https://goodworld.in A website by Madhav Bhope

संत तुकारामांचे अभंग-6 Sant Tukaram abhang-6

tukaram-5

Sant Tukaram abhang-6 

संत तुकारामांचे अभंग-6

थोर संत तुकाराम महाराज यांचे अभंग आपण पाहत आहोत. आतापर्यंत ५ लेखांमधून आपण ढोबळपणे विविध विषयांनुसार तुकाराम महाराजांचे अभंग पाहिले. तुकाराम महाराजांचे अभंग इतके आहेत, आणि इतके हृदयस्पर्शी आहेत की कोणता अभंग घ्यावा आणि कोणता सोडावा हे ठरवणे फार अवघड आहे.

आज त्यांचे अजून काही करुणापरक अभंग आपण पाहूत.

खालील अभंगांत तुकाराम महाराजांनी तुमची आमची स्थितीच अगदी यथार्थ वर्णन केली आहे असे वाटते. आपल्याला जप तप ही साधनें जमत नाहीत, ‘न सांडवे अन्न-‘ उपास तापास पण करवत नाहीत, वनात जाता येत नाही, काही पाठांतर करावे म्हटले तर तेही होत नाही. कसलीच योग्यता नाही- आणि आयुष्य तर थोडे आहे. काय करावे? हे आयुष्य म्हणजे एक कोडेच आहे. पंढरी राया-तुझ्यावीण सगळा शीण वाटतो. मला फक्त एकच येते- सगळी लाज सोडून तुला शरण येणे आणि तुझी करुणा भाकणे- असे सगळे भाव खालील काही अभंगांत व्यक्त होतात-

 

जपतपादि साधनें । मज चितवेना मनें

करुणावचनें । म्यां भाकावीं तुम्हां दीनें

तुका म्हणे घेई । माझें थोडें फार ठायीं

 

 

न संडवे अन्न । मज न सेववे वन

म्हणऊनि नारायणा । कींव भाकितों करुणा

नाहीं अधिकार । कांहीं घोकाया अक्षर

तुका म्हणे थोडें । आयुष्य अवघेंचि कोडें

 

येई गा तूं मायबापा पंढरीच्या राया

तुजविण शीण वाटे क्षीण झाली काया

यातिहीन मतिहीन कर्म हीन माझें

सर्व लज्जा सांडोनियां शरण आलों तुज

दीनानाथ दीनबंधु नाम तुज साजे

पतितपावन नाम ऐसी ब्रीदाबळी गाजे

विटेवरी उभा नीट कटावरी कर

तुका म्हणे हेंचि आम्हां ध्यान निरंतर

 

 

_______________________

 

आणि मागणे काय? तर एकच मागणे आहे- माझे प्रपंचातील चित्त ओसरावे आणि तुझ्या पायी लागावे –

 

प्रपंच वोसरो । चित्त तुझे पायीं मुरो

ऐसें करीं गा पांडुरंगा । शुद्ध रंगवावें रंगा

पुरे पुरे आतां । नको दुजियाची सत्ता

लटिकें तें फेडा । तुका म्हणे जाय पीडा

 

 

पतित पतित । परि मी त्रिवाचा पतित

परी तूं आपुलिया सत्ता । मज करावें सरता

नाहीं चित्तशुद्धि । स्थिर पायांपाशीं बुद्धि

अपराधाचा केलों । तुका म्हणे किती बोलों

 

 

______________________

 

माझ्या मनात दुर्बुद्धि कधीही न् येवो

 

दुर्बुद्धि ते मना कदा नुपजो नारायणा

आतां मज ऐसें करीं तुझे पाय चित्तीं धरीं

उपजला भावो तुझे कृपें सिद्धी जावो

तुका म्हणे आतां लाभ नाहीं यापरता

 

____________________________

 

 

सुरुवातील हरिनाम घेतांना मन त्यामध्ये लागत नाही- पण हरकत नाही- मुखात नाम आले की ते नाम आपले काम बरोबर करेल आणि हळू हळू मनातही उतरेल.

 

नसे तरी मनीं नसो परी वाचे तरी वसो

देह पडो या चिंतनीं विठ्ठलनामसंकीर्तनीं

दंभस्फीति भलत्या भावें मज हरिजन म्हणवावे

तुका म्हणे काळांतरीं मज सांभाळील हरी

 

________________________

 

सुरुवातीला आपल्या इंद्रियांना बळजबरीने वळण लावावे लागते. पण आपला सगळ्यांचाच अनुभव आहे, की एकदा इंद्रियांना वळण पडले- देवाच्या सुखाची गोडी लागली, की मग ती अशी लुब्धावतात  की मग तिथून हलण्याचे नांव घेत नाहीत-

 

आणीक दुसरें मज नाहीं आतां नेमिलें या चित्तापासूनियां

पांडुरंग ध्यानीं पांडुरंग मनीं जागृतीं स्वपनीं पांडुरंग

पडिलें वळण इंद्रियां सकळां भाव तो निराळा नाहीं दुजा

तुका म्हणे नेत्री केली ओळखण तटस्थ तें ध्यान विटेवरी

 

_______________________

 

आपल्यापैकी काही जण गुरू नाही म्हणून स्वस्थ बसतात. पण तुकाराम महाराज सांगतात की माझ्या विठोबाचे माझ्यावर असे प्रेम आहे की देव स्वतःच गुरू होतो- माझ्या मागे पुढे उभा राहून सांभाळतो- आणि तुकाराम महाराज म्हणतात- विश्वास नसेल तर पुराणात पाहा- असे कितीतरी पुरावे सापडतील.

 

खालील अभंग मी खुलताबाद येथे असतांना माझ्या रूम वर (तेंव्हा बॅचलर होतो) रात्री पडल्या पडल्या, कुठल्या तरी देवळात, रात्री भजनी मंडळातील गायक तल्लीन होऊन गात असतांना कानावर आला आणि तो तसाच हृदयावर कोरला गेला. पूर्वी आपल्याकडे दर गुरुवारी, एकादशीला, किंवा पर्वाला कोणाच्या तरी घरी किंवा मंदिरात लोक एकत्र जमून टाळ मृदुंगाच्या तालावर तल्लीन होऊन रात्री उशिरापर्यंत भजने म्हणत, रामकृष्ण हरि कीर्तन करत. मला आठवते, मी मॅट्रिकला असतांना माझे वडीलही भजनी मंडळात जाऊन या भजनात सामील होत. मी कधी कधी त्यांच्या सोबत जात असे. आता अशी भजनें दुर्मिळ झाली आहेत.

 

 

माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणचि देव होय गुरु

पढियें देहभाव पुरवी वासना अंतीं तें आपणापाशीं न्यावें

मागें पुढें उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारावे

योगक्षेम त्याचें जाणे जडभारी वाट दावी करीं धरूनियां

तुका म्हणे नाहीं विश्वास ज्या मनीं पाहावें पुराणीं विचारूनी

 

आणि संसार करतांना देवाची आठवण कशी करावी, असा कोणाला प्रश्न पडत असेल तर त्याचे उत्तर ही महाराजांनी देऊन ठेवले आहे-

 

दुडीवरी दुडी चाले मोकळी गुजरी

ध्यान लागो ऐसें हरी तुझे चरणीं तैशापरी

 

अशाच अर्थाचा एक अभंग आपण नामदेव महाराजांचाही पाहिला होता.

 

दुडीवरी दुडी पाण्या निघाली गुजरी | चाले मोकळ्या करीं परी लक्ष तेथें

धनलोभ्यानें धन ठेवियलें दूरी | वर्ते चराचरी परी लक्ष तेथें

नामा म्हणे असावें तियां व्यापारी | लक्ष सर्वेश्‍वरीं ठेवूनियां

 

___________________________

 

खालील एक अभंगही मला खूप आवडतो. अगदी प्रॅक्टिकल आणि matter of fact असा हा अभंग आहे. शेवटी ‘औट’ म्हणजे साडेतीन हात तुझी जागा आहे. कशाला तृष्णा आणि हांव वाढवतोस- एक राम विसरला तर सगळे श्रमच आहेत.

 

एक शेर अन्ना चाड येर वाउगी बडबड

कां रे तृष्णा वाढविसी बांधवूनि मोहपाशीं

औट हात तुझा जागा येर सिणसी वाउगा

तुका म्हणे श्रम एक विसरतां राम

 

_________________

 

खालील एक अभंग फारच गमतीशीर आहे. जेंव्हा दोन स्वार्थी लोक एकमेकांना भेटतात, तेंव्हा ते स्वतःच्या स्वार्था साठी दुसऱ्याला कसे ठकवायचा प्रयत्न करतात याचे फारच विनोदी उदाहरण दिले आहे.

 

वाघें उपदेशिला कोल्हा सुखें खाऊं द्यावें मला

अंतीं मरसी तें चुके मजही मारितोसी भुके

येरू म्हणे भला भला निवाड तुझ्या तोंडें झाला

देह तों जाणार घडेल हा परउपकार

येरू म्हणे मनीं ऐसें जावें समजोनि

गांठी पडली ठका ठका त्याचें वर्म जाणें तुका

 

एकदा एक वाघ कोल्ह्याला उपदेश करतो की तुझे शरीर तू मला सुखाने खाऊ दे कारण शेवटी हा देह पडणारच आहे, अंत हा कोणाला चुकणार नाही, त्यामुळे निदान माझा तरी भुकेने चाललेला जीव वाचव, त्याने तुझ्या पदरी पुण्यच पडेल.

हे ऐकून कोल्हा म्हणतो हे तू बरे केलेस, स्वतःच्या तोंडानेच काय बरोबर आणि काय चूक याचा निवाडा केला. देह सगळ्यांचाच पडतो त्यामुळे मला सोडून देऊन आणि भुकेने जात असेलेले स्वतःचे प्राण त्यागून तूच का हे पुण्य स्वतःच्या पदरी पडून घेत नाहीस? जेव्हा एका ठकाची दुसऱ्या ठकाशी गाठ पडते तेव्हा ते एकमेकांना असेच स्वार्थी सल्ले देतात, त्यामूळे अशा स्वार्थी लोकांच्या स्वार्थी उपदेशांचे वर्म मला आता कळून चुकले आहे.

 

यावरूनच ‘गाठ पडली ठका ठका’ हा वाक्प्रचार रूढ झाला असावा.

 

यापुढील लेखात आपण तुकाराम महाराजांचे आणखी काही प्रत्ययकारी अभंग पाहणार आहोत.

आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. आणि लाईक करणे.

 

माधव भोपे

A glimpse of Vedic knowledge-3

yagya

A glimpse of Vedic knowledge-3

A glimpse of Vedas या लेखमालेत आपण वेदांबद्दल काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्या या अत्यंत समृद्ध आणि कालातीत ठेव्याविषयी पाश्चात्य लोक किती आस्थापूर्वक अभ्यास करतात हे पाहिल्यावर आपल्याला या गोष्टींची अगदी प्राथमिक माहिती तरी असली पाहिजे असा विचार आला.

पहिल्या लेखात आपण प्रस्थान त्रयी कशाला म्हणतात, श्रुति प्रस्थान, स्मृति प्रस्थान आणि न्याय प्रस्थान म्हणजे काय याची थोडक्यात माहिती घेतली.

सनातन संस्कृतीचे आधारभूत असलेले वाङमय म्हणजे वेद होत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे ते चार वेद होत. संस्कृत मधील विद् या संज्ञेपासून वेद हा शब्द बनला आहे. विद् म्हणजे ‘जो जाणतो’ आणि वेद म्हणजे ‘जाणणे’.

चार वेदांत सगळ्यात मुख्य आणि सगळ्यात मोठा ऋग्वेद आहे. मोठा म्हणजे किती मोठा? तर ऋग्वेदात साधारण १०४६२ मंत्र, किंवा ऋचा आहेत. ज्या रचना पद्यस्वरूपात किंवा छंदोबद्ध आहेत त्यांना ऋचा म्हटले जाते. ऋक् + वेद म्हणजे ऋग्वेद. यातील ऋक् म्हणजे प्रार्थनापर किंवा स्तुतिपर मंत्र.  यजुस् म्हणजे यज्ञात वापरले जाणारे गद्य मंत्र. यजुर्वेद मुख्यतः यज्ञात वापरल्या जाणाऱ्या गद्य मंत्रांचा संग्रह आहे असे म्हटले तरी चालेल. यजुर्वेदात १९७५ मंत्र आहेत. सामवेदातही  जवळपास तितकेच मंत्र आहेत. पण सामवेदात बहुतेक मंत्र ऋग्वेदातीलच जसेच्या तसे घेतले आहेत. सामवेदात ते मुख्यतः गेय (गायल्या जाणाऱ्या) स्वरूपात आले आहेत. आणि अथर्ववेदात जवळ जवळ ६००० मंत्र आहेत. अथर्ववेदात अनेक तांत्रिक बाबतीतले, तसेच तथाकथित ‘वाम’ मार्गातील मंत्र आहेत. याबद्दल आपण पुढे माहिती घेऊ. याला आपल्या सोयीसाठी पुढील टेबलमध्ये मांडता येईल.

क्र.

वेद

मंत्र संख्या

शैली

विवरण

1

ऋग्वेद

10462

मन्त्रपरक

सगळ्यात  प्राचीन वेद

2

यजुर्वेद

1975

गद्यात्मक

कर्मकांडपरक, शुक्ल आणि  कृष्ण भागात विभाजित

3

सामवेद

1875

गेयात्मक

संगीतमय, यातील बहुतेक  मंत्र ऋग्वेदातीलच आहेत.

4

अथर्ववेद

5987

प्रौद्योगिकी, आरोग्य आणि तंत्रपरक

सगळ्यात नवीन वेद

ऋग्वेदात काय आहे?

ऋग्वेदात निसर्गाची, निसर्गातील विविध घटकांची आणि त्यांच्या देवतांची स्तुति आणि अत्यंत काव्यमय वर्णनें आहेत. अग्नि, वायू, इन्द्र, वरुण, विश्वदेव, मरुत, प्रजापति, सूर्य, उषा, पूषा, रुद्र, सविता या देवतांची सूक्तें आहेत. सूक्त म्हणजे स्तुति करणारी, ‘सु’ उक्ति. ऋग्वेदातील पहिलाच मंत्र किंवा ऋचा खालीलप्रमाणे आहे:

ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्। होतारं रत्नधातमम् ॥ १.१.१

पदच्छेद- ओ३म्  अ॒ग्निम् । ई॒ळे॒ । पु॒रःऽहि॑तम् । य॒ज्ञस्य॑ । दे॒वम् । ऋ॒त्विज॑म् । होता॑रम् । र॒त्न॒ऽधात॑मम् ॥ १.१.१

agni

ई॒ळे॒ म्हणजे स्तुति करणे. अग्नीचे मनुष्याच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ऋग्वेदाच्या पहिल्याच ऋचेमध्ये अशा अग्नीची स्तुति आणि प्रार्थना केली आहे. यात पुरोहित म्हणजे यज्ञाचे नेतृत्व करणारा पुजारी, ऋत्विज यांचे चार प्रकार असतात- होतार , अध्वर्यु, उद्गाता, आणि  ब्रह्मा.  ऋत्विज म्हणजे योग्य वेळी आहुति देणारा.  ‘होतार’ म्हणजे देवतांचे आवाहन  करणारा, या सर्व शब्दांचे अर्थ आपण पुढील काही भागांत पाहणार आहोत. जी खूप रंजक माहिती आहे. मी सुरुवातीच्या लेखात उल्लेख केलेल्या रशियन विद्वानाच्या व्हिडिओमध्ये त्यांनीं याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे.!

yagya

सर्व वेद हे साधारण चार भागांमध्ये विभागलेले असतात- १. संहिता, २. ब्राह्मण, ३. आरण्यक आणि ४. उपनिषद.

पूर्वी मनुष्याच्या जीवनाचे चार आश्रम किंवा अवस्था मानल्या जात- ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम.

विद्यार्थी जेंव्हा गुरुकुलात वेद शिकायला जाई, तेंव्हा वेदातील चारही भाग तो शिके, पण त्यातील संहिता भाग जास्त करून त्याला ब्रह्मचर्याश्रमात उपयोगी येई, ब्राह्मण भाग गृहस्थाश्रमात, आरण्यक भाग वानप्रस्थाश्रमात आणि उपनिषद संन्यासाश्रमात.    

1) संहिता –

संहिता म्हणजे संग्रह. वेळोवेळी ऋषींनी रचलेले गद्य व पद्य मंत्र विषयवारीने एकत्र केले, त्याच संहिता होत. ऋग्वेद हा पद्यमंत्रांचा संग्रह आहे. हे पद्यमंत्र म्हणजे निरनिराळ्या देवतांच्या मुख्यत: प्रार्थना किंवा स्तोत्रे होत. हा भाग मुख्यतः ब्रह्मचर्याश्रमात उपयोगी येई

२.)‘ब्राह्मण’ या भागात विविध यज्ञ कसे करावयाचे, ह्याचे तपशीलवार विवरण दिलेले आहे. गृहस्थाश्रमात करणे अपेक्षित असलेल्या यज्ञातील प्रधान कर्म, अंगभूत कर्मे, कर्माची साधने, विविध नामे, यज्ञांचे अधिकारी व यज्ञांची विविध फले ह्यांत सांगितलेली असतात. यज्ञकर्मे रीतसर पार पाडण्याचा महिमा सूचित करणाऱ्या देव, ऋषी, असुर इत्यादिकांच्या कथा, योग्य पद्धतीने पार पाडलेल्या कर्माची व साधनांची वर्णने, तसेच अयोग्य रीतीने अनुष्ठिलेल्या कर्मांच्या व निषिद्ध पदार्थांच्या दुष्परिणामांची वर्णने, ह्यांत आलेली असतात.

3) आरण्यके –

अरण्यातच ज्या भागाचे व्रतस्थ राहून पठन करावयाचे तो भाग म्हणजे ‘आरण्यक’ होय. सर्व आरण्यके म्हणजे ब्राह्मणग्रंथांची अखेरची प्रकरणे होत. यांत यज्ञधर्माच्या विधानात्मक विवेचनापेक्षा यज्ञाचे तात्त्विक विवेचन आढळते. मनुष्याने गृहस्थाश्रम संपवून, वानप्रस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर या भागांचा अर्थ त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकत असावा.

4) उपनिषदे –

सामान्यतः जीव, ब्रह्म आणि जगत्‌ यांचे संबंधात विवेचन करणारे तत्त्वज्ञानात्मक भाग  उपनिषदे म्हणून ओळखली जातात. संन्यासाश्रमात हा भाग समजण्याएवढी प्रगल्भता मनुष्याला आलेली असे. पण म्हणून अर्थात उपनिषद इतर कुठल्या आश्रमात वाचू नये असे मुळीच नाही.

उपनिषदें ही साधारणतः वेदाच्या अंतिम भागात येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ म्हटले जाते. किंवा वेदांचा ‘निचोड’ म्हणता येईल, असा हा भाग असतो. गंमत म्हणजे, ज्या यज्ञ, याग यांविषयी आधीच्या भागात सविस्तर माहिती दिलेली असते, त्यांच्याही पलिकडे ‘परब्रह्म’ कसे आहे, याचे या भागांत वर्णन केलेले असते.

अनेक प्राचीन उपनिषदे ही वर्तमान आरण्यकांचे भाग असावेत. तसेच आज प्रसिद्ध असलेली प्राचीन उपनिषदे ज्या आरण्यकांचे भाग आहेत, त्यांतील उपनिषदांव्यतिरिक्त भागांनाही, ‘उपनिषद’ ही संज्ञा आरण्यकांमध्ये दिलेली असते. उदा., ‘बृहदारण्यक’ (मोठे आरण्यक) हा शतपथ ब्राह्मण नामक ब्राह्मणग्रंथाचा भाग असून हेच बृहदारण्यकोपनिषद म्हणून निर्दिष्ट केले जाते.

ऋग्वेदात साधारणपणे खालील वर्णन आहे.

  1. देवी-देवता : ऋग्वेदात इंद्र, अग्नि , सूर्य, विष्णू, सोम आदी प्रमुख देवतांसह ३३ देवी-देवतांची स्तुती व वर्णन आहे. या देवता विविध नैसर्गिक शक्ती आणि घटनांशी संबंधित आहेत.
  2. निसर्ग : सूर्य, चंद्र, नद्या, पर्वत, वृक्ष, वनस्पति  अशा निसर्गाच्या विविध पैलूंचे वर्णन यात केले आहे. या नैसर्गिक घटकांची देवता म्हणून पूजा केली जात असे.
  3. समाजजीवन : विविध वर्ग, व्यवसाय, चालीरीती व परंपरा यांचे वर्णन करून समकालीन समाजाची झलक यात दिसते.
  4. तत्त्वज्ञान आणि नीति : जीवन, मृत्यू, आत्मा, देवत्व, सत्य, न्याय आणि कर्म या विषयांवर सखोल विचार.
  5. स्तुति आणि प्रार्थना : ऋग्वेदात समृद्धि,  आरोग्य, विजय आणि मोक्षाच्या इच्छांसह देवी-देवतांची विविध स्तुति आणि प्रार्थना आहेत.
  6. पौराणिक कथा : यात अनेक पौराणिक कथा आणि दैवी पात्रे देखील आहेत, जी देवी-देवता आणि नैसर्गिक शक्तींचे सामर्थ्य वर्णन करतात.

प्रसिद्ध ‘गायत्री मंत्र’, तसेंच ‘पुरुष सूक्त’ हे ऋग्वेदाचा भाग आहेत. हे आपणाला माहिती असावे.

पुढील भागात आपण काही अत्यंत रंजक माहिती पाहणार आहोत. नक्की वाचा.

माधव भोपे 

यापूर्वीचे लेख इथे वाचा 

A glimpse of Vedic knowledge-1

A glimpse of Vedic knowledge-2

संत तुकारामांचे अभंग-5 Sant Tukaram abhang-5

tukaram-5

Sant Tukaram abhang-5 

संत तुकारामांचे अभंग-5 

संत तुकाराम महाराजांच्या अभंगांतील काही अभंग आपण मागील 4 लेखांमधून पाहत आहोत. मागील काही लेखांत आपण पाहिले की संतांचा रुसवा देवापाशी, प्रेम देवाशी, भांडण देवाशी, जे काही मागायचे, हक्काने, तेही देवापाशीच. कुठल्याही प्रकारे, प्रत्येक क्षण हा देवाशी जोडला गेला पाहिजे. गीतेतील

अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना: पर्युपासते ।
तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥अ.९-२२ ॥

“जे लोक अनन्य भावाने निरंतर माझी उपासना करतात त्यांचा योगक्षेम मी स्वतः चालवतो” या वचनावर दृढ श्रद्धा संतांची असते. त्यामुळेच ते देवाशी भांडूही शकतात.  

तुकाराम महाराजांचे काही अभंग असे देवाशी भांडण व्यक्त करणारे आहेत.

तुझें नाम मुखीं तयासी विपत्ति आश्‍चर्य हें चित्ती वाटतसे

काय जाणों देवा होसील निजला नेणों जी विठ्ठला मायबापा

तुका म्हणे माझें दचकलें मन वाटे वायांविण श्रम केला

 देवाला इथे तुकाराम महाराज चक्क, ‘झोपला होता काय?’ असे खडसावून विचारीत आहेत! (भक्तांवर, तुझे नांव घेणाऱ्यांवर विपत्ति येतात, त्यावेळी धावून न येता नुसती गंमत पाहतोस). आणि देवा, तुझे नांव घेण्याचा उगाच खटाटोप केला असे म्हणत आहेत!

____________________

तसेंच खालील अभंगात, तुम्ही निर्गुणाची ‘खोळ’ ओढून बसला आहात, मग आम्हालाच का डोळे आणि कान दिले, या डोळ्यांनी आणि कानांनी तुमची अपकीर्ति पाहिली आणि ऐकली जात नाही, असे सांगतात.

तुम्ही बैसलेती निर्गुणाचे खोळे आम्हां कां हे डोळे कान दिले

नाइकवे तुझी अपकीर्ति देवा अव्हेरली सेवा देखवे

आपुले पोटीं तों राखियेला वाव आम्हांसी कां भाव अल्प दिला

तुका म्हणे दु:खी असें हें कळों द्या पुढलिया धंद्या मन नेघे

________________________

आणि खालील अभंगात तर, हरि तूं  निष्ठुर असेही म्हणतात! आणि पुढे त्या अभंगात, हरिश्चंद्राचे, शिबी राजाचे, बळी राजाचे, उदाहरण देऊन म्हणतात, की या तुझ्या भक्तांचे तू सर्वस्व हरण केलेस. तुला भावाने जे भजतात, त्यांच्या संसाराची तू ही गति करतोस,

हरि तूं निष्ठुर निर्गुण नाहीं माया बहु कठिण

नव्हे तें करिसी आन कवणें नाहीं केलें तें

घेऊनि हरिश्चंद्राचें वैभव राज्य घोडे भाग्य सर्व

पुत्र पत्नी जीव डोंबा घरीं वोपविलीं

राजा शिबी चक्रवर्ती कृपाळु दयाळु भूतीं

तुळविलें अंतीं तुळें मांस तयाचें

बळी सर्वस्वें उदार जेणें उभारिला कर

करूनि काहार तो पाताळीं घातला

तुज भावें जे भजती त्यांच्या संसारा हे गति

ठाव नाहीं रे पुढती तुका म्हणे करिसी तें

__________________

आणखी एका अभंगात, देवा तू आंधळ्याची काठी हिरावून घेऊन त्याला कड्यावर लोटून देतोस, आणि साखर म्हणून हातात माती देतोस असेही म्हणतात.

अंधळ्याची काठी हिरोनियां कडा लोटी

हें कां देखण्या उचित लाभ किंवा कांहीं हित

चाळवूनि हातीं साकर म्हणोनि द्यावी माती

तुका म्हणे वाटे देवा पसरावे सराटे

__________________

तसेच खालील अभंग “आम्हां गांजी जन । तरि कां मेला नारायण” इतक्या अटीतटीने देवाशी भांडणारे आहेत.

आम्हां गांजी जन तरि कां मेला नारायण

झालों पोरटीं निढळें ठाव नाहीं बुड आळें

आम्हीं जना भ्यावें तरि कां लाजिजे देवें

तुका म्हणे देश झाला देवाविण ओस

 

कामधेनचें वासरू खाया मिळे काय करूं

ऐसें आम्हां मांडियेलें विठो त्वां कां सांडियेलें

बेसुनि कल्पद्रुमातळीं पोटासाठी तळमळी

तुका म्हणे नारायणा भले लोकीं हें दिसेना

दुष्काळात जेंव्हा खायलाही मिळत नव्हते, तेंव्हाही भांडण विठ्ठलाशीच होते! त्यांनी कोणापुढेही हात पसरला नाही. शिवाजी महाराजांनी दिलेला धनाचा नजराणा, त्यांनी आदरपूर्वक परत पाठविला, ही कथा प्रसिद्धच आहे.

दिवट्या, छत्री, घोडे। हें तों बऱ्यांत न पडे।।
आतां येथे पंढरीराया। मज गोविसी कासया।।
मान दंभ चेष्टा। हें तो शूकराची विष्ठा।।
पुढे ते म्हणतात,
तुमचें येर वित्त धन। तें मज मृत्तिकेसमान।।
कंठी मिरवा तुळसी। व्रत करा एकादशी।।

 _____________________

 देवाशी भांडणात एके ठिकाणी तर ते म्हणतात, देवा, आम्ही पतित नसतो, तर तू पतितपावन कसा झाला असतास?

जरी मी पतित नव्हतों देवा तरि तूं पावन कैंचा तेव्हां

म्हणोनि माझें नाम आधीं मग तूं पावन कृपानिधी

लोहो महिमान परिसा नाहीं तरी दगड जैसा

तुका म्हणे याचकभावें कल्पतरु मान पावे

 देवा, आम्ही मोठ्या नवसाने तुला झालोत, नाहीतर तुझे नांव कोणी घेतले असते, एवढेच काय, तुला पिंडदान तरी कोणी केले असते!?

 नवां नवसांचीं झालों तुम्हासी वाणीचीं

कोण तुझें नाम घेतें देवा पिंडदान देतें

कोण होतें मागे पुढें दुजे बोलाया रोकडें

तुका म्हणे पांडुरंगा कोणा घेतासि वोसंगा

__________________

संत ज्ञानेश्वर यांना सर्व संत आपली माऊली मानत. तुकाराम महाराजही ज्ञानेश्वरांबद्दल बोलतांना आपल्या भावना खालील शब्दांत व्यक्त करतात-

जयाचिये द्वारीं सोन्याचा पिंपळ अंगीं ऐसें बळ रेडा बोले

करील तें काय नव्हे महाराज परि पाहे बीज शुद्ध अंगीं

जेणें हे घातली मुक्तीची गवांदी मेळविली मांदी वैष्णवांची

तुका म्हणे तेथें सुखा काय उणें राहे समाधानें चित्ताचिया

 

बोलिली लेंकुरें वेडी वांकुडीं उत्तरे

करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध

नाहीं विचारिला अधिकार म्यां आपुला

तुका म्हणे ज्ञानेश्‍वरा राखा पायांपें किंकरा

____________

आणि खालील अभंग तर पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या आवाजात अजूनच प्रभावीपणे व्यक्त केला आहे-

ज्ञानियांचा राजा हा अभंग येथे ऐकू शकता

ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव ऐसें तुम्हां

मज पामरा हें काय थोरपण पायींची वाहाण पायीं बरी

ब्रह्मादिक जेथें तुम्हां वोळगणें इतर तुळणें काय पुढें

तुका म्हणे नेणें युक्‍तीची ते खोली म्हणोनी ठेविली पायीं डोई

 __________________

 शरीराबद्दल बोलतांना शरीर हे चांगलेही नाही आणि वाईटही नाही. तसे पाहायला गेले तर शरीर हे दुःखाचे कोठार, घाणीचे आगर आहे. पण हेच शरीर हरिभजनासाठी कामाला येते म्हणून हे शरीर चांगले आहे, असे सांगतात.

 शरीर दुःखाचें कोठार शरीर रोगाचें भांडार

शरीर दुर्गंधीची थार नाहीं अपवित्र शरीरा ऐसें

शरीर उत्तम चांगलें शरीर सुखाचे घोसुलें

शरीरें साध्य होय केलें शरीरें साधलें परब्रह्म

शरीर विटाळाचें आळें मायामोहपाश जाळें

पतन शरीराच्या मुळें शरीर काळें व्यापिले

शरीर सकळ हें शुद्ध शरीर निधींचाही निध

शरीरें तुटे भवबंध वसे मध्यभागीं देव शरीरा

शरीरा सुख नेदावा भोग द्यावें दु: करीं त्याग

शरीर वोखटें ना चांग तुका म्हणे वेग करीं हरिभजनीं

 ____________

आजकाल, सगळे आयते मिळाले तर बरे, असा विचार असतो. पण हा विचार आजकालचाच नाही, तर त्याकाळीही लोकांना एखाद्या बाबाजीच्या मागे लागावे, आणि त्याने आपल्याला आयते मोक्षपद द्यावे, अशी इच्छा असे. पण तुकाराम महाराज हे अशा लोकांचा मोहभंग अत्यंत निर्भीडपणे करतात. इंद्रियांचा जय साधून, मन एकाग्र करून, निर्विषय करूनच हे साध्य होईल असे बजावतात. आणि स्वप्नातील घावाने काय विव्हळतोस, हे सर्व मिथ्या आहे, असे समजावतात.

 नाहीं देवापाशीं मोक्षाचें गांठोळें आणूनि निराळें द्यावें हातीं

इंद्रियांचा जय साधूनियां मन निर्विषय कारण असे तेथें

उपवास पारणीं अक्षरांची आटी सत्कर्मा शेवटीं असे फळ

आदरें संकल्प वारीं अतिशय सहज तें काय दुःख जाणे

स्वप्नींचिया घायें विवळसी वायां रडे रडतियासवें मिथ्या

तुका म्हणे फळ आहे मूळापाशीं शरण देवासी जाय वेगीं

 

आपण आज तुकाराम महाराजांचे आणखी काही स्फुट अभंग पाहिले. पुढील लेखात अजून काही अत्यंत परिणामकारी अभंग पाहणार आहोत.

 

आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. आणि लाईक करणे.

माधव भोपे

संत तुकारामांचे अभंग-4 Sant Tukaram abhang-4

tukaram-3

Sant Tukaram abhang-4 

संत तुकारामांचे अभंग-4 

महाराष्ट्रात 16 व्या आणि 17 व्या शतकात होऊन गेलेले थोर संत तुकाराम महाराज यांचे अभंग आपण पाहत आहोत. आतापर्यंत 3 भागांमध्ये आपण तुकाराम महाराजांचे कांही अभंग पाहिले. संत हे स्वभावतः क्षमाशील असतात. तुकाराम महाराजांची आणि मंबाजीची गोष्ट आपल्याला माहित आहे. पण संतांचे भांडण देवाशी असते. तसे अभंग बुडविल्यानंतर त्यांनी देवाशी भांडण मांडले होते, आणि नंतर अभंग वर आल्यावर त्यांना, देवाला विनाकारण त्रास दिल्याबद्दल पश्चात्तापही झाला होता. अशाच एका अभंगात, तुकाराम महाराज विठ्ठलाचा मायाळूपणा वर्णन करतांना, आपल्या अपराधांबद्दल क्षमा मागतात. या अभंगातील शब्दरचना ही किती गोड आहे-

 

तूं माउलीहून मायाळ । चंद्राहूनि शीतळ

पाणियाहूनि पातळ । कल्लोळ प्रेमाचा ।

देऊं कशाची उपमा । दुजी तुज पुरुषोत्तमा

ओंवाळूनि नामा । तुझ्यावरूनि टाकिलों ।

तुवां केलें रे अमृता । गोड त्याही तूं परता

पांचां तत्त्वांचा जनिता । सकळ सत्तानायक ।

कांहीं न बोलोनी आतां । उगाच चरणीं ठेवितों माथा

तुका म्हणे पंढरिनाथा । क्षमा करीं अपराध ।

 

__________________________________

 

अशाच दुसऱ्या एका अभंगात आपल्याला अवगुणी, अन्यायी असे संबोधून ते विठ्ठलाचा धावा करतात. विठ्ठलाला ‘विठ्ठले’ म्हणून माऊलीरूप समजून हाक मारण्याची पद्धतही किती गोड आहे!

 

मी अवगुणी अन्यायी । किती म्हणोन सांगों काई

आतां मज पायीं । ठाव देई विठ्ठले ।

पुरे पुरे हा संसार । कर्म बळिवंत दुस्तर

राहों नेदी स्थिर । एके ठायीं निश्चळ ।

अनेक बुद्धीचे तरंग । क्षणक्षणां पालटती रंग

धरू जातां संग । तंव तो होतो बाधक ।

तुका म्हणे आतां । अवघी तोडीं माझी चिंता

येऊनि पंढरिनाथा । वास करीं हृदयीं ।

 

_____________________

विठ्ठलाच्या भेटीसाठी काकुळतीला येऊन केलेले अनेक अभंग वाचतांना आणि म्हणतांना तर डोळ्यात पाणी येते.

 

कन्या सासुऱ्यासी  जाये । मागे परतोनि पाहे

तेसें झालें माझ्या जिवा । केव्हां भेटसी केशवा

चुकलिया माये । बाळ हुरूहुरू पाहे

जीवनावेगळी मासोळी । तैसा तुका तळमळी

 

 

भेटीलागीं जीवा लागलीसे आस । पाहे रात्रंदिवस वाट तुझी

पूर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन । तैसे माझें मन वाट पाहे

दिवाळीच्या मुळा लेकी आसावली । पाहतसे वाटुली पंढरीची

भुकेलिया बाळ अति शोक करी । वाट पाहे परि माउलोची

तुका म्हणे मज लागलीसे भूक । धांवूनि श्रीमुख दावीं देवा

 

 

वाटुली पाहातां सिणले डोळुले । दाविसी पाउले कैं वो डोळां

तूं माय माउली कृपेची साउली । विठ्ठले पाहिली वास तुझी

कां बा मोकलिलें कोणा निरविलें । कठिण कैसें झालें हृदय तुझें

तुका म्हणे माझ्या आसावल्या बाह्या । तुज क्षेम द्याया पांडुरंगा

 

__________________

 

ते विठ्ठलालाच, तुझे ध्यान कसे करू हे तूच सांग असे काकुळतीला येऊन विचारतात.

 

कैसे करूं ध्यान कैसा पाहों तुज । वर्म दावी मज याचकासी

कैसी भक्ति करूं सांग तुझी सेवा । कोण्या भावें देवा आतुडसी

कैसी कीर्ति वाणूं कैसा लक्षा आणूं । जाणूं हा कवणू कैसा तुज

कैसा गाऊं गीतीं कैसा ध्याऊं चिती । कैसी स्थिती मती दावीं मज

तुका म्हणे जेसें दास केलें देवा । तेसें हें अनुभवा आणीं मज

 

_______________

 

आपल्यासारखी संसारी माणसें, देवाला, धन, धान्य, समृद्धि, कीर्ती, आणि काय काय मागतात. पण तुकाराम महाराजांचे मागणे अगदी माफक होते. माझा देह कुठेही असो, आणि कसल्याही अवस्थेत असो, पण चित्त मात्र तुझ्या पायी राहू दे, हेच त्यांचे मागणे होते. आणि देह अवसानी- म्हणजे देह सोडायची वेळ येईल तेंव्हा फक्त कफ-वात-पित्त हे दूर सारून ठेव, जेणे करून की मला तुझे नांव घेता येईल.  

 

आतां केशीराजा हेंचि विनवणी । मस्तक चरणीं ठेवीतसें

देह असो माझा भलतिये ठायीं । चित्त तुझ्या पायीं असां द्यावें

कफवातपित्त देहअवसानीं । ठेवावीं वारूनि दुरितें हीं

तुका म्हणे तूं या सकळांचा जनिता । येथें ऐक्यता सकळांसी

 

 

देवा आतां ऐसा करीं उपकार । देहाचा विसर पाडी मज

तरीच हा जीव सुख पावे माझा । बरें केशीराजा कळों आलें

ठाव देई चित्ता राखें पायांपाशीं । सकळ वृत्तींसी अखंडित

आस भय चिंता लाज काम क्रोध । तोडावा संबंध यांचा माझा

मागणें तें एक हेंचि आहे आतां । नाम मुखीं संतसंग देई

तुका म्हणे नको वरपंग देवा । घेई माझी सेवा भावशुद्ध

 

______________________

 

तुकाराम महाराज कीर्तन करू लागले, लोक त्यांच्या कीर्तनाला येऊ लागले, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊ लागले, आणि तुकाराम महाराजांचे नांवही होऊ लागले. पण ते या कीर्तीने अस्वस्थ होत आणि पुन्हा विठ्ठलाची करुणा भाकून यापासून वाचव म्हणून साकडे घालत.

 

 

नव्हें दास खरा । परि हा झालासे डांगोरा

यासी काय करू आतां । तूं हें सकळ जाणता

नाहीं पुण्य गाठीं । जें हें वेचूं कोणासाठी

तुका म्हणे कां उपाधि । वाढविली कृपानिधि

 

दिवट्या छत्री घोडे । हें तों बऱ्यात  न पडे

आतां येथें पंढरिराया । मज गोविसी कासया

मान दंभ चेष्टा । हे तो शूकराची विष्ठा

तुका म्हणे देवा । माझे सोडवणें धांवा

 

नावडे जें चित्ता । तेंचि होसी पुरविता

कां रे पुरविलो पाठी । माझी केली जीवें साठीं

न करावा संग । वाटे दुरवावें जग

सेवावा एकांत । वाटे न बोलावी मात

जन धन तन । वाटे लेखावें वमन

तुका म्हणे सत्ता । हातीं तुझ्या पंढरीनाथा

 

 

तुकाराम महाराजांचे खूप अभंग खूप प्रसिद्ध आहेत. आपण इथे त्यातील काही कमी प्रसिद्ध असे अभंग पाहत आहोत. या वाटचालीत पुढील भागात आपण अजून काही अभंग पाहणार आहोत.

आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. किंवा लाईक करणे.

माधव भोपे

संत तुकारामांचे अभंग-3 Sant Tukaram abhang-3

tukaram-3

Sant Tukaram abhang-3

संत तुकारामांचे अभंग-3

संत तुकारामांचे अभंग पाहत असतांना आपण मागील लेखात काही स्फुट अभंग पाहिले..

तुकरामांनी त्यांच्या अभंगात ठिकठिकाणी आपल्या जीवनातील काही घटना कुठलाही आडपडदा न ठेवता वर्णन केल्या आहेत. खालील अभंगात त्यांनी आपल्या जन्मापासून ते इंद्रयाणीत वह्या बुडवीपर्यन्तच्या वेगवेगळ्या घटना थोडक्यात वर्णन केल्या आहेत.

तुकाराम महाराज वाणी समाजाचे; त्यांचे घराणे मोरे आणि आडनाव अंबिले होते.

तुकोबांना त्यांच्या प्रापंचिक जीवनात विपत्तींचे तडाखे सहन करावे लागले. अनेक प्रापंचिक दुःखे भोगावी लागली. ते १७-१८ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील मरण पावले, मोठा भाऊ विरक्तीमुळे तीर्थाटनाला निघून गेला. भयंकर दुष्काळाचा त्यांना सामना करावा लागला. त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला, गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली. मन उदास झाले, संसारात विरक्ती आली. या परिस्थितीत त्यांनी श्रीविठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली. चिरंतनाचा, शाश्वताचा शोध घेत असताना त्यांना साक्षात्कार झाला. तेथेच परब्रह्मस्वरूप ‘श्रीविठ्ठल’ त्यांना भेटला असे मानले जाते. तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु एकदा दुष्काळ पडला असता त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले. जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने-कीर्तने करताना तुकारामांना अभंगांची रचना स्फुरू लागली.

संत तुकारामांना चार मुले होती. त्यापैकी दोन आजाराने मरण पावले. पहिली बायको गेल्यानंतर जिजाऊ हिच्याबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. ती स्वभावाने खाष्ट होती पण नवऱ्याला माया लावणारी होती. संत तुकारामांचा संसार तिने नीट सांभाळला. संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर आत्मचिंतनासाठी तेरा दिवस बसले. ईश्वराची करुणा भाकत चिंतन केले, त्यावेळी त्यांची सर्व देखभाल जिजाऊने केली.Sant Tukaram abhang-3

नंतर, प्राकृतात रचना केली म्हणून जेंव्हा त्यांना त्यांचे अभंग इंद्रयाणीत बुडविण्याची आज्ञा झाली, तेंव्हा अभंग इंद्रयाणीत बुडवून ते व्यथित होऊन इंद्रायणीकाठीच तेरा दिवस आकांत मांडून, देवाशी भांडण काढून बसले. नंतर त्यांच्या अभंगांच्या वह्या कोरड्या बाहेर आल्यानंतर, देवाला आपल्यासाठी विनाकारण त्रास दिल्याबद्दल त्यांना पश्चाताप झाला. तेही त्यांनीं आपल्या अभंगांतून व्यक्त केले आहे.

 याती शूद्र वैश्य केला वेवसाव । आधीं तो हा देव कुळपूज्य

नये बोलों परि पाळिलें वचन । केलियाचा प्रश्‍न तुम्हीं संतीं

संवसारें जालों अतिदुःखें दु:खी । मायबापें सेखीं क्रमिलिया

दुष्काळें आटिलें द्रव्य नेला मान । स्त्री एकी अन्न अन्न करितां मेली

लज्जा वाटे जीवा त्रासलों या दुःखें । वेवसाय देखें तुटी येतां

देवाचें देऊळ होतें जें भंगलें । चित्तासी तें आलें करावेंसें

आरंभीं कीर्तन करी एकादशी । नव्हतें अभ्यासीं चित्त आधीं

कांहीं पाठ केलीं संतांची उत्तरें । विश्‍वासें आदरें करोनियां

गाती पुढें त्यांचें धरावें ध्रुपद । भावें चित्त शुद्ध करोनियां

संतांचें सेविलें तीर्थ पायवणी । लाज नाहीं मनीं येऊं दिली

ठाकला तो कांहीं केला उपकार । केलें हें शरीर कष्टवूनि

वचनें मानिलीं नाहीं सुहृदांचीं । समूळ प्रपंची वीट आला

सत्यअसत्यासी मन केलें ग्वाही । मानियेलें नाहीं बहुमतां

मानियेला स्वप्नीं गुरूचा उपदेश । धरिला विश्वास दृढ नामीं

यावरी या जाली कवित्वाची स्फूर्ति । पाय धरिले चित्तीं विठोबाचे

निषेधाचा कांहीं पडिला आघात । तेणें मध्यें चित्त दुखवलें

बुडविल्या वह्या बैसलों धरणें । केलें नारायणें समाधान

विस्तारीं सांगतां बहुत प्रकार । होईल उशीर आतां पुरे

आतां आहे तैसा दिसतो विचार । पुढील प्रकार देव जाणे

भक्तां नारायण नुपेक्षी सर्वथा । कृपावंत ऐसा कळों आलें

तुका म्हणे माझें सर्व भांडवल । बोलविले बोल पांडुरंगे

 


 

अभंगांच्या वह्या बुडविल्यानंतरचा आकांत त्यांनीं खालील अभंगात मांडला आहे

तेरा दिवस झाले निश्‍चक्र करितां पवसी अनंता मायबापा

पाषाणांची खोळ घेऊनि बैसलासी काय हषीकेशी झालें तुज

तुजवरी आतां प्राण मी त्यजीन हत्या मी घालीन पांडुरंगा

फार विठाबाई धरिली तुझी आस करीन जीवा नाश पांडुरंगा

तुका म्हणे आतां मांडिले निर्वाण प्राण हा सांडीन तुजवरी

 

आणि जेंव्हा विठ्ठलाच्या कृपेने तेराव्या दिवशी अभंगांच्या वह्या कोरड्या बाहेर आल्या त्यावेळी झालेला पश्चात्ताप त्यांनीं खालील अभंगात व्यक्त केला आहे.

थोर अन्याय केला तुझा अंत म्यां पाहिला

जनाचियां बोला साठीं चित्त क्षोभविलें

भागविलासी केला सीण अधम मी यातीहीन

झांकूनि लोचन दिवस तेरा राहिलों

अवघें घालूनियां कोडें तहानभुकेचें सांकडे

योगक्षेम पुढें तुज करणें लागलें

उदकीं राखिले कागद चुकविला जनवाद

तुका म्हणे ब्रीद साच केलें आपुलें

 

संसारात इतक्या विपत्ति आल्या तरी ‘जे होते ते बऱ्यासाठीच’, या विचाराने ते लिहितात-

बरें झालें देवा निघालें दिवाळें । बरी या दुष्काळें पीडा केली

अनुतापें तुझें राहिलें चितन । झाला हा वमन संवसार

बरें झालें देवा बाईल कर्कशा । बरी हे दुर्दशा जनामध्यें

बरें झालें जगीं पावलों अपमान । बरें गेलें धन ठोरें गुरे

बरें झालें नाहीं धरिली लोकलाज । बरा आलों तुज शरण देवा

बरें झालें तुझें केलें देवाईल । लेंकरें बाईल उपेक्षिलीं

तुका म्हणे बरें व्रत एकादशी । केलें उपवासी जागरण

 ____________________

 तुकाराम महाराजांना त्यांच्या गुरूची फक्त ओझरतीच भेट झाली. राघवचैतन्य केशवचेतन्य- बाबाजी असे त्यांच्या गुरूंचे नांव असल्याचे तुकाराम महाराज सांगतात. माघ शुद्ध दशमी, गुरुवारी त्यांनीं गंगास्नानाला (इंद्रायणी) जातांना आपल्याला अचानक ‘सापडविले’, आपल्या डोक्यावर हात ठेवला, आणि ‘रामकृष्ण हरि’ हा मंत्र दिला, असे ते सांगतात. पण गुरूंची काही सेवा घडली नाही म्हणून ते खंत पण व्यक्त करतात.

babaji chaitanya

 सद्गुरुरायें कृपा मज केली । परि नाहीं घडलीं सेवा कांहीं

सांपडविलें वाटे जातां गंगास्नाना । मस्तकीं तो जाणा ठेविला कर

राघवचैतन्य केशवचेतन्य । सांगितली खूण माळिकेची

बाबाजी आपुलें सांगितलें नाम । मंत्र दिला राम कृष्ण हरि

माघ शुद्ध दशमी पाहूनी गुरुवार । केला अंगीकार तुका म्हणे


रामकृष्ण हरि या नांवाचा आधीच त्यांना छंद लागला होता, आणि गुरूंनी तोच त्यांच्या आवडीचा मंत्र त्यांना सांगितला. त्यांना कुठे गुहेत जावे लागले नाही, की तप करावे लागले नाही, हेही त्यांनीं सांगितले आहे.

माझिये मनींचा जाणोनियां भाव । तो करी उपाव गुरुरावो

आवडीचा मंत्र सांगितला सोपा । जेणें नोहे गुंफा कांहीं कोठें

जाती पुढें एक उतरले पार । हा भवसागर साधुसंत

जाणत्या नेणत्या ज्या जैसी आवडी । उतार सांगडी तापे पेटे

तुका म्हणे मज दावियेला तारू कृपेचा सागरु पांडुरंग


मागील एका लेखात जसे आपण बघितले होते, तोच अभंग इथे पुन्हा उद्धृत करीत आहोत, ज्याच्यात त्यांनीं नामदेवांनी आपल्याला त्यांचे राहिलेले कार्य पूर्ण करण्याबद्दल स्वप्नात येऊन सांगितल्याचा उल्लेख आहे.

ामदेवें केलें स्वप्नामाजीं जागें । सवें पांडुरंगे येऊनियां

सांगितलें काम करावें कवित्व । वाउगें निमित्य बोलों नये

शेवटील स्थळ नीच माझी वृत्ति । आधारें विश्रांती पावईन

नामदेवापायीं तुकया स्वप्नीं भेटी । प्रसाद हा पोटीं राहिलासे

संत तुकारामांची अभंग संपदा एवढी मोठी आहे, आणि एवढी रसाळ आहे, की त्यातून निवड करणे शक्य नाही. तरी आपण त्यातील काही मुख्य मुख्य अभंग येत्या काही लेखांत पाहणार आहोत.

आपणांस ही लेखमाला आवडत असल्यास कॉमेंट करून कळविणे. किंवा लाईक करणे.

 

 

माधव भोपे

Mind blowing experiences of a Banker-16 एका बँकरचे थरारक अनुभव-16

angry judge-1

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

Mind blowing experiences of a Banker-16

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 16)

अविरत गतिमान काळ कधीही कुणासाठीही थांबत नसतो. जीवनाचं रहाटगाडं रडत खडत, ठेचकाळत, अवघड परिस्थितीतून मार्ग काढीत, कसंबसं मार्गक्रमण करीत पुढे पुढे जातच होतं. कोर्टाच्या तारखा सुरू झाल्या होत्या. आम्हा सर्व पाचही आरोपींच्या नावाने समन्स जारी झालं होतं. प्रत्येक तारखेला बेबी सुमित्रा वगळता आम्ही चौघेही न चुकता कोर्टात हजर रहात होतो.

आम्ही चौघांनीही आमच्यावरील “संगनमताने सौ. रत्नमाला बोडखे यांची आर्थिक फसवणूक” केल्याचा आरोप अमान्य केल्यामुळे कोर्टाने आमच्यावर आरोप निश्चित करून सुनावणी साठी पुढील तारीख दिली. सुरवातीला दर पंधरा वीस दिवसांनी तारीख असायची. आणि आम्ही चौघेही सकाळी दहा वाजल्यापासून आमच्या केसचा पुकारा होण्याची वाट पहात कोर्टाच्या व्हरांड्यात ताटकळत बसलेलो असायचो. सुखदेव सुद्धा आपल्या कुटुंबासह त्या व्हरांड्यातच जाणून बुजून अगदी आमच्या समोरची जागा धरून बसायचा.Mind blowing experiences of a Banker-16

“आरोपी क्रमांक ए sss क ! श्री. xxxx हाजीर हो sss !” असा कोर्टातील पट्टेवाला माझ्या नावाने जेंव्हा पुकारा करायचा तेंव्हा माझ्याकडे बोट दाखवून “आरोपी.. आरोपी..” असे म्हणून डिवचत सुखदेव खदाखदा हसायचा. त्याच्या त्या कुत्सित विकट हास्यात पराकोटीचा द्वेष आणि सूडभावना भरलेली दिसायची. अत्यंत शांत, निर्विकार मुद्रेने मी सुखदेवच्या त्या बालिश वर्तनाकडे दुर्लक्ष करून मान झुकवून अदबीने न्यायमूर्तींसमोर हजर व्हायचो. आपण एवढं चिडवूनही हे साहेब अजिबात कोणतीही प्रतिक्रिया देत नाहीत हे पाहून सुखदेव मनोमन अतिशय चरफडत असे.

सुखदेवच्या त्या दुष्ट वर्तनाचा कोर्टातील पट्टेवाल्या शिपायासही खूप राग येत असे. मला “आरोपी” असे म्हटल्यामुळे सुखदेवला विकृत आनंद होतो हे लक्षात आल्यावर त्या पट्टेवाल्याने मला आरोपी म्हणून माझ्या नावाचा पुकारा करणे कायमचेच सोडून दिले. उलट, आमच्या केसचा पुकारा केल्यावर मला पाहून कमरेत झुकून तो आदराने “या साहेब..” असे म्हणायचा. आणि हे पाहून तर सुखदेवचा अधिकच जळफळाट होत असे.

बेबी सुमित्राने वैजापूरला येण्यापूर्वी युनियन बँकेची प्रोबेशनरी ऑफिसर साठीची लेखी परीक्षा दिली होती. तिचा निकाल लागून बेबी त्यात उत्तीर्ण झाली आणि इंटरव्ह्यू नंतर तिला गावाच्या जवळच रायपूर येथे पोस्टिंगही मिळाली. अशारीतीनं वैजापूर सोडावं लागणं ही तिच्या दृष्टीने एकप्रकारे इष्टापत्तीच ठरली. बेबीने ताबडतोब आम्हा सर्वांना फोन करून ही गुड न्यूज कळवली.girl talking over phone

नोकरी लागल्यानंतर आपले गाव कायमचे सोडून बेबी आपल्या आईवडिलांसह रायपूर इथे रहात होती. बेबीच्या नावावर कोर्टाने पाठविलेली सर्व समन्स योग्य पत्त्याअभावी परत येत होती. कोर्टाने तसेच पोलिसांनी देखील बेबीच्या नवीन पत्त्याची आमच्याकडे वारंवार मागणी केली. परंतु बँकेच्या रेकॉर्डवरील बेबीचा जुनाच पत्ता आम्ही त्यांना दिला आणि तिचा सध्याचा ठावठिकाणा ठाऊक नसल्याचे त्यांना कळवले. आधीच खूप काही सोसलेल्या बेबीला निदान या वैजापुरच्या कोर्ट केसच्या त्रासापासून तरी दूरच ठेवावं अशीच यामागे आमची प्रामाणिक सदिच्छा होती.

कोर्टाच्या दहा पंधरा तारखा झाल्या तरी केसच्या सुनावणीला काही सुरवात होत नव्हती. सर्व आरोपी व फिर्यादी हजर असल्याशिवाय केसची सुनावणी सुरू करता येत नाही असा कोर्टाचा नियम असल्याने बहुदा ह्या केसची सुनावणी दीर्घकाळ पर्यंत सुरूच होणार नाही अशी चिन्हे दिसत होती. एक रहीम चाचा वगळता आम्हा कुणालाही कोर्ट केस बद्दल घाई नव्हती. आज ना उद्या ग्राहक मंचा कडून आपल्याला नुकसान भरपाई मिळणारच आहे याची खात्री असल्याने सुखदेवही कोर्ट केस बाबत तसा उदासीनच होता. रुपेशला तर त्याच्या गुन्ह्यातील सहभागाबद्दल कोर्टाद्वारे शिक्षा होण्याची पुरेपूर शक्यता असल्याने तो ही कोर्टाच्या तारखांना क्वचितच हजर राहत असे.

रहीम चाचांची मानसिकता मात्र वेगळीच होती. कोर्ट केस मधून निर्दोष मुक्तता होऊन सन्मानाने नोकरीतून निवृत्त व्हावे ही त्यांची इच्छा दुर्दैवाने पूर्ण होऊ शकली नव्हती. कोर्ट केसचा निकाल काय लागेल या चिंतेने निवृत्ती नंतरही त्यांना शांत झोप लागत नसे. केस लवकर निकाली निघावी यासाठी त्यांनी स्वतःचा वेगळा वकिलही लावला होता. बेबी सुमित्राला समन्स बजावता येत नसल्याने तिला वगळून केसचे कामकाज चालवावे.. अशी त्यांनी वकीलातर्फे कोर्टाला विनंती केली. अर्थात या गोष्टीला आम्ही अन्य आरोपी व फिर्यादी यापैकी कुणाचाही आक्षेप नसल्याने बेबी सुमित्राला वगळून केसची सुनावणी करण्यास कोर्टाने मान्यता दिली.

राजू चहावाल्याने हळूहळू पुन्हा चहा घेऊन बँकेत यायला सुरुवात केली होती. साहेबांनी (म्हणजे मी) अशी काय जादू केली की जगन राठोड सारखा कर्दनकाळ ठाणेदारही त्यांच्या वाटेला जाण्यास घाबरतो आहे, याचंच त्याला कोडं पडलं होतं. हे साहेब दिसतात तेवढे साधे सरळ नाहीत, त्यांचे हात थेट वरपर्यंत पोहोचलेले आहेत असा त्याचा पक्का समज झाला आणि त्याच्या मनातील माझ्याबद्दलचा आदर आणखीनच वाढला.tea stall

राजुने पोलिसांना जे वीस हजार रुपये माझ्या नावे परस्पर दिले होते ते त्याने वैजापुरातील एका दारू विक्रेत्या कडून उसने मागून आणले होते. मला ही गोष्ट समजताच मी ताबडतोब त्या दारू विक्रेत्याला बँकेत बोलावून त्याने दिलेले पैसे त्याला परत केले होते. कालांतराने राजूला ही गोष्ट समजली आणि हे साहेब अत्यंत निस्पृह, निरासक्त आहेत, कुणाचेही पाच पैशाचेही उपकार ते घेत नाहीत, ही गोष्ट तो कौतुकाने व अभिमानाने ज्याला त्याला सांगू लागला.

आम्ही एवढ्या कठीण परिस्थितीतून जात असतांनाही कर्मचाऱ्यांची तसेच अधिकारी वर्गाची संघटना आमच्या मदतीला का धावून आली नाही ? असा प्रश्न कुणालाही पडणं हे अगदी साहजिकच आहे. एक तर आम्ही भोगत असलेल्या त्रासाची आमच्या संघटनेच्या नेत्यांना नीटशी यथार्थ कल्पनाच नव्हती. विनाकारण त्या प्रॉब्लेमॅटिक कस्टमरशी आणि पोलिसांशी पंगा घेण्यापेक्षा गुपचूप पणे त्यांच्याशी समझोता करावा, ते मागतील तेवढे पैसे त्यांच्या तोंडावर फेकावे आणि आपली कातडी वाचवावी हेच व्यावहारिक शहाणपणाचं आहे अशीच बहुतांश संघटनेच्या नेत्यांची प्रामाणिक समजूत होती. हे प्रकरण चिघळून वर्तमानपत्रांपर्यंत गेलं आणि पुढे पोलीस केस वगैरे झाली ती आम्ही कस्टमरशी तडजोड न केल्यामुळेच असंच त्यांचं मत होतं. मुळात बरीचशी चूक आमचीही होती. आम्ही आमच्या संघटनांकडे अधिकृतरित्या या प्रकरणात मदतीची याचना कधी केलीच नाही. आमचे नेते आपणहून शाखेला भेट देऊन खरीखुरी वस्तुस्थिती जाणून घेतील अशीच आमची सार्थ अपेक्षा होती. परंतु दुर्दैवानं तसं काहीच घडलं नाही.

याउलट रिजनल ऑफिस मधील आमचे वरिष्ठ अधिकारी तसेच क्षेत्रीय प्रबंधक यांनी मात्र या प्रकरणी वारंवार शाखेत येऊन प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली, स्टाफशी संवाद साधला, त्यांना धीर दिला तसंच तक्रारदार ग्राहकाचीही अनेकदा भेट घेऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. बँक मॅनेजमेंटचा आम्हाला कायमच पूर्ण सपोर्ट होता. तसंच स्टाफचा प्रामाणिकपणा व निर्दोषत्वा बद्दल देखील त्यांना पुरेपूर विश्वास व खात्री असल्यामुळे त्यांना आमच्या बद्दल सहानुभूतीही होती. दुर्दैवाने त्या काळात एक अत्यंत अनुचित घटना घडली, जिचा उल्लेख केल्याशिवाय राहावत नाही.

आम्हाला अटकपूर्व जामीन मिळवून देण्यासाठी ॲड. जोगळेकर साहेबांनी आमच्याकडून प्रत्येकी चाळीस हजार रुपये फी घेतली होती. त्यावेळी, म्हणजे आमच्या फरारी असण्याच्या काळात आमची राहण्याची (पोलिसांपासून लपण्याची) व्यवस्था रिजनल मॅनेजर साहेबांनी बँकेच्या ट्रेनिंग सेंटर मध्येच केली असल्याने रोजच संध्याकाळी आम्ही AGM व DGM साहेबांना भेटायला जात असू. या प्रकरणी स्टाफला करावा लागणारा सर्व प्रकारचा खर्च, वकिलांची फी इत्यादीची प्रतिपूर्ती (Reimbursement) बँकेने केली पाहिजे असेच AGM व DGM साहेबांचे मत होते. परंतु काही विघ्नसंतोषी झारीतील शुक्राचार्यांनी याला विरोध केला. ही केस बँकेविरुद्ध नाही तर वैयक्तिक स्टाफ विरुद्ध असल्याने त्यांना प्रतिपूर्ती (Reimb.) देता येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. आश्चर्य म्हणजे कर्मचारी व अधिकारी या दोन्ही संघटनांच्या काही दुय्यम नेत्यांचाही या शुक्राचार्यांना पाठिंबा होता. बँकेचे दैनंदिन कामकाज पार पाडताना (Routine course) उद्भवलेली ही घटना होती ही साधी गोष्ट देखील त्यांनी ध्यानात घेतली नाही. असो..!

आम्ही त्यावेळी आमच्याच परेशानीत होतो. पैसा आमच्या दृष्टीने अजिबात महत्वाचा नव्हता. तसाही तो खर्च झालाच होता आणि पुढे आणखीही खर्च होणारच होता. लवकरच संघटनेच्या नेत्यांच्या आमच्या प्रती उदासीन वागणुकीची (apathy) ही बाब आम्ही पार विसरूनही गेलो. रविशंकर आणि बेबी सुमित्रा हे दोघेजण अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे असल्याने त्यांचा बँकेच्या हेड ऑफीसमधील त्यांच्या संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांशी केस संदर्भात नेहमीच वार्तालाप होत असे. अशाच एका फोनवरील संवादात त्यांनी बँक वकिलाची फी reimburse करीत नसल्याची बाब त्यांच्या संघटनेच्या सर्वोच्च नेत्याच्या कानावर घातली.

योगायोगाने पी. उग्रसिंह नावाचे ते हेड ऑफिस मधील संघटनेचे झुंजार नेते त्यावेळी बँकेचे वर्कमन डायरेक्टर सुद्धा होते. त्यांनी ताबडतोब औरंगाबादच्या DGM साहेबांना फोन लावून त्यांना अत्यंत कठोर शब्दांत खूप काही सुनावलं.

angry leader

हा फोन सुरू असताना आम्ही DGM साहेबांच्या केबिन मध्येच होतो. हे पी. उग्रसिंह नावाप्रमाणेच अतिशय उग्र, तापट व शीघ्र कोपी होते. त्यांनी अतिशय जालीम, निर्दयी व जहाल भाषेत DGM साहेबांची खरडपट्टी काढली असावी हे DGM साहेबांच्या चेहऱ्यावरील भीती व झरझर बदलणाऱ्या भावांवरूनच समजत होतं. मूळचे काश्मीरचे असणारे श्री. बिजॉय सप्रू नावाचे त्यावेळचे ते DGM म्हणजे एक अत्यंत सहृदय व दिलखुलास व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात एवढे कडक आणि निष्ठुर शब्द कधीच ऐकले नसावेत. पाच दहा मिनिटे ते यंत्रवत फोन धरून पलीकडून होणाऱ्या वाक्-बाणांच्या अग्निवर्षावात न्हाऊन निघत होते. त्यांनी फोन ठेवला तेंव्हा त्यांचा चेहरा घामाने डबडबला होता, हातांना कंप सुटला होता आणि डोळे अश्रूंनी भरले होते. हताश, करुण स्वरात ते म्हणाले..dgm

 

“अरे, मैं तो शुरुसेही आप लोगोंको हर तरह से मदत करने के पक्ष में हूँ.. फिर भी मुझे क्यों ये सब कुछ सुनना पड़ा.. आप के लीडर लोगो ने ही टांग अडाई है.. वरना हमे तो खुशी है आपको expenses reimburse करने में.. !”

मग माझ्याकडे पहात ते म्हणाले..

“इस केस के सिलसिले में आप लोगों को जो कुछ भी खर्च उठाना पड़ा है.. वकील की फीस, यहां आने जाने का रहनेका खर्च.. सभी बैंक reimburse करेंगा.. ! आप सब लोग टीए बिल भी क्लेम कर सकते हो.. मैं आप को सूचित करता हूं कि इस केस से संबंधित सभी स्टाफ expenses तथा TA Bill आदि का आप ब्रांच लेव्हल पर ही तुरंत भुगतान (payment) करो और परिपुष्टि (confirmation) के लिए हमे अवगत कराओ.. हमारी ओर से किसीका भी कोई भी खर्च अस्वीकृत (decline) नही होगा..”

DGM साहेबांसारख्या दयाळू माणसाला आपल्यामुळे विनाकारण बोलणी खावी लागली, पराकोटीची मानहानी, अपमान सहन करावा लागला याचं रविशंकरला खूप वाईट वाटलं. “सर.. आय ॲम व्हेरी सॉरी..” असं म्हणून तो उठून त्यांची माफी मागू लागला, इतक्यात त्या असह्य मानहानीमुळे गळ्याशी दाटून आलेला हुंदका कसाबसा रोखीत DGM साहेब उठले आणि आम्हाला हातानेच बाहेर जाण्याची खूण करीत केबिन मधील वॉशरूम कडे गेले.

आजही DGM साहेबांची त्या दिवशीची ती केविलवाणी, दयनीय अवस्था आठवली की काळजात चरर्र होतं. त्या वाईटातून चांगलं एवढंच निघालं की त्यानंतर नेहमीसाठीच आम्हा सर्वांचे या केस संबंधित सर्वच खर्च व TA Bills आदि विनासायास Reimburse होत गेले.

ॲड. जोगळेकर आणि त्यांचे असिस्टंट ॲड. पुराणिक यांचे अधून मधून मला तसेच रविशंकर, सैनी व रहीम चाचांनी फोन येतच असायचे. चार्जशीट मधून तुमचे नाव वगळून देतो.. इतके इतके पैसे द्या.. वगैरे वगैरे.. एके दिवशी ॲड. पुराणिक साहेबांनी आम्हा सर्वांना फोन करून सांगितलं की पैशांचा अपहार केल्यामुळे जोगळेकर साहेबांनी रश्मीला त्यांच्या ऑफिसातून काढून टाकले आहे. त्यामुळे तिच्याशी कोणताही पैशांचा अथवा अन्य कुठलाही व्यवहार करू नये..

कदाचित जोगळेकर साहेबांच्या मिसेसनी त्यांना रश्मी बरोबर अश्लील चाळे करताना रंगे हाथ पकडलं असावं, आणि म्हणूनच नाईलाजाने त्यांना तिला ऑफिसातून काढून टाकण्याचं नाटक करावं लागलं असेल.. असं समजून पुराणिक साहेबांच्या बोलण्याकडे आम्ही दुर्लक्षच केलं. बरेचदा जोगळेकर साहेब वैजापूरच्या कोर्टातही आलेले दिसायचे. मात्र त्यावेळी ते आमच्याशी साधी ओळखही दाखवीत नसत. नेमकी त्याच दिवशी आमच्या केसचीही तारीख असायची. हा योगायोग असायचा की आणखी काही.. हे शेवटपर्यंत आम्हाला समजलंच नाही.

काही दिवसांनंतर वर्तमानपत्रात एक खळबळ जनक बातमी वाचायला मिळाली. जोगळेकर वकिलांची कार रस्त्यात थांबवून त्यांच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला होता. एक गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली होती. हा हल्ला आपली भूतपूर्व पर्सनल सेक्रेटरी ॲड. मिस रश्मी यांनीच सुपारी देऊन गुंडांकरवी करवला असल्याचा आरोप जोगळेकर साहेबांनी केला होता. गेल्या काही दिवसांपासून रश्मी आपल्याला ब्लॅकमेल करीत असून यावेळी तिची पन्नास लाख रुपयांची मागणी पूर्ण न केल्यामुळेच तिने हा हल्ला केल्याचा गौप्यस्फोटही वकील साहेबांनी केला. तसेच यापूर्वीही आपल्यातील अनैतिक संबंध जगजाहीर करण्याची धमकी देऊन तिने एक चार रूमचा लक्झरी फ्लॅट स्वतःच्या नावे करण्यास आपल्याला भाग पाडल्याचेही जोगळेकर साहेबांनी पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी जरी रश्मीला ताबडतोब अटक केली असली तरी औरंगाबादच्या अनुभवी पोलीस अधिक्षकांना मात्र या हल्ल्यामागे काहीतरी काळंबेरं असल्याचा संशय होता. हा हल्ला म्हणजे एक लुटीपुटीचा फार्स असून ॲड. जोगळेकरांना या हल्ल्याची पूर्वकल्पना असावी असा त्यांचा कयास होता. अवघ्या एक फूट अंतरावरून चालविलेल्या गोळीचा नेम चुकून ती कानाला नुसती ओझरती चाटून जाते हे पोलिसांच्या पचनी पडत नव्हते. पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांकरवी भराभर चौकशीची चक्रे फिरविली आणि अवघ्या दोनच दिवसात गोळ्या झाडणाऱ्या मुन्ना नावाच्या हिस्ट्री शिटर सराईत गुंडाला पिस्तूलासह अटक केली. हा तोच मुन्ना होता जो, जोगळेकर वकिलांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा गेलो असता आम्हाला दिसला होता आणि त्याने आमच्या समोरच जोगळेकर साहेबांना एक देशी कट्टा (गावठी पिस्तुल) ही दिला होता.

पोलिसांनी मुन्नाला चौदावं रत्न दाखवून बोलतं केलं तेंव्हा आपण हा हल्ला जोगळेकर वकिलांच्या सांगण्यावरूनच केला असून रश्मीचा या हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचे त्याने कबूल केले.

या जोगळेकर हल्ला प्रकरणाचा आपल्या कथेशी तसा काहीही संबंध नाही, परंतु पोलीस आणि वकील हे सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे वैधानिक व सामाजिक दायित्व असणारे दोन महत्वाचे समाज घटक आपल्या पदाचा व ज्ञानाचा दुरुपयोग करून कायद्याची व न्यायाची कशी सर्रास क्रूर थट्टा करतात याची कल्पना यावी म्हणून थोडक्यात तिचा येथे उल्लेख केला आहे.

मध्यंतरी ग्राहक मंचाच्या तारखांना सुखदेव हजर न राहिल्यामुळे सुमारे सहा महिने केवळ पुढच्या तारखाच मिळत गेल्या. त्यानंतरच्या तारखेला “चेकवरील सही बनावट असल्याचे सिद्ध झाल्यामुळे नियमानुसार चेकची संपूर्ण रक्कम बचत खात्याच्या व्याजासहित परत करण्यास बँक तयार असल्याचे” मी न्यायाधीशांना सांगितले. त्यावर समाधान व्यक्त करीत पुढील तारखेला नुकसान भरपाईचा धनादेश वा ड्राफ्ट कोर्टासमक्ष फिर्यादीला सुपूर्द करावा असा न्यायाधीशांनी आदेश दिला.

दरम्यान वैजापूर कोर्टात सुरू असलेल्या फौजदारी खटल्याचे कामकाजही संथ गतीने सुरू होते. गुन्ह्यातील आपल्या सहभागाचा पोलिसांना दिलेला कबुलीजबाब रुपेशने कोर्टात साफ नाकारला होता. पोलिसांनी आपल्या विरुद्ध बळाचा वापर केल्यामुळे शारीरिक त्रासाला भिऊनच तो खोटा कबुलीजबाब दिल्याचे त्याने कोर्टाला सांगितले.

ग्राहक मंचाच्या पुढील तारखेपूर्वीच रिजनल ऑफिसच्या सुचनेनुसार तात्पुरते सस्पेन्स खात्याला डेबिट टाकून पाच लाख ऐंशी हजार रुपये अधिक व्याज अशा रकमेचा सौ. रत्नमाला बोडखे यांच्या नावाचा ड्राफ्ट मी तयार करून ठेवला होता. ॲड. ऋतुराज यांनी आपले सारे वकिली कौशल्य व चातुर्य पणाला लावून खालील प्रमाणे एक परफेक्ट तडजोड पत्र तयार केले.

“मला चेकचे सगळे पैसे व्याजासह प्राप्त झाले असून माझे पूर्ण समाधान झाले आहे. माझी बँकेविरुद्ध किंवा बँक कर्मचाऱ्यां विरुद्ध कसलीही नाराजी अथवा तक्रार बाकी उरलेली नाही. तसेच केवळ बँक कर्मचाऱ्यां बद्दलच्या गैरसमजुतीमुळे मी त्यांच्याविरुद्ध जी पोलीस कंप्लेन्ट व कोर्ट कारवाई केली होती ती मी मागे घेईन असे कबूल करते. तसेच बँकिंग लोकपाल, लाचलुचपत प्रतिबंधक खाते, मानवाधिकार आयोग, विविध सामाजिक संस्था व सरकारी विभाग यांच्याकडे बँक व बँक कर्मचारी यांच्याबद्दल याच गैरसमजातून मी ज्या ज्या तक्रारी केल्या होत्या त्या सर्व मी मागे या पत्राद्वारे मागे घेत आहे.”

हे तडजोड पत्र ग्राहक मंचाच्या न्यायाधीशांना दाखविले असता त्यांनी त्या पत्रास मान्यता दिली व या पत्रावर सही केल्यावरच नुकसान भरपाईचा ड्राफ्ट देण्यात येईल असे सौ. बोडखे यांना सांगितले.

सुखदेवने जेंव्हा हे तडजोड पत्र वाचले तेंव्हा तो रागाने थरथरू लागला. आपली ब्लॅकमेलिंग करण्याची सर्व अस्त्रे, शस्त्रे कर्णाच्या कवच कुंडलां प्रमाणे लबाडीने हिसकावून घेतली जात आहेत असेच त्याला वाटले. त्याने या तडजोड पत्रावर सही करण्यास साफ नकार दिला. मात्र सुखदेवच्या लालची वकिलांना त्यांची भली मोठी फी मिळणे हे या नुकसान भरपाईच्या ड्राफ्टचे पैसे मिळण्यावरच अवलंबून असल्याने त्यांनी महात्प्रयासाने सुखदेवची समजूत घालून त्याला व सौ. बोडखेंना त्या तडजोड पत्रावर सही करण्यास भाग पाडले. त्यानंतर न्यायाधीशां समक्ष सुखदेवला आम्ही तो ड्राफ्ट दिला. सुखदेवने लगबगीने बँकेत जाऊन त्याच दिवशी तो ड्राफ्ट वटवून पैसे ताब्यात देखील घेतले.

त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी झोनल ऑफिसमध्ये “मंथली प्रोग्रेस रिव्ह्यू” (P- Review) मीटिंग असल्याने त्यादिवशी मी औरंगाबादलाच थांबलो.

कशी काय कोण जाणे, पण सुखदेवला चेकच्या नुकसान भरपाईचे पैसे मिळाल्याची बातमी वैजापूर पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचली. “नुकसान भरपाईतील आपला हिस्सा बुडाला..” हे कळताच ठाणेदार जगन राठोड चार पाच कॉन्स्टेबलना सोबत घेऊन लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी बँकेत आले. “पोलिसांच्या पूर्व परवानगी शिवाय बँकेने बोडखेंना परस्पर नुकसान भरपाई दिलीच कशी ?” असा प्रश्न विचारून आरडा ओरडा करीत त्यांनी बँकेत प्रचंड गोंधळ घातला. खुर्च्या, टेबल व अन्य फर्निचरची उलथापालथ करून नासधूस केली.

ransacking office

बँकेचा स्टाफ या अकस्मात झालेल्या पोलिसी आक्रमणामुळे घाबरून गेला आणि सर्व काम थांबवून लंच रूम मध्ये जाऊन लपून बसला. अकाउंटंट साहेबांनी तांतडीने मला फोन लावून बँकेत चाललेल्या त्या प्रकाराची माहिती दिली. चालू मिटिंग मधून थोडा वेळ बाहेर जात मी लगेच DySP मॅडमला फोन करून हे वृत्त कळविले. DySP मॅडमचा फोन जाताच फौजदार साहेब घाईघाईतच ठाण्यात परतले. तसंच जाण्यापूर्वी दोन कॉन्स्टेबलना “तुम्ही इथे थांबून सर्व फर्निचर पुन्हा पूर्वी सारखं जागच्या जागी लावून ठेवा..” अशी सूचनाही देऊन गेले.

पोलिसांवर विश्वास ठेवणं, त्यांच्या कडून सभ्य, सुसंस्कृत, सद्-वर्तनाची अपेक्षा ठेवणं किती चुकीचं आणि मुर्खपणाचं होतं हेच पोलिसांनी त्यांच्या त्या दिवशीच्या असभ्य, रानटी वागणुकीने सिद्ध केलं होतं..

असेच दिवस भराभर उलटत होते. मार्च संपताच मलाही बदलीचे वेध लागले. मुलांच्या शिक्षणासाठी फॅमिली औरंगाबादला रहात असल्यामुळे माझी पुढील पोस्टिंग शक्यतो औरंगाबादलाच देण्याचा प्रयत्न करू असे AGM व DGM यांनी मला आश्वासन दिले होते. त्यानुसारच औरंगाबाद सेवा शाखेच्या प्रबंधक पदी लवकरच माझी बदली झाली. येत्या शनिवारी रिलिव्ह होऊन सोमवारी नवीन जागी रुजू होण्याचे रिजनल ऑफिसचे आदेशही प्राप्त झाले.

त्या दिवशी शुक्रवार होता. सर्व काम आटोपून मेस वर जेवण करून मी रूमवर परतलो. रात्री, वैजापुरातल्या गेल्या साडेतीन वर्षातील सर्व कडू गोड क्षणांची उजळणी करीत मी आपल्या बिछान्यावर पहुडलो होतो. उद्या माझा निरोप समारंभ होता. जंग जंग पछाडूनही सुखदेवच्या केसशी निगडित काही काही प्रश्नांची खात्रीशीर, काँक्रीट उत्तरं मला अद्यापही मिळाली नव्हती.

बनावट सहीचा चेक वटवून पाच लाख ऐंशी हजार रुपये घेऊन पसार झालेला तो जयदेव खडके नावाचा अज्ञात इसम कुठे हवेत विरून गेला होता ? पोलिसांना तो खरोखरीच सापडला नाही की पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्नच केला नाही ? रुपेशच्या हस्ताक्षर चाचणीचा अहवाल काय आला ? पोलिसांनी रुपेशला बोलतं का केलं नाही ? सुखदेवचा सुद्धा या गुन्ह्यात नक्कीच सहभाग होता.. कारण दुसऱ्या चेकबुकची मागणी त्यानेच केली होती. मग पोलिसांनी सुखदेव वरच तपास का केंद्रीत केला नाही ? सुखदेव बोडखे, रुपेश जगधने आणि जयदेव खडके या तिघांनी मिळून गुन्ह्याचा कट आखला होता ही गोष्ट तर अगदी सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ, स्पष्ट होती. मग गुन्हे शोधण्यात तरबेज असलेल्या पोलीसांना एवढी साधी गोष्टही लक्षात कशी आली नाही ? कि.. पोलिसांनी जाणूनबुजून गुन्हेगारांना संरक्षण दिलं ?

असे असंख्य अनुत्तरित प्रश्न माझ्या मनात घोळ घालीत होते. उद्या माझी इथून बदली झाल्यावर तर या केस संबंधी पुन्हा कसलीही माहिती मिळणार नाही आणि या प्रश्नांचे गूढ बहुदा तसेच राहणार.. ! अशा विचारातच कधी तरी उशिरा मला झोप लागली.

thinking

(क्रमशः)

(काल्पनिक)

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १५    भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे..