https://goodworld.in A website by Madhav Bhope

उतनूरचे दिवस-1-Memories-at-Utnoor-By Ajay Kotnis

tiger at night

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

Memories-at-Utnoor-1

*उतनूरचे दिवस..*

*थरार… (१)*

उतनूरचा अवघा परिसर घनदाट जंगलाने वेढलेला होता. उंच सखोल डोंगर दऱ्यांच्या मधून जाणाऱ्या अरुंद, निर्मनुष्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या हिरव्यागार पानांचे विशाल उत्तुंग सागवृक्ष होते.

teak forest

 भर दुपारी या सागवृक्षांच्या गर्द सावल्या रस्त्यावर पडल्या की सूर्य प्रकाश अंधुक होऊन संध्याकाळ झाल्याचा भास होत असे. हिंस्त्र, रानटी पशुंचा या जंगलात मुक्त वावर असल्याने त्यांच्या भयामुळे दुपारनंतर रस्त्यावरील रहदारी मंदावत असे. संध्याकाळ नंतर तर कुणीही या रस्त्याने जाण्याचे धाडस करीत नसे.utnoor-8

उतनूरला येऊन मला आता दोन महिने होत आले होते. इथल्या शांत, सुंदर, निसर्गरम्य वातावरणात मी आता चांगलाच रमलो होतो. फक्त दीड ते दोन किलोमीटर लांब रुंद पसरलेल्या त्या छोट्याशा गावाची लोकसंख्या जेमतेम दहा हजार इतकी असावी. तालुक्याचे ठिकाण असल्याने राज्य सरकारच्या सर्व विभागांची कार्यालये तिथे होती. वनक्षेत्र असल्याने फॉरेस्ट खाते तसेच आदिवासी क्षेत्र असल्याने “एकात्मिक आदिवासी विकास संस्था” (Integrated Tribal Development Agency – ITDA) यांची कार्यालयेही त्या गावात होती.

उतनूरच्या ITDA कडे गावातील बराच मोठा भूभाग होता, ज्यावर बोटॅनिकल गार्डन, मधुमक्षिका पालन, रेशीम उत्पादन व ससे प्रजनन (rabbit breeding) असे विविध प्रकल्प राबविले जात. माझा अडीच वर्षांचा मुलगा चि. अनिशला खेळण्यासाठी पांढऱ्याशुभ्र सशांची दोन गोजिरवाणी पिल्ले येथीलच ससे पालन केंद्रातून मी विकत आणली होती.two white rabbits

मी रहात असलेल्या घराला कंपाऊंड वॉल असली तरी कंपाउंडच्या चारी बाजूला भरपूर मोकळी जागा होती. या जागेत वावरणारे नाग, साप, विंचू असे अनेक विषारी, घातक प्राणी नेहमीच कंपाऊंडच्या गेट मधून आत घुसून अंगणात तसेच दरवाज्या समोरील पायऱ्यांवर निर्धास्तपणे पहुडलेले दिसायचे. त्यामुळे निसर्गाच्या सान्निध्यात राहणे जितके आनंददायी तितकेच धोकादायक सुद्धा आहे याची जाणीव होत होती.

सशाची पिल्ले आणण्यापूर्वी चि. अनिश साठी एक मांजराचं पिल्लूही मी घरी आणलं होतं. शेजारीच राहणाऱ्या माझ्या घरमालकाकडे पूर्वीपासूनच एक धिप्पाड कोंबडी पाळलेली होती. त्याच सुमारास घरमालकाचा मुलगा एकदा जंगलातून मोराचं अंडं घेऊन आला. त्या पाळलेल्या कोंबडीने ते अंडं उबवलं आणि एक देखणं मोराचं पिल्लू त्यातून बाहेर आलं.hen

घराच्या गच्चीवर भलं मोठं पाण्याचं टाकं होतं. वेगवेगळ्या जातीचे मासे, खेकडे, विचित्र दिसणारे बेडूक त्या टाक्यात होते. रस्त्याच्या कडेने जात असलेली कासवाची तीन पिल्लेही एकदा घरमालकाच्या त्या मुलाने उचलून आणून त्या टाकीतील पाण्यात सोडली होती. घराभोवतीच्या अंगणात गोडलिंब, शेवगा, गुलमोहर अशी झाडे तसेच गुलाब, चाफा, केवडा, मोगरा, कर्दळी आणि विविधरंगी आकर्षक रानटी फुलांची झाडे होती. निसर्गातील अवघा फ्लोरा आणि फौना (flora & fauna) जणू आमच्या त्या छोट्याशा जागेत एकवटला होता.

जवळपासच्या शेतांतील गलेलठ्ठ उंदीर रोजच रात्री घराच्या व्हेंटिलेटरच्या खिडकीतून आत घुसून खुडबुड करायचे. त्यांच्या मागोमाग त्यांची शिकार करण्यासाठी साप, नाग व रानमांजरं सुद्धा कंपाऊंड मध्ये शिरायची. एकदा एक दहा फूट लांबीचा जाडजूड काळा कभिन्न नाग घरामागील बाथरूम जवळ दिसून आला. आसपास राहणाऱ्या सर्व लोकांनी आरडाओरडा करीत जमून त्याला मारण्याचा खूप प्रयत्न केला. पण ते जनावर खूपच चपळ होते. आम्हा सर्वांचे लाठ्या काठ्यांचे प्रहार चुकवीत क्षणार्धात तो नाग एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे विजेच्या वेगाने सळसळत जायचा. कधी चिडून फणा काढून “हिस्स” असा फुत्कार सोडायचा तर कधी एखाद्या फुलांच्या कुंडीमागे बेमालूमपणे असा निपचित पडून राहायचा की जणू तो हवेतच विरून अदृश्यच झाला असावा असा भास व्हायचा. अखेरीस सगळ्यांना गुंगारा देऊन तो भुजंग अंगणातच कुठेतरी काट्याकुट्यात जो दडून बसला तो शेवटपर्यंत कुणालाच सापडला नाही.

माझा एलटीसी (Leave Travel Concession) चा ब्लॉक 15 डिसेंम्बरला expire होत असल्याने दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ व तामिळनाडू या राज्यात फिरून येण्याचे ठरवले. योगायोगाने त्याच सुमारास माझे आई, वडील, भाऊ व वहिनी आपल्या मुलांसह मला भेटण्यासाठी उतनूरला आले होते. तेंव्हा त्यांनाही सोबत घेऊनच ही दक्षिण भारताची सहल करावी असे ठरवले. त्यानुसार प्रवासासाठी गावातीलच एक टेम्पो ट्रॅक्स गाडी ठरवली आणि येत्या रविवारी दुपारी बारा वाजता उतनूर हून निघून संध्याकाळ पर्यंत हैदराबादला पोहोचायचे असा प्लॅन केला.

ठरल्याप्रमाणे रविवारी दुपारचे बारा वाजण्यापूर्वीच जेवणं खाणं आटोपून आम्ही सारे गाडीची वाट पहात बसलो. मात्र, सकाळी सर्व्हिसिंग साठी आदीलाबादला गेलेली गाडी संध्याकाळ झाली तरी उतनूरला परत आली नव्हती. शेवटी वाट पाहून कंटाळून आम्ही रात्रीची जेवणंही उरकून घेतली. रात्री आठ वाजता गाडी गावात परतली. गाडीच्या मागच्या दरवाजाचे काम अजूनही अर्धवटच राहीले असल्याने तो उघडाच ठेवावा लागत होता. त्यामुळे सोमवारी पुन्हा आदीलाबादला जाऊन दरवाजाचे हे काम पूर्ण करावे आणि मंगळवारी प्रवासाला निघावे किंवा आजच लगेच हैदराबादला निघावे आणि दरवाजाचे राहिलेले काम उद्या म्हणजे सोमवारी हैदराबाद इथेच करून घ्यावे असे दोन पर्याय ड्रायव्हर कृष्णाने आमच्यापुढे ठेवले.

आधीच मोठ्या मुश्किलीने मला आठ दिवसांची सुट्टी मंजूर झाली होती. त्यामुळे इथे थांबून दिवस वाया घालवण्यापेक्षा आत्ता लगेच निघून उद्या सकाळपर्यंत हैद्राबादला पोहोचावे असा निर्णय घेतला. रात्री नऊ वाजता आम्ही गावातून निघालो. मी समोरच्या सीटवर ड्रायव्हर शेजारी बसलो होतो. गावापासून जेमतेम दोन किलोमीटर दूर गेल्यावर लगेच तुरळक जंगलाला सुरवात झाली. छान टिपूर चांदणं पडलं होतं. त्याच्या चंदेरी प्रकाशात रस्ता उजळून निघाला होता. नुकतीच दिवाळी होऊन गेलेली होती. नोव्हेंबर महिना असला तरी थंडीला अजून सुरवात झालेली नव्हती. बाहेरील वातावरण उबदार आणि अत्यंत सुखद होतं. लहान मुलांची बडबड आणि आमच्या आपसातील गप्पा ह्याच्या नादात आम्ही दाट किर्र, निबिड भयाण जंगलात कधी प्रवेश केला ते ध्यानातही आलं नाही.

जंगलातील त्या सुनसान रस्त्यावरून आमची गाडी सुसाट वेगाने पळत होती. गाडीचा मागील दरवाजा उघडाच असल्याने त्यातून अधून मधून वारा आत घुसत असे. बाहेर एवढा मिट्ट काळोख होता की गाडीच्या लांबवर जाणाऱ्या प्रकाश झोतात दिसणारा निर्मनुष्य रस्ता सोडला तर आजूबाजूचं काहीही दिसत नव्हतं. आपण एखाद्या अतिखोल, अंधाऱ्या विवरातून किंवा कधीही न संपणाऱ्या एकाकी,भीषण काळोख्या बोगद्यातूनच प्रवास करीत आहोत असा भास होत होता. बाहेर सर्वत्रच अस्वस्थ, भयावह आणि गूढ शांतता पसरली होती. मुलांची बडबड आणि आमच्या गप्पा आता आपोआपच थांबल्या होत्या. फक्त चालत्या गाडीच्या इंजिनाचा आवाजच त्या भयाण शांततेचा भंग करीत होता.forest

आमच्या गाडीचा ड्रायव्हर कृष्णा हा अंदाजे पंचवीस वर्षे वयाचा हसमुख, उमदा तरुण होता. आतापर्यंत तो ही आमच्या गप्पांत अधून मधून भाग घेत होता, प्रवासातील मनोरंजक अनुभव, किस्से आम्हाला सांगत होता. मात्र हे घोर घनदाट जंगल सुरू होताच तोही निःशब्द होऊन अतिशय सावध नजरेने अवतीभवती पहात काळजीपूर्वक गाडी पुढे नेत होता. एखादा धांदरट, घाबरट ससा मधेच टुणकन उडी मारून रस्ता ओलांडून जायचा तर कधी एखादा बुटकासा कोल्हा तिरप्या मानेने गाडीकडे पहात पहात चपळाईने रस्ता क्रॉस करून पलीकडच्या झाडीत अदृश्य व्हायचा. कितीतरी छोटे मोठे साप नागमोडी वळणं घेत लगबगीने वळवळत गाडीच्या चाकांना चुकवत बाजूच्या काळोखात गडप व्हायचे तर माकडे, हरीण, मोर यासारखे प्राणी रस्त्याच्या कडेला थांबून आमची गाडी निघून जायची वाट पहात असलेले दिसायचे.

रस्ता जसा जसा जास्त दाट अरण्यातून जात होता तशी तशी रातकिड्यांची किरकिर वाढलेली जाणवत होती. दूर जंगलातून रानटी कुत्रे, लांडगे, तरस यांच्या टोळ्यांचे भेसूर आवाजातील हेल काढून एकसुरात सामूहिक रडणे, ओरडणे ऐकू येत होते. उंच झाडाच्या फांदीवर बसलेला एखादा टिटवी सारखा पक्षी साऱ्या आसमंतात घुमणारी कर्णकटु सांकेतिक शीळ घालायचा तेंव्हा तो कुणाला तरी इशारा करतोय किंवा आम्हाला सावध तरी करतोय असं वाटायचं. अचानक मधूनच अनोळख्या जंगली श्वापदाचा जीवघेणा आर्त चित्कार कानावर पडायचा आणि काळजाचं पाणी पाणी व्हायचं. आपण विनाकारणच जीव धोक्यात घालून रात्रीच्या वेळी अशा सुनसान भीतीदायक जंगलातून प्रवास करण्याचा मूर्खपणाचा निर्णय का घेतला याचा आम्हा सर्वांनाच आता मनोमन पश्चाताप होत होता.

आमच्या डोळ्यांतील झोप तर पार उडाली होती. मुलंही कावऱ्या बावऱ्या चेहऱ्यानं समोरच्या डांबरी रस्त्यावर नजर खिळवून भयमिश्रित कुतूहलाने श्वास रोखून बसली होती. काहीतरी आगळं वेगळं, अप्रत्याशित, अकल्पित घडणार आहे किंवा पहायला तरी मिळणार आहे अशी अंतर्मन सतत सूचना देत होतं. आम्ही जिथून जात होतो तो अवघा परिसरच मंतरलेला, जादूने भारलेला, फसवा, मायावी वाटत होता..

अचानक अनुभवी कृष्णाच्या सावध नजरेनं दूर अंतरावरील सागवृक्षांच्या विशाल पानांमागची कसली तरी हालचाल टिपली. गाडीचा वेग कमी करत त्यानं रस्त्याच्या मधोमध गाडी उभी केली. रस्त्यावर कुणीच नव्हतं. मी कृष्णाला काही विचारणार इतक्यात त्यानं तोंडावर बोट ठेवीत मला शांत राहण्याची खूण केली. त्यानंतर तब्बल तीन चार मिनिटं आम्ही सारे तोंडातून एक शब्दही बाहेर न काढता, कसलीही हालचाल न करता रिकाम्या रस्त्याकडे पहात तसेच आपल्या जागी बसून होतो. डोळे फाडफाडून बघितलं तरी आम्हाला कुठेही काहीच दिसत नव्हतं. कृष्णाची नजर मात्र उजव्या बाजूच्या खोलगट जंगलाकडेच रोखलेली होती. अशीच आणखी दोन तीन मिनिटं स्तब्धतेत गेली. माझा संयम आता सुटू लागला होता..

“आपण कशासाठी थांबलो आहोत इथं..?”

अखेर न राहवून मधल्या सीटवर बसलेल्या माझ्या मोठ्या वहिनींनी अस्पष्ट, कुजबुजत्या हलक्या सुरात विचारलंच..

कृष्णानं मागे वळून दोन्ही हात जोडून त्यांना “अजिबात बोलू नका.. शांत राहून पुढे पहात रहा..” अशी बोटानंच खूण केली. तोच..

बाजूच्या खोलगट भागातून दमदार मंदगती पावले टाकीत एक रुबाबदार, अंगावर काळे पिवळे पट्टे असलेला, धष्टपुष्ट वाघ हळूहळू प्रगट झाला. आमच्या गाडीकडे नजर रोखून डौलदार चालीत आपलं एक एक ठाम पाऊल अगदी सावकाशपणे उचलीत अंदाजे आठ ते नऊ फूट लांबीचं ते राजबिंडं जनावर रस्त्याच्या मध्यभागी येऊन आमच्याकडे एकटक पहात स्तब्ध उभं राहिलं. त्याचा पिंगट, तांबूस, तपकिरी पिवळा रंग गाडीच्या हेड लाईट्स च्या प्रकाशात सोन्यासारखा चमचमत होता. त्यावरील दाट काळ्या रंगाचे तिरपे उभे पट्टे तर अतिशयच खुलून दिसत होते. शौर्य आणि सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक असलेला तो जंगलचा अनभिषिक्त राजा एखाद्या अप्रतिम अलौकिक शिल्पासारखा आमच्या पुढे उभा होता. अनिमिष नेत्रांनी, अवाक् होऊन आम्ही सारे ते दृश्य पहात होतो. ब्युटी क्वीन काँटेस्ट मधील सौंदर्यवती तरुणी रॅम्प वॉक करताना थोडंसं चालून क्षणभर थांबते आणि मग वळून परत फिरण्याआधी कमरेवर हात ठेवून एक पोझ देते ना, अगदी तस्साच तो वाघ आम्हाला पोझ देतो आहे असंही क्षणभर वाटून गेलं.tiger at night

तो धिप्पाड देखणा वाघ गाडीच्या हेड लाईट्स च्या प्रखर प्रकाश झोतासमोर सिनेमातील एखाद्या हिरो सारखा स्टायलिशपणे आम्हाला आव्हान देत उभा होता. अंधाराला सरावलेल्या त्याच्या डोळ्यांवर एवढा सर्च लाईट सारखा पॉवरफुल प्रकाश पडूनही त्याचे डोळे दिपून गेल्याचे अजिबात जाणवत नव्हते.tiger staring

त्यावरून त्याला अशा प्रकाशाची सवय असावी असे वाटत होते. अद्यापही तो डोळे मोठे करून आमच्या गाडीकडेच निरखून पहात होता. मनात विचार आला.. त्या वाघाला गाडीत बसलेले आम्ही सारे दिसत असू का ?

त्या वाघाच्या अशा अचानक रस्त्यावर येण्यामुळे आजूबाजूच्या वातावरणातही एक अनोखा बदल घडून आल्याचा भास होत होता. पक्ष्यांचा कलकलाट, किलबिलाट, प्राण्यांचे हुंकार, चित्कार अचानक थांबले होते. रातकिड्यांची किरकिरही आता ऐकू येत नव्हती. एवढंच काय, सळसळत वाहणारा रानवारा देखील अगदी स्तब्ध, थंड झाला होता. जणू जंगलातील सारे प्राणी, पक्षी, कीटक, जंतू, वृक्ष, वनस्पती आणि वारा देखील श्वास रोखून आता पुढे काय होतंय याची उत्सुकतेने प्रतीक्षा करीत आहेत असं वाटत होतं.

आम्हा सर्वांचे डोळे त्या व्याघ्रराजा वर घट्ट खिळले असले तरी ड्रायव्हर कृष्णाची सावध नजर मात्र अवती भवतीचा कानोसा घेत होती. कुणाला नकळत माझ्या हाताला हलकासा चिमटा घेऊन त्यानं मला त्याच्या जवळ सरकण्याची खूण केली. त्यानुसार मी त्याच्या जवळ सरकल्यावर तो माझ्या कानात कुजबुजत म्हणाला..

“किसीं को समझे बगैर, आपकी बाजूवाले साईड मिरर में झांक के, रस्तेके पीछे की ओर देखो.. और प्ली sss ज, मुंह बिल्कुल बंद रख्खो.. किसी को कुछ भी पता न चले..”

डाव्या बाजूला सरकून मी साईड मिरर मध्ये डोकावलं. तिथे मला काहीतरी हालचाल दिसली. दोन तीन लहान मोठ्या आकृत्या रस्त्यावर बसल्या सारखं दिसत होतं. ते नेमकं काय आहे याची नीट, स्पष्ट कल्पना न आल्यामुळे अभावितपणे मी चक्क मान मागे वळवून गाडीच्या मागील बाजूच्या रस्त्याकडे बघितलं. गाडीचा मागचा नादुरुस्त दरवाजा तसाच सताड उघडा होता. त्यावेळी तिथे मला जे दृश्य दिसलं ते पाहून भीतीने माझी बोबडीच वळली.

आमच्या गाडीच्या मागे जेमतेम पंचवीस तीस फुटांवर एक अजस्त्र आकाराची वाघीण आपल्या दोन लहान बछड्यांसहित आरामात रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसली होती. एवढंच नाही तर त्या वाघिणीच्या मागील बाजूने आणखी दोन मध्यम आकाराचे तरुण वाघ खालच्या खोलगट जंगलातून रस्त्याच्या दिशेने येत होते. जणू त्या वाघाच्या संपूर्ण फॅमिलीनेच आम्हाला पूर्णपणे घेरून टाकलं होतं.

बापरे ! गाडीच्या मागच्या भागात बायका आणि लहान मुलं बसलेली आहेत आणि दुर्दैवाने गाडीचा मागील दरवाजा बिघडला असल्याने बंद करता येत नाहीए.. चुकून आमच्यापैकी कुणी मागे पाहिलं आणि हे दृश्य पाहून त्यांनी आरडा ओरडा केला तर ? ही क्रूर, चपळ श्वापदं आमच्या गोंगाटानं जर बिथरली तर केवळ एका झेपेतच ती आमच्या पर्यंत पोहोचू शकतील या कल्पनेनेच माझ्या अंगावर काटा आला.

सुदैवाने मी व ड्रायव्हर कृष्णा वगळता गाडीतील अन्य सर्वजण समोर दिसणाऱ्या त्या दिव्य व्याघ्रमूर्ती कडे एकटक पाहण्यात एवढे गुंग होऊन गेले होते की आणखी कुठेही पाहण्याचे त्यांना भानच नव्हते. माझी घाबरलेली अवस्था कृष्णाने ओळखली. अर्थात आंतून तोही माझ्या इतकाच घाबरलेला असावा. तरीही मला धीर देत हलकेच कुजबुजत तो म्हणाला..

“सब्र रखो साब..! सिर्फ शांति बनाए रखो.. सब ठीक हो जाएगा..!”

एकमेकांच्या आमने सामने उभे ठाकलेले गाडीतील आम्ही आणि तो वाघ.. जणू परस्परांना जोखत होतो, दुसऱ्याच्या शक्तीचा, संयमाचा, पुढील हालचालीचा अंदाज घेत होतो. पलीकडून, वाट अडवून उभा असलेल्या त्या वाघाच्या मागून, विरुद्ध दिशेने एखादी गाडी यावी आणि आमची या डेड लॉक मधून सुटका व्हावी असाच मनोमन देवाचा धावा करीत होतो. जसाजसा वेळ निघत चालला होता तसातसा माझा धीरही सुटत चालला होता. गाडीच्या मागे जमा झालेलं वाघाचं ते आख्खं कुटुंब आत्ता नेमकं काय करतं आहे हे पाहण्याचं तर किंचितही धैर्य माझ्यात उरलं नव्हतं. भीतीनं व्याकुळ होऊन गाडी तशीच पुढे दामटण्याची ड्रायव्हर कृष्णाला मी कासावीस नजरेनंच विनंती केली. मात्र कृष्णा कडे जबरदस्त संयम होता. कदाचित यापूर्वीही अशा प्रसंगांतून तो गेलेला असावा. “धीर धरा.. शांत रहा.. मी आहे ना..” अशी त्याने डोळे व हातांनी मला खूण केली. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून गाडीतील स्त्रिया आणि मुलं यांनी देखील आतापर्यंत जे सावध, घट्ट मौन धारण केलं होतं ते सुद्धा खरोखरीच कौतुकास्पदच होतं.

आमच्या सुदैवाने वाघालाच आता या स्टेलमेटचा कंटाळा आला असावा. पुढील पाय लांबवून कंबर झुकवून शरीराला आळोखे पिळोखे देत त्याने एक दीर्घ आळस दिला. अचानक त्याच्या चेहऱ्यावरील निर्विकार भाव बदलून त्याजागी दुष्ट, क्रूर, हिंस्त्र, शिकारी भाव दिसू लागले. थोडं पुढे सरकून तो रस्त्याच्या कडेला गेला आणि अचानक त्यानं आपला रोख गाडीच्या दिशेनं केला. तो आता आमच्यावर हल्ला करण्याच्याच तयारीत आहे अशी माझी जवळ जवळ खात्रीच झाली. त्याचवेळी जवळच्या झाडावरील माकडांनी अचानक भयसूचक गोंगाट करायला सुरुवात केली. कुण्या अनोळखी पक्ष्याची भयावह, थरकांप उडवणारी किंकाळी सदृश कर्णभेदक तान लकेर एकाएकी आसमंतात घुमली. अचानक माजलेल्या या कोलाहलामुळे त्या वाघाचे लक्ष जरासे विचलित झाले. हाच इशारा, हीच योग्य वेळ समजून अगदी त्याचवेळी कृष्णाने एक्सलरेटर दाबून भरधाव वेगानं गाडी पुढे काढली.

त्यानंतर सतत तासभर, एखादं भूत पाठीमागे लागल्यागत, जराही मागे वळून न पाहता, वारं प्यालेल्या वासरा सारखा कृष्णा गाडी पुढे पुढे दामटीत होता. नंतर जाणवलं की नोव्हेंबरच्या त्या थंडीतही गाडीतील आम्ही सारे जण भीतीने घामाघूम झालो होतो. अतिनिकट, खुल्या व्याघ्रदर्शनाच्या त्या विलक्षण रोमांचक, जिवंत अनुभवामुळे एखादं दुष्ट स्वप्न पाहिल्यागत आम्ही सारे इतके भयचकित, मुग्ध, अबोल बनलो होतो की त्या घटनेबद्दल साधी चर्चा करण्याइतकी हिम्मत देखील आम्हा कुणामध्येच उरली नव्हती.

दुसऱ्या दिवशी सकाळी हैद्राबादला पोहोचल्यावर सर्वप्रथम गाडीचा मागील दरवाजा तातडीने रिपेअर करून घेतला.

श्रीशैल्यम्, तिरुपती, मदुराई, रामेश्वरम्, कन्याकुमारी, त्रिवेंद्रम्, उटी, म्हैसूर, बेंगलोर, हैद्राबाद अशी आठ दहा दिवसांची दक्षिण भारत सहल आटोपून उतनूरला परतलो. नंतर सहज एकदा आमचा बँकेतील अष्टपैलू व हरहुन्नरी प्युन रमेशला उतनूरच्या जंगलातील व्याघ्र दर्शनाबद्दल सांगितलं तेंव्हा तो म्हणाला..

“यहाँ जंगलमें रात के समय शेर का दिख जाना तो आम बात है। लेकिन यहां एक गांव ऐसा भी है जहाँ शेर दिनदहाड़े गांव में घुस जाता है। हमारे कुछ पुराने कर्जदार उस गांव में रहते है। चलो, कल हम आप को उस गांव में ले चलते है..! और.. सच कहूं तो साब, आपने अब तक “असली शेर” तो देखा ही नही है.. !!”

“असली शेर ? मैं कुछ समझा नही..?”

बुचकळ्यात पडून मी विचारलं..

त्यावर गूढ हसत रमेश म्हणाला..

“असली शेर याने “अन्ना..” ! वो खूंखार नक्सलाईट लोग, जिनका सिर्फ नाम सुनते ही इस पूरे एरिया के लोगोंको सांप सूंघ जाता है.. उन से भी मुलाकात होगी आपकी कभी ना कभी.. लेकिन फिलहाल.. याने की कल.. हम चलेंगे शेरों के गांव.. पुलीमडगु.. !!”

(क्रमशः 2)

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी आंध्र प्रदेश मधील (आताचे तेलंगणा) आदिलाबाद या नक्सलग्रस्त जिल्ह्यातील, उतनूर या दुर्गम गावी पोस्टिंग असतांना त्यांना आलेल्या अनुभवावर  आधारित, नवीन लेखमाला- “उतनूरचे दिवस” ही सुरू केली आहे. सदर लेख त्यांच्या फेसबुक पेज वरून त्यांच्या परवानगीने साभार घेऊन, त्यात कथेस अनुरूप अशी चित्रें आणि व्हिडिओ टाकून, सदरील लेखमाला या ब्लॉगच्या वाचकांसाठी प्रस्तुत करीत आहोत.

Mind blowing experiences of a Banker-19 LAST episode शेवटचे प्रकरण

salute

अनेक वळणांनी जाणाऱ्या  उत्कंठावर्धक कथेचा हा अंतिम भाग- श्री अजय कोटणीस यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केलेला.. ………………………………………….

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. या लेखमालेतील हे शेवटचे प्रकरण आज येथे , या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत 

Mind blowing experiences of a Banker-19 

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(अंतिम भाग : 19)

रुपेशच्या हस्ताक्षराची पुनः पडताळणी करण्याची माझी मागणी न्यायाधीशांनी सपशेल फेटाळून लावल्यामुळे मी अंतर्यामी खूप निराश झालो. खरं म्हणजे या नवीन आलेल्या न्यायाधीशांकडे उतावीळपणे लगेच अशी मागणी करून मी तशी चूकच केली होती. पण आता त्याला इलाज नव्हता.

मात्र त्यानंतर लवकरच या नवीन न्यायाधीशांनाही आमच्या केसची सत्य परिस्थिती कोर्टातील अन्य न्यायाधिश तसेच वकिलांकडून समजली आणि त्यांचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच पार बदलून गेला. आता त्यांनीही सुखदेव आणि त्याच्या कुटुंबियांची सक्त झाडाझडती घ्यायला सुरुवात केली.

“कशाच्या आधारे बँक कर्मचाऱ्यांना या घटनेसाठी जबाबदार समजून तुम्ही पोलिसांत तक्रार केली ?” या न्यायमूर्तींनी विचारलेल्या थेट प्रश्नाचे उत्तर फिर्यादी सौ. रत्नमाला बोडखे यांच्याकडे नव्हते. त्या निरुत्तर होऊन तशाच मख्खपणे उभ्या राहिल्या. न्यायाधीशांनी पुन्हा पुन्हा विचारल्यावर “मला यातले काहीही ठाऊक नसून माझे पती सुखदेव यांनी जिथे जिथे सांगितले तिथे तिथे मी सह्या केल्या..” असे सांगून त्या गप्प बसल्या.woman in witness box

साहजिकच न्यायाधीशांनी नंतर सुखदेवला हाच प्रश्न विचारला. त्यावर सुखदेवने संतप्त होऊन न्यायाधीशांनाच अद्वातद्वा बोलणे सुरू केले.

“आरोपींना तसंच मोकळं सोडून तुम्ही फिर्यादीलाच आरोपी ठरवण्याचा प्रयत्न करीत आहात. तुमची वागणूक अत्यंत पक्षपातपूर्ण आहे. आम्हाला बँक कर्मचाऱ्यांचा संशय आला म्हणूनच त्यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार केली. मी एका वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा असून मागासवर्गीय आहे. तुम्ही मला किंवा माझ्या कुटुंबियांना असे नसते गैरवाजवी प्रश्न विचारून विनाकारण त्रास दिलात तर मी खुद्द तुमच्या विरुद्धही विविध कायद्यां अंतर्गत पोलिसांत तक्रार करायला मागेपुढे पाहणार नाही..”

सुखदेवचा मानसिक तोल आता पुरता ढळल्यासारखे दिसत होते. तो वाट्टेल ते बरळत होता. मात्र हे नवीन न्यायाधीशही चांगलेच खमके होते. सुखदेवच्या धमक्यांनी जराही दबून न जाता ते म्हणाले..

“खुशाल पाहिजे तिथे तक्रार करा. मी ही मागासवर्गीयच आहे. असल्या पोकळ धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही. उलट, खोटी तक्रार करून पोलिसांचा व न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाया घालवल्याबद्दल मीच तुमच्याविरुद्ध कठोर action घेऊ शकतो. आसनस्थ न्यायाधीशांना धमक्या देऊन न्यायालयाची बे-अदबी केल्याबद्दल तुम्हाला ताबडतोब अटक करण्याचा याक्षणीच मी आदेशही देऊ शकतो..”

न्यायमूर्तींचा हा रौद्र अवतार बघून सुखदेवचे वकील भयभीत झाले. सुखदेवच्या वतीने त्यांनी न्यायाधीशांची परोपरीने क्षमा मागितली. सुखदेवही आता भानावर आला होता. न्यायाधीशांना दुखावून आपण भली मोठी घोडचूक करून ठेवली आहे याची त्याला जाणीव झाली. सारवासावर करत तो म्हणाला..

“प्रकृती अस्वास्थ्य, कौटुंबिक कलह आणि आर्थिक विवंचना यामुळे आलेल्या अतीव निराशेमुळे गेले काही दिवस माझे मानसिक संतुलन बिघडले आहे. आणि त्यामुळेच आपल्याशी दुर्वर्तन करण्याचा घोर अपराध मघाशी माझ्या हातून घडला आहे. माझ्या ह्या उद्दाम, अरेरावीच्या वर्तना बद्दल मी लज्जित असून आपली क्षमा याचना करीत आहे. आपण उदार अंतःकरणाने मला माफ करावे..”court scene

सुखदेव कसलेला अभिनेता तर होताच. पश्चाताप झाल्याचे ढोंग त्याने उत्तम वठवले. न्यायाधीशांवर त्याच्या या माफी मागण्याच्या वरवरच्या नाटकाचा कितपत परिणाम झाला हे जरी समजू शकले नाही तरी त्यांनी आपल्या बेअदबीचा मुद्दा जास्त ताणून धरला नाही.

परिस्थिती पाहून त्यावेळी सुखदेवने न्यायाधीशांसमोर नमतं घेतलं असलं तरी त्याचा दिर्घद्वेषी, शीघ्रकोपी, खुनशी स्वभाव मध्येच उफाळून येत असे. अशावेळी न्यायाधीशांशी त्याची अनेकदा शाब्दिक खडाजंगी होत असे. एकदा चिडून न्यायाधीश त्याला म्हणाले की

“तुम्ही कसंही वागलात तरी आम्ही काहीच करू शकत नाही असं समजू नका. तुमच्या कार्यालयाला सांगून त्यांच्यातर्फे आम्ही तुमच्यावर कठोर कारवाई करू शकतो..”

त्यावर निर्लज्जपणे हसत सुखदेव म्हणाला..

“मी केंव्हाच नोकरीतून ऐच्छिक निवृत्ती (VRS) घेतली असून आता तुम्ही माझं काहीही बिघडवू शकत नाही..”

तब्बल आठ वर्षे न्यायालयात हा खटला चालू होता. या दरम्यान केसशी संबंधित आम्हा सर्वांच्या आयुष्यात अनेक बऱ्यावाईट घटना घडून आल्या.

वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यावर नियमानुसार रितसरपणे नोकरीतून निवृत्त झाल्यावर पुणं सोडून मी औरंगाबादलाच कायमचा स्थायिक झालो. वाढलेल्या प्रोस्टेट ग्रंथी काढून टाकण्याची एक मोठी शस्त्रक्रिया वगळता माझी प्रकृती तशी ठीकठाकच होती. अनियंत्रित मधुमेह, रक्तदाब आणि गुडघेदुखी या सारख्या कायमस्वरूपी साथीदारांना काळजीपूर्वक सांभाळत मी आपलं “हॅपी अँड हेल्दी (?) रिटायर्ड लाईफ” जमेल तसं एन्जॉय करीत होतो.

रवीशंकरच्या आईचे पूर्वीच कॅन्सरने निधन झाले होते. त्या पाठोपाठ त्याच्या सुस्वभावी, प्रेमळ पत्नीचेही ऐन तरुण वयात हार्ट अटॅकने दुःखद निधन झाले. त्याची दोन गोंडस लहान मुले आईविना पोरकी झाली. त्यांची केविलवाणी अवस्था बघून रविशंकर अक्षरशः सैरभैर झाला होता. या केसमुळे आपण महाराष्ट्रात अडकून पडलो.. शक्य असूनही आपल्याला बिहारमधील आपल्या गावी बदली करून घेता असली नाही.. तसंच केसच्या तणावामुळेच आपल्या पत्नीचे हृदय कमजोर बनले व आपणच तिच्या अकाली मृत्यूला जबाबदार आहोत अशी खंत तो वारंवार बोलून दाखवीत असे.

रहीम चाचांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या फंडाच्या रकमेचा बराच मोठा हिस्सा जास्त परताव्याचा आशेने एका बोगस चिट फंडात गुंतवला होता. एक दिवस तो चिट फंड बुडाला आणि रहीम चाचा आपली जन्मभराची पुंजी त्यात गमावून बसले. प्राप्त निवृत्ती फंडापैकी उरली सुरली रक्कम त्यांनी एका जवळच्या गरजू नातेवाईकाला अल्पकाळासाठी उसनी म्हणून दिली होती. मात्र त्या नातेवाईकानेही तोंडाला पाने पुसल्यामुळे रहीम चाचांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. म्हातारपणाचा एकमेव आधार असलेली पैशांची उबच नाहीशी झाल्यामुळे आता कुटुंबाचे पालनपोषण आणि गलितगात्र वार्धक्यरुपी कडाक्याच्या थंडीचा मुकाबला कसा करायचा ही चिंता त्यांना रात्रंदिवस सतावत होती. अंधःकारमय भविष्यकाळाबद्दलची एक अनामिक भीती त्यांच्या भकास डोळ्यांतील भयाण नजरेत सदैव जाणवत असायची.

दिल्लीला एकत्र कुटुंबात राहणारी सैनीची पत्नी सासरच्यांच्या रोजच्या भांडणांना कंटाळून मुलाबाळांसह हरियाणातील आपल्या माहेरी निघून गेली होती. तिची समजूत घालण्यासाठी बिचारा सैनी निलंग्याहून दिल्ली, हरियाणा अशा सतत चकरा मारून बेजार झाला होता. कधी एकदा ही केस संपते आणि आपण हरियाणातील आपल्या गावाकडे आपली बदली करून घेऊन आपल्या संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा नीट, सुरळीत बसवतो असं त्याला झालं होतं.

सुखदेवच्या वाया गेलेल्या आवारा मुलानं आपल्या शौकाखातर एक सेकंड हँड कार घेतली होती. दुर्दैवाने त्याच्या हातून त्या कारचा अपघात झाला आणि त्यात जखमी झालेल्या व्यक्तींना भली मोठी नुकसान भरपाई देणे सुखदेवला भाग पडले. माजी स्वातंत्र्य सैनिक असलेले सुखदेवचे म्हातारे वडीलही या दरम्यान वार्धक्यामुळे निधन पावले होते. काही अज्ञात, आकस्मिक कारणामुळे सुखदेवने आपली गावातील दोन एकर जमीन तसंच घरातील बरंचसं सोनं नाणं विकल्याचंही ऐकिवात होतं.

रुपेशचे आई वडील दुर्धर आजारामुळे दीर्घकाळापासून अंथरुणाला खिळून बसले होते. त्याचा एकुलता एक मुलगाही खूपच अशक्त, किरकिरा आणि मंदबुद्धी निघाला होता. मुलाचा सांभाळ, सासू सासऱ्यांची सेवा, पाळलेल्या जनावरांची देखभाल, शेतीची कामं.. हे सारं करून करून रूपेशची सहनशील पत्नी कंटाळली होती. शेवटी वैतागून एके दिवशी मुलाला घेऊन ती माहेरी निघून गेली, ती पुन्हा न येण्यासाठीच. तसंही रुपेश जेलमध्ये गेल्यापासून त्याच्या कुटुंबाला साऱ्या गावानं जवळ जवळ वाळीतच टाकलं होतं.

कोर्टात पाच वर्षांपेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेले सर्व फौजदारी खटले त्वरित निकाली काढावेत असा हायकोर्टाचा आदेश निघाल्यामुळे आमच्या केसचा निकाल आता लवकरच लागेल अशी चिन्हे दिसत होती.

आमच्या केसमधील सर्व साक्षी पुरावे संपल्यामुळे दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपला अंतिम युक्तिवाद (final argument) सादर करावा अशी न्यायाधीशांनी सूचना केली.

फिर्यादीच्या वकिलांनी केलेल्या हतोत्साही (half hearted) फायनल ऑर्ग्युमेंट मध्ये काहीच दम नव्हता. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपींना योग्य ती शिक्षा व्हावी अशी गुळमुळीत मागणी त्यांनी कोर्टाकडे केली होती.

आमचे वकील ॲड. मनोहर यांनी आपल्या अंतिम युक्तिवादांत, हा संपूर्ण खटलाच बनावट असल्याचे सांगून पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात दाखवलेली बेपर्वाई, मुख्य आरोपी जयदेव खडकेला पकडण्यात त्यांना आलेले अपयश, गुन्ह्यात सहभागी असलेल्या रुपेश सारख्या गुन्हेगाराला संरक्षण देण्याच्या पोलिसांचा प्रयत्न, फिर्यादी सुखदेवच्या कुटुंबियांची संशयास्पद वर्तणूक आणि आरोपी बँक कर्मचाऱ्यांचे स्वच्छ चारित्र्य ह्या सर्व बाबी उत्तमरीत्या अधोरेखित करून केवळ व्यक्तिगत आकसापोटीच फिर्यादीने हा खटला दाखल केला असल्याचे कोर्टात प्रभावीपणे प्रतिपादन केले.

तत्पूर्वी न्यायमूर्तींनी “आरोपींपैकी कुणाला आपल्या बचावार्थ काही सांगायचे आहे काय ?” असे विचारले असता मी म्हणालो..

“आरोपींचा गुन्ह्यामागील हेतू (motive), गुन्हेगारांचा पूर्वेतिहास (track record), प्रथमदर्शनी पुरावा (primafacie evidence) व परिस्थितीजन्य पुरावा (circumstancial evidence) यापैकी कोणतीही गोष्ट आमच्याविरुद्ध सिद्ध करण्यात पोलिसांना घोर अपयश आलेले आहे. हा संपूर्ण खटलाच धादांत खोटा आहे याबद्दल कुणाच्याही.. अगदी पोलिसांच्याही, मनात तिळमात्र शंका नाही. आदरणीय न्यायमूर्ती या खटल्याचा काय निकाल देतील हा सर्वस्वी त्यांचाच अधिकार आहे. मात्र माझी त्यांना अशी नम्र विनंती आहे की जर या खटल्यातून आमची निर्दोष मुक्तता करण्याचे न्यायमूर्तींनी ठरविले तर कृपया निकाल देताना “सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता” असे न म्हणता “पूर्णपणे निर्दोष असल्याने सन्मानपूर्वक मुक्तता” अशा शब्दांचा आवर्जून उपयोग करावा.”

माझी ही विनंती ऐकल्यावर न्यायमूर्तींनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

पुढील सोमवारी खटल्याचा निकाल जाहीर केला जाईल असे घोषित करून न्यायमूर्तीनी कोर्टाचे कामकाज तहकूब केले आणि आम्ही सारे आपापल्या गावी परतलो.

त्यानंतर जेमतेम दोनच दिवस उलटले असता सुखदेवच्या वकिलांनी आम्हा चौघा आरोपींशी फोनवरून संपर्क साधून “सोमवारच्या निकालात न्यायमूर्ती तुम्हाला शिक्षा ठोठावणार असून तत्पूर्वीच आम्हाला प्रत्येकी फक्त वीस हजार रुपये दिल्यास आम्ही तडजोड करून आत्ताच खटला मागे घेण्यास तयार आहोत..” असा निरोप दिला. आश्चर्य म्हणजे त्या पाठोपाठ रुपेशच्या वकिलांनीही आमच्याशी संपर्क साधून अगदी तसाच निरोप दिला. फरक एवढाच की रुपेशचे वकील प्रत्येकी फक्त दहा हजार रुपये घेऊन तडजोड करण्यास तयार होते.

अत्यंत घाबरट आणि उतावळ्या स्वभावाच्या रहीम चाचांनी तर लगेच हुरळून जाऊन खटल्यातून मुक्तता होण्याच्या आशेने त्यांना पैसे देण्याचे आनंदाने कबूलही केले. मात्र माझ्याशी संपर्क करून जेंव्हा त्यांनी विरोधी पक्षाच्या वकिलांना पैसे देण्याचा आपला निर्णय सांगितला तेंव्हा महत्प्रयासाने मी त्यांची समजूत काढली आणि त्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त केले.

होता होता पुढील सोमवार उजाडला. आज आमच्या केसचा निर्णय होणार होता. ठीक अकरा वाजता न्यायमूर्ती आपल्या डायसवर येऊन बसले आणि त्यांनी निकालाचे वाचन करण्यास सुरुवात केली. संपूर्ण निकालात जागोजागी न्यायमूर्तींनी पोलिसांच्या सदोष तपासावर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले होते. रुपेश जगधनेच्या तपासात जाणूनबुजून ढिलाई करून त्याला मदत केल्याबद्दल संबंधित जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांना वरिष्ठांनी जाब विचारून त्यांच्याविरुद्ध उचित ती कार्यवाही करावी अशी देखील न्यायमूर्तींनी सूचना केली. वैयक्तिक आकस किंवा धमकी देऊन पैसे उकळणे अशा हेतूनेच बोडखे कुटुंबीयांनी बँक कर्मचाऱ्यांवर हा खटला दाखल केल्याचे दिसते असे निरीक्षणही न्यायमूर्तींनी नोंदविले. सरतेशेवटी न्यायमूर्ती म्हणाले..

*”अभियोक्ता पक्ष (वादी), विरोधी (प्रतिवादी) पक्षा वरील आरोप सिद्ध करण्यात संपूर्णतः अयशस्वी ठरल्यामुळे आरोपी रुपेश जगधने व तथाकथित आरोपी जयदेव खडके वगळता अन्य सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. ही मुक्तता सन्माननीय मुक्तता (honourable acquital) असून या मुक्ततेविरुद्ध उच्च न्यायालयाच्या विशेष परवानगी शिवाय फिर्यादी पक्षाला वरच्या कोर्टात अपील करता येणार नाही. रुपेश जगधनेचीही सबळ व पुरेशा पुराव्या अभावी संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे. तसेच फरारी आरोपी जयदेव खडके याचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला अटक करून न्यायालयासमोर उभे करण्याचेही पोलिसांना निर्देश देण्यात येत आहेत.”*court

न्यायमूर्तींनी निकालाचे वाचन संपविल्यावर खटल्यातील आम्ही चौघा निर्दोष आरोपींनी एकमेकांचे अभिनंदन केले. हळव्या रहीम चाचांचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. वारंवार दोन्ही हात उंचावून आकाशाकडे पहात ते खुदाचा शुक्रिया अदा करीत होते. आमचे वकील ॲड. मनोहर तसेच कोर्टातील सर्व वकील वृंदाने आणि कर्मचारी वर्गानेही आमचे अभिनंदन केले. तब्बल दहा वर्षे एवढ्या प्रदीर्घ कालावधीच्या आमच्या न्यायासाठीच्या अथक, चिवट लढ्याची अखेर आज यशस्वी सांगता झाली होती.

काही अंशी या केसमुळेच आपली पत्नी गमावून बसलेल्या रविशंकर व सैनी यांच्या अंतर्यामी खिन्न चेहऱ्यावर ओढून ताणून आणलेल्या हास्यात एक करुण, उदास झाक दिसून येत होती. त्यांच्याकडे पाहिल्यावर Justice delayed is justice denied ही उक्ती खरी असल्याची प्रचिती येत होती.

कोर्टाबाहेर आल्यावर आमचे वकील ॲड. मनोहर व आम्ही चौघांनी राजू चहावाल्याच्या आग्रहास्तव त्याच्या टपरीवर चहा घेतला. नंतर एकमेकांचा निरोप घेऊन सगळे आपापल्या रस्त्याने निघून गेले. रेल्वेची वेळ होत आल्याने मीही रिक्षाने रेल्वे स्टेशनकडे निघालो. स्टेशनवर आल्यावर रेल्वे कॅन्टीन जवळील झाडाखालच्या बाकावर बसून गाडीची वाट पहात असतानाच सुखदेव बोडखे माझ्या दिशेने येताना दिसला.

“मनःपूर्वक अभिनंदन साहेब..!”

माझ्या जवळ येऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करीत तो म्हणाला. त्याच्या आजच्या बोलण्यात नेहमीसारखा विखार, उपहास, उपरोध किंवा कुत्सितपणा नव्हता.

“धन्यवाद आणि नमस्कार ! या बसा..”waiting

मी प्रत्युत्तरादाखल त्याला नमस्कार करून बाकावर शेजारी बसण्याची विनंती केली. बाकाच्या एका टोकाला संकोचत अंग चोरून बसत तो म्हणाला..

“साहेब, तुम्ही जिंकलात मी हरलो.. आज तुमची क्षमा मागायला आलोय इथे. तुमची काहीही चूक नसतांना तुम्हाला खूप त्रास दिलाय मी. माफ करा मला..”

सुखदेवच्या नजरेतील नेहमीचा बेरकीपणा नाहीसा होऊन त्या जागी प्रामाणिक पश्चाताप दिसत होता. त्याला बरं वाटावं म्हणून म्हणालो..

“जाऊ द्या हो, चालायचंच.. त्या जुन्या गोष्टी झाल्या. मी केंव्हाच विसरलोय सगळं.. ! पण एक गोष्ट मात्र अजून समजली नाही की, मी तुमचा असा कोणता घोर अपराध केला होता की ज्यामुळे तुमचा माझ्यावर एवढा प्रचंड राग होता ?”

माझ्या या प्रश्नावर शरमेनं खाली मान घालून तो म्हणाला..

“बदनामीची, पोलिस कंप्लेंटची, अटकेची भीती दाखवून लोकांकडून पैसे उकळण्याची मला सवयच लागली होती. तुम्ही पांढरपेशे कर्मचारी पोलिसांना व बदनामीला खूप घाबरता. त्यामुळे एखाद्या क्षुल्लकशा चुकीबद्दल किंवा हलगर्जीपणा बद्दल वरिष्ठांकडे व पोलिसांत तक्रार करण्याची केवळ धमकी देऊन मी बँक कर्मचारी, शिक्षक तसेच अन्य अनेक सरकारी खात्यांतील कर्मचाऱ्यांकडून यापूर्वी भरपूर पैसे लुबाडले होते. आजपर्यंत कुणीही मला पैसे देण्यास विरोध केला नव्हता. त्यामुळे मला माझ्या दुष्ट, खुनशी, विकृत बुद्धीचा प्रचंड अहंकार झाला होता. तुम्ही मात्र माझ्यापुढे झुकण्यास ठाम नकार दिलात. त्यामुळे माझा अहंकार डिवचला गेला. कोणत्याही प्रकारे तुम्हाला माझ्यापुढे झुकण्यास भाग पाडायचेच असा मी टोकाचा, हट्टी निर्धार केला. तुमची बदनामी करण्यासाठी मी पोलीस, पत्रकार, वकील तसेच स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनाही हाताशी धरलं. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तुम्ही साऱ्यांना पुरून उरलात. तुम्हाला घाबरवण्यासाठी मी पोलीस कंप्लेंट केली खरी पण पुढे त्यातच मी फसलो. पोलिसांनी मला ओरबाडून ओरबाडून संपूर्ण लुटलं. माझी जमीन, घरातील सगळं सोनं नाणं या पोलिसांची कधीच न भागणारी पैशांची भूक भागविण्यासाठी मला विकावं लागलं. मी या प्रकरणात आता पुरता कफल्लक झालो आहे. आणि माझा गर्व, माझा अहंकार.. ? तो तर केंव्हाच कापरासारखा उडून नाहीसा झाला आहे.”

एखाद्या शक्तीहीन, म्हाताऱ्या, थकलेल्या सिंहासारखा सुखदेव असहाय्य आणि केविलवाणा भासत होता.

“असं आहे तर मग गेल्या आठवड्यात तुम्ही तुमच्या वकिलांकरवी तडजोड करण्याची ऑफर देऊन आमच्याकडे पैशाची मागणी का केलीत ?”

