https://goodworld.in A website by Madhav Bhope

Learning journey-3

1715837720406

Life is a learning journey.images 18

या आधीच्या दोन लेखांत एकूण चार व्यक्तिमत्वांबद्दल लिहिले होते. आज आणखी काही सहकाऱ्यांबद्दल सांगावेसे वाटते.

माझे बी ग्रुप मध्ये प्रमोशन झाल्यावर एक वर्ष ट्रेनिंग आणि एक वर्ष प्रोबेशन असे दोन वर्ष झाल्यावर मला पहिली पोस्टिंग बीड A.D.B. येथे फील्ड ऑफिसर म्हणून मिळाली. बीड एडीबी ला आम्ही ४ ते ५ फील्ड ऑफिसर्स होतो. ब्रँचकडे भरपूर गावे दत्तक होती आणि प्रत्येक फील्ड ऑफिसरला १५ ते २० गावे दिलेली असत. बीड A.D.B च्या कार्यकाळात तसे तर सगळ्यांकडून काही ना काही शिकायला मिळाले, पण २ सहकाऱ्यांकडून मी काही खूप उपयुक्त गोष्टी शिकलो. आणि अजून एका स्वच्छंदी व्यक्तीचे व्यक्तिमत्व खूप लक्षात राहिले.

  1. श्री एन जी. बांटे

माझी तिथे पोस्टिंग झाल्यानंतर, काही कालावधीनंतर तिथे श्री एन जी. बांटे यांची टेक्निकल ऑफिसर म्हणून पोस्टिंग झाली. टेक्निकल ऑफिसरचे काम म्हणजे सगळ्या फील्ड ऑफिसर्सला काही तांत्रिक बाबीत सल्ला देणे. त्यात विहीर, मोटर, पाइप लाईन, ड्रिप इरिगेशन, हॉर्टिकल्चर, इत्यादि साठीची जी कर्ज प्रकरणे असत, ज्यात बर्‍याच तांत्रिक गोष्टींचा विचार करणे आवश्यक असते, त्यात शक्यतो फील्ड ऑफिसर च्या सोबत जाऊन, संयुक्त पाहणी करून, तो प्रोजेक्ट व्हाएबल आहे की नाही, किंवा तसा नसेल तर त्यात काय बदल करावे लागतील, इत्यादि गोष्टींचा रिपोर्ट  देणे.

श्री बांटे यांची आणि माझी वेव्हलेंग्थ जुळत होती. भरपूर उंची, भव्य चेहरा, थोडे टक्कल पडत आलेले, नेहमी इन करण्याची सवय, आणि चेहर्‍यावर सौम्य भाव आणि वागणे आणि बोलणेही तसेच सौम्य. कोणाचे मन दुखवणार नाही, पण स्पष्टवक्तेपणाने समोरच्यासाठी योग्य तो सल्ला देण्याची वृत्ती. आणि त्यांना शेतीबद्दल अगदी खोल तांत्रिक ज्ञान होते आणि या आधीचा इतर शाखांमधला समृद्ध अनुभवही होता. मला याचा खूप उपयोग झाला.

त्यांचे एक वैशिष्ट्य होते. कुठल्याही शेतात गेल्यानंतर (जिथे नवीन विहीर घ्यायची आहे, किंवा जुन्या विहीरीची दुरूस्ती करायची आहे), त्यांना थोड्याच वेळात तिथल्या टोपोग्राफीचे योग्य आकलन होत असे. शेताच्या चारी बाजूला फिरून ते विहीर घेण्याची योग्य जागा अचूक सांगू शकत. साधारण किती फुटावर पाणी लागेल याचाही त्यांना अंदाज येत असे. किती इंची पाइपलाइन लागेल, किती हॉर्सपॉवर ची मोटर लागेल, इत्यादि तपशील ते अचूक सांगत. जमिनीचा पोत कसा आहे, ती कुठल्या पिकासाठी योग्य आहे हेही ते लगेच सांगू शकत.  वेगवेगळ्या पिकांसाठीचा (विशेषतः द्राक्ष वगैरे महाग पिकांसाठी) येणार्‍या खर्चाचा, लागणार्‍या खतांचा, फवारणीचा, तपशील त्यांना पूर्ण माहिती असे, आणि शेतकर्‍याशी ते अधिकारवाणीने बोलू शकत आणि त्याला योग्य तो सल्ला ही देऊ शकत. या सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या. त्यामुळे मी त्यांना अनेक शंका विचारीत असे आणि त्याचे त्यांच्याकडून योग्य ते उत्तर मला मिळत असे.

जसा पाणाड्याला जमिनीत पाणी कुठे लागेल याचा अंदाज असतो, त्याप्रमाणे त्यांचा अंदाज बरोबर ठरत असे. पण ते त्यामागचे शास्त्र समजावून सांगत. आणि या त्यांच्या वैशिष्ट्याबद्दल त्यांना जराही अभिमान किंवा गर्व नव्हता. या आधी त्यांनी लोकांना केलेल्या मार्गदर्शनामुळे कसे व्यवस्थित पाणी लागले, इत्यादीचे किस्से ते कधी कधी सांगत. पण त्यात कुठेही बढाईचा लवलेश नसे. त्यांनी बनविलेला टेक्निकल रिपोर्टही सविस्तर आणि परिपूर्ण असे. त्यांच्यासोबत दोन वर्षे राहून मला खूप नवीन आणि उपयुक्त माहिती मिळाली.

त्यांच्यासोबत जाऊन जाऊन, जी माहिती झाली होती, तिच्या जोरावर नंतर नंतर मी पण शेतावर गेल्यावर एखाद्या एक्स्पर्टचा आव आणून शेतकर्‍याशी चर्चा करीत असे! त्याचे थोडे फार इंप्रेशन कधी कधी पडत असे. पण माझे ज्ञान हे अनुभवावर आधारित नसल्याने आणि तोकडे असल्याने, कधी कधी पोल उघडी पडण्याची वेळ येत असे! कन्नड येथे मिळालेला 3 वर्षांचा अनुभव, आणि बीड A.D.B. येथील अनुभव, एवढ्या भांडवलावर पुढील कालावधीत जेंव्हा जेंव्हा शेती कर्जाशी संबंध आला तो कालावधी निर्वेधपणे पार पडला!

माझी नंतर दुसर्‍या शाखेत (अजिंठा शाखा) बदली झाल्यानंतरही मला कुठलीही अडचण आली तर मी बांटेसाहेब  यांना फोन करून त्यांचा सल्ला विचारीत असे आणि तेही कुठलेही आढेवेढे न घेता मला योग्य तो सल्ला देत. बँकेतील माझ्या जडण घडणीत ज्या लोकांचा सहभाग आहे, त्यात श्री बांटे यांचे खूप मोलाचे स्थान आहे.

  1. श्री पी. के. कुलकर्णी

बीड A.D.B येथे असतांनाच, श्री पी. के. कुलकर्णी हे माझ्याबरोबर फील्ड ऑफिसर होते. पण माझी ही पहिलीच पोस्टिंग होती तर श्री पी. के. कुलकर्णी हे मला खूप सीनियर होते आणि अनुभवी होते. त्यात आणखी विशेष म्हणजे ते बीड येथे परवानानगर या बँकर्सच्या कॉलनीमध्ये माझे शेजारी होते. एक घर सोडून त्यांचे घर होते. त्यामुळे आमच्या  दोन्ही कुटुंबांचे पण एकमेकांसोबत खूप प्रेमाचे संबंध होते. ते मला सीनियर असल्यामुळे मी नेहमी मला कुठलीही शंका असली तरी त्यांना विचारत असे. आणि त्यांच्याकडून त्याचे अगदी प्रॅक्टिकल उत्तर मिळत असे. त्यांचाही स्वभाव हा अत्यंत सौम्य, हसतमुख आणि मनमिळाऊ असा होता. आणि कर्जदारांशी बोलतांनाही ते अगदी मित्रत्वाच्या टोनमध्ये बोलत. आम्ही बऱ्याच वेळा सोबत inspection ला जात असू. विशेषतः जेंव्हा माझी आणि त्यांची गांवे एकाच रूट वर असत तेंव्हा आम्ही एकाच जीप मधून सोबत जात असूत. त्यावेळी मी त्यांची खातेदारांशी बोलण्याची पद्धत जवळून बघत असे. त्यांची संवाद साधण्याची एक खास पद्धत होती. ते आधी खातेदाराशी सुरुवातीला आपुलकीच्या गोष्टी बोलून त्याचे मन मोकळे करीत आणि त्याच्या मनात विश्वास निर्माण करीत. थकबाकीदार असला तरी सरळ त्याच्या थकबाकीच्या मुद्द्यावर न येता, आधी त्याची आपुलकीने चौकशी करीत. त्याचे सध्या कसे काय चालले आहे, यावर्षी, त्याच्या आधीच्या वर्षी, पीकपाणी कसे झाले, घरी काही अडचण आहे का, इत्यादि सर्व चौकशी अगदी आपुलकीने करीत. आणि मग अगदी सौम्यपणे आपल्या मुद्द्यावर येत. कधी कधी नुसत्या revival letter किंवा rephasement letter वर सही घेण्याचे काम असे. पण अशा प्रकारे बोलल्यानंतर कुठलाही खातेदार पाहिजे ती सही करून द्यायला कधीच नकार देत नसे. मला त्यांची ही communication ची पद्धत खूप भावली. या गोष्टींचा मला पाथरी A.D.B. ला काम करतांना खूप उपयोग झाला. नंतर, खूप वर्षांनी औरंगाबाद येथील ट्रेनिंग सेंटरला जॉइन झाल्यावर, मला SBI मध्ये आमच्या Trainers training मध्ये जेंव्हा communication, soft skills, inter personal relations इत्यादि विषयांची ओळख झाली, त्यावेळी असे जाणवले, की या विषयांवरील वस्तुपाठ आपल्याला या व्यक्तिंकडून आधीच मिळाला आहे.

  1. श्री बी. एन. कुलकर्णी

बीड A.D.B येथे असतांना जे एक मनमौजी व्यक्तिमत्व माझ्या लक्षात राहिले ते म्हणजे, तिथे नंतरच्या काळात आलेले शाखाधिकारी श्री बी. एन. कुलकर्णी हे होत. त्यांची पूर्ण सर्विस मुंबई दिल्ली सारख्या मेट्रो शहरांत गेली होती आणि त्यांनी याआधी कधीच शेतीशी संबंधित शाखेत काम केले नव्हते. पण तसे असतांनाही त्यांना कुठलेच टेंशन नव्हते. ते तेंव्हा अर्थातच बरेच सीनियर होते (जवळजवळ पन्नाशीच्या आसपास). आणि त्यांना अगदी अप-टू-डेट राहायला आवडे. साधारण डार्क रंगाची पॅन्ट, त्यावर पांढऱ्या रंगाचा हाफ शर्ट, इन केलेली, पायात नेहमी चकचकीत पॉलिश केलेले शूज,  कमरेच्या बेल्टला त्यांच्या किल्ल्यांचा जुडगा लटकत असलेला. त्यांना त्यावेळी टक्कल पडत आले होते, पण आहे त्या केसांना ते आवर्जून डाय लावत आणि खिशामध्ये पॉकेट कंगवा असे, त्याने भांग पाडत. सदैव हसतमुख आणि जॉली मूड मध्ये असत. त्या माणसाला मी कधीच दुर्मुखलेले किंवा तणावामध्ये असलेले पाहिले नाही. किंवा कधीही आपल्या हाताखालच्या लोकांवर आपला रुबाब दाखवतांना पाहिले नाही. एवढ्या मोठ्या शाखेचे मुख्य असून आणि एवढा स्टाफ हाताखाली असूनही त्यांना कधी त्या गोष्टीचा गर्व नव्हता. सगळ्या स्टाफशी आणि खातेदारांशी ते अगदी फ्रेंडली वागत. सगळ्या गोष्टी अगदी सहज घेण्याच्या त्यांचा स्वभाव होता.  मुंबई दिल्ली येथे पूर्ण सर्विस केल्यामुळे बऱ्याचदा बोलण्यात हिन्दी किंवा इंग्लिश शब्द येत. अशी happy go lucky pesonality मला नंतर कुठे बघायला मिळाली नाही.  त्यांचे कुठलेही वैशिष्ट्य आत्मसात करणे तर मला शक्य नव्हते, कारण ते रसायनच वेगळे होते, पण अशीही माणसे असतात हे त्यामुळे समजले, आणि त्यांचे व्यक्तिमत्व माझ्या चांगलेच लक्षात राहिले.

माधव भोपे

मित्रांनो, ज्या व्यक्तिमत्वांनी मला वेगवेगळ्या कारणांमुळे प्रभावित केले, त्यांच्याबद्दल लिहिण्याच्या प्रपंचातील हा तिसरा  लेख.  आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्ति या आपल्यावर आणि आपण त्यांच्यावर परस्पर प्रभाव कमीजास्त प्रमाणात टाकत असतो, आणि त्यातून आपले व्यक्तिमत्व घडत जात असते. 

आपले याबाबतीतील विचार जरूर कळवा.

आवडल्यास ब्लॉगला subscribe करा.

 

Shrimat Bhagwat Katha Saar श्रीमद् भागवत कथासार

bhagwat katha mahtava 1

भज गोविन्दं भज गोविन्दं

image 6image 11image 12

 

गणेश वि. रामदासी

छत्रपति संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) येथील समर्थ भक्त श्री गणेश वि. रामदासी यांच्या यू ट्यूब चॅनेल वर (ज्याचे नांव Avirat Dasnavmi Mahotsav-  Ganesh V.Ramdasi असे आहे) नित्यनियमाने अनेक धार्मिक प्रवचने चालू असतात. मला असेच यू ट्यूब वर browse करता करता हे चॅनेल दिसले आणि खूप आवडले. 

सध्या या चॅनेल वर श्रीमद्भागवत कथासार चालू आहे.  आतापर्यंत २०० हून अधिक भाग प्रसारित झाले आहेत. यात त्यांच्या अत्यंत रसाळ वाणीने ते रोज ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राच्या जपासहित भागवत कथेचे निरूपण करीत असतात.  त्यांच्या प्रवचनांची लिंक आपण आपल्या ब्लॉग वर देत आहोत. ही लिंक रोज अपडेट होत राहील. 

अध्यात्माची आवड असणाऱ्या वाचकांना आणि श्रोत्यांना हा उपक्रम आवडेल अशी आशा.

RSS Avirat Dasnavmi Mahotsav – Ganesh V. Ramdasi

न लगे मुक्ति धन संपदा

sant tukaram news 92203693

Guest Article by Shri Pandurang Deshpande

आपण वेगवेगळ्या संतांच्या साहित्याचा अभ्यास केल्यास असे जाणवते, की जेवढे म्हणून संत झाले आहेत, त्या सर्वांची अनुभूति एकच असते. फक्त त्यांच्या वैयक्तिक परिस्थितीनुसार आणि त्या त्या काळानुसार, त्यांची व्यक्त होण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी असते, किंवा त्या त्या वेळच्या परिस्थितीनुसार त्यांच्या कडून त्या त्या वेळेला आवश्यक असलेल्या गोष्टीला थोडे जास्त महत्व दिले जाते. वरवर पाहिले तर कदाचित त्यांच्या विचारांमध्ये फरक वाटू शकतो, पण त्यांच्या पातळीवर जाऊन पाहिल्यावर दोन्हीमधील एकवाक्यता लक्षात येते.

असेच महाराष्ट्रातील दोन संत म्हणजे संत तुकाराम महाराज आणि आणि समर्थ रामदास.images 10629 18 pic 0

हे दोघेही संत साधारण एकाच कालखंडात झाले. (तुकाराम महाराज- इ.स. 1608 ते 1650, आणि समर्थ रामदास इ.स. 1608 ते 1682). दोघांचाही  परमार्थात मोठा अधिकार होता, आणि जगाच्या कल्याणा संताच्या विभूति असेच दोघांचे वर्तन होते. तुकाराम महाराज जिवंतपणीच ब्राह्मी स्थितीला पोहोचलेले तर समर्थ हे त्यांच्या प्रदीर्घ आणि  प्रखर साधनेने ‘रामदास’  बनलेले. या दोघांना सहस्रदल अशा  भारतीय तत्त्वज्ञानाच्या कमलपुष्पाच्या  दोन पाकळ्यांची उपमा शोभून दिसेल.

सनातन भारतीय तत्त्वज्ञान हे आत्मोद्धार हेच आयुष्याचे ध्येय मानणारे आहे.

पण वित्तेषणा (धनाची इच्छा) दारेषणा (स्त्रीची इच्छा) आणि  लोकेषणा (प्रसिद्धीची इच्छा) यांच्याबरोबर मोक्षेच्छा  ही सुद्धा एक ईषणा म्हणजे इच्छा आहे असे मानून त्याही पलीकडे जाणा-या तुकोबांना मोक्षाचे महत्त्व वाटत नाही, तर मोक्ष प्राप्ती नंतरही त्यांना भगवद्भजनच करावे वाटते.   

प्रेममय भक्तीचे ते पथिक होते आणि मुक्ती  त्यांना दासीप्रमाणे होती. मुक्तीनंतर सर्व इच्छा नष्ट झाल्या तरी एक उरतेच ती म्हणजे भगवंताचे सुख उपभोगावे हीच. तुकोबा असेही म्हणतात की ख-या भक्तीचा आरंभच मुळी ब्रह्मानुभवापासून (मुक्ती लाभल्यावर) होतो.

सामान्यतः माणूस पुनर्जन्माला घाबरून असतो.पण तुकोबांना याची भीती वाटत नाही.देवाची साथ म्हणजेच स्मरण असेल तर कितीही जन्म घ्यावे लागले तरी ते दु:ख खोटे आहे यावर त्यांचा विश्वास आहे.म्हणून तर ते म्हणतात..

हेचि दान देगा देवा ।तुझा विसर व्हावा।

पुढे ते म्हणतात..गुण गाईन आवडी …

(सक्तीने नाही हो! मनापासून..!!)

 (अत्यद्भूतं तच्चरितं सुमंगलं गायन्तआनंदसमुद्रमग्न: ।।भागवत अष्टमस्कंध)

हेचि माझे सर्व जोडी।।

लगे मुक्ती धन संपदा .

(आणि दुर्मिळ असा )

संतसंग देई सदा.।।

…जो देवसुद्धा इच्छितो…!

तुका म्हणे गर्भवासी।सुखे घालावे आम्हांसी

तुकोबा चतुर आहेत…

ते म्हणतात..गर्भवासी सुखे घालावे

कारण..गर्भात दु:ख आहे हे त्यांना माहीत आहेच..पण हरी सखा जवळ असेल,स्मरणात असेल तर ते दु:खच राहणार नाही हे ते जाणत होते.साक्षात हरीच आपणाला पालखीतून जन्मांतराच्या वाटेवरून घेऊन जाणार  असेल तर  पायी चालणा-यांना होणारे वाटेवरचे त्रास  जाणवणार नाहीत.

दु:ख त्याला भोगावे लागते ज्याची चित्तवृत्ती देहाला चिकटली आहे.पण ज्याची चित्तवृत्ती नामस्मरणात रंगते त्याचे देहात्म्यच सुटते.त्याला दु:ख कोठून असणार ? त्याची पालखी उचलायला देव तयारच आहे.

आता या पार्श्वभूमीवर, समर्थ रामदासांचे विचार पहिले, तर समर्थांना  सामान्यजन गर्भवासाच्या दु:खातून याच जन्मात मुक्त व्हावेत याची तळमळ होती.कारण जन्मजन्मांतरीचे नित्यकल्याण करण्याचे साधन असणारा नरदेह हा दुर्लभ आहे

लाधलो हा देह काकतालीन्याये।

घडो उपाये घडो आले ।।’

पापपुण्य समान झाले तरच नरदेह मिळतो.

नाथ महाराज म्हणतात..

सुकृतदुष्कृत समानसमी तैं पाविजे कर्मभूमि ।।

तेचि जैं पडे विषमी।तैं स्वर्गगामी कां नरक ।।(एक.भा.अ. २-२१७ )

इतर पशु आदी जन्मात पापपुण्य नाही पण येरझाऱ्या आहेत.

आणि आम्हा सामान्यांना प्रपंचासक्ती व वित्तदारेषणा (वासना),इतक्या घट्टपणे चिकटलेल्या आहेत की सर्वांची पूर्ति करतांना आम्हाला प्रचंड दु:ख होते.. जन्म वाया जाऊनही मरणानंतरही हे सुटत नाही मग जन्ममरणाच्या येरझाऱ्या,गर्भवासाचे दु:ख सहन करणेही अटळ..त्याची अत्यंत भीतीही वाटते..

मातेचिया उदरकुहरी ।पचुनी विष्ठेचिया रात्री ।।

उकडूनि नवमास वरी जन्मजन्मोनी मरती ।।(ज्ञा.९-३३१)

दासबोधात समर्थ लिहीतात..

वोकानरकाचे रस झिरपती ।ते जठराग्नीस्तव तापती

तेणे सर्वही उकडती।अस्तीमांस।(३-१-३०)

असा हा शोककारी,दु:खकारी गर्भवास…

म्हणून मनाच्या श्लोकामध्ये रामदास स्वामी म्हणतात..

मना वासना चुकवी येरझारा I मना कामना सांडी रे द्रव्य दारा I

मना यातना थोर हे गर्भवासी ।मना सज्जना भेटवी राघवासी

 

(येथे वासना ही षष्ठी विभक्ती) .वासनेच्या येरझाऱ्या असा अर्थ.

दोन्ही महापुरुषांना एकच गोष्ट सांगायची आहे..

हेचि दान देगा देवा..तुझा विसर व्हावा

आणि

मना सज्जना भेटवी राघवासी

असे झाल्यास गर्भवास झाले तरी दु:ख होणार  नाही किंबहुना ते होणारच नाहीत कारण राघवाची भेट त्याचा विसर न झाल्याने होणार आहे .वासना ,कामना,द्रव्य दारा लोकादी ईषणा नष्ट झाल्यामुळे,मन सज्जन झाल्यामुळे हे होणार आहे..तो भेटल्यावर पुन्हा जन्म कसचा..? नामस्मरणातच मुक्ती आहे..विस्मरणात मरण आणि पुन्हा जन्म आहे.

थोडेसे विषयांतर..

प्रत्येकाला कितीदा जन्म घ्यावा लागेल हे माहीत नाही.

विवेकानंदांनी एक गोष्ट सांगितली आहे..

एका साधूला त्याचे मुक्ती साठी दोन जन्म बाकी सांगितल्यावर तो निराश झाला पण एका सहज  फिरणा-या माणसाला मुक्तीसाठी झाडावरच्या पानांइतके जन्म घ्यावे लागतील म्हणाल्यावर तो आनंदाने नाचू लागला..तर त्याला तात्काळ मुक्ती मिळाली.. कारण तो मुक्तच होता..

तेव्हा बंधन आणि मुक्ती या पण संकल्पनाच आहेत,त्या देहबुद्धीमुळे निर्माण होतात स्वस्वरुप ज्ञान करवून घेऊन त्यांचे निरसन करुन घ्यावे असे समर्थ दासबोधात म्हणतात.(७-६-५०)

आता, राघवाची भेट कशासाठी हवीय किंवा तुकोबांना देवाच्या स्मरणाचेच दान का हवे.. ? तर..

तद्प्राप्य तदेवावलोकयती तदेव श्रुणोती तदेव भाषयती तदेव चिंतयती ।।(नारदभक्तीसूत्र ४-५५)

भगवन्ताच्या प्रेमाला प्राप्त झाल्यावर भक्त फक्त त्याच्याचकडे पाहतो,त्याच्याबद्दलच ऐकतो,बोलतो,सदैव त्याचेच चिंतन करतो.

ही प्रेमभक्तीची उच्चतम अवस्था त्यांना निरंतर हवी आहे..(काही तत्त्वज्ञ मुक्तीचे १६ ते २० प्रकार मानतात..तरीही हीच सर्वोच्च अवस्था असे मी मानतो)

शेवटी..आणखी एक श्लोक घेऊन विवेचन संपवतो.

 देह्यादिक प्रपंच हा चिंतियेला I

परी अंतरी लोभ निश्चित ठेला I

हरीचिंतने मुक्तीकांता वरावी I

सदा संगती सज्जनांची धरावी..II

सदैव  प्रपंचाचेच चिंतन व त्याचा लोभ सोडून  मनाने मुक्ती साधावी,का? तर हरिचिंतन करता यावे म्हणून.यासाठी सज्जनांची संगती धरावी.तुकोबा संतसंगत मागतात तर समर्थ सज्जनांची.दोन्ही एकच. समर्थ तर मनालाच सज्जन म्हणून हाक मारतात.समर्थांचे याविषयी मनाचे श्लोक किती म्हणून सांगावेत..?

एकूण काय, तर कोणतेही संत त्यांच्या अनुभवाच्या आधारावर, एकाच गोष्ट, वेगवेगळ्या शब्दांत, वेगवेगळे दृष्टान्त देऊन सांगतात. फक्त समजून घेणारा पाहिजे.

संत साहित्य वाचतांना सहज सुचलेले हे विचार, समविचारी लोकांबरोबर शेअर करावे असे वाटले, म्हणून हा लेखनप्रपंच!

पांडुरंग देशपांडे

लेखक- श्री पांडुरंग देशपांडे.

pandurang deshpande
pandurang deshpande

लेखक हे Textile Process Advisor and consultant असून मुंबई येथील UDCT मधून Textile Engineer झालेले आहेत. व्यवसायानिमित्त भारतभर भ्रमण केले आहे. आणि अध्यात्माची आवड असल्याने संत वाङमयाचे अभ्यासक आहेत.

Learning journey-2

learning journey

Life is a learning journey.

जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे, ही या वेबसाईटची टॅग लाईन आहे..

आपला कामाच्या निमित्ताने अनेक लोकांशी संबंध येतो. विशेषतः आपण जिथे नोकरी किंवा व्यवसाय करीत असू, तिथे आपल्या सोबत असणाऱ्या लोकांचा आपल्यावर कळत नकळत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभाव पडत असतो. मी गेल्या लेखात, औरंगाबाद (आताचे संभाजीनगर) येथे काम करत असतांना त्यावेळचे तेथील DGM श्री नकीब यांच्या बद्दल लिहिले होते. आता अजून काही व्यक्तिमत्वांबद्दल लिहायचे आहे.

  1. श्री बी. डी. भोपे

मी बँकेत लागण्याच्या आधीपासून, माझे वडील बंधू, श्री बी. डी. भोपे, हे बँकेत होते. ते बँकेतील एक अत्यंत प्रसिद्ध, लोकप्रिय, अभ्यासू  आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व होते.

मी बँकेत लागल्यावर मला पहिली पोस्टिंग औरंगाबादपासून 35 किलोमीटर  अंतरावर असणाऱ्या खुलताबाद या उंचावरील निसर्गरम्य ठिकाणी मिळाली. माझी पोस्टिंग कॅशियर कम क्लर्क अशी होती.

हे जेंव्हा वडील बंधू (ज्यांना आम्ही ‘दादा’ म्हणत असू) यांना कळाले, तेंव्हा त्यांनी मला एक खूप उपयुक्त असा सल्ला दिला. ते म्हणाले, हे बघ, तुझी अपॉईंटमेंट कॅशियर कम क्लर्क म्हणून झाली आहे. तेंव्हा तुला केंव्हाही कॅश वर पण बसावे लागेल. (म्हणजे कॅशियर म्हणून काम करावे लागेल). त्यावेळी, माझ्या गुरुने मला सांगितलेली एक गोष्ट मी तुला सांगतो, जेणे करून तुला कॅश मध्ये कधीही shortage येणार नाही. ती गोष्ट अशी, “लेकर लिख, लिखकर दे – घाटा आया तो मुझसे ले!” म्हणजे असे, की तू काऊंटर वर बसल्यावर जेंव्हा कोणी कॅश जमा करायला येईल, तेंव्हा, त्यांनी दिलेली स्लिप, आणि त्यासोबतची कॅश- घेतल्यावर आधी मोजून घ्यायची- आणि त्याचे डिटेल्स आपण आपल्या हाताने त्या व्हाऊचर वर लिहायचे, टोटल करायची, आणि त्याने व्हाऊचर वर लिहिलेल्या रकमेसोबत ती जुळल्यावर, मग आपल्या Receipts च्या रजिस्टर मध्ये enter करायची. याच्या उलट कृती पेमेंट देतेवेळी करायची- पेमेंट च्या व्हाऊचर वर आधी आपण देणार असलेली कॅश पूर्ण लिहायची, tally करायची, आणि मग समोरच्या व्यक्तिला द्यायची. पेमेन्टचे व्हाऊचर दिवसाच्या शेवटी रजिस्टर मध्ये एंटर करायचे.

मी हा सल्ला चांगला लक्षात ठेवला. मला नेहमी जरी कॅश वर बसायचे काम पडत नसायचे, तरी जेंव्हा केंव्हा कॅश मध्ये काम करायची वेळ येई, त्यावेळी मी या पद्धतीने कॅश घेणे किंवा देणे करीत असे. त्यामुळे, माझी ऑफिसर म्हणून प्रमोशन होईपर्यंतच्या साडेसात वर्षांच्या काळात अनेक वेळा कॅश वर काम करावे लागले, पण कधी शॉर्ट आले नाही की एक्सेस आले नाही. आणि कॅश मध्ये काम करतांना कितीही गर्दी आली तरी त्याचे कधी दडपण आले नाही.

बी. डी. भोपें बद्दल अजूनही कधी विषय निघाला की त्यांच्यासोबत काम केलेले लोक भरभरून बोलतात. त्यांच्या उंचीच्या जवळपासही मला जाता आले नाही. पण प्रत्येक गोष्टीत बारीक सारिक डिटेल्सचा अभ्यास करून विषयाची पूर्ण माहिती करून घेण्याचा त्यांचा गुण थोड्या प्रमाणात मी आत्मसात करू शकलो.

  1. श्री एम. एस. भाले

खुलताबाद ला काम करतांना श्री एम. एस. भाले उर्फ मधू भाले, हे हेड कॅशियर होते. त्यांचा कॅशच्या कामातील आणि इतरही कामातील नीटनेटकेपणा अतिशय वाखाणण्याजोगा होता. एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व, तितकेच स्वाभिमानी, फटकळ पण त्याच वेळी आपले काम आटोपून इतरांना मदत करण्यात अत्यंत तत्पर असे हे व्यक्तिमत्व होते. त्यांचा आत्मविश्वास अत्यंत दांडगा होता. आणि राहणीमान, कपड्यांची आवड निवड ही अत्यंत चोखंदळ होती. कॅश च्या रजिस्टर मध्ये प्रत्येक कॉलम मध्ये सर्व फिगर्स अत्यंत नीटनेटक्या, एकाखाली एक लिहिलेल्या, आणि शेवटी टोटल मारतांना, एका रुळाने टोटलच्या खाली आणि वर सरळ रेष आखणार. जेणे करून टोटल हायलाईट होईल. आमच्या बँकेत करन्सी चेस्ट होती, म्हणजे आर. बी. आय. ची प्रतिनिधि म्हणून आमच्याकडे दर काही महिन्यांनी कोट्यावधीची नवीन करन्सी यायची. तसेच करन्सी चेस्ट चे व्यवहार, त्याचे दिवसाच्या सुरुवातीचे बॅलन्स, दिवसभरातील व्यवहार, आणि दिवसाच्या शेवटचे बॅलन्स, सर्व नोटांच्या तपशीलासह, असा पूर्ण तपशील रोजच्या रोज करन्सी ऑफिसर रिझर्व्ह बँक यांना पाठवावा लागायचा. त्याला चेस्ट स्लिप म्हणायचे. श्री भाले हा तपशील अत्यंत अचूकपणे भरून वर तो लिफाफा स्वतःच्या हाताने तयार करून त्यात ती स्लिप टाकून तयार ठेवत. कामातील अचूकता आणि परिपूर्णता हे गुण मला त्याकाळी त्यांच्याकडून शिकायला मिळाले.

  1. श्री बी. ए. रझवी (बाकर आली रझवी)

माझी खुलताबादहून कन्नड येथे बदली झाली. कन्नड येथे बँकेचे एग्रिकल्चरल बँकिंग डिविजन (A.B.D.)होते. तिथे माझी पोस्टिंग झाली. A.B.D. म्हणजे मुख्य शाखे अंतर्गत, कृषि कर्जां साठीचा खास विभाग होता, आणि त्याचे इन चार्ज श्री बी. ए. रझवी हे होते. त्या विभागात सुरुवातीस आम्ही दोघेच होतो. मी त्यांचा सहाय्यक म्हणून तिथे 3 वर्षे काम केले. (साधारण एक-दोन वर्षांनंतर श्री एस. पी. माथुर हे तांत्रिक अधिकारी त्या विभागात आले.)

