https://goodworld.in A website by Madhav Bhope

बारा राशींचे बारा स्वभाव 12 Zodiac signs nature

rashi featured image

बारा राशींचे बारा स्वभाव

12 zodiac signs nature

खूप वर्षांपूर्वी शरद उपाध्ये यांचे  ‘भविष्यावर बोलू काही’, आणि ‘राशीचक्र’, यासारखे टीव्ही शोज मराठी टीव्ही चॅनेल्स वर खूप लोकप्रिय झाले होते. राशीभविष्य या विषयावर हलक्या फुलक्या भाषेत दिलेली माहिती श्रोत्यांना खूप आवडत असे. त्यामुळे राशीभविष्य या विषयाविषयी लोकांना वाटणारी एक प्रकारची भीती असायची ती कमी होण्यास मदत झाली.

माणसाचे भविष्य घडविणे हे त्याच्या हातात असते, असे कर्तृत्ववान लोकांचे मानणे असते, आणि ते अगदी खरे आहे. पण ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणार्‍यांचे म्हणणे असे असते, की या शास्त्राचा उपयोग माणसाला सतर्क करण्यासाठी होऊ शकतो.

अर्थात, या विषयावरील विविध मतांमध्ये आपल्याला जायचे नाही.

पण ढोबळ मानाने पहायचे झाल्यास ज्या काही विषयांवर जवळ जवळ सर्व ज्योतिषकारांचे एकमत आढळते, ते म्हणजे विशिष्ट राशींचे विशिष्ट स्वभाव. आपल्यासारख्या सर्वसाधारण माणसानेही आपल्या आजूबाजूस पाहिल्यास यातील काही गोष्टी खूप प्रमाणात लागू पडतात असे दिसते. सगळ्याच गोष्टी लागू पडत नाहीत. पण काही राशींचे स्वभाव अगदी ठळकपणे दिसून येतात उदा. कन्या राशीचा चिकित्सक आणि शंकेखोर स्वभाव- घराला लावलेले कुलूप तीन तीनदा ओढून बरोबर लागले आहे की नाही ते पाहणारी माणसे आपल्या आजूबाजूला दिसतात. वृषभ राशीच्या व्यक्ति देखण्या, रसिक आणि चैनी असलेल्या बर्‍याच प्रमाणात दिसतात. नेतृत्व गुण आणि अहंकार असलेल्या सिंह राशीच्या व्यक्तीही आपल्या आजूबाजूला दिसतात. अजून एक गोष्ट म्हणजे, कोणत्या राशीचा शरीराच्या कुठल्या भागावर अंमल जास्त असतो, आणि त्या त्या राशीच्या लोकांना जास्त करून त्याच अवयवांचे त्रास हे प्रामुख्याने होतात, हे नमूद केलेल्यानुसार खूप प्रमाणात जुळते.  त्यामुळे त्या त्या राशीच्या लोकांनी त्या त्या अवयवांची जास्त काळजी घेतल्यास पुढे होणारा त्रास ते टाळू शकतील.

बर्‍याच वेळा आपल्या आजूबाजूची माणसे आपल्या अपेक्षेपेक्षा खूप वेगळी वागतात. काही वेळा आपण केलेल्या उपकाराची फेड अपकाराने करतात, कारण नसतांना आपल्याशी डूख धरतात, तेंव्हा असे का होते, ते असे का वागतात, हे जेंव्हा समजत नाही.

अशा वेळी , हा राशींच्या स्वभावाचा चार्ट पाहिल्यास एखाद्या व्यक्तीच्या वागण्याची संगती काही प्रमाणात लागू शकते- जन्मतःच जो स्वभाव व्यक्ति घेऊन आलेली असते, त्याप्रमाणे ती वागते.

सर्वसाधारणपणे बारा राशींची स्वभाव वैशिष्ट्यें खाली  दिली आहेत. आपल्या आजूबाजूला पाहिले तर या पैकी बहुतेक स्वभाव वैशिष्ट्यें त्या त्या राशींच्या लोकांसोबत खूप प्रमाणात जुळतांना आढळतात.

एकेका राशीत पुन्हा कोणत्या नक्षत्रावर जन्म झाला आहे,त्यानुसार स्वभावात फरक दिसू शकतो. पण एक सहज छंद म्हणून जर आपण हे गुणधर्म ताडून पाहिले तर बऱ्याच प्रमाणात आपल्याला एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अंदाज येऊ शकतो.

रासस्वभाव वैशिष्ठ्ये
मेषधाडसी, धडपडे, रागीट, अविचारी, उतावळे, धैर्यवान, पराक्रमी, पुरुषी अहंभाव बाळगणारे, बेभान, लढाऊ, दिलदार, अतिरेकी वृत्तीचे, अति प्रेम करणारे..
वृषभभोगी, चैनी, कलंदर स्वभाव, परिश्रमी, मिरवण्याची हौस असलेले, रसिक, स्तुतिप्रिय, स्त्रीजित, सौन्दर्यवादी, सर्जनशील, गीतसंगीत आवड असणारे.
मिथुनअस्थिर, पोरकट, घाबरट, कचखाऊ, गोडबोले, मनकवडे, मिस्किल, कृश शरीर, वाक् चातुर्य, चांगली स्मरणशक्ती असणारे.
कर्कबोलका चेहरा, संवेदनशील, चंचल, चपळ , चिडचिडे, प्रवासाची आवड असणारे, हळवे(रडके), स्त्रीवश, आतिथ्यशील, सेवाभावी
सिंहमानी, अभिमानी, शूर, गिर्यारोहक, हेकेखोर, स्पष्टवक्ता, धीरोदात्त, बेडर, दुराग्रही, हुकूमशहा, ताठर, अहंमन्य
कन्यासंकोची, सेवाभावी, शंकेखोर, कवीमनाचे, दातृत्व, भित्र्या स्वभावाचे, व्यवस्थित, अतिकाळजी करणारे, काटकसरी, दुसर्‍याला न दुखावणारे, लाजाळू
तूळउत्तम सल्लागार, धनवान, जुगारी प्रवृत्तीचे, व्यवहार चतुर, संधीचा फायदा घेणारे, जगन्मित्र, व्यापारी व व्यावसायिक वृत्तीचे, शांत, कलावंत, मृदू भाषी, हिशेबी वृत्ती, जोखीम घेणारे.
वृश्चिकमुत्सद्दी, मेहनती, भेदक वृत्तीचे, महत्त्वाकांक्षी, क्रूर, पाताळयंत्री, निश्चयी वृत्तीचे, अबोला धरणारे, धारदार बोलणारे, छिद्रान्वेषी
धनुमजबूत शरीर, मैदानी खेळांची आवड असणारे, आशावादी, आनंदी, तेजस्वी, स्तुतिप्रिय, बेदरकार, बेजबाबदार, धरसोड वृत्तीचे, धार्मिक
मकरचिवट, सहनशील, मितव्ययी, दीर्घोद्योगी, कडवट, तुसडे, न्यायनिष्ठुर, राजकारणी, आत्मकेंद्रित, स्वावलंबी, जिद्दी, वास्तववादी, वाक् चातुर्याचा अभाव असणारे, शिस्तप्रिय, तडफदार.
कुंभमानवतावादी, समजाभिमुख, नवमतवादी, संशोधक, दुसर्‍याला अक्कल शिकवणारे, संग्राहक वृत्तीचे, आत्ममग्न, विक्षिप्त, अलिप्त, निरुत्साही, प्रगल्भ बुद्धिवंत, वैराग्य वृत्तीचे, ध्येयवेडे, गंभीर.
मीनअंतःस्फूर्ति, भूतदयावादी, दूरदर्शी, स्वप्नदर्शी, आळशी, परावलंबी, गोंधळी, सोशीक, पापभीरू, अपयशाची भीती वाटणारे, नमते घेणारे, प्रसन्न चेहरा.

आता एखादा मनुष्य त्याच राशीत का जन्म घेतो?- तर प्रत्येकजण आपले पूर्वकर्म बरोबर घेऊन येतो, आणि गेल्या जन्मीचे हिशोब या जन्मी पूर्ण करतो- आणि  या जन्माच्या कर्मांनी नवीन जन्माची तयारी करतो! असो.

तसेंच प्रत्येक राशीच्या लोकांना शरीराच्या कुठल्या भागाचे रोग होण्याची शक्यता असते हे खालील चार्ट पाहिला तर समजू शकते. त्या त्या राशीच्या लोकांनी त्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेंच त्या त्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या दैवताची उपासना करावी हेही खालील चार्ट मध्ये दिलेले आहे.

एकेका राशीचा एकेक स्वामी असतो, म्हणजे त्या राशीवर त्या त्या ग्रहाचा अंमल असतो असे मानले जाते.

सूर्य आणि चंद्र हे प्रत्येकी एका राशीचे स्वामी आहेत. सूर्य सिंह राशीचा तर चंद्र कर्क राशीचा स्वामी आहे.

मंगळ, बुध, गुरू, शुक्र आणि शनि हे प्रत्येकी 2-2 राशींचे स्वामी आहेत.

रासराशीस्वामीनक्षत्रउपास्य देवताशरीरावर अम्मलStrong Pointsआनंदमय जीवनासाठी
मेषमंगळअश्विनी व भरणी नक्षत्राचे प्रत्येकी 4 चरण व कृत्तिका नक्षत्राचा 1 चरणगणपती, कुलदेवता, मनोवांछित देवताडोके, कवटी, केस, कपाळधडाडी आणि धडपडी वृत्तिउतावीळ व अविचारी पणावर मात करावी॰
वृषभशुक्रकृत्तिका नक्षत्राचे 3, रोहिणीचे 4, मृग नक्षत्राचे पहिले 2 चरणलक्ष्मी, कुलदेवता, मनोवांछित देवताचेहरा, घसा, दात, तोंड, डोके, गळाकष्टाळू वृत्ति व एकाग्रताचैनी व दिखाऊ वृत्तीला आवर घालावा.
मिथुनबुधमृग नक्षत्राचे शेवटचे 2 चरण, आर्द्राचे 4 चरण, पुनर्वसूचे पहिले 3 चरण.विष्णू, कुलदेवता, मनोवांछित देवतावाणी, मान, खांदे, कान, नर्व्हस सिस्टिम, श्वसन विकारबोलण्याची कला आणि भाषा प्रभुत्त्वकचखाऊ वृत्ती व अस्थिरपणा सोडावा.
कर्कचंद्रपुनर्वसू नक्षत्राचे शेवटचे 1 चरण, पुष्य नक्षत्राचे 4 चरण, आश्लेषा नक्षत्राचे 4 चरणशंकर, कुलदेवता, मनोवांछित देवताहृदय, स्तन, छाती, रक्तसमर्पण भाव व चपळपणाचंचलपणा व हळवेपणावर ताबा मिळवावा.
सिंहसूर्यमघा नक्षत्राचे 4 चरण, पूर्वा नक्षत्राचे 4 चरण, उत्तरा नक्षत्राचा 1 चरणखंडोबा, सूर्य, कुलदेवता, मनोवांछित देवताकुक्षी, शरीराचे नाभीचक्र, पाठ, पाठीचा कणातत्त्वनिष्ठा आणि मनाचा कणखरपणाअहंकारी व हेकेखोर वृत्तीवर नियंत्रण ठेवावे.
कन्याबुधउत्तरा नक्षत्राचे 3, हस्ता नक्षत्राचे 4 चरण, चित्रा नक्षत्राचे 2 चरण.विठ्ठल रुखमाई, कुलदेवता, मनोवांछित देवताकंबर, त्वचा, पोट, जठर, गर्भाशयधोरणीपणा आणि कौशल्यापूर्ण नियोजनअतिविचार व अतिचौकशा करू नयेत.
तूळशुक्रचित्रा नक्षत्राचे 2 चरण, स्वाति नक्षत्राचे 4 चरण, विशाखा नक्षत्राचे 3 चरण.महालक्ष्मी, कुलदेवता, मनोवांछित देवताओटीपोट, नितंब, बस्ती, मूत्राशय, स्त्रीबीज, पुंबीजउच्च अभिरुचि आणि व्यावसायिक दृष्टिकोनसंधीसाधू व हिशेबी वृत्तीला काबूत ठेवावे.
वृश्चिकमंगळविशाखा नक्षत्राचा शेवटचा 1 चरण, अनुराधा नक्षत्राचे 4 आणि ज्येष्ठा नक्षत्राचे 4 चरण.शंकर, कुलदेवता, मनोवांछित देवतागुदद्वार, गुह्येंद्रिय, स्नायू संस्थामर्मज्ञ व महत्त्वाकांक्षीगूढ आणि खुनशी वृत्तीचा त्याग करावा.
धनुगुरूमूळ नक्षत्राचे 4 चरण, पूर्वाषाढा नक्षत्राचे 4 चरण, उत्तराषाढा नक्षत्राचा पहिला चरणश्री दत्त, कुलदेवता, मनोवांछित देवतामांड्या, सायटिका, यकृत, मेद(चरबी)सामर्थ्य व आशावादगाफील व बेदरकार वृत्तीला लगाम घालावा.
मकरशनिउत्तराषाढा नक्षत्राचे 3 चरण, श्रवण नक्षत्राचे 4, धनिष्ठा नक्षत्राचे 2 चरण.मारुति, कुलदेवता, मनोवांछित देवताशरीरातील सर्व सांधे व हाडे, विशेषतः गुडघेजिद्दी व वास्तववादी वृत्तिकडवट व न्याय निष्ठूर वृत्तीवर विजय मिळवावा.
कुंभशनिधनिष्ठा नक्षत्राचे 2 चरण, शततारका नक्षत्राचे 4 चरण, पूर्वा भाद्रपदाचे 3 चरण.श्री दत्त, कुलदेवता, मनोवांछित देवताडावा कान, पोटर्‍या, घोटेनवमतवाद आणि उच्च बुद्धिमत्ताविक्षिप्त व अलिप्त वृत्तीवर अंकुश ठेवावा.
मीनगुरूपूर्वा भाद्रपदाचा 1 चरण, उत्तरा भाद्रपदाचे 4 चरण, रेवती नक्षत्राचे 4 चरण.लक्ष्मीनारायण, श्री दत्त, कुलदेवता, मनोवांछित देवतापावले, तळवे, डावा डोळा, घामाद्वारे उत्सर्जनअंतः स्फूर्ति आणि दूरदर्शी वृत्तीऐषारामी व स्वप्नाळू वृत्तीला मुरड घालावी.

मला स्वतःला ज्योतिष या विषयाची काही माहिती नाही, त्यामुळे या विषयातील विद्वान मंडळींची आधीच माफी मागतो.

सदरील माहिती ही केवळ मनोरंजन या स्वरूपात घ्यावी अशी विनंती आहे. आणि यात दिलेली माहिती, आपल्या स्वतःच्या स्वभावाला, किंवा आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींच्या (ज्यांच्या राशी आपल्याला माहित आहेत) स्वभावाशी ताडून पाहून, हे कितपत लागू होते हे आपणच ठरवावे.

आपल्याला आवडल्यास इतरांनाही जरूर शेअर करावे.

या विषयी आपले अनुभव असतील ते comments मध्ये नक्की कळवा. तसेच आपले विचार ही comments  मध्ये लिहून कळवा.

माधव भोपे 

ring
SILVERSPOT JEWEL 925 Sterling Silver Blue Sapphire Birth stone (Pisces, Taurus, Virgo, Libra, Sagittarius)

Shivajinagar Wakdewadi Pune Bus timings MSRTC

MSRTC pune time table
Shivajinagar Bus Timings

Shivajinagar Wakdewadi Pune Bus Timings

Find Your Bus Timings

Full Bus Timetable

Sr.No. Destination Timings

For further enquiries:

Toll-free contact number: 1800221250

Location of Wakdewadi Bus Stand, Pune

20250824 174021 scaled

Memories of Ganesh Utsav आठवणीतील सात्त्विक गणेश उत्सव

lord-ganesha

आठवणीतील गणेश उत्सव

महाराष्ट्रातील गणेश उत्सवाचे पूर्वीचे स्वरूप 

Memories of Ganesh Utsav in Maharashtra

आपल्या goodlifehub.in या वेबसाइट वर मागील वर्षी हा लेख प्रकाशित केला होता. या लेखाची प्रासंगिकता आजही कायम आहे. त्यामुळे या लेखात काही समयोचित बदल करून तो आता goodworld.in च्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

यावर्षी  गणेश चतुर्थी बुधवार दि. 27 ऑगस्ट 2025 रोजी गणरायांचे आगमन धूम धडाक्यात झाले.  यावर्षी पाऊस ही सगळीकडे छान झाला, पिकें चांगली आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे, जनावरांना चारा आणि पाणी  मुबलक झाले आहे, त्यामुळे सर्व आनंदात आहेत.   10 दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. आजकाल सर्वच सार्वजनिक कार्यक्रमांचे स्वरूप दिवसेंदिवस बदलत चालले आहे. अशा वेळी, आम्ही लहान असतांना गणेश उत्सवाचे स्वरूप कसे होते, हे जसे आठवेल तसे वर्णन करण्याचा प्रयत्न या लेखात  केला आहे.

आठवणीतील गणेश उत्सव

आजपासून 50-55 वर्षांपूर्वीचा गणेशोत्सव हा खूपच साधा आणि सात्त्विक होता. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची, शहराची, आपली आपली एक वेगळी परंपरा असे. त्या त्या भागातील आजूबाजूची गावेही तीच परंपरा पाळत. गणेशोत्सव जवळ आला की हौशी गणेश मंडळे कामाला लागत. काही नवीन गणेश मंडळेही स्थापन होत. पण या सगळ्यात हौशी मंडळीच असत. गणेशोत्सवाला व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले नव्हते. वर्गणीची, counterfoil असलेली पावती पुस्तके छापून घेतली जात. मोठाली मंडळे अशी अनेक पावती बुकें छापीत, आणि कार्यकर्त्यांचे वेगवेगळे गट वेगवेगळ्या पावती पुस्तकांसह वर्गणी गोळा करण्याच्या कामाला लागत. वर्गणीच्या आकड्याबद्दल प्रेमळ आग्रह असे, पण कुठेही धाक दपटशा किंवा जबरदस्ती नसे. दुकानदार लोकांकडूनही वर्गणी गोळा केली जाई. छोटी छोटी बाल गणेश मंडळेही असत. त्यांच्या छोट्या कार्यकर्त्यांनाही कौतुकाने अल्पशी वर्गणी दिली जात असे. ते त्यातच खूष असत.images 29

गणपती बसवण्यासाठी कोणाची तरी बैठक, किंवा ओसरी ही बऱ्याच वेळा पुरे होई. मोठाली मंडळे स्टेज उभारीत. पण ते स्टेज कधीच रहदारीला अडथळा करणारे नसे. शक्यतो एका बाजूला लावले जाई.

मला हिंगोलीचा गणेशउत्सव आठवतो. तेंव्हा मी सहावी सातवी इयत्तेत होतो. गल्लीतील गणेश मंडळा तर्फे कार्यकर्ता म्हणून इतरांबरोबर मीही वर्गणी गोळा करायला जायचो. लोकांकडून नगदी पैसे वर्गणी म्हणून घेतांना खूप थ्रिल वाटायचे.

हिंगोली बऱ्यापैकी मोठे शहर होते. तिथे बरीच गणेश मंडळे असत. गणेश उत्सवामधील मुख्य कार्यक्रम दोन प्रकारचे असत. एक म्हणजे निरनिराळी गणेश मंडळे गाण्यांच्या स्पर्धा आयोजित करत. त्यात सिने गीत, भावगीत, भक्तीगीत, सर्व प्रकारची गीते चालत असत. संध्याकाळी 8 च्या नंतर या स्पर्धा सुरू होत, त्या रात्री 11 किंवा 12 वाजेपर्यंत चालत. 

या स्पर्धामध्ये मुख्य करून शिशु किंवा तरुण वर्गाचाच सहभाग असे. त्यातील काही काही गाणारे छान गात आणि मग ते खूप प्रसिद्ध होत. ते रोज किंवा दिवसा आड वेगवेगळ्या गणेश उत्सवां च्या स्पर्धांमध्ये भाग घेत आणि हमखास पाहिले किंवा दुसरे बक्षिस मिळवत. ही बक्षिसे शेवटच्या दिवशी जाहीर केली जात. तसेच रसिक प्रेक्षक त्यांना त्यांच्या गाण्यावर खूष होऊन 1 रुपया पासून 10 किंवा वीस रुपयांपर्यंत बक्षिसे ही देत. ही बक्षिसे लगेच स्टेजवर अँकर द्वारे जाहीर केली जात. काही काही मुले अशी प्रोत्साहनपर खूप रक्कम मिळवीत.640px Prathamesh Lagate

 हिंगोली येथील स्टेशन मास्टर चा मुलगा, “ऐ माँ  तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी” हे गाणे खूप छान म्हणायचा. एक अकबर नावाचा मुसलमानाचा साधारण 18-20 वर्षांचा मुलगा होता.(त्या काळी असे स्पष्टपणे म्हणण्यात काही वावगे वाटत नसे. सर्व जण अत्यंत मिळून मिसळून राहत).  तो पांढरी शुभ्र पॅन्ट आणि तसाच पांढरा शर्ट घालून येई. तो जास्त करून देशभक्तिपर गीते म्हणायचा. त्यातील एक गीत, ‘नौ जवानों भारत की तकदीर बना दो- फूलों के इस गुलशन से काँटों को हटा दो” हे गाणे,  अॅक्शन सहित म्हणायचा. त्याला ही खूप  बक्षिसें मिळत. .

