवांतपणे बिडी ओढू लागला.

माझा लहान मुलगा या साऱ्या प्रकाराने खूप घाबरला होता. सुनसान दाट जंगल, सर्वत्र असलेला गर्द भीषण काळोख, भुतासारखे भासणारे उंचच उंच स्तब्ध साग वृक्ष.. अशा वातावरणात आमच्या ट्रकचे तसेच फॉरेस्टच्या दोन्ही व्हॅनचे हेड लाइट्स अजूनही ऑनच होते. भरीस भर म्हणून ट्रकला वेढा घातलेल्या पंधरा वीस गार्ड्सच्या हातातील प्रखर झोताचे टॉर्चही सुरूच होते. एखाद्या चोराकडे किंवा पिंजऱ्यातील हिंस्त्र जनावराकडे पहावे तसे ते खाली उभे राहून आमच्याकडे बघत होते.

“पप्पा, हे आपल्याला मारून तर टाकणार नाही ना ?”

माझा पाच वर्षाचा लहान मुलगा मला भीतीने बिलगत विचारत होता. कदाचित टीव्हीवर पाहिलेल्या सिनेमातील अशाच प्रकारची डाकुंची दृश्ये त्याला आठवत असावीत. खरं तर त्याला खूप जोराची लघवी लागली होती. पण अशा धोकादायक जागी लघवीसाठी खाली उतरण्यास तो तयार नव्हता.

रात्रीचे दोन वाजले होते. आम्हा तिघांनाही खूप झोप येत होती. जांभया देत अवती भवतीच्या मिट्ट अंधाराकडे पहात आम्ही जागे राहण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होतो. रातकिड्यांची किरकिर, टिटवी सारख्या पक्ष्यांचे ओरडणे आणि अधून मधून ऐकू येणारी झाडांच्या पानांची सळसळ व फॉरेस्ट गार्ड्सची हलक्या आवाजातील कुजबुज..! सारंच खूप भयाण, कंटाळवाणं वाटत होतं. वेळ जाता जात नव्हता..

सूर्यकुमार साहेब जंगलातील त्यांच्या टेन्टच्या बाहेर येणार नाहीत याबद्दल मला पक्की खात्री होती. तशीही पुन्हा त्यांचे तोंड पाहण्याची मलाही अजिबातच इच्छा नव्हती.

बऱ्याच वेळाने जंगलात गेलेला तो अधिकारी परत येताना दिसला.

“रेंजर साब आपसे खुद ही मिलना चाहते है ! प्लीज, आप नीचे आईये.. !!”

जवळ येऊन नम्र भाषेत तो विनंती करता झाला.

“पप्पा, खाली उतरू नका..” असं ओरडून माझा शर्ट घट्ट पकडीत मुलगा विनवित असताना त्याचाकडे लक्ष न देता मी खाली उतरलो. ऑफिसरने माझ्यासाठी खुर्ची मागवली. त्यावर बसून मी रेंजर साहेबांची वाट पाहू लागलो.

थोड्या वेळाने अचानक माझ्या खुर्चीमागून येऊन समोर प्रगट होत आपल्या चिरपरिचित हसऱ्या मुद्रेने “जय हिंद, सर !” म्हणत सूर्यकुमार साहेबांनी मला आदराने कडक सल्युट ठोकला. त्यानंतर लगेच माझा हात हातात घेऊन प्रेमाने दाबला आणि बळजबरीने मला जवळ खेचत घट्ट मिठी मारून म्हणाले..

“ओहो.. व्हॉट अ सरप्राइज ! सर, कितने दिनों के बाद मिल रहे है हम.. ! रिअली अनबिलिव्हेबल.. !!”

ट्रक मध्ये बसलेल्या माझ्या पत्नीकडे लक्ष जाताच ट्रकच्या दरवाजा जवळ जात हात हलवित म्हणाले..

“हॅलो भाभीजी, कैसे है आप ? फायनली, अपने गाँव वापस जा रहे हो ? आपका बनाया टेस्टी मसाला डोसा अभी भी याद है.. फिरसे खाने के लिए एक दिन जरूर महाराष्ट्रा में आपके घर आऊंगा.. !! विश यू हॅपी जर्नी, मॅडम..!”

त्यानंतर आईला बिलगून त्यांच्याकडे संशय मिश्रित कुतूहलाने पाहणाऱ्या लहानग्या अनिश कडे पाहून म्हणाले..

“हाय प्रिन्स ! डरो मत.. हम तुम्हारे पापा के दोस्त है..”

त्यानंतर खिशातून मूठभर चॉकलेट्स काढून ती अनिशच्या हातात ठेवत म्हणाले..

“हॅव धिस..! इस जंगल में तुम्हे बस इतना ही दे सकता हूं मैं..!”

रेंजर साहेबांच्या मैत्रीच्या या खोट्या प्रदर्शनाला मी आता भुलणार नव्हतो. माझ्या डोळ्यांतील तिरस्कृत भाव आणि कोरड्या प्रतिसादा वरून त्यांच्या ही ते सहज लक्षात आलं असावं. त्याकडे दुर्लक्ष करीत..

“दिन में निकलने की बजाए, आप इतनी रात में क्यों निकले ? वो भी फॅमिली के साथ.. और ऐसे ट्रक मे बैठ कर..! आपका बँक, कार का पैसा नही देता क्या ? अरे भाई, ये खतरनाक जंगल है.. चिता, शेर, भालू कभी भी अटॅक कर सकते है..! और हमारे डिपार्टमेंट को टीक स्मगलिंग का डाउट भी आता है ऐसे रात में चलने वाले व्हेईकल्स पर.. !!”

असं म्हणून त्यांनी हाताखालच्या अधिकाऱ्यांशी कसली तरी महत्त्वाची गंभीर चर्चा केली. त्यानंतर आमच्या ट्रकच्या ड्रायव्हरला बोलावून घेत त्याला तेलगू भाषेत काही तरी समजावून सांगितलं. मग माझ्याकडे वळून ते म्हणाले..

“आज हमारे फॉरेस्ट डिपार्टमेंट के सेंट्रल अँटी टीक स्मगलिंग फोर्स का annual इन्स्पेक्शन है.. यहाँ से “निर्मल-भैंसा” रास्ते तक जगह जगह पर डिटेल चेकिंग हो रही है.. बेवजह इस रास्ते पर आपको बहुत तकलीफ होगी.. रुकना भी पडेगा हर जगह.. यहाँ से महाराष्ट्र बॉर्डर तक जाने वाला एक कच्चा शॉर्ट कट है, जहाँ पर आज की चेकिंग नही है.. वहां से ये मिनी ट्रक आसानीसे निकल सकता है.. आप लोग हमारी सफारी जीप में पक्के रास्ते से स्टेट बॉर्डर तक जाइए.. ट्रक के साथ हमारा एक ऑफिसर रहेगा.. प्लीज, इन्कार मत करना..! आप को सच्चे दिल से मदत करना चाहता हूं.. !!”

दोन्ही हात जोडत सूर्यकुमार विनवणी करीत होते.

थोड्याशा अनिच्छेनेच आम्ही फॉरेस्टच्या जीप मध्ये बसलो. मी अद्याप रेंजर साहेबांशी एक शब्दही बोललो नव्हतो. आम्ही निघतानाही त्यांच्याकडे पहाणं मी हेतुपुरस्सरपणे टाळलं. टेन्ट मधून काही ब्रेड व बिस्कीटांचे पुडे मागवून ते आम्हाला देण्यासाठी त्यांनी ड्रायव्हरकडे दिले. जीप बरीच पुढे गेल्यावर मी सहज मागे वळून पाहिलं.. रेंजर साहेब अजूनही रस्त्यावर उभे राहून आमच्याकडेच पहात हात हलवून निरोप देत होते.

फॉरेस्टच्या जीपमधून म्हैसा (Bhainsa) जवळील महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून नांदेड जिल्ह्यातील भोकर पर्यंत पोहोचलो. थोड्याच वेळात आमचा मिनी ट्रक ही तिथे येऊन पोहोचला. ट्रक सोबत आलेल्या आंध्र प्रदेशच्या फॉरेस्ट ऑफिसर सोबत तिथल्याच एका हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता घेतला. आमचा निरोप घेताना त्या ऑफिसरने वायरलेस सेट वरून सूर्यकुमार साहेबांशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी माझ्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली.

आत्ता नुकत्याच केलेल्या मदतीबद्दल “थॅन्क्स!” असं म्हणून त्यांचे आभार मानले तेंव्हा उत्तरा दाखल बोलताना ते म्हणाले..

“सर, आय नो, मुझ पर बहुत नाराज हो आप.. ! न जाने हमारे मुल्क से कैसी कैसी भली बुरी यादें साथ ले कर जा रहे हो…

आप मेरे बंगले पर आकर गए.. आपको मेरे प्रायव्हेट हॉल मे जाते हुए मैने देख लिया था, ईसलिये उस दिन मै बाहर से ही वापस लौट गया था..

आपने मेरी ऐशो-आराम भरी, शौकिया पसंद, सुखभोगी, विलासितापूर्ण जिंदगी तो देख ली.. मेरी कथनी और करनी में अंतर भी देख लिया.. मै ऐसा ही हूं, मुझे लक्झरी लाईफ जीने की आदत सी पड़ गई है..

आपको अभी दुनिया का ठीक से तजुर्बा नही है.. दुनिया ऐसी ही है.. जो दिखती है वैसी कभी नही होती..

फिर भी, आपसे कहना चाहूंगा की जहां तक हो सके ईमानदारीसे ही जिंदगी बिताओ.. बेईमानी की कमाई से इकठ्ठा की हुई इन चीजों से सुख और आराम तो अवश्य मिलता है, लेकिन शांती और समाधान कभी नही मिल सकता..

मैने आपको अपरिग्रह का जो रास्ता बताया था, वो अपनाना बहुत कठिन तो है, लेकिन सच्चा सुख उसी रास्ते पर चलनेसे मिलता है.. मुझे अफसोस है के मै खुद इस रास्ते पर चल न सका..

आप की फॅमिली बहुत खुबसुरत है, आप हमेशा खुश रहे, सुखी और समाधानी रहे, यहीं कामना करता हूं.. भाभीजी को प्रणाम !”

एवढं बोलून सूर्यकुमार साहेबांनी वायरलेस कट केला. आज त्यांच्याशी एवढं कडवट, त्रयस्थपणे वागल्याबद्दल मला चुटपुट लागून राहिली होती.

महाराष्ट्रातील रुक्ष रस्त्यांवरून भोकर, वसमत, औंढा, जिंतूर, मंठा मार्गे आणखी आठ तासांचा कंटाळवाणा प्रवास करून दुपारी उशिरा जालन्याला पोहोचलो. उतनुरचे ते हिरव्यागार जंगलाचे, भोळ्या आदिवासींचे, निर्दयी पोलिसांचे, क्रूर नक्षलवाद्यांचे, नवनवीन साहसी, रोमांचक अनुभवांचे दिवस आता सरले होते. निरर्थक इर्षा, द्वेष, स्पर्धा, चढाओढ, लाचारी, चमचेगिरी यांनी भरलेल्या स्वार्थी शहरी दुनियेत आपण पुन्हा प्रवेश करीत आहोत असेच प्रवास करताना जाणवत होते.

… आज इतक्या वर्षांनंतरही उतनुरच्या सागवानी रॉकिंग चेअर बसून झुलत झुलत कधी जैन तत्वे, गीतेची वचने, गांधींचे विचार, बुद्धांची प्रवचने वाचतो आणि त्यात “अपरिग्रह” शब्दाचा उल्लेख येतो तेंव्हा रेंज फॉरेस्ट ऑफिसर सूर्यकुमार साहेबांचा रुबाबदार हसरा चेहरा, त्यांनी माझ्या घरी दिलेलं मोटिव्हेशनल स्पीच आणि त्यांचा तो आलिशान दिवाणखाना आठवतो.

(समाप्त)

.(मागील लेखांची लिंक).*

1. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान

2. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान-2 

3.*लोकां सांगे ब्रह्मज्ञान-3 

4..लोकां सांगे ब्रह्मज्ञान-4

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानका वर खिळवून ठेवतात.

निवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या वेळेत हे अनुभव लिहून काढले आणि त्यांच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केलेले आहेत, आणि ते सर्व अत्यंत लोकप्रिय झाले. बँकेतील, किंवा केवळ मित्रपरिवारातीलच  नाही, तर सर्व स्तरावरील वाचकांचा त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, आणि वाचक त्यांच्या पुढल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहू लागले.  आज त्यांच्याच फेस बुक वर या आधी प्रकाशित झालेल्या या  कथानकाचे  सादरीकरण या ब्लॉगवर करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे, 5 भागांची ही कथा मालिका आपल्या ब्लॉगवर प्रकाशित केली आहे.

amazon logo
wall clocks
CLICK FOR ONLINE SHOPPING AT AMAZON.