https://goodworld.in A website by Madhav Bhope

Mind blowing experiences of a Banker-3 एका बँकर चे थरारक अनुभव-3

ajay kotnis

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

बँकस्य कथा रम्या..

स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव..

(भाग : 3)

सगळा स्टाफ डोळे विस्फारून वर्तमान पत्रात आलेली ती बातमी अधाशासारखी वाचून काढीत होता. मी मात्र कालपासून एखाद्या त्रयस्थाप्रमाणे या सगळ्या घटनाक्रमाकडे पहात होतो. वर्तमानपत्रात अशी बातमी येणार याचा मला अंदाज होताच, पण ती इतक्या लवकर येईल हे मात्र अपेक्षित नव्हतं. माझ्या केबिनमध्ये जमलेल्या स्टाफला उद्देशून म्हणालो..
 
“पेपर मधील या बातमीने विचलित होऊ नका. आजपासून लोकांच्या तुमच्याकडे पाहण्याच्या नजरा बदलतील.. काही खवचट कस्टमर तुम्हाला या बातमीच्या संदर्भात नाना प्रकारचे अपमानास्पद प्रश्न, कुत्सित शंका विचारतील.. टोमणे मारतील.. त्या सर्वांकडे दुर्लक्ष करायचं.. चिडचिड न करता संयम राखून शांतपणे आपलं काम करायचं.. कुणाशीही वाद घालायचा नाही.. तसंच आपल्या कुठल्याही अंतर्गत बाबींची बाहेर कुणाशीही चर्चा करायची नाही..”
 
आमचं असं बोलणं सुरू असतानाच रिजनल मॅनेजर साहेबांनी बँकेत प्रवेश केला.
 
बँकिंग हॉलमध्ये RM साहेबांनी स्टाफची एक छोटीशी मिटिंग घेतली.meeting सुरवातीला कालच्या घटनेबद्दल थोडक्यात सांगुन झाल्यावर आम्ही तो चेक RM साहेबांना दाखवला. तसंच चेकबुक इश्यु रजिस्टर मधील दोन्ही चेकबुकच्या नोंदी दाखवून दुसऱ्या चेकबुकसाठी घेतलेला अर्ज फायलिंग मधून गहाळ झाला असल्याचंही सांगितलं. सीसीटीव्हीचं फुटेज व संशयिताच्या फोटो प्रिंट्स पाहिल्यावर RM साहेबांनी चेक वरील सही स्कॅन केलेल्या सहीच्या नमुन्याशी ताडून पाहीली. घडलेल्या प्रकारात स्टाफची कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणा नाही याची त्यांना खात्री पटली.
 
रत्नमालाबाईंना दुसरं चेकबुक कुणी सुपूर्द (handover) केलं ? या त्यांच्या प्रश्नावर कुणीच उत्तर दिलं नाही. सामान्यत: काउंटर क्लार्क किंवा प्युन हे काम करायचे. मात्र रत्नमालाबाईंना दुसरं चेकबुक दिल्याचं कुणालाही आठवत नव्हतं. कामाचा कितीही रश असला तरीही चेक बुक दिल्यावर कस्टमरने रजिस्टरवर नीट सही केली किंवा नाही याची खात्री करून घेतलीच पाहिजे असं RM साहेबांनी स्टाफला बजावलं.
 
त्यानंतर ते फायलिंगचं काम करणाऱ्या रामदास प्युन (दप्तरी) कडे वळले. या प्युनचं काम अत्यंत अपटुडेट होतं. चेकबुक इश्यु रजिस्टर समोर ठेवून त्यातील सिरीयल नंबर नुसार Cheque Book Requisition Slips फाईल करण्याची त्याची पद्धत होती. त्याने चेकबुकच्या अर्जांची फाईलच RM साहेबांना दाखविली. त्याचं चेकबुकच्या सिरीयल नुसार केलेलं गेल्या काही महिन्यातील फायलिंग साहेबांनी चेक केलं. इतकं व्यवस्थित फायलिंग पाहून त्यांनी रामदास दप्तरीच्या कामाचं कौतुक केलं. 
 
रामदास म्हणाला..
“साहेब, मी खात्रीपूर्वक सांगतो की रत्नमालाबाईंचा दुसऱ्या चेकबुकसाठीचा अर्ज मी व्यवस्थित फाईल केला होता. त्यानंतरच तो फाईलमधून गहाळ करण्यात आला आहे.”
 
स्टाफची मिटिंग आटोपल्यावर RM साहेब माझ्या केबिनमध्ये येऊन बसले. काल रात्री उशिरापर्यंत जागून काही महत्त्वाचे मुद्दे मी लिहून काढले होते, ते थोडक्यात असे होते..
.१. मुलासाठी मोटार सायकल घ्यायची असून, त्यासाठी खाजगी बँकेकडून कर्ज घ्यायचे असल्याने चेक बुक हवे आहे असे सांगून सुखदेव बोडखेने बायकोच्या नावाने खाते उघडून चेक बुक घेतले होते. मात्र आता तो शेती घेण्याबद्दल सांगतो आहे.
.२. खाते उघडुन ज्या दिवशी दुसरे चेक बुक घेतले त्याच दिवशी खात्यात सहा लाख रुपये जमा करण्यात आले. आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यातून पाच लाख ऐंशी हजार रुपये काढून घेण्यात आले. यावरून हा सर्व प्लॅन अत्यंत घाईघाईत, एकही दिवस वाया न घालवता त्वरित अंमलात आणण्यात आल्याचे दिसते.
.३. ज्या अर्थी दुसऱ्या चेकबुक बद्दल बोडखे कुटुंब काहीही बोलण्यास तयार नाही, त्या अर्थी या घटनेत त्यांचाही सहभाग असू शकतो.
.४. चेकवरील सही ओरिजिनल सहीशी तंतोतंत जुळते. याचाच अर्थ चेकवर सही करणारी व्यक्ती बोडखे कुटुंबाच्या निकटच्या परिचयाची असावी, ज्याला रत्नमालाबाईंची सही कशी आहे याबद्दल माहिती आहे.
.५. ही निकटच्या परिचयाची व्यक्ती म्हणजे त्यांचा मुलगा बबन बोडखे असू शकते. कारण दुसरे चेकबुक घेण्यासाठी तोच बँकेत आला होता. तसेच त्याला आपल्या आईची सही माहीत असणे अत्यंत साहजिक आहे.
.६. चेकबुक इश्यु रजिस्टरवर रत्नमालाबाईंची जाणूनबुजून सही न घेणे तसेच दुसऱ्या चेकबुक साठीचा अर्ज फाईल मधून गहाळ होणे यात बँकेतीलच कुणातरी कर्मचाऱ्याचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.७. सर्वात महत्वाचे म्हणजे आदल्या दिवशी दुपारी तीन वाजता त्या अनोळखी व्यक्तीने रत्नमालाबाईंच्या खात्यातून पैसे काढून नेल्यावर लगेच त्या घटनेची माहिती बोडखे कुटुंबाला कशी मिळाली ? कारण त्यांच्यापैकी कुणीही दुपारनंतर खात्यातील बॅलन्सची चौकशी करण्यासाठी बँकेत आलेले नव्हते. तसेच ताबडतोब घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी बोडखे कुटुंबाने बँकेत येऊन आरडाओरड केली होती. याचा अर्थ त्यांना खात्यातून पैसे काढले गेल्याबद्दल आदल्या दिवशीच समजले होते.
.८. पत्रकार, राजकीय नेते गोळा करणे, खात्यातील पैसे परत मागण्यासाठी बँकेला दिलेला अर्ज लिहून तो टाईप करणे.. ही सर्व कामे सुखदेव बोडखे याने निश्चितपणे आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी खात्यातून पैसे काढले गेले त्याच दिवशी केली असली पाहिजेत. यावरून त्यांना या घटनेची पूर्वकल्पना होती असेच दिसते.
 
वरील सर्व मुद्दे मी RM साहेबांच्या निदर्शनास आणून दिले. आपल्या खात्यातून एवढी मोठी रक्कम काढून नेल्याचे जर एखाद्या स्त्रीला समजले तर तिची पहिली सहज, नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानीमुळे जबर धक्का बसून तिला अपार दुःख होईल, डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागतील.. ती पैसे परत करण्याची बँकेला विनंती करेल. परंतु याच्या विपरीत रत्नमालाबाई तर भांडण करण्याच्या तयारीनेच बँकेत आली होती. तिला जराही दुःख झाल्याचे दिसत, जाणवत नव्हते.. या बाबीकडेही मी RM साहेबांचे लक्ष वेधले.
 
आमची चर्चा चालू असतानांच सुखदेव भेटायला आल्याची सिक्युरिटी गार्डने वर्दी दिली.
 
जणू सर्वस्वच लुटल्यासारखा भयाण, उध्वस्त चेहरा करून सुखदेवने केबिनमध्ये प्रवेश केला. अबोलपणे आदरार्थी नुसती मान झुकवत RM साहेबांना नमस्कार करून त्यांच्याकडे भकास, दीनवाण्या नजरेने पहात तो हात जोडून उभा राहीला. RM साहेबांनी त्याला खुर्चीवर बसायला सांगितलं.
वेळ न घालवता थेट मुद्द्यालाच हात घालत RM साहेब म्हणाले..
 
“हे पहा सुखदेवजी, तुमच्या पत्नीची बनावट सही करून तिच्या खात्यातून कुणा अपरिचित व्यक्तीने मोठी रक्कम काढून नेल्यामुळे धक्का बसून तुमची जी दुःखद मानसिक अवस्था झाली आहे, त्याची मला जाणीव आहे. तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पैसे परत मिळावेत अशी आमचीही इच्छा आहे.. तरीपण अशा प्रसंगी बँकेचेही काही नियम, काही कार्य पद्धती असते. आमची बँक ही एक सरकारी संस्था असल्याने सर्व नियमांचे काटेकोर पालन आम्हाला करावेच लागते. संबंधित चेकवरील सही ही खऱ्या सहीशी हुबेहूब जुळत असल्याने हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तिचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. जर ती सही बनावट, (forged) असल्याचे सिद्ध झाले तर बँक तुम्हाला तुमचे पैसे नक्की परत करील. कृपया तोपर्यंत धीर धरा आणि बँकेला या घटनेच्या तपासात सहकार्य करा..”
सुखदेवने आतापर्यंत खाली घातलेली मान वर केली. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. संमतीदर्शक मान डोलावीत आणि आपले थरथरते हात RM साहेबांपुढे जोडून कापऱ्या आवाजात तो म्हणाला..
 
“ठीक आहे साहेब.. तुमचे म्हणणे मला मान्य आहे. तुमचा तपास पूर्ण होईपर्यंत थांबायला मी तयार आहे. परंतु या पैशांतून जी जमीन मी विकत घेणार होतो तिचा मालक एक दिवसही थांबायला तयार नाही. हा सौदा फिस्कटला तर जमीन तर हातातून जाईलच पण ईसार म्हणून दिलेले पन्नास हजारही बुडतील. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी तुमचा विशेष अधिकार वापरून किमान दोन लाख रुपये मला आजच्या आज देण्याची व्यवस्था करावी. म्हणजे ते पैसे जमीन मालकाला देऊन मी सौद्याची मुदत वाढवून घेऊ शकतो..”
 
सुखदेव बोडखेच्या करुण चेहऱ्यावरील हतबल, दीन, लाचार हावभाव इतके अस्सल होते की क्षणभर मलाही त्याची दया आली. मात्र त्याचे कालचे कांगावखोर, कपटी, कावेबाज रूप पाहिले असल्याने त्याच्या जातीवंत कसलेल्या अभिनयाला मनोमन दाद देत मी गप्प राहून RM साहेब त्याला काय उत्तर देतात हे उत्सुकतेने ऐकू लागलो..
 
निनाद राणे.. आमचे तरुण तडफदार रिजनल मॅनेजर हे खूप धाडसी, निर्भीड व चाणाक्ष अधिकारी होते. अशा धूर्त, मतलबी, ढोंगी लोकांचा त्यांना चांगलाच अनुभव होता.
 
“बँकेच्या नियमांचे उल्लंघन न करता जी काही मदत तुम्हाला करता येईल ती सर्व आम्ही निश्चितच करूच.. पण त्यापूर्वी काही महत्वाच्या बाबींचे स्पष्टीकरण मला तुमच्याकडून हवं आहे..”
 
RM साहेबांनी असे म्हणतांच सुखदेवचे कान ताठ झाले.. सावधपणे तो म्हणाला..
“बोला ना साहेब.. कोणत्या बाबी.. ?”
“तुमच्या खात्यातून पैसे काढले गेल्याचे तुम्हाला कसे समजले ? कारण दुपारी तीन वाजता त्या व्यक्तीने पैसे काढून नेल्यावर तुमच्या कुटुंबातील कोणीही बँकेत खात्याची चौकशी करण्यासाठी आलं नव्हतं असं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग वरून दिसतं. मग लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी बँक उघडण्यापूर्वीच तुम्हाला तुमच्या खात्यातून कुणीतरी पाच लाख ऐंशी हजार रुपये काढले आहेत हे कसं समजलं ?”
 
RM साहेबांचा बिनतोड प्रश्न ऐकतांच सुखदेवच्या चेहऱ्यावरील भाव झरकन बदलले.. बहुदा त्याने या प्रश्नाची अपेक्षाही केली असावी. कारण निर्ढावलेल्या, उद्धाम स्वरात तो म्हणाला..
“ते मी तुम्हाला कशाला सांगू ? म्हणजे तुम्ही विनाकारण त्या सांगणाऱ्या व्यक्तीला त्रास देणार.. ! आणि.. आम्हाला कुणी का सांगेना, खात्यातून पैसे गेले आहेत ही गोष्ट तर खरीच आहे ना ?”
 
सुखदेव मुरलेला चाणाक्ष, बिलंदर होता. RM साहेबांचा हा तीर वाया गेला होता. सुखदेवकडे रोखून पहात RM साहेब म्हणाले..
“ठीक आहे, तुमची मर्जी..! पण तो चेक तुम्हाला दिलेल्या दुसऱ्या चेकबुक मधील आहे. आणि ते चेकबुक स्वतः तुमची पत्नी व मुलगा यांनी बँकेतून नेल्याचे सीसीटीव्हीत दिसते आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ?”
 
RM साहेबांनी टाकलेला हा फसवा गुगली चुकवणं सुखदेवला शक्यच नव्हतं. खरं म्हणजे दुर्दैवाने बोडखे कुटुंबाला दुसरं चेकबुक देतांनाचे कुठलेही रेकॉर्डिंग सीसीटीव्ही फुटेजमध्ये नव्हते. बहुदा अतिशय हुशारीने सीसीटीव्हीच्या रेंजबाहेर उभे राहून त्यांनी ते चेक बुक घेतलं असावं. मात्र ही बाब सुखदेवला माहीत असण्याची शक्यता नव्हती.
 
“हे पहा साहेब, तुम्हाला असं वाटत असेल की ते चेकबुक खरंच आम्ही नेलं असेल तर तसं सिद्ध करा. आमचा अर्ज, रजिस्टरवर सही, सीसीटीव्ही रेकॉर्डिंग काहीही दाखवा आम्ही ते मान्य करू. पण जर तुमच्याकडे यापैकी काहीही पुरावा नसेल तर मात्र वेळ न घालवता आम्हाला आमचे पैसे देऊन टाका. मी माझी तक्रार मागे घेऊन हे प्रकरण मिटवून टाकेन.”
 
सुखदेवच्या चेहऱ्यावर आता कुटील, बेरकी हास्य होतं. निरुत्तर होऊन RM साहेब उपरोधाने म्हणाले..
“अरे वा ! बॅंकेतील अंतर्गत बाबींची तुम्हाला स्टाफ पेक्षा ही जास्त माहिती असल्याचं दिसतंय.. ही घटना कशी घडली किंवा कशी घडवून आणली गेली याची थोडी थोडी कल्पना येतेय मला..”
 