माझा हा प्रश्न सुखदेवला अपेक्षितच असावा. खाली घातलेली मान क्षणभरही वर न करता तो म्हणाला..

“वकिलांना त्यांची फी देण्यासाठी माझ्याकडे तसेच रुपेश कडेही काहीच पैसे उरले नव्हते. त्यामुळे “आमची थकलेली फी वसूल करण्यासाठी तुमच्या नावाने आम्ही बँकवाल्यांकडे तडजोडीची ऑफर देऊन पैसे मागितले तर चालेल का ?” असं आम्हा दोघांच्या वकिलांनी आम्हाला विचारलं, तेंव्हा नाईलाजानं त्यांना आम्ही होकार दिला..”

सुखदेवचं हे स्पष्टीकरण पटण्यासारखंच होतं. त्याचं सांत्वन करीत म्हणालो..

“जाऊ द्या..! झालं गेलं गंगेला मिळालं.. !! माझा कुणावरही कसलाही राग नाही. मात्र यापुढे कुणा निरपराधाला चुकूनही असा विनाकारण त्रास देऊ नका एवढीच तुमच्या कडून अपेक्षा करतो. तुमच्या आईवडिलांनी केवढ्या प्रेमानं तुमचं नाव ‘सुखदेव’ असं ठेवलं असेल. मात्र तुमच्या चुकीच्या वर्तनामुळे तुम्ही लोकांना दुःख देणारे ‘दुखदेव’ च ठरलात. अजूनही वेळ गेलेली नाही. तुमचा दृष्टिकोन, तुमचं वर्तन बदला. अन्यायाने, अनैतिक मार्गाने मिळवलेला पैसा कधीही खरं सुख आणि आनंद देत नाही, हे ध्यानात ठेवा. आपला स्वभाव बदला. लोकांवर प्रेम करणारे, त्यांना सुख देणारे ‘सुखदेव’ बनून मातापित्यांनी दिलेलं नाव सार्थक करा.”

माझा उपदेश शांतपणे ऐकून सुखदेवने होकारार्थी मान डोलावली.

आमच्या केसशी संबंधित अनेक अनुत्तरित प्रश्न, ज्यांची उत्तरे सुखदेवकडे निश्चितच असावी, माझ्या डोक्यात अद्यापही घोंगावत होते. सुखदेवकडून त्यांचा उलगडा करून घ्यावा असा क्षणभर मला मोहसुद्धा झाला. पण आता या सगळ्या कटू आठवणी विसरुन या प्रकरणावर कायमचा पडदा टाकायचा असं ठरवून मी तो मोह आवरला.

तोच.. दूरवरून स्टेशनकडे येणाऱ्या ट्रेनचा हेड लाईट चमकला. प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची धावपळ, लगबग सुरू झाली. मीही माझ्या बाकावरून उठलो. सुखदेवनं माझा उजवा हात आपल्या दोन्ही हातात गच्च धरला आणि गदगदत्या स्वरात म्हणाला..

“तुम्हाला विनाकारण दिलेल्या त्रासाबद्दल मी तुमची मनापासून क्षमा मागतो. माझ्यावर दया करा आणि मोठ्या मनानं मला माफ करा..”

बोलता बोलता अचानक तो खाली वाकला आणि चक्क माझ्या पायावर त्यानं आपलं डोकं टेकलं. त्याच्या या अनपेक्षित कृतीनं अचंबित होऊन मी भांबावून गेलो. कसंबसं त्याला उठवून उभं केलं. किंचित मागे सरुन तो म्हणाला..

“कधीही आपला संयम जराही ढळू न देता अत्यंत शांतपणे तुम्ही ज्या धीराने एकूण सर्व विपरीत परिस्थितीला इतका दीर्घ काळपर्यंत अतिशय समर्थपणे आणि सदैव प्रसन्न मुद्रेने जे तोंड दिलंत त्याला खरंच तोड नाही. मी सर्व बाजूंनी तुमच्यावर हल्ला चढविला, अनेक कुटील डावपेचही लढवले पण तुम्ही कधीही न डगमगता अतिशय स्थिर बुद्धीने माझा मुकाबला केलात आणि शेवटी माझा डाव माझ्यावरच उलटवलात. तुमच्या या शांत, संयमी, सुसंस्कृत आणि स्थिर बुद्धीच्या विजयी लढ्याला माझा मनापासून सलाम.. !!”

ताठ उभं राहून उजव्या हाताचा तळवा आपल्या कपाळासमोर नेत सुखदेवनं मला कडक मिलिटरी सॅल्युट ठोकला.salute

एव्हाना माझी ट्रेन प्लॅटफॉर्मवर येऊन उभी राहिली होती. एखाद्या पुतळ्यागत सलामीच्या पोझ मध्ये स्थिर उभ्या असलेल्या सुखदेवकडे पुन्हा पुन्हा वळून पहातच मी गाडीत शिरलो.

गाडी प्लॅटफॉर्म वरून हलली. मी दरवाजातच उभा होतो. सुखदेव माझ्याकडे पहात अजूनही त्याच पोझमध्ये निश्चलपणे उभा होता. प्लॅटफॉर्म वरील अंधुक प्रकाशातही त्याच्या डोळ्यातील अश्रू स्पष्टपणे चकाकताना दिसत होते.

हळूहळू गाडीनं वेग पकडला. मी पार दिसेनासा होईपर्यंत माझ्याकडे एकटक पहात सुखदेव प्लॅटफॉर्मवर अजूनही तशाच अवस्थेत स्तब्धपणे उभा होता..

(समाप्त)

(संपूर्ण काल्पनिक)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १८ भाग त्यांनी प्रसारित केले होते. या त्यांच्या चित्त थरारक दीर्घ कथेचे हे शेवटचे प्रकरण…………………………… 

Mind blowing experiences of a Banker-18 एका बँकरचे थरारक अनुभव-18

angry man

ही अनेक वळणांनी जाणारी, उत्कंठावर्धक कथा आता जवळ जवळ अंतिम  टप्प्या पर्यंत आली असून पुढील भाग हा या कथेचा क्लायमॅक्स असणार आहे.. तरी हे दोन्ही भाग वाचण्यास चुकू नका……………..

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

ही अनेक वळणांनी जाणारी, उत्कंठावर्धक कथा आता जवळ जवळ अंतिम  टप्प्या पर्यंत आली असून पुढील भाग हा या कथेचा क्लायमॅक्स असणार आहे.. तरी हे दोन्ही भाग वाचण्यास चुकू नका……………..

Mind blowing experiences of a Banker-18

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 18)

औरंगाबादला आल्यावर ताबडतोब सेवा शाखा (Service Branch) इथे शाखाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. शाखांच्या Inward आणि Outward क्लिअरिंग चेक्सचे Centralised Processing करणे हेच इथले मुख्य काम होते. ग्राहकांशी कोणताही डायरेक्ट संबंध नसल्याने इथे तसा खूपच आराम होता. नवीन प्रकारच्या कामाची ओळख करून घेण्यातच सुरवातीचे काही दिवस गेले आणि दैनंदिन कामकाज नियंत्रणात आल्यावर लवकरच तिथल्या वातावरणाशी समरस होऊन गेलो.

वैजापूर कोर्टाच्या सर्व तारखांना आम्ही चौघेही आरोपी अगदी नियमितपणे हजर रहात होतो. औरंगाबादहून वैजापूरचे अंतर जेमतेम तास दीड तासाचे असल्याने मला तारखेला हजर राहणे फारसे अवघड नव्हते. शाखेत दोन तडफदार, कार्यक्षम अधिकारी तसेच दोन ट्रेनी ऑफिसर मुली मदतीला असल्याने कोर्टाच्या तारखा अटेंड करण्यासाठी रिजनल ऑफिसकडे रिलिव्हर मागण्याचीही मला कधीच गरज भासली नाही. वैजापूरहून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या येवला इथं राहणाऱ्या रहीम चाचांनाही वैजापूर कोर्टात येणे जाणे तसे सोयीस्करच होते. बीड व परभणी जिल्ह्यातील सुदूर, दुर्गम भागात असणाऱ्या रविशंकर आणि सैनी यांना मात्र तिथून आदल्या दिवशी संध्याकाळीच निघून रात्री उशिरा किंवा भल्या पहाटे वैजापूरला पोहोचून लॉजमध्ये उतरावे लागत असे.

सतत बदलून येणारे नवनवीन न्यायाधीश सोडले तर वैजापूर कोर्टातील सर्वच कर्मचाऱ्यांना आमच्या केस मागील सत्य परिस्थितीची यथार्थ कल्पना असल्याने ते आमच्याशी अतिशय आदराने, नम्रतेने व सहकार्याने वागत. नवीन आलेल्या न्यायाधीशांची वागणूक देखील सुरवातीला थोडीशी कठोर, रुक्ष असली तरी लवकरच कोर्टातील कर्मचारी व वकील आमच्या केसची वास्तविक हकीकत त्यांना समजावून सांगत आणि मग तेही आमच्याकडे करुणायुक्त सहानुभूतीने, दयाळू दृष्टीने पहात असत. याउलट रुपेश जगधने व सुखदेव बोडखेचे कुटुंबीय यांना मात्र कायमच कोर्टातील कर्मचारी तसेच वकिलांच्या तिरस्कारपूर्ण नजरांचा सामना करावा लागत असे. सत्य परिस्थिती समजल्यावर न्यायाधीशही वारंवार उपरोधपूर्ण टोमणे मारून त्यांना अपमानास्पदरित्या संबोधित करीत असत.

कधी कधी रिलिव्हिंग अरेंजमेंट न झाल्यामुळे रविशंकर व सैनी यांना तारखेला हजर राहणे शक्य होत नसे. अशावेळी त्यांच्या वतीने कोर्टात अर्ज सादर करून ॲड. मनोहर त्यांची बाजू सांभाळून घेत असत. यथावकाश सरकारी वकिलांनी आमच्या विरुद्धचा एकमेव पुरावा म्हणजे “कस्टमरची सही न घेतलेले चेक बुक इश्यू रजिस्टर” तसेच “एनकॅश केलेल्या चेकवरील सही बनावट असल्याचा फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट” कोर्टापुढे सादर करून तत्कालीन ठाणेदार श्री. माळी व सब. इंस्पे. हिवाळे यांना तपास अधिकारी व मुख्य साक्षीदार म्हणून साक्ष देण्यासाठी कोर्टात पाचारण केले.

वारंवार समन्स बजावूनही इंस्पे. माळी साक्ष देण्यासाठी कोर्टात हजर झाले नाहीत. त्यामुळे सब. इंस्पे. हिवाळे यांनीच सहाय्यक तपास अधिकारी म्हणून कोर्टापुढे साक्ष दिली. “बनावट सहीचा चेक वटवून पाच लाख ऐंशी हजार रुपये एवढी मोठी रक्कम घेऊन पसार झालेल्या तथाकथित जयदेव खडके नामक महत्वाच्या आरोपीला त्याचा फोटो व cvtv फुटेज उपलब्ध असूनही पोलिसांनी अद्याप अटक का केली नाही ?” या न्यायमूर्तींनी विचारलेल्या प्रश्नावर सब. इंस्पे. हिवाळेंकडे समाधानकारक उत्तर नव्हते. “जयदेवचा cctv मधील फोटो तितकासा स्पष्ट नव्हता तसेच कदाचित तो राज्याबाहेर पळून गेला असावा त्यामुळे सापडू शकला नाही..” अशी न पटणारी तकलादू कारणे देऊन त्यांनी कशीबशी वेळ मारून नेली.police in witness box

“चोरी गेलेला मुद्देमाल म्हणजेच रोख रक्कम पोलीस जप्त करू शकले नाहीत तसेच चेक वरील खोटी सही देखील आरोपींपैकी कुणीही केल्याचे सिद्ध झाले नाही. मग केवळ बोडखे कुटुंबाने केलेली तक्रार व दुसऱ्या चेक बुकच्या मागणीचा अर्ज गहाळ असणे एवढ्याच गोष्टींवरून बँक कर्मचाऱ्यांनी संगनमताने हा गुन्हा घडवून आणला असे म्हणता येईल काय ?” न्यायाधीशांनी विचारलेल्या या प्रश्नावर सब. इंस्पे. हिवाळे व सरकारी वकील या दोघांनीही निरुत्तर होत खाली मान घातली. “पोलिसांनी एवढ्या मोठ्या व गंभीर गुन्ह्याचा तपास करतांना अत्यंत casual approach दाखवल्याचे दिसून येते..” असे मत न्यायाधीशांनी नोंदवले.

“गुन्ह्यात सहभागी असलेल्या रुपेश जगधने ह्या महत्त्वाच्या आरोपीची पोलिसांनी हवी तशी कसून चौकशी केली नसल्याचेही स्पष्ट दिसते..” असे परखड निरीक्षण व्यक्त करून त्याबद्दल पोलिसांनी सब. इंस्पे. हिवाळेंना चांगलेच फटकारले. “सद् रक्षणाय खल निग्रहणाय” हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे ही गोष्ट तुम्ही विसरलात की काय ? तुमचे एकंदरीत वर्तन तर “खल रक्षणाय सद् निग्रहणाय” असेच विपरीत व अत्यंत निंदनीय आहे..” असे जळजळीत उद्गारही न्यायाधीशांनी काढले. खजील होऊन खाली मान घालून सब. इंस्पे. हिवाळे न्यायाधीशांचे फटके निमूटपणे सहन करत होते. वारंवार समन्स बजावूनही ठाणेदार इंस्पे. माळींनी धुर्तपणे कोर्टात येण्याचे का टाळले ? हे त्यांना आता चांगलेच उमगले होते.

न्यायाधीश सब. इंस्पे. हिवाळेंची अशी खरडपट्टी काढत असतांना तिकडे सुखदेवचा जीव अकारणच खालीवर होत होता. रागाने लालबुंद होत त्वेषाने तो न्यायमूर्तींना उद्देशून म्हणाला.. “हे काय चालवलंय तुम्ही ? आरोपींना प्रश्न विचारण्याचं सोडून तुम्ही उलट पोलिसांचीच हजेरी घेत आहात..!” सुखदेवच्या या मूर्खतापूर्ण आततायी अविर्भावामुळे त्याचे वकील एकदम गडबडून गेले. घाबरून जाऊन कसंबसं त्यांनी सुखदेवला शांत केलं आणि न्यायाधीशांच्या रोषापासून वाचविण्यासाठी जवळजवळ ओढतच त्याला कोर्टरूम बाहेर नेलं.angry man

कोर्टाचं कामकाज अतिशय संथ गतीनं चाललं होतं. कोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या, न्यायाधीशांच्या बदल्या व अन्य अनेक कारणांमुळे कोणतेही कामकाज न होता सतत फक्त पुढच्या तारखाच मिळत होत्या. वर्षातून साधारणतः आठ ते दहा वेळा कोर्टाची तारीख असायची. याच दरम्यान माझी बदली औरंगाबादहून लातूर इथे झाली. मुलांच्या शिक्षणासाठी फॅमिली पुणे येथे शिफ्ट करून मी लातूर रिजनल ऑफिसला रुजू झालो. अर्थात तेथूनही मी नियमितपणे प्रत्येक तारखेला वैजापूर कोर्टात हजर रहात असे.

फिर्यादी व आरोपींपैकी एक जण जरी तारखेस गैरहजर राहिला तरी न्यायाधीश कोणतेही कामकाज न करता लगेच पुढची तारीख देत असत. असा बराच काळ गेला. जुने न्यायाधीश बदली होऊन गेले की त्यांच्या जागी नवीन न्यायाधीश यायचे. पदोन्नती, प्रलंबित बदली, तात्पुरता कार्यभार, प्रतिनियुक्ती (deputation) अशा अनेक कारणांमुळे काही न्यायाधीशांची नियुक्ती अल्पकाळासाठी असे. असे न्यायाधीश आमच्या केसला हातही लावीत नसत. फक्त खूप पुढच्या तारखा देऊन केसचे कामकाज लांबवित असत.

दिवसांमागून दिवस जात होते. माझी बदली लातूरहून आता उस्मानाबादला झाली होती. रविशंकरचीही बदली परभणी जिल्ह्यातीळ पालम या गावी झाली, तर सैनीने प्रमोशन घेतल्यामुळे त्याचीही बदली लातूर जिल्ह्यातील निलंगा इथे झाली. सुखदेव आणि रुपेश या दोघांचाही या केसमधील इंटरेस्ट आता बराच कमी झाला होता. आजकाल ते दोघेही कोर्टाच्या तारखांना सतत गैरहजर राहू लागले. अर्थात त्यामुळे सलग लागोपाठ पुढच्या तारखा मिळून केसचे आधीच रखडलेले काम आणखीनच रेंगाळले.

