https://goodworld.in A website by Madhav Bhope

Teachers day in India आठवणीतील शिक्षक दिन

radhakrishnan

Memories of Teachers day आठवणीतील शिक्षक दिन

 

कोण आहेत महाराष्ट्रातील पारितोषिक प्राप्त शिक्षक?

इतर कुठलाही दिवस (स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाशिवाय) इतका लक्षात राहत नाही, पण 5 सप्टेंबर हा दिवस ‘शिक्षक दिन’ म्हणून पक्का लक्षात राहतो. कारण शिक्षक दिनासोबत जोडलेल्या आपल्या शालेय जीवनातील आठवणी, आणि त्याच बरोबर आपल्या संस्कारक्षम वयात आपल्याला शिकविणाऱ्या आपल्या शिक्षकांच्या आठवणी.

शिक्षकांच्या प्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन हा जसा भारतात साजरा केला जातो, तसा तो जगभरात पण साजरा केला जातो, पण 5 सप्टेंबरला नाही. यूनेस्को तर्फे 5 ऑक्टोबर हा जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.

जगातील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये शिक्षक दिन वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो. मात्र, जागतिक शिक्षक दिन 5 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

 याशिवाय अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. 1994 मध्ये UNESCO ने शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी 5 ऑक्टोबर हा ‘जागतिक शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्याची मान्यता दिली होती.

भारतात 1962 सालपासून,  प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि भारताचे दुसरे राष्ट्रपति, सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करायला सुरूवात झालेली आहे.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 रोजी इंग्रजांच्या काळातील ‘मद्रास प्रेसिडेन्सी’ मधील नॉर्थ अॅऱ्कॉट  जिल्ह्यातील तिरुतनी या गावी, तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला होता(आताच्या तामिळनाडू मधील तिरुवल्लूर जिल्हा). त्यांच्या विद्वत्तेने शिक्षण क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला होता. काही पाश्चात्य तत्त्वज्ञान्यांनी वेदान्त तत्त्वज्ञाना बद्दल केलेल्या चुकीच्या प्रचारानी व्यथित होऊन, त्यांनी वेदान्त तत्वज्ञान, अद्वैत तत्त्वज्ञान याबद्दल सखोल अभ्यास करून, त्यांना उत्तर देण्यासाठी, “The Ethics of Vedanta” या नावाचा शोधप्रबंध 1914 साली प्रसिद्ध केला. ते सनातन हिंदू तत्वज्ञान आणि अद्वैत वेदान्त याचे कट्टर पुरस्कर्ते होते.

राधाकृष्णन यांना 1952 मध्ये भारताचे उपराष्ट्रपति म्हणून निवडण्यात आले. आणि 1962 साली ते भारताचे दुसरे राष्ट्रपति झाले. ते 1967 पर्यन्त भारताचे राष्ट्रपति होते. राधाकृष्णन यांना 1954 मध्ये ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

ते जेंव्हा भारताचे राष्ट्रपति झाले तेव्हा त्यांचे काही विद्यार्थी 5 सप्टेंबर रोजी येणारा त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांना भेटायला गेले तेव्हा आपला वाढदिवस साजरा करण्यापेक्षा 5 सप्टेंबर हा दिवस देशातील शिक्षकांच्या सन्मानार्थ शिक्षक दिन म्हणून साजरा करावा असे त्यांनी सुचविले. तेंव्हापासून 5 सप्टेंबर हा दिवस भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.

आमच्या शिक्षक दिनाच्या आठवणी

teachers day
couresy- Indian Express

शिक्षक दिनानिमित्त आमच्या त्या काळच्या शिक्षकांची आठवण आजही आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक शिक्षकाची शिकवण्याची लकब त्यानिमित्ताने आठवते. शिक्षक आणि मुलांचे एक वेगळेच घट्ट नाते त्याकाळी होते. शिक्षकांविषयी अपार आदर होता, आणि शिक्षकांनाही मुलांविषयी अपार आत्मीयता होती. शिक्षक दिन विशेष लक्षात राहण्याचे कारण म्हणजे विद्यार्थ्यांनी एक दिवस केलेली शिक्षकाची भूमिका. शिक्षक दिनाच्या दिवशी शाळेतील त्यातल्या त्यात हुशार विद्यार्थी, वेगवेगळ्या विषयाचे ‘शिक्षक’ म्हणून भूमिका पार पाडत. आपापले विषय वाटून घेत आणि त्या दिवशी शिकविण्यासाठी एखादा लेसन तयार करून, त्या दिवशी ‘क्लास’ घेत. त्यांचे वर्गमित्र मोठ्या उत्साहाने त्यांचा क्लास attend करत. काही काही व्रात्य मुले आपल्या या ‘शिक्षकाची’ फिरकीही घेत. शिक्षकही आपल्या शिष्याचे कौतुक पाहायला क्लास मध्ये येत. एखादा विद्यार्थी हेडमास्तरही होई. शिक्षक दिनानिमित्त भाषणेही होत. नंतर सगळे मिळून छानपैकी नाश्ता करून त्या दिवसाची सांगता करीत.

मला वाटते अजूनही ही प्रथा बऱ्यापैकी चालू आहे आणि आजच्या विद्यार्थ्यांसाठीही शिक्षक दिन ही अशीच एक पर्वणी आहे.

पुरस्कार प्राप्त शिक्षकांची यादी

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2024 प्राप्त शिक्षकांची यादी

भारताच्या राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू  यांच्या हस्ते दि. 5 सप्टेंबर रोजी खालील 50 शिक्षकांना उत्कृष्ट शिक्षक म्हणून गौरवित करण्यात येणार आहे. आणि त्यांना नगदी रु. 50000/ एक प्रमाणपत्र आणि सिल्वर मेडल यांनी सन्मानित करण्यात येणार आहे. 

  1. अविनाशा शर्मा – हरियाणा
  2. सुनील कुमार – हिमाचल प्रदेश
  3. पंकज कुमार गोया – पंजाब
  4. राजिंदर सिंह – पंजाब
  5. बलजिंदर बराड़ सिंह – राजस्थान
  6. हुकम चौधरी चंद – राजस्थान
  7. कुसुम लता गरिया – उत्तराखंड
  8. चंद्रलेखा दामोदर मेस्त्री – गोवा
  9. चंद्रेशकुमार भोलाशंकर बोरीसागर – गुजरात
  10. विनय शशिकांत पटेल – गुजरात
  11. माधव पटेल प्रसाद – मध्य प्रदेश
  12. सुनीता गोधा – मध्य प्रदेश
  13. के, शारदा – छत्तीसगढ़
  14. नरसिम्हा मूर्ति एचके – कर्नाटक
  15. द्विति चंद्र साहू – ओडिशा
  16. संतोष कुमार कर – ओडिश
  17. आशीष कुमार रॉय – पश्चिम बंगाल
  18. प्रशांत कुमार मारिक – पश्चिम बंगाल
  19. उर्फनामीन जम्मू – कश्मीर
  20. रविकांत द्विवेदी – उत्तर प्रदेश
  21. श्याम मौर्य प्रकाश यू – उत्तर प्रदेश
  22. डॉ. मिनाक्षी कुमारी – बिहार
  23. सुकेंद्र कुमार सुमन – बिहार
  24. के. सुमा – अंडमान एंड निकोबर द्वीप
  25. सुनीता गुप्ता – मध्य प्रदेश
  26. चारू शर्मा – दिल्ली
  27. अशोक सेनगुप्ता – कर्नाटक
  28. एच एन गिरीश – कर्नाटक
  29. नारायणस्वामी.आर – कर्नाटक
  30. ज्योति पंका – अरुणाचल प्रदेश
  31. लेफिजो अपोन – नागालैंड
  32. नंदिता च ओंगथम – मणिपुर
  33. यांकिला लामा – सिक्किम
  34. जोसेफ वनलालह्रुआ सेल – मिजोरम
  35. एवरलास्टी एनजी पाइनग्रोप – मेघालय
  36. डॉ.नानी जी देबनाथ – त्रिपुरा
  37. दीपेन खानिकर – असम
  38. डॉ. आशा रानी – झारखंड
  39. जिनु जॉर्ज – केरल
  40. के सिवाप रसद – केरल
  41. मिडी श्रीनिवास राव – आंध्र प्रदेश
  42. सुरेश कुनाट – आंध्र प्रदेश
  43. प्रभाकर रेड्डी पेसरा – तेलंगाना
  44. थदुरी संपत कुमार – तेलंगाना
  45. पल्लवी शर्मा – दिल्ली
  46. चारु मैनी – हरियाणा
  47. गोपीनाथ आर – तमिलनाडु
  48. मुरलीधरन रमिया सेथुरमन – तमिलनाडु
  49. मंटय्या  चिन्नी बेडके – महाराष्ट्र Z.P.UPEER PRIMZRY DIGITAL SCHOOL JAJAVANDI
  50. सागर चित्तरंज एन बागडेमहाराष्ट्र SOU S. M. LOHIA HIGHSCHOOL AND JUNIOR COLLEGE KOLHAPUR
 

आठवणीतील पोळा Pola festival in Maharashtra

pola festival

आठवणीतील पोळा How pola was celebrated in Maharashtra

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पूर्वी साजरा केल्या जाणाऱ्या पोळ्याच्या आठवणी आणि इत्थंभूत वर्णन.

Pola in Maharashtra in old days. श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक, हे चार महिने सणावारांचे. श्रावणातील पहिल्या पंचमी पासून म्हणजे नागपंचमी पासून जे सण सुरू होतात, ते शीतला सप्तमी, नारळी पोर्णिमा किंवा रक्षाबंधन, गोकुळाष्टमी आणि गोपाळकाला, इत्यादि झाल्यावर श्रावण अमावास्येला साजरा केला जाणारा सण म्हणजे पोळा आणि त्याच दिवशी साजरा केला जाणार मातृदिन. पोळ्याच्या नंतर लगेच गणेश चतुर्थी, महालक्षुम्या, नंतर पितृपक्षानंतर येणारे नवरात्र, दसरा, आणि नंतर दिवाळी, यामुळे, “पोळा, अन सण झाले गोळा”. अशी जुन्याकाळी म्हण होती.

आजकाल शहरात राहतांना हे सण कुठे येतात आणि कुठे जातात यांचा पत्ता लागत नाही. तेंव्हा बालपणी हे सण किती उत्साहाने साजरे केले जायचे हे आठवते. आज पुण्या मुंबई सारख्या शहरात, कॉस्मोपोलिटन भागात राहतांना, मातीचे बैल सुद्धा सहज मिळत नाहीत, आणि मग घरीच बैलांचे चित्र ठेवून त्याचीच पूजा करून कसे तरी मनाचे समाधान करून घ्यावे लागते, तेंव्हा बालपणी ठिकठिकाणी दणक्यात साजरा होणारा पोळा आठवतो.

आधी मातृदिना बद्दल. पोळ्याच्या दिवशी, सकाळी घरी मातीच्या पाच  बैलांचे, आणि गाय गोर्‍याचे रीतसर पूजन करून आई त्यांना खिरीचा आणि पुरीचा नैवेद्य दाखवीत असे. आणि मग आम्हाला ‘वाण’ घ्यायला बोलावीत असे. ‘वाण’ म्हणजे काय, तर आई आम्हाला तिच्या मागे उभे राहायला सांगत असे. तिने सुताच्या धाग्याला चार पदरी करून, हळदीने रंगवून ठेवलेले असे. त्याला ‘पोवते’ म्हणत. आम्ही मागे येऊन उभे राहिल्यावर आई मागे न पाहता आम्हाला विचारीत असे,- “सर्वातीत कोण?” मग आम्ही म्हणायचे, “सर्वातीत मी !” मग पुन्हा आई विचारी, “सर्वातीत कोण?” मग पुन्हा आम्ही म्हणायचे, “सर्वातीत मी !” असे तीनदा कारायचे. मग आई आम्हाला आपला उजवा हात पुढे करायला सांगायची, आणि मागे न पाहता, हातावर ते बंधन (‘पोवते’) बांधायची. आधी साधी गाठ बांधून मग ती मागे वळून आमच्या हाताला ते ‘पोवते’ नीट बांधून द्यायची. मग आम्हाला खीर पुरीचा नैवेद्य द्यायची.

मला यात खूप अर्थ भरलेला वाटतो. आई ही आपली पहिली गुरू असते. त्या आईची शिकवण आपल्याला आयुष्यभर साथ करणारी असते. ही शिकवण ही तशीच उच्च दर्जाची असली पाहिजे. ‘सर्वातीत’ म्हणजे सगळ्याच्या अतीत, म्हणजे पलीकडला. आणि असा सर्वाच्या पलीकडला म्हणजे कोण असतो, तर ‘आत्मा’. म्हणजे आपल्या अपत्याला “तू सगळ्याच्या अतीत असणारा आत्मा आहेस” याची आठवण करून देणारा हा उपदेश आहे. आणि हा प्रश्नोत्तराच्या स्वरूपात, मुलाकडून तीनदा हे वदवून घेतले जाते, की मी सर्वातीत आहे. असा हा मूल आणि माता यांच्यामधील अनन्य संबंध अधोरेखित करणारा हा दिवस आहे, म्हणून, “मातृदिन”.

आमच्याकडे जरी शेती नव्हती, तरी त्याकाळी आम्ही राहत असलेली गावे छोटी छोटीच होती, आणि तिथे बहुसंख्य समाज हा शेतीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून असणारा होता. मला समजायला लागल्यावर आठवणारा पोळा म्हणजे हिंगोलीचा पोळा. मी त्यावेळी 9 ते 11 वर्षांचा असेल. हिंगोलीला सगळेच सण प्रचंड उत्साहात आणि मोठ्या प्रमाणावर साजरे होत. त्यानंतरची आठवण म्हणजे सिल्लोड या गावची. तिथे अजून वेगळ्या प्रकारे पोळा साजरा होई. पण ठिकठिकाणी साजरा केला जाणारा पोळा हा बर्‍याच बाबतीत सारखा असे. माझ्या बहिणीच्या सासुरवाडीला, म्हणजे डोंगरावर असणार्‍या, सिल्लोड तालुक्यातील हळदा या गावी (त्यांच्याकडे शेती होती अणि ते पूर्णवेळ शेतकरी होते) साजरा होणारा पोळा मला बहीणीकडून ऐकायला मिळत असे.

खेड्यापाड्यात पोळ्याच्या कितीतरी दिवस आधी पासून शेतकर्‍यांची पोळ्याची तयारी सुरू व्ह्यायची. प्रत्येक शेतकर्‍याच्या घरी किती तरी बैल असत. त्यातल्या प्रत्येक बैलाचे आवडीने ठेवलेले नाव असे. तो कोणत्या कालवडी पासून झालेला आहे, कसा वाढला आहे, त्याच्या काय काय सवयी, किंवा ‘खोडी’ आहेत, त्याला काय आवडते आणि काय आवडत नाही, याची त्याच्या मालकाला इत्थंभूत माहिती असे. कोणता बैल गाडीला जुंपल्यावर अगदी शहाण्यासारखा चालतो, आणि कोणता नखरे करतो, पण तो नखरे करणारा बैलच औत ओढायला कसा भारी आहे, हे त्याचा मालक कौतुकाने सांगत असे.

पोळ्याच्या आधी येणारा आठवडी बाजाराचा दिवस बैलांच्या साजशृंगाराची सामग्री खरेदी करणार्‍या शेतकर्‍यांनी गजबजलेला असे. शिंगांना लावण्यासाठी वेगवेगळ्या रंगांचा ‘हिंगुळ’ (जो छोट्या छोट्या पत्र्याच्या डब्यांत मिळत असे), शिंगांना लावायसाठी रंगीबेरंगी बेगडी कागद, गळ्यात बांधायला घंटांच्या माळा, कवड्यांच्या माळा, तसेच नजर लागू नये म्हणून काळ्या रंगांच्या माळा,  रंगीबेरंगी गोंडे, पायात घालायला तोडे, बैलांच्या पाठीवर टाकायसाठी रंगीबेरंगी, वेगवेगळ्या रंगाच्या झुली, असे तऱ्हेतऱ्हेचे सामान बाजारात आलेले असे, आणि बैलांचे मालक आपल्या आवडत्या बैलांसाठी हे सर्व सामान मोठ्या आवडीने खरेदी करीत.pola bazar

पोळ्याच्या आदल्या दिवसापासून बैलांची स्पेशल ट्रीटमेंट सुरू होत असे. त्या दिवशी व दुसऱ्या दिवशी बैलांकडून कोणतेही काम घेत नसत. त्यांना नदीवर आंघोळीला घेऊन जात आणि चोळून चोळून आंघोळ घालीत. त्यानंतर बैलांची ‘खांदे मळणी’ होत असे. म्हणजे बैलांच्या खांद्यांना हळद आणि लोण्याने किंवा तुपाने मालिश करत. संध्याकाळी बैलांना चवळीच्या शेंगांची भाजी आणि पोळी किंवा पुरी खाऊ घालत.