ते गाणे साधारण मला आठवते तसे इथे देत आहे

नौजवानों भारत की तकदीर बना दो 

नौजवानों भारत की तकदीर बना दो 

फूलों के इस गुलशन से काँटों को हटा दो

फूलों के इस गुलशन से काँटों को हटा दो

छोड़के सारे भेदभावको समझो देश को अपना

समझो देश को अपना,

रह ना जाए देख अधूरा कोई सुंदर सपना

कोई सुंदर सपना

हम भारत के वासी क्यों हों दुनिया में शर्मिन्दा

देश के कारण मौत भी आए फिर भी रहेंगे ज़िन्दा

जय-जय हिन्द के नारों से धरती को हिला दो

फूलों के इस …

अपने साथ है कैसे-कैसे बलवानों की शक्ति

श्री जवाहर लाल की हिम्मत बापू जी की भक्ति

देश का झण्डा जग में ऊँचा करके दिखा दो

फूलों के इस ..

मला आत्ता गूगल करता करता कळाले की वरील गीत हे १९५५ साली रिलीज झालेल्या कुंदन नांवाच्या देशभक्तिपर चित्रपटातील आहे. 

ते असे आदर्शवादाचे आणि स्वप्नाळू पणाचे दिवस होते. आजकालच्या भयानक वास्तवतेत तो  आदर्शवाद पाल्या पाचोळया सारखा उडून गेला आहे, हे दारुण सत्य आहे. 

असो. तर   त्यांचे पाहून माझ्यासारख्यालाही कधी कधी स्पर्धेत भाग घ्यावासा वाटे. मग स्पर्धेत नाव नोंदवून आल्यावर, आपण ही तसेच गात आहोत, सगळे जण टाळ्या वाजवीत आहेत. आपला पाहिला नंबर आला आहे, इत्यादि स्वप्न रंगविण्यात 2-3 दिवस बरे जात. त्याकाळी लोकप्रिय सिनेमांच्या गाण्याची, घडी घातलेली छोटी छोटी 3-4 पानांची पुस्तके, 20-25 पैशांना मिळत. मग ती आणून त्यातून गाणे पाठ केले जाई. ते गाणे, अर्थातच, फ्लॉप होई, हे काही वेगळे सांगावयास नको. 

देखावे 

असो. तर अशा या गाण्याच्या स्पर्धा होत. दुसरा एक महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे निरनिराळे देखावे, ज्यांना ‘झाकी’ म्हणत. निरनिराळी मंडळे वेगवेगळ्या झाक्या (देखावे) बनवीत. हे देखावे बनवायला कोणीही व्यावसायिक मंडळी नसत, तर मंडळाचेच उत्साही कार्यकर्ते असत. कधी भारत पाक युद्धाचा देखावा केला जाई, तर कुठे पुराणातील एखाद्या कथेचा देखावा केला जाई.

maxresdefault 2 काही सामाजिक उद्बोधनपर देखावे केले जात. यातील बहुतांश देखावे ‘स्थिर’ असत. पण काही काही मंडळे ‘हालते’ देखावे करत. असे देखावे बघायला तूफान गर्दी उसळे. काही काही देखाव्यात, कोणी तरी, गणपतीच्या पाया पडतो आहे आणि गणपती त्याला आशीर्वाद देतो आहे, असा देखावा- आणि त्यात गणपतीचा मेकअप करून एखादा मुलगा उभा असे. तो सारखा सारखा आशीर्वाद देण्यासाठी हात वर करी. मग मधून मधून त्याला विश्रांती देण्यासाठी पडदा पाडीत. तो थोडा वेळ आराम करे, आणि पुन्हा गणपतीच्या भूमिकेत जाई. रात्रीच्या वेळी, आपल्या मंडळातली गणपतीची आरती उरकली, की लोक झुंडी झुंडीने देखावे पाहायला बाहेर पडत. पूर्ण शहरभर अनेक देखावे असत. प्रत्येक ठिकाणी लाइट्स चा झगमगाट असे. पण तो खूप जास्त नसे. सगळे देखावे पाहता पाहता रात्रीचे बारा केंव्हा वाजून जात काही कळात नसे. या देखाव्यांची ही स्पर्धा असे आणि परीक्षक मंडळ शहरातील सर्व देखाव्यांची पाहणी करून त्यातून नंबर काढत. ही बक्षिसे ही शेवटच्या दिवशी दिली जात. एके वर्षी आमच्या गल्लीच्या ‘बाल गणेश मंडळाने’ कुठला तरी युद्धाचा देखावा केला होता, ते आठवते. त्यात गल्लीतीलच एक धष्टपुष्ट मुलगा सैनिकाचा वेष घालून, सैनिक झाला होता, आणि हातात बंदूक घेऊन शत्रूला मारीत होता, असा काहीसा देखावा होता. काही काही मोठी गणेश मंडळे खूप भव्य दिव्य असे देखावे करीत.images 35

असो. रोज सकाळ संध्याकाळ आरती होई. गणपतीच्या मंडपात सिनेमाची अचकट विचकट गाणे लावण्याची प्रथा सुरू झालेली नव्हती. खरे तर साऊंड सिस्टम तेंव्हा कोणाकडे नसायची.

काही काही मातब्बर गणेश मंडळे मोठ्या शहरातील ऑर्केस्ट्रा बोलावीत. त्याच्या कार्यक्रमाला तुफान गर्दी उसळे. भरपूर वाद्य वृंदासहित आलेले ते कलाकार, सिनेमाची लोकप्रिय गाणी अगदी हुबेहूब वाजवत.33088a1c85338b85cddd3d212e18

अशा प्रकारे पाहता पाहता दहा दिवस कसे निघून जात कळत नसे. आणि मग गणेश विसर्जनाचा दिवस येई-

गणेश विसर्जन 

गणेश विसर्जन गावाबाहेरील एका मोठ्या तलावात करीत. गावातील मानाचा गणपती ठरलेला असे. संध्याकाळी लवकरच, म्हणजे 8-9 च्या सुमारास विसर्जनाची मिरवणूक निघे. शहरभरातील गणपती आपापल्या ठिकाणाहून निघून, त्या मिरवणुकीत रांगेने सामील होत. बहुसंख्य गणपती हे हातगाडी किंवा सजवलेली बैलगाडी यावर असत. या गाड्यांमध्ये गल्लीतील सगळ्या घरांतील छोटे छोटे गणपतीही दिलेले असत. बहुतेक मिरवणूकींच्या समोर भजनी मंडळे टाळ आणि मृदुंग घेऊन, भजने गात चाललेली असायची. कुठेही गणपतीच्या समोर अचकट विचकट नाच गाणे नसायचे. खूप सात्त्विक वातावरण असायचे. उजेडासाठी पेट्रोमॅक्स च्या ‘बत्त्या’ असायच्या. गर्दी भरपूर असायची, पण अत्यंत शिस्तीत आणि शांततेत मिरवणूक चालायची. रात्री बाराच्या आसपास पहिला गणपती तलावावर पोंचायचा. त्याची रीतसर पूजा वगैरे होऊन विसर्जन व्हायचे. मग  एकेक करीत सगळ्या गणपतींचे विसर्जन होत, शेवटच्या गणपतीचे विसर्जन व्हायला सकाळचे 3 ते 4 वाजायचे.  

मेळे आणि सांस्कृतिक कार्यक्रम, व्याखानमाला  

हिंगोलीनंतर आमची बदली सिल्लोड येथे झाली होती. सिल्लोड हे हिंगोली पेक्षा छोटे गाव होते. मी तोपर्यन्त थोडा मोठा झालो होतो, आणि आठव्या वर्गात गेलो होतो. मला हिंगोलीच्या गणेश उत्सवाचा अनुभव होता. गल्लीतल्या मुलांपुढे त्यामुळे माझी थोडी ‘वट’ होती. मग मी पुढाकार घेऊन आमच्या गल्लीत एक ‘बाल गणेश मंडळ’ सुरू केले. आम्ही राहत असलेल्या वाड्याच्या शेजारी नीलकंठ नावाच्या वकिलांचा मोठा वाडा होता. त्यावरील ओसरी त्यांनी आम्हाला मंडळाचा गणपती बसवायला दिली. आम्ही तिथे छोटेखानी गणपती बसवला.

images 33

सिल्लोड हे औरंगाबाद तालुक्यातील गाव, संगीत मेळयांसाठी खूप प्रसिद्ध होते. सिल्लोडला देखावे वगैरे करायची प्रथा नव्हती. पण मेळे मात्र खूप व्हायचे. कोणी तरी हौशी, संगीताचा जाणकार असलेला माणूस पुढाकार घेऊन मेळा सुरू करी. मग आजूबाजूच्या बऱ्यापैकी आवाज असणाऱ्या आणि बऱ्यापैकी दिसणाऱ्या मुलांना आणि काही प्रमाणात मुलींनासुद्धा, तो आपल्या मेळयात, त्यांच्या आईवडिलांच्या संमतीने  सामील करून घेई. मेळयाला छानदार नांव दिले जाई. तबला पेटी वगैरेची जुळवाजुळव केली जाई. आणि महिना महिना आधी त्या मुलांची गाण्याची प्रॅक्टिस सुरू केली जाई. काही काही मेळे अनेक वर्षांपासून सुरू होते आणि खूप प्रसिद्ध होते. बहुतेक मेळयांना आपला ड्रेस कोड असे. पण सिल्लोड येथील ‘बापू टेलर’ चा मेळा मात्र खूप प्रसिद्ध होता. त्यांनी युनिफॉर्म ठेवला नव्हता, तर ते त्यांच्या कलाकारांना त्या त्या गाण्याला अनुरूप असा वेष करवीत. जसे की भाजीवाली म्हटले तर नऊवारी साडी, डोक्यावर टोपले, इत्यादि. त्यांच्या या वेगळेपणामुळे तो मेळा खूप तूफान चाले. लांबून लांबून त्यांना बोलावणी येत. औरंगाबादला सुद्धा ते जात. तो आमच्या गावचा मेळा म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटे. सिल्लोड येथील एस टी महामंडळाचा गणपती पण खूप मोठा आणि प्रसिद्ध होता. त्यांची वर्गणीही खूप जमायची. त्यामुळे ते पण मोठे मोठे कार्यक्रम ठेवायचे.

आणखी एक आठवणारी अत्यंत चांगली गोष्ट म्हणजे गणपतीच्या काळात बरीच गणपती मंडळे, चांगल्या चांगल्या वक्त्यांची, विद्वानांची अभ्यासपूर्ण व्याख्याने असलेल्या व्याख्यान मालिका ठेवत. त्याला खूप गर्दी होत असे. मला आठवते मी प्रसिद्ध वक्ते प्रा. वसंत कुंभोजकर यांचे शिवरायांवरील व्याख्यान सिल्लोड येथेच ऐकले होते. त्याकाळी गणपती उत्सवाला दिलेली वर्गणी सार्थकी लागल्यासारखी वाटायची.unnamed  

एखादे वर्षी औरंगाबादला जाण्याचा योग येई. औरंगाबादला मेळे आणि देखावे दोन्ही असत. आणि प्रचंड गर्दी असे. पण त्याकाळी खूप मोठ्या मोठ्या एकापेक्षा एक प्रचंड गणपतींची फॅशन निघाली नव्हती. आणि सगळे काही मर्यादा सांभाळून होत असल्याने त्या काळचे गणपती उत्सव म्हणजे एक आनंद पर्वणी होती हे निःसंशय.

नंतर हळू हळू व्हीडीओ कॅसेटचा जमाना सुरू झाला, आणि गणेश मंडळें 16 एमएम चा पडदा आणून त्यावर पिक्चर ची कॅसेट लावण्यात धन्यता मानू लागली.

आजची परिस्थिती-गेले ते दिवस!

आणखी काही वर्षांनी गणेश उत्सवाचा ताबा ‘समाजसेवक’ मंडळींनी घेतला. हळू हळू त्यात राजकारणी लोकांचा शिरकाव झाला, हे आपण डोळ्यासमोर पाहतोच आहोत. आजकाल गणेशोत्सव जवळ आलाय हे आता रस्त्यारस्त्यावर आणि कोपऱ्या कोपऱ्यावर उभारल्या जाणारे प्रचंड स्टेजेस आणि सेट अप,  तिथे व्यावसायिक कामगारांकडून चालू असणारी ठोकाठोकी, काही ठिकाणी मंडप उभारण्यासाठी चांगल्या डांबरी रस्त्यांवर केलेले मोठे मोठे खड्डे, डीजे चे प्रचंड मोठे बॉक्स इत्यादि गोष्टी दिसायला लागल्यावर समजते. आजकाल लोकांचा देवावरचा भक्तिभाव खूप वाढला आहे हे पाहून भरून येते!!lalbaug maxresdefault 3

असो. यावर्षी श्री गजाननाच्या कृपेने पाऊस खूप छान झाला आहे. धरणेंही सगळी भरली आहेत, आणि आनंदी आनंद आहे. त्यामुळे यावर्षीचा गणेश उत्सव खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा करूयात. या वर्षीच्या गणेश उत्सवानिमित्त सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा!

माधव भोपे 

 

पुण्यातील मानाचे पाच गणपति 5 Most important Ganpati of Pune

punyache manache ganpati

5 Most important Ganpati of Pune

पुण्यातील मानाचे पाच गणपति

पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. मुळात सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवातच आणि त्याचा पाया हा पुण्यामध्ये घातला गेलेला आहे, त्यामुळेच पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा निश्चितच इतरांपेक्षा वेगळा आहे. यामध्ये कालांतराने अनेक गणेश उत्सव मंडळे निर्माण होत गेली आणि आज सध्या हजारो मंडळे पुण्यामध्ये कार्यरत आहेत.

पण त्यापैकी काही निवडक, जुने, ऐतिहासिक आणि मानाचे असे पाच गणपती पुण्यात आजही आहेत. या मानाच्या गणपतींचे दर्शन सुद्धा एका विशिष्ट क्रमाने घ्यायचे असते

पुण्याच्या मानाच्या ५ गणपतींचे दर्शन कसे घेण्याचा क्रम खालीलप्रमाणे

१. दर्शनाची सुरुवात मानाचा पहिल्या गणपती कसबा गणपती पासून करावी.
२. त्यानंतर ४५० मीटर वर असलेल्या मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेशवरी चे दर्शन घ्यावे.
३. त्यानंतर २३० मीटर वर असलेल्या गुरुजी तालीम या मानाचा तिसरा गणपतीचे दर्शन घेता येईल.
४. इथून १५० मीटर वर असणाऱ्या तुळशीबाग गणपती या मानाचा चौथा गणपती चे दर्शन घ्यावे.
५. आणि सर्वात शेवटी ९०० मीटर वरील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपती चे दर्शन घ्यावे.
सर्व गणपतींचे दर्शन जास्तीत जास्त २.५ किलोमीटर मध्ये होईल.

पुण्याच्या 5 मानाच्या गणपतीची  माहिती

  1. कसबा गणपती – मानाचा पहिला गणपती  Kasaba Ganapati

shri-kasba-ganpati

मासाहेब जिजाबाई भोसले यांच्या घराजवळ राहणाऱ्या विनायक ठकार यांच्या घराजवळ गणेशाची मूर्ती सापडली. हे मंदिर शिवाजी महाराज आणि जिजाबाई भोसले यांनी १६३९ साली बांधले होते.

पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचे नेतृत्व श्री कसबा गणपती करतात. या मंडळाच्या मूर्तींचे विसर्जन झाल्यानंतरच इतर मंडळे त्यांचे विसर्जन करू शकतात. पुण्याच्या आयुक्तांसह महापौर यांच्या तर्फे आरती होते आणि नंतर पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात होते.

शहाजीराजेंनी १६३६ साली लाल महाल बांधला त्यावेळी जिजामातांनी या गणपतीची स्थापना केली. येथील मूर्ती स्वयंभू असून प्रारंभीच्या काळात ती तांदळा एवढी होती, आता सातत्याने शेंदूर लेपल्यामुळे ती सुमारे साडेतीन फुट उंचीची झाली आहे असे सांगितले जाते.

2.तांबडी जोगेशवरी – मानाचा दूसरा गणपती- Tambadi Jogeshwari

tambdi jogeshwari ganpatiतांबडी जोगेश्वरी हे दुर्गा देवीचे मंदिर आहे जिला पुणे शहराची ग्रामदेवता म्हणून ओळखले जाते. येथील वैशिष्ट्य म्हणजे, दरवर्षी गणेशोत्सवाच्या शेवटी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते आणि सलग वर्षभरात त्याची पुनर्स्थापना केली जाते.

हे मंदिर १५ व्या शतकात बांधले गेले असले तरी दुर्गादेवीची मूर्ती अजूनही शाबूत आहे. सन 2000 पर्यंत मंदिरातच गणेश मूर्तीची स्थापना केली जात होती. 2000 पासून मंदिरासमोर स्वतंत्र पेंडल लावून मूर्तीची स्थापना चांदीच्या घुमटात केली जाते.

इथल्या गणेश मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी या मूर्तीचे विसर्जन करण्यात येते आणि दरवर्षी मूर्तींची प्रतिष्ठापना करतात. या उत्सवाची सुरुवात १८९३ साली झाली झाली. बुधवार पेठेतील या गणेशोत्सवास श्री भाऊ बेंद्रे यांनी प्रारंभ केला. इथल्या पितळी देव्हाऱ्यात गणेश मूर्तीची स्थापना करतात, तसेच चार युगातील बाप्पांचे एकाच ठिकाणी इथे रूप पाहायला मिळतात

3.गुरुजी तालीम – मानाचा तिसरा गणपती  Guruji Talim Ganapati

guruji talim ganpatiगुरुजी तालीम हा पुण्यातील तिसरा मानाचा गणपती आहे. 1887 मध्ये भिकू शिंदे आणि उस्ताद नलबन या दोन हिंदू आणि मुस्लिम कुटुंबांनी प्रथम स्थापना केली. त्यामुळेच पुण्यातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून गुरुजी तालीम गणपतीचे उदाहरण दिले जाते.

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वी ६ वर्षे या मंडळाची स्थापना झाली होती; त्यांउळे प्लॅटिनम ज्युबिली साजरी करणारे ते पहिले मंडळ बनले.

4.तुळशीबाग गणपती – मानाचा चौथा गणपती  Tulshi baag Ganpati

tulshibag ganpati जगप्रसिद्ध तुळशीबागेतील गणपती हा पुण्यातील चौथा मानाचा गणपती आहे. याची स्थापना 1901 मध्ये झाली होती. 1975 पासून प्रथम ग्लास फायबर ची मूर्ती स्थापन करण्याचा मान या मंडळाला मिळाला आहे. हा शहराच्या मध्यभाग आणि सर्वात गजबजलेला भाग आहे. पुतळा 13 फूट उंच आहे आणि 80 किलोपेक्षा जास्त वजनाचे दागिने घालतात. कलाकार डी.एस.खटवकर अनेक वर्षांपासून मूर्तीची सजावट करत आहेत.

5.केसरीवाडा गणपती – मानाचा पाचवा गणपती  Kesariwada Ganpati

kesari vada ganpatiटिळकांच्या केसरी संस्थेचा केसरीवाडा गणपती हा पुण्यातील ५वा मानाचा गणपती आहे. १८९४ मध्ये स्थापन झाल्यापासून केसरीवाड्याचा गणेशोत्सव कुमठेकर रोडपासून दूर असलेल्या विंचूरकर वाड्यात आयोजित केला जायचा, जे त्यावेळचे टिळकांचे वडिलोपार्जित घर होते. त्यानंतर ते गायकवाड वाड्यात स्थलांतरित करण्यात आले, जो सध्या केसरीवाडा म्हणून ओळखला जातो.

इथे गणेशोत्सव काळात टिळकांची नियमित व्याख्याने होत असत. आजही  या गणपतीची मिरवणूक पालखीतून निघते.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

तर ते सगळं झालं ‘मानाचे ५ गणपती’ बद्दल, म्हणजेच सर्वात आदरणीय आणि आदरणीय गणेश मूर्तींबद्दल. या ५ व्यतिरिक्त, आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा उल्लेख करायला विसरू शकत नाही जो महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गणपती मंडळ आहे. बुधवार पेठेत असलेल्या या मंदिराला वर्षभर असंख्य भाविक भेट देतात परंतु गणेशोत्सवादरम्यान मंदिर आणि त्याची सजावट हे शहरातील मुख्य आकर्षणांपैकी एक आहे . भक्तांमध्ये महाराष्ट्रातील सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध राजकारणी यांचा समावेश आहे.

dagdusheth halwai ganpati

Map of 5 most important Ganpatis of Pune

Manache-Ganpati-Pune-Map updated on 27.8.2025

Hartalika vrat- Connection with nature हरतालिका व्रत- निसर्गाशी नाते

hariyali-teej-1

Hartalika vrat- Connection with nature

हरितालिकेचे व्रत- निसर्गाशी नाते

आपल्या देशातील सण, वार, व्रतें ही किती खुबीने निसर्गाशी आणि निसर्गचक्राशी जोडली गेलेली आहेत हे पाहून राहून राहून आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. मागे आपण चातुर्मासातील  एकूणच दिनचर्या कशी या ऋतूतील बदलांशी आपल्या शरीराला जुळवून घेण्याच्या दृष्टीने बनविण्यात आली आहे, याबद्दल लिहिले होते. तसेच चातुर्मासातील विविध व्रतांच्या निमित्ताने घरातील स्त्रियांना, लहान थोरांना सगळ्यांनाच या काळात निसर्गात मुबलकपणे उपलब्ध होणाऱ्या विविध वनस्पती, पानें, फुले, फळे इत्यादि यांची ओळख अनायासे होत असते. बाहेर जाऊन या वनस्पती गोळा करून आणणे, त्या निवडून व्यवस्थित करणे, इत्यादि कामांत एक तर त्या निमित्ताने ज्यांना कधी, शेतात इत्यादि जाण्याचे काम पडत नाही अशांना सुद्धा, बाहेरच्या मोकळ्या वातावरणात जाण्याचे काम पडते, आणि त्या वनस्पतींना हाताळण्याने, त्यांची पक्की ओळख होते, अनायासेच त्यांच्या गुणधर्मांची माहिती होऊ शकते. अर्थात आजकाल शहरांत या सर्व गोष्टी बाजारात आयत्या विकत मिळतात, त्यामुळे घरच्या सदस्यांचा बाहेर मोकळ्या हवेत जाण्याचा भाग जरी कमी झाला असला, तयारी त्या निमित्ताने त्या वनस्पतींची ओळख होते हेही काही कमी नाही.

आज स्त्रिया साजरे करीत असणारे हरतालिका व्रत हे एक असेच व्रत आहे. मला अजून एक गोष्ट आपल्या सगळ्या चाली रीतीं मध्ये अगदी ठळकपणे दिसते, जिचा आजकाल अत्यंत अभाव झाला आहे- ती म्हणजे या सण व्रतांच्या निमित्ताने एकत्र येण्याने लोकांना, घरातील स्त्रियांना आपल्या भावनांना वाट करून देण्याची मिळणारी संधी. हरतालिका व्रताची, पार्वती आणि शंकराची कहाणी सर्वांना माहिती आहे- ती आपण पुढे थोडक्यात बघूच.   

पण या व्रताची, पारंपरिक पद्धत ही खूप रंजक आहे. हरतालिकेला महादेवाच्या वाळूच्या पिंडीचे पूजन करतात. तर पूर्वी ही जी वाळू आणायची, त्यासाठी अशी पद्धत होती की गावातील स्त्रिया दोघी दोघी, चौघी चौघी, किंवा त्याहूनही जास्त अशा घोळक्याने, गावातील नदीच्या काठी जात. पावसाळा आता अर्ध्यापेक्षा जास्त होऊन गेलेला असे, त्यामुळे नदीचे पाणीही नितळ झालेले असे. मग दोघी दोघी स्त्रिया, नदीच्या पात्रात जाऊन, एकमेकींच्या हातात हात गुंफून, नदीच्या पात्रातून वाळू काढीत. त्यावेळी त्या एक गाणे म्हणत-

“खडक फोडू-मोती काढू- चला चला गौळणी, गौळणी!”

हे सर्व करतांना हास्य विनोद करीत करीत, निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचे टेंशन कुणाला राहणे शक्यच नसे.

असे पाच वेळा करून मग आपल्या हातांच्या ओंजळीत नदीतील वाळू काढीत. पाच वेळा केल्याने वाळूतील सर्व मोठे मोठे गोटे, काडी, कचरा वगैरे निघून जात असे आणि हातात राहिलेली स्वच्छ वाळू मग त्या सोबत आणलेल्या ताटलीत घेऊन घरी येत. नंतर त्या आणलेल्या वाळूची, छान सुबक पिंड तयार करीत. त्या पिंडीवर मग शंकर, पार्वती व पार्वतीच्या मांडीवर गणपती, एका बाजूला  पार्वतीच्या ५ सख्या आणि पिंडीच्या समोर नंदी दर्शविणारे छोटे छोटे वाळूचे गोळे ठेवायचे.

आणि मग त्या सर्वांची विधिवत पूजा करायची. ही पूजा बऱ्याच वेळा घरातील स्त्रिया आणि आजूबाजूच्या त्यांच्या शेजारणी, मैत्रिणी, या सर्वजणी सामूहिक रीतीने अत्यंत उत्साहाने करीत.  स्त्रियांसाठी हे  एकप्रकारे emotional tonic असे आणि वर्षभराची ऊर्जा या एकत्र येण्यातल्या आनंदातून त्या साठवून घेत.  

निसर्गाच्या सान्निध्याचा- हरतालिकेच्या महादेवासाठी वाळू आणणे हा एक भाग झाला, तर या पूजेसाठी लागणाऱ्या सोळा प्रकारच्या पत्र्या (पानें) आणणे आणि फुलें आणणे हा दुसरा भाग झाला. पूजेसाठी लागणाऱ्या सर्व पत्र्या घरातील व्यक्ति स्वतः जाऊन आणीत असल्याने वर लिहिल्याप्रमाणे अनायासेच ह्या सर्व वनस्पती हाताळल्या जात असत. महादेव पार्वतीच्या पूजेसाठी १६ प्रकारच्या पत्र्या वाहतात. या सोळा वनस्पती कोणत्या याबद्दल आपल्याला वेगवेगळी माहिती मिळते. साधारणपणे खालील वनस्पतींच्या पानांचा उपयोग केला जातो- एक लक्षात घेण्यासारखे आहे, की या सर्व वनस्पतींचे कुठले ना कुठले औषधी गुणधर्म आहेत. साध्या साध्या दुखण्यांवर कुठल्या वनस्पतीच्या पानाचा रस, तर कुठल्याच्या मुळांचा उपयोग, कुठल्या फुलांचा उपयोग, हा अनायासेच माहिती होत असे- अशा प्रकारे समाज, आरोग्याच्या बाबतीत स्वावलंबी होत असे. छोट्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज अजिबात नसे. तर हरतालिकेसाठी लागणाऱ्या १६ पत्र्या खालीलप्रमाणे-

हरतालिका पूजेसाठी लागणाऱ्या १६ पत्रींची नावे: 

  1. बेलपत्र (Bilva Patra)
  2. आघाडा (Aghada)
  3. मालती (Malati)
  4. दुर्वा (Durva/Durva Grass)
  5. चंपक (Champak)
  6. करवीर (Karvir/Oleander) म्हणजेच कण्हेर
  7. बद्री (Badri) म्हणजे बोर
  8. रुई (Rui/Calotropis) (रुईची फळे ही वाहतात)
  9. तुळस (Tulsi)
  10. मुनीपत्र (Munipatra) (म्हणजे ब्राह्मी- किंवा मंडूकपर्णी
  11. डाळिंब (Dalimb/Pomegranate)
  12. धोतरा (Dhatura)
  13. जाई (Jai/Jasmine)
  14. माका म्हणजेच भृंगराज (जे केसांसाठी वापरतात). (Maka)
  15. बकुळ (Bakul)
  16. अशोक (Ashok)

काही काही ठिकाणी यातील काही वनस्पतींच्या ऐवजी दुसऱ्या वनस्पतींची नांवे आढळतात. त्यामुळे असे सांगितले जाते की यातील मिळतील तितक्या वनस्पती घ्यायच्या, आणि महादेव पार्वतीची पूजा करतांना पार्वतीचे एक एक नांव घेऊन त्या वाहायच्या. तसेच फुलें ही वेगवेगळ्या प्रकारची, वाहायची, महादेव पार्वतीला दुधाचा नैवेद्य दाखवायचा. आरती करायची. हरतालिकेला स्त्रिया पूर्ण दिवस उपवास ठेवतात- हाही या ऋतूला अनुकूल असा एक detoxification चाच प्रकार आहे असे दिसून येते. आणि दुसऱ्या दिवशी, म्हणजे गणेश चतुर्थीला, सकाळी दहीभाताचा नैवेद्य दाखवून, हरतालिकेचे विसर्जन केल्यावर तो खाऊन हा उपवास सोडायचा. त्यासोबत गुळाचा कानोला, खीर, भिजवलेली हरभऱ्याची डाळ, काकडीच्या फोडी, किसलेले खोबरे आणि साखर यांची खिरापत यांचाही नैवेद्य दाखवतात. हे सर्व पदार्थ किती आरोग्यदायी, शक्तिदायी आणि पावसाळ्याच्या ऋतूला योग्य असणारे आहेत!

त्यानंतर येणारा गणपती उत्सव पण असाच निसर्गाशी नाळ असलेला होता. रोज गणपतीला लागणाऱ्या दूर्वा तोडून आणणे, त्या निवडणे या सर्व गोष्टी किती आनंददायी होत्या! आणि हो, आजकालसारखे प्लास्टर ऑफ पॅरिस चे गणपती नव्हते आणि वीस वीस पन्नास पन्नास फुटांचे अजस्त्र गणपती तर नव्हतेच नव्हते. गणपतीची मृण्मयी मूर्ती करण्याची पद्धत घरोघरी प्रचलित होती, आणि आपल्या गावातच मिळणारी माती आणून घरोघरी आपल्या कला कुसरीने गणपती बनवले जात. ती मूर्ती बनवत असतांनाच बनवणारा त्यात आपला जीव ओतत असे! ती खरोखर चैतन्यमयी मूर्ती होत असे.

हरतालिकेची प्रचलित असलेली कहाणी याप्रमाणे-

एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.

हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी ‍त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांने ही गोष्ट कबूल केली.

नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिये चा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो.

पुढे दुसर्‍या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझे वडील तिथं आले, त्यांनी तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यांनी तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेले . मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे.

ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दळिद्रं येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.

हरतालिकेच्या व्रताच्या समस्त महिला वर्गाला खूप खूप शुभेच्छा!

माधव भोपे 

Child psychology- मुलांचे मानसशास्त्र

family-in-train

मुलें म्हणजे मशीन नव्हेत!

Child psychology

सुप्रसिद्ध साहित्यिक आणि बालमानसतज्ज्ञ श्री राजीव तांबे यांचा एक लेख सकाळ मध्ये वाचण्यात आला. लेख आवडल्यामुळे आपल्या ब्लॉग च्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

प्रवासात वाचायला पुस्तक किंवा गप्पा मारायला लहान मूल असेल तर मजाच मजा. परवा असंच झालं. प्रवासात लहान मूल असणारे माझ्या समोरच बसले होते. त्यामुळे पुस्तक वाचूनसुद्धा जे समजणार नाही ते तेव्हा समजलं. माझ्या समोरच बसले होते आपल्या टिपटॉप कपड्यांची सतत काळजी घेणारे बाबा, आणि चार वर्षांच्या सचिनला मांडीवर खेळवणारी त्याची आई.

हे बाबा बहुधा कुठल्याशा संगणक कंपनीत प्रोग्रॅमर असावेत. कारण ते आपल्या मुलाशी प्रत्यक्ष न बोलता, त्याला शिकविण्याचा ‘प्रोग्रॅम’ करत असायचे. आई बिचारी आज्ञाधारक ‘माऊस’प्रमाणे त्यांचे प्रोग्रॅम ऐकत असे. कपडे खराब होतील, वेळ फुकट जाईल या भीतीपोटी आणि ‘इतक्या लहान मुलाशी, माझ्यासारखा हुशार माणूस काय बोलणार?’ बहुधा या विचाराने ते सचिनशी एकदाही बोलले नाहीत, की त्याला एकदाही जवळ घेतलं नाही.

आता आईने सचिनसाठी दाणे घेतले. आता सचिन दाणे खाणार इतक्यात बाबांनी त्याचा प्रोग्रॅम तयार केला. ते आईला म्हणाले, ‘‘त्याला म्हणावं वर तोंड करून खाऊ नकोस. उगाच दाणे तोंडात कोंबू नकोस. एकावेळी एकच दाणा खा. चांगला चावून चावून खा. न चावता दाणा गिळायचा नाही, नाहीतर तो घशात अडकेल.

खाऊन झाल्यावर चूळ भरायची नाहीतर दात किडतात. कळलंय?’’

आईने शांतपणे मान हलवली. आईने बाबांचा प्रोग्रॅम सचिनकडे ‘पास ऑन’ केला. आता बाबा बाजूला सरकून एका डोळ्यानं ‘आपला प्रोग्रॅम ॲप्‍लाय होतोय का?’ हे पाहत होते.

आता माझी उत्सुकता वाढली. सचिनच्या हातात दाण्याची पुडी होती. त्यामुळे या प्रसंगात अनेक शक्यता होत्या. ‘बाबा आज्ञावलीचा’ अर्थ सचिन कशाप्रकारे लावू शकतो याचे मी अनेक तर्क करू लागलो. पण सचिननं गुगलीच टाकला. सचिननं भरपूर दाणे आपल्या डाव्या हातात घेतले. पुडी आईच्या मांडीवर ठेवली.

family in train compartment

या सुमारास ‘आपल्या प्रोग्रॅमचे बारा वाजले’ हे कळल्यानं बाबांचं ब्लडप्रेशर वाढू लागलं होतं. ‘आता हा काय करणार?’ या कल्पनेनं आईही अस्वस्थ. उजव्या हातात एक दाणा घेत सचिन म्हणाला, ‘‘आई गं हा एक दाणा तुला आणि मग दोन दाणे मला. चल. आऽऽ कर. मी तुझ्या तोंडात हळूच एक दाणा टाकतो. मग तू मला दोन दाणे भरव. मग पुन्हा एक तुला आणि दोन मला. ओके?’’ बाबांचा ‘आदर्श प्रोग्रॅम’ टोटल फेल.

तुमच्या लक्षात येतंय का, मुलांना समजतं प्रेम, माया आणि आपलेपणाचा स्पर्श! विशेष म्हणजे या गोष्टींना ‘प्रोग्रॅम’ करता येत नाही. ठरवून प्रेम करता येत नाही व मोजूनमापून मायाही करता येत नाही. ते आतूनच यावं लागतं आणि मूल समजून घेण्याची तळमळ असेल तरच ते शक्य होतं. उसनं प्रेम लहान मुलांनाही कळतं.

बाबांचं म्हणणं काही चुकीचं नव्हतं; पण ज्या बोलण्यात प्रेमाचा ओलावा नाही, की मायेची ऊब नाही अशा कोरड्या बोलण्यानं मुलं नकळत दुखावली जातात. असे उसन्या प्रेमाचे फवारे मारणाऱ्यांकडे मुलं पद्धतशीरपणे दुर्लक्ष करतात. आणि याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुलांना त्यांच्याशी थेट बोललेलं आवडतं.

त्यामुळे ती आपली प्रतिक्रिया अधिक स्पष्टपणे व्यक्त करू शकतात. कोणाच्यातरी माध्यमातून बोललेलं त्यांना अजिबात आवडत नाही. अशावेळी मुलं काही प्रतिक्रियाच व्यक्त करत नाहीत; पण अशा माणसांबद्दल त्यांच्या मनात कायम राग धुमसत राहातो.

‘जे पालक मुलांचं बोलणं ऐकायला उत्सुक असतात अशाच भाग्यवान पालकांच्या मांडीवर मुलं हक्‍काने बसतात’ ही चिनी तुम्ही ऐकलीच असेल.