अशातच एक सहृदय न्यायाधीश वैजापूरला बदलून आले. न्याय खात्यात नोकरी करण्यापूर्वी काही काळ त्यांनी बँकेतही जॉब केला असल्यामुळे त्यांना बँक कर्मचाऱ्यांबद्दल आपुलकी व सहानुभूती होती. एकदा त्यांनी सहज केसच्या हजेरीचे रेकॉर्ड बघितले तेंव्हा आम्ही बँकवाले नियमितपणे सर्व तारखांना हजर राहतो हे पाहून त्यांना आश्चर्य वाटले. त्यांनी “या केससाठी तुम्ही कुठून कुठून वैजापूरला येता ?” असं विचारलं तेंव्हा “उस्मानाबाद, पालम, निलंगा” अशी दूरदूरच्या गावांची नावे ऐकून केवळ “पुढची तारीख अमुक अमुक..” हे चार शब्द ऐकण्यासाठी आम्हा सर्वांना मजल दरमजल करीत वैजापूर सारख्या गावी यावे लागते हे पाहून त्यांना खूप वाईट वाटलं. त्या दिवशी ते डायस वरूनच आम्हाला म्हणाले..

“एवढ्या दूर अंतरावरून येऊन प्रत्येक तारखेला हजर राहण्याची काहीही गरज नाही. तुम्ही बिनधास्त तुमच्या वकिलांना आधी फोन करून आपल्या अनुपस्थितीची कल्पना देऊ शकता आणि मग तुम्ही तारखेला नाही आलात तरी चालेल. ज्या दिवशी तुमची उपस्थिती अनिवार्य असेल त्यावेळी त्याची पूर्वसूचना तुमच्या वकिलांना अगोदर पासूनच देऊन ठेवण्याची व्यवस्था मी करीत जाईन..”judge

अर्थात न्यायाधीशांनी आम्हाला अशी सवलत दिली असली तरी आम्ही कोर्टाच्या तारखांना अगदी क्वचितच अनुपस्थित राहिलो. मात्र न्यायाधीश, कर्मचारी, वकील वृंद तसेच कोर्टात येणारे अन्य प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून आम्हाला मिळत असलेली आदर व सद्भावपूर्ण वागणूक पाहून सुखदेवचा प्रचंड जळफळाट होत असे. त्याचा तो तीव्र द्वेषाग्नि, सुडाग्नी अद्याप शमला नव्हता. कोर्टात आम्हाला पाहिल्यावर तो संतापाने धुमसत चेहऱ्यावर क्रुद्ध भाव आणून तोंडातल्या तोंडात अस्पष्टपणे सतत काहीतरी पुटपुटत रहायचा. बहुदा शिव्याशापच देत असावा. आम्ही मात्र त्याच्याकडे अनोळखी माणसासारखं पाहून दुर्लक्षच करायचो.

सुखदेव आणि रुपेश आंतून एक असले तरी कोर्टात समोरासमोर आल्यावर कुणाला संशय येऊ नये म्हणून एकमेकांना अजिबात ओळख देत नसत. त्या दोघांचेही वकील मात्र एकत्रच बसून केसच्या मुद्द्यांवर चर्चा करीत असत.

बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध पोलिसांत तक्रार करून आपण नेमकं काय साध्य केलं हेच सुखदेवला समजत नसावं. अटक होण्याची तसंच नोकरी गमावण्याची भीती, बदनामी, पोलिसांचा त्रास, वकिलाचा खर्च व कोर्टाच्या न संपणाऱ्या तारखांना कंटाळून आम्ही जेरीस येऊन दाती तृण धरून त्याला शरण जाऊ व तो मागेल तितके पैसे देऊन केस मागे घेण्याची त्याला विनंती करू असा सुखदेवचा प्रारंभी गोड गैरसमज होता. पण आम्ही जराही न डगमगता हा सारा त्रास हसतमुखाने सहन केला आणि सर्वांना पुरून उरलो. माझ्या या स्थितप्रज्ञतेमुळे चिडून जाऊन एकदा कोर्टातून बाहेर पडताना सुखदेव मला म्हणाला..

“साहेब, तुम्ही वरून शांत असल्याचं कितीही नाटक करीत असलात तरी आंतून या कोर्टाच्या तारखांमुळे तुम्ही चांगलेच बेजार झाला आहात हे मला पक्कं ठाऊक आहे. इथे येण्याजाण्यात तुमचा बराच वेळ, पैसा आणि सुट्ट्या खर्च होत असतील हे तर अगदी उघडच आहे. शिवाय सुट्ट्या मंजूर होण्यातील अडचणी, दर तारखेमागे वकिलांना द्यावी लागणारी फी, सततचं टेन्शन आणि मानसिक त्रास यामुळे तुम्ही पार वैतागून गेले असाल याचीही मला कल्पना आहे. खरं म्हणजे, त्यावेळी घाईगडबडीत माझं थोडंसं चुकलंच..! तुमच्या त्या उर्मट AGM राणे साहेबांनी माझा अपमान करून मला बँकेतून हाकलून दिलं होतं. तुमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार करताना त्या राणे साहेबांचंही नाव मी तक्रारीत टाकायला पाहिजे होतं. म्हणजे आज त्यांनाही तुमच्या सारखेच कोर्टात सारखे हेलपाटे मारावे लागले असते.”angry man-2

सुखदेवची ती विखारी जळजळ मी शांतपणे ऐकून घेतली. आणि मग हसत हसत समजावणीच्या सुरात त्याला म्हणालो..

“तुमचा काहीतरी फार मोठा गैरसमज झालेला दिसतोय. या कोर्टाच्या तारखांमुळे आम्हाला अजिबात त्रास होत नाही. उलट कोर्टाच्या तारखा लवकर लवकर मिळाव्यात याचीच आम्ही वाट पहात असतो. एकतर, आमचा इथे येण्याजाण्याचा सर्व खर्च बँकच देते. वकिलाची फी तसेच केस संबंधी जो काही खर्च होईल त्याचीही बँक आम्हाला पुरेपूर भरपाई देते. तसंच इथे येण्याचा एक दिवस, जाण्याचा एक दिवस व कोर्टाच्या तारखेचा एक दिवस असे किमान तीन दिवस सुटी मिळून बँकेच्या रोजच्या कामाच्या टेन्शनमधूनही आमची मुक्तता होते. त्यातून मधे जर एखाद दुसरी सुट्टी आली तर सलग चार ते पाच दिवस बँकेच्या कामातून आम्हाला आराम मिळतो.”calm man

माझं बोलणं ऐकून तीव्र अपेक्षाभंग झाल्याचं दुःख सुखदेवच्या काळवंडलेल्या चेहऱ्यावर उघडपणे झळकत होतं. तो माझ्याकडे अविश्वासाच्या नजरेने पहात असतानाच मी पुढे म्हणालो..

“माझा दैनिक भत्ता प्रतिदिन एक हजार रुपये इतका आहे. त्यामुळे प्रवास खर्चा (TA) व्यतिरिक्त प्रत्येक तारखेला किमान तीन ते पाच हजार रुपये मला दैनिक भत्ता (DA) मिळतो. पुढची तारीख मिळाल्यावर लगेच आम्ही आमच्या फॅमिलीला भेटायला इथूनच आपापल्या गावी जातो. आणि दोन दिवस फॅमिली सोबत राहून मगच पुन्हा नोकरीच्या जागी रुजू होतो. अशाप्रकारे या कोर्टाच्या तारखेच्या निमित्ताने आम्हाला बँकेच्या कामातून सुट्टी मिळते, प्रवास खर्च मिळतो, दैनिक भत्ता मिळतो आणि फॅमिली सोबत राहताही येतं.”

सुखदेव ‘आ वासून’ माझं हे बोलणं ऐकत होता. माझ्या बोलण्यावर विश्वास न बसून त्याने शेजारी उभ्या असलेल्या रहीम चाचांना विचारलं..

“तुम्हाला कोर्टाच्या तारखेला हजर राहण्यासाठी बँकेकडून टीए डीए (TA DA) मिळतो हे खरं आहे का ?”

उत्तरादाखल रहीम चाचांनी गेल्याच महिन्यातील त्यांच्या TA Bill ची मंजुरी सुचनाच (Sanction advice) खिशातून काढून त्याला दाखविली आणि म्हणाले..

“मी रिटायर होऊन तीन वर्षे झाली आहेत. तरीही कोर्टाची तारीख अटेंड करण्याचा मला अजूनही पूर्ण TA DA मिळतो. आणि ही केस संपेपर्यंत आम्हा सर्वांना तो तसा मिळतच राहणार आहे.”

“म्हणजे.. मागे तुम्ही मुंबईला RBI लोकपाल कार्यालयात आला होतात तेही बँकेच्याच खर्चाने का ?”

आवंढा गिळत सुखदेवने विचारलं..

“अर्थातच..!” मी म्हणालो.

“बँकेच्याच खर्चाने तेंव्हा मी मरीन ड्राईव्ह वरील आलिशान हॉटेल मध्ये उतरलो होतो आणि फर्स्ट क्लास AC ने प्रवासही केला होता.”

त्याला आणखी जळवण्यासाठी मी पुढे म्हणालो..

“एवढंच नाही, तर ग्राहक मंचाच्या औरंगाबादला झालेल्या सर्व तारखांना हजर राहण्यासाठी मला full TA DA तर मिळालाच पण अन्य किरकोळ खर्च, सुटी आणि फॅमिली सोबत राहण्याचा लाभही मिळाला..”

“म्हणजे.. तुम्हाला कोर्टाच्या तारखांना हजर राहण्याचा कधीच काहीच त्रास झाला नाही ?”

पडलेल्या चेहऱ्याने सुखदेवनं विचारलं..

“कधीच नाही. म्हणूनच तर आम्ही सगळे प्रत्येक तारखेला न चुकता कोर्टात हजर राहतो. पुढची तारीख नजीकच्या डेट ची मिळावी अशीच आमची इच्छा असते.”

माझं हे उत्तर ऐकून सुखदेवच्या मनाची झालेली तगमग, तडफड, चिडचिड त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. त्याचा डाव सपशेल फसला होता. आम्हाला त्रास देणं तर दूरच, उलट आम्ही कोर्टाच्या तारखा एन्जॉय करतो आहोत हे पाहून त्याला आपली प्रचंड फसगत झाल्यागत वाटत होतं. नेहमी यशस्वी होणारा आपला डाव यावेळी आपल्यावरच उलटल्याचं पाहून हताश होऊन स्वतःवरच चरफडत, खांदे पाडून निराश, दुःखी अंतःकरणाने खाल मानेनं तो तिथून निघून गेला.

त्या दिवसानंतर सुखदेवचा या केसमधील सारा इंटरेस्टच जणू संपून गेला. तो सतत तारखांना गैरहजर राहू लागला. कधी कधी त्याची बायको रत्नमाला ही एकटीच कोर्टात हजर रहात असे. रुपेश जगधनेची साक्ष सुरू असल्याने तो मात्र प्रत्येक तारखेला न चुकता हजर रहायचा. कोर्टात रुपेशने आपला आधीच कबुलीजबाब साफ फिरवला. आपण गुन्ह्यातील सहभागाचा पूर्वीचा खोटा कबुलीजबाब पोलिसांच्या मारहाणीच्या भयाने दडपणाखाली दिला होता.. असे त्याने सांगितले. अर्थात कोर्टाचा त्यावर विश्वास बसला नाही आणि त्यांनी रुपेशला “उलटलेला साक्षीदार” घोषित केले. रूपेशचे वर्तन संशयास्पद असून पोलीसांनी या महत्त्वाच्या दुव्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याचे दिसते, असेही न्यायाधीश म्हणाले.

त्याच दरम्यान नेहमीचे न्यायाधीश दीर्घकालीन सुटीवर गेल्याने त्यांच्या जागी आलेल्या नवीन जज साहेबांच्या कोर्टात आमची केस ट्रान्सफर झाली. रुपेशची साक्ष आणि उलटतपासणी संपली होती. “आरोपींपैकी कुणाला रुपेश बद्दल आणखी काही सांगायचे आहे का ?” असे जज साहेबांनी विचारले. आमचे वकील ॲड. मनोहर नेमके त्या दिवशी दुसऱ्या एका केसच्या ऑर्ग्युमेंटमध्ये बिझी होते. त्यामुळे मी शाळेतील वर्गातल्या विद्यार्थ्यासारखा हात उंचावून बोलण्याची परवानगी मागितली. न्यायाधीशांनी “तुमचे वकील कुठे आहेत ?” असं विचारलं आणि ते दुसऱ्या केसमध्ये युक्तिवाद करीत आहेत हे समजल्यावर मला बोलण्याची परवानगी दिली.

साक्षीदाराच्या पिंजऱ्यात (Witness box)

उभं राहून मी बोलायला सुरवात केली.. witness

प्रारंभी, रुपेशवर विश्वासाने सिग्नेचर स्कँनिंगचे काम सोपविल्यामुळे त्याला कोणत्याही खातेदाराची नमुना सही (specimen signature) पाहणे सहज शक्य होते हे सांगून त्याच्या अंगी “कुणाचीही सही हुबेहूब गिरवण्याची कला” असल्याचेही न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिले. गुन्ह्याच्या घटनेच्या दिवशी रुपेशची संशयास्पद हालचाल cctv त रेकॉर्ड झाली असून चेक बुक मागणी अर्ज गहाळ करणे, चेक बुक इश्यू रजिस्टर मध्ये खातेदाराची सही न घेताच त्याला चेक बुक देणे यात आपला सहभाग असल्याचे रुपेशने बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या समक्ष कबूल केल्याचेही न्यायाधीशांना सांगितले. अज्ञात संशयित जयदेव खडके याला भेटल्याचे व त्याने दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात त्याला दुसरे चेक बुक सुपूर्द केल्याचेही रुपेशने यापूर्वीच मान्य केले आहे याची सुद्धा मी न्यायाधीशांना आठवण करून दिली.

“वटवलेल्या चेक वरील बनावट सही रुपेशने केलेली नाही..” असा फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट असला तरी या रिपोर्टवर आमचा विश्वास नसून एकतर हा रिपोर्ट “मॅनेज” केलेला असावा किंवा रुपेश ऐवजी कुण्या “भलत्याच” व्यक्तीच्या हस्ताक्षराचा नमुना पडताळणीसाठी पाठविण्यात आला असावा असा आम्हाला संशय आहे. त्यामुळे “प्रतिष्ठित तटस्थ पंचांच्या उपस्थितीत रुपेशच्या हस्ताक्षराचा नवीन नमुना प्राप्त करण्यात यावा आणि तो नमुना अन्य मान्यताप्राप्त फोरेन्सिक लॅब कडे पडताळणीसाठी पाठविण्यात यावा..” अशी आमची मागणी असल्याचे मी न्यायाधीशांना अत्यंत नम्रपणे सांगितले.

जज साहेबांपुढे माझे म्हणणे मांडत असतांना अधून मधून मी रुपेशकडेही पहात होतो. त्याचा चेहरा भीतीने पांढरा फटक पडला होता. आपलं भांडं फुटलं, आपली चोरी पकडली गेली, आपला बुरखा फाटला, आपल्या पापांचा घडा भरला.. असे भाव त्याच्या भेदरलेल्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. नंतर लज्जेने, भीतीने, शरमेने त्याने जी मान खाली घातली ती बराच वेळ वरतीच केली नाही.

जज साहेब माझ्या बोलण्याने प्रभावित होऊन रुपेशच्या हस्ताक्षराची पुनः पडताळणी करण्याची मागणी मान्य करतील आणि मग “दूध का दूध, पानी का पानी” होऊन सत्य परिस्थिती पुढे येईल आणि आम्हाला खरा न्याय मिळेल अशी मला खात्री होती.

पण झालं उलटंच..! त्या नवीन न्यायाधीशांना केसच्या वास्तवाची काहीच पूर्वकल्पना नसल्याने माझी मागणी ऐकताच ते भडकले. मी उगाच काहीतरी नवीन मुद्दा उपस्थित करून संपत चाललेल्या केसच्या सुनावणीला अनावश्यक फाटे फोडून केस लांबवण्याचा प्रयत्न करतो आहे असेच त्यांना वाटले. रागाने ते म्हणाले..angry judge

“असा पोलिसांच्या तपासावरच संशय घेणं अत्यंत चुकीचं आहे. कशाच्या आधारे तुम्ही हा अंदाज व्यक्त करीत आहात ? पोलिसांवर रुपेशला मदत केल्याचा जो आरोप तुम्ही करीत आहात त्याचा काही ठोस पुरावा आहे का तुमच्याकडे ?”

त्यांच्या या प्रश्नावर मी मूकपणे नकारार्थी मान हलवली.

“रुपेशच्या हस्ताक्षराची पुनः पडताळणी करण्याची तुमची मागणी अमान्य करण्यात येत असून तुम्हाला कडक ताकीद देण्यात येते की यापुढे कोणत्याही पुराव्याशिवाय पोलिसांच्या तपासावर अविश्वास दाखवून कोर्टाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल.”

कोर्टाचा हा निर्णय ऐकून माझी घोर निराशा झाली तर रुपेशने सुटकेचा खोल निःश्वास टाकला. कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्याची माझी उरली सुरली आशाही अशारितीने संपुष्टात आली.sad man

(क्रमश:)

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १७    भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 

Mind blowing experiences of a Banker-17 एका बँकरचे थरारक अनुभव-17

farewell

लेखक 

श्री अजय कोटणीस – निवृत्त व्यवस्थापक- स्टेट बँक ऑफ हैदराबाद 

(लेखक परिचय- लेखाच्या शेवटी)

ही लेखमाला श्री कोटणीस यांच्या फेसबुक पेज वर नुकतीच त्यांनी प्रसिद्ध केली आहे आणि तिला वाचकांचा भरभरून प्रतिसाद नेहमीप्रमाणे मिळतो आहे. इथे ही लेखमाला या ब्लॉगच्या  वाचकांसाठी, श्री कोटणीस यांच्या परवानगीने प्रसिद्ध करीत आहोत.

Mind blowing experiences of a Banker-17

*बॅंकस्य कथा रम्या..*

*स्थितप्रज्ञ आणि उलटलेला डाव*

(भाग : 17)

सकाळी नेहमी सारखाच पहाटे पाच वाजता उठून रोजच्या सवयी प्रमाणे सारंगी डॅमच्या काठाने फिरायला गेलो. तिथे नित्य नेमाने येणारी दैनंदिन परिचयाची तरुण व आबालवृद्ध मंडळी भेटून अभिवादन करीत होती. त्यांच्या नमस्काराला हसून प्रत्युत्तर देताना “आता उद्यापासून आपल्याला हे चेहरे पुन्हा कधीही दिसणार नाहीत..” असे विचार मनात येऊन नकळत हात उंचावून तो हलवत मी त्यांचा निरोप घेत होतो.

बँकेत सकाळ पासूनच मला प्रत्यक्ष भेटून निरोप द्यायला येणाऱ्यांची रीघच लागली होती. राजू चहावाल्याच्या डोळ्यांतील अश्रू तर थांबता थांबत नव्हते. चारी बाजूंनी काच असलेली कृष्णाची एक सुंदर मूर्ती आपली आठवण म्हणून त्याने मला भेट दिली. बँकेच्या कॅश व्हॅनचा अतिशय अबोल, संयमी आणि निर्व्यसनी ड्रायव्हर अंगद तसंच प्रामाणिक, कष्टाळू सेवक नंदू माळी या दोघांची अवस्थाही तशीच बेचैन, सैरभैर झालेली दिसत होती. गावातील दाट परिचयाची डॉक्टर, वकील, शिक्षक, बँकर, शेतकरी व व्यावसायिक मंडळी मला आवर्जून भेटायला येऊन शुभेच्छा देऊन जात होती.

विशेष म्हणजे Addl. DSP व DySP मॅडम ही जोडी तसेच ठाणेदार जगन राठोड आणि सब. इंस्पे. वर्षा महाले हे देखील पुष्पगुच्छ घेऊन सदिच्छा व निरोप द्यायला आले होते. दुपारी अडीच वाजता बँकेचे कामकाज संपल्यावर गावातीलच एका हॉटेलमध्ये माझ्यातर्फे स्टाफला जेवण्यासाठी आमंत्रित केले होते. तिथेच हसत खेळत माझा अनौपचारिक निरोप समारंभ पार पडला. संध्याकाळी पाच वाजता केबिन मध्ये एकटाच बसून शेवटची आवरा सावर करत असतानाच बाहेरून..

“आत येऊ का साहेब..?”

असा आवाज ऐकू येताच मी मान वर करून पाहिलं, तो एक अंदाजे साठ पासष्ट वयाचा पॅन्ट शर्ट या साध्या वेशातील गृहस्थ हातात एक छोटासा पुष्प गुच्छ घेऊन उभा होता..

“या.. या..! बसा..!”

असं म्हणून मी त्याला आत बोलावलं..

“साहेब, तुम्ही मला ओळखलं नाही ? मी अप्पा.. कॉन्स्टेबल अप्पा वाघमारे..”

त्या गृहस्थाने असं म्हणताच मी त्याच्याकडे निरखून पाहिलं..

“अरे अप्पा.. तुम्ही ? खरंच मी ओळखलंच नाही तुम्हाला या वेशात.. नेहमी तुम्हाला युनिफॉर्म मध्येच पहायची सवय आहे ना, म्हणून.. ! कसे आहात ?”

वैजापूर ठाण्यात ड्युटीला असणारे अप्पा वाघमारे पोलिसांच्या पगाराची बिलं तसंच पोलीस ठाण्यातील बँके संबंधीची अन्य सर्व प्रकारची कामं करण्यासाठी नेहमीच बँकेत यायचे. शांत, मनमिळावू स्वभावाचे अप्पा सर्वांशी हसतमुखाने, प्रेमाने व आपुलकीने बोलायचे. पोलिस ठाण्यातील सर्वात सिनियर कर्मचारी असलेल्या हेड कॉन्स्टेबल अप्पांकडे, आताशा वयोमाना नुसार धावपळीची कामे झेपत नसल्याने ठाण्यातील बैठी, कारकुनी कामे तसेच बँकेतील कामे सोपवली जायची.

आत येऊन अप्पांनी आपल्या हातातील पुष्पगुच्छ मला दिला आणि म्हणाले..

“अभिनंदन साहेब, तुमची बदली औरंगाबादला झाल्याबद्दल.. ! तुम्ही एकदाचे टेन्शन मुक्त झालात.. आता तुम्हाला छान तुमच्या पत्नी, पोराबाळां सोबत शांतपणे राहता येईल. तुमचा इथला कार्यकाळ कसा गेला हे आम्हा पोलिस कर्मचाऱ्यांशिवाय कुणाला जास्त चांगलं ठाऊक असणार ? पण तुम्ही जराही न डगमगता, ज्या धीरानं परिस्थितीला तोंड दिलंत त्याबद्दल तुमचं कौतुक केलंच पाहिजे.”

बहुदा अप्पांना आणखीही काही बोलायचं होतं.. ते क्षणभर घुटमळले. इतक्यात त्यांच्या साध्या सिव्हिल पेहरावाकडे माझं लक्ष गेलं आणि मी विचारलं….

“आज तुम्ही साध्या वेषात कसे ? तुमची ड्युटी तर रात्री उशिरा पर्यंत असते ना ? की.. सुट्टीवर आहात आज ?”

माझ्या या प्रश्नावर आनंदी, प्रफुल्लित चेहऱ्याने ते म्हणाले..

“आज मी सेवानिवृत्त झालो. तुमच्या प्रमाणेच मी ही आजपासून टेन्शन मुक्त झालो. आता नाशिक जिल्ह्यातल्या माझ्या खेडेगावी राहून मस्तपैकी शेती करीत उर्वरीत आयुष्य शांतपणे घालवणार..”

“अरे वा ! अप्पा, खूप खूप अभिनंदन तुमचं.. आणि तुमच्या निवृत्ती नंतरच्या सुखी, निरोगी जीवनासाठी माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा..! आता मी तुम्हाला चहा पाजल्याशिवाय सोडणार नाही..”

बेल वाजवून वॉचमनला बोलावलं आणि सगळ्यांसाठी चहा आणायला सांगितलं. चहा पित असताना अप्पा एकटक माझ्याकडेच पहात होते. मग अचानक गंभीर होऊन ते म्हणाले..

“तुम्हाला आम्हा सर्वच पोलिसांचा खूप राग येत असेल, नाही ? आमचं खातं खूप भ्रष्ट आहे, लाच घेतल्याशिवाय आम्ही कोणतंही काम करीत नाही असाच तुमचा समज झाला असेल. आमच्या खात्यातील सर्वच अधिकारी व शिपाई कामचोर, लाचखोर नसले तरी दुर्दैवाने बहुसंख्य कर्मचारी मात्र लोभी, लालची आहेत, ही गोष्ट सुद्धा खरीच आहे..”

त्यावर मी म्हणालो..

“अहो अप्पा, लाचखोरी आणि भ्रष्टाचार तर सर्वच क्षेत्रांत बोकाळला आहे. मात्र या देशातील सर्वात जास्त तल्लख, बुद्धिमान, तत्पर आणि कार्यक्षम समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांपैकीच एक असून देखील तुम्हाला आमच्या केसचा तपास लावण्यात मात्र थोडं सुद्धा यश मिळू शकलं नाही याबद्दलच जरा आश्चर्य आणि दुःख वाटतंय..”

मी असं म्हणताच अविश्वासाने डोळे विस्फारून अप्पा म्हणाले..

“म्हणजे ? तुम्हाला खरंच काहीच माहिती नाही ? त्या तुमच्या हॉटेल वाल्या राजुनेही काहीच सांगितलं नाही का तुम्हाला ? निदान गावातल्या लोकांकडून तरी थोडी फार माहिती समजायलाच पाहिजे होती..”

अप्पांच्या या प्रश्नावर नकारार्थी मान हलवीत मी ठामपणे म्हणालो..

“नाही, राजूनं काहीच सांगितलं नाही मला. म्हणजे.. मीच त्याला पोलीस स्टेशन मधली कुठलीही बातमी सांगण्यास मनाई केली होती. आणि, गावकऱ्यांचं म्हणाल तर.. जितकी माणसं तितक्या अफवा.. म्हणून कुठल्याही इकडच्या तिकडच्या गावगप्पांवर मी कधीच विश्वास ठेवला नाही..”

त्यावर एक खोल निःश्वास सोडून अप्पा म्हणाले..

“ठीक आहे तर मग आता तुम्ही माझ्याकडूनच ऐका.. तुमच्या केसच्या तपासाची खरीखुरी कहाणी..”

खिशातून तपकिरीची डबी काढून त्यातील तपकीर बोटांच्या चिमटीत धरून ती नाकाजवळ नेऊन दीर्घ श्वास घेऊन अप्पा म्हणाले..

“त्या सुखदेव बोडखेनं पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर दोनच दिवसांत खबऱ्यां मार्फत त्या जयदेव खडकेच्या ठावठिकाण्या बद्दल फौजदार साहेबांना पक्की खबर मिळाली असावी. कारण फौजदार साहेब सब. इंस्पे. हिवाळे आणि दोन कॉन्स्टेबलना सोबत घेऊन तडका फडकी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात गेले होते. जयदेव खडके हे नाव धारण करणाऱ्या त्या व्यक्तीचं खरं नाव भाऊसाहेब सुरकांडे असल्याचं समजतं.. आणि हा भाऊसाहेब सुखदेवच्या मावसभावाचा जवळचा मित्र आहे असंही म्हणतात. सुरगाणा तालुक्यातील एक छोट्याशा गावांतील भाऊसाहेबाच्या घरी जेंव्हा पोलीस गेले तेंव्हा तो जवळच्या गुजराथ राज्यात पळून गेला होता. मात्र त्याच्या घरून फौजदार साहेबांनी साडेपाच लाख रुपयांची रोख रक्कम जप्त केली असं त्यांच्या बरोबर गेलेले कॉन्स्टेबल सांगतात..”

एवढं बोलून या गौप्यस्फोटा नंतर माझ्या चेहऱ्यावर काय प्रतिक्रिया उमटते हे पाहण्यासाठी अप्पा जरा वेळ थांबले. खरं म्हणजे, पोलिसांनी तोतया जयदेवला पकडून त्याच्याकडून पाच लाख ऐंशी हजार रुपये तर वसूल केलेच पण त्याच्या भाऊ व आई वडिलांना तसेच त्याच्या सासू सासऱ्यांनाही भीती दाखवून त्यांच्याकडून बरीच मोठी रक्कम उकळल्याचे वैजापुरातील लोकांकडून अनेकदा उडत उडत समजले होते. पण त्या बातम्यांची पुष्टी आत्ता अप्पांकडून होत होती. चेहऱ्यावर ओढून ताणून खोटी उत्सुकता दाखवीत म्हणालो..

“मग ? पुढे काय झालं ? तो भाऊसाहेब सुरकांडे चांगला हाती सापडला असतानाही त्याला अटक का नाही केली पोलिसांनी ?”

“अहो साहेब, भाऊसाहेबला जर अटक केली असती तर जप्त केलेले पैसे सरकार दरबारी जमा करावे लागले असते. परस्पर तसेच गिळंकृत करता आले नसते. तसंच फिर्यादी सुखदेव व आरोपी.. म्हणजे तुम्ही आणि गुन्ह्याशी संबंधित अन्य व्यक्तींकडून पैसेही उकळता आले नसते.”

“बापरे ! म्हणजे पोलिसांनी फिर्यादी सुखदेव बोडखे कडूनही पैसे उकळले ?”

“अर्थात ! एक तर.. खात्यातून पैसे काढले गेल्याची गोष्ट ताबडतोब त्याच दिवशी कशी समजली ? या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर सुखदेव जवळ नव्हतं. तसंच दुसरं चेक बुक मिळण्यास किंचित विलंब झाल्यावरून सुखदेवच्या मुलाने बँकेत आरडाओरड करून गोंधळ घातला होता, असं तुमच्या त्या बँक सोडून गेलेल्या मुलीचं, बेबीचं स्टेटमेंट होतं. सुखदेवचा मुलगा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून यापूर्वी अनेकदा किरकोळ गुन्ह्यांसाठी त्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याचा गुन्ह्यातील सहभाग पोलिसांना सहज सिद्ध करता आला असता.”

“पण मग फौजदार साहेबांनी सुखदेव आणि त्याच्या मुलावर तेंव्हाच action का घेतली नाही ?”

“तसं पाहिलं तर सुरवातीला फौजदार साहेबांनी न मागताच सुखदेव त्यांना भरपूर पैसे देत होता. पोलिसांनी लवकर FIR नोंदवून बँकेच्या स्टाफला अटक करावी यासाठीच ही लाच होती. फौजदार साहेबांना तेंव्हाच सुखदेव बद्दल संशय निर्माण झाला होता. आणि पुढे त्या भाऊसाहेब सुरकांडेचं सुखदेवशी असलेलं कनेक्शन उघड झाल्यावर तर सुखदेवलाच पोलिसांच्या कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नाईलाजाने फौजदार साहेबांना आणखी भरपूर पैसे द्यावे लागले.”

“अप्पा, मघाशी तुम्ही गुन्ह्याशी संबंधित अन्य व्यक्तींकडूनही पोलिसांनी पैसे घेतले असा उल्लेख केलात.. या अन्य व्यक्ती कोण ? रुपेश तर नाही ?”

“बरोब्बर ओळखलंत तुम्ही, साहेब ! खरं म्हणजे त्या भाऊसाहेब सुरकांडे बद्दल पोलिसांना पहिली खबर या रुपेशनंच दिली. रुपेश हा होमगार्ड असल्याने त्याचे पोलीस स्टेशन मधील सर्वांशीच अतिशय जवळचे संबंध आहेत. आम्ही त्याला आमच्या पैकीच समजतो. आयत्या मिळणाऱ्या पैशाच्या मोहाला बळी पडून रुपेशने आधी या गुन्ह्यात भाग घेतला खरा, पण नंतर त्याला खूप पश्चाताप झाला. पोलीस या गुन्ह्याचा छडा लावतील आणि आपल्याला खूप मोठी शिक्षा होईल ही भीती त्याला सतावू लागली. गुन्ह्यात आपलं नाव येऊ न देण्याच्या अटीवर त्याने या कटाची संपूर्ण माहिती फौजदार साहेबांना दिली.”

“मला आणखी एक शंका आहे. त्या दिवशी रुपेशने आम्हाला अर्धवट लेखी कबुली जबाब दिल्यावर जेवायला घरी जाऊन येतो असे म्हणून तो बँकेतून घराकडे गेला. मात्र घरून आल्यावर त्याने आणखी काहीही माहिती सांगण्यास नकार दिला. तो त्या दिवशी घरी न जाता पोलीस स्टेशन मध्ये तर आला नव्हता ना ?”

“नाही साहेब.. ! त्या दिवशी तो घरीच गेला होता. खरं म्हणजे त्याला पोलीस ठाण्यातच यायचं होतं, पण चलाख रहीम चाचांनी त्याचा पोलीस स्टेशन पर्यंत पाठलाग केला. त्यामुळे नाईलाजाने त्याला घरीच जावं लागलं. मात्र घरून त्याने मोबाईल वरून फौजदारांशी संपर्क साधला आणि बँकेच्या स्टाफला लेखी कबुली जबाब दिल्याचं सांगितलं. त्यावर फौजदार साहेबांनी “आता यापेक्षा जास्त काहीही कबूल करू नकोस, नाहीतर तुला वाचवता येणं कठीण आहे” असं त्याला बजावून सांगितलं. म्हणूनच त्याने बँकेत परत आल्यावर आणखी काहीही सांगण्यास नकार दिला.”

अप्पांकडून एकेका रहस्यावरचा पडदा अलगद दूर होत होता.

“आणखी एक शंका आहे अप्पा..! पोलिसांनी केलेल्या हस्ताक्षर चाचणीचा अहवाल काय आला ? पोलीसांनी त्याबद्दल आम्हाला आतापर्यंत काहीच कसं कळवलं नाही ?”

माझ्या हा प्रश्न ऐकून हेड कॉन्स्टेबल वाघमारे अप्पा, सांगावं की सांगू नये.. अशा चिंतेत पडले. पण मग आता आपण सेवामुक्त झालो आहोत याची त्यांना जाणीव झाली असावी. मनमोकळं हसत ते म्हणाले..

“महत्वाचा, कळीचा प्रश्न विचारलात साहेब..! चेक वरील सही खातेदार सौ. रत्नमाला बोडखे यांनी केलेली नाही तसेच बँकेचा स्टाफ किंवा रुपेश जगधने यापैकीही कुणीही केलेली नाही असा पुण्याच्या फोरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आला असून तो रिपोर्ट कोर्टाला सादर करण्यात आला आहे. तुम्ही आरोपी असल्याने तुम्हाला या रिपोर्ट बद्दल माहिती देण्याचा काही संबंधच येत नाही..”

“हे कसं शक्य आहे ? ती हुबेहूब बनावट सही रुपेशनेच केलेली आहे याबद्दल मला शंभर टक्के खात्री आहे. त्या फोरेन्सिक लॅबच्या रिपोर्ट मध्ये नक्कीच काहीतरी घोटाळा आहे.”

“नाही साहेब ! फोरेन्सिक लॅबचं काम अगदी चोख आहे. त्यांचा रिपोर्टही एकदम अचूक आहे. मात्र रुपेशच्या हस्ताक्षराचा जो नमुना लॅब कडे पाठवण्यासाठी घेण्यात आला होता तोच बदलून जर त्या जागी भलत्याच व्यक्तीच्या हस्ताक्षराचा नमुना लॅब कडे पाठविण्यात आला असेल तर ? शेवटी, रुपेश हा आमचाच माणूस असल्याने त्याला वाचविण्याचा हर प्रकारे प्रयत्न करणं हे ही आमचं कर्तव्यच होतं, नाही का ?”

“पण तुम्ही तर रुपेशला अटक करून कोर्टासमोर हजरही केलं होतंत. काही काळ तो हरसूल कारागृहातही होता..”

“रुपेशचा मूर्खपणा त्याला नडला. त्याचं असं झालं की आपल्या मुलाचा बँकेतील घटनेत सहभाग असावा अशी रुपेशच्या पापभिरू आई वडीलांना आधीपासूनच शंका होती. कारण तो भाऊसाहेब सुरकांडे एक दोन वेळा रुपेशच्या घरी गेला होता तेंव्हा रुपेशच्या पत्नीने व आई वडिलांनी त्याला पाहिले होते. बँकेचे कर्मचारी भाऊसाहेबाचा फोटो सर्वांना दाखवत फिरत होते, त्यावेळी रुपेशच्या वडिलांनी फोटोतील भाऊसाहेबला पाहून हाच तो रुपेशला भेटायला आपल्या घरी येणारा म्हणून ओळखले होते. रुपेशला पोलीस पकडतील म्हणून त्यावेळी ते गप्प बसले. त्यातच रुपेशचा दोन वर्षांचा एकुलता एक मुलगा त्याच सुमारास खूप आजारी पडला. आधीच, हातून घडलेल्या विश्वासघाताच्या कृत्यामुळे रुपेशचं मन त्याला खात होतंच.. त्यातून त्याची पत्नी आणि आई वडील सुद्धा त्याला देवाची, पापाच्या परिणामांची भीती दाखवून सतत टोचून बोलत होते. मुलाच्या बिघडत्या तब्येतीच्या काळजीने तो हळवा झालेला असतांनाच तुम्ही त्याला केबिनमध्ये बसवून ठेवलंत.. आत्मग्लानीने तो कोलमडून गेला आणि त्या पश्चातापाच्या भरात त्याने तो कबुलीजबाब दिला. अर्थात तो लवकरच सावरला, सावध झाला आणि अर्धवट दिलेला कबुलीजबाब त्याने तसाच राहू दिला, पूर्ण केला नाही.”

एवढं बोलून किंचित डोळे बारीक करून माझ्याकडे पहात अप्पा म्हणाले..

“तुम्ही रुपेशकडून घेतलेल्या लेखी कबुलीजबाबाला आम्ही थेट केराची टोपली दाखवली. त्याला आम्ही अटकही करणारच नव्हतो. पण तुम्ही त्या कबुलीजबाबाची एक प्रत स्वतः कडे ठेवून घेतली आहे, हे आम्हाला ठाऊक नव्हते. तुम्ही ती प्रत Addl. DSP साहेबांना दाखवली आणि मग त्यांच्या आदेशावरून आम्हाला रुपेशला अटक करून तुरुंगात पाठवावे लागले..”

हेड कॉन्स्टेबल अप्पा वाघामारेंना जे काही सांगायचं होतं ते सारं सांगून झालं होतं. डोक्यावरून जणू काही खूप मोठं ओझं उतरल्या सारखा चेहरा करून ते खुर्चीत निवांतपणे रेलून बसले. मी त्यांना विचारलं..

“मग आता पुढे काय होणार पोलीस तपासाचं..?”

मोठ्याने खो खो हसत अप्पा म्हणाले..

“अहो साहेब, झाला की तपास पूर्ण.. ! आरोपींवर चार्जशीट दाखल करून कोर्टात खटला दाखल केला आहे. आता आमचा रोल संपला. यापुढील कारवाई आता कोर्टच करेल..”

“पण.. तो मुख्य आरोपी जयदेव खडके उर्फ भाऊसाहेब सुरकांडे.. ह्याला तर तुम्ही अटकच केली नाहीत ? तुमच्या रेकॉर्ड मध्ये ही केस “न सुटलेली (unsolved)” म्हणूनच नाही का राहणार ?”

मी माझी भाबडी शंका व्यक्त केली.

“नाही ! आमच्या लेखी तुम्ही बँकवालेच मुख्य आरोपी आहात. रुपेश आणि जयदेव तुमचे सहाय्यक आहेत. बहुतांश आरोपींना आम्ही तांत्रिक दृष्ट्या अटक करून कोर्टासमोर हजर केले आहे. आता कोर्टाचा निकाल लागेपर्यंत तुम्ही सारे जामीना वरतीच मोकळे राहणार आहात. जयदेवचा तपास लागू शकला नाही आणि त्यामुळे मुद्देमालही (रोख रक्कम) जप्त करता आला नाही असे नमूद करून आम्ही केसचा तपास केंव्हाच थांबवला आहे..”

या अप्पा वाघमारेंकडे माझ्या सर्वच प्रश्नांची उत्तरे होती. अर्थात या केस संबंधित आणखीही काही बाबतीत थोड्याशा अंधुक शंका-कुशंका, कुतूहल म्हणा वा उत्सुकता, बाकी होतीच. त्यांचंही निरसन या अप्पांकडूनच करून घ्यावं म्हणून विचारलं..

“रुपेश जगधनेनं गेल्या काही दिवसात दोनदा आपली थोडी थोडी शेती विकल्याचं ऐकलं आहे.. ते खरं आहे का ? आणि खरं असल्यास ती त्याने कशासाठी विकली ?”

“रुपेशचा या गुन्ह्यात थेट सहभाग आहे. Cctv फुटेज, लेखी कबुलीजबाब असे सर्व पुरावे त्याच्याविरुद्ध आहेत. त्याला वाचविणं, शिक्षा होऊ न देणं हे फौजदारांच्या दृष्टीनं तसं खूपच जोखमीचं काम होतं. अर्थात त्याची पुरेपूर किंमत फौजदार साहेबांनी रुपेश कडून वसूल केली. सुरवातीला त्यासाठीच त्याला आपली दोन एकर शेती विकावी लागली. त्यानंतर पूर्वीच्या फौजदारांची इथून बदली झाल्यावर जेंव्हा नवीन फौजदार साहेब इथे रुजू झाले तेंव्हा त्यांनीही रुपेश कडून तशीच मोठी रक्कम वसूल केली. त्यावेळी पुन्हा त्याला आपल्या हिश्श्याची आणखी एक एकर जमीन विकावी लागली.”

“व्वा ! शाब्बास !! एकंदरीत ‘वसुली’ हेच तुम्हा पोलिसांचं प्रथम कर्तव्य असतं असं दिसतंय.. ते गुन्ह्याचा तपास वगैरे सगळं दुय्यम, गौण.. असंच ना ?”

मी उपरोधानं म्हणालो. त्याकडे दुर्लक्ष करून अप्पा म्हणाले..

“या सगळ्यांतून त्या सुखदेवला काय मिळालं, हे तर तुम्ही विचारलंच नाहीत ? पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, या प्रकरणात सर्वात जास्त आर्थिक नुकसान सुखदेवचंच झालं. एकतर बँकेच्या कर्मचाऱ्यांना बदनामीची व पोलीस केसची भीती दाखवून पैसे उकळण्याचा त्याचा प्लॅन सपशेल फसला. तुम्ही बदनामी, मानसिक त्रास सहन केलात पण त्याच्या धमक्यांना भीक घातली नाहीत. पोलीस, पत्रकार, नेते मंडळी यांच्यावर आधी सुखदेवने स्वतःहूनच खूप पैसे खर्च केले. ग्राहक मंच व फौजदारी न्यायालयातील त्याच्या वकिलांनीही त्याला भरपूर लुबाडून घेतलं. खरं म्हणजे तुम्हा बँकवाल्यांना फक्त घाबरवण्यासाठीच त्याने पोलीसात तक्रार दाखल केली होती. तुम्ही पोलिसांच्या अटकेला घाबराल आणि आपली नोकरी वाचविण्यासाठी ताबडतोब त्याला हवे तेवढे पैसे द्याल आणि मग पोलिसात दिलेली तक्रार सोयीस्करपणे मागे घेता येईल, असा त्याचा साधा सरळ प्लॅन होता.”

अप्पा चांगलेच रंगात येऊन बोलत होते. मधेच त्यांना तपकिरीची आठवण झाली. चिमूटभर तपकीर मनसोक्त हुंगून झाल्यावर ते पुढे म्हणाले..

“पोलिसांत तक्रार देऊन सुखदेव फसला. जस जसे सुखदेव विरुद्ध पोलीसांकडे पुरावे गोळा होऊ लागले तशी तशी त्यांची पैशाची मागणी वाढत गेली. पोलिस आपल्या भोवती फास आवळू नयेत म्हणून सुखदेव त्यांना ते मागतील तेवढे पैसे देत राहिला. जयदेव उर्फ भाऊसाहेब सुरकांडे कडून पोलिसांनी गुन्ह्यातील संपूर्ण रक्कम आधीच वसूल केली होती. ग्राहक न्यायालया मार्फत सुखदेवने बँके कडून पुन्हा पाच लाख ऐंशी हजार रुपये व्याजासहित उकळले खरे, पण पोलिसांनी जोर जबरदस्ती करून त्यातूनही आपला हिस्सा दमदाटीने वसूल केलाच.”

अप्पांच्या तोंडून पोलिसांचं हे “अर्थपुराण” ऐकताना मनात प्रचंड चीड दाटून येत होती. तरीही संयम राखीत म्हणालो..

“अशारितीने तुमची मनसोक्त वसुली तर झाली ना..? मग आता तरी आम्हाला न्याय मिळणार की नाही? तुम्ही सुखदेवला अटक का करत नाही ? तसंच जयदेव उर्फ भाऊसाहेब आणि रुपेश यांनाही तुम्ही बेड्या ठोकल्या पाहिजेत.”

यावर किंचित गंभीर होत अप्पा म्हणाले..

“सुखदेव या केस मध्ये फिर्यादी आहे. त्यामुळे त्यालाच जर आरोपी केलं तर संपूर्ण केसच उलटपलट होऊन जाईल. सुखदेव मुळेच आम्हाला एवढ्या मोठया ‘वसुली’ ची संधी मिळाली. तसंच त्याने पोलिसांना त्यांच्या मागणीनुसार वेळोवेळी दिलेल्या पैशांचा मानही ठेवलाच पाहिजे. भाऊसाहेब सुरकांडेला अटक केली तर त्याच्याकडून जप्त केलेली रक्कम सरकारजमा करावी लागणार. तसंच तो कोर्टापुढे सुखदेवचं आणि रुपेशचं नाव घेतल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ह्या जयदेव उर्फ भाऊसाहेबचा शोध कधीच लागणार नाही. तो कायम अज्ञातच राहणार.. रुपेशने आधीच पुरेसा तुरुंगवास भोगला आहे. त्याच्याविरुद्ध कुठलेही पुरावे कोर्टापुढे सादर न करण्याची काळजी आम्ही घेतली आहे. त्यामुळे कोर्ट त्याला कोणतीही शिक्षा सुनावू शकणार नाही. आता राहिला प्रश्न तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा..!”

एखादा न्यायाधीश अंतिम निकालाचं वाचन करताना बोलतो तसं अप्पा अत्यंत मुद्देसूद बोलत होते.

“तर साहेब.., तुमच्या विरुद्धही आम्ही कोणताच ठोस पुरावा कोर्टापुढे सादर केलेला नाही. दुसऱ्या चेक बुकच्या मागणीचा अर्ज गहाळ असणे आणि चेक बुक इश्यू रजिस्टर वर कस्टमरची सही नसणे.. ह्या दोनच गोष्टी तुमच्या विरुद्ध आहेत. अर्थात त्यावरून फार तर बँकेने आपल्या दैनंदिन कामात थोडा निष्काळजीपणा केला एवढाच निष्कर्ष काढला जाऊ शकतो. पैशांचा अपहार कदापिही सिद्ध होऊ शकत नाही. सबब, तुम्हालाही कोर्टात शिक्षा होणं शक्य नाही. आणि.. तुम्हाला शिक्षा न होणं, तुमच्यावर अन्याय न होणं हा ही एक प्रकारे न्यायच आहे, नाही का ?”

अप्पांचं अजब तर्कशास्त्र ऐकून मान डोलावल्याशिवाय गत्यंतरच नव्हतं.

“बरं.. निघतो मी ! खूप वेळ घेतला तुमचा.. !!”

असं बोलून अप्पा वाघमारे परत जायला निघाले.

“थांबा अप्पा ! आणखी एक दोन शंका आहेत.. तुम्हाला ठाऊक असल्यास कृपया त्यांचीही उत्तरं देऊन जा..”

माझी ही विनंती ऐकताच अप्पा थबकले. मी त्यांचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकतोय, त्यांना महत्व देतोय हे पाहून ते अंतर्यामी सुखावले. पुन्हा खुर्चीवर बसत ते म्हणाले..

“विचारा नं साहेब ! काय वाट्टेल ते विचारा.. मी सगळ्यांची खबर ठेवतो. या अप्पाच्या नजरेतून बारीक सारीक गोष्टही सुटत नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर देईन मी..”

“आमचे जोगळेकर नावाचे एक वकील आहेत, औरंगाबादचे..! ते कधी कधी वैजापूर कोर्टात आलेले दिसायचे. ते इथे का येत असावेत याबाबत काही कल्पना आहे का ? म्हणजे, आमच्या केसच्या संदर्भात तर नव्हते ना येत ? ..असं विचारायचंय..”

“वा साहेब ! मानलं तुम्हाला..! तुमची शंका अगदी बरोबर आहे. औरंगाबादचे एक वकील मध्यंतरी फौजदार साहेबांना भेटायला येत होते. चार्ज शीट मधून तुमचं नाव वगळण्यासाठी त्यांचं सहकार्य मागण्यासाठी.. पण फौजदार साहेबांनी त्यांना त्यासाठी खूप मोठी किंमत सांगितली. त्यांनी कमी किंमतीत काम करण्यास तयार व्हावं यासाठी ते वकील साहेब काही दिवस फौजदार साहेबांकडे चकरा मारत होते. पण मग काही दिवसांनी त्या वकिलांनी फौजदार साहेबांचा नाद सोडला.. कुणाला संशय येऊ नये म्हणून ते वकील साहेब आपली कार कोर्टाच्या आवारात उभी करत आणि फौजदार साहेबांनाच तिकडे बोलावून घेत असत. त्यांच्यासोबत कार मधे बसूनच ते ही सौदेबाजीची बोलणी करत..”

माझ्या डोक्यातील साऱ्याच शंकांचा गुंता हळूहळू सुटत चालला होता. आता एकच मुख्य शंका बाकी होती. तीही या अप्पांना विचारून टाकावी म्हणून म्हटलं..

“रूपेश व्यतिरिक्त आमच्या स्टाफ पैकी अथवा निकट परिचय असलेल्यांपैकी आणखीही कुणीतरी पोलिसांचा मदतनीस किंवा खबऱ्या असावा असा मला पूर्वीपासून संशय आहे. याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का ?”

“नुसता संशयच आहे अजून ? खरंच साहेब, खूप भोळे आहात तुम्ही..!”

तोंडाने ‘चुक चुक’ असा आवाज काढीत माझ्याबद्दल एकाच वेळी कीव आणि सहानुभूती.. दोन्ही व्यक्त करीत अप्पा उद्गारले..

“तुमच्या सर्व हालचालींची खडानखडा माहिती पोलिसांना वेळोवेळी अगदी ताबडतोब मिळत होती. FIR दाखल झाल्यावर अटकेच्या भीतीने तुम्ही सारे वैजापूरहून औरंगाबादला निघालात त्यावेळी केवळ दोनच मिनिटांच्या आतच आम्हाला त्याची खबर मिळाली. तुम्ही औरंगाबादला पोहोचण्यापूर्वीच आम्ही तुम्हाला अटक करू शकलो असतो, पण आम्ही जाणीवपूर्वक तसं केलं नाही. तुम्ही बँकेच्या ट्रेनिंग सेंटरच्या होस्टेल मध्ये रहात असल्याची खबर मिळाल्यानेच सब. इंस्पे. हिवाळे साहेब तिथे तुम्हाला भेटायला आले होते.”

अप्पांचं म्हणणं खरंच होतं. हिवाळे साहेब हॉस्टेल वर भेटायला आले तेंव्हाच स्टाफपैकीच कुणीतरी “आस्तीन का सांप” असला पाहिजे असा संशय आला होता. पण तो “दगाबाज खबऱ्या” कोण असावा ? याबद्दल खूप विचार करूनही त्याबद्दल तेंव्हा उलगडा झाला नव्हता.

“चहावाला राजू, नंदू माळी, जीप ड्रायव्हर अंगद, बँकेसमोरील अंडाभुर्जी-वडापाव वाले, चार दोन तुमचे अगदी जवळचे, विश्वासू व हितचिंतक कस्टमर ही बाहेरची मंडळी.. तसेच बँकेचे पर्मनंट चपराशी, सिक्युरिटी गार्डस् आणि काही लेडीज व जेंट कर्मचारी.. एवढ्या साऱ्या जणांनी पोलिसांना वेळोवेळी जाणता अजाणता बरीच महत्वाची माहिती पुरवली आहे. कुणा एकाचं नाव मी घेणार नाही. तुम्ही सुज्ञ आहात. शिवाय आज ना उद्या तुम्हाला या सर्वांची नावं कळणारच आहेत.”

धुर्तपणे असं गोल मोल उत्तर देऊन माझा निरोप घेत अप्पा निघाले. त्यांना जास्त आग्रह करण्यात अर्थ नव्हता. माझीही निघायची वेळ झालीच होती. नंदू माळी व ड्रायव्हर अंगद, बाहेर जीप मध्ये माझं सामान ठेवून मी बाहेर येण्याची वाट पहात थांबले होते. केबिन लॉक करून मी हॉल मध्ये येताच ड्युटीवरील दोन्ही सिक्युरिटी गार्ड्सनी मला निरोपाचा कडक सॅल्युट ठोकला. बँकेच्या इमारती बाहेरील आवारात येताच बगीच्या जवळील अंधाऱ्या आडोशातून अचानक राजू चहावाला पुढे आला. माझ्या जवळ येऊन हलक्या आवाजात तो म्हणाला..

“साहेब, तो हलकट अप्पा इतका वेळ इथे काय करत होता ? खूप मोठा चुगलखोर आहे तो.. आपल्या मनानेच खोट्या नाट्या कहाण्या रचून लोकांत भांडणं लावून देणं हा त्याचा आवडता उद्योग आहे. खुद्द फौजदार साहेब तसंच ठाण्यातील इतर पोलीस कर्मचाऱ्यांबद्दल खऱ्या वाटतील अशा असंख्य मनगढ़ंत, काल्पनिक गोष्टी, किस्से तयार करून तशा अफवा पसरवणे व त्या आधारे वरिष्ठांकडे तक्रार करणे यासाठी तो बदनाम आहे. यामुळेच पोलीस त्याला कोणत्याही तपास कामात सहभागी करून घेत नसत आणि फक्त बँकेची व कारकुनी स्वरूपाची कामेच त्याच्याकडून करवून घेत असत. त्याचं बोलणं म्हणजे शुद्ध थापा असतात..”

राजुचं बोलणं मला कुठेतरी थोडं थोडं पटत होतं. अर्थात आता वैजापुरातल्या कुठल्याही खऱ्या खोट्या व्यक्तींशी अथवा गोष्टींशी मला काहीही देणं घेणं नव्हतं. औरंगाबादला जाणारी शिर्डी एक्सप्रेस तारुर स्टेशन वरून सुटली असून दहा मिनिटांत रोटेगावला येत असल्याचा स्टेशन मास्तरांचा निरोप मिळाला आणि सर्वांचा शेवटचा निरोप घेऊन घाईघाईतच मी स्टेशनकडे निघालो.

kotnis katha

(क्रमश:)

 

ajay kotnis photo1

श्री अजय कोटणीस हे बँकेतील माझे सहकारी असून, स्टेट बँक ऑफ हैदराबाद मधून शाखा व्यवस्थापक या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचा ३७ पेक्षा जास्त  वर्षांचा प्रदीर्घ अनुभव  असून, त्यांच्या कार्यकाळात त्यांनी महाराष्ट्रातच नाही तर बाहेरील राज्यांमध्येही सेवा बजावली. त्याआधी त्यांनी मराठवाडा ग्रामीण बँकेतही  सेवा केली.  त्यांना त्यांच्या सेवेत आलेले चित्तथरारक अनुभव ते त्यांच्या उत्कंठावर्धक शैलीत वर्णन करतात, आणि वाचकाला शेवटपर्यंत कथानकावर खिळवून ठेवतात.  

त्यांना मराठवाड्यातील एका गावी बँकेत शाखा प्रमुख असतांना आलेल्या अनुभवावर आधारित, एक प्रसंग त्यांनी त्यांच्या खास शैलीत वर्णन केला आहे. यापूर्वी या कथानकाचे १६   भाग त्यांनी प्रसारित केले होते, आता हे कथानक पुढे वर्णन केले आहे.. 

A glimpse of Vedic knowledge-3

yagya

A glimpse of Vedic knowledge-3

A glimpse of Vedas या लेखमालेत आपण वेदांबद्दल काही माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपल्या या अत्यंत समृद्ध आणि कालातीत ठेव्याविषयी पाश्चात्य लोक किती आस्थापूर्वक अभ्यास करतात हे पाहिल्यावर आपल्याला या गोष्टींची अगदी प्राथमिक माहिती तरी असली पाहिजे असा विचार आला.

पहिल्या लेखात आपण प्रस्थान त्रयी कशाला म्हणतात, श्रुति प्रस्थान, स्मृति प्रस्थान आणि न्याय प्रस्थान म्हणजे काय याची थोडक्यात माहिती घेतली.

सनातन संस्कृतीचे आधारभूत असलेले वाङमय म्हणजे वेद होत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे ते चार वेद होत. संस्कृत मधील विद् या संज्ञेपासून वेद हा शब्द बनला आहे. विद् म्हणजे ‘जो जाणतो’ आणि वेद म्हणजे ‘जाणणे’.

चार वेदांत सगळ्यात मुख्य आणि सगळ्यात मोठा ऋग्वेद आहे. मोठा म्हणजे किती मोठा? तर ऋग्वेदात साधारण १०४६२ मंत्र, किंवा ऋचा आहेत. ज्या रचना पद्यस्वरूपात किंवा छंदोबद्ध आहेत त्यांना ऋचा म्हटले जाते. ऋक् + वेद म्हणजे ऋग्वेद. यातील ऋक् म्हणजे प्रार्थनापर किंवा स्तुतिपर मंत्र.  यजुस् म्हणजे यज्ञात वापरले जाणारे गद्य मंत्र. यजुर्वेद मुख्यतः यज्ञात वापरल्या जाणाऱ्या गद्य मंत्रांचा संग्रह आहे असे म्हटले तरी चालेल. यजुर्वेदात १९७५ मंत्र आहेत. सामवेदातही  जवळपास तितकेच मंत्र आहेत. पण सामवेदात बहुतेक मंत्र ऋग्वेदातीलच जसेच्या तसे घेतले आहेत. सामवेदात ते मुख्यतः गेय (गायल्या जाणाऱ्या) स्वरूपात आले आहेत. आणि अथर्ववेदात जवळ जवळ ६००० मंत्र आहेत. अथर्ववेदात अनेक तांत्रिक बाबतीतले, तसेच तथाकथित ‘वाम’ मार्गातील मंत्र आहेत. याबद्दल आपण पुढे माहिती घेऊ. याला आपल्या सोयीसाठी पुढील टेबलमध्ये मांडता येईल.

क्र.

वेद

मंत्र संख्या

शैली

विवरण

1

ऋग्वेद

10462

मन्त्रपरक

सगळ्यात  प्राचीन वेद

2

यजुर्वेद

1975

गद्यात्मक

कर्मकांडपरक, शुक्ल आणि  कृष्ण भागात विभाजित

3

सामवेद

1875

गेयात्मक

संगीतमय, यातील बहुतेक  मंत्र ऋग्वेदातीलच आहेत.

4

अथर्ववेद

5987

प्रौद्योगिकी, आरोग्य आणि तंत्रपरक

सगळ्यात नवीन वेद

ऋग्वेदात काय आहे?

ऋग्वेदात निसर्गाची, निसर्गातील विविध घटकांची आणि त्यांच्या देवतांची स्तुति आणि अत्यंत काव्यमय वर्णनें आहेत. अग्नि, वायू, इन्द्र, वरुण, विश्वदेव, मरुत, प्रजापति, सूर्य, उषा, पूषा, रुद्र, सविता या देवतांची सूक्तें आहेत. सूक्त म्हणजे स्तुति करणारी, ‘सु’ उक्ति. ऋग्वेदातील पहिलाच मंत्र किंवा ऋचा खालीलप्रमाणे आहे:

ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्। होतारं रत्नधातमम् ॥ १.१.१

पदच्छेद- ओ३म्  अ॒ग्निम् । ई॒ळे॒ । पु॒रःऽहि॑तम् । य॒ज्ञस्य॑ । दे॒वम् । ऋ॒त्विज॑म् । होता॑रम् । र॒त्न॒ऽधात॑मम् ॥ १.१.१

agni

ई॒ळे॒ म्हणजे स्तुति करणे. अग्नीचे मनुष्याच्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ऋग्वेदाच्या पहिल्याच ऋचेमध्ये अशा अग्नीची स्तुति आणि प्रार्थना केली आहे. यात पुरोहित म्हणजे यज्ञाचे नेतृत्व करणारा पुजारी, ऋत्विज यांचे चार प्रकार असतात- होतार , अध्वर्यु, उद्गाता, आणि  ब्रह्मा.  ऋत्विज म्हणजे योग्य वेळी आहुति देणारा.  ‘होतार’ म्हणजे देवतांचे आवाहन  करणारा, या सर्व शब्दांचे अर्थ आपण पुढील काही भागांत पाहणार आहोत. जी खूप रंजक माहिती आहे. मी सुरुवातीच्या लेखात उल्लेख केलेल्या रशियन विद्वानाच्या व्हिडिओमध्ये त्यांनीं याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे.!

yagya

सर्व वेद हे साधारण चार भागांमध्ये विभागलेले असतात- १. संहिता, २. ब्राह्मण, ३. आरण्यक आणि ४. उपनिषद.

पूर्वी मनुष्याच्या जीवनाचे चार आश्रम किंवा अवस्था मानल्या जात- ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम.

विद्यार्थी जेंव्हा गुरुकुलात वेद शिकायला जाई, तेंव्हा वेदातील चारही भाग तो शिके, पण त्यातील संहिता भाग जास्त करून त्याला ब्रह्मचर्याश्रमात उपयोगी येई, ब्राह्मण भाग गृहस्थाश्रमात, आरण्यक भाग वानप्रस्थाश्रमात आणि उपनिषद संन्यासाश्रमात.    

1) संहिता –

संहिता म्हणजे संग्रह. वेळोवेळी ऋषींनी रचलेले गद्य व पद्य मंत्र विषयवारीने एकत्र केले, त्याच संहिता होत. ऋग्वेद हा पद्यमंत्रांचा संग्रह आहे. हे पद्यमंत्र म्हणजे निरनिराळ्या देवतांच्या मुख्यत: प्रार्थना किंवा स्तोत्रे होत. हा भाग मुख्यतः ब्रह्मचर्याश्रमात उपयोगी येई

२.)‘ब्राह्मण’ या भागात विविध यज्ञ कसे करावयाचे, ह्याचे तपशीलवार विवरण दिलेले आहे. गृहस्थाश्रमात करणे अपेक्षित असलेल्या यज्ञातील प्रधान कर्म, अंगभूत कर्मे, कर्माची साधने, विविध नामे, यज्ञांचे अधिकारी व यज्ञांची विविध फले ह्यांत सांगितलेली असतात. यज्ञकर्मे रीतसर पार पाडण्याचा महिमा सूचित करणाऱ्या देव, ऋषी, असुर इत्यादिकांच्या कथा, योग्य पद्धतीने पार पाडलेल्या कर्माची व साधनांची वर्णने, तसेच अयोग्य रीतीने अनुष्ठिलेल्या कर्मांच्या व निषिद्ध पदार्थांच्या दुष्परिणामांची वर्णने, ह्यांत आलेली असतात.

3) आरण्यके –

अरण्यातच ज्या भागाचे व्रतस्थ राहून पठन करावयाचे तो भाग म्हणजे ‘आरण्यक’ होय. सर्व आरण्यके म्हणजे ब्राह्मणग्रंथांची अखेरची प्रकरणे होत. यांत यज्ञधर्माच्या विधानात्मक विवेचनापेक्षा यज्ञाचे तात्त्विक विवेचन आढळते. मनुष्याने गृहस्थाश्रम संपवून, वानप्रस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर या भागांचा अर्थ त्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकत असावा.

4) उपनिषदे –

सामान्यतः जीव, ब्रह्म आणि जगत्‌ यांचे संबंधात विवेचन करणारे तत्त्वज्ञानात्मक भाग  उपनिषदे म्हणून ओळखली जातात. संन्यासाश्रमात हा भाग समजण्याएवढी प्रगल्भता मनुष्याला आलेली असे. पण म्हणून अर्थात उपनिषद इतर कुठल्या आश्रमात वाचू नये असे मुळीच नाही.

उपनिषदें ही साधारणतः वेदाच्या अंतिम भागात येतात म्हणून त्यांना ‘वेदान्त’ म्हटले जाते. किंवा वेदांचा ‘निचोड’ म्हणता येईल, असा हा भाग असतो. गंमत म्हणजे, ज्या यज्ञ, याग यांविषयी आधीच्या भागात सविस्तर माहिती दिलेली असते, त्यांच्याही पलिकडे ‘परब्रह्म’ कसे आहे, याचे या भागांत वर्णन केलेले असते.

अनेक प्राचीन उपनिषदे ही वर्तमान आरण्यकांचे भाग असावेत. तसेच आज प्रसिद्ध असलेली प्राचीन उपनिषदे ज्या आरण्यकांचे भाग आहेत, त्यांतील उपनिषदांव्यतिरिक्त भागांनाही, ‘उपनिषद’ ही संज्ञा आरण्यकांमध्ये दिलेली असते. उदा., ‘बृहदारण्यक’ (मोठे आरण्यक) हा शतपथ ब्राह्मण नामक ब्राह्मणग्रंथाचा भाग असून हेच बृहदारण्यकोपनिषद म्हणून निर्दिष्ट केले जाते.

ऋग्वेदात साधारणपणे खालील वर्णन आहे.

  1. देवी-देवता : ऋग्वेदात इंद्र, अग्नि , सूर्य, विष्णू, सोम आदी प्रमुख देवतांसह ३३ देवी-देवतांची स्तुती व वर्णन आहे. या देवता विविध नैसर्गिक शक्ती आणि घटनांशी संबंधित आहेत.
  2. निसर्ग : सूर्य, चंद्र, नद्या, पर्वत, वृक्ष, वनस्पति  अशा निसर्गाच्या विविध पैलूंचे वर्णन यात केले आहे. या नैसर्गिक घटकांची देवता म्हणून पूजा केली जात असे.
  3. समाजजीवन : विविध वर्ग, व्यवसाय, चालीरीती व परंपरा यांचे वर्णन करून समकालीन समाजाची झलक यात दिसते.
  4. तत्त्वज्ञान आणि नीति : जीवन, मृत्यू, आत्मा, देवत्व, सत्य, न्याय आणि कर्म या विषयांवर सखोल विचार.
  5. स्तुति आणि प्रार्थना : ऋग्वेदात समृद्धि,  आरोग्य, विजय आणि मोक्षाच्या इच्छांसह देवी-देवतांची विविध स्तुति आणि प्रार्थना आहेत.
  6. पौराणिक कथा : यात अनेक पौराणिक कथा आणि दैवी पात्रे देखील आहेत, जी देवी-देवता आणि नैसर्गिक शक्तींचे सामर्थ्य वर्णन करतात.

प्रसिद्ध ‘गायत्री मंत्र’, तसेंच ‘पुरुष सूक्त’ हे ऋग्वेदाचा भाग आहेत. हे आपणाला माहिती असावे.

पुढील भागात आपण काही अत्यंत रंजक माहिती पाहणार आहोत. नक्की वाचा.

माधव भोपे 

यापूर्वीचे लेख इथे वाचा 

A glimpse of Vedic knowledge-1

A glimpse of Vedic knowledge-2

Trending song Gulabi sadi by two little girls

gulabi sadi dance

Trending song Gulabi Sadi

gulabi sadi dance

This trending Marathi song is choreographed by my grand daughter Saumya and performed by her with her little sister. Saumya has entirely independently choreographed this song. 

Subscribe to Saumyas corner, you tube iconyou tube channel to watch interesting videos