https://goodworld.in A website by Madhav Bhope

Who caught whom?- चोरीचा मामला

people-cinema-watching-movie_23-2151005467.png

Guest Article by Shri V.D.Bhope.

इंग्रजी सिनेमा पाहतांना पकडले …..

( पण कुणी कुणाला ? )

———————

मित्रांनो
साधारणपणे १९६८ सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी औरंगाबादला(आताचे संभाजीनगर) इंजिनियरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो.दोन मित्रांसोबत किरायाची खोली घेऊन उस्मानपुऱ्यात रहात होतो.महिन्यातून एक दोन वेळा सिनेमा पहायला जायचो. त्या काळात विद्यार्थ्यांनी इंग्रजी सिनेमा पाहणे एकदम वर्ज्य समजले जायचे.एकदम शांतम् पापम् ! पापभिरू मंडळींनी इंग्रजी सिनेमा पहायचा नसतो अशी समजूत सर्वसाधारणपणे दृढ होती .
आमच्या घरचे वातावरण तर फारच बाळबोध होते.आम्हा सर्व बहीण भावंडांना आमच्या वडिलांचा फार धाक वाटत होता .त्यांच्या समोर बोलण्याची आमची हिम्मत नसे.   त्यांच्याशी सगळं महत्वाचं communication सहसा आईच्या मार्फतच व्हायचं .
आमच्या काळात आपण कांहीही चूक केली नसली तरी वडीलांना भिण्याची पध्दत होती. 


तर एका रविवारी आम्ही कांही मित्रांनी गुलजार टाॅकीजमध्ये चालू असलेला एक इंग्रजी सिनेमा पहायला जायचे ठरवले.सगळ्यांचे आई वडील परगावी रहात होते. त्यामुळे ही गोष्ट तशी कुणाच्याही घरी कळण्याची काहीच  शक्यता नव्हती.
तर आम्ही कांही मित्र ठरल्या प्रमाणे गुलजार टाॅकीज मध्ये मॅटिनी शो ला जाऊन बसलो. सिनेमा सुरू झाला .त्यातील नट माहित नाहीत, नट्या माहित नाहीत ,त्यांची भाषा कळत नाही, उच्चार नीट समजत नाहीत , पडद्यावर नक्की काय चाललंय हे ही कुणाला समजत नाही तरी पण आसपासचे कुणी हसले तर कांही तरी विनोद  झाला असावा असा अंदाज बांधून उरलेले हसतात .आणि सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक काॅमन भाव दिसतो.आपल्याला सिनेमातलं कांही कळत नाही हे कुणी ओळखलं तर नाही ना ? अशा अर्थाचा तो ओशाळवाणा भाव असतो. पण अळीमिळी गुपचिळी हेच धोरण सगळे जण अवलंबतात .म्हणजे तेरी भी चूप अन् मेरी भी चूप .असो.

सिनेमा सुरू झाल्या नंतर कांही वेळाने माझ्या एका मित्राने मोठ्ठ्याने ओरडून हाक मारली..ए भोपे , इकडे ये न बे , जागा रिकामी आहे. ‘ मी त्याने दाखवलेल्या जागेवर जाऊन बसलो.टाॅकीज मध्ये अंधारात थोडावेळ बसल्यांनतर कांही वेळाने आसपासचे बऱ्यापैकी दिसू लागते.कांही वेळाने माझ्या लक्षात आले की माझ्या शेजारचे गृहस्थ आमच्या कुटुंबाशी चांगलेच परिचित असलेले एक गृहस्थ होते. आम्ही त्यांना काका म्हणत असू. माझ्या मित्राने मोठ्ठयाने माझ्या नावाने जेव्हां  मला हाक मारली तेंव्हाच त्या काकांना समजले होते की मी सिनेमाला आलो म्हणून !


आणि आता तर काय मी त्यांच्या शेजारीच बसलो होतो. ते म्हणाले, अरे विष्णू बैस बैस .आता मात्र मी बेचैन झालो. हे काका पुढे मागे  आमच्या गावी आमच्या घरी गेले तर नक्कीच माझी चुगली  करतील आणि मग वडिलांनी  जाब विचारला तर आपल्यावर काय प्रसंग ओढवेल याची मला काळजी वाटू लागली .
मला ओरडून नावाने हाक मारणाऱ्या मित्राला इंटरव्हल मध्ये चांगलंच झापावं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या शेजारच्या काकांना कांहीतरी गयावया करून पुढेमागे गावी  गेलात तर प्लीज ही गोष्ट घरी सांगू नका,अशी गळ घालावी असं मी मनात ठरवलं आणि त्यासाठी मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करू लागलो .
इंटरव्हल झाली . माझ्या त्या मित्राला मी गाठलं आणि म्हणालो ” माझं नाव घेऊन एवढ्या मोठ्ठयाने ओरडायची  काय गरज होती रे ? त्या माझ्या शेजारी बसलेल्या काकांना  आता कळालंना ! त्यांनी घरी चुगली केली म्हणजे ?”

तेवढ्यात त्या काकांनी मला गाठलं. माझ्या अभ्यासाविषयी जुजबी चौकशी केली. माझ्यासाठी व स्वत:साठी खारे दाणे  घेतले. व आर्जवाच्या स्वरात मला म्हणाले,

” माझं एक काम करशील का ?’

मी काम न जाणून न घेताच म्हटले ,

“हो करीन की . त्यात काय एवढं !”


त्यावर काका म्हणाले , “हे बघ तू जर कधी आमच्या घरी आलास ना तर इतर कुठल्याही विषयावर बोल पण हिला म्हणजे तुझ्या काकूला मी इंग्लिश सिनेमा पाहतांना भेटलो होतो हे तिला कधीही सांगू नकोस बाबा. तुझी काकू कशी आहे हे तुला माहीत आहे ना. सगळं घर डोक्यावर घेईल ती हे कळालं तर.’

आता माझी ट्यूब लाईट पेटली. म्हणजे जो प्राॅब्लेम मला होता तोच प्राॅब्लेम या काकांनाही होता तर ! मी उगचंच घाबरलो होतो.
म्हणजे या काकांना इंग्लिश पिक्चर पाहतांना मी पाहिलं हे ही तितकंच खरं होतं की !
अन् त्यांनाच चिंता वाटत होती की मी कुठे ही गोष्ट त्यांच्या घरी सांगतो .

मी म्हणालो , “अहो काका!!
आज आपण भेटलोच नाही आणि इंग्लिश पिक्चर तर पाहिलाच नाही! तेंव्हा कुणी कुणाला कांही सांगण्याचा प्रश्न येतोच कुठे , सांगा बरं !!…”

काका म्हणाले, … शाब्बास . व्हेरी गुड .हुशार आहेस . अळिमिळी गुप चिळी. चल चहा घेऊ यात .

😄😎🤑

amazon logo
Go to shopping

प्रयत्नांती परमेश्वर

Screenshot 20240403 092528 Google

ही पोस्ट वाचण्यासाठी कमीत कमी १० मिनिटांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे आपणांस विनंती की तेवढा वेळ काढून ही पोस्ट नक्की वाचावी. 

राष्ट्रीयीकृत बँकेतील नोकरी म्हणजे नुसतेच उपजीविकेचे साधन नाही, तर निरनिराळ्या प्रसंगांमधून अनुभवाची मिळणारी मोठीच शिदोरी आहे.  बँकेतील नोकरीमुळे करतांना  आपल्या स्वभावाचे अनेक टोचणारे कंगोरे घासून घासून गुळगुळीत केले जातात आणि आपल्याला अनेक स्किल्स (कौशल्ये) शिकण्यास भाग पडून आपले व्यक्तिमत्व अधिक परिपूर्ण बनवण्यासाठी मदत होते .  अनेक कठीण प्रसंगांतून मार्ग काढावा लागतो.  पण या कठीण प्रसंगांतून यशस्वीरित्या मार्ग काढल्यानंतर मिळणारे समाधान काही वेगळेच असते..