“नुसत्या कल्पना करीत बसू नका..” खुर्चीवरून उठून उभा रहात RM साहेबांकडे बोट रोखीत त्वेषाने सुखदेव म्हणाला..
“एक दिवस..! आणखी फक्त एक दिवस मी थांबेन.. आणि तेही तुम्ही खास मला भेटायला इथवर आलात म्हणून केवळ तुमचा मान राखण्यासाठी.. पण त्यानंतर मात्र एक सेकंदही न थांबता थेट पोलीस स्टेशनची पायरी चढेन.. आणि.. पोलिसांचं काम तर तुम्ही जाणताच.. स्टाफचा छळ, अटक, जामीन, कोर्टात फेऱ्या, बँकेची बदनामी.. आत्ताच सारं काही बोलत नाही.. उद्या संध्याकाळ पर्यंत तुम्हाला मुदत देतो.. तुमच्या स्टाफची तुम्हाला खरोखरीच काळजी असेल तर विचारपूर्वक योग्य तो निर्णय घ्या.. येतो मी !”
 
दोन्ही हात उंचावून नमस्कार करीत झपाझप पावले टाकीत सुखदेव बँकेतून निघून गेला. तो गेल्यावर निश्वास सोडीत RM साहेब म्हणाले..
“काय डेंजरस माणूस आहे हा.. ! खात्रीने सांगतो, यानेच पैसे काढले आहेत आणि आता उलट्या बोंबा मारतो आहे.. पण तुम्ही घाबरू नका.. रिजनल ऑफिस तुमच्या पाठीशी आहे.. तसं मी DGM आणि GM साहेबांच्या कानावरही घालून ठेवतो हे प्रकरण.. पुढील दोन दिवस Branch व्हिजिट साठी मी याच परिसरात आहे, तेंव्हा काही काळजी करण्यासारखं वाटलं तर लगेच फोन करा.. मी येऊन भेटून जाईन..”
 
केबिन बाहेर येऊन RM साहेबांनी स्टाफचा निरोप घेतांना त्यांची पाठ थोपटून त्याचं कौतुक केलं..
“यू आर डुईंग गुड जॉब.. असंच एकजुटीने राहून काम करा.. आणि निश्चिन्त रहा.. आमचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे..”
कारमध्ये बसल्यावर RM साहेबांनी मला जवळ बोलावून हळू आवाजात सांगितलं..
“ते paid instrument (चेक), चेकबुक इश्यु रजिस्टर आणि सीसीटीव्ही रेकॉर्डिंग हे सारं तुमच्या Safe Vault मध्ये नीट सुरक्षित ठेवा. त्या अर्जाप्रमाणेच या गोष्टी सुद्धा गहाळ केल्या जाऊ शकतात..”
 
 
त्यानंतरचे दोन दिवस शांततेत गेले. फक्त एक दिवस थांबून मग पोलीस केस करण्याची धमकी देऊन गेलेला सुखदेव हे दोन दिवस बँकेकडे फिरकलाही नाही. रत्नमाला बाईंचा पैसे परत करण्याची मागणी करणारा अर्ज मी या आधीच रिजनल ऑफिसला पाठवून दिला होता. प्रकरणाची चौकशी करण्यासठी क्षेत्रीय कार्यालयातर्फे एक वरिष्ठ अधिकारी शाखेला भेट देऊन गेले. अकाऊंटंट रविशंकर, चेकबुक देणारी बेबी सुमित्रा, चेक घेऊन टोकन देणारे सिनियर काऊंटर क्लर्क रहीम चाचा व फायलिंग करणारा दप्तरी प्युन रामदास.. या चौघांना नियमांची काटेकोर अंमलबजावणी न करून कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल स्पष्टीकरण (explanation) विचारण्यात आले.
 
अशातच, सुखदेव बोडखे गेले दोन दिवस पोलीस स्टेशनमध्येच बसला असून फौजदार साहेबांशी अर्थपूर्ण वाटाघाटी करीत असल्याचे वृत्त संजू चहावाल्याने आणले. बहुदा, सुखदेवच्या तक्रारीवरून पोलिसांनी बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध FIR दाखल केला असावा असा त्याचा अंदाज होता. वैजापुरातील रिक्षावाले अवैध वाहतुकीबद्दल पोलिसांना द्यावा लागणारा हफ्ता संजूकडेच जमा करीत असत. ती रक्कम देण्यासाठी संजू नेहमीच पोलीस स्टेशनमध्ये जात असे. त्यामुळे त्याला पोलीस स्टेशन मधील हालचालींची अपटुडेट बित्तंबातमी मिळत असे.
 
RM साहेब रोज संध्याकाळी फोन करून प्रकरणातील ताज्या घडामोडींची माहिती घेत असत. सुखदेवने बॅंकेविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली असल्याची शंका त्यांना बोलून दाखवतांच ते म्हणाले..
“हे तर अपेक्षितच होते. आता पोलिस बँकेत येऊन चौकशी करतील. ते जी माहिती मागतील ती देऊन त्यांना तपासात सहकार्य करा. कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊन सुखदेवशी संपर्क साधू नका. पोलीस येऊन गेल्यावर तो स्वतःच बँकेत येईल..”
 
 
माझं मन नुसतं बेचैन झालं होतं. विचार करून करून डोक्याचा भुगा झाला होता. कुणी घडवून आणलं असावं हे सारं ? रात्री उशिरापर्यंत CCTV चं घटनेच्या दिवसाचं रेकॉर्डिंग सारखं डोळे ताणून पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक बघत होतो. पण कुठलाच अगदी पुसटसा धागा दोरा ही गवसत नव्हता.
हा सुखदेव बोडखे अजून एवढा शांत का ? त्याचा पुढचा प्लॅन काय असावा ? बँकेतील कर्मचाऱ्यांना त्याच्या पूर्वेतिहासाबद्दल जी माहिती समजली होती त्यावरून तो अत्यंत धूर्त, नीच आणि कोडग्या मनोवृत्तीचा होता. या पूर्वी वैजापुरातील अन्य बँकांतील कर्मचाऱ्यांना केवळ पोलिसांची व बदनाम करण्याची धमकी देऊन लुबाडण्यात तो यशस्वी झाला होता. आमच्या दुर्दैवाने त्याची शिकारी वक्रदृष्टी आता आमच्या बँकेतील कर्मचाऱ्यांकडे वळली होती.
आपण कोणतंही चुकीचं गैरकृत्य केलेलं नाही त्यामुळे “कर नाही त्याला डर कशाला” या उक्तीनुसार आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे जरी मनाला समजावीत असलो तरी लवकरच काही तरी विपरीत, अशुभ, अघटित घडणार आहे अशी आतून हुरहूर लागून राहिली होती.
त्यातून अजून त्या *जयदेव खडके* चा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता..
कोण होता हा जयदेव खडके ???
(क्रमशः 4 )
 
 
 

ajay-kotnis-photo1श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे

Mind blowing experiences of a Banker-2 एका बँकर चे थरारक अनुभव-2

ajay kotnis-2

बॅंकस्य कथा रम्या..

स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव..

(भाग.. 2)
अचानक झालेल्या या गर्दी गोंधळामुळे क्षणभर गांगरून मी अचंभित झालो.
“आत्ताच्या आत्ता आमचे पैसे परत करा.. !!”
 
उजव्या हाताची मूठ वळून ती माझ्या टेबलावर जोरजोराने आपटीत रत्नमाला ओरडत होती. तिचा पती व मुलगा हे दोघेही रागारागाने हातवारे करून तारस्वरात ओरडत तिला साथ देत होते. हा सगळा तमाशा करीत असताना अधून मधून ते आपल्या मागे पुढे, सगळीकडे नजर फिरवून बँकिंग हॉल मधील ग्राहकांचे लक्ष आपल्याकडे वेधले गेले आहे की नाही याची खातरजमा करून घेत होते.bank
 
जागीच उभा रहात दोन्ही हात उंचावून त्यांना शांत राहण्याची खूण करीत म्हणालो..
“शांत व्हा.. शांत व्हा.. ! तुम्ही काय म्हणताय ते मला अजिबात समजत नाहीये.. कुठल्या पैशाबद्दल बोलताय तुम्ही..? इथे नीट बसून मला सविस्तरपणे समजावून सांगा..”
 
यावर डोळे मोठ मोठे करीत रागारागाने सुखदेव किंचाळला..
“काय साहेब नाटक करताय ? काल आमच्या खात्यातून एवढी मोठी रक्कम गेली आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला काहीच माहीत नाही.. ? ते काही नाही.. आम्ही इथे बसायला आलेलो नाही.. बऱ्या बोलाने ताबडतोब आमचे पैसे देता की नाही ते सांगा.. !”
 
सुखदेव आणि रत्नमाला यांची ती बेभान अवस्था बघून मी त्यांच्या तरुण मुलाला.. बबनला म्हणालो,
“बबन, तू तरी सांग नेमकी काय तक्रार आहे तुमची ? काल दुपारपर्यंत मी बँकेतच नव्हतो. त्यामुळे खरंच काल काय झालं याची मला काहीही कल्पना नाही..”
“परवाच मी आईच्या खात्यात सहा लाख रुपये जमा केले होते आणि काल कुणीतरी त्यातून पाच लाख ऐंशी हजार रुपये काढून घेतले आहेत. आमच्या खात्यातले पैसे तुम्ही असे दुसऱ्या कुणालाही कसे देऊ शकता ?
 
बबनने एकदाचा खुलासा केला.
“काही नाही रे बबन, हे आपल्याशी खोटं बोलत आहेत.. ह्या बँकेतल्या साऱ्या कर्मचाऱ्यांनी मिळूनच आपले पैसे गिळंकृत केले आहेत.. आणि आता आपली दिशाभूल करीत आहेत.. एका स्वातंत्र्य सैनिकाच्या असहाय्य कुटुंबाची ते अशी घोर फसवणूक करीत आहेत.. यांना चांगला धडा शिकविलाच पाहिजे..”
रागाने लालबुंद होत तावातावाने सुखदेव बबनला म्हणाला.
 
आश्चर्य म्हणजे सुखदेव सोबत आलेले आठ दहा अनोळखी लोक कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता माझ्या केबिन मध्ये शांतपणे नुसते उभे होते.
ताबडतोब अकाऊंटंट, फिल्ड ऑफिसर आणि हेड कॅशिअर या तिघांनाही माझ्या केबिन मध्ये बोलावले आणि “हे लोक काय म्हणताहेत..? तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे काय ?” असं विचारलं. त्या तिघांनीही नकारार्थक मान डोलावत त्यांना याबद्दल काहीही माहीत नसल्याचे सांगितले.
 
मग मात्र माझं डोकंच चक्रावून गेलं. जर स्टाफ पैकी कुणालाच अशा कोणत्याही घटनेची माहिती नाही तर मग ह्या बोडखे कुटुंबाला त्याबद्दल कुणी सांगितलं.. ?
दरम्यान रत्नमालाबाईं कडून त्यांच्या खात्याचं पासबुक घेऊन अकाऊंटंट साहेब त्या खात्यात आतापर्यंत कोणकोणते व्यवहार झाले आहेत हे तपासायला घेऊन गेले होते. तोपर्यंत चपराशा कडून जास्तीच्या खुर्च्या मागवून केबिन मध्ये आलेल्या सर्व मंडळींची बसण्याची व्यवस्था केली. सर्वजण खुर्च्यांवर शांतपणे बसलेले पाहताच संजू चहावाल्याने लगबगीने सर्वांसाठी फक्कडसा चहा करून आणला.
 
आता सुखदेवही बराच शांत झाला होता. आत्मविश्वासाने सगळ्यांकडे पहात आपल्या बरोबर आलेल्या मंडळींचा त्याने परिचय करून दिला. ती मंडळी म्हणजे चार पत्रकार, दोन वकील, तीन राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी व एक दोन सामाजिक कार्यकर्ते होते.
 
सर्व जण अकाऊंटंट साहेब परत येण्याची वाट पहात होते. सुखदेवने हातातील पिशवीतून कागदांची एक सुरळी काढून त्यातील एक कागद माझ्या समोर ठेवला. तो रत्नमाला बोडखे यांनी त्यांच्या खात्यातून काढले गेलेले पाच लाख ऐंशी हजार रुपये परत मिळावे या साठी मला उद्देशून लिहिलेला अर्ज होता. त्या अर्जाच्या प्रतिलिपी (copies) आमच्या बँकेचे चेअरमन, रिजनल मॅनेजर, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यापासून ते थेट राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांना अग्रेसित (forward) केलेल्या होत्या.
 
“आणखी तीन वर्षांनी मी रिटायर होणार आहे.. मला पेन्शन नाही.. मुलाला नोकरी नाही.. घरी वृद्ध वडील आहेत, त्यांना स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन मिळते. त्याचाच काय तो आधार आहे. निवृत्तीनंतर शेती करून उदर निर्वाह करावा अशा विचाराने बायकोचे दागिने मोडून शेती विकत घेण्यासाठी हे पैसे उभे केले होते. पण तुम्ही बँकवाल्यांनी ते खाऊन टाकले, त्यामुळे माझे शेती घेण्याचे स्वप्न चक्काचूर झाले. माझे व माझ्या कुटुंबियांचे भविष्य तुम्ही अंधःकारमय केलेत..”
एखाद्या सराईत वक्त्या प्रमाणे छापील पोपटपंची करीत सुखदेव बोडखे बोलत होता. जणू जमलेल्या पत्रकारांना पेपरात छापण्यासाठी तो तयार वाक्येच पुरवीत होता.
 
“जर आमच्या आयुष्यभराची पुंजी, जी तुमच्या कर्मचाऱ्यांनी हडप केली आहे, ती आम्हाला दोन दिवसात परत मिळाली नाही तर मी हे प्रकरण पोलिसांत देईन, माझ्या पत्रकार मित्रांतर्फे वर्तमानपत्रांत याबद्दल आवाज उठविन.. ! हा अर्ज घ्या.. आणि ह्या दुसऱ्या कॉपी वर Received लिहून सही शिक्का मारून द्या..”
सुखदेवचे बोलणे सुरू असतांनाच अकाऊंटंट साहेब रत्नमाला बाईंच्या खात्याची चौकशी करून केबिन मध्ये परत आले होते..
“सर, परवा या खात्यात सहा लाख रुपये जमा करण्यात आले होते आणि काल चेक द्वारे त्यातून पाच लाख ऐंशी हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. आज रोजी खात्यात फक्त वीस हजार रुपये शिल्लक आहेत.. तसंच, ही पाहा कालची व्हाऊचर्स.. ! त्यातील ह्या पाच लाख ऐंशी हजार रुपयांच्या चेक वर रत्नमाला बाईंचीच सही आहे आणि त्यांना दिलेल्या चेक बुक मधीलच हा चेक आहे..”
 
एका दमांतच अकाऊंटंट साहेबांनी घडाघडा सर्व माहिती सांगून टाकली.
“हा चेक तुम्हीच पास केला असेल ना ?”
मी अकाऊंटंट साहेबांना विचारलं..
“नाही साहेब ! गेले दोन दिवस मी रजेवर होतो. माझ्या जागी रविशंकर बसला होता, त्यानेच पास केला आहे हा चेक..”
“ठीक आहे.. तुम्ही जा, आणि कृपया
रविशंकरला इकडे पाठवून द्या..”
अकाऊंटंट साहेब निघून गेल्यानंतर लगेच आधी माझ्या कॉम्प्युटर वरून रत्नमाला बाईंच्या सहीचा नमुना चेक केला. तो चेकवरील सहीशी तंतोतंत जुळत होता. तसेच तो चेक ही त्या बाईंना दिलेल्या additional चेक बुक मधील असल्याचे कॉम्प्युटर दाखवीत होता.
“बघा.. !” रत्नमाला बाईंना तो चेक दाखवीत मी म्हणालो..
“हा चेक तुम्हाला दिलेल्या चेक बुक मधीलच आहे आणि त्यावरील सही सुद्धा तुमचीच आहे. या बेअरर चेकचे पेमेंट करण्यात आमच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही चूक झाल्याचे मला तरी दिसत नाही.. !!”
 
माझ्या या ठासून बोलण्याचा रत्नमाला बाईंवर काहीएक परिणाम झाला नाही. तितक्याच निर्धारपूर्वक ठामपणे ती म्हणाली..
“पण मुळात ही सही मी केलेलीच नाही आणि हा चेक सुद्धा मला दिलेल्या चेक बुक मधील नाही..!”
आमचं असं संभाषण चालू असतांनाच तरुण, हसमुख रविशंकरने केबिन मध्ये प्रवेश केला. बिहारी बाबू असलेला रविशंकर अत्यंत शांत, सहृदय आणि समंजस कर्मचारी होता. गेल्या काही वर्षांपासून तो वैजापूर शाखेतच हेड कॅशियर पदावर काम करीत होता. नुकतीच त्याची अधिकारी पदावर पदोन्नती झाली होती.
“रविशंकर, ये चेक आपने पास किया है ना ? कुछ याद है, किसने लाया था ये चेक..?”
 
