https://goodworld.in A website by Madhav Bhope

Mind blowing experiences of a Banker-5 एका बँकर चे थरारक अनुभव-5

images 46 1

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

गाडीत मागच्या बाजूला बसलेले रविशंकर, सुनील सैनी, शेख रहीम आणि बेबी सुमित्रा हे चौघे अजूनही गोंधळलेल्या मन:स्थितीतच होते. स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी निघालेलो आपण औरंगाबादला कशासाठी चाललो आहोत हाच प्रश्न चौघांनाही पडला होता परंतु माझ्या चेहऱ्यावरील गंभीर चिंतेचे भाव व RM साहेबांशी माझे होत असलेले बोलणे, यावरून कसलं तरी सिरीयस मॅटर असावं याचा त्यांनी मनाशी अंदाज बांधला होता.

आमची गाडी वैजापूर पासून जेमतेम चार पाच किलोमीटर अंतरावर पोहोचली असेल नसेल तोच माझा मोबाईल वाजला. पलीकडून इंस्पे. माळी बोलत होते..

“अहो साहेब, तुम्ही निघालात की नाही अजून ? फक्त पाचच मिनिटांचं काम आहे. फिर्यादीने बँके विरुद्धची तक्रार मागे घेतली आहे. त्यासंबंधीच्या तडजोडीच्या कागदपत्रांवर तुम्हा सर्व स्टाफच्या सह्या हव्या आहेत. त्या करून तुम्ही लगेच बँकेत परत जाऊ शकता.. तेंव्हा लवकर निघा..”

“हो साहेब, निघालोच..!”

असं तुटक उत्तर देऊन मी कॉल कट केला.

पाच सात मिनिटांनी पुन्हा मोबाईलची रिंग वाजली. या वेळी मात्र ठाण्यातून सब इंस्पे. हिवाळे बोलत होते..

“काय राव, आम्ही केंव्हाची वाट पाहतोय.. हातातलं काम टाकून जसे असाल तसे लगेच निघा बरं.. !

कमाल आहे हं तुमची ! तुमच्या विरुद्ध ठाण्यात फिर्याद नोंदली गेली आहे, फिर्यादी सकाळ पासून ठाण्यात हजर आहे, आम्ही तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करतोय.. फिर्यादीचं मन वळवतोय.. आणि तुम्हाला तर काही गांभीर्यच दिसत नाही या प्रकरणाचं.. !

ध्यानात घ्या, जर फौजदार साहेब चिडले नं, तर सारा मामलाच बिघडून जाईल.. त्यामुळे, निघा लवकर !!”

शेवटचे “निघा लवकर !” हे शब्द दरडावल्यासारखे उच्चारून माझ्या उत्तराची वाट ही न पाहता हिवाळेंनी फोन कट केला.police

एव्हाना आम्ही वैजापूर पासून पंचवीस तीस किलोमीटर दूर आलो होतो. पोलीस आम्हाला पाठलाग करून गाठण्याची आता फारशी शक्यता नव्हती, त्यामुळे थोडा निर्धास्त झालो आणि मागे वळून स्टाफकडे पहात म्हणालो..

“हमे पुलीस स्टेशन बुलाकर धोखेसे अरेस्ट करनेका पुलिसवालों का प्लान था, इसलिए हमें इस तरह जल्दबाजी में वैजापूर छोड़ना पड़ा.. अब अरेस्ट से बचने के लिए हमें तुरंत एंटीसिपेटरी बेल के लिए कोर्ट में अर्जी करनी होगी और जब तक बेल की दरख़्वास्त मंजूर नही होती तब तक पुलिस की नजरों से दूर कहीं चोरी छिपे रहना होगा.. फिलहाल तो RM साब ने अपने ट्रेनिंग सेंटर में हमारे रहने का इंतज़ाम कर दिया है और हम सीधे वहीं पर जा रहे है..”

माझ्या बोलण्या नंतर काही क्षण गाडीत गहन गंभीर शांतता पसरली.. मग हळूहळू एकेकाच्या प्रतिक्रिया यायला लागल्या.

“ओ माय गॉड !” इति रविशंकर..

“अरे बापरे.. !” इति सैनी..

“या खुदा..! तेरी रहमत !” इति रहीम चाचा..

अल्लड, अवखळ बेबी सुमित्राच्या चेहऱ्यावर मात्र कसलाच तणाव दिसत नव्हता. अवघ्या तीन महिन्यांपूर्वी सुदूर छत्तीसगडच्या आदिवासी भागातून वैजापुरात आलेली हसरी, खेळकर बेबी जणू हे टेन्शन, ही भीती सुद्धा एन्जॉय करत होती. अचानक तिच्या चेहऱ्यावर मिश्किल भाव उमटले..

“मतलब.. सर, आज से हम सब लोग दुनिया की नजरों मे *फरार* है.. ! है ना ?”

आणि मग खळाळून हसत दोन्ही हातांनी टाळी वाजवत ती म्हणाली..

“हाऊ एक्सायटिंग ! हाऊ थ्रिलिंग !”

बेबीचं हे बोलणं थोडंसं बालिश वाटलं तरी तिच्या उत्साही मुद्रेवरील खेळकर आणि निरागस उस्फुर्त आनंद पाहून गाडीतील सर्वांचाच ताण एकदम हलका होऊन गेला. नकळत आम्हालाही खुदकन हसू आलं.. बेबी सारखंच आपणही स्वतःवर हसून हे संकट एन्जॉय कां करू शकत नाही ? असाच विचार आमच्या मनात येऊन गेला.

इकडे सब इंस्पे. हिवाळे मघापासून मला सारखा फोन लावीत होते. बराच वेळ घाबरून मी फोन उचललाच नाही. नंतर ती फोनची सतत वाजणारी रिंग असह्य झाली म्हणून एकदाचा तो फोनच स्विच ऑफ करून टाकला.

आता गाडीतील अन्य चौघांचेही मोबाईल वाजणं सुरू झालं. सारेच नंबर्स अनोळखी होते. हे सारे फोन पोलीस स्टेशन मधूनच येत आहेत हे न समजण्या इतके कुणीही खुळे नव्हते. त्यामुळे कुणीच फोन उचलण्याच्या भानगडीत पडलं नाही.

अशातच बेबीचा फोन वाजला आणि आमच्या “नकोss ! उचलू नकोss !” च्या खाणाखुणांकडे दुर्लक्ष करीत तिने तो चक्क उचलला..

“हॅलोss !”

“कौन ? बेबी सुमित्रा..?”

“हां, मै बेबी सुमित्राही बात कर रही हूँ..”

“आप अभी तक थाने क्यों नही पहुँची ? अगर पाँच मिनट में आप सब लोग थाने नही पहुंचे तो हमे मजबूरन बैंक में आना पड़ेगा.. आपके मैनेजर साब तो फोन भी नही उठा रहे.. उन से कह दो, हम से कोई चालबाजी मत करो, वरना बहुत महँगा पड़ेगा..!”

पलीकडून उर्मट आवाजात दरडावण्यात आलं..

लाडिक, मधाळ, खोडकर स्वरात बेबी उत्तरली..

“अरे क्याsss साब ! आप तो खामख्वाह नाराज हो गए.. हम तो रास्ते में ही थे.. ये लीजिये..! पहुंच गए हम सब आपके थाने ! जरा उठकर बाहर आकर तो देखिए.. क्या हमे लेने गेट तक भी नही आओगे ? !!”

.. एवढं बोलून बेबीनं फोन कट केला आणि “अब ढूंढते रहो हमें पागलों की तरह, थाने के बाहर, इधर उधर.. !” असं म्हणत पोट धरधरून मोठ्यानं हसत सुटली.giggling woman

मी डोळे मोठे करून तिच्याकडे रागानं बघितलं तेंव्हा स्वतःला सावरून घेत ती म्हणाली..

“सर, वो लोग इतना बडा झूठ बोलकर हम से दगाबाजी कर सकते है तो हम इतना सा झूठ बोलकर उन को उल्लू भी नही बना सकते क्या ?”

बेबीच्या हिंमतीला आणि विनोदबुद्धीला मनोमन दाद देत मी गप्प बसलो.

औरंगाबाद आलं.. ट्रेनिंग सेंटरच्या हॉस्टेल मध्ये आमच्यासाठी चार खोल्या राखून ठेवण्यात आल्या होत्या. माझं घर तिथून अगदी जवळच होतं. घरी जाऊन बायकोला ओढवलेल्या प्रसंगाची थोडक्यात कल्पना दिली आणि घरातील दोन चार लुंगी पायजामे व बेबी साठी बायकोचा नाईट ड्रेस घेऊन हॉस्टेल वर परतलो. रात्री जेवणं झाल्यावर एका खोलीत एकत्र जमून आम्ही गप्पा मारत बसलो.room1

“तुम्हाला काय वाटतं..? तो दुसऱ्या चेकबुक मागणीचा अर्ज फायलिंग मधून कुणी गायब केला असावा ? ती व्यक्ती बँकेतीलच आहे हे तर नक्की..! पण कोण करू शकेल असं ?”

माझ्या या प्रश्नावर रहीम चाचा म्हणाले..

“जी व्यक्ती बँक संपल्यावर म्हणजेच सर्व जण घरी गेल्यावर देखील बँकेत थांबते अशीच व्यक्ती हे काम सहज करू शकते. मला वाटतं की आपले पाच सेक्युरिटी गार्ड्स हे रात्री बँकेतच असतात, त्यांच्या पैकीच कुणाचं तरी हे काम असावं..”

“नाही, मला ते पटत नाही. गेली सात वर्षं मी त्यांना पाहतो आहे. ते सारेच अतिशय कर्तव्यदक्ष आणि इमानदार आहेत. ते असं काही करतील याची तिळमात्र ही शक्यता नाही..”

रविशंकर ठामपणे म्हणाला..

“मग दुसरं कोण ? नंदू तर नाही ? कारण तो सकाळी सहा वाजल्यापासून बँकेतच असतो, आणि तेंव्हा बँकेत कुणीच नसतं..”

रहीम चाचांनी शंका व्यक्त केली.

नंदू हा माळी काम व बँकेची साफसफाई करणारा टेम्पररी (आऊट सोर्सिंग) कर्मचारी होता. सकाळी सहा वाजता बँकेत येऊन तो बागेतील झाडांना पाणी टाकणे, बाहेरील कंपाउंड झाडून काढणे, हॉल व आतील टाईल्स झाडून पुसून स्वच्छ करणे अशी कामे करीत असे. याशिवाय दिवसभर बँकेत थांबून तो प्युनची अन्य कामे सुद्धा करीत असे.hqdefault 1 1

प्रचंड कष्टाळू, नम्र व अबोल असलेला नंदू हा अत्यंत पापभिरू होता. पहाटे पाच ते सहा या वेळेत तो स्वेच्छेने व विना मोबदला गावातील दत्त मंदिराची साफसफाई करीत असे. म्हाताऱ्या आई वडिलांची मनापासून सेवा करणारा व नातेवाईकांनी वडिलोपार्जित संपत्ती लुबाडली तरी त्यांच्या बद्दल कोणतीही कटुता न बाळगणारा कुटुंबवत्सल नंदू हा माझा आवडता कर्मचारी होता. त्याचे आई वडीलही त्यांच्या तरुणपणी दीर्घकाळ पर्यंत आमच्या बँकेतच साफसफाईचे काम करीत होते. नंदू असं काही कृत्य करेल हे माझ्या दृष्टीने next to impossible होतं. त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल मी निश्चितच पक्की खात्री देऊ शकत होतो.

मग आता कोण उरलं ?

बँकेच्या तीन पर्मनंट प्युन्स पैकी दोघा जणांना आत्यंतिक मद्य प्राशन करण्याची घाणेरडी सवय होती. दारूमुळे त्यांचं शरीर पोखरलं गेलं होतं. ते दोघेही वारंवार आजारी पडत आणि त्यामुळेच कामावर नेहमी गैरहजर रहायचे. गेले काही दिवस तर ते दोघे ही खूप आजारी असल्याने अंथरुणावरच होते. तिसरा प्युन रोज वेरूळ येथून वैजापूरला जाणे येणे करीत असे. सकाळी खूप उशिरा कामावर येणे आणि संध्याकाळी.. नव्हे दुपारीच खूप लवकर बँकेतून निघून जाणे हा त्याचा नित्यक्रम होता. पनिशमेण्ट वरच त्याची वेरूळहुन वैजापूरला बदली झाली होती. वारंवार ताकीद देऊन ही कुणालाही न जुमानता तो बँकेतून रोज लवकर निघून जात असे. मात्र त्यामुळेच तो या कट कारस्थानात सामील असण्याची शक्यता खूपच कमी होती.

“रुपेश के बारे में क्या खयाल है, सर ? पिछले चार साल से मैं उसे देख रहा हूँ, लेकिन अभी भी उसे ठीक तरह पहचान नही पाया हूँ..”confident businessman 1 e1727538156305

डोक्यावरील केसांतून हात फिरवीत रविशंकर म्हणाला.

खूप ठेंगणा, रापलेल्या चेहऱ्याचा आणि बलदंड शरीराचा रुपेश जगधने हा पंचवीस सव्वीस वर्षांचा तरुण होता. वैजापूर पासून दोन किलोमीटर अंतरावरील घायगाव इथे त्याची दहा एकर बागायती जमीन होती. फावल्या वेळेत तो होम गार्ड ची ड्युटी ही करीत असे. बँकेचे सिक्युरिटी गार्ड्स जेंव्हा रजेवर जात तेंव्हा त्यांच्या रजेच्या कालावधी पुरते त्यांच्या जागी लष्कराचे रिटायर्ड जवान किंवा होमगार्ड यांना रोजंदारीने पगारी ड्युटी देण्याचा बँकेचा नियम आहे. होम गार्ड असलेला रुपेश असा तात्पुरता सिक्युरिटी गार्ड म्हणून बँकेत अधून मधून ड्युटी करायचा.

तल्लख बुद्धीच्या रुपेशने कॉम्पुटरचा कोर्सही केलेला होता. पूर्वीच्या मॅनेजर साहेबांनी त्याला “सिग्नेचर स्कॅनिंग” चे काम शिकून घेण्यास सांगितले. लवकरच रुपेश त्या कामात तरबेज झाला आणि दररोज बँकेत येऊन सिग्नेचर स्कॅनिंग चे काम करू लागला. ग्राहकांकडून अकाउंट ओपनिंग चा फॉर्म भरून घेणे व अन्य छोटी मोठी कामे ही तो करीत असे. त्याला बसण्यासाठी बँकेत एक स्वतंत्र काउंटरही देण्यात आले होते.

रुपेश जसं आणि जिथून बोलावणं येईल त्याप्रमाणे कधी बँके बाहेर सिक्युरिटी गार्ड म्हणून उभा राहायचा तर कधी नवरात्र, उरूस, गणेशोत्सव काळात होमगार्ड म्हणून पोलीस बंदोबस्ताला जायचा.. कधी सिग्नेचर स्कॅनिंग साठी बँकेच्या आत काउंटर वर बसायचा तर कधी आपल्या स्वतःच्या शेतात राबायचा. काही महिन्यांपूर्वी त्याला पाईप लाईन साठी कृषी कर्ज हवे असल्याने त्याच्या शेतीचे इन्स्पेक्शन करण्यासाठी गेलो असता त्याच्या घायगाव येथील घरीही गेलो होतो.

आई बापाचा एकुलता एक मुलगा असलेल्या रुपेशने मोठ्या कष्टाने शेती खूप छान फुलवली होती. वृद्ध आईवडिलांची सेवा करीत सुस्वरूप पत्नी व दोन वर्षांच्या गोंडस मुलासह घायगावात बांधलेल्या पक्क्या घरात तो आनंदाने रहात होता. बँकेतील सर्वच प्रकारच्या कामांत तो तरबेज असल्याने गर्दीच्या वेळी प्रत्येकच कर्मचारी त्याला आवर्जून मदतीला बोलावून घेत असे. रुपेशही अगदी मनापासून सर्वांना त्यांच्या कामात मदत करीत असे.

रुपेशचे हस्ताक्षर खूप सुन्दर आणि वळणदार होते. मी वैजापूर शाखेत जॉईन झालो तेंव्हा तेथील रजिस्टर्सवर सुबक अक्षरात लिहिलेली नावे पाहून हे सुरेख अक्षर कुणाचे आहे याची चौकशी केली होती. त्यावेळी हे रुपेशचे हस्ताक्षर असून सध्या तो होमगार्डची ड्युटी करण्यासाठी औरंगाबादला गेला असल्याचे नंदू कडून समजले.

