https://goodworld.in A website by Madhav Bhope

लोकां सांगे ब्रह्मज्ञान-4

rich home

लेखक

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*लोकां सांगे ब्रह्मज्ञान..*

क्रमशः (४)

जीपने नुकताच वेग घेतला होता. माझे ओरडणे ऐकू जाताच करकचून ब्रेक दाबल्याचा आवाज होऊन जीप थांबली. तशीच तिला घाईघाईत रिव्हर्स घेऊन दारासमोर थांबवून माझ्याकडे आश्चर्याने पाहत सूर्यकुमार खाली उतरले.

मी त्यांना घेऊन घरात गेलो आणि बैठकीतील दिवाणाकडे बोट दाखवून त्या खालच्या खळग्यात सागाच्या फळ्या आहेत असं सांगितलं. सूर्यकुमार साहेबांनी हवालदार साईनाथला दिवाणा खालून फळ्या बाहेर काढायला सांगितलं. तसंच रीतसर नोंद व पंचनामा होईपर्यंत मी आतील दुसऱ्या खोलीत थांबावं अशी त्यांनी मला विनंती केली. त्यानुसार बेडरूममध्ये जाऊन पंचनामा पूर्ण होण्याची मी वाट पाहू लागलो.

थोड्या वेळाने रेंजर साहेबांनी मला बाहेर बोलावलं. आठशे रूपयांच्या दंडाची पावती हातात ठेवून पैसे उद्या दिलेत तरी चालेल, असे ते म्हणाले. परंतु सुदैवाने घरात, बायको जवळ तेवढे पैसे होते, ते आणून ताबडतोब त्यांच्या हातात ठेवले.

त्यानंतर वन विभागाचा खुणेचा शिक्का त्या लाकडी फळ्यांवर मारण्यास त्यांनी साईनाथला सांगितलं. शिक्का मारण्याचे काम चालू असताना दहापैकी केवळ सहा फळ्याच साईनाथने बाहेर काढल्याचे माझ्या लक्षात आले.

“खाली आणखी चार फळ्या आहेत !” असे साईनाथला सांगताच डोळा मारत त्याने “गप्प रहा..!” अशी मला खूण केली.

नुकतेच आम्ही रामेश्वरम्, कन्याकुमारीला जाऊन आली होतो. तेथून आणलेले वेगवेगळ्या आकारांचे व विविध रंगांचे मोठमोठे आकर्षक समुद्री शंख शिंपले प्लास्टिकच्या कव्हर मध्ये घालून ते माळेसारखे बैठकीच्या खोलीत लटकवले होते. साईनाथ महाशयांना हे शंख शिंपले फारच आवडलेले दिसत होते. सकाळी घरात आल्यापासून वारंवार ते शंख शिंपले हातात घेऊन तो त्यांच्याकडे अनिमिष नेत्रांनी बघत होता.

“खूप मौल्यवान असतील ना हे शंख शिंपले ?” असा प्रश्न ही त्याने दोन तीनदा विचारला होता. तसे ते शंख शिंपले अगदीच स्वस्त किमतीचे होते. परंतु साईनाथच्या चेहऱ्यावरील सौंदर्यचकित भाव पाहून शिंपल्यांची खरी किंमत ऐकून त्याचा अपेक्षाभंग होऊन विरस होऊ नये म्हणून मी त्याच्या प्रश्नावर होकारार्थी मान डोलावली होती.

साईनाथ पाणी पिण्याच्या निमित्ताने घरात आला आणि मला एका बाजूला घेत,

“मी मुद्दामच चार फळ्या खाली ठेवल्या आहेत. त्या बदल्यात तुम्ही मला ते शंख शिंपले द्या..!”

असे म्हणाला.

मी त्याला घेऊन बाहेरच्या खोलीत गेलो आणि ती भिंतीवर टांगलेली शंख शिंपल्यांची माळ काढून त्याच्या हातात ठेवत म्हणालो..

“ही माझ्याकडून तुला सप्रेम भेट ! याच्या बदल्यात मला तुझ्याकडून काहीही नको..”

त्यानंतर “आणखी चार फळ्या बाहेर काढायच्या राहिल्या असल्याचे” मी सूर्यकुमार साहेबांच्या निदर्शनास आणून दिले. हलगर्जीपणाबद्दल साईनाथला चार शिव्या हासडीत रेंजर साहेबांनी त्या चार फळ्या बाहेर काढून त्याची पंचनाम्यात नोंद घेतली. या चार फळ्यांचा जादा दंड न लावता लगेच फॉरेस्ट विभागाचा शिक्काही त्या फळ्यांवर मारून दिला.

मी दाखविलेल्या प्रामाणिकपणा बद्दल व केलेल्या सहकार्या बद्दल त्यांनी माझे आभार मानले. त्यावर मी हात जोडून त्यांना म्हणालो की.. “माझ्या घरात जे सागवानी फर्निचर आहे त्या सर्वांवरही मी योग्य तो सरकारी दंड भरू इच्छितो. तसेच एक सोफा सेट मी बेकायदेशीररित्या बस द्वारे महाराष्ट्रात पाठविला आहे. त्या कृत्याबद्दल कायद्यानुसार जी शिक्षा असेल ती भोगण्यास मी तयार आहे तसेच त्याचा दंडही माझ्या कडून वसूल करावा.”

सर्व गुन्हे कबूल करून चटकन पापमुक्त होण्याची जणू मला घाईच झाली होती.

पडत्या फळाची आज्ञा घेऊन रेंजर साहेबांनी घरातील साऱ्या फर्निचर वर दंड आकारला. महाराष्ट्रात पाठविलेल्या सोफा सेटवरही दुप्पट दराने दंड लावून एकूण अडीच हजार रुपये एवढ्या रकमेची पावती दिली. शेजारी राहणाऱ्या घरमालका कडून तात्पुरते पैसे उसने घेऊन मी वन विभागाचा दंड लगेच भरून टाकला.

एका शिक्का मारलेल्या पावतीवर घरातील सर्व फर्निचरचा उल्लेख करून ती माझ्या हातात ठेवीत सूर्यकुमार म्हणाले की.. “ही पावती दाखविलीत तर फॉरेस्ट विभागाच्या कोणत्याही चेक पोस्टवर कुणीही तुम्हाला अडवू शकणार नाही.”

“रेड” यशस्वी करून परत जाताना अत्यानंदाने मला प्रेमभरी मिठी मारून रेंजर साहेब म्हणाले..

“मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून अनेक ठिकाणी मी व्याख्यानं देतो. परंतु माझ्या उपदेशामुळे एखाद्याचे इतक्या अल्प अवधीत हृदयपरिवर्तन झाल्याचा हा पहिलाच अनुभव !

ड्युटीवर नसताना मी नेहमी हा असा पांढऱ्या रंगाचा खादीचा शर्ट व पँट असे साधे कपडे घालतो, हे तुम्हाला माहीतच आहे. जीनची पँट, महागडे शूज, गॉगल्स, रिस्ट वॉच, बेल्टस्, परफ्युम्स, ब्रँडेड कपडे अशा गोष्टी मी कधीच वापरत नाही. गरिबीतून वर आल्यामुळे मी बराचसा साम्यवादी विचारसरणीचा आहे.

सरकारी अधिकारी असूनही सशस्त्र नक्षलवादी अतिरेक्यांचा सुळसुळाट असलेल्या येथील जंगलात मी निर्भयपणे एकटा फिरतो. अनेक खतरनाक नक्षलवाद्यांशी माझे मित्रत्वाचे संबंध आहेत. माझी साधी राहणी आणि स्वच्छ चारित्र्य यांचा सर्वांवरच आपोआपच चांगला प्रभाव पडतो.

तुम्ही देखील साधी राहणी, अपरिग्रह, स्वाध्याय, आत्मसंयम व योग साधना यांचा अवलंब करून चिंतामुक्त सुखी जीवन जगावे, हीच मनोमन सदिच्छा.. !!”

एवढं बोलून रेंजर साहेबांनी माझा निरोप घेतला. त्यांच्या साधेपणाला, उच्च विचारसरणीला, आदर्श, निर्मोही वृत्ती आणि निस्पृह कर्तव्यनिष्ठेला मी मनोमन सॅल्युट केला.

एका मोठ्या संकटातून माझी सहीसलामत सुटका झाली होती. दंड भरून मी कायमचा निश्चिंत झालो होतो. अंतर्मनाला लागलेली सद्सद विवेकबुद्धीची टोचणी देखील कमी झाली होती. मेंदू वरील अपराधाचं, काळजीचं मानसिक ओझं उतरल्यामुळे कसं हलकं हलकं वाटत होतं.

दुसऱ्या दिवशी बँकेत गेलो तेंव्हा हेड कॅशियर, मॅनेजर व अन्य दोघा सागफळ्या खरेदी पार्टनर्स कडे विशेष निरखून बघितलं. पण ते नेहमी सारखेच आपल्या रोजच्या कामात मग्न होते. त्यांचे माझ्याकडे लक्षही नव्हते.

म्हणजे ? काल ह्या चौघांवर फॉरेस्ट डिपार्टमेंटची रेड पडलीच नाही की काय ? रेंजर साहेब तर ह्या चौघांच्या घरी धाड टाकून लाकूड जप्त करून आल्याचं म्हणाले होते ? मग हे चौघे, असं काहीच न झाल्याचा खोटा आव तर आणत नाही आहेत ? “झाकली मूठ सव्वा लाखाची” असा विचार करून मी ही मग कालच्या फॉरेस्ट रेड बद्दल कुणाकडेही विषय काढला नाही.

बँकेत रेग्युलर ऑडिट आलं होतं. सर्वजण त्या संबंधीच्या कामात गर्क झाले होते. पंधरा दिवसांनी ऑडिट संपलं. शाखेला ऑडिटमध्ये उत्तम रेटिंग मिळाल्यामुळे सर्वजण खुष होते. त्या आनंदात मॅनेजर साहेबांनी सर्व स्टाफसाठी बँकेतच छोटीशी पार्टी अरेंज केली होती.

पार्टीत गप्पा मारत असताना अचानक काहीतरी आठवल्या सारखं करून मॅनेजर साहेब म्हणाले..

“आपको बताना भूल ही गया इस ऑडिटकी गडबडमे.. वो, फॉरेस्ट रेंजर सूर्यकुमार आपके घर आ सकता है कभी भी.. आपके घर में इल्लीगल लकडी का स्टॉक है ऐसा बोल के, डरा धमका कर आप से फाईन भरने को कहेंगा.. उस को बिलकुल भाव मत देना.. ‘मॅनेजर साब से बात करो’, ऐसा कहना..

जब भी कोई बाहर के स्टेट का नया स्टाफ आता है तो ये लोग ऐसी ही चाल चलते है.. दरअसल उनके डिपार्टमेंट की सॅलरी, टीए बिल और अन्य सभी बिल का पेमेंट हम ही करते है.. उनके सारे स्टाफ को हम ने पर्सनल लोन भी दे रक्खा है.. हमेशा, बँक का समय समाप्त होने के बाद आने पर भी हम उन्हे पेमेंट देकर को-ऑपरेशन करते है इसलीये वो हमारे शुक्रगुजार रहते है और हमसे दब कर, थोडा डर कर भी रहते है..

.. और एक बात ! उस रेंजर सूर्यकुमार की बड़ी बड़ी बातों में मत आना.. वो जैसे दिखता है और दिखाता है, वैसा बिलकुल नहीं है !”

मॅनेजर साहेबांचे बोलणे ऐकून माझा पार्टीचा मूडच गेला. आपली फार मोठी फसवणूक झाल्याचं माझ्या लक्षात आलं. कसेबसे दोन घास खाऊन मी घरी परतलो.

त्या दिवसानंतर सूर्यकुमार साहेब मला कधीच भेटले नाहीत. फॉरेस्ट विभागाच्या कर्ज योजने संबंधी मीटिंग्ज मध्ये तसेच कर्ज मंजुरीच्या इंटरव्ह्यू पॅनल मध्ये ही ते गैरहजर असायचे.

रेंजर साहेबांच्या भ्रष्ट कारभाराचे, लाचखाऊ वृत्तीचे काही किस्सेही उडत उडत माझ्या कानावर आले. नक्षलवादी लोकांशी त्यांचे आर्थिक लागेबांधे असल्याचा लोकांना संशय होता. भरभक्कम मोठी लाच घेऊन ट्रकचे ट्रक सागवान चोरून स्मगल करणाऱ्या गुन्हेगारी रॅकेटचा ते हिस्सा असल्याबद्दल लोकांत कुजबुज होती.

अशातच आमच्या शाखेचा पंचविसावा वर्धापन दिन मोठ्या प्रमाणात साजरा करण्याचे ठरले. रेंजर साहेबांना त्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याचे काम माझ्याकडे सोपविण्यात आले होते. निमंत्रण पत्रिका घेऊन सकाळी नऊ वाजता रेंजर साहेबांच्या बंगल्यावर गेलो तेंव्हा ते बाहेर कुठेतरी जवळपासच गेले आहेत, असे गेट वरील रखवालदार म्हणाला. साहेब येईपर्यंत बंगल्याच्या दिवाणखान्यात थांबू शकता, असेही तो म्हणाला. मलाही त्यांचे घर पाहण्याची उत्सुकता होतीच, म्हणून मी दिवाणखान्यात प्रवेश केला.

त्या हॉलमध्ये बसण्यासाठी एक सतरंजी अंथरली होती. सतरंजीवर काही पुस्तके, ऑफिस फाईल्स, डायऱ्या व एक पेन होता. कोपऱ्यात पिण्याच्या पाण्याचा माठ ठेवलेला होता. अगदी रेंजर साहेबांनी वर्णन केल्याप्रमाणेच त्यांच्या घरातील दृश्य दिसत होते. माझ्या मनात पुन्हा त्यांच्याबद्दल कौतुकाचा भाव जागायला लागला.

थोड्या वेळाने त्यांचा खाजगी नोकर-कम्-खानसामा तिथे आला. “आपण साहेबांचे नातेवाईक आहात का ? रेंजर साहेब तुमचे कोण लागतात ?” असे त्याने विचारले. “ते माझे दोस्त आहेत..” असे त्याला सांगताच,

“अरे साब, फिर आप इधर निचे जमीनपर क्यों बैठे हो ? साब देखेंगे तो मुझ पर बहुत गुस्सा करेंगे.. चलो, आपको साब का प्रायव्हेट रुम दिखाता हुं.. वहां आराम से बैठ कर वेट करो, साब आते ही होंगे, तब तक मैं आप के लिए चाय बनाकर लाता हूं..”

असे म्हणत तो मला बंगल्याच्या मागे घेऊन गेला. तिथे आणखी एक छोटीशी टुमदार बंगली होती. त्याच्या व्हरांड्यात दोन उत्कृष्ट कलाकुसरीच्या सागवानी झुलत्या (रॉकिंग) चेअर्स ठेवलेल्या होत्या. काळ्या शिसवी लाकडाचे उत्तमोत्तम मुखवटे व नाजूक कोरीव नक्षीकामाच्या सुंदर लाकडी वस्तूंनी व्हरांडा कलात्मकपणे सजविला होता.

या प्रायव्हेट बंगल्यातील दिवाणखान्याच्या फरशीवर जाडजूड गुबगुबीत उंची गालिचा अंथरला होता. चंदनी शिसमच्या भव्य शाही सोफ्यामुळे त्या हॉलला जणू राजवाड्याचाच लुक आला होता. छताला काचेची चमकणारी हंड्या झुंबरे टांगलेली होती. हॉलमधील सर्व दारे व खिडक्यांना आलिशान राजेशाही किनखापी पडदे लावलेले होते. हॉलभर फ्रेंच परफ्युमचा मंद सुगंध दरवळत होता.

हॉलच्या एका भिंतीवर पंचावन्न इंची रंगीत टीव्ही होता, तर बाजूलाच काचेच्या शो केस मध्ये काही फॅमिली फोटो फ्रेम्स ठेवलेल्या होत्या. त्या फ्रेम्स मध्ये सूर्यकुमार साहेबांचे पत्नी सोबत काढलेले लंडन, पॅरिस, रोम, न्यूयॉर्क येथील फोटो होते. सोफ्या समोरील कॉफी टेबलवर फिल्म फेअर, स्टारडस्ट, फेमिना, डेबोनेर, इव्हज विकली अशी रंगीत, गुळगुळीत पानांची मासिके होती. टेबलच्या काचेखालील शेल्फवर “प्ले बॉय”, “लेग शो”, “मेन्स वर्ल्ड”, “प्रायव्हेट”, “सेलेब्रिटी स्किन”, “चिक” अशी उघड्या नागड्या चित्रांनी भरलेली विदेशी पोर्न मॅगझिन्स होती.

हॉलमध्ये एका बाजूला छोटासा मिनी बार होता. तेथील एका शेल्फ वर काचेची नाजूक निमुळती मदिरा पात्रे होती तर बाकी साऱ्या शेल्फ मध्ये विविध ब्रँड्सची व्हिस्की, रम, वाईन, ब्रँडी, बियर होती. शिवास रिगल, जॉनी वॉकर, ओल्ड माँक, रॉयल स्टॅग, मॅकडोवेल नं.1, हवाना क्लब, स्मर्नऑफ, अब्सोल्युट व्होडका अशा प्रसिद्ध ब्रँडच्या बाटल्यांची लेबले बसल्या जागेवरून वाचता येत होती. याशिवाय एका शेल्फ मध्ये डनहिल, मार्लबरो, चेस्टरफिल्ड, कॅवेंदर्स, न्यूपोर्ट, बेन्सन अँड हेजेस अशा विदेशी ब्रँडच्या सिगारेटची पाकिटे ठेवली होती.

मिनी बारच्या भिंतीवर अर्धनग्न ओलेत्या मादक सौंदर्यवतीचे उभ्या आकारातील उत्तान छायाचित्र लावलेले होते. सोफ्यामागे मुख्य भिंतीवर सहा बाय चार फूट अशा मोठ्या आकाराचे शिकार करणाऱ्या आदिवासींचे हुबेहूब जिवंत दृश्य रेखाटलेले महागडे तैलचित्र पाहता क्षणीच लक्ष वेधून घेत होते. विलक्षण सुंदर लाकडाची कलाकुसर असलेले, सिनेमात श्रीमंतांच्या बंगल्यात दाखवितात तसे जाळीदार चेंजिंग पार्टिशन एका कोपऱ्यात ठेवले होते. अनेक उंची नाईट ड्रेस, जीन्स, टी शर्टस, कमरेचे बेल्टस पार्टिशन मागील लाकडी खुंटीवर मिरवत होते. खुंटीखाली आठ दहा प्रकारचे ब्रँडेड चपला बुटांचे जोड ओळीने लावून ठेवलेले होते.

एका भिंतीवर एअर कंडीशनर लावला होता. त्या एसी खाली काचेचा मोठा फिश पाँड होता. त्यातील रंग बदलणारे लाईट्स, खालून वर येणारे पाण्यातील बुडबुडे, आत फिरणारे रंगीबेरंगी मासे यामुळे खोलीतील वातावरण स्वप्नमय वाटत होते. फिश पाँड शेजारीच Sony ची स्टिरिओफोनिक म्युझिक सिस्टीम होती.

स्टडी टेबलवर छोट्याशा शेल्फ मध्ये रॉबर्ट लुडलम, सिडने शेल्डन, हॅरॉल्ड रॉबिन्स, अर्ल स्टॅन्ले गार्डनर या सारख्या तत्कालीन बेस्ट सेलर लेखकांची नॉव्हेल्स होती. आधुनिक डिझाईनचा टेबल लॅम्प, शुभ्र संगमरवरी व्हीनसचा अर्धपुतळा, ताज्या फुलांचा फ्लॉवरपॉट, कंबर, मान डुलवणारी जपानी बाहुली यांनी स्टडी टेबल सजला होता.

टेनिसच्या दोन रॅकेट्स आणि एक गिटार भिंतीची शोभा वाढवीत होते. श्रीमंती, लक्झरी लुक असलेला, लव्हली आर्ट मास्टरपीस भासणारा Boca Do Lobo या जगप्रसिद्ध ब्रँडचा बेल्जियम काचेचा ओव्हल शेपचा आरसा पाहूनच त्याच्या किमतीचा अंदाज येत होता. आरशा शेजारील ओपन पेंड्युलम असलेले स्विझरलँडचे अँटिक व्हिंटेज ककु क्लॉक घर मालकाच्या उच्च चोखंदळ कलासक्त वृत्तीची साक्ष देत होते.

एखाद्या गर्भश्रीमंत रसिक संस्थानिकाच्या रंग महालात बसल्यासारखं मला वाटत होतं. बाजूलाच रेंजर साहेबांचा खराखुरा रंगमहाल म्हणजेच शयनगृह (बेडरूम) होते. परंतु हॉल मधील श्रीमंतीचे हे ओंगळवाणे, बटबटीत प्रदर्शन पाहून त्या रंगमहालात साधं डोकावून पाहण्याची देखील इच्छा आता उरली नव्हती.

एवढ्यात साहेबांचा खानसामा एका ट्रे मध्ये चहा घेऊन आला. ट्रे मध्ये नेबिस्को, पिल्सबरी या सारख्या प्रसिद्ध विदेशी ब्रँडची सँडविच बिस्किटे व कुकीज तसेच जर्मनी, इटलीची मिल्क, व्हाईट आणि डार्क चॉकलेट्स होती. घट्ट दुधाचा अद्रक, लवंग, विलायची, दालचिनी घातलेला मसाला चहा पिताना मला सूर्यकुमार यांच्या अपरिग्रह, साधी राहणी व साम्यवादाच्या दांभिक गप्पा आठवत होत्या.

“हा माणूस दिसतो आणि दाखवतो तसा अजिबात नाही..” हे मॅनेजर साहेबांचे शब्द मला राहून राहून आठवत होते.

कसाबसा चहा संपवून मी उठलो. रेंजर साहेबांचे विलासी जीवन तसेच त्यांचा दुतोंडीपणा व ढोंगी मिथ्याचरण पाहून एकूणच साऱ्या प्रकाराचा उबग येऊन माझा जीव तिथे घुसमटू लागला होता. कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका व माझे व्हिजिटिंग कार्ड खानसाम्याच्या हातात देऊन खिन्न मनाने मी तेथून बाहेर पडलो.

एकीकडे दुनियेतील समस्त माणुसकीवरचा माझा विश्र्वासच उडाला होता तर दुसरीकडे स्वत:च्या बावळट, मूर्ख, भाबडेपणाचा मला प्रचंड राग येत होता..

(क्रमशः)

 

.(मागील लेखांची लिंक).*

1. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान

2. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान-2 

3.*लोकां सांगे ब्रह्मज्ञान-3 

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानका वर खिळवून ठेवतात.

निवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या वेळेत हे अनुभव लिहून काढले आणि त्यांच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केलेले आहेत, आणि ते सर्व अत्यंत लोकप्रिय झाले. बँकेतील, किंवा केवळ मित्रपरिवारातीलच  नाही, तर सर्व स्तरावरील वाचकांचा त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, आणि वाचक त्यांच्या पुढल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहू लागले.  आज त्यांच्याच फेस बुक वर या आधी प्रकाशित झालेल्या एका अशाच कथानकाचे  सादरीकरण या ब्लॉगवर करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे, ही कथा मालिका आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करीत आहोत.

लोकां सांगे ब्रह्मज्ञान-3

forest officer

लेखक

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*लोकां सांगे ब्रह्मज्ञान..*

क्रमशः (३)

सूर्यकुमार यांनी त्यांचा असिस्टंट हवालदार साईनाथला घराची झडती घेण्यास सांगितले. ढेरपोट्या, लालची नजरेचा साईनाथ आपली खाली घसरणारी पँट सावरीत शिकारी कुत्र्याच्या शोधक नजरेने घराचा कानाकोपरा धुंडाळू लागला.

बैठकीच्या खोलीत एक मोठा लाकडी दिवाण ठेवलेला होता. त्या दिवाणाखाली कोपऱ्यात भिंतीला लागून एक खळगा होता. त्या खळग्यातच सागफळ्या लपवून ठेवल्या होत्या. तिथपर्यंत बाहेरील प्रकाश पोहोचत नसल्याने दिवाणाखाली डोकावून पाहिले तरी खाली ठेवलेले सामान अजिबात दिसत नसे.

बेडरूम, स्वयंपाक घर, मागील बाजूचे संडास बाथरूम हे सारं पाहून रिकाम्या हाताने, मान हलवित साईनाथ परतला. स्टूल वर चढून घराच्या तिन्ही खोल्यांचे माळे बघितल्यावर बाहेरील जिन्याने तो गच्चीवर पोहोचला. टेरेस अगदी स्वच्छ आणि मोकळा होता.

“साब, या तो हमारी खबर गलत है, या फिर माल को यहाँ से कहीं दूसरी जगह शिफ्ट कर दिया है..!”

गच्चीवरून खाली येतांच साईनाथने सूर्यकुमार साहेबांना रिपोर्ट दिला.

“खबर तो गलत हो ही नहीं सकती..” असं स्वतःशी पुटपुटत सूर्यकुमार उठून घराबाहेर आले. घराच्या कंपाऊंड मध्ये पिण्याच्या पाण्याची विहीर होती. विहिरीला लागून एक कुलूप लावून बंद केलेली काटक्यांची झोपडी होती. घरमालकाने त्यात निरुपयोगी, अडगळीचे सामान ठेवले होते.

घरमालकाकडून झोपडीची किल्ली मागवून रेंजर साहेबांनी झोपडी उघडली. आत साचलेली प्रचंड धूळ, लटकणारी मोठमोठी कोळीष्टके आणि दार उघडताच घाबरून लगबगीने अडगळीत लपलेले दोन चार सरपटणारे जीव बघतांच आंत पाऊलही न ठेवता त्यांनी झोपडीचा दरवाजा लगेच बंद केला आणि निराश होऊन पुन्हा घरात येऊन बसले.

अपराधी चेहऱ्याने, धडधडत्या छातीने आणि जीव मुठीत धरून बाजूला उभा रहात, निमुटपणे फॉरेस्ट विभागाची ही कारवाई पाहणारा मी, माझे गैरकृत्य अद्याप उघडकीस न आल्याबद्दल मनोमन देवाचे आभार मानीत होतो.

मध्यंतरीच्या काळात माझ्या पत्नीने सूर्यकुमार साहेबांना चहा, नाश्ता घेण्याचा अनेकदा आग्रह केला होता. परंतु “रेड” होत असताना संशयित व्यक्तीचे कोणतेही आदरातिथ्य स्वीकारत नसल्याचे सांगत त्यांनी नम्रपणे नकार दिला होता. मात्र आता, माझ्या घरी सागवानाचा कोणताही अवैध साठा नसल्याचे आढळून आल्यावर त्यांच्यावरचेही दडपण नाहीसे झाल्यासारखे वाटत होते. चेहऱ्यावरील पूर्वीचा ताण पूर्णपणे निवळून त्याजागी नेहमीसारखे निर्मळ, आश्वासक, मनमोकळे हास्य उमलले होते.

स्वयंपाकघरात बायको लहान्या मुलासाठी मसाला डोसा तयार करीत होती. त्याच्या खमंग खरपूस वासाने सूर्यकुमार साहेबांची भूक चाळवली गेली असावी. माझ्या पाठीवर थाप मारीत ते म्हणाले..

“चलो भाई..! ड्युटी तो खतम हुई.. अब दोस्ती की बाते करेंगे..!”

नंतर किचनमध्ये डोकावत बायकोला ऐकू जाईल अशा बेताने मोठ्या आवाजात ते म्हणाले..

“भाभीजी शायद कुछ कह रही थी, चाय-नाश्ते के बारे में..! मै तो अपनी फॅमिली से दूर यहां अकेला ही रहता हूं, रोज बाहर का खाना खाता हूं.. आज मौका है, मौसम है, साथ में दोस्त भी है.. भाभीजी से कह दो, हमारा भी मन करता है कभी कभी घर का बना मसाला डोसा खाने को..!

रेंजर साहेबांचे बोलणे पूर्ण होण्याच्या आतच तत्परतेने ताज्या गरम मसाला डोशाची प्लेट भरून बायकोने त्यांच्या हातात ठेवली.

मनसोक्त, भरपेट नाश्ता करून सूर्यकुमार आणि साईनाथ दोघेही तृप्त झाले. मग चहा घेता घेता अचानक गंभीर होत ते म्हणाले..

“आप दोनों से कुछ जरूरी और थोड़ी सीरियस बात करनी है.. जरा मॅडम को बाहर आनेको कहो..”

मी आणि माझी पत्नी, आम्ही दोघेही आज्ञाधारक शिष्यांसारखे रेंजर साहेबां समोर येऊन बसलो. माझ्या डोळ्यात डोळे घालून एकटक रोखून पहात सूर्यकुमार म्हणाले..

“अपरिग्रह के बारेमे कुछ जानकारी है ? कभी कुछ पढ़ा है ?”

मी होकारार्थी मान हलवली.

आपल्या मालकीच्या पण गरजेपेक्षा अधिक असलेल्या कोणत्याही गोष्टीचा शारीरिकरित्या, मानसिकरित्या व भावनिकरित्या त्याग करणे यालाच अपरिग्रह असे म्हणतात, हे मला ठाऊक होते. रेंजर साहेबांना तसे सांगताच खुश होऊन मान डोलावित ते म्हणाले..

“अगदी बरोबर ! अहिंसा व अपरिग्रह ही जैन धर्माची मुख्य तत्वे आहेत.

महर्षी पतंजलींनी साधनपादात अष्टांग योगाची साधना सांगितली आहे. त्यातील दोन अंगे म्हणजे यम आणि नियम. पतंजलींनी अपरिग्रह हा पाचवा यम मानला आहे. अहिंसासत्यास्तेयब्रह्मचर्यापरिग्रहा यमा: !

महात्मा गांधी यांनी सुद्धा अपरिग्रह व्रताचा पुरस्कार केला. मग सांगा बरं, जीवनात अपरिग्रह अवलंबिल्यामुळे काय फायदा होतो ?”

सूर्यकुमार साहेबांनी लगेच दुसरा प्रश्न विचारला.

“यामुळे व्यक्तीला साधे आयुष्य जगण्यात मदत होते.”

फावल्या वेळातील अतिरिक्त वाचनामुळे मला माहिती असलेली उत्तरे मी पटापट देत होतो.

“अगदी अचूक ! पण फक्त साधे जीवन नाही, तर साधे आणि सुखी जीवन ! अर्थात कसलीही काळजी नसलेले, दुःखमुक्त जीवन..!”

सूर्यकुमार म्हणाले..

यानंतर, गुरुकुलातील एखाद्या तपस्वी ऋषी सारखे धीरगंभीर, अखंड, ओघवत्या प्रासादिक वाणीत त्यांनी चक्क अध्यात्मिक प्रवचन द्यायला सुरवात केली.

“मनुष्यास जे सुख-समाधान लाभते, ते विषयांपासून आणि विषय प्राप्त करून देणाऱ्या साधनांपासून मिळते असे त्याला वाटत असते; म्हणून तो नेहेमी या साधनांचा संग्रह आपल्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक आणि आर्थिक क्षमतेनुसार करीत असतो. हा संग्रह म्हणजेच ‘परिग्रह’. तर आपल्या देहधारणेस अत्यावश्यक नसणाऱ्या अशा साधनांचा संग्रह किंवा परिग्रह न करणे म्हणजे ‘अपरिग्रह’ होय.

आपल्याला आनंद व सुख देणारी साधने मिळविण्यासाठी, ती प्राप्त झाल्यावर सांभाळून ठेवण्यासाठी व त्यांचा वियोग झाला असता होणारे दु:ख सहन करण्यासाठी मनुष्याला बरेच प्रयास, कष्ट करावे लागतात. शिवाय या साधनांचा उपभोग घेत असताना ती नित्य जवळ असावीत अशी इच्छा चित्तात निर्माण होत राहते. या इच्छेने चित्तात दु:ख निर्माण होते.

हे उपभोग्य विषय नित्य उपलब्ध राहावेत यासाठी मनुष्य प्रयत्नशील राहातो आणि भविष्यात त्यांचा वियोग होण्याच्या कल्पनेने सुद्धा त्याला दु:ख होते. भौतिक, उपभोग्य वस्तूंचा परिग्रह हा मनुष्याच्या जीवन योगसाधनेतील अडथळा ठरू शकतो. यासाठी मनुष्याने, साधकाने केवळ देहधारणेस अत्यावश्यक वस्तूंचा संग्रह करावा.

अपरिग्रह साधल्याने हळूहळू उपभोगाच्या साधनांविषयी वैराग्य निर्माण होते. उपभोगाची साधने व शरीर ह्याविषयी साधकाच्या चित्तात वैराग्य निर्माण होते तेव्हा तो स्वत:कडे साक्षीभावाने पाहू लागतो. ‘मी’ आणि ‘माझा देह’ यातील संबंध नश्वर आहे अशी जाणीव त्याच्या मनात निर्माण होते, त्याचा देहाभिमान क्षीण होतो आणि त्याच्या पूर्वजन्मीच्या स्मृती जागृत होतात व त्याला भविष्याचेही ज्ञान होते.

अपरिग्रह ही एक प्रकारची साधना आहे. विषयांचा वारंवार भोग घेतल्याने इंद्रियाची त्याविषयी आसक्ती वाढते. आसक्तीमुळे पुण्य किवा पापरूपी कर्म घडते.

श्रीमद्भगवद्गीतेतही योग्याचे वर्णन करताना त्याने एकांतात राहून अपरिग्रहाचे पालन करीत मन स्थिर ठेवावे व साधना करावी असे म्हटले आहे. असा योगी मातीचे ढेकूळ, पाषाण किंवा सोने यांना सारखेच लेखतो.”

किंचित थांबून मंद हास्य करीत माझ्या पत्नीकडे पहात ते पुढे म्हणाले..

“भाभीजी, मी पाहतो आहे की तुमच्या घरात फ्रिज पासून टिव्ही पर्यंत सर्व आधुनिक सुखसोयींची साधने आहेत. डबल बेड, दिवाण, सोफा, रॉकिंग चेअर, टीपॉय, स्टडी टेबल, स्टूल असे भरगच्च सागवानी फर्निचर तुम्ही गोळा केले आहे. तुमच्या बेडवर फोमच्या महागड्या गाद्या आहेत. कपाटात किंवा बँकेतील लॉकरमध्ये सोन्याचे भरपूर दागिनेही असतील..

खरं सांगा, या साऱ्या वस्तू तुमच्या जवळ नसताना तुम्ही दुःखी होता का ?

तुम्ही एकदा माझ्या येथील बंगल्यावर येऊन बघा. माझ्या घरी साधी खुर्ची सुद्धा नाही. व्यायाम, लेखन, वाचन व अन्य सर्व कामं मी सतरंजीवर बसूनच करतो. रात्री झोपताना खाली जमिनीवर चटई अंथरून त्यावर झोपतो. कामानिमित्त मला भेटायला बंगल्यावर येणाऱ्याला एक तर उभे राहूनच बोलावे लागते किंवा माझ्यासारखे खाली सतरंजीवर बसावे लागते. माझ्या गरजा मी अत्यंत कमी ठेवल्या आहेत. त्यामुळेच मला कसलाही मोह स्पर्श करू शकत नाही आणि मी सदैव निर्भय, चिंतामुक्त व आनंदी राहतो.”

शेवटी आम्हा दोघांना हात जोडत नम्रपणे ते म्हणाले..

“माफ करा, तुम्हाला उपदेश करण्या इतकी माझी योग्यता नाही. तुम्ही सुज्ञ, सुसंस्कृत, सुजाण आहात. आपण सारे या देशाचे जबाबदार नागरिक आहोत. आपल्या निस्पृह, साध्या राहणीतून आपण समाजाला आदर्श घालून दिला पाहिजे असे मला वाटते.

आपण नोकरी निमित्त ज्या भागात आलो आहोत तो भाग नक्षलपीडित आहे. साधन संपत्तीच्या असमान वितरणामुळे ही नक्षलवादाची समस्या निर्माण झाली आहे. आपण सर्वांनी अपरिग्रहाचे पालन केल्यास वर्तमान आणि भविष्य काळातील साधन संपत्ती विषयक असमतोलाच्या समस्येचे निराकरण होण्यास निश्चितच काही अंशी मदत होऊ शकते.”

एवढं बोलून सूर्यकुमार साहेब परत जाण्यास निघाले. मी आणि माझी पत्नी, दोघेही अद्याप भारावलेल्या स्थितीतच होतो. सूर्यकुमार साहेबांचे सच्चे, तळमळीचे शब्द आमच्या काळजाला भिडले होते. सागवानाचा अनावश्यक मोह धरल्या बद्दल आता आम्हाला स्वतःचीच लाज वाटत होती.

योगायोगाने त्यासुमारासच म. गांधींचे “My experiments with truth” हे इंग्रजी पुस्तक मी वाचीत होतो. कोणतीही लाज किंवा संकोच न बाळगता आपल्या चुकांची जी कबुली त्या पुस्तकात म. गांधींनी दिली आहे ती वाचून माझ्या मनातील गांधींबद्दलचा पूर्वग्रह बऱ्याच अंशी दूर होऊन त्यांच्या बद्दलचा आदरही वाढला होता.

विशेषत: दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या अशिलांनी केलेली कर चुकवेगिरी त्यांना सरकार दरबारी कबूल करायला लावून, योग्य तो दंड भरून भीतीतून व अपराधीपणाच्या जाणिवेतून त्यांची मुक्तता गांधीजींनी केली, हे वाचून मला सत्याची महत्ता चांगलीच पटली होती.

आताही सूर्य कुमार साहेबांसमोर आपली चूक कबूल करावी अशी वारंवार उर्मी दाटून येत होती. परंतु तसे करण्याचे धाडस मात्र होत नव्हते.

घराबाहेर पडून रेंजर साहेब जीप मध्ये बसले. आणि मला जवळ बोलावून माझा हात हातात धरून हलक्या आवाजात म्हणाले..

“हमारी खबर पक्की थी, इसपर मुझे पुरा यकिन है ! दोस्त होने के नाते, छुट्टी के दिन, सिव्हिल ड्रेस पहन कर मैंने रेड कंडक्ट की, ताकि किसी को पता न चले, आपकी बदनामी न हो और आपकी नौकरी भी सलामत रहे ! लेकिन आप बहुत चालाक निकले.. पहले ही लकड़ी कहीं और छुपा दी..! ठीक है, लेकिन मैने जो कुछ कहा है उसपर संजीदगीसे विचार करना !”

रेंजर साहेबांनी हात उंचावून दारात उभ्या असलेल्या माझ्या पत्नी व मुलाला बाय बाय केला आणि जीप सुरू झाली.

जीप थोडी पुढे गेली न गेली तोंच..

दाबून ठेवलेला पश्चातापाचा ज्वालामुखी उफाळून एकाएकी माझा आतापर्यंत महत्प्रयासाने रोखून धरलेला संयमाचा बांध अचानक फुटला आणि सारं धैर्य एकवटून मी जोरात ओरडलो..

“ठहरो साब..! वो लकडी इधर, मेरे घर में ही है..!!”

(क्रमशः)

 

.(मागील लेखांची लिंक).*

1. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान

2. *लोकां सांगे ब्रह्मज्ञान-2 

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानका वर खिळवून ठेवतात.

निवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या वेळेत हे अनुभव लिहून काढले आणि त्यांच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केलेले आहेत, आणि ते सर्व अत्यंत लोकप्रिय झाले. बँकेतील, किंवा केवळ मित्रपरिवारातीलच  नाही, तर सर्व स्तरावरील वाचकांचा त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, आणि वाचक त्यांच्या पुढल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहू लागले.  आज त्यांच्याच फेस बुक वर या आधी प्रकाशित झालेल्या एका अशाच कथानकाचे  सादरीकरण या ब्लॉगवर करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे, ही कथा मालिका आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करीत आहोत.

लोकां सांगे ब्रह्मज्ञान-2

Indian forest service

लेखक

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*लोका सांगे ब्रह्मज्ञान..-2*

 

क्रमशः.. (२)

उतनुर परिसरातील जंगलात सागाचे घनदाट जंगल होते. जाडजूड बुंध्याची उंच सरळसोट वाढलेली ही झाडे अनेकदा सोसाट्याच्या वादळात उन्मळून पडत. कधी कधी त्यांच्या वर वीज पडून ती अर्धवट जळून तुटून जात. अशी ही उन्मळून पडलेली, वीज पडून अथवा वणव्यात जळून, तुटून पडलेली सागाची झाडे वर्षानुवर्षे तशीच निर्जन, सुदूर अरण्यात पाण्यापावसात भिजत पडून रहात.

जंगलात राहणारे आदिवासी पोटापुरते धान्य पिकविण्यासाठी थोडी फार शेतीही करत. त्यासाठी त्यांना जंगलात मोकळी, सपाट जमीन हवी असे. मग कधी कधी जंगलातील एखादा विरळ झाडी असलेला भूभाग निवडून रातोरात त्यावरील सर्व छोटे मोठे सागवृक्ष हे आदिवासी मुळापासून तोडून टाकत. मग मोकळ्या झालेल्या जमिनीच्या तुकड्यावर ते शेती करत. अशाप्रकारे नवीन जमीन संपादन करण्याला ते “जमीन मारणे” असे म्हणत.

या नवीन जमिनीवर काही वर्षे पिके घेतल्यावर कालांतराने हळूहळू त्या जमिनीचा कस आपोआप कमी होत असे. त्यामुळे या आदिवासींना शेतीसाठी पुन्हा नवीन जमिनीचा शोध घ्यावा लागत असे. मग पुन्हा सरसकट वृक्षतोड करून ते नवीन जमीन मारत असत. या सर्व प्रकारात मोठ्या प्रमाणात सागाची झाडे वारंवार तोडली जात. आदिवासींची मूलभूत गरज जाणून वन विभागही या प्रकाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असे.

हे तुटलेले वृक्ष उचलून नेण्याइतपत साधन सामुग्री, वेळ आणि मनुष्यबळ वन विभागाकडे क्वचितच असायचे. मग आदिवासीच हे सागाचे लांबलचक भरभक्कम ओंडके खांद्यावर उचलून त्यांच्या वस्तीत नेऊन टाकायचे. वेळ मिळेल तसे या ओंडक्यांचे तुकडे करून आदिवासी हे लाकूड गावकऱ्यांना मातीमोल भावात विकायचे. चोरटे फर्निचर करणारे कारागीरही या आदिवासीं कडूनच जवळ जवळ फुकटातच सागाचे लाकूड प्राप्त करायचे.

सागवानाच्या लाकडाला बाहेर सोन्याचा भाव होता. उतनुर भागातील सागवान उच्च प्रतीचे असल्याने आसपासच्या गावांतून या लाकडाला भरपूर मागणी असायची. काळ्या शिसव (Indian Rosewood) वृक्षाची काही तुरळक झाडेही उतनुरच्या जंगलात होती. ह्या वृक्षाचे जड, काळे, दर्जेदार शिसवी लाकूड दूरवर खूप प्रसिद्ध होते. सागवाना बरोबरच ह्या शिसवी लाकडाचीही चोरटी वाहतूक आसपासच्या गावांत व्हायची. या तस्करीला आळा घालण्यासाठी डिव्हीजनल फॉरेस्ट ऑफिस आणि फॉरेस्ट रेंज ऑफिस अशी वन विभागाची दोन कार्यालये उतनुर गावांत होती.

पी. सूर्यकुमार नावाचा सहा फूट उंच, सुदृढ, गोरा पान, सरळ धारदार नाक असलेला रुबाबदार, तरुण IFS अधिकारी, फॉरेस्ट रेंज ऑफिसर म्हणून नुकताच उतनुरला जॉईन झाला होता. अतिशय धडाडीचा, कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्याने अल्पावधीतच चांगला लौकिक प्राप्त केला होता.

चोरट्या सॉ मिल मधून सागवानाच्या फळ्या कापून त्यांची ऑटो रिक्षातून जवळच्या गावांत वाहतूक करण्याचा एक नवीनच किफायतशीर धंदा तेंव्हा लाकूड तस्करांनी उतनुर परिसरात सुरू केला होता. तयार फर्निचरही या ऑटो रिक्षातून सहजपणे कुठेही पोहोचते केले जात असे. रेंज फॉरेस्ट ऑफिसर सूर्यकुमार यांचा अधिकांश वेळ व शक्ती या चोरट्या रिक्षा वाहतुकीला पायबंद घालण्यातच खर्च होत असे. अनेक कारागीर सुतारांनी स्वतःच्या रिक्षा खरेदी करून त्या जंगलात नेऊन ठेवल्या होत्या. मागणी नुसार फर्निचर, फळ्या तयार करून रिक्षात भरून रातोरात ते स्वतःच त्या मालाची आसपासच्या गावांत डिलिव्हरी करायचे.

ज्यांची सुतारकामाची उपकरणे, यंत्रे, हत्यारे जप्त करण्यात आली आहेत, अशा कारागीर लाकूड तस्करांचे पुनर्वसन (Rehabilitation) करण्यासाठी अर्थ सहाय्याच्या विविध योजना आमच्या बँकेमार्फत राबविल्या जात.

एकात्मिक आदिवासी विकास महामंडळ (ITDA), वन विभाग (Forest Dept) व जिल्हा उद्योग केंद्र (DIC) यांच्यातर्फे अशा योजनांना पर्याप्त बीज भांडवल (Seed money) व अनुदान (Subsidy) उपलब्ध करून दिले जात असे.

पर्यायी उद्योग धंद्यासाठी अर्थसहाय्य घेण्यास इच्छुक असलेल्या लाकूड तस्करांची मुलाखत घेण्यासाठी फिल्ड ऑफिसर या नात्याने बँकेचा प्रतिनिधी म्हणून मलाच जावे लागत असे. अशाच काही लाकूड तस्करांची कर्ज मंजुरी पूर्वीची मुलाखत घेण्यासाठी एकदा गेलो होतो. या सर्वांनी रिक्षा व्यवसायासाठी कर्ज मागितले होते.

“कोणत्या मार्गावर रिक्षा चालवणार ?”, “भाडे कोणत्या दराने आकारणार ?”, “दिवसाला किंवा महिन्याला किती कमाई होणार ?”, “कर्जाची परतफेड कशी करणार ?”

यापैकी कोणत्याही प्रश्नाचे कुणाजवळ ही उत्तर नव्हते.

“मग रिक्षा कशासाठी खरेदी करणार ?”

या प्रश्नाचे मात्र सर्वांनीच निरागसपणे, खरेखुरे आणि एक सारखे उत्तर दिले..

“फर्निचर-फळ्यांची डिलिव्हरी करण्यासाठी..!”

तस्करांचे हे उत्तर ऐकून इंटरव्ह्यू पॅनल मधील आम्ही सर्वांनी कपाळावर हात मारून घेतला.

मध्यंतरीच्या काळात माझा मेव्हणा उतनुरला येऊन गेला. त्याला आमचा लाकडी सोफा सेट खूपच आवडला. कसंही करून माझ्यासाठी असा एक सेट विकत घेऊन तो बुलढाण्याला पाठवून द्याच.. असे तो परत जाताना वारंवार जतावून, विनवून गेला.

त्याच्या आग्रहास्तव एक सागवानी सोफा सेट खरेदी करून तो थेट सकाळी सातच्या उतनुर ते आदिलाबाद बस मध्ये चढवला. सुदैवाने उतनुर ते आदिलाबाद हा पन्नास किलोमीटरचा दीड तासाचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडला. आदिलाबादला बस स्टँड वरच वन विभागाची चौकी होती. परंतु त्यांच्या कडूनही कसलीच चौकशी किंवा आडकाठी झाली नाही.

आदिलाबादहून फक्त वीस किलोमीटर वर महाराष्ट्राची सीमा आहे. “आदिलाबाद ते पांढरकवडा” ह्या महाराष्ट्रात जाणाऱ्या बसमध्ये सोफा चढवला. पंचेचाळीस किलोमीटरचा हा प्रवास तासाभराचा होता. पैनगंगा नदी पार केल्यावर पिंपळखुटा इथे महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस झाली आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला.

पांढरकवडा ते बुलढाणा बसची अगोदरच चौकशी करून ठेवली होती. ती बस दुपारी अकरा वाजता होती. योग्य ते लगेज चार्जेस भरून बसमध्ये सोफा चढवला. ड्रायव्हर कंडक्टरला चहा पाण्यासाठी थोडे पैसे दिले आणि बुलढाण्याला मेव्हणा सोफा उतरवून घेईल असे सांगितले. अशाप्रकारे सोफा संध्याकाळ पर्यंत बुलढाण्याला पोहोचता झाला.

उतनुरला याआधी किरवानी नावाचे एक चाणाक्ष बुद्धीचे मॅनेजर होते. त्यांचे घर हैद्राबादला होते. सागवानाच्या अशा भरपूर फळ्या त्यांनी जमा करून ठेवल्या होत्या. त्या फळ्यांची बाजारभावाने किंमत कित्येक लाखात होती. या फळ्या हैद्राबादला पोहोचविण्यासाठी त्यांनी एक अनोखी शक्कल लढविली.

आंध्र प्रदेशातील आदिवासी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा त्या सुमारास हैद्राबाद येथे होता. किरवानी साहेबांनी एका ट्रक मध्ये सर्व फळ्या व्यवस्थित रचल्या. मग त्यावर गाद्या टाकून त्या फळ्या झाकून टाकल्या. जंगली पारंपरिक वेशभूषेतील वीस पंचवीस आदिवासी स्त्रीपुरुषांना वाद्यांसहित ट्रकमधील गाद्यांवर बसविले. मेळाव्याची बॅनर्स तयार करून ती ट्रकच्या चारी बाजूंना बांधली.

“मेळाव्यासाठी हैद्राबादला जात आहोत..” असे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगत वाद्ये वाजवित, गाणी गात, नृत्य करीत हे आदिवासी उतनुर जंगल क्षेत्रातील सर्व चेक पोस्ट्स पार करीत हैद्राबादच्या रस्त्याला लागले. कडक तपासणीचा एरिया पार झाल्यावर ट्रकच्या मागोमाग कार मधून येणाऱ्या किरवानी साहेबांनी मग रस्त्याच्या कडेच्या एका ढाब्यावर ट्रक थांबवून सर्व आदिवासींना ट्रक मधून खाली उतरविले. ट्रक वरील बॅनर्स काढून टाकली. आदिवासींना ढाब्यावर पोटभर जेऊ खाऊ घालून खर्चासाठी थोडे फार पैसे देऊन बसने उतनुरला परत पाठवून दिले. वन विभागाला जराही संशय येऊ न देता अशा प्रकारे किरवानी साहेबांनी लाखोंचे सागवानी लाकूड हैद्राबादला पोहोचते केले.

ज्यावेळी एखाद्या कर्मचाऱ्याची बदली उतनुर बाहेर अन्यत्र होत असे तेंव्हा त्याला ऑफिसचे ट्रान्स्फर लेटर दाखविल्यावर हे घरगुती वापराचे तयार फर्निचर कायदेशीरपणे उतनुर बाहेर नेता येत असे. बदलीची ऑर्डर व रिलिव्हिंग लेटर पाहिल्यावर चेक पोस्ट वर जास्त चौकशी होत नसे. अर्थात सागवानी फळ्यांची वाहतूक करण्यास मात्र सर्वांनाच सर्व काळ सक्त मनाई होती.

आसपासचे गांवकरी सागवानी लाकडाचे चौरंग, स्टूल, खेळणी, मेकप-बँगल बॉक्स, शिसवी देव्हारे अशा विविध वस्तू उतनुरच्या तस्कर सुतारांकडून विकत घेत. मात्र त्या लाकडी वस्तू घेऊन आपल्या गावी जाताना वन विभागाकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत असे. (काय करतील बिचारे..! ट्रान्स्फर लेटर कुठून आणणार ते ?) वन कर्मचाऱ्यांच्या मूड नुसार कधी कधी किरकोळ दंडाची पावती फाडून काम भागत असे तर कधी मुद्देमाल जप्त होऊन वर दंडही भरावा लागत असे. सराईत व धंदेवाईक लोकांवर खटलाही भरला जायचा.

माझा उतनुर मधील कार्यकाळ संपत आला आणि बदलीचे वेध लागले तेंव्हा जाता जाता इतर सर्वांप्रमाणेच आपणही थोड्याशा सागवानी फळ्या येथून घेऊन जाव्या असा मोह मनात जागू लागला. आमच्या मॅनेजर साहेबांचीही लवकरच बदली होणार होती. घरातील नित्य वापराच्या फर्निचर व्यतिरिक्त एक खोलीभर अतिरिक्त सागवानी फर्निचर त्यांनीं आधीच गोळा करून ठेवले होते. हेड कॅशियर व अन्य एक दोन कर्मचाऱ्यांची ट्रान्स्फरही due होती. ते देखील जाण्यापूर्वी जमेल तितके फर्निचर, फळ्या विकत घेऊन ठेवण्याचा विचार करीत होते.

…अशातच एक दिवस बँकसमोरील चहाच्या टपरीवर काम करणारा रघु नावाचा नोकर हेड कॅशियर साहेबांकडे एक आकर्षक ऑफर घेऊन आला.

“स्वच्छ, गुळगुळीत, दर्जेदार आणि जाडजूड सागवानी फळ्यांनी भरलेली एक रिक्षा अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असून रोख पैसे दिल्यास एक दोन दिवसात माल घरपोच केला जाईल..” अशी ती ऑफर होती.

खरं म्हणजे हेड कॅशियर साहेबांनीच समोरच्या हॉटेल वाल्याला कुठे सागाच्या फळ्या मिळतील का ? याबद्दल विचारले होते. ते ऐकूनच त्याचा नोकर रघु ही ऑफर घेऊन आला होता. अनायासे चालून आलेली ही संधी हेड कॅशियर दवडणार नव्हते. त्यांनी ताबडतोब रघुची ऑफर स्वीकारली. त्यानंतर मॅनेजर साहेब, मी व अन्य दोन under transfer स्टाफला त्यांनी या ऑफर बद्दल सांगितले. “जर आपण पाच जणांनी मिळून या फळ्या वाटून घेतल्या तर सर्वांना दर्जेदार लाकूड स्वस्तात आणि घरपोच मिळेल..”, असेही ते म्हणाले.

विनासायास घरपोच मिळणारं असं दर्जेदार सागवान प्रत्येकालाच हवं होतं. ताबडतोब सर्वांनी पैसे गोळा करून ते रघुच्या स्वाधीन केले. पैसे खिशात ठेवून घेत रघु म्हणाला..

“उद्या गावातील लाईट गेल्यानंतर रात्री आठच्या सुमारास रिक्षा आळीपाळीने प्रत्येकाच्या घरासमोर उभी राहील. रिक्षात सारख्या मापाच्या पन्नास फळ्या असतील. प्रत्येकाने दहा दहा फळ्या आपापल्या घरात सुरक्षित जागी ठेवून घ्याव्यात. घर दाखविण्यासाठी व फळ्या ठेवायला मदत करण्यासाठी रिक्षासोबत मी ही असेन..”

रघुने सांगितल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजल्या नंतर साग फळ्यांनी भरलेली रिक्षा आमच्या घरासमोर उभी राहिली. प्रत्येकाने आपापल्या दहा फळ्या रिक्षावाल्याकडून उतरवून घेऊन घरातील आधीच मोकळ्या केलेल्या जागी रघुकरवी व्यवस्थित ठेवून घेतल्या.

त्यानंतर आठ दहा दिवस शांततेत गेले. आम्ही सारे दुपारी चहा पिण्यासाठी समोरच्या टपरीवर जायचो तेंव्हा चांगले लाकूड मिळवून दिल्याबद्दल आवर्जून रघुचे आभार मानायचो.

दोन आठवड्यानंतर रविवारच्या दिवशी सकाळी घरी गरमा गरम मसाला दोशाचा नाश्ता करीत असताना दारासमोर जीप थांबल्याचा आवाज आला. बाहेर हलका झिमझिम पाऊस पडत होता.

“सुटीच्या दिवशी भर पावसात एवढ्या सकाळी घरी कोण आलं असावं बुवा ?” असा विचार करीतच दार उघडलं. जीप मधून साध्या वेशातील फॉरेस्ट रेंजर IFS पी. सूर्यकुमार उतरत होते.

“वेलकम् सर..! आईये..!”

म्हणत मी त्यांचं स्वागत केलं. सूर्यकुमार माझ्या चांगल्याच परिचयाचे होते. लाकूड तस्करांच्या कर्ज मंजुरीच्या अनेक मुलाखती आम्ही दोघांनी मिळूनच घेतल्या होता.

“आज छुट्टी के दिन.. इतने सवेरे.. इधर किस कामसे आए थे..?”

सूर्यकुमार आणि त्यांचा सहाय्यक हवालदार सोफ्यावर स्थानापन्न झाल्यावर मी हसत विचारलं.

काही कामानिमित्त सूर्यकुमार या भागात आले असावेत आणि परत जाताना ते सहज माझ्या घरी आले असावेत असाच माझा समज होता.

“आप ही के घर आया था..! सॉरी सर, बट धिस इज फॉरेस्ट डिपार्टमेंट रेड.. !! वुई हॅव काँक्रिट इन्फर्मेशन दॅट यू हॅव स्टोअर्ड इल्लीगल स्टॉक ऑफ टीकवुड प्लॅन्कस्.

वुई हॅव ऑलरेडी रेडेड दि हाऊसेस ऑफ युवर आदर फोर बँकमेट्स इन्क्लुडिंग ब्रँच मॅनेजर.. अँड कॉन्फिस्केटेड ए ह्यूज क्वांटिटी ऑफ सच स्टॉक.”

सूर्यकुमार यांच्या तोंडचे हे शब्द ऐकताच मी हादरून गेलो. क्षणभर मतीच गुंग झाली. सारं घर स्वतःभोवती गरगर फिरतंय असं वाटू लागलं…

(क्रमशः)

*लोकां सांगे ब्रह्मज्ञान.(मागील लेखाची लिंक).*

 

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानका वर खिळवून ठेवतात.

निवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या वेळेत हे अनुभव लिहून काढले आणि त्यांच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केलेले आहेत, आणि ते सर्व अत्यंत लोकप्रिय झाले. बँकेतील, किंवा केवळ मित्रपरिवारातीलच  नाही, तर सर्व स्तरावरील वाचकांचा त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, आणि वाचक त्यांच्या पुढल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहू लागले.  आज त्यांच्याच फेस बुक वर या आधी प्रकाशित झालेल्या एका अशाच कथानकाचे  सादरीकरण या ब्लॉगवर करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे, ही कथा मालिका आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करीत आहोत.

activa ceiling fan
Check the prices of Ceiling Fans on Amazon
havels ceiling fan
Havels Fans on Amazon

लोकां सांगे ब्रह्मज्ञान-1

kotnis-loka-sange

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*लोका सांगे ब्रह्मज्ञान..*

ऑफिसर पदावर पदोन्नती झाल्यावर तत्कालीन आंध्र प्रदेशच्या आदिलाबाद जिल्ह्यातील स्टेट बँकेच्या “उतनुर” नामक शाखेत रुजू झालो, तेंव्हाचा हा प्रसंग..!

आदिलाबाद हा महाराष्ट्राच्या सीमेलगतचा घनदाट जंगलाने वेढलेला जिल्हा. नक्षल पीडित, आदिवासी बहुल असल्याने अत्यंत मागासलेला आणि  अविकसित.. रेल्वे, रस्ते, वीज, दळण वळणाची साधने, पिण्यायोग्य पाणी अशा मूलभूत सोयी सुविधांचाही या भागात अभावच होता.

उतनुरला बिऱ्हाड शिफ्ट करण्यासाठी सात दिवसांचा “जॉइनिंग टाईम” घेऊन निघालो तेंव्हा शाखेतील प्रत्येकाने एकच सल्ला दिला की.. “साब, आते वक्त पलंग, सोफा, अलमारी, डायनिंग टेबल, दिवान, स्टूल ऐसा कोई भी फर्निचर साथ मत लाना.. सिर्फ स्कूटर, टीव्ही, फ्रिज, चादर गद्दे, गॅस, कपडे और घरेलु बर्तन इतनाही सामान लेके आना..”

सर्व जण वारंवार तेच ते बजावून सांगत असल्यामुळे सुरवातीला त्याचं नवल वाटलं. पण नंतर जेंव्हा समजलं की इथे अस्सल सागवानी लाकडाचं सर्व प्रकारचं फर्निचर अक्षरशः नाममात्र किंमतीत अगदी घरपोच आणून मिळतं, तेंव्हा मात्र त्यांचं म्हणणं पटलं. स्टाफचा सल्ला मानून, बायकोचा आग्रह न जुमानता, परत येताना केवळ फ्रिज, स्कूटर, कपडे व थोडी भांडीकुंडी एवढंच सामान सोबत घेऊन आलो.

येताना आंध्र प्रदेशच्या निजामाबाद व आदिलाबाद जिल्ह्यात प्रवेश करताच जागोजागी विविध प्रकारचे चेक पोस्ट्स लागले. परिवहन विभाग (RTO), मार्केटिंग कमिटी, टॅक्स (Goods) चेक पोस्ट असे तुरळक नाके वगळता अन्य सर्व तपासणी नाके हे वन विभागाचे (Forest Deptt.) होते. आम्ही जंगल क्षेत्राच्या आत प्रवेश करत असल्याने आम्हाला कुणीही कुठेच अडवलं नाही. तेथून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची मात्र कसून तपासणी होताना दिसत होती.

मी बायको मुलांसहित सर्व सामान घेऊन आल्याचं समजताच मॅनेजर साहेबांनी सामान लावण्यात मदत करण्यासाठी सकाळीच बँकेतील दोन चपराशी घरी पाठवून दिले. त्यांच्या मदतीने अवघ्या दोन तासांतच सर्व सामान लावून झालं. त्या दिवशी रविवार होता. दुपारी मॅनेजर साहेबांकडे सहकुटुंब जेवायला बोलावलं होतं.

जेवण झाल्यानंतर मॅनेजर साहेब म्हणाले.. “आपको सिर्फ आज का एक दिन नीचे फर्शपर गद्दा बिछाकर सोना पड़ेगा.. अभी मेरे घर का फर्नीचर देखो और किस टाईप का पलंग और सोफा चाहिए वो बता दो.. कल सुबह तक फर्नीचर घर में पहुंच जाएंगा..!”

मॅनेजर साहेबांच्या घरातील तीन चार प्रकारच्या पलंग व सोफासेट पैकी एक डिझाईन बायकोच्या सल्ल्याने पसंत करून घरी परतलो. दीर्घ प्रवासामुळे आधीच शरीर खूप थकलं होतं. त्यामुळे रात्री बिछान्यावर पडल्या पडल्याच गाढ झोप लागली.

सुमारे बारा वाजता दारावर टक टक झाली.

“साब, मै रमेश.. ! दरवाजा खोलो.. आपका फर्नीचर आ रहा है..”

बाहेरून बँकेचा चपराशी रमेश दबक्या आवाजात बोलत होता.

डोळे चोळतच मी दार उघडलं. हातात टॉर्च आणि रुमालाने संपूर्ण चेहरा झाकलेला रमेश पायऱ्यांवर उभा होता. नेहमी प्रमाणे गावातली वीज केंव्हाच गुल झाली होती. बाहेर सर्वत्र मिट्ट काळोख होता. घरामागे विस्तीर्ण, काटेरी, उजाड माळरान होतं. त्यामागे काही शेतं आणि लहान डोंगर होते. हातातील टॉर्च उंचावत रमेशने त्या दिशेने एक दोन वेळा प्रकाशझोत सोडला.

थोड्याच वेळात तिकडून घुबडा सारख्या निशाचर पक्ष्यांचे खुणेचे घूत्कार ऐकू आले. रमेशचे डोळे आनंदाने चमकले.

“वो आ रहे है..! कल दोपहरको ही आपका घर दिखाया था उनको..”

रमेशचं बोलणं संपतं न संपतं तोच अंधारातून कमरेला फक्त छोटंसं फडकं बांधलेले चार पाच उघडेबंब आदिवासी तरुण सावध नजरेने इकडे तिकडे पाहत  घराजवळ येताना दिसले. मांजरीच्या पावलांनी, दबकत दबकत येणाऱ्या त्या तरुणांच्या डोक्यावर लाकडांच्या मोळ्या होत्या. रमेशने त्यांच्याकडून त्या मोळ्या घरात ठेवून घेतल्या.

“साब, इनको कुछ बक्षीसी, इनाम दे दो..”

रमेश म्हणाला..

मी शंभराची नोट काढली. ते पाहताच..

“अरे साब, ऐसे इनकी आदत मत बिगाड़ो.. रहने दो.. मै ही देता हूं..!”

असं म्हणत रमेशने आपल्या खिशातून दहा दहा रुपयांच्या तीन चार नोटा काढल्या आणि “ये लो लच्छु..!” म्हणत त्यांच्या म्होरक्याच्या हातात ठेवल्या.

त्या म्होरक्याने खुश होत मला व रमेशला सलाम ठोकला, कमरेला खोचलेली एक छोटीशी कापडी थैली रमेशच्या हातात ठेवली आणि मागे वळून आल्या वाटेने जात पाहता पाहता आपल्या साथीदारांसह अंधारात दिसेनासा झाला.

ती कापडी थैली माझ्या कडे देत रमेश म्हणाला..

“साब, इसमे पलंग सोफा के नट बोल्ट है.. कल सुबह घर आके सारा फर्निचर फिट कर दूंगा..”

दुसऱ्या दिवशी घरी येऊन रमेशने त्या लाकडाच्या मोळ्या सोडल्या. ते सोफा व पलंगाचे फोल्डिंग पार्टस् होते. नट बोल्ट फिट केल्यावर आकर्षक आकाराचा सोफा व पलंग तयार झाला. सोफा सेटचे बाराशे रुपये आणि पलंगाचे सातशे रुपये असे फक्त एकोणीसशे रुपये रमेशने मागितले तेंव्हा..

“एवढं स्वस्त ? कसं काय परवडतं बुवा त्यांना..?”

असे आश्चर्योदगार अभावितपणेच माझ्या तोंडून बाहेर पडले.

त्यावर रमेश म्हणाला..

“ये सिर्फ कारागीर की मजदूरी के पैसे है.. सागवान की लकडी तो यहां मुफ्त ही मिलती है.. अगर घरमे जलाने के लिये चाहिए तो बता देना.. दो चार रुपये देने पर कोई भी ढेर सारी सागवानी लकडी घर लाके देगा..”

अशाप्रकारे उतनुरला आल्या आल्या एका दिवसातच आम्ही “साग फर्निचर संपन्न” बनलो. हळू हळू डायनिंग टेबल, रॉकिंग चेअर (झुलती खुर्ची), दिवाण, स्टडी टेबल, वेगवेगळ्या आकाराची स्टूलं.. असं विविध प्रकारचं सागवानी फर्निचर “मध्यरात्रीच्या साहसी, थरारक, चोरट्या वाहतुकी मार्गे” आमच्या घरात दाखल झालं.

तसं पाहिलं तर, सागवानी लाकडाचा बोटभर तुकडाही जर कुणी जंगला बाहेर नेला, तर तो मोठा अपराध मानून फॉरेस्ट डिपार्टमेंट अशा व्यक्ती विरुद्ध कठोर कारवाई करीत असे. जबर आर्थिक दंड अथवा फौजदारी गुन्हा किंवा दोन्ही.. अशी ती कारवाई असे. परंतु त्याच लाकडाचं फर्निचर बनवून जर कुणी आपल्या घरात वापरलं तर मात्र अशा व्यक्तीविरुद्ध वन विभाग कोणतीच कारवाई करीत नसे. वन विभागाच्या कायद्यातील या पळवाटेचा फायदा घेऊन त्या भागातील रहिवासी घरोघरी सागवान लाकडाचा उदंड वापर करीत.

त्या भागातील गरीब, निर्धन आदिवासी झोपड्या बांधताना सहज व मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या सागवानी लाकडांचाच वापर करीत. बहुदा त्यामुळेच वन विभागाने सागवानाच्या घरगुती वापरासाठी सर्व नागरिकांना अशी सवलत दिली असावी.

उतनुर गावातील सर्वच सिमेंट काँक्रिटच्या घरांची खिडक्या दारे अस्सल सागवानी लाकडांचीच होती. याशिवाय लहान मुलांचे लाकडी पाळणे, झोपाळा (बंगई), दुकाने, हॉटेल यातील टेबल खुर्च्या, काऊंटर, शो केसेस हे सारं सागवानीच असे. काही श्रीमंतांनी तर सागवान वापरून दोन तीन मजली लाकडी महाल बांधले होते, ज्यात संपूर्ण लाकडी छत, लाकडी जिने व प्रचंड विशाल लाकडी दिंडी दरवाजे होते.

आश्चर्य आणि विनोदाचा भाग म्हणजे सागवानी लाकडाचे फर्निचर बनविण्यावर वन विभागाचे कडक निर्बंध होते. त्यामुळे ही सुतार मंडळी खोल जंगलात लपून छपून फर्निचर तयार करीत असत.  वन विभाग अधून मधून त्यांच्यावर धाडी टाकून त्यांची हत्यारे जप्त करीत असे. त्यांना तडीपारही (हद्दपार) करीत असे.

मात्र एकदा का असे वन विभागाची नजर चुकवून तयार केलेले फर्निचर चोरट्या मार्गाने गावात दाखल होऊन एखाद्या रहिवाश्याच्या घरात विराजमान झाले, की मग वन विभाग त्याच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करू शकत नसे. त्यामुळे असे फर्निचर घरात दाखल होण्यापूर्वीच धाड टाकून ते विकणारा व खरेदी करणारा अशा दोघांवरही कारवाई करण्याचा वन विभाग आटापिटा करीत असे.

जो कोणी वन विभागाला अशा अवैध फर्निचर खरेदी विक्रीची आगाऊ खबर देईल त्याला वन विभागातर्फे रोख इनाम दिले जाई. या बक्षिसाला चटावलेले वन विभागाचे अनेक गुप्त खबरे गावातील सामान्य नागरिकांमध्ये बेमालूमपणे वावरत होते.

… असाच एक धूर्त, साळसूद गुप्त खबऱ्या स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांवर बारीक नजर ठेवून होता, ज्याची आम्हा कुणालाच अजिबात खबर नव्हती..

          🙏🌹🙏

(क्रमशः)

kotnis

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानका वर खिळवून ठेवतात. 

निवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या वेळेत हे अनुभव लिहून काढले आणि त्यांच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केलेले आहेत, आणि ते सर्व अत्यंत लोकप्रिय झाले. बँकेतील, किंवा केवळ मित्रपरिवारातीलच  नाही, तर सर्व स्तरावरील वाचकांचा त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, आणि वाचक त्यांच्या पुढल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहू लागले.  आज त्यांच्याच फेस बुक वर या आधी प्रकाशित झालेल्या एका अशाच कथानकाचे  सादरीकरण या ब्लॉगवर करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे, ही कथा मालिका आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करीत आहोत.

Who caught whom?- चोरीचा मामला

people-cinema-watching-movie_23-2151005467.png

Guest Article by Shri V.D.Bhope.

इंग्रजी सिनेमा पाहतांना पकडले …..

( पण कुणी कुणाला ? )

———————

मित्रांनो
साधारणपणे १९६८ सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी औरंगाबादला(आताचे संभाजीनगर) इंजिनियरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो.दोन मित्रांसोबत किरायाची खोली घेऊन उस्मानपुऱ्यात रहात होतो.महिन्यातून एक दोन वेळा सिनेमा पहायला जायचो. त्या काळात विद्यार्थ्यांनी इंग्रजी सिनेमा पाहणे एकदम वर्ज्य समजले जायचे.एकदम शांतम् पापम् ! पापभिरू मंडळींनी इंग्रजी सिनेमा पहायचा नसतो अशी समजूत सर्वसाधारणपणे दृढ होती .
आमच्या घरचे वातावरण तर फारच बाळबोध होते.आम्हा सर्व बहीण भावंडांना आमच्या वडिलांचा फार धाक वाटत होता .त्यांच्या समोर बोलण्याची आमची हिम्मत नसे.   त्यांच्याशी सगळं महत्वाचं communication सहसा आईच्या मार्फतच व्हायचं .
आमच्या काळात आपण कांहीही चूक केली नसली तरी वडीलांना भिण्याची पध्दत होती. 


तर एका रविवारी आम्ही कांही मित्रांनी गुलजार टाॅकीजमध्ये चालू असलेला एक इंग्रजी सिनेमा पहायला जायचे ठरवले.सगळ्यांचे आई वडील परगावी रहात होते. त्यामुळे ही गोष्ट तशी कुणाच्याही घरी कळण्याची काहीच  शक्यता नव्हती.
तर आम्ही कांही मित्र ठरल्या प्रमाणे गुलजार टाॅकीज मध्ये मॅटिनी शो ला जाऊन बसलो. सिनेमा सुरू झाला .त्यातील नट माहित नाहीत, नट्या माहित नाहीत ,त्यांची भाषा कळत नाही, उच्चार नीट समजत नाहीत , पडद्यावर नक्की काय चाललंय हे ही कुणाला समजत नाही तरी पण आसपासचे कुणी हसले तर कांही तरी विनोद  झाला असावा असा अंदाज बांधून उरलेले हसतात .आणि सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक काॅमन भाव दिसतो.आपल्याला सिनेमातलं कांही कळत नाही हे कुणी ओळखलं तर नाही ना ? अशा अर्थाचा तो ओशाळवाणा भाव असतो. पण अळीमिळी गुपचिळी हेच धोरण सगळे जण अवलंबतात .म्हणजे तेरी भी चूप अन् मेरी भी चूप .असो.

सिनेमा सुरू झाल्या नंतर कांही वेळाने माझ्या एका मित्राने मोठ्ठ्याने ओरडून हाक मारली..ए भोपे , इकडे ये न बे , जागा रिकामी आहे. ‘ मी त्याने दाखवलेल्या जागेवर जाऊन बसलो.टाॅकीज मध्ये अंधारात थोडावेळ बसल्यांनतर कांही वेळाने आसपासचे बऱ्यापैकी दिसू लागते.कांही वेळाने माझ्या लक्षात आले की माझ्या शेजारचे गृहस्थ आमच्या कुटुंबाशी चांगलेच परिचित असलेले एक गृहस्थ होते. आम्ही त्यांना काका म्हणत असू. माझ्या मित्राने मोठ्ठयाने माझ्या नावाने जेव्हां  मला हाक मारली तेंव्हाच त्या काकांना समजले होते की मी सिनेमाला आलो म्हणून !


आणि आता तर काय मी त्यांच्या शेजारीच बसलो होतो. ते म्हणाले, अरे विष्णू बैस बैस .आता मात्र मी बेचैन झालो. हे काका पुढे मागे  आमच्या गावी आमच्या घरी गेले तर नक्कीच माझी चुगली  करतील आणि मग वडिलांनी  जाब विचारला तर आपल्यावर काय प्रसंग ओढवेल याची मला काळजी वाटू लागली .
मला ओरडून नावाने हाक मारणाऱ्या मित्राला इंटरव्हल मध्ये चांगलंच झापावं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या शेजारच्या काकांना कांहीतरी गयावया करून पुढेमागे गावी  गेलात तर प्लीज ही गोष्ट घरी सांगू नका,अशी गळ घालावी असं मी मनात ठरवलं आणि त्यासाठी मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करू लागलो .
इंटरव्हल झाली . माझ्या त्या मित्राला मी गाठलं आणि म्हणालो ” माझं नाव घेऊन एवढ्या मोठ्ठयाने ओरडायची  काय गरज होती रे ? त्या माझ्या शेजारी बसलेल्या काकांना  आता कळालंना ! त्यांनी घरी चुगली केली म्हणजे ?”

तेवढ्यात त्या काकांनी मला गाठलं. माझ्या अभ्यासाविषयी जुजबी चौकशी केली. माझ्यासाठी व स्वत:साठी खारे दाणे  घेतले. व आर्जवाच्या स्वरात मला म्हणाले,

” माझं एक काम करशील का ?’

मी काम न जाणून न घेताच म्हटले ,

“हो करीन की . त्यात काय एवढं !”


त्यावर काका म्हणाले , “हे बघ तू जर कधी आमच्या घरी आलास ना तर इतर कुठल्याही विषयावर बोल पण हिला म्हणजे तुझ्या काकूला मी इंग्लिश सिनेमा पाहतांना भेटलो होतो हे तिला कधीही सांगू नकोस बाबा. तुझी काकू कशी आहे हे तुला माहीत आहे ना. सगळं घर डोक्यावर घेईल ती हे कळालं तर.’

आता माझी ट्यूब लाईट पेटली. म्हणजे जो प्राॅब्लेम मला होता तोच प्राॅब्लेम या काकांनाही होता तर ! मी उगचंच घाबरलो होतो.
म्हणजे या काकांना इंग्लिश पिक्चर पाहतांना मी पाहिलं हे ही तितकंच खरं होतं की !
अन् त्यांनाच चिंता वाटत होती की मी कुठे ही गोष्ट त्यांच्या घरी सांगतो .

मी म्हणालो , “अहो काका!!
आज आपण भेटलोच नाही आणि इंग्लिश पिक्चर तर पाहिलाच नाही! तेंव्हा कुणी कुणाला कांही सांगण्याचा प्रश्न येतोच कुठे , सांगा बरं !!…”

काका म्हणाले, … शाब्बास . व्हेरी गुड .हुशार आहेस . अळिमिळी गुप चिळी. चल चहा घेऊ यात .

😄😎🤑

amazon logo
Go to shopping

प्रयत्नांती परमेश्वर

Screenshot 20240403 092528 Google

ही पोस्ट वाचण्यासाठी कमीत कमी १० मिनिटांचा वेळ लागू शकतो. त्यामुळे आपणांस विनंती की तेवढा वेळ काढून ही पोस्ट नक्की वाचावी. 

राष्ट्रीयीकृत बँकेतील नोकरी म्हणजे नुसतेच उपजीविकेचे साधन नाही, तर निरनिराळ्या प्रसंगांमधून अनुभवाची मिळणारी मोठीच शिदोरी आहे.  बँकेतील नोकरीमुळे करतांना  आपल्या स्वभावाचे अनेक टोचणारे कंगोरे घासून घासून गुळगुळीत केले जातात आणि आपल्याला अनेक स्किल्स (कौशल्ये) शिकण्यास भाग पडून आपले व्यक्तिमत्व अधिक परिपूर्ण बनवण्यासाठी मदत होते .  अनेक कठीण प्रसंगांतून मार्ग काढावा लागतो.  पण या कठीण प्रसंगांतून यशस्वीरित्या मार्ग काढल्यानंतर मिळणारे समाधान काही वेगळेच असते..

अशाच प्रकारचा एक अनुभव आज इथे कथन करायचा आहे.

ऑफिसर म्हणून पदोन्नती मिळाल्यानंतर, माझा प्रवास अनेक शाखांमधून झाला. त्यात अगदी खेड्याच्या शाखेपासून ते इतर राज्यातील मोठ्या शहरातील मोठ्या शाखांपर्यंत हा प्रवास चालू होता. अशात सन 2002 च्या सुरुवातीला  माझी पोस्टिंग एका मोठ्या कृषि विकास शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून झाली. त्या शाखेचा पसारा खूप मोठा होता. ७२ गांवें आणि १०००० च्या वर कर्ज खाती तिथे होती . मी तिथे मध्ये रुजू झाल्यानंतर मार्चचा वार्षिक ताळेबंद तोंडावर होता , शिवाय नुकतेच ऑडिट (अंतर्गत लेखापरिक्षण) झाले होते आणि त्यात १००० खात्यांचे रीफेसमेंट (पुनर्गठन ) करून ऑडिट चे उत्तर द्यायचे होते, आणि तेंव्हाच बँकेत संगणकीकरण सुरू करण्याचे ठरले होते त्यासाठी बँक-मास्टर ही प्रणाली लागू करायची होती. शिवाय त्या गावात वातावरण अतिशय स्फोटक असल्यामुळे रोज एक नवीन प्रकरण उपस्थित व्हायचे आणि त्याचा निपटारा करावा लागायचा. तेथे आलेला सर्वात मोठा अनुभव म्हणजे शेतकरी संघटनेचे आंदोलन हाताळण्याचा.

परभणी, सेलू, मानवत, पाथरी, माजलगाव हा भाग म्हणजे संघटनेचा बालेकिल्ला समजला जायचा. मी तिथे रुजू झाल्यानंतर काहीच दिवसात, बँकेच्या सेलू येथील क्षेत्र अधिकाऱ्याला  लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. आम्ही सर्व तिथे जाऊन त्या आमच्या सहकाऱ्याला आमच्या पाठिंब्याची ग्वाही दिली होती आणि धीर दिला होता. उपरोक्त प्रसंगामुळे, आपल्याकडे असा काही प्रकार होऊ नये म्हणून मी अधिकच सावध झालो होतो. संघटनेचे नेते आणि कार्यकर्ते एका विशिष्ट विचारसरणीने भरलेले होते, आणि त्या विचारसरणीच्या समर्थनार्थ काहीही करण्याची मानसिकता तयार झाली होती.

मी तिथे  आल्यानंतर दोन महिन्यात, पूर्ण ब्रांच च्या सर्व खात्यांचे गावनिहाय वर्गीकरण करून घेतले होते, त्यामुळे प्रत्येक गावातील परतफेडीच्या रेकॉर्डची कल्पना आली होती. मानवत तालुक्यातील एक  गांव  हे संघटनेचा बालेकिल्ला समजला जात होते. संघटनेचे ब्रीदवाक्य होते, “ सरकारी कर भरणार नाही, बँकेचे कर्ज परतफेड करणार नाही…. आम्ही तुमचे देणे लागत नाही. उलट शेतमालाला भाव न मिळाल्यामुळे तुम्हीच आमचे देणे लागतात.” बऱ्याच वेळेला, त्यांचे कार्यकर्ते, बसमधून तिकीट न काढता प्रवास करीत आणि कंडक्टर ने तिकीट काढावयास सांगितल्यास त्याच्याशी वरील मुद्द्यावरून वाद घालत आणि प्रसंगी मारहाण ही करत.

वरील हे गांव आमच्या शाखेकडेच होते, आणि साहजिकच, तेथील थकबाकी इतर गावांपेक्षा कितीतरी जास्त होती. त्या गावी  मी आमच्या फील्ड ऑफिसर सोबत एकदा जीप ने गेलो, तेंव्हा गावाच्या वेशी जवळील एका भिंतीवर, मोठ्या अक्षरात , “सरकारी अधिकारी आणि बँकेच्या वसूली अधिकाऱ्यांना गावात प्रवेश बंद” असे लिहून ठेवले होते. मी, सरकारी स्कीम मधील  नवीन कर्ज प्रकरणाच्या चौकशीच्या निमित्ताने गेलो असल्यामुळे, संबंधित अर्जदार माझ्यासोबत होता, त्यामुळे गावात जाण्यास काही त्रास झाला नाही. पण इतर गावांना वापरीत असलेली वसुलीसाठीची कार्यपद्धती इथे लागू पडणार नाही याची मला जाणीव होत होती आणि मी मनोमन काही तरी ठरवत होतो.

मी त्या गावातील  खातेदारांची, विशेषकरून थकबाकीदारांची माहिती पुनः पुन्हा बघत होतो, आणि त्यातल्या मोठ्या मोठ्या थकबाकीदारांची नांवे मला त्यांच्या थकबाकी च्या रकमेसहित मुखोद्गत झाल्यासारखी झाली होती.

अशात एके दिवशी त्या गावातील संघटनेचे सर्वात प्रभावशाली पुढारी, त्यांच्या काही कार्यकर्त्यांसोबत माझ्याकडे आले. धोतर, नेहरू शर्ट, टोपी, भरपूर उंची आणि पिळदार मिशा असलेले प्रभावी व्यक्तिमत्व होते ते. त्यांच्या छातीवर संघटनेचा तो सुप्रसिद्ध बिल्ला डौलाने मिरवत होता. सोबतच्या सर्व कार्यकर्त्यांच्याही शर्टावर अर्थातच तो बिल्ला झळकत होता. मी जरी आजवर त्यांना पहिले नव्हते, तरी गावातील प्रत्येक थकबाकीदाराच्या नावासहित फोटो ही माझ्या डोक्यात पक्के ठसले होते, त्यामुळे त्यांना पाहिल्याबरोबर त्यांचे नाव आणि त्यांचा थकबाकीचा आकडा माझ्या डोळ्यासमोर आला आणि मी माझ्या कॉम्पुटर वर बघून खात्री करून घेतली. परंतु मी त्यांचे हसून स्वागत केले आणि “या” म्हणून आदराने त्यांना बसावयास खुर्ची ऑफर केली. त्यांच्याबरोबरचे कार्यकर्तेही आजूबाजूच्या खुर्च्यांवर बसले. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मी माझे हातातील सर्व काम बाजूला ठेवून “कसे काय येणे केलेत?” असे आस्थेने विचारले. त्याच बरोबर चहाची ऑर्डर दिली. त्यांनी त्यांच्या संघटनेबद्दल सांगायला सुरुवात केली. त्याचबरोबर सरकार शेतकऱ्यांची कशी पिळवणूक करीत आहे, आणि बँका सरकारच्या हस्तक असल्यामुळे कशा त्यांच्या पिळवणुकीत सहभागी आहेत, हे सांगायला सुरुवात केली. शेतीचे अर्थशास्त्र सांगायला सुरुवात केली. मी त्यांचे सर्व बोलणे लक्षपूर्वक ऐकून घेतले, आणि त्यांच्या बहुतेक सर्व मुद्दयांना संमती दर्शविली. जवळ जवळ अर्धा तास ही चर्चा चालू होती.पूर्ण संभाषणाच्या दरम्यान मी एकदाही त्यांच्या थकबाकी बद्दल एक अक्षर ही उच्चारले नाही. तेही बहुतेक माझा अंदाज घ्यायला आले होते. खेड्यात सहसा अशी पद्धत असते, की तेथील पुढारी, नवीन कोणीही सरकारी अधिकारी किंवा बँक मॅनेजर आल्यानंतर त्याची चाचपणी करण्यासाठी एक अशी चक्कर हमखास करतात. मी त्यांचे केलेले स्वागत कदाचित त्यांना अनपेक्षित असावे. आणि ते, आपणास विरोध होईल आणि मग आपण मॅनेजरला आपला इंगा दाखवू, अशा तयारीने आले परंतु, वजनदार बदली उचलायला जावे आणि ती बदली रिकामी निघावी, तसे काहीसे झाल्यासारखे भाव मला त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. शेवटी निघता निघता, काही तरी आठवल्यासारखे करून त्यांनी, सांगितले, “साहेब, तुमच्या बँकेकडे आय आर डी पी स्कीम खाली अमुक अमुक माणसाची एक फाईल आली आहे. चांगला माणूस आहे. तुमच्या नियमात बसतं का बघा.” मी लगेच ती फाईल काढून पाहिली. आणि ती नियमात बसत असल्यास नक्की विचार करीन असे आश्वासन दिले. वास्तविक त्यांच्या येण्याचा मुख्य उद्देश तोच होता हे मला जाणवले. परंतु मी त्यांना तसे जाणवू न देता त्यांना विचार करीन असे आश्वासन दिले. आमच्या पहिल्या भेटीने अत्यंत समाधानी होऊन त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझा निरोप घेतला. ते गेल्यानंतर आमच्या फील्ड ऑफिसरने येऊन त्यांच्या पूर्ण थकबाकीची मला माहिती दिली. अर्थात ती  मला माहिती होतीच.

त्यांनी सांगितलेली फाईल योग्य वाटत होती आणि नियमात बसत होती. केवळ त्यांनी सांगितले म्हणून फाईल नाकारणे ही योग्य नव्हते. त्यामुळे आम्ही ३-४ दिवसातच ती फाईल मंजूर केली आणि ८-१० दिवसात त्याचे पहिल्या हप्त्याचे वाटपही केले.

त्यांनी सांगितलेली फाईल मंजूर केल्यामुळे त्यांना चांगले वाटले होते, आणि हा माणूस आपल्यावर विश्वास ठेवतो आहे अशी खात्री झाली होती. त्यानंतर त्यांच्या बँकेत बऱ्याच चकरा झाल्या. प्रत्येक वेळी आल्यानंतर ते बराच वेळ बसत आणि भडा भडा बोलत. मला त्यांच्या बोलण्यातून बरीच नवीन माहिती मिळत होती. या कुठल्याही भेटीत मी त्यांच्या खात्याबद्दल किंवा त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या खात्याबद्दल  एक अवाक्षरही काढले नाही. मात्र मी त्यांच्या बोलण्यातून मधून मधून सवड काढून त्यांना बँकेच्या विविध स्कीम्स बद्दल बोलत होतो.

अशाच एके दिवशी ते आणि त्यांचे एक त्यांच्यापेक्षा वयाने जास्त असलेले एक कार्यकर्ते असे दोघेजण आले. ते कार्यकर्ते थोडे परेशान दिसत होते. बोलता बोलता मी त्या दुसऱ्या व्यक्तीची शेती कशी काय चालली आहे, त्याची चौकशी केली. त्यांनी सांगितले, काय करावे साहेब, उसाला पाणी कमी पडते आहे. जवळ असलेले सर्व पैसे बेण्यात आणि खतात घातले आहेत. आता विहीर खोल केली आणि ठिबक केले तरच ऊस वाचेल अशी परिस्थिती आहे. पण आता सावकारही कर्जाऊ देत नाही कारण त्याच्याकडून आधीच कर्ज घेतले आहे. आमच्या संघटनेच्या तत्त्वाप्रमाणे, बँकेचे कर्ज फेडायचे नाही आणि घ्यायचेही नाही. तसेही, आम्हाला कर्ज देणे तर तुमच्या नियमात बसणार नाही कारण पहिले खाते थकबाकीत आहे. त्यांच्या मनातील व्यथा बाहेर आल्यानंतर मी त्यांना म्हणालो, “ खरं आहे तुम्ही म्हणता ते. हे जग पैशावर चालतं. सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही म्हणतात ते खरच आहे. आणि पाटील हे बघा, मी तुमच्या संघटनेच्या विचारसरणीचा आदर करतो. पण शेवटी प्रत्येकाला आपली वैयक्तिक प्रगती करायची असेल, आपल्या मुलांना चांगले उच्च शिक्षण द्यायचे असेल तर पैशांची गरज आहेच. तुमचे खाते थकबाकीत असल्याने बँकेला किंवा वैयक्तिक मला, विशेष काही फरक पडत नाही. (अर्थात हे विधान मी मोठे धाडसाने केले होते, आणि अपेक्षित परिणाम साधण्यासाठी केले होते), पण तुमच्या जीवनावर मात्र फार मोठा फरक पडतो. मी तुमची खाती काढून बघतो, आणि आपण बघूयात काय करता येते ते.” त्यानंतर मी त्यांचे खाते काढून पाहिले. थकबाकी किती आहे ते पाहिले. योगायोगाने त्यांचे पीक कर्ज थकबाकीत असले तरी बाकी खूप जास्त नव्हती. त्यांची जमीन  बरीच होती. मी त्यांना सुचवले, “ तुम्ही जर ही थोडीशी रक्कम भरू शकला तर बघा, तुम्हाला तुमच्या होल्डिंग प्रमाणे पीक कर्ज लगेच मंजूर होऊ शकेल आणि ते दुसऱ्याच दिवशी मिळेल याची मी खात्री देतो. तसेच तुमचे पीक कर्ज नियमित असल्यानंतर, तुम्हाला विहीर दुरुस्तीसाठी आणि ठिबक साठी ही कर्ज मिळू शकते. ठिबक ही तर आज काळाची गरज आहे.” हे ऐकून त्यांचा चेहरा खुलला पण ते म्हणाले, “ साहेब, मी कसेही करून पैशाची व्यवस्था करतो, पण एक विनंती आहे. कृपया मी माझी थकबाकी भरली याची कुठेही वाच्यता करू नका. कारण आम्ही संघटनेची नेते मंडळी आहोत. आम्हीच संघटनेच्या विचाराविरूद्ध वागलो असे इतरांना कळले तर ते ठीक होणार नाही.” मी त्यांना आश्वासन दिले, “ काही काळजी करू नका, आमच्या कडून कुठल्याच खातेदाराची माहिती इतरांना दिली जात नाही”. अशा प्रकारे संघटनेच्या पहिल्या व्यक्तीचे खाते नियमित झाले. आम्ही, आश्वासन दिल्याप्रमाणे, अत्यंत त्वरेने त्याचे कर्ज मंजूर केले, आणि थोड्याच दिवसात, त्याचे विहिरीचे काम सुरु झाले, आणि ठिबक संच ही शेतात येऊन पडला! आम्ही त्याचे काम पाहायला गेलो तेंव्हा त्याच्या शेतातील ऊस हिरवागार होता, आणि त्याच्या चेहऱ्यावरील आनंद अवर्णनीय होता. आम्हालाही साहजिकच, एक नेक काम आपल्या हातून झाल्याचा आनंद झाला.

त्यानंतर, काही दिवसांनी, ते पुढारी अजून एका व्यक्तीला आमच्याकडे घेऊन आले आणि, “ साहेब, याचा हिशोब बघा बरं” म्हणून म्हणाले. त्याचा हिशोब बघितल्यानंतर, त्याच्याकडे असलेले  पैसे थकबाकी भरायला कमी पडत होते. मी त्याला घरात कुणाच्या नावाने शेती आहे का ते विचारले. त्याच्या पत्नीच्या नावावर शेती होती आणि कर्ज घेतले नव्हते. तेंव्हा मी त्याच्या पत्नीच्या नावाने कर्ज मंजूर करण्याची तयारी दाखविली, आणि अजून एक खाते बेबाक झाले. त्याने ही तीच विनंती केली, “साहेब, मी थकबाकी भरली म्हणून कोणाला सांगू नका!”

अशा प्रकारे ८-१० खाती बेबाक झाली; लोकांच्या विहिरी होऊ लागल्या, पाईप लाईन लागू लागल्या ठिबक संच बसू लागले, आणि हळू हळू गावात बातमी पसरली. बँक, थकबाकी भरणा ऱ्यांना सढळ हाताने मदत करत आहे. एके दिवशी, ते मुख्य पुढारी जे होते, ते माझ्याकडे आले, आणि मला म्हणाले, “साहेब, आपला किती हिशोब होतो ते पहा बरं!” माझ्या प्रयत्नांना यश येतांना पाहून मला अतिशय आनंद झाला. मी त्यांना त्यांचा पूर्ण हिशोब सांगितला. त्यांची अजून एक आवश्यकता होती. त्यांना मानवत मध्ये घर बांधायचे होते. प्लॉट घेतलेला होता. पण घर बांधायसाठी पैसे नव्हते. त्यांची थकबाकी भरल्यानंतर, कुठेही नियमांचे उल्लंघन न करता, त्यांच्या गरजेप्रमाणे कर्ज मंजूर करता आले आणि संघटनेच्या कामात असलेल्या व्यस्तते मुळे त्यांची आर्थिक घडी जी विस्कटली होती, ती नीट बसायला लागली. आता मात्र पूर्ण गावाला माहित झाले होते, की बँकेकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे, आणि त्या पहिल्या घटनेनंतर, सहा महिन्यांच्या कालावधीत, ८० टक्के खाती नियमित झाली! यात जराही अतिशयोक्ति नाही. अशाच एका कार्यकर्त्याचा मुलगा अत्यंत हुशार होता आणि त्याचा आय आय टी चेन्नई येथे नंबर लागला होता. त्याला आम्ही एज्युकेशन लोन दिले आणि तो चेन्नई ला गेला. आता आमचे फील्ड ऑफिसर निर्भयपणे आणि मुक्तपणे त्या गावात ये जा करू लागले होते आणि गावातील लोकांचे बँकेत येणे जाणे नित्याचे झाले होते.

खरा क्लायमॅक्स पुढेच आहे.

पुढील वर्षाची गोष्ट. रिकव्हरी सीझन (कर्ज वसूलीचे दिवस)चालू होता. आमच्या परीने आमचे सर्व लोक वसुलीसाठी मेहनत करत होते. अनौपचारिकरित्या वसुली मेळावे  होत होतेच, पण रिजन ऑफिस कडून निरोप आला, की एक वसुली मेळावा मोठा झाला पाहिजे, आणि त्यासाठी एजीएम  (सहाय्यक महाप्रबंधक) आणि डीजीएम (उपमहाप्रबंधक) येतील. तशात परभणीच्या कृषि विकास शाखेने   वसुली मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यात १४ लाख रुपये वसुली झाली (ही घटना २००३ ची आहे, आणि तेंव्हा ही रक्कम बरीच मोठी होती, हे इथे लक्षात घेण्याजोगे आहे). आम्हाला रिजन ऑफिस ला वसुली मेळाव्याची तारीख आणि ठिकाण कळवायचे होते. त्यासाठी मी आणि माझे सर्व फील्ड ऑफिसर सहकारी माझ्या केबिन मध्ये बसून विचार विनिमय करीत होतो. शक्यतो ब्रांच च्या जवळ चे गाव निवडावे, आणि ज्या गावाचे वसुली रेकॉर्ड खूप चांगले आहे, असे गाव निवडावे, असा विचार चालला होता. त्यानुसार अनेक नांवे समोर येत होती. इतक्यात त्या गावचे  ते पुढारी आणि त्यांचे सहकारी आले. बँकेची वेळ संपली होती, पण त्या गावची  मंडळी आता बँकेच्या कुटुंबापैकीच असल्यासारखी झाली होती, त्यामुळे, त्यांनी आवाज दिला, “ काय साहेब, काय चाललंय, याव का आत?” आम्ही त्यांना आत बोलावले. त्यांना काय विषय चालला आहे त्याची कल्पना दिली. त्याबरोबर, अनपेक्षितरित्या त्यांच्याकडून ताड्कन प्रस्ताव आला, “त्यात काय विचार करायचा साहेब, आमच्या गावालाच ठेऊ यात की वसुली मेळावा!” आश्चर्यचकित होण्याची पाळी आमची होती. आम्ही या प्रस्तावाला लगेच होकार दिला नाही. मी त्यांना म्हटले, “ आपल्या गावातील वसुली आता नक्कीच चांगली आहे आणि वसुली मेळाव्याला प्रतिसाद ही चांगला मिळेल, पण मला असे वाटते की संघटनेचे विचार आहेत त्याच्या विरुद्ध असा मेळावा घेणे योग्य राहील का, याविषयी आपण अजून विचार करावा.” त्यावर लगेच ते म्हणाले, “तसेच असेल तर आत्ताच चला साहेब, आपण आमच्या सेलूच्या मोठ्या साहेबांकडे जाऊत”. त्याप्रमाणे आम्ही लगेच जीप काढली आणि सेलूच्या त्यांच्या शीर्ष नेतृत्वाकडे गेलो (नाव मुद्दामहून देत नाही). त्यांच्याकडे गेल्यानंतर असे समजले, की त्यांच्या कानावर आमच्या बँकेबद्दल पूर्ण माहिती आली होती आणि बँकेमुळे झालेल्या गावच्या प्रगतीबद्दल ते अत्यंत समाधानी होते. त्यांनी पूर्ण खात्रीने त्यांच्याकडून हिरवा कंदील दिला. गावात २-४ उनाड तरुण पोरे होती. सेलूच्या नेत्याने लोकल नेत्यांना बजावून सांगितले, त्यांना त्या दिवशी येऊ देऊ नका, आणि कार्यक्रम एकदम जोरदार झाला पाहिजे.

अशा प्रकारे वसुली मेळावा मानोलीला घेण्याचे सर्वानुमते नक्की झाले, आणि आम्ही रिजन ऑफिस ला ठिकाण आणि विसेक दिवसा नंतरची  तारीख कळवून टाकली. परभणीच्या वसुली मेळाव्यात १४ लाखांची वसुली झाली होती. तेंव्हा आम्ही आमच्या अंतर्गत मीटिंग मध्ये एक उद्देश ठेवला, “ आपली वसुली कमीत कमी १५ लाख झाली पाहिजे!” त्या दिशेने सर्व सहकारी पूर्णपणे कामाला लागले. अर्थात अशा वसुली मेळाव्यासाठी लोकांकडून आधी वसुलीबद्दल खात्री करून घेऊन त्यांना त्या ठराविक तारखेला त्या गावी येण्याचे सांगावे लागते. आजूबाजूच्या सर्व गावांना ही त्यात सामील करावे लागते. त्याप्रमाणे आमचे फील्ड ऑफिसर रोज सगळीकडे हिंडून वसुलीचे आकडे घेऊन येऊ लागले. ब्रांच च्या स्टाफ सेक्रेटरीनेही पूर्ण स्टाफ च्या वतीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हळू हळू, आमची वसुली १५ लाखाच्या आसपास पोंचेल अशी परिस्थिती निर्माण झाली. मानोलीचे लोक मधून मधून येऊन आम्हाला सांगत होते, “तुम्ही काही काळजी करू नका साहेब, आपला मेळावा जोरदार होणार.!” होता होता तो दिवस उगवला.

रिजन ऑफिस हून एजीएम आणि डीजीएम, आले. ब्रँचमध्ये त्यांचे स्वागत केल्यानंतर, सकाळी १० च्या सुमारास आम्ही मानोलीला निघालो. ब्रँचमध्ये कमीत कमी स्टाफ ठेवून बाकी सर्वजण (कॅश मोजायसाठी कॅशियर, तसेच क्लार्कस) साडेदहाच्या सुमारास मानोलीला पोंचलो. गाव जवळ आल्यानंतर जे दृश्य दिसले ते खूपच उत्साहवर्धक होते. गावाच्या वेशीवरच, “स्टेट बँक ऑफ हैदराबाद वसुली मेळावा” असा फलक लावला होता. आणि आम्ही वेशीपाशी पोंचलो तेंव्हा गावातील मंडळी हातात हार घेऊन उभी होती. समोर बँड पथक होते, आणि आम्ही पोंचल्यानंतर, बँडच्या तालात, गावातील पुढारी मंडळींनी, पुढे होऊन सर्वांचे हार घालून स्वागत केले, आणि सभेच्या पंडाल (मंडप) पर्यंत सर्वांना वाजत घेऊन गेले. पंडाल खचाखच भरलेला होता. मानोलीचेच नाही तर आजूबाजूच्या ७-८ गावांचे लोक आले होते. स्टेज वगैरे सुशोभित केले होते. एजीएम आणि डीजीएम सहित सर्व स्थानापन्न झाले. प्रास्ताविक झाले. त्यानंतर एजीएम श्री कोटगिरे साहेबांनी अर्धा तास अत्यंत उत्कृष्ट असे भाषण केले. त्यांना मराठवाड्याची पूर्ण परिस्थिती माहिती असल्यामुळे त्यांनी उपस्थित मंडळीच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना उत्कृष्ट पणे हात घातला आणि सर्वांची मने जिंकून घेतली. त्यानंतर, डीजीएम श्री केशवन साहेब यांनी गावकऱ्यांचे कौतुक करीत त्यांना आपल्या बँकेकडून पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले. त्यांच्या भाषणालाही कडाडून टाळ्या पडल्या. त्यानंतर औपचारिक कार्यक्रम संपला आणि वसुली मेळावा सुरु झाला. पैसे भरायला आलेल्या लोकांची गर्दी आमचे सर्व लोक त्वरेने हाताळू लागले. २ तास पर्यंत कॅश मोजणे चालू होते. शेवटच्या व्यक्तीची  कॅश घेऊन झाली, आणि जेंव्हा हिशोब लावण्यात आला, तेंव्हा, सर्व मिळून रक्कम झाली २६ लाख! हा आकडा जेंव्हा केशवन साहेबांना सांगण्यात आला, तेंव्हा ते इतके खुश झाले, की सांगता सोय नाही! त्यांनी तिथूनच सगळीकडे फोन करून सांगितले, रिकव्हरी डिपार्टमेंटला कळवले. परत येतांना पूर्ण रस्त्यात ते सर्वांना शाबासकी देत होते. ब्रँचमध्ये सर्वजण परतलो, तेंव्हा एजीएम आणि डीजीएम दोघांनीही टीम लीडर म्हणून अभिनंदन केले.

वरील प्रसंगाची आठवण ही आजही सुखावून जाते. या प्रसंगातून मला संयमाचा, धैर्याचा जो धडा मिळाला, तसेच टीम वर्क करण्याची जी संधी मिळाली, लोकांच्या प्रगतीत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि आपल्या प्रयत्न यशस्वी झाल्यानंतर  जे समाधान मिळाले, त्याची किंमत कशानेही करता येणार नाही.

 

 

माधव भोपे

Retired Chief Manager