https://goodworld.in A website by Madhav Bhope

खंडोबाच्या आरत्या आणि तळी khandoba-aartinew1-2

khandoba-3

खंडेरायाच्या आरत्या आणि तळी

khandoba-aarti

खंडोबाची आरती-१ नरहरी कृत

जेजुरगडपर्वत शिवलिंगाकार ।

मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर ॥

नानापरिची रचना रचिली अपार ।

तये स्थळी नांदे स्वामी शंकर ॥ १ ॥

जय देव जय देव शिवमार्तंडा ।

अरिमर्दन मल्लारी तूंची प्रचंडा ॥ धृ. ॥

मणिमल्ल दैत्य प्रबळ तो झाला ।

त्रिभुवनी त्याने प्रळय मांडिला ॥

नाटोपे कोणास वरे मातला ।

देवगण गंधर्व कांपती त्याला ॥ जय. ॥ २ ॥

चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी ।

मणिमल्ल दैत्यांचा संहार करिसी ।

चरणी पृष्ठी खंङ्‌गें वर्मी स्थापीसी ।

अंती वर देउनि त्या मुक्तीते देशी ॥ जय. ॥ ३ ॥

मणिमल्ल दैत्य मर्दुनी मल्लारी ।

देवा संकट पडतां राहे जेजुरी ॥

अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी ।

देवा ठाय मागे दास नरहरि ॥ जय. ॥ ४ ॥


खंडोबाची आरती-२  रामदास स्वामी कृत

पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।

खंडामंडित दंडित दानव अवलीळा ॥

मणिमल्ल मर्दुनियां जों धूसुर पिवळा ।

हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ॥ १ ॥

जय देव जय देव जय शिव मल्हारी ।

वारीं दुर्जनअसुरा भवदुस्तर तारी ॥ धृ. ॥

सुरवरसंवर वर दे मजलागी देवा ।

नाना नामे गाइन ही तुमची सेवा ॥

अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।

फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ २ ॥

रघुवीरस्मरणी शंकर हृदयीं निवाला ।

तो हा मल्लांतक अवतार झाला ॥

यालागीं आवडे भाव वर्णीला ।

रामी रामदासा जिवलग भेटला ॥ जय देव.॥ ३ ॥


खंडोबाची आरती-३  नामदेव कृत

जय देवा मार्तंडा । हाती घेउनिया खंडा ॥

मारिले दुष्ट दैत्य । उडे त्रैलोकी झेंडा ॥ धृ. ॥

मातले पृथ्वीवरि । मणि मल्ल दैत्य दोनी ॥

टाकिले ऋषीयाग । यज्ञकुंड विध्वंसुनी ॥

म्हणुनीया अवतरले । गौरीहर शूळपाणी ॥ जय. ॥ १ ॥

साठ कोटी गण सवें । घेउनियां दैत्यावरी ॥

जाऊनियां युद्ध केलें । रण तुंबल भारी ॥

शिवचक्र दैत्यचक्र । युद्ध होय बरोबरी ॥ जय. ॥ २ ॥

त्रिशुळपाणी तप्त । थोर झाले क्रोधामुळें ॥

मारिले खङ्‌ग जेव्हां । दैत्याचे कंठनाळीं ॥

वरदान मागताती । प्राण अंताचे वेळी ॥ जय. ॥ ३ ॥

मल्ल म्हणे कर्पूरगौरा । हर हर महादेवा मल्हारी जनमुखिं ॥

ऎसा उच्चार व्हावा । उद्धरिले असुरातें ।

म्हणुनीं मल्लारी नांवा । जय. ॥ ४ ॥

चंपाषष्ठीचे दिवशी । ऎसा अवतार झाला ॥

आनंदले सुरवर । म्हणुनी येळकोट बोला ॥

चरणी तुझे लीन नामा ॥ देवा सांभाळी त्याला ॥ जय देवा. ॥ ५ ॥


खंडोबाची आरती- ४ मध्वमुनीश्वर कृत

मस्तकि मुगुट अंगी सोन्याचा शेला । हस्तकि खड्गा घेउनी मारिसी मणिमल्ला ।।

कैलासाची प्रतिमा जेजुरीचा किल्ला । बैसोनिया रक्षिसी दक्षिणचा जिल्हा ।।१।।

जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडारानें डवडवली काया ।।धृ ।।

चंपाषष्ठीचा जे करिती कुळधर्म । त्यांचे होत आहे परिपूर्णधर्म ।।

ज्यांना न कळे तुझ्या भक्तीचे वर्म। त्यांचे तोडीत आहे कळीकाळ चर्म ।।२।।

जयदेव जयदेव जय खंडेराया ।अखंड भंडारानें डवडवली काया ।।धृ ।।

तुझे भक्तीविन्मुख जे ते कौरव । जिकडे तुझा धर्म तिकडे गौरव ।।

मध्वनाथ जपतो येळकोट भैरव । निंदा करिती त्यांना होती रौरव ।।३।।

जयदेव जयदेव जय खंडेराया । अखंड भंडारानें डवडवली काया ।।धृ ।।


खंडोबाची तळी

श्री खंडोबा महाराज तळी आरती

॥ जय मल्हार ॥

बोल खंडेराव महाराज की जय॥

सदानंदाचा येळकोट ॥

येळकोट येळकोट जय मल्हार॥

हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥

भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥

सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥

निळा घोडा॥ पाई तोडा॥

कमर करगोटा ॥ बेंबी हिरा॥

गळयात कंठी॥ मोहन माळा॥

ङोईवर शेला॥ अंगावर शाल॥

सदा हिलाल॥ जेजुरी जाई॥

शिकार खेळी॥ म्हाळसा सुंदरी॥

आरती करी॥ देवा ओवाळी ॥

नाना परी॥ देवाचा श्रृंगार ॥

कोठ लागो शिखरा॥ खंडेरायाचा खंडका ॥

भंडाऱ्याचा भडका॥ बोल सदानंदाचा येळकोट ॥

येळकोट येळकोट जय मल्हार॥


आगडदुम नगारा, सोन्याची जेजुरी ।

निळा घोडा, पाव में तोडा ।

मस्तकी तुरा, बेंबी हिरा ।

अंगावर शाल, सदाही लाल ।

म्हाळसा सुंदरी, आरती करी ।

खोबऱ्याचा कुटका, भंडाऱ्याचा भंडका ।

बोला सदा आनंदाचा येळकोट

खंडेराव महाराजकी जय

हर हर महादेव

चिंतामणी मोरया

आनंदीचा उदय उदय

भैरीचा चांग भले

सदानंदाचा येळकोट

खंडेराव महाराज की जय

हर हर महादेव

चिंतामणी मोरया

चिंतामणी मोरया

आनंदाचा उदय उदय

भैरीचा चांग बले

सदानंदाचा येळकोट

खंडेराव महाराज कि जय


बोल खंडेराव महाराज की जय॥

सदानंदाचा येळकोट ॥

येळकोट येळकोट जय मल्हार॥

हर हर महादेव॥ चिंतामण मोरया॥

भैरोबाचा चांदोबा॥ अगडबंब नगारा॥

सोन्याची जेजुरी॥ मोत्याचा तुरा॥

निळा घोडा॥ पाई तोडा॥

कमरी करगोटा ॥ बेंबी हिरा॥

गळयात कंठी॥ मोहन माळा॥

अंगावर शाल॥ सदा हिलाल॥

जेजुरी जाई॥ शिकार खेळी॥

म्हाळसा सुंदरी॥ आरती करी॥

देवा ओवाळी ॥ नाना परी॥

देवाचा श्रृंगार ॥ कोठ लागो शिखरा॥

खंडेरायाचा खंडका ॥ भंडाऱ्याचा भडका॥

बोल सदानंदाचा येळकोट ॥

येळकोट येळकोट जय मल्हार॥


 

नागपूजन- नागदिवे Nagdive

nagdiwali

नागदिवाळी सण कशासाठी साजरा करतात.?

नागदिवाळी हा महाराष्ट्रात मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला साजरा होणारा सण आहे, ज्यामध्ये नागांची पूजा केली जाते आणि कुटुंबातील पुरुषांच्या नावाने पक्वान्नांवर दिवे लावले जातात. हा सण विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि कोकणसारख्या भागांमध्ये साजरा होतो आणि याला शेतीशी जोडले जाते. 

 या दिवशी नागप्रतिमेची पूजा करण्याची व घरात जेवढे पुरुष असतील त्या प्रत्येकाच्या नावाने पक्वान्न करून त्यावर एकेक दिवा लावण्याची प्रथा महाराष्ट्रात  आहे.nagdive image

सणाचे महत्त्व

  • नाग आणि दीर्घायुष्यासाठी पूजा: या दिवशी नागांची आणि नागप्रतिमेची पूजा केली जाते. दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते.
  • कुटुंबातील पुरुषांचे दीर्घायुष्य: कुटुंबात जेवढे पुरुष आहेत, त्यांच्या नावाने एकेक पक्वान्न तयार करून त्यावर दिवा लावला जातो, हे दीर्घायुष्यासाठी केले जाते.
  • धार्मिक महत्त्व: या दिवशी नागांची पूजा करण्याची प्रथा आहे आणि याला स्कंदपुराणातही उल्लेख आहे.
  • शेतकऱ्यांसाठी महत्त्व: खरिपातील धान्य घरी आल्यावर त्याचा आनंद साजरा करण्याशी हा सण जोडला जातो, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी याचे विशेष महत्त्व आहे

nag_diwali

आपल्याकडे दिवाळी, देव दिवाळी आणि यानंतर नाग दिवाळी साजरी करण्याची परंपरा असून, यात महत्वाचे म्हणजे दिवे आहे. आपल्या जीवनातील अंधकार दूर होऊन प्रकाश यावा हीच यामागील श्रद्धा आहे.

नागदिवाळीला लावण्यात येणारा दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक व नाग हे कुलाच्या मूळपुरुषाचे प्रतीक मानतात. या मूळपुरुषाच्या कृपेने घरातल्या हयात पुरुषांना दीर्घायुष्य लाभावे असा हेतू असतो.

स्कंदपुराणात म्हटल्याप्रमाणे

“शुक्ला मार्गशिरे पुण्या श्रावणे याच पंचमी ।

स्नानदानैर्बहुफला नागलोकप्रदायिनी ॥”

या वचनानुसार श्रावण शुद्ध पंचमीप्रमाणेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीलाही नागांची पूजा केल्याने आणि व्रत केल्याने फलप्राप्ती होते, सुख-समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते.nagdiwali-2

नागदिवाळी पूजा पद्धत

नागदिवाळीला नागदिवे बनविले जातात. पुरणाचे, किंवा कणकेचे तर काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे हे दिवे तयार केले जातात. आपआपल्या परंपरेनुसार कोणी १ तर कोणी ५ दिवे लावतात, तर काही ठिकाणी घरात जितके पुरूषमंडळी आहेत तितके दिवे लावण्याची पद्धत आहे. या दिव्यासह हरभऱ्याची, मेथीची भाजी, वांग्याचे भरीत, भात असा नैवेद्य अर्पण करतात.nagdive naivedya

 

नागदिवाळीचे विदर्भासह महाराष्ट्रात विशेष महत्त्व आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ, कोकण यातील ग्रामीण भागात हा सण साजरा केला जातो. शेतकरी वर्गात याचे विशेष महत्त्व आहे. खरीपाचे धान्य शेतकऱ्याच्या घरी आल्यानंतर त्याचा आनंद साजरा करण्याशीही याचा संबंध जोडतात.

यावर्षी नागदिवाळी केंव्हा आहे?

यावर्षी नागदिवाळी मंगळवार, दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी आहे, ज्या दिवशी पंचमी आहे.

महाराष्ट्राचे कुलदैवत: खंडेराय-खंडोबा- चंपाषष्ठी khandoba-champa-shashthi

khandoba-1

khandoba-champa-shashthi

महाराष्ट्राचे कुलदैवत: खंडेराय – अवतार कथा, चंपाषष्ठीचे महत्त्व आणि अनोख्या परंपरा

चंपाषष्ठी किंवा स्कंद षष्ठी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेजुरीचा खंडोबा अर्थात मल्हारी देवाचा उत्सव  सुरू होतो. या सहा दिवसांना  ‘मार्तंड भैरव षड् रात्रोत्सव’ म्हणतात. काही लोक  त्यांना खंडोबाचे नवरात्र असेही म्हणतात.  

  • खंडोबाचे वर्णन (मार्तंड भैरव म्हणून) मुख्यत्वे ‘स्कंद पुराण’ आणि ‘ब्रह्मांड पुराण’ यांच्या काही भागांमध्ये आढळते.
  • या पुराणांमधील काही विशिष्ट प्रकरणांमध्ये (उदा. काशी खंड – जिथे भैरवाचे महत्त्व सांगितले आहे) आणि ‘मल्हारी माहात्म्य’ ग्रंथात मार्तंड भैरवाच्या कथा येतात. ‘मल्हारी माहात्म्य’ हा ग्रंथ पुराणांचाच एक उपग्रंथ मानला जातो. 
 

मणी-मल्ल या दोन दैत्यांचा पराभव करून खंडोबाने लोकांना संकट मुक्त केले. या घटनेचे स्मरण म्हणून हा उत्सव करतात.

मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. पुण्याजवळील जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो.

जेजुरीचे मंदिरjejuri

जेजुरीचे मंदिर वीरपाल वीरमल्ल याने इ.स. १३८१ साली बांधले. १६३५ साली खटावच्या राघो मंबाजीने याचा विस्तार केला. बंगाली संत चैतन्य महाप्रभू यांनी या मंदिरास भेट दिली होती व मुरळींचा वेश्याव्यवसाय बंद करण्याचे प्रयत्न केले होते; असे ऐतिहासिक उल्लेख आहेत. जेजुरी गडावरील शिलालेखांत विठ्ठल सदाशिव विंचूरकर, मल्हारराव होळकर वगैरेंचे उल्लेख येतात. नारायणरावाच्या हत्येनंतर नाना फडणीस यांनी नारायणरावाची गरोदर पत्‍नी गंगाबाई हीस पुत्र झाल्यास एक लाख अर्पण करू असा नवस केला होता. नवस पूर्ण झाल्यामुळे पेशवे दरबाराकडून विविध रूपात हा नवस फेडला गेला.khandoba-1

नवरात्री पूजा

कुलाचाराप्रमाणे ज्यांच्या पूजेत सुघट व टाक असतात ते त्यांची पूजा करतात. नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत घाटावर लावायच्या असतात. सहा दिवस नंदादीप लावतात. जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळांतही खंडोबाचा उत्सव असतो. घटाची स्थापना, नंदादीप, मल्हारी महात्म्य वाचणे व त्याचा पाठ करणे, एकाच वेळी जेवणे(एकभुक्त),शिवलिंगाचे दर्शन घेणे,ब्राह्मण-सुवासिनी तसेच वाघ्या आणी मुरळी यांना भोजन देणे असे सहा दिवस केले जाते. चंपाषष्ठी या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात. खंडोबाची तळी भरून आरती करतात.

महाराष्ट्र ही संतांची आणि दैवतांची भूमी आहे. येथील लोकसंस्कृतीमध्ये आणि धार्मिक जीवनात कुलदैवतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. अशा कोट्यवधी मराठी जनांचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत म्हणजे ‘खंडोबा’ किंवा आदराने घेतलेले ‘जेजुरीचे खंडेराय’. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ आणि ‘खंडोबाच्या नावानं चांगभलं’ या जयघोषाने महाराष्ट्रातील अनेक गावांचे आणि जेजुरी गडाचे वातावरण नेहमीच भक्तीमय झालेले असते.

खंडोबा हे दैवत महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा अविभाज्य भाग आहे. जेजुरीचा हा राजा कोण होता? त्यांच्या जन्माची कथा काय आहे? त्यांना हळदीचा भंडारा का वाहिला जातो? आणि चंपाषष्ठीचा सण का साजरा केला जातो? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि खंडोबा या  दैवताविषयीची सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत.

नाव

एका मतानुसार खंडोबा हे नाव या देवतेच्या खंडा (संस्कृत खड्ग -> मराठी खंडा) या शस्त्रावरून आले आहे. दुसऱ्या मतानुसार हा संस्कृत स्कंद शब्दाचा अपभ्रंश आहे. (स्कंद -> स्कंदोबा -> खंडोबा) याखेरीज मल्हारी(मल्लारी), खंडेराय, मार्तंडभैरव, म्हाळसाकांत, रवळनाथ, येळकोटी(येळ=सात,सात कोटी सैन्य असलेला) ही खंडोबाची इतर नावे होत. खंडेराया हे नाव भक्तांमध्ये लोकप्रिय आहे. ते खंडोबाच्या खंडा शस्त्रास खड्ग अशा नावाने संबोधतात. मल्ह / मल्ल + अरी अशी मल्हारी शब्दाची फोड असून मल्ल राक्षसाचा काल असा त्याचा अर्थ आहे. म्हाळसेचा पती म्हणून खंडोबास म्हाळसाकांत असे म्हणतात. येळकोटी म्हणजे सात कोटी सैनिकांचा नायक. खंडेराय (राय = राजा) हे नावही खंडोबाचे राजेपण दर्शविते.[]

  • खंडेराय: शिवशंकराचा वीर अवतार

खंडोबाच्या अवताराची निश्चित कालखंडात विभागलेली जीवनकथा (जीवनचरित्र) पुराणांमध्ये दिली गेलेली नाही. ते शिवाचे मार्तंड भैरव हे रूप असून, पौराणिक कथांनुसार त्यांनी ‘मल्हारी महात्म्य’ आणि ‘मार्तंड विजय’ या ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या दैत्य संहारासाठी अवतार घेतला

खंडोबाचा अवतार कधी झाला?

पौराणिक संदर्भानुसार: खंडोबाने मणी आणि मल्ल या दैत्यांचा वध करण्यासाठी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. ही घटना मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी (चंपाषष्ठी) या दिवशी घडली. काही ग्रंथांनुसार, चैत्र पौर्णिमेला त्यांनी अवतार घेतला आणि सहा दिवसांनी षष्ठीला दैत्यांचा वध केला.

ऐतिहासिक दृष्टिकोनातून: खंडोबा हे मूळचे लोकदैवत असून, नवव्या ते अकराव्या शतकाच्या दरम्यान त्यांची लोकप्रियता वाढली. या लोकदेवतेला नंतर मुख्य प्रवाहातील हिंदू धर्मात, शिवाचा अवतार म्हणून स्वीकारले गेले

खंडोबा हे महाराष्ट्रातील एक प्रमुख लोकदैवत असून, पौराणिक दृष्ट्या ते भगवान शंकराचे अवतार मानले जातात. त्यांना मार्तंड भैरव किंवा मल्हारी मार्तंड या नावांनीही ओळखले जाते.

खंडोबा हे नाव पडण्यामागे एक विशिष्ट संदर्भ आहे. ‘खंड’ म्हणजे तलवार (खड्ग) आणि ‘बा’ म्हणजे वडील किंवा स्वामी. हातामध्ये खड्ग घेऊन (तलवार घेऊन) दैत्यांशी लढणारे दैवत म्हणून त्यांना ‘खंडोबा’ म्हटले गेले. हे दैवत मूळचे लोकदैवत असून, नंतरच्या काळात त्यांना मुख्य प्रवाहातील शिवतत्त्वाशी जोडले गेले.

खंडोबाचे चरित्र मुख्यत्वे खालील दोन ग्रंथांमध्ये आढळते:

मल्हारी माहात्म्य‘ (मल्लारी महात्म्य): हे खंडोबाचे मुख्य चरित्र पुस्तक आहे. यात खंडोबाच्या अवताराची कथा, दैत्य संहार, आणि त्यांच्या लीलांचे वर्णन आहे. हे पुस्तक महाराष्ट्रातील अनेक घरांमध्ये वाचले जाते. हे मूळ संस्कृतमध्ये आहे आणि त्याची मराठी हस्तलिखिते व छापलेली पुस्तके उपलब्ध आहेत.

मार्तंड विजय‘: हा ग्रंथ श्रीधरस्वामी नाझरेकर यांनी लिहिला आहे. यात ओवीबद्ध स्वरूपात खंडोबाचे सविस्तर चरित्र आणि कथा सांगितल्या आहेत. हे पुस्तक वाचायला सोपे असून मराठी भाषेत अत्यंत लोकप्रिय आहे.

वरील दोन्ही ग्रंथांत २२ अध्याय आहेत.

२. जन्माची कथा आणि मल्हारीमाहात्म्य

खंडोबाच्या अवताराची कथा मुख्यत्वे मल्हारी माहात्म्य आणि मार्तंड विजय या धार्मिक ग्रंथांमध्ये सविस्तरपणे सांगितली आहे. ही कथा पौराणिक असून, ती शिवपुराणाशी जोडली गेलेली आहे.

दैत्य मणी आणि मल्लाचा अत्याचार:
प्राचीन काळी मणी आणि मल्ल (मल्लिकार्जुन) नावाचे दोन बलाढ्य दैत्य होते. त्यांनी कठोर तपस्या करून वर प्राप्त केले आणि तिन्ही लोकांमध्ये हाहाकार माजवला. ऋषी-मुनी आणि सामान्य जनतेवर त्यांनी अनन्वित अत्याचार सुरू केले. त्यांच्या त्रासाला कंटाळून सर्व देवांनी इंद्राकडे, नंतर भगवान विष्णू आणि नंतर कैलासपती महादेवाकडे धाव घेतली.

मार्तंड भैरवाचा अवतार आणि संहार:
भक्तांच्या रक्षणासाठी महादेवाने रौद्र रूप धारण केले. त्यांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला, ज्यांच्यासोबत त्यांची पत्नी म्हाळसादेवी आणि वीरगळ नावाचे सहकारी होते. हा अवतार अत्यंत तेजस्वी होता.

मार्तंड भैरवाने (खंडोबाने) मणिचूल पर्वतावर (सध्याची जेजुरी) दैत्यांशी सहा दिवस घनघोर युद्ध केले. युद्धाच्या शेवटी, खंडोबाने दोन्ही दैत्यांचा वध केला. मरण्यापूर्वी मल्लाने पश्चात्ताप व्यक्त करून वर मागितला की, ‘तुमचे नाव माझ्या नावावरून पडावे.’ म्हणून शिवाला ‘मल्हारी’ (मल्लाचा अरी म्हणजे शत्रू) किंवा ‘मल्लिकार्जुन’ हे नाव मिळाले. मणीनेही शरणागती पत्करून चरणी स्थान मागितले, जे खंडोबाने पूर्ण केले.

या विजयाचा दिवस मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी होता, जो ‘चंपाषष्ठी’ म्हणून साजरा केला जातो.

३. खंडोबाचे जीवनचरित्र आणि दोन विवाहkhandoba-2

खंडोबाचे चरित्र एका राजाप्रमाणे सांगितले जाते. त्यांनी केवळ दैत्य संहार केला नाही, तर गृहस्थाश्रम स्वीकारून महाराष्ट्राच्या लोकजीवनाचा भाग झाले.

  • म्हाळसादेवी: म्हाळसा ही एका व्यापाऱ्याची मुलगी होती आणि ती पार्वतीचा अवतार मानली जाते. खंडोबाने तिच्याशी लग्न केले. जेजुरी गडावर म्हाळसादेवीचे स्थान महत्त्वाचे आहे.
  • बाणाई (बानू): बाणाई ही गंगेचा अवतार मानली जाते आणि ती धनगर समाजातील होती. खंडोबाने तिच्याशी दुसरा विवाह केला. बाणाई आणि म्हाळसा यांच्यातील रुसवे-फुगवे आणि संवाद लोकगीतांमध्ये अत्यंत रंजक पद्धतीने मांडले जातात.

खंडोबाचे हे जीवनचरित्र महाराष्ट्रातील विविध समाजांना एकत्र जोडणारे ठरले.

४. चंपाषष्ठी सण आणि नैवेद्याचे महत्त्वchampashashthi naivedya

चंपाषष्ठी हा खंडोबाचा सर्वात मोठा सण आहे. हा सण सहा दिवसांचा असतो (मार्गशीर्ष प्रतिपदा   ते षष्ठी), परंतु षष्ठीचा दिवस महत्त्वाचा मानला जातो.

नैवेद्याची प्रथा:
या सणाचे वैशिष्ट्य म्हणजे नैवेद्य. अनेक घरांमध्ये चतुर्मासाच्या (पावसाळ्याच्या) सुरुवातीपासून कांदा, वांगी आणि लसूण खाणे वर्ज्य मानले जाते. चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाला वांग्याचे भरीत, बाजरीची भाकरी आणि कांद्याचा नैवेद्य दाखवला जातो.

प्रथेमागील कारण:
धार्मिक मान्यतेनुसार, हे पदार्थ देवाला अर्पण केल्यानंतरच वर्षभरात खाण्यास सुरुवात केली जाते. तसेच, पावसाळ्यात हे पदार्थ आरोग्यासाठी तितकेसे चांगले नसल्याने ते टाळले जातात आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला हवामान बदलल्यावर पुन्हा खाण्यास सुरुवात होते.

५. खंडोबाला हळदीचा भंडारा का वाहतात?

खंडोबाच्या पूजेचे सर्वात मोठे आणि आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे ‘भंडारा’ (हळदीची पूड) उधळणे. जेजुरीचा किल्ला नेहमी पिवळ्या धमक भंडाऱ्याने माखलेला असतो. या प्रथेमागे अनेक धार्मिक आणि प्रतीकात्मक कारणे आहेत:

  • विजय आणि दैत्य संहार: जेव्हा खंडोबाने मणी आणि मल्ल या दैत्यांशी युद्ध केले, तेव्हा रक्ताचा विध्वंस थांबवण्यासाठी देवांनी हळदीची पावडर रणांगणावर उधळली. तेव्हापासून, हा विजयोत्सव म्हणून भंडारा उधळला जातो.
  • मांगल्याचे आणि समृद्धीचे प्रतीक: हिंदू धर्मात हळदीला अत्यंत पवित्र आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. भंडारा उधळणे म्हणजे देवाकडे सुख, शांती आणि समृद्धीची मागणी करणे होय.
  • आरोग्य आणि औषधी गुणधर्म: हळद ही नैसर्गिक जंतुनाशक असल्याने, मोठ्या जनसमुदायात तिच्या वापरामुळे आरोग्याचे फायदे होतात.

६.  वाघ्या-मुरळी: खंडोबाच्या सेवेतील लोककलाकारvaghya murali-1

 

महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीमध्ये आणि खंडोबाच्या परंपरेत ‘वाघ्या’ आणि ‘मुरळी’ यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हे दोघेही स्वतःला खंडोबाचे सेवक आणि भक्त मानतात.

वाघ्या:
‘वाघ्या’ म्हणजे खंडोबाचा पुरुष भक्त किंवा सेवक. हे लोक पारंपारिक वेशभूषा करून, हातात डमरू आणि ‘खंडा’ (छोटी तलवार) घेऊन खंडोबाची गाणी (लोकगीते) गातात. ते जागरण आणि गोंधळाच्या कार्यक्रमात मुख्य भूमिका बजावतात. खंडोबाच्या कथा, स्तुती आणि म्हाळसा-बाणाईच्या कथा सांगून ते भक्तांचे मनोरंजन करतात आणि धार्मिक वातावरण निर्माण करतात.

मुरळी:
‘मुरळी’ म्हणजे खंडोबाच्या सेवेसाठी समर्पित केलेली स्त्री भक्त. पूर्वीच्या काळी मुलींना देवाला ‘मुरळी’ म्हणून अर्पण करण्याची प्रथा होती, जी आता कायद्याने बंद झाली आहे. तरीही, अनेक जुन्या मुरळ्या आजही पारंपरिक पद्धतीने खंडोबाची भक्ती करतात. त्या वाघ्यासोबत गाणी गातात, नृत्य करतात आणि देवाची सेवा करतात.

सामाजिक महत्त्व:
वाघ्या-मुरळी ही परंपरा महाराष्ट्राची एक अद्वितीय लोककला आहे. त्यांच्या माध्यमातूनच ‘मल्हारी माहात्म्य’ आणि खंडोबाच्या कथा पिढ्यानपिढ्या लोकांपर्यंत पोहोचल्या आहेत. ते भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करतात आणि मिळालेल्या पैशातून देवाची सेवा करतात.

७. इतर राज्यांतही या दैवताची पूजा केली जाते का?

होय, खंडोबाची पूजा इतर राज्यांमध्येही केली जाते, परंतु वेगवेगळ्या नावांनी आणि स्वरूपात:

  • कर्नाटक: कर्नाटकात खंडोबाला ‘मेलगिरी म्हाळसाकांत’ किंवा ‘मल्लय्या’ (Mallayya) या नावाने ओळखले जाते. तेथील अनेक मंदिरांमध्ये (उदा. बेट्टाडापूर) त्यांची पूजा केली जाते.
  • आंध्र प्रदेश आणि तेलंगणा: येथेही ‘मल्लय्या’ किंवा ‘मल्लिकार्जुन स्वामी’ म्हणून त्यांची पूजा होते. श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे शिवाचेच रूप आहे.srishailam
  • गुजरात आणि मध्य प्रदेश: या राज्यांच्या काही सीमावर्ती भागांत किंवा महाराष्ट्रीयन समाजांमध्ये खंडोबाची पूजा प्रचलित आहे.

महाराष्ट्राबाहेर या दैवताला मुख्यतः ‘मल्लिकार्जुन’ किंवा ‘मल्लय्या’ या नावाने जास्त ओळखले जाते.

८. लोकप्रिय गाणी आणि साहित्य

‘मल्हारी माहात्म्य’ आणि ‘मार्तंड विजय’ या ग्रंथांव्यतिरिक्त, खंडोबाची भक्ती लोकगीतांमधून व्यक्त होते.

  • खंडेरायाच्या नावानं चांगभलं: हा भक्तांच्या मनातील श्रद्धेचा जयघोष आहे.
  • खंडेरायाच्या लग्नात, बानू नवरी नटली: जगदीश पाटील यांनी गायलेले हे गाणे उत्सवांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

अन्य

मार्गशीर्ष महिन्याचा पहिलाचा दिवस म्हणजे देवदीपावली किंवा छोटी दिवाळी. मुख्यत: चित्तपावनांमध्ये कुलदैवत, ग्रामदैवत यांना भजण्याचा तो दिवस. चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्यांची संख्या वेगळी असते. गावातील मुख्य देवता, इतर उपदेव-देवता महापुरुष, वेतोबा, ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य दाखवले जातात. त्याचबरोबर काही कुटुंबांत पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवतात. त्यामुळे नैवेद्याच्या पानांची संख्या सतरा, चोवीस, नऊ अशी कोणतीही असते.

. जेजुरीला कसे जायचे? (How to Reach Jejuri)

जेजुरी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी चांगल्या प्रकारे जोडलेली आहे. तुमच्या सोयीनुसार तुम्ही खालीलपैकी कोणताही मार्ग निवडू शकता:

१. हवाई मार्ग (By Air):

  • जवळचे विमानतळ: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ (Pune International Airport) हे जेजुरीपासून सर्वात जवळचे आहे.
  • अंतर: पुण्याहून जेजुरीचे अंतर अंदाजे ७० ते ८० किलोमीटर आहे.
  • पुढे कसे जाल: विमानतळावरून तुम्ही टॅक्सी (Cab) किंवा बसने थेट जेजुरीला पोहोचू शकता.

२. रेल्वे मार्ग (By Train):

  • जवळचे रेल्वे स्टेशन: ‘जेजुरी रेल्वे स्टेशन’ (Jejuri Railway Station) हे अगदी शहरातच आहे.
  • मार्ग: हे स्टेशन पुणे-मिरज-लोंडा रेल्वे मार्गावर आहे. पुण्याहून आणि महाराष्ट्रातील इतर प्रमुख शहरांतून जेजुरीसाठी अनेक पॅसेंजर (Passenger) आणि एक्सप्रेस (Express) ट्रेन्स उपलब्ध आहेत.
  • मुख्य जंक्शन: पुण्याहून ट्रेन्स सहज मिळतात.

३. रस्ता मार्ग (By Road):

  • स्वतःच्या वाहनाने/बसने:
    • जेजुरी राष्ट्रीय महामार्ग ६५ (NH 65), पुणे-सोलापूर महामार्गापासून जवळ आहे (सासवड मार्गे).
    • पुण्यापासून: पुण्याहून सासवड आणि नंतर जेजुरी (अंदाजे ६० किमी) असा मार्ग आहे.
    • मुंबईपासून: मुंबईहून पुण्याला (Expressway ने) आणि तिथून पुढे जेजुरीला जाता येते. एकूण अंतर अंदाजे २४० किमी आहे.
  • महाराष्ट्र राज्य परिवहन (ST Bus):
    • महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या (MSRTC) बस सेवा महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांतून (पुणे, सातारा, मुंबई, सोलापूर) जेजुरीसाठी उपलब्ध आहेत.

जेजुरीला पोहोचणे सोपे असून, वर्षभर भाविकांची आणि पर्यटकांची गर्दी असते.

सातारा छ. संभाजीनगर येथील श्री खंडोबा मंदिर satara khandoba mandir

 

छ. संभाजीनगर येथील सातारा गावात डोंगर पायथ्याशी असलेले खंडोबाचे हेमाडपंथी मंदिर हे एकाच दगडात निर्माण केलेले मंदिर आहे. अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून 1766 मध्ये त्याचा जीर्णोद्धार केला. मंदिराचा गाभाऱ्यापर्यंतचा भाग दगडी व त्यावरील कळसापर्यंतचा भाग वीटांनी बांधला. मंदिराची ही वास्तु पुरातत्त्व विभागाने ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून संरक्षित केली आहे.

नागदिवाळी 

चंपाषष्ठीच्या दिवशी किंवा त्याच्या आसपासच्या काळात ‘नागदिवाळी’ हा सण देखील साजरा केला जातो. या दोन्ही सणांमध्ये थेट पौराणिक संबंध नसला तरी, भौगोलिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या काही संबंध जोडले जातात.

नागदिवाळी (नागपंचमी)

नागदिवाळी हा सण प्रामुख्याने मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला साजरा केला जातो, म्हणजेच चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी. या सणाला काही ठिकाणी ‘नागपंचमी’ असेही म्हटले जाते.
नागदिवाळीचे महत्त्व आणि कथा:
नागांची पूजा: या दिवशी नागांची पूजा केली जाते. घरातील स्त्रिया मातीच्या नागाची किंवा नागाच्या प्रतिमेची पूजा करतात, त्यांना दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवतात.
कृषी संस्कृती: हा सण महाराष्ट्रातील कृषी संस्कृतीशी जोडलेला आहे. शेतात उंदीर, घुशी आणि इतर कीटक पिकांचे नुकसान करतात, परंतु नाग या कीटकांना खाऊन पिकांचे रक्षण करतात. त्यामुळे नागांना शेतकऱ्याचा मित्र मानले जाते आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो.
दिवाळी: या काळात (मार्गशीर्ष महिन्यात) शेतीमधील कामे जवळजवळ पूर्ण झालेली असतात आणि शेतकरी सुगीच्या कामांना सुरुवात करत असतात. आनंदाच्या आणि समृद्धीच्या या काळात दिवे लावून सण साजरा केला जातो, म्हणून त्याला ‘नागदिवाळी’ म्हणतात.
चंपाषष्ठी आणि नागदिवाळी यांचा संबंध
या दोन्ही सणांमध्ये थेट पौराणिक कथा (म्हणजे खंडोबाच्या अवताराशी नागांचा संबंध) जोडलेली नाही, परंतु काही साम्यस्थळे आढळतात:
तारखेचे साम्य: दोन्ही सण एकाच आठवड्यात (मार्गशीर्ष शुक्ल पंचमी आणि षष्ठी) येतात, ज्यामुळे ते एकत्रितपणे साजरे केले जातात.
शिव-संबंध: दोन्ही दैवते शिवशंकराशी संबंधित आहेत.
खंडोबा हा शिवाचा अवतार आहे.
नाग हे शिवाच्या गळ्यातले भूषण आहेत, त्यामुळे नागांची पूजा देखील शिवपूजेचाच एक भाग मानली जाते.
प्रतीकात्मक संबंध: काही अभ्यासकांच्या मते, मणी आणि मल्ल या दैत्यांशी युद्ध करताना खंडोबाने धारण केलेले रूप अत्यंत उग्र होते. या उग्र रूपाला शांत करण्यासाठी आणि निसर्गातील शक्तींना (नागांसारख्या) आवाहन करण्यासाठी हे सण साजरे केले गेले असावेत.
थोडक्यात, चंपाषष्ठी हा विजयोत्सवाचा सण आहे, तर नागदिवाळी हा कृषी संस्कृतीतील कृतज्ञतेचा आणि आरोग्याच्या रक्षणासाठी नागांची पूजा करण्याचा सण आहे. दोन्ही सण एकाच काळात येत असल्याने महाराष्ट्रात ते एकत्रितपणे साजरे केले जातात.

महाराष्ट्रातील काही घरांत खंडोबा हे मुख्य कुलदैवत असते तर काही ठिकाणी खंडोबा हा पाहुणा म्हणून आला आहे असे मानतात.

खंडोबा हे केवळ एक दैवत नाही, तर ते महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आणि लोकजीवनाचे प्रतीक आहेत. त्यांच्या अवताराची कथा दुष्ट शक्तींवर चांगुलपणाच्या विजयाची प्रेरणा देते. जेजुरीचा हा राजा आजही भक्तांच्या हाकेला धावून येतो, अशी श्रद्धा आहे. ‘सदानंदाचा येळकोट, जय मल्हार!’

माधव भोपे 

मुलांचा अभ्यास घेण्यापूर्वी १० मिनिटे हे वाचा. Spare 10 minutes to read this

happy-homework

मुलांचा अभ्यास घेण्यापूर्वी १० मिनिटे हे वाचा. Spare 10 minutes to read this

Spare 10 minutes to read this

मुलांचा अभ्यास घेण्यापूर्वी १० मिनिटे हे वाचा. Spare 10 minutes to read this

मागच्या लेखात आपण पाहिले तसे, आजकाल मुले वाढविणे अत्यंत आव्हानात्मक, challenging झाले आहे- आणि त्यात मुलांचा अभ्यास घेणे म्हणजे तर मुलांच्या आयांसाठी रोजची लढाई- आणि मुलांसाठी सुद्धा! त्यामानाने खरेच आमची पिढी खूप भाग्यवान होती. आम्ही जेंव्हा लहान होतो, तेंव्हा आमच्या आई वडिलांना आम्ही कोणत्या वर्गात आहोत एवढे माहीत असणे म्हणजे खूप होते. आणि वर्षाच्या शेवटी- पास झालोय की नापास- एवढ्यापुरता त्यांचा संबंध येई. यात कदाचित आजच्या पिढीला अतिशयोक्ति वाटेल, पण वस्तुस्थिती अशीच होती.

आता दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत वेगाने बदलत आहे, आणि मुलांच्या शिक्षणाचा ताण आई वडिलांवर जास्त येतो आहे. शाळेत मुलांना घरून करून आणण्यासाठी एवढे मोठे होमवर्क देतात, निरनिराळे प्रोजेक्ट्स देतात, जे की मुलें स्वतंत्रपणे करूच शकणार नाहीत. त्यामुळे मुलाच्या पालकांना त्यात लक्ष घालावेच लागते आणि त्यातून घरोघर रोजची ‘लढाई’ नित्य झाली आहे.

पण दुर्दैवाची गोष्ट अशी की ही जबाबदारी पार पाडण्यासाठी काही स्किल लागू शकते, याची जाणीव फार थोड्या पालकांना असते, मग त्यांनी त्याची कुठली ट्रेनिंग घेणे तर दूर राहिले. आणि मग पालक, आपल्या आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांप्रमाणे, आपल्या मर्यादित ज्ञानानुसार, मुलांचा अभ्यास घेण्याचा सोपस्कार पार पाडतात आणि पुरेशा सामंजस्याअभावी हा रोजचा अनुभव ते मूल आणि त्याची आई- दोघांसाठीही थकवणारा होतो.

त्यासाठी पालकांना काही अत्यंत मूलभूत गोष्टी माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.

काही पालकांची अशी ठाम समजूत असते की मुलांना ‘धाकात’ ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. नाही तर मुले बिघडतील.. त्यामुळे ते कायम मुलांशी आज्ञार्थी आणि दरडावून बोलण्यावर विश्वास ठेवतात, सतत मुलांच्या चुका दाखवून त्यांना टोकत राहतात, हिणवत राहतात.  तर काही पालक या उलट मुलांचे अत्यंत लाड करतात- त्यांचा कुठलाही शब्द खाली पडू देत नाहीत- या दोन्ही टोकाच्या गोष्टी टाळायला हव्यात.

मुलांचे होमवर्क- अर्थात घरून करून आणायचा अभ्यास 

आज आपण अभ्यासाबद्दल बोलणार आहोत.

मुलांचे पालक (जास्त करून आयांना मुलांचा अभ्यास घ्यावा लागतो म्हणून आपण या ठिकाणी आयांचे उदाहरण घेणार आहोत) मुलांचा अभ्यास घ्यायला बसतात, तेंव्हा त्यांच्यात पेशन्स नसेल, आपल्या हातातील कामात आनंद घेण्याची वृत्ती नसेल, तर ते शक्यतो लवकर त्यांचे होमवर्क ‘उरकून’ घेण्याचा प्रयत्न करतात.

या ठिकाणी आईला काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे-

  1. मुलांची उपजत आणि नैसर्गिक प्रवृत्ती ही ‘खेळण्याची’ असते- त्यांना ‘खेळण्यात’ जो आनंद मिळतो तो इतर कशातही मिळत नाही- त्यामुळे मुले अभ्यासाचे रूपांतर ही खेळण्यात करू पाहतात. खरे तर आपल्यासोबत अभ्यासाला बसून, त्यांनी त्याच्या ‘खेळण्यावर’ पाणी सोडलेले असते हा त्यांच्या दृष्टीने मोठा ‘त्याग’ असतो! आईने मुलांना हसत ‘खेळत’ शिकविले तर त्यांना त्याचे अजिबात टेंशन येणार नाही.
  2. साधारण वयस्कर मनुष्यांचा attention span हा ३२ ते ५० मिनिटे असतो. हे मी बँकेच्या ट्रेनिंग सेंटर मध्ये असतांना आम्हाला सांगितले जात असे- त्यामुळे आम्ही वर्गात शिकवतांना ३५ ते ४० मिनिटां नंतर participants ला एखादा जोक सांगून, किंवा विषय बदलून, मग पुन्हा विषयावर येत असू. ५ ते ६ वर्षांच्या मुलां मध्ये हा attention span १२ ते १८ मिनिटे असतो. खाली वयानुसार attention span चा तक्ता दिला आहे.
वयानुसार लक्ष देण्याची क्षमता
• २ वर्षांची मुले: ४-६ मिनिटे
• ३ वर्षांची मुले: ६-८ मिनिटे
• ४ वर्षांची मुले: ८-१२ मिनिटे
• ५-६ वर्षांची मुले: १२-१८ मिनिटे
• ७-८ वर्षांची मुले: १६-२४ मिनिटे
• ९-१० वर्षांची मुले: २०-३० मिनिटे
• ११-१२ वर्षांची मुले: २५-३५ मिनिटे
• १३-१५ वर्षांची मुले: ३०-४० मिनिटे
• १६ आणि त्याहून अधिक वयाचे: ३२-५०+ मिनिटे

त्यामुळे, मुलांचा अभ्यास घेतांना त्यांना लागोपाठ एकेक दोन दोन तास अभ्यास करायला लावला, तर त्याचा ‘काही उपयोग’ होत नाही. ५ ते ८ वर्षाच्या मुलाला २०-२५ मिनिटांनंतर मध्ये थोडा ब्रेक घेऊ देणे हे अत्यंत आवश्यक आहे. ही शास्त्रीय माहिती फार थोड्या पालकांना असते आणि शिस्त लावायच्या नावाखाली, किंवा लवकर ‘उरकण्या’ साठी, ते मुलांना नॉनस्टॉप अभ्यासाला बसवू पाहतात, आणि त्यातून मग conflict सुरू होतो- लढाई सुरू होते! मुले चुळबूळ करायला लागतात. त्यापेक्षा मधून मधून मुलांना ब्रेक घेऊ दिला तर त्यांचा अभ्यास नीट पार पडू शकतो.child-playing

  1. मुलांना आपण काय सांगतोय ते समजले नाही तर पालक अत्यंत अधीर होतात, एवढे साधेही कसे समजत नाही म्हणून मुलावर ओरडतात. पण आपण आपल्या लहानपणी किती बुद्दू होतो हे ते विसरतात! आणि शिकवतांना मुलांवर अनेक नकारार्थी शब्दांचा भडिमार करतात! उदाहरणार्थ- उनाडक्या करायला, मोबाईल बघायला बरे आवडते, आणि अभ्यासाच्या वेळेसच बरा कंटाळा येतो! खायला पायजे नुसते! अभ्यासाच्या नांवाने बोंब नुसती! शिकला नाहीत तर कसे व्हावे- मवाली होशील! (त्या मुलाच्या शब्दकोशात ‘मवाली’ हा शब्द नसतो- तो आपण घालतो!) तसेच पालक आपले सर्व frustration, निराशा त्या मुलांवर ओततात. मुलांची आणि आपली समजण्याची पातळी एक असू शकत नाही- मुलाला समजले नाही याचा अर्थ आपण सांगण्यात कुठे तरी कमी पडतो आहोत हे त्यांनी समजून घ्यायला पाहिजे- आणि पेशन्स हा परवलीचा शब्द लक्षात ठेवला पाहिजे.

त्यापुढची पायरी म्हणजे मग मुलांवर ओरडणे, त्यांना मारणे, धमकी देणे  हे प्रकार होतात. मुले या गोष्टी अत्यंत seriously घेतात- त्यांना तुम्ही खरेच बोलताय की पोकळ धमकी देताय हे समजण्या इतपत अनुभव नसतो. पालकांनी या ठिकाणी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की पालक जेंव्हा मुलांवर ओरडतात, रागावतात, त्यावेळी त्यांचा lower brain अॅक्टिवेट होतो- म्हणजे काय? तर आपले संरक्षण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हालचाली किंवा प्रतिक्रिया त्याच्या शरीरात आणि मनात व्हायला लागतात. त्यांच्या रक्तात  cortisol आणि adrenaline ही स्ट्रेस हार्मोन्स रिलीज होतात. Cortisol मुळे मेंदूत नवीन पाथ वेज (ज्ञान तंतूंचे मार्ग) तयार होणे कमी होते. Adrenaline मुळे  fight or flight हा रिस्पॉन्स trigger होतो. अशा वेळी त्याचा मेंदू कुठलीही उपयुक्त माहिती ग्रहण करू शकत नाही. त्यामुळे पालकांनी पण त्यांचा lower brain वापरण्या ऐवजी, त्यांचा upper brain वापरून, शांत पणे, मुलांना समजून सांगण्याची आवश्यकता असते- म्हणूनच म्हटले जाते की पालकत्व हे पालकांसाठी त्यांच्या संयमाची परीक्षा असते. मुलें स्ट्रेस मध्ये कुठलीही नवीन माहिती ग्रहण करू शकत नाहीत.brain functions

  1. मुलांना (खरे तर कोणालाही) प्रोत्साहनाची आवश्यकता असते. कौतुक, प्रोत्साहन यामुळे मनुष्यात Dopamine, Serotonin, Oxytocin, Endorphins ही happy harmones रिलीज होतात. त्यामुळे मुलांकडून उदाहरणे सोडवून घेताना, त्यांनी ५० प्रश्न सोडवले असतील, तर ते तपासतांना, त्यातील एक दोन प्रश्नांची उत्तरे चुकली असतील तर नेमके त्यावरच बोट ठेवण्या ऐवजी- आधी त्यांनी जे प्रश्न बरोबर सोडवले आहेत, त्याबद्दल त्यांना शाबासकी द्या, त्यांचे कौतुक करा-किती हुशार आहेस तू! अरे वा! बरोबर उत्तर दिलेस! शाब्बास! अशा शब्दांची मुक्तपणे उधळण करा. त्याला काही पैसे लागत नाहीत! काही पालकांचा अगदी ठाम गैरसमज असतो की मुलांचे कौतुक केले तर ती शेफारतात! त्यामुळे ती चुकूनही मुलांचे कौतुक करत नाहीत. मग मुले हिरमुसली होतात. हा खरे तर मनुष्य स्वभावाचा मूलभूत पैलू आहे! आणि यामुळे खूप गोष्टी सुकर होऊ शकतात. पण काही पालक या बाबतीत अत्यंत चिक्कू असतात.
  2. मुले के. जी, पहिली दुसरी, अशाच वर्गात असतांना सुद्धा काही पालक त्यांनी १०० पैकी शंभर मार्क मिळवलेच पाहिजेत, नाही तर अगदी आभाळ कोसळेल अशा समजुतीत असतात. त्यांनी हा समज काढून टाकायला पाहिजे. मुलांना शाळा शिकणे, अभ्यास करणे हा एक आनंदाचा अनुभव झाला पाहिजे हा उद्देश पालकांचा असला पाहिजे. मुलांचा सर्वांगीण विकास होऊ देणे हा आपला उद्देश असला पाहिजे. याबाबतीत बऱ्याच पालकांचे म्हणणे असते की, तुमच्या वेळी वेगळे होते, आजकाल स्पर्धा खूप वाढली आहे, त्यामुळे अगदी बालपणापासून मुलांकडून मेहनत करून घेतली नाही तर त्यांचे भविष्य काही बनू शकणार नाही. पण पहिली दुसरीतील, शाळेतील अंतर्गत परिक्षेतील गुणांनी मुलाच्या भवितव्यावर कितीसा परिणाम होणार आहे, आणि त्यासाठी आपण किती किंमत मोजायची, याचा सापेक्ष विचार प्रत्येक आई वडिलांनी करायचा आहे. 
  3. मुलांना जर रागावून, भीती दाखवून, धमकावून, अभ्यास करून घेण्याचा प्रयत्न केला, तर मुलें त्यांच्या स्वभावानुसार प्रतिक्रिया देतील. काही मुले जी बुजरी आहेत, ती पालकांच्या धाकाने अभ्यास करतील, पण आपला आत्मविश्वास हरवून बसतील- प्रत्येक गोष्टीत त्यांना पालकांची मदत लागेल. याउलट जी मुलें स्वभावतः आक्रमक आहेत, ती त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर अधिकाधिक आक्रमक होत जातील.frustrated-homework
  4. काही पालकांच्या मनात नक्कीच विचार येत असतील- आमच्या काळी असली काही थेरें नव्हती- छडी लागे छम छम, विद्या येई घम घम! या उक्तीप्रमाणे, मुलांना धाक दाखवला तर ती वठणीवर येतात, अन्यथा नाही. पण या बाबतीत हे लक्षात घेणे आवश्यक आहे की त्या काळची कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती वेगळी होती. मुलांना वळण लावायला फक्त आई वडीलच नाही तर इतरही वडीलधारे असत. तसेच मुलांना आपल्या भावनांना वाट मोकळी करून द्यायला सुद्धा इतर वडीलधारे, मित्र, नातेवाईक, मोठे, लहान भाऊ बहीण असत असत. खरे तर आजोबा आणि आजी ही मुलांच्या आयुष्यातील buffer किंवा shock absorber म्हणून काम करीत. पण आजकाल न्यूक्लियर families मध्ये मुलें पूर्ण पणे isolated असतात. इतर कुणाशीही त्यांचा क्वचितच संबंध येतो. मित्र मैत्रिणीही अगदी निवडकच असतात- अशा वेळी हा छडी लागे छम छम चा वापर केला, तर त्याचा उलट परिणामच होण्याची शक्यता जास्त. आई किंवा वडिलांकडून एखादा शब्द चुकीचा गेला, तर त्याला neutralize करायला घरात इतर कोणीही नसते- किंवा काही ठिकाणी आजोबा आजी असतील तरी त्यांना मोकळेपणाने बोलण्याची सोय नसते.

त्यामुळेच मला असे वाटते, आजकालच्या आई वडिलांना मुलांना वाढवणे हे एक मोठे आव्हान आहे, आणि त्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी  त्यांनी आपली क्षमता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे.

म्हणूनच मुलांचा अभ्यास घेण्या आधी १० मिनिटें या लेखात मांडलेल्या मतांवर विचार करा- आणि आपल्या मुलांचा अभ्यास हा आपल्यासाठी आणि त्यांच्यासाठी पण एक आनंद यात्रा होईल असा प्रयत्न करा!

हा लेख म्हणजे या विषयावरील मला सुचलेले विचार आहेत. या विषयाला इतर अनेक पैलू आहेत- जसे की differently abled मुलांचा विषय, एकल पालक (single parents) यांनी मुलाला कसे सांभाळावे इत्यादि. तसेच मी काही या विषयावरील तज्ञही नाही. माझी मतें ही माझ्या अनुभवातून आणि मर्यादित ज्ञानातून आलेली असल्यामुळे परिपूर्ण असतील असे नाही. पण हा विषय मांडायला ब्लॉगिंग हा एक उपयुक्त मंच उपलब्ध झाल्यामुळे ती इथे मांडायचा प्रयत्न केला आहे.

या विषयावरील आपली मतें comments मध्ये नक्की कळवा.

माधव भोपे

मुलांना वाढवतांना- हा ७-७-७ चा नियम पाळा! Bringing up children- the 7-7-7 rule.

happy-family

Bringing up children- the 7-7-7 rule.

मुलांना वाढवतांना- हा ७-७-७ चा नियम पाळा!

एक गोष्ट आपण सगळेच मान्य करू- आजकाल मुलांना वाढवणे इतके सोपे राहिले नाही, जितके की २५-३०-४० वर्षांपूर्वी होते. कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थिती खूप बदलली आहे- वाढत्या वयातील मुलांच्या पालकांचा ताण खूप वाढला आहे- आई आणि वडील दोघेही नोकरी करणारे असतील, आणि घरात कोणी वडीलधारे नसतील तर ही परिस्थिती आणखीच बिकट होते.

आजकाल लग्नें खूप थाटामाटाने लावून देतात. लग्न झाल्यानंतर लवकरच दोघेही आई वडील होतात. पण मुलें जशी जशी मोठी व्हायला लागतात, त्यांचे सुरुवातीचे गोड बालपण संपून हळू हळू ती ४-५-६- वर्षांची होतात, के. जी. किंवा शाळेत जाऊ लागतात, तसे तसे त्यांना कसे handle करावे, असा प्रश्न पडू लागतो. खरे तर मूल झाल्यानंतर आईवडिलांचे खरे शिक्षण सुरू होते, त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या पेशन्सचा, त्यांच्या संवाद कौशल्याचा, कस लागतो- मुलें आई वडिलांच्या संयमाची परिक्षा पाहतात- आणि बरेच आई वडील या परिक्षेत सपशेल फेल होतात आणि मुलांवर चिडणे, रागावणे, ओरडणे, मारणे, इत्यादि प्रकार सुरू होतात. कधी कधी त्यामुळे एकमेकांवर चिडणे ही सुरू होते.angry-mother

याचे कारण म्हणजे पालकत्व parenting- शिकण्यासाठी वेगळे काही करावे लागेल- शिकावे लागेल, आपल्या स्वभावात काही बदल घडवावे लागतील असे या ‘नवजात’ (!) आई वडिलांच्या गावीही नसते. त्याउलट मूल थोडेसे समजायच्या वयाचे झाले की त्याच्यावर तथाकथित  ‘संस्कार’ करणे ही आपली जबाबदारी, जन्मसिद्ध अधिकार आहे असा पक्का ग्रह प्रत्येक आई वडिलांचा असतो.

खरं तर मूल हे तुम्ही काय ‘सांगता’ यापेक्षा प्रत्येक प्रसंगात तुम्ही कसे ‘वागता’, तुमची काय प्रतिक्रिया असते, देहबोली, आवाजाचा ‘टोन’ डोळे, चेहऱ्यावरचा भाव, इत्यादि कसे आहेत, यावरून शिकत असते, आणि आईवडिलांच्या ‘सांगण्या’ पेक्षा त्यांचे ‘वागणे’ हे अनुकरण करीत असते, आत्मसात करीत असते. एखाद्या आईला छोट्या छोट्या गोष्टींवर कपाळावर हात मारून घ्यायची सवय असेल तर मूल लगेच ती उचलते. मुलाचे वडील जर मोबाईल बघत बघत जेवत असतील तर मूलही तसेच करते.

मुलांना मोठे करण्यात आई वडील दोघांचाही सहभाग असला, तरी त्यात आईचा वाटा खूप जास्त असतो, कारण मुलाजवळ २४ तास राहणारी आईच असते. आणि आपल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मुलांना आईचा सहभाग आणि सहवास हवा असतो. अर्थात मुलांकडून योग्य त्या गोष्टी करून घेण्यासाठी, त्यांना अयोग्य गोष्टींपासून परावृत्त करण्यासाठी किंवा दूर ठेवण्यासाठी, दिवसातून अनेक वेळा रागवावे लागू शकते, खरे तर मुलांना रागावत नाही ओरडत नाही असे पालक कुणीच नसतील. पण असे करतांना जर एक ७-७-७ चा गोल्डन रूल लक्षात ठेवला, तर मुलांवर त्या रागावण्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही.

काय आहे तो गोल्डन रूल? प्रत्येक आईने(आणि वडिलांनीही) लक्षात ठेवावा असा हा नियम म्हणजे- दिवसातील ३ मुख्य वेळा पाळण्याचा. कोणत्या आहेत या तीन वेळा?

या तीन वेळा म्हणजे मूल जेंव्हा सकाळी झोपेतून उठते, त्यावेळचे ७ मिनिट, दुसरी वेळ म्हणजे मूल जेंव्हा शाळेतून घरी येते, त्यावेळचे ७ मिनिट, आणि तिसरी वेळ म्हणजे मूल जेंव्हा झोपी जाते, त्यापूर्वीचे ७ मिनिट- या अत्यंत महत्त्वाच्या वेळा असतात.

४ ते ७-८ वर्षांचे मूल जेंव्हा सकाळी झोपेतून उठते, तेंव्हा त्याला आई समोर पाहिजे असते. मूल जेंव्हा के. जी. किंवा शाळेत जायच्या वयाचे होते, आणि सकाळी शाळा असेल, तेंव्हा सकाळी त्याला उठवणे भाग असते. बऱ्याच आया, त्यांच्या कामाच्या ताणामुळे, सकाळी बरीच कामे लवकर आटपायची असल्यामुळे, मुलांना उठवतांनाच खूप वैतागून, आरडा ओरडा करून, मुलांना उठवतात. मुलें उठत असतांनाच बऱ्याच गोष्टी त्यांना ‘सुनावून’’ देतात. वास्तविक पाहता, झोपेतून उठण्याची ही वेळ मुलांसाठी अत्यंत ‘सेंसिटीव्ह’ असते. झोपेतून उठून, बाहेरच्या जगाच्या धावपळीशी जुळवून घेण्यात त्यांनाही बरेच प्रयत्न करावे लागतात. अर्धवट झोपेतून उठून लगेच तोंड धुणे, आंघोळ करणे, शाळेची तयारी करणे, या सर्व गोष्टी लागोपाठ कराव्या लागतात. त्यांच्यासाठी सुद्धा ही रोजची लढाई असते. अशा वेळी मुले उठतात त्यावेळची ७ मिनिटे. जर आईने त्याला थोडे मायेने, प्रेमाने, डोक्यावर हात फिरवून, दोन गोड शब्द बोलून जर झोपेतून जागे केले, फक्त ७ मिनिटे जर पेशन्स दाखविला, तर ते मूल आनंदाने उठते- आजकालची मुलेही बरीच समजूतदार झालीत. त्यांना नीट समजून सांगितले तर ती समजून घेतात- पण नेमक्या या महत्वाच्या वेळेस जर आपले फ्रस्ट्रेशन थोडे बाजूला ठेवून, त्यांच्याशी मायेने वागले नाही, तर दिवसाची सुरुवातच चिडचिड आणि राग  याने होते, आणि संबंध दिवसावर याचा परिणाम होतो.happy-child-1

दुसरी महत्त्वाची वेळ म्हणजे मूल शाळेतून घरी येते, तेंव्हा! मूल शाळेतून घरी येते, तेंव्हा त्याला आई समोर हवीच असते! आणि दिवसभर शाळेत काय काय झाले हे अगदी बारीक सारीक तपशीलांसह आईला सांगायचे असते. त्यावेळी आईने हातात कितीही महत्त्वाचे काम असले, तरी ते बाजूला ठेवून, मुलाचे म्हणणे, अगदी इंटरेस्ट दाखवून ऐकले, फक्त ७ मिनिटे! तरी मुलाचे समाधान होते. अशा वेळी बऱ्याच आया मुलाकडे दुर्लक्ष करतात, किंवा, आल्या आल्या, त्याने डबा पूर्ण संपवला नाही, दफ्तर कुठे तरी फेकून दिले, बूट नीट जागेवर ठेवले नाही, अशा काही कारणांमुळे लगेच रागवायला सुरुवात करतात. अशा वेळी खरे तर आई काही कामात असली, तरी तिने आपले लक्ष मुलाकडे आहे असे दाखवणे आवश्यक आहे- तुझ्यापेक्षा मला कोणतेही काम मोठे नाही- अशी जाणीव करून देणे आवश्यक आहे. कमीतकमी सुरुवातीचे काही सेकंद- एखादे मिनिट तरी- मुलाला, आपल्या आगमनामुळे आईला आनंद झाला आहे हे जाणवले पाहिजे-  आणि तुम्ही कोणत्या अत्यंत महत्वाच्या कामात असलात तरी- “थांब हं! मी एवढे करून आलेच!” अशी एक प्रकारे त्याची ‘परमिशन’ घेऊन हातातील काम उरकून लगेच त्याच्याकडे लक्ष दिले तर आपण आईसाठी महत्वाचे आहोत ही खात्री मुलांच्या मनात येते.happy-child-2

तिसरी महत्वाची वेळ म्हणजे रात्री झोपण्यापूर्वीची! झोपेतून उठणे आणि झोपी जाणे या दोन क्रिया एक प्रकारे transition phase असतात! त्यावेळी मुलांना आई जवळ हवी असते. आणि मुले झोपण्याच्या वेळेस कुठल्याही प्रकारे वाद विवाद करून, रागावून (तू लवकर झोपत नाहीस म्हणून) चिडून रडत रडत जर मूल झोपी गेले, तर त्याची तीच मानसिक अवस्था झोपेतही सुरू राहते, आणि सकाळीही मूल तीच मानसिक अवस्था घेऊन उठण्याची शक्यता असते. त्यामुळे आई वडिलांना मूल झोपतांना (किंवा त्याला झोपी घालतांना)ही आपल्या संयमाचा कस लावावा लागतो. दिवसभरात काहीही वाद विवाद झाले असतील, तरी झोपतांना मुलाला जवळ घेऊन, डोक्यावरून, पाठीवरून हात फिरवून, आनंदी अवस्थेत झोपी घातले, तर मुलाची झोप उत्तम प्रकारची होते आणि सकाळी उठतांना ही मूल फ्रेश मूड मध्ये उठते.mother-child

अशा प्रकारे हा ७-७-७ चा नियम जर पाळला तर बऱ्याच पालकांचे आणि त्यांच्या मुलांचे आयुष्य सुकर होईल!

वरील प्रकारे वागतांना आईला आपल्या आवडीनिवडींना, मुरड घालावी लागते- हीच स्वभाव बदलण्याची शाळा-जिच्यात आईवडिलांना नकळत प्रवेश मिळाला असतो. त्यामुळे मुलें मोठी होत असतांना- नुसती मुलें च मोठी (शहाणी) होत नाहीत, तर त्यांच्याबरोबर त्यांच्या इतकेच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त त्यांच्या आई वडिलांचे- आई वडील म्हणून, आणि माणूस म्हणून- शिक्षण चालू असते!

या विषयावर आपले अनुभव आणि आपली मते जरूर कळवा.

माधव भोपे 

Shivajinagar Wakdewadi Pune Bus timings MSRTC

MSRTC pune time table
Shivajinagar Bus Timings

Shivajinagar Wakdewadi Pune Bus Timings

Find Your Bus Timings

Full Bus Timetable

Sr.No. Destination Timings

For further enquiries:

Toll-free contact number: 1800221250

Location of Wakdewadi Bus Stand, Pune

20250824 174021 scaled