पोळ्याच्या दिवशी सकाळी किंवा दुपारी बैलांना आंघोळीसाठी नदीवर घेऊन जात. तिथून आल्यानंतर त्यांना सजवायला सुरूवात करीत. तांदुळाच्या पिठापासून आणि अन्य वस्तूंपासून तयार केलेल्या रंगाने बैलांना रंगवीत. त्यामध्ये बैलांच्या अंगावर बटाट्यापासून किंवा लाकडापासून बनवलेल्या छापयांनी छापे काढीत. तसेच हातांनीही छापे काढीत. बैलांची शिंगे खरबरीत झालेली असल्यास आधी त्यांना चाकूने नीट तासून घेत, जेणे करून शिंगांवरील डेड भाग निघून जाईल. नंतर शिंगांना हिंगुळ लावीत. हिंगुळ म्हणजे एक प्रकारचा रंगच असे. नंतर काही जण त्या हिंगुळावर, तो ओला असतांनाच बेगड चिकटवीत. बैलांच्या गळ्यात आदल्या दिवशी आणलेल्या घुंगरांच्या माळा(ज्यांना घागरमाळा सुद्धा म्हणतात) कवड्यांच्या माळा, आणि काळ्या रंगाच्या ‘केसरी’  माळा घालीत. पोळ्याच्या दिवशी बैलाच्या नाकात घालणारी ‘नथ’ किंवा ‘नथणी’ सुद्धा बदलतात आणि नवीन घालतात.  शिंगांना दोन्ही बाजूंनी अडकवून गोंडे समोरच्या बाजूला कपाळावर येतील असे बांधीत. तसेच छान तयार केलेले बाशिंग बांधीत.

अशा प्रकारे छान सजवलेले बैल घेऊन मग घराबाहेर पडत, घरी अनेक बैल असल्यानंतर (ते सहसा असतच.) घरातील माणसे एकेक बैल घेऊन बाहेर पडत. तसेच आणखी बैल असतील ते घेऊन सालदार बाहेर पडत.bail2

गावातील घरोघरचे सगळे बैल घेऊन मग सर्वजण एका मोठ्या मैदानात जमत. काही ठिकाणी हे ठिकाण नदीच्या पल्याड असे. काही जण तिकडे जाण्या आधी बैलांना मारूतीचे दर्शन करून आणीत.

पोळा ‘फुटायची’ वेळ सहसा आधीच गावकऱ्यांनी सर्व सहमतीने ठरवलेली असे. गावातील पोळ्याच्या मैदानावर सर्व मातब्बर मंडळी जमलेली असे. मैदानावर एका ठराविक ठिकाणी एक सजवलेली दोरी  तोरण म्हणून दोन्ही बाजूंनी ताणून धरलेली असे. जमलेले बैलही या वातावरणाने खूप उत्तेजित होऊन फुरफुरू लागत. आणि आपल्या मालकाच्या हातातील दाव्याला हिसडा देऊन पुढे जायचा प्रयत्न करीत. ठरलेल्या वेळेच्या खूप आधी वाजवणारी मंडळी जोरजोरात डफडे वाजवायला सुरूवात करीत. पोळा फुटल्यानंतर पहिल्यांदा पुढे जाणारा बैल कोणाचा हे आधीच ठरलेले असे. काही ठिकाणी गावातील प्रमुख व्यक्ति, पाटील इत्यादींना हा मान असे. काही ठिकाणी ज्यांनी नवीन जमीन घेतली आहे अशा मालकाला हा मान दिला जाई, तर काही ठिकाणी या मानाचा ‘लिलाव’ करून, जास्तीत जास्त बोली लावणाऱ्याला हा मान दिला जाई आणि त्याच्या कडून मिळणारे पैसे गावाच्या विकासासाठी वापरले जात.

आणि मग पोळा फुटायची वेळ येई, आणि एका क्षणी ते तोरण बाजूला घेतले जाई आणि सगळ्यात पहिल्यांदा मानाचा बैल ऐटीत पुढे निघे. आणि त्याच्या मागे लगेच इतर बैलांचे मालक आपापले बैल दामटीत. शेकडो बैल आणि त्यांचे मालक एकाच वेळी पळत सुटल्याने सगळीकडे त्यांच्या पायांनी उडणारी धूळ, बैलांच्या मालकांनी आपल्या बैलांना दिलेले आवाज, या सर्वांनी वातावरण भरून जात असे.pola festival

मग त्यातील बरेच जण आपल्या बैलांना मारुतीच्या मंदिरात घेऊन जात आणि  मारूतीचे दर्शन करून आणीत. मग त्यातील बरेच जण आपल्या घराकडे जाण्याआधी गावातील सर्व घरांच्या समोर घेऊन जात. त्या ठिकाणी घरातील मंडळी सजून धजून बैलांच्या स्वागतासाठी उभेच असत. मग घरातील स्त्रिया त्या बैलांना ओवाळीत, हळदी कुंकू वाहीत, त्यांच्या पायावर पाणी घालीत, तसेच ज्याने बैल धरला आहे त्याच्या सुद्धा पायावर पाणी घालीत, आणि बैलाला पुरणपोळीचा घास भरवीत. बैलही मोठ्या आनंदाने हा पुरणपोळीचा नैवेद्य स्वीकारीत.pola14 pola15 pola16

एखाद्या एखाद्या घरी मात्र बैल काही केल्या पुरणपोळी घेत नसत. तोंडाजवळ पोळी नेली तरी आडवी मान हलवीत. मग अशा वेळी बैल रूसला आहे असे म्हणत. मग त्याचा मालक त्याच्या विनवण्या करी, तेंव्हा कुठे तो बैल तो नैवेद्य स्वीकारी. गावात त्यादिवशी पूर्ण उत्सवाचे आणि उत्साहाचेच वातावरण असे. सगळीकडे जाऊन आल्यानंतर मग बैलाचा मालक जेंव्हा त्याला घेऊन घरी येई, तेंव्हा त्या दोघांचे खूप उत्साहाने स्वागत होत असे. काही काही जण आधी घरी जाऊन मग सगळीकडे बैल फिरवीत. घरी बैलाला घरातील स्त्रिया ओवाळीत, त्याच्या पायांवर पाणी घालीत, हळदी कुंकू वाहून नमस्कार करीत, आणि त्याला पुरणपोळी खाऊ घालीत.

आपल्या घरी आपले सगळे बैल परत आल्यानंतर मग सगळ्यांना पुरणपोळीचे जेवण असे. त्यात सालदार, घरगडी, बैल धरणारे, शेजारी पाजारी, नातेवाईक, असे सर्व संमिलित असत आणि मोठी पंगत असे.

नाग हा विषारी प्राणी असूनही, शेतातील धान्य फस्त करणार्‍या उंदरांना मर्यादित ठेवतो, अणि जीवन साखळीचा तो एक आवश्यक भाग आहे,म्हणून आपली संस्कृती त्याच्याप्रतिही, नागपंचमीच्या सणाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करते, त्याचे पूजन करते. त्यानिमित्ताने स्त्रिया बाहेर पडत, सामूहिकरित्या गावाबाहेरच्या मोकळ्या हवेत, वारुळावर जात, आणि नागाचे पूजन करत. यात निसर्गाच्या एका घटकाविषयी कृतज्ञतेचा भाव तर आहेच, पण अशा अनेक निमित्ताने  सगळ्यांचे एकत्र येणे, निसर्गाच्या जवळ जाणे, हे एक खूप मोठे मानसिक औषध ही आहे. तसेच बैल हा शेतीचा अविभाज्य घटक असून त्यावर शेतकर्‍यांचे अणि पर्यायाने इतर समाज घटकांचे जीवन अवलंबून असल्याने, नागपंचमी काय किंवा, बैलपोळा काय, हे आपले सण हे निसर्गाच्या अणि त्यातील घटकांच्या प्रति आपला कृतज्ञ भाव व्यक्त करणारी अप्रतिम व्यवस्था आहे.

 ज्याच्यावर आपले पोट, आपली शेती अवलंबून आहे, ज्याच्या श्रमामुळे आपण शेती करू शंकतो, त्या मुक्या जनावराच्या प्रति,  नुसते जनावर म्हणून नाही तर घरातील एक सदस्य म्हणून बघण्याची आणि त्याच्याप्रति कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याची ही पर्वणी,  म्हणजे बैलपोळा.

अजून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात बर्‍याच प्रमाणात पोळा हा वरील स्वरूपात साजरा केला जातो. पण शहरात राहणार्‍यांना मात्र बैल पोळा वरील स्वरूपात अनुभवायला मिळत नाही. आमच्या मुलांनी काही प्रमाणात हा अनुभव घेतला, पण नातवंडांना मात्र हा अनुभव देणे हे आता स्वप्नवतच झाले आहे.

असो. आज पोळ्याच्या अणि मातृदिनाच्या निमित्ताने जुन्या सगळ्या स्मृतींची उजळणी झाली. या पोळ्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा, आणि मातृदिनानिमित्त सर्व मातांना वंदन!

हा लेख आवडला असल्यास हा ब्लॉग जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या मुलांनाही हा ब्लॉग वाचू द्या, जेणेकरून त्यांना आपल्या संस्कृतीची ओळख होईल. 

माधव भोपे

वर्धिष्णु दक्षिणा

vardhishnu dakshina
 
श्री मकरंद करंदीकर यांच्या फेसबुक पेज वर अनेक महितीपूर्ण पोस्ट्स ते टाकत असतात. तसेच ठिकठिकाणी ते माहितीपूर्ण व्याख्यानेही देत असतात. 
काही दिवसांपूर्वी त्यांनी दक्षिणा इत्यादि नेहमी शेवटी 1 आकडा असलेली का देत असतात याबाबत माहितीपूर्ण विवेचन दिले आहे. ते इथे साभार पोस्ट करीत आहोत. तसेच त्या पोस्टची लिंक पण खाली देत आहोत. जेणे करून मूळ पोस्ट पाहून त्यांच्या पेज लाईक व शेअर करता येईल. 
 
दक्षिणा, आहेर, बक्षीस हे ११, ५१, १०१ अशा रकमेचे का देतात ?
( थोडी वेगळी माहिती )
आता चातुर्मास व  श्रावण महिना सुरु झाला आहे.आपल्याकडे अशा अनेक चालीरिती आहेत ज्या लोकं वर्षानुवर्षे कसोशीने पाळतात पण त्या आपण का पाळतो हे अनेकांना माहिती नसते. त्यातील एक प्रथा म्हणजे दक्षिणा,आहेर, बक्षीस हे ५१, १०१, ५०१ अशा रकमेचे देणे. आता श्रावण महिना सुरु झाला आहे. भटजींना दक्षिणा, १० वी / १२ वी उत्तीर्ण झालेल्यांना कौतुक म्हणून बक्षीस, धार्मिक कार्यांमध्ये आहेर हा रोख देतांना नेहेमी सम रकमेत १ रुपया मिळवून ती रक्कम विषम करूनच दिला जातो. या मागची अनेक करणे आणि समजुती आपण आज जाणून घेऊ या.
358146920 6391026107678876 6848480943425326199 n
मान्य केलेल्या रकमेपेक्षा थोडेसे अधिक दिले तर घेणारा खूष होतो. कोकणात पूर्वापार आंबे, काजू अशा गोष्टी शेकड्यावर घेतल्या जात असत. त्याचे १०० मोजले की अधिक ५ फळे तरी दिली जात असत. मापट्याने ( फरा, पायली ) धान्य मोजताना पहिला पसाभर देवासाठी आणि शेवटी पाच पसा अधिक दिले जायचे. युरोपात एकदा एका बेकरीवाल्याने १ डझन म्हणून चुकीने १२ ऐवजी १३ वस्तू दिल्या. त्यामुळे तिकडे १३ वस्तूंना बेकर्स डझन म्हणतात.
विषम रकमेच्या आहेरामागे अशी एक भावना असते की सम अंकाचा दोनने भागाकार होऊ शकतो पण विषम अंकाचा दोनने भागाकार होत नाही. तसाच आहेर घेणाऱ्याच्या सुखाचे, आनंदाचे कधीही दोन भाग होऊ नयेत आणि पुढचा १ म्हणजे ते वर्धिष्णू असल्याचे द्योतक. तसेच ५०. १००, ५०० म्हणजे शेवटी शून्य. शून्य म्हणजे सगळे संपले… असे होऊ नये म्हणून अधिक १ !… हा पुढचा अधिकचा १ रुपया म्हणजे, हल्लीच्या भाषेत …and counting म्हणजे त्यापुढेही अजून सुरूच असल्याची सद्भावना… अधिकस्य अधिकम फलम ! आज खरेतर १ रुपयाला कांही किंमतच उरलेली नाही. १ रुपयाची नोट छापायला सरकारला १ रुपयापेक्षाही अधिक खर्च येतो. तरीही सरकार अजूनही १ रुपयाची नोट छापते. लोकांच्या मनातल्या या भावनेची घेतलेली ही दखल तर नाही ?
पूर्वी धार्मिक कार्यासाठी भटजींना सव्वा रुपया दक्षिण दिली जात असे. अगदी पूर्वी तर फक्त चांदीचा रुपया असे. ही दक्षिणा फळे, शिधा, नारळ या व्यतिरिक्त प्रतीकात्मक म्हणून आणि शुद्ध धातूचे दान म्हणून दिली जात असे. जर काही कारणांमुळे पूजा साहित्य जमविणे यजमानाला कठीण असेल तर भटजींना पूजेच्या साहित्याचा सव्वा रुपया अधिक सव्वा रुपया दक्षिणा असे अडीच रुपये दिले जाऊ लागले. येथे एक गंमतीदार गोष्ट सांगाण्यासारखी आहे. इंग्रज सरकारने १९१८ साली भारतात, सव्वा रुपया अधिक सव्वा रुपया असे एकूण अडीच रुपयांची ( २ रुपये ८ आणे ) अजब चलनी नोट छापली होती. 
363780965 6391025541012266 4656317608516441604 n
 
कागदी नोटा आल्यावर एक नवीन डोकेदुखी आली. दक्षिणा देतांना त्यावर तुळशीपत्र ठेऊन उदक म्हणजे पाणी सोडून ती दिली जात असे. तुळशीपत्र ठेवणे आणि उदक सोडणे म्हणजे सर्वकाही समर्पण केल्याचे प्रतीक असते. कागदाच्या नोटांवर पाणी कसे सोडायचे ? म्हणून मग त्यावर १ नाणे ठेऊन देण्याची प्रथा रूढ झाली.
362984888 6391026277678859 5723636780467405978 n
याचाच एक महत्वाचा भाग अनेकांना माहिती नसेल म्हणून सांगतो.. अनेक धार्मिक स्थळी किंवा खूप जाणकार भटजी, पुजारी तुमच्याकडून घेतलेल्या दक्षिणेतील १ रुपया तुम्हाला परत करतात. तो रुपया म्हणजे शुभ शकुनाचा, देवाच्या प्रसादाचा म्हणून मानला जातो. त्याशिवाय देणाऱ्याने जरी त्याचे सर्वस्व तुमच्या झोळीत टाकले तरी ते सर्व स्वीकारून त्याला कफल्लक करायचे नसते. म्हणून त्यातील थोडे तरी धन त्याला प्रसाद म्हणून परत करायचे असते. ही प्रथा आता फक्त कांही जाणकारच पाळतात. धार्मिक प्रथा म्हणून कोरडी भिक्षा मागितली जाते. त्यावेळीही तुम्ही घातलेल्या भिक्षेतून चिमूटभर / मूठभर तुमच्या पात्रात, प्रसाद म्हणून परत दिली जाते.
कांही ठिकाणी असे मानले जात असे की दानामधील वरचा १ रुपया हा पुजाऱ्याचा आणि बाकी रक्कम देवळाची ! एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर १२ व्या किंवा १३ व्या दिवशी, घरातील माणसे सर्व धार्मिक कार्ये आटोपल्यावर, नव्याने सुरुवात म्हणून देवळात जात असत. त्यावेळी पुजाऱ्याकडून कुठलेही धार्मिक कार्य करायचे नसल्यामुळे त्यांना सम रकमेची दक्षिणा / दान
दिले जात असे. त्यामुळे सम रक्कम देणे हे एरवी अशुभही मानले जाते.
आता तुम्ही पुढे कधी कुणाला १०१ किंवा ५०१ रुपये द्याल तेव्हा तुम्हाला या सर्व गोष्टी नक्कीच आठवतील.
( या लेखाचे हिंदी आणि कोंकणी भाषेत भाषांतरही झाले आहे ).
( पुनर्लिखित )
*© ( हा लेख व सोबतचे फोटो शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावेत )*
***** *मकरंद करंदीकर.*
*makarandsk@gmail.com*
 
 
 

आठवणीतील गोकुळाष्टमी Gokulashtami 2024

matiche gokul

आठवणीतील गोकुळाष्टमी- विस्मृतीत गेलेले मातीचे गोकुळ Gokulashtami 2024

आज गोकुळअष्टमी, आणि उद्या दहीहंडी. दहीहंडीच्या दिवशी मुंबईसारख्या महानगरांत आणि इतर शहरात जो ‘राजकीय’ उत्सव होतो, तो आपल्या सर्वांना चांगलाच माहिती आहे.

पण या निमित्ताने मन सहज भूतकाळात गेले, आणि साधारण 50-55 वर्षांपूर्वी गोकुळाष्टमी Gokulashtami कशी साजरी व्हायची याचा मन धांडोळा घेऊ लागले.

श्रावण लागल्यापासून एक प्रकारचे धार्मिक वातावरण आपोआपच तयार होत असे. श्रावणतील पाहिला सण- राखी पोर्णिमा होऊन गेल्यानंतर, वेध लागत ते गोकुळाष्टमीचे. Gokulashtami che. श्रावण महिन्यातील भर पावसात, रात्रीच्या अंधारात, कारागृहाच्या बंदिस्त दरवाज्यांच्या आड झालेला कृष्णजन्म- कंसाच्या भीतीने पिता वसुदेवाने त्याला रात्रीच्या अंधारात, उफाण आलेल्या यमुनेला पार करून गोकुळात घेऊन जाणे, गोकुळात यशोदेच्या पोटी जन्मलेली साक्षात आदिमाया हिला घेऊन परत मथुरेला येणे, आणि कंसाचे, प्राण भयाने त्या नवजात कोमल बालिकेला पायाला धरून दगडावर आपटणे. त्या आदिमायेचे आकाशात जाऊन कंस वधाची भविष्यवाणी वर्तवणे. या सगळ्या गोष्टी कितीही वेळेस ऐकल्या तरी प्रत्येक वेळी अंगावर काटा उभ्या केल्याशिवाय राहत नाहीत.vasudev and krishna

 पण इतक्या अडचणींवर मात करून झालेला कृष्ण जन्म म्हणजे आनंदाची पर्वणीच. अशा या कृष्ण जन्मोत्सवाची आठवण म्हणून गोकुळाष्टमीच्या दिवशी (On the day of gokulashtami) कृष्ण जन्मे पर्यंत घरोघरी लहान थोर, उपवास करून त्या कृष्णाच्या आगमनाची वाट पाहत.

gokulashtami
Image credit-Indrasut2 on Maayboli.com

त्या दिवसाची आठवण म्हणून घरोघरी, लाकडाच्या पाटावर, शेतात जाऊन आणलेल्या काळ्याशार आणि मऊसूत अशा चिकण मातीने गोकुळाची प्रतिकृति साकारली जात असे.

लहान मुले उत्साहाने आजूबाजूच्या शेतात जाऊन काळी माती गोळा करून आणत. त्या निमित्ताने काळ्या आईशी यथेच्छ खेळायला मिळत असे. अंग, कपडे, हात पाय सर्व काळ्या मातीने माखले जात. घरी आणल्यावर घरातील आई, आज्जी, इत्यादि मंडळी त्या मातीतील काडी कचरा खडे गोटे काढून ती स्वच्छ करून पाणी टाकून छान मळून देत.

घरात लाकडाचे अनेक पाट असत. त्यातील मोठयाशा पाटावर मग गोकुळ साकारायला सुरुवात होत असे. त्याला सगळ्यांचेच हात लागत. आधी चहू बाजूंनी गावाची तटबंदी आखली जात असे. मग गोकुळातील विविध गोष्टी साकारल्या जात. आणि विविध पात्रे- त्यात गोप, गोपी, पेंदया, गाई, आणि एक गाढवही असायचे आणि कुत्राही असायचा! निसर्गातील झाडे, प्राणी या सर्वाविषयी आपुलकीची भावना यात दिसून येते. त्या गोकुळात काही ठिकाणी पूतना मावशीही असायची!  पिंपळाचा पार,(त्याच्यावर पिंपळाच्या झाडाची एक फांदी), तुळशी वृंदावन, जाते, उखळ, चूल, तवा. नंद बाबाचे घर, त्या घरातील एक पाळणा, आणि त्या पाळण्यात, एक पिंपळाचे पान आणि/ किंवा एक  छान मऊसूत रंगीत कपडा अंथरूण त्यावर बाळ कृष्णाची स्वारी!

gokul2
Image credit- Anuradha Tambolkar-You Tube channel

या सगळ्या गोष्टी बनवतांना घरातील सगळ्यांच्या कलात्मकतेला, सृजनात्मकतेला आणि कल्पनाशक्तीला किती वाव मिळत असेल कल्पना करा. आणि घरातील लहानापासून थोरांपर्यंत सगळ्यांची त्यात involvement असे. सगळ्या घरात उत्साहाचे वातावरण असे. बाळकृष्णाला नैवेद्य म्हणून सुंठ साखरेचे मिश्रण तयार केले जाई. काही ठिकाणी डिंकाचा लाडूही नैवेद्याला केला जाई. या पावसाळ्याच्या दिवसात थंडीमुळे होणारे उपद्रव टाळण्यासाठी सुंठ आणि साखरेची योजना किती योग्य वाटते! वरील गोकुळातील पात्रांना सजविण्यासाठी ज्वारीचे दाणे वापरले जात. तसेच तुळशी वृंदावनावर छोटीशी तुळस ठेवली जाई. नंद बाबाच्या घरी भाकऱ्यांची चळत, लोण्याचे भांडेही साकारले जाई. ठिकठिकाणी गोकर्णाची निळी फुले आणि इतर त्या ऋतुतील फुले ठेवून गोकुळ सजवले जाई. आणि मग संध्याकाळी, सर्वजण जमून कृष्णजन्म साजरा करीत, कृष्णाचा पाळणा म्हटला जाई

गोकुळाष्टमी-(Gokulashtami)- कीर्तन 

गावातील मंदिरात कीर्तनकार कृष्णजन्माची कथा रंगवून रंगवून सांगत. मंदिरातही कृष्णाला पाळण्यात ठेवून, कृष्ण जन्म साजरा केला जाई. आणि त्यावेळी मिळणारा प्रसाद- सुंठ, खोबरे, खसखस,  खडीसाखर इत्यादिचे मिश्रण (याला उत्तरेकडे पंजिरी म्हणतात) अगदी अप्रतिम लागत असे.

