https://goodworld.in A website by Madhav Bhope

लोकां सांगे ब्रह्मज्ञान-2

Indian forest service

लेखक

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*लोका सांगे ब्रह्मज्ञान..-2*

 

क्रमशः.. (२)

उतनुर परिसरातील जंगलात सागाचे घनदाट जंगल होते. जाडजूड बुंध्याची उंच सरळसोट वाढलेली ही झाडे अनेकदा सोसाट्याच्या वादळात उन्मळून पडत. कधी कधी त्यांच्या वर वीज पडून ती अर्धवट जळून तुटून जात. अशी ही उन्मळून पडलेली, वीज पडून अथवा वणव्यात जळून, तुटून पडलेली सागाची झाडे वर्षानुवर्षे तशीच निर्जन, सुदूर अरण्यात पाण्यापावसात भिजत पडून रहात.

जंगलात राहणारे आदिवासी पोटापुरते धान्य पिकविण्यासाठी थोडी फार शेतीही करत. त्यासाठी त्यांना जंगलात मोकळी, सपाट जमीन हवी असे. मग कधी कधी जंगलातील एखादा विरळ झाडी असलेला भूभाग निवडून रातोरात त्यावरील सर्व छोटे मोठे सागवृक्ष हे आदिवासी मुळापासून तोडून टाकत. मग मोकळ्या झालेल्या जमिनीच्या तुकड्यावर ते शेती करत. अशाप्रकारे नवीन जमीन संपादन करण्याला ते “जमीन मारणे” असे म्हणत.

या नवीन जमिनीवर काही वर्षे पिके घेतल्यावर कालांतराने हळूहळू त्या जमिनीचा कस आपोआप कमी होत असे. त्यामुळे या आदिवासींना शेतीसाठी पुन्हा नवीन जमिनीचा शोध घ्यावा लागत असे. मग पुन्हा सरसकट वृक्षतोड करून ते नवीन जमीन मारत असत. या सर्व प्रकारात मोठ्या प्रमाणात सागाची झाडे वारंवार तोडली जात. आदिवासींची मूलभूत गरज जाणून वन विभागही या प्रकाराकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असे.

हे तुटलेले वृक्ष उचलून नेण्याइतपत साधन सामुग्री, वेळ आणि मनुष्यबळ वन विभागाकडे क्वचितच असायचे. मग आदिवासीच हे सागाचे लांबलचक भरभक्कम ओंडके खांद्यावर उचलून त्यांच्या वस्तीत नेऊन टाकायचे. वेळ मिळेल तसे या ओंडक्यांचे तुकडे करून आदिवासी हे लाकूड गावकऱ्यांना मातीमोल भावात विकायचे. चोरटे फर्निचर करणारे कारागीरही या आदिवासीं कडूनच जवळ जवळ फुकटातच सागाचे लाकूड प्राप्त करायचे.

सागवानाच्या लाकडाला बाहेर सोन्याचा भाव होता. उतनुर भागातील सागवान उच्च प्रतीचे असल्याने आसपासच्या गावांतून या लाकडाला भरपूर मागणी असायची. काळ्या शिसव (Indian Rosewood) वृक्षाची काही तुरळक झाडेही उतनुरच्या जंगलात होती. ह्या वृक्षाचे जड, काळे, दर्जेदार शिसवी लाकूड दूरवर खूप प्रसिद्ध होते. सागवाना बरोबरच ह्या शिसवी लाकडाचीही चोरटी वाहतूक आसपासच्या गावांत व्हायची. या तस्करीला आळा घालण्यासाठी डिव्हीजनल फॉरेस्ट ऑफिस आणि फॉरेस्ट रेंज ऑफिस अशी वन विभागाची दोन कार्यालये उतनुर गावांत होती.

पी. सूर्यकुमार नावाचा सहा फूट उंच, सुदृढ, गोरा पान, सरळ धारदार नाक असलेला रुबाबदार, तरुण IFS अधिकारी, फॉरेस्ट रेंज ऑफिसर म्हणून नुकताच उतनुरला जॉईन झाला होता. अतिशय धडाडीचा, कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्याने अल्पावधीतच चांगला लौकिक प्राप्त केला होता.

चोरट्या सॉ मिल मधून सागवानाच्या फळ्या कापून त्यांची ऑटो रिक्षातून जवळच्या गावांत वाहतूक करण्याचा एक नवीनच किफायतशीर धंदा तेंव्हा लाकूड तस्करांनी उतनुर परिसरात सुरू केला होता. तयार फर्निचरही या ऑटो रिक्षातून सहजपणे कुठेही पोहोचते केले जात असे. रेंज फॉरेस्ट ऑफिसर सूर्यकुमार यांचा अधिकांश वेळ व शक्ती या चोरट्या रिक्षा वाहतुकीला पायबंद घालण्यातच खर्च होत असे. अनेक कारागीर सुतारांनी स्वतःच्या रिक्षा खरेदी करून त्या जंगलात नेऊन ठेवल्या होत्या. मागणी नुसार फर्निचर, फळ्या तयार करून रिक्षात भरून रातोरात ते स्वतःच त्या मालाची आसपासच्या गावांत डिलिव्हरी करायचे.

ज्यांची सुतारकामाची उपकरणे, यंत्रे, हत्यारे जप्त करण्यात आली आहेत, अशा कारागीर लाकूड तस्करांचे पुनर्वसन (Rehabilitation) करण्यासाठी अर्थ सहाय्याच्या विविध योजना आमच्या बँकेमार्फत राबविल्या जात.

एकात्मिक आदिवासी विकास महामंडळ (ITDA), वन विभाग (Forest Dept) व जिल्हा उद्योग केंद्र (DIC) यांच्यातर्फे अशा योजनांना पर्याप्त बीज भांडवल (Seed money) व अनुदान (Subsidy) उपलब्ध करून दिले जात असे.

पर्यायी उद्योग धंद्यासाठी अर्थसहाय्य घेण्यास इच्छुक असलेल्या लाकूड तस्करांची मुलाखत घेण्यासाठी फिल्ड ऑफिसर या नात्याने बँकेचा प्रतिनिधी म्हणून मलाच जावे लागत असे. अशाच काही लाकूड तस्करांची कर्ज मंजुरी पूर्वीची मुलाखत घेण्यासाठी एकदा गेलो होतो. या सर्वांनी रिक्षा व्यवसायासाठी कर्ज मागितले होते.

“कोणत्या मार्गावर रिक्षा चालवणार ?”, “भाडे कोणत्या दराने आकारणार ?”, “दिवसाला किंवा महिन्याला किती कमाई होणार ?”, “कर्जाची परतफेड कशी करणार ?”

यापैकी कोणत्याही प्रश्नाचे कुणाजवळ ही उत्तर नव्हते.

“मग रिक्षा कशासाठी खरेदी करणार ?”

या प्रश्नाचे मात्र सर्वांनीच निरागसपणे, खरेखुरे आणि एक सारखे उत्तर दिले..

“फर्निचर-फळ्यांची डिलिव्हरी करण्यासाठी..!”

तस्करांचे हे उत्तर ऐकून इंटरव्ह्यू पॅनल मधील आम्ही सर्वांनी कपाळावर हात मारून घेतला.

मध्यंतरीच्या काळात माझा मेव्हणा उतनुरला येऊन गेला. त्याला आमचा लाकडी सोफा सेट खूपच आवडला. कसंही करून माझ्यासाठी असा एक सेट विकत घेऊन तो बुलढाण्याला पाठवून द्याच.. असे तो परत जाताना वारंवार जतावून, विनवून गेला.

त्याच्या आग्रहास्तव एक सागवानी सोफा सेट खरेदी करून तो थेट सकाळी सातच्या उतनुर ते आदिलाबाद बस मध्ये चढवला. सुदैवाने उतनुर ते आदिलाबाद हा पन्नास किलोमीटरचा दीड तासाचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडला. आदिलाबादला बस स्टँड वरच वन विभागाची चौकी होती. परंतु त्यांच्या कडूनही कसलीच चौकशी किंवा आडकाठी झाली नाही.

आदिलाबादहून फक्त वीस किलोमीटर वर महाराष्ट्राची सीमा आहे. “आदिलाबाद ते पांढरकवडा” ह्या महाराष्ट्रात जाणाऱ्या बसमध्ये सोफा चढवला. पंचेचाळीस किलोमीटरचा हा प्रवास तासाभराचा होता. पैनगंगा नदी पार केल्यावर पिंपळखुटा इथे महाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस झाली आणि मी सुटकेचा निःश्वास सोडला.

पांढरकवडा ते बुलढाणा बसची अगोदरच चौकशी करून ठेवली होती. ती बस दुपारी अकरा वाजता होती. योग्य ते लगेज चार्जेस भरून बसमध्ये सोफा चढवला. ड्रायव्हर कंडक्टरला चहा पाण्यासाठी थोडे पैसे दिले आणि बुलढाण्याला मेव्हणा सोफा उतरवून घेईल असे सांगितले. अशाप्रकारे सोफा संध्याकाळ पर्यंत बुलढाण्याला पोहोचता झाला.

उतनुरला याआधी किरवानी नावाचे एक चाणाक्ष बुद्धीचे मॅनेजर होते. त्यांचे घर हैद्राबादला होते. सागवानाच्या अशा भरपूर फळ्या त्यांनी जमा करून ठेवल्या होत्या. त्या फळ्यांची बाजारभावाने किंमत कित्येक लाखात होती. या फळ्या हैद्राबादला पोहोचविण्यासाठी त्यांनी एक अनोखी शक्कल लढविली.

आंध्र प्रदेशातील आदिवासी समाजाचा राज्यस्तरीय मेळावा त्या सुमारास हैद्राबाद येथे होता. किरवानी साहेबांनी एका ट्रक मध्ये सर्व फळ्या व्यवस्थित रचल्या. मग त्यावर गाद्या टाकून त्या फळ्या झाकून टाकल्या. जंगली पारंपरिक वेशभूषेतील वीस पंचवीस आदिवासी स्त्रीपुरुषांना वाद्यांसहित ट्रकमधील गाद्यांवर बसविले. मेळाव्याची बॅनर्स तयार करून ती ट्रकच्या चारी बाजूंना बांधली.

“मेळाव्यासाठी हैद्राबादला जात आहोत..” असे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सांगत वाद्ये वाजवित, गाणी गात, नृत्य करीत हे आदिवासी उतनुर जंगल क्षेत्रातील सर्व चेक पोस्ट्स पार करीत हैद्राबादच्या रस्त्याला लागले. कडक तपासणीचा एरिया पार झाल्यावर ट्रकच्या मागोमाग कार मधून येणाऱ्या किरवानी साहेबांनी मग रस्त्याच्या कडेच्या एका ढाब्यावर ट्रक थांबवून सर्व आदिवासींना ट्रक मधून खाली उतरविले. ट्रक वरील बॅनर्स काढून टाकली. आदिवासींना ढाब्यावर पोटभर जेऊ खाऊ घालून खर्चासाठी थोडे फार पैसे देऊन बसने उतनुरला परत पाठवून दिले. वन विभागाला जराही संशय येऊ न देता अशा प्रकारे किरवानी साहेबांनी लाखोंचे सागवानी लाकूड हैद्राबादला पोहोचते केले.

ज्यावेळी एखाद्या कर्मचाऱ्याची बदली उतनुर बाहेर अन्यत्र होत असे तेंव्हा त्याला ऑफिसचे ट्रान्स्फर लेटर दाखविल्यावर हे घरगुती वापराचे तयार फर्निचर कायदेशीरपणे उतनुर बाहेर नेता येत असे. बदलीची ऑर्डर व रिलिव्हिंग लेटर पाहिल्यावर चेक पोस्ट वर जास्त चौकशी होत नसे. अर्थात सागवानी फळ्यांची वाहतूक करण्यास मात्र सर्वांनाच सर्व काळ सक्त मनाई होती.

आसपासचे गांवकरी सागवानी लाकडाचे चौरंग, स्टूल, खेळणी, मेकप-बँगल बॉक्स, शिसवी देव्हारे अशा विविध वस्तू उतनुरच्या तस्कर सुतारांकडून विकत घेत. मात्र त्या लाकडी वस्तू घेऊन आपल्या गावी जाताना वन विभागाकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होत असे. (काय करतील बिचारे..! ट्रान्स्फर लेटर कुठून आणणार ते ?) वन कर्मचाऱ्यांच्या मूड नुसार कधी कधी किरकोळ दंडाची पावती फाडून काम भागत असे तर कधी मुद्देमाल जप्त होऊन वर दंडही भरावा लागत असे. सराईत व धंदेवाईक लोकांवर खटलाही भरला जायचा.

माझा उतनुर मधील कार्यकाळ संपत आला आणि बदलीचे वेध लागले तेंव्हा जाता जाता इतर सर्वांप्रमाणेच आपणही थोड्याशा सागवानी फळ्या येथून घेऊन जाव्या असा मोह मनात जागू लागला. आमच्या मॅनेजर साहेबांचीही लवकरच बदली होणार होती. घरातील नित्य वापराच्या फर्निचर व्यतिरिक्त एक खोलीभर अतिरिक्त सागवानी फर्निचर त्यांनीं आधीच गोळा करून ठेवले होते. हेड कॅशियर व अन्य एक दोन कर्मचाऱ्यांची ट्रान्स्फरही due होती. ते देखील जाण्यापूर्वी जमेल तितके फर्निचर, फळ्या विकत घेऊन ठेवण्याचा विचार करीत होते.

…अशातच एक दिवस बँकसमोरील चहाच्या टपरीवर काम करणारा रघु नावाचा नोकर हेड कॅशियर साहेबांकडे एक आकर्षक ऑफर घेऊन आला.

“स्वच्छ, गुळगुळीत, दर्जेदार आणि जाडजूड सागवानी फळ्यांनी भरलेली एक रिक्षा अत्यंत कमी किमतीत उपलब्ध असून रोख पैसे दिल्यास एक दोन दिवसात माल घरपोच केला जाईल..” अशी ती ऑफर होती.

खरं म्हणजे हेड कॅशियर साहेबांनीच समोरच्या हॉटेल वाल्याला कुठे सागाच्या फळ्या मिळतील का ? याबद्दल विचारले होते. ते ऐकूनच त्याचा नोकर रघु ही ऑफर घेऊन आला होता. अनायासे चालून आलेली ही संधी हेड कॅशियर दवडणार नव्हते. त्यांनी ताबडतोब रघुची ऑफर स्वीकारली. त्यानंतर मॅनेजर साहेब, मी व अन्य दोन under transfer स्टाफला त्यांनी या ऑफर बद्दल सांगितले. “जर आपण पाच जणांनी मिळून या फळ्या वाटून घेतल्या तर सर्वांना दर्जेदार लाकूड स्वस्तात आणि घरपोच मिळेल..”, असेही ते म्हणाले.

विनासायास घरपोच मिळणारं असं दर्जेदार सागवान प्रत्येकालाच हवं होतं. ताबडतोब सर्वांनी पैसे गोळा करून ते रघुच्या स्वाधीन केले. पैसे खिशात ठेवून घेत रघु म्हणाला..

“उद्या गावातील लाईट गेल्यानंतर रात्री आठच्या सुमारास रिक्षा आळीपाळीने प्रत्येकाच्या घरासमोर उभी राहील. रिक्षात सारख्या मापाच्या पन्नास फळ्या असतील. प्रत्येकाने दहा दहा फळ्या आपापल्या घरात सुरक्षित जागी ठेवून घ्याव्यात. घर दाखविण्यासाठी व फळ्या ठेवायला मदत करण्यासाठी रिक्षासोबत मी ही असेन..”

रघुने सांगितल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजल्या नंतर साग फळ्यांनी भरलेली रिक्षा आमच्या घरासमोर उभी राहिली. प्रत्येकाने आपापल्या दहा फळ्या रिक्षावाल्याकडून उतरवून घेऊन घरातील आधीच मोकळ्या केलेल्या जागी रघुकरवी व्यवस्थित ठेवून घेतल्या.

त्यानंतर आठ दहा दिवस शांततेत गेले. आम्ही सारे दुपारी चहा पिण्यासाठी समोरच्या टपरीवर जायचो तेंव्हा चांगले लाकूड मिळवून दिल्याबद्दल आवर्जून रघुचे आभार मानायचो.

दोन आठवड्यानंतर रविवारच्या दिवशी सकाळी घरी गरमा गरम मसाला दोशाचा नाश्ता करीत असताना दारासमोर जीप थांबल्याचा आवाज आला. बाहेर हलका झिमझिम पाऊस पडत होता.

“सुटीच्या दिवशी भर पावसात एवढ्या सकाळी घरी कोण आलं असावं बुवा ?” असा विचार करीतच दार उघडलं. जीप मधून साध्या वेशातील फॉरेस्ट रेंजर IFS पी. सूर्यकुमार उतरत होते.

“वेलकम् सर..! आईये..!”

म्हणत मी त्यांचं स्वागत केलं. सूर्यकुमार माझ्या चांगल्याच परिचयाचे होते. लाकूड तस्करांच्या कर्ज मंजुरीच्या अनेक मुलाखती आम्ही दोघांनी मिळूनच घेतल्या होता.

“आज छुट्टी के दिन.. इतने सवेरे.. इधर किस कामसे आए थे..?”

सूर्यकुमार आणि त्यांचा सहाय्यक हवालदार सोफ्यावर स्थानापन्न झाल्यावर मी हसत विचारलं.

काही कामानिमित्त सूर्यकुमार या भागात आले असावेत आणि परत जाताना ते सहज माझ्या घरी आले असावेत असाच माझा समज होता.

“आप ही के घर आया था..! सॉरी सर, बट धिस इज फॉरेस्ट डिपार्टमेंट रेड.. !! वुई हॅव काँक्रिट इन्फर्मेशन दॅट यू हॅव स्टोअर्ड इल्लीगल स्टॉक ऑफ टीकवुड प्लॅन्कस्.

वुई हॅव ऑलरेडी रेडेड दि हाऊसेस ऑफ युवर आदर फोर बँकमेट्स इन्क्लुडिंग ब्रँच मॅनेजर.. अँड कॉन्फिस्केटेड ए ह्यूज क्वांटिटी ऑफ सच स्टॉक.”

सूर्यकुमार यांच्या तोंडचे हे शब्द ऐकताच मी हादरून गेलो. क्षणभर मतीच गुंग झाली. सारं घर स्वतःभोवती गरगर फिरतंय असं वाटू लागलं…

(क्रमशः)

*लोकां सांगे ब्रह्मज्ञान.(मागील लेखाची लिंक).*

 

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानका वर खिळवून ठेवतात.

निवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या वेळेत हे अनुभव लिहून काढले आणि त्यांच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केलेले आहेत, आणि ते सर्व अत्यंत लोकप्रिय झाले. बँकेतील, किंवा केवळ मित्रपरिवारातीलच  नाही, तर सर्व स्तरावरील वाचकांचा त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, आणि वाचक त्यांच्या पुढल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहू लागले.  आज त्यांच्याच फेस बुक वर या आधी प्रकाशित झालेल्या एका अशाच कथानकाचे  सादरीकरण या ब्लॉगवर करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे, ही कथा मालिका आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करीत आहोत.

activa ceiling fan
Check the prices of Ceiling Fans on Amazon
havels ceiling fan
Havels Fans on Amazon

लोकां सांगे ब्रह्मज्ञान-1

kotnis-loka-sange

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

*लोका सांगे ब्रह्मज्ञान..*

ऑफिसर पदावर पदोन्नती झाल्यावर तत्कालीन आंध्र प्रदेशच्या आदिलाबाद जिल्ह्यातील स्टेट बँकेच्या “उतनुर” नामक शाखेत रुजू झालो, तेंव्हाचा हा प्रसंग..!

आदिलाबाद हा महाराष्ट्राच्या सीमेलगतचा घनदाट जंगलाने वेढलेला जिल्हा. नक्षल पीडित, आदिवासी बहुल असल्याने अत्यंत मागासलेला आणि  अविकसित.. रेल्वे, रस्ते, वीज, दळण वळणाची साधने, पिण्यायोग्य पाणी अशा मूलभूत सोयी सुविधांचाही या भागात अभावच होता.

उतनुरला बिऱ्हाड शिफ्ट करण्यासाठी सात दिवसांचा “जॉइनिंग टाईम” घेऊन निघालो तेंव्हा शाखेतील प्रत्येकाने एकच सल्ला दिला की.. “साब, आते वक्त पलंग, सोफा, अलमारी, डायनिंग टेबल, दिवान, स्टूल ऐसा कोई भी फर्निचर साथ मत लाना.. सिर्फ स्कूटर, टीव्ही, फ्रिज, चादर गद्दे, गॅस, कपडे और घरेलु बर्तन इतनाही सामान लेके आना..”

सर्व जण वारंवार तेच ते बजावून सांगत असल्यामुळे सुरवातीला त्याचं नवल वाटलं. पण नंतर जेंव्हा समजलं की इथे अस्सल सागवानी लाकडाचं सर्व प्रकारचं फर्निचर अक्षरशः नाममात्र किंमतीत अगदी घरपोच आणून मिळतं, तेंव्हा मात्र त्यांचं म्हणणं पटलं. स्टाफचा सल्ला मानून, बायकोचा आग्रह न जुमानता, परत येताना केवळ फ्रिज, स्कूटर, कपडे व थोडी भांडीकुंडी एवढंच सामान सोबत घेऊन आलो.

येताना आंध्र प्रदेशच्या निजामाबाद व आदिलाबाद जिल्ह्यात प्रवेश करताच जागोजागी विविध प्रकारचे चेक पोस्ट्स लागले. परिवहन विभाग (RTO), मार्केटिंग कमिटी, टॅक्स (Goods) चेक पोस्ट असे तुरळक नाके वगळता अन्य सर्व तपासणी नाके हे वन विभागाचे (Forest Deptt.) होते. आम्ही जंगल क्षेत्राच्या आत प्रवेश करत असल्याने आम्हाला कुणीही कुठेच अडवलं नाही. तेथून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची मात्र कसून तपासणी होताना दिसत होती.

मी बायको मुलांसहित सर्व सामान घेऊन आल्याचं समजताच मॅनेजर साहेबांनी सामान लावण्यात मदत करण्यासाठी सकाळीच बँकेतील दोन चपराशी घरी पाठवून दिले. त्यांच्या मदतीने अवघ्या दोन तासांतच सर्व सामान लावून झालं. त्या दिवशी रविवार होता. दुपारी मॅनेजर साहेबांकडे सहकुटुंब जेवायला बोलावलं होतं.

जेवण झाल्यानंतर मॅनेजर साहेब म्हणाले.. “आपको सिर्फ आज का एक दिन नीचे फर्शपर गद्दा बिछाकर सोना पड़ेगा.. अभी मेरे घर का फर्नीचर देखो और किस टाईप का पलंग और सोफा चाहिए वो बता दो.. कल सुबह तक फर्नीचर घर में पहुंच जाएंगा..!”

मॅनेजर साहेबांच्या घरातील तीन चार प्रकारच्या पलंग व सोफासेट पैकी एक डिझाईन बायकोच्या सल्ल्याने पसंत करून घरी परतलो. दीर्घ प्रवासामुळे आधीच शरीर खूप थकलं होतं. त्यामुळे रात्री बिछान्यावर पडल्या पडल्याच गाढ झोप लागली.

सुमारे बारा वाजता दारावर टक टक झाली.

“साब, मै रमेश.. ! दरवाजा खोलो.. आपका फर्नीचर आ रहा है..”

बाहेरून बँकेचा चपराशी रमेश दबक्या आवाजात बोलत होता.

डोळे चोळतच मी दार उघडलं. हातात टॉर्च आणि रुमालाने संपूर्ण चेहरा झाकलेला रमेश पायऱ्यांवर उभा होता. नेहमी प्रमाणे गावातली वीज केंव्हाच गुल झाली होती. बाहेर सर्वत्र मिट्ट काळोख होता. घरामागे विस्तीर्ण, काटेरी, उजाड माळरान होतं. त्यामागे काही शेतं आणि लहान डोंगर होते. हातातील टॉर्च उंचावत रमेशने त्या दिशेने एक दोन वेळा प्रकाशझोत सोडला.

थोड्याच वेळात तिकडून घुबडा सारख्या निशाचर पक्ष्यांचे खुणेचे घूत्कार ऐकू आले. रमेशचे डोळे आनंदाने चमकले.

“वो आ रहे है..! कल दोपहरको ही आपका घर दिखाया था उनको..”

रमेशचं बोलणं संपतं न संपतं तोच अंधारातून कमरेला फक्त छोटंसं फडकं बांधलेले चार पाच उघडेबंब आदिवासी तरुण सावध नजरेने इकडे तिकडे पाहत  घराजवळ येताना दिसले. मांजरीच्या पावलांनी, दबकत दबकत येणाऱ्या त्या तरुणांच्या डोक्यावर लाकडांच्या मोळ्या होत्या. रमेशने त्यांच्याकडून त्या मोळ्या घरात ठेवून घेतल्या.

“साब, इनको कुछ बक्षीसी, इनाम दे दो..”

रमेश म्हणाला..

मी शंभराची नोट काढली. ते पाहताच..

“अरे साब, ऐसे इनकी आदत मत बिगाड़ो.. रहने दो.. मै ही देता हूं..!”

असं म्हणत रमेशने आपल्या खिशातून दहा दहा रुपयांच्या तीन चार नोटा काढल्या आणि “ये लो लच्छु..!” म्हणत त्यांच्या म्होरक्याच्या हातात ठेवल्या.

त्या म्होरक्याने खुश होत मला व रमेशला सलाम ठोकला, कमरेला खोचलेली एक छोटीशी कापडी थैली रमेशच्या हातात ठेवली आणि मागे वळून आल्या वाटेने जात पाहता पाहता आपल्या साथीदारांसह अंधारात दिसेनासा झाला.

ती कापडी थैली माझ्या कडे देत रमेश म्हणाला..

“साब, इसमे पलंग सोफा के नट बोल्ट है.. कल सुबह घर आके सारा फर्निचर फिट कर दूंगा..”

दुसऱ्या दिवशी घरी येऊन रमेशने त्या लाकडाच्या मोळ्या सोडल्या. ते सोफा व पलंगाचे फोल्डिंग पार्टस् होते. नट बोल्ट फिट केल्यावर आकर्षक आकाराचा सोफा व पलंग तयार झाला. सोफा सेटचे बाराशे रुपये आणि पलंगाचे सातशे रुपये असे फक्त एकोणीसशे रुपये रमेशने मागितले तेंव्हा..

“एवढं स्वस्त ? कसं काय परवडतं बुवा त्यांना..?”

असे आश्चर्योदगार अभावितपणेच माझ्या तोंडून बाहेर पडले.

त्यावर रमेश म्हणाला..

“ये सिर्फ कारागीर की मजदूरी के पैसे है.. सागवान की लकडी तो यहां मुफ्त ही मिलती है.. अगर घरमे जलाने के लिये चाहिए तो बता देना.. दो चार रुपये देने पर कोई भी ढेर सारी सागवानी लकडी घर लाके देगा..”

अशाप्रकारे उतनुरला आल्या आल्या एका दिवसातच आम्ही “साग फर्निचर संपन्न” बनलो. हळू हळू डायनिंग टेबल, रॉकिंग चेअर (झुलती खुर्ची), दिवाण, स्टडी टेबल, वेगवेगळ्या आकाराची स्टूलं.. असं विविध प्रकारचं सागवानी फर्निचर “मध्यरात्रीच्या साहसी, थरारक, चोरट्या वाहतुकी मार्गे” आमच्या घरात दाखल झालं.

तसं पाहिलं तर, सागवानी लाकडाचा बोटभर तुकडाही जर कुणी जंगला बाहेर नेला, तर तो मोठा अपराध मानून फॉरेस्ट डिपार्टमेंट अशा व्यक्ती विरुद्ध कठोर कारवाई करीत असे. जबर आर्थिक दंड अथवा फौजदारी गुन्हा किंवा दोन्ही.. अशी ती कारवाई असे. परंतु त्याच लाकडाचं फर्निचर बनवून जर कुणी आपल्या घरात वापरलं तर मात्र अशा व्यक्तीविरुद्ध वन विभाग कोणतीच कारवाई करीत नसे. वन विभागाच्या कायद्यातील या पळवाटेचा फायदा घेऊन त्या भागातील रहिवासी घरोघरी सागवान लाकडाचा उदंड वापर करीत.

त्या भागातील गरीब, निर्धन आदिवासी झोपड्या बांधताना सहज व मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या सागवानी लाकडांचाच वापर करीत. बहुदा त्यामुळेच वन विभागाने सागवानाच्या घरगुती वापरासाठी सर्व नागरिकांना अशी सवलत दिली असावी.

उतनुर गावातील सर्वच सिमेंट काँक्रिटच्या घरांची खिडक्या दारे अस्सल सागवानी लाकडांचीच होती. याशिवाय लहान मुलांचे लाकडी पाळणे, झोपाळा (बंगई), दुकाने, हॉटेल यातील टेबल खुर्च्या, काऊंटर, शो केसेस हे सारं सागवानीच असे. काही श्रीमंतांनी तर सागवान वापरून दोन तीन मजली लाकडी महाल बांधले होते, ज्यात संपूर्ण लाकडी छत, लाकडी जिने व प्रचंड विशाल लाकडी दिंडी दरवाजे होते.

आश्चर्य आणि विनोदाचा भाग म्हणजे सागवानी लाकडाचे फर्निचर बनविण्यावर वन विभागाचे कडक निर्बंध होते. त्यामुळे ही सुतार मंडळी खोल जंगलात लपून छपून फर्निचर तयार करीत असत.  वन विभाग अधून मधून त्यांच्यावर धाडी टाकून त्यांची हत्यारे जप्त करीत असे. त्यांना तडीपारही (हद्दपार) करीत असे.

मात्र एकदा का असे वन विभागाची नजर चुकवून तयार केलेले फर्निचर चोरट्या मार्गाने गावात दाखल होऊन एखाद्या रहिवाश्याच्या घरात विराजमान झाले, की मग वन विभाग त्याच्या विरुद्ध कोणतीही कारवाई करू शकत नसे. त्यामुळे असे फर्निचर घरात दाखल होण्यापूर्वीच धाड टाकून ते विकणारा व खरेदी करणारा अशा दोघांवरही कारवाई करण्याचा वन विभाग आटापिटा करीत असे.

जो कोणी वन विभागाला अशा अवैध फर्निचर खरेदी विक्रीची आगाऊ खबर देईल त्याला वन विभागातर्फे रोख इनाम दिले जाई. या बक्षिसाला चटावलेले वन विभागाचे अनेक गुप्त खबरे गावातील सामान्य नागरिकांमध्ये बेमालूमपणे वावरत होते.

… असाच एक धूर्त, साळसूद गुप्त खबऱ्या स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांवर बारीक नजर ठेवून होता, ज्याची आम्हा कुणालाच अजिबात खबर नव्हती..

          🙏🌹🙏

(क्रमशः)

kotnis

लेखक परिचय-

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानका वर खिळवून ठेवतात. 

निवृत्तीनंतर त्यांनी मिळालेल्या वेळेत हे अनुभव लिहून काढले आणि त्यांच्या फेसबुक पेज वर प्रकाशित केलेले आहेत, आणि ते सर्व अत्यंत लोकप्रिय झाले. बँकेतील, किंवा केवळ मित्रपरिवारातीलच  नाही, तर सर्व स्तरावरील वाचकांचा त्यांना खूप प्रतिसाद मिळाला, आणि वाचक त्यांच्या पुढल्या पोस्टची आतुरतेने वाट पाहू लागले.  आज त्यांच्याच फेस बुक वर या आधी प्रकाशित झालेल्या एका अशाच कथानकाचे  सादरीकरण या ब्लॉगवर करण्यासाठी त्यांनी परवानगी दिल्यामुळे, ही कथा मालिका आपल्या ब्लॉगवर प्रकाशित करीत आहोत.

Who caught whom?- चोरीचा मामला

people-cinema-watching-movie_23-2151005467.png

Guest Article by Shri V.D.Bhope.

इंग्रजी सिनेमा पाहतांना पकडले …..

( पण कुणी कुणाला ? )

———————

मित्रांनो
साधारणपणे १९६८ सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी औरंगाबादला(आताचे संभाजीनगर) इंजिनियरींगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होतो.दोन मित्रांसोबत किरायाची खोली घेऊन उस्मानपुऱ्यात रहात होतो.महिन्यातून एक दोन वेळा सिनेमा पहायला जायचो. त्या काळात विद्यार्थ्यांनी इंग्रजी सिनेमा पाहणे एकदम वर्ज्य समजले जायचे.एकदम शांतम् पापम् ! पापभिरू मंडळींनी इंग्रजी सिनेमा पहायचा नसतो अशी समजूत सर्वसाधारणपणे दृढ होती .
आमच्या घरचे वातावरण तर फारच बाळबोध होते.आम्हा सर्व बहीण भावंडांना आमच्या वडिलांचा फार धाक वाटत होता .त्यांच्या समोर बोलण्याची आमची हिम्मत नसे.   त्यांच्याशी सगळं महत्वाचं communication सहसा आईच्या मार्फतच व्हायचं .
आमच्या काळात आपण कांहीही चूक केली नसली तरी वडीलांना भिण्याची पध्दत होती. 


तर एका रविवारी आम्ही कांही मित्रांनी गुलजार टाॅकीजमध्ये चालू असलेला एक इंग्रजी सिनेमा पहायला जायचे ठरवले.सगळ्यांचे आई वडील परगावी रहात होते. त्यामुळे ही गोष्ट तशी कुणाच्याही घरी कळण्याची काहीच  शक्यता नव्हती.
तर आम्ही कांही मित्र ठरल्या प्रमाणे गुलजार टाॅकीज मध्ये मॅटिनी शो ला जाऊन बसलो. सिनेमा सुरू झाला .त्यातील नट माहित नाहीत, नट्या माहित नाहीत ,त्यांची भाषा कळत नाही, उच्चार नीट समजत नाहीत , पडद्यावर नक्की काय चाललंय हे ही कुणाला समजत नाही तरी पण आसपासचे कुणी हसले तर कांही तरी विनोद  झाला असावा असा अंदाज बांधून उरलेले हसतात .आणि सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक काॅमन भाव दिसतो.आपल्याला सिनेमातलं कांही कळत नाही हे कुणी ओळखलं तर नाही ना ? अशा अर्थाचा तो ओशाळवाणा भाव असतो. पण अळीमिळी गुपचिळी हेच धोरण सगळे जण अवलंबतात .म्हणजे तेरी भी चूप अन् मेरी भी चूप .असो.

सिनेमा सुरू झाल्या नंतर कांही वेळाने माझ्या एका मित्राने मोठ्ठ्याने ओरडून हाक मारली..ए भोपे , इकडे ये न बे , जागा रिकामी आहे. ‘ मी त्याने दाखवलेल्या जागेवर जाऊन बसलो.टाॅकीज मध्ये अंधारात थोडावेळ बसल्यांनतर कांही वेळाने आसपासचे बऱ्यापैकी दिसू लागते.कांही वेळाने माझ्या लक्षात आले की माझ्या शेजारचे गृहस्थ आमच्या कुटुंबाशी चांगलेच परिचित असलेले एक गृहस्थ होते. आम्ही त्यांना काका म्हणत असू. माझ्या मित्राने मोठ्ठयाने माझ्या नावाने जेव्हां  मला हाक मारली तेंव्हाच त्या काकांना समजले होते की मी सिनेमाला आलो म्हणून !


आणि आता तर काय मी त्यांच्या शेजारीच बसलो होतो. ते म्हणाले, अरे विष्णू बैस बैस .आता मात्र मी बेचैन झालो. हे काका पुढे मागे  आमच्या गावी आमच्या घरी गेले तर नक्कीच माझी चुगली  करतील आणि मग वडिलांनी  जाब विचारला तर आपल्यावर काय प्रसंग ओढवेल याची मला काळजी वाटू लागली .
मला ओरडून नावाने हाक मारणाऱ्या मित्राला इंटरव्हल मध्ये चांगलंच झापावं आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या शेजारच्या काकांना कांहीतरी गयावया करून पुढेमागे गावी  गेलात तर प्लीज ही गोष्ट घरी सांगू नका,अशी गळ घालावी असं मी मनात ठरवलं आणि त्यासाठी मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करू लागलो .
इंटरव्हल झाली . माझ्या त्या मित्राला मी गाठलं आणि म्हणालो ” माझं नाव घेऊन एवढ्या मोठ्ठयाने ओरडायची  काय गरज होती रे ? त्या माझ्या शेजारी बसलेल्या काकांना  आता कळालंना ! त्यांनी घरी चुगली केली म्हणजे ?”

तेवढ्यात त्या काकांनी मला गाठलं. माझ्या अभ्यासाविषयी जुजबी चौकशी केली. माझ्यासाठी व स्वत:साठी खारे दाणे  घेतले. व आर्जवाच्या स्वरात मला म्हणाले,

” माझं एक काम करशील का ?’

मी काम न जाणून न घेताच म्हटले ,

“हो करीन की . त्यात काय एवढं !”


त्यावर काका म्हणाले , “हे बघ तू जर कधी आमच्या घरी आलास ना तर इतर कुठल्याही विषयावर बोल पण हिला म्हणजे तुझ्या काकूला मी इंग्लिश सिनेमा पाहतांना भेटलो होतो हे तिला कधीही सांगू नकोस बाबा. तुझी काकू कशी आहे हे तुला माहीत आहे ना. सगळं घर डोक्यावर घेईल ती हे कळालं तर.’

आता माझी ट्यूब लाईट पेटली. म्हणजे जो प्राॅब्लेम मला होता तोच प्राॅब्लेम या काकांनाही होता तर ! मी उगचंच घाबरलो होतो.
म्हणजे या काकांना इंग्लिश पिक्चर पाहतांना मी पाहिलं हे ही तितकंच खरं होतं की !
अन् त्यांनाच चिंता वाटत होती की मी कुठे ही गोष्ट त्यांच्या घरी सांगतो .

मी म्हणालो , “अहो काका!!
आज आपण भेटलोच नाही आणि इंग्लिश पिक्चर तर पाहिलाच नाही! तेंव्हा कुणी कुणाला कांही सांगण्याचा प्रश्न येतोच कुठे , सांगा बरं !!…”

काका म्हणाले, … शाब्बास . व्हेरी गुड .हुशार आहेस . अळिमिळी गुप चिळी. चल चहा घेऊ यात .

😄😎🤑

amazon logo
Go to shopping

तेथे कर माझे जुळती

indian woman

तेथे कर माझे जुळती

कर्तव्यदक्ष आणि मायाळू परदेशी मावशी

आपल्या सर्वांच्या घरी बहुधा भांडी घासणे, कपडे धुणे व स्वयंपाक या कामांसाठी मोलकरणी लावलेल्या असतात.बहुतेक वेळा  गृहिणी आपल्या मोलकरणीच्या कामाबाबत खूष नसते .  अर्थात त्याला कारणही तसंच आहे.आजकालच्या मोलकरणी पाट्या टाकल्या सारखं कसंतरी काम करतात . अर्थात सर्वजणी तशा नसतात, त्यात खूप जणी खूप चांगल्या पण असतात. पण बऱ्याच जणी  पूर्व कल्पना न देता सर्रास गैरहजर राहतात.दोन दिवस येणार नाही असं सांगून प्रत्यक्षात आणखी कांही दिवस गैरहजर राहतात.मोबाईल फोन लवकर घेत नाहीत किंवा घेतच नाहीत आणि असे का केले म्हणून विचारले तर बॅटरी संपली होती , हे किंवा असेच कांहीतरी थातुरमातुर कारण सांगतात .त्यांना दिवाळीचा बोनस म्हणून एक महिन्याचा पगार कित्येक वर्षापासून रूढ झाला आहे .म्हणजेच जेवढा एका महिन्याचा पगार तेवढाच दिवाळीचा बोनस.तसेच आपण  कांही दिवस गावी गेलो किंवा मोलकरीण गावी गेली तर त्या कालावधीचा पगार कापायचा नाही.पुन्हा दोन तीन वर्ष झाली की हमखास पगारवाढ द्यावीच लागते.

बरं , मोलकरीण बदलावी म्हटलं तर लवकर दुसरी मोलकरीण मिळत नाही . आणि समजा यदाकदाचित मिळालीच तर ती आहे तिच्यापेक्षा कामचुकार निघाली तर काय घ्या. त्यामुळे आहे त्या मोलकरणी कडून काम करून घेणेच ठीक आहे अशी भूमिका बहुतेक वेळी घेतली जाते…असो ….

मी ज्यावेळी औरंगाबादला इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होतो त्यावेळी  किरायाची खोली घेऊन रहात होतो. आमच्या त्या वाड्यात बरेच विद्यार्थी रहात होते.मी स्वयंपाकासाठी ज्या मावशी लावल्या त्या परदेशी मावशी म्हणून ओळखल्या जात होत्या. परदेशी मावशींचं  खरं नांव  कुणालाच माहित नव्हतं . रोज दोन वेळ स्वयंपाकासाठी एका विद्यार्थ्यासाठी महिन्याचा पगार वीस रूपये होता.यामध्ये भांडी घासणे समाविष्ट होते .

मावशीच्या हाताला खरंच चव होती.

मी रूमची एक किल्ली मावशींकडे देऊन ठेवली होती.मी बाहेर असलो तर मावशी परस्पर रूमवर येऊन स्वयंपाक करून जायच्या.

रूममधल्या सुतळीच्या तुकड्याला सुध्दा मावशींनी कधी हात लावला नाही..

मावशी अजब नगर मधे कुठेतरी रहात होत्या.माझ्या खोलीपासून सुमारे एक किलो मिटर अंतर होते.

मावशीला मूलबाळ नव्हते असे मला समजले. वाड्यातल्या विद्यार्थ्यांवर त्या मुलासारखी माया करायच्या.

एकदा माझ्याकडे पीठ संपले होते. गहू दळून आणायला मला जमले नाही . कॉलेजला   गेल्यानंतर ही गोष्ट माझ्या लक्षात आली. संध्याकाळी रूम वर आलो तर मावशी छान पोळ्या करीत होत्या. मी विचारले , मावशी कणीक तर संपली होती ना ? मग ह्या पोळ्या कशा ? मावशी म्हणाल्या , सदाफुले (माझा मित्र आणि शेजारी) कडून पीठ आणलं .तुम्हाला उपाशी कसं ठेऊ ? नाही जमत कधी कधी पोरांना दळण आणायला . तेंव्हा मी असंच दुसऱ्या मुलाकडून पीठ आणून पोळ्या करते. तुमचं गिरणीतून पीठ आलं की सदाफुलेला त्यांचं उसनं घेतलेलं पीठ परत करील.

माझा भाचा, शंकर, याला त्याच्या परिक्षेच्या काळात मी माझ्या रूमवर एक महिना ठेऊन घ्यायचो. एकदा संध्याकाळचा स्वयंपाक करून मावशी निघून गेल्या. थोड्या वेळाने शंकर आला. माझ्याकडे राहण्यासाठी. त्याच्यापाठोपाठ मावशीही आल्या. मी म्हटले , आत्ताच तर तुम्ही स्वयंपाक करून गेलात ना. मग पुन्हा कशाला आल्या ? त्यावर मावशी म्हणाल्या शंकरसाठी स्वयंपाक करायचा म्हणून आले .

आणि त्यांनी कांही मिनिटात शंकरसाठी जास्तीचा स्वयंपाक केला ..

मावशींमध्ये किती माणुसकी, सहृदयता,  extreme devotion towards duty  हे दुर्मिळ गुण होते याचं आणखी एक उदाहरण देतो ..

एकदा  शहरात कुठेतरी दंगल झाली होती त्यामुळे शहरात कर्फ्यू लागला होता. त्यामुळे जेवणाची अडचण होणार अशी परिस्थिती निर्माण झाली.कर्फ्यूमुळे मावशी येणार नाहीत असं मी समजत होतो. पण माझा अंदाज सपशेल खोटा ठरला. मावशी त्यांच्या नेहमीच्या वेळेत रुमवर हजर झाल्या. मी म्हटलं , अहो मावशी , गावात संचारबंदी लागलीय. तुम्ही कशा आल्या आणि कशाकरता आल्या ?

मावशी म्हणाल्या मी मेन रोड चुकवून गल्लीबोळातून आले. पोरांना उपाशी कसं ठेवू? स्वयंपाक करून मग अशीच गल्लीबोळातून घरी परत जाईन .येतांना नाही का आले ? कुठे काय झालं ?’

मी अवाक् झालो !!!

आणि निरूत्तरही झालो.मनात म्हटले केवढ्या मोठ्या मनाची, कर्तव्यदक्ष आणि हिकमतीची आहे ही माय माऊली.

आमच्या वाड्यातल्या मुलांचा स्वयंपाक करूनच मग मावशी गल्लीबोळातून अजबनगरला आपल्या घरी गेल्या .

मित्रांनो , जगात चांगली  माणसे कमी प्रमाणात आहेत आणि अतिशय चांगली माणसे तर त्यापेक्षा कमी प्रमाणात आहेत .पण आहेत जरूर. अशा माणसांमुळेच जग चालले आहे.

 

लेखक:- श्री व्ही. डी. भोपे

 निवृत्त कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र सरकार 

मराठी आडनावांचा इतिहास

village-man-300x169

Marathi Surnames-मराठी आडनावांचा इतिहास

Milind Abhyankar- मिलिंद अभ्यंकर

 
village man 1
मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी 
 
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे प्रख्यात कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.
 
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी संस्कृतीत रुजलेल्या “आडनाव” या वैशिष्ट्यपूर्ण शब्दाविषयी मला नेहमीच कुतुहुल वाटत आलेले आहे. कारण अशी पद्धत अन्य भाषेत अभावानेच आढळते.
आद्यनाव या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश म्हणजे आडनाव. त्याचे झाले पद नावं आणि त्याचा अपभ्रंश पड नाव हे पड नाव किंवा पदनाम त्या त्या कुळांना कोणत्या प्रकारची शेती करतो किंवा पशुपालन करतो किंवा कोणत्या फुला फळाच्या बागा लावतो किंवा व्यापार करतो किंवा कोणती प्रशासकीय कामे करतो किंवा संरक्षण सेवेत कोणते पद घेऊन काम करतो यावरून पडली.आडनाव हे जरी शेवटी लिहले जात असले तरी ते आद्य नाव आहे आद्य म्हणजे पूर्वीचे कुळाचे नाव ते आद्य नाम आणि याचा अपभ्रंश होऊन झाले आडनाव.मराठी नामोल्लेखाच्या/ नामलेखनाच्या प्रचलित पद्धतीत
• व्यक्तीचे स्वतःचे नाव/ पहिले नाव
• व्यक्तीच्या वडिलांचे/ (काही वेळा) आईचे/ (व्यक्ती विवाहित स्त्री असल्यास) पतीचे नाव आणि
• व्यक्तीच्या वडिलांचे आडनाव/ व्यक्ती विवाहित स्त्री असल्यास तिच्या पतीचे आडनाव
अशी नावांची त्रयी सांगण्याची/ लिहिण्याची प्रथा आहे. ह्या तिहेरी नावाला संपूर्ण नाव असेही म्हणतात. मात्र नामोल्लेखाची वा नामलेखनाची ही पद्धत सार्वत्रिक आहे असे नाही. तसेच आडनाव ह्या संज्ञेने व्यक्त होणारा संकेतही सार्वत्रिकरीत्या आढळेल असे नाही.
(आधार विकिपिडिया)
 
देशपांडे, जोशी, कुलकर्णीं, देशमुख, पाटील,पवार, गायकवाड, कांबळे, इनामदार, जहागीरदार, कोतवाल, अशी आडनावे तर सरार्स आढळतात. गावाच्या नावावरुन तर असंख्य आडनावे आहेत. गावाला कर असे संबोधन चिटकवायचे जसे गाव+कर= गावकर. पण आडनाव नाही असा मराठी माणूस औषधाला देखिल सापडणार नाही.आमच्या कोब्रा जातीतली आडनावे खूपच वेगळी आहेत असे माझे निरीक्षण आहे. आता बघा माझेच आडनाव अभ्यंकर आहे. बरेच जण मला विचारतात की तुम्ही अभ्यं गावचे आहात का? मलाही अनेक दिवस या आडनावाचा खुलासा होत नव्हता. एका देऋबाने (देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण)त्याचा अर्थ मला सांगीतला. अभयं करोती अभया, म्हणजे अभय मागणाऱ्याला जो अभय देतो त्याला अभ्यंकर म्हणतात. म्हणजे पाहा आम्ही किती महान आहोत. नाहीतर अनेकजण मला भयंकर म्हणूनच हाक मारत असतात. शाहीर साबळेंच्या भारुडात तुम्ही ऐकलेच असेल …इंगळी म्हणजे मोठा विंचू, मोठा म्हणजे भयंकर मोठा, म्हणजे तो अभ्यंकर नाही का… त्याच्यासारखा” 😅
 
असो. आता अन्य चित्तपावनी आडनावे पाहू
लेले यांच्यावरुन आम्ही वा.क.लेले, थ.क.लेले अशी नावे तयार केली होती. नुकताच ओले आले हा सिनेमा पाहीला त्यात आदित्य लेले, ओंकार लेले अशी बाप लेकाची जोडी आहे.
रानडे, बरेच जण याचा उच्चार रांडे असा करतात.
दातीर, दातार, दाते,दात्ये या लोकांचे दात पुढे आलेले असावेत.😁
पोंक्षे या आडनावाचा उच्चार केला की डोळ्यासमोर पोंगा दृष्यमान होतो.
गोखले आडनावाचा भरपूर खोकणारा असावा.
ढमढेरे ढम व ढेरे मग काय बघायलाच नको.
टकले आडनाव पण डोईवर दाट केस.
आडनाव डोंगरे पण शरीरयष्टी खड्यासारखी.
केळकर आणि चोळकर या आडनावांचे माझे नातेवाईक आहेत. आता यांचा विवाह झाला आहे. सुज्ञास सांगणे नलगे…..🤪
काळे गोरे तर उडदामाजी आहेतच मग चित्तपावन त्याला अपवाद असू शकत नाहीत.
हगवणे आडनावाच्या मुलाला कुणी मुलगी देत असेल का?
नातू आडनाव म्हणजे जन्मभर हे नातवंडच राहणार.
आपटे काय आपटत होते कुणास ठावूक.
ह.ना. आपटे या लेखकाचे नाव माझा एक देशस्थ मित्र हणा आपटे असा करतो.
(बऱ्याच देशस्थ ब्राह्मणांना ‘न’ आणि ‘ण’ याचा उपयोग कसा करावा हे कळत नाही असे माझे निरीक्षण आहे. कान व मान याचा उच्चार काण व माण असे करताना मी पाहात आलो आहे.)
बापट – हे पण काही तरी आपटत असणार. आमच्या बापट नावाच्या मित्राला आम्ही “बापट कुल्ले आपट” असे चिडवत असू. तो देखिल भारी, काॕलेजच्या बेंचवर कुल्ले आपटून दाखवत असे. 🤣
रास्ते हे असेच एक चित्तपावनी नाव. रस्ते बनवत असावेत.
खांबेटे – खांब व बेट काय सबंध असावा?
रिसबुड – मुळात बुड हा शब्दच अनेक अर्थ उत्पन्न करतो. यांचे बुड ठिकाणावर राहात असावे, रीसभरही इकडेतिकडे होत नसावे.😊
गाडगीळ – एकतर गाड किंवा गीळ
दामले – जया दामले (माझ्या परिचित) याचा अर्थ सांगतील कदाचित दाम मागतील !
पेंडसे – (प्राची पेंडसे, माझ्या एक परिचित) याचा अर्थ सांगतील, पेंडखजुराचा काही संबंध असावा !
साने – हे बहुतेक लहानसहान काम करत असावेत.
परांजपे – परांशी जपून वागत असावेत.
गोडसे – गोड असे पण नावापुरता.
मराठे – पण जातीने चित्तपावन. आमच्या एका मामाला मराठे कुटुंबातील मुलगी मिळाली आणि गावात त्याकाळात चर्चा सुरु झाली जोशाच्या पोरान मराठ्याची पोरगी केली म्हणे !
विद्वांस – या आडनावाची माझी मावशी होती. अनेकजण त्याचा उच्चार विध्वंस असा करतात.
उकिडवे – माझे आतेकाका. यांचा असा कोणता व्यवसाय होता कुणास ठावूक?
आठवले – सतत नको त्या गोष्टीं आठवत असावेत.
आठल्ये – कपाळावर कायम आठ्या असणार
पटवर्धन – पटावर धन करणारे
सोमण – मणाचे ओझे सहज वागवत असावेत
फडके – सारखे कपडे गुंडाळत असणार
दांडेकर – अर्थात दांडगई करणारे किंवा थांबवणारे.
तुळपुळे – कायम तुळतुळ करणारे.
हसबनीस किंवा हसमनीस म्हणजे जे मनातल्या मनात हसतात ते
असो. 😊
 
काही आडनावे मराठीतील डुकरे, गाढवे, मुंगळे, मुंगी, वाघ, वाघमारे, बकरे, कोंबडे, बदके, चिमणे, कावळे, ढवळे, पवळे, ढेकणे, पिंगळे, मोरे, ढोरमारे, कोळसे, लाकडे, कुऱ्हाडे, भामटे, गुंड, पुंड, बडवे का पडली असावीत? याचा मी नेहमी विचार करतो.
सखारामपंत खापरखुंटीकर हे आमच्या मराठवाड्यातील एका कलाकाराचे नाव वाचले की नकळत मला हसायला येते. तसेच आमच्या एका मित्राचे आडनाव दिवटे आहे. तो दिसला की माझ्या मनात नकळत आले दिवटे चिरंजीव असे शब्द येतात. पांडव नावाचा माझा एक मित्र आहे. काॕलेजमधे आम्ही नुकतेच गेलो होतो. प्रत्येकजण नाव आडनाव सांगत होता. पांडवने नाव सांगीतले, काहीवेळाने एकाने आपले आडनाव तोरो असे सांगीतले, आम्हाला ते कौरव असे ऐकू आले. वर्गात हशा पिकला, चला पांडव व कौरव वर्गात आहेत म्हणजे महाभारत अर्थात वस्त्रहरण कार्यक्रम होणार असे मुले विनोदाने बोलू लागली.
 
कुंभार, सोनार, चांभार, फुले, काटे, वारीक, माळी, कोळी, कोष्टी, गोसावी, ही बलुतेदारी करणारी आडनावे आहेत.
असा आहे हा मराठी आडनावांचा महिमा. बाहेरच्या राज्यात गेल्यावर अनेक अमराठी लोकांना आपले नेमके नाव काय आहे हे कळत नाही. असा माझा अनुभव आहे. माझे मिलिंद हे नाव अनेकांना कळतच नाही. मिलिंद गणेश अभ्यंकर असे नाव असताना अनेक जण मला गणेश असे पुकारत. तर दिल्लीत माझे मिलिंद हे नाव मिलन असे झाले होते.
शेवटी आडनावात काय आहे, असे म्हणावेसे वाटते, पण नाही, आडनावात बरेच काही आहे ते मराठी माणसाला चांगले कळते.
ही आहे माझ्या प्रिय मायमराठीची आडनावांची गंम्मत, खासीयत.
वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांना मराठीभाषा गौरव दिनानिमित्त शब्दांजली.
मिलिंद गणेश अभ्यंकर
छत्रपति संभाजीनगरकर

वरील लेख श्री मिलिंद गणेश अभ्यंकर यांच्या फेसबुक  वरून  साभार- श्री अभ्यंकर यांचा मूळ लेख वाचण्यासाठी  फेसबुक लेखाची खालील  लिंक क्लिक करा.

लेखक हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून मुख्य प्रबंधक म्हणून निवृत्त झाले आहेत आणि फेसबुक आणि अन्य माध्यमांवर वेळोवेळी प्रसंगोचित लिखाण करीत असतात.