त्यांच्या सोबत काम करतांना, मला शेती कर्जाची अगदी बारीक सारिक माहिती झाली. ते मला त्यांच्या सोबत फील्ड वर मोटर सायकल वर इन्सपेक्शन ला घेऊन जात. तिथे शेतीची, पिकांची, विहीर, मोटार, पाइप लाईन, सर्व गोष्टींची माहिती मिळत असे. तोपर्यन्त माझा शेतीशी कधीही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आला नव्हता. पण इथे मला सगळ्या शेतीसंबंधात बारीक सारिक गोष्टींची पण पूर्ण माहिती झाली.

मला त्यांच्यातला एक गुण फारच नोंद करण्यासारखा वाटला, आणि मी काही प्रमाणात तो पुढे चालून आत्मसात करण्याचा, मला जमेल तितका प्रयत्न केला. तो म्हणजे, compartmentalization.  त्यांच्यासमोर जेंव्हा एखादा खातेदार (शेती कर्जाचा) बसला असे, आणि तो जर थकबाकीदार असेल, किंवा त्याने काही नियमबाह्य काम केले असेल, तर ते त्याला खूप झापत. (ते मुस्लिम असले तरी अगदी अस्खलित मराठी बोलत, आणि दिसायला एखाद्या कोकणस्थासारखे गोरे पान दिसत.)त्यावेळी  त्यांची पूर्ण देहबोली, हातवारे, इत्यादि त्यांच्या मुद्द्याला साजेसे, आक्रमक होत आणि बोलता बोलता त्यांचा गोरापान असलेला चेहरा, लालबुंद होऊन जात असे. पण तो विषय संपला, की त्याच कर्जदाराशी इतर कुठला विषय असेल, किंवा त्यानंतर लगेच त्याच्यासोबत आलेल्या दुसऱ्या कुणाशी बोलण्याचे असेल, किंवा माझ्यासोबत काही बोलायचे असेल, तेंव्हा एक क्षणाचाही वेळ न लागता, एखाद्या कसलेल्या नटासारखे ते दुसऱ्या, हलक्या फुलक्या मूड मध्ये येऊ शकत. आधीच्या रागावलेल्या मूडचा मागमूसही त्यांच्यात दिसत नसे.

या ब्लॉग वर काही दिवसांपूर्वी, वैद्य सोहन पाठक यांचा Compartmentalization ⇒

(विभागीकरण, किंवा कप्पे करण्याचे कसब)या विषयावरचा लेख आपण वाचला असेल. मला वाटते हे compartmentalization रोजच्या आयुष्यात खूप आवश्यक आहे. त्यामुळे एका गोष्टीचा किंवा प्रसंगाचा तणाव दुसऱ्या गोष्टीवर पडणार नाही. आणि हे कसब कोणामध्ये उपजत नसेल तरी प्रयत्नाने साध्य करता येऊ शकेल. या बद्दल यापूर्वीच्या एका लेखात Acquire New skills  (काही तरी धरावी सोय, आगंतुक गुणांची) मी माझी मते व्यक्त केली होती.

मित्रांनो, ज्या व्यक्तिमत्वांनी मला वेगवेगळ्या कारणांमुळे प्रभावित केले, त्यांच्याबद्दल लिहिण्याच्या प्रपंचातील हा दुसरा लेख.  आपल्या अवतीभोवतीच्या व्यक्ति या आपल्यावर आणि आपण त्यांच्यावर परस्पर प्रभाव कमीजास्त प्रमाणात टाकत असतो, आणि त्यातून आपले व्यक्तिमत्व घडत जात असते, ही प्रक्रिया शेवटपर्यंत चालू असते, असे मला वाटते.

येणाऱ्या भागात आणखी काही व्यक्तिमत्वांबद्दल लिहिण्याचा विचार आहे. आपले याबाबतीतील विचार जरूर कळवा.

आवडल्यास ब्लॉगला subscribe करा.

 

Learning journey-1

e6b6ca34594b195e57c656177db2d978

माझे बँकेतील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुरू

जीवन म्हणजे एक सतत शिकण्याचा प्रवास आहे, ही या वेबसाईटची टॅग लाईन आहे. Life is a learning journey. जीवनातील प्रत्येक अनुभव हा आपल्याला काही शिकवून जातो, आणि तो अनुभव गाठीस बांधून आपला प्रवास अव्याहत पुढे चालू ठेवायचा असतो, अशी माझी श्रद्धा आहे. वेगवेगळे अनुभव, परिस्थिती, आणि प्रसंग जसे आपल्याला काही शिकवण देऊन जातात, तसेच काही व्यक्ति, आपल्याला बरेच काही शिकवून जातात. काही व्यक्तींमधील काही गुण आपल्याला खूप प्रभावित करीत असले, तरी, आपल्याला ते आत्मसात करता येण्याची अजिबात शक्यता नसते. आपण नुसते कौतुकाने बघत राहण्यापलीकडे काही करू शकत नाही.

अशाच व्यक्तीपैकी एक अवलिया माणूस म्हणजे, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मध्ये औरंगाबाद झोनल ऑफिसला साधारण 2 वर्ष उप महा प्रबंधक (DGM- Deputy General Manager) म्हणून आलेले मूळचे काश्मीरचे असलेले, काश्मिरी पंडित, श्री अजॉय नकीब हे व्यक्तिमत्व. अत्यंत साधी राहणी, गोरीपान आणि ठेंगणा ठुसकी पण मजबूत शरीरयष्टी, धारदार नाक, आणि किंचित घारे डोळे, डोक्याला टक्कल पडत आलेले, पण गालाला पडणाऱ्या खळ्या, आणि  कायम प्रसन्न मुद्रा आणि फ्रेंडली वागणूक, यामुळे ते पूर्ण झोनल ऑफिसच्या गळ्यातील ताईत झाले होते.image 4

स्टेट बँक ऑफ हैदराबाद ही स्टेट बँक ऑफ इंडिया ची सर्वात मोठी सहयोगी बँक होती, जी आता, स्टेट बँक ऑफ इंडियामध्येच विलीन झालेली आहे. त्याकाळी, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या 7 सहयोगी बँका होत्या, आणि त्या बँकामधील उच्चपदस्थ व्यक्तींच्या एका सहयोगी बँकेतून दुसऱ्या सहयोगी बँकेतही बदल्या होत होत्या. श्री नकीब हे स्टेट बँक ऑफ पटियाला मधून बदलून या काळात स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या औरंगाबाद येथील झोनल ऑफिसला साधारण वर्ष 2011 ते 2013 या कालावधीत झोनल ऑफिसचे मुख्य म्हणून आले होते

एखादी व्यक्ति किती इतक्या उच्च पदावर असतांनाही किती साधी राहू शकते, याचे अजॉय नकीब म्हणजे एक चालते बोलते उदाहरण होते. बँकेतील नोकरी म्हणजे व्यक्ति जितक्या मोठ्या जबाबदारीच्या पदावर असेल, तितकी ती जास्त बिझी, व्यस्त राहणार आणि सतत तणावाखाली राहणार, हे समीकरण या माणसाला अजिबात लागू पडत नव्हते.

मी त्या वेळी औरंगाबाद येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादच्या ट्रेनिंग सेंटर येथे होतो. ट्रेनिंग सेंटरची जबाबदारी सांभाळतांना बऱ्याचदा चांगलीच दमछाक व्हायची. बऱ्याच वेळा, नकीब साहेबांना, ट्रेनिंगच्या नवीन बॅच च्या सुरुवातीला, उद्घाटन करण्यासाठी बोलवायला, मी जात असे. झोनल ऑफिस च्या मुख्याचा वेळ किती किमती आहे, हे माहीत असल्यामुळे, मी त्यांची वेळ घेऊन जात असे, आणि त्यांना आमंत्रण देतांना, त्यांना वेळ उपलब्ध आहे की नाही याची चौकशी करीत असे. त्यावेळी, ते अगदी दिलखुलासपणे  म्हणत, “अरे, भोपेजी, मेरे पास तो समय ही समय है. आप हुकूम करो, कब हाजिर होना है!” वास्तविक पाहता, ते माझ्यापेक्षा हुद्दयाने खूप मोठे होते, पण त्यांनी कधीच असे जाणवू दिले नाही. आणि माझ्याशीच नाही, तर सगळ्यांशी त्यांचा हाच व्यवहार होता. केंव्हाही त्यांच्याकडे गेले, तरी ते कधीच आपण खूप कामात आहोत, आपल्याजवळ अजिबात वेळ नाही, असे दाखवीत नसत. आणि केंव्हाही गेले, तरी ते कधीच तणावात दिसत नसत.

आम्ही कधी कधी त्यांना अधिकाऱ्यांच्या एखाद्या बॅचला, एखादा महत्वाचा विषय शिकविण्यासाठी पाहुणा वक्ता म्हणून बोलवत असूत. त्यावेळी बँकेतील अगदी कठीण विषय ते रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन अगदी सोपे करून सांगत.

त्यांचे एकेक किस्से ऐकल्यावर, अवलिया, हे एकाच विशेषण त्यांना द्यावेसे वाटत असे. खरे तर त्यांच्या पदाला, बँकेची ड्रायवरसहित चांगली मोठी गाडी त्यांच्या दिमतीला असे. पण त्यांनी स्वतःच्या घरी, किंवा बाजारात इत्यादि जाण्यासाठी चक्क एक छोटीशी नॅनो कार विकत घेतली होती, आणि आपल्या खाजगी कामासाठी त्या गाडीतून फिरत.

त्यांना पूर्ण मराठवाड्यात दौऱ्यासाठी जावे लागे. अर्थातच बँकेची गाडी त्यांच्या दिमतीला असे. पण एखाद्या वेळी ते चक्क बसने जात, अगदी साधा वेष, पॅन्ट, हाफ बाह्यांचा बुशशर्ट, आणि पायात साधी चप्पल, या वेशात ते एखाद्या बँकेच्या एखाद्या खेड्यातलया शाखेत जाऊन धडकत. आणि तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधत. त्यांच्या काय अडचणी आहेत हे जाणून घेत. आणि शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून शाखा व्यवस्थापकाला सूचना देत.

झोनल ऑफिस मध्ये अगदी प्यून पासून ते मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांशी एकदम इनफॉर्मल वागत.

पण एवढेच नाही, हा मनुष्य हरहुन्नरी, रसिक आणि त्याचवेळी कलाकार सुद्धा होता.

औरंगाबादचे झोनल ऑफिस हे तेथील स्टाफ च्या अंगी असलेल्या वेगवेगळ्या कला गुणांमुळेही प्रसिद्ध होते. आणि त्यासाठी हैदराबादच्या हेड ऑफिस मध्ये औरंगाबाद चे खूप नांव होते.

दर वर्षी हैदराबादला बँक डे ला खूप मोठा कार्यक्रम होत असे. त्यावेळी वेगवेगळ्या झोन्स मधील सांस्कृतिक कलादर्शन कार्यक्रम होत आणि त्यांच्या स्पर्धाही होत. एके वर्षी, गाण्याच्या स्पर्धा होत्या, आणि त्यात, झोन मधील स्टाफची स्पर्धा घेऊन, त्यातील विजेत्याला हैदराबाद येथे, झोन चे प्रतिनिधित्व करायला मिळणार होते. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बाहेरील नामवंत कलाकार बोलावले होते. त्यात चक्क नकीब साहेबांनी, स्पर्धक म्हणून भाग घेतला, आणि काश्मीर की कली या चित्रपटातील, “इशारो इशारो में दिल लेने वाले, बता ये हुनर तूने सीखा कहाँसे” हे गाणे इतके अप्रतिम गायले, की परीक्षकांनी त्यांच्या गाण्याला प्रथम क्रमांक दिला. आणि तो नक्कीच ते DGM होते म्हणून नाहीत, तर गाण्याच्या गुणवत्तेवर दिला. पण नकीब साहेबांनी, त्याचा जरी नम्रपणे स्वीकार केला, पण DGM म्हणून त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या कलाकाराचीच निवड, हैदराबाद ला जाण्यासाठी केली.

झोनल ऑफिस च्या लोकांची दरवर्षी कुठे तरी सहल जात असे. तो पर्यन्त सहसा उच्च पदस्थ असलेले अधिकारी त्या सहलीत कधी प्रत्यक्ष सहभागी होत नसत. पण नकीब साहेब अत्यंत उत्साहाने कोकणला रायगड ला निघलेल्या सहलीत सामील झाले. त्या सहलीत एकूण 40-50 जण होते, त्यात मीही होतो. आणि त्यांनी पूर्ण सहलीत सगळ्यांसोबत त्यांच्यातीलच एक होऊन मनमुरादपणे सहलीचा आनंद लुटला. पूर्ण बसच्या प्रवासात, मी त्यांच्या मागच्या सीट वर असतांना, श्री सुधीर ओंकार (दुसरे तितकेच कलाकार आणि हर हुन्नरी व्यक्तिमत्व) यांच्या शेर शायरी वर कितीतरी वेळ चाललेल्या गप्पा मी ऐकत होतो, आणि दोन रसिक माणसांच्या गप्पांचा मनमुराद आनंद लुटत होतो.DSC02631

एका गावी, आम्ही पायी चालत असतांना एक म्हातारी बाई काही तरी (फळ) विकायला रस्त्यात उभी होती. तिच्याकडून खूप मोठी फळे विकत घेऊन सगळ्यांना दिली, आणि त्यांच्या पाकिटातून हाताला येतील तितक्या नोटा, फळांच्या किमतीच्या कितीतरी अधिक, न मोजता, त्या बाईला दिल्या!DSC02627

आम्ही रायगडला गेलो. आमच्यात बरेच चांगले गायक, वादक होते. त्यातील हौशी असलेले, विश्वास काळे इत्यादींनी ढोलकी वगैरेही सोबत आणली होती. गड बघून आल्यावर सर्वजण भारावलेल्या अवस्थेत होते. अशा वेळी काळे आणि इतर मंडळींनी, “ गर्जा महाराष्ट्र माझा” हे वीरश्री पूर्ण गाणे, ढोलकीच्या तालावर म्हणायला सुरुवात केली, आणि सर्वजण त्या ठेकयात सामील झाले. त्यावेळी नकीब साहेबही त्या ठेकयात उत्साहाने सामील झाले. त्यावेळचे एक दोन व्हिडिओ अजून माझ्याकडे आहेत, ते या ब्लॉग सोबत देत आहे.

मित्रांनो, असा हा अवलिया माणूस, काश्मिरी पंडित, अशातच, चक्क महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यात येऊन स्थायिक झाला आहे, आणि तिथे महाराष्ट्रातील आदिवासी लोकांसोबत समरस होऊन कार्य करीत आहे, हे मला आज गूगलवर सर्च केल्यावर समजले. आणि त्यांनी एक यू ट्यूब चॅनल पण सुरू केले आहे.

त्यात आणखी एका चॅनल वर त्यांनी आपल्याविषयी थोडक्यात सांगणारा एक व्हिडिओ टाकला आहे. 

मन मौजी , मस्त कलंदर, आणि जीवन आपल्याच धुंदीत जगणारा असा एक अवलिया, म्हणूनच

अशी काही व्यक्तिमत्व आपल्याला बरेच काही शिकवून जातात.

यापुढील लेखात, बँकेतील इतर काही सहकारी, ज्यांच्या कडून मी खूप काही शिकलो, अशा व्यक्तींबद्दल लिहायचा विचार आहे.

सुगरणीचा खोपा

sugran pakshi

गेल्या महिन्यात एके ठिकाणी गेल्यावर तिथे एका जुनाट, वापरात नसलेल्या विहिरीवर, सुगरणीचे अनेक खोपे दिसले. विहीरीच्या काठाने उगवलेल्या झाडांवर त्यांनी खोपे बांधले होते. आणि अनेक सुगरण पक्षी, त्यांचा तो विशिष्ट आवाज करीत लगबग लगबग करीत ये-जा करीत होते. sugran

त्या पक्ष्यांची मेहनत बघून वाटले, आजकाल छोट्या छोट्या अडचणींना वैतागून, व्यसनाधीन होणारे, किंवा डिप्रेशन मध्ये जाणारे किंवा आत्महत्या करणारे लोक, जर या पक्ष्यांच्या जीवनातून काही बोध घेतील तर किती बरे!

बहिणाबाई चौधरीने म्हणून ठेवले आहे. 

तिची उलूशीच चोच,

तेच दात, तेच ओठ

तुले देले रे देवाने

दोन हात दहा बोटं

बहिणाबाई म्हणतात, त्या पक्ष्याला ना हात आहेत, ना बोटं. तिची छोटीशी चोंच हीच तिचे हात आणि बोटं. तरी पण किती जिद्दीने ती तिचे घरटे विणते!

खरंच बहिणाबाई चौधरी या आपल्या खानदेशी कवयित्रीची  जीवनाकडे बघण्याची दृष्टी किती practical आणि आशावादी होती !

त्या निमित्ताने इथे बहिणाबाईची सुगरणीच्या खोप्यावरील कविता या ठिकाणी देण्याचा मोह आवरत नाही. म्हणून ती पूर्ण कविता येथे सादर करीत आहे. 

खोप्या मधी खोपा

अरे खोप्या मधी खोपा

सुगरणीचा चांगला

देखा पिलासाठी तिनं

झोका झाडाले टांगला

sugran-2

पिलं निजली खोप्यात

जसा झुलता बंगला

तिचा पिलामधी जीव

जीव झाडाले टांगला

सुगरीन सुगरीन

अशी माझी रे चतुर

sugan female
sugan female

तिला जन्माचा सांगाती

मिळे गण्या गंप्या नर 1

sugran male

खोपा विणला विणला

जसा गिलक्याचा 2 कोसा3

पाखराची कारागिरी

जरा देख रे माणसा!

तिची उलूशीच4 चोच,

तेच दात, तेच ओठ

तुले देले रे देवाने

दोन हात दहा बोटं

काय लोकाचीबी तऱ्हा

कसे भांग घोटा पेल्हे5

उभा जमिनीच्या मधी

आड6 म्हणती उभ्याले

आसं म्हनू नही कधी

जसं उभ्याले आडवा

गुढी उभारतो त्याले

कसं म्हनती पाडवा?6gudhi

बहिणाबाई चौधरी

शब्द अर्थ:

  1. गण्या गंप्या नर- सुगरण पक्षिणीला खोपा विणता येतो. परंतु तिच्या नराला येत नाही. तो फक्त तिला गवताच्या काड्या वगैरे आणून देतो. म्हणून त्याला गण्या गंप्या म्हणजेच बावळट म्हटले आहे.
  2. गिलक्याचा कोसा- गिलके म्हणजे घोसाळे (पारसे दोडके). कोसा म्हणजे त्याचे वाळवून केलेली स्पंजा सारखी रचना. याला इंग्लिश मध्ये loofah म्हणतात.loofah
  3. वाळवून केलेली स्पंजा सारखी रचना
  4. उलूशीच- छोटीशी
  5. पिले.
  6. आड म्हणजे पूर्वी घरात किंवा गल्लीत असायचे ते छोटे पाण्याचे स्रोत. इथे बहिणाबाईने कोटी केली आहे. आड हा  जमिनीत ‘उभा’ असतो. त्याला आड म्हणणे जसे चूक आहे, तसेच गुढी पाडव्याला आपण गुढी ‘उभारतो’, पण मग त्याला ‘पाडवा’ कसे काय म्हणतो.? असा जाता जाता विनोद केला  आहे.