मग दुसऱ्या दिवशी दुपारपासून दहीहंडीची धूम सुरू होत असे. पण दहीहंडीला आजच्या सारखे अक्राळ विक्राळ स्वरूप प्राप्त झाले नव्हते. तो एक मर्यादित कार्यक्रम असे. मंदिरातही दहीहंडी होत असे. तिथे घराघरातून लोक गोपाळकाल्यासाठी पदार्थ घेऊन येत. त्यात भिजवलेले पोहे, ज्वारीच्या लाहया,कैरीचे आणि लिंबाचे लोणचे, काकडी, डाळिंब, पेरूच्या फोडी, भिजवलेली चण्याची डाळ, दही, इत्यादि साहित्य सगळ्यांच्या घरातून आलेले, निरनिराळ्या चवीचे साहित्य एका मोठ्या भांड्यात एकत्र केल्यानंतर जी अप्रतिम चव तयार होते, त्याची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. (आजच्या न्यूट्रिशन च्या दृष्टीने पाहिले तर यात पौष्टिक आणि पाचक पदार्थ एकत्र केल्याचे दिसून येते.)मंदिरातील दहीहंडी छोट्या प्रमाणावर असे, आणि हा एकत्र केलेला गोपालकाला त्या हंडीत ठेवला जाई, आणि हंडी फोडल्यावर त्यातील काही कण आपल्याला मिळावे म्हणून सगळ्यांची झुंबड उडत असे. अर्थात नंतर सगळ्यांना तो मोठ्या पातेल्यातील एकत्र केलेला काला द्रोणात भरून दिला जाई. आणि तो लोक घरी घेऊन जात आणि घरातील इतर सदस्यांना देत.dahi handi

चौकाचौकात जो दहीहंडी चा कार्यक्रम होई, त्याची मजा लोक आजूबाजूच्या घरांच्या गॅलऱ्यांमधून घेत. त्या परिसरातील सधन लोक काही बक्षिस ठेवत. पण हा सर्व कार्यक्रम एका मर्यादेत होता. त्याला बाजारू स्वरूप आले नव्हते.

विदर्भातील गोकुळाष्टमी 

विदर्भात गोकुळाष्टमीला कानोबा म्हणतात. गणपतीला करतात तशी आरास करून कृष्णाची मूर्ती बनवतात. फुलोरा ही करतात. सकाळी मूर्तीची स्थापना करतात. त्या दिवशी कुटुंबातील मोठ्या माणसांना उपवास यसतो. दुपारपर्यंत मूर्तीची स्थापना होते. त्या दिवशी रात्री बारापर्यंत जागरण करतात. पूर्वी कृष्णलीलेवर छोटेखानी नाटक सुद्धा बसवत. भरगच्च कार्यक्रम असत. रात्री बरोबर बारा वाजता फुलोरा हलतांना कोणाला तरी दिसायचा. त्यानंतर जन्मोत्सव, आरत्या वगैरे रात्री 2 पर्यन्त चालायचे. दुसऱ्या दिवशी सर्वांना घरी जेवायला बोलावत. संध्याकाळी मूर्तीचे वाजत गाजत विसर्जन करीत. (विदर्भातील माहिती ग्रुप मधील बान्ते कुटुंबीयांनी पुरविली आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद)

20240826 074923
गोकुळाष्टमीच्या निमित्ताने शाळेतल्या कार्यक्रमात ‘राधा’ म्हणून जायला सजलेली माझी नात- श्रीशा

आजकाल कित्येक दिवस आधी वर्गणी करून केले जाणारे कार्यक्रम, अशा कार्यक्रमांत समाजातील तथाकथित ‘दादा’ आणि ‘भाईंचा’ सहभाग, विविध राजकीय पक्षांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग, डीजेचा कर्कश दणडणाट या सर्व पार्श्वभूमीवर, आठवणीतील साधेसुधे पण निसर्गाशी जवळीक सांगणारे, माणसामाणसांतील नाती जपणारे त्या काळातील सण उत्सव आठवले की असे वाटते, की ते दिवस आता पुन्हा कधी येणार नाही!

माधव भोपे 

रक्षा बंधन 2024 Raksha Bandhan 2024

20638458 1423752471078592 5580919310273041343 n

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:। तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल।।

Raksha Bandhan 2024

Raksha Bandhan 2024

आज आपण महाराष्ट्रात जी राखी पोर्णिमा साजरी करतो, ती, आणि काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 1970 -1980 या दशकातील महाराष्ट्रातील राखी पोर्णिमेचे स्वरूप हे खूप वेगळे होते! 

मला विशेषतः खेड्यातील राखी पोर्णिमा जी आठवते ती अशी-

आम्ही त्यावेळी 12 ते 15-16 वर्षांचे असतांना, राखी पोर्णिमे मध्ये बहीण भावांचा सण वगैरे असे काही स्वरूप नव्हते. या दिवशी गावातील भट मंडळी यांना आदर पूर्वक घरी बोलावले जात असे. किंवा काही भट मंडळी स्वतः ही नेहमीच्या ओळखीच्या घरी स्वतः हून जात. त्यांच्या जवळ लाल हिरव्या पिवळ्या गोंड्याच्या राख्यां चे बंडल असे.rakhhi e1724057917674 किंवा गावातील एखाद्या मंदिरातही त्यातील काही मंडळी बसलेली असत आणि जो येईल त्याला राखी बांधण्याचा कार्यक्रम करीत. लहान थोर सर्व मंडळी त्यांच्या समोर बसून आपला उजवा हात पुढे करीत. मग गुरूजी, वरील मंत्र म्हणत त्यांच्या हाताला राखी गुंडाळत, आणि तिच्या दोऱ्याची गाठ बांधून देत. मग राखी बांधून घेणारी व्यक्ति त्यांच्या हातावर श्रद्धेने दक्षिणा ठेवत- दक्षिणा किती- तर चार आणे , दहा पैसे, पाच पैसे सुद्धा. क्वचित एखादी सुस्थितीतील व्यक्ति आठ आणे किंवा बंदा रुपया ठेवत. आणि श्रद्धेने त्यांच्या पायावर डोके ठेवत. गुरूजी घरी आलेले असतील तर घरातील सर्वांची राखी बांधून झाल्यावर गुरुजींना काही गोड धोड दिले जाई आणि ते पुढच्या घराकडे वळत. 

अशा वेळी पुरोहित मंडळींची छोटी छोटी मुलेही हातात राख्यांचा गठ्ठा घेऊन बाहेर पडत. आणि जो दिसेल त्याला वरील मंत्र जसा येईल तसा म्हणत म्हणत राखी बांधत. बरेच लोक एकदा राखी बांधून घेतलेली असली तरी अशा अनेक मुलांकडून पुन्हा कौतुकाने राखी बांधून घेत. त्यासाठी खिशात पाच किंवा दहा पैशांच्या नाण्यांची चिल्लर मुद्दाम हून ठेवत.  आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या अशा मुलांना या पर्वकाळात अशा रीतीने मिळणाऱ्या छोट्याशा उत्पन्नामुळे त्यांचे पुस्तकांचे किंवा तत्सम छोटे छोटे खर्च भागवायला मदत होत असे. आणि त्यात कुणालाही काही वावगे वाटत नसे. 

बारा बलुतेदारांच्या  समाज व्यवस्थेत त्याकाळी पूजा आणि पंचांग सांगून पोट भरणारी भिक्षुक  मंडळी ही समाजाच्या दुर्बल घटकात मोडत असे. आणि शेतकरी राजा हा क्षत्रिय म्हणजे सबल, आणि सर्वांचा पोशिंदा मानला जात असे. त्यामुळे दुर्बलांचे रक्षण सबल असलेल्यांनी करावे असा एकूण भाव होता.  

बहिणीसुद्धा भावाला राखी बांधत. पण त्याचा अग्रक्रम नंतरचा असे. आणि फक्त राखी बांधणेच असे. ओवाळणे वगैरे त्यावेळी नाही, दिवाळीच्या- भाऊबीजेच्या दिवशी.  आणि बहिणीने राखी बांधल्यावर तिला काही ‘गिफ्ट’ देणे वगैरे प्रकार नव्हता. 

मला तरी त्यावेळची आठवणारी राखी पोर्णिमा अशी होती.

हळू हळू वरील प्रथा केंव्हा बंद होत गेली, समजले नाही.  कालांतराने सिनेमाच्या प्रभावामुळे, आपल्याकडे उत्तर भारतातील प्रथा रुजू लागल्या. उत्तर भारतात हा दिवस मुख्य करून बहीण भावाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. अर्थात त्याच्याही बऱ्याच कथा आहेत. कॅडबरी च्या जाहिरातीमध्ये बहीण भावाचे रूसणे, मग भावाने बहिणीला कॅडबरी चा मोठ्ठा पॅक देणे, ही जाहिरात आपल्यावर खूप परिणाम करून गेली. वेगवेगळ्या प्रकारच्या फॅन्सी आणि मोठमोठ्या  राख्या आल्या. किती मोठी राखी बांधली याच्यावर चर्चा होऊ लागल्या. काही काही तथा कथित ‘भाऊ’, ‘दादा’ आपल्या मनगटावर आपल्या तथाकथित ‘बहीणींकडून’ बांधून घेतलेल्या शे-पन्नास राख्या बांधून मिरविण्यात धन्यता मानू लागले.  आता तर महाराष्ट्रात उत्तर भारतातील काही प्रथा लग्न इत्यादि समारंभातही इतक्या रुजल्या आहेत, आणि त्या योग्य की अयोग्य याचा कुणी विचार करतांना दिसत नाहीत.  असो.66c2c60393375 raksha bandhan 2024 date history and significance 181522239 16x9 1

तर  रक्षा बंधन किंवा राखी  पोर्णिमा याच्याबद्दल पूर्व काळीचे काही संदर्भ आहेत ते पाहू. पण त्याआधी वरील मंत्राचा अर्थ पाहू-

येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबल:।
तेन त्वामनुबध्नामि रक्षे मा चल मा चल।।

अर्थात, ज्या रक्षा सूत्राने दानवांचा राजा बली हा वचनबद्ध आहे, ते रक्षासूत्र मी (पुरोहित) तुम्हाला (यजमानाला) बांधत आहे. आणि नंतर त्या रक्षा सूत्राला प्रार्थना केली आहे ‘रक्षे’ म्हणजे रक्षा सूत्र. की तू स्थिर रहा. ‘मा चल’, ‘मा चल’ (मा म्हणजे नको- चल म्हणजे चलायमान)

सामान्यतः या मंत्राचा अर्थ असा आहे की, रक्षासूत्र बांधताना ब्राह्मण किंवा पुजारी आपल्या यजमानांना सांगतात की, ज्या रक्षासूत्राने दानवांचा पराक्रमी राजा बळी याला धर्माच्या बंधनात बांधले गेले होते, ते म्हणजे, ते धर्मात वापरले होते, मी तुम्हाला त्याच रक्षासूत्राने बांधले आहे, म्हणजेच मी धर्माला बांधील आहे. यानंतर पुजारी रक्षासूत्राला म्हणतात की हे रक्षा, तू स्थिर राहा, स्थिर राहा. अशा प्रकारे, रक्षा सूत्राचा उद्देश ब्राह्मणांना त्यांच्या यजमानांची धर्मासाठी उपासना करण्यासाठी प्रेरित करणे आणि त्यांचा वापर करणे हा आहे.

पंचांगकर्ते मोहन दाते यांनी रक्षा बंधना बद्दल दिलेली माहितीही खूप उपयुक्त आहे- श्री मोहन दाते म्हणतात-

Raksha Bandhan 2024

१९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन दिवसभरात कधीही करता येईल.


पूर्वीच्या काळी रक्षाबंधनाचा अर्थ बहिणीने भावाला राखी बांधणे एवढाच अभिप्रेत नव्हता, इंद्राच्या पत्नीने इंद्राला रक्षा सूत्र बांधलेले होते, राखी म्हणजे रक्षा सूत्र कोणी कोणास व कोणत्या हेतूने बांधावयाचे असते ? याचा ही विचार रक्षा बंधन साठी महत्वाचा आहे. त्याकाळी रक्षाहोम करून रक्षासूत्र तयार करून ते राजाला बांधले जायचे, अशा पद्धतीने रक्षाबंधन विधिवत करणाऱ्यांनी भद्राकाल वर्ज्य करावा.


राखी पौर्णिमा अर्थात बहिणीने भावाच्या हाताला राखी बांधणे. याकरिता भद्रा वर्ज्य नाही आणि राखी बांधण्यासाठी कोणत्याही वेगळ्या मुहूर्ताची आवश्यकता नाही. त्यामुळे भद्राचा विचार न करता 19 ऑगस्ट 2024 रोजी सोमवारी नेहमी प्रमाणे राखीपौर्णिमा साजरी करावी असे आमचे मत आहे.

 

तसेच रक्षाबंधन हा मुंज, विवाह, वास्तु प्रमाणे मंगल कार्यासारखे नसून सामाजिक व कौटुंबिक उत्सव असल्याने भद्रा असतानाच्या काळात म्हणजे दिवसभरात आपल्या सोईने केंव्हा ही करता येईल असे आमचे मत असल्याने दाते पंचांगात रक्षाबंधनाची वेळ दिलेली नाही . सध्याच्या काळात फक्त पौर्णिमेस रक्षा बंधन करतात असे होत नाही १-२ दिवस आधी किंवा नंतरचे रविवारी सुध्दा करतात धर्मशास्त्रा तील वचनानुसार
ज्यांना रक्षाबंधन विधिवत् करावयाचे आहे त्यांनी खालील प्रमाणे विधी करावा व त्यासाठी भद्राकाल वर्ज्य करावा म्हणजे दुपारी १ वाजून ३३ मिनिटानंतर रक्षाबंधन करावे.

 


रक्षाबंधन विधी – तांदूळ, सोने व पांढऱ्या मोहऱ्या किंवा दूर्वा , अक्षता, केशर, चंदन, मोहरी चे दाणे एकत्र करून त्यांची रेशमी कापडात पुरचुंडी बांधून त्याला रंगीत दोरा बांधून रक्षा अर्थात् राखी तयार करावी आणि ती देवघरात कलशावर ठेऊन तिची पूजा करावी. नंतर पुढील मंत्र म्हणत ती राखी बांधावी.
येन बद्धो बलीराजा दानवेन्द्रो महाबलः । तेन त्वामपि बध्नामि रक्षे मा चल मा चल ।।
सध्याच्या काळात
मात्र या शिवाय प्लास्टिक, स्पंज, इत्यादी पासून तयार केलेली बाजारात मिळणारी वेगवेगळ्या प्रकारची फॅन्सी राखी बांधावयाची असेल तर भद्राकाळात सुध्दा असे रक्षाबंधन करता येईल.
असा हा बहीण – भाऊ, मित्र, समाज बांधव यांच्यातील सामाजिक सलोखा राखणारा हा रक्षाबंधन उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करावा.🙏
मोहन दाते 

याबाबीत काही पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भ आता पाहूत. 

इंद्राची कथा 

एकदा देव आणि दानव यांच्यात युद्ध सुरू झाले, आणि ते बारा वर्ष पर्यन्त चालले. असुरांनी देवांना आणि इंद्राला पराजित केले. इन्द्र आणि इतर देव अमरावतीला  गेले. इकडे असुरांनी तिन्ही लोकात घोषणा केली की इथून पुढे त्यांचीच पूजा केली जाईल. कोणीही यज्ञकर्म इत्यादि काही करू नये. त्यावेळी हतबल होऊन इन्द्र, बृहस्पतींच्या जवळ जाऊन त्यांना यातून बाहेर काढण्याची प्रार्थना केली. बृहस्पतीने इंद्राला ‘रक्षा विधान’ करायला सांगितले.  श्रावण पोर्णिमेला वरील मंत्राने रक्षा विधान संपन्न करण्यात आले.  इंद्राची पत्नी इंद्राणी हिने वरील प्रकारे द्विज यांच्याकडून विधान करवून रक्षा तंतु घेतला आणि इंद्राच्या उजव्या हाताला बांधून मग त्याला युद्धाला पाठविले.  रक्षा तंतूच्या प्रभावामुळे इंद्राला युद्धात विजय प्राप्त झाला.

कृष्ण आणि द्रौपदीची कथा 

कृष्णाने जेंव्हा शिशुपालाचा वध सुदर्शन चक्राने केला, तेंव्हा कृष्णाच्या हाताला सुदर्शन चक्र लागून जखम झाली आणि त्यातून रक्त येऊ लागले. ज्यावेळी  द्रौपदीने ते पाहिले तेंव्हा तिने ते रक्त थांबवण्यासाठी तिच्या भरजरी शालूला मागचा पुढचा कुठलाही विचार न करता एक चिंधी फाडून ती श्रीकृष्णाच्या हाताला बांधून रक्त थांबविले. द्रौपदी ही कृष्णाची मानलेली बहीण. नंतर पुढे जेंव्हा कौरवांच्या भर सभेत तिचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न झाला, त्यावेळी जेंव्हा अनन्य होऊन तिने कृष्णाचा धावा केला, तेंव्हा कृष्णाने तिला वस्त्रे पुरवून तिची लाज वाचविली , आणि तिने बांधलेल्या चिंधीची अशा प्रकारे परतफेड केली.  असे म्हणतात की तेंव्हा पासून भावाने बहिणीचे रक्षण करण्यासाठी त्याला राखी बांधायची अशी प्रथा सुरू झाली.

राणी कर्णावती आणि हुमायूँ ची कहाणी.

एकदा राजपूत मुस्लिमांच्या विरूद्ध लढत होते. त्यात आपला पती राणा संग याच्या मृत्यू नंतर त्याची वीर पत्नी राणी कर्णावती ही मेवाड मध्ये लढत होती.  त्यावेळी गुजरातच्या बहादुर शाह ने मेवाड वर दुसर्‍यांदा आक्रमण केले. कर्णावती ने त्यावेळी हुमायूँ ला राखी पाठवून आपली रक्षा करण्याविषयी विनंती केली. हुमायूँ त्यावेळी दुसर्‍या युद्धात होता. पण राणीची ही हाक ऐकून त्याने आपली फौज मेवाडकडे पाठविली. दुर्दैवाने त्याचे सैनिक वेळेवर पोचू शकले नाही, आणि तोपर्यंत राणी कर्णावतीने जौहार करून प्राण त्याग केला होता. पण हुमायूँ च्या सैन्याने चित्तोड मधून शाह च्या सैन्याला हाकलून लावले आणि कर्णावती चा मुलगा विक्रमजीत याला राज्यावर बसविले, अशी कथा आहे.images 27

अशा प्रकारे श्रावण मासात येणार्‍या या पवित्र सणाला, भारताच्या विविध भागांत विविध इतिहास आहे. अशा या पावन पर्वा निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

आपणास ही पोस्ट आवडली असल्यास या ब्लॉग ची लिंक सर्वांना तसेच आपल्या सर्व ग्रुप्स मध्ये माझ्या नावासकट फॉरवर्ड करायला काहीच हरकत नाही.

माधव भोपे

Unsung Heroes of Indian Freedom Struggle

e048c7d9b1100d11b67dd09cf7dc3dc9

Unsung Heroes of Indian Independence.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा सहभागindependenceday 1723561798347

आज आपण भारताचा 78 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. पण दुर्दैवाने 1947 साली आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले, त्याला फाळणीच्या दुःखाची किनार होती आणि लक्षावधी निर्वासितांच्या आणि जे मारले गेले त्यांच्या कुटुंबियांच्या आक्रोशाचे आवरण होते.

भारतीयांचे स्वातंत्र्य युद्ध अनेक वर्षे चालले. त्याची सुरुवात 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामापासून झाली.( त्याला 1857 चे बंड असे इंग्रजांच्या प्रभावामुळे आपण कित्येक वर्ष म्हणत आलो होतोत). आज आपल्याला स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन आपल्या प्राणाची आहुति देणाऱ्या तसेच अनन्वित अत्याचार सहन करणाऱ्या योद्ध्यांचा विसर पडल्यासारखे झाले आहे. म्हणून आजच्या या दिवशी, स्वातंत्र्य लढ्यातील या योद्ध्यांचे स्मरण करून त्यांना नमन करूयात .images 1

1 160

Unsung Heroes of Indian Independence.

कवि बा. भ. बोरकर यांच्या कवितेत थोडासा बदल करून असे म्हणावेसे वाटते:

यज्ञी ज्यांनी देऊनी निजशीर

घडिले स्वातंत्र्याचे मंदिर

परी तयांच्या दहनभूमीवर

नाही चिरा नाही पणती

तेथे कर माझे जुळती

इ.स. १८५७ च्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धात मंगल पांडे, तात्या टोपे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, लहुजी राघोजी साळवे, उमाजी नाईक,नानासाहेब पेशवे, शेवटचा मुघल बादशाहा बहादूरशाह जफर इत्यादी स्वातंत्रवीरांचा सक्रिय सहभाग होता. मात्र स्वातंत्र्ययुद्ध अयशस्वी झाले, आणि भारतात ब्रिटिश सरकारचे शासन सुरू झाले. त्यापूर्वी आणि त्यानंतरही ज्या क्रांतिकारांनी भारताला स्वातंत्र्य मिळावे यासाठी हरप्रकारे प्रयत्‍न केले अशा काही क्रांतिकारकांची ही यादी:Indian Freedom Fighters

  1. अनंत लक्ष्मण कान्हेरे
  2. उमाजी नाईक
  3. चंद्रशेखर आझाद
  4. मंगल पांडे
  5. दामोदर हरी चाफेकर
  6. नाना पाटील
  7. बाळकृष्ण हरी चाफेकर
  8. भगतसिंग
  9. मदनलाल धिंग्रा
  10. राजगुरू
  11. लहुजी राघोजी साळवे
  12. हरी मकाजी नाईक
  13. वासुदेव बळवंत फडके
  14. वासुदेव हरी चाफेकर
  15. विष्णू गणेश पिंगळे
  16. विनायक दामोदर सावरकर
  17. हेमू कलानी
  18. बिरसा मुंडा
  19. बेगम हजरत महल
  20. कुंवरसिंह
  21. राणी चेन्नमा
  22. बहादूरशाह जफर
  23. खुदीराम बोस
  24. प्रितीलता वड्डेदार
  25. बुधू भगत
  26. शंभुधन फुंगलोसा
  27. शंकर शहा
  28. दर्यावसिंह ठाकूर
  29. सुरेंद्र साए
  30. चारुचंद्र बोस
  31. रंगो बापूजी गुप्ते
  32. गोमाजी रामा पाटील
  33. हिराजी गोमाजी पाटील
  34. झिपरु चांगो गवळी
  35. आनंदीबाई झिपरु गवळी
  36. नारायण नागो पाटील
  37. दिनकर बाळु पाटील
  38. गौतम पोशा भोईर
  39. विश्राम घोले
  40. यशवंतराव होळकर
  41. राणी गाइदिनल्यू
  42. राघोजी भांगरे
  43. डाॅ. सदाशिव खानखोजे
  44. कोंडाजी नवले
  45. रामजी किरवे
  46. बिरसा मुंडा
  47. खाज्या नाईक
  48. झलकारी बाई
  49. त्रंबक डेंगळे
  50. जयनाथ सिंह
  51. राजा नंदकुमार
  52. राजा चेतसिंह
  53. तिलाका मांझी
  54. पझसी राजा –केरल वर्मा
  55. मुधोजीराजे भोसले
  56. घानासिंह
  57. युवराज चैनसिंह
  58. राणी चेन्नमा
  59. तीरथसिंह
  60. आत्माराम चौकेकर
  61. फोंड सावंत
  62. सुई मुंडा
  63. चिमासाहेब भोसले
  64. गंगानारायण
  65. फकुन आणि बरुआ
  66. चक्र बिष्णोई
  67. शम्भूदान
  68. राणी जिंदान कौर
  69. मूलराज
  70. सिदो कान्हू
  71. ईश्वरी पांडे
  72. कुमारी मैना
  73. अजिदुल्ला खाँ
  74. मुहंमद अली
  75. भीमाबाई
  76. राणा बेनो माधोसिंह
  77. फिरोजशहा
  78. वाजिद अली शहा
  79. बेगम हजरत महल
  80. मौलवी अहमदुल्ला शहा
  81. कुंवरसिंह

याशियाय असे असंख्य स्वातंत्र्यवीर आहेत ज्यांची आपल्याला माहित नसतील. 2022 सालच्या आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या वेळी, भारत सरकारने अशा अजून काही खूप कमी माहिती असलेल्या स्वातंत्र्य योद्ध्यांची माहिती प्रसिद्ध केली होती. ती या ठिकाणी प्रस्तुत करीत आहोत.

येथे क्लिक करा 

Capture 14 aug

Watch Live telecast of Independence day celebrations and flag hoisting here: