https://goodworld.in A website by Madhav Bhope

संत तुकारामांचे अभंग-4 Sant Tukaram abhang-4

tukaram-3

Sant Tukaram abhang-4 

संत तुकारामांचे अभंग-4 

महाराष्ट्रात 16 व्या आणि 17 व्या शतकात होऊन गेलेले थोर संत तुकाराम महाराज यांचे अभंग आपण पाहत आहोत. आतापर्यंत 3 भागांमध्ये आपण तुकाराम महाराजांचे कांही अभंग पाहिले. संत हे स्वभावतः क्षमाशील असतात. तुकाराम महाराजांची आणि मंबाजीची गोष्ट आपल्याला माहित आहे. पण संतांचे भांडण देवाशी असते. तसे अभंग बुडविल्यानंतर त्यांनी देवाशी भांडण मांडले होते, आणि नंतर अभंग वर आल्यावर त्यांना, देवाला विनाकारण त्रास दिल्याबद्दल पश्चात्तापही झाला होता. अशाच एका अभंगात, तुकाराम महाराज विठ्ठलाचा मायाळूपणा वर्णन करतांना, आपल्या अपराधांबद्दल क्षमा मागतात. या अभंगातील शब्दरचना ही किती गोड आहे-

 

तूं माउलीहून मायाळ । चंद्राहूनि शीतळ

पाणियाहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।

देऊं कशाची उपमा । दुजी तुज पुरुषोत्तमा

ओंवाळूनि नामा । तुझ्यावरूनि टाकिलों ।

तुवां केलें रे अमृता । गोड त्याही तूं परता

पांचां तत्त्वांचा जनिता । सकळ सत्तानायक ।

कांहीं न बोलोनी आतां । उगाच चरणीं ठेवितों माथा

तुका म्हणे पंढरिनाथा । क्षमा करीं अपराध ।

 

__________________________________

 

अशाच दुसऱ्या एका अभंगात आपल्याला अवगुणी, अन्यायी असे संबोधून ते विठ्ठलाचा धावा करतात. विठ्ठलाला ‘विठ्ठले’ म्हणून माऊलीरूप समजून हाक मारण्याची पद्धतही किती गोड आहे!

 

मी अवगुणी अन्यायी । किती म्हणोन सांगों काई

आतां मज पायीं । ठाव देई विठ्ठले ।

पुरे पुरे हा संसार । कर्म बळिवंत दुस्तर

राहों नेदी स्थिर । एके ठायीं निश्चळ ।

अनेक बुद्धीचे तरंग । क्षणक्षणां पालटती रंग

धरू जातां संग । तंव तो होतो बाधक ।

तुका म्हणे आतां । अवघी तोडीं माझी चिंता

येऊनि पंढरिनाथा । वास करीं हृदयीं ।

 

_____________________

विठ्ठलाच्या भेटीसाठी काकुळतीला येऊन केलेले अनेक अभंग वाचतांना आणि म्हणतांना तर डोळ्यात पाणी येते.

 

कन्या सासुऱ्यासी  जाये । मागे परतोनि पाहे

तेसें झालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा

चुकलिया माये । बाळ हुरूहुरू पाहे

जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी

 

 

भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी

पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसे माझें मन वाट पाहे

दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची

भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलोची

तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा

 

 

वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउले कैं वो डोळां

तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी

कां बा मोकलिलें कोणा निरविलें । कठिण कैसें झालें हृदय तुझें

तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा

 

__________________

 

ते विठ्ठलालाच, तुझे ध्यान कसे करू हे तूच सांग असे काकुळतीला येऊन विचारतात.

 

कैसे करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावी मज याचकासी

कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी

कैसी कीर्ति वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवणू कैसा तुज

कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चिती । कैसी स्थिती मती दावीं मज

तुका म्हणे जेसें दास केलें देवा । तेसें हें अनुभवा आणीं मज

 

_______________

 

आपल्यासारखी संसारी माणसें, देवाला, धन, धान्य, समृद्धि, कीर्ती, आणि काय काय मागतात. पण तुकाराम महाराजांचे मागणे अगदी माफक होते. माझा देह कुठेही असो, आणि कसल्याही अवस्थेत असो, पण चित्त मात्र तुझ्या पायी राहू दे, हेच त्यांचे मागणे होते. आणि देह अवसानी- म्हणजे देह सोडायची वेळ येईल तेंव्हा फक्त कफ-वात-पित्त हे दूर सारून ठेव, जेणे करून की मला तुझे नांव घेता येईल.  

 

आतां केशीराजा हेंचि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें

देह असो माझा भलतिये ठायीं । चित्त तुझ्या पायीं असां द्यावें

कफवातपित्त देहअवसानीं । ठेवावीं वारूनि दुरितें हीं

तुका म्हणे तूं या सकळांचा जनिता । येथें ऐक्यता सकळांसी

 

 

देवा आतां ऐसा करीं उपकार । देहाचा विसर पाडी मज

तरीच हा जीव सुख पावे माझा । बरें केशीराजा कळों आलें

ठाव देई चित्ता राखें पायांपाशीं । सकळ वृत्तींसी अखंडित

आस भय चिंता लाज काम क्रोध । तोडावा संबंध यांचा माझा

मागणें तें एक हेंचि आहे आतां । नाम मुखीं संतसंग देई

तुका म्हणे नको वरपंग देवा । घेई माझी सेवा भावशुद्ध

 

______________________

 

तुकाराम महाराज कीर्तन करू लागले, लोक त्यांच्या कीर्तनाला येऊ लागले, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊ लागले, आणि तुकाराम महाराजांचे नांवही होऊ लागले. पण ते या कीर्तीने अस्वस्थ होत आणि पुन्हा विठ्ठलाची करुणा भाकून यापासून वाचव म्हणून साकडे घालत.

 

 

नव्हें दास खरा । परि हा झालासे डांगोरा

यासी काय करू आतां । तूं हें सकळ जाणता

नाहीं पुण्य गाठीं । जें हें वेचूं कोणासाठी

तुका म्हणे कां उपाधि । वाढविली कृपानिधि

 

दिवट्या छत्री घोडे । हें तों बऱ्यात  न पडे

आतां येथें पंढरिराया । मज गोविसी कासया

मान दंभ चेष्टा । हे तो शूकराची विष्ठा

तुका म्हणे देवा । माझे सोडवणें धांवा

 

नावडे जें चित्ता । तेंचि होसी पुरविता

कां रे पुरविलो पाठी । माझी केली जीवें साठीं

न करावा संग । वाटे दुरवावें जग

सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात

जन धन तन । वाटे लेखावें वमन

तुका म्हणे सत्ता । हातीं तुझ्या पंढरीनाथा

 

 

तुकाराम महाराजांचे खूप अभंग खूप प्रसिद्ध आहेत. आपण इथे त्यातील काही कमी प्रसिद्ध असे अभंग पाहत आहोत. या वाटचालीत पुढील भागात आपण अजून काही अभंग पाहणार आहोत.

आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. किंवा लाईक करणे.

माधव भोपे

संत तुकारामांचे अभंग-3 Sant Tukaram abhang-3

tukaram-3

Sant Tukaram abhang-3

संत तुकारामांचे अभंग-3

संत तुकारामांचे अभंग पाहत असतांना आपण मागील लेखात काही स्फुट अभंग पाहिले..

तुकरामांनी त्यांच्या अभंगात ठिकठिकाणी आपल्या जीवनातील काही घटना कुठलाही आडपडदा न ठेवता वर्णन केल्या आहेत. खालील अभंगात त्यांनी आपल्या जन्मापासून ते इंद्रयाणीत वह्या बुडवीपर्यन्तच्या वेगवेगळ्या घटना थोडक्यात वर्णन केल्या आहेत.

तुकाराम महाराज वाणी समाजाचे; त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले होते.

तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते. तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली.

संत तुकारामांना चार मुले होती. त्यापैकी दोन आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती पण नवऱ्याला माया लावणारी होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली.Sant Tukaram abhang-3

नंतर, प्राकृतात रचना केली म्हणून जेंव्हा त्यांना त्यांचे अभंग इंद्रयाणीत बुडविण्याची आज्ञा झाली, तेंव्हा अभंग इंद्रयाणीत बुडवून ते व्यथित होऊन इंद्रायणीकाठीच तेरा दिवस आकांत मांडून, देवाशी भांडण काढून बसले. नंतर त्यांच्या अभंगांच्या वह्या कोरड्या बाहेर आल्यानंतर, देवाला आपल्यासाठी विनाकारण त्रास दिल्याबद्दल त्यांना पश्चाताप झाला. तेही त्यांनीं आपल्या अभंगांतून व्यक्त केले आहे.

 याती शूद्र वैश्य केला वेवसाव । आधीं तो हा देव कुळपूज्य

नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्‍न तुम्हीं संतीं

संवसारें जालों अतिदुःखें दु:खी । मायबापें सेखीं क्रमिलिया

दुष्काळें आटिलें द्रव्य नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली

लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देखें तुटी येतां

देवाचें देऊळ होतें जें भंगलें । चित्तासी तें आलें करावेंसें

आरंभीं कीर्तन करी एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं

कांहीं पाठ केलीं संतांची उत्तरें । विश्‍वासें आदरें करोनियां

गाती पुढें त्यांचें धरावें ध्रुपद । भावें चित्त शुद्ध करोनियां

संतांचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली

ठाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि

वचनें मानिलीं नाहीं सुहृदांचीं । समूळ प्रपंची वीट आला

सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां

मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं

यावरी या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे

निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखवलें

बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान

विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे

आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे

भक्तां नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें

तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगे

 


 

अभंगांच्या वह्या बुडविल्यानंतरचा आकांत त्यांनीं खालील अभंगात मांडला आहे

तेरा दिवस झाले निश्‍चक्र करितां पवसी अनंता मायबापा

पाषाणांची खोळ घेऊनि बैसलासी काय हषीकेशी झालें तुज

तुजवरी आतां प्राण मी त्यजीन हत्या मी घालीन पांडुरंगा

फार विठाबाई धरिली तुझी आस करीन जीवा नाश पांडुरंगा

तुका म्हणे आतां मांडिले निर्वाण प्राण हा सांडीन तुजवरी

 

आणि जेंव्हा विठ्ठलाच्या कृपेने तेराव्या दिवशी अभंगांच्या वह्या कोरड्या बाहेर आल्या त्यावेळी झालेला पश्चात्ताप त्यांनीं खालील अभंगात व्यक्त केला आहे.

थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला

जनाचियां बोला साठीं चित्त क्षोभविलें

भागविलासी केला सीण अधम मी यातीहीन

झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों

अवघें घालूनियां कोडें तहानभुकेचें सांकडे

योगक्षेम पुढें तुज करणें लागलें

उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद

तुका म्हणे ब्रीद साच केलें आपुलें

 

संसारात इतक्या विपत्ति आल्या तरी ‘जे होते ते बऱ्यासाठीच’, या विचाराने ते लिहितात-

बरें झालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली

अनुतापें तुझें राहिलें चितन । झाला हा वमन संवसार

बरें झालें देवा बाईल कर्कशा । बरी हे दुर्दशा जनामध्यें

बरें झालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ठोरें गुरे

बरें झालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा

बरें झालें तुझें केलें देवाईल । लेंकरें बाईल उपेक्षिलीं

तुका म्हणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासी जागरण

 ____________________

 तुकाराम महाराजांना त्यांच्या गुरूची फक्त ओझरतीच भेट झाली. राघवचैतन्य केशवचेतन्य- बाबाजी असे त्यांच्या गुरूंचे नांव असल्याचे तुकाराम महाराज सांगतात. माघ शुद्ध दशमी, गुरुवारी त्यांनीं गंगास्नानाला (इंद्रायणी) जातांना आपल्याला अचानक ‘सापडविले’, आपल्या डोक्यावर हात ठेवला, आणि ‘रामकृष्ण हरि’ हा मंत्र दिला, असे ते सांगतात. पण गुरूंची काही सेवा घडली नाही म्हणून ते खंत पण व्यक्त करतात.

babaji chaitanya

 सद्गुरुरायें कृपा मज केली । परि नाहीं घडलीं सेवा कांहीं

सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर

राघवचैतन्य केशवचेतन्य । सांगितली खूण माळिकेची

बाबाजी आपुलें सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि

माघ शुद्ध दशमी पाहूनी गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे


रामकृष्ण हरि या नांवाचा आधीच त्यांना छंद लागला होता, आणि गुरूंनी तोच त्यांच्या आवडीचा मंत्र त्यांना सांगितला. त्यांना कुठे गुहेत जावे लागले नाही, की तप करावे लागले नाही, हेही त्यांनीं सांगितले आहे.

माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुरावो

आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें नोहे गुंफा कांहीं कोठें

जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत

जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटे

तुका म्हणे मज दावियेला तारू कृपेचा सागरु पांडुरंग


मागील एका लेखात जसे आपण बघितले होते, तोच अभंग इथे पुन्हा उद्धृत करीत आहोत, ज्याच्यात त्यांनीं नामदेवांनी आपल्याला त्यांचे राहिलेले कार्य पूर्ण करण्याबद्दल स्वप्नात येऊन सांगितल्याचा उल्लेख आहे.

ामदेवें केलें स्वप्नामाजीं जागें । सवें पांडुरंगे येऊनियां

सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नये

शेवटील स्थळ नीच माझी वृत्ति । आधारें विश्रांती पावईन

नामदेवापायीं तुकया स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे

संत तुकारामांची अभंग संपदा एवढी मोठी आहे, आणि एवढी रसाळ आहे, की त्यातून निवड करणे शक्य नाही. तरी आपण त्यातील काही मुख्य मुख्य अभंग येत्या काही लेखांत पाहणार आहोत.

आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. किंवा लाईक करणे.

 

 

माधव भोपे

संत तुकारामांचे अभंग-2 Sant Tukaram abhang-2

vithal rukmini

Sant Tukaram abhang-2

संत तुकारामांचे अभंग-2

संत तुकारामांचे अभंग आपण बघत आहोत. लौकिक अर्थाने संत तुकारामांचे जीवन हे कष्टाने भरलेले होते. त्यांचा पिढीजात व्यवसाय जो सावकारीचा होता, तो त्यांनी आपली ऋणकोंची कर्जें माफ करून संपवून टाकला होता. संसारात त्यांचे चित्त लागत नव्हते. त्यात दुष्काळ पडला. बायको मुलांना खायला घालायची पण पंचाईत. संसारात मन लागत नव्हते आणि ईश्वरप्राप्ती अजून झाली नव्हती, अशा विमनस्क अवस्थेत, आपल्या आराध्य दैवताला- पंढरीच्या पांडुरंगाला आळवणे एवढेच त्यांना सुचत होते

देखत होतों आधीं मागें पुढें सकळ

मग हे दृष्टि गेली वरी आलें पडळ

तिमिर कोंदलेंसे वाढे वाढतां प्रबळ

भीत मी झालों देवा काय ज्याल्याचें फळ ।

आतां मज दृष्टि देई पांडुरंगा मायबापा

शरण मी आलों तुज निवारूनियां पापा

अंजन लेववूनी करीं मारग सोपा

जाईन सिद्धपंथें अवघ्या चुकतील खेपा ।

होतसे खेद चित्ता कांहीं नाठवे विचार

जात होतों जनामागें तो हि सांडिला आधार

हा ना तो ठाव झाला अवघा पडिला अंधार

फिरली माझीं मज कोणी न देती आधार ।

जोंबरी चळण गा तोंवरी म्हणती माझा

मानिती लहान थोर देहसुखाचिया काजा

इंद्रिये मावळलीं आला बागूल आजा

कैसा विपरीत झाला तोचि देह नव्हे दुजा ।

गुंतलो या संवसारें केसा झालोंसें अंध

मी माझें वाढवूनी मायातृष्णेचा बाध

स्वहित न दिसेचि केला आपुला वध

लागले काळ पाठीं सवें काम हे क्रोध ।

लागती चालतां गा गुणदोषांच्या ठेंसा

सांडिली वाट मग झालों निराळा कैसा

पाहातों वास तुझी थोर करूनी आशा

तुका म्हणे वैद्यरजा पंढरीच्या निवासा ।

यातील इंद्रिये मावळलीं आला बागूल आजा या ओळी विशेषतः ज्यांचे वय झाले आहे, एक एक अवयव साथ सोडत आहेत, त्यांच्या मनाला भिडतील अशा आहेत- “इंद्रियें मावळली” ही शब्दरचना किती प्रभावी आहे! आणि “आला बागुल आजा”- लहानपणी आई ज्या बागुलबुवाची भीती दाखवायची तो आता वृद्धपणी दिसू लागला- आणि कैसा विपरीत झाला तोचि देह नव्हे दुजा तरुणपणी निरोगी आणि देखणा असणारा देह म्हातारपणी किती वेगळा आणि कुरूप दिसू लागला! तरुणपणी संसारात गुंतल्याने, मी आणि माझे या माया, तृष्णेच्या जाळ्यात गुंतल्याने देवाकडे चित्त लागले नाही- स्वहित साधण्याची आठवण राहिली नाही- म्हणून आता पंढरीच्या  वैद्याचा धावा करीत आहे.

वरील अभंगातील वर्णन हे आपल्यासारख्या संसारी माणसाचे वर्णन करण्यासाठी केले असावे. कारण तुकाराम महाराज तर भक्तीच्या रसात न्हाऊन निघाले होते.


जेंव्हा पांडुरंगाची कृपा झाली, त्याने आपली भक्ति दिली, तेंव्हा भक्तिरसात न्हाऊन त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात-

आजी आनंदु रे एकी परमानंदु रे । जया श्रुति नेति नेति म्हणती गोविंदु रे

विठोबाचीं वेडी आम्हां आनंदु सदा । गाऊं नाचूं वाहूं टाळी रंजवूं गोविंदा

सदा सण सांत आम्हां नित्य दिवाळी । आनंदें निर्भर आमचा कैवारी बळी

तुका म्हणे नाहीं जन्ममरणाचा धाक । संत सनकादिक हे तों आमचें कवतुक


आहा आहा रे भाई ।

खालील काही अभंग -आहा आहा रे भाई । असे म्हणून खूप मोलाचा उपदेश केला आहे-

आहा आहा रे भाई ।

जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान

धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ।

पराविया नारी माउलीसमान । परधनीं बाटों नेदीं मन

जीवित्व तें तृणासमान । स्वामिकाजीं जाण शूर म्हणों तया आम्ही ।

शक्ति वेचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा

सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथें आले हो सांगतों ।

व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर

पुण्य तें असे गातां नाचतां फार । पुन्हां बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ।

संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा

पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ।

तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोखडी

पुढती पुढती अधिक गोडी । भरूनि कळस भजन आवडी

केशवदास नटतसे ।

वरील अभंगात विठ्ठलाच्या भक्तांना वारकरी पंथाची तत्वें सांगितली आहेत- अभिमान जिंका, देवाच्या भक्तिमध्ये लज्जा आणि मान ठेवू नका, पर नारीला माऊलीसमान माना, परधनाची आशा धरू नका ( ह्या दोन तत्वांची आज समाजाला किती आवश्यकता आहे!), सोमवार आणि एकादशी व्रत करा, (वारकऱ्यांची ही ओळख आहे).


यापुढील एक रचना अगदी रोखठोकपणे समजातील अप प्रवृत्तींवर प्रहार करणारी आहे-

आहा आहा रे भाई ।

थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वायां बाहेरी

बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकाऱ्यास नये दारा

विद्याबळें वाद करूनियां छळी । आणिकांसी फळी मांडोनियां

गांवींचिया देवा नाही दंडवत । ब्राह्मण अतीत घडेचि ना

सदा सर्वकाळ करितोचि निंदा । स्वप्नींही गोविंदा आठवीना

खाचेमध्यें धन पोटासी बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं

तुका म्हणे नटें दावूनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावे

 बाईलेचा दास- पितरांस उदास- जन्मदात्या आई वडिलांच्या उपकारांची जाणीव न ठेवणे- हे प्रत्येक पिढीत वाढत चालले आहे. ‘दान’ देण्याची दानत कोणामध्ये राहिली नाही- प्रत्येकजण फक्त घेण्याचेच बघतो..

 ________________

या उलट यापुढील रचनेत, जे लोक देवाला आळवतात, माता पित्यांची सेवा करतात, इतरांचे सुख दुःख जाणतात अशा परोपकारी जनांना मनापासून नमन करतात-

आहा आहा रे भाई ।

नमो उदासीन झाले देहभावा । आळविती देवा तया नमो

नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती बोळवित त्यांसी नमो

नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरूचें त्या

नमो तया मातापित्यांचें पाळण । नमो त्या वचन सत्य वदे

नमो तयां जाणे आणिकांचें सुखदु:ख । राखे तहान भूक तया नमो

परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसी

तुका म्हणे नमो हरीचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे


यापुढील रचनेत गंगा, पिंपळ, तुळशी, रुद्राक्ष इत्यादि पवित्र वस्तूंचे महत्व सांगतात.

आहा आहा रे भाई ।

 गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ

तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ।

गरुड नव्हे पाखरू । ढोर नव्हे नंदिकेश्‍वरू

झाड नव्हे कल्पतरु । कामधेनु गाय न म्हणावी ।

कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी

तुका पांडुरंगी । हा प्रसाद लाधला ।

तुकाराम महाराज, आपले चरित्र काही अभंगांमधून अगदी वास्तव रीतीने वर्णन करतात, असे काही अभंग आपण पुढील भागात पाहणार आहोत.

 

माधव भोपे

 

संत तुकारामांचे अभंग-1 Sant Tukaram abhang-1

tukaram-3

Sant Tukaram abhang-1

संत तुकारामांचे अभंग-1

महाराष्ट्रातील संतांच्या अभंगांबद्दल माहिती करून घेतांना, सुरुवातीच्या १० भागांमध्ये आपण १३ व्या शतकातील संत नामदेव यांच्या अभंग संपदेतील काही अभंगांची माहिती घेतली.

येत्या काही भागांमध्ये आपण १६ व्या आणि १७ व्या शतकातील, थोर संत कवि तुकाराम महाराज यांच्या रसाळ अभंगांची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील संतांचे अभंग आणि रचना इथल्या प्रत्येक स्त्री पुरुष लहान थोर यांच्या रक्तातच भिनले आहेत असे म्हटले तरी चालेल, इतके ते आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य अंग बनले आहेत. वारकऱ्यांच्या तोंडात तर संत तुकारामांचे अभंग सतत असतात, कीर्तनकारांच्या कीर्तनातही संत तुकारामांच्या अभंगांशिवाय पान हलत नाही. आणि घरोघरी संत नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ आणि तुकाराम यांचे हरिपाठाचे अभंग हे नित्य म्हटल्या जाणाऱ्यापैकी आहेत.

सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची

ओवी ज्ञानेशाची आर्या मयूरपंतांची

संत तुकारामांच्या अभंगांची शब्दरचना अत्यंत प्रभावकारी आणि प्रत्ययकारी आहे. त्यांचे अभंग हे त्यांच्या अनुभवातून आपोआप उमटलेले शब्द आहेत. त्यामुळे त्यांची प्रत्येक रचना ही सरळ मनाला भिडते.

संत नामदेवांचे राहिलेले कार्य त्यांनी आपल्याकडून करून घेतले आहे, अशी तुकाराम महाराजांची धारणा होती.

नामदेवें केलें स्वप्नामाजी जागें । सवें पांडुरंगें येऊनियां ॥१॥
सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नको ॥ध्रु.॥
माप टाकी सळे धरिली विठ्ठलें । थापटोनि केलें सावधान ॥२॥
प्रमाणाची संख्या सांगे शत कोटी । उरले ते शेवटीं लावी तुका ॥३॥

संत नामदेव माझ्या स्वप्नात आले, त्यांच्या संगे पांडुरंग येऊन मला त्यांनी जागृत केले. देवाचे वर्णन करणारे  कवित्व करावे, उगीच व्यर्थ गोष्टींबद्दल बोलू नको असे सांगितले,  व तू अभंगाचे माप पुरपूर टाक, असे त्यांनी मला थापटून सावध करून सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात संत नामदेवांनी मला सांगितले की,”मी शतकोटी अभंग रचना करण्याची प्रतिज्ञा केली आहे त्यापैकी मी शहाण्णव कोटी अभंग केले आहेत उरलेले चार कोटी अभंग तू कर”

भागवत धर्माचा, वारकरी पंथाच्या इमारतीचा पाया ज्ञानदेवांनी रचला, आणि संत तुकाराम हे त्या इमारतीचे कळस झाले, असे संत बहिणाबाई म्हणून गेली आहे.

संतकृपा झाली । इमारत फळा आली ।।

ज्ञानदेवें रचिला पाया । उभारिले देवालया ।।

नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार ।।

जनार्दन एकनाथ । खांब दिला भागवत ।।

तुका झालासे कळस । भजन करा सावकाश ।।

बहेणी फडकते ध्वजा । निरुपण आले ओजा ।।

 

संत तुकारामांच्या काळी, महाराष्ट्रात मोगल आणि इतर आक्रमकांचा धुमाकूळ सुरू होता. प्रजेला कोणी वाली उरले नव्हते. लोकांमध्ये अंधश्रद्धा बोकाळली होती. अशा वेळी, जनजागृती करण्याचे आणि अंधश्रद्धेवर प्रहार करण्याचे कामही संत तुकारामांनी केले. त्याच वेळी छत्रपति शिवाजी महाराजांचा उदय झाला. संत तुकारामांची आणि शिवाजी महाराजांची भेट प्रसिद्ध आहे.

 

संत तुकाराम महाराजांचे अभंग पाहतांना आपण सुरूवातीला त्यांचे भक्तिरसाने ओथंबलेले काही अत्यंत प्रसिद्ध अभंग पाहणार आहोत.

 

सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां

तुळसीहार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर हेंचि ध्यान

मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित

तुका म्हणे माझे हेंचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें

 

 

अत्यंत कमी शब्दात पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती डोळ्यासमोर आणणारा हा अभंग हा वारकऱ्यांच्या, कीर्तनकारांच्या अत्यंत आवडीचा आहे.


 

राजस सुकुमार मदनाचा पुतळा । रविशशिकळा लोपलिया

कस्तुरी मळवट चंदनाची उटी । रुळे माळ कंठीं वैजयंती

मुकुट कुंडले श्रीमुख शोभलें । सुखाचें ओतलें सकळही

कासे सोनसळा पांघरे पाटोळा । घननीळ सांवळा बाइयांनो

सकळही तुम्ही व्हा गे एकीसवा । तुका म्हणे जीवा धीर नाहीं

आपल्या विठ्ठलाचे सौंदर्य वर्णन करतांना तुकाराम महाराज त्याला ‘राजस सुकुमार- मदनाचा पुतळा-‘ अशी उपमा देतात. त्याच्यासमोर चंद्र आणि सूर्य यांचे तेज लोप पावते. ‘कासे सोनसळा- कंबरेला सोनेरी पितांबर आणि- पांघरे पाटोळा (पाटोळा म्हणजे पांघरायचे वस्त्र) असा हा घननीळ- मेघासारखा निळा रंग असलेला माझा विठ्ठल पाहण्यासाठी मला धीर निघत नाही.- याठिकाणी तुकाराम महाराज स्वतःला गोपीच्या स्वरूपात पाहतात- आणि म्हणतात- सकळही तुम्ही व्हा गे एकसवा- तुम्ही सगळ्या एका बाजूला व्हा- आणि मला माझ्या घन नीळाला पाहू द्या.

 

खेळिया

 

मागे संत नामदेवांचे अभंग पाहतांना आपण नव्हे तें चि कैसें झाले रे खेळिया | नाहीं तें चि दिसूं लागलें रे

अरूप होतें तें रूपासी आलें । जीव-शिव नांव पावलें रे

आपली चि आवडी धरुनी खेळिया | आप आपणातें व्यालें रे

या अभंगात संत नामदेवांनी संसार हा खेळ समजून कसा खेळायचा ते सांगितले आहे ते पाहिले होते आणि त्यात त्यांनी सहजरित्या अद्वैत सिद्धांत सांगितला होता.

संत तुकाराम सुद्धा त्यांच्या पर्यन्त होऊन गेलेल्या संतांची महति सांगतांना, हा खेळ त्याच्या नियमानुसार जो खेळेल तोच ‘उतरेल’ असे सांगतात. सगळीकडे एकत्व पाहिल्यास तुझ्यावर ‘डाव’ येणार नाही. द्वैतबुद्धि ठेवली, तर फसगत होईल. त्रिगुणांच्या फेऱ्यात सापडला तर दुःखी होशील, पण ‘या चौघांची’ म्हणजे चार वेदांची आज्ञा पाळशील तर दुःखी होणार नाहीस असे सांगतात.

एके घाई खेळतां न पडसी डाई । दुचाळ्यानें ठकसील भाई रे

त्रिगुणांचे फेरी थोर कष्टी होसी । या चोघांची तरी धरीं सोई रे

 

खेळ खेळोनियां निराळाचि राही । सांडी या विषयांची घाई रे ।

सिंपियाचा पोर एक खेळिया नामा । तेणें विठ्ठल बसवंत केला रे

 

या खेळात गुंतायचे नाही- निराळेच राहायचे- खेळ हा खेळ म्हणूनच खेळायचा- नामदेव या शिंप्याच्या पोराने विठ्ठल ‘बसवंत’ केला- तो खेळात नाही अडकला.

 

आपुल्या संवगडिया सिकवूनि घाई । तेणें सतत फड जागविला रे

एक घाई खेळतां तो न चुकेचि कोठें । तया संत जन मानवले रे ।

ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा । सोपान आनंदें खेळती रे

कान्हो गोवारी त्यांनीं बसवंत केला । आपण भोंवतीं नाचती रे

सकळिकां मिळोनी एकचि घाई । त्याच्या ब्रह्मादिक लागती पायी रे ।

रामा बसवंत कबीर खेळिया । जोडा बरवा मिळाला रे

पांचा संवगडियां एकचि घाई । तेथें नाद बरवा उमटला रे

ब्रह्मादिक सुरवर मिळोनियां त्यांनी । तो ही खेळिया निवडिला रे ।

ब्राह्मणाचा पोर खेळिया एका भला । तेणें जन खेळकर केला रे

जनार्दन बसवंत करूनियां । तेणें वैष्णवांचा मेळ मेळविला रे

एकचि घाई खेळतां खेळतां । आपणचि बसवंत झाला रे ।

 

ब्राह्मणाचा पोर- म्हणजे एकनाथ- याने आपले गुरू -जनार्दन यांना ‘बसवंत’ केले- आदर्श मानले आणि गुरूंच्या उपदेशामुळे, ते स्वतःच ‘बसवंत’ झाले.

आणीक खेळिये होऊनियां गेले । वर्णावया वाचा मज नाहीं रे

तुका म्हणे गडे हो हुशारूनि खेळा । पुढिलांची धरूनियां सोई रे

एकचि घाई खेळतां जो चुकला । तो पडेल संसारडाई रे ।

 


 

आणि खालील अभंगात- भीमातीरि विठ्ठलाच्या आनंदात नाचणाऱ्या वैष्णवांच्या आनंद सोहळ्याचे अप्रतिम वर्णन केले आहे. हा अभंग स्वर सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्वरांनी आणि श्रीनिवास खळे यांच्या संगीतानी अजूनच विलोभनीय केला आहे-

 

खेळ मांडियेला वाळवंटी घाई । नाचती वैष्णव भाई रे

क्रोध अभिमान केला पावटणी । एक एका लागतील पायीं रे ।

नाचती आनंदकल्लोळीं । पवित्र गाणें नामावळी रे

कळिकाळावरी घातलीसे कास । एक एकाहुनी बळी रे ।

लुब्धली नादीं लागली समाधि । मूढ जन नर नारी लोकां रे

पंडित ज्ञानी योगी महानुभाव । एकचि सिद्धसाधकां रे ।

वर्णाभिमान विसरली याति । एक एकां लोटांगणीं जाती रे

निर्मळ चित्तें झालीं नवनीतें । पाषाणा पाझर सुटती रे ।

होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे

तुका म्हणे सोपी केली पायवाट । तरावया भवसागर रे ।

होतो जयजयकार गर्जत अंबर । मातले हे वैष्णव वीर रे

वरील ओळी ऐकून अक्षरशः अंगावर शहारा येतो- मातले हे वैष्णव वीर रे! काय शब्दरचना आहे!

संत तुकारामांचे ‘तुकाराम गाथा’ या स्वरूपात जवळ जवळ ४५८३ अभंग आहेत. सगळ्या अभंगांचा अभ्यास करायचा म्हटले तर अक्खा जन्म सुद्धा कमी पडेल. आपण येत्या काही लेखांत, आचार्य विनोबा भावे यांनी निवडलेले काही अभंग आणि इतर काही अभंग पाहणार आहोत.

 

 

माधव भोपे 

संत नामदेवांचे अभंग-10 Sant Namdev Abhang-10

namdev

Sant Namdev Abhang-10

संत नामदेवांचे अभंग-10

रामकृष्ण परमहंसांची एक गोष्ट प्रसिद्ध आहे. एकदा एक साधक त्यांच्याकडे आला आणि खूप दिवस झाले, मी साधना करीत आहे पण अजून मला ईश्वर प्राप्ती होत नाही असे सांगू लागला. रामकृष्ण त्याला जवळच्या नदीत घेऊन गेले. त्यांनी त्याचे डोके पाण्याखाली दाबून धरले. तो साधक श्वास घेण्यासाठी जिवाच्या आकांताने धडपड करू लागला. मोठ्या प्रयत्नाने त्याने रामकृष्णांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली आणि बाहेर येऊन म्हणू लागला, “हे काय? माझा जीव घेणार होतात की काय आज? मी तुमच्याकडे ईश्वर प्राप्ती करून घ्यायसाठी आलो आणि तुम्ही तर माझा जीव घ्यायला निघलात! रामकृष्ण म्हणाले, “मी जेंव्हा तुला पाण्याखाली दाबून धरले होते, तेंव्हा तुला सगळ्यात जास्त आवश्यकता कशाची वाटली?”

“कशाची म्हणून काय विचारता? श्वास घेण्यासाठी माझा जीव तडफडत होता! मला सगळ्यात जास्त आवश्यकता तेंव्हा श्वास घेण्याची वाटत होती!”

तेंव्हा रामकृष्ण म्हणाले, “इतकी तीव्रतेने जेंव्हा तुला ईश्वरप्राप्तीची आवश्यकता वाटेल, ईश्वरा शिवाय एक क्षण ही राहणे जेंव्हा तुला अशक्य होईल, तेंव्हा, तत्क्षणीच तुला ईश्वर प्राप्ती होईल!”

सर्व संतांची आपल्याला हीच अवस्था दिसते. म्हणूनच त्यांना ईश्वरप्राप्ती झालेली असते. “चुकलिया माये, बाळ हुरूहुरू पाहे”.. “जीवनावेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी” अशा अभंगांमधून संत तुकाराम महाराज आपली तळमळ व्यक्त करतात.

संत नामदेवही आपली साधक अवस्थेतील तळमळ खालील अभंगांतून व्यक्त करतात-

जननिये जिवलगे ये वो पांडुरंगे शिणलों भेटी दे गे एक वेळां

त्राहे त्राहे त्राहे कृपादृष्टी पाहे | येऊनियां राहें हृदयामाजीं

वासनेच्या संगें शिणले माझें चित्त विषयाचे आघात पडती वरी

नाहीं तुझी सेवा केली मनोधर्मे   संसारसंभ्रमें भ्रांत सदा

नाहीं तुझें नाम गाइले आवडी | वाळली कुर्वंडी त्रिविध तापें

नामा म्हणे आई धांवें लवलाहीं बुडतों चिंताडोहीं काढीं मज

साधकाला जेंव्हा आपले अपराध कळून येतात, अनेक प्रयत्नांनीही विषय, वासना आटोक्यात येत नाही हे जेंव्हा कळते, तेंव्हा अनन्य भावाने आपल्या जननीचा धावा करणे हेच त्याला सुचते.

तुमची आमची अशी अवस्था असते की आपल्यासारखे चांगले आपणच अशी आपली पक्की धारणा असते. आपले दोष आपल्याला कधीच दिसून येत नाहीत. मग त्यांच्याबद्दल वाईट वाटणे तर दूरच. पण संतांची अवस्था अशी नसते. त्यांना आपण म्हणजे अपराधांची राशी आहो असे वाटत असते-

काय गुणदोष माझे विचारिसी | आहें मी तों राशी अपराधांची

अंगुष्ठापासोनि मस्तकापर्यंत | अखंड दुश्‍चित आचरलों

स्वप्नी देवा तुझी नाहीं घडली भक्ति| पुससी विरक्ति कोठोनियां

तूं चि माझा गुरु तूं चि तारी स्वामी | सकळअंतर्यामी गाऊं तुज

नामा म्हणे माझें चुकवीं जन्ममरण | नको करूं शीण पांडुरंगा

देवाच्या नांवाचा महिमा तर कळला आहे, पण मुखी नांव मात्र येत नाही. अमृत साक्षात समोर दिसत असूनही ते घेण्याची इच्छा होत नाही.

पण संतांनी या अभंगांतून, स्वतःच्या मिषाने खरे तर तुमच्या आमच्यासारख्या संसारी जीवांची अवस्था वर्णन केली आहे, असे जाणवते.

https://www.aathavanitli-gani.com/Song/Amrutahuni_God_Naam

अमृताहुनी गोड नाम तुझें देवा | मन माझें केशवा कां बा नेघे

सांग पंढरीराया काय करूं यासी | कां रूप ध्यानासी ये तुझें

कीर्तनीं बैसतां निद्रें नागविले | मन माझें गुंतले विषयसुखा

हरिदास गर्जती हरिनामकीर्ति | ये माझ्या चित्तीं नामा म्हणे

___________________________________

बालकामध्ये कोणती विशेषता असते? कोणतेही संकट आले, की त्याला फक्त आईचा धावा करणे, आईच्या कुशीत लपणे, हेच माहिती असते.

अग्नीमाजी पडे बाळु । माता धांवे कनवाळु

तैसा धांवें माझिया काजा | अंकिला मी दास तुझा

वणवा लागलासे वनीं । पाडस चिंतीत हरिणी

नामा म्हणे मेघा जैसा | विनवितो चातक तैसा

तूं माझी माउली मी वो तुझा तान्हा | पाजीं प्रेम पान्हा पांडुरंगे

तूं माझी गाउली मी तुझें वासरूं | नको पान्हा चोरूं पांडुरंगे

तूं माझी हरिणी मी तुझें पाडस | तोडी भवपाश पांडुरंगे

तूं माझी पक्षिणी मी तुझें अंडज | चारा घालीं मज पांडुरंगे

नामा म्हणे होसी भक्‍तीचा वल्लभ | मागें पुढें उभा सांभाळिसी

वरील अभंगात ‘माऊली-तान्हा’, ‘गाऊली-वासरू’, ‘हरिणी-पाडस’, ‘पक्षिणी-अंडज’ अशा कितीतरी उपमा देऊन नामदेव महाराज आपले आणि पांडुरंगाचे बालक आणि मातेचे नाते वर्णन करतात.  

 ___________________________________

तसेच खालील अभंगातील शब्दरचना किती गोड आहे- ‘भुकाळु, कृपाळु, सांभाळु’ अशा शब्दांनी त्यातील कोमल भाव नेमका व्यक्त होतो.

येई वो कृपावंते अनाथांचे नाथे | निवारीं भवव्यथे पांडुरंगे

मी बाळक भुकाळु तूं माउली कृपाळु करी माझा सांभाळु पांडुरंगे

मी देह तूं चैतन्य मी क्षुधार्त तूं अन्न | मी तृषार्त तूं जीवन पांडुरंगे

मी चकोर तूं चंद्र मी सरिता तूं सागर मी याचक तूं दातार पांडुरंगे

मी धनलोभी शुद्ध तूं पूर्ण कनककुंभ | मी मगर तूं अंभ पांडुरंगे

मी चातक तूं मेघ मी प्रवृत्ति तू बोध मी शुष्क नदी तूं ओघ पांडुरंगे

मी दोषी तूं तारक मी भृत्य तूं नायक | मी प्रजा तूं पाळक पांडुरंगे

मी पाडस तूं कुरंगिणी मी अंडज तूं पक्षिणी मी अपत्य तूं जननी पांडुरंगे

मी भक्ति तूं निजसोय मी ध्यान तूं ध्येय | मी आडळ तूं साह्य पांडुरंगे

शीघ्र येई वो श्रीरंगे भक्‍तमानसरंगे | प्रेमपान्हा दे गे नामदेवा

_____________________________________

 खालील गीत तर सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात सकाळच्या मंगल प्रभात कार्यक्रमात आपण बऱ्याचदा ऐकतो.

https://www.aathavanitli-gani.com/Song/Pakshini_Prabhati_Chariyasi

पक्षिणी प्रभातीं चारियासी जाये | पिलू वाट पाहे उपवासी

तैसें माझें मन करी वो तुझी आस | चरण रात्रंदिवस चिंतीतसे

तान्हें वत्स घरीं बांधलेसें देवा तया हृदयीं धांवा माउलीचा

नामा म्हणे केशवा तूं माझा सोइरा | झणीं मज अव्हेरा अनाथनाथा

 

_____________________________________

जे काही मागायचे ते केशवा जवळच मागायचे- आणि मागायचे ते काय- विषय भोग नाही, तर त्याचीच अनन्य भक्ति- खालील अभंगसुद्धा ‘मंगला नाथ’ यांच्या आवाजात आपण भक्ति गीतांच्या कार्यक्रमात बऱ्याचदा ऐकतो.

click here to listen the song

माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा | केशवा माधवा नारायणा

नाहीं नाहीं मज आणिक सोयरा | करीं अव्हेरा पांडुरंगा

अनाथांचा नाथ होसी तूं दयाळा | किती वेळोवेळां प्रार्थू आतां

नामा म्हणे जीव होतो कासावीस | केली तुझी आस आतांवरी

माझे मनोरथ पूर्ण कीजे देवा | केशवा माधवा नारायणा

नाहीं नाहीं मज आणिक सोयरा | करीं अव्हेरा पांडुरंगा

अनाथांचा नाथ होसी तूं दयाळा | किती वेळोवेळां प्रार्थू आतां

नामा म्हणे जीव होतो कासावीस | केली तुझी आस आतांवरी

साधनेच्या उत्तरावस्थे मध्ये साधकाची देवाशी एवढी जवळीक होते, की मग तो म्हणतो, “आम्ही भक्तांनीच तुझा महिमा वाढविला आहे- नाही तर तुला कोण विचारतो!”

देवा आम्हीं तुज दिलें थोरपण | मानीं हें वचन सत्य माझें

पतित अमंगळ तुज झालों साह्य | विचारू पाहें खरेंखोटें

रोग व्याधि पीडा जनांसी नसतां | कोण पाचारितां वैद्यालागीं

कल्पनेचें भूत झडपी या संसारीं | माने पंचाक्षरी पाचारितां

 _____________________________

आम्हीं शरणागतीं केलासी सरता | येऱ्हवीं अनंता कोण जाणे

वेदशास्त्रपुराणीं उबगोनि सांडिलासी | तो आम्हीं धरिलासी हृदयकमळीं

चतुरां शिरोमणि अहो केशिराजा | अंगीकार तुझा केला आम्हीं

सहस्र नामीं झालासी संपन्न तरी हें हि भूषण आमुचें चि

येऱ्हवीं त्या नामांची कोण जाणे सीमा पाहें मेघश्‍यामा विचारोनि

होतासी क्षीरसागरीं अनाथाचे परी लक्ष्मी तेथें करी चरणसेवा

ते हि तंव जाण आमुची जननी तूं तियेवांचोनि शोभसी कैसा

तुज नाहीं नाम रूप जाति कुळ | अनादिचें मूळ म्हणती तूज

आम्ही भक्‍त तरी तूं भक्‍तवत्सल | ऐसा प्रगट बोठ जगामाजीं

ऐसे आमुचेनि भोगिसी थोरीव | आमुचा जीवभाव तुझे ठायीं

नामा म्हणे केशवा जरी होसी जाणता | तरी या बोला उचिता प्रेम देई

 मी तुझा दास म्हणवतो आणि तरी जर माझ्यात प्रेमभाव नसेल तर त्यात तुलाच कमीपणा आहे असे देवाला बजावायला संत कमी करीत नाहीत!

तुझा विष्णुदास म्हणताती जगीं | नाहीं माझे अंगीं प्रेमभावो

तेणें थोर लाज वाटे पंढरीराया | ये माझ्या हृदया एक वेळां

द्वैताद्वैतभाव आहे माझे ठायीं | अनुभव नाहीं स्वरूपाचा

नामा म्हणे माझा उजळ करीं माथा | भेटी देउनी संतां निरवीं मज

आणि मग नामदेव महाराज त्यांचा स्वतःचा अनुभव सांगतात-

घे रे घे रे नाम्या दिलें माझें प्रेम | घोकी माझें नाम सर्वकाळ

शिरावरी हात ठेवीतसे माझ्या | अभिमान तुझा गेला म्हणुनी

भक्तिसुख देवें दिले नामयातें | नामा परमामृतें तृप्त झाला

नामा म्हणे देवा झालों मी पावन | माझें तुजविण कोण आहे

 आणि मग समर्थाच्या दासाला साक्षात काळाचीही भीती नाही-

आम्ही विठोबाचे दूत | यमा आणूं शरणागत

मुखीं नाम हातीं टाळी महापाप करूं होळी

एवढा प्रताप नामाचा | रीघ नव्हे कळिकाळाचा

ऐसा नामा यशवंत | विठोबाचा शरणागत

आणि मग देहाची आठवण सुद्धा राहत नाही- फक्त मुखात केशवाचे मंगल नाम राहावे हीच इच्छा राहते.

देह जावो अथवा राहो- येथे ऐका

 देह जावो अथवा राहो | पांडुरंगी दृढ भावो

चरण सोडीं सर्वथा आण तुझी पंढरीनाथा

वदनीं तुझें मंगळ नाम | हृदयीं अखंडित प्रेम

नामा म्हणे केशिराजा | केला नेम चालवी माझा

_____________________________________

साधनेच्या उच्च अवस्थेत, उन्मनी अवस्थेत आपल्या आराध्य दैवताचे चिंतन करता करता द्वैत मावळते- योग्यांना ध्यानाच्या अवस्थेत येणारा अनुभव- तो अनाहत ध्वनि- भक्तांना भक्तीच्या उच्च अवस्थेत अनायासेच अनुभवायला येतो. हे केवळ कवित्व नाही- हा साक्षात अनुभव शब्दरूपांनी प्रकटला आहे.

देहमंदिराभीतरीं शेजे सूतले श्रीहरि

निद्राउन्मनीचे भरीं तें म्यां स्वप्न देखिले

ध्यानीं पहुडला सांवळा | जवळीं नारी बारा सोळा

विंजणें वारिती सकळा | सोहंशब्द जागरणीं

धिं धिं तुरे वाजती | अनुहातध्वनि गर्जती

तेथें निद्रा ना सुषुप्ति | चंद्र सूर्य मावळले

मना पवना नाहीं भेद तया ठायीं हा गोविंद

तेथें खुंटला अनुवाद | वेदश्रुति आटल्या

म्हणे विष्णुदास नामा | जन्ममरण नाहीं आम्हां

कृपा केली मेघश्यामा | संतसंगें तारिलों

 खालील अभंगही अद्वैताच्या उच्च अनुभवाचे वर्णन करणारा आहे- “आपणा पैं पहावया कवण लावूं दिवा रे”, “पूर्व पश्‍चिम दक्षिण उत्तर नाहीं दाही दिशा रे| प्रळयीं सागर एक होती अनुभविया तो तैसा रे |”

चेईला म्हणजे ‘जागा झाला, भानावर आला’

चेइला तो जाण रे सद्गुरुवचनीं निर्धारे

विपरीत मानवा विसर पडला कंठीं जया परिहार रे |

आपणा पैं पहावया कवण लावूं दिवा रे

चंद्रसूर्य जेणें प्रकाशे तो मी कैसा पाहूं रे |

अंत त्यासी नाहीं रे स्थान मान कांहीं रे

चेइला तेणें ओळखिला येरांसी अगम्य भाई रे |

पूर्व पश्‍चिम दक्षिण उत्तर नाहीं दाही दिशा रे

प्रळयीं सागर एक होती अनुभविया तो तैसा रे |

काष्ठी पावक उपजला तो हि तया सम रे

नामा म्हणे केशिराजा चेइल्या आम्हां तुम्ही रे |

संत नामदेव यांच्या विपुल अभंग भांडारातील काही मोजके अभंग आपण या १० भागांत पाहिले. संत मंडळी ही आपल्याला दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करत असतात. भारतात आणि त्यातही महाराष्ट्रभूमी मध्ये जन्म मिळाला हे खरोखर आपले भाग्य आहे.

यापुढे महाराष्ट्रातील थोर संत तुकाराम यांच्या अभंगांबद्दल लिहिण्याचा विचार आहे.

माधव भोपे