https://goodworld.in A website by Madhav Bhope

Mind blowing experiences of a Banker-12 एका बँकरचे थरारक अनुभव-12

ombudsman

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

ombudsman

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 12)

फॅक्स मेसेज पाठोपाठ लगेच औरंगाबादच्या क्षेत्रीय कार्यालयातून फोन आला. स्वतः रिजनल मॅनेजर बोलत होते..

“उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत तुम्ही नरिमन पॉईंट, मुंबई येथील बँकेच्या झोनल ऑफिस मध्ये पोहोचा. तिथे बँकेचे एक वरिष्ठ अधिकारी तुम्हाला मदत व मार्गदर्शन करण्यासाठी हजर असतील. तुम्हाला रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग लोकपाल कार्यालयातही तेच घेऊन जातील.”

मी लक्ष देऊन ऐकत होतो. RM साहेब पुढे म्हणाले..

“या प्रकरणाची इत्यंभूत माहिती केवळ तुम्हालाच असल्याने बँकेतर्फे ही केस तुम्हालाच प्लीड करायची आहे. लक्षात ठेवा, हे बँकिंग लोकपाल बँकांच्या कार्यपद्धती व नियमावली बद्दल सखोल ज्ञान असणाऱ्या उच्चपदस्थ व अनुभवी व्यक्ती असतात. त्यांच्याशी बोलतांना सावधगिरी बाळगा व अतिशय आदराने आणि मुद्देसूद तेवढंच बोला.”

“आणि.. लक्षात ठेवा, 20 लाख रुपयांपर्यंतच्या प्रकरणांत ग्राहकाला त्वरित नुकसान भरपाई देण्याचे ते संबंधित बँकेला आदेश देऊ शकतात. तसेच विलंब व मानसिक त्रासापोटी एक लाख रुपयांचा अतिरिक्त दंडही ते बँकेला करू शकतात. तेंव्हा त्यांच्यापुढे अत्यंत नम्रपणे, अदबीने व सांभाळून सादर व्हा.. आणि केसचा निकाल बँकेविरुद्ध लागू नये यासाठी योग्य ते आटोकाट प्रयत्न करा.. ऑल द बेस्ट !!”

RM साहेबांचा फोन आल्यानंतर भराभर टेबलावरील कामे आवरेपर्यंत संध्याकाळचे सहा वाजले. मग डेप्यु. मॅनेजरला केबिनमध्ये बोलावून आज मुंबईला जात असल्याची त्यांना कल्पना दिली. केस संबंधी सर्व कागदपत्रे, वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे, सीसीटीव्ही फुटेज इत्यादी सामग्री घाईघाईत बॅगमध्ये भरली. शांत चित्ताने संपूर्ण घटनाक्रम व महत्वाचे मुद्दे थोडक्यात लिहून काढले. औरंगाबादला घरी जाण्यात उशीर झाला असता म्हणून रात्रीच्या बसने वैजापूरहूनच मुंबईला जाण्याचे ठरवले. रुमवरील एक बऱ्यापैकी ड्रेस बॅगेत टाकला आणि बस स्टँडवर निघालो.

छ. शिवाजी महाराज टर्मिनस जवळ उतरलो तेंव्हा पहाटेचे पाच वाजले होते. जवळच्याच एका हॉटेलात जाऊन सिंगल रूम बुक केली. माझ्या रूमच्या खिडकीतून व्हिक्टोरिया टर्मिनस रेल्वे स्टेशनची सुंदर देखणी इमारत दिसत होती. तिच्याकडे पहात चहाचे घोट घेता घेता.. “आजच्या केसचा निकाल काय लागणार.. ?” याबद्दलचेच विचार मनात घोळत होते.

नरिमन पॉईंट वरील बँकेच्या झोनल ऑफिस मध्ये पोहोचलो तेंव्हा किंचित स्थूल, ठेंगणे आणि जाड भिंगाचा चष्मा असलेले, दुभाषी नावाचे एक सिनियर चीफ मॅनेजर तिथे माझी वाटच पहात थांबले होते. माझं स्वागत केल्यावर “चला.. आपण आधी RBI च्या ऑफिसजवळ पोहोचू आणि मग तिथेच नाश्ता करू” असं ते म्हणाले. टॅक्सीतून आम्ही भायखळ्याच्या रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाजवळ पोहोचलो. तिथे एका रेस्टॉरंट मध्ये नाश्ता करता करता दुभाषी साहेब म्हणाले.. “मी तुमच्या केसचा नीट अभ्यास केला आहे. सर्व मुद्दे आपल्या विरुद्ध आहेत. ही केस आपण जिंकण्याची एक टक्काही शक्यता नाही. माझ्या अनुभवावरून सांगतो, जास्तीतजास्त पंधरा मिनिटांत लोकपाल Adverse Verdict देतील..”ro official

हे ऐकतांच माझा चेहरा एकदम पडला. बँकेने या गृहस्थांना मला मदत करण्यासाठी पाठविलं आहे की माझं धैर्य खच्ची करून मला नाउमेद करण्यासाठी ? अशी शंकाही माझ्या मनात तरळून गेली.

माझ्या चेहऱ्यावरील खिन्न भाव दुभाषी साहेबांच्या धूर्त डोळ्यांनी अचूक टिपले. काटे चमच्याचा सफाईदार उपयोग करून समोरच्या प्लेटमधील मसाला डोशाचा तुकडा तोंडात टाकीत अत्यंत निर्विकारपणे ते म्हणाले..

“मी खरं तेच सांगतोय.. पण तुम्ही असे निराश होऊ नका. या लोकायुक्त कार्यालयातील एकही केस आपण आजपर्यंत जिंकलेलो नाही. अहो, हे लोकपाल खूपच स्ट्रिक्ट असतात. राष्ट्रीयकृत बँकांचे चीफ जनरल मॅनेजर किंवा जनरल मॅनेजर अशा उच्च पदावरील या व्यक्ती असतात. ‘बाप दाखव नाही तर श्राद्ध कर’ असा ह्यांचा सडेतोड खाक्या असतो. त्यामुळे ते तडकाफडकी निर्णय देतात आणि अर्थातच तो निर्णय बहुतांशी बँकेच्या विरुद्धच जातो. असो..! तुम्ही याबाबत जास्त विचार करू नका. ही केस हरलात तरी तुम्हाला कोणीही काहीही म्हणणार नाही.”

मी घड्याळात पाहिलं.. अकरा वाजायला आले होते. घाईघाईत खाणं संपवून नॅपकिनने तोंड पुशीत दुभाषी साहेब म्हणाले..

“चला चला.. ! It’s time now !आयुक्तांपुढे वेळेत हजर व्हायला हवं. तुम्ही या माझ्या मागे भराभर..”

तुरु तुरु चालत दुभाषी साहेब रिझर्व्ह बँकेच्या प्रशासकीय कार्यालयाच्या लिफ्ट जवळ पोहोचले. लोकायुक्त कार्यालय इमारतीच्या चौथ्या मजल्यावर होते. तेथील रिसेप्शनिस्टने आम्ही हजर झाल्याबद्दल नोंद करून तेथील रजिस्टरवर आमच्या सह्या घेतल्या व थोड्याच वेळात तुम्हाला आत बोलावले जाईल असे सांगितले. दुभाषी साहेब तेथील सोफ्यावर बसून वर्तमानपत्रे चाळू लागले. जवळच एका टेबलवर तेथील ऑफिस सुपरिन्टेंडेंट मॅडम बसल्या होत्या. माझ्याकडे पाहून त्यांनी जुनी ओळख असल्यागत सुहास्य केले, त्यामुळे मी सरळ त्याच्या टेबलासमोरील खुर्चीवरच जाऊन बसलो.

त्या मॅडमचं नाव स्नेहलता होतं. त्यांनी सहज माझी चौकशी केली.. कुठून आलात ? कसली केस आहे ? वगैरे.. वगैरे. मीही त्यांना थोडक्यात केसची माहिती दिली. तसंच लिहून आणलेला घटनाक्रम व वर्तमानपत्रातील कात्रणेही त्यांना दाखविली. सुखदेवचा काळाकुट्ट पूर्वेतिहास, रुपेशने दिलेला घटनेतील सहभागाचा कबुलीजबाब, पोलीसांचा पक्षपातीपणा व तपासातील जाणूनबुजून केलेली दिरंगाई याबद्दलही त्यांना सांगितलं. माझी कहाणी ऐकून त्या हळहळल्या. त्यांच्या डोळ्यांत माझ्याबद्दल सहानुभूती दाटून आली.

“अरेरे..! खरं म्हणजे सध्या ज्या लोकपाल मॅडम आहेत ना, त्या माझ्या अत्यंत जवळच्या मैत्रीण सुद्धा आहेत. एरव्ही त्यांना तुमची केस समजावून तुम्हाला मदत करणं मला नक्कीच आवडलं असतं. पण.. काय करू ? दुर्दैवाने तुमची केस चुकीच्या वेळी इथे आली आहे..!”

“म्हणजे ? मी समजलो नाही, चुकीची वेळ म्हणजे ? आणि.. लोकपाल ह्या महिला असून तुमची मैत्रीण आहेत ?”

जरासं असमंजस होऊनच मी विचारलं..

“होय.. सध्या असलेल्या Ombundsman मॅडम.. लोपामुद्रा सेनगुप्ता त्यांचं नाव.. ती माझी अगदी जवळची मैत्रीण आहे.. आम्ही इथे मुंबईतच एकत्रच शिकलो आहोत.. कार्यकाल संपल्यामुळे आज त्यांचा ऑफिसमधील शेवटचा दिवस आहे. त्यामुळेच तुमची ही एकमेव केस आज त्यांनी हिअरिंग साठी ठेवली आहे. उद्या नंतर कदाचित एखाद्या राष्ट्रीयकृत बँकेची चेअर(वू)मन किंवा RBI च्या डेप्यु. गव्हर्नर म्हणूनही त्यांची नेमणूक होऊ शकते.”

आमचं असं बोलणं सुरू असतांनाच सुखदेव बोडखेने आपली पत्नी, मुलगा व एक दोन वकिलांना घेऊन ऑफिसात प्रवेश केला. मला पाहतांच त्याच्या चेहऱ्यावर आसुरी आनंद प्रकटला. मोठ्याने ओरडून तो म्हणाला..

“अरे वा ! आले का साहेब रडत, बोंबलत, फरफटत.. वैजापूर टू मुंबई..! पाहिला नं, कसा आहे माझा इंगा..?”

मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. आमच्या नावाचा पुकारा झाला आणि आम्ही सगळे लोकपालांच्या न्यायकक्षात गेलो.

अंदाजे चाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान वय, मानेपर्यंतच केस असलेला आकर्षक प्लश बॉब कट, स्लीव्हलेस ब्लाऊझ, टपोरे सुंदर पाणीदार डोळे, धारदार नाक, गोरापान रंग, उंच कमनीय सडपातळ बांधा, चापून चोपून नेसलेली साधी पण सुंदरशी साडी अशा मोहक व्यक्तिमत्वाच्या लोपामुद्रा मॅडमनी सुहास्य वदनाने आमचं स्वागत केलं. आमच्या केसचा मॅडमनी सखोल अभ्यास केलेला असावा. रत्नमालाबाईंकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या..

banking ombudsman

“तुम्ही.. तक्रारदार मिसेस बोडखे ना ? तुमचं म्हणणं थोडक्यात सांगा..”

लोकपाल मॅडमनी एवढं म्हणायचाच अवकाश की दोन्ही हात जोडून आणि चेहऱ्यावर अत्यंत दीन, असहाय भाव आणीत सुखदेव उभा राहिला आणि म्हणाला..

“तिला काय विचारता मॅडम ? दुःखाने तिच्या तोंडून एक शब्दही बाहेर पडणार नाही. आमची अशी काय चूक झाली की बँकेने एका रात्रीत आमच्या खात्यातून एवढी मोठी रक्कम गायब करून आम्हाला कफल्लक केलं.. बँक म्हणते की कोणीतरी आम्हाला दिलेल्या चेकबुक मधील चेकवर खोटी सही करून पैसे काढले आहेत. पण माझं चेकबुक तर माझ्याजवळच आहे. दुसरं जे चेकबुक आम्हाला दिलं होतं असं बँक म्हणते, त्या चेकबुक इश्यू रजिस्टरवर आम्हा कुणाचीही सही नाही. तसंच आमचा चेकबुक मागणी अर्ज देखील बँक दाखवू शकत नाही. मग बॅंकेच्या या निष्काळजीपणाची आम्हाला का सजा देता ?

मॅडम, मी एका स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असून सरकारी खात्यातील एक जबाबदार कर्मचारी आहे. हे पैसे शेती घेण्यासाठी बायकोचे दागिने मोडून मी बँकेत जमा केले होते. मला पेन्शन नाही, त्यामुळे रिटायरमेंट नंतर शेती करून उदरनिर्वाह करण्याचा माझा विचार आहे. या प्रकरणी आधीच खूप उशीर झालेला आहे. बँकेची चौकशी व तपास जेंव्हा पूर्ण व्हायचा तेंव्हा होवो. पण आम्हाला मात्र आमचे कष्टाचे पैसे ताबडतोब व्याजासहित आपण मिळवून द्यावेत हीच हात जोडून तुम्हाला कळकळीची विनंती..!”

हुंदके देत, दुःखी, केविलवाण्या, बापुड्या अभिनयाची पराकाष्ठा करीत अवघ्या शरीराची थरथरती हालचाल करीत डोळ्यातील अश्रू पुसत सुखदेव खाली बसला. त्याच्या काळीज पिळवटून टाकणाऱ्या.. तद्दन नाटकी पण तरीही दमदार व भावपूर्ण वक्तृत्वाचा लोपामुद्रा मॅडमवर अपेक्षित परिणाम झालेला दिसला. माझ्याकडे रागाने पहात त्या कडाडल्या..

“तुम्हीच रिप्रेझेंट करताय ना बँकेला ? काही वेगळं सांगायचंय का तुम्हाला ? तक्रारदाराने आत्ता जे सांगितलं ते खोटं आहे असं तुम्ही सिद्ध करू शकता काय ? तसा काही नवीन, कागदोपत्री पुरावा आहे का तुमच्याकडे ? आणला असेल सोबत तर वेळ न घालवता ताबडतोब सादर करा..!”

“पण.. मॅडम, फोरेन्सिक डिपार्टमेंटचा अहवाल अजून प्राप्त व्हायचा आहे. त्यामुळे चेकवरील सही खरी (जेन्यूईन) आहे की बनावट (फोर्ज) आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही..”

मी कसंबसं चाचरतच म्हणालो..

“अहो, पण जर तो चेकच तक्रारदाराला दिलेल्या चेकबुक मधील नाही तर मग सहीच्या खरे खोटेपणाचा प्रश्नच कुठे येतो ? आणि.. आणखी किती वेळ घ्याल तुम्ही सहीचा खरेपणा तपासण्यासाठी ? तुम्हाला काही माणुसकी वगैरे आहे की नाही ? हे जे समोर बसले आहेत, ते तुमचेच कस्टमर आहेत ना ? त्यांची अवस्था बघा..! तुम्हाला त्यांची काहीच काळजी नाही कां ?”

मॅडमच्या त्या उग्रावतारापुढे गप्प बसणंच मी शहाणपणाचं आणि इष्ट समजलं. उद्वेगपूर्ण निराशेनं मान हलवीत माझ्याकडे पहात लोपामुद्रा मॅडम म्हणाल्या..

“ते काही नाही.. Enough is enough..! बँकेने तक्रारदाराला सात दिवसांच्या आत चेकची संपूर्ण रक्कम यथायोग्य व्याजासहित परत करावी असा मी आदेश देते. या आदेशाचं तंतोतंत पालन न झाल्यास संबंधित बँकेविरुद्ध या कार्यालयातर्फे उचित ती दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल..”

लोकपाल मॅडमचा “फैसला” ऐकताच माझ्या शेजारी बसलेले दुभाषी साहेब आपल्या जागेवरून उठले आणि बाहेर जाण्यापूर्वी हलक्या आवाजात मला म्हणाले..

“अगदी अपेक्षितच निकाल होता. मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं.. पण एक बरं झालं, उगीच ताटकळत न ठेवता लवकर निकाल दिला मॅडमनी.. आता थोड्याच वेळात मॅडम निकालाची एक प्रत तक्रारदाराला व दुसरी बँकेला.. म्हणजे तुम्हाला देतील. तुम्ही ती निकालाची प्रत तुमच्या रिजनल ऑफिसला व झोनल ऑफिसला पाठवून द्या. मीही आमच्या कार्यालया मार्फत हेड ऑफिसला निकालाची माहिती देतो. येतो मी..”

असं म्हणून दुभाषी साहेब त्या लोकपाल कक्षाच्या दारापर्यंत गेले आणि मग काहीतरी आठवल्या सारखं करून मागे फिरून माझ्याजवळ येत म्हणाले..

“मी आता परत ऑफिसात न जाता माझ्या घरी जातोय. तेवढाच फॅमिली बरोबर वेळ घालवता येईल. आता थेट उद्याच ऑफिसला जाईन. संध्याकाळी उशिरापर्यंत लोकपाल कार्यालयातच होतो, असं सांगणार आहे DGM साहेबांना.. आमच्या ऑफिसातून कुणाचा फोन आला तर तुम्हीही तसंच सांगा.. आणि हो, निकाल विरुद्ध केला म्हणून मूड खराब करून घेऊ नका. एवीतेवी इथपर्यंत आलाच आहात तर थोडीशी मुंबई फिरून घ्या. बा ssss य..!”

माझ्या खांद्यावर हलकंसं थोपटून हात हलवीत निरोप घेत दुभाषी साहेब निघून गेले. मी घड्याळात पाहिलं.. आता कुठे फक्त साडेबारा वाजले होते. सेनगुप्ता मॅडम त्यांच्या पी. ए. ला निकालाच्या आदेश व अटींबाबत डिक्टेशन देत होत्या आणि त्यानुसार तो पीए भराभर टायपिंग करत होता. डिक्टेशन संपताच टाईप केलेले कागद सहीसाठी त्याने मॅडम समोर ठेवले व त्यांनी सही करतांच ते कागद दोन लिफाफ्यात टाकून माझ्या व सुखदेवच्या हातात दिले.

सुखदेवने लिफाफा उघडून आदेशाची प्रत वाचली. त्यातील “व्याजासहित चेकची संपूर्ण रक्कम सात दिवसांच्या आत द्यावी..” हे शब्द वाचून आनंद व अतीव समाधानाने त्याने डोळे मिटून घेतले. तिथूनच अदबपूर्ण कृतज्ञतेने मान झुकवून, कमरेत वाकून त्याने मॅडमना नमस्कार केला आणि म्हणाला..

“तुमचे खूप खूप आभार, मॅडम ! हा निकाल देऊन एका गरीब असहाय्य कुटुंबाला न्याय मिळवून दिलात तुम्ही.. तुमची सदैव प्रगती होवो, तुमचं कल्याण होवो अशाच मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद देतो मॅडम तुम्हाला माझ्या कुटुंबातर्फे..”

लोकपाल मॅडम डायसच्या मागील दाराने त्यांच्या चेंबर मध्ये निघून गेल्यावर माझ्याजवळ येऊन माझ्याकडे कीव मिश्रित दयेच्या भावाने पहात सुखदेव म्हणाला..

“अरेरे.. साहेब..! अहो, हे काय झालं..? तुमची तर आत्ताच हवा गुल झाली. मग उद्या जेंव्हा मी वैजापुरात विजयी मिरवणूक काढून बँकेसमोर पब्लिक जमवून धांगडधिंगा करत तुमच्याविरुद्ध घोषणा देईन तेंव्हा तुमची काय हालत होईल ? आणि.. उद्याच्या पेपर मधील तुमच्या बदनामीच्या ठळक अक्षरातील बातम्या वाचून तर तुम्ही बहुदा आत्महत्याच करून घ्याल.. खूप मजा येणार आहे आता..! उद्या वैजापुरात भेटूच.. !!”sukhdev bodkhe

निकालाचा लिफाफा उंचावून जणू नाचतच आपल्या लवाजम्यासह सुखदेव निघून गेला. खिन्न मनानं जड पावलांनी मी रिसेप्शन रूम मध्ये आलो. ऑफिस सुपरिन्टेंडेंट स्नेहलता मॅडमनी ईशाऱ्यानेच मला जवळ बोलावलं.

(क्रमश:)

 

kotnisश्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १० भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 

Mind blowing experiences of a Banker-11 एका बँकरचे थरारक अनुभव-11

ombudsman

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

यापूर्वीचे कथानक-

सोमवारचा दिवस उजाडला.. सकाळ पासूनच आपल्यासोबत आज काहीतरी आकस्मिक, अनुचित व भयंकर अशुभ असं घडणार आहे अशी अंतर्मनात अनामिक हुरहूर लागून राहिली होती. दहा वाजता बँकेत पोहोचून केबिनमध्ये प्रवेश करतो न करतो तोच माझ्या मागोमाग चहावाला राजू घाईघाईत आत शिरला. आज नेहमी सारखी त्याच्या हातात चहाची किटली सुद्धा नव्हती. चेहऱ्यावर भीतीचे भाव असलेला आणि बोलताना थरथर कापणारा राजू आपले डोळे मोठ्याने विस्फारून सांगू लागला..
 
“साहेब घात झाला.. तुम्हाला फसविण्यासाठी पोलिसांनी भयंकर कट आखला आहे. रुपेश आत्ता पोलीस स्टेशनमध्ये बसला आहे, आणि पोलिसांनी पढविल्याप्रमाणे नवीन, सुधारित कबुलीजबाब देतो आहे.
“मॅनेजर साहेब व अन्य स्टाफच्या सांगण्या वरूनच मी या गुन्ह्यात सामील झालो होतो व या फसवणुकीचा संपूर्ण प्लॅन मॅनेजर साहेब व स्टाफ यांनीच तयार केला होता..”
असा त्याचा सुधारित कबुलीजबाब आहे..”

बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 11)

राजू चहावाल्याने आणलेली ती भयंकर बातमी माझ्यासाठी खरं तर एखाद्या बॉम्बगोळ्याच्या स्फोटा सारखीच सुन्न करून टाकणारी होती. परंतु हे प्रकरण सुरू झाल्यापासून एकामागून एक एवढी संकटे अनपेक्षितपणे येऊन आमच्यावर कोसळत होती की आता त्या संकटांची मनाला जणू सवयच झाली होती. काळीज घट्ट झालं होतं.. रोज दिवस उजाडला की आज कोणत्या नवीन आपत्तीचं ताट आपल्यापुढे वाढून ठेवलं आहे याचीच आम्ही वाट पहात असू..

या नेहमीच वाईट बातमी आणणाऱ्या राजूचाही अलीकडे मला रागच यायला लागला होता. शेवटी काही झालं तरी हा देखील एकप्रकारे पोलिसांचा वसुली एजंटच. कशावरून तो हेतुपुरस्सर आणि पोलिसांच्या सांगण्यावरूनच अशा घाबरवून टाकणाऱ्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवित नसेल ? तसंही एका क्षुल्लक चहाविक्या माणसाला.., भलेही तो कितीही हितचिंतक असला तरी, सतत इतकं महत्व देणं बुद्धिसंगत नव्हतंच. मनाशी काहीतरी निश्चय करून राजूला म्हणालो..

“हे बघ, आतापर्यंत या प्रकरणात तू आम्हाला वेळोवेळी जी मदत केलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार.. पण.. ! यापुढे त्या पोलीस स्टेशन मधील कोणतीही बातमी.. मग आमच्या दृष्टीने ती कितीही महत्वाची असो, तू आम्हाला सांगायची नाहीस. पोलीस काहीही करू देत, तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही कोणतीही चूक, कोणताही अपराध केलेला नाही. उलट पोलिसच त्यांच्या कर्तव्यात कसूर करीत आहेत. गुन्हेगारांचा शोध लावून अपराध्यांना शासन करणं हेच खरं तर त्यांचं मुख्य काम. पण ते करायचं सोडून ते आमच्या सारख्या निरपराधांना निरनिराळ्या प्रकारे त्रास देत आहेत.

जा..! जाऊन सांग त्यांना की आम्ही त्यांना अजिबात भीत नाही. आणि..! यापुढे आम्हाला त्रास देण्याचा पोलिसांनी जराही प्रयत्न केला तर आम्ही थेट पोलीस कमिशनर पर्यंत हे प्रकरण नेऊ.”

माझा तो करारी बाणा पाहून राजू गडबडूनच गेला. दोन्ही कानांना हात लावीत तो म्हणाला..sanju chaywala

“अहो, साहेब..! तुम्ही तर नाराज झालात.. तुम्हाला वाटतंय तसं पोलिसांनी मला इथे पाठवलं नाही. तिथे प्रत्यक्ष डोळ्यांनी जे पाहिलं, ऐकलं तेच सांगून तुम्हाला सावध केलं इतकंच. याउप्पर तुमची मर्जी ! तुम्ही तुमच्या मनाला पटेल ते करा.. येतो मी..!”

एवढं बोलून राजू  परत जाण्यासाठी वळला तेंव्हा त्याला मी म्हणालो..

“थांब ! आणखी एक लक्षात ठेव.. !! बाहेर हॉल मध्ये कोणत्याही स्टाफला किंवा अगदी कस्टमरला देखील तू यापुढे या प्रकरणाशी संबंधित कोणतीही बातमी पुरवायची नाहीस. जर मला असं आढळून आलं तर बँकेबाहेरील तुझी चहाची टपरी मी तात्काळ उखडून फेकून देईन..”

माझे शब्द ऐकून राजूने अविश्वासाने मागे वळून पाहिलं.. त्याला काहीतरी बोलायचं होतं, पण माझ्या चेहऱ्यावरील क्रुद्ध भाव पाहून खाली मान घालून निमूटपणे तो निघून गेला.

मी त्या त्रस्त, विमनस्क पण तरीही ठाम निश्चयी मूड मध्ये असतानाच माझा मोबाईल खणाणला. पलीकडून ॲडव्होकेट जोगळेकर बोलत होते. “फक्त प्रत्येकी पन्नास हजार रुपये आगाऊ जमा केल्यास चार्जशीट मधून तुम्हा साऱ्यांची नावे एक एक करून वगळून देतो..” असं ते म्हणत होते. बहुधा रश्मीनेच त्यांना आम्हाला तसा फोन करण्याची गळ घातली असावी. मला सर्वांच्याच या लुटारू वृत्तीचा मनस्वी उबग आला होता. त्या तिरिमिरीतच मी वकील साहेबांना म्हणालो..

“चार्जशीट मधून नाव गाळण्यासाठी तुम्हाला प्रत्येकी पन्नास हजार रुपये देण्यापेक्षा त्या सुखदेवच्या तोंडावर जर दोन लाख रुपये फेकले तर तो आमच्या विरुद्धची तक्रारच मागे घेईल आणि संपूर्ण चार्जशीटच रद्द होईल. In fact, आम्ही दोन लाख रूपये न दिल्यामुळेच त्याने आम्हाला या बनावट खटल्यात गोवलं आहे. तेंव्हा आता सुखदेवला त्याचं काम करू देत, पोलिसांना पोलिसांचं काम करू देत आणि तुम्हीही तुमचं अटकपूर्व जामीन मिळवून देण्यापुरतंच काम करा. चालू दे खटला जितकी वर्षं चालायचा तो..

तसंही हस्ताक्षर तपासणी अहवालात जर चेक वरील सही बनावट असल्याचं आढळून आलं तर नियमानुसार सुखदेवला त्याच्या खात्यातून त्या चेकद्वारे काढली गेलेली संपूर्ण रक्कम व्याजासहित परत करावी लागणारच आहे. आणि त्यानंतर केस आपोआपच संपुष्टात येईल. त्यामुळे सॉरी ! तुमच्या या ऑफर मध्ये आम्हाला अजिबात इंटरेस्ट नाही.. “

एवढं बोलून मी फोन कट केला.

अशाप्रकारे कोर्ट केसचं, सुखदेवचं, पोलिसांचं, रश्मीचं, वकील साहेबांचं असं सगळं टेन्शन एका झटक्यात झुगारून दूर फेकून दिल्यामुळे मला आता एकदम मोकळं मोकळं वाटत होतं.relaxed man

त्यानंतरचे दोन दिवस खूप शांततेत गेले. या काळात सुखदेव, संजू किंवा पोलीस यापैकी कुणीही बँकेकडे फिरकलं सुद्धा नाही. संजूने तर त्याचं हॉटेलही बंदच ठेवलं होतं. मध्यंतरीच्या काळात बँकेच्या दैनंदिन कामाकडे खूपच दुर्लक्ष झालं होतं. त्यामुळे महत्वाची पेंडिंग राहिलेली कामे उरकण्यात मी गुंगून गेलो.

दरम्यान रविशंकर आणि बेबी सुमित्रा ह्या दोघांनाही औरंगाबादच्या जिल्हा न्यायालयातून रीतसर अटकपूर्व जामीन मिळाला. अर्थात त्याबद्दल आता फारसं कौतुक, नावीन्य, अप्रूप किंवा आनंद उरला नव्हता. निर्बुद्ध आणि संवेदनाहीन पोलिसांच्या हडेलहप्पी वर्तणुकीपासून बचाव करण्याची सावधगिरीची एक कायदेशीर प्रक्रिया संपली होती इतकंच. संध्याकाळी रहीमचाचा, रविशंकर, सैनी आणि बेबी हे चौघेही मला भेटण्यासाठी केबिन मध्ये आले तेंव्हा ही जामीन मिळाल्याची बातमी सांगण्यासाठीच ते आले असावेत असंच मला वाटलं.

“सर, हम सब आपसे एक रिक्वेस्ट करने आए है..”

खाली मान घालून अतिशय नम्रपणे रहीमचाचांनी बोलायला सुरुवात केली.

“बात ये है कि हमे कहींसे मालूम पड़ा के आपने रश्मी मॅडम की ऑफर स्वीकार कर ली है और जल्द ही आप का नाम पुलिस की चार्जशीट से हटाया जाएगा..”

“किसने बताया आपको ? ये सरासर झूठ है…” मी गडबडून उत्तरलो. पण माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून रहीम चाचांनी आपलं बोलणं तसंच सुरू ठेवलं.

“सर, हम जानते है कि इस पूरे मामले में आपका दूर दूर तक कोई ताल्लुक नही है और आपके खिलाफ कोई भी गुनाह पुलिस या फिर्यादी के वकील साबित नही कर सकते। लेकिन हमारे हालात आपसे बिलकुल विपरीत है। सभी सबूत हमारे खिलाफ है। अगर सावधानी और होशियारी से काम न लिया गया तो कोर्ट हमे दोषी करार दे सकता है। सिर्फ और सिर्फ आप के भरोसे ही हम ये केस लड़ने की हिम्मत जुटा पा रहे है। अगर आपनेही खुद को इस मामले से अलग कर लिया तो फिर हम तो पूरी तरह बर्बाद हो जाएंगे..”

बोलता बोलता रहीम चाचांचे डोळे भरून आले.

“हे पहा, अशी कोणतीही शंका तुम्ही आपल्या मनात आणू नका. ही केस आपण सगळे मिळून एकत्रच लढणार आहोत. कुणाच्याही दबावाला बळी न पडता आपल्याला या खोट्या केस मधून कोर्टाद्वारे निर्दोष मुक्तता करून घ्यायची आहे..”

मी त्या चौघांनाही आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्या चेहऱ्यावरील भय अजूनही तसेच दिसत होते. थरथरत्या आवाजात रहीम चाचा म्हणाले..

“सर, ये बेचारा रविशंकर.. दूर बिहार से आया है.. अभी अभी प्रमोशन मिला और इस संकट में फंस गया.. इसकी पत्नी और माँ, दोनों चिंता के मारे बेहाल है.. ये सैनी.. इसके बिबीबच्चे दिल्ली में रहते है और मिलने के लिए यहां आना चाहते है, लेकिन इस केस के कारण इसने उन्हें रोक रखा है.. सुमित्रा बेबी तो ये नौकरीही छोड़ने का मन बना चुकी है.. मेरे भी नौकरी के सिर्फ दो साल ही बचे है.. मेरा क्या होगा ? मुझे पेन्शन मिलेगा के नहीं ? ये चिंता मुझे रात दिन सताती है.. मै हाथ जोड़कर आपसे बिनती करता हूँ, प्लीज प्लीज.. आप खुद को इस केस से अलग मत कीजिए..”

आसवांनी डबडबलेल्या डोळ्यांनी हाथ जोडून उभे असलेल्या माझ्या त्या चारही सहकारी कर्मचाऱ्यांना पाहून मला गलबलून आलं. खुर्चीवरून उठून मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांना खांद्यावर थोपटलं आणि म्हणालो..

“तुम्ही असे घाबरून जाऊ नका. आपण प्रामाणिक आहोत आणि आपल्या कुणाच्याही हातून कोणतीही चूक किंवा गुन्हा घडलेला नाही, हे तर आपल्याला पक्कं ठाऊक आहे ना ? मग झालं तर ! हा पोलिसांचा आणि बदनामीचा त्रास.. हा तात्पुरता आणि अल्पकाळासाठी आहे. तो तर आपल्याला सहन करावाच लागेल. मात्र या दुर्दैवी घटनेत आपण पूर्णपणे निर्दोष आहोत याबद्दल या वैजापुरातील प्रत्येकाला खात्री आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या वरिष्ठांचाही या प्रकरणात आपल्याला पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य आहे. तेंव्हा थोडा धीर धरा आणि निश्चिन्त रहा. तुम्हाला पोलिसांकडून किंवा अन्य कुणाकडून ही यापुढे कसलाही त्रास होणार नाही याची मी काळजी घेईन..”

त्या चौघांनाही बसायला सांगून त्यांच्यासाठी चहा मागवला. वरवर जरी ते सारे शांत झाल्यासारखे दिसत असले तरी मधूनच त्यांच्या डोळ्यात अविश्वासाचे भाव उमटून जात होते. चहा पिऊन निमूटपणे केबिन बाहेर जाताना ते सारखे मागे वळून माझ्याकडेच पहात होते.

तत्पूर्वी, खोदून खोदून विचारलं तरीही “रश्मी मॅडमची ऑफर मी स्वीकारली आहे.. ही बातमी कोठून समजली ?” या माझ्या प्रश्नावर त्या चौघांनीही “माफ करा, आम्ही ते सांगू शकत नाही..” असं म्हणत मौनच स्वीकारणं पसंत केलं होतं..

सुखदेवने ज्या विविध न्याय यंत्रणांकडे बँकेविरुद्ध तक्रार दाखल केली होती त्यातीलच एक न्याय व्यवस्था होती “डिस्ट्रिक्ट कन्झ्युमर फोरम” अर्थात जिल्हा ग्राहक मंच. ग्राहकांना जलद न्याय मिळवून देण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली असून सिव्हिल प्रोसिजर कोड अंतर्गत सिव्हिल जजला असणारे सर्व अधिकार या संस्थेतील जजला असतात. बँकेकडून 30 दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण न झाल्यास एक साधं ॲफिडेव्हीट दाखल करून कोणताही ग्राहक या मंचाकडे तक्रार दाखल करू शकतो. सुखदेवची तक्रार दाखल करून घेतल्यावर औरंगाबादच्या ग्राहक मंचाने नियमानुसार कोर्टापुढे हजर राहण्यासाठी बँकेविरुद्ध समन्स जारी केलं. बँकेचा प्रतिनिधी म्हणून ही केस सुद्धा अर्थात मलाच लढावी लागणार होती.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कन्झ्युमर कोर्टात हजर झालो तेंव्हा तिथे अगोदरपासूनच सुखदेव आपल्या तीन वकिलांच्या ताफ्यासह जय्यत तयारी करून आलेला दिसला. मला पाहताच त्याच्या चेहऱ्यावर “आता कशी जिरली..!” चे भाव उमटले. माझ्या जवळ येऊन तो म्हणाला..

“तरी चांगलं सांगत होतो तुम्हाला की मला हवे तेवढे पैसे देऊन प्रकरण मिटवून टाका म्हणून.. पण तुम्ही पडले तत्ववादी.. अती इमानदार..! आता भोगा आपल्या इमानदारीची फळं.. अहो, ही तर फक्त सुरवात आहे. वेगवेगळ्या कोर्टांच्या, सरकारी कार्यालयांच्या एवढ्या फेऱ्या मारायला लावीन तुम्हाला की त्या येरझारांनीच तुमचा अर्धा जीव जाईल.. मग केस परत घ्यायची विनंती करत याल तुम्ही माझ्याकडे.. हात जोडून माफी मागत.. “

सुखदेवची अशी उपरोधिक, उर्मट बडबड सुरू असतानाच माझ्या नावाचा पुकारा झाला.

“चेक बुक इश्यू रजिस्टर वर कस्टमरची सही का घेतली नाही ?”

“कस्टमरचा चेक बुक मागणी अर्ज कुठे आहे ?”

“बँकेने अद्याप कस्टमरला नुकसान भरपाई का दिली नाही ?”

सुखदेवच्या वकिलांनी तसेच कन्झ्युमर कोर्टाच्या जजने विचारलेल्या वरील पैकी एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर माझ्याजवळ नव्हते.

“विवादित चेक वरील सहीचा खरे खोटेपणा पडताळून पाहण्यासाठी बँकेने हैदराबाद येथील फोरेन्सिक डिपार्टमेंट कडे आवश्यक ती कागदपत्रे पाठविली असून त्यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच नुकसान भरपाई देण्याबद्दल बँक आपल्या नियमानुसार योग्य तो निर्णय घेईल..”

कसेबसे एवढेच उत्तर मी त्यांना देऊ शकलो. माझ्या उत्तराने कोर्टाचे अजिबात समाधान झाले नाही. या प्रकरणी होत असलेल्या बिलंबा बद्दल व ग्राहकांप्रतीच्या असहानुभतीपूर्ण वागणुकीबद्दल बँकेला दोषी मानून, लवकरात लवकर ग्राहकाला न्याय न मिळाल्यास नुकसान भरपाईचा एकतर्फी आदेश देण्यात येईल अशी कोर्टाने तंबी दिली.

ग्राहक मंचाचा निकाल सहसा ग्राहकाविरुद्ध जात नाही. त्यामुळे या कोर्टाचा निकाल नक्कीच आमच्या विरुद्धच जाणार याची मनोमन जाणीव असल्यामुळे रिजनल ऑफिसला कोर्टाने दिलेल्या तंबीबद्दल कळवून या प्रकरणी बँकेतर्फे ताबडतोब सक्षम वकील नेमण्याची विनंती केली. त्यानुसार प्रसिद्ध ॲडव्होकेट ऋतुराज यांची बँकेने या प्रकरणी वकील म्हणून नेमणूक केली.

चेकवरील सहीचा खरेखोटेपणा तपासण्यासाठी पोलिसांनी पुणे येथील हस्ताक्षर तज्ज्ञांकडे विवादित चेक व बँकेकडील ग्राहकाच्या सहीचा नमुना पूर्वीच पाठविला होता. मात्र त्यांचा अहवाल प्राप्त होण्यास खूप उशीर लागेल असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. दरम्यान आमच्या बँकेच्या सूचनेनुसार हैदराबाद स्थित सेंट्रल फोरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (CFSL) या नामांकित संस्थेकडे मी चेकची कलर झेरॉक्स व सहीचा नमुना (Speciman Signature) पडताळणीसाठी पाठवून दिला होता. त्यांचाही अहवाल अजून प्राप्त झाला नव्हता.

जिल्हाधिकारी कार्यालयातील कन्झ्युमर कोर्टातून बाहेर पडताना विजयी हास्य करीत सुखदेव म्हणाला होता,

“आता महिन्याभरातच तुमच्या बँकेकडून चेकची रक्कम 11 टक्के व्याजासहित वसूल करेन आणि मग तुम्ही दिलेल्या मानसिक त्रासाबद्दल भली मोठी नुकसान भरपाई मिळण्यासाठी आणखी वेगळा दावा याच ग्राहक मंचात ठोकेन. त्यानंतर फौजदारी खटल्यातून तुम्हा पाचही जणांना कठोर शिक्षा होईल याचीही पुरेपूर काळजी घेईन.. या सुखदेवशी पंगा घेतल्याचे काय परिणाम होतात ते समजेल तुम्हाला आता.. उद्याचा पेपर बघाच.. कशी चविष्ट बातमी छापून आणतो तुमच्या आजच्या कोर्टातील फजितीची..”

बोलल्याप्रमाणे खरोखरीच सुखदेवने दुसऱ्या दिवशीच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत कन्झ्युमर कोर्टाने केलेल्या कानउघाडणीची बातमी छापून आणली होती. मात्र ती बातमी वाचून पोलिसांचे कान मात्र उगीच ताठ झाले. ह्या सुखदेवने जर बँकेकडून परस्परच रक्कम वसूल केली तर मग आपल्या हिश्श्याचं काय ? तो कसा वसूल करणार ? असा प्रश्न बहुदा त्यांना पडला असावा. त्यामुळेच फौजदार साहेबांनी ताबडतोब मला फोन करून “कुठल्याही परिस्थितीत पोलिसांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय बोडखे कुटुंबाला चेकची रक्कम देण्यात येऊ नये..” असे निक्षून बजावले.

केंद्र व राज्य सरकारचे विविध विभाग तसेच अन्य अनेक सामाजिक संस्थांकडे तक्रार अर्ज करून सुखदेवने या प्रकरणी त्याच्या कुटुंबाला त्वरित न्याय देण्याची मागणी केली होती. त्या सर्व सामाजिक संस्था व सरकारी कार्यालयांनी पाठविलेल्या नोटिसींना उत्तरे देण्यात तसेच बोगस अर्जाद्वारे माहितीच्या अधिकाराखाली (RTI) मागविलेली अर्थहीन माहिती पुरविण्यातच माझा दिवसातील बराच वेळ खर्च होत होता. निरुपद्रवी दिसणाऱ्या या सुखदेवने आणखी कुठे कुठे दाद मागितली असावी ? याबद्दल विचार करत बसलो असतांनाच टेबला शेजारील फॅक्स मशीनवरून रिजनल ऑफिसचा अर्जंट मेसेज आला..

“उद्या सकाळी ठीक अकरा वाजता रिझर्व्ह बँकेच्या बँकिंग लोकपाल (Banking Ombundsman) कार्यालयात सौ. रत्नमाला बोडखे यांनी वैजापूर शाखेविरुद्ध केलेल्या तक्रार अर्जाची सुनावणी असून बँकेचा प्रतिनिधी म्हणून तिथे हजर राहण्यासाठी ताबडतोब मुंबईला निघावे..”

(क्रमशः)

kotnisश्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १० भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 

new1

New Year 2025 Greeting Card Generator

New Year 2025 Greeting Card Generator

Happy New Year 2025!

May the new year bring you peace, joy, and prosperity!

- Your Name

Importance of 30th December for India- भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ३० डिसेंबरचे महत्त्व

bose1

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ३० डिसेंबरचे महत्त्व

भारताला स्वातंत्र्य १५ ऑगस्ट १९४७ रोजी मिळाले हे आपण सर्व जाणतो. पण त्याआधी, स्वातंत्र्य मिळविण्याचे प्रयत्न, वेगवेगळ्या देशभक्तांनी आपआपल्या परीने सुरू ठेवले होते. आपल्यापैकी फार कमी जणांना हे माहिती असेल, की आजपासून बरोबर ८१ वर्षांपूर्वी, ३० डिसेंबर १९४३ रोजी, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारने, म्हणजेच आझाद हिंद सरकारने, अंदमान आणि निकोबार बेटांवर, पोर्ट ब्लेअर येथे अंदमान क्लबच्या समोर असलेल्या जिमखाना ग्राउंड वर भारतीय ध्वज फडकावून भारतीय स्वातंत्र्याची घोषणा केली होती.Flag-Point-in-Port-Blair

Independence League आणि Indian National Army (INA) ची स्थापना

बंगालमधील क्रांतिकारक रास बिहारी बोस हे डिसेंबर १९१२ मध्ये तत्कालीन वाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज यांच्यावरील खुनी हल्ल्याचे सूत्रधार होते. ते ब्रिटिश सरकारकडून होणारी अटक टाळण्या साठी, जपानला गेले, आणि तिथून आपले प्रयत्न चालू ठेवले. नंतर ते जपानमध्येच स्थायिक झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान त्यांनी, तत्कालीन जपान सरकारला, भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मदत करण्याविषयी तयार केले. त्यांनी तिथे मार्च १९४२ मध्ये Indian Independence League ची स्थापना केली. तसेच Indian National Army (INA) या नांवाने सशस्त्र सेना उभारायला सुरुवात केली. या लीगच्या जून १९४२ मध्ये झालेल्या दुसऱ्या बैठकीत, सुभाषचंद्र बोस यांना तिचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. सुभाषचंद्र बोस यांनी त्यानंतर Indian National Army (INA) म्हणजेच आझाद हिंद सेना या नांवाने त्या सेनेत अनेक लोकांना सामील केले. ब्रह्मदेश आणि मलेशिया येथील भारतीय युद्धकैद्यांना या सेनेत सैनिक म्हणून घेण्यात आले.

सुभाषचंद्र बोस यांच्याकडून भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा

सुभाषचंद्र बोस यांनी, टोकियो मध्ये, जून १९४३ मध्ये, ब्रिटिशांना भारताबाहेर हुसकून लावण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून, भारताच्या पूर्वेकडील भाग ताब्यात घेण्यासाठी सैनिक कृति करण्याची घोषणा केली. त्यानंतर ते जपानच्या ताब्यात असलेल्या सिंगापूरमध्ये आले आणि तिथे त्यांनी २१ ऑक्टोबर १९४३ रोजी आपल्या स्वतंत्र भारताच्या सरकारची घोषणा केली आणि काही मंत्र्यांची, आणि सैन्य अधिकाऱ्यांचीही ही नियुक्ती केली. विशेष म्हणजे या सरकारला, तत्कालीन ७  देशांनी मान्यता सुद्धा दिली होती- जर्मनी, जापान, इटली, क्रोएशिया, थायलंड, ब्रह्मदेश आणि फिलिपाईन्स. ही एक मोठी राजनीतीक उपलब्धि होती. त्यांच्या सरकारने चलनी नोटा, पोस्ट स्टॅम्पस, छापायला सुरुवात केली, कायदे बनवायला सुरुवात केली.azad hind currency

अंदमान येथे तिरंगा ध्वज फडकविला

दुसऱ्या महायुद्धाच्या त्या काळात, जपानने ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या अंदमान आणि निकोबार या बेटांवर ताबा मिळविला होता. जपानने, सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला स्वतंत्र भारताचे सरकार म्हणून मान्यता दिली असल्याने, अंदमान आणि निकोबार ही बेटें त्यांच्या ताब्यात देण्याचे ठरवले.

आणि त्याप्रमाणे, ३० डिसेंबर १९४३ रोजी सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारने (आझाद हिंद सरकार) अंदमान आणि निकोबार बेटांवर, अंदमान क्लबच्या समोर असलेल्या जिमखाना ग्राउंड वर  भारतीय तिरंगा ध्वज फडकावून भारतीय सार्वभौमत्वाची घोषणा केली. (याआधी सुभाषचंद्र बोस भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे अध्यक्ष होते, तेंव्हा, त्या पक्षाने, चरखा असलेला तिरंगा ध्वज हा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला होता. तोच ध्वज येथे फडकविण्यात आला.) tiranga

अर्थात, नंतरच्या काळात घडलेल्या घटनांमुळे, दुसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांची सरशी झाली. जर्मनी, जपान यांची पीछेहाट झाली. जपानला शरणागती पत्करावी लागली. त्या धामधुमीत एका छोट्या बॉम्बर विमानातून नेताजी आणि त्यांचे काही सहकारी जात असतांना, त्या विमानाचा दुर्दैवी अपघात झाला.

तर ३० डिसेंबर १९४३ ची ही कहाणी आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात कोणाकोणाचे आणि कसे योगदान होते हे माहित असणे आवश्यक आहे. म्हणून हा माहिती प्रपंच.

वरील माहिती ही आंतरजालाच्या विविध स्रोतांतून एकत्र करून एका ठिकाणी गुंफली आहे.

माधव भोपे 

आठवणीतले झाकीरभाई- remembering Zakir bhai

zakir hussain

 

सहेली.. शब्द प्रांगण या ग्रुप मध्ये, श्री सौरभ जोशी यांचा आलेला लेख, खूप आवडल्याने, इथे, मूळ लेखकाच्या नांवासकट प्रकाशित करत आहोत.

 

आठवणीतले झाकीरभाई

 

सौरभ जोशी

 

 

 

झाकीरभाई अनंताच्या प्रवासाला गेले, आणि माझ्या मनात त्यांच्या आठवणींचं मोहोळ उठलं. अर्थात त्यांचा भरपूर सहवास लाभावा, इतका मी भाग्यवान नव्हतो. पण माझ्याकडच्या चिमुटभर पुण्याईच्या शिदोरीवर माझ्या आयुष्यात त्यांच्याबरोबर जे काही चार क्षण घालवायचं भाग्य मला लाभलं, ते क्षण म्हणजे साक्षात अमृतशिंपण करणारे होते. त्याविषयी हा छोटा लेखनप्रपंच.

तर, मी चार वर्षांचा असताना झाकीरभाईंना पहिल्यांदा पाहिलं. त्याचं झालं असं की, बोरिवलीला भाटिया हॉलमध्ये इतर काही कलाकारांबरोबरंच अब्बाजी आणि झाकीरभाईंच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होता. तेव्हा झाकीरभाईंनी जो काही तबला वाजवला, त्याने मी जो संमोहित झालो, तो कायमचा. मला त्यांचं वादन आणि त्यांचं व्यक्तिमत्व इतकं आवडलं, की चार वर्षांचा मी आई बाबांना म्हणालो, “माझी मुंज भाटिया हॉलमध्ये करायची, कारण तिथे झाकीरभाई येतात”. आपण किती मोठ्या कलाकाराबद्दल असं म्हटलं, याची तेव्हा माझ्या बालमनाला पुसटशीही कल्पना नव्हती. त्यांचं मोठेपण नंतरच्या जीवनात त्यांच्या कार्यक्रमांतून, त्यांना भेटण्यातून, त्यांच्याशी थोडंफार जेव्हा केव्हा बोलायला मिळालं, त्यातून उलगडत गेलं.

 

कलाकार किती नम्र असावा, याचा मूर्तिमंत वस्तुपाठ झाकीरभाई पदोपदी घालून देत असंत. त्याविषयी काही आठवणी सांगतो.

 

१९९३ साली फेब्रुवारी महिन्यात उ.अमीर हुसेन खॉं साहेबांच्या बरसीनिमित्त दादरला छबिलदास विद्यालयात एकल तबलावादनाचे कार्यक्रम होते. त्यात शेवटी झाकीरभाईंचं एकल तबलावादन होतं. नगम्याला सारंगीवर उ.सुलतान खाँसाहेब. मी आणि माझा भाऊ दीपक जोशी इतके भाग्यवान होतो, की कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होऊन सगळे गिचमिडीत बसले असताना, फूटभरच उंची असलेल्या स्टेजच्या अगदी पुढ्यात, झाकीरभाईंपासून अगदी दोन हात अंतरावर स्टेजला खेटूनंच आम्ही बसलो होतो आणि अख्खा कार्यक्रम ऐकला. पं.पढरीनाथ नागेशकर, पं.अरविंद मुळगावकर, पं.सुरेश तळवलकर पं.भाई गायतोंडे, पं.सुधीर माईणकर, अशी अनेक बुजुर्ग खानदानी तबलाविद्यालयं बाजूला बसली होती. झाकीरभाई आणि खाँसाहेब मंचावर स्थानापन्न झाल्यावर निवेदक श्रीकृष्ण जोशी यांनी “ज्यांचं एकल तबलावादन ऐकण्यासाठी आपण सारे खूप वेळ उत्सुक आहोत, ते उस्ताद झाकीर हुसेन मंचावर विराजमान झाले आहेत” असं म्हणून त्यांचं स्वागत केलं. तेव्हा त्यांचं निवेदन पूर्ण होण्याच्या आधीच त्यांना थांबवून झाकीरभाईंनी माईक हातात घेतला, आणि म्हणाले, “मै एक correction करवाना चाहता हूं l जहा इतने ग्यानी बुजुर्ग कलावंत सामने बैठे हो, जहा उ.अमीर हुसैन खॉंसाहाब जैसे तबलियाकी बरसी हो रही है, जहा बाजू मै यही मंच पे सुलतान खाँसाहाब बैठे हो, ऐसी जगह सरस्वती के मंदिर जैसी बन जाती है l वहा (स्वतःच्या छातीवर हात ठेवून) हम जैसे बच्चोंको उस्ताद कहना ठीक नही है l अगर उस्ताद कहनाही हो, तो उस्ताद सुलतान खां (त्यांच्याकडे हात दाखवून) कहीये l हम तो अभीभी सिख रहे है l गुरजनोंकी कृपा से जो थोडा बहोत बजाता हूं, वो ही बजाकर मै और हम सब मिलके ये बरसी के अवसरपर माता सरस्वतीके चरण मे पूजा करेंगे l” यश आणि कीर्तीच्या परमोच्च शिखरावर पोचलेला हा कलाकार भर मैफिलीत स्वतःला बच्चा म्हणतो, अजूनही शिकतोय, असं म्हणतो, ही किती नम्रता? कलाकार बरेच असतात. पण आपल्यातील कलेच्या अचाट अविष्काराबद्द्ल जराही गर्व न बाळगता इतका साधेपणा, इतका विनयशीलपणा दाखवणारा झाकीरभाईंसारखा कलाकार विरळाच, नव्हे, ऐसा होणे नाही.

 

अशीच अजून एक आठवण. पार्ल्याला लोकमान्य सेवा संघात एकदा झाकीरभाईंचं एकल तबलावादन ऐकायला आणि पाहायला (हो, पाहायला देखील कारण, त्यांचं वादन हे श्रवणीय आणि प्रेक्षणीय असं दोन्ही होतं) गेलो होतो. तेव्हाही असाच त्यांच्या पुढ्यात स्टेजला चिकटून बसलो होतो. सारंगीवर उ. सुलतान खाँसाहेब. खॉंसाहेबांनी सारंगीवर सुंदर आलापी सादर करून वातावरण भारून टाकलं, आणि झाकीरभाईंनी आपल्या वादनास सुरूवात केली. पेशकार संपवून कायदा घेतला वाजवायला, त्याची दीडपट करून झाली, दुगुन केली आणि कायदाविस्तार करण्यासाठी पलट्यांमध्ये शिरले. इथपर्यंत वादन सुरू करून साधारण अर्धा तास-चाळीस मिनिटं झाली असतील, आणि प्रख्यात संवादिनीवादक पं.अप्पा जळगावकर सभागृहात प्रवेशते झाले, आणि स्टेजच्या समोरच भारतीय बैठकीवर येऊन बसले. ते पाहून झाकीरभाई वाजवायचे थांबले. प्रेक्षकांना कळेना काय झालं. झाकीरभाई मग स्टेजवरून उतरून अप्पांजवळ आले, भर मैफिलीत स्टेजच्या पुढ्यात गुडघे टेकून अप्पांच्या पायावर डोकं ठेवलं, आणि अप्पांना स्टेजवर घेऊन आले.

तबल्यावरचा माईक हातात घेतला आणि म्हणाले, “आज अप्पाजी का जनमदिन है l मेरा परमसौभाग्य है, की अप्पाजी के जनमदिनपर उनके सामने मै बजा रहा हूं l” असं म्हणून स्वतःला स्वागतपर मिळालेली शाल अप्पांवर घातली, आणि पुन्हा स्टेजवर त्यांना नमस्कार केला. हे सगळं झाल्यावर अप्पा स्टेजवरून खाली भारतीय बैठकीवर, जिथे आधी बसले होते, तिथे उतरून जायला लागले. तेव्हा झाकीरभाई त्यांना म्हणाले, “अप्पाजी, कहा जा रहे हो? रुकीये l” मग श्रोत्यांना उद्देशून म्हणाले,”अप्पाजी जैसे महान कलाकार जब सभागृह मे हो, तो उन्हे स्टेजके सामने बैठकपर बिठाके हम जैसे छोटे लोगोंने स्टेजपर बैठ के बजाना गलत है l” मग अप्पांना उद्देशून म्हणाले, “अप्पाजी, आप यही स्टेजपर मेरे बाजू मे बैठकर मुझे तबला बजाने के लिये आशीर्वाद देते रहीये”, असं म्हणून अप्पांना स्वतःच्या बाजूला बसवून अख्खा सोलो वाजवला. आणि हे सगळं भर कार्यक्रमात, शेकडो प्रेक्षकांसमोर, वादन सुरू करून अर्धा तास होऊन गेल्यावर. झाकीरभाई तबलावादकाबरोबरंच एक माणूस, एक कलाकार म्हणून हे असे होते. इतकी नम्रता मी आजवर कुठल्याही कलाकारात पाहिली नाही. म्हणूनच झाकीरभाई हे व्यक्तिमत्व नव्हतं, तर पुलंच्या भाषेत सांगायचं तर विभूतिमत्व होतं.

 

आता झाकीरभाईंच्या मिश्किलपणाच्या एक दोन आठवणी सांगतो. १९९१ सालची गोष्ट. हरिजींनी त्यांच्या वृंदावन गुरुकुलातर्फे एक पूर्ण रात्र ५ जुगलबंदीचा कार्यक्रम शिवाजी पार्क ला ठेवला होता. त्यात अर्थातच झाकीरभाई देखील तबला वाजवणार होते. मला झाकीरभाईंचा कुठलाही कार्यक्रम मागे बसून पाहायला आवडायचं नाही. कारण मघाशी म्हटल्याप्रमाणे मला त्यांचं वादन नुसतं ऐकायचं नसायचं, तर ते पहायचं ही असायचं. त्याचबरोबर झाकीरभाईंच्या मुद्रा, डोळे, उडणारे कुरळे केस, मात्रांचा हिशोब डोक्यात चालू असताना हवेत एका जागी पाहत स्थिर राहणारे त्यांचे पाणीदार डोळे, हे सारं डोळे भरून पाहायचं असायचं. त्याप्रमाणे, मी पुढील रांगेतील महाग तिकिटे असतात वगैरे कसलाही विचार न करता सरळ पहिल्या रांगेतील सोफ्यावर जाऊन बसलो. पण दुर्दैवाने हरिजी आणि झाकीरभाईंची जुगलबंदी सुरु झाल्यावर आमंत्रितांपैकी कोणीतरी हस्ती सोफ्यावर बसण्यास आल्या, आणि मला उठावं लागलं. पण मी इतका बेशरम की, मुकाट्याने मागे आपल्या जागी यायचं सोडून मी सरळ स्टेज च्या झाकीरभाईंच्या बाजूला असणाऱ्या पायऱ्यांपैकी पहिल्या पायरीवर जाऊन बसलो, आणि झाकीरभाईंना वाजवताना पाहत राहिलो. ती पायरी स्टेज च्या बऱ्यापैकी जवळ होती, म्हणजे अजून २-३ पायऱ्या चढल्या कि थेट स्टेज वरंच…हरिजींबरोबर तबला वाजवताना मध्येच झाकीरभाईंनी मी पायरीवर येऊन बसलोय हे पहिलं. त्यांच्या जागी इतर दुसरा कुठला कलाकार असता, तर त्याने मला तडक उठवलं असतं, किंवा आयोजकांना मला तिथून उठवायला सांगितलं असतं. पण झाकीरभाई माझ्याकडे पाहून मिश्किल हसले, आणि “आता इतक्या जवळ येऊन बसलाच आहेस, तर आता माझ्या बाजूलाच येऊन बस” अशा अर्थी स्व:च्या मांडीच्या बाजूला स्टेज वर हाताने थाप देऊन खूण केली, आणि पुन्हा हसले. हे सगळं हरिजींना तबला साथ चालू असताना …! मी ती संपूर्ण जुगलबंदी तिथेच त्या स्टेज च्या पायरीवर बसून झाकीरभाईंना मनसोक्त डोळ्यात साठवत ऐकली. त्या वेळी रात्री नऊ ते सकाळी पाच वाजेपर्यंत झाकीरभाईंनी सलग पाच जुगलबंदींमध्ये वादन केलं. झाकीरभाई आणि अब्बाजी, झाकीरभाई आणि पं.बिरजू महाराज, झाकीरभाई पं.जसराज आणि, झाकीरभाई आणि हरिजी, झाकीरभाई, पं.बिरजू महाराज आणि पं.केलूचरण महापात्रा. झाकीरभाईंच्या वादनातील clarity, वजन, आणि शक्ती जशी आदल्या रात्री नऊ ला होती, तशीच सकाळी पाच ला पाच जुगलबंद्या सलग वाजवून झाल्यावरंही होती. काय अचाट शक्ती आणि उत्साह. हे फक्त आणि फक्त झाकीरभाईच करू जाणोत.

 

त्यांच्या spontaneous sense of humor आणि मिश्कीलपणाची अजून एक आठवण. असंच एकदा नेहरू सेंटर ला गुणीदास संगीत संमेलनामध्ये उ.सुलतान खानसाहेबांचं सारंगीवादन आणि साथीला झाकीरभाई, असं सत्र होतं. खॉंसाहेब आणि झाकीरभाई मंचावर येऊन बसले. निवेदकाने झाकीरभाईंची भरभरून ओळख करून दिली, आणि त्यात एक वाक्य फेकलं, “उम्र के तीन सालसे आपने तबले की शिक्षा प्राप्त करने की शुरुवात की, सात साल की उम्र मे पेहेला प्रोग्राम बजाया, और तभी से अबतक कभी भी पीछे मुडकर नही देखा l” हे वाक्य झाकीरभाईंनी ऐकलं, आणि त्वरीत निवेदकाकडे मागे वळून पाहिलं, आणि म्हणाले “अभी तो देखा l” त्यावर सभागृहात जो हशा पिकला, की विचारायची सोय नाही.

 

आपल्यापेक्षा वयाने, यशाने, कीर्तीने ,ज्ञानाने कितीही छोट्या असलेल्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारे कमी लेखायचं नाही, हा कटाक्ष झाकीरभाईंनी आयुष्यभर पाळला. याचीच साक्ष देणारा माझ्या जीवनात झाकीरभाईंनीच दिलेला अजून एक अनुभव. माझे गुरु पं. मल्हारराव कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक वर्षी झाकीरभाई आणि फाझलभाई  अशी जुगलबंदी बोरिवली ला प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात आयोजित केली होती. त्यादिवशी कार्यक्रमस्थळी झाकीरभाईंना घेऊन यायची जवाबदारी राघुदादाने (श्री. राघवेंद्र कुलकर्णी, म्हणजे माझ्या गुरुजींचे ज्येष्ठ सुपुत्र) माझ्यावर सोपवली होती, नव्हे, राघुदादाकडे हट्ट करून मीच माझ्याकडे खेचली होती…! संध्याकाळी ५-३० च्या सुमारास सांताक्रूझ विमानतळाबाहेरील हॉटेल ऑर्किड मधून झाकीरभाईंना घेऊन बोरिवली ला प्रबोधनकार नाट्यगृहात गाडीने घेऊन यायचे होते. माझ्यासाठी तो उत्सवाचा दिवस होता. झाकीरभाई दिल्लीहून विमानाने मुंबईत येऊन, ऑर्किड ला येऊन, फ्रेश होऊन, कपडे करून पुढे आमच्या कार्यक्रमाला यायचे होते. मी अर्धा तास आधीच ऑर्किड ला पोचलो. ६ वाजून गेले तरी झाकीरभाई दिल्लीहून आले नाहीत. विमान अर्धा पाऊणतास लेट झालं होतं. मग सव्वा सहा च्या सुमारास झाकीरभाई आले. एक साधा डेनिमचा फुल शर्ट आणि जीन्स ची पॅन्ट असा त्यांचा पेहेराव होता. त्या पेहरावात मी झाकीरभाईंना त्यावेळी प्रथम पाहिलं. माझ्या झब्ब्यावरील volunteer च्या बॅचवरून त्यांनी मला लगेच ओळखलं, आणि मी काही बोलायच्या आतच, उशीर झाल्याबद्दल माफी मागितली. मलाच लाजल्यासारखं झालं. इतका महान, जगद्विख्यात, आणि कीर्तीच्या अत्युच्च शिखरावरील कलासूर्य, माझ्यासारख्या किस झाड की पत्ती असणार्या काजव्याची विमानाला उशीर झाल्याने आणि त्यांची काही चुकी नसताना उशीर झाला म्हणून माफी मागतो, याला काय म्हणावे? मी म्हटलं, “झाकीरभाई, it’s ok, आप क्या मुझ जैसे बच्चे को sorry बोल रहे हो l Flight delay हुआ, तो क्या करूं सक्ती है l” मग म्हणाले, “नही नही, आप को इंतजार करना पडा, मुझे अच्छा नही लगा l आप आप यही लॉबी मे बैठो, में १० मिनिट मे तय्यार होके आता हूं l” असं म्हणून त्यांच्या रूमवर गेले, आणि दहाव्या मिनिटाला सलवार कुडता घालून हजर झाले. म्हणाले चलिये. ऑर्किडवरून निघताना तिकडच्या security guard च्या विनंतीस मान देऊन, त्याच्याबरोबर फोटो काढून दिला. आपल्यासमोर जो माणूस येईल, मग तो लहान, थोर, कुणीही असो, त्याला सन्मानानेच वागवून, त्याच्यावर आपल्या वलयांकित व्यक्तिमत्त्वाचं जराही दडपण येऊ द्यायचं नाही, हे त्यांचं तत्व, मला तेव्हा उमगलं. झाकीरभाईंबरोबर सांताक्रूझ ते प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरिवली असा आमच्या गाडीतून केलेला प्रवास म्हणजे माझ्या आयुष्यातील अनमोल स्मृतीकुंभ आहे. त्या पाऊण एक तासात त्यांच्याशी झालेल्या गप्पा मी आयुष्यभर माझ्या हृदयात जपून ठेवल्या आहेत.

 

आज माझे शब्द अबोल झालेत, बोटं बधिर झाली आहेत…

आज झाकीरभाई या जगात नाहीत हे सत्य जरी असलं, आणि जरी एक ना एक दिवस हे अटळ होतं, तरीही माझं मन हे अजून स्वीकारूच शकत नाहीये… नव्हे, ते सत्य असलं तरी कधीही स्वीकारणारंच नाही. कारण वर कथन केल्याप्रमाणे मी चार वर्षांचा असताना जेव्हा मी झाकीरभाईंना प्रथम पाहिलं आणि ऐकलं, तेव्हापासूनच माझ्या हृदयात झाकिरभाईंसाठी एक स्वतंत्र सिंहासन तयार झालं, जे माझं हृदय चालू असेपर्यंत राहील, आणि त्यावर झाकीरभाई कायम विराजमान असतील.

 

बहुत काय लिहिणे, इति लेखनसीमा.

 

– सौरभ जोशी

१८.१२.२०२४

————————-

ज्ञान ,मनोरंजन, माहिती, यासारख्या update मिळविण्यासाठी join करा..

सहेली.. शब्द प्रांगण

What’sapp group 10

 

https://chat.whatsapp.com/Bz3uFrE8LpSB3h7BBa5hK0

 

सहेली.. शब्द प्रांगण

 

G.K.Quiz-Political India

india map1

Take this interesting quiz about Indian States-just to brush up your information about current affairs. 

This quiz can also be useful to some extent for those who are preparing for competitive exams.