“जी हां साब ! कोई नया ही आदमी था चेक लानेवाला.. पिछले सात साल से मैं वैजापुर में रहता हूं.. यहां के लगभग सभी लोगों को मैं अच्छी तरह पहचानता हूं.. लेकिन उस आदमी को मैने पहली बार देखा था.. हो सकता है के शायद किसी दूसरे गांव का हो.. लेकीन.. प्रॉब्लेम क्या है साब.. ?”
रविशंकर आतापर्यंत बँकेच्या मागील बाजूस असलेल्या डायनिंग रूम मध्ये दार लावून शांतपणे पीक कर्जाची डॉक्युमेंट्स तयार करीत बसला असल्याने बाहेर चाललेल्या गोंधळाची त्याला काहीच कल्पना नव्हती.
“ये डिपॉझिटर मॅडम कहती है के उन्होंने ऐसा कोई चेक कभी किसी को भी दिया ही नहीं था..”
“ओ माय गॉड ! लेकीन ये कैसे हो सकता है ? चेक तो मॅडम को इश्यू किए गए चेक बुक में से ही था.. और चेक पर जो सिग्नेचर था वो भी scanned speciman signature से हुबहू मेल खा रहा था।”
बिचारा रविशंकर..!! अधिकारीपदी प्रमोशन झाल्यानंतर पहिल्यांदाच “पासिंग” ला बसला होता. त्याला या प्रकाराचं विलक्षण आश्चर्य वाटत होतं.
“लेकीन मॅडम.., आपको दिया गया चेक बुक किसी दूसरे के हाथ कैसे लग सकता है ? जरूर आपने चेक बुक अच्छी तरह सम्हालकर नही रखा.. ये आप की ही लापरवाही का नतीजा है के चेक गलत हाथों में पड़ा..!!”
 
रविशंकरच्या या बोलण्याचा उलटाच परिणाम झाला. सुखदेव बोडखे रागाने ताडकन खुर्चीवरून उठला आणि म्हणाला..
“उगीच तुमच्या चुकीचं खापर आमच्या डोक्यावर फोडू नका हं साहेब.. बँकेतून नेलेलं चेक बुक आम्ही कपाटात नीट सुरक्षित ठेवलंय. आत्ताच तपासून आलोय मी. त्यातील दहाचे दहा चेक तसेच आहेत..”
“अहो पण तुम्ही एक जास्तीचं चेक बुक सुद्धा घेतलं होतं ना त्या खाजगी बँकेत देण्यासाठी.. ?”
… माझे हे शब्द पूर्ण होण्या अगोदरच सुखदेव त्याच्या बरोबर आलेल्या मंडळींना म्हणाला..
“चला रे.. ! यांचा आज तरी पैसे परत करण्याचा इरादा दिसत नाही.. यांना काय गोंधळ घालायचाय तो घालू दे, काय चौकशी करायचीय ती करून देत.. उद्या पर्यंत जर आमचे पैसे परत मिळाले नाहीत तर यांच्याविरुद्ध पोलिसांत जाण्याशिवाय अन्य मार्ग मला दिसत नाही..”
 
“हे बघा, आधी आपण कालचं सीसीटीव्ही फुटेज चेक करू. ज्या कुणी हा चेक प्रेझेंट करून पैसे नेले आहेत तो माणूस तुमच्या ओळखीचा आहे कां ते बघा. तसंच आधी आम्हाला आमच्या वरिष्ठांना या घटनेबाबत कळवावं लागेल आणि त्यांच्या सुचनेनुसारच पुढची पाउले उचलावी लागतील. माझी नम्र विनंती आहे की या तपासात तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं..”
परंतु माझ्या या विनंतीचा सुखदेव आणि त्याच्या कुटुंबियांवर काहीएक परिणाम झाला नाही. त्यांचं तमाशा करून बँकेत गोंधळ घालण्याचं आणि धमकी देण्याचं काम पूर्ण झालं होतं.
 
“तुमच्या तपासाशी आम्हाला काहीच देणंघेणं नाही. हे सारं नाटक आहे. गरिबांचा तळतळाट घेऊ नका साहेब, ताबडतोब आमचे पैसे परत करा. वाटल्यास तुमच्या वरिष्ठांना आजच वैजापूरला बोलावून घ्या. कारण मी फक्त उद्यापर्यंत थांबेन. आणि उद्या संध्याकाळ पर्यंत माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर मात्र नाईलाजाने मला हे प्रकरण पोलिसांकडे द्यावे लागेल.. विचार करा आणि त्वरित निर्णय घ्या..”
एवढं बोलून जमलेल्या मंडळींकडे पहात सुखदेव म्हणाला..
“चला रे ! उद्याचा दिवस आपण वाट पाहू आणि मग आपलं ठरल्याप्रमाणे करू..”
 
सुखदेवने इशारा करतांच एक ही शब्द न बोलता केबिन मधील सर्व जण उठले आणि आज्ञाधारकासारखे सुखदेव मागोमाग निमूटपणे बँकेबाहेर निघून गेले.
ते लोक जाताच रविशंकरला शेजारी बसवून घेत सीसीटीव्हीचा माउस हातात घेऊन कालचं रेकॉर्डिंग चेक करू लागलो. सकाळी ठीक साडे दहा वाजता एक अदमासे तिशीच्या आसपास असलेला गृहस्थ काउंटर क्लार्ककडे चेक देताना दिसला. त्याला पाहताच उत्तेजित होऊन रविशंकर म्हणाला..
“यही है.. ! यही है साब.. वो पांच लाख अस्सी हजार के चेकवाला..”
 
थोडा वेळ काउंटर क्लार्कशी बोलून टोकन घेऊन तो माणूस कॅश काउंटरच्या रांगेत उभा राहिलेला दिसला. रांगेतील अन्य लोकांशी तो माणूस जुनी ओळख असल्यागत हसून बोलत होता. त्याचा नंबर आल्यावर कॅशियरशी एक दोन शब्द बोलून तो रिकाम्या हातीच परत फिरून सरळ बॅंकेबाहेर गेलेला दिसला.
“हम स्ट्रॉंग रूम में से जादा कॅश नही निकालते. सुबह बगलका पेट्रोल पंप जो कॅश जमा कराता है उसीमें से सभी पेमेंट किये जाते है। कल पेट्रोल पंप की कॅश आने में थोडा समय था, इसलीये कॅशियर साब ने ऊस आदमी को दोपहर दो बजे आने को कहा था..”
रविशंकरने खुलासा केला.
त्यानंतर तो माणूस पुन्हा दुपारी अडीच वाजता बँकेत आलेला दिसला. पण त्या वेळी कॅशियर लंचला गेला असल्यामुळे थोडा वेळ हॉल मध्येच थांबून मग तीन वाजता पुन्हा काउंटर सुरू झाल्यावर तो काउंटर वर गेला आणि पाच लाख ऐंशी हजार घेऊन जाताना दिसला. अशा प्रकारे सकाळी साडे दहा ते दुपारचे तीन या दरम्यान तो माणूस बँकेत दिसत होता.
 
मी लगेच सर्व स्टाफ मेंबर्स तसेच बँकिंग हॉल मधील सर्व ग्राहकांना आत बोलावून त्यांना सीसीटीव्हीत दिसणारा तो कॅश नेणारा माणूस दाखवला. मात्र तो माणूस कुणाच्याच ओळखीचा नव्हता. आम्ही दिवसभर ही शोध मोहीम राबविली. मोंढ्यातील मुनींमांच्या हातात असते तशी थैली त्या माणसाकडे दिसत होती, म्हणून आमच्या मोंढ्यातील सर्व कस्टमर्सना फोन करून बँकेत बोलावून घेतले. पण कुणालाच तो माणूस ओळखता आला नाही.
दुसऱ्या चेकबुक बद्दल सुखदेव काहीच बोलण्यास तयार नव्हता म्हणून मला शंका आली. मी सेव्हिंग बँक क्लर्क बेबी सुमित्राला बोलावून विचारलं..
“सुमित्रा, आपनेही रत्नमाला मॅडम को दूसरा चेकबुक इश्यु किया था नं ?”
“जी हां साब. “
“आपने दुसरा चेक बुक देने से पहले उनसे अर्जी ली थी नं..?”
“जी हां साब.. अर्जी लेने के बाद मैने पहले सिग्नेचर व्हेरीफाय की और दूसरा चेक बुक सिस्टिम में फीड करने के बाद ‘चेक बुक इश्यु रजिस्टर’ में लिख कर रविशंकर साब के पास चेकिंग के लिए भेज दिया..”
बेबी सुमित्राने खणखणीत आवाजात उत्तर दिलं. छत्तीसगडच्या आदिवासी भागातून आलेली बेबी सुमित्रा अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच बँकेत लागली होती. साधी, सरळ बेबी जितकी मेहनती आणि कष्टाळू तितकीच निर्भीड व स्पष्टवक्ती होती.
 
“बहुत अच्छा ! वो अर्जी और चेकबुक इश्यु रजिस्टर यहां लेकर आओ..”
“अभी लाई, सर !” असं म्हणत बेबी सुमित्रा लगबगीने रेकॉर्ड रूमकडे निघाली.
दरम्यान, कॉम्पुटरचं काम करणाऱ्या गावातील टेक्निशियनला सीसीटीव्हीचं त्या दिवशीचं फुटेज पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन त्याची सीडी तयार करायला सांगितलं. तसंच फुटेज मधून त्या संशयित व्यक्तीचा वेगवेगळ्या अँगल मधून फोटो घेऊन तो एनलार्ज करून त्याच्या भरपूर कॉपीज प्रिंट करायलाही सांगितलं. अवघ्या तासाभरातच सीसीटीव्ही फुटेजची सीडी व संशयिताचे फोटो त्याने बँकेत आणून दिले. सीडी अलमारीत सुरक्षित ठेवून संशयिताच्या फोटोच्या कॉपीज सगळ्या वॉचमन, प्युन व कर्मचाऱ्यांना दिल्या. बँकेत येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला तो फोटो दाखवून “कुणी त्याला ओळखतं का ?” याचा शोध सुरू झाला.
बराच वेळ झाला तरी बेबी सुमित्रा अद्याप तो दुसऱ्या चेकबुक साठीचा अर्ज व चेकबुक इश्यु रजिस्टर घेऊन आली नसल्याने ती काय करते आहे हे पहायला मी रेकॉर्ड रुम मध्ये गेलो. बेबी सुमित्रा तिथल्या डस्ट बिन मधील फाडलेले, चुरगाळलेले कागद एक एक करून तपासून पहात होती. फायलिंगचं काम करणारा प्युन (दप्तरी) देखील तेच करीत होता.
 
“ये क्या कर रही हो सुमित्रा ? वो अर्जी तो फायलिंग में ही मिलेगी ना ?”
“सर, फायलिंग में सिर्फ वो ही अर्जी नही मिल रही.. ऊस दिन की बाकी सभी चेक बुक रिक्विझिशन स्लिपस् ठीक ढंग से फाईल कि हुई है.. मुझे तो ये किसीने जानपुछकर, इरादतन किया हुआ काम लगता है..”
बेबी सुमित्राच्या म्हणण्यात तथ्य दिसत होतं. तरीही तिला तो अर्ज शोधणं सुरूच ठेवायला सांगून मी चेकबुक इश्यु रजिस्टर मागवलं. त्यात रत्नमाला बोडखेला दिलेल्या चेक बुकचा नंबर, खातेदाराचे नाव व खाते क्रमांक, चेकिंग ऑफिसरची सही इत्यादी तपशील व्यवस्थित लिहिला होता. त्यानंतरच्या कॉलम मध्ये चेक बुक नेणाऱ्याची सही देखील होती. ते पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला.
“चला..! आपल्याकडे त्या बोडखेने बँकेतून दुसरं चेकबुक नेल्याचा लेखी पुरावा तर आहे.. !!”
मी मनाशीच म्हणालो..
 
मात्र ती सही रत्नमालाची वाटत नव्हती. त्यामुळे दुसरं चेकबुक घ्यायला काउंटरवर कोण आलं होतं याबद्दल बेबीला विचारलं तेंव्हा सुखदेव बोडखेचा मुलगा बबन हा आपली आई रत्नमालाला घेऊन चेकबुक नेण्यासाठी आल्याचं समजलं. चेकबुक द्यायला फक्त पाच मिनिटे उशीर झाला तेंव्हा हा बबन स्टाफशी भांडण करीत अपशब्दही बोलला असल्याचं बेबी सुमित्राला चांगलंच आठवत होतं.
“म्हणजे ही चेकबुक नेल्याची सही बबनची आहे तर..” मी स्वतःशीच पुटपुटलो.
“नाही सर !”
माझं पुटपुटणं ऐकतांच अकाऊंटंट साहेबांनी लगेच खुलासा केला.
“ती सही बबनची नाही. त्या अगोदरचं चेकबुक ज्यानं नेलं त्याची आहे. चुकून त्याने एक ओळ खाली, म्हणजे रत्नमाला बाईंच्या नावासमोर सही केली आहे. नीट काळजीपूर्वक पाहिल्यावरच ते समजून येतं..”
ते ऐकून मी हादरलोच. अरे बापरे ! एकतर दुसऱ्या चेकबुक साठीचा अर्ज गहाळ आणि चेकबुक इश्यू रजिस्टरवर कस्टमरची सही सुद्धा नाही.. म्हणजेच रत्नमालाबाईंना दुसरं चेकबुक दिल्याचा कुठलाही पुरावा बँकेकडे नाही. म्हणूनच तर तो सुखदेव एवढ्या आत्मविश्वासाने बोलत होता..
आता काय करायचं ? अशा प्रसंगी शाखेच्या पातळीवर जे जे काही करता येणं शक्य होतं ते ते करून झालं होतं. त्यामुळे वरिष्ठांच्या कानावर आता हे प्रकरण घालायलाच हवं असा विचार करून रिजनल मॅनेजर साहेबांना फोन करून थोडक्यात त्यांना संपूर्ण प्रकरणाची कल्पना दिली.
“मी उद्या शिर्डीच्या दिशेने जाणारच आहे, तेंव्हा वाटेत सकाळी थोडावेळ वैजापूरला थांबेन.. त्यावेळी बोलू. जमल्यास त्या तक्रारदारालाही मला भेटण्यासाठी बँकेत बोलावून घ्या.”
एवढं बोलून रिजनल मॅनेजर साहेबांनी फोन ठेवला.
 
तो दिवस खूपच तणावपूर्ण धावपळीत गेला. शाखेतील सर्वच कर्मचारी एकदिलाने या आकस्मिक संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले होते. त्या संशयिताचे फोटो घेऊन प्रत्येक कर्मचारी जो भेटेल त्याच्याकडे चौकशी करीत होते. काही जण बस स्टँड, रेल्वे स्टेशन, लॉज, हॉटेल्स, पानाचे ठेले अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन त्या इसमाचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करीत होते. दिवसभर शोधूनही दुसऱ्या चेकबुक साठीचा “तो अर्ज” अजून सापडला नव्हता. सीसीटीव्हीचे फुटेज अनेकदा पाहून झाले होते. काही तरी महत्वाचा “क्लु” अगदी नजरे समोरच आहे पण हाती येत नाहीये असं राहून राहून जाणवत होतं.
उद्या सकाळी नऊ वाजता रिजनल मॅनेजर साहेब येणार असून त्यांना भेटण्यासाठी शाखेत लवकर येण्याबाबत सर्व स्टाफला कळविले. तसेच सुखदेव बोडखे यालाही फोन करुन तसा निरोप दिला. रात्री उशिरापर्यंत सर्व जण काळजीपोटी बँकेतच थांबले होते. कुणीतरी खूप विचारपूर्वक प्लॅन करून बँकेची फसवणूक केल्याची सर्वांनाच मनोमन खात्री पटली होती. काही जण सुखदेव बोडखेच्या कुटुंबाबद्दल माहिती गोळा करण्यासाठी गावात गेले होते. त्यांनी आणलेली माहिती धक्कादायक होती.meeting
 
घटनेचा तिसरा दिवस उजाडला. सर्वजण सकाळी साडेआठ वाजताच बँकेत येऊन RM साहेबांची वाट पहात बसले होते. इतक्यात संजू चहावाला घाईघाईत बँकेत येताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसत होते. केबिन मध्ये येऊन मला नमस्कार केल्यावर त्याने हातातील वर्तमानपत्रे माझ्या समोर ठेवली. दैनिक लोकमत, दै. सकाळ, दै. पुण्य नगरी अशा प्रमुख वर्तमानपत्रांचे ते आजचे अंक होते. आणि त्या सर्व पेपरात एकच बातमी ठळक अक्षरात छापून आली होती..
*”वैजापूरच्या स्टेट बँकेत प्रचंड रकमेचा अपहार.. कर्मचाऱ्यांनी संगनमताने हडप केले गरीब कुटुंबाचे पाच लाख ऐंशी हजार रुपये.. प्रकरण पोलिसांकडे..”*
(क्रमशः 3)
(संपूर्ण काल्पनिक)
 

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

ajay-kotnis-photo1श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे

Mind blowing experiences of a Banker-1 एका बँकर चे थरारक अनुभव-1

ajay kotnis story

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

बँकस्य कथा रम्या..