पुढच्याच आठवड्यात नंदू रुपेशला घेऊन माझ्या केबिन मध्ये आला.

“साहेब, हा रुपेश.. रुपेश जगधने. घायगावला राहून शेती करतो. बारावी पास आहे. कॉम्पुटर मधील सगळं काम येतं ह्याला. होमगार्ड म्हणून इथल्या पोलीस स्टेशनमध्ये काम करतो. कधी कधी आपल्या कडे टेम्पररी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो तसंच गेल्या दोन वर्षांपासून आपलं सिग्नेचर स्कॅनिंगचं ही काम करतो. साहेब, तुम्ही त्या दिवशी रजिस्टर वरील ज्याच्या सुंदर अक्षराबद्दल चौकशी केली होती तोच हा रुपेश..”

“अरे वा ! खूप छान.. !!”

रुपेश कडे कौतुकाने पहात मी म्हणालो.

“साहेब, ह्या रुपेशच्या अंगात विविध प्रकारच्या कला आहेत.”

नंदू म्हणाला..

“अच्छा..?”

कचरा कुंडीतील एक पाठकोरा कागदाचा तुकडा घेऊन नंदू म्हणाला..

“साहेब, ह्याच्यावर तुमची सही करा..!”

मी प्रश्नार्थक नजरेने नंदू कडे पाहिलं..

“असं संशयाने पाहू नका साहेब, फक्त एक गंमत दाखवायची आहे तुम्हाला.. आधी तुम्ही तुमची सही करा इथे..!”

हा काय पोरकटपणा आहे ? अशा मुद्रेने अनिच्छेनेच मी त्या कागदावर सही केली.

“आता बघा गंमत..” असं म्हणत नंदूने तो कागद रुपेशकडे दिला.

रुपेशने आपल्या खिशातील पेन काढला.. क्षणभर कागदावरील माझ्या सहीकडे बघीतलं, आणि चट्कन माझ्या सहीखाली अगदी हुबेहूब माझ्या सही सारखीच सही केली. दोन्ही सह्या इतक्या एकसारख्या दिसत होत्या की मी देखील ते पाहून चकित झालो.

“मानलं पाहिजे..! खरंच विलक्षण कला आहे.. ! पण जपून, ह्या कलेचा चुकूनही दुरुपयोग करू नकोस.. नाहीतर एके दिवशी तुरुंगात जावं लागेल.. !”

मी रुपेशला म्हणालो.

जीभ बाहेर काढून दोन्ही कानांना हात लावीत रुपेश म्हणाला..

“साहेब, मी स्वप्नातही असं कधी करण्याचा विचारही मनात आणणार नाही. ही तुमची सही सुद्धा नंदूने फारच आग्रह केला म्हणून खूप नाईलाजाने फक्त यावेळ पुरतीच केली आहे..”

कालांतराने ही गोष्ट मी पार विसरून गेलो होतो. आज रुपेशचं नाव निघाल्यावर अचानक हे सारं आठवलं. खरं म्हणजे रुपेशच्या या “हस्तकलेच्या जादू” बद्दल स्टाफ मधील सर्वांनाच माहिती होती. तरी देखील एवढी महत्वाची गोष्ट आतापर्यंत आपल्यापैकी कुणालाच कशी काय “क्लिक” झाली नाही याचंच सर्वांना राहून राहून आश्चर्य वाटत होतं.

जसे जसे संशयित गुन्हेगार म्हणून रुपेश बद्दल आम्ही विचार करत गेलो तसा तसा त्याच्या वरील आमचा संशय अधिकच पक्का होत गेला. CCTV च्या रेंज बाहेर राहून ते चेक बुक डिलिव्हर करणं केवळ रुपेश सारख्या चाणाक्ष व्यक्तीलाच शक्य होतं. तसंच चेक बुक मागणी अर्ज फाईल मधून गायब करणं ही त्यालाच सहज साध्य होतं. सर्वात महत्वाचं म्हणजे सिग्नेचर स्कॅनिंग करीत असल्यामुळे त्याला कुणाचीही सही पाहणं सहज शक्य होतं आणि हुबेहूब सही गिरवण्यात तर त्याचा हातखंडाच होता.

अशा तऱ्हेने इतके दिवस न सुटणारं कोडं अचानक सुटलं होतं. मधूनच अस्पष्ट दिसून दाट धुक्यात लुप्त होणारा, हुलकावणी देत हाती न येणारा तो धूर्त, कपटी, कारस्थानी चेहरा आता जाहीर झाला होता.

आता कधी एकदा लवकरात लवकर कोर्टातून जामीन मिळवून वैजापूरला परत जातो आणि रुपेशला बोलतं करून गुन्हेगारांच्या टोळीचा पर्दाफाश करतो असं आम्हाला झालं होतं..

गप्पांच्या नादात रात्रीचे बारा वाजून गेले होते. रात्री नऊ पूर्वीच झोपायची सवय असलेले वयोवृद्ध रहीम चाचा मघापासून जांभया देत होते. एकमेकांना “गुड नाईट” करून समाधानानं आम्ही आपापल्या खोलीत जाण्यासाठी निघालो तोच दारावर कुणीतरी हलक्या आवाजात “टकटक” केलं.

इतक्या रात्री कोण आलं असावं बरं ? कदाचित हॉस्टेलचा केअर टेकर “तुमच्या बोलण्यामुळे हॉस्टेल मधील ट्रेनिंग साठी आलेल्या अन्य स्टाफला डिस्टर्ब होतोय.. कृपया जास्त जागू नका.. आता झोपा..” असं सांगण्यासाठी आला असावा, असं वाटून मी रुमचं दार उघडलं.. तो काय..

डोक्यावर कॅप, अंगात कडक इस्त्रीचा युनिफॉर्म, कमरेला सर्व्हिस रिव्हॉल्व्हर, हातात पोलिसी दंडुका आणि चर्येवर क्रुद्ध भाव असलेले सब इंस्पे. हिवाळे दारात उभे होते..

Untitled design 1

 

(क्रमशः 6)

 

 

ajay-kotnis-photo1श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे

Mind blowing experiences of a Banker-4 एका बँकर चे थरारक अनुभव-4

cash van

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

बॅंकस्य कथा रम्या..

स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव..

( भाग : 4 )
जयदेव खडके… ! होय, हेच नाव होतं त्या पाच लाख ऐंशी हजार रुपयांच्या तथाकथित बनावट सहीच्या चेकवर..
उभट चेहरा, गहू वर्ण, मध्यम उंची, किंचित बसकं नाक, डोक्यावर विरळ केस, काळ्या रंगाच्या पँटीत खोचलेला दंडापर्यंत बाह्या फोल्ड केलेला पांढरा शर्ट आणि सतत भिरभिरणारे कावरे बावरे डोळे.. अतिशय साधारण आणि निरुपद्रवी वाटणाऱ्या त्या व्यक्तिमत्वात तसं पाहिलं तर चट्कन लक्षात रहावं असं काहीही नव्हतं.. पण सध्या तरी तोच अतिसामान्य चेहरा रहस्यमय बनून “टॉक ऑफ द टाऊन” झाला होता.
 
जयदेव खडके असे नाव सांगणाऱ्या त्या माणसाचे हॉलमधील CCTV कॅमेऱ्यांच्या वेगवेगळ्या अँगल मधून घेतलेले सुमारे दोनशे मोठ्या आकाराचे फोटो काढून आम्ही ते पोलीस स्टेशन, बस स्टँड, रेल्वे स्टेशन परिसर व मोंढ्यातील दुकानदार, आसपासच्या गावातील बँकेचे ग्राहक यांच्यापर्यंत पोहोचविले होते. त्यांच्या मार्फत फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीची व्यापक चौकशी सुरू होती. बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारा जवळच एका मॉनिटर स्क्रीनवर घटनेच्या दिवसाचे CCTV रेकॉर्डिंग दाखवून बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडे जयदेव खडकेची चौकशी केली जात होती.
 
पोलिसांतर्फे तो फोटो नजीकच्या जिल्ह्यांतील सगळ्या पोलीस स्टेशन्सना सर्क्युलेट करणे अपेक्षित होते. परंतु तसा कोणताही प्रयत्न त्यांच्यातर्फे होत असल्याचे दिसत नव्हते. हुबेहूब अशीच दिसणारी व्यक्ती नाशिक व अहमदनगर येथे पाहिली असल्याचे आठवते असे काही कस्टमर म्हणाले. त्यामुळे ती ही गोष्ट आम्ही सब इंस्पे. हिवाळेंच्या कानावर घातली. संशयित गुन्हेगाराचा एवढा स्पष्ट फोटो हातात असूनही अद्याप पोलीस त्याला का हुडकून काढू शकत नाहीत ? याचे सर्वांनाच आश्चर्य वाटत होते.
 
एवढ्या मोठ्या रकमेचा चेक पोस्ट करण्यापूर्वी काउंटर क्लर्क शेख रहीम याने खातेदाराला फोन लावून त्याचे कन्फर्मेशन का घेतले नाही ? असा प्रश्न बँकेतर्फे अंतर्गत चौकशी करण्यासाठी आलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारला होता. त्यावर रहीम चाचा म्हणाले..
“सभी बडी रकम के चेक जारी (issue) करनेवाले कस्टमरोंको फोन करके अनिवार्य रूप से मै उनका कन्फर्मेशन लेता हूँ.. ठीक उसी तरह वो चेक पोस्ट करने से पहले भी मैंने रत्नमाला बाई को फोन किया था, लेकिन उनका फोन उस समय स्विच ऑफ था. चेक लानेवाले जयदेव खड़के से मैंने उसका आधार कार्ड मांगा, लेकिन उसने ‘कार्ड घर पर है’ ऐसा जवाब दिया. फिर मैंने उसे उसका मोबाईल नंबर मांगा ताकि वह चेक के पीछे लिख के रख सकूँ.. लेकिन उसने कहाँ की ‘मेरे पास मोबाईल नही है..’ “
 
“चेक लानेवाला शख्स खुद को मोंढें के सबसे बडे व्यापारी मंगल सेठ का मुनीम बता रहा था.. उस के हाथ में मोंढे के मुनीमों के पास रहती है वैसी लंबी थैली भी थी और बैंक में मौजूद दूसरे मुनीमों के साथ वह जिस तरह हँस के बातें कर रहा था उसे देख मुझे उसपर कोई शक नही हुआ !”
“काउंटर पे भीड़ बढ़ती जा रही थी, और वैसे भी चेक बेअरर था, इसलिए मैंने चेक पोस्ट किया और पासिंग को भेज दिया..”
 
रहीम चाचा यांनी कितीही योग्य रीतीने व प्रामाणिकपणे आपल्या कृतीचे समर्थन केले असले तरी बँकेने मात्र सखोल चौकशीअंती, कर्तव्यपालनातील हलगर्जी पणाबद्दल (negligence of duty) त्यांना दोषीच मानले. असो..
 
आज घटनेचा सहावा दिवस होता. सकाळी साडेदहा वाजतांच सब इन्स्पेक्टर हिवाळे दोन कॉन्स्टेबल सह बँकेत आले. रत्नमाला बोडखे यांनी बँकेविरुद्ध केलेल्या तक्रारीचा तपास करण्यासाठी आलो असल्याचं सांगून त्यांनी तो बनावट सहीचा चेक, चेकबुक इश्यु रजिस्टर व चेकबुक मागणीचा अर्ज मागितला. अर्ज सापडत नसल्याचे सांगून चेक व चेकबुक इश्यु रजिस्टर त्यांना दाखविले. घटनेशी संबंधित बँकेतील कर्मचाऱ्यांचे स्टेटमेंट घेऊन व चेकबुक इश्यु रजिस्टर आणि तो चेक जप्त करून सब इंस्पे. हिवाळे निघून गेले.police
 
पोलिस गेल्यानंतर लगेच RM साहेबांना फोन केला आणि पोलिसांनी केलेल्या चौकशीबद्दल त्यांना सविस्तर माहिती दिली. “सध्या मी श्रीरामपूर शाखेत ब्रँच व्हिजिट साठी आलो असून संध्याकाळी वैजापूर मार्गे परत जाताना तुमच्या शाखेत थोडा वेळ थांबेन तेंव्हा बोलू..” असं म्हणून त्यांनी फोन ठेवला.
सकाळी जेंव्हा सब इंस्पे. हिवाळे साहेब केबिन मध्ये बसून माझ्याकडून प्रकरणाची माहिती घेत होते तेंव्हा त्यांचा सूर अगदी नम्र आणि मित्रत्वाचा होता. त्यांच्या सोबत आलेले दोन कॉन्स्टेबल सुद्धा चौकशी करताना व स्टेटमेंट घेताना बँकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांशी अतिशय आदराने व स्नेहभावाने वागत होते. पोलिसांची ही सौहार्दपूर्ण वर्तणूक आम्ही जी कल्पना केली होती त्याच्या अगदी विपरीत होती. “घटनेच्या संपूर्ण दिवसाचे CCTV फुटेज पाहण्यासाठी रात्री आठ वाजता बँकेत येईन..” असंही जाता जाता हिवाळे सांगून गेले होते.
 
तो दिवस तसा शांततेतच गेला. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता AGM राणे साहेब बँकेत आले. बँकिंग हॉल मध्ये गोलाकार खुर्च्या टाकून त्यांनी स्टाफची छोटीशी मिटिंग घेतली. एक अकाऊंटंट, दोन फिल्ड ऑफिसर, दोन ट्रेनी ऑफिसर, एक हेड कॅशियर, दहा काउंटर क्लर्क, तीन पर्मनंट प्युन्स, दोन टेम्पररी (आऊटसोर्सिंग) प्युन, पाच सिक्युरिटी गार्ड्स असा माझ्या सहित एकूण सत्तावीस जणांचा स्टाफ मिटिंगला हजर होता.bank meeting
 
स्टाफला संबोधित करतांना RM साहेब म्हणाले.. “चौकशीला आलेल्या पोलिसांची आजची स्टाफशी वागणूक ही माणुसकीपूर्ण होती असं समजलं. ही आनंदाची गोष्ट असली तरी एव्हढ्यावरून तुम्ही हुरळून जाऊ नका. अद्याप पोलिसांनी FIR दाखल केलेला नाही एवढाच त्याचा अर्थ. जर कुठल्याही दबावाखाली पोलिसांनी बँकेविरुद्ध FIR फाईल केला तर या प्रकरणाशी संबंधित सर्वच कर्मचाऱ्यांना अटक करण्याचा ते नक्कीच प्रयत्न करतील. त्यामुळे सावध रहा. पोलिसांच्या गोड बोलण्यावर कदापिही विश्वास ठेवू नका. पोलीस स्टेशन मध्ये जाण्याचेही शक्यतो टाळा. माझ्या अंदाजाप्रमाणे आधी, तो तक्रारदार सुखदेव बोडखे, तडजोड करण्यासाठी एकदा तरी पुन्हा बँकेत येऊन जाईल. त्यामुळे निदान तोपर्यंत तरी तुम्ही अगदी निश्चिन्त रहा.”
 
पोलिसांनी आपला जबाब (स्टेटमेंट) नोंदवून घेतला, आवश्यक तो मुद्देमालही जप्त केला, त्यामुळे आपल्या मागे लागलेल्या या नसत्या झेंगटातून आता आपली मुक्तता झाली असं समजणाऱ्या सगळ्याच संबंधित स्टाफला RM साहेबांच्या या बोलण्याने धक्काच बसला. तो सुखदेव बोडखे लवकरात लवकर पुन्हा बँकेत यावा आणि काहीतरी तडजोड करून बँकेविरुद्धची तक्रार त्याने मागे घ्यावी अशीच सर्वजण मनातल्या मनात प्रार्थना करू लागले.
 
“रिजनल ऑफिस या प्रकरणात तुमच्यामागे भक्कमपणे उभं आहे. त्यामुळे न घाबरता आणि कसलीही काळजी न करता, मन लावून आपलं काम करीत रहा..” एवढं बोलून मिटिंग संपवून RM साहेब परत निघाले. ते हॉलच्या दरवाजाकडे जात असतानाच अचानक त्या पापग्रहाने.. सुखदेव बोडखेने, रागीट चेहऱ्याने घाईघाईत बँकेत प्रवेश केला.
“हे काय RM साहेब ? मला न बोलावता, न भेटता तसेच गुपचूप निघून चालला होतात की काय ?”
RM साहेबांना पाहताच सुखदेव तुच्छ उपरोधाने म्हणाला.
“तुम्ही आलात ? बरंच झालं..! चला आपण तिथे केबिन मध्ये बसून बोलू..”
राग आवरून संयम राखीत RM साहेब सुखदेवला माझ्या केबिन मध्ये घेऊन गेले.
“साहेब, तुमची चौकशी पूर्ण झाली का ? मला माझे पैसे कधी परत करणार ?”
सुखदेवने थेट मुद्द्यालाच हात घातला.
 
“हे पहा, बँकेची चौकशी इतक्या लवकर पूर्ण होत नसते. आधी चेकवरील सहीचा खरेखोटेपणा तपासून पहावा लागेल. आणखीही काही फॉर्म्यालिटीज आहेत..”
RM साहेबांचे बोलणे मधेच अर्धवट तोडीत उतावीळपणे सुखदेव म्हणाला..
“मी आता एक क्षण ही जास्त थांबू शकत नाही. तुम्ही मॅनेजर साहेबांना माझ्या खात्यात आजच्या आज तीन लाख रुपये जमा करायला सांगा. बाकीची रक्कम तुमची चौकशी पूर्ण झाल्यानंतर व्याजासहित परत करा. तुम्ही एवढं केल्यास मी बँकेविरुद्धची तक्रार मागे घेईन..”
“नाही, ते शक्य नाही !”
RM साहेब ठामपणे म्हणाले.
“ठीक आहे.. मग पुढील परिणाम भोगायला तयार रहा..”
खुर्ची वरून उठत खुनशी हास्य करीत सुखदेव शांतपणे म्हणाला.
 
“उद्या सकाळी पोलीस FIR दाखल करून घेतील. सर्व संबंधित कर्मचाऱ्यांना अटक होईल. बँकेची प्रचंड बदनामी होईल. पोलीस कर्मचाऱ्यांवर खटला भरतील. हा खटला किमान पंधरा वीस वर्षे चालेल. या संपूर्ण कालावधीत शेकडो वेळा कर्मचाऱ्यांना कोर्टात तारखेला हजर रहावे लागेल. हजर न झाल्यास वॉरंट निघेल. वर पोलीस वेळोवेळी त्रास देतील, पैसे लुबाडतील ते वेगळंच..! सबळ पुराव्या अभावी अनेक वर्षांनी कदाचित तुमचा स्टाफ निर्दोष सुटेलही परंतु तोपर्यंत कोर्टात नेहमी त्यांचा आरोपी म्हणूनच उल्लेख होईल. शेजाती पाजारी व नातेवाईकांत त्यांची बदनामी होईल. पोलीस नवीन नवीन कलमे लावतील. जामीन मिळविण्यासाठी त्यांना धावाधाव करावी लागेल. कोर्ट कचेरी आणि वकीलासाठी पाण्यासारखा पैसा खर्च होईल.. ! आज मला फक्त दोन लाख रुपये देऊन तुम्ही हे सारं टाळू शकता..”
 
केबिन बाहेर उभे राहून उत्कंठेने आतील संभाषण ऐकीत असलेल्या स्टाफच्या डोळ्यासमोर बोडखेने आगामी वास्तवाचे भीषण चित्रच उभे केले होते.
RM साहेबांनी मात्र बोडखेच्या बोलण्यावर कसलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. दोन क्षण वाट पाहून सुखदेव म्हणाला..
“तयार रहा मग उद्या तोफेच्या तोंडी जायला..!”
तरातरा पावले टाकीत बोडखे निघून गेला.
 
“उद्याचा दिवस तुमच्यासाठी कठीण दिसतो..! हा माणूस पूर्ण तयारी करून आलेला दिसतोय. उद्याची माझी या भागातील ब्रँच व्हिजिट सकाळी लवकर आटोपून दुपारी तीनच्या सुमारास पुन्हा एकदा तुम्हाला भेटायला शाखेत येऊन जातो..”
अशाप्रकारे कर्मचाऱ्यांना आश्वस्त करीत RM साहेब निघून गेले. जाताना त्यांच्या अनुभवी, गंभीर चेहऱ्यावरील चिंतेचे भाव पाहून हे प्रकरण आपण समजतो तितकं साधं सरळ नाही याची सर्वांनाच जाणीव झाली.
 
ठरल्याप्रमाणे रात्री आठ वाजता सब इंस्पे. हिवाळे CCTV रेकॉर्डिंग पाहण्यासाठी आले. रेकॉर्डिंग मध्ये नवीन काही पाहण्यासारखं नव्हतंच. नाही म्हणायला तो पैसे काढणारा इसम थोडा वेळ एका अन्य कस्टमरशी बोलताना दिसत होता. तो कस्टमर कोण आहे हे पाहून त्याला उद्या बँकेत बोलावून घेऊन त्याची चौकशी करायला त्यांनी सांगितलं. मात्र रेकॉर्डिंग पाहताना हिवाळेंशी खूप गप्पा झाल्या, त्यांच्याशी एकप्रकारे दोस्तीच झाली. कुणीतरी खूप हुशारीने ही घटना घडवून आणली आहे, बँक कर्मचाऱ्यांची यात कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणा नाही, तसेच तो पैसे काढणारा इसम अन्य गावचा असावा याबद्दल हिवाळेंना खात्री पटली.
 
सुखदेव बोडखेचा मुलगा बबन हा मवाली टाईप असून गेल्या वर्षी त्याने चक्क इथल्या पूर्वीच्या इन्स्पेक्टर साहेबांच्या कॉलेजात शिकणाऱ्या मुलीचीच छेड काढली होती. त्या प्रकरणी त्याला अटक करून भरपूर चोप दिल्याची माहितीही हिवाळेंनी दिली. ते असंही म्हणाले की..
“ते इन्स्पेक्टर साहेब नुकतेच इथून बदलून गेले आहेत म्हणून बरंय, नाहीतर त्यांनी त्या बोडखेची तक्रारच नोंदवून घेतली नसती..”
रात्री बाराच्या सुमारास हिवाळे बँकेतून परत जाण्यास निघाले तोपर्यंत सर्व स्टाफ बँकेतच थांबला होता. उद्या काय होणार याची चिंता प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.
 
घटनेचा सातवा दिवस उजाडला. कसला तरी सण असल्याने आज बँकेत विशेष गर्दी नव्हती. सकाळीच एक साध्या वेशातील व्यक्ती पोलीस स्टेशन मधून आलो असल्याचे सांगून काही व्यक्तींची संपूर्ण नावे लिहून घेत होती. विवादित चेक बुक इश्यू करणारी क्लर्क बेबी सुमित्रा, काउंटर वर चेक घेऊन टोकन देणारे सिनिअर क्लर्क रहीम चाचा, चेक पास करणारा अकाउंटंट रविशंकर, चेकचे पैसे देणारा कॅशियर सुनील सैनी अशा चौघांची नावे त्या माणसाने लिहून घेतली.
काल सांगितल्यानुसार दुपारी दोन वाजता ब्रँच व्हिजिट आटोपून औरंगाबादला परत जाताना RM साहेब दोन मिनिटांपुरते बँकेत आले.
आल्या आल्या त्यांनी विचारलं..
 
“आज काही विशेष ? Any further development in the matter ? पोलीस स्टेशन मधून काही फोन वगैरे ?”
“अद्याप तरी काही नाही..”
मी थोडक्यात उत्तर दिलं.
“ठीक आहे ! मी निघतो मग.. काही काळजी करण्या सारखं वाटलं तर लगेच फोन करा मला..”
RM साहेबांनी आपली कार बाहेर रस्त्यावरच उभी केली होती. त्यांना सोडण्यासाठी बाहेर रस्त्या पर्यंत गेलो. ते कार मध्ये बसताच अचानक कुठून तरी सुखदेव तिथे प्रकट झाला. RM साहेबांना नमस्कार करून तो म्हणाला..
 
“साहेब, पाच जणांच्या नावे उद्या अटक वॉरंट निघणार आहे. त्यांच्याकडून प्रत्येकी चाळीस हजार घेऊन मला आजच्या आज दोन लाख रुपये द्या. मी तक्रार मागे घेतो. ही शेवटचीच संधी समजा. तुमच्या स्टाफ बद्दल सहानुभूती वाटते, त्यांच्या लेकरा बाळांची चिंता वाटते म्हणून मी हा चान्स देतोय तुम्हाला..”
एकाएकी RM साहेबांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. त्यांना या साऱ्या प्रकाराचा उबग आला असावा. आवाज वाढवून कडक स्वरात ते म्हणाले..
“खबरदार, यापुढे असले पोरकट चाळे कराल तर.. ! तुमच्या असल्या धमक्यांना मी भीक घालीत नाही. तुम्हाला काय करायचं असेल ते करा. आमच्या स्टाफची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. या प्रकरणात जे काही होईल ते बँकेच्या नियमानुसारच होईल. यापुढे जर बँकेत पाय ठेवलात तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तुमच्याविरुद्धच पोलिसांत तक्रार करण्यात येईल.”
 
नंतर माझ्याकडे पहात ते म्हणाले..
“यापुढे जर हा माणूस बँकेत येऊन बडबड करू लागला तर सिक्युरिटी गार्ड करवी धक्के मारून याला हाकलून लावा..”
RM साहेबांनी गाडीची काच वर केली आणि त्यांची कार औरंगाबादच्या दिशेने निघाली.
सुखदेव बोडखे RM साहेबांच्या आकस्मिक उग्रावताराने स्तंभित होऊन अजून जागच्या जागीच उभा होता. नंतर भानावर येऊन डिवचल्यागत, चिडून पाय आपटीत तो सरळ पोलीस स्टेशनच्या दिशेने निघून गेला.
 
बँकेत परत आल्यावर मी घड्याळात बघितलं तर दुपारचे पावणेतीन वाजले होते. स्टाफ पैकी काहीजण लंच आटोपून आपापल्या काउंटर वर जाऊन बसले होते. मी ही घाईघाईत माझा लंच बॉक्स उघडला तेवढ्यातच टेबलावरील फोन खणाणला. पलीकडून वैजापूर ठाण्याचे ईंचार्ज इन्स्पेक्टर माळी बोलत होते.
“नमस्कार ! वैजापूर पोलीस स्टेशन मधून ठाणेदार इंस्पे. माळी बोलतोय. तुमच्या स्टाफ विरुद्ध आमच्या ठाण्यात सुखदेव बोडखे यांनी फिर्याद नोंदविल्याचे तुम्हाला माहीतच असेल. त्याच संदर्भात आम्ही त्यांना समजावले असून मोठ्या मुश्किलीने ते आपली तक्रार मागे घेण्यास तयार झाले आहेत. तरी तुम्ही ताबडतोब बेबी सुमित्रा, शेख रहीम, रविशंकर व सुनील सैनी या चार जणांना घेऊन पोलीस ठाण्यात या, म्हणजे त्यांचे एक छोटेसे स्टेटमेंट व सही घेऊन प्रकरण मिटवून टाकता येईल. कृपया जरा लवकर या, आम्ही तुमची वाट पहात आहोत.”
 
इंस्पेक्टर साहेबांचे बोलणे ऐकत असताना माझ्या मस्तकात भीतीची एक थंडगार लहर उमटून गेली. जणू माझा मेंदू मला अनामिक संकटाचा इशाराच देत होता.
“येस सर, सध्या आम्ही लंच घेत आहोत. लंच झाल्यावर सर्वांना घेऊन लगेच तिकडे येतो. थँक यू व्हेरी मच, सर !”
थरथरत्या हातांनीच मी फोन खाली ठेवला. वाघाच्या गुहेत जाण्याची वेळ आली होती. बेबी, रविशंकर, रहीम व सैनी या चौघांना केबिन मध्ये बोलावून घेऊन त्यांना इंस्पे. माळींच्या फोन बद्दल सांगितलं.
“पोलीस स्टेशन मध्ये किती वेळ लागेल ते सांगता येत नाही, म्हणून आपल्या काऊंटरचे काम दुसऱ्यांना देऊन जा..”
असं सांगून पोलीस स्टेशन मध्ये जाण्यासाठी मी जागेवरून उठलो. कॅश टॅली करून काउंटरचा चार्ज दुसऱ्याला देण्यास सुनील सैनीला थोडा वेळ लागला. त्या मधल्या वेळेत RM साहेबांना ही रिसेन्ट डेव्हलपमेंट कळवावी म्हणून मोबाईल वरून त्यांच्याशी संपर्क साधला. एव्हाना ते औरंगाबादच्या अर्ध्या वाटेपर्यंत पोहोचले होते. त्यांना इंस्पे. माळींच्या फोन बद्दल सांगताच त्यांनी ताबडतोब आपली कार जागीच थांबवली..
“हा पोलिसांचा ट्रॅप आहे. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाताच ते तुम्हाला लागलीच अटक करतील. त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवा आणि मिळेल त्या वाहनाने ताबडतोब औरंगाबादकडे निघा. तोपर्यंत मी तुमची इथे राहण्याची व्यवस्था करून ठेवतो. तिथून निघाल्यावर पोलीस स्टेशनच्या कुठल्याही कॉल ला उत्तर देऊ नका..”
 
… युद्ध सुरू होण्यापूर्वीचा शंखनाद झाला होता. लवकरच आमने सामने प्रत्यक्ष युद्धाला सुरवात होणार होती. सुदैवाने आसपासच्या शाखेतून कॅश नेण्या-आणण्यासाठी वैजापूर शाखेत कॅश व्हॅन ची व्यवस्था होती. त्या व्हॅन मध्ये सर्वांना बसवलं.cash van आपण व्हॅन मधून पोलीस स्टेशनला चाललो आहोत असंच ड्रायव्हर सहित सर्वांना वाटलं. व्हॅन गेटच्या बाहेर निघाल्यावर मी ड्रायव्हरला म्हणालो..
“चलो औरंगाबाद.. !!”
( क्रमश: 5 )
 

ajay-kotnis-photo1श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे

Mind blowing experiences of a Banker-3 एका बँकर चे थरारक अनुभव-3

ajay kotnis

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

बँकस्य कथा रम्या..

स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव..

(भाग : 3)

सगळा स्टाफ डोळे विस्फारून वर्तमान पत्रात आलेली ती बातमी अधाशासारखी वाचून काढीत होता. मी मात्र कालपासून एखाद्या त्रयस्थाप्रमाणे या सगळ्या घटनाक्रमाकडे पहात होतो. वर्तमानपत्रात अशी बातमी येणार याचा मला अंदाज होताच, पण ती इतक्या लवकर येईल हे मात्र अपेक्षित नव्हतं. माझ्या केबिनमध्ये जमलेल्या स्टाफला उद्देशून म्हणालो..
 
“पेपर मधील या बातमीने विचलित होऊ नका. आजपासून लोकांच्या तुमच्याकडे पाहण्याच्या नजरा बदलतील.. काही खवचट कस्टमर तुम्हाला या बातमीच्या संदर्भात नाना प्रकारचे अपमानास्पद प्रश्न, कुत्सित शंका विचारतील.. टोमणे मारतील.. त्या सर्वांकडे दुर्लक्ष करायचं.. चिडचिड न करता संयम राखून शांतपणे आपलं काम करायचं.. कुणाशीही वाद घालायचा नाही.. तसंच आपल्या कुठल्याही अंतर्गत बाबींची बाहेर कुणाशीही चर्चा करायची नाही..”
 
आमचं असं बोलणं सुरू असतानाच रिजनल मॅनेजर साहेबांनी बँकेत प्रवेश केला.
 
बँकिंग हॉलमध्ये RM साहेबांनी स्टाफची एक छोटीशी मिटिंग घेतली.meeting सुरवातीला कालच्या घटनेबद्दल थोडक्यात सांगुन झाल्यावर आम्ही तो चेक RM साहेबांना दाखवला. तसंच चेकबुक इश्यु रजिस्टर मधील दोन्ही चेकबुकच्या नोंदी दाखवून दुसऱ्या चेकबुकसाठी घेतलेला अर्ज फायलिंग मधून गहाळ झाला असल्याचंही सांगितलं. सीसीटीव्हीचं फुटेज व संशयिताच्या फोटो प्रिंट्स पाहिल्यावर RM साहेबांनी चेक वरील सही स्कॅन केलेल्या सहीच्या नमुन्याशी ताडून पाहीली. घडलेल्या प्रकारात स्टाफची कोणतीही चूक किंवा निष्काळजीपणा नाही याची त्यांना खात्री पटली.
 
रत्नमालाबाईंना दुसरं चेकबुक कुणी सुपूर्द (handover) केलं ? या त्यांच्या प्रश्नावर कुणीच उत्तर दिलं नाही. सामान्यत: काउंटर क्लार्क किंवा प्युन हे काम करायचे. मात्र रत्नमालाबाईंना दुसरं चेकबुक दिल्याचं कुणालाही आठवत नव्हतं. कामाचा कितीही रश असला तरीही चेक बुक दिल्यावर कस्टमरने रजिस्टरवर नीट सही केली किंवा नाही याची खात्री करून घेतलीच पाहिजे असं RM साहेबांनी स्टाफला बजावलं.
 
त्यानंतर ते फायलिंगचं काम करणाऱ्या रामदास प्युन (दप्तरी) कडे वळले. या प्युनचं काम अत्यंत अपटुडेट होतं. चेकबुक इश्यु रजिस्टर समोर ठेवून त्यातील सिरीयल नंबर नुसार Cheque Book Requisition Slips फाईल करण्याची त्याची पद्धत होती. त्याने चेकबुकच्या अर्जांची फाईलच RM साहेबांना दाखविली. त्याचं चेकबुकच्या सिरीयल नुसार केलेलं गेल्या काही महिन्यातील फायलिंग साहेबांनी चेक केलं. इतकं व्यवस्थित फायलिंग पाहून त्यांनी रामदास दप्तरीच्या कामाचं कौतुक केलं. 
 
रामदास म्हणाला..
“साहेब, मी खात्रीपूर्वक सांगतो की रत्नमालाबाईंचा दुसऱ्या चेकबुकसाठीचा अर्ज मी व्यवस्थित फाईल केला होता. त्यानंतरच तो फाईलमधून गहाळ करण्यात आला आहे.”
 
स्टाफची मिटिंग आटोपल्यावर RM साहेब माझ्या केबिनमध्ये येऊन बसले. काल रात्री उशिरापर्यंत जागून काही महत्त्वाचे मुद्दे मी लिहून काढले होते, ते थोडक्यात असे होते..
.१. मुलासाठी मोटार सायकल घ्यायची असून, त्यासाठी खाजगी बँकेकडून कर्ज घ्यायचे असल्याने चेक बुक हवे आहे असे सांगून सुखदेव बोडखेने बायकोच्या नावाने खाते उघडून चेक बुक घेतले होते. मात्र आता तो शेती घेण्याबद्दल सांगतो आहे.
.२. खाते उघडुन ज्या दिवशी दुसरे चेक बुक घेतले त्याच दिवशी खात्यात सहा लाख रुपये जमा करण्यात आले. आणि लगेच दुसऱ्या दिवशी त्यातून पाच लाख ऐंशी हजार रुपये काढून घेण्यात आले. यावरून हा सर्व प्लॅन अत्यंत घाईघाईत, एकही दिवस वाया न घालवता त्वरित अंमलात आणण्यात आल्याचे दिसते.
.३. ज्या अर्थी दुसऱ्या चेकबुक बद्दल बोडखे कुटुंब काहीही बोलण्यास तयार नाही, त्या अर्थी या घटनेत त्यांचाही सहभाग असू शकतो.
.४. चेकवरील सही ओरिजिनल सहीशी तंतोतंत जुळते. याचाच अर्थ चेकवर सही करणारी व्यक्ती बोडखे कुटुंबाच्या निकटच्या परिचयाची असावी, ज्याला रत्नमालाबाईंची सही कशी आहे याबद्दल माहिती आहे.
.५. ही निकटच्या परिचयाची व्यक्ती म्हणजे त्यांचा मुलगा बबन बोडखे असू शकते. कारण दुसरे चेकबुक घेण्यासाठी तोच बँकेत आला होता. तसेच त्याला आपल्या आईची सही माहीत असणे अत्यंत साहजिक आहे.
.६. चेकबुक इश्यु रजिस्टरवर रत्नमालाबाईंची जाणूनबुजून सही न घेणे तसेच दुसऱ्या चेकबुक साठीचा अर्ज फाईल मधून गहाळ होणे यात बँकेतीलच कुणातरी कर्मचाऱ्याचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.७. सर्वात महत्वाचे म्हणजे आदल्या दिवशी दुपारी तीन वाजता त्या अनोळखी व्यक्तीने रत्नमालाबाईंच्या खात्यातून पैसे काढून नेल्यावर लगेच त्या घटनेची माहिती बोडखे कुटुंबाला कशी मिळाली ? कारण त्यांच्यापैकी कुणीही दुपारनंतर खात्यातील बॅलन्सची चौकशी करण्यासाठी बँकेत आलेले नव्हते. तसेच ताबडतोब घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सकाळी बोडखे कुटुंबाने बँकेत येऊन आरडाओरड केली होती. याचा अर्थ त्यांना खात्यातून पैसे काढले गेल्याबद्दल आदल्या दिवशीच समजले होते.
.८. पत्रकार, राजकीय नेते गोळा करणे, खात्यातील पैसे परत मागण्यासाठी बँकेला दिलेला अर्ज लिहून तो टाईप करणे.. ही सर्व कामे सुखदेव बोडखे याने निश्चितपणे आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी खात्यातून पैसे काढले गेले त्याच दिवशी केली असली पाहिजेत. यावरून त्यांना या घटनेची पूर्वकल्पना होती असेच दिसते.
 
वरील सर्व मुद्दे मी RM साहेबांच्या निदर्शनास आणून दिले. आपल्या खात्यातून एवढी मोठी रक्कम काढून नेल्याचे जर एखाद्या स्त्रीला समजले तर तिची पहिली सहज, नैसर्गिक प्रतिक्रिया म्हणजे झालेल्या प्रचंड आर्थिक नुकसानीमुळे जबर धक्का बसून तिला अपार दुःख होईल, डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागतील.. ती पैसे परत करण्याची बँकेला विनंती करेल. परंतु याच्या विपरीत रत्नमालाबाई तर भांडण करण्याच्या तयारीनेच बँकेत आली होती. तिला जराही दुःख झाल्याचे दिसत, जाणवत नव्हते.. या बाबीकडेही मी RM साहेबांचे लक्ष वेधले.
 
आमची चर्चा चालू असतानांच सुखदेव भेटायला आल्याची सिक्युरिटी गार्डने वर्दी दिली.
 
जणू सर्वस्वच लुटल्यासारखा भयाण, उध्वस्त चेहरा करून सुखदेवने केबिनमध्ये प्रवेश केला. अबोलपणे आदरार्थी नुसती मान झुकवत RM साहेबांना नमस्कार करून त्यांच्याकडे भकास, दीनवाण्या नजरेने पहात तो हात जोडून उभा राहीला. RM साहेबांनी त्याला खुर्चीवर बसायला सांगितलं.
वेळ न घालवता थेट मुद्द्यालाच हात घालत RM साहेब म्हणाले..
 
“हे पहा सुखदेवजी, तुमच्या पत्नीची बनावट सही करून तिच्या खात्यातून कुणा अपरिचित व्यक्तीने मोठी रक्कम काढून नेल्यामुळे धक्का बसून तुमची जी दुःखद मानसिक अवस्था झाली आहे, त्याची मला जाणीव आहे. तुम्हाला लवकरात लवकर तुमचे पैसे परत मिळावेत अशी आमचीही इच्छा आहे.. तरीपण अशा प्रसंगी बँकेचेही काही नियम, काही कार्य पद्धती असते. आमची बँक ही एक सरकारी संस्था असल्याने सर्व नियमांचे काटेकोर पालन आम्हाला करावेच लागते. संबंधित चेकवरील सही ही खऱ्या सहीशी हुबेहूब जुळत असल्याने हस्ताक्षर तज्ज्ञांकडून तिचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. जर ती सही बनावट, (forged) असल्याचे सिद्ध झाले तर बँक तुम्हाला तुमचे पैसे नक्की परत करील. कृपया तोपर्यंत धीर धरा आणि बँकेला या घटनेच्या तपासात सहकार्य करा..”
सुखदेवने आतापर्यंत खाली घातलेली मान वर केली. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. संमतीदर्शक मान डोलावीत आणि आपले थरथरते हात RM साहेबांपुढे जोडून कापऱ्या आवाजात तो म्हणाला..
 
“ठीक आहे साहेब.. तुमचे म्हणणे मला मान्य आहे. तुमचा तपास पूर्ण होईपर्यंत थांबायला मी तयार आहे. परंतु या पैशांतून जी जमीन मी विकत घेणार होतो तिचा मालक एक दिवसही थांबायला तयार नाही. हा सौदा फिस्कटला तर जमीन तर हातातून जाईलच पण ईसार म्हणून दिलेले पन्नास हजारही बुडतील. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी तुमचा विशेष अधिकार वापरून किमान दोन लाख रुपये मला आजच्या आज देण्याची व्यवस्था करावी. म्हणजे ते पैसे जमीन मालकाला देऊन मी सौद्याची मुदत वाढवून घेऊ शकतो..”
 
सुखदेव बोडखेच्या करुण चेहऱ्यावरील हतबल, दीन, लाचार हावभाव इतके अस्सल होते की क्षणभर मलाही त्याची दया आली. मात्र त्याचे कालचे कांगावखोर, कपटी, कावेबाज रूप पाहिले असल्याने त्याच्या जातीवंत कसलेल्या अभिनयाला मनोमन दाद देत मी गप्प राहून RM साहेब त्याला काय उत्तर देतात हे उत्सुकतेने ऐकू लागलो..
 
निनाद राणे.. आमचे तरुण तडफदार रिजनल मॅनेजर हे खूप धाडसी, निर्भीड व चाणाक्ष अधिकारी होते. अशा धूर्त, मतलबी, ढोंगी लोकांचा त्यांना चांगलाच अनुभव होता.
 
“बँकेच्या नियमांचे उल्लंघन न करता जी काही मदत तुम्हाला करता येईल ती सर्व आम्ही निश्चितच करूच.. पण त्यापूर्वी काही महत्वाच्या बाबींचे स्पष्टीकरण मला तुमच्याकडून हवं आहे..”
 
RM साहेबांनी असे म्हणतांच सुखदेवचे कान ताठ झाले.. सावधपणे तो म्हणाला..
“बोला ना साहेब.. कोणत्या बाबी.. ?”
“तुमच्या खात्यातून पैसे काढले गेल्याचे तुम्हाला कसे समजले ? कारण दुपारी तीन वाजता त्या व्यक्तीने पैसे काढून नेल्यावर तुमच्या कुटुंबातील कोणीही बँकेत खात्याची चौकशी करण्यासाठी आलं नव्हतं असं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग वरून दिसतं. मग लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी बँक उघडण्यापूर्वीच तुम्हाला तुमच्या खात्यातून कुणीतरी पाच लाख ऐंशी हजार रुपये काढले आहेत हे कसं समजलं ?”
 
RM साहेबांचा बिनतोड प्रश्न ऐकतांच सुखदेवच्या चेहऱ्यावरील भाव झरकन बदलले.. बहुदा त्याने या प्रश्नाची अपेक्षाही केली असावी. कारण निर्ढावलेल्या, उद्धाम स्वरात तो म्हणाला..
“ते मी तुम्हाला कशाला सांगू ? म्हणजे तुम्ही विनाकारण त्या सांगणाऱ्या व्यक्तीला त्रास देणार.. ! आणि.. आम्हाला कुणी का सांगेना, खात्यातून पैसे गेले आहेत ही गोष्ट तर खरीच आहे ना ?”
 
सुखदेव मुरलेला चाणाक्ष, बिलंदर होता. RM साहेबांचा हा तीर वाया गेला होता. सुखदेवकडे रोखून पहात RM साहेब म्हणाले..
“ठीक आहे, तुमची मर्जी..! पण तो चेक तुम्हाला दिलेल्या दुसऱ्या चेकबुक मधील आहे. आणि ते चेकबुक स्वतः तुमची पत्नी व मुलगा यांनी बँकेतून नेल्याचे सीसीटीव्हीत दिसते आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ?”
 
RM साहेबांनी टाकलेला हा फसवा गुगली चुकवणं सुखदेवला शक्यच नव्हतं. खरं म्हणजे दुर्दैवाने बोडखे कुटुंबाला दुसरं चेकबुक देतांनाचे कुठलेही रेकॉर्डिंग सीसीटीव्ही फुटेजमध्ये नव्हते. बहुदा अतिशय हुशारीने सीसीटीव्हीच्या रेंजबाहेर उभे राहून त्यांनी ते चेक बुक घेतलं असावं. मात्र ही बाब सुखदेवला माहीत असण्याची शक्यता नव्हती.
 
“हे पहा साहेब, तुम्हाला असं वाटत असेल की ते चेकबुक खरंच आम्ही नेलं असेल तर तसं सिद्ध करा. आमचा अर्ज, रजिस्टरवर सही, सीसीटीव्ही रेकॉर्डिंग काहीही दाखवा आम्ही ते मान्य करू. पण जर तुमच्याकडे यापैकी काहीही पुरावा नसेल तर मात्र वेळ न घालवता आम्हाला आमचे पैसे देऊन टाका. मी माझी तक्रार मागे घेऊन हे प्रकरण मिटवून टाकेन.”
 
सुखदेवच्या चेहऱ्यावर आता कुटील, बेरकी हास्य होतं. निरुत्तर होऊन RM साहेब उपरोधाने म्हणाले..
“अरे वा ! बॅंकेतील अंतर्गत बाबींची तुम्हाला स्टाफ पेक्षा ही जास्त माहिती असल्याचं दिसतंय.. ही घटना कशी घडली किंवा कशी घडवून आणली गेली याची थोडी थोडी कल्पना येतेय मला..”
 
“नुसत्या कल्पना करीत बसू नका..” खुर्चीवरून उठून उभा रहात RM साहेबांकडे बोट रोखीत त्वेषाने सुखदेव म्हणाला..
“एक दिवस..! आणखी फक्त एक दिवस मी थांबेन.. आणि तेही तुम्ही खास मला भेटायला इथवर आलात म्हणून केवळ तुमचा मान राखण्यासाठी.. पण त्यानंतर मात्र एक सेकंदही न थांबता थेट पोलीस स्टेशनची पायरी चढेन.. आणि.. पोलिसांचं काम तर तुम्ही जाणताच.. स्टाफचा छळ, अटक, जामीन, कोर्टात फेऱ्या, बँकेची बदनामी.. आत्ताच सारं काही बोलत नाही.. उद्या संध्याकाळ पर्यंत तुम्हाला मुदत देतो.. तुमच्या स्टाफची तुम्हाला खरोखरीच काळजी असेल तर विचारपूर्वक योग्य तो निर्णय घ्या.. येतो मी !”
 
दोन्ही हात उंचावून नमस्कार करीत झपाझप पावले टाकीत सुखदेव बँकेतून निघून गेला. तो गेल्यावर निश्वास सोडीत RM साहेब म्हणाले..
“काय डेंजरस माणूस आहे हा.. ! खात्रीने सांगतो, यानेच पैसे काढले आहेत आणि आता उलट्या बोंबा मारतो आहे.. पण तुम्ही घाबरू नका.. रिजनल ऑफिस तुमच्या पाठीशी आहे.. तसं मी DGM आणि GM साहेबांच्या कानावरही घालून ठेवतो हे प्रकरण.. पुढील दोन दिवस Branch व्हिजिट साठी मी याच परिसरात आहे, तेंव्हा काही काळजी करण्यासारखं वाटलं तर लगेच फोन करा.. मी येऊन भेटून जाईन..”
 
केबिन बाहेर येऊन RM साहेबांनी स्टाफचा निरोप घेतांना त्यांची पाठ थोपटून त्याचं कौतुक केलं..
“यू आर डुईंग गुड जॉब.. असंच एकजुटीने राहून काम करा.. आणि निश्चिन्त रहा.. आमचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे..”
कारमध्ये बसल्यावर RM साहेबांनी मला जवळ बोलावून हळू आवाजात सांगितलं..
“ते paid instrument (चेक), चेकबुक इश्यु रजिस्टर आणि सीसीटीव्ही रेकॉर्डिंग हे सारं तुमच्या Safe Vault मध्ये नीट सुरक्षित ठेवा. त्या अर्जाप्रमाणेच या गोष्टी सुद्धा गहाळ केल्या जाऊ शकतात..”
 
 
त्यानंतरचे दोन दिवस शांततेत गेले. फक्त एक दिवस थांबून मग पोलीस केस करण्याची धमकी देऊन गेलेला सुखदेव हे दोन दिवस बँकेकडे फिरकलाही नाही. रत्नमाला बाईंचा पैसे परत करण्याची मागणी करणारा अर्ज मी या आधीच रिजनल ऑफिसला पाठवून दिला होता. प्रकरणाची चौकशी करण्यासठी क्षेत्रीय कार्यालयातर्फे एक वरिष्ठ अधिकारी शाखेला भेट देऊन गेले. अकाऊंटंट रविशंकर, चेकबुक देणारी बेबी सुमित्रा, चेक घेऊन टोकन देणारे सिनियर काऊंटर क्लर्क रहीम चाचा व फायलिंग करणारा दप्तरी प्युन रामदास.. या चौघांना नियमांची काटेकोर अंमलबजावणी न करून कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल स्पष्टीकरण (explanation) विचारण्यात आले.
 
अशातच, सुखदेव बोडखे गेले दोन दिवस पोलीस स्टेशनमध्येच बसला असून फौजदार साहेबांशी अर्थपूर्ण वाटाघाटी करीत असल्याचे वृत्त संजू चहावाल्याने आणले. बहुदा, सुखदेवच्या तक्रारीवरून पोलिसांनी बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध FIR दाखल केला असावा असा त्याचा अंदाज होता. वैजापुरातील रिक्षावाले अवैध वाहतुकीबद्दल पोलिसांना द्यावा लागणारा हफ्ता संजूकडेच जमा करीत असत. ती रक्कम देण्यासाठी संजू नेहमीच पोलीस स्टेशनमध्ये जात असे. त्यामुळे त्याला पोलीस स्टेशन मधील हालचालींची अपटुडेट बित्तंबातमी मिळत असे.
 
RM साहेब रोज संध्याकाळी फोन करून प्रकरणातील ताज्या घडामोडींची माहिती घेत असत. सुखदेवने बॅंकेविरुद्ध पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली असल्याची शंका त्यांना बोलून दाखवतांच ते म्हणाले..
“हे तर अपेक्षितच होते. आता पोलिस बँकेत येऊन चौकशी करतील. ते जी माहिती मागतील ती देऊन त्यांना तपासात सहकार्य करा. कोणत्याही परिस्थितीत घाबरून जाऊन सुखदेवशी संपर्क साधू नका. पोलीस येऊन गेल्यावर तो स्वतःच बँकेत येईल..”
 
 
माझं मन नुसतं बेचैन झालं होतं. विचार करून करून डोक्याचा भुगा झाला होता. कुणी घडवून आणलं असावं हे सारं ? रात्री उशिरापर्यंत CCTV चं घटनेच्या दिवसाचं रेकॉर्डिंग सारखं डोळे ताणून पुन्हा पुन्हा काळजीपूर्वक बघत होतो. पण कुठलाच अगदी पुसटसा धागा दोरा ही गवसत नव्हता.
हा सुखदेव बोडखे अजून एवढा शांत का ? त्याचा पुढचा प्लॅन काय असावा ? बँकेतील कर्मचाऱ्यांना त्याच्या पूर्वेतिहासाबद्दल जी माहिती समजली होती त्यावरून तो अत्यंत धूर्त, नीच आणि कोडग्या मनोवृत्तीचा होता. या पूर्वी वैजापुरातील अन्य बँकांतील कर्मचाऱ्यांना केवळ पोलिसांची व बदनाम करण्याची धमकी देऊन लुबाडण्यात तो यशस्वी झाला होता. आमच्या दुर्दैवाने त्याची शिकारी वक्रदृष्टी आता आमच्या बँकेतील कर्मचाऱ्यांकडे वळली होती.
आपण कोणतंही चुकीचं गैरकृत्य केलेलं नाही त्यामुळे “कर नाही त्याला डर कशाला” या उक्तीनुसार आपल्याला घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे जरी मनाला समजावीत असलो तरी लवकरच काही तरी विपरीत, अशुभ, अघटित घडणार आहे अशी आतून हुरहूर लागून राहिली होती.
त्यातून अजून त्या *जयदेव खडके* चा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता..
कोण होता हा जयदेव खडके ???
(क्रमशः 4 )
 
 
 

ajay-kotnis-photo1श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे

Mind blowing experiences of a Banker-2 एका बँकर चे थरारक अनुभव-2

ajay kotnis-2

बॅंकस्य कथा रम्या..

स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव..

(भाग.. 2)
अचानक झालेल्या या गर्दी गोंधळामुळे क्षणभर गांगरून मी अचंभित झालो.
“आत्ताच्या आत्ता आमचे पैसे परत करा.. !!”
 
उजव्या हाताची मूठ वळून ती माझ्या टेबलावर जोरजोराने आपटीत रत्नमाला ओरडत होती. तिचा पती व मुलगा हे दोघेही रागारागाने हातवारे करून तारस्वरात ओरडत तिला साथ देत होते. हा सगळा तमाशा करीत असताना अधून मधून ते आपल्या मागे पुढे, सगळीकडे नजर फिरवून बँकिंग हॉल मधील ग्राहकांचे लक्ष आपल्याकडे वेधले गेले आहे की नाही याची खातरजमा करून घेत होते.bank
 
जागीच उभा रहात दोन्ही हात उंचावून त्यांना शांत राहण्याची खूण करीत म्हणालो..
“शांत व्हा.. शांत व्हा.. ! तुम्ही काय म्हणताय ते मला अजिबात समजत नाहीये.. कुठल्या पैशाबद्दल बोलताय तुम्ही..? इथे नीट बसून मला सविस्तरपणे समजावून सांगा..”
 
यावर डोळे मोठ मोठे करीत रागारागाने सुखदेव किंचाळला..
“काय साहेब नाटक करताय ? काल आमच्या खात्यातून एवढी मोठी रक्कम गेली आणि तुम्ही म्हणताय की तुम्हाला काहीच माहीत नाही.. ? ते काही नाही.. आम्ही इथे बसायला आलेलो नाही.. बऱ्या बोलाने ताबडतोब आमचे पैसे देता की नाही ते सांगा.. !”
 
सुखदेव आणि रत्नमाला यांची ती बेभान अवस्था बघून मी त्यांच्या तरुण मुलाला.. बबनला म्हणालो,
“बबन, तू तरी सांग नेमकी काय तक्रार आहे तुमची ? काल दुपारपर्यंत मी बँकेतच नव्हतो. त्यामुळे खरंच काल काय झालं याची मला काहीही कल्पना नाही..”
“परवाच मी आईच्या खात्यात सहा लाख रुपये जमा केले होते आणि काल कुणीतरी त्यातून पाच लाख ऐंशी हजार रुपये काढून घेतले आहेत. आमच्या खात्यातले पैसे तुम्ही असे दुसऱ्या कुणालाही कसे देऊ शकता ?
 
बबनने एकदाचा खुलासा केला.
“काही नाही रे बबन, हे आपल्याशी खोटं बोलत आहेत.. ह्या बँकेतल्या साऱ्या कर्मचाऱ्यांनी मिळूनच आपले पैसे गिळंकृत केले आहेत.. आणि आता आपली दिशाभूल करीत आहेत.. एका स्वातंत्र्य सैनिकाच्या असहाय्य कुटुंबाची ते अशी घोर फसवणूक करीत आहेत.. यांना चांगला धडा शिकविलाच पाहिजे..”
रागाने लालबुंद होत तावातावाने सुखदेव बबनला म्हणाला.
 
आश्चर्य म्हणजे सुखदेव सोबत आलेले आठ दहा अनोळखी लोक कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त न करता माझ्या केबिन मध्ये शांतपणे नुसते उभे होते.
ताबडतोब अकाऊंटंट, फिल्ड ऑफिसर आणि हेड कॅशिअर या तिघांनाही माझ्या केबिन मध्ये बोलावले आणि “हे लोक काय म्हणताहेत..? तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे काय ?” असं विचारलं. त्या तिघांनीही नकारार्थक मान डोलावत त्यांना याबद्दल काहीही माहीत नसल्याचे सांगितले.
 
मग मात्र माझं डोकंच चक्रावून गेलं. जर स्टाफ पैकी कुणालाच अशा कोणत्याही घटनेची माहिती नाही तर मग ह्या बोडखे कुटुंबाला त्याबद्दल कुणी सांगितलं.. ?
दरम्यान रत्नमालाबाईं कडून त्यांच्या खात्याचं पासबुक घेऊन अकाऊंटंट साहेब त्या खात्यात आतापर्यंत कोणकोणते व्यवहार झाले आहेत हे तपासायला घेऊन गेले होते. तोपर्यंत चपराशा कडून जास्तीच्या खुर्च्या मागवून केबिन मध्ये आलेल्या सर्व मंडळींची बसण्याची व्यवस्था केली. सर्वजण खुर्च्यांवर शांतपणे बसलेले पाहताच संजू चहावाल्याने लगबगीने सर्वांसाठी फक्कडसा चहा करून आणला.
 
आता सुखदेवही बराच शांत झाला होता. आत्मविश्वासाने सगळ्यांकडे पहात आपल्या बरोबर आलेल्या मंडळींचा त्याने परिचय करून दिला. ती मंडळी म्हणजे चार पत्रकार, दोन वकील, तीन राजकीय पक्षांचे स्थानिक पदाधिकारी व एक दोन सामाजिक कार्यकर्ते होते.
 
सर्व जण अकाऊंटंट साहेब परत येण्याची वाट पहात होते. सुखदेवने हातातील पिशवीतून कागदांची एक सुरळी काढून त्यातील एक कागद माझ्या समोर ठेवला. तो रत्नमाला बोडखे यांनी त्यांच्या खात्यातून काढले गेलेले पाच लाख ऐंशी हजार रुपये परत मिळावे या साठी मला उद्देशून लिहिलेला अर्ज होता. त्या अर्जाच्या प्रतिलिपी (copies) आमच्या बँकेचे चेअरमन, रिजनल मॅनेजर, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांच्यापासून ते थेट राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, रिझर्व्ह बँक गव्हर्नर यांना अग्रेसित (forward) केलेल्या होत्या.
 
“आणखी तीन वर्षांनी मी रिटायर होणार आहे.. मला पेन्शन नाही.. मुलाला नोकरी नाही.. घरी वृद्ध वडील आहेत, त्यांना स्वातंत्र्य सैनिकाची पेन्शन मिळते. त्याचाच काय तो आधार आहे. निवृत्तीनंतर शेती करून उदर निर्वाह करावा अशा विचाराने बायकोचे दागिने मोडून शेती विकत घेण्यासाठी हे पैसे उभे केले होते. पण तुम्ही बँकवाल्यांनी ते खाऊन टाकले, त्यामुळे माझे शेती घेण्याचे स्वप्न चक्काचूर झाले. माझे व माझ्या कुटुंबियांचे भविष्य तुम्ही अंधःकारमय केलेत..”
एखाद्या सराईत वक्त्या प्रमाणे छापील पोपटपंची करीत सुखदेव बोडखे बोलत होता. जणू जमलेल्या पत्रकारांना पेपरात छापण्यासाठी तो तयार वाक्येच पुरवीत होता.
 
“जर आमच्या आयुष्यभराची पुंजी, जी तुमच्या कर्मचाऱ्यांनी हडप केली आहे, ती आम्हाला दोन दिवसात परत मिळाली नाही तर मी हे प्रकरण पोलिसांत देईन, माझ्या पत्रकार मित्रांतर्फे वर्तमानपत्रांत याबद्दल आवाज उठविन.. ! हा अर्ज घ्या.. आणि ह्या दुसऱ्या कॉपी वर Received लिहून सही शिक्का मारून द्या..”
सुखदेवचे बोलणे सुरू असतांनाच अकाऊंटंट साहेब रत्नमाला बाईंच्या खात्याची चौकशी करून केबिन मध्ये परत आले होते..
“सर, परवा या खात्यात सहा लाख रुपये जमा करण्यात आले होते आणि काल चेक द्वारे त्यातून पाच लाख ऐंशी हजार रुपये काढून घेण्यात आले आहेत. आज रोजी खात्यात फक्त वीस हजार रुपये शिल्लक आहेत.. तसंच, ही पाहा कालची व्हाऊचर्स.. ! त्यातील ह्या पाच लाख ऐंशी हजार रुपयांच्या चेक वर रत्नमाला बाईंचीच सही आहे आणि त्यांना दिलेल्या चेक बुक मधीलच हा चेक आहे..”
 
एका दमांतच अकाऊंटंट साहेबांनी घडाघडा सर्व माहिती सांगून टाकली.
“हा चेक तुम्हीच पास केला असेल ना ?”
मी अकाऊंटंट साहेबांना विचारलं..
“नाही साहेब ! गेले दोन दिवस मी रजेवर होतो. माझ्या जागी रविशंकर बसला होता, त्यानेच पास केला आहे हा चेक..”
“ठीक आहे.. तुम्ही जा, आणि कृपया
रविशंकरला इकडे पाठवून द्या..”
अकाऊंटंट साहेब निघून गेल्यानंतर लगेच आधी माझ्या कॉम्प्युटर वरून रत्नमाला बाईंच्या सहीचा नमुना चेक केला. तो चेकवरील सहीशी तंतोतंत जुळत होता. तसेच तो चेक ही त्या बाईंना दिलेल्या additional चेक बुक मधील असल्याचे कॉम्प्युटर दाखवीत होता.
“बघा.. !” रत्नमाला बाईंना तो चेक दाखवीत मी म्हणालो..
“हा चेक तुम्हाला दिलेल्या चेक बुक मधीलच आहे आणि त्यावरील सही सुद्धा तुमचीच आहे. या बेअरर चेकचे पेमेंट करण्यात आमच्या कर्मचाऱ्यांकडून कोणतीही चूक झाल्याचे मला तरी दिसत नाही.. !!”
 
माझ्या या ठासून बोलण्याचा रत्नमाला बाईंवर काहीएक परिणाम झाला नाही. तितक्याच निर्धारपूर्वक ठामपणे ती म्हणाली..
“पण मुळात ही सही मी केलेलीच नाही आणि हा चेक सुद्धा मला दिलेल्या चेक बुक मधील नाही..!”
आमचं असं संभाषण चालू असतांनाच तरुण, हसमुख रविशंकरने केबिन मध्ये प्रवेश केला. बिहारी बाबू असलेला रविशंकर अत्यंत शांत, सहृदय आणि समंजस कर्मचारी होता. गेल्या काही वर्षांपासून तो वैजापूर शाखेतच हेड कॅशियर पदावर काम करीत होता. नुकतीच त्याची अधिकारी पदावर पदोन्नती झाली होती.
“रविशंकर, ये चेक आपने पास किया है ना ? कुछ याद है, किसने लाया था ये चेक..?”
 
“जी हां साब ! कोई नया ही आदमी था चेक लानेवाला.. पिछले सात साल से मैं वैजापुर में रहता हूं.. यहां के लगभग सभी लोगों को मैं अच्छी तरह पहचानता हूं.. लेकिन उस आदमी को मैने पहली बार देखा था.. हो सकता है के शायद किसी दूसरे गांव का हो.. लेकीन.. प्रॉब्लेम क्या है साब.. ?”
रविशंकर आतापर्यंत बँकेच्या मागील बाजूस असलेल्या डायनिंग रूम मध्ये दार लावून शांतपणे पीक कर्जाची डॉक्युमेंट्स तयार करीत बसला असल्याने बाहेर चाललेल्या गोंधळाची त्याला काहीच कल्पना नव्हती.
“ये डिपॉझिटर मॅडम कहती है के उन्होंने ऐसा कोई चेक कभी किसी को भी दिया ही नहीं था..”
“ओ माय गॉड ! लेकीन ये कैसे हो सकता है ? चेक तो मॅडम को इश्यू किए गए चेक बुक में से ही था.. और चेक पर जो सिग्नेचर था वो भी scanned speciman signature से हुबहू मेल खा रहा था।”
बिचारा रविशंकर..!! अधिकारीपदी प्रमोशन झाल्यानंतर पहिल्यांदाच “पासिंग” ला बसला होता. त्याला या प्रकाराचं विलक्षण आश्चर्य वाटत होतं.
“लेकीन मॅडम.., आपको दिया गया चेक बुक किसी दूसरे के हाथ कैसे लग सकता है ? जरूर आपने चेक बुक अच्छी तरह सम्हालकर नही रखा.. ये आप की ही लापरवाही का नतीजा है के चेक गलत हाथों में पड़ा..!!”
 
रविशंकरच्या या बोलण्याचा उलटाच परिणाम झाला. सुखदेव बोडखे रागाने ताडकन खुर्चीवरून उठला आणि म्हणाला..
“उगीच तुमच्या चुकीचं खापर आमच्या डोक्यावर फोडू नका हं साहेब.. बँकेतून नेलेलं चेक बुक आम्ही कपाटात नीट सुरक्षित ठेवलंय. आत्ताच तपासून आलोय मी. त्यातील दहाचे दहा चेक तसेच आहेत..”
“अहो पण तुम्ही एक जास्तीचं चेक बुक सुद्धा घेतलं होतं ना त्या खाजगी बँकेत देण्यासाठी.. ?”
… माझे हे शब्द पूर्ण होण्या अगोदरच सुखदेव त्याच्या बरोबर आलेल्या मंडळींना म्हणाला..
“चला रे.. ! यांचा आज तरी पैसे परत करण्याचा इरादा दिसत नाही.. यांना काय गोंधळ घालायचाय तो घालू दे, काय चौकशी करायचीय ती करून देत.. उद्या पर्यंत जर आमचे पैसे परत मिळाले नाहीत तर यांच्याविरुद्ध पोलिसांत जाण्याशिवाय अन्य मार्ग मला दिसत नाही..”
 
“हे बघा, आधी आपण कालचं सीसीटीव्ही फुटेज चेक करू. ज्या कुणी हा चेक प्रेझेंट करून पैसे नेले आहेत तो माणूस तुमच्या ओळखीचा आहे कां ते बघा. तसंच आधी आम्हाला आमच्या वरिष्ठांना या घटनेबाबत कळवावं लागेल आणि त्यांच्या सुचनेनुसारच पुढची पाउले उचलावी लागतील. माझी नम्र विनंती आहे की या तपासात तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं..”
परंतु माझ्या या विनंतीचा सुखदेव आणि त्याच्या कुटुंबियांवर काहीएक परिणाम झाला नाही. त्यांचं तमाशा करून बँकेत गोंधळ घालण्याचं आणि धमकी देण्याचं काम पूर्ण झालं होतं.
 
“तुमच्या तपासाशी आम्हाला काहीच देणंघेणं नाही. हे सारं नाटक आहे. गरिबांचा तळतळाट घेऊ नका साहेब, ताबडतोब आमचे पैसे परत करा. वाटल्यास तुमच्या वरिष्ठांना आजच वैजापूरला बोलावून घ्या. कारण मी फक्त उद्यापर्यंत थांबेन. आणि उद्या संध्याकाळ पर्यंत माझ्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तर मात्र नाईलाजाने मला हे प्रकरण पोलिसांकडे द्यावे लागेल.. विचार करा आणि त्वरित निर्णय घ्या..”
एवढं बोलून जमलेल्या मंडळींकडे पहात सुखदेव म्हणाला..
“चला रे ! उद्याचा दिवस आपण वाट पाहू आणि मग आपलं ठरल्याप्रमाणे करू..”
 
सुखदेवने इशारा करतांच एक ही शब्द न बोलता केबिन मधील सर्व जण उठले आणि आज्ञाधारकासारखे सुखदेव मागोमाग निमूटपणे बँकेबाहेर निघून गेले.
ते लोक जाताच रविशंकरला शेजारी बसवून घेत सीसीटीव्हीचा माउस हातात घेऊन कालचं रेकॉर्डिंग चेक करू लागलो. सकाळी ठीक साडे दहा वाजता एक अदमासे तिशीच्या आसपास असलेला गृहस्थ काउंटर क्लार्ककडे चेक देताना दिसला. त्याला पाहताच उत्तेजित होऊन रविशंकर म्हणाला..
“यही है.. ! यही है साब.. वो पांच लाख अस्सी हजार के चेकवाला..”
 
थोडा वेळ काउंटर क्लार्कशी बोलून टोकन घेऊन तो माणूस कॅश काउंटरच्या रांगेत उभा राहिलेला दिसला. रांगेतील अन्य लोकांशी तो माणूस जुनी ओळख असल्यागत हसून बोलत होता. त्याचा नंबर आल्यावर कॅशियरशी एक दोन शब्द बोलून तो रिकाम्या हातीच परत फिरून सरळ बॅंकेबाहेर गेलेला दिसला.
“हम स्ट्रॉंग रूम में से जादा कॅश नही निकालते. सुबह बगलका पेट्रोल पंप जो कॅश जमा कराता है उसीमें से सभी पेमेंट किये जाते है। कल पेट्रोल पंप की कॅश आने में थोडा समय था, इसलीये कॅशियर साब ने ऊस आदमी को दोपहर दो बजे आने को कहा था..”
रविशंकरने खुलासा केला.
त्यानंतर तो माणूस पुन्हा दुपारी अडीच वाजता बँकेत आलेला दिसला. पण त्या वेळी कॅशियर लंचला गेला असल्यामुळे थोडा वेळ हॉल मध्येच थांबून मग तीन वाजता पुन्हा काउंटर सुरू झाल्यावर तो काउंटर वर गेला आणि पाच लाख ऐंशी हजार घेऊन जाताना दिसला. अशा प्रकारे सकाळी साडे दहा ते दुपारचे तीन या दरम्यान तो माणूस बँकेत दिसत होता.
 
मी लगेच सर्व स्टाफ मेंबर्स तसेच बँकिंग हॉल मधील सर्व ग्राहकांना आत बोलावून त्यांना सीसीटीव्हीत दिसणारा तो कॅश नेणारा माणूस दाखवला. मात्र तो माणूस कुणाच्याच ओळखीचा नव्हता. आम्ही दिवसभर ही शोध मोहीम राबविली. मोंढ्यातील मुनींमांच्या हातात असते तशी थैली त्या माणसाकडे दिसत होती, म्हणून आमच्या मोंढ्यातील सर्व कस्टमर्सना फोन करून बँकेत बोलावून घेतले. पण कुणालाच तो माणूस ओळखता आला नाही.
दुसऱ्या चेकबुक बद्दल सुखदेव काहीच बोलण्यास तयार नव्हता म्हणून मला शंका आली. मी सेव्हिंग बँक क्लर्क बेबी सुमित्राला बोलावून विचारलं..
“सुमित्रा, आपनेही रत्नमाला मॅडम को दूसरा चेकबुक इश्यु किया था नं ?”
“जी हां साब. “
“आपने दुसरा चेक बुक देने से पहले उनसे अर्जी ली थी नं..?”
“जी हां साब.. अर्जी लेने के बाद मैने पहले सिग्नेचर व्हेरीफाय की और दूसरा चेक बुक सिस्टिम में फीड करने के बाद ‘चेक बुक इश्यु रजिस्टर’ में लिख कर रविशंकर साब के पास चेकिंग के लिए भेज दिया..”
बेबी सुमित्राने खणखणीत आवाजात उत्तर दिलं. छत्तीसगडच्या आदिवासी भागातून आलेली बेबी सुमित्रा अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच बँकेत लागली होती. साधी, सरळ बेबी जितकी मेहनती आणि कष्टाळू तितकीच निर्भीड व स्पष्टवक्ती होती.
 
“बहुत अच्छा ! वो अर्जी और चेकबुक इश्यु रजिस्टर यहां लेकर आओ..”
“अभी लाई, सर !” असं म्हणत बेबी सुमित्रा लगबगीने रेकॉर्ड रूमकडे निघाली.
दरम्यान, कॉम्पुटरचं काम करणाऱ्या गावातील टेक्निशियनला सीसीटीव्हीचं त्या दिवशीचं फुटेज पेन ड्राईव्ह मध्ये घेऊन त्याची सीडी तयार करायला सांगितलं. तसंच फुटेज मधून त्या संशयित व्यक्तीचा वेगवेगळ्या अँगल मधून फोटो घेऊन तो एनलार्ज करून त्याच्या भरपूर कॉपीज प्रिंट करायलाही सांगितलं. अवघ्या तासाभरातच सीसीटीव्ही फुटेजची सीडी व संशयिताचे फोटो त्याने बँकेत आणून दिले. सीडी अलमारीत सुरक्षित ठेवून संशयिताच्या फोटोच्या कॉपीज सगळ्या वॉचमन, प्युन व कर्मचाऱ्यांना दिल्या. बँकेत येणाऱ्या प्रत्येक कस्टमरला तो फोटो दाखवून “कुणी त्याला ओळखतं का ?” याचा शोध सुरू झाला.
बराच वेळ झाला तरी बेबी सुमित्रा अद्याप तो दुसऱ्या चेकबुक साठीचा अर्ज व चेकबुक इश्यु रजिस्टर घेऊन आली नसल्याने ती काय करते आहे हे पहायला मी रेकॉर्ड रुम मध्ये गेलो. बेबी सुमित्रा तिथल्या डस्ट बिन मधील फाडलेले, चुरगाळलेले कागद एक एक करून तपासून पहात होती. फायलिंगचं काम करणारा प्युन (दप्तरी) देखील तेच करीत होता.
 
“ये क्या कर रही हो सुमित्रा ? वो अर्जी तो फायलिंग में ही मिलेगी ना ?”
“सर, फायलिंग में सिर्फ वो ही अर्जी नही मिल रही.. ऊस दिन की बाकी सभी चेक बुक रिक्विझिशन स्लिपस् ठीक ढंग से फाईल कि हुई है.. मुझे तो ये किसीने जानपुछकर, इरादतन किया हुआ काम लगता है..”
बेबी सुमित्राच्या म्हणण्यात तथ्य दिसत होतं. तरीही तिला तो अर्ज शोधणं सुरूच ठेवायला सांगून मी चेकबुक इश्यु रजिस्टर मागवलं. त्यात रत्नमाला बोडखेला दिलेल्या चेक बुकचा नंबर, खातेदाराचे नाव व खाते क्रमांक, चेकिंग ऑफिसरची सही इत्यादी तपशील व्यवस्थित लिहिला होता. त्यानंतरच्या कॉलम मध्ये चेक बुक नेणाऱ्याची सही देखील होती. ते पाहून मी सुटकेचा निश्वास सोडला.
“चला..! आपल्याकडे त्या बोडखेने बँकेतून दुसरं चेकबुक नेल्याचा लेखी पुरावा तर आहे.. !!”
मी मनाशीच म्हणालो..
 
मात्र ती सही रत्नमालाची वाटत नव्हती. त्यामुळे दुसरं चेकबुक घ्यायला काउंटरवर कोण आलं होतं याबद्दल बेबीला विचारलं तेंव्हा सुखदेव बोडखेचा मुलगा बबन हा आपली आई रत्नमालाला घेऊन चेकबुक नेण्यासाठी आल्याचं समजलं. चेकबुक द्यायला फक्त पाच मिनिटे उशीर झाला तेंव्हा हा बबन स्टाफशी भांडण करीत अपशब्दही बोलला असल्याचं बेबी सुमित्राला चांगलंच आठवत होतं.
“म्हणजे ही चेकबुक नेल्याची सही बबनची आहे तर..” मी स्वतःशीच पुटपुटलो.
“नाही सर !”
माझं पुटपुटणं ऐकतांच अकाऊंटंट साहेबांनी लगेच खुलासा केला.
“ती सही बबनची नाही. त्या अगोदरचं चेकबुक ज्यानं नेलं त्याची आहे. चुकून त्याने एक ओळ खाली, म्हणजे रत्नमाला बाईंच्या नावासमोर सही केली आहे. नीट काळजीपूर्वक पाहिल्यावरच ते समजून येतं..”
ते ऐकून मी हादरलोच. अरे बापरे ! एकतर दुसऱ्या चेकबुक साठीचा अर्ज गहाळ आणि चेकबुक इश्यू रजिस्टरवर कस्टमरची सही सुद्धा नाही.. म्हणजेच रत्नमालाबाईंना दुसरं चेकबुक दिल्याचा कुठलाही पुरावा बँकेकडे नाही. म्हणूनच तर तो सुखदेव एवढ्या आत्मविश्वासाने बोलत होता..
आता काय करायचं ? अशा प्रसंगी शाखेच्या पातळीवर जे जे काही करता येणं शक्य होतं ते ते करून झालं होतं. त्यामुळे वरिष्ठांच्या कानावर आता हे प्रकरण घालायलाच हवं असा विचार करून रिजनल मॅनेजर साहेबांना फोन करून थोडक्यात त्यांना संपूर्ण प्रकरणाची कल्पना दिली.
“मी उद्या शिर्डीच्या दिशेने जाणारच आहे, तेंव्हा वाटेत सकाळी थोडावेळ वैजापूरला थांबेन.. त्यावेळी बोलू. जमल्यास त्या तक्रारदारालाही मला भेटण्यासाठी बँकेत बोलावून घ्या.”
एवढं बोलून रिजनल मॅनेजर साहेबांनी फोन ठेवला.
 
तो दिवस खूपच तणावपूर्ण धावपळीत गेला. शाखेतील सर्वच कर्मचारी एकदिलाने या आकस्मिक संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले होते. त्या संशयिताचे फोटो घेऊन प्रत्येक कर्मचारी जो भेटेल त्याच्याकडे चौकशी करीत होते. काही जण बस स्टँड, रेल्वे स्टेशन, लॉज, हॉटेल्स, पानाचे ठेले अशा गर्दीच्या ठिकाणी जाऊन त्या इसमाचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न करीत होते. दिवसभर शोधूनही दुसऱ्या चेकबुक साठीचा “तो अर्ज” अजून सापडला नव्हता. सीसीटीव्हीचे फुटेज अनेकदा पाहून झाले होते. काही तरी महत्वाचा “क्लु” अगदी नजरे समोरच आहे पण हाती येत नाहीये असं राहून राहून जाणवत होतं.
उद्या सकाळी नऊ वाजता रिजनल मॅनेजर साहेब येणार असून त्यांना भेटण्यासाठी शाखेत लवकर येण्याबाबत सर्व स्टाफला कळविले. तसेच सुखदेव बोडखे यालाही फोन करुन तसा निरोप दिला. रात्री उशिरापर्यंत सर्व जण काळजीपोटी बँकेतच थांबले होते. कुणीतरी खूप विचारपूर्वक प्लॅन करून बँकेची फसवणूक केल्याची सर्वांनाच मनोमन खात्री पटली होती. काही जण सुखदेव बोडखेच्या कुटुंबाबद्दल माहिती गोळा करण्यासाठी गावात गेले होते. त्यांनी आणलेली माहिती धक्कादायक होती.meeting
 
घटनेचा तिसरा दिवस उजाडला. सर्वजण सकाळी साडेआठ वाजताच बँकेत येऊन RM साहेबांची वाट पहात बसले होते. इतक्यात संजू चहावाला घाईघाईत बँकेत येताना दिसला. त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव दिसत होते. केबिन मध्ये येऊन मला नमस्कार केल्यावर त्याने हातातील वर्तमानपत्रे माझ्या समोर ठेवली. दैनिक लोकमत, दै. सकाळ, दै. पुण्य नगरी अशा प्रमुख वर्तमानपत्रांचे ते आजचे अंक होते. आणि त्या सर्व पेपरात एकच बातमी ठळक अक्षरात छापून आली होती..
*”वैजापूरच्या स्टेट बँकेत प्रचंड रकमेचा अपहार.. कर्मचाऱ्यांनी संगनमताने हडप केले गरीब कुटुंबाचे पाच लाख ऐंशी हजार रुपये.. प्रकरण पोलिसांकडे..”*
(क्रमशः 3)
(संपूर्ण काल्पनिक)
 

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

ajay-kotnis-photo1श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे

Mind blowing experiences of a Banker-1 एका बँकर चे थरारक अनुभव-1

ajay kotnis story

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

बँकस्य कथा रम्या..

“स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव..”

अगदी एखाद्या रहस्यमय कादंबरीत शोभावी अशी एक घटना मी वैजापुरच्या स्टेट बँकेत व्यवस्थापकपदी असताना घडली, त्याचीच ही चित्तरकथा.. नव्हे चित्तथरारक कथा.. !!
 
सुखदेव बोडखे नावाचा साधारण पन्नास पंचावन्न वर्षे वयाचा बँकेचा एक जुना खातेदार एके दिवशी आपल्या बायकोला घेऊन बँकेत आला. त्याला बायकोच्या नावाने चेक बुक सुविधा असलेले खाते उघडायचे होते. तो स्वतः औरंगाबादला कुठल्यातरी सरकारी खात्यात चपराशाची नोकरी करीत होता. त्याला स्वत:च्या मुलासाठी मोटारसायकल घ्यायची होती. नोकरीचा कालावधी पाच वर्षांहून कमी उरल्याने त्याला त्याच्या ऑफिसमधून कर्ज मिळू शकत नसल्याने बायकोच्या नावाने खाजगी बँकेतून तो कर्ज घेणार होता.. आणि त्या खाजगी बँकेला देण्यासाठी त्याला चेक बुक हवे होते.
 
सुखदेव बोडखेचे आमच्या बँकेत खाते असल्याने त्याच्या introduction ने लगेच त्याची बायको रत्नमालाच्या नावाने खाते उघडून दिले. अवघ्या अर्ध्या तासात नवीन खात्याचे पासबुक व चेकबुक हातात पडल्याने खुश होऊन माझ्या केबिनमध्ये येऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करून माझे आभार मानीत आनंदी चेहऱ्याने सुखदेव बँकेतून निघून गेला. अतिशय नम्र आणि मृदुभाषी असलेल्या सुखदेवचे ते आभार मानण्याचे gesture मला खूप आवडले आणि आतून मनोमन सुखावुनही गेले.
 
सुमारे आठ दिवसांनी सुखदेव बायकोला घेऊन पुन्हा बँकेत आला. “आपण दिलेल्या चेकबुक मध्ये फक्त दहाच चेक आहेत आणि त्या खाजगी बँकेला कर्जास तारण म्हणून किमान वीस कोरे (Blank) चेक द्यावे लागतात.. म्हणून मला दहा चेकचे आणखी एक चेकबुक द्या..” असे तो म्हणत होता.
नियमानुसार रत्नमाला बोडखेच्या नावाने additional चेकबुकसाठीचा अर्ज घेऊन ताबडतोब त्याला दुसरे चेक बुक देण्यात आले. Additional चेकबुक चार्जेस संबंधित खात्याला डेबिट टाकण्यात आले. याही वेळी तत्पर सेवेबद्दल अदबीने मान झुकवून माझे आभार मानीत सुखदेव बायकोसह निघून गेला. त्याचा तो नम्र, शालीन, विनयशील स्वभाव अंतर्यामी मला खूपच भावला..
 
तो गेल्यानंतर मी सहज स्वतःशीच विचार करीत बसलो. एव्हाना वैजापुरला येऊन मला वर्ष होत आलं होतं. सुरवातीचं नवखेपण सरून बँकेच्या दैनंदिन कामकाजावर माझी आता चांगलीच पकड बसली होती. डिपॉझिट आणि कर्ज वाटपाची वर्षभराची सर्व टार्गेट्स मी मुदतीपूर्वीच अचीव्ह केली होती. भरपूर कर्जवसुलीमुळे अनुत्पादक कर्जाचे (NPA) प्रमाणही खूप घटले होते. भरीस भर म्हणून इन्शुरन्सचा मुख्य (?) बिझिनेसही पुरेसा केल्यामुळे वरिष्ठही माझ्यावर प्रसन्न होते.
 
सुदैवाने शाखेतील सर्व स्टाफ खूप कष्टाळू व आज्ञाधारक होता. एक दोन जुने सिनियर वगळता बहुतांश कर्मचारी तरुण, उत्साही होते. वैजापुरलाच रहात असल्याने सर्वांच्या घरी जाऊन मी त्यांची आपुलकीने विचारपूस करीत असे. या ना त्या निमित्ताने अधून मधून सर्वांना बाहेर जेवायला घेऊन जात असे. कधी जवळच असलेल्या शिर्डीला दर्शनासाठी तर कधी एखाद्या शेतकऱ्याचा शेतावर हुरडा खाण्यासाठी लहान लहान सहली काढीत असे. त्यामुळे सर्व स्टाफशी खूप जवळीक निर्माण झाली होती.
 
एकंदरीत बँकेत सर्वच स्तरावर अत्यंत खेळीमेळीचं, मित्रत्वाचं आणि परस्पर विश्वासाचं वातावरण होतं. कुणाही मॅनेजरला सदैव हवंहवंसं वाटणारं स्थैर्य, शांती आणि चिंतामुक्त समाधान मला आता कुठे नुकतंच लाभू लागलं होतं.bank
 
 
मात्र ही वादळापूर्वीची शांतता होती. क्रूर नियतीने आमचं सौख्य हिरावून घेण्यासाठी केंव्हाच फासे फेकले होते. येणाऱ्या अकल्पित संकटाच्या यातनाचक्रात आम्ही सारे भरडून निघणार होतो. आमच्या दिशेने घोंगावत येणाऱ्या या आगामी भीषण भयकारी झंझावाताची त्यावेळी कुणालाही सुतराम कल्पना नव्हती.
ज्या दिवशी सुखदेव बोडखे दुसरे एक्स्ट्रॉ चेक बुक घेऊन गेला त्याच दिवशी दुपारी माझा जालन्याचा जिवलग मित्र अरुण भालेराव याचा फोन आला. हा माझा मित्र जालन्या जवळील आनंदगडच्या महाराजांचा शिष्य होता. दरवर्षी प्रमाणे हे महाराज आपल्या शिष्यांसह पालखी घेऊन वारीसाठी निघाले होते. वाटेत ते “कोली” नावाच्या गावात सकाळी थोडा वेळ थांबणार होते. तिथे गावकऱ्यांतर्फे सर्व वारकऱ्यांना फराळ दिला जाणार होता.
 
कोली हे गाव वैजापूर पासून फक्त पंधरा किलोमीटर दूर होते. तसेच ते भालेरावचे पैतृक गाव ही होते. भालेरावचे वडील बंधू निवृत्ती नंतर तेथील घरात राहून वडिलोपार्जित शेती पहायचे. माझा त्यांच्याशी जुजबी परिचय होता. अनायासे मी कोली गावापासून जवळच रहात असल्याने महाराजांचे स्वागत करण्यासाठी मी आदल्या दिवशीच कोली गावात जावे आणि त्यांच्या भावाकडे रात्री मुक्कामास रहावे असा भालेरावने आग्रह धरला.
 
योगायोगाने कोली गावाजवळील खंडाळा येथील एका गृह मालमत्तेवर जप्तीची ताबा नोटीस (Sarfaesi) सर्व्ह करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी मला जायचेच होते, तेंव्हा.. आज रात्री कोली गावात मुक्काम करावा व उद्या सकाळी खंडाळ्याची ताबा नोटीस सर्व्ह करून दुपार पर्यंत बँकेत यावे असं मी ठरवलं. त्याप्रमाणे रिजनल ऑफिसला फोन करून यासाठी त्यांची परवानगीही घेतली.
 
संध्याकाळी सहा नंतर मोटार सायकल घेऊन कोली गावाकडे निघालो. अर्ध्या तासातच गावात पोहोचलो. गाव मुख्य रस्त्याला अगदी लागूनच होतं. भालेरावांचे घर शोधून त्यांच्या घरात प्रवेश केला तेंव्हा तिथे गावातील काही वयोवृद्ध जाणकार मंडळी सतरंजीवर बसून ज्ञानेश्वरीचे पठण करीत होती. मला पाहताच भालेरावांनी उठून उभे रहात माझे स्वागत केले व उपस्थितांशी माझा परिचय करून दिला.
 
समोर असलेले ज्ञानेश्वरीचे जाडजूड पुस्तक मी सहज चाळून पाहिले. ती साखरे महाराजांची सुलभ ज्ञानेश्वरी होती.
“तुम्ही ज्ञानेश्वरी वाचली आहे काय ?”
भालेरावांनी उत्सुकतेने विचारले..
 
“होय. संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत मराठी भाषेत लिहिलेली “भावार्थ दीपिका” म्हणजेच ज्ञानेश्वरी समजण्यास जरा कठीण आहे. कारण त्यातील बरेच शब्द आता प्रचलित नाहीत. ज्ञानेश्वरांनी गीतेतील कठीण श्लोकांचा अर्थ समजावून सांगण्यासाठी
दैनंदिन जीवनातील अनेक उदाहरणे (दृष्टांत) दिले आहेत.
 
सोनोपंत उर्फ मामासाहेब दांडेकरांची सुलभ ज्ञानेश्वरी मी वाचली आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे श्रीमद् भगवदगीतेवरील टीका.. अशीच टीका लोकमान्य टिळकांनी “गीता रहस्य” नावाने लिहिली. त्यांच्यापूर्वी मध्वाचार्य, रामानुजाचार्य, पंडित त्रिविक्रम, आदिशंकराचार्य यांनीही गीतेवर भाष्य केले आहे. आचार्य विनोबा भावे यांनी “गीताई” तसेच “गीता प्रवचने” यातून अतिशय रसाळ भाषेत गीतेचे निरूपण केले आहे. या सर्वांनी आपापल्या दृष्टिकोनातून गीतेचा वेगवेगळा अर्थ लावला आहे. यापैकी काही पुस्तके, ग्रंथ मी वाचले आहेत. पण तरीही प्रत्येक वेळी गीता वाचताना तिचा वेगळाच, नवीन अर्थ समजतो.”
 
माझे उत्तर ऐकून जमलेले सर्व जण चकित झाल्यासारखे दिसले. मी कोणी फार विद्वान, प्रकांड पंडित असल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर उमटले. गीतेबद्दल, ज्ञानेश्वरीबद्दल काही अत्यंत साध्या तर काही थोड्या जटिल शंका मग त्यांनी विचारल्या. माझ्या तुटपुंज्या पुस्तकी ज्ञानाच्या जोरावर यथामती मी त्यांचे समाधानही केले.
 
“द्वैत अद्वैत म्हणजे काय ? ब्रह्म, प्रकृतीपुरुष, वेदांत, मोक्ष म्हणजे काय ? अशा विविध विषयांवर सखोल चर्चा झाल्यानंतर..
“स्थितप्रज्ञ” म्हणजे कोण ? आणि संसारात राहून आपण स्थितप्रज्ञ राहू शकतो काय ?”
असा प्रश्न भालेरावांनी विचारला.
 
उत्तरादाखल मी म्हणालो..
“ज्या पुरुषाची बुद्धी स्थिर झाली आहे अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात. अशा माणसाला कोणतीही आशा, अभिलाषा नसते. तो सदा तृप्त असून सुख व दुःख यांमुळे त्याला आनंद किंवा उद्वेग होत नाही.
कासव ज्याप्रमाणे आपले अवयव (डोके व हात, पाय) स्वतःच्या इच्छेनुसार आवरून घेते किंवा बाहेर काढते त्याप्रमाणे त्याची इंद्रिये त्याच्या पूर्णपणे ताब्यात असतात. आत्मबोधाने तो सदा संतुष्ट असतो.”
 
माझ्या उत्तराने सर्वांचे समाधान झाल्यासारखे दिसले. मात्र “तुम्ही स्थितप्रज्ञ अवस्था अनुभवली आहे काय ?” या एका गावकऱ्याच्या पुढील प्रश्नावर..
“आतापर्यंत तरी नाही. परंतु यापुढे जेंव्हा भलं मोठं संकट पुढे उभं ठाकेल त्यावेळी मात्र स्थितप्रज्ञ राहण्याचा जरूर प्रयत्न करेन..”
असे थातुर मातुर उत्तर देऊन वेळ मारून नेली.
 
चर्चा बरीच रंगत गेल्यामुळे रात्री झोपायला खूप उशीर झाला. खेड्यातील लोक आपण समजतो तसे निरक्षर, अडाणी नसतात तर शहरी लोकांपेक्षा जास्त वाचन-अनुभवसंपन्न आणि अभ्यासू विचारवंतही असतात याची मला नव्यानेच प्रचिती आली.
 
ठरल्याप्रमाणे आनंदगडची पालखी सकाळी आठ वाजता कोली गावात आली. गावकऱ्यांनी वारकऱ्यांच्या न्याहरीसाठी पोटभर उपमा व गोड बुंदीची व्यवस्था केली होती. न्याहरीनंतर महाराजांनी अर्ध्या तासाचे प्रभावी प्रवचन करून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. दहा वाजता पालखीने गावातून प्रयाण केल्यावर सर्वांचा निरोप घेऊन मी ही खंडाळ्याच्या दिशेने निघालो.
 
खंडाळ्याचे काम पूर्ण होण्यास अपेक्षेपेक्षा खूपच जास्त वेळ लागला. आधी तर बॅंकेची ताब्याची नोटीस (Sarfaesi) घरावर लावून घ्यायलाच तो थकीत कर्जदार तयार नव्हता. कसेबसे त्याला समजावून चार लोकांसह नोटीस लावलेल्या घराचे फोटो काढून घेतले. तोपर्यंत जेवणाची वेळ झाली असल्याने बस स्टँड वरील हॉटेलात जे मिळेल ते खाऊन घेतले. अधून मधून बँकेत फोन करून दैनंदिन कामाबद्दल विचारपूस करीतच होतो. बँकेत पोहोचलो तेंव्हा दुपारचे साडेतीन वाजले होते.sbh
 
तोपर्यंत बँकेतील गर्दी ओसरली होती. टेबलावर बसल्यावर दिवसभराचं साचलेलं काम भराभर हातावेगळं करू लागलो. सर्वात आधी फिल्ड ऑफिसरने तयार केलेल्या पीक कर्जाच्या पन्नास एक डॉक्युमेंट्सवर सह्या केल्या, महत्त्वाची डाक पाहिली, Sundry, Suspense, IBIT, DP या सारख्या ऑफिस अकाऊंटस् वरून एक नजर फिरवली, काही मोठ्या थकीत कर्जदारांना वसुलीसाठी फोन केले, रिजनल ऑफिसला NPA reduction, Crop loans, Personal loans, Housing loans disbursed, SB/CA a/cs opened, SBI Life इत्यादी दैनंदिन माहिती कळवली. त्यानंतर कॅश स्क्रोल बंद करून हेड ऑफिसची साईट उघडून महत्त्वाची सर्क्युलर्स काळजीपूर्वक वाचून काढली.
 
ही सर्व कामं करीत असतांनाही काल रात्रीची ज्ञानेश्वरी वरील चर्चा आणि एका गावकऱ्यांने विचारलेला स्थितप्रज्ञ अवस्थेबद्दलचा तो प्रश्न सारखा आठवत होता. “खरोखरीच, आपण पराकोटीच्या सुख-दुःखातही अजिबात विचलित न होता संयम राखू शकतो का ? यशाने उन्मत्त न होता आणि संकटांनी घाबरून न जाता मानसिक संतुलन कायम टिकवून ठेवू शकतो का ?”… मी स्वतःशीच विचार करीत होतो.
स्ट्राँग रूम क्लोज करून कॅशियर व अकाऊंटंट साहेब “गुड नाईट” करत निघून गेले. बाकीचा स्टाफ आधीच बाहेर पडला होता. फिल्ड ऑफिसर उद्या वाटप करायच्या पीक कर्जाची कागदपत्रे तयार करीत बसले होते. रात्रीचे दहा वाजल्यावर ते ही काम आवरून केबिन मध्ये आले, तेंव्हा मी सीसीटीव्हीच्या दिवसभरातील रेकॉर्डिंगवर धावती नजर फिरवीत होतो.
 
“चला साहेब, हॉटेल बंद होण्यापूर्वी जेवून घेऊ या.. नाहीतर उपाशीच झोपावं लागेल..”
दीर्घ जांभई देत फिल्ड ऑफिसर साहेब म्हणाले..
भिंतीवरील घड्याळाकडे पहात खुर्चीवरून उठलो आणि त्यांच्या सोबत बाहेर पडलो. जेवण झाल्यावर फिल्ड ऑफिसर म्हणाले..
“साहेब, रोजच्या सारखे आता पुन्हा बँकेत जाऊन काम करत बसू नका.. दिवसभराच्या दगदगीने थकले असाल, रूम वर जाऊन मस्त आराम करा.. उद्या सकाळी पुन्हा उठून बँकेत यायचेच आहे..”
त्यांचा काळजीचा सल्ला मानून रूमवर आलो. पलंगावर पडून झोपेची आराधना करीत असतानाही “विपरीत परिस्थितीतही आपण खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञ राहू शकतो काय ?” हाच विचार मनात घोळत होता.
 
दुसऱ्या दिवशी रोजच्याप्रमाणे पहाटे उठून मॉर्निंग-वॉक झाल्यावर अंघोळ करून मारुती मंदिरात दर्शनासाठी गेलो. तिथून सरळ बँकेत आलो. बँकेत शिरताना मेन गेट जवळील संजू चहावाल्याच्या दुकानाच्या पायरीवर सुखदेव बोडखे आपल्या बायकोसह बसलेला दिसला. एवढ्या सकाळी त्याला बँकेसमोर पाहून आश्चर्य वाटलं. त्याच्याकडे पहात हसत हसत म्हणालो..
“आज एवढ्या सकाळी बँकेत काय काम काढलंत..?”
 
माझ्या या प्रश्नावर सुखदेवने काहीच उत्तर दिलं नाही, उलट आपली मान विरुद्ध दिशेला फिरविली.
बहुदा त्याला मी बोललेलं नीट ऐकू गेलं नसेल असं वाटून पुन्हा म्हणालो..
“अरे वा ! मोटार सायकलचे पेढे द्यायला आलात वाटतं ? झालं ना तुमचं कर्जाचं काम ? कि आणखी तिसरं ही चेक बुक लागतंय त्या खाजगी बँकेला ?”
 
माझ्या या बोलण्यावर सुखदेवने काहीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. माझ्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून तो बायकोला उपरोधिक स्वरात म्हणाला..
“ए, तू रस्त्यात काय बसलीस.. बाजूला सरक, साहेबाला जाऊ दे.. कामाची माणसं आहेत ती.. आपल्या सारखी भिकार, रिकामटेकडी थोडीच आहेत.. “
सुखदेव सारख्या विनम्र माणसाकडून असं हेटाळणीपूर्ण वागणं मुळीच अपेक्षित नव्हतं. तरी देखील माणुसकी म्हणून त्याला म्हणालो..
“बँक उघडायला अजून दीड तास अवकाश आहे.. काही अर्जंट काम होतं का ?”
 
चेहऱ्यावर त्रासिक, तिरसट भाव आणीत उद्धटपणे सुखदेव म्हणाला..
“जा नं साहेब गुमान.. उगीच आमच्या नादी का लागता ? आधीच आम्ही आमच्या परेशानीत आहोत.. तुम्ही तुमचं काम बघा, विनाकारण आमच्यात नाक खुपसू नका..”
 
सुखदेवच्या तोंडचे ते तुसडे शब्द ऐकून मला धक्काच बसला. चपराशाची नोकरी करणाऱ्या त्या य:कश्चीत माणसाने माझ्याशी असे अरेरावीने बोलावे याबद्दल वाईट वाटून किंचित रागही आला. अपमान गिळून गेट उघडून मी बँकेत गेलो आणि खिन्न होऊन खुर्चीवर बसलो. सुखदेवच्या त्या दुर्व्यवहाराने मी चांगलाच दुखावलो होतो. माझी कोणतीच चूक नसताना त्याने माझ्याशी असे का वागावे ? नकळत माझे डोळे भरून आले आणि बायको नेहमी बजावते ते शब्द आठवले..
“तुम्ही नको तिथे माणुसकी दाखवायला जाता आणि अपमान करून घेता.. कोणत्याही माणसाशी त्याच्या पायरी नुसारच वागायला हवं.. हाताखालच्या माणसांवर तुमचा धाक असला पाहिजे. नोकरांना नोकरासारखंच वागवायला हवं, नाहीतर ते डोक्यावर बसतात. अति परिचयात अवज्ञा..! उठसूठ कुणालाही मान देत बसू नये. अशाने लोक तुमची किंमत करीत नाहीत..”
 
माझ्या केबिनच्या मागच्या खिडकीतून संजू चहावाल्याची टपरी दिसत होती. तिथे बसून सुखदेव कुणाची तरी वाट बघत होता. त्याचे विचार बाजूला सारून टेबलावरील कामात गुंगून गेलो. सव्वा दहा वाजता रखवालदाराने बँकेचे शटर उघडल्यावर कस्टमर्सचा लोंढा आत शिरला. सर्व काऊंटर्स पुढे रांगा लागल्या. माझ्या केबिनमध्येही पीक कर्जासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली. इतक्यात संजू चहावाला चहा घेऊन आला.
 
पूर्वाश्रमीचा सराईत गुंड आणि आता सन्मार्गाला लागून बँकेसमोर चहाची टपरी टाकून मेहनतीची कमाई खाणारा संजू चहावाला हा बँकेप्रती अतिशय कृतज्ञ होता. स्थानिक राजपूत समाजाचा एक नेता आणि वैजापूरच्या रिक्षा युनियनचा अध्यक्ष असलेल्या संजूचे पोलिसांशी तसेच गावातील सर्वच प्रभावशाली व्यक्तींशी जवळीकीचे संबंध होते. बँकेचा कट्टर समर्थक आणि पाठीराखा असलेला संजू प्रत्येक लहानमोठ्या अडचणीत स्वतःहून बँकेच्या मदतीला धावून येत असे.
कपात चहा भरून तो माझ्या समोर ठेवताना संजू माझ्या कानात हळूच कुजबुजला..
 
“साहेब, सावध व्हा ! तुमच्या विरुद्ध बाहेर काहीतरी भयंकर कट शिजतोय. काही गावगुंड, रिकामे लीडर आणि पत्रकार बाहेर गोळा झाले आहेत. बँकेत गोंधळ घालायचा म्हणत आहेत.. तुम्ही शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. अजिबात राग येऊ देऊ नका.. आधी मॅटर काय आहे ते जाणून घेऊन मगच आपण त्यातून मार्ग काढू या..”
संजूचं बोलणं संपतं न संपतं तोच रागारागाने आरडाओरड करीत रत्नमाला बोडखेने आपला पती सुखदेव आणि मुलगा बबन यांच्यासह केबिनमध्ये प्रवेश केला. त्यांच्या मागोमाग आठ दहा अनोळखी माणसेही केबिनमध्ये घुसली.
(क्रमशः 2..)

ajay-kotnis-photo1श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे

प्रत्यय निरूपण

samarth ramdas

Guest Article by Shri Pandurang Deshpande

प्रत्यय निरूपण

 खालील लेख हा विशेषेकरून श्री समर्थ रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ ज्यांनी वाचला आहे, अभ्यास केला आहे, अशा साधकांसाठी आहे. नुसते वाचून, अभ्यास करून काही होत नाही, तर प्रत्यक्ष अनुभव हेच परमार्थाचे उद्दिष्ट आहे, हे या लेखात सांगितले आहे.
dasbodh2
 

दासबोधामध्ये समर्थांनी मानवी जीवनातील भौतिक व आध्यात्मिक पातळीवरील  विविध विषयांचा सर्वस्पर्शी विशालपट  सविस्तरपणे उलगडला आहे.

 पूर्वार्धात समर्थांनी प्रपंच अपूर्ण व दुःखाने भरलेला असून आत्मज्ञान  म्हणजेच खरे देवदर्शन असे सांगून मानवी बुद्धीला दृष्याकडून दृश्य निरसनाकडे ,  स्थूलाकडून सूक्ष्माकडे नेण्याचा मार्ग दाखविला आहे. सत्संगतीत आत्म्याविषयी सतत श्रवण,मनन व निदिध्यास करायला सांगितले आहे. गुरु करायला व त्याचा उपदेश जीवनात  आचरणात आणून त्याच्या कृपेला पात्र होण्यास सांगितले  आहे.

प्रत्यय किंवा प्रचिती यांनी येणारे ज्ञान  हेच खरे असे दासबोधाच्या  पूर्वार्धात शेवटी शेवटी  म्हणजे नवव्या  दशका पासून सांगायला समर्थ सुरुवात करतात. त्याआधी ते मायाब्रह्म निरूपण,दृश्यनिरसन,अनुमान निरसन,संदेहवारण, विकल्पनिरसन आणि भ्रमनिरुपण आदि संकल्पनातून श्रोत्याला, अनुमानाचे किंवा केवल पुस्तकाचे ज्ञान खोटे आहे असे दाखवून तिथून  पुढे  प्रचितीच्या वा प्रत्ययाच्या भूमिकेवर आणतात.

त्यांची  प्रचिती व प्रत्यय याविषयी जगज्योति दशक (समास ८), विवेकवैराग्य दशक (समास २) नामरूप दशक(समास ७) ही तीन स्वतंत्र प्रकरणे  आपण वाचतोच.

भौतिक जीवनाचा संदर्भ घेऊन प्रकरणांचे शेवटी प्रत्यय हीच परमार्थातील अंतिम ज्ञानाची कसोटी आहे असे ते पटवून देतात.

पूर्वार्धातील आत्मवस्तुचा सिद्धांत  व्यावहारिक आणि पारमार्थिक जीवनात कसा आचरणात आणायचा  हे समर्थ उत्तरार्धात सांगतात. संबंध दासबोध हा केवळ प्रचिती व प्रत्ययज्ञानाचा म्हणजेच अपरोक्षज्ञानाचा आदर्श ग्रंथच आहे. परमार्थाला वैराग्यासह विवेकाची जोड अत्यंत आवश्यक आहे हे ते वारंवार सांगतात.तसेच ज्या विवेकाने आत्मानात्म विचार करायचा तो सुद्धा प्रत्ययाच्या म्हणजेच स्वानुभवाच्या पायावर आधारलेला असावा,नाहीतर विवेक केवळ कल्पनारूप उरतो.

त्यांनी प्रत्ययाच्या अनेक ओव्या दासबोधात ठिकठिकाणी लिहिल्या आहेतdasbodh1

 अनुमान निर्शन -पिंडब्रह्माण्डाविषयी –

येथे प्रचित हे प्रमाण ।ना लगे शास्त्राचा अनुमान |   अथवा शास्त्री तरी पाहोन ।प्रत्ययो आणावा ।।(९-५-१४)

जितुके अनुमानाचे बोलणे ।तितुके वमनत्यागें टाकणे ।निश्चयात्मक बोलणे ।प्रत्ययाचे ।।(९-५-३९)

 सगुणभजन निरूपण नाम —

म्हणौन सगुण भजन ।वरी विशेष ब्रह्मज्ञान ।प्रत्ययाचे समाधान ।दुर्लभ जगी ।।(१०-७-३१)

नाना व्रते नाना दाने ।नाना योग तीर्थाटणें ।सर्वांहूनि कोटिगुणें ।महिमा आत्मज्ञानाचा ।।(१०-१०-६४)

या प्रचितीच्या गोष्टी ।प्रचित पाहावी आत्मदृष्टी ।प्रचितीवेगळे कष्टी।होवोची नये ।।(१०-१०-६७)

प्रत्यय निरूपण –

बरे करीत बरे होते ।हें तों  प्रत्ययास येते ।आता पुढे सांगावे ते। कोणास काये ।।(१२-२-२८)

 विवेक वैराग्य –

प्रखर वैराग्य उदासीन ।प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान ।स्नानसंध्या भगवद्भजन| ।पुण्यमार्ग ।।(१२-४-१८)

 सृष्टिनिरूपण नाम-

पुस्तकज्ञाने निश्चय धरणे ।तरी गुरु कासया करणे ।या कारणे विवरणे ।आपुल्या प्रत्यये  ।।(१२-७-६)

 उभारणी निरूपणनाम –

नवे अनुमानाचे बोलणे ।याचा बरा प्रत्यये  घेणे ।वेदशास्त्र पुराणें ।प्रत्यये  घ्यावी ।।(१३-३-१७)

जे आपल्या प्रत्यया  येना ।ते अनुमानिक घ्यावे ना ।प्रत्ययाविण सकळ जना ।वेवसाय नाही ।।(१३-३-१८)

 कर्ता निरूपण  नाम –

बरे पाहता प्रत्यये आला| तरी का करावा गलबला ।प्रचित आलीयां आपणाला ।अंतर्यामी||(१३-८-३६)

 अखंड ध्यान नाम-

खोटे अवघेंच सांडावे| खरे प्रत्यये वोळखावें ।मायात्यागें समजावे|परब्रह्म ।।(१४-१०-९)

 आत्मदशक –शाश्वतब्रह्म निरूपण

लोकांचे बोली लागला|तो अनुमानेची बुडाला ।या कारणे प्रत्ययाला|पाहिलेच पाहावे||(१५-४-३१)

 सप्ततीन्वय –

पिंडावरून ब्रह्माण्ड पाहावे| प्रचितीने प्रचीतीस घ्यावे|उमजेना तरी उमजावे|विवर विवरो ।।(१६-७-४१)

आणि शेवटी —

 पूर्णदशक-सूक्ष्मनामाभिधान –

उदंड हुडकावे संत ।सांपडे प्रचितीचा महंत ।प्रचितीविण स्वहित । होणार नाही ।।(२०-३-२७)

प्रपंच अथवा परमार्थ ।प्रचितीविण अवघे वेर्थ ।प्रत्येयज्ञानी तो समर्थ ।सकळांमध्ये||(२०-३-२८)

शुद्ध सार श्रवण।शुद्ध प्रत्ययाचे मनन ।विज्ञान पावतां  उन्मन | सहजचि होते|| (२०-१०-२५)

ग्रंथाचे करावे स्तवन|स्तवनाचे  काय प्रयोजन| येथे प्रत्ययास कारण ।प्रत्ययो पाहावा ।।(२०-१०-३३)

याशिवायही अनेक ओव्या आहेत. या ओव्यांचे अर्थ स्पष्ट आहेत.dasbodh3

प्रपंचातील घटना ,वस्तू  अनुभव इंद्रियगोचर असतात  प्रपंचातील ज्ञान पडताळ्याने लगेच तपासात येतो. परंतु  परमार्थातील घटना, आत्मवस्तु व अनुभव हे सर्व अतींद्रिय असतात.  पडताळ्यासाठी इतर सिध्दसाधकांचा अनुभव तेथे कामास नाही. एवढेच काय  पण सद्गुरूंचा अनुभव सुद्धा आपल्या समाधानास पुरा पडत  नाही. तेथे फक्त स्वयंसाधनेने आलेला स्वानुभवच ज्ञानाच्या खरेपणाबद्दल निश्चयवृत्ती करतो … स.भ.प.पु. बेलसरे महाराज सांगतात की  प्रचितीचा दृष्टिकोन  हा प्रपंच आणि  परमार्थात मूलभूत आहे..पण परमार्थात प्रचिती येणे (आत्मसाक्षात्कार होणे )म्हणजे  काय साधते हे सांगणे अवश्य असते..मुंडक उपनिषदामध्ये दुसऱ्या अध्यायात असा मंत्र आहे–

भिंद्यन्ते हृदयग्रंथी: छिन्द्यन्ते सर्व संशया:।क्षीयंते चास्य कर्माणि तस्मिन्द्रष्टी परावरे ।।”

-सर्वत्र समानपणे व्यापून असलेल्या ब्रह्माचे दर्शन झाले की हृदयात वास करणारी अविद्या आणि तिच्यापासून उत्पन्न होणार वासनासमुदाय नष्ट पावतो. मनातील संदेह नष्ट पावतात..प्रत्ययामुळे निश्चळ आत्मनिवेदन होते..पापखंडन  होऊन कर्मक्षय होतो.माणसाचा जन्म मरणाचा फेरा होणे थांबते.

म्हणून समर्थ म्हणतात की ..

पापाची खंडना  जाली  ।जन्मयातना चुकली ऐसी स्वयें प्रचित आली म्हणिजे बरें  ।।(१०-८-२१ ते २३)

परमेश्वरास ओळखिलें ।आपण कोणसे कळले| आत्मनिवेदन जाले म्हणजे बरें ।।

ब्रह्माण्ड कोणे केले| कासयाचे उभारलें | मुख्य कर्त्यास ओळखिले म्हणिजे बरें| ।।

जय जय रघुवीर समर्थ ।

-पांडुरंग  देशपांडे

लेखक- श्री पांडुरंग देशपांडे.

pandurang deshpande
pandurang deshpande

लेखक हे Textile Process Advisor and consultant असून मुंबई येथील UDCT मधून Textile Engineer झालेले आहेत. व्यवसायानिमित्त भारतभर भ्रमण केले आहे. आणि अध्यात्माची आवड असल्याने संत वाङमयाचे अभ्यासक आहेत.