अशाच प्रकारचा एक अनुभव आज इथे कथन करायचा आहे.

ऑफिसर म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर, माझा प्रवास अनेक शाखांमधून झाला. त्यात अगदी खेड्याच्या शाखेपासून ते इतर राज्यातील मोठ्या शहरातील मोठ्या शाखांपर्यंत हा प्रवास चालू होता. अशात सन 2002 च्या सुरुवातीला  माझी पोस्टिंग एका मोठ्या कृषि विकास शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून झाली. त्या शाखेचा पसारा खूप मोठा होता. ७२ गांवें आणि १०००० च्या वर कर्ज खाती तिथे होती . मी तिथे मध्ये रुजू झाल्यानंतर मार्चचा वार्षिक ताळेबंद तोंडावर होता , शिवाय नुकतेच ऑडिट (अंतर्गत लेखापरिक्षण) झाले होते आणि त्यात १००० खात्यांचे रीफेसमेंट (पुनर्गठन ) करून ऑडिट चे उत्तर द्यायचे होते, आणि तेंव्हाच बँकेत संगणकीकरण सुरू करण्याचे ठरले होते त्यासाठी बँक-मास्टर ही प्रणाली लागू करायची होती. शिवाय त्या गावात वातावरण अतिशय स्फोटक असल्यामुळे रोज एक नवीन प्रकरण उपस्थित व्हायचे आणि त्याचा निपटारा करावा लागायचा. तेथे आलेला सर्वात मोठा अनुभव म्हणजे शेतकरी संघटनेचे आंदोलन हाताळण्याचा.

परभणी, सेलू, मानवत, पाथरी, माजलगाव हा भाग म्हणजे संघटनेचा बालेकिल्ला समजला जायचा. मी तिथे रुजू झाल्यानंतर काहीच दिवसात, बँकेच्या सेलू येथील क्षेत्र अधिकाऱ्याला  लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. आम्ही सर्व तिथे जाऊन त्या आमच्या सहकाऱ्याला आमच्या पाठिंब्याची ग्वाही दिली होती आणि धीर दिला होता. उपरोक्त प्रसंगामुळे, आपल्याकडे असा काही प्रकार होऊ नये म्हणून मी अधिकच सावध झालो होतो. संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते एका विशिष्ट विचारसरणीने भरलेले होते, आणि त्या विचारसरणीच्या समर्थनार्थ काहीही करण्याची मानसिकता तयार झाली होती.

मी तिथे  आल्यानंतर दोन महिन्यात, पूर्ण ब्रांच च्या सर्व खात्यांचे गावनिहाय वर्गीकरण करून घेतले होते, त्यामुळे प्रत्येक गावातील परतफेडीच्या रेकॉर्डची कल्पना आली होती. मानवत तालुक्यातील एक  गांव  हे संघटनेचा बालेकिल्ला समजला जात होते. संघटनेचे ब्रीदवाक्य होते, “ सरकारी कर भरणार नाही, बँकेचे कर्ज परतफेड करणार नाही…. आम्ही तुमचे देणे लागत नाही. उलट शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे तुम्हीच आमचे देणे लागतात.” बऱ्याच वेळेला, त्यांचे कार्यकर्ते, बसमधून तिकीट न काढता प्रवास करीत आणि कंडक्टर ने तिकीट काढावयास सांगितल्यास त्याच्याशी वरील मुद्द्यावरून वाद घालत आणि प्रसंगी मारहाण ही करत.

वरील हे गांव आमच्या शाखेकडेच होते, आणि साहजिकच, तेथील थकबाकी इतर गावांपेक्षा कितीतरी जास्त होती. त्या गावी  मी आमच्या फील्ड ऑफिसर सोबत एकदा जीप ने गेलो, तेंव्हा गावाच्या वेशी जवळील एका भिंतीवर, मोठ्या अक्षरात , “सरकारी अधिकारी आणि बँकेच्या वसूली अधिकाऱ्यांना गावात प्रवेश बंद” असे लिहून ठेवले होते. मी, सरकारी स्कीम मधील  नवीन कर्ज प्रकरणाच्या चौकशीच्या निमित्ताने गेलो असल्यामुळे, संबंधित अर्जदार माझ्यासोबत होता, त्यामुळे गावात जाण्यास काही त्रास झाला नाही. पण इतर गावांना वापरीत असलेली वसुलीसाठीची कार्यपद्धती इथे लागू पडणार नाही याची मला जाणीव होत होती आणि मी मनोमन काही तरी ठरवत होतो.

मी त्या गावातील  खातेदारांची, विशेषकरून थकबाकीदारांची माहिती पुनः पुन्हा बघत होतो, आणि त्यातल्या मोठ्या मोठ्या थकबाकीदारांची नांवे मला त्यांच्या थकबाकी च्या रकमेसहित मुखोद्गत झाल्यासारखी झाली होती.

अशात एके दिवशी त्या गावातील संघटनेचे सर्वात प्रभावशाली पुढारी, त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत माझ्याकडे आले. धोतर, नेहरू शर्ट, टोपी, भरपूर उंची आणि पिळदार मिशा असलेले प्रभावी व्यक्तिमत्व होते ते. त्यांच्या छातीवर संघटनेचा तो सुप्रसिद्ध बिल्ला डौलाने मिरवत होता. सोबतच्या सर्व कार्यकर्त्यांच्याही शर्टावर अर्थातच तो बिल्ला झळकत होता. मी जरी आजवर त्यांना पहिले नव्हते, तरी गावातील प्रत्येक थकबाकीदाराच्या नावासहित फोटो ही माझ्या डोक्यात पक्के ठसले होते, त्यामुळे त्यांना पाहिल्याबरोबर त्यांचे नाव आणि त्यांचा थकबाकीचा आकडा माझ्या डोळ्यासमोर आला आणि मी माझ्या कॉम्पुटर वर बघून खात्री करून घेतली. परंतु मी त्यांचे हसून स्वागत केले आणि “या” म्हणून आदराने त्यांना बसावयास खुर्ची ऑफर केली. त्यांच्याबरोबरचे कार्यकर्तेही आजूबाजूच्या खुर्च्यांवर बसले. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी माझे हातातील सर्व काम बाजूला ठेवून “कसे काय येणे केलेत?” असे आस्थेने विचारले. त्याच बरोबर चहाची ऑर्डर दिली. त्यांनी त्यांच्या संघटनेबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करीत आहे, आणि बँका सरकारच्या हस्तक असल्यामुळे कशा त्यांच्या पिळवणुकीत सहभागी आहेत, हे सांगायला सुरुवात केली. शेतीचे अर्थशास्त्र सांगायला सुरुवात केली. मी त्यांचे सर्व बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले, आणि त्यांच्या बहुतेक सर्व मुद्दयांना संमती दर्शविली. जवळ जवळ अर्धा तास ही चर्चा चालू होती.पूर्ण संभाषणाच्या दरम्यान मी एकदाही त्यांच्या थकबाकी बद्दल एक अक्षर ही उच्चारले नाही. तेही बहुतेक माझा अंदाज घ्यायला आले होते. खेड्यात सहसा अशी पद्धत असते, की तेथील पुढारी, नवीन कोणीही सरकारी अधिकारी किंवा बँक मॅनेजर आल्यानंतर त्याची चाचपणी करण्यासाठी एक अशी चक्कर हमखास करतात. मी त्यांचे केलेले स्वागत कदाचित त्यांना अनपेक्षित असावे. आणि ते, आपणास विरोध होईल आणि मग आपण मॅनेजरला आपला इंगा दाखवू, अशा तयारीने आले परंतु, वजनदार बदली उचलायला जावे आणि ती बदली रिकामी निघावी, तसे काहीसे झाल्यासारखे भाव मला त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. शेवटी निघता निघता, काही तरी आठवल्यासारखे करून त्यांनी, सांगितले, “साहेब, तुमच्या बँकेकडे आय आर डी पी स्कीम खाली अमुक अमुक माणसाची एक फाईल आली आहे. चांगला माणूस आहे. तुमच्या नियमात बसतं का बघा.” मी लगेच ती फाईल काढून पाहिली. आणि ती नियमात बसत असल्यास नक्की विचार करीन असे आश्वासन दिले. वास्तविक त्यांच्या येण्याचा मुख्य उद्देश तोच होता हे मला जाणवले. परंतु मी त्यांना तसे जाणवू न देता त्यांना विचार करीन असे आश्वासन दिले. आमच्या पहिल्या भेटीने अत्यंत समाधानी होऊन त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझा निरोप घेतला. ते गेल्यानंतर आमच्या फील्ड ऑफिसरने येऊन त्यांच्या पूर्ण थकबाकीची मला माहिती दिली. अर्थात ती  मला माहिती होतीच.

त्यांनी सांगितलेली फाईल योग्य वाटत होती आणि नियमात बसत होती. केवळ त्यांनी सांगितले म्हणून फाईल नाकारणे ही योग्य नव्हते. त्यामुळे आम्ही ३-४ दिवसातच ती फाईल मंजूर केली आणि ८-१० दिवसात त्याचे पहिल्या हप्त्याचे वाटपही केले.

त्यांनी सांगितलेली फाईल मंजूर केल्यामुळे त्यांना चांगले वाटले होते, आणि हा माणूस आपल्यावर विश्वास ठेवतो आहे अशी खात्री झाली होती. त्यानंतर त्यांच्या बँकेत बऱ्याच चकरा झाल्या. प्रत्येक वेळी आल्यानंतर ते बराच वेळ बसत आणि भडा भडा बोलत. मला त्यांच्या बोलण्यातून बरीच नवीन माहिती मिळत होती. या कुठल्याही भेटीत मी त्यांच्या खात्याबद्दल किंवा त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या खात्याबद्दल  एक अवाक्षरही काढले नाही. मात्र मी त्यांच्या बोलण्यातून मधून मधून सवड काढून त्यांना बँकेच्या विविध स्कीम्स बद्दल बोलत होतो.

अशाच एके दिवशी ते आणि त्यांचे एक त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असलेले एक कार्यकर्ते असे दोघेजण आले. ते कार्यकर्ते थोडे परेशान दिसत होते. बोलता बोलता मी त्या दुसऱ्या व्यक्तीची शेती कशी काय चालली आहे, त्याची चौकशी केली. त्यांनी सांगितले, काय करावे साहेब, उसाला पाणी कमी पडते आहे. जवळ असलेले सर्व पैसे बेण्यात आणि खतात घातले आहेत. आता विहीर खोल केली आणि ठिबक केले तरच ऊस वाचेल अशी परिस्थिती आहे. पण आता सावकारही कर्जाऊ देत नाही कारण त्याच्याकडून आधीच कर्ज घेतले आहे. आमच्या संघटनेच्या तत्त्वाप्रमाणे, बँकेचे कर्ज फेडायचे नाही आणि घ्यायचेही नाही. तसेही, आम्हाला कर्ज देणे तर तुमच्या नियमात बसणार नाही कारण पहिले खाते थकबाकीत आहे. त्यांच्या मनातील व्यथा बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणालो, “ खरं आहे तुम्ही म्हणता ते. हे जग पैशावर चालतं. सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणतात ते खरच आहे. आणि पाटील हे बघा, मी तुमच्या संघटनेच्या विचारसरणीचा आदर करतो. पण शेवटी प्रत्येकाला आपली वैयक्तिक प्रगती करायची असेल, आपल्या मुलांना चांगले उच्च शिक्षण द्यायचे असेल तर पैशांची गरज आहेच. तुमचे खाते थकबाकीत असल्याने बँकेला किंवा वैयक्तिक मला, विशेष काही फरक पडत नाही. (अर्थात हे विधान मी मोठे धाडसाने केले होते, आणि अपेक्षित परिणाम साधण्यासाठी केले होते), पण तुमच्या जीवनावर मात्र फार मोठा फरक पडतो. मी तुमची खाती काढून बघतो, आणि आपण बघूयात काय करता येते ते.” त्यानंतर मी त्यांचे खाते काढून पाहिले. थकबाकी किती आहे ते पाहिले. योगायोगाने त्यांचे पीक कर्ज थकबाकीत असले तरी बाकी खूप जास्त नव्हती. त्यांची जमीन  बरीच होती. मी त्यांना सुचवले, “ तुम्ही जर ही थोडीशी रक्कम भरू शकला तर बघा, तुम्हाला तुमच्या होल्डिंग प्रमाणे पीक कर्ज लगेच मंजूर होऊ शकेल आणि ते दुसऱ्याच दिवशी मिळेल याची मी खात्री देतो. तसेच तुमचे पीक कर्ज नियमित असल्यानंतर, तुम्हाला विहीर दुरुस्तीसाठी आणि ठिबक साठी ही कर्ज मिळू शकते. ठिबक ही तर आज काळाची गरज आहे.” हे ऐकून त्यांचा चेहरा खुलला पण ते म्हणाले, “ साहेब, मी कसेही करून पैशाची व्यवस्था करतो, पण एक विनंती आहे. कृपया मी माझी थकबाकी भरली याची कुठेही वाच्यता करू नका. कारण आम्ही संघटनेची नेते मंडळी आहोत. आम्हीच संघटनेच्या विचाराविरूद्ध वागलो असे इतरांना कळले तर ते ठीक होणार नाही.” मी त्यांना आश्वासन दिले, “ काही काळजी करू नका, आमच्या कडून कुठल्याच खातेदाराची माहिती इतरांना दिली जात नाही”. अशा प्रकारे संघटनेच्या पहिल्या व्यक्तीचे खाते नियमित झाले. आम्ही, आश्वासन दिल्याप्रमाणे, अत्यंत त्वरेने त्याचे कर्ज मंजूर केले, आणि थोड्याच दिवसात, त्याचे विहिरीचे काम सुरु झाले, आणि ठिबक संच ही शेतात येऊन पडला! आम्ही त्याचे काम पाहायला गेलो तेंव्हा त्याच्या शेतातील ऊस हिरवागार होता, आणि त्याच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. आम्हालाही साहजिकच, एक नेक काम आपल्या हातून झाल्याचा आनंद झाला.

त्यानंतर, काही दिवसांनी, ते पुढारी अजून एका व्यक्तीला आमच्याकडे घेऊन आले आणि, “ साहेब, याचा हिशोब बघा बरं” म्हणून म्हणाले. त्याचा हिशोब बघितल्यानंतर, त्याच्याकडे असलेले  पैसे थकबाकी भरायला कमी पडत होते. मी त्याला घरात कुणाच्या नावाने शेती आहे का ते विचारले. त्याच्या पत्नीच्या नावावर शेती होती आणि कर्ज घेतले नव्हते. तेंव्हा मी त्याच्या पत्नीच्या नावाने कर्ज मंजूर करण्याची तयारी दाखविली, आणि अजून एक खाते बेबाक झाले. त्याने ही तीच विनंती केली, “साहेब, मी थकबाकी भरली म्हणून कोणाला सांगू नका!”

अशा प्रकारे ८-१० खाती बेबाक झाली; लोकांच्या विहिरी होऊ लागल्या, पाईप लाईन लागू लागल्या ठिबक संच बसू लागले, आणि हळू हळू गावात बातमी पसरली. बँक, थकबाकी भरणा ऱ्यांना सढळ हाताने मदत करत आहे. एके दिवशी, ते मुख्य पुढारी जे होते, ते माझ्याकडे आले, आणि मला म्हणाले, “साहेब, आपला किती हिशोब होतो ते पहा बरं!” माझ्या प्रयत्नांना यश येतांना पाहून मला अतिशय आनंद झाला. मी त्यांना त्यांचा पूर्ण हिशोब सांगितला. त्यांची अजून एक आवश्यकता होती. त्यांना मानवत मध्ये घर बांधायचे होते. प्लॉट घेतलेला होता. पण घर बांधायसाठी पैसे नव्हते. त्यांची थकबाकी भरल्यानंतर, कुठेही नियमांचे उल्लंघन न करता, त्यांच्या गरजेप्रमाणे कर्ज मंजूर करता आले आणि संघटनेच्या कामात असलेल्या व्यस्तते मुळे त्यांची आर्थिक घडी जी विस्कटली होती, ती नीट बसायला लागली. आता मात्र पूर्ण गावाला माहित झाले होते, की बँकेकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे, आणि त्या पहिल्या घटनेनंतर, सहा महिन्यांच्या कालावधीत, ८० टक्के खाती नियमित झाली! यात जराही अतिशयोक्ति नाही. अशाच एका कार्यकर्त्याचा मुलगा अत्यंत हुशार होता आणि त्याचा आय आय टी चेन्नई येथे नंबर लागला होता. त्याला आम्ही एज्युकेशन लोन दिले आणि तो चेन्नई ला गेला. आता आमचे फील्ड ऑफिसर निर्भयपणे आणि मुक्तपणे त्या गावात ये जा करू लागले होते आणि गावातील लोकांचे बँकेत येणे जाणे नित्याचे झाले होते.

खरा क्लायमॅक्स पुढेच आहे.

पुढील वर्षाची गोष्ट. रिकव्हरी सीझन (कर्ज वसूलीचे दिवस)चालू होता. आमच्या परीने आमचे सर्व लोक वसुलीसाठी मेहनत करत होते. अनौपचारिकरित्या वसुली मेळावे  होत होतेच, पण रिजन ऑफिस कडून निरोप आला, की एक वसुली मेळावा मोठा झाला पाहिजे, आणि त्यासाठी एजीएम  (सहाय्यक महाप्रबंधक) आणि डीजीएम (उपमहाप्रबंधक) येतील. तशात परभणीच्या कृषि विकास शाखेने   वसुली मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात १४ लाख रुपये वसुली झाली (ही घटना २००३ ची आहे, आणि तेंव्हा ही रक्कम बरीच मोठी होती, हे इथे लक्षात घेण्याजोगे आहे). आम्हाला रिजन ऑफिस ला वसुली मेळाव्याची तारीख आणि ठिकाण कळवायचे होते. त्यासाठी मी आणि माझे सर्व फील्ड ऑफिसर सहकारी माझ्या केबिन मध्ये बसून विचार विनिमय करीत होतो. शक्यतो ब्रांच च्या जवळ चे गाव निवडावे, आणि ज्या गावाचे वसुली रेकॉर्ड खूप चांगले आहे, असे गाव निवडावे, असा विचार चालला होता. त्यानुसार अनेक नांवे समोर येत होती. इतक्यात त्या गावचे  ते पुढारी आणि त्यांचे सहकारी आले. बँकेची वेळ संपली होती, पण त्या गावची  मंडळी आता बँकेच्या कुटुंबापैकीच असल्यासारखी झाली होती, त्यामुळे, त्यांनी आवाज दिला, “ काय साहेब, काय चाललंय, याव का आत?” आम्ही त्यांना आत बोलावले. त्यांना काय विषय चालला आहे त्याची कल्पना दिली. त्याबरोबर, अनपेक्षितरित्या त्यांच्याकडून ताड्कन प्रस्ताव आला, “त्यात काय विचार करायचा साहेब, आमच्या गावालाच ठेऊ यात की वसुली मेळावा!” आश्चर्यचकित होण्याची पाळी आमची होती. आम्ही या प्रस्तावाला लगेच होकार दिला नाही. मी त्यांना म्हटले, “ आपल्या गावातील वसुली आता नक्कीच चांगली आहे आणि वसुली मेळाव्याला प्रतिसाद ही चांगला मिळेल, पण मला असे वाटते की संघटनेचे विचार आहेत त्याच्या विरुद्ध असा मेळावा घेणे योग्य राहील का, याविषयी आपण अजून विचार करावा.” त्यावर लगेच ते म्हणाले, “तसेच असेल तर आत्ताच चला साहेब, आपण आमच्या सेलूच्या मोठ्या साहेबांकडे जाऊत”. त्याप्रमाणे आम्ही लगेच जीप काढली आणि सेलूच्या त्यांच्या शीर्ष नेतृत्वाकडे गेलो (नाव मुद्दामहून देत नाही). त्यांच्याकडे गेल्यानंतर असे समजले, की त्यांच्या कानावर आमच्या बँकेबद्दल पूर्ण माहिती आली होती आणि बँकेमुळे झालेल्या गावच्या प्रगतीबद्दल ते अत्यंत समाधानी होते. त्यांनी पूर्ण खात्रीने त्यांच्याकडून हिरवा कंदील दिला. गावात २-४ उनाड तरुण पोरे होती. सेलूच्या नेत्याने लोकल नेत्यांना बजावून सांगितले, त्यांना त्या दिवशी येऊ देऊ नका, आणि कार्यक्रम एकदम जोरदार झाला पाहिजे.

अशा प्रकारे वसुली मेळावा मानोलीला घेण्याचे सर्वानुमते नक्की झाले, आणि आम्ही रिजन ऑफिस ला ठिकाण आणि विसेक दिवसा नंतरची  तारीख कळवून टाकली. परभणीच्या वसुली मेळाव्यात १४ लाखांची वसुली झाली होती. तेंव्हा आम्ही आमच्या अंतर्गत मीटिंग मध्ये एक उद्देश ठेवला, “ आपली वसुली कमीत कमी १५ लाख झाली पाहिजे!” त्या दिशेने सर्व सहकारी पूर्णपणे कामाला लागले. अर्थात अशा वसुली मेळाव्यासाठी लोकांकडून आधी वसुलीबद्दल खात्री करून घेऊन त्यांना त्या ठराविक तारखेला त्या गावी येण्याचे सांगावे लागते. आजूबाजूच्या सर्व गावांना ही त्यात सामील करावे लागते. त्याप्रमाणे आमचे फील्ड ऑफिसर रोज सगळीकडे हिंडून वसुलीचे आकडे घेऊन येऊ लागले. ब्रांच च्या स्टाफ सेक्रेटरीनेही पूर्ण स्टाफ च्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हळू हळू, आमची वसुली १५ लाखाच्या आसपास पोंचेल अशी परिस्थिती निर्माण झाली. मानोलीचे लोक मधून मधून येऊन आम्हाला सांगत होते, “तुम्ही काही काळजी करू नका साहेब, आपला मेळावा जोरदार होणार.!” होता होता तो दिवस उगवला.

रिजन ऑफिस हून एजीएम आणि डीजीएम, आले. ब्रँचमध्ये त्यांचे स्वागत केल्यानंतर, सकाळी १० च्या सुमारास आम्ही मानोलीला निघालो. ब्रँचमध्ये कमीत कमी स्टाफ ठेवून बाकी सर्वजण (कॅश मोजायसाठी कॅशियर, तसेच क्लार्कस) साडेदहाच्या सुमारास मानोलीला पोंचलो. गाव जवळ आल्यानंतर जे दृश्य दिसले ते खूपच उत्साहवर्धक होते. गावाच्या वेशीवरच, “स्टेट बँक ऑफ हैदराबाद वसुली मेळावा” असा फलक लावला होता. आणि आम्ही वेशीपाशी पोंचलो तेंव्हा गावातील मंडळी हातात हार घेऊन उभी होती. समोर बँड पथक होते, आणि आम्ही पोंचल्यानंतर, बँडच्या तालात, गावातील पुढारी मंडळींनी, पुढे होऊन सर्वांचे हार घालून स्वागत केले, आणि सभेच्या पंडाल (मंडप) पर्यंत सर्वांना वाजत घेऊन गेले. पंडाल खचाखच भरलेला होता. मानोलीचेच नाही तर आजूबाजूच्या ७-८ गावांचे लोक आले होते. स्टेज वगैरे सुशोभित केले होते. एजीएम आणि डीजीएम सहित सर्व स्थानापन्न झाले. प्रास्ताविक झाले. त्यानंतर एजीएम श्री कोटगिरे साहेबांनी अर्धा तास अत्यंत उत्कृष्ट असे भाषण केले. त्यांना मराठवाड्याची पूर्ण परिस्थिती माहिती असल्यामुळे त्यांनी उपस्थित मंडळीच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना उत्कृष्ट पणे हात घातला आणि सर्वांची मने जिंकून घेतली. त्यानंतर, डीजीएम श्री केशवन साहेब यांनी गावकऱ्यांचे कौतुक करीत त्यांना आपल्या बँकेकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांच्या भाषणालाही कडाडून टाळ्या पडल्या. त्यानंतर औपचारिक कार्यक्रम संपला आणि वसुली मेळावा सुरु झाला. पैसे भरायला आलेल्या लोकांची गर्दी आमचे सर्व लोक त्वरेने हाताळू लागले. २ तास पर्यंत कॅश मोजणे चालू होते. शेवटच्या व्यक्तीची  कॅश घेऊन झाली, आणि जेंव्हा हिशोब लावण्यात आला, तेंव्हा, सर्व मिळून रक्कम झाली २६ लाख! हा आकडा जेंव्हा केशवन साहेबांना सांगण्यात आला, तेंव्हा ते इतके खुश झाले, की सांगता सोय नाही! त्यांनी तिथूनच सगळीकडे फोन करून सांगितले, रिकव्हरी डिपार्टमेंटला कळवले. परत येतांना पूर्ण रस्त्यात ते सर्वांना शाबासकी देत होते. ब्रँचमध्ये सर्वजण परतलो, तेंव्हा एजीएम आणि डीजीएम दोघांनीही टीम लीडर म्हणून अभिनंदन केले.

वरील प्रसंगाची आठवण ही आजही सुखावून जाते. या प्रसंगातून मला संयमाचा, धैर्याचा जो धडा मिळाला, तसेच टीम वर्क करण्याची जी संधी मिळाली, लोकांच्या प्रगतीत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि आपल्या प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर  जे समाधान मिळाले, त्याची किंमत कशानेही करता येणार नाही.

 

 

माधव भोपे

Retired Chief Manager

 

 

 

 

तेथे कर माझे जुळती

indian woman

तेथे कर माझे जुळती

कर्तव्यदक्ष आणि मायाळू परदेशी मावशी

आपल्या सर्वांच्या घरी बहुधा भांडी घासणे, कपडे धुणे व स्वयंपाक या कामांसाठी मोलकरणी लावलेल्या असतात.बहुतेक वेळा  गृहिणी आपल्या मोलकरणीच्या कामाबाबत खूष नसते .  अर्थात त्याला कारणही तसंच आहे.आजकालच्या मोलकरणी पाट्या टाकल्या सारखं कसंतरी काम करतात . अर्थात सर्वजणी तशा नसतात, त्यात खूप जणी खूप चांगल्या पण असतात. पण बऱ्याच जणी  पूर्व कल्पना न देता सर्रास गैरहजर राहतात.दोन दिवस येणार नाही असं सांगून प्रत्यक्षात आणखी कांही दिवस गैरहजर राहतात.मोबाईल फोन लवकर घेत नाहीत किंवा घेतच नाहीत आणि असे का केले म्हणून विचारले तर बॅटरी संपली होती , हे किंवा असेच कांहीतरी थातुरमातुर कारण सांगतात .त्यांना दिवाळीचा बोनस म्हणून एक महिन्याचा पगार कित्येक वर्षापासून रूढ झाला आहे .म्हणजेच जेवढा एका महिन्याचा पगार तेवढाच दिवाळीचा बोनस.तसेच आपण  कांही दिवस गावी गेलो किंवा मोलकरीण गावी गेली तर त्या कालावधीचा पगार कापायचा नाही.पुन्हा दोन तीन वर्ष झाली की हमखास पगारवाढ द्यावीच लागते.

बरं , मोलकरीण बदलावी म्हटलं तर लवकर दुसरी मोलकरीण मिळत नाही . आणि समजा यदाकदाचित मिळालीच तर ती आहे तिच्यापेक्षा कामचुकार निघाली तर काय घ्या. त्यामुळे आहे त्या मोलकरणी कडून काम करून घेणेच ठीक आहे अशी भूमिका बहुतेक वेळी घेतली जाते…असो ….

मी ज्यावेळी औरंगाबादला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होतो त्यावेळी  किरायाची खोली घेऊन रहात होतो. आमच्या त्या वाड्यात बरेच विद्यार्थी रहात होते.मी स्वयंपाकासाठी ज्या मावशी लावल्या त्या परदेशी मावशी म्हणून ओळखल्या जात होत्या. परदेशी मावशींचं  खरं नांव  कुणालाच माहित नव्हतं . रोज दोन वेळ स्वयंपाकासाठी एका विद्यार्थ्यासाठी महिन्याचा पगार वीस रूपये होता.यामध्ये भांडी घासणे समाविष्ट होते .

मावशीच्या हाताला खरंच चव होती.

मी रूमची एक किल्ली मावशींकडे देऊन ठेवली होती.मी बाहेर असलो तर मावशी परस्पर रूमवर येऊन स्वयंपाक करून जायच्या.

रूममधल्या सुतळीच्या तुकड्याला सुध्दा मावशींनी कधी हात लावला नाही..

मावशी अजब नगर मधे कुठेतरी रहात होत्या.माझ्या खोलीपासून सुमारे एक किलो मिटर अंतर होते.

मावशीला मूलबाळ नव्हते असे मला समजले. वाड्यातल्या विद्यार्थ्यांवर त्या मुलासारखी माया करायच्या.

एकदा माझ्याकडे पीठ संपले होते. गहू दळून आणायला मला जमले नाही . कॉलेजला   गेल्यानंतर ही गोष्ट माझ्या लक्षात आली. संध्याकाळी रूम वर आलो तर मावशी छान पोळ्या करीत होत्या. मी विचारले , मावशी कणीक तर संपली होती ना ? मग ह्या पोळ्या कशा ? मावशी म्हणाल्या , सदाफुले (माझा मित्र आणि शेजारी) कडून पीठ आणलं .तुम्हाला उपाशी कसं ठेऊ ? नाही जमत कधी कधी पोरांना दळण आणायला . तेंव्हा मी असंच दुसऱ्या मुलाकडून पीठ आणून पोळ्या करते. तुमचं गिरणीतून पीठ आलं की सदाफुलेला त्यांचं उसनं घेतलेलं पीठ परत करील.

माझा भाचा, शंकर, याला त्याच्या परिक्षेच्या काळात मी माझ्या रूमवर एक महिना ठेऊन घ्यायचो. एकदा संध्याकाळचा स्वयंपाक करून मावशी निघून गेल्या. थोड्या वेळाने शंकर आला. माझ्याकडे राहण्यासाठी. त्याच्यापाठोपाठ मावशीही आल्या. मी म्हटले , आत्ताच तर तुम्ही स्वयंपाक करून गेलात ना. मग पुन्हा कशाला आल्या ? त्यावर मावशी म्हणाल्या शंकरसाठी स्वयंपाक करायचा म्हणून आले .

आणि त्यांनी कांही मिनिटात शंकरसाठी जास्तीचा स्वयंपाक केला ..

मावशींमध्ये किती माणुसकी, सहृदयता,  extreme devotion towards duty  हे दुर्मिळ गुण होते याचं आणखी एक उदाहरण देतो ..

एकदा  शहरात कुठेतरी दंगल झाली होती त्यामुळे शहरात कर्फ्यू लागला होता. त्यामुळे जेवणाची अडचण होणार अशी परिस्थिती निर्माण झाली.कर्फ्यूमुळे मावशी येणार नाहीत असं मी समजत होतो. पण माझा अंदाज सपशेल खोटा ठरला. मावशी त्यांच्या नेहमीच्या वेळेत रुमवर हजर झाल्या. मी म्हटलं , अहो मावशी , गावात संचारबंदी लागलीय. तुम्ही कशा आल्या आणि कशाकरता आल्या ?

मावशी म्हणाल्या मी मेन रोड चुकवून गल्लीबोळातून आले. पोरांना उपाशी कसं ठेवू? स्वयंपाक करून मग अशीच गल्लीबोळातून घरी परत जाईन .येतांना नाही का आले ? कुठे काय झालं ?’

मी अवाक् झालो !!!

आणि निरूत्तरही झालो.मनात म्हटले केवढ्या मोठ्या मनाची, कर्तव्यदक्ष आणि हिकमतीची आहे ही माय माऊली.

आमच्या वाड्यातल्या मुलांचा स्वयंपाक करूनच मग मावशी गल्लीबोळातून अजबनगरला आपल्या घरी गेल्या .

मित्रांनो , जगात चांगली  माणसे कमी प्रमाणात आहेत आणि अतिशय चांगली माणसे तर त्यापेक्षा कमी प्रमाणात आहेत .पण आहेत जरूर. अशा माणसांमुळेच जग चालले आहे.

 

लेखक:- श्री व्ही. डी. भोपे

 निवृत्त कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र सरकार 

Love your elders

old man and grandson

Love your Elders!

भावनांना कुठल्याही भौगोलिक मर्यादा नसतात. भाषा वेगवेगळी असली तरी भावना चेहऱ्यावर व्यक्त सारख्याच प्रकारे होतात. 

काही महिन्यांपूर्वी ट्वीटर (आताचे x )आलेली एक पोस्ट कुठून तरी फिरत फिरत माझ्यापर्यंत आली होती, आणि ती फारच भावली होती. मी याआधी कदाचित काही whatsapp  ग्रुप्स मध्ये शेअर केली ही होती. त्यामुळे त्याची द्विरुक्ती होत असल्यास क्षमस्व . हो पोस्ट बहुतेक एका पाकिस्तानी माणसाने पोस्ट केली आहे. 

या फक्त 90 सेकंदांच्या क्लिपमध्ये , एक तरुण मुलाने घरातल्या ज्येष्ठानबद्दल  जी भावना व्यक्त केली आहे, ती अप्रतिम आहे. 

हा बहुतेक कुणी, आपल्या मोठ्या काकांना किंवा आजोबांना खूप प्रेम करणारा एक तरूण, जुन्या पिढीतील लोकांची होणारी तळमळ ओळखतो, त्याला त्याच्या ज्येष्ठां बद्दल अपार माया आहे, आणि आता त्यांची आयुष्याची संध्याकाळ आहे, ही जाणीव आहे. तुम्हाला सगळे माहीत असले, तरी त्यांना विचारा- त्यांची छाती अभिमानाने फुलून येईल- अशा  काहीशा अर्थाचे त्याचे हे शब्द- इथे जसेच्या तसे देत आहे –

मेरी रियल सिस्टर एक भी नहीं है, लेकिन हाँ, कज़न सिस्टर्स बहुत हैं। जब पहली कज़न सिस्टर की शादी हुई, हम सारे भाई बहुत छोटे थे। तो ऑफ़-कोर्स, पापा लोगों ने ही सब कुछ संभाला। मतलब, वही हमको डायरेक्शन देते थे कि हरिराम हलवाई के यहाँ से मिठाई आएगी, केटरिंग के लिए मैंने बिस्वा अंकल को बोल दिया है, एक काम करो, लिस्ट जाके दे आओ और हाँ, गोल चक्कर साइड से जाना, ट्रैफिक कम मिलेगा वहाँ पे। क्योंकि हमें कुछ पता ही नहीं होता था।

रिसेंटली, हमारी एक और कजिन की शादी हुई। फ़र्क सिर्फ़ इतना है कि अब हम सारे भाई बड़े हो गए हैं। जगह से लेकर दुकान तक, हमको सब पता है। तो पापा लोगों ने पूरी शादी एक कोने में बैठकर ही एन्जॉय की। वही है ना कि क्यों परेशान करना, है ना?

बचपन में जब भी पापा लोगों से कुछ पूछो न जाके, जिस हिसाब से वो बताते थे, उनके चेहरे पे एक अलग ही चमक होती थी। क्यूरियोसिटी होती थी उनको बताने की, डायरेक्शन: यहाँ से ऐसे लेफ्ट ले लेना, वहाँ से राईट ले लेना।

आई नो, आपको सब पता है। आपको पता है कि चीज़ें कहाँ-कैसे मिलेंगी, लेकिन कभी-कभी न अनजान बन जाना बहुत ज़रूरी है, अपने बड़े-बुज़ुर्गों के आगे!

उनसे पूछो, उनसे पूछो कि “पापा डेकोरेशन और म्यूजिक का तो हो गया, पापा केटरिंग के लिए कहाँ जाऊँ?”

इससे पहले कि वो खुद की वैल्यू खुद की नज़र में कम कर दें, आप उनकी वैल्यू बढ़ा दो। उनसे उनकी राय ले लो!

साहब! गूगल मैप तो आगे भी रहेगा, पर ये लोग………. नहीं रहेंगे।

 

 

 

काल आपण अशोक सराफ यांनी त्या 3 मिनिटांच्या क्लिप मध्ये किती intense expressions दिले होते, ते आपण पाहिले. तसेच या क्लिप मध्ये, त्या तरुणाच्या चेहऱ्यावरील भाव, त्याचे उसासे, आणि अगदी 90 सेकंदांच्या अवधीतील काही शांतता, खूप काही सांगून जाते. 

पोस्ट चा climax शेवटच्या ओळीत येतो जेंव्हा तो मान हलवत, रुद्ध गळ्याने आणि  अश्रूंना रोखत म्हणतो, ” गूगल मॅप  तो फिर भी रहेगा, लेकिन ये लोग..” आणि पुढले शब्द त्याच्या घशातच राहून जातात.

Some times you stumble upon a touching post unknowingly. The chords of emotions know no geographical bounds or language barriers. I had stumbled upon this post few months back. It seems that the video is posted on twitter by a Pakistani man, depicting the love, care and attachment of a young boy about the elders of the house.

The  respect for elders is a universal phenomenon. But sometimes it tends to get suppressed in the daily hustle bustle of busy life schedule. This post is an eye opener in a way.

It’s just a 90 seconds clip, with very few words, but the actor depicts the entire story by his facial expressions, his sighs, and his silences, all within the 90 seconds. The climax is reached in the last line.. See the way he moves his head, with a choked throat and tears held back forcibly in his eyes, when he says, “लेकिन ये लोग ..” not able to utter the next words..

हुरहूर असते तीच उरी

Image by wirestock on Freepik
कुठला रस्ता सांग खरा
वळणाचा की सरळ बरा

आयुष्यात एका टप्प्यावर आल्यानंतर, माणसाच्या मनात एक हुरहूर लागून राहते. आणि जसे जसे वय वाढत जाते, तशी तशी ती हुरहूर अधिकाधिक गडद होत जाते. मन पूर्ण आयुष्याचा हिशेब मांडायला लागते, आणि शेवटी हाती काय उरले हा एक मोठा यक्षप्रश्न उभा राहतो. कित्येकदा तर, “ याचसाठी  केला होता का एवढा सारा खटाटोप?” असा मोठा प्रश्न आ वासून उभा राहतो. “सुख खरे की दु:ख खरे”  हेच समजेनासे होते.

एके दिवशी अचानक, 2008 मध्ये लहानपणीच्या मुग्धा वैशंपायनने Little Champs मध्ये  गायलेले “हुरहूर असते, तीच उरी” हे गाणे ऐकायला (आणि बघायला) मिळाले. त्या गाण्यातील अगदी मोजकेच शब्द, पण मनाला स्पर्शून गेले. मुग्धाने त्या बालवयात ही हे गाणे एवढे छान म्हटले होते, त्यावेळी तिला  वैशाली सामंतने, जेंव्हा विचारले, की, “बाळा, तुला या गाण्याचा अर्थ कळतो का?” तेंव्हा मुग्धा ने गोड हसून उत्तर दिले होते, “बाबा, म्हणाले, तू मोठी झाल्यावर कळेल”

हुरहुर असते तीच उरी
दिवस बरा की रात्र बरी

कुठला रस्ता सांग खरा
वळणाचा की सरळ बरा

शरीर जाते जळून तरी
धूर खरा की राख खरी

जगणे, मरणे, काय बरे

सुख खरे की दु:ख खरे

मुग्धाच्या या गाण्यावर बोलतांना, अतिथि म्हणून उपस्थित असलेला आदेश बांदेकर म्हणाला होता, की मुग्धा, मी आज हे गाणे पहिल्यांदा ऐकले. आणि यापुढे जेंव्हा हे गाणे ऐकेन तेंव्हा मला हे मुग्धाचे गाणे म्हणूनच लक्षात राहील. माझेही तसेच झाले. मला हे गाणे ऐकले की सर्वप्रथम मुग्धा आठवते. असो.

मुग्धाच्या त्या गाण्याची लिंक खाली देत आहे.

 

 

मग या गाण्याचा शोध घेता घेता, “एक उनाड दिवस” हा अशोक सराफची प्रमुख भूमिका असलेला, 2005 मध्ये प्रदर्शित झालेला मराठी सिनेमा बघण्यात आला. अत्यंत सरळ आणि छोटीसे  कथानक असलेला हा चित्रपट मुळातूनच पाहण्यासारखा आहे, पण त्यात हे गाणे अशोक सराफ (चित्रपटातील दाभोळकर) जेंव्हा अभिनेत्री फैयाज (चित्रपटातील, विपन्नावस्थेतील गायिका चंद्रिका) हिच्या तोंडून ऐकतो, त्यावेळी, अशोक सराफच्या चेहऱ्यावरील भाव अगदी अप्रतिम आहेत. गायिका गात असलेल्या गीतातील भाव त्याच्या चेहऱ्यावर साक्षात मूर्तिमंत होतात. इतक्या कमी वेळात एक माणूस आपल्या चेहऱ्याने, अगदी काहीही न बोलता, इतके उत्कट भाव कसे व्यक्त करू शकतो, हे खरंच अचंबित करणारे आहे. अभिनेत्री फैयाजनेही त्याच ताकदीने हे गाणे पेश केले आहे.

श्रेय नामावली:

गीत: सौमित्र

संगीत- सलील कुलकर्णी

मूळ गायिका- शुभा जोशी

चित्रपट- एक उनाड दिवस

मूळ चित्रपटातील मला भावलेले हे गाणे, त्याची लिंक खाली देत आहे.

मराठी आडनावांचा इतिहास

village-man-300x169

Marathi Surnames-मराठी आडनावांचा इतिहास

Milind Abhyankar- मिलिंद अभ्यंकर

 
village man 1
मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी 
 
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे प्रख्यात कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.
 
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी संस्कृतीत रुजलेल्या “आडनाव” या वैशिष्ट्यपूर्ण शब्दाविषयी मला नेहमीच कुतुहुल वाटत आलेले आहे. कारण अशी पद्धत अन्य भाषेत अभावानेच आढळते.
आद्यनाव या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश म्हणजे आडनाव. त्याचे झाले पद नावं आणि त्याचा अपभ्रंश पड नाव हे पड नाव किंवा पदनाम त्या त्या कुळांना कोणत्या प्रकारची शेती करतो किंवा पशुपालन करतो किंवा कोणत्या फुला फळाच्या बागा लावतो किंवा व्यापार करतो किंवा कोणती प्रशासकीय कामे करतो किंवा संरक्षण सेवेत कोणते पद घेऊन काम करतो यावरून पडली.आडनाव हे जरी शेवटी लिहले जात असले तरी ते आद्य नाव आहे आद्य म्हणजे पूर्वीचे कुळाचे नाव ते आद्य नाम आणि याचा अपभ्रंश होऊन झाले आडनाव.मराठी नामोल्लेखाच्या/ नामलेखनाच्या प्रचलित पद्धतीत
• व्यक्तीचे स्वतःचे नाव/ पहिले नाव
• व्यक्तीच्या वडिलांचे/ (काही वेळा) आईचे/ (व्यक्ती विवाहित स्त्री असल्यास) पतीचे नाव आणि
• व्यक्तीच्या वडिलांचे आडनाव/ व्यक्ती विवाहित स्त्री असल्यास तिच्या पतीचे आडनाव
अशी नावांची त्रयी सांगण्याची/ लिहिण्याची प्रथा आहे. ह्या तिहेरी नावाला संपूर्ण नाव असेही म्हणतात. मात्र नामोल्लेखाची वा नामलेखनाची ही पद्धत सार्वत्रिक आहे असे नाही. तसेच आडनाव ह्या संज्ञेने व्यक्त होणारा संकेतही सार्वत्रिकरीत्या आढळेल असे नाही.
(आधार विकिपिडिया)
 
देशपांडे, जोशी, कुलकर्णीं, देशमुख, पाटील,पवार, गायकवाड, कांबळे, इनामदार, जहागीरदार, कोतवाल, अशी आडनावे तर सरार्स आढळतात. गावाच्या नावावरुन तर असंख्य आडनावे आहेत. गावाला कर असे संबोधन चिटकवायचे जसे गाव+कर= गावकर. पण आडनाव नाही असा मराठी माणूस औषधाला देखिल सापडणार नाही.आमच्या कोब्रा जातीतली आडनावे खूपच वेगळी आहेत असे माझे निरीक्षण आहे. आता बघा माझेच आडनाव अभ्यंकर आहे. बरेच जण मला विचारतात की तुम्ही अभ्यं गावचे आहात का? मलाही अनेक दिवस या आडनावाचा खुलासा होत नव्हता. एका देऋबाने (देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण)त्याचा अर्थ मला सांगीतला. अभयं करोती अभया, म्हणजे अभय मागणाऱ्याला जो अभय देतो त्याला अभ्यंकर म्हणतात. म्हणजे पाहा आम्ही किती महान आहोत. नाहीतर अनेकजण मला भयंकर म्हणूनच हाक मारत असतात. शाहीर साबळेंच्या भारुडात तुम्ही ऐकलेच असेल …इंगळी म्हणजे मोठा विंचू, मोठा म्हणजे भयंकर मोठा, म्हणजे तो अभ्यंकर नाही का… त्याच्यासारखा” 😅
 
असो. आता अन्य चित्तपावनी आडनावे पाहू
लेले यांच्यावरुन आम्ही वा.क.लेले, थ.क.लेले अशी नावे तयार केली होती. नुकताच ओले आले हा सिनेमा पाहीला त्यात आदित्य लेले, ओंकार लेले अशी बाप लेकाची जोडी आहे.
रानडे, बरेच जण याचा उच्चार रांडे असा करतात.
दातीर, दातार, दाते,दात्ये या लोकांचे दात पुढे आलेले असावेत.😁
पोंक्षे या आडनावाचा उच्चार केला की डोळ्यासमोर पोंगा दृष्यमान होतो.
गोखले आडनावाचा भरपूर खोकणारा असावा.
ढमढेरे ढम व ढेरे मग काय बघायलाच नको.
टकले आडनाव पण डोईवर दाट केस.
आडनाव डोंगरे पण शरीरयष्टी खड्यासारखी.
केळकर आणि चोळकर या आडनावांचे माझे नातेवाईक आहेत. आता यांचा विवाह झाला आहे. सुज्ञास सांगणे नलगे…..🤪
काळे गोरे तर उडदामाजी आहेतच मग चित्तपावन त्याला अपवाद असू शकत नाहीत.
हगवणे आडनावाच्या मुलाला कुणी मुलगी देत असेल का?
नातू आडनाव म्हणजे जन्मभर हे नातवंडच राहणार.
आपटे काय आपटत होते कुणास ठावूक.
ह.ना. आपटे या लेखकाचे नाव माझा एक देशस्थ मित्र हणा आपटे असा करतो.
(बऱ्याच देशस्थ ब्राह्मणांना ‘न’ आणि ‘ण’ याचा उपयोग कसा करावा हे कळत नाही असे माझे निरीक्षण आहे. कान व मान याचा उच्चार काण व माण असे करताना मी पाहात आलो आहे.)
बापट – हे पण काही तरी आपटत असणार. आमच्या बापट नावाच्या मित्राला आम्ही “बापट कुल्ले आपट” असे चिडवत असू. तो देखिल भारी, काॕलेजच्या बेंचवर कुल्ले आपटून दाखवत असे. 🤣
रास्ते हे असेच एक चित्तपावनी नाव. रस्ते बनवत असावेत.
खांबेटे – खांब व बेट काय सबंध असावा?
रिसबुड – मुळात बुड हा शब्दच अनेक अर्थ उत्पन्न करतो. यांचे बुड ठिकाणावर राहात असावे, रीसभरही इकडेतिकडे होत नसावे.😊
गाडगीळ – एकतर गाड किंवा गीळ
दामले – जया दामले (माझ्या परिचित) याचा अर्थ सांगतील कदाचित दाम मागतील !
पेंडसे – (प्राची पेंडसे, माझ्या एक परिचित) याचा अर्थ सांगतील, पेंडखजुराचा काही संबंध असावा !
साने – हे बहुतेक लहानसहान काम करत असावेत.
परांजपे – परांशी जपून वागत असावेत.
गोडसे – गोड असे पण नावापुरता.
मराठे – पण जातीने चित्तपावन. आमच्या एका मामाला मराठे कुटुंबातील मुलगी मिळाली आणि गावात त्याकाळात चर्चा सुरु झाली जोशाच्या पोरान मराठ्याची पोरगी केली म्हणे !
विद्वांस – या आडनावाची माझी मावशी होती. अनेकजण त्याचा उच्चार विध्वंस असा करतात.
उकिडवे – माझे आतेकाका. यांचा असा कोणता व्यवसाय होता कुणास ठावूक?
आठवले – सतत नको त्या गोष्टीं आठवत असावेत.
आठल्ये – कपाळावर कायम आठ्या असणार
पटवर्धन – पटावर धन करणारे
सोमण – मणाचे ओझे सहज वागवत असावेत
फडके – सारखे कपडे गुंडाळत असणार
दांडेकर – अर्थात दांडगई करणारे किंवा थांबवणारे.
तुळपुळे – कायम तुळतुळ करणारे.
हसबनीस किंवा हसमनीस म्हणजे जे मनातल्या मनात हसतात ते
असो. 😊
 
काही आडनावे मराठीतील डुकरे, गाढवे, मुंगळे, मुंगी, वाघ, वाघमारे, बकरे, कोंबडे, बदके, चिमणे, कावळे, ढवळे, पवळे, ढेकणे, पिंगळे, मोरे, ढोरमारे, कोळसे, लाकडे, कुऱ्हाडे, भामटे, गुंड, पुंड, बडवे का पडली असावीत? याचा मी नेहमी विचार करतो.
सखारामपंत खापरखुंटीकर हे आमच्या मराठवाड्यातील एका कलाकाराचे नाव वाचले की नकळत मला हसायला येते. तसेच आमच्या एका मित्राचे आडनाव दिवटे आहे. तो दिसला की माझ्या मनात नकळत आले दिवटे चिरंजीव असे शब्द येतात. पांडव नावाचा माझा एक मित्र आहे. काॕलेजमधे आम्ही नुकतेच गेलो होतो. प्रत्येकजण नाव आडनाव सांगत होता. पांडवने नाव सांगीतले, काहीवेळाने एकाने आपले आडनाव तोरो असे सांगीतले, आम्हाला ते कौरव असे ऐकू आले. वर्गात हशा पिकला, चला पांडव व कौरव वर्गात आहेत म्हणजे महाभारत अर्थात वस्त्रहरण कार्यक्रम होणार असे मुले विनोदाने बोलू लागली.
 
कुंभार, सोनार, चांभार, फुले, काटे, वारीक, माळी, कोळी, कोष्टी, गोसावी, ही बलुतेदारी करणारी आडनावे आहेत.
असा आहे हा मराठी आडनावांचा महिमा. बाहेरच्या राज्यात गेल्यावर अनेक अमराठी लोकांना आपले नेमके नाव काय आहे हे कळत नाही. असा माझा अनुभव आहे. माझे मिलिंद हे नाव अनेकांना कळतच नाही. मिलिंद गणेश अभ्यंकर असे नाव असताना अनेक जण मला गणेश असे पुकारत. तर दिल्लीत माझे मिलिंद हे नाव मिलन असे झाले होते.
शेवटी आडनावात काय आहे, असे म्हणावेसे वाटते, पण नाही, आडनावात बरेच काही आहे ते मराठी माणसाला चांगले कळते.
ही आहे माझ्या प्रिय मायमराठीची आडनावांची गंम्मत, खासीयत.
वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना मराठीभाषा गौरव दिनानिमित्त शब्दांजली.
मिलिंद गणेश अभ्यंकर
छत्रपति संभाजीनगरकर

वरील लेख श्री मिलिंद गणेश अभ्यंकर यांच्या फेसबुक  वरून  साभार- श्री अभ्यंकर यांचा मूळ लेख वाचण्यासाठी  फेसबुक लेखाची खालील  लिंक क्लिक करा.

लेखक हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून मुख्य प्रबंधक म्हणून निवृत्त झाले आहेत आणि फेसबुक आणि अन्य माध्यमांवर वेळोवेळी प्रसंगोचित लिखाण करीत असतात.