Story of a donkey-एका गाढवाची गोष्ट
Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra
एका गाढवाची गोष्ट
ही साधारण १९६३ सालची गोष्ट आहे.
मी त्यावेळी अंबाजोगाईला होतो आणि योगेश्वरी शाळेत ९ वीत शिकत होतो. आमच्या शाळेच्या सभागृहात कथाकथनाचा कार्यक्रम चालू होता. त्यात एक खूप बिलंदर वक्ता होता. तो नेहमी मास्तर लोकांची चेष्टा करीत असे.
त्याने गाढवाची गोष्ट सांगायला सुरुवात केली.
“एका धोब्याकडे एक गाढव असते. ते मानेने फक्त ‘हो-हो’ असेच म्हणत असते. त्या धोब्याने शर्यत लावली की जो कोणी माझ्या गाढवाकडून ‘नाही- नाही’ म्हणवून दाखवेल, त्याला दहा रुपये बक्षीस म्हणून देण्यात येतील. तेंव्हा बरेच जण आले आणि त्यांनी विविध प्रकारे त्या गाढवाची मान ‘नाही-नाही’ अशी, म्हणजे आडवी हालेल यासाठी प्रयत्न केले. पण कितीही जंग जंग पछाडले तरी ते गाढव काही ‘नाही-नाही’ म्हणत नव्हते. दर वेळी ते गाढव ‘हो-हो’ अशीच मान हालवित होते.
शेवटी एकजण आला. तो त्या गाढवाच्या कानात काही तरी बोलला. लगेच ते गाढव मानेने ‘नाही-नाही’ असे म्हणू लागले.
धोब्याने आपली हार कबूल केली, आणि ठरल्याप्रमाणे त्या माणसाला १० रुपये दिले. पण मग न राहवून धोब्याने त्या माणसाला विचारले, “मी इतके दिवसांपासून हा खेळ करतो आहे, पण आतापर्यंत कुणीही गाढवाकडून नाही नाही म्हणवून घेऊ शकले नाही, मग तुम्ही असे काय त्या गाढवाच्या कानात सांगितले, की माझे गाढव एवढे जोरजोरात नाही म्हणून मान हलवू लागले?”
त्यावर तो माणूस म्हणाला, “अगदी सोपे आहे. मी त्या गाढवाच्या कानात विचारले, क्या तू मास्टर बनेगा?” त्यावर त्याने जोरात मान हलवली.!!”
त्या वक्त्याच्या या शेवटच्या वाक्याने, पूर्ण हॉल प्रचंड हास्यात बुडून गेला. तिथे उपस्थित असलेले सर्व शिक्षक, गोरेमोरे झाले.
संयोजकांनी पुढच्या वक्त्याचे नाव पुकारले. पुढचे वक्ते होते संभूस सर. संभूस सर हे खूप हजरजबाबी म्हणून प्रसिद्ध होते. ते योगेश्वरी महाविद्यालयाचे मराठीचे प्राध्यापक तर होतेच पण एक चांगले साहित्यिक पण होते. ते त्या आगाऊ वक्त्याला असे सोडतील असे शक्यच नव्हते.
संभूस सर व्यासपीठावर आले. त्यांनी सर्व श्रोत्यांकडे नजर फिरविली. त्यानंतर एक कटाक्ष त्यांनी आधीच्या वक्त्याकडे टाकला आणि त्यांनी पहिलेच वाक्य म्हटले,
“ आत्ताच तुम्ही एका गाढवाची गोष्ट ऐकली आहे…..
आता माझी गोष्ट ऐका…”
एक क्षणभर शांतता, आणि पुढल्याच क्षणी, आधी झाला होता, त्यापेक्षा, दुप्पट हशा पूर्ण सभागृहात झाला, आणि त्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट पण झाला.
तो आधीचा वक्ता, जो इतका वेळ विजयी नजरेने सगळीकडे पाहत होता, त्याला मेल्याहून मेल्यासारखे झाले, आणि त्याने खाली मान घातली, ती नंतर वर केलीच नाही.
“मास्टर से पंगा लेना इतना आसान नही होता!” हे त्यादिवशी संभूस सरांनी सिद्ध करून दाखवले.
लेखक:- श्री व्ही. डी. भोपे
निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग, महाराष्ट्र सरकार
गावातील राजकारण
Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra
गावपातळीवरील
—————
राजकारणाची एका छोटीसी
———————
झलक
——-
साधारणपणे १९७४ सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी पाणीपुरवठा खात्यात ज्युनियर इंजिनीअर म्हणून काम करीत होतो .ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना तयार करण्यासाठी वेगवेगळ्या खेड्यांत मला सर्व्हे करण्यासाठी जावे लागायचे. तिथे चार पाच दिवस मुक्काम करावा लागायचा .नदी काठी प्रस्तावित विहीरीच्या जागेचा सर्व्हे , रायजिंग मेन म्हणजे नदीकाठच्या प्रस्तावित विहीरीपासून गावातील प्रस्तावित टाकीपर्यंत टाकायच्या पाईपच्या अलाईनमेंटचा सर्व्हे , प्रस्तावित टाकीच्या जागेचा सर्व्हे आणि Distribution system म्हणजे गावातल्या सगळ्या गल्ल्यांमध्ये पाणी वितरण व्यवस्थे साठी करावयाचा सर्व्हे असे साधारणपणे कामाचे तांत्रिक स्वरूप होते.त्या काळात खेड्यापाड्यांमध्ये चुकुन माकुन एखादी दुसरी चहाची टपरी असायची.मुक्काम करण्यासाठी आणि खाण्यापिण्यासाठी शहरातल्या सारखी लाॅजिंग बोर्डींगची सोय असणारे हाॅटेल्स खेड्यात नसतं .त्यामुळे
आमचा मुक्काम ग्रामपंचायतीमध्येच असायचा. आम्ही दौऱ्यावर येतांना आपले अंथरूण पांघरूण बरोबर घेऊन यायचो. जेवणासाठी आम्ही आमचे किचन किट बरोबरच ठेवायचो. त्यामध्ये स्टोव्ह, पुरेसे राॅकेल, पीठ, मीठ, दाळ, तांदूळ, तेल, तिखट , चहा साखर इत्यादी सर्व आवश्यक वस्तू असंत .भांड्यांचा सेट आम्हाला आॅफिसतर्फे मिळायचा. व आमचे जेवण खाण नाश्तापाणी हे तयार करण्यासाठी एक अटेन्डट सोबत मिळायचा.सर्व्हे करण्यासाठी लागणारे चारपाच मजूर आम्ही डेली वेजेसवर गावातूनच घ्यायचो.त्यावेळी नियमित बससेवा फार कमी खेड्यांमध्ये होती म्हणून आमचे डेप्युटी इंजिनीअर आम्हाला जीपने खेड्यात आणून सोडायचे व ठरल्याप्रमाणे परत चार पाच दिवसांनी आम्हाला वापस घेऊन जाण्यासाठी जीप घेऊन यायचे.
आम्ही गावात आलो की कांही मिनिटांतच पाणी पुरवठ्याचे इंजिनियर लोक आलेत ही बातमी वाऱ्या सारखी गावभर पसरायची. खेड्यात रिकामटेकडे लोक मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात . त्यांच्यापैकी कांहीजण नुसतेच आम्हाला पहाण्यासाठी यायचे.आपण झू मध्ये जातो ना वन्य प्राणी पहायला , अगदी सेम तसेच आम्हाला पहायला कांही लोक यायचे. थोडंसं दूर अंतरावर उभे राहून आपसात हळू आवाजात बोलायचे . अर्थात आमच्याबद्दलच ते बोलणे असे. हा प्रकार मोठा आॅकवर्ड वाटायचा. पण काय करणार ना !!!
एका खेड्याच्या सर्व्हेसाठी दोन junior engineers पुरे असतात.आम्ही आल्या आल्या कोतवालाला सूचना द्यायचो की , जा सरपंचांना सांग की पाणी पुरवठा योजनेचा सर्व्हे करणारे इंजिनियर लोक आलेयत आणि तुम्हाला बोलावलयं. सरपंच नसले तर उप सरपंचाला सांग आणि ते ही नसले तर चार दोन मेंबरांना बोलाऊन घेऊन ये. आम्ही योजनेची माहिती देणार आहोत म्हणा.’
मग जे कोणी येतील त्यांना आम्ही पाणी पुरवठा योजनेचे स्वरूप त्यांना समजेल अशा स्टाईल मध्ये समजावून सांगायचो व मग यथावकाश survey instruments घेऊन सर्व्हेचे काम सुरू करायचो.
सर्व्हेचे काम साधारणपणे चारपाच दिवसात पूर्ण व्हायचं . मग ठरल्याप्रमाणे आमचे डेप्युटी इंजिनियर जीप घेऊन यायचे व आम्हाला औरंगाबादला परत आणायचे.
पाणी पुरवठा ही एक अत्यावश्यक बाब असल्यामुळे आम्ही ज्या खेड्यात जाऊ तिथल्या लोकांत उत्साह आणि आनंद पसरायचा की चला आता आपल्याला पिण्याचं पाणी आपल्या घरोघरी नळातून मिळणार . रोज दूर अंतरावरून पिण्याचे पाणी आणण्याचा आपला आणि विशेषत: आपल्या बायकांचा कित्येक वर्षांपासून होणारा त्रास लवकरच संपणार आणि तो ही सरकारी खर्चाने ! म्हणून तमाम मंडळी खूष असंत .संध्याकाळी गावची तालेवार मंडळी आम्हाला येऊन भेटत .योजनेची माहिती विचारीत . मीही त्यांच समाधान होईल अशी माहिती देत असे. मग कुणीतरी आपल्या गड्याला सांगत असे , जा रे आपल्या घरला जाऊन सायेब लोकान्साठी च्या पोहे घेऊन ये. मग थोड्या वेळानी आमच्या साठी चहा पोह्याचा नाश्ता यायचा. सरपंच आणि इतर लोक सुद्धा अदबीने बोलायचे.कुणीतरी विचारायचं, सायेब सर्वेला किती दिवस लागतील.. मी म्हणायचो .’ चार पाच दिवसात सहज सर्व्हे पूर्ण होईल.’
पुढचा प्रश्न ‘.,अन् मंग तेच्यानंतर काय हुईल ? ‘
माझं उत्तर , ‘ त्याच्यानंतर आम्ही औरंगाबादच्या आॅफिस मध्ये बसून या पाणी पुरवठा योजनेचे प्लॅन्स ड्राॅईंग्ज डिझाईन्स आणि एस्टिमेट्स तयार करू. याच्यासाठी आम्हाला औरंगाबादला पंधरा दिवस लागतील.नंतर या योजनेला मंजूरी मिळेल.नंतर निधी उपलब्ध होईल. नंतर टेंडर्स बोलावले जातील . त्यानंतर योजनेचं प्रत्यक्ष काम सुरू होईल व त्यानंतर साधारणपणे नऊ महिन्यात काम पूर्ण होऊन तुम्हाला घरामध्ये कनेक्शन घेऊन पिण्याचं पाणी मिळू शकेल..’ मी थोडक्यात अशी माहिती देत असे.
मग सगळे लोक आम्हाला काम लवकरात लवकर केलंत तर लई चांगल होईल बघा , त्याच्यासाठी तुम्हाला जे सहकार्य पाहिजे ते आनंदाने द्यायला आम्ही तयार आहोत असं सांगायचे..
हा झाला सर्व साधारणपणे आमचा जनरल अनुभव .
पण एका खेड्यात मात्र वेगळाच अनुभव आला.आमचा सर्व्हे संपायच्या शेवटच्या दिवशी रात्री ८ च्या सुमारास दोन तीन जण आले. मला म्हणाले . ‘ इंजनेर सायेब यावं का, थोडं महत्वाचं बोलायचं व्हतं .’
मला वाटलं नेहमीप्रमाणे लवकर योजना तयार करा अशी विनंती करायला मंडळी आली असावी. मी म्हटलं ,’ या की, बसा अन् सांगा काय सांगायचं ते.’
त्यावर त्यांचा म्होरक्या म्हणाला, ‘ तुमी म्हनला व्हता की तुमाला सर्वे कराया पाच दिवस अन् यवजनेचे एष्टीमेट कराया पंधरा दिवस लागतील म्हनून शान..’
मी म्हटलं, ‘ होय की तेवढ्या वेळात मी नक्कीच करू शकतो..’
त्यावर त्यांचा म्होरक्या म्हणाला., ‘इंजनेर सायेब इतक्या फाष्ट यवजनेचे एष्टीमेट करायची काय पन गरज नाही. आम्ही तर म्हन्तो तुमी चांगले पाचसहा महिने एष्टीमेट लांबवा . तेच्यात काई बी आब्जेक्शन काढा अन् मधी खोडा घाला..’
मी अवाक् झालो आपल्याच गावच्या विरोधात हे लोक अशी मागणी का करताहेत हे मला समजेना.
मी त्यांना म्हटलं अहो प्रत्येक गावातले लोक आम्हाला लवकरात लवकर काम करण्यासाठी सांगतात आणि तुम्ही अशी विपरित मागणी कशी करू शकता. त्याचं काय कारण आहे.’..
त्यावर म्होरक्या म्हणाला, ‘ सायेब हे गावचं पाल्टिक्स असतं. तुमच्या सारख्यांना न्हाई समजायचं . तरी बी सांगतो. अावो सायेब जर यवजना लवकर पूर्न झाली तर त्याचं समदं क्रेडिट सरपंचास्नी जाईल. पुडच्या इलेक्शनमधे आमाला त्याला पाडायचंय अन् मला सरपंच व्हायाचंय . त्याच्या काळात पानीपुरवठा यवजना वेळेवर करून घेन्यात हा सरपंच फेल गेला आसं मला प्रचारात त्याच्या आपोजिटमधे बोंबाबोंब करून सांगता आलं फायजे. म्हनून तुमाला मी रिक्वेष्ट करतो की काहीतरी टेक्निकल पाईंट काढून तुम्ही ही यवजना लांबवा.
अन् सायेब अाम्ही काही नुस्तीच कोरडी रिक्वेष्ट करत न्हाई . तुमची काय राजी खुशी आसंल, च्या पानी आसंल ते खुल्लं सांगा . तुमी आमचं यवढं मोठं काम करनार म्हनल्यावर आम्ही बी तुम्हाला खुश करूच की .’
अर्थात असे स्वार्थी आणि
गलिच्छ राजकारण
करणाऱ्या
पुढाऱ्याला मी भीक घातली
नाही हे वेगळे सांगण्याची गरजच नाही.
पण हा अनुभव मात्र मला बरंच कांही शिकवून गेला !!!
लेखक:- श्री व्ही. डी. भोपे
निवृत्त कार्यकारी अभियंता, सिंचन विभाग, महाराष्ट्र सरकार
This site contains product affiliate links for Amazon and other sellers. We may receive a small commission if you make a purchase after clicking on one of these links, without any additional cost to the purchaser.
चोराच्या उलट्या बोंबा
Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra
चोराच्या उलट्या बोंबा
——————-
मित्रांनो
मी इंजिनिअरिंगला शिकत असतांना उस्मानपुऱ्यातल्या एका वाड्यात रहात होतो.तो बराच मोठा वाडा होता. सात आठ खोल्यात मिळून सुमारे पंधरा वीस विद्यार्थी तिथे रहात होते . त्यातले बहुसंख्य आमच्याच काॅलेज मध्ये शिकत होते.
उन्हाळा सुरू झाला की रूममध्ये खूप उकडायचे.फॅन विकत घेण्याची त्यावेळी आमच्या पैकी कुणाची ऐपत नव्हती . त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात कांही जण अंगणात झोपायचे , तर बरेच जण रूमचे दार रात्रभर चक्क सताड उघडे टाकून झोपायचे . रात्रीचा अभ्यास साधारणपणे बारा वाजेपर्यंत चालायचा व त्यानंतर बहुधा सगळे जण झोपायचे ..
त्यावेळी उस्मानपुऱ्यात रात्री उचलेगिरी करणाऱ्या भुरट्या चोरांची एक टोळी सक्रिय होती.
एकदा मध्यरात्रीनंतर केंव्हातरी आमच्या वाड्यात चोर आले .रूमचे दार रुममधे
उकडते म्हणून सताड उघडे टाकून कांही विद्यार्थी झोपले होते. अगदी गाढ झोपले होते. मध्यरात्र उलटून गेल्यानंतर ज्या खोल्या उघड्या दिसल्या तिथून कपडे म्हणजे शर्ट पॅंट्स चोरून अवघ्या कांही मिनिटांमध्ये चोर पसार झाले ..
ज्यांचे कपडे चोरीला गेले त्यांना सकाळी उठल्यानंतरच कळाले की आपले कपडे चोरी गेले आहेत.
पोलिस कम्प्लेन्ट करण्यात कांहीच अर्थ नव्हता . कारण वेळ तर नक्कीच वाया गेला असता आणि चोर पकडले जाण्याची आणि चोरी गेलेले कपडे परत मिळण्याची सुतराम शक्यता नाही असे मानून कुणीही कंप्लेन्ट करण्याच्या फंदात पडले नाही.
असाच साधारण महिना गेला. चोरीचा विषय मागे पडला होता . पण एक दिवशी एक हवालदार आमच्या वाड्यात आला आणि म्हणाला आम्ही दोन चोरांना दुसऱ्या गुन्ह्यात अरेस्ट केले आहे . त्यांनी तुमच्या वाड्यात कपड्यांची चोरी केल्याची कबुली पण दिली आहे.तेंव्हा तुम्ही चोरांच्या आयडेंटीफिकेशन साठी व चोरी गेलेल्या कपड्यांच्या आयडेंटीफिकेशन साठी पोलिस स्टेशन मध्ये या..”..
आम्ही सांगितले की आम्ही सगळे जण गाढ झोपेत असतांना चोर येऊन चोरी करून गेले.त्यामुळे आम्ही चोरांना नाही ओळखू शकणार . पण आमचे कपडे जरूर ओळखू . आणि दिवसा आम्हाला काॅलेज असतं म्हणून आम्ही संध्याकाळी येऊ .. चालेल ना.. यावर हवालदार हो म्हणाला .
माझी स्वत:ची एक पॅंट गेली होती . चेन खराब झालेली, हुक तुटलेली, तुरपाई उसवलेली अशी पॅंट होती.
संध्याकाळी आम्ही चारपाच जण पोलिस ठाण्यात गेलो.
तिथे पोलिसांनी आम्हाला लाॅकअप मधला तो चोर दाखवला आणि त्यानी चोरलेले आमचे कपडे म्हणजे शर्ट्स व पॅंट्स दाखवले.ज्यानी त्यानी आपापले कपडे ओळखले व तसे आम्ही तिथल्या हवालदाराला सांगितले .
आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या चोरट्याच्या चेहेऱ्यावर आपण कांही चुकीचं केलंय अशा भावनेचा लवलेशही नव्हता .
त्याचं नाव करीम खान असं होतं असं हवालदाराकडून कळालं .
कांही तरी बोलावं म्हणून मी म्हणालो…कायको चोरी किये मियाॅं हमारे वाडेमे. हम सब तो स्टुडन्टस है. पढाई करने के वास्ते आये है.ऐसा नही करना था तुमने..”
ऐसे कैसे इष्टुडन्ट लोगां है जी तुम….कितने खराब कपडे मिले मेरेकु.किसकी चेन नही तो किसकी हुक नही, किसके बटना टुटे हुए तो किसके कपलिंग गायब तो किसका जेब फटा हुवा.
ऐसे भंगार कपडे पहनते क्या ? रिपेरिंग मे मेरेकु कित्ता खर्चा करना पडा..
और हाॅं . दूसरी बात … किसीकेभी जेब मे मेरेकु एक धेला भी नही मिला … तुम सब के सब कडके निकले.
तुम लोगोंको घरसे मनिआरडर नही आती क्या ? मेरेकु कुछ पडतल नही गिरा….”
म्हणजे पहा…हा xxxx स्वत: चोर !!! पण आमच्या कडे चोरी करून परत वर आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करीत होता..
आता पर्यंत मी फक्त ‘ चोराच्या उलट्या बोंबा ‘ हा वाक्प्रचारच ऐकला होता . पण या प्रसंगाच्या तो प्रत्यक्षात अनुभवायला मिळाला….
😄😜🤑
This site contains product affiliate links for Amazon and other sellers. We may receive a small commission if you make a purchase after clicking on one of these links, without any additional cost to the purchaser.
आमची आंगणवाडी रद्द करू नका
Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra
आमची अंगणवाडी कॅन्सल करू नका
———————
( वादळामुळे झाली उपरती )
मित्रांनो
लातूर आणि उस्मानाबाद या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ३० सप्टेंबर १९९३ साली प्रलयंकारी भूकंप झाला होता याची तुम्हा सर्वांनाच माहिती असेल.
दोन्ही जिल्ह्यांमध्ये या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाली होती. तसेच प्राणहानी सुध्दा झाली होती.दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकूण ५२ गावे जवळपास बेचिराख झाली होती . ६.२ रिश्टरचा भूकंप झाला होता.
शासनाने युद्ध पातळीवर पुनर्वसनाचे काम हाती घेतले. त्यासाठी एकूण १० डिव्हिजन ऑफिसेस तातडीने सुरु केले होते. या दहा ऑफिसेस पैकी उमरग्याच्या एका ऑफिसला Executive Engineer म्हणून माझी पोस्टिंग शासनाने केली . तिथे मी पाच वर्षे काम केले.
या पाच वर्षांमध्ये बेचिराख झालेल्या एकूण ५ गावांचे संपूर्ण पुनर्वसन केले. १८ हजार घरांचे Retrofitting म्हणजे क्षतिग्रस्त झालेल्या घरांची तंत्रशुध्द पध्दतीने दुरुस्ती आणि १५० नविन अंगणवाड्या आणि १०० शाळेच्या इमारतींची दुरूस्ती
एवढी सगळी कामे माझ्या ऑफिसने केली.पाच वर्षात शंभर टक्के टार्गेट पूर्ण केले.
यासर्व कामांपैकी एका छोट्या कामाचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे.
शासनातर्फे प्रत्येक खेड्यामध्ये नवीन अंगणवाडी बांधण्याचा कार्यक्रम होता. तुळजापूर तालुक्यांतील सर्व अंगणवाड्या बांधण्याचे काम माझ्या ऑफिसकडे होते.
योजना अशी होती की ज्या गावाला नवीन अंगणवाडी मंजूर झाली आहे त्या गावच्या ग्रामपंचायतीने बाराशे चौरस फूट जमिनीचे संमतिपत्र आम्हाला ठराव पास करून करून द्यावे व मग आमच्या ऑफिसतर्फे तिथे अंगणवाडी बांधली जाईल.जे गाव संमतिपत्र देणार नाही त्या गावात अर्थातच अंगणवाडी बांधली जाणार नाही.
आम्हाला बहुतेक कोणत्याही गावी असे संमतिपत्र मिळण्यास कांहीही अडचण आली.
पण एका गावी मात्र मला वेगळाच अनुभव आला. ग्रामपंचायत मेंबर्स मधील अंतर्गत कलह, हेवेदावे, दुफळी या कारणांमुळे माझ्या स्टाफला त्या गावाकडून संमतिपत्र मिळेच ना.माझ्या डेप्युटी इंजिनिअरने तसा रिपोर्टही मला सादर केला .मी म्हटले एकदा मी स्वत: त्या गावाला व्हिजिट देऊन प्रयत्न करून पहातो.
मी त्या गावी ग्रामपंचायत बोलावली. पण तिथली मंडळी आपल्या आडमुठे पणावर कायमच होती.ते लोक त्यांच्या अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे मला संमतिपत्र द्यायला तयारच नव्हते.
मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मी म्हणालो,” मंडळी शासनाकडे बहुतेक पैशांची चणचण असते म्हणून विकासाची कामे वर्षोनवर्षे रखडतात पण भूकंपग्रस्त गावांसाठी शासनाने भरपूर निधी दिला आहे . त्याचा तुमच्या गावासाठी फायदा करून घ्या. आम्हाला संमतिचा ठराव करून द्या. आम्ही तंत्रशुद्ध पध्दतीने अंगणवाडीचे बांधकाम करून देऊ . तुमच्यामधील मतभेदामुळे लहान मुलांचे नुकसान करू नका…”
माझ्या या शिष्टाईचा कांहीही उपयोग झाला नाही.
मंडळी मला म्हणाली ,” साहेब , आम्ही कांही जमिनीचा ठराव देणार नाही. आम्हाला आहे एक जुनी अंगणवाडी ! तुम्ही जावा आपलं परत. आमचं आम्ही बघून घेऊ. “
स्वत:च नाक कापलं तरी हरकत नाही पण समोरच्याला अपशकुन झाला पाहिजे.या म्हणीचा प्रत्यय मला तिथे आला.
मी म्हटले, ठीक आहे मंडळी. तुम्ही जमिनीचा ठराव करून द्यायचाच नाही असं म्हणताहात तर मी परत जातो. तुमची अंगणवाडी मात्र मला आता कॅन्सल करावी लागेल. ती मी आता दुसऱ्या होतकरू गावाला बांधीन…पण मला तुमची सध्याची अंगणवाडी कशी आहे ते तरी बघू द्या…”
गावच्या लोकांनी मला जुनी अंगणवाडी दाखवली. ती एक मोडकळीस आलेली दोन खोल्यांची जागा होती.छताच्या पत्र्यांचे fixtures निघून गेले होते .इमारत धोकादायक झाली होती.
मला रहावले नाही . मी म्हटले, ” मंडळी ही इमारत धोकादायक आहे . कांहीही होऊ शकते “
तरी सुध्दा लोक मला म्हणाले, ” आमचं आम्ही बघून घेऊ..”
मी परत जायला निघणार….
एवढ्यात सोसाट्याचे वादळ आले आणि पाच मिनिटांमध्ये त्या अंगणवाडीवरील दोन पत्रे आकाशात उंच उडाले व मग खाली पडले . या पत्र्यांमुळे बालवाडीतली दोन छोटी मुले जखमी झाली होती. मी त्या मुलांच्या पालकांना कारमध्ये बसायला सांगितले व ते मुलांना घेऊन निमुटपणे गाडीत बसले. ड्रायव्हरला सांगितले, कार अणदूरच्या दवाखान्यात घेऊन चला. एकदम फास्ट .कांही वेळातच आम्ही दवाखान्यात पोहोंचले . तेथील डाॅक्टर्सनी तातडीने मुलांवर उपचार केले. सुदैवानी एकाही मुलाला गंभीर इजा झाली नव्हती .
मुलांना घेऊन मी परत त्या गावात आलो. लोक माझी वाट पहात थांबले होते .मी गावकऱ्यांच्या स्वाधीन मुलं केली .आणि त्या लोकांना म्हणालो, ” मंडळी सुदैवांने मुलांना गंभीर झाली नाही. डाॅक्टरांनी औषधोपचार केला आहे. आता काळजीचं कांही विशेष कारण नाही..लेकरांना सांभाळा येतो मी…”
मी निघालो. पण लोकांनी माझी कार अडवली.
मी खाली उतरलो.
त्यांचा म्होरक्या मला म्हणाला..” साहेब आम्हाला माफ करा. आम्ही माती खाल्ली.आमच्या हेव्यादाव्यात लेकरांचं नुकसान करायला निघालो होतो.पण आता असं होणार नाही. तुम्हाला आम्ही आत्ताच्या आत्ता संमतिपत्र अन् ग्रामपंचायतीचा ठराव करून देतो. तो घेतल्याशिवाय तुम्ही जाऊ नका अन् मेहेरबानी करून आमची अंगणवाडी कॅन्सल करू नका..”
मला काय ? मला तर हेच हवे होते…
एका तासामध्ये त्या गावकऱ्यांकडून जमिनीचे संमतिपत्र, काॅफीचा पाहुणचार व भरपूर सदिच्छा व आदर एवढा सगळा ऐवज घेऊन मी आनंदाने उमरग्याला परत आलो .
माझ्या साडेछत्तीस वर्षांच्या सर्व्हीस मध्ये माझे प्रकल्प यशस्वी करण्यात मला खूप लोकांचे सहकार्य मिळाले.
पण या प्रकरणी मात्र चक्क निसर्गच माझ्या मदतीला धावून आला…..
कदाचित त्याला वाटले असावे..” चला.. हा बिचारा एवढ्या तळमळीने. प्रयत्न करतोय तर आपण त्याला मदत करू या ..”
तुम तो ठहरे परदेसी
Guest Article by Shri V.D.Bhope., Retired Executive Engineer, Irrigation Department, Govt. of Maharashtra
तुम तो ठहरे परदेसी
साथ क्या निभाओगे
सुबह पहली गाडी से
तुम तो चले जाओगे
………………………….
मित्रांनो
असाच एक किस्सा तुमच्या बरोबर शेअर करतोय …
साधारणपणे १९९७ सालची गोष्ट आहे. त्यावेळी मी उमरग्याला कार्यरत होतो .१९९३ साली लातूर उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये जो प्रलयंकारी भूकंप झाला त्या भूकंपात एकूण ५२ गावे फार मोठ्या प्रमाणात घरांची पडझड झाल्यामुळे जवळपास बेचिराख झाली होती. व मनुष्यहानीही कांही हजारांमध्ये झाली होती .
माझ्याकडे एकूण ५ गावांच्या पुनर्वसनाचे काम होते.सरकारनेही भूकंप पुनर्वसनाचे काम वेळेत व्हावे म्हणून सुमारे ८०० इंजिनीअर्स या प्रकल्पावर नेमले होते .
ज्या गावाच्या पुनर्वसनाचे काम पूर्ण झाले तेथील सर्व नवीन घरे , शाळा , दवाखाना, ग्रामपंचायत, कम्युनिटी हाॅल ,इत्यादिंचा लोकार्पण सोहळा केला जायचा.त्यासाठी अर्थातच पालकमंत्री यायचे . बॅंडवालेही यायचे . भाषणे व्हायची. मंत्री आले की त्यांचे कार्यकर्ते, चेलेचपाटे, खुशमस्करेही आवर्जून यायचे .कुणी सांगायचं मी साहेबांचा उजवा हात आहे बरं का !
अशाच एका नवीन वसलेल्या गावाचा उद्घाटनसोहळा होता.
मंत्र्यांच्या स्तुतीपर भाषणे झाली. आमचा रोल म्हणजे या सोहळ्यास हजर राहणे तेही अनिच्छेने एवढाच होता. मंत्री महोदय भाषणास उभे राहिले …. शासन तुमच्या पाठीशी आहे . तुमचं गाव आम्ही आता पूर्णपणे नवीन बांधून दिलं आहे .भूकंपग्रस्त लोकांना काहीही अडचण आली तर मी अर्ध्यारात्री धावून येईन. तुमची साथ मी कधीही सोडणार नाही असं साॅलिड आश्वासन मंत्र्यांनी देऊ न टाकलं…
त्यांच्या कार्यकर्त्यांनी व जमलेल्या लोकांनी टाळ्या वाजवल्या . नंतर मंत्र्यांच्याच एका उत्साही कार्यकर्त्यांने त्यांची गावातून मिरवणूक काढण्याची टूम काढली.तो साहेबांचा उजवा हात म्हणवून घ्यायचा..
साहेबांची मिरवणूक गावातून निघाली…एका कार्यकर्त्याने बॅंडवाल्यांना इशारा केला चांगलं गाणं वाजवा रे…
बॅंडवाल्यांना काय , त्यांनी लगेच त्या काळातलं अल्ताफ राजाचं गाणं सुरु केलं….
तुम तो ठहरे परदेसी
साथ क्या निभाओगे
सुबह पहली गाडीसे
तुम तो चले जाओगे
तुम तो ठहरे परदेसी
साथ क्या निभाओगे….
कार्यकर्ता माझ्या चांगल्या ओळखीतला होता.बैठकीतलाही होता.मी त्याचा शर्ट ओढून त्याला म्हटलं , हे काय गाणं लावलं राव. मंत्र्यांनी आत्ताच भाषणात लोकांना साथ देण्याचं आश्वासन दिलंय अन् तुम्ही हे गाणं लावलं …
त्यावर तो म्हणाला ,…
जाऊ द्या हो साहेब . मंत्र्यांना काय त्यांच्या कार्यकर्त्यांची गर्दी पायजे,बॅंड पायजे अन् स्वत:ची मिरवणूक पायजे…हे सगळं आहे ना, बस तर मग…बॅंडवर कोणतं का गाणं वाजेना.कोण लक्ष देतोय .तुम्ही त्यांच्या चेहेऱ्याकडे पहा बरं , किती खुश दिसताहेत ते..’
मी हळूच मंत्र्यांच्या चेहेऱ्याकडे पाहिलं . मिरवणुकीचा एवढा लवाजमा पाहून स्वारी जाम खुश दिसत होती…
मी कार्यकर्त्याला म्हटलं , तुमच बरोबर आहे रावं . आम्हाला नाही कळत तुमच्या एवढं. खुशाल चालू द्या गाणं
तुम तो ठहरे परदेसी
साथ क्या निभाओगे
😁😃😜🤑🤑😄
This site contains product affiliate links for Amazon and other sellers. We may receive a small commission if you make a purchase after clicking on one of these links, without any additional cost to the purchaser.