“स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव..”

अगदी एखाद्या रहस्यमय कादंबरीत शोभावी अशी एक घटना मी वैजापुरच्या स्टेट बँकेत व्यवस्थापकपदी असताना घडली, त्याचीच ही चित्तरकथा.. नव्हे चित्तथरारक कथा.. !!
 
सुखदेव बोडखे नावाचा साधारण पन्नास पंचावन्न वर्षे वयाचा बँकेचा एक जुना खातेदार एके दिवशी आपल्या बायकोला घेऊन बँकेत आला. त्याला बायकोच्या नावाने चेक बुक सुविधा असलेले खाते उघडायचे होते. तो स्वतः औरंगाबादला कुठल्यातरी सरकारी खात्यात चपराशाची नोकरी करीत होता. त्याला स्वत:च्या मुलासाठी मोटारसायकल घ्यायची होती. नोकरीचा कालावधी पाच वर्षांहून कमी उरल्याने त्याला त्याच्या ऑफिसमधून कर्ज मिळू शकत नसल्याने बायकोच्या नावाने खाजगी बँकेतून तो कर्ज घेणार होता.. आणि त्या खाजगी बँकेला देण्यासाठी त्याला चेक बुक हवे होते.
 
सुखदेव बोडखेचे आमच्या बँकेत खाते असल्याने त्याच्या introduction ने लगेच त्याची बायको रत्नमालाच्या नावाने खाते उघडून दिले. अवघ्या अर्ध्या तासात नवीन खात्याचे पासबुक व चेकबुक हातात पडल्याने खुश होऊन माझ्या केबिनमध्ये येऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करून माझे आभार मानीत आनंदी चेहऱ्याने सुखदेव बँकेतून निघून गेला. अतिशय नम्र आणि मृदुभाषी असलेल्या सुखदेवचे ते आभार मानण्याचे gesture मला खूप आवडले आणि आतून मनोमन सुखावुनही गेले.
 
सुमारे आठ दिवसांनी सुखदेव बायकोला घेऊन पुन्हा बँकेत आला. “आपण दिलेल्या चेकबुक मध्ये फक्त दहाच चेक आहेत आणि त्या खाजगी बँकेला कर्जास तारण म्हणून किमान वीस कोरे (Blank) चेक द्यावे लागतात.. म्हणून मला दहा चेकचे आणखी एक चेकबुक द्या..” असे तो म्हणत होता.
नियमानुसार रत्नमाला बोडखेच्या नावाने additional चेकबुकसाठीचा अर्ज घेऊन ताबडतोब त्याला दुसरे चेक बुक देण्यात आले. Additional चेकबुक चार्जेस संबंधित खात्याला डेबिट टाकण्यात आले. याही वेळी तत्पर सेवेबद्दल अदबीने मान झुकवून माझे आभार मानीत सुखदेव बायकोसह निघून गेला. त्याचा तो नम्र, शालीन, विनयशील स्वभाव अंतर्यामी मला खूपच भावला..
 
तो गेल्यानंतर मी सहज स्वतःशीच विचार करीत बसलो. एव्हाना वैजापुरला येऊन मला वर्ष होत आलं होतं. सुरवातीचं नवखेपण सरून बँकेच्या दैनंदिन कामकाजावर माझी आता चांगलीच पकड बसली होती. डिपॉझिट आणि कर्ज वाटपाची वर्षभराची सर्व टार्गेट्स मी मुदतीपूर्वीच अचीव्ह केली होती. भरपूर कर्जवसुलीमुळे अनुत्पादक कर्जाचे (NPA) प्रमाणही खूप घटले होते. भरीस भर म्हणून इन्शुरन्सचा मुख्य (?) बिझिनेसही पुरेसा केल्यामुळे वरिष्ठही माझ्यावर प्रसन्न होते.
 
सुदैवाने शाखेतील सर्व स्टाफ खूप कष्टाळू व आज्ञाधारक होता. एक दोन जुने सिनियर वगळता बहुतांश कर्मचारी तरुण, उत्साही होते. वैजापुरलाच रहात असल्याने सर्वांच्या घरी जाऊन मी त्यांची आपुलकीने विचारपूस करीत असे. या ना त्या निमित्ताने अधून मधून सर्वांना बाहेर जेवायला घेऊन जात असे. कधी जवळच असलेल्या शिर्डीला दर्शनासाठी तर कधी एखाद्या शेतकऱ्याचा शेतावर हुरडा खाण्यासाठी लहान लहान सहली काढीत असे. त्यामुळे सर्व स्टाफशी खूप जवळीक निर्माण झाली होती.
 
एकंदरीत बँकेत सर्वच स्तरावर अत्यंत खेळीमेळीचं, मित्रत्वाचं आणि परस्पर विश्वासाचं वातावरण होतं. कुणाही मॅनेजरला सदैव हवंहवंसं वाटणारं स्थैर्य, शांती आणि चिंतामुक्त समाधान मला आता कुठे नुकतंच लाभू लागलं होतं.bank
 
 
मात्र ही वादळापूर्वीची शांतता होती. क्रूर नियतीने आमचं सौख्य हिरावून घेण्यासाठी केंव्हाच फासे फेकले होते. येणाऱ्या अकल्पित संकटाच्या यातनाचक्रात आम्ही सारे भरडून निघणार होतो. आमच्या दिशेने घोंगावत येणाऱ्या या आगामी भीषण भयकारी झंझावाताची त्यावेळी कुणालाही सुतराम कल्पना नव्हती.
ज्या दिवशी सुखदेव बोडखे दुसरे एक्स्ट्रॉ चेक बुक घेऊन गेला त्याच दिवशी दुपारी माझा जालन्याचा जिवलग मित्र अरुण भालेराव याचा फोन आला. हा माझा मित्र जालन्या जवळील आनंदगडच्या महाराजांचा शिष्य होता. दरवर्षी प्रमाणे हे महाराज आपल्या शिष्यांसह पालखी घेऊन वारीसाठी निघाले होते. वाटेत ते “कोली” नावाच्या गावात सकाळी थोडा वेळ थांबणार होते. तिथे गावकऱ्यांतर्फे सर्व वारकऱ्यांना फराळ दिला जाणार होता.
 
कोली हे गाव वैजापूर पासून फक्त पंधरा किलोमीटर दूर होते. तसेच ते भालेरावचे पैतृक गाव ही होते. भालेरावचे वडील बंधू निवृत्ती नंतर तेथील घरात राहून वडिलोपार्जित शेती पहायचे. माझा त्यांच्याशी जुजबी परिचय होता. अनायासे मी कोली गावापासून जवळच रहात असल्याने महाराजांचे स्वागत करण्यासाठी मी आदल्या दिवशीच कोली गावात जावे आणि त्यांच्या भावाकडे रात्री मुक्कामास रहावे असा भालेरावने आग्रह धरला.
 
योगायोगाने कोली गावाजवळील खंडाळा येथील एका गृह मालमत्तेवर जप्तीची ताबा नोटीस (Sarfaesi) सर्व्ह करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी मला जायचेच होते, तेंव्हा.. आज रात्री कोली गावात मुक्काम करावा व उद्या सकाळी खंडाळ्याची ताबा नोटीस सर्व्ह करून दुपार पर्यंत बँकेत यावे असं मी ठरवलं. त्याप्रमाणे रिजनल ऑफिसला फोन करून यासाठी त्यांची परवानगीही घेतली.
 
संध्याकाळी सहा नंतर मोटार सायकल घेऊन कोली गावाकडे निघालो. अर्ध्या तासातच गावात पोहोचलो. गाव मुख्य रस्त्याला अगदी लागूनच होतं. भालेरावांचे घर शोधून त्यांच्या घरात प्रवेश केला तेंव्हा तिथे गावातील काही वयोवृद्ध जाणकार मंडळी सतरंजीवर बसून ज्ञानेश्वरीचे पठण करीत होती. मला पाहताच भालेरावांनी उठून उभे रहात माझे स्वागत केले व उपस्थितांशी माझा परिचय करून दिला.
 
समोर असलेले ज्ञानेश्वरीचे जाडजूड पुस्तक मी सहज चाळून पाहिले. ती साखरे महाराजांची सुलभ ज्ञानेश्वरी होती.
“तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली आहे काय ?”
भालेरावांनी उत्सुकतेने विचारले..
 
“होय. संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत मराठी भाषेत लिहिलेली “भावार्थ दीपिका” म्हणजेच ज्ञानेश्वरी समजण्यास जरा कठीण आहे. कारण त्यातील बरेच शब्द आता प्रचलित नाहीत. ज्ञानेश्वरांनी गीतेतील कठीण श्लोकांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी
दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे (दृष्टांत) दिले आहेत.
 
सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकरांची सुलभ ज्ञानेश्वरी मी वाचली आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद् भगवदगीतेवरील टीका.. अशीच टीका लोकमान्य टिळकांनी “गीता रहस्य” नावाने लिहिली. त्यांच्यापूर्वी मध्वाचार्य, रामानुजाचार्य, पंडित त्रिविक्रम, आदिशंकराचार्य यांनीही गीतेवर भाष्य केले आहे. आचार्य विनोबा भावे यांनी “गीताई” तसेच “गीता प्रवचने” यातून अतिशय रसाळ भाषेत गीतेचे निरूपण केले आहे. या सर्वांनी आपापल्या दृष्टिकोनातून गीतेचा वेगवेगळा अर्थ लावला आहे. यापैकी काही पुस्तके, ग्रंथ मी वाचले आहेत. पण तरीही प्रत्येक वेळी गीता वाचताना तिचा वेगळाच, नवीन अर्थ समजतो.”
 
माझे उत्तर ऐकून जमलेले सर्व जण चकित झाल्यासारखे दिसले. मी कोणी फार विद्वान, प्रकांड पंडित असल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. गीतेबद्दल, ज्ञानेश्वरीबद्दल काही अत्यंत साध्या तर काही थोड्या जटिल शंका मग त्यांनी विचारल्या. माझ्या तुटपुंज्या पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर यथामती मी त्यांचे समाधानही केले.
 
“द्वैत अद्वैत म्हणजे काय ? ब्रह्म, प्रकृतीपुरुष, वेदांत, मोक्ष म्हणजे काय ? अशा विविध विषयांवर सखोल चर्चा झाल्यानंतर..
“स्थितप्रज्ञ” म्हणजे कोण ? आणि संसारात राहून आपण स्थितप्रज्ञ राहू शकतो काय ?”
असा प्रश्न भालेरावांनी विचारला.
 
उत्तरादाखल मी म्हणालो..
“ज्या पुरुषाची बुद्धी स्थिर झाली आहे अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. अशा माणसाला कोणतीही आशा, अभिलाषा नसते. तो सदा तृप्त असून सुख व दुःख यांमुळे त्याला आनंद किंवा उद्वेग होत नाही.
कासव ज्याप्रमाणे आपले अवयव (डोके व हात, पाय) स्वतःच्या इच्छेनुसार आवरून घेते किंवा बाहेर काढते त्याप्रमाणे त्याची इंद्रिये त्याच्या पूर्णपणे ताब्यात असतात. आत्मबोधाने तो सदा संतुष्ट असतो.”
 
माझ्या उत्तराने सर्वांचे समाधान झाल्यासारखे दिसले. मात्र “तुम्ही स्थितप्रज्ञ अवस्था अनुभवली आहे काय ?” या एका गावकऱ्याच्या पुढील प्रश्नावर..
“आतापर्यंत तरी नाही. परंतु यापुढे जेंव्हा भलं मोठं संकट पुढे उभं ठाकेल त्यावेळी मात्र स्थितप्रज्ञ राहण्याचा जरूर प्रयत्न करेन..”
असे थातुर मातुर उत्तर देऊन वेळ मारून नेली.
 
चर्चा बरीच रंगत गेल्यामुळे रात्री झोपायला खूप उशीर झाला. खेड्यातील लोक आपण समजतो तसे निरक्षर, अडाणी नसतात तर शहरी लोकांपेक्षा जास्त वाचन-अनुभवसंपन्न आणि अभ्यासू विचारवंतही असतात याची मला नव्यानेच प्रचिती आली.
 
ठरल्याप्रमाणे आनंदगडची पालखी सकाळी आठ वाजता कोली गावात आली. गावकऱ्यांनी वारकऱ्यांच्या न्याहरीसाठी पोटभर उपमा व गोड बुंदीची व्यवस्था केली होती. न्याहरीनंतर महाराजांनी अर्ध्या तासाचे प्रभावी प्रवचन करून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. दहा वाजता पालखीने गावातून प्रयाण केल्यावर सर्वांचा निरोप घेऊन मी ही खंडाळ्याच्या दिशेने निघालो.
 
खंडाळ्याचे काम पूर्ण होण्यास अपेक्षेपेक्षा खूपच जास्त वेळ लागला. आधी तर बॅंकेची ताब्याची नोटीस (Sarfaesi) घरावर लावून घ्यायलाच तो थकीत कर्जदार तयार नव्हता. कसेबसे त्याला समजावून चार लोकांसह नोटीस लावलेल्या घराचे फोटो काढून घेतले. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली असल्याने बस स्टँड वरील हॉटेलात जे मिळेल ते खाऊन घेतले. अधून मधून बँकेत फोन करून दैनंदिन कामाबद्दल विचारपूस करीतच होतो. बँकेत पोहोचलो तेंव्हा दुपारचे साडेतीन वाजले होते.sbh
 
तोपर्यंत बँकेतील गर्दी ओसरली होती. टेबलावर बसल्यावर दिवसभराचं साचलेलं काम भराभर हातावेगळं करू लागलो. सर्वात आधी फिल्ड ऑफिसरने तयार केलेल्या पीक कर्जाच्या पन्नास एक डॉक्युमेंट्सवर सह्या केल्या, महत्त्वाची डाक पाहिली, Sundry, Suspense, IBIT, DP या सारख्या ऑफिस अकाऊंटस् वरून एक नजर फिरवली, काही मोठ्या थकीत कर्जदारांना वसुलीसाठी फोन केले, रिजनल ऑफिसला NPA reduction, Crop loans, Personal loans, Housing loans disbursed, SB/CA a/cs opened, SBI Life इत्यादी दैनंदिन माहिती कळवली. त्यानंतर कॅश स्क्रोल बंद करून हेड ऑफिसची साईट उघडून महत्त्वाची सर्क्युलर्स काळजीपूर्वक वाचून काढली.
 
ही सर्व कामं करीत असतांनाही काल रात्रीची ज्ञानेश्वरी वरील चर्चा आणि एका गावकऱ्यांने विचारलेला स्थितप्रज्ञ अवस्थेबद्दलचा तो प्रश्न सारखा आठवत होता. “खरोखरीच, आपण पराकोटीच्या सुख-दुःखातही अजिबात विचलित न होता संयम राखू शकतो का ? यशाने उन्मत्त न होता आणि संकटांनी घाबरून न जाता मानसिक संतुलन कायम टिकवून ठेवू शकतो का ?”… मी स्वतःशीच विचार करीत होतो.
स्ट्राँग रूम क्लोज करून कॅशियर व अकाऊंटंट साहेब “गुड नाईट” करत निघून गेले. बाकीचा स्टाफ आधीच बाहेर पडला होता. फिल्ड ऑफिसर उद्या वाटप करायच्या पीक कर्जाची कागदपत्रे तयार करीत बसले होते. रात्रीचे दहा वाजल्यावर ते ही काम आवरून केबिन मध्ये आले, तेंव्हा मी सीसीटीव्हीच्या दिवसभरातील रेकॉर्डिंगवर धावती नजर फिरवीत होतो.
 
“चला साहेब, हॉटेल बंद होण्यापूर्वी जेवून घेऊ या.. नाहीतर उपाशीच झोपावं लागेल..”
दीर्घ जांभई देत फिल्ड ऑफिसर साहेब म्हणाले..
भिंतीवरील घड्याळाकडे पहात खुर्चीवरून उठलो आणि त्यांच्या सोबत बाहेर पडलो. जेवण झाल्यावर फिल्ड ऑफिसर म्हणाले..
“साहेब, रोजच्या सारखे आता पुन्हा बँकेत जाऊन काम करत बसू नका.. दिवसभराच्या दगदगीने थकले असाल, रूम वर जाऊन मस्त आराम करा.. उद्या सकाळी पुन्हा उठून बँकेत यायचेच आहे..”
त्यांचा काळजीचा सल्ला मानून रूमवर आलो. पलंगावर पडून झोपेची आराधना करीत असतानाही “विपरीत परिस्थितीतही आपण खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ राहू शकतो काय ?” हाच विचार मनात घोळत होता.
 
दुसऱ्या दिवशी रोजच्याप्रमाणे पहाटे उठून मॉर्निंग-वॉक झाल्यावर अंघोळ करून मारुती मंदिरात दर्शनासाठी गेलो. तिथून सरळ बँकेत आलो. बँकेत शिरताना मेन गेट जवळील संजू चहावाल्याच्या दुकानाच्या पायरीवर सुखदेव बोडखे आपल्या बायकोसह बसलेला दिसला. एवढ्या सकाळी त्याला बँकेसमोर पाहून आश्चर्य वाटलं. त्याच्याकडे पहात हसत हसत म्हणालो..
“आज एवढ्या सकाळी बँकेत काय काम काढलंत..?”
 
माझ्या या प्रश्नावर सुखदेवने काहीच उत्तर दिलं नाही, उलट आपली मान विरुद्ध दिशेला फिरविली.
बहुदा त्याला मी बोललेलं नीट ऐकू गेलं नसेल असं वाटून पुन्हा म्हणालो..
“अरे वा ! मोटार सायकलचे पेढे द्यायला आलात वाटतं ? झालं ना तुमचं कर्जाचं काम ? कि आणखी तिसरं ही चेक बुक लागतंय त्या खाजगी बँकेला ?”
 
माझ्या या बोलण्यावर सुखदेवने काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. माझ्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तो बायकोला उपरोधिक स्वरात म्हणाला..
“ए, तू रस्त्यात काय बसलीस.. बाजूला सरक, साहेबाला जाऊ दे.. कामाची माणसं आहेत ती.. आपल्या सारखी भिकार, रिकामटेकडी थोडीच आहेत.. “
सुखदेव सारख्या विनम्र माणसाकडून असं हेटाळणीपूर्ण वागणं मुळीच अपेक्षित नव्हतं. तरी देखील माणुसकी म्हणून त्याला म्हणालो..
“बँक उघडायला अजून दीड तास अवकाश आहे.. काही अर्जंट काम होतं का ?”
 
चेहऱ्यावर त्रासिक, तिरसट भाव आणीत उद्धटपणे सुखदेव म्हणाला..
“जा नं साहेब गुमान.. उगीच आमच्या नादी का लागता ? आधीच आम्ही आमच्या परेशानीत आहोत.. तुम्ही तुमचं काम बघा, विनाकारण आमच्यात नाक खुपसू नका..”
 
सुखदेवच्या तोंडचे ते तुसडे शब्द ऐकून मला धक्काच बसला. चपराशाची नोकरी करणाऱ्या त्या य:कश्चीत माणसाने माझ्याशी असे अरेरावीने बोलावे याबद्दल वाईट वाटून किंचित रागही आला. अपमान गिळून गेट उघडून मी बँकेत गेलो आणि खिन्न होऊन खुर्चीवर बसलो. सुखदेवच्या त्या दुर्व्यवहाराने मी चांगलाच दुखावलो होतो. माझी कोणतीच चूक नसताना त्याने माझ्याशी असे का वागावे ? नकळत माझे डोळे भरून आले आणि बायको नेहमी बजावते ते शब्द आठवले..
“तुम्ही नको तिथे माणुसकी दाखवायला जाता आणि अपमान करून घेता.. कोणत्याही माणसाशी त्याच्या पायरी नुसारच वागायला हवं.. हाताखालच्या माणसांवर तुमचा धाक असला पाहिजे. नोकरांना नोकरासारखंच वागवायला हवं, नाहीतर ते डोक्यावर बसतात. अति परिचयात अवज्ञा..! उठसूठ कुणालाही मान देत बसू नये. अशाने लोक तुमची किंमत करीत नाहीत..”
 
माझ्या केबिनच्या मागच्या खिडकीतून संजू चहावाल्याची टपरी दिसत होती. तिथे बसून सुखदेव कुणाची तरी वाट बघत होता. त्याचे विचार बाजूला सारून टेबलावरील कामात गुंगून गेलो. सव्वा दहा वाजता रखवालदाराने बँकेचे शटर उघडल्यावर कस्टमर्सचा लोंढा आत शिरला. सर्व काऊंटर्स पुढे रांगा लागल्या. माझ्या केबिनमध्येही पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. इतक्यात संजू चहावाला चहा घेऊन आला.
 
पूर्वाश्रमीचा सराईत गुंड आणि आता सन्मार्गाला लागून बँकेसमोर चहाची टपरी टाकून मेहनतीची कमाई खाणारा संजू चहावाला हा बँकेप्रती अतिशय कृतज्ञ होता. स्थानिक राजपूत समाजाचा एक नेता आणि वैजापूरच्या रिक्षा युनियनचा अध्यक्ष असलेल्या संजूचे पोलिसांशी तसेच गावातील सर्वच प्रभावशाली व्यक्तींशी जवळीकीचे संबंध होते. बँकेचा कट्टर समर्थक आणि पाठीराखा असलेला संजू प्रत्येक लहानमोठ्या अडचणीत स्वतःहून बँकेच्या मदतीला धावून येत असे.
कपात चहा भरून तो माझ्या समोर ठेवताना संजू माझ्या कानात हळूच कुजबुजला..
 
“साहेब, सावध व्हा ! तुमच्या विरुद्ध बाहेर काहीतरी भयंकर कट शिजतोय. काही गावगुंड, रिकामे लीडर आणि पत्रकार बाहेर गोळा झाले आहेत. बँकेत गोंधळ घालायचा म्हणत आहेत.. तुम्ही शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. अजिबात राग येऊ देऊ नका.. आधी मॅटर काय आहे ते जाणून घेऊन मगच आपण त्यातून मार्ग काढू या..”
संजूचं बोलणं संपतं न संपतं तोच रागारागाने आरडाओरड करीत रत्नमाला बोडखेने आपला पती सुखदेव आणि मुलगा बबन यांच्यासह केबिनमध्ये प्रवेश केला. त्यांच्या मागोमाग आठ दहा अनोळखी माणसेही केबिनमध्ये घुसली.
(क्रमशः 2..)

ajay-kotnis-photo1श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे

रानभूल -4

spooky forest dark mystery horror nature generated by ai 24640 81335

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

  

*रानभूल…* (४ )

एका गोष्टीचं मात्र राहून राहून आश्चर्य वाटत होतं की आम्हाला अद्याप एकही माणूस अथवा सजीव प्राणी दिसला नव्हता. आजपर्यंत चकव्याच्या जितक्या कथा ऐकल्या होत्या त्या सर्व कथांत चकव्याने कुत्रा, मांजर, ससा किंवा बकरी यांचेच रूप घेऊन फसवणूक केली होती.

माझा एक मित्र कारने पंढरपूरला जात असताना तुळजापूरच्या पुढे एक वळण घेतल्यावर चुकीच्या रस्त्याला लागला. जेंव्हा खूप वेळ पासून एकही वाहन क्रॉस झाले नाही आणि रस्त्याच्या दुतर्फा असणारे अंतर दर्शविणारे माईल स्टोन्स ही दिसेनात तेंव्हा त्याला रस्ता चुकला असे वाटले व त्याने मागे झोपलेल्या मित्राला उठवून सांगितले की दिवसाची वेळ असूनही रस्त्यावर एकही वाहन दिसत नाही. मात्र सशांचे थवेच्या थवे कारच्या पुढून रस्ता ओलांडून जात आहेत, हे मला जरा विचित्र वाटते आहे.

त्या अनुभवी मित्राने हे ऐकताच ओळखले की त्यांना चकवा लागला आहे. संध्याकाळ होईपर्यंत थांबून गाडीतच बसून वाट पाहण्याचे त्यांनी ठरवले. संध्याकाळ होताच चकव्याचा प्रभाव संपला आणि त्यांना समोरच पंढरपूरचा वाहता रस्ता दिसू लागला.

असाच चकव्याचा आणखी एक अनुभव माझ्या मित्राच्या वडिलांनाही आला होता.

तालुक्याच्या आठवडी बाजारातून खेड्यातील घरी परतताना एक छोटेसे बकरीचे पिल्लू त्यांच्या मागे मागे चालत येऊ लागले. ते पिल्लू एवढे गोंडस होते की त्याला उचलून घेण्याचा त्यांना अनिवार मोह झाला. पिल्लाला उचलून घरी नेताना वाटेतील नदी ओलांडताना त्या पिल्लाचे पाय लांब लांब होऊ लागले. जेंव्हा ते पाय लांब होऊन नदीच्या पाण्याला लागले तेंव्हा त्यांनी ते पिल्लू दूर भिरकावून दिले आणि मागे न पाहता भराभर गावाकडे निघाले. तोच मागून आवाज आला..

“आज वाचलास… !”

रानातील, जंगलातील चकव्याप्रमाणेच उजाड माळरानावरही चकवा लागल्याचे अनेक किस्से आहेत.

अकोल्यात आमच्या घराशेजारी राहणाऱ्या काकांना उमरीच्या माळावर एका माणसाने कसलातरी पत्ता विचारला. त्यानंतर काय झाले माहीत नाही, पण हे काका त्या माणसाच्या मागे मागे चालू लागले. रस्त्याने एक दोन ओळखीच्या माणसांनी त्यांना नमस्कार केला पण त्यांच्याकडे अजिबात न पाहता जादूने भारल्यासारखे ते त्या माणसाच्या मागून चालत राहिले.

एका कोरड्या विहिरीपाशी आल्यावर तो माणूस एकाएकी अदृश्य झाला आणि मग काका किंचित भानावर आहे. पण आपण इथवर का व कसे आलो आणि आता आपल्याला कुठे जायचे आहे हेच त्यांना आठवेना. त्यांची अशी संभ्रमित अवस्था पाहून एक दोघा परिचितांनी त्यांना घरापर्यंत पोहोचविले.

चकव्याच्या अशा एका मागून एक थरारक कहाण्या आठवत असतानाच बाजूलाच बसून काहीतरी विचार करीत असलेला रमेश म्हणाला..

“साब, ये प्राणहिता नदी इस जंगलमे सांप जैसी मोड़ लेते हुए (नागमोड़ी वळणे घेत) बहती है.. और शायद हम नदी के ऐसे ही एक मोड़ के बीच घूम रहे है ! बाहर निकलनेका रास्ता पास ही है, लेकिन हमे कुछ न सूझने के कारण दिखाई नहीं दे रहा..”

रमेश जो विचार करत होता त्यात तथ्य होतं. नदीच्या दोन गोलाकार वळणांमध्ये आम्ही अडकलो असण्याचीही शक्यता होती. रानभुलीमुळे आम्हाला बाहेर निघण्याची वाट जवळ असूनही दिसत नव्हती.

आम्ही सरळ सरळ पुढेच जात असल्याने एकाच पद्धतीने विचार करीत आहोत आणि पुन्हा पुन्हा त्याच रस्त्यावर येत आहोत. पुढे जाण्याऐवजी मागे फिरून पाहिलं तर..? कदाचित उलट दिशेने गेल्यास एखादी नवी वाट सापडूही शकेल..!

रमेशलाही ही कल्पना पटली आणि मग पुन्हा पुन्हा नदी ओलांडण्याऐवजी आलेल्या रस्त्याने मागे फिरून आसपास एखादी नवीन वाट दिसते का ते शोधण्याचं ठरवलं.

हा उपाय खूपच परिणामकारक ठरला. त्याच रस्त्याने मागे फिरलो असताना आता रस्ता अजिबात ओळखीचा वाटत नव्हता. सर्व परिसर नवीन, वेगळा व अनोळखी वाटत होता. एखादी नवीन वाट आता आम्हाला नक्कीच सापडेल असा मनोमन विश्वास वाटत असतानाच दूर टोकावर एक मानवी आकृती उभी असलेली दिसली.

कमरेला फक्त वीतभर लांबीचा पंचा गुंडाळलेला एक उघडाबंब आदिवासी टोकाला घुंगरू लावलेली लांब काठी हातात घेऊन पुतळ्यासारखा स्थिर नजरेने आमच्याकडेच पहात होता. झुबकेदार मिशा, डोक्यावर मळकट मुंडासं, गळ्यात काळा गोफ, कानात कसल्यातरी धातूची भिकबाळी, खांद्यावर आखुडसं घोंगडं असलेला तो वनवासी जणू आमचीच वाट पहात रस्त्याच्या मधोमध उभा होता.

त्या माणसाजवळ जाताच रमेश म्हणाला..

“अरे..! ये तो अपना भिमन्ना है !”ranbhool 4

भिमन्ना बिरसाईपेट जवळच्या एका आदिवासी तांड्यात राहणारा गुराखी होता. गुरांना चरण्यासाठी तो जवळपासच्या जंगलात घेऊन जात असे. रमेश त्याला चांगलाच ओळखत होता.

“भिमन्ना, हम रास्ता भटक गए है ! हमे बालमपुर जाना था.. लेकिन अब बहुत देर हो चुकी है, इसलिए अब उतनुर वापस जाने के लिए रास्ता बताओ..!”

रमेशचं हे बोलणं ऐकताच भिमन्ना किंचित हसला आणि जवळच्या झाडाची पाने बाजूला केली. तो काय..?

त्या झाडामागे एक पाऊलवाट होती. एकावर एक असे तीन कळस असलेलं एक मंदिर ही तिथून दिसत होतं. लाकडी ओंडके व दगडी शिळांनी आदिवासी शैलीत बांधलेल्या त्या अनोख्या आकाराच्या मंदिराच्या शिखरावर लालभडक रंगाची त्रिकोणी पताका होती. बालमपुर गावातील काही झोपड्याही तिथून दिसत होत्या.

आम्ही एकदाचे बालमपुर गावात येऊन पोहोचलो होतो. आता आधी तिथल्या कर्जदारांना भेटून मग एखाद्या गावकऱ्यालाच सोबत घेऊया. म्हणजे परत जाताना त्रास होणार नाही.

तहानेनं जीव कासावीस झाला होता. कधी एकदा गावात जाऊन पोटभर पाणी पितोय असं झालं होतं. मी बालमपुरच्या दिशेनं मोटर सायकल वळवली.

भिमन्नाशी बोलण्यासाठी रमेश मात्र मागेच थांबला होता.

“कहो भिमन्ना..! बहुत दिन हुए, दिखाई नही दिए गांवमे..! कहां गए थे..?”

खिशातून तंबाखू काढून तळहातावर चोळत रमेश शेजारी उभा असलेल्या भिमन्नाला म्हणाला.

मात्र भिमन्नाकडून काहीच उत्तर न मिळाल्यामुळे रमेशने त्याच्याकडे वळून पाहिले तर त्याला तिथे कुणीच दिसले नाही. भिमन्ना कुठेतरी अंतर्धान पावला होता.

“साब.. रुक जाओ ! आगे मत जाना !”

रमेश जीवाच्या आकांताने ओरडला..

मी तसाच मागे आलो.

“क्या हुआ रमेश ? तुम इतने क्यों घबराए हुए हो ? और.. भिमन्ना कहां गया ?”

“वो.. वो.. वो भिमन्ना नही था !!”

थरथर कापत रमेश म्हणाला..

क्षणार्धात सारा प्रकार माझ्या ध्यानात आला. त्या झाडाची पाने बाजूला सारत मी बालमपुरच्या रस्त्याकडे पुन्हा बघितलं.. मघाशी दिसलेली पायवाट, ते आगळं वेगळं मंदिर, त्या झोपड्या.. सारं काही अदृश्य झालं होतं. गर्द झाडीशिवाय तिथे काहीच नव्हतं.

“घबराओ मत रमेश ! वो छलावा हमारा कुछ नही बिगाड़ सकता !”

वरकरणी रमेशला धीर देत असलो तरी आतून मी सुद्धा चांगलाच टरकलो होतो. चकवा आमच्या चिकाटीला कंटाळून आता आमनेसामने लढायला आला होता.

खिन्न मनाने आम्ही पूर्वीच्याच उलट दिशेने प्रवास पुन्हा सुरू केला. थोडं पुढे जातो न जातो, एवढ्यात अचानक मोटर सायकल बंद पडली. कदाचित गाडीतील पेट्रोल संपलं असावं. पेट्रोल टँकला कान लावत गाडी हलवून पाहिलं. काहीच आवाज ऐकू आला नाही. म्हणजे नक्कीच पेट्रोल संपलं होतं.

निमुटपणे गाडी हातात घेऊन पायवाटेने चालत पुढे निघालो. या चकव्याचा प्रभाव नक्की कधी संपणार ? मारुती चितमपल्ली यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे शुक्राची चांदणी दिसेपर्यंत तर नाही ना ?

प्रसिद्ध वन्यजीव अभ्यासक, लेखक अरण्यऋषी डॉ. मारुती चितमपल्ली हे विदर्भातील तणमोराच्या संशोधनाच्या निमित्ताने रानोमाळ भटकत असताना तणमोराची शिकार करणारा पारधी भेटला. डॉक्टर सलीम अली यांच्या पक्ष्यांच्या पुस्तकातील घुबडाचे चित्र पाहून त्याने त्या पक्ष्याचे नाव सांगितले “चकवाचांदण”. घुबडासारख्या अशुभ समजल्या जाणार्‍या पक्ष्याचे नाव इतके सुंदर, काव्यमय असू शकते याचे शब्दवेड्या चितमपल्लींना आश्चर्य, तसेच आनंद वाटला. साहजिकच त्यांच्या मनात “चकवाचांदण” या नावाविषयी जिज्ञासा निर्माण झाली.

त्यांनी त्या पारध्याला विचारले, “चकवाचांदण” म्हणजे काय ? तो म्हणाला “साब, ते पखेरू कलमुहा हाय. रानात सांजेला तो बोंबलू लागला की वाटेत आम्हाला चकवा मारतो. आमची रानभूल होते. अशा वेळी आम्ही जिथल्या तिथं बसून राहतो. आभाळात शुक्राची चांदणी दिसू लागते तेव्हा चकवा निघून जातो. आम्हाला वाट सापडते. म्हणून त्याला चकवाचांदण म्हणतो.”

चितमपल्लींना नावाचा हा खुलासा आवडला. “चकवाचांदण” हे नाव त्यांना संधिप्रकाश आणि गूढता यांचे प्रतीक वाटले. चितमपल्लींनी वनविभागातील नोकरी ठरवून स्वीकारलेली नव्हती. चुकून ते या नोकरीच्या आडवाटेच्या वनात आले आणि चालताना त्यांना आयुष्याची सुंदर वाट सापडली. अरण्यातल्या चकव्यानंतर दिसलेल्या उगवत्या शुक्राच्या चांदणीचे सौंदर्य अगदी आगळेवेगळे दिसते, म्हणून मारुती चितमपल्लींनी आपल्या आत्मकथनाचे नाव “चकवाचांदण” असे ठेवले.

उतनुरच्या त्या जंगलात अस्वल, तरस, बिबट्या, चित्ता, अजगर अशा हिंस्त्र प्राण्यांचा मुक्त संचार होता. संध्याकाळनंतर तिथे थांबणं खूपच थोक्याचं होतं.

काहीही करून लवकरात लवकर जंगलाबाहेर पडणं अत्यंत जरुरीचं होतं.

गाडी बंद पडल्यामुळे आमचा प्रवासाचा वेग मंदावला होता. अशात एखाद्या जंगली प्राण्याने हल्ला केला तर वेगाने पळ काढणेही शक्य नव्हते.

रानभूल ठरावीक अंतरापर्यंत आणि ठरावीक वेळेपर्यंतच आपल्या मेंदूचा कब्जा घेते. या भुलीच्या सीमेबाहेर जाताच त्याचा परिणाम, गुंगी कमी होते. खंबीर व भक्कम मनाच्या व्यक्ती मात्र अशा रानभुलीतून बाहेर पडू शकतात. कमकुवत मनाच्या व्यक्तींवर मात्र त्याचा दीर्घ काळ परिणाम राहू शकतो.

जंगलातले प्राणी, चरायला गेलेली गुरं, शेळ्या-मेंढ्या, गुराखी, लाकूडफाटा गोळा करायला गेलेले बायका-पुरुष, खेडूत, आदिवासी यांनाही चकवा लागतो. ते भ्रमिष्ट होतात, फिरून फिरून त्याच जागी घुटमळतात. शेवटी थकून, कंटाळून भुताटकी समजून घाबरतात.अशा भ्रमिष्ट झालेल्या व्यक्तींवर प्रसंगी मांत्रिकाकडून अघोरी उपायही केले जातात. पण चकवा, रानभूल हा अंधश्रद्धेचा विषय नाही, ती एक नैसर्गिक अरण्यशक्ती आहे. या शक्तीच्या अस्तित्वाचे संकेत रानभुलीसारख्या अनुभवातून मिळतात.

नवेगाव अरण्यातल्या अशाच एका अनुभवाची गोष्ट. नवेगाव अरण्यातला निसर्ग आणि वन्यजीवांचं निरीक्षण करण्यासाठी शाळा-महाविद्यालयांच्या सहली सतत जातात. एकदा एका शाळेतर्फे पाच दिवसांचं शिबीर तेथे भरवलं गेलं होतं. प्रत्यक्ष जंगलात वास्तव्य करून अरण्यवाचन शिकवलं जात होतं. वन्यजीव आणि त्यांची पर्यावरणातला समतोल राखण्यात होणारी मदत याबद्दलची माहिती दिली जात होती.

काही वेळानंतर सर्वानी दुपारच्या जेवणासाठी परतीची वाट धरली. वाटेवरच्या पाणवठ्यावर मुलं तहान भागवण्यासाठी थांबली. तेव्हा त्यांची गणती केली गेली. सर्व मिळून २४ जण होते. तिथून त्यांचा कॅम्प ३ किलोमीटर अंतरावर होता. थकव्यामुळे सर्वाची चाल मंदावली. पुढे १ किलोमीटरनंतर मागे-पुढे चालणाऱ्यांची गणती केली असता २ मुली आणि १ शिक्षिका दिसेनात.

त्या थकव्यामुळे सावकाश मागे चालत असतील असं समजून मागे जाऊन त्यांना शोधलं, सर्वानी खूप हाकाही मारल्या. पण काहीच प्रतिसाद येईना. मागच्या पाणवठ्यावरही शोधलं, पण त्या तिघी कुठेच दिसेनात. सूर्य डोक्यावर तळपू लागला. बाकी मुलामुलींना कॅम्पवर पोहोचवण्यात आलं, आणि त्या तिघींचा पुन्हा बारकाईनं शोध घ्यायला सुरुवात झाली. तेव्हा मात्र धास्ती वाटू लागली.

तेवढ्यात अचानक एका नाल्यापुढे ओलसर मातीत मुलींच्या पायांचे ठसे दिसले. त्यांना साद घालत घालत, शोधपथक निघालं. नाल्यातून तसंच २ किलोमीटर चालत गेल्यावर मोहाच्या एका झाडाला टेकून ती शिक्षिका सुन्नपणे बसलेली दिसली. तिच्या कुशीत त्या २ छोट्या मुली थकूनभागून पहुडल्या होत्या. शोधपथक आनंदानं त्यांच्याजवळ गेलं. पण त्यांनी त्यांना ओळखलं नाही. तिघींना हलवलं तरी त्यांनी कसली हालचाल केली नाही. त्या भान हरवल्यासारख्या बसल्या होत्या.

एकूण परिस्थितीवरून त्या रानभुलीच्या चक्रव्यूहात सापडल्याचं लक्षात आलं. त्यांना आधार देऊन उठवलं, आणि १ किलोमीटर चालत आणलं. दरम्यान, शोधार्थ निघालेली वन विभागाची जीप तेथे आली. काही वेळानं त्या शुद्धीवर आल्या.

पुढे “आकाशवाणी” वरच्या कार्यक्रमासाठी त्यांचे अनुभव ध्वनिमुद्रित केले गेले. तेव्हा ती शिक्षिका म्हणाली, ‘‘आम्ही सर्वाच्या मागे चालत होतो. तेवढय़ात एका मुलीला रस्त्याच्या डाव्या बाजूला सुंदर फुलं दिसली. ती तोडायचा मोह अनावर झाला, म्हणून तिघीही फुलांजवळ गेलो. तोच कसलातरी उग्र गंध आला आणि त्या वासानं आम्ही भांबावलो. काय चाललंय तेच कळेना. रस्ता दिसेनासा झाला. मुलींनी माझे हात घट्ट पकडले. आम्ही चालतच राहिलो. कुठे जातोय ते कळत नव्हतं. चालत चालत या नाल्यात आलो. थकव्यानं पायातलं त्राणच गेलं होतं, भान हरपलं होतं. फुलांचा मोह महागात पडला.’’

याचा अर्थ स्वसंरक्षणासाठी त्या झाडानं उग्र गंध सोडून त्या तिघींना बेभान केलं होतं.

मी व रमेश, आम्ही दोघेही अशाच कुठल्या झाडाच्या, वेलीच्या गंधजालात अडकलो होतो का ? तो रमेशच्या तोंडावर बसणारा वेलीचा फटका स्वसंरक्षणासाठीच होता काय ?

काही जाणकारांच्या मते अशा भूल पडणाऱ्या तीन प्रकारच्या वनस्पती आहेत. आदिवासी जिला “भुलनीदेवी” म्हणतात ती एक प्रकारची वनस्पती किनवट तालुक्यात आढळते. ज्या वनस्पतीवर पाय पडला किंवा फुलाचा सुगंध घेतल्यास भूल पडते ती “भूलनजडी” नावाची वनस्पती कोरपना ते राजुरा महामार्गावरील नदी शेजारील पायवाटेवर आढळते. ज्या वनस्पतीवर पाय पडल्यास ती त्या व्यक्तीला खाली पाडते अशी “भूतनी” नावाची वनस्पती पेटलावदच्या जंगलात तसेच निमाड भागात आढळते.

जंगलात भटकण्याची, गड किल्ले चढण्याची, ट्रेकिंग व अन्य साहसी प्रकारांची मनापासून आवड असल्याने माझं मनोधैर्य अद्याप तसं फारसं खचलं नव्हतं. उलट मला त्यात एक वेगळंच ॲडव्हेंचर दिसून येत होतं.

आम्ही खाली मान घालून चालतच होतो. इतक्यात..जंगलातील वातावरण हलके हलके बदलतं आहे असं जाणवू लागलं. पक्ष्यांचे कूजन पुन्हा कानावर पडू लागले. फळा फुलांचे सुगंधी वास पुन्हा दरवळू लागले. मघापासून प्रेतासारखे निर्जीव व भेसूर भासणारे जंगल आता पूर्वीसारखंच उल्हसित व चैतन्यपूर्ण वाटू लागले.

पुन्हा दूरवर एक मानवी आकृती दिसली. आम्ही एकमेकांकडे पाहिलं. या आधीचा अनुभव आठवून आता पूर्ण सावधगिरी बाळगायचं मनोमन ठरवलं.

हुबेहूब यापूर्वी भेटलेल्या माणसा सारखाच दिसणारा तो आदिवासी आमच्याकडे हसत हसत पहात उभा होता. फक्त त्याच्या खांद्यावर घोंगडी व हातात काठी नव्हती. त्याऐवजी खांद्यावर एक कुऱ्हाड लटकत होती. किंचित वयस्कर वाटणाऱ्या त्या आदिवासीला रमेशने तेलगू मिश्रित गोंड भाषेत अभिवादन करून रस्ता चुकल्याचे सांगितले व उतनुरचा रस्ता विचारला.

त्या माणसाने सांगितले की पुढे जाऊन तुम्हाला दोन रस्ते दिसतील. त्यातील डाव्या रस्त्याने न जाता उजव्या रस्त्याने जा. डावा रस्ता “जुन्या बालमपुर” गावाकडे जातो तर उजवा रस्ता दंतनपल्ली गावाजवळ निघेल.

रमेशने त्या आदिवासीचा हात धरून ठेवला. आणि मला खरोखरीच पुढे दोन रस्ते आहेत का.. हे पाहण्यासाठी पुढे पाठविले.

पुढे खरोखरीच दोन पायवाटा होत्या. त्या आदिवासीचे आभार मानून त्याचे नाव विचारले तेंव्हा तो नमस्कार करत हसून म्हणाला.. “देवू.. देवन्ना !”

आम्ही पायीच पुढे चालू लागलो तेंव्हा तो म्हणाला.. “गाडी पर बैठो, साब..!”

गाडीतील पेट्रोल संपल्याचं सांगितल्यावर त्याने गाडी धरून जोरात हलवली तेंव्हा टाकीतील पेट्रोलचा आवाज आम्हाला स्पष्ट ऐकू आला.

आश्चर्य वाटून गाडीला किक मारली आणि पहिल्याच किक मध्ये गाडी सुरू झाली. आमचे चेहरे आनंदाने फुलले. त्याचे पुन्हा पुन्हा आभार मानीत आम्ही उजव्या रस्त्याने निघालो. थोडं दूर आल्यावर मागे वळून पाहिलं तर “देवू” अजूनही आम्हाला हात हलवून निरोप देत उभा होता.

जाताना सहज डाव्या बाजूच्या पायवाटेकडे नजर गेली. ती पायवाट एक प्रचंड मोठ्या तलावाला जाऊन मिळाली होती. त्या विस्तीर्ण जलाशयात एक मंदिर पूर्णपणे बुडालेले दिसत होते. फक्त त्या मंदिराचे एकावर एक तीन कळस असलेले शिखर तेवढे पाण्याच्या वर होते. मंदिराच्या शिखरावर लालभडक त्रिकोणी पताका फडकत होती.

सुमारे चार किलोमीटर अंतर कापल्यावर आम्ही दंतनपल्ली गावाजवळ पोहोचलो तेंव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. तिथून मग अर्ध्या तासात ऊतनुरला पोहोचलो.

दुसऱ्या दिवशी बिरसाईपेटचे गावकरी बँकेत आले असता त्यांना आदल्या दिवशीचा अनुभव कथन केला तेंव्हा त्यांनी जो खुलासा केला तो ऐकून तर आम्ही आश्चर्याने फुटभर उंच उडालोच.

सुमारे दोन वर्षांपूर्वी बालमपुर गावाजवळ छोटेसे धरण बांधण्यात आले. त्यामुळे बालमपुर गावाचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले. मात्र काही आदिवासी गावकऱ्यांनी गाव सोडण्यास नकार दिला. संपूर्ण गाव धरणाच्या पाण्याखाली जाणार असल्याने धरणाचे बांधकाम पूर्ण झाल्यावर पाणी सोडण्यापूर्वी वन खात्याने व पाटबंधारे खात्याने संयुक्त मोहीम राबवून या हट्टी गावकऱ्यांना बळजबरीने पकडून दहा किलोमीटर दूर अंतरावर उभारलेल्या निर्वासितांच्या छावणीत स्थलांतरित केले.

मात्र काही जिद्दी आदिवासी गावकरी संध्याकाळ होताच तेथून निसटले आणि पायी चालत बालमपुरला येऊन आपापल्या झोपड्यांमध्ये जाऊन झोपले. रात्री बारा नंतर धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. या पाण्यात बालमपुर गाव पूर्णपणे बुडाले. आदल्या रात्री झोपड्यांमध्ये येऊन झोपलेले तेवीस आदिवासी झोपेतच बुडून मरण पावले.

दुसऱ्या दिवशी ही बातमी समजताच प्रशासनात एकच हडकंप माजला. पत्रकारांवर व अन्य प्रसिद्धी माध्यमांवर वरून दबाव आणून बातमी दडपण्यात आली. मृतांच्या कुटुंबियांना भरपूर नुकसान भरपाई देऊन त्यांची तोंडे बंद करण्यात आली.

मात्र त्या दिवसापासून बालमपुर गावाच्या आसपासच्या परिसरात, जंगलात लोकांना विचित्र अनुभव येऊ लागले. तलावात मृत झालेल्या व्यक्ती लोकांना दिसायच्या. काही दुष्ट मृतात्मे त्या जंगलात शिरणाऱ्या लोकांना तलावाजवळ नेऊन त्यांना बुडवून त्यांचा जीव घेऊ लागले. तर काही सत्प्रवृत्त मृतात्मे या दुष्ट मृतात्म्यांपासून लोकांचे रक्षण करून त्यांना मदतही करीत असत.

आम्हाला देवासारखा भेटलेला “देवन्ना” हा असाच एक सत्प्रवृत्त मृतात्मा असावा. भिमन्ना हा बिरसाईपेट जवळ राहणारा गुराखी सहा महिन्यांपूर्वी बालमपुरच्या तलावात बुडून मरण पावला होता. कदाचित तोच दुष्ट मृतात्मा बनून आम्हाला भेटला असावा.

माझ्या काही मित्रांच्या मते मला त्या दिवशी जे जे अनुभव आले त्या सर्वांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येते. उदा. आम्हाला जंगलात जे कुजबुजण्याचे, हसण्याचे, विकट हास्याचे आवाज ऐकू आले ते दाट जंगलात जोरदार वाहणारा वारा कोंडला गेला की येऊ शकतात. याशिवाय मनाचे खेळ, भास, आजूबाजूला असलेल्या एखाद्या विषारी वनस्पतीने उत्सर्जित केलेल्या वायूचा परिणाम (हॅल्युसिनॅशन) असं सुद्धा असू शकतं.

हवेच्या दाबामुळे, वातावरणातील, हवेतील अतिउष्णता वा अतिशीतलता यामुळे, प्रकाशाच्या परावर्तन व अपवर्तन (reflection & refraction) हयामुळे सुद्धा अनेक प्रकारचे भास होतात. आकाशातील ताऱ्यांचे लुकलुकणे, पाण्याने भरलेल्या ग्लासात ठेवलेला चमचा तुटलेला दिसणे, पाण्याची खोली आहे त्यापेक्षा खूप कमी भासणे, आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य हे सारे एकप्रकारचे दृष्टीभ्रम किंवा आभासच असून प्रकाशाच्या अपवर्तनाचे (refraction) परिणाम आहेत. वाळवंटातील मृगजळ (Mirage), हे ही याचेच उदाहरण.

वाळवंटात भरकटलेल्या व्यक्तींना बरेचदा दूर अंतरावर हिरवळीचा प्रदेश (oasis) असल्याचा भ्रम होतो. कारण त्यांचा मेंदू तशी कल्पना करून तसा आभास निर्माण करतो. हिमालय, अंटार्क्टिका या सारख्या अतिथंड बर्फाळ प्रदेशात सैनिकांना, संशोधकांना अत्याधिक थंडीमुळे विविध प्रकारचे आभास होतात.

आणि दिशाभूल ही तर कुठेही होऊ शकते. वाळवंटात, महासागरात, पर्वतराजीत, उजाड माळरानात किंवा दाट जंगलात दिशा भरकटल्याची असंख्य उदाहरणे आहेत. पण गजबजलेल्या शहरातही आपण अनोळखी गल्लीबोळातून जाताना अनेकदा रस्ता, दिशा चुकतो. भलत्याच दिशेने बाहेर निघतो. ही देखील एक प्रकारची दिशाभूलच असते. अनेकदा दुपारच्या झोपेतून उठल्यावर आपल्याला सकाळ झाल्याचा भास होतो हा ही एक प्रकारचा कालभ्रम असतो.

ज्याला आपण “चकवा” म्हणतो तो कदाचित एखादा स्थलकालाचा अपघात असू शकेल. वेळ आणि काल यांच्यातला परस्पर संबंध अजूनही आजच्या विज्ञानाला नीटसा उमजलेला नाही. उदाहरणार्थ, एखाद्या कागदावर काही अंतरावर दोन ठिपके काढले तर त्यांना जोडणारी सरळ रेषा हाच सर्वात जवळचा मार्ग असू शकतो. पण त्याच कागदाची घडी घातली तर त्या दोन बिंदूमध्ये अजूनही जवळचा मार्ग निर्माण होऊ शकतो.

किंवा एखाद्या रबरी फुग्यावर दोन्ही बाजूंना दोन बिंदू रेखाटले तर फुग्याच्या बाहेरून वळसा घालत जाणारी रेषा हा जवळचा ज्ञात मार्ग असू शकतो, पण फुग्याच्या आतमधून दोन बिंदू जोडणारा मार्ग सर्वात जवळचा असेल. फक्त त्याची कल्पना यायला हवी. मानव त्रिमिती मध्ये जगतो म्हणून त्याला कदाचित याचं आकलन होऊ शकेल, पण मुंगीसारखा प्राणी जो द्विमिती मध्ये जगतो त्याला याची कल्पनाच येऊ शकणार नाही.

*विश्वात अजूनही असे काही मार्ग असतील ज्यांची आपल्याला जाणीव होत नाही किंवा आपल्याकडे त्याची जाणीव करून देणारी सक्षम ज्ञानेंद्रिये नाहीत.* किंवा हे अनुभव इतके प्रखर असतील कि ज्याची जाणीव मेंदू आपल्याला होऊ देत नाही. मग हे अनुभव एखाद्या फिल्टर झालेल्या गोष्टींसारखे निरुपद्रवी रूपात आपल्याला सामोरे येत असतील.

कारण समोरच्या गोष्टीचं नीट आकलन होत नसेल तर मेंदू त्याला सर्वात जवळचं रूप देतो आणि त्याच स्वरूपात ती आपल्याला दिसते किंवा दाखवली जाते. पण दरवेळी ती तशीच असेल असं नाही. एखाद्या स्थलकालाच्या क्वचित घडणाऱ्या आणि क्षणिक टिकणाऱ्या अपघाताचा कोणीतरी साक्षीदार होत असेल आणि तो त्याला “चकवा” या निरुपद्रवी रूपात जाणवत असेल किंवा जाणवून दिला जात असेल.

बालमपुरच्या जंगलातील त्या दिवशीच्या दुपारी आम्हाला आलेला अनुभव एवढेच सांगतो की काही गोष्टी अशा असतात की ज्यांचे कोणतेही शास्त्रीय, वैज्ञानिक वा मानसशास्त्रीय स्पष्टीकरण दिलेच जाऊ शकत नाही.

अजूनही दैनंदिन जीवनात जेंव्हा जेंव्हा सुष्ट व दुष्ट प्रवृत्तीची माणसे एकाच वेळी भेटतात तेंव्हा तेंव्हा बालमपुरच्या जंगलात भेटलेल्या देवन्ना व भिमन्ना यांची आठवण आल्याखेरीज रहात नाही.

(समाप्त)

रानभूल-१ 

रानभूल-२ 

रानभूल-३ 

लेखक परिचय-ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

अशीच एक सत्यकथा त्यांना तेंव्हाच्या आंध्र प्रदेश मधील आदिलाबाद जिल्ह्यातील उतनूर या ठिकाणी पोस्टिंग असतांना आलेला अनुभव वर्णन करणारी आहे. ही कथा 3 भागांमध्ये क्रमशः आहे. ही यापूर्वी त्यांच्या फेसबुकवर प्रसिद्ध झालेली आहे, आणि आता त्यांच्या परवानगीने या ब्लॉगच्या वाचकांसाठी इथे देत आहोत. 

Online Shopping on Amazon

smartphone summer sale
smartphone summer sale
wall clocks
Wall Clocks
Nilkamal cupboard
Nilkamal cupboard
wooden sofa set
wooden sofa set

Order any items above by clicking on respective images

Or click on the link shown here  to see all items in furniture

The above items are available on Amazon India.

Please refer to our affiliate disclosure page

रानभूल -3

spooky forest dark mystery horror nature generated by ai 24640 81335

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

रानभूल…* (३ )

अनेक वृक्षवल्लींत पंचेंद्रियांची गूढ शक्ती असते. जंगलात येणाऱ्या प्रत्येक परक्याचं अस्तित्व ही घुसखोरी वाटल्यामुळे त्यांना ती सहन होत नाही. आपल्याला उपद्रव व इजा करण्यासाठीच कुणीतरी आलेलं आहे अशी त्यांची समजूत होते. मग त्यांची स्वसंरक्षणासाठी प्रतिक्षिप्त क्रिया (Reflex action), हालचाल होते.

… हा वेलीचा रमेशवरील हल्ला म्हणजे अशीच प्रतिक्षिप्त क्रिया तर नाही ना ?

काही वृक्षवेली आपण त्यांच्या जवळपास जाताच पानाफुलांतून उग्र गंध सोडून त्रस्त करून सोडतात. त्या उग्र गंधाचा परिणाम सौम्य किंवा तीव्र भूल दिल्यासारखा होतो. परिणामी प्राणिमात्रांना गुंगी येते. प्रत्येकाच्या मनोबलानुसार कमी-जास्त प्रमाणात स्मृतिभ्रंश होतो. त्यामुळे आजूबाजूच्या व्यक्ती, दिशा यांचं भान राहात नाही. आपण कुठे आहोत, कुठे चाललो आहोत, कुठे जायचं आहे, हे कळेनासं होतं. मेंदू बधिर होतो, आणि मागे, पुढे, डावीकडे, उजवीकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही. फिरून फिरून व्यक्ती त्याच जागेवर येते. हीच रानभूल! हाच चकवा, आणि हेच झोटिंग!

…आम्हालाही असाच स्मृतिभ्रंश तर झालेला नाही ना ? कारण योग्य दिशा न सापडल्यामुळे आम्हीही फिरून फिरून त्याच जागी येत होतो.

पण नाही..! ज्याअर्थी मला सारं काही व्यवस्थित आठवत होतं त्याअर्थी माझी स्मरणशक्ती जागृत होती. माझी तर्कशक्ती, चिकित्सक वृत्ती व विनोदबुद्धी ही अद्याप शाबूत होती. वास्तवाचं पुरेपूर भानही मला होतं. पण.. पण या व्यतिरिक्त इथे असं काहीतरी होतं की जे माझ्या बुद्धीच्या आकलन कक्षेबाहेरचं होतं.

हा निसर्गाचा भोवरा, हे मायावी अरण्याचं दुष्टचक्र कधी संपणार..? असा सचिंत मनाने विचार करीत असतानाच जंगलातील वातावरण ढवळल्यासारखं होऊन जोरदार वारे वाहू लागले. जवळच्या झाडीतून कुणाच्या तरी दबक्या आवाजातील हसण्याचा व कुजबुज करण्याचा आवाजही कानी पडला. बोलणाऱ्या व्यक्तींची भाषा जरी समजत नसली तरी ऐकू येणाऱ्या विविध प्रकारच्या आवाजांवरून तो किमान सहा सात माणसांचा घोळका असावा.img

आतापर्यंत अतिशय शांत, स्तब्ध, नीरव असलेल्या त्या जंगलात कोणतीही चाहूल न लागू देता अचानक एवढी सारी माणसे कुठून आली..? असा प्रश्न पडून भीती वाटण्याऐवजी उलट या जंगलात आम्हाला कुणीतरी सोबतीला आलं आहे याचा आनंदच झाला. या व्यक्तींना जंगलातील सर्व रस्त्यांची खडानखडा माहिती असेल आणि त्यांच्या मदतीने या जंतरमंतर मधून आता नक्कीच बाहेर पडू या विचाराने आम्ही सुखावलो.

बराच वेळ झाला तरी त्या हसत गप्पा करणाऱ्या व्यक्ती जंगलातून बाहेर येण्याचे नावच घेत नव्हत्या. शेवटी कंटाळून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही मोठ्याने ओरडून आवाज देत टाळ्याही वाजवल्या. थोडा वेळ तो आवाज एकदम शांत झाला. त्यापाठोपाठ वाहता वाराही लगेच थांबला. पण मग आमच्या आवाजाकडे संपूर्ण दुर्लक्ष करीत पुन्हा त्यांचं हसणं खिदळणं पूर्ववत सुरू झालं. वाराही पूर्वीसारखा अनिर्बंध वाहू लागला.mihaly koles kKWrn At4Gg unsplash

ती माणसं जंगलातून परस्पर निघून गेली तर या चकव्यातून बाहेर पडण्याची आलेली संधी आपण गमावून बसू या धास्तीने उतावीळ होऊन मी त्यांना गाठण्यासाठी झाडीत शिरण्यासाठी पुढे सरसावलो.. तोच.. रमेशने माझा हात धरून “थांबा..!” अशी खूण केली. मी भिवया उंचावत चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव आणून त्याच्याकडे पाहिलं, तेंव्हा तो हलकेच पुटपुटला..

“साब.. यहीं *छलावा* है !”

रमेशचे हे शब्द ऐकताच मी विंचू चावल्यागत झटकन झाडीत घातलेला पाय मागे घेतला.

रमेशने इतक्या हळू आवाजात बोललेलं त्या दूर झाडीतील चकव्याला कसं काय ऐकू गेलं कोण जाणे..! पण त्या नंतर तो आवाज एकाएकी एकदम लुप्त झाला. वाहता वाराही अचानक थंड झाल्यामुळे जंगलात स्मशान शांतता पसरली. आम्ही बराच वेळ त्या आवाजाच्या दिशेने कानोसा घेत उभे होतो. पण पुन्हा काही तो आवाज ऐकू आला नाही.

कदाचित तो चकवाही.. आता आम्ही काय करतो..? याची गंमत पहात आमच्या अगदी जवळच उभा असावा. कारण थोडा वेळ कानोसा घेऊन जेंव्हा आम्ही तिथून आपल्या वाटेने पुढे जायला निघालो तेंव्हा त्या झाडीतून विकट हास्याचा एक कल्लोळ उठला. जणू काय..”कसं फसवलं..!” असंच चिडवित तो आम्हाला हसत असावा. पुन्हा सुरू झालेल्या बेभान वाऱ्यासंगे तो गडगडाटी अट्टाहास ध्वनी जंगलभर घुमत असतानाच मी गाडीचा वेग वाढवला.

थोडं पुढे आल्यावर रमेश म्हणाला..

“जब तक हम इस रास्ते पर है, तब तक सेफ है ! उस छलावेका इरादा हमे किसी तरह जंगल के अंदर बुलाकर, दूर खींच के ले जाने का है ! अगर हम गलती से भी रास्ता छोड़कर जंगल के अंदर गए तो बहुत बुरे फंस जाएंगे !”

रमेशचे हे बोलणे ऐकतांच कॉलेजातील मित्राने एकदा सांगितलेला चकव्या संबंधीचा असाच एक किस्सा आठवला.

या मित्राच्या गावाकडील शेतात काम करणारा एक तरणाबांड मजूर दुपारी रानाजवळील वाटेने शेतात जात असताना बाजूच्या झुडुपात त्याला कसलातरी आवाज ऐकू आला. म्हणून त्याने जवळ जाऊन पाहिले तर त्याला काहीच दिसले नाही. तो थोडा पुढे आल्यावर पुन्हा त्याला तसाच आवाज ऐकू आला. यावेळीही त्याला त्या झुडुपात काहीच दिसलं नाही. तिसऱ्या वेळी पुन्हा जेंव्हा तसा आवाज आला तेंव्हा त्याने चिडून त्या दिशेने एक मोठा दगड भिरकावला, तेंव्हा एक गलेलठ्ठ रानकोंबडी पंख फडफडवित रानाच्या दिशेने पळाली.

रान कोंबडी पाहून मजुराला तिला पकडण्याचा मोह झाला आणि तिच्या मागे धावत तो खूप खोल रानात गेला. रानकोंबडी तर त्याला गुंगारा देऊन कुठेतरी गडप झाली पण तो मजूर मात्र त्या रानात अडकला. फिर फिर फिरला, पण रानातून बाहेर पडण्याचा मार्गच त्याला सापडेना. असा चार पाच तास भटकल्यानंतर संध्याकाळी तो गावापासून दहा किलोमीटर दूर तालुक्याच्या दिशेने जाताना दिसला. त्याची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली होती. आपल्याला कुठे जायचे आहे याची त्याला शुद्धच नव्हती. गावकऱ्यांनी त्याला कसेबसे घरी आणल्यानंतर बरेच दिवस तो संभ्रमित, अस्थिर मानसिक अवस्थेत होता.

…आम्हीही मघाशी उताविळपणे त्या हसण्याच्या आवाजाच्या दिशेने खोल जंगलात शिरलो असतो तर आमची अवस्था काय झाली असती या नुसत्या कल्पनेनेच मला कापरं भरलं.

जंगलातील ओबड धोबड पायवाटेवरून खडखड असा आवाज करीत हळूहळू पुढे जाणाऱ्या मोटर सायकल वरून आमचा अर्थहीन व अंतहीन प्रवास सुरूच होता.

एवढ्यात.. तोच चिरपरिचित नदीच्या पाण्याचा खळखळाट पुन्हा ऐकू आला. समोर पाहिलं तर तोच नदीकाठचा मोठा दगड, तीच मोडून नदीत आडवी पडलेली झाडे, फुटभर खोल स्वच्छ पाण्यात चमकणारे तेच दगड वाळू गोटे आणि एखाद्या भयनाट्यातील मायावी चेटकिणी प्रमाणे भासणारी तीच तीस चाळीस फुटाच्या उथळ पात्राची खळखळ वाहणारी गूढ रहस्यमय नदी..Nature Tree River Bach Water Forest Landscape 3630487 2

“रमेश, क्या नाम है इस नदी का..?”

या नदीचं नक्कीच निर्दया, भीषणा, भेसूरा, कर्कशा, कठोरा, निष्ठूरा, आक्रोशा, रुद्रा, डाकिणी, पिशाचीणी असं काहीतरी भीतीदायक नाव असलं पाहिजे, असा मनाशी विचार करीत रमेशला विचारलं..

“ये नदी आगे जा कर “प्राणहिता नदी” को मिल जाती है इस लिये इस नदी को भी सब लोग *प्राणहिता* ही कहते है..!”

रमेशचं हे उत्तर ऐकून हसू आलं. एखाद्या निर्दयी कसायाचं नाव दीनदयाळ असावं.. तसंच होतं हे ! खरं तर “प्राणहिता” ऐवजी या नदीचं नाव “प्राणहरा” किंवा “प्राणहंता” असंच असायला हवं होतं..!

हतबुद्ध होऊन नाईलाजाने नदीकाठच्या त्या मोठ्या दगडावर बसून क्षणभराची विश्रांती घेताना आणखी किती वेळा ही नदी आपल्याला पुन्हा पुन्हा आडवी येणार आहे असाच विचार राहून राहून मनात येत होता.

(क्रमशः)

या आधीचे २ लेख इथे वाचा 

रानभूल-१ 

 

रानभूल-२ 

 

लेखक परिचय-ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

अशीच एक सत्यकथा त्यांना तेंव्हाच्या आंध्र प्रदेश मधील आदिलाबाद जिल्ह्यातील उतनूर या ठिकाणी पोस्टिंग असतांना आलेला अनुभव वर्णन करणारी आहे. ही कथा 3 भागांमध्ये क्रमशः आहे. ही यापूर्वी त्यांच्या फेसबुकवर प्रसिद्ध झालेली आहे, आणि आता त्यांच्या परवानगीने या ब्लॉगच्या वाचकांसाठी इथे देत आहोत. 

Online Shopping on Amazon

smartphone summer sale
smartphone summer sale
wall clocks
Wall Clocks
Nilkamal cupboard
Nilkamal cupboard
wooden sofa set
wooden sofa set

Order any items above by clicking on respective images

Or click on the link shown here  to see all items in furniture

The above items are available on Amazon India.

Please refer to our affiliate disclosure page

रानभूल -2

spooky forest dark mystery horror nature generated by ai 24640 81335

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

रानभूल…* (२) नदीच्या बाहेर पडल्यावर पुढे जाताना थोड्या थोड्या वेळाने सारखा मागे वळून पहात होतो. आपण पुन्हा पुन्हा त्याच त्याच ठिकाणी कसे जाऊन पोहोचतो आहोत..? हा चकवा तर नाही ना ? चकव्याचा विचार मनात येताच भीतीने अंग शहारलं. लहानपणापासून ऐकलेल्या चकव्याबद्दलच्या अनेक गूढ कथा, कहाण्या आठवल्या. चकवा हा कोणत्याही वस्तूचे, माणसाचे, पक्ष्याचे, प्राण्याचे रूप घेऊ शकतो, हे ही ऐकल्याचं आठवलं. पण.. आम्हाला तर अजूनपर्यंत एकही माणूस, पक्षी किंवा प्राणी भेटला नव्हता..! चकवा कोणत्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूचे रूप घेऊ शकतो.. म्हणजे मग आम्हाला पुन्हा पुन्हा दिसणारे ते वृक्ष.. तो कोवळा पाच फुटी साग.. ते तिरपे हिरड्याचे झाड.. ही सारी चकव्याने घेतलेली रूपे तर नाहीत..? अगदी ती पुन्हा पुन्हा दिसणारी गूढ, भयावह नदी म्हणजे सुद्धा चकव्याचे छद्मरूप असू शकते.images 24 किंवा.. मी मघापासून ज्याच्याशी बोलतो आहे तो बँकेचा प्यून.. रमेश.. तो सुद्धा खरा आहे की चकव्याने घेतलेले रूप आहे..? मी मोटर सायकल थांबवून रमेशकडे निरखून बघितले. “..तुम.. रमेश ही हो नं.. ?”

गोंधळलेल्या रमेशकडे अविश्वासपूर्ण नजरेने पहात थरथरत्या घोगऱ्या आवाजात मी विचारलं..

” ऐसा क्यूँ पूछ रहे हो साब..! और.. ऐसा घूर घूर के मत देखो साब मेरी तरफ.. डर लगता है..!” अगोदरच भीतीने गारठून गेलेला रमेश खाली नजर वळवित म्हणाला. त्याला माझ्या संशयी नजरेची भीती वाटत असावी.. की.. त्यालाही माझ्यासारखीच भीती वाटते आहे.. म्हणजे उलट तो मलाच तर चकवा समजत नाहीय ना..?

…तसं असेल तर आधी रमेशची भीती घालवणं अत्यंत जरुरीचं होतं. कारण या भयावह, एकाकी जंगलात आता आम्हाला एकमेकांचाच आधार होता.images 25

रमेशचा हात धरून आश्वासक शब्दात त्याला म्हणालो.. “देखो रमेश.. हम इस जंगल की भूलभुलैया में अटक गए है.. यहां से कैसे बाहर निकला जाएं.. तुम्हे कुछ सूझ रहा है..?” “साब.. मुझे पूरा यकीन है, ये *छलावा* ही है..!” अत्याधिक अनामिक भयाने स्तब्ध होऊन थिजलेल्या आवाजात एक एक शब्द संथपणे उच्चारीत रमेश म्हणाला. “छलावा..?.. वो क्या होता है..?” मी हा शब्द नव्यानेच ऐकत होतो.. “यहां के गोंड आदिवासी उसे *साडतीन* कहते है.. कुछ आदिवासी उसे *भूलनी* भी कहते है.. इसे लोगों को सताने में, भटका कर परेशान करने में मजा आता है..” मी ओळखलं.. रमेश चकव्याबद्दलच बोलत होता. चकव्याला मराठीत “रानभूल” ही म्हणतात. ग्रामीण भाषेत त्याला “बाहेरची बाधा” म्हणतात तर काही ठिकाणी त्याला “झोटिंग” असे ही म्हणतात.halloween ghost in spooky empty house dark mysterious background ai generated photo पूर्वी माणसं फारसा प्रवास करीत नसत. आतासारखी दळणवळणाची साधनं तेव्हा नव्हती. बिकट वाटा आणि अनवट वळणांवरून प्रवास करावा लागायचा. म्हणून माणसं फारसा प्रवास करीतच नसत. काही माणसं तर आयुष्यभर बाहेर गेलेली नसत. अशाकाळी कुणी प्रवासाला निघाला तर त्याच्यावर बरंच दडपण येत असे. दऱ्या, डोंगर, झाडी, वाटमारी याला माणसं सतत घाबरत. मनावर ताण घेऊन केलेल्या प्रवासात माणसं बऱ्याचदा वाट चुकत. आडरानात फिरून फिरून पुन्हा त्याच ठिकाणी येत. दिशांचे ज्ञान विस्मृत झाल्यामुळे दिशाभूल होत असे. याला रानभूल म्हणत. त्यालाच आपण चकवाही म्हणतो. जे लोक चकव्याला एक प्रकारचे “भूत” मानतात त्यांचा असा समज आहे की हे भूत माणसाला *ऐन मध्यान्ही* चकविते. आम्ही देखील ऐन मध्यान्हीच या चकव्याच्या तावडीत सापडलो होतो. त्यातल्या त्यात समाधानाची बाब ही होती की, चकवा हा तसा निरुपद्रवी असतो.. थोडा वेळ भटकवून मग सोडून देतो.. हे वाचून, ऐकून माहिती होतं त्यामुळे जीवावर बेतण्यासारखा काही धोका नव्हता. चकव्याच्या नादी लागून व्यर्थ जंगलात गोल गोल फिरण्याऐवजी एका ठिकाणी शांत बसून डबे खाऊन घ्यावेत असा विचार करून जवळच एका झाडाखाली बसलो. त्या दाट घनघोर जंगलात डब्यातील अन्नाचा एकेक घास खाताना चारी दिशांना मान वळवून भोवतालच्या वृक्ष वेलींचे बारकाईने निरीक्षण करीत होतो. मधेच मान वर करून उंच उंच झाडांच्या शेंड्यांची न दिसणारी टोकं बघण्याचा प्रयत्न करीत होतो. मघाशी सुंदर, रमणीय वाटणारं हे जंगल आता दुष्ट, क्रूर आणि अक्राळविक्राळ भासत होतं.p07n19vr खूप भूक लागली असूनही भीतीमुळे घास घशाखाली उतरत नव्हता. आता पुढे काय होणार..? आपण ह्या चक्रव्यूहातून बाहेर कसे पडणार..? जर आपल्याला वाट सापडलीच नाही आणि रात्र जंगलातच काढावी लागली तर..? आपण ज्याला निरुपद्रवी चकवा समजतो आहोत, तो चकवा नसून दुसरा काहीतरी भयंकर प्रकार असेल तर..? एका मागोमाग एक असे अनेक विपरीत, अनिष्ट, अशुभ विचार मनात येत होते.. विविध शंका कुशंका मनात दाटून येत होत्या. भीतीमुळे घशाला कोरड पडली होती. डबे खाऊन झाले होते. आता तहान लागली होती. आम्ही प्यायचं पाणी सोबत आणलं नव्हतं. रमेश मध्येच उठून दोन तीन वेळा लघवी करून आला. तसेच पायात चप्पल घालताना त्याचा उजवा की डावा असा गोंधळ होत होता. “क्या बात है रमेश..? बार बार चप्पल का पांव बदल रहे हो..! और.. हमने कितनी देर से एक घूंट भी पानी नहीं पिया, फिर भी तुम्हे बार बार पेशाब कैसे आ रही है..?” शेवटी न राहवून विचारलंच… “सुना है, इस छलावेसे बाहर निकलना हो तो तुरंत पेशाब के लिए बैठ जाना चाहिए ! साथ ही में जूता चप्पल का पांव भी अदला बदली करना चाहिए ! ऐसा करने से छलावे का जादू खत्म हो जाता है !” रमेशच्या उत्तरामुळे त्याच्या विचित्र वागण्याचा उलगडा झाला. “चलो फिर.. निकल पडते है..! और एक बार ट्राय कर के देखेंगे..! हो सकता है के तुम्हारा नुस्खा काम कर गया हो और शायद अब की बार हमे रास्ता मिल भी जाये..” असं म्हणत आम्ही उठलो आणि उसनं अवसान आणून एकमेकांकडे पाहून केविलवाणं हसत मोटर सायकलवर बसून जंगलातल्या पायवाटेने पुढे निघालो. जाताना वाटेतली सारी झाडं झुडुपं, वृक्ष वेली, खाच खळगे, शिळा, वारुळं ओळखीची वाटत होती. तेच ते स्वप्न आपण वारंवार पहात आहोत असं वाटत होतं. थोड्या वेळाने त्याचा उबग येऊन आजूबाजूला पाहणं सोडून दिलं आणि नाकासमोर पहात गाडी चालवू लागलो. *”रानावनात पडणारा चकवा किंवा पडणारी रानभूल म्हणजे पानाफुलांतील, वृक्षवेलींतील अज्ञात गूढ शक्तीचा अनुभव असतो..”* असं काहीसं एका लेखात वाचल्याचं मला स्मरत होतं. त्या लेखात पुढे असं ही म्हटलं होतं की.. “जंगलातल्या अनेक वृक्षवेलींमध्ये, झाडाझुडपांमध्ये अनेक प्रकारची शक्ती असते. ती आपल्या जाणिवेच्या पलीकडे असल्यामुळे गूढ वाटते. मात्र ही शक्ती सर्वच वृक्षवेलींत नसते. ठरावीक परिसरातच ती आढळते. रानात भटकायला गेल्यावर अमक्याला ‘चकवा’ लागला किंवा ‘बाहेरची बाधा’ झाली, अशा गोष्टी कुणाकुणाकडून ऐकायला मिळतात. वनस्पती अभ्यासकांच्या मते या ‘चकव्या’लाही वनस्पतीशास्त्रात काही आधार आहे. त्याचा संबंध भुताखेताशी नसून ठरावीक वनस्पतींचं स्वयंसंरक्षणासाठीचं ते एक शस्त्र आहे. जंगलातल्या काही जागा पवित्र, मंगलमय वाटतात. केवढं प्रसन्न आणि रमणीय वाटतं तिथे. याचा अर्थ तिथे सकारात्मक ऊर्जेचे प्रवाह वाहत असतात. तर काही जागा गूढ, रहस्यमय शक्तींनी भारलेल्या असतात असं वाटतं, आणि त्या आपल्याला अस्वस्थ करतात. तिथे नकारात्मक ऊर्जेचं प्राबल्य असतं. त्या ऊर्जेच्या संपर्कात माणूस आला, की माणसाचं संतुलन बिघडतं. तो भारलेल्या अवस्थेत जातो. कधी आजारीही पडतो. अशी भारून टाकणारी एक अरण्यशक्ती तिथे असते. या अरण्यशक्तीचे, निसर्गऊर्जेचे अनेक अनुभव, अरण्य हेच आपलं घर मानून, सारं जीवन अरण्यात घालवणाऱ्यांना येतात.” ….हे सारं आठवत गाडी चालवता चालवता किती वेळ गेला ते कळलंही नाही. अचानक मागे बसलेल्या रमेशच्या तोंडावर पूर्वी दोनदा बसला होता अगदी तस्साच एका रानवेलीचा जोरदार फटका बसला आणि तो वेदनेनं कळवळला. मी गाडी थांबवली. तीच जागा.. तीच वेल.. आणि तेच त्या झाडाखाली रचलेले मोहाच्या फळाफुलांचे ढीग.. मोटर सायकल वर पुढे बसलेल्या मला टाळून दरवेळी नेमका मागे बसलेल्या रमेशच्या चेहऱ्यावरच या वेलीचा आघात कसा काय होतो ? हा नेम धरून हल्ला करण्याचा प्रकार तर नाही ना ? (क्रमशः)

लेखक परिचय-ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

अशीच एक सत्यकथा त्यांना तेंव्हाच्या आंध्र प्रदेश मधील आदिलाबाद जिल्ह्यातील उतनूर या ठिकाणी पोस्टिंग असतांना आलेला अनुभव वर्णन करणारी आहे. ही कथा 3 भागांमध्ये क्रमशः आहे. ही यापूर्वी त्यांच्या फेसबुकवर प्रसिद्ध झालेली आहे, आणि आता त्यांच्या परवानगीने या ब्लॉगच्या वाचकांसाठी इथे देत आहोत. 

smartphone summer sale
smartphone summer sale
wall clocks
Wall Clocks
Nilkamal cupboard
Nilkamal cupboard
wooden sofa set
wooden sofa set

Order any items above by clicking on respective images

Or click on the link shown here  to see all items in furniture

The above items are available on Amazon India.

Please refer to our affiliate disclosure page