https://goodworld.in A website by Madhav Bhope

Mind blowing experiences of a Banker-17 एका बँकरचे थरारक अनुभव-17

farewell

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

Mind blowing experiences of a Banker-17

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 17)

सकाळी नेहमी सारखाच पहाटे पाच वाजता उठून रोजच्या सवयी प्रमाणे सारंगी डॅमच्या काठाने फिरायला गेलो. तिथे नित्य नेमाने येणारी दैनंदिन परिचयाची तरुण व आबालवृद्ध मंडळी भेटून अभिवादन करीत होती. त्यांच्या नमस्काराला हसून प्रत्युत्तर देताना “आता उद्यापासून आपल्याला हे चेहरे पुन्हा कधीही दिसणार नाहीत..” असे विचार मनात येऊन नकळत हात उंचावून तो हलवत मी त्यांचा निरोप घेत होतो.

बँकेत सकाळ पासूनच मला प्रत्यक्ष भेटून निरोप द्यायला येणाऱ्यांची रीघच लागली होती. राजू चहावाल्याच्या डोळ्यांतील अश्रू तर थांबता थांबत नव्हते. चारी बाजूंनी काच असलेली कृष्णाची एक सुंदर मूर्ती आपली आठवण म्हणून त्याने मला भेट दिली. बँकेच्या कॅश व्हॅनचा अतिशय अबोल, संयमी आणि निर्व्यसनी ड्रायव्हर अंगद तसंच प्रामाणिक, कष्टाळू सेवक नंदू माळी या दोघांची अवस्थाही तशीच बेचैन, सैरभैर झालेली दिसत होती. गावातील दाट परिचयाची डॉक्टर, वकील, शिक्षक, बँकर, शेतकरी व व्यावसायिक मंडळी मला आवर्जून भेटायला येऊन शुभेच्छा देऊन जात होती.

विशेष म्हणजे Addl. DSP व DySP मॅडम ही जोडी तसेच ठाणेदार जगन राठोड आणि सब. इंस्पे. वर्षा महाले हे देखील पुष्पगुच्छ घेऊन सदिच्छा व निरोप द्यायला आले होते. दुपारी अडीच वाजता बँकेचे कामकाज संपल्यावर गावातीलच एका हॉटेलमध्ये माझ्यातर्फे स्टाफला जेवण्यासाठी आमंत्रित केले होते. तिथेच हसत खेळत माझा अनौपचारिक निरोप समारंभ पार पडला. संध्याकाळी पाच वाजता केबिन मध्ये एकटाच बसून शेवटची आवरा सावर करत असतानाच बाहेरून..

“आत येऊ का साहेब..?”

असा आवाज ऐकू येताच मी मान वर करून पाहिलं, तो एक अंदाजे साठ पासष्ट वयाचा पॅन्ट शर्ट या साध्या वेशातील गृहस्थ हातात एक छोटासा पुष्प गुच्छ घेऊन उभा होता..

“या.. या..! बसा..!”

असं म्हणून मी त्याला आत बोलावलं..

“साहेब, तुम्ही मला ओळखलं नाही ? मी अप्पा.. कॉन्स्टेबल अप्पा वाघमारे..”

त्या गृहस्थाने असं म्हणताच मी त्याच्याकडे निरखून पाहिलं..

“अरे अप्पा.. तुम्ही ? खरंच मी ओळखलंच नाही तुम्हाला या वेशात.. नेहमी तुम्हाला युनिफॉर्म मध्येच पहायची सवय आहे ना, म्हणून.. ! कसे आहात ?”

वैजापूर ठाण्यात ड्युटीला असणारे अप्पा वाघमारे पोलिसांच्या पगाराची बिलं तसंच पोलीस ठाण्यातील बँके संबंधीची अन्य सर्व प्रकारची कामं करण्यासाठी नेहमीच बँकेत यायचे. शांत, मनमिळावू स्वभावाचे अप्पा सर्वांशी हसतमुखाने, प्रेमाने व आपुलकीने बोलायचे. पोलिस ठाण्यातील सर्वात सिनियर कर्मचारी असलेल्या हेड कॉन्स्टेबल अप्पांकडे, आताशा वयोमाना नुसार धावपळीची कामे झेपत नसल्याने ठाण्यातील बैठी, कारकुनी कामे तसेच बँकेतील कामे सोपवली जायची.

आत येऊन अप्पांनी आपल्या हातातील पुष्पगुच्छ मला दिला आणि म्हणाले..

“अभिनंदन साहेब, तुमची बदली औरंगाबादला झाल्याबद्दल.. ! तुम्ही एकदाचे टेन्शन मुक्त झालात.. आता तुम्हाला छान तुमच्या पत्नी, पोराबाळां सोबत शांतपणे राहता येईल. तुमचा इथला कार्यकाळ कसा गेला हे आम्हा पोलिस कर्मचाऱ्यांशिवाय कुणाला जास्त चांगलं ठाऊक असणार ? पण तुम्ही जराही न डगमगता, ज्या धीरानं परिस्थितीला तोंड दिलंत त्याबद्दल तुमचं कौतुक केलंच पाहिजे.”

बहुदा अप्पांना आणखीही काही बोलायचं होतं.. ते क्षणभर घुटमळले. इतक्यात त्यांच्या साध्या सिव्हिल पेहरावाकडे माझं लक्ष गेलं आणि मी विचारलं….

“आज तुम्ही साध्या वेषात कसे ? तुमची ड्युटी तर रात्री उशिरा पर्यंत असते ना ? की.. सुट्टीवर आहात आज ?”

माझ्या या प्रश्नावर आनंदी, प्रफुल्लित चेहऱ्याने ते म्हणाले..

“आज मी सेवानिवृत्त झालो. तुमच्या प्रमाणेच मी ही आजपासून टेन्शन मुक्त झालो. आता नाशिक जिल्ह्यातल्या माझ्या खेडेगावी राहून मस्तपैकी शेती करीत उर्वरीत आयुष्य शांतपणे घालवणार..”

“अरे वा ! अप्पा, खूप खूप अभिनंदन तुमचं.. आणि तुमच्या निवृत्ती नंतरच्या सुखी, निरोगी जीवनासाठी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा..! आता मी तुम्हाला चहा पाजल्याशिवाय सोडणार नाही..”

बेल वाजवून वॉचमनला बोलावलं आणि सगळ्यांसाठी चहा आणायला सांगितलं. चहा पित असताना अप्पा एकटक माझ्याकडेच पहात होते. मग अचानक गंभीर होऊन ते म्हणाले..

“तुम्हाला आम्हा सर्वच पोलिसांचा खूप राग येत असेल, नाही ? आमचं खातं खूप भ्रष्ट आहे, लाच घेतल्याशिवाय आम्ही कोणतंही काम करीत नाही असाच तुमचा समज झाला असेल. आमच्या खात्यातील सर्वच अधिकारी व शिपाई कामचोर, लाचखोर नसले तरी दुर्दैवाने बहुसंख्य कर्मचारी मात्र लोभी, लालची आहेत, ही गोष्ट सुद्धा खरीच आहे..”

त्यावर मी म्हणालो..

“अहो अप्पा, लाचखोरी आणि भ्रष्टाचार तर सर्वच क्षेत्रांत बोकाळला आहे. मात्र या देशातील सर्वात जास्त तल्लख, बुद्धिमान, तत्पर आणि कार्यक्षम समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांपैकीच एक असून देखील तुम्हाला आमच्या केसचा तपास लावण्यात मात्र थोडं सुद्धा यश मिळू शकलं नाही याबद्दलच जरा आश्चर्य आणि दुःख वाटतंय..”

मी असं म्हणताच अविश्वासाने डोळे विस्फारून अप्पा म्हणाले..

“म्हणजे ? तुम्हाला खरंच काहीच माहिती नाही ? त्या तुमच्या हॉटेल वाल्या राजुनेही काहीच सांगितलं नाही का तुम्हाला ? निदान गावातल्या लोकांकडून तरी थोडी फार माहिती समजायलाच पाहिजे होती..”

अप्पांच्या या प्रश्नावर नकारार्थी मान हलवीत मी ठामपणे म्हणालो..

“नाही, राजूनं काहीच सांगितलं नाही मला. म्हणजे.. मीच त्याला पोलीस स्टेशन मधली कुठलीही बातमी सांगण्यास मनाई केली होती. आणि, गावकऱ्यांचं म्हणाल तर.. जितकी माणसं तितक्या अफवा.. म्हणून कुठल्याही इकडच्या तिकडच्या गावगप्पांवर मी कधीच विश्वास ठेवला नाही..”

त्यावर एक खोल निःश्वास सोडून अप्पा म्हणाले..

“ठीक आहे तर मग आता तुम्ही माझ्याकडूनच ऐका.. तुमच्या केसच्या तपासाची खरीखुरी कहाणी..”

खिशातून तपकिरीची डबी काढून त्यातील तपकीर बोटांच्या चिमटीत धरून ती नाकाजवळ नेऊन दीर्घ श्वास घेऊन अप्पा म्हणाले..

“त्या सुखदेव बोडखेनं पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर दोनच दिवसांत खबऱ्यां मार्फत त्या जयदेव खडकेच्या ठावठिकाण्या बद्दल फौजदार साहेबांना पक्की खबर मिळाली असावी. कारण फौजदार साहेब सब. इंस्पे. हिवाळे आणि दोन कॉन्स्टेबलना सोबत घेऊन तडका फडकी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात गेले होते. जयदेव खडके हे नाव धारण करणाऱ्या त्या व्यक्तीचं खरं नाव भाऊसाहेब सुरकांडे असल्याचं समजतं.. आणि हा भाऊसाहेब सुखदेवच्या मावसभावाचा जवळचा मित्र आहे असंही म्हणतात. सुरगाणा तालुक्यातील एक छोट्याशा गावांतील भाऊसाहेबाच्या घरी जेंव्हा पोलीस गेले तेंव्हा तो जवळच्या गुजराथ राज्यात पळून गेला होता. मात्र त्याच्या घरून फौजदार साहेबांनी साडेपाच लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली असं त्यांच्या बरोबर गेलेले कॉन्स्टेबल सांगतात..”

एवढं बोलून या गौप्यस्फोटा नंतर माझ्या चेहऱ्यावर काय प्रतिक्रिया उमटते हे पाहण्यासाठी अप्पा जरा वेळ थांबले. खरं म्हणजे, पोलिसांनी तोतया जयदेवला पकडून त्याच्याकडून पाच लाख ऐंशी हजार रुपये तर वसूल केलेच पण त्याच्या भाऊ व आई वडिलांना तसेच त्याच्या सासू सासऱ्यांनाही भीती दाखवून त्यांच्याकडून बरीच मोठी रक्कम उकळल्याचे वैजापुरातील लोकांकडून अनेकदा उडत उडत समजले होते. पण त्या बातम्यांची पुष्टी आत्ता अप्पांकडून होत होती. चेहऱ्यावर ओढून ताणून खोटी उत्सुकता दाखवीत म्हणालो..

“मग ? पुढे काय झालं ? तो भाऊसाहेब सुरकांडे चांगला हाती सापडला असतानाही त्याला अटक का नाही केली पोलिसांनी ?”

“अहो साहेब, भाऊसाहेबला जर अटक केली असती तर जप्त केलेले पैसे सरकार दरबारी जमा करावे लागले असते. परस्पर तसेच गिळंकृत करता आले नसते. तसंच फिर्यादी सुखदेव व आरोपी.. म्हणजे तुम्ही आणि गुन्ह्याशी संबंधित अन्य व्यक्तींकडून पैसेही उकळता आले नसते.”

“बापरे ! म्हणजे पोलिसांनी फिर्यादी सुखदेव बोडखे कडूनही पैसे उकळले ?”

“अर्थात ! एक तर.. खात्यातून पैसे काढले गेल्याची गोष्ट ताबडतोब त्याच दिवशी कशी समजली ? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सुखदेव जवळ नव्हतं. तसंच दुसरं चेक बुक मिळण्यास किंचित विलंब झाल्यावरून सुखदेवच्या मुलाने बँकेत आरडाओरड करून गोंधळ घातला होता, असं तुमच्या त्या बँक सोडून गेलेल्या मुलीचं, बेबीचं स्टेटमेंट होतं. सुखदेवचा मुलगा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून यापूर्वी अनेकदा किरकोळ गुन्ह्यांसाठी त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा गुन्ह्यातील सहभाग पोलिसांना सहज सिद्ध करता आला असता.”

“पण मग फौजदार साहेबांनी सुखदेव आणि त्याच्या मुलावर तेंव्हाच action का घेतली नाही ?”

“तसं पाहिलं तर सुरवातीला फौजदार साहेबांनी न मागताच सुखदेव त्यांना भरपूर पैसे देत होता. पोलिसांनी लवकर FIR नोंदवून बँकेच्या स्टाफला अटक करावी यासाठीच ही लाच होती. फौजदार साहेबांना तेंव्हाच सुखदेव बद्दल संशय निर्माण झाला होता. आणि पुढे त्या भाऊसाहेब सुरकांडेचं सुखदेवशी असलेलं कनेक्शन उघड झाल्यावर तर सुखदेवलाच पोलिसांच्या कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नाईलाजाने फौजदार साहेबांना आणखी भरपूर पैसे द्यावे लागले.”

“अप्पा, मघाशी तुम्ही गुन्ह्याशी संबंधित अन्य व्यक्तींकडूनही पोलिसांनी पैसे घेतले असा उल्लेख केलात.. या अन्य व्यक्ती कोण ? रुपेश तर नाही ?”

“बरोब्बर ओळखलंत तुम्ही, साहेब ! खरं म्हणजे त्या भाऊसाहेब सुरकांडे बद्दल पोलिसांना पहिली खबर या रुपेशनंच दिली. रुपेश हा होमगार्ड असल्याने त्याचे पोलीस स्टेशन मधील सर्वांशीच अतिशय जवळचे संबंध आहेत. आम्ही त्याला आमच्या पैकीच समजतो. आयत्या मिळणाऱ्या पैशाच्या मोहाला बळी पडून रुपेशने आधी या गुन्ह्यात भाग घेतला खरा, पण नंतर त्याला खूप पश्चाताप झाला. पोलीस या गुन्ह्याचा छडा लावतील आणि आपल्याला खूप मोठी शिक्षा होईल ही भीती त्याला सतावू लागली. गुन्ह्यात आपलं नाव येऊ न देण्याच्या अटीवर त्याने या कटाची संपूर्ण माहिती फौजदार साहेबांना दिली.”

“मला आणखी एक शंका आहे. त्या दिवशी रुपेशने आम्हाला अर्धवट लेखी कबुली जबाब दिल्यावर जेवायला घरी जाऊन येतो असे म्हणून तो बँकेतून घराकडे गेला. मात्र घरून आल्यावर त्याने आणखी काहीही माहिती सांगण्यास नकार दिला. तो त्या दिवशी घरी न जाता पोलीस स्टेशन मध्ये तर आला नव्हता ना ?”

“नाही साहेब.. ! त्या दिवशी तो घरीच गेला होता. खरं म्हणजे त्याला पोलीस ठाण्यातच यायचं होतं, पण चलाख रहीम चाचांनी त्याचा पोलीस स्टेशन पर्यंत पाठलाग केला. त्यामुळे नाईलाजाने त्याला घरीच जावं लागलं. मात्र घरून त्याने मोबाईल वरून फौजदारांशी संपर्क साधला आणि बँकेच्या स्टाफला लेखी कबुली जबाब दिल्याचं सांगितलं. त्यावर फौजदार साहेबांनी “आता यापेक्षा जास्त काहीही कबूल करू नकोस, नाहीतर तुला वाचवता येणं कठीण आहे” असं त्याला बजावून सांगितलं. म्हणूनच त्याने बँकेत परत आल्यावर आणखी काहीही सांगण्यास नकार दिला.”

अप्पांकडून एकेका रहस्यावरचा पडदा अलगद दूर होत होता.

“आणखी एक शंका आहे अप्पा..! पोलिसांनी केलेल्या हस्ताक्षर चाचणीचा अहवाल काय आला ? पोलीसांनी त्याबद्दल आम्हाला आतापर्यंत काहीच कसं कळवलं नाही ?”

माझ्या हा प्रश्न ऐकून हेड कॉन्स्टेबल वाघमारे अप्पा, सांगावं की सांगू नये.. अशा चिंतेत पडले. पण मग आता आपण सेवामुक्त झालो आहोत याची त्यांना जाणीव झाली असावी. मनमोकळं हसत ते म्हणाले..

“महत्वाचा, कळीचा प्रश्न विचारलात साहेब..! चेक वरील सही खातेदार सौ. रत्नमाला बोडखे यांनी केलेली नाही तसेच बँकेचा स्टाफ किंवा रुपेश जगधने यापैकीही कुणीही केलेली नाही असा पुण्याच्या फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला असून तो रिपोर्ट कोर्टाला सादर करण्यात आला आहे. तुम्ही आरोपी असल्याने तुम्हाला या रिपोर्ट बद्दल माहिती देण्याचा काही संबंधच येत नाही..”

“हे कसं शक्य आहे ? ती हुबेहूब बनावट सही रुपेशनेच केलेली आहे याबद्दल मला शंभर टक्के खात्री आहे. त्या फोरेन्सिक लॅबच्या रिपोर्ट मध्ये नक्कीच काहीतरी घोटाळा आहे.”

“नाही साहेब ! फोरेन्सिक लॅबचं काम अगदी चोख आहे. त्यांचा रिपोर्टही एकदम अचूक आहे. मात्र रुपेशच्या हस्ताक्षराचा जो नमुना लॅब कडे पाठवण्यासाठी घेण्यात आला होता तोच बदलून जर त्या जागी भलत्याच व्यक्तीच्या हस्ताक्षराचा नमुना लॅब कडे पाठविण्यात आला असेल तर ? शेवटी, रुपेश हा आमचाच माणूस असल्याने त्याला वाचविण्याचा हर प्रकारे प्रयत्न करणं हे ही आमचं कर्तव्यच होतं, नाही का ?”

“पण तुम्ही तर रुपेशला अटक करून कोर्टासमोर हजरही केलं होतंत. काही काळ तो हरसूल कारागृहातही होता..”

“रुपेशचा मूर्खपणा त्याला नडला. त्याचं असं झालं की आपल्या मुलाचा बँकेतील घटनेत सहभाग असावा अशी रुपेशच्या पापभिरू आई वडीलांना आधीपासूनच शंका होती. कारण तो भाऊसाहेब सुरकांडे एक दोन वेळा रुपेशच्या घरी गेला होता तेंव्हा रुपेशच्या पत्नीने व आई वडिलांनी त्याला पाहिले होते. बँकेचे कर्मचारी भाऊसाहेबाचा फोटो सर्वांना दाखवत फिरत होते, त्यावेळी रुपेशच्या वडिलांनी फोटोतील भाऊसाहेबला पाहून हाच तो रुपेशला भेटायला आपल्या घरी येणारा म्हणून ओळखले होते. रुपेशला पोलीस पकडतील म्हणून त्यावेळी ते गप्प बसले. त्यातच रुपेशचा दोन वर्षांचा एकुलता एक मुलगा त्याच सुमारास खूप आजारी पडला. आधीच, हातून घडलेल्या विश्वासघाताच्या कृत्यामुळे रुपेशचं मन त्याला खात होतंच.. त्यातून त्याची पत्नी आणि आई वडील सुद्धा त्याला देवाची, पापाच्या परिणामांची भीती दाखवून सतत टोचून बोलत होते. मुलाच्या बिघडत्या तब्येतीच्या काळजीने तो हळवा झालेला असतांनाच तुम्ही त्याला केबिनमध्ये बसवून ठेवलंत.. आत्मग्लानीने तो कोलमडून गेला आणि त्या पश्चातापाच्या भरात त्याने तो कबुलीजबाब दिला. अर्थात तो लवकरच सावरला, सावध झाला आणि अर्धवट दिलेला कबुलीजबाब त्याने तसाच राहू दिला, पूर्ण केला नाही.”

एवढं बोलून किंचित डोळे बारीक करून माझ्याकडे पहात अप्पा म्हणाले..

“तुम्ही रुपेशकडून घेतलेल्या लेखी कबुलीजबाबाला आम्ही थेट केराची टोपली दाखवली. त्याला आम्ही अटकही करणारच नव्हतो. पण तुम्ही त्या कबुलीजबाबाची एक प्रत स्वतः कडे ठेवून घेतली आहे, हे आम्हाला ठाऊक नव्हते. तुम्ही ती प्रत Addl. DSP साहेबांना दाखवली आणि मग त्यांच्या आदेशावरून आम्हाला रुपेशला अटक करून तुरुंगात पाठवावे लागले..”

हेड कॉन्स्टेबल अप्पा वाघामारेंना जे काही सांगायचं होतं ते सारं सांगून झालं होतं. डोक्यावरून जणू काही खूप मोठं ओझं उतरल्या सारखा चेहरा करून ते खुर्चीत निवांतपणे रेलून बसले. मी त्यांना विचारलं..

“मग आता पुढे काय होणार पोलीस तपासाचं..?”

मोठ्याने खो खो हसत अप्पा म्हणाले..

“अहो साहेब, झाला की तपास पूर्ण.. ! आरोपींवर चार्जशीट दाखल करून कोर्टात खटला दाखल केला आहे. आता आमचा रोल संपला. यापुढील कारवाई आता कोर्टच करेल..”

“पण.. तो मुख्य आरोपी जयदेव खडके उर्फ भाऊसाहेब सुरकांडे.. ह्याला तर तुम्ही अटकच केली नाहीत ? तुमच्या रेकॉर्ड मध्ये ही केस “न सुटलेली (unsolved)” म्हणूनच नाही का राहणार ?”

मी माझी भाबडी शंका व्यक्त केली.

“नाही ! आमच्या लेखी तुम्ही बँकवालेच मुख्य आरोपी आहात. रुपेश आणि जयदेव तुमचे सहाय्यक आहेत. बहुतांश आरोपींना आम्ही तांत्रिक दृष्ट्या अटक करून कोर्टासमोर हजर केले आहे. आता कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तुम्ही सारे जामीना वरतीच मोकळे राहणार आहात. जयदेवचा तपास लागू शकला नाही आणि त्यामुळे मुद्देमालही (रोख रक्कम) जप्त करता आला नाही असे नमूद करून आम्ही केसचा तपास केंव्हाच थांबवला आहे..”

या अप्पा वाघमारेंकडे माझ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे होती. अर्थात या केस संबंधित आणखीही काही बाबतीत थोड्याशा अंधुक शंका-कुशंका, कुतूहल म्हणा वा उत्सुकता, बाकी होतीच. त्यांचंही निरसन या अप्पांकडूनच करून घ्यावं म्हणून विचारलं..

“रुपेश जगधनेनं गेल्या काही दिवसात दोनदा आपली थोडी थोडी शेती विकल्याचं ऐकलं आहे.. ते खरं आहे का ? आणि खरं असल्यास ती त्याने कशासाठी विकली ?”

“रुपेशचा या गुन्ह्यात थेट सहभाग आहे. Cctv फुटेज, लेखी कबुलीजबाब असे सर्व पुरावे त्याच्याविरुद्ध आहेत. त्याला वाचविणं, शिक्षा होऊ न देणं हे फौजदारांच्या दृष्टीनं तसं खूपच जोखमीचं काम होतं. अर्थात त्याची पुरेपूर किंमत फौजदार साहेबांनी रुपेश कडून वसूल केली. सुरवातीला त्यासाठीच त्याला आपली दोन एकर शेती विकावी लागली. त्यानंतर पूर्वीच्या फौजदारांची इथून बदली झाल्यावर जेंव्हा नवीन फौजदार साहेब इथे रुजू झाले तेंव्हा त्यांनीही रुपेश कडून तशीच मोठी रक्कम वसूल केली. त्यावेळी पुन्हा त्याला आपल्या हिश्श्याची आणखी एक एकर जमीन विकावी लागली.”

“व्वा ! शाब्बास !! एकंदरीत ‘वसुली’ हेच तुम्हा पोलिसांचं प्रथम कर्तव्य असतं असं दिसतंय.. ते गुन्ह्याचा तपास वगैरे सगळं दुय्यम, गौण.. असंच ना ?”

मी उपरोधानं म्हणालो. त्याकडे दुर्लक्ष करून अप्पा म्हणाले..

“या सगळ्यांतून त्या सुखदेवला काय मिळालं, हे तर तुम्ही विचारलंच नाहीत ? पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, या प्रकरणात सर्वात जास्त आर्थिक नुकसान सुखदेवचंच झालं. एकतर बँकेच्या कर्मचाऱ्यांना बदनामीची व पोलीस केसची भीती दाखवून पैसे उकळण्याचा त्याचा प्लॅन सपशेल फसला. तुम्ही बदनामी, मानसिक त्रास सहन केलात पण त्याच्या धमक्यांना भीक घातली नाहीत. पोलीस, पत्रकार, नेते मंडळी यांच्यावर आधी सुखदेवने स्वतःहूनच खूप पैसे खर्च केले. ग्राहक मंच व फौजदारी न्यायालयातील त्याच्या वकिलांनीही त्याला भरपूर लुबाडून घेतलं. खरं म्हणजे तुम्हा बँकवाल्यांना फक्त घाबरवण्यासाठीच त्याने पोलीसात तक्रार दाखल केली होती. तुम्ही पोलिसांच्या अटकेला घाबराल आणि आपली नोकरी वाचविण्यासाठी ताबडतोब त्याला हवे तेवढे पैसे द्याल आणि मग पोलिसात दिलेली तक्रार सोयीस्करपणे मागे घेता येईल, असा त्याचा साधा सरळ प्लॅन होता.”

अप्पा चांगलेच रंगात येऊन बोलत होते. मधेच त्यांना तपकिरीची आठवण झाली. चिमूटभर तपकीर मनसोक्त हुंगून झाल्यावर ते पुढे म्हणाले..

“पोलिसांत तक्रार देऊन सुखदेव फसला. जस जसे सुखदेव विरुद्ध पोलीसांकडे पुरावे गोळा होऊ लागले तशी तशी त्यांची पैशाची मागणी वाढत गेली. पोलिस आपल्या भोवती फास आवळू नयेत म्हणून सुखदेव त्यांना ते मागतील तेवढे पैसे देत राहिला. जयदेव उर्फ भाऊसाहेब सुरकांडे कडून पोलिसांनी गुन्ह्यातील संपूर्ण रक्कम आधीच वसूल केली होती. ग्राहक न्यायालया मार्फत सुखदेवने बँके कडून पुन्हा पाच लाख ऐंशी हजार रुपये व्याजासहित उकळले खरे, पण पोलिसांनी जोर जबरदस्ती करून त्यातूनही आपला हिस्सा दमदाटीने वसूल केलाच.”

अप्पांच्या तोंडून पोलिसांचं हे “अर्थपुराण” ऐकताना मनात प्रचंड चीड दाटून येत होती. तरीही संयम राखीत म्हणालो..

“अशारितीने तुमची मनसोक्त वसुली तर झाली ना..? मग आता तरी आम्हाला न्याय मिळणार की नाही? तुम्ही सुखदेवला अटक का करत नाही ? तसंच जयदेव उर्फ भाऊसाहेब आणि रुपेश यांनाही तुम्ही बेड्या ठोकल्या पाहिजेत.”

यावर किंचित गंभीर होत अप्पा म्हणाले..

“सुखदेव या केस मध्ये फिर्यादी आहे. त्यामुळे त्यालाच जर आरोपी केलं तर संपूर्ण केसच उलटपलट होऊन जाईल. सुखदेव मुळेच आम्हाला एवढ्या मोठया ‘वसुली’ ची संधी मिळाली. तसंच त्याने पोलिसांना त्यांच्या मागणीनुसार वेळोवेळी दिलेल्या पैशांचा मानही ठेवलाच पाहिजे. भाऊसाहेब सुरकांडेला अटक केली तर त्याच्याकडून जप्त केलेली रक्कम सरकारजमा करावी लागणार. तसंच तो कोर्टापुढे सुखदेवचं आणि रुपेशचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ह्या जयदेव उर्फ भाऊसाहेबचा शोध कधीच लागणार नाही. तो कायम अज्ञातच राहणार.. रुपेशने आधीच पुरेसा तुरुंगवास भोगला आहे. त्याच्याविरुद्ध कुठलेही पुरावे कोर्टापुढे सादर न करण्याची काळजी आम्ही घेतली आहे. त्यामुळे कोर्ट त्याला कोणतीही शिक्षा सुनावू शकणार नाही. आता राहिला प्रश्न तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा..!”

एखादा न्यायाधीश अंतिम निकालाचं वाचन करताना बोलतो तसं अप्पा अत्यंत मुद्देसूद बोलत होते.

“तर साहेब.., तुमच्या विरुद्धही आम्ही कोणताच ठोस पुरावा कोर्टापुढे सादर केलेला नाही. दुसऱ्या चेक बुकच्या मागणीचा अर्ज गहाळ असणे आणि चेक बुक इश्यू रजिस्टर वर कस्टमरची सही नसणे.. ह्या दोनच गोष्टी तुमच्या विरुद्ध आहेत. अर्थात त्यावरून फार तर बँकेने आपल्या दैनंदिन कामात थोडा निष्काळजीपणा केला एवढाच निष्कर्ष काढला जाऊ शकतो. पैशांचा अपहार कदापिही सिद्ध होऊ शकत नाही. सबब, तुम्हालाही कोर्टात शिक्षा होणं शक्य नाही. आणि.. तुम्हाला शिक्षा न होणं, तुमच्यावर अन्याय न होणं हा ही एक प्रकारे न्यायच आहे, नाही का ?”

अप्पांचं अजब तर्कशास्त्र ऐकून मान डोलावल्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.

“बरं.. निघतो मी ! खूप वेळ घेतला तुमचा.. !!”

असं बोलून अप्पा वाघमारे परत जायला निघाले.

“थांबा अप्पा ! आणखी एक दोन शंका आहेत.. तुम्हाला ठाऊक असल्यास कृपया त्यांचीही उत्तरं देऊन जा..”

माझी ही विनंती ऐकताच अप्पा थबकले. मी त्यांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकतोय, त्यांना महत्व देतोय हे पाहून ते अंतर्यामी सुखावले. पुन्हा खुर्चीवर बसत ते म्हणाले..

“विचारा नं साहेब ! काय वाट्टेल ते विचारा.. मी सगळ्यांची खबर ठेवतो. या अप्पाच्या नजरेतून बारीक सारीक गोष्टही सुटत नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर देईन मी..”

“आमचे जोगळेकर नावाचे एक वकील आहेत, औरंगाबादचे..! ते कधी कधी वैजापूर कोर्टात आलेले दिसायचे. ते इथे का येत असावेत याबाबत काही कल्पना आहे का ? म्हणजे, आमच्या केसच्या संदर्भात तर नव्हते ना येत ? ..असं विचारायचंय..”

“वा साहेब ! मानलं तुम्हाला..! तुमची शंका अगदी बरोबर आहे. औरंगाबादचे एक वकील मध्यंतरी फौजदार साहेबांना भेटायला येत होते. चार्ज शीट मधून तुमचं नाव वगळण्यासाठी त्यांचं सहकार्य मागण्यासाठी.. पण फौजदार साहेबांनी त्यांना त्यासाठी खूप मोठी किंमत सांगितली. त्यांनी कमी किंमतीत काम करण्यास तयार व्हावं यासाठी ते वकील साहेब काही दिवस फौजदार साहेबांकडे चकरा मारत होते. पण मग काही दिवसांनी त्या वकिलांनी फौजदार साहेबांचा नाद सोडला.. कुणाला संशय येऊ नये म्हणून ते वकील साहेब आपली कार कोर्टाच्या आवारात उभी करत आणि फौजदार साहेबांनाच तिकडे बोलावून घेत असत. त्यांच्यासोबत कार मधे बसूनच ते ही सौदेबाजीची बोलणी करत..”

माझ्या डोक्यातील साऱ्याच शंकांचा गुंता हळूहळू सुटत चालला होता. आता एकच मुख्य शंका बाकी होती. तीही या अप्पांना विचारून टाकावी म्हणून म्हटलं..

“रूपेश व्यतिरिक्त आमच्या स्टाफ पैकी अथवा निकट परिचय असलेल्यांपैकी आणखीही कुणीतरी पोलिसांचा मदतनीस किंवा खबऱ्या असावा असा मला पूर्वीपासून संशय आहे. याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का ?”

“नुसता संशयच आहे अजून ? खरंच साहेब, खूप भोळे आहात तुम्ही..!”

तोंडाने ‘चुक चुक’ असा आवाज काढीत माझ्याबद्दल एकाच वेळी कीव आणि सहानुभूती.. दोन्ही व्यक्त करीत अप्पा उद्गारले..

“तुमच्या सर्व हालचालींची खडानखडा माहिती पोलिसांना वेळोवेळी अगदी ताबडतोब मिळत होती. FIR दाखल झाल्यावर अटकेच्या भीतीने तुम्ही सारे वैजापूरहून औरंगाबादला निघालात त्यावेळी केवळ दोनच मिनिटांच्या आतच आम्हाला त्याची खबर मिळाली. तुम्ही औरंगाबादला पोहोचण्यापूर्वीच आम्ही तुम्हाला अटक करू शकलो असतो, पण आम्ही जाणीवपूर्वक तसं केलं नाही. तुम्ही बँकेच्या ट्रेनिंग सेंटरच्या होस्टेल मध्ये रहात असल्याची खबर मिळाल्यानेच सब. इंस्पे. हिवाळे साहेब तिथे तुम्हाला भेटायला आले होते.”

अप्पांचं म्हणणं खरंच होतं. हिवाळे साहेब हॉस्टेल वर भेटायला आले तेंव्हाच स्टाफपैकीच कुणीतरी “आस्तीन का सांप” असला पाहिजे असा संशय आला होता. पण तो “दगाबाज खबऱ्या” कोण असावा ? याबद्दल खूप विचार करूनही त्याबद्दल तेंव्हा उलगडा झाला नव्हता.

“चहावाला राजू, नंदू माळी, जीप ड्रायव्हर अंगद, बँकेसमोरील अंडाभुर्जी-वडापाव वाले, चार दोन तुमचे अगदी जवळचे, विश्वासू व हितचिंतक कस्टमर ही बाहेरची मंडळी.. तसेच बँकेचे पर्मनंट चपराशी, सिक्युरिटी गार्डस् आणि काही लेडीज व जेंट कर्मचारी.. एवढ्या साऱ्या जणांनी पोलिसांना वेळोवेळी जाणता अजाणता बरीच महत्वाची माहिती पुरवली आहे. कुणा एकाचं नाव मी घेणार नाही. तुम्ही सुज्ञ आहात. शिवाय आज ना उद्या तुम्हाला या सर्वांची नावं कळणारच आहेत.”

धुर्तपणे असं गोल मोल उत्तर देऊन माझा निरोप घेत अप्पा निघाले. त्यांना जास्त आग्रह करण्यात अर्थ नव्हता. माझीही निघायची वेळ झालीच होती. नंदू माळी व ड्रायव्हर अंगद, बाहेर जीप मध्ये माझं सामान ठेवून मी बाहेर येण्याची वाट पहात थांबले होते. केबिन लॉक करून मी हॉल मध्ये येताच ड्युटीवरील दोन्ही सिक्युरिटी गार्ड्सनी मला निरोपाचा कडक सॅल्युट ठोकला. बँकेच्या इमारती बाहेरील आवारात येताच बगीच्या जवळील अंधाऱ्या आडोशातून अचानक राजू चहावाला पुढे आला. माझ्या जवळ येऊन हलक्या आवाजात तो म्हणाला..

“साहेब, तो हलकट अप्पा इतका वेळ इथे काय करत होता ? खूप मोठा चुगलखोर आहे तो.. आपल्या मनानेच खोट्या नाट्या कहाण्या रचून लोकांत भांडणं लावून देणं हा त्याचा आवडता उद्योग आहे. खुद्द फौजदार साहेब तसंच ठाण्यातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल खऱ्या वाटतील अशा असंख्य मनगढ़ंत, काल्पनिक गोष्टी, किस्से तयार करून तशा अफवा पसरवणे व त्या आधारे वरिष्ठांकडे तक्रार करणे यासाठी तो बदनाम आहे. यामुळेच पोलीस त्याला कोणत्याही तपास कामात सहभागी करून घेत नसत आणि फक्त बँकेची व कारकुनी स्वरूपाची कामेच त्याच्याकडून करवून घेत असत. त्याचं बोलणं म्हणजे शुद्ध थापा असतात..”

राजुचं बोलणं मला कुठेतरी थोडं थोडं पटत होतं. अर्थात आता वैजापुरातल्या कुठल्याही खऱ्या खोट्या व्यक्तींशी अथवा गोष्टींशी मला काहीही देणं घेणं नव्हतं. औरंगाबादला जाणारी शिर्डी एक्सप्रेस तारुर स्टेशन वरून सुटली असून दहा मिनिटांत रोटेगावला येत असल्याचा स्टेशन मास्तरांचा निरोप मिळाला आणि सर्वांचा शेवटचा निरोप घेऊन घाईघाईतच मी स्टेशनकडे निघालो.

kotnis katha

(क्रमश:)

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १६   भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 

Mind blowing experiences of a Banker-16 एका बँकरचे थरारक अनुभव-16

angry judge-1

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

Mind blowing experiences of a Banker-16

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 16)

अविरत गतिमान काळ कधीही कुणासाठीही थांबत नसतो. जीवनाचं रहाटगाडं रडत खडत, ठेचकाळत, अवघड परिस्थितीतून मार्ग काढीत, कसंबसं मार्गक्रमण करीत पुढे पुढे जातच होतं. कोर्टाच्या तारखा सुरू झाल्या होत्या. आम्हा सर्व पाचही आरोपींच्या नावाने समन्स जारी झालं होतं. प्रत्येक तारखेला बेबी सुमित्रा वगळता आम्ही चौघेही न चुकता कोर्टात हजर रहात होतो.

आम्ही चौघांनीही आमच्यावरील “संगनमताने सौ. रत्नमाला बोडखे यांची आर्थिक फसवणूक” केल्याचा आरोप अमान्य केल्यामुळे कोर्टाने आमच्यावर आरोप निश्चित करून सुनावणी साठी पुढील तारीख दिली. सुरवातीला दर पंधरा वीस दिवसांनी तारीख असायची. आणि आम्ही चौघेही सकाळी दहा वाजल्यापासून आमच्या केसचा पुकारा होण्याची वाट पहात कोर्टाच्या व्हरांड्यात ताटकळत बसलेलो असायचो. सुखदेव सुद्धा आपल्या कुटुंबासह त्या व्हरांड्यातच जाणून बुजून अगदी आमच्या समोरची जागा धरून बसायचा.Mind blowing experiences of a Banker-16

“आरोपी क्रमांक ए sss क ! श्री. xxxx हाजीर हो sss !” असा कोर्टातील पट्टेवाला माझ्या नावाने जेंव्हा पुकारा करायचा तेंव्हा माझ्याकडे बोट दाखवून “आरोपी.. आरोपी..” असे म्हणून डिवचत सुखदेव खदाखदा हसायचा. त्याच्या त्या कुत्सित विकट हास्यात पराकोटीचा द्वेष आणि सूडभावना भरलेली दिसायची. अत्यंत शांत, निर्विकार मुद्रेने मी सुखदेवच्या त्या बालिश वर्तनाकडे दुर्लक्ष करून मान झुकवून अदबीने न्यायमूर्तींसमोर हजर व्हायचो. आपण एवढं चिडवूनही हे साहेब अजिबात कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत हे पाहून सुखदेव मनोमन अतिशय चरफडत असे.

सुखदेवच्या त्या दुष्ट वर्तनाचा कोर्टातील पट्टेवाल्या शिपायासही खूप राग येत असे. मला “आरोपी” असे म्हटल्यामुळे सुखदेवला विकृत आनंद होतो हे लक्षात आल्यावर त्या पट्टेवाल्याने मला आरोपी म्हणून माझ्या नावाचा पुकारा करणे कायमचेच सोडून दिले. उलट, आमच्या केसचा पुकारा केल्यावर मला पाहून कमरेत झुकून तो आदराने “या साहेब..” असे म्हणायचा. आणि हे पाहून तर सुखदेवचा अधिकच जळफळाट होत असे.

बेबी सुमित्राने वैजापूरला येण्यापूर्वी युनियन बँकेची प्रोबेशनरी ऑफिसर साठीची लेखी परीक्षा दिली होती. तिचा निकाल लागून बेबी त्यात उत्तीर्ण झाली आणि इंटरव्ह्यू नंतर तिला गावाच्या जवळच रायपूर येथे पोस्टिंगही मिळाली. अशारीतीनं वैजापूर सोडावं लागणं ही तिच्या दृष्टीने एकप्रकारे इष्टापत्तीच ठरली. बेबीने ताबडतोब आम्हा सर्वांना फोन करून ही गुड न्यूज कळवली.girl talking over phone

नोकरी लागल्यानंतर आपले गाव कायमचे सोडून बेबी आपल्या आईवडिलांसह रायपूर इथे रहात होती. बेबीच्या नावावर कोर्टाने पाठविलेली सर्व समन्स योग्य पत्त्याअभावी परत येत होती. कोर्टाने तसेच पोलिसांनी देखील बेबीच्या नवीन पत्त्याची आमच्याकडे वारंवार मागणी केली. परंतु बँकेच्या रेकॉर्डवरील बेबीचा जुनाच पत्ता आम्ही त्यांना दिला आणि तिचा सध्याचा ठावठिकाणा ठाऊक नसल्याचे त्यांना कळवले. आधीच खूप काही सोसलेल्या बेबीला निदान या वैजापुरच्या कोर्ट केसच्या त्रासापासून तरी दूरच ठेवावं अशीच यामागे आमची प्रामाणिक सदिच्छा होती.

कोर्टाच्या दहा पंधरा तारखा झाल्या तरी केसच्या सुनावणीला काही सुरवात होत नव्हती. सर्व आरोपी व फिर्यादी हजर असल्याशिवाय केसची सुनावणी सुरू करता येत नाही असा कोर्टाचा नियम असल्याने बहुदा ह्या केसची सुनावणी दीर्घकाळ पर्यंत सुरूच होणार नाही अशी चिन्हे दिसत होती. एक रहीम चाचा वगळता आम्हा कुणालाही कोर्ट केस बद्दल घाई नव्हती. आज ना उद्या ग्राहक मंचा कडून आपल्याला नुकसान भरपाई मिळणारच आहे याची खात्री असल्याने सुखदेवही कोर्ट केस बाबत तसा उदासीनच होता. रुपेशला तर त्याच्या गुन्ह्यातील सहभागाबद्दल कोर्टाद्वारे शिक्षा होण्याची पुरेपूर शक्यता असल्याने तो ही कोर्टाच्या तारखांना क्वचितच हजर राहत असे.

रहीम चाचांची मानसिकता मात्र वेगळीच होती. कोर्ट केस मधून निर्दोष मुक्तता होऊन सन्मानाने नोकरीतून निवृत्त व्हावे ही त्यांची इच्छा दुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नव्हती. कोर्ट केसचा निकाल काय लागेल या चिंतेने निवृत्ती नंतरही त्यांना शांत झोप लागत नसे. केस लवकर निकाली निघावी यासाठी त्यांनी स्वतःचा वेगळा वकिलही लावला होता. बेबी सुमित्राला समन्स बजावता येत नसल्याने तिला वगळून केसचे कामकाज चालवावे.. अशी त्यांनी वकीलातर्फे कोर्टाला विनंती केली. अर्थात या गोष्टीला आम्ही अन्य आरोपी व फिर्यादी यापैकी कुणाचाही आक्षेप नसल्याने बेबी सुमित्राला वगळून केसची सुनावणी करण्यास कोर्टाने मान्यता दिली.

राजू चहावाल्याने हळूहळू पुन्हा चहा घेऊन बँकेत यायला सुरुवात केली होती. साहेबांनी (म्हणजे मी) अशी काय जादू केली की जगन राठोड सारखा कर्दनकाळ ठाणेदारही त्यांच्या वाटेला जाण्यास घाबरतो आहे, याचंच त्याला कोडं पडलं होतं. हे साहेब दिसतात तेवढे साधे सरळ नाहीत, त्यांचे हात थेट वरपर्यंत पोहोचलेले आहेत असा त्याचा पक्का समज झाला आणि त्याच्या मनातील माझ्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला.tea stall

राजुने पोलिसांना जे वीस हजार रुपये माझ्या नावे परस्पर दिले होते ते त्याने वैजापुरातील एका दारू विक्रेत्या कडून उसने मागून आणले होते. मला ही गोष्ट समजताच मी ताबडतोब त्या दारू विक्रेत्याला बँकेत बोलावून त्याने दिलेले पैसे त्याला परत केले होते. कालांतराने राजूला ही गोष्ट समजली आणि हे साहेब अत्यंत निस्पृह, निरासक्त आहेत, कुणाचेही पाच पैशाचेही उपकार ते घेत नाहीत, ही गोष्ट तो कौतुकाने व अभिमानाने ज्याला त्याला सांगू लागला.

आम्ही एवढ्या कठीण परिस्थितीतून जात असतांनाही कर्मचाऱ्यांची तसेच अधिकारी वर्गाची संघटना आमच्या मदतीला का धावून आली नाही ? असा प्रश्न कुणालाही पडणं हे अगदी साहजिकच आहे. एक तर आम्ही भोगत असलेल्या त्रासाची आमच्या संघटनेच्या नेत्यांना नीटशी यथार्थ कल्पनाच नव्हती. विनाकारण त्या प्रॉब्लेमॅटिक कस्टमरशी आणि पोलिसांशी पंगा घेण्यापेक्षा गुपचूप पणे त्यांच्याशी समझोता करावा, ते मागतील तेवढे पैसे त्यांच्या तोंडावर फेकावे आणि आपली कातडी वाचवावी हेच व्यावहारिक शहाणपणाचं आहे अशीच बहुतांश संघटनेच्या नेत्यांची प्रामाणिक समजूत होती. हे प्रकरण चिघळून वर्तमानपत्रांपर्यंत गेलं आणि पुढे पोलीस केस वगैरे झाली ती आम्ही कस्टमरशी तडजोड न केल्यामुळेच असंच त्यांचं मत होतं. मुळात बरीचशी चूक आमचीही होती. आम्ही आमच्या संघटनांकडे अधिकृतरित्या या प्रकरणात मदतीची याचना कधी केलीच नाही. आमचे नेते आपणहून शाखेला भेट देऊन खरीखुरी वस्तुस्थिती जाणून घेतील अशीच आमची सार्थ अपेक्षा होती. परंतु दुर्दैवानं तसं काहीच घडलं नाही.

याउलट रिजनल ऑफिस मधील आमचे वरिष्ठ अधिकारी तसेच क्षेत्रीय प्रबंधक यांनी मात्र या प्रकरणी वारंवार शाखेत येऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली, स्टाफशी संवाद साधला, त्यांना धीर दिला तसंच तक्रारदार ग्राहकाचीही अनेकदा भेट घेऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. बँक मॅनेजमेंटचा आम्हाला कायमच पूर्ण सपोर्ट होता. तसंच स्टाफचा प्रामाणिकपणा व निर्दोषत्वा बद्दल देखील त्यांना पुरेपूर विश्वास व खात्री असल्यामुळे त्यांना आमच्या बद्दल सहानुभूतीही होती. दुर्दैवाने त्या काळात एक अत्यंत अनुचित घटना घडली, जिचा उल्लेख केल्याशिवाय राहावत नाही.

आम्हाला अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी ॲड. जोगळेकर साहेबांनी आमच्याकडून प्रत्येकी चाळीस हजार रुपये फी घेतली होती. त्यावेळी, म्हणजे आमच्या फरारी असण्याच्या काळात आमची राहण्याची (पोलिसांपासून लपण्याची) व्यवस्था रिजनल मॅनेजर साहेबांनी बँकेच्या ट्रेनिंग सेंटर मध्येच केली असल्याने रोजच संध्याकाळी आम्ही AGM व DGM साहेबांना भेटायला जात असू. या प्रकरणी स्टाफला करावा लागणारा सर्व प्रकारचा खर्च, वकिलांची फी इत्यादीची प्रतिपूर्ती (Reimbursement) बँकेने केली पाहिजे असेच AGM व DGM साहेबांचे मत होते. परंतु काही विघ्नसंतोषी झारीतील शुक्राचार्यांनी याला विरोध केला. ही केस बँकेविरुद्ध नाही तर वैयक्तिक स्टाफ विरुद्ध असल्याने त्यांना प्रतिपूर्ती (Reimb.) देता येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आश्चर्य म्हणजे कर्मचारी व अधिकारी या दोन्ही संघटनांच्या काही दुय्यम नेत्यांचाही या शुक्राचार्यांना पाठिंबा होता. बँकेचे दैनंदिन कामकाज पार पाडताना (Routine course) उद्भवलेली ही घटना होती ही साधी गोष्ट देखील त्यांनी ध्यानात घेतली नाही. असो..!

आम्ही त्यावेळी आमच्याच परेशानीत होतो. पैसा आमच्या दृष्टीने अजिबात महत्वाचा नव्हता. तसाही तो खर्च झालाच होता आणि पुढे आणखीही खर्च होणारच होता. लवकरच संघटनेच्या नेत्यांच्या आमच्या प्रती उदासीन वागणुकीची (apathy) ही बाब आम्ही पार विसरूनही गेलो. रविशंकर आणि बेबी सुमित्रा हे दोघेजण अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे असल्याने त्यांचा बँकेच्या हेड ऑफीसमधील त्यांच्या संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांशी केस संदर्भात नेहमीच वार्तालाप होत असे. अशाच एका फोनवरील संवादात त्यांनी बँक वकिलाची फी reimburse करीत नसल्याची बाब त्यांच्या संघटनेच्या सर्वोच्च नेत्याच्या कानावर घातली.

योगायोगाने पी. उग्रसिंह नावाचे ते हेड ऑफिस मधील संघटनेचे झुंजार नेते त्यावेळी बँकेचे वर्कमन डायरेक्टर सुद्धा होते. त्यांनी ताबडतोब औरंगाबादच्या DGM साहेबांना फोन लावून त्यांना अत्यंत कठोर शब्दांत खूप काही सुनावलं.

angry leader

हा फोन सुरू असताना आम्ही DGM साहेबांच्या केबिन मध्येच होतो. हे पी. उग्रसिंह नावाप्रमाणेच अतिशय उग्र, तापट व शीघ्र कोपी होते. त्यांनी अतिशय जालीम, निर्दयी व जहाल भाषेत DGM साहेबांची खरडपट्टी काढली असावी हे DGM साहेबांच्या चेहऱ्यावरील भीती व झरझर बदलणाऱ्या भावांवरूनच समजत होतं. मूळचे काश्मीरचे असणारे श्री. बिजॉय सप्रू नावाचे त्यावेळचे ते DGM म्हणजे एक अत्यंत सहृदय व दिलखुलास व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात एवढे कडक आणि निष्ठुर शब्द कधीच ऐकले नसावेत. पाच दहा मिनिटे ते यंत्रवत फोन धरून पलीकडून होणाऱ्या वाक्-बाणांच्या अग्निवर्षावात न्हाऊन निघत होते. त्यांनी फोन ठेवला तेंव्हा त्यांचा चेहरा घामाने डबडबला होता, हातांना कंप सुटला होता आणि डोळे अश्रूंनी भरले होते. हताश, करुण स्वरात ते म्हणाले..dgm

 

“अरे, मैं तो शुरुसेही आप लोगोंको हर तरह से मदत करने के पक्ष में हूँ.. फिर भी मुझे क्यों ये सब कुछ सुनना पड़ा.. आप के लीडर लोगो ने ही टांग अडाई है.. वरना हमे तो खुशी है आपको expenses reimburse करने में.. !”

मग माझ्याकडे पहात ते म्हणाले..

“इस केस के सिलसिले में आप लोगों को जो कुछ भी खर्च उठाना पड़ा है.. वकील की फीस, यहां आने जाने का रहनेका खर्च.. सभी बैंक reimburse करेंगा.. ! आप सब लोग टीए बिल भी क्लेम कर सकते हो.. मैं आप को सूचित करता हूं कि इस केस से संबंधित सभी स्टाफ expenses तथा TA Bill आदि का आप ब्रांच लेव्हल पर ही तुरंत भुगतान (payment) करो और परिपुष्टि (confirmation) के लिए हमे अवगत कराओ.. हमारी ओर से किसीका भी कोई भी खर्च अस्वीकृत (decline) नही होगा..”

DGM साहेबांसारख्या दयाळू माणसाला आपल्यामुळे विनाकारण बोलणी खावी लागली, पराकोटीची मानहानी, अपमान सहन करावा लागला याचं रविशंकरला खूप वाईट वाटलं. “सर.. आय ॲम व्हेरी सॉरी..” असं म्हणून तो उठून त्यांची माफी मागू लागला, इतक्यात त्या असह्य मानहानीमुळे गळ्याशी दाटून आलेला हुंदका कसाबसा रोखीत DGM साहेब उठले आणि आम्हाला हातानेच बाहेर जाण्याची खूण करीत केबिन मधील वॉशरूम कडे गेले.

आजही DGM साहेबांची त्या दिवशीची ती केविलवाणी, दयनीय अवस्था आठवली की काळजात चरर्र होतं. त्या वाईटातून चांगलं एवढंच निघालं की त्यानंतर नेहमीसाठीच आम्हा सर्वांचे या केस संबंधित सर्वच खर्च व TA Bills आदि विनासायास Reimburse होत गेले.

ॲड. जोगळेकर आणि त्यांचे असिस्टंट ॲड. पुराणिक यांचे अधून मधून मला तसेच रविशंकर, सैनी व रहीम चाचांनी फोन येतच असायचे. चार्जशीट मधून तुमचे नाव वगळून देतो.. इतके इतके पैसे द्या.. वगैरे वगैरे.. एके दिवशी ॲड. पुराणिक साहेबांनी आम्हा सर्वांना फोन करून सांगितलं की पैशांचा अपहार केल्यामुळे जोगळेकर साहेबांनी रश्मीला त्यांच्या ऑफिसातून काढून टाकले आहे. त्यामुळे तिच्याशी कोणताही पैशांचा अथवा अन्य कुठलाही व्यवहार करू नये..

कदाचित जोगळेकर साहेबांच्या मिसेसनी त्यांना रश्मी बरोबर अश्लील चाळे करताना रंगे हाथ पकडलं असावं, आणि म्हणूनच नाईलाजाने त्यांना तिला ऑफिसातून काढून टाकण्याचं नाटक करावं लागलं असेल.. असं समजून पुराणिक साहेबांच्या बोलण्याकडे आम्ही दुर्लक्षच केलं. बरेचदा जोगळेकर साहेब वैजापूरच्या कोर्टातही आलेले दिसायचे. मात्र त्यावेळी ते आमच्याशी साधी ओळखही दाखवीत नसत. नेमकी त्याच दिवशी आमच्या केसचीही तारीख असायची. हा योगायोग असायचा की आणखी काही.. हे शेवटपर्यंत आम्हाला समजलंच नाही.

काही दिवसांनंतर वर्तमानपत्रात एक खळबळ जनक बातमी वाचायला मिळाली. जोगळेकर वकिलांची कार रस्त्यात थांबवून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. एक गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती. हा हल्ला आपली भूतपूर्व पर्सनल सेक्रेटरी ॲड. मिस रश्मी यांनीच सुपारी देऊन गुंडांकरवी करवला असल्याचा आरोप जोगळेकर साहेबांनी केला होता. गेल्या काही दिवसांपासून रश्मी आपल्याला ब्लॅकमेल करीत असून यावेळी तिची पन्नास लाख रुपयांची मागणी पूर्ण न केल्यामुळेच तिने हा हल्ला केल्याचा गौप्यस्फोटही वकील साहेबांनी केला. तसेच यापूर्वीही आपल्यातील अनैतिक संबंध जगजाहीर करण्याची धमकी देऊन तिने एक चार रूमचा लक्झरी फ्लॅट स्वतःच्या नावे करण्यास आपल्याला भाग पाडल्याचेही जोगळेकर साहेबांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी जरी रश्मीला ताबडतोब अटक केली असली तरी औरंगाबादच्या अनुभवी पोलीस अधिक्षकांना मात्र या हल्ल्यामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय होता. हा हल्ला म्हणजे एक लुटीपुटीचा फार्स असून ॲड. जोगळेकरांना या हल्ल्याची पूर्वकल्पना असावी असा त्यांचा कयास होता. अवघ्या एक फूट अंतरावरून चालविलेल्या गोळीचा नेम चुकून ती कानाला नुसती ओझरती चाटून जाते हे पोलिसांच्या पचनी पडत नव्हते. पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांकरवी भराभर चौकशीची चक्रे फिरविली आणि अवघ्या दोनच दिवसात गोळ्या झाडणाऱ्या मुन्ना नावाच्या हिस्ट्री शिटर सराईत गुंडाला पिस्तूलासह अटक केली. हा तोच मुन्ना होता जो, जोगळेकर वकिलांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा गेलो असता आम्हाला दिसला होता आणि त्याने आमच्या समोरच जोगळेकर साहेबांना एक देशी कट्टा (गावठी पिस्तुल) ही दिला होता.

पोलिसांनी मुन्नाला चौदावं रत्न दाखवून बोलतं केलं तेंव्हा आपण हा हल्ला जोगळेकर वकिलांच्या सांगण्यावरूनच केला असून रश्मीचा या हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचे त्याने कबूल केले.

या जोगळेकर हल्ला प्रकरणाचा आपल्या कथेशी तसा काहीही संबंध नाही, परंतु पोलीस आणि वकील हे सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे वैधानिक व सामाजिक दायित्व असणारे दोन महत्वाचे समाज घटक आपल्या पदाचा व ज्ञानाचा दुरुपयोग करून कायद्याची व न्यायाची कशी सर्रास क्रूर थट्टा करतात याची कल्पना यावी म्हणून थोडक्यात तिचा येथे उल्लेख केला आहे.

मध्यंतरी ग्राहक मंचाच्या तारखांना सुखदेव हजर न राहिल्यामुळे सुमारे सहा महिने केवळ पुढच्या तारखाच मिळत गेल्या. त्यानंतरच्या तारखेला “चेकवरील सही बनावट असल्याचे सिद्ध झाल्यामुळे नियमानुसार चेकची संपूर्ण रक्कम बचत खात्याच्या व्याजासहित परत करण्यास बँक तयार असल्याचे” मी न्यायाधीशांना सांगितले. त्यावर समाधान व्यक्त करीत पुढील तारखेला नुकसान भरपाईचा धनादेश वा ड्राफ्ट कोर्टासमक्ष फिर्यादीला सुपूर्द करावा असा न्यायाधीशांनी आदेश दिला.

दरम्यान वैजापूर कोर्टात सुरू असलेल्या फौजदारी खटल्याचे कामकाजही संथ गतीने सुरू होते. गुन्ह्यातील आपल्या सहभागाचा पोलिसांना दिलेला कबुलीजबाब रुपेशने कोर्टात साफ नाकारला होता. पोलिसांनी आपल्या विरुद्ध बळाचा वापर केल्यामुळे शारीरिक त्रासाला भिऊनच तो खोटा कबुलीजबाब दिल्याचे त्याने कोर्टाला सांगितले.

ग्राहक मंचाच्या पुढील तारखेपूर्वीच रिजनल ऑफिसच्या सुचनेनुसार तात्पुरते सस्पेन्स खात्याला डेबिट टाकून पाच लाख ऐंशी हजार रुपये अधिक व्याज अशा रकमेचा सौ. रत्नमाला बोडखे यांच्या नावाचा ड्राफ्ट मी तयार करून ठेवला होता. ॲड. ऋतुराज यांनी आपले सारे वकिली कौशल्य व चातुर्य पणाला लावून खालील प्रमाणे एक परफेक्ट तडजोड पत्र तयार केले.

“मला चेकचे सगळे पैसे व्याजासह प्राप्त झाले असून माझे पूर्ण समाधान झाले आहे. माझी बँकेविरुद्ध किंवा बँक कर्मचाऱ्यां विरुद्ध कसलीही नाराजी अथवा तक्रार बाकी उरलेली नाही. तसेच केवळ बँक कर्मचाऱ्यां बद्दलच्या गैरसमजुतीमुळे मी त्यांच्याविरुद्ध जी पोलीस कंप्लेन्ट व कोर्ट कारवाई केली होती ती मी मागे घेईन असे कबूल करते. तसेच बँकिंग लोकपाल, लाचलुचपत प्रतिबंधक खाते, मानवाधिकार आयोग, विविध सामाजिक संस्था व सरकारी विभाग यांच्याकडे बँक व बँक कर्मचारी यांच्याबद्दल याच गैरसमजातून मी ज्या ज्या तक्रारी केल्या होत्या त्या सर्व मी मागे या पत्राद्वारे मागे घेत आहे.”

हे तडजोड पत्र ग्राहक मंचाच्या न्यायाधीशांना दाखविले असता त्यांनी त्या पत्रास मान्यता दिली व या पत्रावर सही केल्यावरच नुकसान भरपाईचा ड्राफ्ट देण्यात येईल असे सौ. बोडखे यांना सांगितले.

सुखदेवने जेंव्हा हे तडजोड पत्र वाचले तेंव्हा तो रागाने थरथरू लागला. आपली ब्लॅकमेलिंग करण्याची सर्व अस्त्रे, शस्त्रे कर्णाच्या कवच कुंडलां प्रमाणे लबाडीने हिसकावून घेतली जात आहेत असेच त्याला वाटले. त्याने या तडजोड पत्रावर सही करण्यास साफ नकार दिला. मात्र सुखदेवच्या लालची वकिलांना त्यांची भली मोठी फी मिळणे हे या नुकसान भरपाईच्या ड्राफ्टचे पैसे मिळण्यावरच अवलंबून असल्याने त्यांनी महात्प्रयासाने सुखदेवची समजूत घालून त्याला व सौ. बोडखेंना त्या तडजोड पत्रावर सही करण्यास भाग पाडले. त्यानंतर न्यायाधीशां समक्ष सुखदेवला आम्ही तो ड्राफ्ट दिला. सुखदेवने लगबगीने बँकेत जाऊन त्याच दिवशी तो ड्राफ्ट वटवून पैसे ताब्यात देखील घेतले.

त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी झोनल ऑफिसमध्ये “मंथली प्रोग्रेस रिव्ह्यू” (P- Review) मीटिंग असल्याने त्यादिवशी मी औरंगाबादलाच थांबलो.

कशी काय कोण जाणे, पण सुखदेवला चेकच्या नुकसान भरपाईचे पैसे मिळाल्याची बातमी वैजापूर पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचली. “नुकसान भरपाईतील आपला हिस्सा बुडाला..” हे कळताच ठाणेदार जगन राठोड चार पाच कॉन्स्टेबलना सोबत घेऊन लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेत आले. “पोलिसांच्या पूर्व परवानगी शिवाय बँकेने बोडखेंना परस्पर नुकसान भरपाई दिलीच कशी ?” असा प्रश्न विचारून आरडा ओरडा करीत त्यांनी बँकेत प्रचंड गोंधळ घातला. खुर्च्या, टेबल व अन्य फर्निचरची उलथापालथ करून नासधूस केली.

ransacking office

बँकेचा स्टाफ या अकस्मात झालेल्या पोलिसी आक्रमणामुळे घाबरून गेला आणि सर्व काम थांबवून लंच रूम मध्ये जाऊन लपून बसला. अकाउंटंट साहेबांनी तांतडीने मला फोन लावून बँकेत चाललेल्या त्या प्रकाराची माहिती दिली. चालू मिटिंग मधून थोडा वेळ बाहेर जात मी लगेच DySP मॅडमला फोन करून हे वृत्त कळविले. DySP मॅडमचा फोन जाताच फौजदार साहेब घाईघाईतच ठाण्यात परतले. तसंच जाण्यापूर्वी दोन कॉन्स्टेबलना “तुम्ही इथे थांबून सर्व फर्निचर पुन्हा पूर्वी सारखं जागच्या जागी लावून ठेवा..” अशी सूचनाही देऊन गेले.

पोलिसांवर विश्वास ठेवणं, त्यांच्या कडून सभ्य, सुसंस्कृत, सद्-वर्तनाची अपेक्षा ठेवणं किती चुकीचं आणि मुर्खपणाचं होतं हेच पोलिसांनी त्यांच्या त्या दिवशीच्या असभ्य, रानटी वागणुकीने सिद्ध केलं होतं..

असेच दिवस भराभर उलटत होते. मार्च संपताच मलाही बदलीचे वेध लागले. मुलांच्या शिक्षणासाठी फॅमिली औरंगाबादला रहात असल्यामुळे माझी पुढील पोस्टिंग शक्यतो औरंगाबादलाच देण्याचा प्रयत्न करू असे AGM व DGM यांनी मला आश्वासन दिले होते. त्यानुसारच औरंगाबाद सेवा शाखेच्या प्रबंधक पदी लवकरच माझी बदली झाली. येत्या शनिवारी रिलिव्ह होऊन सोमवारी नवीन जागी रुजू होण्याचे रिजनल ऑफिसचे आदेशही प्राप्त झाले.

त्या दिवशी शुक्रवार होता. सर्व काम आटोपून मेस वर जेवण करून मी रूमवर परतलो. रात्री, वैजापुरातल्या गेल्या साडेतीन वर्षातील सर्व कडू गोड क्षणांची उजळणी करीत मी आपल्या बिछान्यावर पहुडलो होतो. उद्या माझा निरोप समारंभ होता. जंग जंग पछाडूनही सुखदेवच्या केसशी निगडित काही काही प्रश्नांची खात्रीशीर, काँक्रीट उत्तरं मला अद्यापही मिळाली नव्हती.

बनावट सहीचा चेक वटवून पाच लाख ऐंशी हजार रुपये घेऊन पसार झालेला तो जयदेव खडके नावाचा अज्ञात इसम कुठे हवेत विरून गेला होता ? पोलिसांना तो खरोखरीच सापडला नाही की पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्नच केला नाही ? रुपेशच्या हस्ताक्षर चाचणीचा अहवाल काय आला ? पोलिसांनी रुपेशला बोलतं का केलं नाही ? सुखदेवचा सुद्धा या गुन्ह्यात नक्कीच सहभाग होता.. कारण दुसऱ्या चेकबुकची मागणी त्यानेच केली होती. मग पोलिसांनी सुखदेव वरच तपास का केंद्रीत केला नाही ? सुखदेव बोडखे, रुपेश जगधने आणि जयदेव खडके या तिघांनी मिळून गुन्ह्याचा कट आखला होता ही गोष्ट तर अगदी सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ, स्पष्ट होती. मग गुन्हे शोधण्यात तरबेज असलेल्या पोलीसांना एवढी साधी गोष्टही लक्षात कशी आली नाही ? कि.. पोलिसांनी जाणूनबुजून गुन्हेगारांना संरक्षण दिलं ?

असे असंख्य अनुत्तरित प्रश्न माझ्या मनात घोळ घालीत होते. उद्या माझी इथून बदली झाल्यावर तर या केस संबंधी पुन्हा कसलीही माहिती मिळणार नाही आणि या प्रश्नांचे गूढ बहुदा तसेच राहणार.. ! अशा विचारातच कधी तरी उशिरा मला झोप लागली.

thinking

(क्रमशः)

(काल्पनिक)

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १५    भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 

Mind blowing experiences of a Banker-15 एका बँकरचे थरारक अनुभव-15

police official

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 15)

विवादित चेकवरील सही बनावट असल्या बद्दलचा CFSL संस्थेचा अहवाल मी क्षेत्रीय कार्यालयाला पाठवून दिला तसेच ॲड. ऋतुराज यांनाही त्याची माहिती दिली. ते म्हणाले..

cfsl-1

cheque

“या बद्दल सध्या कुठेही वाच्यता करू नका.. हा बँकेचा अंतर्गत चौकशी संबंधी अहवाल आहे आणि बँकेलाच तिच्या नियमावली व कार्यपद्धती नुसार त्यावर यथावकाश निर्णय घेऊ द्यात. चुकून जर सुखदेवला या अहवाला बद्दल समजलं तर तो क्षणभरही थांबायला तयार होणार नाही आणि पुन्हा पेपरबाजी वगैरे करून बँकेवर दडपण आणून बँकेला तडकाफडकी नुकसान भरपाई देण्यास भाग पाडेल.”

सुदैवाने ग्राहक मंचाची पुढची तारीख दोन महिने नंतरची होती. पोलिसांनी पुण्यास पाठविलेल्या चेक वरील सहीचा हस्ताक्षर तपासणी अहवाल जर त्यांना या दरम्यान प्राप्त झाला असता तर मात्र सुखदेव पासून ही बातमी जास्त काळ लपून राहिली नसती. त्यामुळे हाती पडलेल्या हस्ताक्षर तपासणी अहवालावर बँकेने शीघ्रतेने निर्णय घ्यावा अशी मी क्षेत्रीय कार्यालयाला विनंती केली.

याच दरम्यान दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. वैजापूर पोलीस स्टेशनचे ठाणेप्रमुख इन्स्पेक्टर माळी यांची बदली पैठण इथे झाली. तसेच सब. इंस्पे. हिवाळे यांची देखील स्थानिक गुन्हे शाखा (LCB) औरंगाबाद इथे बदली झाली. या दोन्ही बदल्या Complaint Basis वरच झाल्या होत्या. दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे रविशंकरची बदली बीड जिल्ह्यातील “मादळमोही” इथे झाली होती. त्या आडमार्गावरील गावातून आईच्या कॅन्सर ट्रीटमेंटसाठी मुंबईला जाणे अवघड असल्यामुळे ही बदली रद्द करून महामार्गा जवळील ठिकाणी व्हावी यासाठी त्याची धडपड सुरू झाली.

वैजापूर पोलीस ठाण्याचे नवीन फौजदार जगन राठोड हे एक अत्यंत उग्र, रासवट आणि उर्मट असं व्यक्तिमत्व होतं. आल्या आल्या त्यांनी सिनेस्टाईल धडाकेबाज कारवाया करून सामान्य नागरिक व गुंड या दोघांवरही ही भीतीयुक्त जरब बसवून एक प्रकारची दहशतच निर्माण केली होती. रस्त्यावर बाचाबाची, किरकोळ भांडणे करणारे नागरिक, जादा पॅसेंजर बसवणारे रिक्षा चालक, मटका खेळणारे जुगारी तसेच नशेत तर्र असणारे दारुडे यांना निर्दयीपणे भर रस्त्यात अमानुष मारहाण करणे हा त्यांचा आवडता छंद होता.

बरेच दिवसांत सुखदेव बँकेकडे फिरकला नव्हता. मुंबईत लोकपाल कार्यालयात झालेली मानहानी व अपमान तो अद्याप विसरलेला नव्हता. “पैसे देऊन न्याय विकत घेऊन ज्याप्रमाणे मला रिझर्व्ह बँकेच्या शिपायांच्या हातून बखोटं धरून बाहेर काढलं होतं, अगदी त्याचप्रमाणे.. वाट्टेल तितका खर्च करीन पण एकदा तरी ह्या साहेबांची वैजापुरातून धिंड काढल्याशिवाय राहणार नाही..” अशा वल्गना करीत संतापाने धुमसत तो बँकेसमोरून चकरा मारीत असतो असे कस्टमर्स कडून समजत असे.

अशातच एके दिवशी राजू चहावाला घाईघाईने बँकेत शिरला. माझ्या केबिनपाशी येताच दारातच थबकून तो उभा राहिला. काकुळत्या नजरेने माझ्याकडे पहात तो म्हणाला..

sanju chaywala

“आत येण्याची मला मनाई केली आहे तुम्ही.. ठाऊक आहे मला..! पण राहवलं नाही, जीवाला चैनच पडेना म्हणून आलो साहेब तुमच्याकडे.. जास्त वेळ घेणार नाही मी तुमचा.. फक्त पाचच मिनिटं माझं बोलणं ऐकून घ्या..”

त्याच्या डोळ्यातील करुण भाव आणि अजिजीचा स्वर यामुळे मी विरघळलो.. हातानेच त्याला आत येण्याची खूण केली. तो आत येऊन बोलणं सुरू करणार, एवढ्यात त्याला थांबवून मी म्हणालो..

“पण हे बघ.. ! पोलीस स्टेशनची कोणतीही बातमी किंवा निरोप तू मला सांगायचा नाहीस..”

यावर काही न बोलता माझ्याकडे पहात दोन क्षण तो तसाच गप्प उभा राहिला. मग खाली मान घालून म्हणाला..

“आता साहेब.. दिवसभर मी पोलीस स्टेशन मधेच असतो, तेंव्हा बातमीही तिथलीच असणार.. पण मी फक्त तुम्हाला सावध करायला आलोय.. मी तिथे जे ऐकलं, जे पाहिलं तेच मी तुम्हाला सांगतोय.. तुम्ही नीट ऐकून घ्या आणि मग तुम्हाला योग्य वाटेल ते करा..”

“ठीक आहे.. सांग पटकन..!”

त्याला लवकर कटवण्यासाठी मी म्हणालो.

“तो सुखदेव गेले चार दिवस रोज ठाण्यात येतोय. बँकेच्या स्टाफला काहीही करून त्रास देऊन परेशान करा अशी नवीन फौजदार साहेबांना तो सतत विनंती करतोय. त्यांना गळंच घालतोय म्हणा ना ? फौजदार साहेब आधी त्याचं काही ऐकायलाच तयार नव्हते. पण ते खूप लोभी असल्यामुळे सुखदेवने जेंव्हा त्यांना पैशांची लालूच दाखवली तेंव्हा कुठे ते तयार झाले. एक दोन दिवसांत साऱ्या आरोपींना ठाण्यात बोलावून त्यांची चांगलीच हजेरी घेतो असा त्यांनी शब्द दिलाय त्या सुखदेवला..”

इतकं बोलून क्षणभर थांबून राजू पुढे म्हणाला..

“साहेब, हे नवीन फौजदार खूप लालची आहेत. मारहाण करून दहशत पसरवून सर्वच अवैध धंदेवाल्यांचे हप्ते त्यांनी भरपूर वाढवून घेतले आहेत. शिवाय हप्ते घेऊनही वर पुन्हा कोणत्या धंदेवाल्यावर कधी धाड टाकतील याचाही काही नेम नाही. पैशासाठी कोणत्याही थराला जाणारा हा माणूस आहे. त्यामुळे त्याच्यापासून खूप सावध राहा.. बस ! एवढंच सांगायला आलो होतो मी..”

एवढं बोलून मागे वळून कुठेही न बघता वाऱ्याच्या वेगाने राजू निघून गेला.

पोलिसांनी केसचा तपास पूर्ण करून कोर्टात आरोपपत्र (चार्जशीट) सुद्धा दाखल केलं असल्यामुळे त्यांचा आता आमच्या केसशी काहीही संबंध उरला नसल्याची वस्तुस्थिती मला माहित होती. शिवाय आम्ही पाचही जणांनी तसा अटकपूर्व जामीनही मिळवलाच होता. भित्र्या स्वभावाच्या राजूला असं इतरांना घाबरवून टाकण्याची सवयच आहे असं समजून मी त्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्षच केलं. अशातच दोन चार दिवस निघून गेले आणि मी ही गोष्ट पार विसरून गेलो.

त्या दिवशी शनिवार होता. अर्धा दिवसच बँक असल्याने सर्वांना लवकर काम आटोपून घरी जाण्याची गडबड होती. चार साडेचार वाजेपर्यंत आपापलं काम संपवून अर्धा अधिक स्टाफ बँके बाहेरही पडला होता. येवल्याहून जाणं येणं करणारे रहीम चाचा घराकडे निघण्यापूर्वी मला “गुड बाय” करण्यासाठी केबिनमध्ये आले असतांनाच एक महिला पोलीस अधिकारी “आत येऊ का सर ?” असं अदबीने विचारून आत शिरली.

lady police officer

“मी, सब. इंस्पे. वर्षा महाले..! हिवाळे साहेबांच्या जागेवर आले आहे. एका अर्जंट कामाच्या संदर्भात फौजदार राठोड साहेबांनी चेक फ्रॉड केसच्या पाचही आरोपींना ताबडतोब ठाण्यात बोलावले असून तुम्हाला सोबत घेऊन येण्यासाठी मला इथे पाठविले आहे. तेंव्हा तुम्ही तुमची सर्व जण आपापली कामं लवकर आटोपून घ्या, आणि माझ्या सोबत चला. पाहिजे तर तोवर थांबते मी इथेच..”

आम्हाला ठाण्यात नेण्यासाठी नवीन लेडी सब. इंस्पे. स्वतःच बँकेत आल्यामुळे आता अन्य काही उपायच उरला नव्हता. “मुळीच घाबरू नका. पाहू या तरी हे नवीन आलेले फौजदार साहेब काय म्हणतात ते..” असा धीर देत सर्व सहकाऱ्यांना घेऊन मी ठाण्यात गेलो.

आम्ही ठाणे प्रमुखांच्या दालनात शिरताच आम्हाला आपाद मस्तक न्याहाळीत आणि आपल्या टोकदार मिशांवर हात फिरवीत ते जगन राठोड नावाचे दणकट शरीरयष्टी, दमदार आवाज व रापलेला राकट चेहरा असलेले फौजदार म्हणाले..

“या ssss ! कैद्यांची हजेरी घेतोय सध्या मी.. तोपर्यंत तुम्ही या भिंतीला टेकून निमूटपणे एका रांगेत उभे रहा.. तुमच्याकडे मग नीट फुरसतीने बघतोच..!”

police-3

आम्हाला असं कोपऱ्यात उभं रहायला सांगून त्यांनी एकेका कैद्याला बोलावणं सुरू केलं. भीतीने गर्भगळीत झालेल्या एका मध्यम वयाच्या फाटक्या इसमाला धरून आणून त्याला फौजदार साहेबांच्या पुढ्यात उभं करीत तेथील हवालदार म्हणाले..

“साहेब, हा बद्रुद्दीन.. चार फटके खाल्ल्यावर, आतापर्यंत गावातून तीन सायकली चोरल्याचं कबूल केलंय ह्याने..”

“ठीक आहे, उद्या कोर्टात हजर करा ह्याला.. चल..! हात पुढे कर ..!”

फौजदार साहेबांनी असं दरडावताच त्या फाटक्या इसमाने थरथरतच आपला उजवा हात पुढे केला. टेबलावर ठेवलेला विशिष्ट आकाराचा, जेमतेम एक फूट लांबीचा चामड्याचा जाडजूड पट्टा हातात घेऊन फौजदार साहेबांनी पूर्ण ताकदीनिशी सपकन तो त्याच्या तळहातावर मारला. प्रचंड वेदनेने त्या भुरट्या चोराचा चेहरा कसनुसा झाला. त्याच्या कळवळण्याकडे लक्ष न देता निष्ठुरपणे फौजदार म्हणाले..

“चल.. आता दुसरा हात पुढे कर !”

police beating

त्या चोराने घाबरून दुसरा हात पुढे करण्यास किंचित आढेवेढे घेतले तेंव्हा त्यांनी त्याच्या पायावरच त्या आखूड पट्ट्याने सपासप वार केले. शेवटी नाईलाजाने तो अघोरी मार चुकवण्यासाठी त्याने आपला दुसरा हात पुढे केला. फौजदार साहेबांनी यावेळी दात ओठ खाऊन त्या तळहातावर पट्ट्याने पहिल्यापेक्षाही जोरदार प्रहार केला. अतीव वेदनेपायी मारामुळे लालबुंद झालेला तो तळहात त्या सायकल चोराने आपल्या दोन्ही मांड्यांत घट्ट दाबून ठेवला. त्याला धक्का मारून बाजूला सारत फौजदार साहेबांनी पुढच्या कैद्यास बोलावले आणि त्यालाही तशीच अमानुष मारहाण केली. सलग अर्धा तास चाललेली ती कैद्यांची क्रूर, निर्दयी, माणुसकीशून्य मारझोड आम्ही धडधडत्या छातीने बघत होतो.

पोलीस कोठडीतील सर्व कैद्यांची ही यातना परेड आम्हाला घाबरवण्यासाठीच जाणून बुजून आमच्या समोर घेतली जात होती. तसंच आम्हाला बसायलाही न देता दीर्घकाळ तसंच उभं ठेवून आमचा हेतुपुरस्सर अपमानही केला जात होता. तरुण रविशंकर आणि सतरा वर्षे आर्मीत घालवलेला सैनी, हे दोघेही पोलिसांची ही थर्ड डिग्रीची पद्धत पाहून आतून हादरून गेले होते. हळव्या मनाचे रहीम चाचा आणि अल्लड, निरागस बेबी सुमित्रा हे दोघे तर भीतीने थरथरायलाच लागले होते. फौजदार साहेब मधूनच तिरप्या नजरेने आमच्याकडे पहात होते आणि आम्हा सर्वांचे भयचकित चेहरे पाहून हलकेच मिशीतल्या मिशीत हसत होते.

कैद्यांचे यातना सत्र संपल्यावर आमच्याकडे वळून ते म्हणाले..

“आमच्या असं कानावर आलं आहे की पोलिसांनी आमच्या कडून पैसे खाल्ले असं सांगून तुम्ही जनतेत पोलिसांची बदनामी करत आहात.. चार्जशीट दाखल झालं म्हणजे पोलिसांचा संबंध संपला, असं समजू नका. आम्ही चार्जशीट मध्ये कधीही आणि कितीही नवीन, खरी वा खोटी कलमं ॲड करू शकतो. त्याच्या तपासासाठी तुम्हाला ताब्यात घेऊन पोलीस कस्टडीतही ठेवू शकतो. आणि.. आमचा तपास कसा असतो त्याची कल्पना यावी म्हणून आत्ताच एक छोटीशी झलक दाखवली तुम्हाला..”

हातातील लाकडी रूळ आमच्या दिशेने रोखत ते पुढे म्हणाले..

“आपण निर्दोष आहोत असं तुम्हाला कितीही वाटत असलं तरी आमच्या दृष्टीने तुम्हीच दोषी आणि आरोपी आहात. तसं नसतं तर आधीच्या फौजदार साहेबांना तुम्ही प्रत्येकी वीस वीस हजार रुपये दिलेच नसते. काय..? खरी आहे ना आमची माहिती ?”

फौजदार साहेबांनी दरडावून विचारलेल्या या प्रश्नावर रहीम चाचांनी घाबरून होकारार्थी मान डोलावली.

“आज आपली पहिलीच भेट होती म्हणून वॉर्निंग देऊन एवढ्यावरच सोडतोय. यापुढे जेंव्हा जेंव्हा पोलीस स्टेशनचं बोलावणं येईल तेंव्हा तेंव्हा वेळ न घालवता ताबडतोब इथे हजर व्हायचं. तसंच जसे पूर्वीचे फौजदार गेले तसेच त्यांना तुम्ही दिलेले पैसेही त्यांच्या बरोबरच गेले. आता तुम्हाला आम्हा नवीन आलेल्यांची सोय सुद्धा पहावी लागेल. तुम्ही तसे समजदार आहात.. मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजलं असेलच.. जाऊ शकता तुम्ही आता.. !!”

काही न बोलता खाली मान घालून आम्ही पोलीस स्टेशन बाहेर पडलो. आमच्या मागे लागलेली ही पोलिसांची साडेसाती काही केल्या संपत नव्हती.

फौजदार साहेबांनी केलेल्या दमदाटीमुळे धसका घेऊन हळव्या, कोवळ्या मनाची बेबी सुमित्रा आजारीच पडली. तर रहीम चाचांचा रक्तदाब वाढल्याने त्यांनाही येवल्यातील दवाखान्यात भरती करावे लागले. इथल्या रोजच्या टेन्शनला वैतागून सैनी पंधरा दिवसांची सुटी टाकून दिल्ली येथील आपल्या बायका पोरांना भेटायला निघून गेला.

पोलिसांच्या या त्रासापासून कायमची मुक्तता कशी करून घ्यावी याबद्दल अहोरात्र विचार करीत असतानाच एके दिवशी आपल्या गृहकर्जाचा हप्ता भरण्यासाठी DySP संगीता मॅडम बँकेत आल्या. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर मी त्यांना फौजदार राठोड साहेबांनी स्टाफला विनाकारण पोलीस स्टेशनमध्ये बोलावून केलेल्या दमदाटी बद्दल सांगितलं. परिणामतः स्टाफच्या बिघडलेल्या मनःस्थिती बद्दलही त्यांना अवगत केलं. आमच्या सहनशक्तीचा कडेलोट झाल्याने आता थेट डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस (DGP) यांच्याकडेच दाद मागणार असल्याचे मी त्यांना सिरियसली सांगितलं. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) तसेच देशाचे व राज्याचे गृहमंत्री यांच्याकडेही पोलिसांच्या असंवेदनशील वागणुकीबद्दल फिर्याद करणार असल्याचा निर्धारही व्यक्त केला.

माझी ही तयारी, हा कृतनिश्चय पाहून DySP मॅडम अंतर्यामी किंचित भयभीत झाल्या. मी बोलल्याप्रमाणे केल्याशिवाय राहणार नाही याची त्यांना मनोमन खात्री पटली. मी वर पर्यंत तक्रार केल्यास कदाचित चौकशीतून पोलिसांच्या आणखीही काही भानगडी बाहेर येतील याची त्यांना बहुदा भीती वाटली असावी. (खुद्द DySP मॅडमनी सुद्धा पुण्यातील दोन कोटींच्या फ्लॅटची किंमत फक्त 80 लाख रूपये इतकी दाखवून आमच्या बँकेकडून साठ लाख रुपयांचे दिखाऊ कर्ज घेतले होते..) माझी समजूत घालून मला शांत करून आश्वस्त करीत त्या म्हणाल्या..

“पोलिसांच्या या कृत्याबद्दल मी खेद व्यक्त करते. फौजदार साहेबांची त्यांच्या या कृत्याबद्दल चांगलीच कानउघाडणी करेन मी. यापुढे तुम्हाला किंवा तुमच्या कोणत्याही स्टाफला पोलिसांकडून कसलाही त्रास होणार नाही असाही मी शब्द देते. तुम्ही आतापर्यंत दिलंत तसंच सहकार्य यापुढेही द्या आणि कृपा करून सध्या तरी पोलिसांविरुद्ध कोणतीही तक्रार करू नका.. मी विनंती करते तुम्हाला..”

DySP मॅडमनी खरोखरीच आपला शब्द राखला. त्यानंतर कधीही पोलिसांकडून आम्हाला कसलाही त्रास झाला नाही. उलट सुखदेवलाच पोलिसांनी अपमान करून पोलीस स्टेशनमधून हाकलून लावले असेही आम्हाला खात्रीलायकरित्या समजले.

बेबी सुमित्राने, कसेही करून वैजापूरहुन बदली करून घ्यायचीच असा आता चंगच बांधला. औरंगाबाद येथील त्यांच्या संघटनेच्या लिडर्सनी देखील यासाठी अनुकूलता दर्शविल्याने ती उत्साहित होऊन कामाला लागली. Request transfer application तसेच स्थानिक नेत्यांमार्फत हैदराबाद येथील संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधणे यासाठी ती वारंवार औरंगाबादला जाऊ लागली.

रविशंकरची ट्रान्सफर ऑर्डर रिव्हाईज होऊन आता त्याची बदली बीड जिल्ह्यातीलच “शिरसाळा” या गावी झाली. हे गावही तसं आडमार्गालाच असलं तरी वैजापूर पोलिसांच्या त्रासाला कंटाळून त्याने शिरसाळ्याला जाणेच इष्ट समजले. रविशंकर गेल्यानंतर लगेच पुढच्याच महिन्यात रहीम चाचांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ झाला. त्यापाठोपाठ सैनीची बदली परभणी जिल्ह्यातील आष्टी इथे झाल्यामुळे त्यालाही ताबडतोब रिलिव्ह करावे लागले. अशाप्रकारे मी व बेबी सुमित्रा असे बनावट चेकच्या केस मधील दोनच आरोपी वैजापूर शाखेत उरलो.farewell

बेबी सुमित्रा औरंगाबाद मधील ज्या नेत्यांना भेटायला जायची त्यापैकी एका नेत्याबद्दल फारसं चांगलं बोललं जात नसे. मी बेबी सुमित्राला त्याबद्दल अनेकदा सावधगिरीचा इशाराही दिला होता. मात्र, एकदा गावाकडे बदली झाली की मग या फालतू लिडर्सना भेटण्याची गरजच पडणार नाही.. असा विचार करून तिने त्या इशाऱ्याकडे जास्त लक्ष दिलं नाही.

एका शनिवारी दुपारी नेहमीप्रमाणेच संघटनेच्या नेत्याला भेटायला औरंगाबादला गेलेली बेबी त्याच रात्री खूप उशिरा परत आली ती अत्यंत उद्विग्न, संतप्त, उध्वस्त मनःस्थितीतच.. वैजापूर शाखेतच काम करणाऱ्या शांतिप्रिया नावाच्या आपल्या बिहारी मैत्रिणी सोबतच एका खोलीत ती रहायची. शांतिप्रियाच्या म्हणण्यानुसार, औरंगाबादहुन आल्यापासून ती उशीत तोंड खुपसून सतत हमसून हमसून रडत होती. कितीही खोदून खोदून विचारलं तरीही नेमकं काय झालं आहे, ते ती कुणालाही सांगत नव्हती.sad woman-1

रविवार आणि सोमवार हे दोन्ही दिवस बेबी उदासपणे खोलीतच बसून होती. सोमवारी दुपारी शांतिप्रियाला सोबत घेऊन तिला भेटायला तिच्या रूमवर गेलो तेंव्हाही ती तशीच शून्यात पहात बसली होती. अल्लड, मिश्किल, चुलबुल्या खोडकर स्वभावाच्या बेबीची ती अवस्था पाहून माझ्या काळजात कालवाकालव झाली. तिला बोलतं करण्याचे माझे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. हताश होऊन मी बँकेत परतलो. माधुरी आणि मीनाक्षी या शाखेत काम करणाऱ्या अन्य दोघींना बेबीची काळजी घ्या, सतत तिच्या सोबत राहून तिला धीर द्या असं सांगितलं. त्या दिवशी रात्रभर बेबीच्या काळजीमुळे मला झोप आली नाही. सारखा तिचा तो उदास, भकास चेहरा नजरेसमोर येत होता. काय झालं असावं बेबी सोबत औरंगाबादला ? कुणी अतिप्रसंग तर केला नसेल तिच्यावर ? असे विचार सारखे डोक्यात घुमत होते.

मंगळवारी सकाळी बेबी सुमित्रा बँकेत आली तेंव्हा ती बरीच सावरलेली दिसत होती. आल्या आल्या तिने माझ्या टेबलावर आपला राजीनामा ठेवला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे राजीनामा देत असून पुरेशा अवधीची नोटीस न दिल्यामुळे नियमानुसार एक महिन्याचा पगार माझ्या खात्यातून कापून घ्यावा असे त्यात नमूद केले होते. आजच दुपारी मनमाडला जाऊन तेथूनच पुढे छत्तीसगडला जाणारी गाडी पकडणार असल्याचे ती म्हणाली. ठाम निश्चय करून आलेल्या बेबीने कुणाचेही काहीही ऐकून घेण्यास नम्रपणे नकार दिला. सर्वांना भेटून नमस्कार करून साधा सेंड ऑफ ही न घेता बेबी निघाली.sad woman-2

योगायोगाने वैजापूर शाखेची कॅश व्हॅन त्याचदिवशी दुपारी मनमाड शाखेतील अतिरिक्त कॅश आणण्यासाठी मनमाडला जाणार होती. त्याच व्हॅनमध्ये बेबीला तिच्या सामाना सहित बसवलं. शाखेतील बेबीचे दोन समवयस्क कर्मचारी मित्र देखील तिला मदत करण्यासाठी व्हॅन सोबत गेले. बेबीला हात हलवून निरोप देऊन परत शाखेत आलो तेंव्हा तिची ती रिकामी खुर्ची पाहून chairतिचा तो सदोदित प्रफुल्लित आनंदी चेहरा, त्या मिश्किल कॉमेंट्स, ते निरागस निर्मळ हास्य हे सारं सारं आठवलं..giggling woman

भूल जा अब वो मस्त हवा,

वो उड़ना डाली डाली..

जग की आंख का कांटा बन गई,

चाल तेरी मतवाली..

तेरी किस्मत में लिखा है,

जीते जी मर जाना..

क्या जाने अब इस नगरी में,

कब हो तेरा आना..

चल उड़ जा रे पंछी,

कि अब ये देस हुआ बेगाना..

lonely bird

या ओळी आठवल्या आणि डोळे नकळत भरून आले..

(क्रमशः)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १४   भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 

Mind blowing experiences of a Banker-14 एका बँकरचे थरारक अनुभव-14

bank office

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 14)

मुंबईहून वैजापूरला परतल्यावर बँकिंग ओंबड्समन कार्यालयातील केसच्या सुनावणीचा निकाल लगेच रिजनल ऑफिस आणि झोनल ऑफिसला पाठवून दिला.

लोकपालांनी आधी दिलेला प्रतिकूल निकाल व तो बदलून अनुकूल निकाल मिळविण्यासाठी कराव्या लागलेल्या प्रयत्नांबद्दल या दोन्ही वरिष्ठ कार्यालयांना काहीच कल्पना नसल्याने त्यांच्याकडून निकालाबद्दल कोणतीही अनुकूल वा प्रतिकूल प्रतिक्रिया किंवा साधी विचारणाही करण्यात आली नाही, .. मग अभिनंदन वा कौतुक करणं तर दूरच.. ! अर्थात मला त्याची अपेक्षाही नव्हती. सरकारी यंत्रणांना चुकीची व अर्धवट माहिती पुरवून, त्यांची दिशाभूल करून त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळवायचा आणि आपला कुटील हेतू साध्य करायचा हा सुखदेवचा धूर्त प्रयत्न निदान काही काळापुरता तरी थोपवता आला याचंच मला समाधान होतं.

याच दरम्यान वैजापुरातील एका वजनदार राजकीय पुढाऱ्याने ईद-मिलन निमित्त आपल्या घरी शिर खुरम्याचे आयोजन केले होते. बँकेच्या साऱ्याच स्टाफला आग्रहाचे निमंत्रण असल्याने आम्ही सारे एकत्रच संध्याकाळी त्या कार्यक्रमात सहभागी झालो होतो. शहरातील सर्वच स्तरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, उच्च पदस्थ सरकारी अधिकारी, प्रथितयश व्यावसायिक, व्यापारी, पत्रकार, वकील आदींनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पोलीस खात्याचे अधिकारी व कर्मचारी देखील साध्या वेशात कार्यक्रमास उपस्थित होते.

या कार्यक्रमात गप्पांच्या ओघात “बँकेला पाच लाख ऐंशी हजार रुपयांचा गंडा घालून फरार झालेल्या अज्ञात इसमाचा पोलिसांनी अद्याप तपास का लावला नाही ?” असा प्रश्न कुणीतरी उपस्थित केला. आणि मग जमलेल्या जवळ जवळ सर्वच निमंत्रितांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल व त्यांच्या प्रामाणिक हेतू बद्दल शंका प्रदर्शित केली. पोलीस जाणूनबुजून या केसचा तपास करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत असेच सर्वांचे मत पडले. कार्यक्रमास आलेले सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी नागरिकांनी त्यांच्यावर केलेली ही टीका व निंदा नालस्ती खाली मान घालून निमूटपणे ऐकत होते.

कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी दुपारी चार वाजता चार पोलीस हवालदार व सब. इंस्पे. हिवाळेंना सोबत घेऊन फौजदार साहेबांनी बँकेत प्रवेश केला. आल्या आल्याच त्यांनी मुख्य गेटवरील सिक्युरिटी गार्डशी विनाकारण धक्काबुकी करून वर उद्धटपणे बाचाबाचीही केली. कर्ज विभागातील टेबलवर ठेवलेली पीक कर्जाची डॉक्युमेंट्स त्यांनी हवेत भिरकावून खाली फेकून दिली. कामाची रजिस्टर्स ठेवलेलं रॅक हलवून रजिस्टर्सची पाडापाड केली. फिल्ड ऑफिसरच्या टेबलावरील टेबल क्लॉथ भर्रकन खेचून वरची काचही फोडली.ransacking

एखाद्या सराईत गुंडांच्या टोळीप्रमाणे कायद्याच्या रक्षकांचा बँकेत चाललेला हा धुमाकूळ पाहून आम्ही सारे एकदम अचंभितच झालो. स्टाफला अत्यंत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत, कॅश केबिन व काऊंटर्सच्या पार्टिशनवर हातातील लाकडी दंडुक्याने प्रहार करीत त्यांचा हा दहशतवादी हल्ला सुरू होता. आणि हे करताना त्यांची खालीलप्रमाणे अखंड बडबड चालू होती..

police officers

“पोलिसांचा तपास अतीसंथ गतीने सुरू आहे काय..?.. पोलीस सुस्तावले आहेत काय.. ? ..जाणून बुजून तपासात दिरंगाई करतात काय.. ? दाखवतोच तुम्हाला आता पोलिसांचा तपास कसा असतो ते..!”

पोलिसांचा हा आक्रस्ताळेपणा असह्य होऊन मी केबीन बाहेर आलो आणि त्यांना उद्देशून मोठ्याने ओरडलो..

“अरे हा काय तमाशा चालवला आहे तुम्ही.. ! तुमच्या वरिष्ठांकडे तक्रार करेन मी तुमच्या ह्या दांडगाई बद्दल.. तसंच सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल तुमच्याविरुद्ध गुन्हा ही दाखल करण्यास सांगेन त्यांना.. !!”

माझ्या त्या ओरडण्याचा पोलिसांवर काहीच परिणाम झाला नाही. उलट खुद्द फौजदार साहेबच हॉल मधूनच माझ्याकडे पहात मोठ्याने म्हणाले..

“वरिष्ठांच्या आदेशानुसारच आम्ही वेगाने तपास सुरू केला आहे..”

त्यांच्या जवळ जात मी म्हणालो..

“तुम्ही अशी नासधूस का चालवलीय..? तुम्ही काय शोधताय ते सांगा, म्हणजे आम्हालाही काही मदत करता येईल..”

दोन्ही हात कमरेवर ठेवून माझ्याकडे रोखून पहात फौजदार साहेब म्हणाले..

“आम्ही तो चेक बुक मागणीचा अर्ज शोधतोय.. जो बँकेला सापडत नाहीये..”

मी म्हणालो..

“अहो.. ! पण तो अर्ज तर कुठेतरी गहाळ झाला आहे.. आम्ही कोपरा न कोपरा शोधला आहे बँकेचा..”

त्यावर खुनशीपणे हसत फौजदार म्हणाले..

“मग..? आत्ता कसं..? अहो, टीचभर कागदाचा तुकडा शोधता येत नाही तुम्हाला सात महिन्यांपासून आणि आणि आम्ही मात्र एवढ्या मोठ्या गुन्ह्याचा छडा लावायचा.. तो ही म्हणे वेगाने.. ! ते काही नाही, आम्ही तुमच्या टेबलावरील आणि कपाटातील सर्व रजिस्टर्स आणि कागदपत्रं जप्त करून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाणार आहोत आणि तिथे त्या गहाळ अर्जाचा शोध घेणार आहोत. तसंच, आम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या स्टाफ पैकी एकदोन जणांना सुद्धा धरून सोबत घेऊन जाणार आहोत..”

हतबुद्ध होऊन आम्ही सारे फौजदार साहेबांचा तो निर्बुद्ध तर्क ऐकत होतो.

पोलीस बँकेत असा हैदोस घालत असताना स्टाफ पैकी काही जणांनी मोबाईल मध्ये त्याचं व्हिडीओ शूटिंग केलं. हॉल मधील काही कस्टमर्सनी सुद्धा हा प्रकार त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला. काही High Value व influential कस्टमर्सनी तर ताबडतोब Addl. DSP साहेबांना फोन करून त्यांना बँकेत चाललेल्या गोंधळाची माहिती दिली.

एखाद्या चिडखोर आणि हट्टी मुलासारखे पोलिसांचे ते बालिश चाळे पाहून माझ्या संयमाचा बांध आता फुटण्याच्याच बेतात होता, इतक्यात Addl DSP साहेबांनी डीवायएसपी मॅडम सह बँकेत प्रवेश केला.

फौजदार साहेबांना आपला फौजफाटा घेऊन ताबडतोब परत जाण्यास सांगून ती दुक्कल माझ्या केबिन मध्ये येऊन बसली. DySP मॅडम म्हणाल्या..

“वैजापूरच्या नागरिकांनी औरंगाबादच्या कमिशनर साहेबांकडे इथल्या पोलिसांबद्दल तक्रार केली आहे. बँकेच्या केसचा तपास करण्यात पोलीस ढिलाई करीत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही त्याच संदर्भात तुम्हाला भेटण्यासाठी आलो आहोत. पोलिसांकडून तुमच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत ?”

एक खोल निःश्वास सोडून मी म्हणालो..

“खरं सांगू..? पोलिसांनी या केसमध्ये अद्याप काडीचाही तपास केलेला नाही. पैसे काढून नेणाऱ्या व्यक्तीचा तांतडीनं शोध घेणं अपेक्षित होतं. पण अद्याप पोलिसांनी त्या व्यक्तीचे साधे फोटोसुद्धा आसपासच्या जिल्ह्यातील पोलीसांकडे तपासासाठी पाठविले नाहीत अशी आमची माहिती आहे. त्या रुपेशला सुद्धा आम्हीच पकडून दिलं. पण पोलिस त्याला साधं बोलतं सुद्धा करू शकलेले नाहीत.”

“चेक वरील बनावट सही ही रुपेशनेच केली आहे हे आम्ही पहिल्यापासूनच सांगत आलो आहोत. पण पोलिसांनी तपासासाठी रुपेशच्या हस्ताक्षराचा नमुनाही अद्याप घेतलेला नाही. तसेच जर आमच्यापैकी कुणी ती बनावट सही केली आहे असा पोलिसांचा संशय असेल तर आमच्या हस्ताक्षराचे नमुने सुद्धा पोलिसांनी गोळा करून ते हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवायला हवे होते. चेक वरील सहीचा खरेपणा तपासण्यासाठी पोलिसांनी पुण्याच्या फोरेन्सिक लॅबला चेक व सहीचा नमुना पाठविला होता. परंतु आता सात महिने होत आले तरी अद्याप त्या लॅबचा रिपोर्ट पोलीस प्राप्त करू शकलेले नाहीत.”

माझ्या त्या स्पष्टोक्तीवर DySP मॅडम काहीच बोलल्या नाहीत. मात्र Addl. DSP साहेब खुर्चीवरून उठत म्हणाले..

“ठीक आहे..! उद्या त्या रुपेशच्या हस्ताक्षराचे नमुने घेण्याबद्दल मी फौजदार साहेबांना सांगतो. पोलिसांच्या आजच्या वर्तनाबद्दल आमच्या खात्याच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो. पोलिसांवर आधीच कामाचा खूप ताण असतो. त्यातून लोकांचं ऐकून वरिष्ठांनी जर कानउघाडणी केली तर निराशा आणि संतापाच्या भरात कधी कधी असं कृत्य घडतं त्यांच्या हातून..”

Addl DSP व DySP मॅडमची जोडी बँकेतून निघून गेल्यावर लगेच स्टाफची छोटीशी मिटिंग घेतली. काही कस्टमर सुद्धा या बैठकीत हजर होते. पोलिसांच्या आजच्या वर्तनाचा सर्वांनीच निषेध केला आणि वरिष्ठ कार्यालयाला ही घटना कळवून स्टाफला संरक्षण पुरविण्याची मागणी करावी असे सर्वांचे म्हणणे पडले. त्यानुसार सर्वांच्या सहीने एक निवेदन तयार करून ते क्षेत्रीय कार्यालयाला पाठवून दिले. जमलेल्या कस्टमर्सनी सुद्धा या निवेदनावर उस्फूर्तपणे सह्या केल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताच पोलिसांचं एक पथक स्टाफच्या हस्ताक्षराचे नमुने घेण्यासाठी बँकेत येऊन ठेपलं. एक मराठी भाषेतील प्रिंटेड पेज आम्हा पाचही जणांना देण्यात आलं आणि कोऱ्या कागदावर ते चार वेळा लिहून काढण्यास सांगण्यात आलं. विशेष म्हणजे रुपेशला सुद्धा पोलिसांनी बँकेतच आणलं होतं आणि आमच्या समोरच त्यांनी त्याच्या हस्ताक्षराचे नमुने घेतले.

“ती” बनावट सही रुपेशनेच केली आहे याबद्दल आमच्या कुणाच्याच मनात किंचितही शंका नव्हती. त्यामुळेच रुपेश हस्ताक्षराचे नमुने देताना आम्ही सारे लक्षपूर्वक त्याचे निरीक्षण करीत होतो. आपण आता पुरते अडकलो आहोत याची रुपेशला पुरेपूर जाणीव झाल्याने या हस्ताक्षर चाचणीच्या दिव्यातून सुटण्याची त्याची केविलवाणी धडपड सुरू झाली.

हस्ताक्षराचे नमुने देताना वेलांटी व उकार यातील ऱ्हस्व दीर्घच्या रुपेश जाणून बुजून चुका करीत होता. एका पानावर सर्व उकार व वेलांट्या ऱ्हस्व काढायचा तर दुसऱ्या पानावर तोच मजकूर लिहिताना सर्व उकार, वेलांट्या दीर्घ काढायचा. तिसऱ्या पानावर ऱ्हस्व दीर्घ अक्षरे मिक्स करायचा तर चौथ्या पानावर काना, मात्रा, वेलांटी, उकार इत्यादी एकतर गाळायचा किंवा डबल डबल लिहायचा.

सर्वांची चार चार पाने लिहून झाल्यावर ती गोळा करतांनाच सब. इंस्पे. हिवाळे बँकेत आले. चार पानांऐवजी फक्त दोनच पाने गोळा करा असे त्यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांना दोन पाने देऊन बाकीची पाने आम्ही आमच्या जवळच ठेवली. रुपेशने लिहिलेली जादाची दोन पाने देखील आम्ही आमच्या जवळच ठेवून घेतली. ही पाने अजूनही बँकेतच आहेत आणि दोन्ही पानांत रुपेशने सर्वच अक्षरांतील वेलांटी, उकार जाणून बुजून परस्परांच्या अगदी विरुद्ध काढले आहेत हे अगदी सहज पाहिलं तरी ध्यानात येतं.

मुंबईहून परत आल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी बँकेच्या हेड ऑफिस मधील एक अधिकारी चौकशीसाठी शाखेत आले. Banking Ombundsman (लोकपाल) कडील केस हरण्या मागील कारणे त्यांना माहीत करून घ्यायची होती. आपण केस हरलेलो नाही हे जेंव्हा त्यांना सांगितलं तेंव्हा त्यांनी मुंबई झोनल ऑफिसने पाठविलेला मेसेज दाखविला. लोकपालांनी आधीचा निकाल बदलल्याचे मुंबई झोनल ऑफिसच्या दुभाषी साहेबांना माहिती नसल्याने हा गोंधळ झाला होता. वस्तुस्थिती समजताच चौकशी गुंडाळून आणि जवळच असलेल्या शिर्डी येथील साईबाबांचे दर्शन घेऊन ते हेड ऑफिसचे अधिकारी परत हैदराबादला निघून गेले.

दोन दिवसांनी दुभाषी साहेबांचा फोन आला. लोकपाल केसच्या निकाला संदर्भात चुकीची माहिती कळवल्याबद्दल त्यांना हेड ऑफिसची चांगलीच बोलणी खावी लागली होती. “त्या दिवशी तुमच्या बरोबर न राहता फॅमिली सोबत वेळ घालवणं खूप महागात पडलं..” असं ते म्हणाले. मात्र लोकपालांनी निकाल बदलल्याचं ऐकून त्यांना जसं खूप आश्चर्य वाटलं तसाच आणि तितकाच आनंदही झाला. माझं मनःपूर्वक आणि भरगच्च अभिनंदन करून त्यांनी फोन ठेवला.

सुखदेवनं ग्राहक मंचात त्याची केस लढण्यासाठी जे वकील लावले होते ते खूप लालची आणि धूर्त होते. दुप्पट नुकसानभरपाई मिळवून देतो असं सांगून सुखदेवला ते चांगलंच बनवीत होते. नंतरच्या काही तारखांना ते कोर्टात हजर न राहिल्याने सारख्या पुढील तारखा पडत गेल्या आणि केसची सुनावणी लांबत गेली. अर्थात केसला असा उशीर होणं आमच्या दृष्टीने एक प्रकारे चांगलंच होतं.

बघता बघता एक वर्ष उलटून गेलं. वैजापूरच्या कोर्टातील फौजदारी केस अद्याप सुनावणीसाठी बोर्डावरच आली नव्हती. रहीम चाचांच्या रिटायरमेंटची तारीख जवळ येत चालली होती. केसची सुनावणी सुरू होताच न्यायाधीश ताबडतोब आपली निर्दोष सुटका करतील अशी त्यांची भाबडी कल्पना होती. त्यामुळे त्यांनी केस लढण्यासाठी स्वतःचा एक स्वतंत्र वकीलही नेमला होता. आपल्या रिटायरमेंट पूर्वीच केसचा निर्णय व्हावा अशी त्यांची तीव्र इच्छा होती.

आम्हा सर्वांच्या वैयक्तिक आयुष्यात ही आर्थिक, शारीरिक, मानसिक व कौटुंबिक अडचणींची मालिका अखंड सुरूच होती. रविशंकरच्या आईला कॅन्सर डिटेक्ट झाल्यामुळे त्याला तिच्या ट्रीटमेंटसाठी वारंवार मुंबईला जावं लागत होतं. वडिलांना हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांची एकुलती एक संतान असलेल्या बेबी सुमित्राचे छत्तीसगडच्या आसपास बदलीसाठी निकराचे प्रयत्न चालू होते. त्यासाठी “एस सी एस टी वेलफेअर ऑर्गनायझेशन” या त्यांच्या संघटनेच्या औरंगाबाद येथील लिडर्स कडे तिचं वारंवार चकरा मारणं सुरू झालं होतं. सैनीच्या दिल्ली येथे राहणाऱ्या एकत्र कुटुंबातील घरगुती वाद पराकोटीच्या विकोपाला गेले होते. तो सतत फोनवर आपल्या कुटुंबियांना धीर देत तासनतास बोलत राही.

माझा अनियंत्रित डायबेटीसही पुन्हा उफाळून आला होता. बँकेतच भोवळ येऊन पडल्यामुळे अनेकदा मला वैजापुरच्या डॉक्टरांकडे न्यावे लागले होते.

56345151

“हे सर्व कामाच्या ताणामुळे होतंय.. मी पाहतोय की तुम्ही रोज रात्री उशिरापर्यंत काम करीत असता.. सतत बँकेबद्दल, कामाबद्दल काळजी करणं, विचार करणं सोडून द्या आणि कमीतकमी महिनाभर तरी सुटी घेऊन आराम करा. कामं तर काय होतच राहतील, आणि ती कधी संपणारही नाहीत.. अधून मधून आपल्या प्रकृतीकडेही लक्ष देणं महत्वाचं आहे.. तुमच्या स्वतःसाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी.. “

वैजापुरातील माझे डॉक्टर मित्र श्री. सुरेश जोशी नेहमी मला असा कळवळीचा सल्ला देत असत. मी त्यांच्यासमोर तेवढ्यापुरती मान डोलावीत असे आणि पुन्हा बँकेत येऊन कामात बुडून जात असे.

बँकेच्या कर्मचाऱ्यांना हर प्रकारे त्रास देऊन आपण सहज भरपूर पैसे उकळू शकू ही सुखदेवची समजूत पार खोटी ठरली होती. पोलीस, पत्रकार, वकील, रिकाम टेकडे स्थानिक राजकीय नेते आणि गुंड प्रवृत्तीची मित्र मंडळी ह्यांना पोसण्यात त्याचा बराच पैसा खर्च झाला होता. बँकेकडून पैसे मिळण्यास जसा जसा उशीर होत होता तसा तसा त्याचा धीर सुटत चालला होता. काय वाट्टेल ते करून निदान ग्राहक मंचामार्फत तरी बँकेकडून ताबडतोब चेकचे पैसे वसूल व्हावे यासाठी त्याने त्याच्या वकिलांकडे धोशा लावला होता.

अतिशय शांत, मृदुभाषी आणि कायद्याचं सखोल ज्ञान असणारे आमचे वकील ॲड. ऋतुराज ग्राहक मंचाची केस अतिशय उत्तम प्रकारे लढत होते. “चेकवरील सही बनावट असल्याचं सिद्ध झालं तरी देखील येनकेन प्रकारे आपण ही केस आणखी दीर्घ काळ पर्यंत लांबवू शकतो. मात्र असं करण्याऐवजी सुखदेवशी सन्माननीय तडजोड करून प्रकरण मिटवणंच जास्त योग्य राहील” असं त्यांचं प्रामाणिक मत होतं..

अशातच एके दिवशी हैदराबादच्या सेंट्रल फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (CFSL) कडे आम्ही पाठविलेल्या चेक वरील सही बद्दलचा हस्ताक्षर चाचणी अहवाल पोस्टाने प्राप्त झाला..

“चेक वरील सही खातेदाराने केलेली नसून बनावट (forged) आहे”

असा त्या अहवालाचा स्पष्ट निष्कर्ष होता.

(क्रमश:)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १३  भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 

Mind blowing experiences of a Banker-13 एका बँकरचे थरारक अनुभव-13

rbi guards

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 13)

लोकपाल मॅडमनी दिलेला तो प्रतिकूल निकाल ऐकल्यापासून माझ्या हातपायातील त्राणच जणू नाहीसं झालं होतं. निकालाचा लिफाफा यंत्रवत हातात धरून मी तसाच रिसेप्शन काउंटर जवळ निर्जीवपणे उभा होतो. स्नेहलता मॅडमनी आधी दुरून, हातानेच खुणावून “काय झालं ?” असं विचारलं. पण माझ्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर त्यांना निकालाचा अंदाज आला असावा. बहुदा म्हणूनच आपुलकीने, सहानुभूती व्यक्त करून माझं सांत्वन करण्यासाठीच त्या मला त्यांच्याजवळ बोलावीत होत्या.

मी तसाच खिन्न, सुन्न, बधिर होऊन उभा असतांनाच लोपामुद्रा सेनगुप्ता मॅडम त्यांच्या चेंबर मधून बाहेर आल्या. स्नेहलता मॅडम जवळ जाऊन त्या म्हणाल्या..

“स्नेहा, खूप खुश आहे मी आज..! एकतर, न्यायासाठी झगडणाऱ्या एका सामान्य, गरीब कुटुंबाला त्वरित न्याय मिळवून देऊन त्यांच्या सदिच्छा व आशीर्वाद मिळवले.. आणि दुसरं म्हणजे माझी ही शेवटची केस खूपच लवकर, अगदी एकाच हिअरिंग मध्ये निकाली निघाली. त्यातही, मनासारखा निर्णय देता आल्यामुळे खूप आनंद आणि समाधान सुद्धा प्राप्त झालंय आज मला..”

सेनगुप्ता मॅडम अस्खलित मराठी भाषेत बोलत होत्या. मुंबईतच लहानाच्या मोठ्या झाल्यामुळे त्यांना छान मराठी बोलता येतं, हे स्नेहलता मॅडमनी मला आधीच सांगितलं होतं. उत्साहाच्या भरात लोकपाल मॅडम आपलं पद विसरून मैत्रिणीशी मनमोकळ्या गप्पा मारीत होत्या..

“अगं, मी त्या बँक मॅनेजरला असं काही खडसावलं की बिचारा काही न बोलता गप्पच बसला. आणि मग मी चट्कन निकाल देऊन टाकला. बरं ते जाऊ दे.. ! मी आता रिक्रिएशन रूम मध्ये जाऊन जरा आराम करणार आहे. मला जरा शांतता हवी आहे. थोडा वेळ मला कुणीही डिस्टर्ब करू नका.. मग.., दुपारी चार वाजता तुमचं ते फेअरवेल फंक्शनही आहे.. हो ना ? काय..! देणार आहात ना सेंड ऑफ मला ?”

एवढं बोलून लोपामुद्रा मॅडम रिक्रिएशन रूम कडे जाण्यासाठी वळल्या तोच त्यांची नजर माझ्यावर पडली. माझ्याबद्दल त्यांनी काढलेले हेटाळणीचे अनुदार बोल मी नक्कीच ऐकले असावेत याची जाणीव झाल्याने क्षणभर त्या ओशाळल्या. पण मग लगेच स्वतःला सावरून घेत, चेहऱ्यावर कठोर भाव आणीत रिसेप्शनिस्ट मॅडमला त्या म्हणाल्या..

“साधना sss ! ज्यांचं काम झालं असेल त्यांना इथून जायला सांग. कामाशिवाय कुणीही इथे बसता कामा नये..”

लोकपाल मॅडमची ही सूचना माझ्यासाठीच होती हे न समजण्या इतका मी खुळा नव्हतो. त्यामुळेच आता स्नेहलता मॅडम कडे जावं की न जावं या संभ्रमात असतानाच जागीच उभं राहून आग्रही स्वरात सुपरिन्टेंडेंट मॅडम म्हणाल्या..

“अहो, या नं तुम्ही..! मला बोलायचंय तुमच्याशी..”

निमूटपणे मी स्नेहलता मॅडमच्या टेबला समोरील खुर्चीत जाऊन बसलो.

“बघू, काय निकाल दिलाय लोकपाल मॅडमनी..?”

माझ्या हातातील लिफाफ्याकडे पहात त्या म्हणाल्या. मी चुपचाप तो लिफाफा त्यांच्या पुढ्यात ठेवला. लिफाफ्यातील निकालाचा कागद बाहेर काढून त्यांनी तो लक्षपूर्वक वाचला. मग माझ्याकडे रोखून पहात त्या म्हणाल्या..

“हं..! मग आता पुढे काय करायचं ठरवलंत..?”

“मी याबद्दल काहीच विचार केलेला नाही. खरं म्हणजे खूप तयारी करून आलो होतो मी. माझ्याजवळची कागदपत्रं आणि तर्कसंगत युक्तिवाद यांच्या जोरावर मी लोकयुक्तांना सत्य परिस्थिती समजावू शकेन, फिर्यादीचा खरा चेहरा त्यांच्यापुढे उघड करू शकेन असा पूर्ण आत्मविश्वास होता मला.. ! पण.. मॅडम काही ऐकून घ्यायच्या मूड मध्येच नव्हत्या. त्यामुळे नाईलाजानं मी गप्प बसलो..”

“ओके, ओके.., होतं असं कधी कधी.. !” स्नेहलता मॅडम मला धीर देत म्हणाल्या..

“मी तुम्हाला सकाळीच म्हटलं होतं ना की दुर्दैवाने तुमची केस चुकीच्या वेळी आलीय मॅडम पुढे म्हणून.. ! बरं, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंत तुम्ही..? आता पुढे काय करणार आहात ?”

या मॅडम मला वारंवार हा एकच प्रश्न का विचारत आहेत हेच मला कळत नव्हतं.

“मॅडम, हे सगळं एवढं तडकाफडकी झालंय की मला काहीच सुचत नाहीय. आता, ह्या निकालाबद्दल वरिष्ठांना कळवायचं आणि पुढे ते सांगतील तसं करायचं बहुदा एवढंच आहे माझ्या हातात..”

हताश स्वरात मी उत्तरलो..

“मॅडम, अपील करता येतं का हो या निकालाविरुद्ध ?”

खोल गेलेल्या स्वरात, उगीच काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं..

“अर्थातच ! रिझर्व्ह बॅंकेच्या डेप्युटी गव्हर्नरकडे 30 दिवसांच्या आत तुम्ही या निकालाविरुद्ध अपील करू शकता. पण त्यासाठी तुमच्या बँकेच्या CMD, ED किंवा CEO यांची आधी मंजुरी घ्यावी लागते. डेप्यु. गव्हर्नर एकतर निकाल तसाच कायम ठेवतात किंवा निकाल रद्द करतात अथवा पुन्हा बँकिंग लोकपालाकडे केस फेरविचारासाठी पाठवतात..”

एवढं सांगितल्यावर स्नेहलता मॅडम म्हणाल्या..

“पण.. मी विचारतेय की तुम्ही आज, आत्ता.. या क्षणी काही प्रयत्न करणार आहात की नाही हा निकाल रोखण्यासाठी किंवा रिव्हर्स करण्यासाठी ? अजूनही तुम्ही लोकपाल मॅडमला भेटून त्यांना आपली बाजू पटवून देऊ शकता. हवं तर मी तुम्हाला या कामी मदत करू शकते. तुम्ही प्रयत्न तर करा.. “

स्नेहलता मॅडमच्या शब्दांतून त्यांना माझ्याविषयी वाटणारी आपुलकी, कळकळ जाणवत होती..

“तुमच्या मॅडमनी तर क्विक जजमेंट देऊन केसच गुंडाळून टाकलीय.. तो सुखदेव तर निकाल घेऊन एव्हाना वैजापूरच्या रस्त्यालाही लागला असेल. आणि.. मला नाही वाटत, तुमची मैत्रीण आता माझी बाजू ऐकून घ्यायला तयार होईल.. छे छे.. अशक्यच आहे ते..! जाऊ द्या मॅडम, तुम्ही माझ्याबद्दल जी आपुलकी व सदभावना दाखवलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार.. येतो मी.. !”

images 80

एवढं बोलून उदास मनाने, दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि खुर्चीवरून उठून परत जाण्यासाठी निघालो. अचानक स्नेहलता मॅडमनी ताडकन खुर्चीवरून उठून माझा हात धरला आणि म्हणाल्या..

“कम ऑन.. चिअर अप ! मी मॅडमची आणि तुमची भेट घालून देते. तुम्ही मला जशी तुमची केस नीट समजावून दिली होतीत अगदी तशीच ती मॅडमलाही समजावून सांगा. माझी खात्री आहे, काहीतरी चांगलं नक्कीच घडेल. तुम्ही प्लिज इथेच थांबा.. मी आलेच..!”

असं बोलून माझ्याकडे पहात पहातच स्नेहलता मॅडम रिक्रिएशन रूम मध्ये गेल्या. अवघ्या दोनच मिनिटांत आनंदी, प्रफुल्लित चेहऱ्याने त्या बाहेर आल्या.

snehalata

“जा..! लोपा.. आय मीन, माझी जवळची मैत्रीण आणि तुमची लोकपाल मॅडम.. ती तयार झालीय.. आय मिन, तयार झाल्यात त्या.. तुमची वस्तुस्थिती जाणून घ्यायला.. जा लवकर..! न घाबरता, शांतपणे बोला त्यांच्याशी.. रिमेम्बर, शी इज व्हेरी हेल्पफुल, कोऑपरेटिव्ह अँड काईंड हार्टेड वूमन.. ऑल द बेस्ट.. !!”

जीव मुठीत धरून भीतभीतच मी रिक्रिएशन रूम मध्ये प्रवेश केला. सेनगुप्ता मॅडम तेथील एका झुलत्या आराम खुर्चीवर बसल्या होत्या. मला पाहून त्यांनी हलकंसं स्मित केलं. त्यांना नमस्कार करून बोलायला सुरुवात करणार इतक्यात त्यांनी हातानेच मला थांबायची खूण केली आणि म्हणाल्या..

“माझ्या मैत्रिणीशी बोलतांना मघाशी उत्साहाच्या भरात तुमच्याबद्दल जे अपरिपक्व, अनुचित शब्द माझ्याकडून उच्चारले गेले त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमची क्षमा मागते. खरं म्हणजे मलाच ही केस लवकर संपवायची घाई झाली होती. चुकलंच माझं..!”

अत्यंत विनम्रतेने आणि मनापासून उच्चारलेले मॅडमचे ते शब्द ऐकून माझ्या छातीवरचं दडपण एकदम कमी झालं आणि त्यांच्याबद्दलचा मनातील आदरही दुणावला.

“मी समजू शकतो मॅडम..! एकतर आज तुमचा ऑफिसातील शेवटचा दिवस असल्याने लवकर सर्व कामं आटपायची घाई आणि त्यातून माझी केस सुद्धा तांत्रिक व कायदेशीर दृष्ट्या खूपच कमजोर होती..”

माझ्या या बोलण्यावर पुन्हा स्वच्छ, निर्मळ, मनमोकळं स्मितहास्य करीत त्या म्हणाल्या..

lopamudra

“बसा निवांतपणे.. आणि सांगा तुम्हाला काय सांगायचंय ते..!”

सुखदेवने त्याच्या बायकोचं बँकेत खातं उघडलं त्या दिवसापासूनचा घटनाक्रम सांगायला मी सुरुवात केली. बँकेचा अस्थायी कर्मचारी रुपेशच्या सहभागामुळे आमची केस कशी कमजोर बनली, पैसे नेणाऱ्या व्यक्तीचा फोटो व घटनेच्या दिवसभराचं CCTV फुटेज उपलब्ध असूनही पोलिसांची तपासकामातील हेतुपुरस्सर दिरंगाई, सुखदेवच्या धमक्या, पेपरबाजी, पैशाच्या मागण्या, त्याने बँकेच्या स्टाफविरुद्ध केलेली खोटी पोलीस केस, रुपेशची अटक व त्याचा अर्धवट कबुलीजबाब.. हे सर्व माझ्या तोंडून ऐकत असतांना क्षणोक्षणी मॅडमच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. माझं बोलणं संपलं तेंव्हा त्या उठून माझ्याजवळ आल्या. माझ्या पाठीवर कौतुकमिश्रित सहानुभूतीने हलकंसं थोपटून त्या म्हणाल्या..

“आय ॲम रिअली व्हेरी सॉरी..! खरंच घाईघाईत खूप मोठी चूक घडली माझ्या हातून.. ! पण.. तक्रारदाराने सादर केलेले पुरावे व मुद्दे पाहता माझ्या जागी दुसरं कुणीही असतं तरी त्याने देखील हाच किंवा असाच निकाल दिला असता. किंवा फार फार तर निकाल थोडा लांबवला असता..”

त्यावर मी म्हणालो..

“नाही मॅडम, तसाही हा निकाल लांबवून फारसा उपयोग झाला नसता.. कारण कन्झ्युमर कोर्टाने ग्राहकाला एका महिन्याच्या आत न्याय देण्याची म्हणजेच नुकसान भरपाई देण्याची बँकेला तंबी दिली आहे..”

माझ्या तोंडून कन्झ्युमर कोर्टाचा उल्लेख ऐकताच सेनगुप्ता मॅडमचे डोळे आनंदानं चकाकले..

“काय म्हणालात..? कन्झ्युमर कोर्ट ? म्हणजे हे प्रकरण तिथेही नेलंय का या गृहस्थाने..?”

“होय मॅडम ! पोलिस केस, फौजदारी न्यायालय, ग्राहक मंच, अँटी करप्शन ब्युरो, केंद्र व राज्य सरकारचे विविध ग्रीव्हन्स सेल, बँकेच्या हेड ऑफिस मधील फ्रॉड व तक्रार विभाग.. अशा अनेक मंचांकडे या सुखदेवने बँकेविरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत..”

हे ऐकतांच मॅडम आनंदाने जवळजवळ ओरडल्याच..

“बस..बस..! झालं तुमचं काम..! जर ही केस आधीच ग्राहक मंचात सुरू असेल तर आज झालेली येथील संपूर्ण सुनावणीच Null & Void म्हणजेच व्यर्थ आहे. ताबडतोब मला हा निकाल बदलायला हवा.. तुम्ही इथेच थांबा.. आणि Revised निकाल घेऊन जा..!”

स्नेहलता मॅडमला सांगून त्यांनी ताबडतोब पीए ला बोलावून घेतलं आणि त्याला Revised Verdict डिक्टेट करायला सुरुवात केली. पीए ने सुधारित निकाल त्वरित टाईप करून मॅडमपुढे ठेवला. त्यावर सही करून मॅडमनी स्वतः तो निकाल माझ्या हातात दिला.

याच दरम्यान स्नेहलता मॅडमनी कार्यालयाच्या साऱ्याच मजल्यावरील सिक्युरिटी गार्ड व शिपायांना बोलावून सुखदेवला शोधून आणण्यासाठी त्यांना खाली रस्त्यावर पिटाळलं होतं. सुदैवाने सुखदेव RBI बिल्डिंग जवळच्या हॉटेलमध्येच कुटुंब व वकील मित्रांसह शांतपणे जेवण करीत बसला होता. लोकपाल मॅडमनी बोलावलंय म्हटल्यावर तो कुटुंबमित्रांसह धावतपळतंच लोकपाल कक्षात आला. धापा टाकीतच तो म्हणाला..

“मॅडम, जेवण झाल्यानंतर तुम्हा सगळ्यांसाठी पेढे घेऊन येणारच होतो मी.. पण तेवढ्यात तुम्ही अर्जंट बोलावल्याचा निरोप मिळाला म्हणून मुलाला पेढे आणण्यासाठी पाठवलं आणि मी लगबगीनं इकडे आलो.. असं काय अर्जंट काम होतं मॅडम ?”

सुखदेवकडे रोखून पहात लोकपाल मॅडम म्हणाल्या..

“असं आहे की, तुमच्या केसच्या निकालात किंचित दुरुस्ती करून आता पहिल्यापेक्षा अधिक योग्य असा निकाल देण्यात आला आहे..”

सुखदेवकडून पूर्वी दिलेला निकाल आधी परत घेऊन लोकपाल मॅडमनी त्याच्या हातात नवीन निकालाचा लिफाफा ठेवला.

पूर्वीसारखाच लिफाफा उघडून सुखदेवनं अधाशा सारखा तो निकाल भराभरा वाचला.

“हे प्रकरण कन्झ्युमर कोर्टात आधीच न्यायप्रविष्ट असल्याने नियमानुसार लोकपाल कार्यालयाला या तक्रारीची दखल घेता येत नाही.. याप्रकरणी आधी दिलेला निकाल रद्द करण्यात येत आहे..”

हे शब्द वाचतांच सुखदेवने अविश्वासयुक्त क्रोधाने मॅडम कडे पाहिलं..

“हा तर सरळ सरळ दगा आहे. तुम्ही असा कसा निकाल बदलू शकता ? मला हे अजिबात मान्य नाही. मला न्याय मिळेपर्यंत मी इथेच तुमच्यापुढे बसून उपोषण करीन. मला पक्की खात्री आहे की त्या मॅनेजर साहेबांच्या सांगण्यावरून आणि त्यांच्याकडून लाच घेऊनच तुम्ही हा निकाल बदललेला आहे. पण मी असा गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. तुम्हाला मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही..”

सुखदेवचं आरडाओरडा करून आकांडतांडव करीत गोंधळ घालणं सुरूच होतं. मला पाहिल्यावर तो आणखीनच चेकाळला असता, म्हणून हेतुपुरस्सरच त्याच्या नजरेसमोर येण्याचं आतापर्यंत मी टाळलं होतं. लोकपाल मॅडमनी कडक शब्दात ताकीद देऊनही सुखदेवचं त्यांना शिव्या-शाप देऊन थयथयाट करीत कक्षात थैमान घालणं तसंच चालू होतं.

हा प्रकार पाहून RBI कार्यालयातील तीन चार सिक्युरिटी गार्ड धावतच लोकपाल कक्षात आले आणि त्यांनी सुखदेवची गचांडी धरून त्याला कक्षा बाहेर काढलं. तरीही सुखदेवची बेताल बडबड अव्याहतपणे सुरूच होती. त्यातच बाहेर एका कोपऱ्यात बसून वाट पहात बसलेलो मी त्याच्या दृष्टीस पडलो. मग काय विचारता..!

क्रोधाने धुमसणाऱ्या सुखदेवच्या संतापाचा जणू स्फोटच झाला. त्वेषाने दातओठ खात तो म्हणाला..

“तरीच..! मला वाटलंच होतं की ही नक्कीच मॅनेजर साहेबांचीच करतूत असावी. आणि आता तुम्हाला इथे पाहून तर माझी त्याबद्दल खात्रीच झाली आहे.. साहेब, तुम्ही मॅडमला लाच देऊन न्याय विकत घेतला आहे.. पण मी तुम्हाला असा सोडणार नाही.. तुम्ही आणि ती आत बसलेली भ्रष्ट, पक्षपाती लोकपाल मॅडम, या दोघांनाही मी जबरदस्त धडा शिकविन.. त्या मॅडमची तर थेट RBI गव्हर्नर कडेच तक्रार करीन. शिवाय त्यांना कोर्टात खेचेन ते वेगळंच..”

सुखदेवनं माजवलेला हा तमाशा पाहून त्याचं मानगूट धरलेला सिक्युरिटी गार्ड म्हणाला..bank katha-13

“हे पहा, लोकपाल कक्षात गोंधळ घालणं आणि मॅडम बद्दल अपशब्द उच्चारणं हा गंभीर गुन्हा आहे. तुम्हाला जर इथल्या मार्शलच्या ताब्यात दिलं तर तुमची रवानगी थेट तुरुंगात होईल. तेंव्हा मुकाट्याने इथून ताबडतोब निघून जा..”

सुखदेवच्या सोबत आलेल्या वकिलांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखलं आणि सुखदेवला शांत करून कशीबशी त्याची समजूत घालत त्याला लोकपाल कार्यालया बाहेर नेलं. आदळआपट करून शिव्याशाप देत, पाय आपटीत सुखदेव तिथून निघून गेला.

मला तर अजूनही आज दुपारनंतरचा सारा घटनाक्रम स्वप्नवतच वाटत होता. इतक्या लवकर असं निकालाचं पारडं माझ्याकडे झुकेल याची कल्पनाही मी केली नव्हती. स्नेहलता मॅडम आणि सेनगुप्ता मॅडमचे आभार मानून त्यांचा निरोप घेतांना माझे डोळे नकळत भरून आले. त्या दोघीही खूप भारावून गेलेल्या दिसत होत्या.

परतीची बस रात्री साडे दहाची होती. रात्रीचं जेवण झाल्यावर सरळ गेट वे ऑफ इंडिया वर गेलो. खूप वर्षांपूर्वी जेंव्हा जेंव्हा परीक्षा, इंटरव्ह्यू व अन्य निमित्ताने मुंबईला येणं व्हायचं तेंव्हा रात्रीच्या वेळी ताजमहाल हॉटेल समोरील समुद्राच्या तटरक्षक भिंतीवर बसून लाटांचं संगीत ऐकत बसायचो. आज ही तसाच समुद्राच्या सान्निध्यात बसलो होतो. वाटलं की, सागरातील भरती ओहोटीच्या लाटां प्रमाणेच जीवनातही आशा निराशेच्या लाटांचा खेळ असाच निरंतर सुरू असतो. आजच्या अकल्पित यशाबद्दल ईश्वराचे मनोमन आभार मानले.

एक छोटीशी लढाई संपली होती. भविष्यात अजून अशा अनेक लढाया आम्हाला जिंकायच्या होत्या.

(क्रमशः)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १० भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे..